दारी कडुलींब
पसरी सावली
घराला माऊली
जशी वाटे
दारी कडुलींब
घराचे बिरुद
पाव्हण्याला साद
देतो जणू
दारी कडुलींब
पानांचा संभार
गारवा चौफेर
उन्हाळ्यात
दारी कडुलींब
पक्ष्यांचा संसार
घरट्यांचा भार
अंगावर
दारी कडुलींब
खेळामध्ये येतो
आम्हा लपवितो
खोडामागे
दारी कडुलींब
श्रावण खेळतो
झोका झुलवितो
फांदीवर
असा कडुलींब
डोळां साठविते
घर आठवीते
माहेराचे
प्रतिक्रिया
14 Nov 2008 - 9:37 pm | कपिल काळे
चांगले आहे. पण देवद्वार किंवा अभंग छंदात लिहिली गेलेली बाकीची कवने बघता असे वाटते की, जास्त कडवी असून नयेत. मोजक्या ४-५ कडव्यामध्येच भावना व्यक्त व्हाव्यात. ( म्हणजे त्या थोर संत मंडळींचे शब्दच तितके महान असायचे की सगळे भाव व्यक्त करण्यासाठी ४ कडवी पुरेशी)
बघा, मला काही तुमच्या कवनाला नाव नाहीत ठेवायची. पण बघा विचार करुन. शेवटी हे माझे विचार आहेत.
http://kalekapil.blogspot.com/
16 Nov 2008 - 12:43 am | विसोबा खेचर
असा कडुलींब
डोळां साठविते
घर आठवीते
माहेराचे
वा वा! सुरेख..!
वरील ओळीवरून सहजच,
'परसात पारिजातकाचा सडे पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे..'
या सुमन क्ल्याणपुरकरांच्या 'घाल घाल पिंगा वार्या..' या गाण्याची आठवण झाली...
तात्या.
16 Nov 2008 - 7:50 am | रामदास
छान कविता .
16 Nov 2008 - 1:06 pm | मनीषा
दारी कडुलींब
पसरी सावली
घराला माऊली
जशी वाटे ..... सुंदर