गीतबाधा
तुम्हाला होतं का कधी असं? भूतबाधा व्हावी तशी गीतबाधा होते मला. एखादं गाणं कचकचून चावतं आणि त्याची बाधा होते. मग ते गाणं मला बरेच दिवस सोडत नाही. कित्येक दिवस मी फक्त तेच गाणं ऐकतो, म्हणतो, ओरडतो, कोकलतो, पुटपुटतो. शेवटी बायको वैतागून ते गाणं बंद करायला सांगते. तरी ते गाणं मला सोडत नाही. संपूर्ण गाणं त्यातल्या संगीताच्या एक-एक तुकड्यासकट तोंडपाठ झाल्याशिवाय मीदेखील त्या गाण्याला सोडत नाही. आधी गाणं मला बाधतं, मग मी गाण्याला बाधतो. एका वेळेस १५-२० वेळा आणि असं किमान ८ ते १० वेळा मी ते गाणं ऐकतो. फारसं चांगलं गाणं येत नसलं तरी मनाचं समाधान होईल इतपत सुरात ते गाणं नरड्यातून येईपर्यंत ते गाणं मी ऐकतो आणि म्हणतो. मग अचानक दुसरं गाणं उगवतं. म्हणून मी आधीच्या गाण्याला वाऱ्यावर सोडत नाही. ते माझ्या मनाच्या एका सुरक्षित कुपीत अलगद ठेवून देतो. अशा प्रत्येक गाण्यासाठी मी एक-एक खास कुपी मनात तयार करून घेत असतो. या कुपीला कुलुप-किल्ल्या नसतात. उघड्याच असतात या कुप्या. एखाद्या कुपीनुरूप माहौल बाहेरच्या जगात तयार झाला की मग त्या विशिष्ट कुपीतून आराम करत असलेलं गाणं सुगंध पसरावा तसं बाहेर पडतं. क्वचित ओठांवरही येतं आणि आसमंत आणि पुन्हा एकदा माझं मन भिजवून जातं. या मनातल्या कुपीची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. गाण्याच्या चालीच्या भिंती असतात. गायक-गायिकांच्या आवाजांचे छप्पर असते. आशयाचे सुंदर रंग असतात. आणि गाण्याच्या मला भिडलेल्या भावाचे, भूतकाळातील आठवणींशी नातं सांगू पाहणाऱ्या किंवा सांगणाऱ्या रेशीमधाग्यांचे सुगंधी पडदे असतात.
कधी गाणं बाहेर पडलं तर हा सगळा लवाजमा बाहेर घेऊनच पडतं. आणि हो, या गीतबाधेला गाण्यांचं कुठलंच बंधन नसतं. फक्त रफीची किंवा सज्जाद हुसेनची किंवा वसंतरावांची किंवा सुधीर फडक्यांची किंवा फक्त अशी क्लासिक वगैरे गाणीच मला बाधतात असे अजिबात नाही. किंबहुना जास्त संख्या साध्या गाण्यांचीच आहे कारण खूप जास्त क्लासिकल मला फारसं झेपत नाही. त्यामुळे बेगम अख्तरचं "वो जो हममे तुममे करार था..." एका कुपीत असेल तर त्याच्या लगतच्या कुपीत "तेरे बदन में तुंफा उठा तो साडी हवा हो गयी" हे 'मवाली'चं तडका गाणंदेखील असू शकतं. कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही.
हा सिलसिला कधी सुरु झाला आठवत नाही पण खूप वर्षे झाली हे नक्की. "सलाम-ए-इश्क मेरी जां जरा कबूल कर लो..." हे बहुधा माझ्या आठवणीतलं पहिलं चावलेलं गाणं. अमिताभ किशोरच्या आवाजात "हां.......इसके आगे की अब दासता मुझसे सुन, सुनके तेरी नजर डबडबा जायेगी..." असं गायला सुरुवात करतो आणि अजूनही रोमांच उभे राहते. अमिताभ, किशोर, आणि लाजवाब चाल! दिल में छेद कर दिया इस गाने ने! अजूनही "हां..." करून भ्रष्ट नक्कल करायचा प्रयत्न करतो पण साला अपनी औकात धोखा दे जाती हैं. तर इतक्या लहानपणापासून हे गाण्यांचं गारुड चकित करत आलंय.
त्यानंतर असा गानदंश कित्येकवेळा झाला पण लहानपणीचे असे बरेच दंश कालौघात बरे झाले. लहानपणी 'पाताल भैरवी'मधले "चुम्मा चुम्मा चुम्मा चुम्मा, मुझको बना ले प्रियतम्मा..." हे डिंपलवर चित्रीत झालेलं गाणंदेखील थोडं चावण्याच्या मूडमध्ये आलं होतं. त्यात डिंपलच्या मादक नृत्याचा जास्त भाग होता हे वेगळं सांगायची गरज नाही. हे गाणं लगेच उतरलं. 'सल्तनत'मधलं "नजर ने नजर से क्या कहा, मेरी जां मेरी जां ये बाता..." हे गाणं त्याकाळी आवडलं आणि नंतर कित्येक वर्षे गायब झालं. हे गाणं मी मागच्या वर्षी खणून काढलं आणि खूप वेळा ऐकलं. बरं वाटलं. पण बाधलं नाही. 'शक्ति'मधलं "जाने कैसे कब कहां इकरार हो गया...." हे मात्र लहानपणापासूनच बाधलं. त्याकाळी इतकं ऐकता आलं नाही; त्याची कसर नंतर भरून काढली. अप्रतिम चाल! स्लो मोशनमध्ये अमिताभ स्मिताला उचलतो त्यावेळेस जो अफलातून तुकडा वाजतो, तो अट्टल रोमांटिक!
नंतर केव्हातरी 'मंजिल मंजिल'मधलं "हे बाबा हे बाबा मिलते है एक दिन हे बाबा, रे बाबा रे बाबा मर गये तुम बिन रे बाबा...." हे गाणं ऐकलं. वेगळीच चाल बांधली होती आरडीने. आणि आशाबाईंनी काय नखरेल आवाजात गायलं होतं, वा! आणि मधले मधले झिंगालाला तुकडे...मजा आ गया. पाठ करून टाकलं. अजूनही पाठ आहे बहुतेक. अशी बरीच गाणी पाठ झाली. बरीच जुनी गाणी मी गेल्या १०-१२ वर्षात उकरून काढली. जवळपास १३-१४ वर्षांपूर्वी 'बसेरा'मधलं "जहां पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं..." हे गाणं अवचित ऐकायला मिळालं. नंतर शक्य झालं तेव्हा अनेकदा ऐकलं. दिदींचा अशक्य वर जाणारा आवाज, मखमली काव्य, आणि आरडीची कुरतडणारी, मनाला हुरहूर लावणारी चाल. गाणं ऐकतंच रहवासं वाटतं. त्याच्या काही वर्षे आधी 'उंबरठा'मधल्या "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..." ने भुरळ घातली. साधारण २०००-२००१-२००२ मध्ये मित्रांसोबत "सुन्या सुन्या"चा आग्रह व्हायचा आणि २-३ वेळा गाऊन झालं की पोरं खुश व्ह्यायची. आता दोन-तीन महिन्यांपूर्वी मुळशीच्या एका रिसोर्टवर गेलो होतो. सगळे जुने दोस्त! जीवाभावाचे! परत 'सुन्या सुन्या' झालं. मन एकदम १४-१५ वर्षे मागे गेलं. अगदी तेव्हा जेव्हा सगळं सुनं सुनंच होतं. नकळत मन हळवं झालं. त्याच सुमारास गुलाम अलीचं "चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला..." ऐकलं. त्याकाळातल्या माझ्या परिस्थितीशी इतकं सुसंगत गाणं तोपर्यंत मी ऐकलं नव्हतं. नोकरी नाही. आणि नोकरी नाही म्हणून सगळीकडून झेलावा लागणारा तिरस्कार, ती अगतिकता, काय करायचं हे काळंकुट्ट प्रश्नचिन्ह..."चमकते" हृदयात रुतून बसलं. अगदी तोंडपाठ झालं. मग "मी कात टाकली" ने झपाटलं. हृदयनाथांची अप्रतिम चाल आणि दिदींचा किंचित आक्रमक तरी हताश स्वर! जादू आहे हे गाणं.
नंतर गुलाम अलीने झपाटलं. "आवारगी", "चुपके चुपके", "वो कोई और न था...", "कैसी चली है अब के हवा…", "हंगामा है क्यू बरपा…"...खूप गजला. अक्षरश: शंभर-शंभर वेळा ऐकून तोंडपाठ झाल्या. अगदी सगळ्या संगीतासहित! गुलाम अलीच्या गजलांमधला मधाळपणा खूप आवडला. नंतर मित्रांसोबत कित्येक वेळा या गजला गायल्या. मित्रदेखील खुशफ़हम आणि खुशमिजाज! त्यांनी ऐकल्या, पुन्हा पुन्हा ऐकल्या, अजूनदेखील ऐकतात आणि मग गातांना आणखी मजा येते. मागे रिसोर्टला गेलो होतो. पहाटे ३ पर्यंत गाणी चालली होती. खडकवासल्याचे गडद पाणी आणि त्याशेजारी आम्ही बसलो होतो. एकामागून एक गजल बाहेर येत होती. माहौल रंगीन होत होता.
"वो तेरा कोठे पे नंगे पाव आना याद हैं". कुणी कधीच असं आलं नाही पण आलं असतं तर जिंदगी ने और क्या क्या हसीन गुल खिलाये होते या विचारात आम्ही पहाट जागवली. नंतर "बिखरती झुल्फ की, परछाईयां मुझे दे दो, तुम अपनी शाम की तनहाईयां मुझे दे दो..." झालं. अशा वेड लावून जाणाऱ्या झुल्फांची आठवण जागवून झाली. प्रत्येकाच्या आठवणीत अशी झुल्फे मुबलक होती.
काही महिन्यांपूर्वी "कोई नही हैं कही, सपनों में क्यू खो गयी" ऐकलं. खूप वर्षांनंतर ऐकलं. नंतर सलग ८-१० दिवस मग हेच गाणं ऐकलं. भूपेंद्र सिंगचा आवाज काय लागलाय म्हणून सांगू! हेमा अंध असते आणि स्टेजवर नाचते. जितेंद्र बाजूला उभं राहून तिला या गाण्यातून सांगतो "कुणीच नाहीये सोबतीला, सगळ्यांचा असे मार्ग एकला". अडचणीत असतांना मार्ग बंद होतात. काय करावं कळत नाही. मार्ग सापडत नाही. कुणीच काही मदत करू शकत नाही. तरीही धीर ठेवावा लागतो; मार्ग आपला आपणच शोधावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये हे गाणं चपखल बसतं. हे गाणं ऐकतांना अशी काही आठवण आली तर डोळ्यात टचकन पाणी आल्यावाचून राहत नाही.
त्यानंतर 'गुंडे' मधलं "तुने मारी एंट्री" जाम आवडलं. काय बीट्स! सुरेख चाल आणि नीती मोहनचा खटकेबाज आवाज. सकाळी चालतांना हे गाणं भारी वाटतं. तालात आणि वेगात पाऊले पडतात. शब्द मात्र आजकाल वळसेदार, गेय नसतात त्यामुळे ह्या गाण्याचे शब्द सहजासहजी ओठांवर येत नाहीत. अशाच पठडीतलं प्रियांकावरच चित्रीत झालेलं 'शूटआऊट एट वडाळा' मधलं "बबली बदमाश हैं" आहे. एकदम झकास गाणं. सुनिधीचा झोकदार आवाज आहे. हे पण चालतांना ऐकण्याचं गाणं. "युं तो प्रेमी पचत्तर हमारे" (एजंट विनोद), "तम्मा तम्मा लोगे" (थानेदार), "आज रपट जाये तो" (नमक हलाल) ही गाणी अशीच धमाल! मला विशेष आवडतं 'तेजाब'मधलं अलकाच्या आवाजातलं "एक दो तीन". काय ओर्केस्ट्रा आहे! मधले काही काही तुकडे तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेउन जातात. एकदा अगदी फोकस करून ऐका हे गाणं. बडी गंमत हैं उस गाने में.
मागे थायलंड्च्या सहलीला गेलो होतो. अर्थातच, बायको होती सोबत. ('त्या' प्रकारचा मसाज घेतला नाही हे आधीच सांगून ठेवतो.) आमच्या गटात एक सुरेख मुलगी होती. सहलीमध्ये असं कुणी असलं की सहलीची मजा चौपट होते हा माझा अनुभव! हर पल हवा में एक अलग सी खुशहाली रहती हैं. काय सुंदर गाणं गायची. तिने 'फेशन' सिनेमातलं "कुछ खास हैं, कुछ बात हैं..." म्हटलं. निव्वळ अप्रतिम! मग ते गाणं शोधून काढणं आलंच. खूप वेळा ऐकलं पण प्रोब्लेम तोच, शब्दांच्या नावाने बोंब! पण गाणं ऐकलं मात्र खूप वेळा.
नंतर अहमद हुसेन - मोहमद हुसेन या बंधूंचं "मैं हवा हूं कहां वतन मेरा, दश्त मेरा ना ये चमन मेरा" असंच १०-१२ दिवस ऐकलं. अजूनही मन सैरभैर झालं की हे गाणं ऐकतो. छान वाटतं. मग बेगम अख्तर यांचं "वो जो हममे तुममे करार था, तुम्हे याद हो के ना याद हो"वर काही दिवस जगलो. मदहोश करणारे सूर!
कधी काळी "सो गया ये जहां, सो गया रासता.." (तेजाब), "सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं" (कुली), "जब हम जवां होंगे, जाने कहां होंगे" (बेताब) अशा गाण्यांनीदेखील वेड लावलं होतं. अशी बरीच गाणी अजूनही बऱ्यापैकी पाठ आहेत. मित्रांच्या आग्रहास्तव शब्बीर कुमार आणि मोहम्मद अझीझ या महान गायकांच्या रेचक गायनवैशिष्ट्यांची आठवण जागवण्यासाठी या गाण्यांचीदेखील फर्माईश होते आणि ही गाणी गायलादेखील तितकीच मजा येते.
नुकतंच मेहदी हसन यांचं "रंजीशही सही, दिल ही दुखाने के लिये आ..." संपवलंय. हे ही रात्रीचं गाणं. रात्र अधिक तरुण करणारं गाणं. काय शायरी आहे! दिल ना दुखा दे तो जाने!
सध्या 'सनम रे' चित्रपटातलं अरिजित सिंगच्या आवाजातलं "भीगी भीगी सडकों पे मैं तेरा इंतजार करू, धीरे धीरे दिल की जमीं को तेरे ही नाम करूं, खुद को यूं खो दू के फिर ना कभी पाऊं, होले होले जिंदगी को मैं तेरे हवाले करूं...सनम रे...सनम रे...तू मेरा सनम हुआ रे, करम रे करम रे, तेरा मुझ पे करम हुआ रे...सनम रे..." हे गाणं ऐकतोय. सुंदर चाल आहे. गाणं म्हणजे जरा ट ला फ जोडल्यासारखंच आहे पण चाल धुंद करणारी आहे. गेले ३-४ दिवस रोज सकाळी ८-१० वेळा हे गाणं ऐकतो.
अशी अजून बरीच गाणी आहेत. आता पुढचं गाणं कुठलं मला माहिती नाही पण एखादं असणार हे नक्की. एखाद्या मैफिलीत मनाच्या असंख्य कुप्यांमधून एकामागोमाग ही गाणी बाहेर पडतात. माहौल चिंब होऊन जातो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पियुष मिश्रा
GoW(१,२) म्हणजे अप्रतिमच
येउद्या
कूपी..
अरे काय धागा आहे!
+1
छान लिहिलय. मागील अठवड्यात एक
धानी अल्बम
याच अल्बम मधले दूर से कोई आये
दादा
आमचं एक ठिगळ,
हम्म. बहुतेक पंख लागले गड्या
बेवजह - कोक स्टूडियो
धूम पिचक धूम. बँड युफोरिया.
तू हि रे, रुक्मिणी, एक हो गये
सध्या माधुरीची दोन गाणी
'परिंदा'मधलं "प्यार के मोड पे, छोडोगे जो बाहे मेरी"
98 कि 99 ला ग्रहण आलेला. जॅकी
जॅकी श्रॉफ वरून आठवलं
मस्त धागा
सुंदर प्रतिसाद
सध्याचे नवे गाणे
अफलातून धागा
झेब हनिया ची गाणी वेड लावतात.
अप्रतिम लेख
मिंचागी नीनू बरलू आवडत नाही
सोनु निगमने गायलेले
चिक बक चिक रायले , आरारा नाका
पहिल्यांदा प्रेमात पडलो
अरे काय धागा आहे! मस्त मस्त...
सगळी कृपा संगितसम्राट
शाळेत होतो. कधीतरी रेडिओ
आख्ख्या धाग्याला
अय्यो. खूपच मस्त धागा आणि
झालं झिंग झिंग झिंग झिंगाट
आज घरातली आवराआवरी करताना
हे गाणं कोणत्या रागावर आधरलेलं आहे?
सुंदर आणि सुरेल धागा
गीतबाधा