सायबर सेक्युरिटी मध्ये मी आणि माझ्या वयाचे म्हणजे ५०शी च्या आसपासचे लोक एक नवीन आव्हान झेलत आहोत. पूर्वी म्हणजे २००० ते २०१० बिग ४ कंपनीत जॉब मिळणे म्हणजे एक शान होती. तिथे जॉब मिळाला तर उमेदवार उत्तम प्रतीचे कौशल्ये असणारा असणारच असे मानले जात होते. मी अनेकदा बिग ४ मध्ये प्रयत्न केला पण एकदाही यश आले नाही.
२०११ नंतर बिग ४ ने बहुदा कॉस्ट कटिंग साठी आणि ताज्या दमाचे उमेदवार जे अधिक करियर केंद्रित व्यक्तिमत्वाचे असतील अशाना जॉब द्यायला सुरवात केली. सुरुवातीलाच बिग ४ सारख्या कंपन्यांतून कामाचा अनुभव मिळाल्याने आज ते उमेदवार सायबर सेक्युरिटी किंवा इतर सर्व डोमेन्स मध्ये उत्तम कौशल्ये घेऊन मार्केट मध्ये उतरलेत. माझी पिढी जी " छोट्या कामातून अनुभव घेत घेत कौशल्ये वाढवत मोठ्या कंपनीत / कॉर्पोरेट मध्ये जावे" अश्या शिकवणीत घडली त्यांच्या पुढे ही बिग ४ अनुभवाचे मटेरियल असलेली पिढी आमच्यापेक्षा जास्त कौशल्ये घेऊन जॉब मार्केट मध्ये आहे. अशा लोकांचे मी इंटरव्यू घेतो तेव्हाच त्यांच्यातले पोटेन्शियल दिसून येते.
सायबर सुरक्षेतील तांत्रिक कामे, कौशल्ये प्रत्येक महिन्याला बदलत आहेत. नवीन नवीन अटॅक सर्फेस आणि थ्रेट व्हेक्टर निर्माण होत आहेत. त्यामुळे आज जे माझ्या पिढीतील आहेत त्यांच्या पुढे एकतर स्वतःला या पिढीला तोंड देता येईल इतके कॉम्पिटन्ट बनवावे लागेल किंवा दुसऱ्या डोमेन मध्ये [किंबहुना IT व्यतिरिक्त] काम शोधावे लागेल असे दिसत आहे.
या शिवाय अत्यंत वरच्या व्यवस्थापनाला थोडक्यात पण त्यांना इंटरेस्ट असलेली माहिती [KPI / KRI] एक किंवा दोन स्लाईड्स मध्ये ३ ते ४ मिनिटात प्रभावीपणे मांडणे हा एक महत्वाचा स्किलसेट मुलाखतीत तपासला जात आहे.
आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
गाभा:
प्रतिक्रिया
5 Feb 2026 - 11:02 am | कानडाऊ योगेशु
मी ही तुमच्याच बोटीतुन प्रवास करत आहेत. कृत्रिम बुध्दिमत्ता हे आपल्यापुढे सगळ्यात महत्वाचे आव्हान आहे. जी छोटी मोठी कौशल्ये आजपावेतो मिळवली ती ए.आय ने एका झटक्यात प्रभावहीन केलेली आहेत.मुळात आपली अवस्था आता सर्कशीतल्या पिंजर्यातल्या सिंहासारखी झाली आहे.शिकारीची कौशल्ये विसरली गेली आहेत आणि मिळेल त्या तुकड्यावर थोड्याफार कसरती दाखवुन गुजराण करण्याची सवय लागली आहे.
5 Feb 2026 - 11:15 am | युयुत्सु
अखंड शिक्षण, आर्थिक व्यवस्थापनाला पर्याय नाही.
5 Feb 2026 - 12:26 pm | राजेंद्र मेहेंदळे
मी सुरुवातीपासुन नेटवर्क इन्फ्रा मध्ये काम करत आहे. त्यात बर्याचदा ऑपरेशनल सिक्युरिटी(फायरवॉल्,वॅफ, प्रॉक्सी,लोड बॅलन्सर्स्, ऑथेंटिकेशन /आइस किवा रेडियस्/टॅकॅक्स) चे कॉम्पोनंट्स असतातच. मला कायम असे वाटत आलेय की इन्फॉर्मेशन सिक्युरिटी,पॉलिसी क्रिएशन्,ऑडिट हे आमच्या वरच्या पायरीवर आहे. म्हणजे तुम्ही ठरवणार आणि आम्ही फक्त आदेशाचे पालन करणार. आणि तुमच्याही वर सिक्युरिटी आर्किटेक्ट वगैरे लेयर असणार. जो सी एक्स ओ लेव्हलशी कनेक्टेड असणार.
आता तुमच्याच पातळीला काय पण आर्किटेक्ट लेव्हललाही धोका निर्माण झाला आहे असे वाटते. कालच एक मित्र सांगत होता की पुण्यातील एका प्रथितयश बी एफ एस आय कंपनीत आर्किटेक्ट लोकांना एच आर केबिनमध्ये बोलवुन तिथेच लेटर हाती देउन बाहेर काढायच्या घटना घडताहेत, डेस्क वर परतही जाउ न देता. लिंक्ड इन वर रोजच अमेझॉन मधुन हाकललेल्या लोकांच्या पोस्ट दिसताहेत. ज्युनिपर नेटवर्कला एच पी ने टेक ओव्हर केलेय. अँथ्रोपिक् ने नुकत्याच लाँच केलेल्या प्लगिन्स मुळे आय टी कंपन्यांचे शेअर्स धाडकन खाली आलेत. आय टी क्षेत्रातील त्यातही इन्फ्रा मधील प्रिमियम कधीच गेलाय आणि काप गेला नी भोके उरली अशी परिस्थिती येउ घातलीय. (कानडाऊ योगेशु यांनी वर म्हटल्याप्रमाणेच).
त्यामुळे मलातर पुढच्या काही वर्षात चितळे किवा अग्रज किवा तत्सम फ्रेंचाईसी घेउन एक दुकान टाकुन बसावेसे वाटु लागले आहे. जमत असेल तर ५०/५० करुया.
बाकी जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत...........
5 Feb 2026 - 1:08 pm | संदिप एस
४५ वर्च्या आपल्या सगळयांनाच आता पुढे काय याचं प्लॅनिंग कराय्ला लगेल आता, मी पण पी एम आणी डीलीवरी सोबत अजुन काय करता येईल ते बघतोच आहे
5 Feb 2026 - 2:12 pm | गणेशा
मी Big 4 सारख्या मोठ्या कंपनीत काम करत असलो, तरी मनापासून सांगायचं झालं तर हे IT हे क्षेत्र मला कधीच खऱ्या अर्थाने आपलंसं वाटलं नाही. मी IT वाला शोभत नाही असे मला वाटते कायम.. No पॉलिटिक्स.. No बकवास..
फक्त माझी नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि थोडे शिकण्याची तयारी या आधारावर मी या क्षेत्रात टिकून राहिलो, असं माझं प्रामाणिक मत आहे. Big Data हे database प्रमाणेच तुलनेने सोपं वाटल्यामुळे थोडं निभावून गेलो, एवढंच.
आधीच २०१९ ला मनाशी ठरवलं होतं की ४५–४७ वयानंतर नोकरी करत बसायचं नाही. त्यामुळे लवकरच लोन संपवत आणली आहेत (mainly home loan), आर्थिक नियोजन नीट केलं आणि दीर्घकालीन गुंतवणुकीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं. २०१९ पासून केलेली planning आज मागे वळून पाहताना खूप योग्य वाटते. Technical analysys आवडत आणि येत असले तर long term हा एकच fundamental base निकष ठेवला.
गेल्या चार-पाच वर्षांपासून मी एक छोटासा side business करतोय, जो मला मनापासून आवडतो. कोनी नावे ठेवू वा नाही, शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळे आज मला समाधान आहे, ग्राहकांचा एक चांगला base तयार झाला आहे. खरं तर ते ग्राहक नाहीत, तर कुटुंबासारखेच आहेत. आणि त्यातून महिन्याला साधारण ५० हजार रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळतं.
Share market मधील माझा technical अभ्यास वापरून, ग्रॅच्युटीमधून मिळालेल्या (सुमारे १५ लाख) रकमेवर short-term ट्रेडिंग करून महिन्याला ३०–४० हजार रुपयांचं उत्पन्न मिळवता येईल, अशी मला आशा आहे. त्यामुळे निवांतपणे, कोणताही ताण न घेता IT क्षेत्रातून बाहेर पडण्याचा माझा विचार आहे.
शहरात राहत असलो, तरी गावाच्या मातीची ओढ मनात कायम आहे. त्यामुळे खर्च कमी राहील, मन रमेल. गावाकडे जाऊन शेती करीन असं मी म्हणत नाही, पण वर्षातील किमान ५-६ महिने तरी तिकडे राहायचं नक्की. भरपूर फिरायचं आहे,अनुभव घ्यायचे आहेत.
आयुष्याकडून फार काही अपेक्षा नाहीत निवांतपणा, स्वातंत्र्य, समाधान…
आणि उरलेलं आयुष्य स्वतःसाठी जगण्याची संधी, एवढंच
बाकी काय पाहिजे आयुष्या कडून?
IT वगैरे सगळी मोहमाया आहे.. असे माझे वयक्तिक मत आहे आणि आयुष्याच्या या वळणावार आपण आत्मनिर्भर हवेच असे वाटते..
त्यातून अजूनही, लहानपनी चे..शाळेतील..कॉलेज चे (२५ वर्षे जूने )मित्र भेटणारे आहेत, virtual किंवा corporate मित्रां पेक्षा हि नाती अगदी घट्ट आहेत, त्यामुळे त्यातील ३-४ जण मिळून करू काही तरी नंतर असे बोलत असतो, बघू त्याबद्दल काही ठरवले नाही...
आता तर मला, रिडींग बरोबर गार्डनिंग ची आवड लागली आहे, मस्त enjoy करतोय..
नव नविन प्रॉडक्ट(IT नाही) बनवायचे ठरवले आहे त्यात किती यश येते बघू...
बाकी काही नाही केले तरी फिरत राहीन हे मात्र नक्की...
बाकी main: हे big ४ मध्ये काम केलेल्या लोकांची कौशल्य चांगली असतात हा मला भ्रम वाटतो, उलट छोट्या छोट्या कंपनीत कौशल्य वाढवलेली माणसे खुप चांगले काम करतात..
हा interview ला फेकाफेकी करणार्या कडे कौशल्य असतेच असे मला वाटत नाही
- गणेशा.
5 Feb 2026 - 11:08 pm | खटपट्या
मला पण सांगा आयडीया...
5 Feb 2026 - 11:35 pm | अभ्या..
.
असे विचारणारे लोक जमा करणे हीच तर आयडीया आहे....
सत्तर रुपये पडतील. हे उत्तर देणारे गणेशा.
.
(हल्के घे रे गणेशा, तू व्य्वस्थित कमावशील आणि सुप्यातसुध्दा निवांत राहशील ह्याची पूरेपूर कल्पना आहे)
6 Feb 2026 - 10:39 am | गणेशा
नक्कीच, सध्या मात्र फक्त long term चालू आहे..
मागे, अर्थजगत मध्ये थोडेसे मी सांगितले होते येथे, share market ची बाराखडी या धाग्यात..
जेंव्हा पुन्हा सुरु करेल तेंव्हा नक्कीच सांगेल.
Technical मला जास्त आवडते, पण job सोडूनच करेल, technical म्हणले तरी positional, monthly +.
Speculative नाही, options तर नाहीच नाही..
मागे २ वर्षे मध्ये मिळून option साठी bot बनवला, सर्व indicator mathematical calculations ने bot मध्ये implement केले, परंतु bot सुद्धा कायम नीट output (profit) देऊ शकत नाही, so options and bot दोन्ही ला पुन्हा हात लावला नाही.. Option bot बनवताना manually केले होते, आणि profit चांगला कमावला, पण त्यात stress आहे खुप आणि हरण्याची शक्यता खुप, so stress वाल्या गोष्टी करायच्याच नाहीत..
अभ्या,
:)
5 Feb 2026 - 2:33 pm | गवि
वाचतो आहे. एकाच बोटीत तरंगणारे इतर जुने खलाशी बघून हायसे वाटले. हा धागा वाचत राहीन आणि सवडीने त्यात भर देखील घालण्याचा प्रयत्न करेन. प्रतिसाद रूपाने.
महत्वाचा विषय. धन्यवाद.
5 Feb 2026 - 4:28 pm | मूकवाचक
पन्नाशीतल्या पिढीएवढीच (किंबहुना थोडी जास्त), जेन झी बद्दल काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आहे.
5 Feb 2026 - 4:55 pm | कांदा लिंबू
जिव्हाळ्याचा विषय आहे; अनुभवी लोकांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा.
जमेल तशी मीही भर घालीन.
- (एकेकाळचा कोडफोड्या) कांदा लिंबू
5 Feb 2026 - 5:26 pm | विजुभाऊ
मी देखील तुमच्यासारखाच सहप्रवासी आहे.
माझ्या पूर्वीच्या कंपनीने काही वर्षापूर्वी अचानक निवृत्तीचे वय ५८ वरून ५४ केले आणि ५४ + च्या लोकाना एका फटक्यात हद्दपार केले.
तसेच हळुहळू ५०+ वाल्यानाही काहीनाकाही कारण देवून गुलाबी चिट्।ठ्या दिल्या.
सतत नवीन शिकावे लागणे याचा कंटाळा केला तर डायनॉसॉर व्हायला वेळ लागणार नाही हे माहीत आहे. पण या गदारोळात स्वतःसाठी जगणे राहूनच जाते.
आपण एक हमाल इतकेच काय वारंवार सिद्ध होते.
या वयात असताना मुलांची जबाबदारी तशी पुर्ण संपलेली नसते , पण वृद्ध पालकांची जबाबदारी वाढलेली असते.
या शिवाय इतक्या वर्षाच्या शारीरीक / मानसीक आबाळीमुळे स्वतःला बीपी / शुगर इत्यादी भेटवस्तू मिळालेल्या असतात.
सोबतचे बँकेत , पालीकेत एल आय सी मधे कम करणारे मित्र निवान रीटायर्ड लाईफ जगत असतात, कुठेकुठे फिरायला जात असतात तेंव्हा आपण आयटी त आहोत याचा कधीतरी केलेला माज आठवून दु:ख होते.
5 Feb 2026 - 5:26 pm | कपिलमुनी
बिग ४ जाउ द्या , सध्या ४० नंतर आय टी मध्ये नोकरी टिकवणे अवघड झाले आहे .
आयटी वाल्यांनी एखादा तरी इतर धंदा बघावा.
मी ज्योतिष सांगणार आहे . फुल्ल बोल बच्च्चन
5 Feb 2026 - 5:29 pm | विजुभाऊ
सहमत आहे.
ए आय मुळे पुढच्या दोन तीन वर्षानंतर कोडर / टेस्टर ही जमात दिसेल का ते ही सांगता येत नाहीय्ये
5 Feb 2026 - 6:07 pm | जेडी
एका कंपनीत साडे आठ वर्षे इंनजिनिअरिंग मेनेजर म्हणुन काम करुन सुद्धा डच्चु(२०१९) मिळाला होता... तेव्हा पासुन लोयल टु कंपनी चा अर्थ समजला आहे. यु आर आवर फेमिलि असले काही नसते हे हि समजले आणि पुन्हा ह्यात तग धरायची असेल तर कसुन अभ्यास (टेक्नीकल चा) ला पर्याय नाही हे ही उमगले. तेव्हापासुन ४ कंपन्या बदलल्या आणि पेकेज दुप्पट केले. करंट कंपनीला आपल्यापेक्शा चांगला मिळणार नाही तोवर ठीक चालेल .
5 Feb 2026 - 8:03 pm | सुबोध खरे
चाळीशी पन्नाशी च्या पुढचे अनेक आय टी तंत्रज्ञ/ अभियंते माझ्याकडे रुग्ण म्हणून येत असतात.
अशा पैकी अनेक लोक आता या स्थितीत नोकरी गेली तर अर्ध्या पगाराची सुद्धा नोकरी मिळणार नाही अशी स्थिती झालेली असल्याने चिंताग्रस्त झालेले आढळतात.
यामुले अनेक लोकांना नीट झोप लागत नाही, कुणाला पचनाची तक्रार सूर झालेली असते. कुणाला घाबरायला होत असते. कुणाचे सेक्स लाईफ बिघडलेले असते
दुर्दैवाने बरेचसे पुरुष हि स्थिती आपल्या कुटुंबाला नीट पणे सांगू शकत नाहीत. कारण आपल्या ताणतणावात बायको मुलांना/ कुटुंबाला कशाला ओढायचे या विचाराने गप्प राहतात.
अर्थात त्यांच्या नोकरीबाबत मी काहीच करू शकत नाही हे मला आणि त्यांनाही माहित असते. पण कुठेतरी आपले मन मोकळे करायला मिळते म्हणून त्यांच्या आणि माझ्या गप्पा होतात. त्यांनी काय करावे हे मी काही सूचित करत नाही कारण तो आगाऊपणा असतो.
अशा वेळेस अनेक लोक आपल्याला कोणताही गंभीतर आजार नाही हे जाणून थोडेसे सुस्कारा सोडतात कारण या स्थितीत गंभीर आजारपण म्हणजे मोठे संकट असू शकते हे त्यांना माहिती आहे. यामुळे या स्थितीत जर आपला आरोग्य विमा उतरवलेला नसेल तर तो जरूर उतरवून घ्या कारण कंपनीतून काढले कि कंपनीचा विमा आपल्याला संरक्षण देणार नाही हे मी आवर्जून सांगतो.
स्त्रिया त्यामानाने थोड्या बऱ्या स्थितीत असतात. कारण बहुसंख्य स्त्रियांनी आपले प्रश्न नवऱ्याला सांगितलेले असतात आणि नवऱ्याची नोकरी शाश्वत असेल तर हि चिंता बरीच कमी असते.
अशा लोकांना माझा अनाहूत सल्ला एवढाच असतो कि आपण आपल्या बायको किंवा मुलांना विश्वासात घेऊन आपली स्थिती नक्की सांगा कारण त्यामुळे इतके दिवस लाड करणारा आपला बाप हात आखडता का घेतो हे मुलांना समजून घेणे सोपे जाते. किंवा बायकोला सुद्धा आपण खर्च जपून करायला हवा हे सहज समजून येते.
शक्य असेल तर या स्थितीबद्दल आपल्या आई वडिलांशी सुद्धा विचार विनिमय करा. ते बहुसंख्य वेळेस मोलाचा सल्ला देऊ शकतील. अगदीच काही नाही तरी मनावरचे ओझे हलके करण्यात आपल्याला नक्की मदत मिळेल. बऱ्याच लोकांचा आपल्या आईवडिलांशी संवाद तुटलेला आहे हे सुद्धा या वेळेस लक्षात येते.
आपण कालबाह्य होत चाललो आहोत हा विचार फार त्रासदायक असतो.
मी स्वतः;बदल सांगतो आहे. मी गेली १५ वर्षे फक्त सोनोग्राफी करतो आहे त्यामुळे सिटी स्कॅन एम आर आयसारख्या तंत्रज्ञानांपासून मी लांब होत चाललो आहे हा विचार मला सतावत होता.
एक दिवस पहाटे झोपेतून उठून मी विचार करत असताना मला एक विजेचा लोळ चमकून गेला.
एम बी बी एस झालो तेंव्हा रेडिओलॉजीचा गंध सुद्धा नव्हता एम डी करून मी हा विषय पूर्ण शिकलो त्याला तीन वर्षेच लागली मग आता इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे आपल्याला हेच तंत्रज्ञान शिकायला किती वेळ लागेल फार तर दीड वर्षे. या विचारानंतर मला शांत झोप लागली
अर्थात माझा सोनोग्राफीचा व्यवसाय उत्तम चालू आहे आणि माझ्या दोन्ही मुलांची लग्नं झालेली असल्याने मी संसाराच्या जबाबदारीतून मोकळा झालो आहे आणि आर्थिक विवंचना तर नाहीच.
पण हाच विचार मी एक दोन आय टी मधील लोकांना बोलून दाखवला. त्यांना हेच विचारले तुम्हाला ए आय/ एल एल एम किंवा तत्सम तंत्रज्ञान नव्याने शिकायला किती वेळ लागेल?
त्यांना पण एकदम लक्षात आले कि अरे इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर हे आपण साधारण एक वर्षात शिकू शकतो.
आता मला त्या तंत्रज्ञानाबद्दल काहीही माहिती नसली त्यामुळे त्यांनी काय करावे हे मी त्यांना अजिबात सांगू शकलो नसलो तरी तरी त्यांना स्वतःबद्दल एकदम हुरूप आणि आत्मविश्वास वाटू लागला.
ज्यांना आपण कालबाह्य झालो आहोत असे वाटत असेल त्यांनी असा विचार करून पाहायला हरकत नाही.
5 Feb 2026 - 11:38 pm | कपिलमुनी
फरक फक्त तंत्रज्ञानाचा नाहीये. स्वस्त लेबर उपलब्ध आहे. हे पिरॅमिड सारखे आहे, वरती जागा कमी आहे.
त्यात सध्या जागतिक वातावरण ठीक नसल्याने मोठ्या गुंतवणुकी होत नाहीये. भारतात सर्व्हिस बेस इंडस्ट्री आहे. मला ह्या माणसाच्या तासाचे ३० डॉलर मिळाले तर मी त्याला २० देऊ शकतो. मग त्याचा पॅकेज चे तेच लिमिट आहे. या टाईप हिशोब असतो.
शिवाय दर वर्षी वाढ आणि नोकरी बदलतील वाढ यामुळे रिसोर्स झेपेंना होतो. मग त्याची चूक नसली तरी काढावा लागतो. त्या पगारात 4 टाळकी येतात . जास्त तास बिलिंग मिळते
6 Feb 2026 - 12:35 pm | सोत्रि
डॉक,
~५० वर्ष वयाचे, आयटीत २५-३० वर्ष करीयर असणारे प्रोफेशनल्स यांना फक्त आत्मविश्वास नाहीयेय आणि तो कोणीतरी द्यायला हवा इतका जनरलाइझ करण्याइतका हा सोपा इश्यु नाहीयेय, तसं समजणं हे एकदम 'नाइव्ह' आहे. भारतातलं 'आयटी इंडस्ट्रीचं' स्ट्रक्चर आणि ऑपेरेशन्स समजावून घेणं त्यासाठी गरजेचं आहे. लेखाच्या गाभ्याशी जाण्यासाठी ते समजणं गरजेच आहे.
- (आयटीग्रस्त) सोकाजी
6 Feb 2026 - 8:15 pm | सुबोध खरे
"यांना फक्त आत्मविश्वास नाहीयेय आणि तो कोणीतरी द्यायला हवा इतका जनरलाइझ करण्याइतका हा सोपा इश्यु नाहीयेय, तसं समजणं हे एकदम 'नाइव्ह' आहे."
तसं मी अजिबात समजत नाही जर माझ्या या लेखनामुळे आपला असा गैरसमज झाला असेल तर ती माझ्या लेखनाच्या क्षमतेची मर्यादा आहे.
आपले आईवडील आपल्या क्षेत्राबद्दल काहीही जाणत नसतील तरी आईवडिलांनी दिलेला दिलासा हा जसा मनाला थोडा उभारी देणारा ठरतो तसेच आहे.
जखमेवर फुंकर घातल्यामुळे जखम बरी होते असे नव्हे पण थोडेसे समाधान होते.
"आयटी इंडस्ट्रीचं' स्ट्रक्चर आणि ऑपेरेशन्स " या बद्दल मला काहीही माहिती नाही त्यामुळे मी त्यांचा प्रश्न सोडवू शकेन अशी सुतरामही शक्यता नाही किंवा तसा माझा दावा हि नाही.
असे माहिती असताना सुद्धा लोक माझ्याकडे मन मोकळं करतात याचं कारण माणसाला आपला ऐकून घेणारा सुद्धा कुणी तरी हवा असतो.
शेवटी हा प्रश्न ज्याचा त्यानेच सोडवायचा असतो.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे स्वामी समर्थ सुद्धा प्रत्यक्ष मदत करायला येत नाहीत पण आपल्या पाठीशी कोणीतरी आहे हा दिलासाच असतो.
माणसाला आपल्याला आपली कौशल्ये मिळवायला फार कष्ट लागणार नाहीत एवढे णूस्टॅ सांगण्या मुळे सुद्धा असाच "केवळ दिलासा" मिळतो.
5 Feb 2026 - 9:18 pm | खटपट्या
जिव्हाळ्याचा धागा. सध्या निव्रुत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने सर्व प्रतिसाद मनाला भावले.
खरे तर आय टी क्षेत्र हे प्रचंड बौध्दीक दमछाक करणारे आहे हे मागील १० वर्षात प्रकर्षाने जाणवू लागले. एखादे सर्टीफिकेशन केल्यावर त्यात काम करुन दोन वर्षे होत नाहीत तो पर्यंत ते तंत्रज्ञान कवडीमोल होते. परत दुसरे शिका, त्यात सर्टिफिकेशन करा आणि सिध्द व्हा, थोडे दिवसात मी वैतागलो आणि सर्टिफिकेशन करायचे थांबवले आणि युटुयुब वर बघुन काम करु लागलो. माझे बेसिक पक्के असल्याने युटुब आणि बाकीच्या साइट्स काम करण्याएवढे ज्ञान देउ लागल्या. पण तरीही पोंक्षे सर म्हणतात तसे नवीन पोरं येउन काही कामे लिलया करत असत ते पाहुन न्युनगंड येवु लागला.
आता मी परीस्थीती पुढे हात टेकले. माझ्या सोबतच्या काही लोकांनी मानेजमेंट मध्ये जाउन आपले जॉब वाचवले (म्हणजे माझ्या द्रुष्टीने उंटावरुन शेळ्या हाकणे होते) काही दिवस मी ते केले आणि नंतर मी काही महीन्यांनी मागे वळून पाहीले तर गेल्या दोन वर्षात मी फक्त पीपीटी, एक्सेल आणि तत्सम कामे करुन फक्त मानेजमेंट करण्याचा आव आणतो आहोत हे जाणवले. डेजिगनेशन बदलुन फक्त पगार फुगत होता पण मी काय आहे आणि करतोय काय ही रुखरुख मनाला खात राहीली.
मी कलाकार असल्याने आता कलेत आणि अध्यात्मात माझे मन रमवत आहे. निव्रुत्त झाल्यानंतर मी कलेला वाहीलेला एखादा जॉब घेइन.
ये आय टी हमे रास नही आयी ...
6 Feb 2026 - 10:44 am | गणेशा
एक job सोडून पुन्हा job च का करायचा?
कलाकाराचा खरा आनंद निर्मिती मध्ये असतो.. Job मध्ये कलेला अडकवून तितकासा आनंद मिळेल?
जास्त बोलत नाही, कारण कला आणि कलाकार यांचा respect आहेच..
6 Feb 2026 - 9:32 pm | खटपट्या
जॉब म्हणजे स्वयंरोजगार म्हणायचे आहे मला.
छंदातून पैसा. नाही मिळाला तरी चालेल पण आवडीचे काम केल्याचे समाधान.
6 Feb 2026 - 2:04 am | कंजूस
सर्वच क्षेत्रांत सोपे करणे, लवकर करणे प्रक्रिया घुसल्याने कर्मचारी कमी करणे किंवा त्यांच्यावर अवलंबून न राहणे हे सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कायमचे ठेवून घेण्याची गरजच कमी होत आहे. शिक्षण असो की शेती.
उलट
आरोग्य क्षेत्रात मात्र रुग्णांना घाबरवून पैसे काढणे वाढत आहे.
खाद्यपदार्थ खरेदी विक्री ( रेस्टॉरंट्स धंदा)वाढत आहे.
तसेच करमणूक आणि पर्यटन व्यवसायही.
बाजारात माल खपवणे ही कला ( मार्केटिंग)- यांची गरज वाढते आहे. त्यातील सल्ले देणे वगैरे.
6 Feb 2026 - 1:26 pm | सोत्रि
हा माझा अत्यंत जिव्ह्याळ्याचा विषय आहे, त्या अनुषंगाने माझे २ सेंट्स.
साधारण १३-१४ वर्षांपूर्वी आयटीची 'सर्व्हिस इंडस्ट्री'सोडून 'कॅप्टीव्ह इंडस्ट्री' जॉइन केली. सातत्याने कमी होत जाणार्या बिलींग रेट्समुळे आयटी कंपन्यांची कट थ्रोट कॉम्पीटीशन, त्यामुळे बिलेबल राहण्यासाठीची कसरत (हुजुरेगीरी), सतत अपडेट होत असलेल्या technology च्या बदलाचा पेस पकडून, बाजारात येण्यार्या तरूण रक्ताशी कॉम्पीट करत राहण्याची अपरिहार्यता आणि त्याने वाढत्या वयामुळे येणारा तणाव, वाढत्या अनुभवाच्या तुलनेत पिरॅमीड स्ट्रक्चरमुळे कमी होत जाणार्या वरच्या पोजिशन्स ही काही महत्वाची कारणं त्यामागे होती.
साधारण ७-८ वर्षांपूर्वीच, ह्या सगळ्या कॉर्पोरेट गदारोळातून लवकरच बाहेर पडायचे असे मनाची ठरवले होते. आयुष्यभर शिकत रहायला हवे, शिकणं थांबलं की मनुष्य थांबला, हे सगळं खरं असलं तरीही ते बाय चॉईस असायला हवं न की बाय फोर्स. कॉर्पोरेट मधलं शिकणं हे माझ्यासाठी बाय फोर्स आहे हे लक्षात आल्याने त्यातली गंमत माझ्यासाठी संपली. आणि, आयुष्याची दुसरी इनिंग लवकरच चालू करायला हवी हे लक्षात आलं. त्यासाठी 'फायनॅन्शियल इन्डीपेन्डन्स' असणं गरजेच असल्याने त्यासाठी लागणारं आर्थिक नियोजन अग्रेसीव्हली सुरू केलं. सुदैवाने इक्वीटी मार्केटचं महत्व समजावून देणारे मित्र योग्य वेळी भेटल्याने वयाच्या ५० व्या वर्षी रिटायर (FIRE) होण्यासाठीचं प्लानिंग योग्यवेळी सुरू केलं. मोस्टली तो गोल ऑल्मोस्ट पूर्ण होत आलाय. धाकट्याचं इंजीनीयरींग पूर्ण होइपर्यंत ३ ते ४ मिनिटात प्रभाव पाडणार्या स्लाईड्स करता येण्याचं स्कील वापरून जितकी वर्ष रेटता येतील रेटायची असा तूर्ताचा प्लॅन आहे.
त्यानंतर, टीयर ३-४ सीटीत, निसर्गाच्या सानिध्यात आयुष्याचा उत्तरकाळ, शांतपणे शरिराचे स्वास्थ्य सांभाळत, शांततापूर्ण मार्गाने व्यतीत करायचा हे ठरवून एक शेतजमीन घेऊन ठेवली आहे. त्यातुन उत्पन्न अजिबात अपेक्षित नाही. जे खायचं ते ऑर्गॅनिक पिकवून खायचं आणि शरीराची हालचाल होउन, व्यायाम होऊन तब्बेत धडधाकट राहवी हा हेतू. उरलेल्या वेळात गणेशा म्हणाला तसं थोडसं ट्रेडींग करून थोडाफार कॅशफ्लो मिळवणं (त्यासाठी सतत शिकणं, बाय चॉइस) , वाचन-लिखाण करणं, विपश्यना ध्यान शिबीरांमधे सेवा देऊन समाजाचे जे देणं लागतो त्यातुन ऊतराई होण्याचा प्रयत्न करणं असा भरगच्च रिटायरमेंट प्लॅन आहे. सध्यातरी तो ऑनपेपर आहे जो धाकट्याचं इंजीनीयरींग पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष अमलांत आणायचा आहे. AIच्या कृपेने जर त्याधिच तो अमलांत आणण्याची गरज निर्माण झाली तर त्यासाठीची मानसिक आणि आर्थिक तयारी करून ठेवली आहे. रिटायरमेंट आयुष्याचा 'मिनिमलीस्टीक लाईफस्टाईल' हा मूलमंत्र ठरवून ठेवला आहे.
पुढे जशी चर्चा सरकेल तशी भर घालत राहिन.
- (पन्नाशीतला आयटीग्रस्त) सोकाजी
10 Feb 2026 - 12:07 am | हणमंतअण्णा शंकर...
सेम पिंच.
मी तर टियर १८ ठिकाणी घर बांधत आहे.
6 Feb 2026 - 3:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण महत्वाचा विषय असल्याने धाग्यावर पुन्हा चक्कर मारुन प्रतिसाद बघितले.
आय टी कंपन्यांमध्ये साधारण ५ प्रकार अहेत
सर्विस ईंडस्ट्री- विप्रो, ईन्फोसिस्,टी सी एस
कॅप्टिव्ह कंपन्या- अनेक मेन्युफॅक्चरिंग, बी एफ एस आय किवा तत्सम नॉन आय टी सेक्टरमधल्या परंतु आय टी वर अवलंबुन असणार्या आणि म्हणुन ईंटर्नल स्टाफ बाळगणार्या
प्रॉडक्ट कंपन्या- सिस्को, पालो अल्टो, ज्युनिपर वगैरे
अजुन एक प्रकार म्हणजे क्लाऊड किवा क्लाउड बेस्ड सर्विस देणार्या- गुगल,मायक्रोसॉफ्ट्,अमेझॉन्,ओरॅकल वगैरे
आणि पाचवा म्हणजे ईंटर्नेट सर्विस प्रोव्हायडर किवा आय एस पी उदा. एअर्टेल,टाटा, बी टी, ए टी अँड टी
आता यात सगळेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत कारण निव्वळ प्रॉडक्ट कंपनी किवा निव्वळ सर्विस कंपनी असे राहीले नाही. उदा. सिस्को किवा आय बी एम प्रॉडक्ट विकतेच पण त्याबरोबर सर्विसेस ही पुरवते. ईन्फोसिस सर्विसेस देते पण त्यांचे फिनॅकल हे लोकप्रिय प्रॉडक्टही आहे. टाटा किवा बी टी ईंटर्नेट पुरवते पण त्याबरोबर सर्विसेसही देते.
अजुन गोंधळ म्हणजे हे सगळे एक मेकांचे ग्राहक सुद्धा आहेत. म्हणजे गूगल भारतात बॅकबोन किवा इंटरनेट साठी टाटा किवा जिओ वर अवलंबुन आहे (कोणताही लोकल प्रोव्हायडर) तर हार्डवेअर प्रॉडक्ट साठि गूगल किवा टाटा हे सिस्को, ज्युनिपर वर अवलंबुन आहेत. सिस्को क्लाऊड बेस्ड ऑफरिंग साठी यातीलच कोणत्यातरी क्लाऊडवर अवलंबुन आहे. विप्रो/टी सी एस एकाच वेळी सिस्को पार्टनर आहेत आणि स्पर्धकही आहेत.
आता आपल्यासाठी मुद्दा असा की कोणाची नोकरी जास्त सुरक्षित आहे? सर्विस कंपनी कडे नेहमीच काही ना काही काम असते त्यामुळे पगार वाढला नाही तरी (शक्यतो) नोकरी चालु राहते. प्रॉडक्ट कंपनीचे प्रॉडक्ट चालेनासे झाले किवा मर्जर झाले तर नोकरी धोक्यात येउ शकते. कॅप्टिव्ह मध्ये तर हायर मॅनेजमेंट बदलली की उलथापालथ ठरलेलीच. क्लाउड कंपन्यांच्या बातम्या तर आपण रोजच पेपरात वाचतो. ईतके हजार काढले नी काय काय. आणि ईंटरनेट मधील मार्जिन कधीच कमी झालाय नी त्यात सरकारी नियम स्पेक्ट्र्म वगैरे घोळ आहेतच.
बापरे---लिहुन लिहुन दमलो. काय करावे बुवा या पुढे?
6 Feb 2026 - 3:53 pm | अमरेंद्र बाहुबली
मी नॉन आयटी वाला आहे, आयटीत नेमके काय काम चालते हे समजत नाही समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी. पण इतकी माहिती आहे की आयटीत प्रचंड पैसा आहे २४ नी ३० लाख पॅकेज मिळवांरे अनेक आहेत. २०१४ साली एकाने सांगितले होते की आयटी आणी मॉडेलिंग क्षेत्रात प्रचंड पैसा असतो इतका की इतर इंडस्ट्रीत तुम्ही आयुष्यभर कमवाल तेवढा आयटीत १० वर्षात कमावला जातो. असे असेल तर आयटी वाले अजून जास्त पैसे कमावण्याची धडपड का करतात?
6 Feb 2026 - 4:23 pm | गणेशा
खरं तर समाधान असेल, तर IT आणि Non-IT असा कोणताही भेदच उरत नाही.
समस्या पैशात नाही, तर पैशानंतर अंगावर चढणाऱ्या लाईफस्टाईल नावाच्या मुखवट्यात आहे.
पैसा आला… आणि त्याच्यासोबत मोठं घर, भारी गाडी, महागडं स्कूल, मोठ्या बाता यांची हौस लागली, की मग माणूस नकळत रेसमध्ये उतरतो.
आवड म्हणून नाही, तर लोकांना दाखवण्यासाठी जगायला लागतो.
बायको किट्टी मध्ये असेल तर ह्या ठिकाणाला भेट देऊन फोटो टाकले नाहीत तर कमीपणा असतो.. मग
प्रवास अनुभवण्यासाठी नाही, तर “आम्ही कसे फिरतो” ह्या मुखवट्यात राहण्यासाठी सुरु होतो..
दोघं कमावत असतील तर, “मला माझ्या पैशांचं वेगळं घर घ्यायचंय”, “हे आपल्या पोराच्या भविष्यासाठी आहे”, “रिटायरमेंटनंतर उपयोगी पडेल”…
आणि समोरच्याला “तुला हे कधी कळणारच नाही.” असे भासवून भविष्य वादी गुंतवणूक दाराचा मुखवटा चढवला जातो..
या साऱ्या race मध्ये आपल्यावरच तर खर्च करतोय ना, ह्या अहंकाराच्या मुखवट्यात जगत जगत जास्त पैसे कमावणाऱ्याला अजून पैसा हवा वाटतो…
गणेशा
6 Feb 2026 - 5:44 pm | नावातकायआहे
बाडिस!
6 Feb 2026 - 5:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
अबा
या विधानाला हसावे की रडावे कळत नाहीये.
पहीले तर मला वाटत नाही की ईतर ईंडस्ट्री आणि आय टी वाल्यांच्या पगारात ईतका फरक असेल. एकतर आय टी हा फारच जेनेरिक शब्द आहे. त्यात ८० टक्के पाट्या टाकणारे आणि २० टक्केच काहीतरी चॅलेंजिंग काम करणारे असतात. त्यातही तुम्ही जे काम करता ती टेक्नॉलॉजी किती निश आहे आणि ती किती काळ निश राहणार आहे हाही मुद्दा आहेच. आजची निश टेक उद्याची कमॉडिटी आणि परवा रिडंडंट व्हायला वेळ लागत नाही.
त्यातही परदेशात तुम्ही पन्नाशी पर्यंत आपापल्या टेक्नॉलॉजी मधे कन्सल्टंट किवा कॉट्रॅक्टर म्हणुन काम करु शकता पण भारतात ते रोल फारच कमी. मग १० वर्षे अनुभव झाला की तुम्हाला जबरदस्तीने पीपल /प्रोजेक्ट मॅनेजमेंट करावी लागते. नाहीतर मग आपल्या पेक्षा वयाने लहान मॅनेजर ला रिपोर्ट करावे लागते. आणि दोन्हीकडे मिड लाईफ क्रायसिस ठरलेलाच.
अजुन एक--फक्त पैसा हाच विषय नाहीये. उदा. आर्मी नेव्ही किवा काही सरकारी नोकर्यांत ईतर फायदे (मेडिकल, हाउसिंग, मुलांना शिक्षणात आरक्षण वगैरे) आणि काही ठिकाणी वर्क लाईफ बॅलन्स मिळतो त्याची किंमत मोजता येत नाही.
या एकदा बसुया!!!
6 Feb 2026 - 5:07 pm | गवि
शतशः सहमत.
6 Feb 2026 - 5:20 pm | अमरेंद्र बाहुबली
गणेशाजी, हा मुखवटा प्रत्येकाचा फुगलेलाच असेल असे नाही.
पहीले तर मला वाटत नाही की ईतर ईंडस्ट्री आणि आय टी वाल्यांच्या पगारात ईतका फरक असेल.आहे! माझ्या ओळखचीचे नी वयाने लहान असलेले अनेक जण २०-२४ लाख वार्षिक कमावताहेत आयटीत. दुसरी गोष्ट मिपावरच अनेक लोक ४५ च्या आसपास आयटीतून भरपूर पैसा कमावलेले निवृत्त झालेले आहेत. प्रश्न हा आहे की आयटीत प्रचंड पैसा आहे, कमावलेलाही भरपूर असतो तरीही आयतो वाले ४५-५० मध्ये जॉब जायला घाबरतात का?6 Feb 2026 - 5:32 pm | गणेशा
आता याचे काय उत्तर द्यायचे?
१. पैसा कमावला आहे, पण सर्व अतिरिक्त किंवा जागा - घर यात टाकून emi मध्ये असेल म्हणून.
२. Invest / save करून न ठेवल्या मुळे असेल..
आणि असे नसून पैसा असून दुसऱ्याच कामच करायचं असेल तर त्यांच्या भाषेत passion आणि माझ्या भाषेत मानसिक गुलामी.
बाकी काय?
तुम्हाला कायम खुप प्रश्न पडत असतात.. मला तर वाटते उत्तरे पण तुम्हाला येत असावीतच :)
6 Feb 2026 - 6:13 pm | धर्मराजमुटके
मिपावर खुप प्रश्न पडणार्यांत गामा आणि अबांचा पैला नंबर आहे :)
6 Feb 2026 - 6:55 pm | सोत्रि
फीयर ॲाफ अननोन!
दरमहा येणाऱ्या पगाराचं सेफ्टीनेट इतकं तगडं असतं की ते बंद झालं तर काय ही कल्पनाच करवत नाही. त्याची भिती असते.
- (सेफ्टी नेट मधे अडकलेला) सोकाजी
6 Feb 2026 - 8:37 pm | अभ्या..
छाम..
बाजारात अजून नवीन रोजगार उपलब्ध होणार म्हणजे....
आयटीवाल्यांनी खरोखर धंंद्यात किंवा नवीन क्षेत्रात स्विच करायचे ठरवले तर मार्केटमध्ये तुफान तेजी येऊ शकते. प्रचंड रोजगार निर्मीती होऊ शकते. गरज आहे भारताच्या मार्केटला त्याची.
.
ही बूम संपल्यानंतर मात्र फ्लो उलटा वाहील तो मात्र आजच्यापेक्षा सिरियस असेल.
6 Feb 2026 - 8:46 pm | अमरेंद्र बाहुबली
आय टी क्षेत्र येत्या २-४ वर्षात बंद पडेल असा सल्ला मला एकाने २०१० साली दिला होता. तेव्हा आयटी हा काय प्रकार आहे हेच माहीत नव्हते, इलेक्ट्रिनिक, मेकॅनिकल, कंप्यूटर ज्याला एडमिशन मिळेल त्याला घ्या असा प्रकार तेव्हा होता, खरे तर डिप्लोमा पास होणार की नाही? हा प्रकार तेव्हा असायचा प्रचंड प्रमानात नापास झालेले नी वर्षानुवर्षे विषय देणारे आजूबाजूला फिरत असायचे. १ ल्या वर्षी ६० ची बॅच असेल तर सेकंद ईयर ला २५ जायचे, थर्ड ला १५ असायचे. अश्या वेळी आम्ही १२ लोक डायरेक्ट सेकंद ईयर ला एडमिशन घेतले त्यातले आंही दोनच थर्ड ईयर ला गेलो मी आणी माझ्या मागे बसणारा, तो ही १० विषयाना पाचची एटीकेटी होती म्हणून. माझे ऑल क्लिअर होते.
तेव्हा आयटी हा प्रकार माहीत असता तर नक्कीच घेतले असते, प्रचंड पैसा ह्या क्षेत्रात आहे हे माहीत असते तर नक्कीच!
7 Feb 2026 - 7:54 pm | अभिजीत अवलिया
चांगला आणि फार महत्वाचा विषय आहे. गेल्या 3 वर्षात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ने चांगलीच मजल मारली आहे. ३ वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही स्वतः कोडींग करत होतो. मग हे GitHub copilot आले. सुरवातीला फक्त टेस्ट केसेस साठी थोडीफार मदत म्हणून GitHub copilot चा वापर कंपनीने सुरु केला. पण गेल्या वर्षापासून GitHub Copilot chat चा वापर सुरु केलाय आणि आता कोडींग मध्ये देखील Copilot is must असे झालेय. Github copilot जर Visual Studio code मध्ये वापरले तर एकदम चांगले काम करतोय. त्यामुळे येत्या १-२ वर्षात कोडींगचे काम देखील किती उरेल ह्याची शंका आहे. कारण सतत नवीन नवीन advanced agents येतच आहेत.
गेली बरेच वर्षे मॅनेजर असून देखील मी जास्त वेळ technical कामे करण्यात घालवत होतो. उद्देश एकच होता की टेक्निकल स्किल्स विसरले जाऊ नयेत. पण आता GitHub Copilot सगळे करणार असेल तर कोडींग स्किल्सच्या जीवावर काही टिकता येणार नाही. त्यामुळे २-३ वर्षात रिटायरमेंट घेण्याची वेळ येईल असेच वाटतेय.
बाकी ह्या ऑटोमेशनमुळे मुलांनी नक्की कुठले उच्चं शिक्षण घ्यावे हे पण कळत नाहीये. कारण ते जे शिक्षण घेतील ते पूर्ण होईपर्यंत कदाचित त्यांनी घेतलेले शिक्षण कालबाह्य झालेले असेल. आणि ह्याच मुळे मी देखील गेली २ वर्षे कुठलेच सर्टिफिकेशन वगैरे देखील केलेले नाही.
बाकी एखादा दुकान गाळा घेऊन ठेवणे अथवा थोडी शेतजमीन घेणे हा एक चांगला पर्याय वाटतोय.
9 Feb 2026 - 4:35 am | सुक्या
महत्वाचा विषय आहे.
copilot किवा ग्रोक सारख्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सहय्याने कोड लिहिला जातोय. त्याचा वापर वाढला आहे हे नक्की. परंतु त्यामुळे भविष्यात एक नवीन समस्या उभी राहु शकते. ती म्हणजे तांत्रीक भाषेत बोलायचे तर "टेक्नीकल डेब्ट". समोर चालता बोलता कोड आहे परंतु जो ईंजीनोयर त्याला सपोर्ट करतो आहे त्याला त्याची माहीती नसणार आहे. मग जेव्हा काही गडबड होईल तेव्हा तो प्रोब्लेम फिक्स करायला ईंजीनोयर ची फे फे उडणार आहे.
मागच्याच अठवड्याची गोष्ट सांगतो. माझ्या कंपणीत एका ग्रुप ने एक प्रोटोटाईप सादर केला. तो व्यवस्थीत चालला. परंतु ज्या ईंजीनोयर ने तो लिहीला किंवा लिहुन घेतला त्याला तो कोड कसा काम करतो आहे हे सादर करताणा प्रचंड गोंधळ उडाला. त्याला तो कोड का लिहिला किण्वा कसा काम करतोय, तसेच त्याची ईतर कोड साठी कंपॅट्बीलीटी कशी राहील सांगता येत नव्हते.
ऑटोमेशनमुळे कामे नक्की होतील. परंतु माहीती तंत्रज्ञानातले ऑटोमेशन हे उत्पादन क्षेत्रातल्या ऑटोमेशन पेक्षा वेगळे असल्यामुळे भविष्यात सावळा गोंधळ उडणार आहे हे नक्की.
7 Feb 2026 - 10:25 pm | कांदा लिंबू
२००१ ते २०१२ मी मा तं कंपन्यांत पूर्णवेळ नोकरी केली. नंतर काही वर्षे consulting केली. मागच्या आठ-दहा वर्षांपासून मा तं प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे. पोटापाण्यापुरते पैसे मिळतात. वर्षभरात कमाल १५० दिवस काम करतो, इतर दिवशी आयुष्य जगतो.
मतभिन्नतेच्या आदरासहित -
"मला काम मिळेल का?" , "मला कामाचे पुरेसे पैसे मिळतील का?" असे प्रश्न better-than-average कौशल्य पातळी असलेल्या लोकांना पडू नये असे मला वाटते.
ज्ञात मानवी इतिहासात आजच्याइतका रोजगार पूर्वी कधीही उपलब्ध नव्हता, आजच्याइतकी रोजगारक्षम होण्याची साधने पूर्वी कधीही उपलब्ध नव्हती, आजच्याइतका चढा रोजगार मोबदला पूर्वी कधीही मिळत नव्हता.
(सध्या वेगाने पडणारी) काळाची पावले ओळखून उद्या कोणत्या कौशल्याचे गरज असेल ते कौशल्य आज प्राप्त करून तयार ठेवणे हा अर्थप्राप्तीचा, किमान relevant तरी राहण्याचा मूलमंत्र आहे.
मी कॉलेजात असताना STD PCO चा धंदा प्रचंड प्रमाणात चालायचा. त्याची एक CPD नावाची मशीन असायची. तिची दुरुस्ती-देखभाल वगैरे कामे तेव्हा फावल्या वेळात करायचो. त्या कामाची तेव्हा बरीच मागणीही असायची. आज त्या कौशल्याचा काय उपयोग आहे? पण त्याचबरोबर Co-pilot या कौशल्यास आज मागणी आहे ज्याची त्यावेळी कुणी कल्पनाही केली नव्हती.
त्याचप्रमाणे SQL, PL/SQL, HTML, CSS वगैरे पासून Java JavaScript ते microservices वगैरे मधील कोडींगचं काम माणसांसाठी संपुष्टात येऊ घातलं आहे, ते काम AI टूल्स् अधिक चांगल्या प्रकारे व कमी खर्चात करायला लागली आहेत.
सध्याची गरज आहे ती AI कडून ही कामे करवून घेणे. हे कौशल्य असलेल्यांना आज-उद्या रोजगार असेल, परवाच्या रोजगाराचे चित्र वेगळे असेल पण रोजगार असेल हे नक्की.
अनुभवाधारित कौशल्य हवे असलेल्या क्षेत्रात उदा वैद्यकीय क्षेत्रात अधिक अनुभव म्हणजे अधिक मोबदला हे कदाचित बरोबर असेल. पण मा तं क्षेत्रात, जिथे एखादं टूल उदा cloude नुकतंच निर्माण झालं आहे तिथे २५-३० वर्षांच्या अनुभवाची काय गरज असणार? आणि त्या अनुभवाला काय म्हणून अधिक मोबदला मिळणार?
मी माझ्या मर्यादित माहिती-समजुतीच्या आधारे हे लिहीत आहे. "नजीकच्या भविष्यात मागणी असणारी मा तं कौशल्ये" अशी चर्चा तज्ज्ञ मिपाकरांनी करावी ही अपेक्षा.
8 Feb 2026 - 10:39 pm | धर्मराजमुटके
अँथ्रोपिक क्लाऊड ने शेअर बाजाराची झोप उडवली आहे.
9 Feb 2026 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या घरात आयटी सदस्य आहे, दोन तीन वर्ष झाले की कंपनी आणि त्यांचं वेतन आणि काम यावरुन कंपनी बदल होत असायचेच. पण पुढें सहा सात वर्ष एका परदेशी बॅंकेच्या कामात होता ऑनलाइन एरर- सुविधा सुरुवातीला चांगलं चाललं. पॅकेज आणि नंतरही वाढवून मिळत होते. त्यांच्या कंपनीने आणखी कामे घेतली आणि यांच्यावर कामाचा ताण वाढला.
करोना काळात तर फार वाढला घरात असून सारखा लॅपटॉपवर पडिक. जेवतांना 'मेल' आला तरी चालला, काम सुरु. सुरुवातीला काही वर्ष आनंदी दिसणारा चेहरा कालवंडत गेला एक दिवस दोघे बोललो. नोटीस वगैरे देऊन सोडायचं सुद्धा दडपण घेऊ नको. नाही दिलं अनुभवाचं प्रमाणपत्र तरी सोडून दे, पुढचं पुढें पाहू.
आता मनमर्जीने स्वत:च पार्टली काम करतो. काही प्रमाणपत्र कोर्स केले. बंधनाशिवाय काम सुरु..,हा थोड़ी मिळकत कमी झाली तरी आनंद आहे.
-दिलीप बिरुटे
9 Feb 2026 - 3:00 pm | मदनबाण
सध्या आयटी हमाल एका निर्णायक परिस्थीतीत आहेत. एक तर कसे तरी अजुन काही काळ निभावतील किंवा एक तर कंपनी त्यांना काढेल किंवा स्वतःच राजिनामा देउन बाहेर पडतील.
आयटी मध्ये इतर इंडस्ट्री पेक्षा चांगले पॅकेज मिळते पण सगळ्याच काम करणार्यांना मजबुत पॅकेज मिळत नसते. इथे शारिरिक मेहनत शून्य पण बैद्धीक कसरत प्रचंड!
या इंडस्ट्री मध्ये नसलेल्या लोकांना आणि असलेल्या अनेकांना एक गोष्ट लक्षात येत नाही, ती म्हणजे आयटीवाले मल्टिटास्किंग करतात, काही काळ काम करुन ते या मल्टिटास्किंग मध्ये मास्टर बनतात. हीच गोष्ट त्यांच्या वयाच्या आणि बुद्धीच्या विरोधात जाते. सातत्याने मल्टिटास्किंग केल्याने त्यांच्या मेंदुची एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करुन ती त्याच गोष्टीवर ठेवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. याचा परिणाम स्वरुप त्यांची नविन गोष्ट शिकण्याची क्षमता जवळपास पूर्णपणे नष्ट होते.
अत्यंत स्ट्रेस, क्लिष्ट तांत्रिक दोष निवारण करणे यात सातत्याने राहिल्याने त्यांचा मेंदू इतर वयाच्या लोकांच्या मानाने फार कमी वयात थकतो. कमी वयात बर्न आऊट होणे हे या क्षेत्रात होते किंवा पहायला मिळते. या शिवाय जर असा व्यक्ती २४X७ शिफ्ट मध्ये काम करत असेल आणि असे शिफ्ट लाईफ त्याने अनेक वर्ष घालवले असेल तर त्या व्यक्तीचे सोशल लाईफ आणि आरोग्य दोन्ही अत्यंत वाईट पद्धतीने खराब होते.
तुमच्या वय वाढण्याला तुम्ही काहीच करु शकत नाही, तुम्ही स्लो होतात, लर्निंग स्लो होते आणि आयुष्य तुम्हाला तुमचे वृद्ध आई-वडिल, बायको-मुले आणि नोकरी यांच्या मध्य स्थानी आणुन उभे करते. सगळ्या प्रकारच्या जवाबदार्या आणि त्या निभावताना जी प्रत्येक व्यक्तीची या वयात हालत होते तीच आयटी हमालांची देखील होते.
आता कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांना मोठ्या वेगात काढत आहे आणि येत्या काळात हा वेग अजुन वाढेल. कंपन्यासाठी आयटी हमाल केवळ एक बिलेबल किंवा नॉन-बिलेबल रिसोर्स असतात. नॉन बिलेबल आधी बेंचवर जातात मग तिथे काही काळ राहुन जर कुठला प्रोजेक्ट मिळाला तर तरतात किंवा काढले जातात. बिलेबल रिसोर्स जर या धाग्यातील वयोगटातील असेल तर बर्याच वेळी त्याच्या पॅकेज मध्ये २-३ नविन पास आऊट रिसोर्स सहज वापरले जाऊ शकतात व त्या वयस्क रिसोर्सला नारळ दिला जातो. प्रोजेक्ट क्रिटीकल असेल,सर्व काही नीट चालत असेल आणि क्लायंटशी रिसोर्स चा चांगला रॅपो असेल तर वयस्क रिसोर्स तग धरुन राहतात.
कंपन्या सातत्याने नव नवे कोर्स त्यांच्या संकेतस्थळांवर ठेवत असतात आणि आयटी हमाल त्यांना दिले गेलेले कोर्स करत असतात, याच बरोबर क्लायंट साईडचे कोर्स आणि इतर काही टास्क असेल तर त्या देखील पास कराव्याच लागतात, कारण कंप्लायन्स. या व्यतिरिक्त इतर जगमान्य कोर्स करण्याचा दबाव हमलांवर असतोच.
आत्ताच्या घडीला आयटी कंपन्या अश्या परिक्षांचा वापर करुन त्यांच्या कर्मचार्यांना मानसिक ताण देऊन आणि त्याला नालायक ठरवुन कंपनीतुन बाहेर कढण्यासाठी शस्त्र म्हणुन वापरतात. कठीण कोर्स असाइन केला जातो,मग त्यात वेळेचे बंधन असते आणि त्यावेळेत पूर्ण न होऊ शकणार नाहीत इतके प्रश्न अश्या परिक्षेत ठेवलेले असतात, जेणे करुन त्या परिक्षेत पास होण्याची शक्यता जवळपास नसते. मग तु कसा योग्य नाहीस हे त्याला सांगुन नारळ दिला जातो.
एआय च्या कथा वाचाव्या तेव्हढ्या कमी, याचे कोर्स देखील कंपनी त्यांच्या कर्मचार्यांना देते असते. एका मापाची पॅंट सगळ्यांना कशी फिट होईल? :)))
प्रत्येक व्यक्ती वेगळा, त्याचे नशिब वेगळे, त्याची बुद्धीमत्त्ता वेगळी, तरी सर्वांना सर्व काही आलेच पाहिजे? आणि शिकलेच पाहिजे?
आपल्या इथे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या त्यामुळे माणसांना आता तशीही किंमत नाही, आणि वयस्क झालेल्यांची तर त्याहुन कमी.
ज्या प्रमाणे अनेक वर्ष मेंदुची शत्रक्रिया करणारा तज्ञ डॉक्टर किडणीची शत्रक्रिया करु शकत नाही, तसेच काहीसे आयटीवाल्यांचे झालेले असते आणि वरती सांगितल्या प्रमाणे मल्टिटास्किंग मध्ये पारंगत असल्याने नविन काही शिकण्याची क्षमता गमावलेली असते.
माझ्या पुरते मी घरी सांगुन ठेवलेले आहे, येणारा प्रत्येक दिवस मी परमेश्वराचा आशिर्वाद समजुन चालतो आहे, अजुन किती काळ मी तग धरु शकेन ते सांगता येत नाही, एक तर कंपनी मला काढेल किंवा मलाच ती सोडण्यास भाग पडेल.
मी आनंदी राहतो, गाणी ऐकतो, चित्रपट, वेब सिरीज पाहुन ताण विरहीत राहण्याचा प्रयत्न करतो... जे होईल त्याला सामोरे जावेच लागेल, चिंता करुन काही समोर उभी असलेली परिस्थीती बदलणार नाही.
इथल्या सगळ्या आयटी हमालांना पुढील चिंते मधुन मुक्ती मिळावी, त्यांना योग्य ती संधी मिळावी आणि कुठलाही आर्थिक ताण त्यांच्या आयुष्यात येऊ नये अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.
[वयस्क आयटी हमाल ]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sahiba... : | Aditya Rikhari, Ankita Chhetri |
9 Feb 2026 - 3:50 pm | मूकवाचक
प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोग्रॅम मॅनेजर, ग्रुप मॅनेजर अशी बिरूदे मिरवणारे, पण वृत्ती आणि व्यावसायिक कौशल्ये या बाबतीत बांधकामाच्या साईटवरच्या 'मुकादमाशी' स्पर्धा करणारे आयटी मधले (आठवड्याला ७० तास/ ९० तास काम फेम) लीडर्स हा स्वतंत्र धाग्याचा विषय होईल. असो.
10 Feb 2026 - 9:36 pm | गणेशा
असहमत... अतिशय चुकीचे वक्तव्य... मी किंवा माझ्या पाहण्यातील कोणीही असे झालेले नाही..
आणि आता मी IT व्यतिरिक्त ३ new model वर काम करतोय, त्यातील १ तर त्या सदृश्य model डायरेक्ट जयंत नाराळीकर यांच्या समवेत काम केलेल्या शास्त्रज्ञाने बनवले आहे.. त्यांची मग रीतसर सांगून पुन्हा काम पुढे चालू केले आहे..
Science किट मध्ये असे product टाकूयात असे नाशिक-पुणे स्तिथ कंपनीची विचारना आहे..
त्या व्यतिरिक्त, मी आणखीन २ model वर काम करतोय, गार्डनिंग, वाचन हे तर मन लावून चालू आहेच.. याशिवाय share market indicator त्याचे mathematical conversion वेगळे चालू आहे,
असे असंख्य.. गार्डेनिंग च्या कुंड्या रंगवने, कुठल्या झाडाला कसे कोणते खत, माती, पाणी द्यायचे हे माहीत आहे, सध्या वाढवतोय झाडे, ४० आहेत..
या व्यतिरिक्त, running, trekking, ect चालू आहे..
IT आवडत नाही म्हंटले म्हणजे मेंदू कामातून चालला आहे, हे अतिशय baseless म्हणणे आहे..
18 Feb 2026 - 8:49 pm | मदनबाण
असहमत... अतिशय चुकीचे वक्तव्य...
जरा एआयला विचारु बघ!
IT आवडत नाही म्हंटले म्हणजे मेंदू कामातून चालला आहे, हे अतिशय baseless म्हणणे आहे..
मी माझ्या संपूर्ण प्रतिसादात मला आयटी आवडत नाही असे कुठेही म्हंटलेले नाही, मी तर नॉन आयटीवाला होतो स्वीच करुन आयटीत आलो, मग नंतर टेक्नॉलॉजी देखील स्वीच केली. फार कमी व्यक्ती असतात ज्यांना जे आवडते ते करायला देखील मिळते त्यात यश देखील मिळते आणि पैसा देखील.
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, त्याला येणारे अनुभव देखील वेगळे असतात. एकाच कंपनी बद्धल एक व्यक्ती चांगले बोलु शकतो आणि त्याच कंपनी बद्धल दुसरा व्यक्ती वाईट देखील बोलु शकतो, कारण त्यांचा त्या कंपनी बद्धल त्यांना आलेला "अनुभव" वेगळा असतो.
असो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Отключаю телефон... : INSTASAMKA
18 Feb 2026 - 10:03 pm | गणेशा
Ok noted. असो थांबतो.
दुसऱ्या विचारांचा respect आहेच..तुमचाही आहेच..
परंतु तुमच्या या वरील अधोरेखीत मताला मी वयक्तिक रित्या कायम असहमत राहिल..
आणि AI जर तसेच म्हणत असेल तर मी त्या पूर्ण AI आणि त्याचा source असलेल्या सर्व जणांशी असहमती दर्शवितो..
मला तर multitasking मुळे dyanamic personality लाभलेली आहे.
असो AI ला विचारले..त्याचा AI ने दिलेला शेवटचा सांराश खाली देतो
:
आणि AI बद्दल…
AI कुठल्याही एका मताचा प्रचार करत नाही.
तो उपलब्ध संशोधन, लेख, डेटा यावर आधारित सरासरी निष्कर्ष सांगतो.
तुम्ही त्या निष्कर्षाशी असहमत राहू शकता — आणि ते पूर्णपणे योग्य आहे.
विचारांमध्ये मतभेद असले म्हणजे शत्रुत्व नसतं —
तेच तर बौद्धिक प्रामाणिकपणाचं लक्षण आहे.
- गणेशा
19 Feb 2026 - 2:06 pm | मदनबाण
परंतु तुमच्या या वरील अधोरेखीत मताला मी वयक्तिक रित्या कायम असहमत राहिल..
हरकत नाही, मी मांडलेले मत केवळ व्यक्तिगत अनुभवा वरुन दिलेले नाही,तर जितकं मी या विषयावर जमेल तसे वाचले आहे व व्हिडियो पाहिले आहेत तसेच डॉक्टरांचे मत देखील विचारात घेऊन मी तसे लिहले आहे.
बाकी तुम्ही आयटीवाले आहात म्हणुन एआयला विचारायला सांगितले! Does multitasking affects concentration & learning ability? असा साधा सोपा प्रश्न एआयला विचारुन पाहिला तरी चालेल.
बाकी एआयचाच [ Claude AI ] वापर करुन व्हेनाझुएलाच्या मादुरोला अमेरिक मेलिटरी ने पकडले होते.
दुसर्याच्या मताचा आदर असला आणि जरी ते मान्य नसले, तरी त्या मताची किमान पडताळणी करणे हे देखील बौद्धिक प्रामाणिकपणाचं लक्षण आहे.
असो... मी आता इथेच थांबतो.
जाता जाता: वाचकांसाठी काही दुवे देवुन जातो.
How Multitasking Drains Your Brain
Digital multitasking and hyperactivity: unveiling the hidden costs to brain health
Multitasking is the Mindkiller | Dr. Lindsay Blooms | TEDxGrandJunction
Key Facts on Attention Spans Over Time
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye - Afrobeat X Kalyani Priyadarshan (Video) | The Independeners | Aa Raathri | S Janaki
19 Feb 2026 - 3:01 pm | गणेशा
मदनबाण :
मी माझे मत पूर्ण आदराने आणि वैयक्तिक अनुभवातून मांडले होते. त्यामुळे त्याची AI किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पडताळणी करून त्यावर “बौद्धिक प्रामाणिकपणा” अशी शिक्कामोर्तब करण्याची गरज नाही.
मत मांडणे आणि मताशी असहमत राहणे या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आणि वैध आहेत.
ज्याला खरोखर थांबायचे असते, तो दुसऱ्याला अक्कल शिकवून थांबत नाही; तो विषयाला गालबोट लागू नये म्हणून थांबतो.
AI पडताळणी करून काय मिळते हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी ती करेल, कोणी करणार नाही. पण मी वैयक्तिक रित्या असहमत आहे आणि माझ्यासाठी तेवढ्यावर विषय संपतो. मला इथे-तिथे पाहा, हे करा, ते करा असा शहाणपणा अपेक्षित नव्हता.. हे म्हणजे तुम्ही असहमत आहात वयक्तिक तरी हे मत इथं बघाच हा शुद्ध हेकेखोर पणा आहे.. आणि इतके करून मग तुमच्या मताला हो असे होते म्हणायचे काय?
बर करून पाहिलं, आणि तसे जरी मत आले तरी वयक्तिक मी असहमत आहे.. कृपाया प्रामाणिक पणा पण आता AI वर पडताळू नका.. आणि तुम्ही खरे माझी चूक झाली असहमती दर्शवून बास?
आणि कृपा करून थांबा. आणि या उपर हि मला तुम्हाला सल्ले द्यायचे असतील तर ९९८७६७३३३२ हा नं आहे त्यावर द्या..
तुमच्या विधानाचा AI चा अहवाला :
तुम्ही दिलेलं विधान पुन्हा पाहूया —
“
मी याला संतुलित उत्तर देतो:
१️⃣ “पूर्णपणे नष्ट होते” — हा शब्द वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नाही
आजवरच्या संशोधनात असा ठोस पुरावा नाही की मल्टिटास्किंगमुळे मेंदूची क्षमता पूर्णपणे नष्ट होते.
हो — पण काही परिणाम दिसतात.
२️⃣ काय परिणाम होऊ शकतात?
सतत task switching केल्याने deep focus कमी होऊ शकतो
working memory वर ताण येऊ शकतो
complex learning करताना जास्त वेळ लागू शकतो
पण हे reversible असते.
Brain plastic आहे — म्हणजे सवयी बदलल्या तर क्षमता परत सुधारते.
३️⃣ शिकण्याची क्षमता “नष्ट” होते का?
नाही.
Learning ही एकच गोष्ट नसते.
जर तुम्ही सतत notifications, distractions मध्ये शिकत असाल — retention कमी होऊ शकतो
पण structured focus दिल्यास शिकण्याची क्षमता टिकून राहते
म्हणजेच — समस्या मल्टिटास्किंगमध्ये नाही,
समस्या अनियंत्रित distraction मध्ये आहे.
19 Feb 2026 - 3:20 pm | मदनबाण
पूर्णपणे नष्ट होते
ओके. पूर्णपणे नष्ट होते हा शब्द प्रयोग योग्य नाही हे मान्य. मला माझी चूक मान्य करण्यास कधीच लाज वाटत नाही.
-
मी इथे कोणाला काहीही शिकवायला येत नाही, अक्कल तर अजिबात नाही.
तुम्ही माझ्या प्रतिसादास उद्देशुन प्रतिक्रिया दिलीत म्हणुन मी व्यक्त झालो, तेव्हा तसे व्यक्त झालो ही चूक असावी, यापुढे ही चूक करणार नाही!
तुम्ही माझ्याशी सहमत व्हा किंवा नका होऊ त्याने मला काडीचाही फरक पडत नाही, तसेच मी फुकटचे सल्ले देत नाही!
तुमच्या मता नुसार समस्या मल्टिटास्किंगमध्ये नाही, हे सांगीतलेत ते उत्तम झाले, त्यावरुन तुम्ही किती शहाणे आहात हे समजले.
असो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye - Afrobeat X Kalyani Priyadarshan (Video) | The Independeners | Aa Raathri | S Janaki
19 Feb 2026 - 3:45 pm | गणेशा
हे शेवटचे वाक्य कशासाठी मग? पहिले प्रथम ते AI चे मत आहे जे तुमच्या मुळे मी येथे दिले..
बस करा... या नंतर एकाहि COMMENT माझ्या वर वयक्तिक लेवल वर आल्यास मी खपवून घेणार नाही...
मी माझ्या विचारावर ठाम आहे, आणि मला शब्द माघे घ्यावा लागला नाही..
मी असहमती खालील विधानाला दिली होती आणि त्या साठी वयक्तिक अनुभवा वरुन मी सांगितले होते.. तुम्ही तुमच्या दोन्ही प्रतिसादा मध्ये शेवटी बौद्धिक प्रामाणिक पणा आणि शहाणे हे लिहिले आहे, आणि तुम्हाला फरक पडत नसला तर तुम्ही वयक्तिक लेवल वर असल्या छटाक भर मता साठी माझ्याशी का बोलता आहात?
कृपया थांबवा, आणि असे शेलके शब्द वयक्तिक पणे पुन्हा वापरणे बंद करा..
9 Feb 2026 - 3:59 pm | सस्नेह
आणि टेन्शनजन्य सुद्धा.
वाचत आहे... चिरंजिवासाठी उपयुक्त.
स्नेहा.
10 Feb 2026 - 7:41 pm | स्वधर्म
सोकाजी यांनी म्हटल्याप्रमाणे आयटी तून निवृत्त होऊन तिसर्या स्तरातील शहरात शेती करत निवृत्त आयुष्य घालवावे असा विचार माझाही आहे. माझी आकर्षणाची बाजू म्हणजे भारतातील कोणत्याही छोट्या शहरात पैसे कमवण्याची मजबूरी नसेल, तर करण्यासारखी खूप उत्पादक कामे (समस्या सोडवण्याच्या संधी) दिसतात. उदा. कोणत्याही सरकारी कार्यालयात हेलपाटे घालणार्या गावकर्यांना मदत करणे, शाळेतल्या मुलांची गणित व इंग्रजीची भीती कमी करणे इ. लोक अक्षरश: सर्व बाजूंनी नाडले जात आहेत आणि सरकारी अधिकारी ढिम्म काम करत नाहीत. असे वाटते की आपल्यासारख्या विश्लेषणात गती असलेल्या माणसाला चांगले जगता येईल. फक्त गावातले लोक अतिशय वेगळ्या वातावरणात मोठे झाल्याने त्यांच्याकडून आपल्याला सुयोग्य जगण्याचा अनुभव (कंपनी) मिळेल की नाही असे वाटते. काही बदलावे याला प्रचंड विरोध व निरुत्साह, वेळ अजिबात न पाळणे व कामाच्या बाबतीत फुटात बारा इंचाचा फरक असे अघळपघळ व्यवहार. आपल्या आयटी व इंडस्ट्रीतील अनुभवात असे नसते व असा टीम मेंबर असेल तर ताबडतोब बाजूला केला जातो. तसे गावात होत नाही. गावातले लोक बेरकी व संकुचित मनोवृत्ती असलेले असू शकतात पण जवळचे व हक्काचे मित्र होऊ शकतील.
गावात शांत स्थिर आयुष्य आपल्याला आवडेल असे अॅझम्पशन आहे, पण आपल्याला आवडते ते करण्याच्या मागे जाणे व ज्यात क्षमता आहे ते करणे यात दुसरे निवडणे योग्य राहील असे वाटते, कारण आवड निवड बदलू शकते, पण क्षमता बर्यापैकी स्थिर असतात.
10 Feb 2026 - 10:30 pm | गवि
आयुष्य शहरात काढून काही दशकांनी तालुक्याच्या गावी किंवा खेड्यात जाऊन स्थायिक होणे हे डिझास्टर ठरण्याची शक्यता ९९%. गोड स्वप्न. एका महिन्यात परत येण्याची ग्यारंटी. आता काही उदाहरणे देता येतात. दाम्पत्य कसे कोंकणातल्या गावी जाऊन परसदारी उगवणाऱ्या भाज्या खातात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने कचऱ्याचे खत बनवतात.
पण हे अत्यंत दुर्मिळ अपवाद असतात हे लक्षात ठेवलेलं बरं. गावाकडे आपलं निसर्गाच्या कुशीतलं घर.. अशा स्वप्नाला विकत घेऊन अनेकांनी घरे बुक करून ठेवली आहेत. ओसाड पडलेल्या अशा रिकाम्या कॉलन्या बऱ्याच गावांत सापडतील.
स्वयंपूर्णतेचे प्रयोग बहुतांश वेळा फसलेले आहेत. शहरी मेट्रो झाड असे उपटून गावात रोवता येत नाही.
11 Feb 2026 - 12:42 am | कपिलमुनी
खेड्यात जाऊन स्थायिक होणे हे डिझास्टर ठरण्याची शक्यता ९९%.
एवढे सोपे मुळीच नाही, लोकांनी रेण्ट करावे अनुभव घ्यावा मग इन्वेस्ट करावे
11 Feb 2026 - 4:10 am | अमरेंद्र बाहुबली
+१
मेट्रो सिटीत आयुष्य काढलेल्याना आपण फार टॅलेंटेड/श्रीमंत/पुढारलेल्या विचारांचे नी गावाकडची लोक साधीभोळी/गरीब/मागास विचारांची असा गोड गैरसमज असतो, तो खाडकन उतरतो, नी मोठा कल्चरल शॉक बसतो.
11 Feb 2026 - 6:04 am | सोत्रि
परसेंटेज देऊन इतक्या खात्रीने मत मांडलं आहे त्याअर्थी त्याला काही आधार नक्कीच असावा. असं डिझास्टर होण्याची कारणं काय असावीत?
असं होणार नाही असं मत असणाऱ्यांचे, लक्षात न घेतलेले मुद्दे समोर येऊन त्याने परस्पेक्टीव्हमधे बदल होण्यास मदत होईल.
- (गावात रोवलं जाण्यास उत्सुक मेट्रो झाड) सोकाजी
11 Feb 2026 - 6:48 am | गवि
अवश्य. कोणी तसा प्रयत्न करून वर्षभर रहात असतील तर अनुभव ऐकायला आवडेल. आणि उलट न जमलेले लोक असतील त्यांची संख्या आणि अनुभव देखील आल्यास उत्तमच.
11 Feb 2026 - 12:33 pm | कपिलमुनी
पुर्ण खेड्यात रहण्यापेक्षा जवळच्या तालुका प्लेस जवळ रहावे , जिथून शहर ५-६ किमी आहे ,
माझे चार आणे - खेड्यात घरकामाला बायका मिळत नहीत . मिळाल्या तरी शेती , मयत , लग्न इत्यादी कामाला १०-१० दिवस सुट्टि घेतात.
11 Feb 2026 - 12:43 pm | अमरेंद्र बाहुबली
खेड्यात/ छोट्या शहरात कामे पैशाच्या बळावर नाही तर संबंधांच्या बळावर होतात, तसेच काम चालू असताना त्याना सतत एंटरटेन करत रहावे लागते, अन्यथा ते बोर होऊन पळ काढतात, पैसा फेकतोय म्हणजे काम होईल असे तिकडे नसते.
11 Feb 2026 - 12:44 pm | गवि
खाली एका प्रतिसादात अशाच आशयाचा मुद्दा मांडला आहे. सहमत आहे. तालुका किंवा जिल्हा बेटर.
11 Feb 2026 - 11:00 am | विजुभाऊ
माझ्या माहितीतल्या एकाने पश्चिम महारष्ट्रात गावी घर बांधले तो तिथे रीटायर्ड लाईफ जगायला गेला होता.
काही दिवस लोकानी ओळखी करून घेतल्या त्या नंतर मात्र लोक त्याच्याकडे पैशे उसने मागायला येवू लागले.
त्याला कंटाळून त्याने ते गाव सोडले.
11 Feb 2026 - 8:54 pm | स्वधर्म
>> डिझास्टर ठरण्याची शक्यता ९९%
माझ्या बाबतीत मी जिथे पहिली वीस वर्षे वाढलो तिथेच जाणार आहे. शेत नंतर घेतले जे लहानपणच्या सांगलीतील घरापासून १० किमीवर आहे. शहर फार मागास किंवा फार लांबही नाही. त्यामुळे बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स असे असू शकेल. सेंद्रीय शेती अभ्यास गटातील लोकांकडून थोडे फार शिकून अन्न पिकवता आले तर चांगले. त्यात बाजूच्या शेतकर्यांपासून काहीसा त्रास/ विरोध होण्याची शक्यता आहे. अजूनही हळव्या करणार्या आठवणी व मित्र २५ पर्यंतचेच आहेत. २५ - ३० वयानंतरची कार्पोरेट मधली सगळी नाती सेलो टेप रिलेशन्स असतात असा अनुभव आहे. नोकरी बदलली की एक दोन वर्षात विरून जातात.
घरचे लोक मात्र तिकडे येणार नाही असे म्हणत आहेत. त्यांचे सगळे मैत्रीसंबंध पुण्यासारख्या मोठ्या शहरात आहेत. त्यामुळे एकटे राहणे हाही एक घटक आहे. पण मला स्वतःला तिथे कसे वाटेल हे काही महिने राहिल्याशिवाय समजणार नाही. तो प्रयत्न नक्की करणार.
11 Feb 2026 - 9:07 pm | गवि
सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सातारा इथे किंवा इथून दहा किलोमीटर्सवर म्हणजे खेडेगाव मुळीच नव्हे हल्ली. शहरातच राहण्यासारखे आहे. सारखे काय, शहरात राहणेच आहे.
11 Feb 2026 - 10:57 pm | रीडर
खेडेगाव नाहीच
टिअर 2/3 शहर
12 Feb 2026 - 5:03 pm | स्वधर्म
सांगली सातार्यात अजूनही शांतता आहे व वाहतूक कोंडी नाही. लोकांना संबंध ठेवण्यासाठी संध्याकाळी भेटणे सहज शक्य असते. सगळी कामाची ठिकाणे १५ मिनीटांवर असतात. ओळखी वर खूप कामे होतात. यामुळे ताण खूप कमी होतो असे तिथल्या लोकांच्या जीवनशैलीवरून जाणवते. उदा. त्यांना संगीत किंवा बागकामासाठी वेळ असतो.
पण जाऊन काही महिने राहिल्याशिवाय खरे समजणार नाही हे मान्य आहे.
12 Feb 2026 - 9:58 pm | धर्मराजमुटके
बरेच दिवस तुम्ही तिकडे गेला नाहित बहुतेक .या शनिवारीच एका लग्नाला गेलो होतो. कोयनानगर (कराड) वरुन कोकरुड फाट्याला जायला ३ तास लागले.
13 Feb 2026 - 4:12 pm | स्वधर्म
डिसेंबर मध्ये गेलो होतो. छान वाटले.
तुंम्ही म्हणता तसा अनुभव क्वचित कधीतरी येतो. धार्मिक कार्यक्रम, राजकीय निवडणूक वगैरे असेल तर असे होऊ शकते. पण पुण्या मुंबईत वाहतूक कोंडी रोजचीच आहे. हिंजवडीला जाऊन येऊन अनुभव आहे. पुण्यात सुट्टी काढली तरी सकाळी एक आणि दुपारी एक एवढेच बाहेरचे काम होऊ शकते असा अनुभव आहे. शक्यतो ५ किमी च्या पुढे कुठेही वेळेत पोहोचणे अवघड असते.
तुंम्हाला त्यादिवशी एवढा वेळ लागला, पण का लागला? काही नैमित्तिक कारण होते की प्रत्येकालाच नेहमी एवढा वेळ लागतो?
11 Feb 2026 - 10:20 am | सुबोध खरे
आमचे काका आमच्या कोकणातील वडिलोपार्जित घरी जाऊन राहण्याचा सहा महिने प्रयत्न करून आता डिसेंबर २५ मध्येच मुंबईत परत आले.
त्यांचे काही अनुभव-- पावसाळ्यात वीज गेली तर तीन चार दिवस कोणी फिरकत सुद्धा नाही. तेंव्हा इंटरनेट सोडाच मोबाईल सुद्धा रिचार्ज करणे कठीण होते. विजेचे वोल्टेज कमीजास्त होत असल्याने मुळे ट्यूबलाईट फार लवकर जातात
साधी साधी कामे करण्यासाठी लोक अव्वाच्या सव्वा पैसे मागतात त्यातून तुम्ही मुंबईचे पैसेवाले लोक थोडेसे पैसे आम्हाला मिळाले तर काय बिघडते हा ऍटीट्युड.
आमचे गाव मुंबई गोवा हमरस्त्यावर अतिशय प्रसिद्ध म्हणजे श्री क्षेत्र परशुराम आहे. आजारी पडलात तर सर्वात जवळचा डॉक्टर १३ किमीवर चिपळूण येथे.
पडला झडला तर तुम्हाला उचलून दवाखान्यात नेणे हि सोपी गोष्ट नाही. साध्या साध्या आजारपणासाठी लागणारी औषधे सुद्धा चिपळूण हुन आणावी लागतात.
वृत्तपत्रे वेळेत येत नाहीत.
इंटरनेट खात्रीशीर चालत नाही. दोन मिनिटे इंटरनेट चालत नसल्यास चिडचिडी होणारी शहरी माणसे तेथे कशी टिकाव धरणार.
हवा आणि पाणी शुद्ध आहे पण बाकी पायाभूत सुविधा यांची स्थिती अजून सुधारलेली नाही.
संध्याकाळी किडे, साप घुसण्याची शक्यता भरपूर.
गॅस सिलिंडर चिपळूणला स्वतः जाऊन आणायला लागतो
वानरांचा त्रास होत असल्याने आम्ही घराला GI पत्रे लावले आहेत. त्याचा पावसाळाभर ताशा वाजत राहतो.
गावात कुणाची हळद, बारसं, लग्न असेल किंवा कुठचाही उत्सव असेल तर दिवसभर बोम्बल्या (लाऊडस्पिकर वाजत राहतो) गावच्या शांत वातावरणात हा आवाज अतिशय त्रासदायक असतो. तक्रार करण्याची सोय नाही कारण तुमचे १२५ वर्ष जुने घर असले आणि तुमचे (काकांचे) बालपण तिथे गेले असले तरी तुम्ही उपरेच असता. तुमच्या बरोबरचे अर्धे लोक वर गेलेले असतात किंवा आता संसाराची जबाबदारी मुलांच्या खांद्यावर जाऊन दात पडलेल्या सिंहा सारखे जगत असतात.
परशा सुताराचा मुलगा रामचंद्र आता तुम्हाला भीक घालत नाही. कारण तुमच्या छोट्याशा कामासाठी त्याला वेळ नसतो. मोठे काम काढले तर मोठ्या उत्साहाने येतात. ऍडव्हान्स म्हणून पैसे घेतात आणि दुसरीकडे काम चालूच ठेवतात. मग तुम्ही त्याच्या मागे बाबापुता करत राहा.
ठाणे ते चिपळूण रेल्वेचे भाडे १७० रुपये आहे. चिपळूण स्टेशन ते परशुराम रिक्षावाले २५० रुपये घेतात.
हि सर्व परिस्थिति हमरस्त्यावर असलेल्या गावाची आहे. आडमार्गी असलेल्या गावात जेथे दिवसात दोनच एस ट्या जातात तेथील स्थिती तर अजूनच वाईट आहे.
एक ना दोन अनेक कारणे आहेत
चार दिवस उत्सवासाठी गावात जाणे आणि कायमचे जाऊन राहणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ते आमच्यासारखाय मुंबईत जन्माला आणि वाढलेल्या लोकांना अशक्य आहे.
स्वप्नरंजन म्हणून ठीक आहे
11 Feb 2026 - 11:00 am | कपिलमुनी
डॉक्टरांनी परफेक्ट मांडले आहे .
उपरेपणा जाणवतो , कितिहि प्रयत्न केलात तरी कायम स्वरुपी वास्तव्य असले कि वेलकम नसते .
शहरात ज्या गोष्टी गृहीत धरलेल्या असतात , त्या तिथे मिळत नाहीत ,
आयुष्य संथ असते , पैसे दिले की पटकन काम होइल याची खात्री नसते,
त्यामुळे शहरी माणसांनी मूळ गावी जायचे तर बरच मानसिक त्रास सोसायची तयारी ठेवावी आणि खिसा कोणाला दाखवू नये , लोक लुबाडतात .
अमच्या एका परीचितांनी देउळ जीर्णोद्धार , उत्सव देणगी , शाळेला मदत वगैरे केली जेणे करून मुख्य प्रवहात सामील होता येइल , पण लोकांनी योग्य वेळेस हिसका दाखवलाच.
11 Feb 2026 - 11:13 am | गवि
+१
प्रत्येकाची कारणे आणि अनुभव वेगवेगळ्या मुद्द्यांवर असू शकतात पण असे प्रयत्न बहुतांश फसतात हे खरं.
बाकी गावातले लोक कसे असतात यावर जनरल मत न देता (कारण गाव तितक्या प्रकृती), सर्वात मोठा प्रॉब्लेम काय येतो हे पाहू गेल्यास तो खुद्द स्वतःच्या आतच असतो.
समुद्रकिनारा, नीरव शांत वनराई, मागेपुढे मोठे अंगण आणि बाग (किंवा बाग करायला वाव - वाव दीड वाव ;-)). ) , पक्ष्यांची किलबिल.. हे सर्व एक आठवडा किंवा एक महिना अप्रूप पुरवतात. मुळात जो शहरात अनेक दशके राहून आलेला आहे त्याला ती खेड्यातली जीवनपद्धती लवकरच कंटाळवाणी होते. बागकाम, शेती, पशुपालन, वाचन, झोप यात विरंगुळा शोधून चोवीस तास त्यावर काढणे हे शहरी मनुष्याला झेपत नाही. ते सर्व सात दिवस सुट्टी घेऊन चेंज म्हणून बरे वाटते.
मधला मार्ग असतो. मोठ्या शहरात, उदा. जिल्ह्याच्या ठिकाणी, तुलनेत कमी रहदारी, कमी प्रदूषण. तुलनेत कमी दगदग. पण किमान शहरी सोयी उपलब्ध.
रत्नागिरी, अलिबाग, पनवेल अशा गावांच्या बाह्य वस्तीत किंवा गोव्यात असा मधला मार्ग सापडतो. अर्थात सर्वत्रच झपाट्याने वस्त्या वाढत आहेत आणि शहराचे शहरपण इतर सर्व समस्या घेऊन पसरत आहे. गोव्यात पणजी किंवा आसपास जिथे शहरी भाग आहे, तिथे घरांचे दर जवळपास मुंबईसारखे झाले आहेत. असे पर्याय खेड्याच्या मानाने महाग असतील. पण ज्यांना परवडेल त्या शहरी लोकांना बेस्ट ऑफ बोथ साईडस त्यात मिळू शकतात. आणि दीर्घकाळ, शांत, समतोल वास्तव्य शक्य होऊ शकतं.
12 Feb 2026 - 12:01 am | हणमंतअण्णा शंकर...
मी घर पाहावे बांधून अशी सिरीज लिहित आहे. ती इन प्रोग्रेस आहे. म्हणजे अजून काहीच नक्की झालेले नाही त्यामुळे पुढचा अपडेट आलेला नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे की मला ते बांधायचेच आहे. पैसे आहेत पण जागाच निश्चित नाही. एक अशक्य सुंदर स्वस्त जागा सापडली आहे. विशाल माळ आणि समोर एक विशाल तळे. जायला चांगला रस्ता. मात्र इथे घर बांधून राहणे चॅलेंजिंग आहे.
आमच्या इथे पावसाळ्यात तुफान पाउस नसतो. मोठ्या क्षमतेचे सोलर बसवले तर पूर्ण ऑफ ग्रीड घर करता येईल. बॅकअप म्हणून ग्रीड ची लाईट घेता येईल. दुसरी गोष्ट जोवर माझे घर होईल तोवर मस्कचे इन्टरनेट वगैरे गोष्टी येतीलच. तशी जिओची फायबर लाईन जवळून गेली आहेच. पावसाचे पाणी साठवायचे जरी ठरवले तरी कॉस्ट फारशी जात नाही. २० ते ३० हजार लीटर क्षमता धरून.
मात्र असे आधुनिक घर आउट ऑफ नोव्हेअर बांधल्यावर आपल्याला बाकीच्या व्यवस्था जसे की वाहन वगैरे कराव्याच लागतात. इलेक्ट्रिक गाडी घेतली तर सोलर देखील चांगले उपयोगाला येतील.
आजूबाजूला लोक राहताहेत म्हणजे पक्की घरे देखील आहेत. शेतकर्यांनी त्यांची राहती घरे बांधली आहेत. गाव जवळ आहे त्यामुळे घरकामाला मदत वगैरे देखिल होऊ शकते.
>> गावात कुणाची हळद, बारसं, लग्न असेल किंवा कुठचाही उत्सव असेल तर दिवसभर बोम्बल्या (लाऊडस्पिकर वाजत राहतो) गावच्या शांत वातावरणात हा आवाज अतिशय त्रासदायक असतो. <<
हे माझ्यासाठी डील ब्रेकर आहे मात्र हे शहरात देखील आहे. त्यामुळे घराचे संपूर्ण नॉइज प्रूफिंग करून कमीत कमी त्रास कसा होईल याची खबरदारी डिझाईन मधे आहे. किंबहुना घराच्या खर्चार १० टक्के खर्च हा नॉइजप्रूफिंग वरच होईल.
12 Feb 2026 - 12:07 am | हणमंतअण्णा शंकर...
हे तिथेच आउट ऑफ नोव्हेअर गेल्याने मला स्वतःला तिथे राहायला काहीच अडचण नाहीये. मात्र घरचे लोक याला सक्त विरोध करत आहेत. कारण मी एकटा निवांत राहू शकतो. करायला भरपूर गोष्टी असतातच. तसेही मी आता बाहेर फारसा पडत नाहीच. आपल्या इच्छा अपेक्षा देखील एकदम साध्या सोप्या आहेत.
लहान पण कोझी घर, घरावर सावली धरणारी मोठी दोन चार झाडे असावीत अशीच साधी इच्छा., घरापुढे खूप फुलझाडे, घरात पुस्तकांची कपाटे असावीत, प्रसन्न सकाळी पुस्तक वाचताना एखादा ब्लो जॉब मिळावा यापेक्षा काही मोठ्या अपेक्षा नाहीत..
11 Feb 2026 - 11:07 am | कांदा लिंबू
शहरामध्ये तात्काळ उपलब्ध असलेल्या सुविधा उदा uber, swiggy, amazon, blinkit, tata1mg, rsa इत्यादी खेड्यात उपलब्ध नसतात. यांची सवय झालेली असलेल्या लोकांना तिथे खूप जड जाऊ शकते.
11 Feb 2026 - 11:17 am | गवि
यू नेल्ड इट. बारीकसारीक पण महत्वाचे असे असंख्य मुद्दे एकत्र येतात. आम्ही कसे खेड्यात राहतोय असे इंस्टाग्राम रीळ टाकण्यात मजा असते. पण कायमची तीच लाईफस्टाईल... हम्म..
11 Feb 2026 - 6:54 pm | गणेशा
IT आणि चाळीशी–पन्नाशीच्या पिढीपासून सुरू झालेली चर्चा आता “पुढे आयुष्यात कुठे स्थायिक व्हायचं?” इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. बहुतेकांचा सूर एकच - गावाकडे राहणं अवघड आहे.
“डोंगर दुरून साजरे” या मताभोवतीच विचार फिरताना दिसतो.
माझं मत मात्र थोडं वेगळं आहे.
----
असे विचार मांडताना एक गोष्ट गृहीत धरलेली असते – आपण शहराच्या सोयींना सरावलेले आहोत, इंटरनेटशिवाय चालत नाही, पायाभूत सुविधाचे पाईक आहोत. मग काही दिवस शुद्ध हवा, शांतता आकर्षित करेल; पण कायम राहणं शक्य नाही.
पण प्रश्न सुविधा आहेत की आपलं नातं?
माणूस शहरात असो वा गावात - त्याचं नातं मातीशी आणि माणसांशी प्रामाणिक असावं.
मी स्वतः शहरात राहतो, पण माझं बालपण उरुळी कांचनमध्ये गेलं(त्यावेळी ते खेडेगाव होते हे मी मानतो, आणि ते माझे गाव नाही). पण पुण्यात - घरात आजही कामवाली नाही, टीव्ही नाही, मोबाईल मर्यादित. साधेपणात जगण्याची सवय आहे असे माझे मला तरी वाटते.
म्हणून कुठेही गेलो तरी तिथल्या माणसांत मिसळून, त्यांच्या सारखं हसता-बोलता, जगता येतं.
जर “दवाखाना नाही, हे मिळणार नाही, ते मिळणार नाही” या भीतीनेच गावाकडे जायचं असेल, तर गावाकडे जाण्याचा विचारच चुकीचा आहे. आणि हीच भीती पुन्हा पुन्हा पसरवली जाते.
मी गावाकडे जाईन पण अपेक्षा घेऊन नाही.
जे त्या गावातील लोकांचं होईल, तेच माझं होईल.
खड्ड्यात पडला तर दवाखान्यात जायला दोन तास लागतील – तर मला सुद्धा लागतील.
पण जर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या माणसांसारखं राहता येणार नसेल, तर आपण मनात जी दरी घेऊन तिकडे जातोय, ती कधी आणि कशी भरून निघेल?
आणि मग आपण आयुष्यभर त्या दरीच्या या बाजूला उभं राहून, पलीकडचं जग अवघड आहे, कायम जुळणार नाही – असंच म्हणत राहणार.
समस्या गावात नाही, ती आपल्या मनातल्या वेगळेपणात आहे.
सुविधा कमी असल्या तरी चालतील, पण माणुसकीत दरी नको.
‘मी’ कमी आणि ‘आपण’ जास्त – एवढं जमलं, की कुठेही घर बनतं.
विस्तृत लिहीत नाही... नंतर लिहिल
गणेशा..
11 Feb 2026 - 8:24 pm | गवि
सर्व काही तत्वतः उत्तम. चांगले विवेचन.
गावी कायमचा स्थायिक झालासच तर त्यानंतर एक दोन वर्षे होऊन गेल्यावर काय घडले ते जाणणे रोचक असेल.
11 Feb 2026 - 7:25 pm | सुबोध खरे
तसं नाही हो
आमचे काका आताच सहा महिने स्वतः च्या जन्मगावात राहून परत आले.
त्यांचा ताजा ताजा अनुभव मी लिहिलेला आहे.
बरं ते मागच्या पिढीचे आहेत म्हणजे इंटरनेट क्वचितच वापरतात आणि संगणक तर नाहीच.
अर्थात आपली अपेक्षा किमान असेल तर आपल्याला खेड्यात स्थायिक होणे जास्त सोपे जाईल शिवाय उरुळी कांचन आता तसं खेडं राहिलेलं नाही.
एके काळी मीसुद्धा नाशिक इंदोर सारख्या शांत मध्यम शहरात राहायला जाऊ असे विचार करत असे.
परंतु गेल्या दहा वर्षात या शहरात सुद्धा इतका मोठा फरक पडला आहे कि तेथे जाण्यापेक्षा मुंबईच बरी या निष्कर्षाप्रत आलो आहे.
गेल्या वर्षी नाशिक मध्ये घेतलेला माझा भूखंड विकून मी मोकळा झालो
पहा जमतंय का
आपल्याला शुभेच्छा
11 Feb 2026 - 8:07 pm | गणेशा
एक addition..
मी उरुळी कांचन ला नाही जाणार त्या पेक्षा पुणे बरे अशी स्तिथी आहे सध्या..
मी- माझे अपरिचित असलेले गाव 'उंडवडी-सुपे' ३०० उंबऱ्याच गाव आहे तेथे राहणार आहे.. पाण्याचा प्रश्न थोडा असेल तेथे पण होईल नीट आणि जीवन जगायला काय लागते? समाधान..
12 Feb 2026 - 4:28 am | सोत्रि
कॅालिंग मुविकाका…
त्यांचा फर्स्टहॅन्ड अनुभव ऐकण रोचक असेल. ते कोकणात शेती करत होते काही वर्ष, आखती देशातून परत येऊन. सद्ध्या डोंबिवलीत असतात.
कोणाच्या संपर्कात असतील तर त्यांना इथे यायला सांगा.
- (मुवींच्या प्रतिक्षेत असलेला) सोकाजी
12 Feb 2026 - 7:45 am | गवि
त्यांचे अनुभव त्यांनी इथे लिहीले होते असं वाटतं. पण त्यांनी या बाबतीत त्यांना काय वाटतं ते सांगितलं तर चर्चेत चांगली भर पडेल.
खालील क्रोनॉलॉजी जर अचूक असेल तर त्यात उत्तर येतंच आहे.
12 Feb 2026 - 11:30 am | सोत्रि
त्यामागे आर्थिक गणितांच कारण असावं असं अंधुकसं आठवतंय, वर आलेल्या मुद्यांमुळे नाही. पण त्याबाबत तेच जास्त माहिती देऊ शकतील.
अनुजही चर्चेत वस्तुनिष्ठ असलेले ठोस मुद्दे आलेले नाहीत, सगळा मामला सब्जेक्टीव्हच आहे.
- (चर्चोत्सुक) सोकाजी
12 Feb 2026 - 11:32 am | गवि
@मुवि काका
या हो.. दर्शन द्या हो..
12 Feb 2026 - 11:40 am | कानडाऊ योगेशु
गवि इज कॉलिंग मुवि.!
12 Feb 2026 - 11:56 am | अमरेंद्र बाहुबली
शेतात हळद लावून मुविकका संदेशखाली वर मिपावर मॅसेज करत होते, नंतर संदेशखालीला वाऱ्यावर सोडून गायबले.
12 Feb 2026 - 11:40 am | कानडाऊ योगेशु
गावाकडे म्हणजे एकदम अननोन वा जुजबी माहीती असलेल्या (ती ही एका बाजूचीच), जाणे ही एक प्रकारची रिस्कच आहे.परंतु ज्या गावात काही वर्षे राहिलो आहोत व ज्या गावाला बर्यापैकी ओळखतो अश्या गावात कायमस्वरुपी अथवा दीर्घकाल राहणे इतके काही अवघड नसावे.
पत्नीच्या कामानिमित्त काही काळ उज्जैन येथे वास्तव्यास होतो.घर भाड्याने घेऊन राहत होतो. वर आम्ही व खाली घरमालक. घरमालकाची मुलगी इंजिनिअर होऊन इंदोरच्या कंपनीत काम करत होती पण आम्ही बेंगलोरहून डायरेक्ट उज्जैनला आलो हे कळ्ल्यानंतर त्याने विशेषतः घरमालकीणीने बेंगलोर मध्ये मुलीसाठी काही जॉब मिळतो का ते पाहा अशी विनंती केली. मी त्यांना बेंगलोरपेक्षा इथले आयुष्य फार चांगले आहे असे अनेकदा बोलून पाहिले व मी स्वतः चार पैसे कमी मिळाले तर चालतील पण उज्जैन इंदोर सारख्या शहरात शिफ्ट व्हायला तयार आहे असेही म्हणालो होतो.
मलाही मी नुकताच ग्रॅज्युएट झाल्यानंतरची माझी विचारसरणी आठवली. मलाही त्या वयात मुंबई,पुणे बेंगलोर वगैरेसारख्या महानगरांचे भयंकर आकर्षण होते व काहीही करुन ह्या शहरात येण्याचा प्रयत्न करत होतो.
मुळात शहरातील जीवनशैली वाईट व गावाकडची चांगली अशी काळीपांढरी विचारसरणीच चुकीची आहे. शहरात राहण्याचा ओवरहेड जास्त असतो पण तो वर गणेशाने लिहिल्याप्रमाणे त्याला आपला दृष्टीकोन जबाबदार आहे.
सध्या भोपाळ मध्ये वास्तव्यास आहे. शेजारी एक कुटुंब राहते आहे.पती पत्नी व एक मुलगा जो सध्या बारावीत आहे. पती ने फार्मसी मधली लठ्ठ पगाराची नोकरी करोनानंतर सोडली.(सर्व आर्थिक जबाबदार्यांतुन मुक्त झाल्यावर.) संध्याकाळी दोघे ही पती पत्नी सोसायटी बाहेर पाणीपुरीचा स्टॉल लावतात संध्याकाळी साधारण ३ तास.दोघांकडे पाहुन सुखी जोडपे कसे असावे ह्याची प्रचीती येते. अर्थात कुरबुरी ही असतीलच पण नेहेमीच्या ताणतणावातुन मुक्त दिसतात. मुद्दा हा आहे कि जर सुखीच राहायचे असेल तर त्यासाठी गावाकडेच जायला हवे ह्याची काही गरज नसावी. आपल्या अवाजवी इच्छा आकाक्षांना थोडीफार मुरड घालुन जिथे आहोत तिथेही सुखी होऊन राहता येते.
12 Feb 2026 - 12:51 pm | सोत्रि
रिस्क??? मूर्खपणा असेल तो. असलं अतरंगी प्लॅनिंग करणाऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कारच करायला हवा.
नेमका हाच मुद्दा टीयर ३-४ शहरात जाण्यामागे आहे. शहरातली बकाली, प्रदूषण (हवा, पाणी, ध्वनी...), भयानक गर्दी, ह्यासाठी ते ओव्हरहेड्स बेयर करणं जड वाटतंय.
- (चर्चोत्सुक) सोकाजी
12 Feb 2026 - 11:42 am | मुक्त विहारि
काही गोष्टी. स्वानुभावर आधारित फक्त मुद्दे लिहित आहे. इथली वाचक मंडळी अतिशय हुषार असल्याने, सविस्तर लिहिण्यात माझा वेळ वाया जाईल.
१. शेती हा पूर्णवेळ व्यवसाय आहे.
२. मजूर वर्ग आधारित शेती फायदेशीर ठरत नाही.
३. नसते लोढणे अंगावर घेणे घेणे अयोग्य.
४. घरची किमान ४ माणसे, सतत शेतावर हवीत.
५. पाण्या सारखा पैसा सतत ओतावा लागतो.
६. वीज पुरवठा खंडित होतोच होतो.
७. दलाल तुपाशी आणि शेतकरी उपाशी, हे जागतिक त्रिकालाबाधित सत्य आहे.
८. सर्व प्रकारचे, दळणवळण सुखकर कधीच होणार नाही.
९. जाती भेद, कधीच पुसले जाणार नाही.
१०. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.... त्यामुळे, नाशवंत शेती न करणेच उत्तम.
थोडक्यात, माझ्या पुरते सांगायचे तर,
कुटुंबासहीत, सामुदायिक वृक्ष लागवड (फणस, बांबू, इत्यादी) करणे, हा सर्वोत्तम मार्ग आहे.
एकटे शेती करणार असाल तर, साई बाबांचे मंदिर शेतात उभारा आणि ही सगळी भानगड ट्रस्टच्या किंवा फाऊंडेशनचा ताब्यात ठेवा. त्या ट्रस्टवर आणि फाउंडेशनवर आपला कौटुंबीक वरचष्मा ठेवा....
वैयक्तिक पातळीवर सांगायचे तर, शेती हौस म्हणून करायची असेल तर, आर्थिक पाया भक्कम पाहिजे आणि तो अविरत हवा.
आणि
व्यवसाय म्हणून करायची असेल तर, फणस आणि नारळ लागवड, हीच सध्या उत्तम .... फणसाचे झाड ही आपली Fix Deposit... वाढले की तोडून टाकायचे, ह्या झाडाची चोरी होत नाही.
नारळ लागवड, हे आपले रोजंदारी उत्पन्न. रोज शेतात फिरायचे आणि पडलेले नारळ गोळा करायचे. नारळ उतरवायला मजूर मिळत नाहीत. पण नारळ तयार झाला की तो झाडावरून पडतो. ४०० नारळाची झाडे, ४ माणसांना रोजचे उत्पन्न देते. एकरी ४० नारळ बसतात.
त्यामुळे, १२ एकर शेती, ही ३५ ते ४० ह्या वयोगटात घेणे.... झाडांची लागवड आणि घर आणि इतर आनुषंगिक गोष्टींना किमान १५ वर्षे , आर्थिक ताण न येता लागतात.
निवृत्ती नंतर, ६० नंतर शेती करायची असेल तर, ती आपल्या मुला साठी ....
बाय द वे,
काही कौटुंबीक जबाबदाऱ्या आणि इतर पर्यायी मार्ग अवलंबत असल्याने, सध्या तरी डोंबिवली येथे आहे. पुढच्या वर्षी कुठे असेन ते सध्या तरी सांगू शकत नाही.
तशी म्हणायला शेत जमीन आहे पण ती फक्त ७१ गुंठे आहे. त्यामुळे, ते भरपूर खर्चिक काम होणार आहे. गेल्या काही वर्षांत, अपघात, लग्न, कुटुंबातील व्यक्तींच्या हॉस्पिटल मध्ये वास्तव्य ह्यामुळे वेळ काढता आला नाही...
12 Feb 2026 - 12:38 pm | सोत्रि
धन्यवाद मुवी! वेळात वेळ काढून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
अजून एक प्रश्न आहे, तो मूळ चर्चेचा मुद्दा आहे.
शहरात सगळे आयुष्य घालवल्यानंतर रिटायरमेंट साठी गावाच्या ठिकाणी जाऊन राहणे शक्य आहे का (भक्कम आर्थिक तरतूद करून) ? की तसा निर्णय घेतल्यावर १-२ महिन्यात निर्णय चुकून परत शहरात यावे लागेल?
तुम्ही आखातातून परत येऊन कोकणात रिटायरमेंट घेतली होतीत. त्यासंदर्भातील तुमचे अनुभव किंवा मतं हवी होती.
- (आभारी) सोकाजी
12 Feb 2026 - 2:21 pm | मुक्त विहारि
वैयक्तिक पातळीवर, मला तरी गावात राहणे सुखकर झाले...
पहाटे चार वाजता उठणे आणि सूर्य उगवायच्या आत, शेतावर जाणे आणि सूर्य तापला की घरी येऊन जेवण बनवणे आणि घरातील इतर कामे आटोपली की दुपारची झोप घेऊन परत ४ वाजता शेतावर जाणे आणि सूर्य मावळे पर्यंत शेतात पाणी फिरवणे आणि जीवामृत फवारणी करणे... ह्यात मला तरी मानसिक समाधान मिळाले.
सोमवारी वीज पुरवठा बंद असल्याने, सोमवारी जीवामृत करणे...
ही जीवनशैली मला आवडली पण इतरांना आवडलीच पाहिजे, हा अट्टाहास नाही...
ह्या जीनशैलीचा मला दोन प्रकारे फायदा झाला.
१. माझी मानसिक ताकद वाढली.
आणि
२. निसर्गा बरोबर एकरूप झालो. (इथे डोंबिवलीत डोळ्यापुढे फक्त भिंती असतात आणि शेतात गेलो की अफाट क्षितीज....)
------
बाकी गावी गेलो की, शहरातील सुखे (?) विसरायची आणि शेतात गेलो की क्षितीजापुढे सगळे विसरून जातो....
-----
कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्याने सध्या तरी डोंबिवली येथे आहे. आणि अपघाता मुळे, एक पाय शॉर्ट झाला आहे, त्यामुळे आता खूप शारीरिक कामे न करता, पाणी आधारीत शेती करायचा विचार आहे.
अर्थात, कमी जागेत, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन (गाव जातिभेद करतेच करते...), पाणी आधारीत, कमी श्रमात, बाजारपेठ शोधून (म्हणजे , उद्या माल जर नासला (नासलेला माल पण विकल्या गेला पाहिजे) किंवा लगेच विकता नाही आला तरी आर्थिक ताण पडायला नको. तसेही "धन" होणार ते दलालाचेच) आणि व्यवस्थित आर्थिक नियोजन करून , आता जागेत नक्की काय उत्पादन करावे? ह्याचा विचार सुरू आहे.
शिवाय जोडीला कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेतच.
-----
परतीचे दोर कधीच कापायचे नसतात.
आपण कितीही प्रयत्न केले तरी, मोठ्या शहरातच शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत...
---------
परत एकदा मूळ पदावर येतो...
मला गावी राहायला आणि स्थाईक व्हायला आवडेल, पण हा अपवाद आहे.
चार दिवस वीज पुरवठा बंद झाला होता आणि मोबाईल बंद पडला होता... माझे अडले नाही.
नाग दोन वेळा दर्शन देऊन गेला... त्याच्या जागेत जातांना मी काळजी घेऊन जायला लागलो. काठी आपटत जायचो...
त्रास एकाच गोष्टीचा होतो आणि तो म्हणजे प्रचंड प्रमाणात होत असणारे ध्वनी प्रदूषण.... पण आता सरळ कानात बोळे घालायचे आणि झोपायचे. तसेही आपण कुठे प्राईम मिनिस्टर आहोत? की फोन नाही घेतला तर जग बुडणार आहे.
-------
आपापल्या चौकटीत रहायचे आणि विसरून जायचे.
-----
प्रतिसाद अस्ताव्यस्त झाला आहे. त्यामुळे क्षमस्व... आता इतकी लिहायची सवय नाही राहिली. आता मी म्हातारा झालो आहे...
तू, समजून घेशील, ही खात्री आहे....
12 Feb 2026 - 5:24 pm | सोत्रि
+१००
मुवीकाका, हा शालजोडीतला कशासाठी? का अवघडायला लावताय चारचौघात.... :(
- (अवघडलेला) सोकाजी
12 Feb 2026 - 12:56 pm | हणमंतअण्णा शंकर...
१. मी आयटीत गेली पंधरा वर्षे काम करत आहे. सुरुवात एलजी इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर दोन प्रॉडक्ट कंपन्या आणि आता एक अमेरिकन प्रॉडक्ट कंपनी अशी माझी करिअर झाली. यात प्रामुख्याने अल्ट्रा scalable back end and लिहिणे यामध्ये जास्तीत जास्त स्पेशललायझेशन मिळवत गेलो. सध्या काही ए आय एनसिलरी प्रोजेक्ट जरी असले तरी माझा तो निष नाही. कंपनीचे एआय ऍडॉप्शन भरपूर आहे त्यामुळे कंपनी मार्केट मधून कालबाह्य होणार नाही. तरीही अँथ्रोपिक ज्या पद्धतीचे नवनवीन टूल्स आणत आहे त्यावरून 'आता उरलो प्रॉम्प्ट पुरता' एवढेच उरले आहे. अजूनही ए आय बेसिक चुका करत असले तरी मी गेले दोन वर्ष एकही ओळ स्वतः लिहिली नाही. मात्र मी ए आय वापरून अनेक कल्पना ज्या मला पूर्वी सहज करणे शक्य नव्हत्या त्या सर्व करून पाहिल्या आणि त्यांचे उत्तम रिझल्ट मिळवले. सध्या सॉफ्टवेअर आर्किटेक्ट अशा रोलमध्ये मी आहे.
२. तरीही मला भीती याची वाटते की कंपन्यांनी डाऊनसाइजिंग केले तर मला नारळ मिळू शकतो. अर्थात मला स्वतःला नारळ मिळेल असे वाटत नाही तरीही एकदा प्रॉडक्ट मॅच्युअर झाला की कंपनीला तसे वाटू शकते की यांना डच्चू दिला तर फारसा फरक पडणार नाही.
३. बऱ्याच कंपन्या स्वतःच्या प्रॉडक्ट्स मध्ये ए आय फीचर आणत आहेत जे कस्टमर वापरत नाहीत त्यामुळे त्यांना अप सेल करणे हे एक मोठे चॅलेंज होऊन बसले आहे. त्यामुळे अगदी एआय मध्ये जरी काम केले तरी काम असेलच याची काहीच खात्री नाही. तरीही सध्या एआय इंजीनियरिंग आणि एम एल ओप्स यांचे ज्ञान घेणे सुरू आहे. दीर्घ अनुभवाचा फायदा असा होतो की हे नवीन ज्ञान घ्यायला फारसा त्रास होत नाही.
४. मात्र आता तशी पॅशन नाही. एका वयानंतर ही धडपड करायचे राहून जाते आणि ती आंतरिक उर्मी देखील तेवढी प्रबळ उरत नाही. म्हणून नवीन स्किल्स मिळवणे कितीही गरजेचे असले तरी मानवी मनाच्या मर्यादा आहेत. सध्याचे नॉलेज लाइफ सायकल सात वर्षांचे असल्याने किंबहुना त्याच्याहूनही कमी असल्याने सात वर्षांपूर्वीची टेक्नॉलॉजी किंवा स्किल आता जवळजवळ कालबाह्य झालेले असते हे आयटी मधले सध्याचे सत्य. मेडिकल क्षेत्रामध्ये किंवा इतर अनेक क्षेत्रांमध्ये हे खरे नाही तिथे ज्ञानाची लाईफ सायकल बऱ्यापैकी मोठी असते.
५. त्यामुळे माझी तंतरली आहे का तर होय कारण वरती सोकाजी म्हणतात तसे पर्याय म्हणून आपण काय करू शकतो याचा आत्मविश्वास नाही. म्हणून बहुतेक लोक फूड व्यवसायात पडतात कारण त्यांना तसा एक लो एन्ट्री बॅरियर असलेला दुसरा पर्याय फारसा सापडत नाही.
६. आतापर्यंत जेवढे जमले आहे ते चांगल्या इक्विटी मध्ये गुंतवून कमी रिस्क आणि जास्त रिस्क बॅलन्स करून वार्षिक 12 ते 13 टक्क्यांच्या वरती परतावा मिळवणाऱ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये पुंजी जमा करून सरळ सरळ निवृत्त व्हावे ही एक सर्व मान्य कल्पना आहे त्यामध्ये तुम्ही नोकरीवर उत्पन्नासाठी अवलंबून राहत नाही. तुमचा मासिक खर्च कमी ठेवून तुम्ही आतापर्यंत जमवलेल्या पैशांवर आरामात आयुष्य काढू शकता अशी फिलोसॉफी. मात्र असे स्ट्रक्चर्ड शिस्तबद्ध प्लॅनिंग बहुतेक लोकांना जमत नाही. ज्यावेळेस पैसे असतात त्यावेळेस लोक संधी हुकवतात आणि ज्या वेळेस संधी असते त्यावेळेस पैसे नसतात असे होते. किंवा स्त्री हट्ट बालहट्ट इत्यादी सर्व हट्टयांना शरण जाऊन रियल इस्टेट सोने नाणे इत्यादी अनेक गोष्टींमध्ये पैसे गुंतवले जातात. म्हणून अशी शिस्त लावून घेणे वाटते तेवढे सरळ नसते.
७. आता निवृत्त झाल्यावर काय करावे हा एक प्रश्न इथे अनेकांना छळत आहे. बऱ्याच जणांची ही एक रोमँटिक कल्पना असते की गावाकडे जाऊन शेती करावी. काही जणांनी त्याला विरोध केला आहे की grass is always greener on the other side. परंतु अशी इच्छा असणे ही व्हॅलिड इच्छा आहे भले कितीही रोमँटिक असेना आणि माणूस जेव्हा असा विचार करत होते तेव्हा तो पूर्णपणे नवीन सेटिंग मध्ये जाऊन स्वतःला सेटल करू इच्छितो असा अर्थ नाही. बहुतेकदा हे गाव त्याच्या परिचयाचे असते गावामध्ये ओळखी असतात. तसेही वय वाढेल तसे आपण जिथे मोठे झालो ते गाव किंवा जागा खुणाव लागतात कारण मिडलाइफ क्राईसेस नंतर आपल्याला जी मानसिक सुरक्षितता लागते ती माणूस तीव्रतेने शोधू लागतो आणि त्यामध्ये आपल्या गावांचा वरती नंबर येतो.
८. माझे वैयक्तिक मत असे आहे की शेती हा पूर्ण वेळ व्यवसाय असला तरी हा तोट्यात जाणार आहे व्यवसाय असतो म्हणून शेतीकडे मी कधीही उत्पन्न मिळवणारा व्यवसाय म्हणून पाहत नाही. जेव्हा मी असे म्हणतो की मी गावाकडे जाऊन शेती करेल तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की मी गावाकडे जाऊन मार्केट गार्डन जरी तयार केले तरी त्यातून उत्पन्न न मिळता किमान तोटा होईल असा मी एक खर्चिक छंद जोपासणार आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. एकदा त्यातून उत्पन्न मिळालेच पाहिजे अशी अट निघून गेली की आपण शेतीमध्ये काहीही करायला मोकळे होतो. म्हणून आधी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र आणि शेतीचा महाग छंद अशी निवृत्त योजना माझी आहे.
९. यात मुख्य उद्देश हातपाय चालत राहावेत आणि त्यातून उत्पन्न मिळालेच तर सोने पे सुहागा.
१०. शहरात आयुष्य घालवलेल्या माणसाला गावाकडच्या अनेक गोष्टी होऊ शकतात परंतु भारतामध्ये शहरातही अनेक खूपणाऱ्या गोष्टी असतात जसे की सगळीकडून होणारे प्रचंड प्रमाणातले ध्वनी प्रदूषण. मध्यम मार्ग म्हणजे लहान शहर आणि त्याच्या परिघावर राहणे. ध्वनी प्रदूषण आणि वायु प्रदूषण यांचा कमीत कमी त्रास होईल असे पाहणे.
११. पुण्यात राहणाऱ्या माझ्या मित्रांच्या सर्व मुलांचे सध्या एलर्जी असलेल्या खोकल्याने प्रचंड नुकसान होत आहे कारण बाहेर एयर क्वालिटी इतकी ढासळलेली आहे. तेव्हा नामुष्की म्हणून शहरात आयुष्य काढणे म्हणजे ते कमीच करून घेणे.
१२. म्हणून सध्या जितका पगार येत आहे तो येऊ देत आहे जोवर आंतरिक इच्छा आहे तोवर पुढे धकवत नेईन. मात्र भारतातील ९५ % जनतेप्रमाणे राहण्यासाठी सध्या आपण पुरेसे कमावलेले आहे की नाही हा विचार जर केला तर आश्वस्तता आहे. आपण लीन राहिलो की आनंदी आयुष्य जगता येईल असे वाटते. अत्यंत जास्त सेफ्टी नेट असले तरीही अस्थिरता आणि अनारोग्य येणारच नाहीत असे काही नसते. माझी आई जर मासिक दहा हजारात आनंदी आयुष्य जगत असेल तर मी तिच्या कित्येक पट कमवून सतत ताणात राहत असेल तर काय फायदा? आनंदी राहायला नेहमी सोयी लागतात असे थोडीच आहे? म्हणजे स्विगी वगैरे नसेल तर काहीही झाटाचा फरक पडला नाही पाहिजे. यास या सोयी कोणाच्यातरी प्रचंड आर्थिक शोषणावर तुम्हाला मिळतात त्यामुळे त्या वाटतात तेवढ्या सोयी नाहीत. महत्त्वाच्या सोयी म्हणजे जवळ दवाखाना आणि शाळा असणे. परंतु जर माझ्या तालुक्याच्या ठिकाणी 30 40 हजार लोक तिथल्या असलेल्या दवाखान्यांवर आणि शाळांवर जगत असतील तर त्यांच्याहून थोडीशी जास्त मिळकत किंवा दळणवळणाची साधने बाळगू शकत असणाऱ्या मला थोडासा बरा दवाखाना शेजारच्या मोठ्या शहरात मिळू शकत असेल तर हे इतके काही वाईट नाही.
12 Feb 2026 - 1:25 pm | हणमंतअण्णा शंकर...
१३. आता सर्व भौतिक गरजा जरी आपण तालुका प्लेस ला किंवा शहरापासून जवळ राहून सोडवल्या तरीही सांस्कृतिक गरजा कशा सोडवायच्या हा एक प्रश्न आहे.
उदाहरणार्थ मला मराठी नाटक पाहायला आवडतात मला एकांकिका बसवायला आवडतात मला संगीतामध्ये रस आहे त्यामुळे मला नवीन वाद्य शिकायचे आहेत आणि मला तसे गुरु हवे आहेत. खेड्यांमध्ये या कोणत्याही गोष्टी मिळणार नाहीत. वैयक्तिक शिकण्याच्या सोयी इंटरनेट आणि तत्सम टेक्नॉलॉजी ने मिळू शकतात मात्र सांघिक कलेसाठी खेडे आणि अगदी तालुक्याची ठिकाणे देखील बिनकामाची असतात.
१४. राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेता येईल एवढा छोटा ग्रुप जरी करायचा म्हटलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणास पर्याय नाही. किंवा तालुक्याचे गाव तरी किमान 40 हजारांच्या लोकसंख्ये पुढचे हवे तर तिथे सम विचारी लोक सापडू शकतात. दुसरा पर्याय म्हणजे अशा ठिकाणी असलेले कॉलेजेस जेथे आपल्याला नवीन मुलं तयार करता येऊ शकतात.
१५. दुसऱ्या सांघिक गरजा जसे की सांघिक खेळ यांच्यामध्ये जर पॅशन असेल तरीदेखील खेडी किंवा तालुक्याची ठिकाणे बिनकामाची आहेत. माझ्या तालुक्याच्या ठिकाणी एक बॅडमिंटन क्लब देखील आहे मात्र हा एवढाच चॉईस आहे. एखाद्याला टेनिस बास्केटबॉल किंवा अगदी फुटबॉल जरी आवडत असेल तर त्याला कोल्हापूर सारख्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नाही. परंतु बहुतेक जनतेचे क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळावर भागते त्यामुळे तालुक्याची ठिकाणे देखील काही वाईट नाही तिथे आता असे क्लब भरपूर आहेत.
१६. वैयक्तिक खेळ आणि तशा इव्हेंटसाठी जवळच्या शहरात जाऊन येऊन असणे अवघड नसावे उदाहरणार्थ मॅरेथॉन. किंवा सायकलिंग. मला स्वतःला सायकलिंग आणि अँगलिंग आवडते त्यामुळे माझ्या सांघिक सांस्कृतिक गरजा या फक्त कलेपुरत्याच मर्यादित आहेत. भारतामध्ये अँगलिंग हा प्रकार अत्यंत बाल्यावस्थेत आहे. परंतु हा अत्यंत कमी खर्चाचा परंतु भरपूर आनंद देणारा प्रकार. माझे घरचे पूर्वीपासून मासेमारी अगदी मनापासून करतात आणि त्यातून मला अँगलिंग ची आवड निर्माण झाली.
१७. पक्षी निरीक्षण फुलं किंवा इतर शास्त्रधारीत छंद शहरात आणि गावांमध्ये तेवढ्याच क्षमतेने करता येतात. किंबहुना माझ्या तालुक्याच्या ठिकाणी दोन अत्यंत उत्तम दर्जाचे पक्षी निरीक्षक आहेत आणि त्यांच्याशी माझे खूप छान जुळते.
12 Feb 2026 - 5:26 pm | स्वधर्म
तुमचा प्रतिसाद म्हणजे एक ब्ल्यू प्रिंटच आहे. मला असेच लिहावेसे वाटत होते.
पण मला उलट सांस्कृतीक गरजा लहान गावात खूप चांगल्या प्रकारे पूर्ण होतील असे वाटते. कारण तसा डेटा आहे. माझा प्रोफेसर भाऊ दररोज कॉलेज सुटल्यावर व्हॉलीबॉल खेळायचा. एक उद्योजक मित्र संगीत शिकायचे व रात्री भजनी मंडळात जायचे. अत्यंत एक्सायटेडली आपण संगीत कसे शिकत आहोत हे सांगायचे. आपल्याला आता भीमसेन जोशी थोडेच व्हायचे आहे. आमचे शिक्षक चक्क नरसोबा वाडीच्या देवळाला अंगार्याच्या पुड्या बांधण्यासाठी कागद कापून लोकसेवा करतात. फक्त या सर्वांना आर्थिक विवंचना नाही. हे पुण्या मुंबईत राहून कुणाला जमते असा एकही माणूस मला माहित नाही. सगळे पोटाच्या मागे लागले आहेत असे वाटते.
लहान गावात अनेक हुशार होतकरू मुले आहेत ज्यांना एक्सपोजर मिळत नाही, हुषार असले तरी इंग्रजी बोलता येत नाही. शिकवण्या घेण्याचे पार्ट टाईम काम केले तर खूपच डिमांड आहे. अशा अनेक संधी तिथेही आहेत.
बाकी पैसे कमवण्यासाठी शेती ही कल्पनाच आताशा व्यवहार्य राहिली नाही असे खेदपूर्वक म्हणावे लागते. त्या बाबतीत मुवी काकांशी सहमत आहे.
12 Feb 2026 - 5:50 pm | गवि
खेडेगाव आणि मध्यम लोकसंख्येचे शहर यांच्यात अनेक प्रतिसादांत गल्लत होतेय की काय असं वाटतं.
खेडेगाव किंवा गाव: पावस, हेदवी, श्रृंगारतळी, बत्तीसशिराळा, लांजा, लासलगाव, घोटी, कवठेपिरान, लोलये , तळपण, आगरदांडा
निमशहर: रत्नागिरी, अलिबाग, कुडाळ, चिपळूण, दापोली, म्हापशे,
शहर: सातारा, सांगली मिरज कुपवाड, कोल्हापूर, बेळगावी, मडगाव, पणजी
महानगर: मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरू
महानगरातून निमशहर आणि शहर यांत जाण्यात कमी अडथळे. खेड्यात जाण्यात मुख्य.
12 Feb 2026 - 1:17 pm | अप्पा जोगळेकर
माझी सक्खी बहीण,भाऊजि आणि भाचा कोविड काळात डोंबिवली ते तळकोकण तले खेडे असे स्थलांतर करून स्वतःचे घर बांधून राहत आहेत. ६ वर्षे झाली. त्यानी स्वतःचे परतीचे दोर कापून टाकले, आता स्थिरस्थावर आहे सगळे. घरचे अन्नधान्य, शेततळे, विहीर, असंख्य अनुदाने, घरचे दूध वगैरे चैन असते. भयंकर पाऊस, फुरसे , माकडे त्रास , शेतीवर गडी न मिळणे इत्यादी असंख्य समस्या सुद्धा आहेत. पण आता त्यांना सवय झाली आहे.
12 Feb 2026 - 1:32 pm | हणमंतअण्णा शंकर...
देशावर सध्या या सापाने धुमाकूळ घातला आहे.
12 Feb 2026 - 1:46 pm | सोत्रि
+१००
- (उभारी मिळालेला) सोकाजी
12 Feb 2026 - 3:02 pm | कपिलमुनी
ज्याना गावाकडे राहायची सवय असेल त्यांना सोपे जाइल ,
पण जन्मापासून पुण्या मुंबैत वाढलेल्या पिढीला हे अवघड आहे , याचे मुख्य कारण आहे .. सोशल कनेक्ट
मनुष्य हा समूहाने राहणारा प्राणी आहे . तुम्ही गावाकडे गेलात ते सोशल कनेक्ट सहज होत नाही . पुरुषांना उतार वयात नवीन मित्र जोडणे अवघड असते , बायका सहज मिक्स होतात . एकमेकींना बोलावणे , गप्पा मारणे , देवाण घेवाण सहज होते.
गावाकडे उद्योग काय करावा ? शेती नसेल तर काय असे प्रश्न अस्तत.
हा एकलकोंडेपणा घालवता आला पाहिजे. बरेच जण त्याला कंटाळतात
-------------------
गावाकडचे विषय , राजकारण , अर्थकारण हे फार वेगळे असते.. एखादा मास्तर सोडला तर रीटायर्ड कोणी नसते. त्यांचे रुटीन चालू असते.
गावाकडेखर्च कमी हा अजून एक गैर समज आहे , किराणाचे जे रेट इथे आहेत तेच तिथेही आहेत , भाज्या थोड्या स्वस्त मिळतिल एवढेच.
-----------------------------
आमचे पिढीजात घर आहे , माझे बालपण गेले आहे आणी सध्या शेतीच्या निमित्ताने मी महिन्यातून २ वेळा जातो , मे मध्ये महिनाभर राहतो ,
गावात हळू हळू संपर्क वाढला आहे . रीटायरमेण्ट नंतर नक्की जाउन राहणार
12 Feb 2026 - 4:23 pm | अमरेंद्र बाहुबली
माझ्या पुणेस्थित काकानी १९६४ साली धुळे सोडले व पुण्यात स्थायिक झाले, आपल्या जन्मगावात स्वतःचे घर असावे म्हणून त्यांनी २०२२ साली स्वतचे घर विकत घेतले, धुळे शहरात घ्या असे सांगूनही त्यांनी शहरापासून २० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या धुळ्यातच आलेल्या पण खेडेच असलेल्या गावात हट्टाने घर घेतले त्याचा फायदा असा झाला की ३५ लाखात चार मोठ्या रुमचे, २ टॉयलेट बाथरूमचे बोअरवेलसह घर मिळाले. बांधकाम अवस्थेत असताना घर घेतले होते पण बिल्डरने ताब्यात देताना प्रचंड त्रास दिला ७ दिवसाचे काम बाकी होते पण ६ महिने झाले तरीही पूर्ण करत नव्हता पैसे सर्व दिले गेले होते तरीही! शेवटी बिल्डरच्या मुलाची नी माझी हाणामारी झाली दोन्ही बाजूचे लोक जमले नी नंतर समजुतीने बैठक बसवून तेच काम बिल्डरने सात दिवात करून दिले.
त्या घरात काका महिना - २ महिन्यातून एखादी चक्कर टाकतात नी चार- पाच दिवस राहतात. जवळच असलेल्या कुणालाही २००-५०० दिले की तो घराची साफसफाई नी केरलादी करून देतो. शिवशाही त्याना फ्री आहे (७५ पार असल्याने) त्यामूळे यायला जायला एक रुपयाही लागत नाही. मागे आम्ही सगळ्यांनी अख्खा मे महिना तिथेच काढला होता. पण आता ४ वर्षांनी काकांचे मन भरले व त्यांनी ते घर विकायला काढले आहे पण ना गिरहाईक आहे ना भाडेकरू. भाडेकरी टाकून फक्त एक रूम स्वतःला ठेवाव म्हणून थोडी तोडफोड करून २० हजार खर्च करून मॉडिफिकेशनही केले पण भाडेकरू मिळत नाहीये कारण ते घर शहराच्या बोंड्रीवर आहे/ जवळपास खेड्यातच आहे. पण शांतता, थंड नि मोकळी हवा तिथे गेल्यावर मिळते. मी गेलो की मला मात्र चारही रूम, अंगण दोन्ही बाथरूम झाडून नि पुसून/ धुवून काढावे लागतात त्यातच मी अर्धमेला होतो.
12 Feb 2026 - 6:52 pm | कपिलमुनी
सगळ्या सेकंड होम ची अवस्था हीच आहे . माझे लहानपण तळेगाव मध्ये गेले , मुंबैकर स्वस्त आणि हौस म्हणून फ्लॅट घ्यायचे . नंतर पडून राह्तात.
12 Feb 2026 - 8:28 pm | गवि
अगदी.
प्रत्यक्ष वर्षानुवर्षे स्थायिक होऊन आजही तिथेच असलेली फार थोडी उदाहरणे दिसतात. तशी असतात पण फार फार कमी. प्रत्यक्षात अशी निसर्गाच्या कुशीतली घरं काळवंडलेली, तडे गेलेली, शेवाळ्याने वेढलेली आणि रिकामी पडलेली, ओळींमध्ये उभी असलेली असंख्य गावांत दिसतील. वास्तुशांत जोरात. गृहप्रवेश उत्साहात. पहिल्या महिन्यात दर विकेंड न चुकता भेट. मग महिन्यातून एकदा साफसफाईपुरते. मग पूर्ण कुटुंब न येता एकच सदस्य सुटसुटीतपणे येऊन गावातल्या बाई किंवा गड्याला पैसे देऊन स्वच्छता करून, बिले भरून जाणे. नंतर गावातच कोणाला किल्ली देऊन आणि गड्याला पैसे देऊन ठेवून स्वच्छता आणि लक्ष ठेवायला सांगणे. फळझाडे असतील तर त्या मोसमात एकदा ती घेऊन जायला फेरी. असा क्रम प्रत्यक्ष निरीक्षणात सर्वात जास्त वेळा आहे. मी स्वतः आणि इतर अनेक.
रिटायर झाल्यावर त्या बुक केलेल्या वसाहतीत परसात शेती वगैरे करू असे प्लॅन करून अधिक खोल पर्यावरणीय प्रकारच्या वसाहतींचे प्रयत्न याहून अधिक आपटले आहेत.
13 Feb 2026 - 8:15 pm | सुबोध खरे
माणसाकडे रोजच्या गरजेपेक्षा पैसा जास्त झाला कि तो बहुधा घर बांधायला घेतो- व्यंकटेश माडगूळकर.
शहरात साधारण बरा पैसा मिळवणारा माणूस असेल तर त्याचे एक गो $$ ड स्वप्न असते ते म्हणजे एखाद्या शांत सुंदर खेड्यात आपले घर असावे. शहराच्या वर्दळीचा कंटाळा आला कि आपण तिथे जाऊन चार दिवस आरामात राहायचे पहाटे उठून नदीकाठावर फिरून यायचे, गावचे सकस अन्न खायचे, ताजी हवा छाती भरून घ्यायची. निवृत्तीला आलं कि हेच घर आपलं कायमचं घर म्हणू करायचं. नको ती शहरातील गर्दी आणि प्रदूषण.
पण
प्रत्यक्षात खेड्यात गेल्यावर काय होतं. खेड्यात पहिले १५ दिवस फार मजेत जातात. चार लोक चौकशी करतात. माणसं चार पैसे सढळ हाताने खर्च करतात.
एकदा नव्याची नवलाई संपली कि हेच खेड्यातील जीवन बऱ्यापैकी संथ आणि रटाळ वाटायला लागतं. वृत्तपत्र तरी किती वाचणार?
घरी टी व्ही संगणक असला तरी निदान चार तास घालवायला चांगला उद्योग नसला तर दिवसभर काय करायचं हा प्रश्न खायला उठतो.
बायकांचा बराच काळ स्वयंपाकघरात किंवा घरच्या उस्तवारीत जातो. उरलेला काळ धारावाहिक पाहण्यात जातो
पुरुषांना साधारणपणे याची अजिबात सवय नसते. गावच्या लोकांशी गप्पा काय आणि किती मारणार? तिकडच्या लोकांचे प्रश्न तुम्हाला क्षुल्लक वाटतात. तिथल्या राजकारणात मन रमत नाही. शेतीची सवय नसते. गावच्या माणसांकडून काम करून घेणे हे वाटते तितके सोपे नसते.
मुंबई पुण्यासारखे वट्ट सहा सात तास तेथे कोणीच कामगार काम करत नाही. पण पैसा मात्र मुंबईच्या दरानेच हवा असतो.
जर मुले शहरातच असतील तर खेड्यात जाऊन आपण नक्की काय मिळवलं हा विचार बळावतो. ज्यांची मुले देशाबाहेरच आहेत त्यांचा प्रश्न वेगळा असतो.
खेड्यात कचरा व्यवस्थापन हा एक विषय असतो. आपले सांडपाणी/ मैल याची व्यवस्था स्वतःला करायची असते.
उन्हाळ्यात हमखास वीज जाते. मग ए सी चालत नाही आणि हिवाळ्यात गिझर चालत नाही कारण एवढा मोठा इन्व्हर्टर किंवा जनरेटर कुणी बसवलेला नसतो.
माणसं साधारण चांगल्या हवामानातच खेड्यात जाऊन राहतात.
कोकणात प्रचंड पावसाळा असतो. देशावर प्रचंड उन्हाळा आणि हिवाळा असतो.
जेंव्हा तुम्ही प्रत्यक्ष राहायला जाता तेंव्हा हे ऋतू किती कठीण आहेत हे जाणवते.
वैद्यकीय मदतीसाठी तालुक्याला पळावे लागते. यात गंभीर आजारच सायला हवा असे नव्हे, साधा चष्मा तुटला तरी दोन चकरा माराव्या लागतात.
आणि तालुका किंवा जिल्हा पातळीवरची शहरे आता मोठ्या शहरांइतकीच प्रदूषित आणि गर्दीची झालेली आहेत.
घर बांधलंय तर त्याची उस्तवार करावीच लागते. मधून मधून शहरात आपली आर्थिक किंवा इतर कामे करण्यासाठी जावेच लागते. तेथे गेल्यावर मग दोन्हीआयुष्याची तुलना होते.
या वेळेस ज्यांची विचारांची बैठक पक्की असते. म्हणजे नवरा आणि बायको दोघांची खेड्यात सामावून घेण्याची तडजोड करण्याची मानसिक तयारीअसते तेच लोक परत खेड्यात जातात. बायकोची तयारी नसेल तर मात्र कठीण होतं.
प्रत्येकाने केवळ आपले गो $$ ड स्वप्न होतं म्हणून जाणे हे व्यावहारिक नाही. ज्याला जमेल त्याने करावे.
अन्यथा परत येण्याचे दोर मात्र कापू नयेत.
12 Feb 2026 - 6:55 pm | हणमंतअण्णा शंकर...
नुसते घरच घेतले की शेत पण घेतले?
नुसते घरच घेतले तर हा काही चांगला निर्णय म्हणता येत नाही.
12 Feb 2026 - 8:38 pm | अमरेंद्र बाहुबली
फक्त घरच.
12 Feb 2026 - 11:04 pm | कपिलमुनी
आयटी मध्ये किंवा इतर उद्योगातून रिटायर झाल्यावर गावाकडे का जावे वाटते ?
शहरात का नाही ?
खर्च कमी असा समज ?
उत्तम शुद्ध हवा ? संथ आयुष्याची आवड ?
खेड्यात राहण्याची शेतीची आवड आणि शेती असणे
शेती किंवा तत्सम उद्योगातून अर्थार्जन ?
15 Feb 2026 - 11:10 pm | गणेशा
वैयक्तिक सांगायचं झालं तर…
गावाकडे ओढ लागते ती सर्वप्रथम आठवणींमुळे.
बापाच्या आठवणी, त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा…
जीवाभावाच्या मित्रांची साथ…
आणि माणुसकीचा तो ओलावा, जो मनाला आधार देतो.
५० नंतर किमान इतकं तरी वाटतं -
उरलेलं आयुष्य थोडं stress विरहित, संथ… आणि मुख्य म्हणजे आपल्यासाठी जगता यावं.
IT आणि शहराच्या जीवनाबद्दल तक्रार नाही,
पण तिथे अनेकदा नात्यांपेक्षा भूमिका जास्त असतात.
मुखवटे घालून जगण्यापेक्षा, जे आहे ते खरं मान्य करून, आपल्या चेहऱ्यासोबत जगणं मला जास्त योग्य वाटतं.
शहराला नावं ठेवणं हा हेतू नाही.
पण या धकाधकीत माणसाला स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ नसतो, मग तो दुसऱ्यांसाठी वेळ कसा काढणार?
म्हणून कधी कधी मन सांगतं -आपलं गावच लय भारी.
कारण तिथ कदाचित सुविधा कमी असतील,
पण माणूसपण जास्त भेटतं.
बाकी पैसा कमावणे, खर्च कमी असणे, शेतीतून पैसा कमावणे हा मला दुय्यम प्रश्न वाटतो..
कारण ज्या माणसाला ५० शी पर्यंत हे नीट करता आले नसेल तो नंतर हि नीट करणार नाही, आणि ज्याला ते आतापर्यंत नीट आले असेल तो ते नीटच करणार...
उगाच मी इतकी शेती घेतली.. याव करणार आणि त्याव करणार असल्या टिंग्या हाणणारे खुप बघितले आहेत ये उनकी बस नही...
Hope तुला माझी उत्तरे तुझ्या प्रश्ना साठी आवडली असतील..
- गणेशा
16 Feb 2026 - 1:39 pm | कपिलमुनी
मी ५० - ५५ नंतर गावी जाण्याचे मूख्य कारण "रूट्स" !
माझ्या पुढच्या पिढीला जुन्या पिढीशी जोडायचा दुवा व्हायचे आहे .
बाकी अर्थार्जन शहरातही होते . खेडे स्वस्त नसते . जो किराणा भाव पुण्यात आहे तोच खेड्यात असतो .
माझे विचार हे तब्येत चांगली राहणे , मातीशी जोडले जाणे आणि पुढच्या पिढिसाठी रान तयार करणे एवढेच आहे
12 Feb 2026 - 11:43 pm | राजेंद्र मेहेंदळे
धागा थोडा भरकटला आहे, सुरुवात आय टी मधील नोकरी कशी टिकवावी यापासुन होऊन आता रिटायरमेंट प्लॅनिंग आणि निवृत्त जीवन कसे घालवावे ईथवर चर्चा आली आहे. पण हरकत नाही. जाणकार लोकांचे प्रतिसाद वाचुन बरेच शिकायला मिळत आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणतात तसे काहीसे.
अवांतर- स्कोअर बोर्ड हलता राहीलाय आणि म्हणता म्हणता धागा शंभरीपार जाणार की. हा ९९ वा प्रतिसाद.
12 Feb 2026 - 11:48 pm | गवि
मूळ विषय पाहता हे भरकटणे फार अवांतर नाही. सुसंगतच आहे. चर्चाही चांगली चालली आहे. आणि शंभरावा प्रतिसाद हा घ्या. चालू घडामोडी किंवा राजकारण वगळता शंभरी गाठणारे धागे आता दुर्मिळ.
13 Feb 2026 - 1:04 am | खटपट्या
सर्व प्रतिसाद वाचून मी काय प्लानिंग केले आहे ते सांगतो. चुक बरोबर सांगू शकता.
महीन्याला ठराविक रक्कम मिळेल एवढी गुंतवणुक करुन ठेवणार. गरजा कमी करणार वाढवणार नाही.
गावी तालुक्याच्या ठीकाणी एक छोटे घर घेणार. तिथे येउन जाउन राहणार. कंटाळा आला की परत शहरात. शहरात कंटाळा आला की परत तालूका. या तालूक्याच्या ठिकाणावरुन गाव जवळ आहे त्यामुळे तिथेही जात राहणार.
मुंबैवरुन तालुक्याच्या ठीकाणी चारचाकी ने जाणार, कारण ड्रायव्हींग ची प्रचंड आवड. तालुक्याच्या ठीकाणी एक दुचाकी ठेवणार.
वाचनाची आवड असल्याने आणि भरपुर काही वाचायचे राहून गेल्याने तालुक्याच्या ठीकाणी जाताना भरपूर पुस्तके घेउन जाणार. म्हणजे वीज गेली आणि इंटरनेट नसले तरी वेळ वाचानात जाइल. अजूनही इंटरनेट चा कंटाळा आला की कागदी पुस्तकच वाचतो. मोबाइल वर पुस्तक वाचणे टाळतो.
गावच्या शेतीवर फक्त चक्कर टाकणार हे बघायला की कोणी अतिक्रमण तर करत नाही ना. गावची शेती पडीक आहे. ती तशीच ठेवणार. सामायिक आहे. कोणीच लक्ष देत नाही तर मी तरी
वरील सर्व गोष्टी करत असताना मुंबईत एक कलेवर आधारीत काम चालू ठेवणार आहे. त्यातून पैसे मिळाले तरी ठीक नाही मिळाले तरी ठीक.
13 Feb 2026 - 1:31 pm | मुक्त विहारि
उर्फ
सुवर्णमध्य
हा उत्तम पर्याय आहे...
अजून एक....
स्वानुभवाचे बोल...
शरीर थकत चालले की, उत्तम डॉक्टर जिथे असेल, त्याच्या जवळपास रहायचे. अर्ध्या तासात दवाखान्यात, ही उतारवयादाठी, प्रमुख अट. घरी ३ वयस्कर माणसे आहेत आणि त्यांच्या सुदैवानं, डॉक्टर एका हाकत येतात.
-------
एक बघितलेले उदाहरण..
आयत्या बिळात नागोबा... त्यामुळं, वडिलोपार्जित जमिनीवर खर्च करत बसू नये...
शेळी जाते जिवानिशी.... असली गत होते.
आणि
वडिलोपार्जित जमिनीवर, शेतीचे प्रयोग करायचे असतील तर, फुकट करायचे.
उदा. चिकुची बी, लिंबाची बी, मिरच्यांची बी, पहिला पाऊस पडला आणि जमीन थोडी ओलसर असेल तर, पेरण्याची हौस भागवून घ्यायची. फुकट काम केल्याने, आर्थिक फटका नाही.
13 Feb 2026 - 3:12 pm | कपिलमुनी
मुवी यांचे शेतीविषयक अनुभव वेगळे आहेत.
मी सध्या शेती करतो, ६ एकर वडिलोपार्जित आहे ती करतो. उत्तम व्यवस्थापन असेल तर शेती नोकरी सांभाळूनही करता येते.
अप अँड डाऊन प्रत्येक बिझनेस मध्ये असतात.
काळी आई, पोशिंदा वगैरे भानगड न ठेवता एक्सेल मध्ये हिशोब ठेऊन शेती करतो. माझ्या गाडीच्या डिझेल पासून ते स्वतःच्या पगारा पर्यंत हिशोब जाऊन शेती फायद्यात राहिली पाहिजे आणि ती तशी करतो आहे.
ऊस जिंदाबाद
13 Feb 2026 - 5:34 pm | हणमंतअण्णा शंकर...
तुमचे मुख्य भांडवल इथेच कमी झाले. याच शेतीचा बाजारभाव काय आहे सध्या? आजूबाजूला चौकशी करून सांगा. त्यामुळे शेती फायद्याची जरी केली तरी ब्रेक इव्हन व्ह्यायला कदाचित दशके जातील.
13 Feb 2026 - 6:22 pm | कपिलमुनी
४० लाख असेल एकरी.
पण कोणी विकत नाही, त्यामुळ सध्या व्यवहार नाहीत
13 Feb 2026 - 6:47 pm | मुक्त विहारि
सध्याच्या भावाप्रमाणे, २ कोटी ४० लाख...
सध्या इतकेच पैसे नॅशनल बँकेत ठेवले तर, दीड लाख रुपये महिना व्याज मिळेल... आणि हेच पैसे Mutual fund मध्ये गुंतवले तर, सोने पे सुहागा... (आमची धाव, Mutual fund पर्यंतच आहे....)
म्हणजे, ह्या ६ एकरातून वर्षाला १८ लाख रुपये निव्वळ नफा मिळत असेल तर फारच उत्तम...
13 Feb 2026 - 8:21 pm | कपिलमुनी
हे असे टक्केवारीचे हिशोब जमिनीच्या बाबतीत उपयोगी नसतात, आमच्या बाबांनी २००० साली ही विकली असती तर १२ लाख आले असते , मग आता काय हरी हरी केले असते का ? बाकी शेतीमध्ये घाम गाळला की पैसा येतोच .. या वर्षी ९५ टनेज आले, आले कि फंडात टाकतो, नोकरी वर बाकी चालतय,, ० % व्याजाने पैसे मिळतात , ते वापरायचे..नुसती काकडी केली तर ३ महिन्यात ३ लाख मिळतात शिवाय सगळे टॅक्स फ्री !
नोकरीचा माज शेतात जिरवण्यापेक्षा शेतीचा माज नोकरीत दाखवतो !
तरी नारळ , आंबे , केळी , शेवगा विकत नाही यावे त्याने घेउन जावे !
आपण घाटारवचे आहोत :)
13 Feb 2026 - 11:55 pm | मुक्त विहारि
तुमचे म्हणणे एका अर्थी बरोबर आहे.
14 Feb 2026 - 3:08 am | गामा पैलवान
ह्योच बोल्तो म्या बी !
-गा.पै.
14 Feb 2026 - 2:57 am | हणमंतअण्णा शंकर...
>> हे असे टक्केवारीचे हिशोब जमिनीच्या बाबतीत उपयोगी नसतात <<
असे कसे नसतील? वडिलोपार्जित जमिनी असणार्या आणि त्यात बागायती जमीन असणार्या लोकांना शहर सोडून गावात जाऊन राहणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आहे.
शेती कुणी विकत नाही त्यामुळे किमंत अजून वाढते ती वाढते पण नव्याने शेती करु इच्छिणार्या कुणालाही शेती करण्यासाठी गाव गाठणे हा आतबट्ट्याचाच व्यवहार ठरेल.
13 Feb 2026 - 6:41 pm | मुक्त विहारि
आणि
स्वतः विकत घेतलेली जमीन आणि ती पण, दुसऱ्या गावात...ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे....
13 Feb 2026 - 5:37 pm | हणमंतअण्णा शंकर...
वरील पोस्ट मधे हे बिग ४ कोण आहेत?
सायबर सिक्युरिटी मधले बिग ४ आहेत की आपले witch मधले बिग ४.
witch वाल्यांना आमच्या इंडस्ट्रीत फार मान नाही. किंबहूना त्यांना माथाडी कामगार किंवा बॉडी शॉपर्स असाच शिक्का होता. त्यामुळे ही मंडळी जास्त लवकर आउटडेटेड होतील.
13 Feb 2026 - 5:41 pm | हणमंतअण्णा शंकर...
माझ्या पहिल्या बॉसचे एक धोरण होते की त्याने कधीही ex witch लोक हायर केले नाहीत. इंटरव्यूलाच कधी बोलवायचा नाही. तीच परंपरा आम्ही पुढे चालवली. एकेक अत्यंत पथेटिक नमुने मिळत. शिवाय ते बेंच वगैरे हॉरिबल प्रकार त्यांच्यात असत. होयबा वृत्ती, नाही म्हणायचे टाळणे, पाट्या टाकणे असे प्रकार सर्रास करत.
16 Feb 2026 - 7:13 am | kvponkshe
Deloitte, PricewaterhouseCoopers (PwC), Ernst & Young (EY), and Klynveld Peat Marwick Goerdeler (KPMG).
13 Feb 2026 - 6:35 pm | अप्पा जोगळेकर
१. माथाडी कामगार कमी दर्जाची माणसे आहेत
२. एखादा माणूस कोणत्या कंपनीत काम करतो या आधारे त्याला मान द्यावा किंवा त्याचा अपमान करावा.
३. विशिष्ट ठिकाणी काम करणारी माणसे outdated व्हावीत त्यांनाही कोणी विचारू नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसावे आणि त्यांना शिव्याशाप द्यावेत.
16 Feb 2026 - 12:51 pm | राजेंद्र मेहेंदळे
ही स्टेट्मेंट आहेत की प्रश्न आहेत?
स्टेटमेंट असतील तर त्यांचा कडाडुन निषेध करतो. एक्स विच म्हणजे टी सी एस, ईन्फोसिस, विप्रो हेच ना? तर मग हे लक्षात घ्या की भारतीय आय टी ईंडस्ट्री हेच लोक चालवतात न की के पी एम जी, डेलॉईट वगैरे.
दुसरे म्हणजे प्रत्येक कंपनीत होयबा आणि पाट्या टाकणारे लोक असतातच. त्याचे असे जनरलायझेशन करणे चूक आहे की एक्स विच मध्येच अशी लोक असतात. हे म्हणजे सगळे आय आय टीयन हुशार आणि लोकल ईंजीनियरिंग वाले माठ किवा यच्च यावत सरकारी बाबूलोक खाबू /कामचुकार असतात असे म्हणण्याप्रमाणे आहे. निती आयोग, रिझर्व बँक, एन पी सी आय, एम एम आर डी ए वगैरे सारख्या ठिकाणी किवा गेला बाजार जिल्हा परीषदेच्या बी डि ओ लेव्हलशी एकदा बोलुन बघा. अक्कलहुशारी म्हणजे काही कोणा एका कंपनीचा मक्ता नाही. तेव्हा आपल्याला दोन शिंगे आहेत अशा भ्रमात कोणी राहु नये.
13 Feb 2026 - 11:22 pm | अमरेंद्र बाहुबली
गावाला राहायच्या गोड स्वप्नासाठी भाड्याने वगैरे घर न घेता गावाकडे एकदम ५०-६० लाख टाकून घर घेणाऱ्याना मी कोपरापासून वंदन करतो.
14 Feb 2026 - 12:05 am | मुक्त विहारि
आमच्या साडूने 2015 मध्ये 65 लाखात घर घेतले , Farm house....
आता तेच घर 60 लाखात विकायला काढले आहे...
सगळीच गंमत आहे....
बाय द वे,
आज सूर्य पश्चिमेला उगवला होता का?
14 Feb 2026 - 1:59 pm | आनन्दा
आत्ता सगळ्यांना "माझे पुढे काय" ही चिंता पडली आहे. त्यात 2 गोष्टी सांगतो.
एका विशिष्ट वयानंतर तुमच्याकडं स्किल्स कमी असतील तरी ती स्किल वापरण्याचा अनुभव बऱ्याच वेळेस तुम्हाला नवीन skilled लोकांवर edge देऊन जातो.
बाकी, आज सगळे जण AI च्या भीतीत आहेत. पण AI ची खरी कुऱ्हाड ही नवोदित लोकांवर पडत आहे.
2020 मध्ये ज्यांनी मोठ्या आशेने कॉम्प्युटर साठी प्रवेश घेतला त्यांना बाहेर पडताना असे दिसते आहे की जी स्किल आपण जीव तोडून शिकत आहोत त्यांना बाहेर किंमतच नाही, आणि value मिळण्यासाठी जो अनुभव हवा तो आपल्याकडे नाही. हा एक खूप मोठा paradox आहे आणि बहुतेक ठिकाणी हा विषय चर्चेत असतो आमच्यासाठी तरी.
अवांतर, पुढची 5 वर्षे तरी आपल्या नोकऱ्यांना मरण नाही, ही गोष्ट खरी आहे की आपण आयुष्यभर जी स्किल घासली ती अचानक कालबाह्य झाली आहेत..
IT मध्ये technology हे मुख्य स्किल कधीच नव्हते, स्किल होते ते problem solving. ते जर तुमच्याकडे असेल तर टेक्नॉलॉजी हे केवळ एक टूल बनते. कालपर्यंत java code लिहत होतो तर आज prompt लिहितोय. पण मुळात लिहितोय कशासाठी, कोणतातरी problem सोडवण्यासाठी.
अशा प्रकारे विचार केला तर मग AI ची भीती वाटण्याऐवजी वरदान वाटू लागेल. त्यामुळे माझ्या जॉबचे काय होईल यापेक्षा आता माझ्या हातात काय आहे आणि त्याचा मी कसा वापर करून घेऊ शकतो हा विचार महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. जगाचे भविष्य फार वेगळे आणि अनपेक्षित असणार आहे, त्यामुळे मी पुढच्या 2 वर्षांपलीकडे प्लॅनिंग करणे बंद केलेलं आहे.
मला माझ्या एका stable employer ने 8 वर्षे experience असताना अचानक असा दणका दिला की त्यानंतर मी जॉब सिक्युरिटी वगैरे शब्द पूर्ण विसरून गेलो .मी जेव्हा freelancing करायचो तेव्हा पण नेहमी 2 महिन्यापलिकड विचार करत नसे, आणि आताही मला असेच वाटते.
एक गोष्ट आहे..
1. तुमचे राहते घर लोन फ्री आहे का?
2. तुमची नोकरी गेली तर जगण्याइतके कमावण्यापुरती स्किल तुमच्याकडे आहेत का
या 2 प्रश्नांची उत्तरे हो असतील तर फार विचार करू नये. फक्त रिकामे बसू नये.
2018 मध्ये जेव्हा मी एक चांगले काम सोडले तेव्हा माझे उत्पन्न अचानक 20 टक्के झाले. But I just survived. नंतर पुन्हा हळूहळू कामे वाढत गेली, नंतर नोकरीत पुन्हा आलो आज परत चांगले कमावतो.
थोडक्यात, भीती डोक्यातून काढून टाकणं आणि survival skills मिळवणे याकडे लक्ष ठेवणे चांगले
14 Feb 2026 - 2:07 pm | गवि
उत्तम प्रतिसाद. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग महत्वाचा मुद्दा आणि अतिशय सहमत.
फ्रीलांसिंग अनुभवाबद्दल आणखी तपशील लिहाल का? हल्लीचे चित्र काय आहे ?
14 Feb 2026 - 4:55 pm | हणमंतअण्णा शंकर...
प्रॉब्लेम सॉल्विंग बद्दल नेहमी असा स्टॅन्ड घेतला जातो. परंतु मला हे तितकेसे पटत नाही.
मुख्य मुद्दा हा आहे की टूल म्हणजे काय आणि टूल ऑपरेट करणारी बुद्धिमत्ता म्हणजे काय यांच्यामधील द्वंद्व हे आधी एस्टॅब्लिश करावे लागते.
पूर्वी बैलांनी नांगरणी करायची तेव्हा बैल आणि औत हे टूल होते. त्यानंतर ट्रॅक्टर आले आणि लोक ट्रॅक्टर नी नांगरणी करायला लागले त्यात त्याही केस मध्ये ट्रॅक्टर हे टूलच होते.
परंतु आत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ टूल नसून स्वतःचा विचार करू शकणारी यंत्रणा आहे. त्या यंत्रणेला मानवी डेटावर ट्रेन केले असल्यामुळे मानवाचे जेवढे बायस आणि मानवाच्या जेवढ्या वैचारिक प्रणाली आहेत त्या सगळ्या तिलाही लागू आहेत किंबहुना त्या सगळ्या एकदम कंजूम करून त्यातून वैचारिक घुसळन करण्याची त्या यंत्रणेची क्षमता प्रचंड आहे त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला केवळ टूल म्हणून उपयोग नाही.
प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये प्रॉब्लेम सॉल्व करणारा हा माणूसच असे आणि कोडींग लँग्वेज ही एक टूल असे.
परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करणारी गोष्ट माणूस नसून कृत्रिम बुद्धिमत्ता असू शकते आणि गरज वाटल्यास ती नव्हे टूल्स देखील निर्माण करू शकते. माणूस इथे फक्त प्रॉब्लेम सांगण्यापुरता आहे. पुढे कदाचित त्याचीही गरज उरणार नाही.
त्यामुळे मला हे प्रॉब्लेम सॉल्विंग चे ऑर्ग्यूमेंट पटत नाही.
म्हणून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेवर विषयी बोलताना नेहमी कृत्रिम बुद्धिमत्ता ही स्वतंत्र विचारशक्ती असलेली मानवाच्या समकक्ष प्रणाली म्हणूनच द्वंद्व स्थापित करून त्यावर चर्चा केली पाहिजे ती केवळ एक टूल आहे असे मानले तर या चर्चांना अर्थ राहत नाही. कारण एखाद्या टूलचा वापर करून आलेली क्षमता म्हणजेच स्किल्स आउट डेट होण्याची कालमर्यादा ही आयटी क्षेत्रामध्ये सात ते आठ वर्षांच्या वर तशीही नव्हतीच. म्हणून हा प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधीचाही आहे की जुन्या स्किल चे काम गेल्यावर काय करावे? त्याविषयी चर्चा करण्यात मला काही फार गेन आहे असे वाटत नाही.
14 Feb 2026 - 5:04 pm | हणमंतअण्णा शंकर...
असेंबली लँग्वेज मध्ये एकेकाळी लोक प्रोग्रॅम करत त्यानंतर वरच्या ऑर्डरच्या भाषा येत गेल्या. त्या भाषा लिहायला ( प्लीज नोट भाषेमध्ये लिहायला नावे तर भाषा लिहायला) दुसऱ्या भाषा जुन्या वापराव्या लागतात म्हणजे कम्पायलर वगैरे लिहायला. म्हणजे भाषेमधून नव्या भाषांची निर्मिती होते एका प्रकारचे हे मेटा प्रोग्रामिंग असते. . आधीची भाषा नव्या भाषेचे आणि नव्या प्रगत गोष्टींचे जनन करत असते. त्या नव्या भाषा वापरून पुढच्या दर्जाच्या नव्या भाषात निर्माण करणे ही एक एक्सपोनेन्शियल प्रोसेस आहे मात्र हे सगळे करायला मानवी बुद्धिमत्ता आणि श्रम लागत.
अँथ्रोपिकचे सीटीओ म्हणतात की अँथ्रोपिकचा प्रत्येक कोड हा 100% एआयनीच लिहिलेला आहे. जेव्हा आधीचा एआय पुढच्या जनरेशनचे एआय लिहू शकतो तेव्हा हा एक्सपोनेन्शियल ग्राफ प्रचंड मोठा आहे. याला सध्या फक्त वास्तवात असलेले फिजिकल रिसोर्सेस ह्याच मर्यादा आहेत म्हणजे जसे की वीज पाणी रेअर अर्थ मेटल्स प्रोसेसर.
एएसएमएल ही कंपनी वेफर तयार करणारी मशीन तयार करते. व्हेरी टासियम या युट्युब चॅनेलने एस एम एल वरती एक सुंदर व्हिडिओ तयार केला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यास असे लक्षात येईल की मानवी कल्पनाशक्तीच्या अत्युच्च प्रेरणेने आणि प्रचंड जिजीविषेने आपण हे बेसिक बिल्डिंग ब्लॉक तयार केले आहेत. आता एआय वापरून हेच बेसिक बिल्डींग ब्लॉक्स आपण अजून प्रचंड मोठी मजल मारू शकतो.
म्हणून मेटा प्रोग्रामिंग करणारा एआय केवळ आयटी क्षेत्रापुरत्या जॉब शीत संबंधित नाही तर सबंध जगातच उलथा पालथ घडवू शकतो
14 Feb 2026 - 5:58 pm | बोका
व्हेरीटासियम चे हे दोन व्हिडिओ नक्की बघा.
The World's Most Important Machine
Why don't jet engines melt?
15 Feb 2026 - 10:13 am | आनन्दा
तुम्ही जो विचार करताय तो वेगळ्या स्तरावरचा विचार आहे. त्याबाबतीत माझे मत अजून वेगळे आहे.
जेव्हा AI पूर्ण विकसित होईल तेव्हा पृथ्वीवर असलेली 70% माणसे, किमान 70टक्के म्हणतोय, हे redundant होतील.
पण तिथपर्यंत जायला अजून 5 वर्षे आहेत. त्यामुळे 5 वर्षांनी आपण जिवंत असू की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. AI खरेच तसे वागायला लागला तर माणसे AI जिवंत ठेवतील का हा सुद्धा एक दुसरा प्रश्न आहे.
I am talking about near future. पुढच्या 2 वर्षात तुम्ही जर AI सोबत जुळवून घेतले नाही तर तुम्ही out of market असणार आहात. तेव्हा आधी ते करा. आपल्याकडे जे आहे, आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आहेत ते आपण AI ने सोडवून monatize करू शकतो का ते पाहा. तरच तुम्ही सर्विस व्हाल. मी परत तेच सांगतो, की उद्या नोकरी गेली तर किमान जगण्यापुरते पैसे मिळतील इतके स्किल आपल्याकडे आहेत का याचा विचार करा, आणि त्याकडे लक्ष द्या. बास. याक्षणी दुसरे काही नको.
अवांतर, AI च्या प्रगतीतील दोन मोठे अडथळे सध्या quanton physics आणि nanotech हे आहेत. मी असे म्हणत नाही की त्यावर उत्तर मिळणारच नाही, पण ते मिळाल्याशिवाय wide spread क्रांती होऊ शकत नाही. आणि आत्ताच वेग बघता त्याला साधारण 3 वर्षे यासाठी लागतील. अर्थात ही काही निश्चित मर्यादा नव्हे कारण हा वेग वाढताना linear नसून exponentially वाढत आहे. पण तरी मला 3 वर्षे ही मर्यादा वाटते, त्यानंतर सगळ्या क्षेत्रात AI येण्यास ajun 2-5 वर्षे. तोपर्यंत आपण शिल्लक राहू ना हे आधी बघायचे. बाकी सगळे नंतर.
15 Feb 2026 - 12:57 pm | गणेशा
AI नंतर..
शहर.. गाव.. मनातली दरी.. या प्रतिसादा ला थोडे पुढे लिहितो आहे...
-------
बदल म्हणजे काय?
मुळात बदल म्हणजे आपली नजर बदलणे.
नव्या जगाकडे नव्या नजरेने पाहणे. पण मनातले पूर्वग्रह तसेच ठेवले, तर केवळ शहर बदलून काही उपयोग होईल का?
शहरातील गोंगाटाचा त्रास होतो म्हणून गावाकडे जाऊनही दारं-खिडक्या soundproof च करायच्या असतील, तर मग गावात जायचंच कशाला? त्या इथं हि करता येतात.. जर माणसांत मिसळून समरसून जगता येत नसेल तर शहर काय आणि गाव काय?
गावी, नव्यानं ..नवं आयुष्य सुरू करताना जुन्या चौकटी बाजूला ठेवल्या पाहिजेत. नव्या अनुभवांना सामोरं जाताना त्रास होईल, थोडं अडखळूही. पण त्यातच तर मजा आहे. कितीतरी गोष्टी पुन्हा नव्याने करता येतील. कितीतरी नवीन माणसं भेटतील.
प्रत्येक गाव वेगळं असतं. तसंच प्रत्येक माणूसही वेगळा असतो, त्याची पार्श्वभूमी, त्याची जातकुळी, त्याचा स्वभाव वेगळा.
जर आपण पूर्वग्रहांच्या चष्म्यातूनच लेबल लावत फिरणार असू, तर गाव किंवा ती माणसं थोडीच थांबणार नाहीत - थांबू आपणच.
आणि मग “दोन वर्षे गावात काढली” असं म्हणताना प्रत्यक्षात आपण फक्त तो वेळ तो काळ वाया घालवलेला असेल.
हे सगळं ऐकायला कदाचित आदर्शवादी वाटेल. आणि असंच जगायलाच हवं, असा माझा हट्टही नाही.
पण एक साधा प्रश्न आहे – ‘मी’ सोडून ‘आपण’ हा भाव जर मनात येत नसेल, आणि तसं जगण्याची उमेद आता उरली नसेल, तर मग आहे ते घर सोडायची गरजच काय?
हे जग बदल स्वीकारतं आहे. आपणही बदललो पाहिजे.
हाच निसर्गाचा नियम आहे.
– गणेशा
15 Feb 2026 - 4:51 pm | हणमंतअण्णा शंकर...
गावाकडे कोणताही धरबंध नसतो. पहाटे साडे तीनला कुणाच्या तरी मनात येते तो दे दणादण अभंग आणि भक्तिगीते लावतो. एखादे जागरण गोंधळ असेल तर जितके पॉवरफुल साउंड सिस्टम तेव्हडे ते भारी असा काहीतरी कमालीचा गैरसमज असतो. रात्रभर त्यातले बेंबीच्या देठापासूनचे चिरकणे ऐकून तुमची झोप खराब झालेली नाही वाटतं. लग्न बिग्न या गोष्टी तर सोडूनच द्या. आमच्या गावच्या जत्रेत ओळखीच्या एका लहान मुलाचे कान कायमचे कामातून गेले. इतके प्रचंड साउंड सिस्टम सोडलेली असते.
शहरात देखील वाढदिवस, इतर सण, मिरवणुका यांना ऊत आलेला असतो. मग ज्यांना शांत झोप हवी आहे त्यांनी कुठं जायचं? झोप सोडून द्या, आवाजाचा त्रास सगळ्यांनाच होतो.
टेक्नॉलॉजी नव्हती तेव्हा ध्वनी प्रदूषण हे खूप लोकल होते. अशा ध्वनी प्रदूषणांमुळे पक्षांना मेटिंग कॉल्स देखील देताना त्रास होतो, त्याचा परिणाम त्यांची एकूण संख्या घटण्यावर होतो. त्याचा परिणाम पुन्हा पिकांवर होतो.
जर्मनीत जनतेला शांततेचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांच्या मुलभूत अधिकारांत शांततेचा अधिकार घालणे खूप गरजेचे आहे.
15 Feb 2026 - 6:06 pm | मुक्त विहारि
भारत, गंमतशीर लोकांचा, गंमतीदार देश आहे....
मेरा काम बनता, भाड में जाय जनता...
15 Feb 2026 - 10:46 pm | गणेशा
मुळात ध्वनी प्रदूषण हे कोठेच नसले पाहिजे मग ते गाव असो वा शहर हे रास्त आहे, आणि त्रास होणाऱ्याने काहीच वयक्तिक करता आले नाही तर sound proof केल्यास हा त्याचा वयक्तिक प्रश्न नक्कीच आहे.. आणि त्यात वावगे असे काहीच नाही...
परंतु गावात जाऊन 'गावाकडं कोणाचा कोणाला धरबंध नसतो, असेच म्हणायचं असेल तर नक्कीच गावात जाऊ नये इतकेच...
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ह्या सर्वत्र सर्व स्थरात असतात, त्याला ना आपले गाव अपवाद आहे ना शहर...
माझ्या नशिबाने मी राहिलेली - उंडवडी सुपे (माझे गाव), डोंगरात वसलेले पांगारे भाटमळ वाडी, लोणी भापकर अशी कित्येक गावे आहेत, जेथे ७-८ ला माणसे झोपी जातात.. एक मिट्ट शांतता सर्वत्र पसरलेली असते.. आणि दिवस भराचा थकवा आपोआप ह्या मिट्ट शांततेत विरघळळा जातो . हि भावना ज्याने अनुभवली आहे त्याला ती खरी वाटते.
आणि मला तरी ती शहरांत वयक्तिक रित्या जाणवली नाही..
रहाटनी - पिंपळे सौदागर सारख्या pcmc च्या पुढरलेल्या वस्ती जवळ राहतोय.. पण वाढदिवस, ते त्यांचे फटाके, लग्न वराती.. जयंत्या फलांना आणि मिरवनुका व dj आणि lights इथं तरी कुठे कमी आहे काही? पण इतर गोष्टी जसे कि job, सुविधा,शिक्षण व इतर यासाठी माणुस adjust करतोच आहे.. तसंच गावांत ज्याला करता येणार नाही त्याने जाऊ नये असे मला वाटते..
जर्मनी च्या शांतते बद्दल बोलला, ऐकले आहे.. आणि ते खरेच वाखणन्या जोगे आहे त्यात दुमत नाहीच..
जर कुणी गावात डॉक्टर नाहीत, कामाला माणसं नाहीत, सुविधा कमी आहेत म्हणून नावं ठेवत असेल… आणि त्याच वेळी परदेशात जाऊन तिथे सगळं adjust करत असेल, तर प्रश्न सोयींचा नसून मानसिकतेचा आहे हेच माझे म्हणणे आहे.
गावात राहणं म्हणजे फक्त शांतता नाही;
शहरात राहणं म्हणजे फक्त सुविधा नाहीत.
दोन्हीकडे किंमत द्यावीच लागते.
---
गाव असो किंवा शहर - माणसं तिथेही माणसंच असतात.
फरक जागेचा कमी, नजरेचा जास्त असतो.
जर कुणी आधीच ठरवून गेलं की “हे लोक असेच असतात”, तर त्याला तेच दिसणार. उघड्या मनाने गेलं, तर चांगुलपणाही सापडतो.
आणखीन एक, इथं बऱ्याच जणांनी शेती हि न परवडनारी गोष्ट आहे, तसे कराल तर उलटे पडाल हे लिहिले आहे.. हे मान्य केल्याने बरे वाटले.. कारण शेती, शेतकरी आणि त्याचे जीवनमान या बद्दल खरेच खुप आस्था आहे..
-
गणेशा
16 Feb 2026 - 1:43 am | हणमंतअण्णा शंकर...
गणेशा तुमचा प्रतिसाद पटला.
गाव जर रिमोट असेल आणि लहान लोकवस्तीचे असेल किंवा लहानशी वस्तीच असेल तर ध्वनी प्रदूषण बऱ्यापैकी आटोक्यात असते काही ठराविक वेळा सोडल्यास. पण लोकवस्ती जवळ राहिले की हे प्रश्न येतातच.
त्याला थोडासा उपाय केला की इतर फायदे मिळू शकतात जसे की चांगली हवा. परंतु काय धकाधकीच्या आयुष्यात माणसाला विरंगुळा आणि शांतता हवी असते ती शोधायला तो काय काय करतो. आणि ती मिळवण्याचा एक प्रयत्न पैसे घालून करून झाल्यावर त्याला शहरातले जास्त वेगातले जीवन पुन्हा हवेसे वाटते. माणसे एका जागी सुखीच नसतात कधी.
अजूनही आपण हंटर ग्यादररच असतो असे मला वाटते फक्त हंटिंग आणि गॅदरिंग हे मात्र बदलले.
गावातली मुलं शहरात जातात त्यांची मुलं परदेशात जातात परदेशातली मुलं पुन्हा आपल्या शहरात येण्याचे स्वप्न बघतात. काहीजण येतातही त्यांच्या मुलांना घेऊन. आणि त्यांच्या मुलांना पुन्हा इंटरनॅशनल स्कूल हवे असते. म्हणून ते पुन्हा शहरात राहतात आणि गावाकडे जाण्यासाठी झुरत राहतात. त्यांना आठवतात परदेशातले शांत दिवस म्हणून मुलांना पुन्हा परदेशात पाठवण्यासाठी धडपडत राहतात. मात्र तिसऱ्या पिढी आधी पणजोबांना बारा मुलं झालेली असतात. आजोबांना चार. वडिलांना दोन. आपल्याला एकच. तेही उडून गेले की आपण पुन्हा त्याच्याबरोबर उडायला जातो. आणि शेवटी कुठेतरी अधांतरीच आदळतो.
आणि याच दरम्यान कधीतरी ए आय येऊन जाते. आपली तर फाटलेलीच असते पण आपलं बाळ कशी फाईट मारेल म्हणून आपली अर्धी जिंदगी तळमळत जाते.
साला ब्लडी माणूस. हंटर ग्यादरर. जसे होमो सेपियन्स ने निअँडरथल लोकांना संपवले तसे आपल्यापुढे एखादे बायोसिंथेतिक सुपर ह्यूमन आले तर? आपलं बाळ किंवा त्याला झालंच तर त्याचं बाळ निअँडरथल.
शेवटी आपण हंटर ग्यादररच.
15 Feb 2026 - 11:40 pm | अमरेंद्र बाहुबली
गणेशाजी प्रतिसाद आवडले, अनेकांचे प्रतिसाद नी अनुभव उत्तम आहेत. खूप छान चालू आहे चर्चा!
माझ्या मते गावापेक्षा शहर खूप कधीही बेस्ट असते! गावातली ताजी हवा हवी असेल तर दर विकेंडला ट्रेक किंवा थकवा न आणणारी ठिकाणे फिरून यावे, त्या साठी गावाकडे शेती किंवा घरच का घ्यायचे असते अनेकांना? कळत नाही. छंद म्हणून ठीक आहे, पण २-४ वर्षे करून नंतर लॉस मध्ये घर किंवा शेत विकून आतबट्ट्याचा व्यवहार करून परततात.
बाकी गावाकडे माणुसकी विचारपूस भरपूर, गप्पा असते, अनेकाना हे देखील आवडते. मला मात्र कधीही पुण्यातून मूळ शहरात गेली की दिवसभर केव्हा आला? कुठे राहतोस? पुण्यात कुठे राहतो? घरभाड किती? पगार किती? कमी सांगितला तर इतका कमी का? जास्त सांगितला तर तुला इतका जास्त पगार कसा देतात? कंपनी कोणती? काय काम असत? आमच्या आमक्या तमक्याला नोकरी बघ, अमक्या तमक्या पुण्यातच नारायणगावला राहतो, त्याला भेटून ये. वगैरेरॅपिड फायर राउंडला सामोरे जावे लागते. (ह्याच प्रश्नांची उत्तरे त्याला दोन महिन्या आधीच दिलेली असतात.) आणी हे एकाला नाही तर ज्याच्या तावडीत सापडलो त्या प्रत्येकाला उत्तरे द्यावे लागतात, दिवसात १०-१५ लोक तरी हे विचारतात. मी तोंडाला रुमाल बांधून फिरतो की कुणी ओळखीचा भेटू नये म्हणून. त्यामूळे तिकडे जाणे म्हणजे मोठे संकट वाटते. काही लोकांना हे सगळे गप्पा, विचारपूस ह्या कॅटेगिरीखाली खूप आवडते. मला मात्र हा भयंकर त्रास वाटतो.
बाकी ध्वनी प्रदूषनाबद्दल म्हटले तर अनेक लोकांसाठी रस्ता हा डिस्को बार असतो, फुलत नाचायला जागा नी फुकटचा डीजे. दारूही फुकट मिळते किंवा स्वतच्या पैशांनी. ह्याच्या प्रचंड डिमांड मूळ लोकल नेटव, भावी नगरसेवक मोठा फ्लेक्स लावून डीजे, जागा नी दारू स्पॉन्सर करतात. दहीहंडी, गणपती, महापुरुषांच्या जयंत्या फक्त सणांचे नावे बदलतात बाकी सगळं सेम असत, त्यातल्या त्या एक उत्तम म्हणजे सरकारकडून बोंबल्या (डीजे ) वर बंदी असते काही ठिकाणी. शांतता मिळणे हा खरच प्रिव्हिलेज आहे, बोंबल्या नसला तरी गाड्यांचा आवाज नी हॉर्न सतत दीमतीला असतात. कोरोन काळात मला इतकी उत्तम झोप मिळायची की मी सकाळी ७:३० ला पूर्ण झोप घेऊन जागा झालेलो असायचो, आता १० ला उठलो तरी दिवस पेंगत जातो.
17 Feb 2026 - 9:40 am | गणेशा
पुरुष तिशीत दिमाखदार असतो.
नवीन शिखरं सर करण्याची त्याची उमेद या काळात शिगेला असते. क्षितिजापलीकडे उडून जग जिंकण्याची स्वप्नं त्याच्या डोळ्यांत असतात. आणि त्या उडण्यासाठी लागणारे पंख बहुतेक वेळा त्याला शहरातच सापडतात.
म्हणून तिशीतला माणूस शहरात रमतो - झगमगाटात, संधींमध्ये, स्पर्धेत.
त्याच काळात तो संसार, नोकरी आणि स्वतःच्या आवडी यांची सांगड घालत असतो. घर, गाडी, मुलं हे टप्पे तो सहज पार करतो.
पैसा कमावण्याची ताकद, त्यासाठी लागणारे परिश्रम हे तो लिलया निभावून नेतो.
म्हणूनच तिशीतल्या माणसाला कदाचित गाव ही कायमची राहण्याची जागा वाटत नाही; कधीतरी विरंगुळ्याला जाण्याचं ठिकाण वाटतं.
पण काळ पुढे जातो. माझे तिशीतले विचार आणि आजचे विचार यात अक्षरशः १८० अंशांचा बदल आहे. कदाचित चाळीशीच्या उंबरठ्यावर येताना माणसाच्या प्राधान्यक्रमात बदल होतो.
कदाचित ‘काय मिळवलं?’ पेक्षा ‘काय अनुभवलं?’ हा प्रश्न मोठा होतो. कदाचित वेगापेक्षा शांतता महत्त्वाची वाटू लागते. आणि कदाचित हेच जीवन आहे प्रवाही.
ज्याच्या प्राधान्यक्रमात बदल होत नाही, तो माणूसच कसला?
असो…
वैयक्तिकरित्या मला माझी तिशी खूप आवडली आहे. खरंच one of my favourite काळ.
संघर्षाचा… धडपडीचा… स्वतःला सिद्ध करण्याच्या जिद्दीचा काळ.
त्या काळात वेग होता, महत्त्वाकांक्षा होती, उर्मी होती.
रात्रंदिवस मेहनत करून काहीतरी उभं करण्याची ताकद होती. पडून पुन्हा उभं राहण्याची हिंमत होती.
बदल म्हणजे भूतकाळ नाकारणे नाही;
बदल म्हणजे त्या काळाला मान देऊन पुढच्या टप्प्यावर जाणे.
– गणेशा
17 Feb 2026 - 10:13 am | सुबोध खरे
माझा अनुभव उलट आहे.
तिशीत असताना मी लष्करात असल्यामुळे भारतभर फिरलो.
तेंव्हा खेड्यात असणाऱ्या अपुऱ्या सुविधा साध्या साध्या गोष्टींसाठी सामान्य माणसांना घ्यावे लागणारे कष्ट हे सहज पणे दिसत असत.
पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. चुलीवर स्वयंपाक करून बायकांचे हाल होत असत आज ही हीच स्थिती आहे.
संगणक हा बाल्यावस्थेत होता. साधे पुण्याहून कलकत्याला जायला रेल्वेची थेट गाडी १९९६ मध्ये पहिल्यांदा उपलब्ध झाली. तेंव्हा खेड्यापाड्यातून तालुक्याला जायला सुद्धा किती कष्ट घ्यावे लागत असत. त्या मानाने मी जेंव्हा सुटीवर मुंबईला येत असे तेंव्हा त्यातील प्रचंड फरक सहज दृष्टीपथात येत असे.
खेड्यात कशाला गोव्यात वास्को सारख्या शहरात आपली टी व्ही फ्रिज वॉशिंग मशिन सारखी उपकरणे बिघडली तर आठवडा जात असे दुरुस्त होण्यात.
वीज गेली तर दोन चार दिवस तर सहज लागत असत.
वोल्टेज स्टॅबिलायझर हि गोष्ट तर मी प्रथम मुंबईच्या बाहेर गेल्यावर पाहिली. विजेचा दाब अतिरिक्त होऊन दिवे जळणे आणि ट्यूबलाईट सहासात महिन्यात उडणे हि सामान्य बाब असे. आजही मुंबईत हे उपकरण केवळ संगणकासाठी ups बरोबर दिसते.
तेंव्हाचे खेंड्यातील जीवन आजच्या मानाने फारच कष्टप्रद असे हे मी डोळ्यांनी पाहिलेले आहे.
बिहार मध्ये कमालीचे दारिद्र्य किती असते हेही डोळ्यांनी पाहिलेले आहे. लालू प्रसाद यांच्या राज्यात (१९९८) शेत मजुराला दोन वेळचे जेवण आणि वर्षाला १८०० रुपये मिळत असत हे मी डोळ्यांनी पाहिलेले आहे. उगाच का लोक नेसत्या वस्त्रानिशी मुंबईत दिल्लीत "जगायला" दाखल होत असत.
बालपणीचा काळ सुखाचा हे त्या काळातील कष्ट आपण विसरलेले असतो म्हणून वाटत राहते..
त्या काळाच्या तुलनेने आज खेड्यांची स्थिती नक्कीच किती तरी सुधारलेली आहे
परंतु आजही भावनेच्या भरात वाहून मी काही खेड्यात राहायला जाणार नाही.
आजही मुंबईच्या इतके स्वच्छ शुद्ध आणि क्षार मुक्त पाणी १२ महिने भारतात कोणत्याही शहरात नाही. (मुख्य पुणे शहर हा अपवाद).
लोड शेडिंग नाहीच वीज सुद्धा.
घराला fenesta च्या खिडक्या लावून घर साउंड प्रूफ केलं आहे. उद्या अतिरिक्त प्रदूषण होऊ लागलं तर एअर प्युरिफायर लावेन पण मुंबईतच राहीन
शेवटी गड्या आपली मुंबईच बरी.
17 Feb 2026 - 11:17 am | गणेशा
आवडले...
मुंबई मध्ये ७ वर्षे राहिलो, खरे सांगायचं तर मुंबई मला खुप आवडली.. भावली...
पुण्याचा असताना मुंबई वर निस्सीम प्रेम केले मी तेंव्हा.. सोडून आलो तेंव्हा अजिबात करमले नव्हते...
----
२००७ ला माझ्या पंचवीशी मध्ये मी मुबंई वर orkut वर एक कविता लिहिलेली, बऱ्याच नावाने ती पसरली नंतर..
येथे २०१० ला दिलेली..
या नंतर पुणे कोल्हापूर वर अशीच कविता गाणी आलेली.. पण हि कविता मला वाटते मिपा वर मी टाकलेली पहिली कविता, येथे देण्याचा मोह होतोय..
स्वप्नांचे पान मुंबई...
स्वप्नांचे पुर्णत्व येथे
स्वप्नांचे पान मुंबई
तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई
वृत्तीतली धगधग येथे
जिवाचे रान मुंबई
मनामनाची ओढ येथे
मनातली जाण मुंबई
प्रीतीतला गोडवा येथे
प्रीतीचे गान मुंबई
लावण्य रुप्-सौंदर्य येथे
लावण्याची खाण मुंबई
नजर घायाळ होती येथे
नजरेचा बाण मुंबई
लखलखता श्रुंगार येथे
नटलेली छान मुंबई
क्षणाक्षणांस महत्त्व येथे
वेळेचे भान मुंबई
भविष्याची उज्वलता येथे
भविष्याचे ध्यान मुंबई
व्यवहारातली कुशलता येथे
व्यवहाराचे ज्ञान मुंबई
ध्येयाचे शिखर येथे
प्रगतीचे यान मुंबई
कष्टकरी हात येथे
हाताचे त्राण मुंबई
जीवनातले अनुभव येथे
अनुभवाचे दान मुंबई
मराठीचे अस्तित्व येथे
मराठीचा मान मुंबई
महाराष्ट्राचा अभिमान मुंबई
देशाची शान मुंबई
आमचा प्राण मुंबई
स्वप्नांचे पान मुंबई.........
---------- गणेशा
17 Feb 2026 - 6:20 pm | चावटमेला
ज्जे बात! हे पगार विचारण्याबद्द्ल तर +७८६. एक तर आधी पगार विचारून तुम्हाला कानकोंडं करायचं, तुम्ही कितीही टाळलं तरी खोदून खोदून विचारत राहायचं. बरं, हे एखाद्या अगदी जवळच्या मित्राने, नातेवाईकाने विचारलं तर एखादे वेळेस ठीक, पण अगदी रँडम व्यक्ती, बाजूचा दुकानदार सुद्धा अगदी निर्भीडपणे विचारतो.
17 Feb 2026 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली
हो, खूप त्रास देतात काही लोक काहीही विचारून, धुळ्यात घराकडे राहणार एक रिक्षावाला तर मला लहानपानपासून पिडत आला आहे, इंजिनिअरिंग ला असताना, तो मला तू मेकॅनिकल इंजिनिअरिंग का घेतलं? त्याला काय स्कोप आहे? नापास झाला तर काय करणार आहेस? पुढचं काय प्लॅनिंग आहे? वगैरे विचारायचा, एग्जाम असल तर आज कुठला पेपर? त्याला चित्रकला, भूगोल, नागरिकशास्त्र ह्याची अपेक्षा असायची, elements of electrical इंजीनियरिंग सांगितल्यावर ते काय असत? वगैरे वगैरे विचारून पिडायचा, अजूनही भेटला की दर दोन महिन्याने पुण्यात कुठे राहतो विचारतो. मी दर वेळेस नवीन लोकेशन सांगतो, कधी इंदापूर, कधी नारायणगाव, कधी लोणावळा, त्यालाही कळत की हा खोटे सांगतोय, पण हार मानत नाही की राग येत नाही. असे असंख्य भेटतात, लोकांना गवई जाऊन अश्या प्रश्नांची उत्तरे मागणारी लोक भेटत नाहीत किंवा कसे कोण जाणे? मला मात्र भयंकर त्रास वाटतो गावी जाणे म्हणजे!
17 Feb 2026 - 7:57 pm | सुबोध खरे
बाजूचा दुकानदार सुद्धा अगदी निर्भीडपणे विचारतो.
त्याला तितकंच निर्भीडपणे सांगायचं
बाईला वय विचारायचं नसतं आणि पुरुषाला पगार विचारायचा नसतो
इतकं साधं तुम्हाला माहिती नसावं याचं आश्चर्य वाटतं!
एका दीड शहाण्या बाईने आमच्या वहिनीला पुतण्याचा पगार विचारला. त्यावर तिने मला तुम्हाला सांगायचं नाहीये असं स्वच्छ सांगितलं.
खरं तर आमची हि वहिनी खूप नम्र आणि सालस आहे. त्यामुळे तिने असं उत्तर दिलेलं पाहून मला आश्चर्य वाटलं आणि तितकाच आनंद हि झाला
17 Feb 2026 - 8:22 pm | हणमंतअण्णा शंकर...
मी देतो ते उत्तर असे आहे :
मी : "मिळतंय गरजेपुरतं. पोटापुरतं" (इथं पुढचा शहाणा असेल तर समजून जातो पुढे प्रतिप्रश्न करत नाही, भोचक असेल तर पुढे वाचा)
ते : "तरी किती, हा हा, अंदाज?"
मी : "फिक्स नसतंय, कधी जास्त कधी कमी, टॅक्स तर आधीच कापून घेतात, हातात गाजरंच येतात"
ते: "काही तर अवरेज काढलं अशीलच की"
मी: मी कसलं अवरेज? काय नुसता राबायचं दुसर्याच्या हाताखाली. शेवटी मालक ते नोकर आम्ही. बघा की आमच्या आज्ज्यानं हायवेच्या बाजूला ३० एकर जमीन आलेली ती पैसे असून सोडली बघा. तुमची कुठं आहे जमीन काय भाव सुरु आहे?
इथून पुढे गाडी चाणाक्षपणे नेहमीच्या यशस्वी कलावंतांवर वळवायची : १. शेतीत आता राम नाही. २. मोदी किंवा नेहमीचा धार्मिक वादविवाद (यात पुढच्या माणसाचा इगो हर्ट न होता फक्त ऐकायचं कारणा काहीही करून वैयक्तिक तपशीलांपासून चर्चा दूर न्यायची ३. क्रिकेट ४. आंतरराष्ट्रीय राजकारण ५. पूर्वीचे लोक १० किलो खाऊन १०० किलोची तलवार उचलत असत वगैरे वगैरे
17 Feb 2026 - 10:17 pm | अमरेंद्र बाहुबली
त्याला तितकंच निर्भीडपणे सांगायचंमग तो म्हणतो, पुण्यात जाऊन जास्त शहाणा झाला, पैशांची घमेंड आली. तिकडे आईवडील एकटे असतात त्याना त्रास देणे, काडी करणे असे प्रकार सुरू होतात.
धुळ्यात माझ्या घराच्या आजूबाजूल अफवा पसरली होती की ह्याला १ लाख रुपये महिना पगार आहे पुण्यात!
17 Feb 2026 - 10:36 pm | हणमंतअण्णा शंकर...
मला महिन्याला १२ लाख रुपये मिळतात असे सर्व गावाला सांगितले होते.
18 Feb 2026 - 10:31 am | सौंदाळा
माझ्या मित्राला पण गावी गेला की अमेरिकेला अजून का गेला नाही १५ वर्षे हिंजवडीत काम करुन असे विचारायचे
वरुन टोमणे मारायचे, माझा भाचा, पुतण्या परवाच अमेरिकेला गेला, आता महीना १ लाख सेविंग करतोय वगैरे.
शेवटी एकदा मित्र वैतागून म्हणाला म्हणूनच मी जात नाही अमेरीकेला, महिना १ लाख सेविंग झाले तर माझे नुकसान होते, इकडे मी त्यापेक्शा जास्त सेव्ह करतो. (जे खरे होते) हे ऐकून समोरचा तोंडात मारल्यासारखा गप झाला.
हे १०-१२ वर्षापूर्वीचे आहे. आता जवळजवळ सगळ्यांचेच घरातले, जवळचे पुण्या-मुंबईत, अमेरीका/युरोपात असतात त्यामुळे हा भोचकपणा बराच कमी झाला आहे.