स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?
स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?
अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते.
कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे. वगैरे.
यापुढे, 'अमुक केलं पाहिजे, घाव घातले पाहिजेत, पावलं उचलली पाहिजेत' वगैरे बोलायचंच नाही. दिवाणखान्यात बसून लेक्चर देणार्यांना समाज बदलता येत नाही. आपल्याला जे योग्य वाटतं ते आपणच करायचं. आपलं बघून आणखी चौघींना बळ येईल.
साधारण पंधरा वर्षापूर्वी बी.बी.सी. वर तामिळनाडूमधील स्त्रीहत्येवर डॉक्युमेंटरी दाखवली गेली होती. स्त्रीभृणहत्या नव्हे हं! स्त्रीहत्या! एका आजीनी कॅमेर्याला सांगितलं होतं, “हो. मी माझ्या तान्ह्या नातीला मारलं. पाण्यांत बुडवून! ती आम्हाला नकोशी झाली होती म्हणून नाही. पण तिचं आयुष्य माझ्यासारखंच जाणार! असं असह्य जीवन वाट्याला येण्याआधीच मी तिची सुटका करून टाकली. द्या फाशी नाहीतर टाका तुरुंगात. नवरा दारुडा, पोरगा पण तसाच. रोजची उपासमार, वर मारहाण. त्याच्यापासूनही सुटका होईल माझी. तुरुंगात दोन वेळची भाकरी देखील नशिबी येईल.”
माझ्या डोक्यात विचार आला, आजीबाई इतकी जिवावर उदार झाली होती, तुरुंगातही जायला तयार होती तर त्या दारुड्या नवर्याच्या डोक्यात झोपेत का होई ना, दगड घालायची हिम्मत का झाली नाही? त्या भीतीनी एखादेवेळेस मुलाची दारू देखील सुटली असती. नातीचं ही भाग्य उजळलं असतं! मर्दुमकी दाखवायची ती त्या असहाय्य जिवावर? आणखी एक नात झाली तर? आणि आणखी एक?
नवर्याला धडा शिकवण्याची तिची छाती का झाली नाही याच्या कारणातच स्त्रीभृणहत्येच मूळ दडलेलं आहे. दडलेलं नाही म्हणा, उजळ माथ्यानं वावरतंय.
बळी तो कान पिळी हा निसर्गाचा नियमच आहे. जंगलात, समुद्रात, वाळवंटात, डिस्कवरीत आणि नॅशनल जॉग्रफिकमध्ये या वास्तवाचं भयाण दर्शन घडतं. हे खरे रिऍलिटी शोज् . इथे अभिनय नाही, रीटेक नाहीत, मॅच फिक्सिंग नाही, खोटे अश्रू नाहीत की आधी टेप केलेलं हास्य नाही. त्या अवस्थेत मानवजात होती तेव्हांपासून पुरुष जातीचा स्त्रीवर वरचष्मा आहे.
आता शारिरिक शक्तीची जरूर तर राहिली नाहीच, उपयोगही फारसा राहिला नाही. कालबाह्य झाला तरीही हा वरचष्मा काही नाहिसा झाला नाही. का बरं नाहिसा होईल? आजपर्यंत कोणी आपणहून राजसिंहासन सोडलंय्?
पूर्वी मुलींना शिक्षण नव्हतं, कमाई नव्हती, हक्क नव्हते. त्यामुळे लग्नाच्या वेळी मुलीच्या आईबापांची धुलाई करण्याची प्रथा सुरू झाली. आता मुली बरोबरीनी शिकल्या, कमवायला लागल्या. सरकारनी त्यांना बरोबरीने हक्क दिले (निदान हिंदू मुलींच्या बाबतीत तरी. बाकीच्यांना कितपत आहेत याचा माझा अभ्यास नाही. दिले असतील अशी आशा). धुलाई कमी झाली पण थांबली नाही. आज कित्येक लग्नात खर्च अर्धा अर्धा केल्याचं ऐकू येतं पण नेहमीच त्याचं कारण ‘मुलाकडच्यांनीच ती ऑफर दिली’ असं असतं. मुलीकडच्यांनी नेटानी हे करवून घेतलं अशा केसेस् असतील नक्कीच, पण माझ्या बघण्यात तरी नाहीत.
“पोरीचं लग्न एकदाच तर करायचय्. पैसे कमावले आहेत ते तिच्यासाठीच ना”, असं प्रत्येक जण आपल्या निर्णयाचं पुष्टीकरण देतो. पण तेव्हां त्यांच्या हे लक्षांत येत नाही की आपल्या आधी कोट्यवधी वधुपित्यांनी असाच विचार केला. त्याच बीजाचा विषवृक्ष झाला आहे. त्याच्याच फांद्या म्हणजे हुंडा, एकतर्फी मानपान, आणि शेंडेफळ आहे स्त्रीभृणहत्या!
किती तर्कशून्य आहे बघा! आपल्याला माहीतच आहे की ज्या वस्तूचा सुळसुळाट असतो तिची किंमत पडते. जिचा तुटवडा असतो तिची वाढते. आज हजार मुलांमागे साडेआठशे ते साडेनऊशे मुली आहेत. (वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे आकडे). आकड्यांचा रेटा फार जबरदस्त असतो. त्यानुसार आपला भाव चांगलाच वधारायला हवा होता. नाही का? तसं का झालं नाही? आपलाच आत्मविश्वास कमी पडला. वरमाई असताना आपल्या आवाजातली फेक आणि वधुमाई असताना यात आपणच फरक पडू दिला. “निष्कारण दुय्यम भूमिका आम्हाला मान्यच नाही” असं आम्ही खडसावून सांगू शकलो नाही.
१९६०च्या दशकात अमेरिकेत ‘विमेन्स लिबरेशन’ या चळवळीनी चांगलंच मूळ धरलं. १९८५ साली त्यांतल्या एका अग्रगण्य महिलेने (तिचं नाव आता मला आठवत नाही) असं विधान केलं की “आमच्या चळवळीची दिशा पुढे पूर्णपणे चुकलीच. आम्ही स्त्रीच्या स्त्रीत्वाचा, अस्मितेचा आदर समाजाकडून व्हावा म्हणून ही चळवळ उभी केली. मात्र पुढे आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलो. आमचं यशापयश त्यांच्याच फूटपट्टीनी मोजायला लागलो. नकळत एका प्रकारे आम्ही अशी पावतीच दिली की पुरुषाचं काम आमच्या कामापेक्षा जास्त challenging and fulfilling आहे. आता मात्र हे बदलायला हवं.”
पण आता हे बदलणं शक्य नव्हतं. त्या कामातलं आव्हान, मिळणारं समाधान, आर्थिक बळ आणि त्यामुळे येणारं स्वातंत्र्य यांचा स्त्रियांना चसका लागला होता. चिमणीची आता घार झाली होती. पंखात शक्ती आली होती, नजर तीक्ष्ण झाली होती, चोच धारदार झाली होती. घरट्यातली जागा आता पुरेशी वाटत नव्हती.
मात्र एक उणीव राहिली. अजूनही आहे. तिचं मन चिमणीचंच राहिलं. आपण घार झालो आहोत हे तिला अजून माहीतच नाही कारण तिला कुणी आरसा दाखवला नाही. तिला अजूनही असंच वाटतं की कावळा आपल्याहून बलवान आहे. ज्या दिवशी तिला तो आरसा सापडेल त्याच दिवशी जोडाक्षरांचा बाप असलेला हा शब्द ‘स्त्रीभृणहत्या’ इतिहासजमा होईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शब्दरचना आवडली.
अप्रतिम
खरी गरज ही पुरुषमुक्तीची आहे -
आपल्याकडच्या स्त्री
लेख आवडला.
मूळ कारण वेगळे आहे
माफ करा, काहीसा असहमत. काही गैरसमज आहेत असे वाटते.
मिपावर आणि इतर मिडियामध्ये
खरी गरज ही पुरुषमुक्तीची आहे -
आमचं यशापयश त्यांच्याच
खरं कारण १) समाज भोंदू आहे -
प्रतिसादांना प्रतिसाद
वा! काय सडेतोड लिहिलंय! पण
हौस??
अच्छा म्हणजे समाजाने आपोआप
लेख विषय
हे वाक्य खासच. मुलींना स्वतःच्या पायावर सक्षम आणि निरणय निर्णय सारासारविवेकी करण्याऐवजी उच्चशिक्षीत करून चांगले स्थ्ळ मिळावे असाच आटाटोप (बहुतांश) घरात असतो. काही अपवाद असतीलही, पण कह्रेच खरेच प्रामाणिकपणाने सांगावे बहुसदस्य कुटुंबात मुलीने शिकलेल्या ज्ञानाचा/पदवीचा/कौशल्याचा पुढे उपयोग करून घेतला जातो ,अगदी शहरातही सनदी लेखापाल्,वैदकीय्,करसल्लागार वगळता इतर मुलींना लग्नाअगोदर घेतलेले शिक्षण पुढे स्वतःच्या आर्थीक/व्यक्तीमत्व उन्नतीसाठी वापरण्याची संधी/अवकाष फार कमी मिळते. मुलींचे पालकही तसा कधी विचार करीत नाहीत हे कटु असले तरी सत्य आहे आणि त्यामुळेच अकस्मात दुर्दवी परिस्थीतीत मुलीला सग्ळी सुरुवात शुन्यापासून करावी लागते.
+१११
“निष्कारण दुय्यम भूमिका
निष्कारण दुय्यम भूमिका
बायकांनाच स्वत:ला खरतर मुलगी
आजकाल मुलीही चोखंदळ आहेत
अरेंज्ड मॅरेज
आता अटी दहा आणि दहाच्या दहा
- मुलगा शेतकरी सधन कुटुंब (अगदी वार्षीक ७-८ लाखापेक्षा जास्त उत्पन्न) आणि स्वतःचे स्वतंत्र घर्,शेत तरी लग्न जमत नाही.
- मुलगा निर्वयसनी पण साधीच नोकरी सध्या घर नाही पण उधळ्या/चैनी स्वभाव नसल्याने घर घेईल अशी खात्रीची परिस्थीती तरी लग्न जमत नाही.
- मुलगा व्यसनी (सिगरेटपासून दारुपर्यंत) पण नोकरी आहे शहरात बाप (आणि आड मार्गाने भावी सासर्याकडून घर घेण्याची तयारी असलेला) लग्न लगेच ठरते.आणि पैश्याच्या धुरात होतेही
- मुलगा आई बापाच्याच घरात रहायला वडीलांचा स्वकष्टाजीत कारखाना (प्रेस वर्कशॉप) पण आईची पैशाची महालालसा (बापाचा मूक पाठींबा), लांबच्या नात्यातील मुलगी (मुलाच्या मानने अतिषय देखणी व शिकलेली). सध्या पैश्यासाठी रोज मारहाण्,आणि शिविगाळ (लग्न झटक्यात जमवलेले आहे).
उत्तरे ऊमजतील न उमजतील पण प्रश्न पडायला काय आहे? समाजातलाच संसारी नाखुदांभिकपणा
विषयाला कधीकधी भलतेच फाटे
स्त्रीभ्रूणहत्या : चोर सोडून ....