आईचा मुलगा
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात.
त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा. तिचं अपर्णासत्र चालू झालं, कि तो तिच्यासमोर उभा राही.
‘आई, का ओरडतेस तू? अपर्णा आणि मी इथे राहात नाहीत आता!’ हे तो लक्ष्याव्यांदा तरी तिला सांगत असे. ‘अजून एकदा चहा आणून देऊ का तुला?सांगतो अपर्णाला.’
त्यावर आजी त्याच्याकडे मिटीमिटी पहात. एकदमच उसळून म्हणत, ‘रे जयंता, तू माझाच मुलगा ना रे! माझाच ना! तिघांत थोरला म्हणून किती रे कौतुक तुझें! तुला विचारले का मी कि बाळा, तुला दुध देऊ का अजून एकदा? विचारले का? आज तू मला एका चहाच्या कपासाठी परत परत विचारतोस!’
जयंताला हे पण पाठ झाले होते. आता कुठे तिने त्याला बाळ असताना दुध पाजणे, आणि कुठे याने चहा आणून देऊ का म्हणून विचारणे! कुठून तरी काही तरी जोडून घ्यायच्या आणि बोलत सुटायच्या. आजीना कोण सांगणार? कधी जयंता म्हणे, ‘का सांगायचे तिला? मी मुलगा आहे, बोलेना का! कुणा रस्त्यावरच्या माणसाला तर नाही बोलत! ऐकून घ्यायचे. आई आहे. तिन्ही जगाचा स्वामी आईविना भिकारी होतो कि नाही, माहित नाही, पण मी नक्कीच भिकारी झालो असतो.’
संध्याकाळी बरोब्बर पावणेपाचला जयंता दाराचे छोटेसे कुलूप काढी, ते त्याने दुपारी घातलेले असे. आईच्या सुरक्षिततेसाठी. मग, दरवाज्याच्या फटीतून हात घालून, दाराची आतली कडी काढी आणि दरवाजा उघडे. चहाचा थर्मास बाजूला ठेवी. ‘आई, ऊठ. आज बुवामहाराज येणारेत मंदिरात! जायचंय ना प्रवचनाला?’
‘नको रे! कुठले ते महाराज अन फिराज! सगळे आपलं तेच भागवत सांगतात.’
तिने संध्याकाळी बाहेर जायला नकार दिला कि जयंताला धस्स होत असे. ती घरात थांबणार म्हणजे आणखी बडबड करणार, संध्याकाळी वरती अपर्णाचा गायनाचा क्लास चालतो. हिला पेटीचा आवाज, गाण्याचे सूर चालत नाहीत. म्हणजे ते अपर्णाचे आहेत म्हणून चालत नाहीत. तेच जर चंदूचे असते तर.... तर... जयंताच्या काळजात धाकट्या भावाच्या आठवणींनी बारीकशी कळ उमटे. त्याचा उमदा फोटो पाहिला कि तो मनातल्या मनात म्हणे, ‘चंदू, अरे रहायचास कि रे! आईला दोन गाणी म्हणून दाखवली असतीस! तुझे गाणे घरात राहिले असते, आईचा जीव जीवात राहिला असता.’
त्याला आईची समजून काढून तिला दोनेक तास बाहेर घेऊन जायचे असायचे.
‘आई मी काय म्हणतो, मंदिर नको तर नको, पण परवादिवशी स्नेहुलीचा वाढदिवस आहे. जरा तिच्यासाठी काहीतरी खरेदी करावी म्हणतो... चल तरी माझ्या सोबत!’
नातीचे नाव काढताच आजीबाई एकदम सावरीचे पीस होते, हे जयंताला माहित. आईच्या विस्मृतीचा फायदा घेत त्याने, स्नेहलचे एका वर्षात किमान शंभर सव्वाशे वाढदिवस तरी असेच साजरे केले होते. आजी मग उठे. जयंत कपाटातून तिचे एखादे चांगले पातळ काढून ठेवी. सहज म्हणे, ‘आई, आज बाजारत गेलो कि तुझ्यासाठी एखादी चांगली नऊवार घेऊ!’
‘मला मेलीला कशाला रे आता नवे पातळ!’
‘असू दे गं, मेलीला तर मेलीला...’ जयंत असला स्टार्क विनोद करे पण मुलाचे आपल्याकडे इतके लक्ष आहेसे पाहून आजीचा जीव सुपाएवढा होई.
ती म्हणे, ‘मेले एकदाची कि मग नवे पातळ येणारच! जुन्या कपड्यांत कोण जाळेल मला? एवढ्या मोठ्या इमारतीची मालकीण मी! कोण मला जुनेर नेसवून जाळेल? म्हणून म्हणते, नवे पातळ राहू दे, येईल उपयोगी...’ मुलापेक्षा हातभर पुढचं आजी बोलायच्या. जयंताला हे ही पाठ होतं.
आई तयार होईपर्यंत तो बाकीच्या रूम्स मध्ये चक्कर टाकून येई. कुठे तिने सुटकेस उघडलेली असे, कशासाठी? तिचं तिलाही माहित नसायचं. बंद करायची विसरलेली असे. कुठे कपडे ओले करून ठेवलेले असत, ते वाशिंग मशीनमध्ये टाकून, मशीन लावून देत असे. कुठे चक्क स्टीलच्या डब्यातली चिल्लर उपडी करून तशीच ठेवलेली असे. एकएक, दोनदोन, पाचपाचची नाणी वेगवेगळी करायचा अर्धवट प्रयत्न केलेला दिसे. नंतर मिक्स नाण्यांच्या राशी दिसत. जयंता नाण्याचा आवाज न करता सावकाश ती परत भरून ठेवी. खिडक्या अर्धवट उघड्या असत, त्या तो नीट बंद करी.
एवढे करून बाहेर येईपर्यंत, त्याची आई तयार झालेली असे. त्याच्या मनाप्रमाणे घडलेले असे. हातात नेहमीची फुलांची परडी असे. तिचा मऊ, सुरकुतलेला, दोनच सोन्याचे बिल्वर घातलेला हात तो हातात घेई, आणि पायऱ्या उतरू लागे. बाहेर येताच, पावले आपोआप मंदिराकडे वळत. आईला मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात, इतर बायकांमध्ये सोडले, कि जयंताचा जीव भांड्यात पडे. मनात म्हणे, ‘ती अशीच तर आपला हात धरून शाळेत सोडवायला यायची. एकदा का आपण आपल्या वर्गात बसलो, कि तिचाही जीव असाच भांड्यात पडत असणार!’
मंदिरासमोरच त्याची कन्सल्टन्सी होती. अधूनमधून काचेतून मंदिराकडे पाही. साधारण साडेसात वाजता प्रवचन संपे. पण त्याची नजर सतत प्रवेशद्वाराशी असे. आई अवेळी बाहेर आली तर? समोरच्या वाहत्या रस्त्यात चालू लागली तर? तो शांत डोळ्यांनी, अस्वस्थ अंत:करणाने मंदिराकडे पहात राही.... हे असे वर्षानुवर्षे चालले होते....
कोण म्हटलं, केवळ घारच आपल्या पिलांवर नजर ठेवते?
- शिवकन्या
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्तच!!
अतीवेळा सहमत !!!
पिरा ताई आणि वीणा ताई
_/\_ !!
वाह! अशी मुले पाहिली आहेत.
वाह! वाह! सुंदर कथा..
लक्षात
_/\_
खूप आवडली कथा..
उत्कृष्ठ!
श्वेता
कथा आवडली, मन सावरीचे पीस
खूप छान
नूतन
छान. सुंदर
सुंदर
आवडली
वा! सुरेख!
आहा __/\__
छान लेखन ! कथा आणि लिहिण्याची
मस्त.. सुरेखच...
अप्रतिम...
विशुमित
अप्रतिम , सुरेख च
एकदम छान कथा
पटला एकदम वास्तव
आईवडीलानी लहानपणी जीव लावला
अॅमी
खूप सुरेख...
खूप दिवसांनी मिपावर आले आणि
काय बोलावं. भिडणारं लिखाण.
खुप छान लेखन . +१००
अप्रतिम...
छान, आवडला __/\__
वाह !! कथा आवडली
सर्व
सुरेख!