Skip to main content

गीतबाधा

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 02/06/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला होतं का कधी असं? भूतबाधा व्हावी तशी गीतबाधा होते मला. एखादं गाणं कचकचून चावतं आणि त्याची बाधा होते. मग ते गाणं मला बरेच दिवस सोडत नाही. कित्येक दिवस मी फक्त तेच गाणं ऐकतो, म्हणतो, ओरडतो, कोकलतो, पुटपुटतो. शेवटी बायको वैतागून ते गाणं बंद करायला सांगते. तरी ते गाणं मला सोडत नाही. संपूर्ण गाणं त्यातल्या संगीताच्या एक-एक तुकड्यासकट तोंडपाठ झाल्याशिवाय मीदेखील त्या गाण्याला सोडत नाही. आधी गाणं मला बाधतं, मग मी गाण्याला बाधतो. एका वेळेस १५-२० वेळा आणि असं किमान ८ ते १० वेळा मी ते गाणं ऐकतो. फारसं चांगलं गाणं येत नसलं तरी मनाचं समाधान होईल इतपत सुरात ते गाणं नरड्यातून येईपर्यंत ते गाणं मी ऐकतो आणि म्हणतो. मग अचानक दुसरं गाणं उगवतं. म्हणून मी आधीच्या गाण्याला वाऱ्यावर सोडत नाही. ते माझ्या मनाच्या एका सुरक्षित कुपीत अलगद ठेवून देतो. अशा प्रत्येक गाण्यासाठी मी एक-एक खास कुपी मनात तयार करून घेत असतो. या कुपीला कुलुप-किल्ल्या नसतात. उघड्याच असतात या कुप्या. एखाद्या कुपीनुरूप माहौल बाहेरच्या जगात तयार झाला की मग त्या विशिष्ट कुपीतून आराम करत असलेलं गाणं सुगंध पसरावा तसं बाहेर पडतं. क्वचित ओठांवरही येतं आणि आसमंत आणि पुन्हा एकदा माझं मन भिजवून जातं. या मनातल्या कुपीची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. गाण्याच्या चालीच्या भिंती असतात. गायक-गायिकांच्या आवाजांचे छप्पर असते. आशयाचे सुंदर रंग असतात. आणि गाण्याच्या मला भिडलेल्या भावाचे, भूतकाळातील आठवणींशी नातं सांगू पाहणाऱ्या किंवा सांगणाऱ्या रेशीमधाग्यांचे सुगंधी पडदे असतात. कधी गाणं बाहेर पडलं तर हा सगळा लवाजमा बाहेर घेऊनच पडतं. आणि हो, या गीतबाधेला गाण्यांचं कुठलंच बंधन नसतं. फक्त रफीची किंवा सज्जाद हुसेनची किंवा वसंतरावांची किंवा सुधीर फडक्यांची किंवा फक्त अशी क्लासिक वगैरे गाणीच मला बाधतात असे अजिबात नाही. किंबहुना जास्त संख्या साध्या गाण्यांचीच आहे कारण खूप जास्त क्लासिकल मला फारसं झेपत नाही. त्यामुळे बेगम अख्तरचं "वो जो हममे तुममे करार था..." एका कुपीत असेल तर त्याच्या लगतच्या कुपीत "तेरे बदन में तुंफा उठा तो साडी हवा हो गयी" हे 'मवाली'चं तडका गाणंदेखील असू शकतं. कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही. हा सिलसिला कधी सुरु झाला आठवत नाही पण खूप वर्षे झाली हे नक्की. "सलाम-ए-इश्क मेरी जां जरा कबूल कर लो..." हे बहुधा माझ्या आठवणीतलं पहिलं चावलेलं गाणं. अमिताभ किशोरच्या आवाजात "हां.......इसके आगे की अब दासता मुझसे सुन, सुनके तेरी नजर डबडबा जायेगी..." असं गायला सुरुवात करतो आणि अजूनही रोमांच उभे राहते. अमिताभ, किशोर, आणि लाजवाब चाल! दिल में छेद कर दिया इस गाने ने! अजूनही "हां..." करून भ्रष्ट नक्कल करायचा प्रयत्न करतो पण साला अपनी औकात धोखा दे जाती हैं. तर इतक्या लहानपणापासून हे गाण्यांचं गारुड चकित करत आलंय. त्यानंतर असा गानदंश कित्येकवेळा झाला पण लहानपणीचे असे बरेच दंश कालौघात बरे झाले. लहानपणी 'पाताल भैरवी'मधले "चुम्मा चुम्मा चुम्मा चुम्मा, मुझको बना ले प्रियतम्मा..." हे डिंपलवर चित्रीत झालेलं गाणंदेखील थोडं चावण्याच्या मूडमध्ये आलं होतं. त्यात डिंपलच्या मादक नृत्याचा जास्त भाग होता हे वेगळं सांगायची गरज नाही. हे गाणं लगेच उतरलं. 'सल्तनत'मधलं "नजर ने नजर से क्या कहा, मेरी जां मेरी जां ये बाता..." हे गाणं त्याकाळी आवडलं आणि नंतर कित्येक वर्षे गायब झालं. हे गाणं मी मागच्या वर्षी खणून काढलं आणि खूप वेळा ऐकलं. बरं वाटलं. पण बाधलं नाही. 'शक्ति'मधलं "जाने कैसे कब कहां इकरार हो गया...." हे मात्र लहानपणापासूनच बाधलं. त्याकाळी इतकं ऐकता आलं नाही; त्याची कसर नंतर भरून काढली. अप्रतिम चाल! स्लो मोशनमध्ये अमिताभ स्मिताला उचलतो त्यावेळेस जो अफलातून तुकडा वाजतो, तो अट्टल रोमांटिक! नंतर केव्हातरी 'मंजिल मंजिल'मधलं "हे बाबा हे बाबा मिलते है एक दिन हे बाबा, रे बाबा रे बाबा मर गये तुम बिन रे बाबा...." हे गाणं ऐकलं. वेगळीच चाल बांधली होती आरडीने. आणि आशाबाईंनी काय नखरेल आवाजात गायलं होतं, वा! आणि मधले मधले झिंगालाला तुकडे...मजा आ गया. पाठ करून टाकलं. अजूनही पाठ आहे बहुतेक. अशी बरीच गाणी पाठ झाली. बरीच जुनी गाणी मी गेल्या १०-१२ वर्षात उकरून काढली. जवळपास १३-१४ वर्षांपूर्वी 'बसेरा'मधलं "जहां पे सवेरा हो, बसेरा वहीं हैं..." हे गाणं अवचित ऐकायला मिळालं. नंतर शक्य झालं तेव्हा अनेकदा ऐकलं. दिदींचा अशक्य वर जाणारा आवाज, मखमली काव्य, आणि आरडीची कुरतडणारी, मनाला हुरहूर लावणारी चाल. गाणं ऐकतंच रहवासं वाटतं. त्याच्या काही वर्षे आधी 'उंबरठा'मधल्या "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..." ने भुरळ घातली. साधारण २०००-२००१-२००२ मध्ये मित्रांसोबत "सुन्या सुन्या"चा आग्रह व्हायचा आणि २-३ वेळा गाऊन झालं की पोरं खुश व्ह्यायची. आता दोन-तीन महिन्यांपूर्वी मुळशीच्या एका रिसोर्टवर गेलो होतो. सगळे जुने दोस्त! जीवाभावाचे! परत 'सुन्या सुन्या' झालं. मन एकदम १४-१५ वर्षे मागे गेलं. अगदी तेव्हा जेव्हा सगळं सुनं सुनंच होतं. नकळत मन हळवं झालं. त्याच सुमारास गुलाम अलीचं "चमकते चांद को टुटा हुआ तारा बना डाला..." ऐकलं. त्याकाळातल्या माझ्या परिस्थितीशी इतकं सुसंगत गाणं तोपर्यंत मी ऐकलं नव्हतं. नोकरी नाही. आणि नोकरी नाही म्हणून सगळीकडून झेलावा लागणारा तिरस्कार, ती अगतिकता, काय करायचं हे काळंकुट्ट प्रश्नचिन्ह..."चमकते" हृदयात रुतून बसलं. अगदी तोंडपाठ झालं. मग "मी कात टाकली" ने झपाटलं. हृदयनाथांची अप्रतिम चाल आणि दिदींचा किंचित आक्रमक तरी हताश स्वर! जादू आहे हे गाणं. नंतर गुलाम अलीने झपाटलं. "आवारगी", "चुपके चुपके", "वो कोई और न था...", "कैसी चली है अब के हवा…", "हंगामा है क्यू बरपा…"...खूप गजला. अक्षरश: शंभर-शंभर वेळा ऐकून तोंडपाठ झाल्या. अगदी सगळ्या संगीतासहित! गुलाम अलीच्या गजलांमधला मधाळपणा खूप आवडला. नंतर मित्रांसोबत कित्येक वेळा या गजला गायल्या. मित्रदेखील खुशफ़हम आणि खुशमिजाज! त्यांनी ऐकल्या, पुन्हा पुन्हा ऐकल्या, अजूनदेखील ऐकतात आणि मग गातांना आणखी मजा येते. मागे रिसोर्टला गेलो होतो. पहाटे ३ पर्यंत गाणी चालली होती. खडकवासल्याचे गडद पाणी आणि त्याशेजारी आम्ही बसलो होतो. एकामागून एक गजल बाहेर येत होती. माहौल रंगीन होत होता. "वो तेरा कोठे पे नंगे पाव आना याद हैं". कुणी कधीच असं आलं नाही पण आलं असतं तर जिंदगी ने और क्या क्या हसीन गुल खिलाये होते या विचारात आम्ही पहाट जागवली. नंतर "बिखरती झुल्फ की, परछाईयां मुझे दे दो, तुम अपनी शाम की तनहाईयां मुझे दे दो..." झालं. अशा वेड लावून जाणाऱ्या झुल्फांची आठवण जागवून झाली. प्रत्येकाच्या आठवणीत अशी झुल्फे मुबलक होती. काही महिन्यांपूर्वी "कोई नही हैं कही, सपनों में क्यू खो गयी" ऐकलं. खूप वर्षांनंतर ऐकलं. नंतर सलग ८-१० दिवस मग हेच गाणं ऐकलं. भूपेंद्र सिंगचा आवाज काय लागलाय म्हणून सांगू! हेमा अंध असते आणि स्टेजवर नाचते. जितेंद्र बाजूला उभं राहून तिला या गाण्यातून सांगतो "कुणीच नाहीये सोबतीला, सगळ्यांचा असे मार्ग एकला". अडचणीत असतांना मार्ग बंद होतात. काय करावं कळत नाही. मार्ग सापडत नाही. कुणीच काही मदत करू शकत नाही. तरीही धीर ठेवावा लागतो; मार्ग आपला आपणच शोधावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये हे गाणं चपखल बसतं. हे गाणं ऐकतांना अशी काही आठवण आली तर डोळ्यात टचकन पाणी आल्यावाचून राहत नाही. त्यानंतर 'गुंडे' मधलं "तुने मारी एंट्री" जाम आवडलं. काय बीट्स! सुरेख चाल आणि नीती मोहनचा खटकेबाज आवाज. सकाळी चालतांना हे गाणं भारी वाटतं. तालात आणि वेगात पाऊले पडतात. शब्द मात्र आजकाल वळसेदार, गेय नसतात त्यामुळे ह्या गाण्याचे शब्द सहजासहजी ओठांवर येत नाहीत. अशाच पठडीतलं प्रियांकावरच चित्रीत झालेलं 'शूटआऊट एट वडाळा' मधलं "बबली बदमाश हैं" आहे. एकदम झकास गाणं. सुनिधीचा झोकदार आवाज आहे. हे पण चालतांना ऐकण्याचं गाणं. "युं तो प्रेमी पचत्तर हमारे" (एजंट विनोद), "तम्मा तम्मा लोगे" (थानेदार), "आज रपट जाये तो" (नमक हलाल) ही गाणी अशीच धमाल! मला विशेष आवडतं 'तेजाब'मधलं अलकाच्या आवाजातलं "एक दो तीन". काय ओर्केस्ट्रा आहे! मधले काही काही तुकडे तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेउन जातात. एकदा अगदी फोकस करून ऐका हे गाणं. बडी गंमत हैं उस गाने में. मागे थायलंड्च्या सहलीला गेलो होतो. अर्थातच, बायको होती सोबत. ('त्या' प्रकारचा मसाज घेतला नाही हे आधीच सांगून ठेवतो.) आमच्या गटात एक सुरेख मुलगी होती. सहलीमध्ये असं कुणी असलं की सहलीची मजा चौपट होते हा माझा अनुभव! हर पल हवा में एक अलग सी खुशहाली रहती हैं. काय सुंदर गाणं गायची. तिने 'फेशन' सिनेमातलं "कुछ खास हैं, कुछ बात हैं..." म्हटलं. निव्वळ अप्रतिम! मग ते गाणं शोधून काढणं आलंच. खूप वेळा ऐकलं पण प्रोब्लेम तोच, शब्दांच्या नावाने बोंब! पण गाणं ऐकलं मात्र खूप वेळा. नंतर अहमद हुसेन - मोहमद हुसेन या बंधूंचं "मैं हवा हूं कहां वतन मेरा, दश्त मेरा ना ये चमन मेरा" असंच १०-१२ दिवस ऐकलं. अजूनही मन सैरभैर झालं की हे गाणं ऐकतो. छान वाटतं. मग बेगम अख्तर यांचं "वो जो हममे तुममे करार था, तुम्हे याद हो के ना याद हो"वर काही दिवस जगलो. मदहोश करणारे सूर! कधी काळी "सो गया ये जहां, सो गया रासता.." (तेजाब), "सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं" (कुली), "जब हम जवां होंगे, जाने कहां होंगे" (बेताब) अशा गाण्यांनीदेखील वेड लावलं होतं. अशी बरीच गाणी अजूनही बऱ्यापैकी पाठ आहेत. मित्रांच्या आग्रहास्तव शब्बीर कुमार आणि मोहम्मद अझीझ या महान गायकांच्या रेचक गायनवैशिष्ट्यांची आठवण जागवण्यासाठी या गाण्यांचीदेखील फर्माईश होते आणि ही गाणी गायलादेखील तितकीच मजा येते. नुकतंच मेहदी हसन यांचं "रंजीशही सही, दिल ही दुखाने के लिये आ..." संपवलंय. हे ही रात्रीचं गाणं. रात्र अधिक तरुण करणारं गाणं. काय शायरी आहे! दिल ना दुखा दे तो जाने! सध्या 'सनम रे' चित्रपटातलं अरिजित सिंगच्या आवाजातलं "भीगी भीगी सडकों पे मैं तेरा इंतजार करू, धीरे धीरे दिल की जमीं को तेरे ही नाम करूं, खुद को यूं खो दू के फिर ना कभी पाऊं, होले होले जिंदगी को मैं तेरे हवाले करूं...सनम रे...सनम रे...तू मेरा सनम हुआ रे, करम रे करम रे, तेरा मुझ पे करम हुआ रे...सनम रे..." हे गाणं ऐकतोय. सुंदर चाल आहे. गाणं म्हणजे जरा ट ला फ जोडल्यासारखंच आहे पण चाल धुंद करणारी आहे. गेले ३-४ दिवस रोज सकाळी ८-१० वेळा हे गाणं ऐकतो. अशी अजून बरीच गाणी आहेत. आता पुढचं गाणं कुठलं मला माहिती नाही पण एखादं असणार हे नक्की. एखाद्या मैफिलीत मनाच्या असंख्य कुप्यांमधून एकामागोमाग ही गाणी बाहेर पडतात. माहौल चिंब होऊन जातो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20638
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

कहो क्या खयाल है.. https://www.youtube.com/watch?v=yKQukk3Un_Q काय मधुर गाणे आहे.. जमल्यास हेड्फोन्स लावून ऐका.. गिटार, बास गिटार, डफ सदृश एक वाद्य.. आणि अरेबियन क्लॅप झेबचा अतिशय गोड आवाज.. आणि माझा आवडता स्वानंद किरकिरे.. त्याची इतर दोन गाणी आठवली या निमित्ताने बावरा मन देखने चला इक सपना.. आणि काहीशा अप्रसिद्ध सिनेमात एक सुंदर बंगाली / बाउल सारखे एक अप्रतिम गाणे आहे मोनटा रे https://www.youtube.com/watch?v=99NUJ1cLbBI

In reply to by मैत्र

एक से एक गाणी .. मित्रा, या प्रतीसादतल्या झेब चे गाणे ऐकले .. आणी तिची अजून गाणी शोधली .. एक से एक सोल्फुल गाणी आहेत .. दरि, पश्तून अन ऊर्दू .. काहि आवडलेली गाणी .. पैमोने चल दिये https://www.youtube.com/watch?v=WY_LzIAG4gc&index=5&list=PL6NUCVkFuGKXo… बीबी सनम पुन्हा धन्यवाद मित्रा तुला अन धागाकर्त्याला ..हिच या वीकेंड्ची गीतबाधा ... - पहाटावारा

सोनु निगमने गायलेले "निन दिन दले " हे कानडी गाणे लक्षात राहिले आहे . चिक बक चिक रायले , आरारा नाका मुक्का , बंगार बोरी कट्टा वच्चंडी हे पापा घराना मोंगुडु ,कादल कसाटा , आनंदु ब्रम्हा गोविन्दु , झगड झगड जा अशी इतर गाणी आवडली होती . घर थकलेले सन्यासी , मनी माउचं , आनंद कंद ऐसा , या भवनातील गीत पुराणे हि मराठि गाणी व इतर अनेक मराठी गाणी आवडतात .

In reply to by सिरुसेरि

चिक बक चिक रायले , आरारा नाका मुक्का , बंगार बोरी कट्टा वच्चंडी हे पापा घराना मोंगुडु ,कादल कसाटा , आनंदु ब्रम्हा गोविन्दु , झगड झगड जा
ही स्गळी गाणी हिंदीत पण आहेत. वरिजिनल चिकपुकचिकरायले ह्यात प्रभुदेवाचा डॅन्स होता (जंटलमन) हिंदीत चिरंजीवी(दी जंटलमन), डुप्लिकेट चिकपकचिक राजाबाबू (राजाबाबू) नाक्कमुका, बंगार कोडी पेट्टा (लडकी है क्या, लाडला) आनंदु ब्रह्मा आणि जगड जगड (नागार्जुनचा शिवा)

पहिल्यांदा प्रेमात पडलो तेव्हा: शाम सवेरे तेरी यादें आती हैं - लकी अली. नॉनस्टॉप चालू होतं..... ६० दिवस, रोज दहा तास तरी. बाकीचे नंतर कधी. लेख आणि प्रतिसाद खूप आवडले. वाखू साठवली. :)

वरती सगळ्यांनी गाण्यांबद्दल लिहिलेच आहे मी जरा वेगळ्या गोष्टीबद्दल लिहिणार आहे. इंजिनिअरिंगला असताना मावशीकडे होतो पहिले वर्ष रहायला. तीघेही मावसभाऊ माझ्यापेक्षा मोठे. त्यांच्याकडे इंग्लिश रेकॉर्डसचा खजिना होता. एका रविवारी प्लेअरवरती एक रेकॉर्ड लावली आणि त्या ट्यूनला जो चिकटलो तो आजपर्यंत!! 'द गुड, द बॅड अँड द अग्ली" ची सिग्नेचर ट्यून होती ती! पहिल्यांदाच मी सलग दहावेळा ती ट्यून ऐकली नंतर रेकॉर्डलाच काहीतरी होईल का काय ह्या भीतीने बंद केली, पण संपूर्णदिवसभर दुसरे काहीही सुचत नव्हते. त्या एका ट्यूनवरती अख्खा सिनेमा तोललेला आहे! कधीही ऐका, कुठेही ऐका झपाटल्याखेरीज तुम्ही राहणार नाही. हाँटिंग हा एकच शब्द मला सुचतो!! क्लिंट इस्टवुड, ली वॅन क्लिफ आणि एली वॅलेच यांच्या कामाबरोबरच ट्यूनचा फार मोठा वाटा चित्रपटाच्या यशात आहे... (क्लिंट पंखा)रंगा

In reply to by चतुरंग

सगळी कृपा संगितसम्राट राजाधिराज महाराज एन्न्यो मारिकोने ह्यांची. दिग्दर्शकाच्या कमी बजेटचे च्यालेंज विलक्षण ताकदीने आणि कल्पकतेने स्विकारून साहेबांनी अलम दुनियेवर उपकारच केले आहेत. गुड बॅड मधलं सिग्नेचर ट्यून तर कोणत्याही प्रकारात आवडतेच आवडते. पण त्याहीपेक्षा त्यातलंच द एक्स्टसी ऑफ गोल्ड आणि डेथ ऑफ सोल्जर म्हणजे जबरदस्तच. ऑर्केस्ट्राचा वापर असा कोणी आणखी केला असेल तर खबर नाही. सुरावटी म्हणजे फक्त हृद्यावर कोरल्या जाणेच... त्यापेक्षा अजून काय लिहिणे.

शाळेत होतो. कधीतरी रेडिओ ऐकताना इश्क बिना आणि ताल से ताल मिला ही गाणी कानावर पडली. रेहमानचं संगीत आणि सोनू निगम, अलका याज्ञिक, उदित नारायण यांच्या आवाजामुळे या दोन गाण्यांनी अक्षरश: वेड लावलं. कॅसेट घेण्याएवढे पैसे जवळ नसायचे त्यामुळे दुरचित्रवाणीवर चित्रहार किंवा रंगोलीमधे जेव्हा कधी ही गाणी लागायची तेव्हा अगदी न चुकवता ऐकायचो. दहावीत असताना हृतिकचा कहो ना प्यार है आला न हृतिकबरोबर यातल्या सगळ्याच गाण्यांनी जवळपास सहा महिने पिच्छा पुरवला होता. त्यातही लकी अलीचा मदहोश आवाज असलेली इक पल का जीना आणि ना तुम जानो ना हम ही दोन्ही गाणी इतकी प्रचंड आवडली की, खाऊला मिळणारे पैसे साठवून तब्बल साठ रूपये किमतीची ऑडीओ कॅसेट जाऊन विकत घेतली. वॉकमनमध्ये कॅसेट टाकून कानात हेडफोन्स टाकायचो आणि तासन तास ही दोन गाणी ऐकत बसायचो, न कंटाळता!! बहुदा त्याच्या पुढच्याच वर्षी लगान आणि गदर हे दोन बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. त्यातल्या लगानमधील राधा कैसे ना जले या गाण्याने बाधलं. यावेळी तर रेहमानच्या जोडीला साक्षात आशाबाई! या चित्रपटाचीही कॅसेट आणून हे गाणे शंभर वेळा तरी ऐकले असावे. गदरमधील उत्तम सिंगने संगीत दिलेले उड जा काले कावा हे गाणेही आवर्जून नमूद करण्याजोगे. प्यार के साईड इफेक्ट्समधलं जाने क्या चाहे मन बावरा खूप वेळा ऎकलंय. खिडकीत बसून समोर धो धो कोसळणार्या पावसाकडे अंतरमूख होऊन पाहत असताना असंख्य वेळा हे गाणं ऎकलंय, एका नाजूकशा अलवार आठवणीसह. गायक नक्की कोण ते ठाऊक नाही, पण अखियन मेरे सावन चला म्हणत अगदी आर्ततेने कवीचे शब्द तो श्रोंत्यापुढे मांडतो. फार पूर्वी, कधीतरी डिसेंबरात आळंदीला माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी गेलो होतो. त्यावेळी रात्रीच्या भारलेल्या वातावरणात इंद्रायणीच्या तीरावर बसून पंडीतजींच्या अलौकिक स्वरातले इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे अभूतपुर्व गाणे खूप वेळ ऎकत बसलो होतो. त्यावेळी मिळालेल्या अनुभूतीची कशाशीही तुलना नाही. आत्ता गेल्यावर्षी आलेल्या नीळकंठ मास्तर चित्रपटातले अधिर मन झाले हे श्रेयाच्या आवाजतले गाणे आणि अजय अतुलचे संगीत यामुळे गाणं प्रचंड सुंदर झालं होतं. स्वतः सतत ऎकत होतोच, पण चांगले वाटले म्हणून काही मित्रांनाही आवर्जून ऎकायला देत होतो.

आख्ख्या धाग्याला प्रतिसादांसह मम! सध्या मोह मोह के धागे ने झपाटलं आहे.

झालं झिंग झिंग झिंग झिंगाट तुझ्या पिर्तीचा इंचु मला चावला रॉकस्टारमधली सगळीच कॉकटेल मधल तुम्ही हो बंधु सखा तुम्ही बोमरीलूमधलं बोम्मनू गीस्थे हे कधी काळी पाठ केलं होतं तू तेव्हा तशी उंबरठामधलं गंजल्या ओठास माझ्या सरनार कधी रण वेडात मराठे केतकीच्या बनी तिथे भय इथले संपत नाही मेरा कुछ सामान संदीपची सरीवर सर, कसे सरतील सये, मन तळ्यात अशी अनेक का कळेना, कधी तू मुंपुमुं मन धागा धागा दगडी चाळ मोह मोह के धागे, दर्द करारा पण सही आहे डोर मधलं ये हौसला झेहनसीब हँसी तो फँसी मैं रंग शरबतों का तेरी गलियां एक विलन मैं तेनु समझावा कि किती सांगायचय मला डबल सीट खेळ मांडला नटरंग माऊली माऊली

किशोरकुमारची गाणी ऐकायचा मूड लागला.. यूट्यूबवरती ज्यूकबॉक्स लावला..अमरप्रेमची नेहेमीची गाणी झाल्यावर अजनबी मधलं 'एक अजनबी हसीना से यूं मुलाकात' लागलं आणि झालं..सकाळपासून हेच गाणं डोक्यात घट्ट बसलंय, किमान पंधरा वेळा तरी ऐकून झालंय. https://youtu.be/4vLVJftqU9Q मुखडा तर सुरेख उचललाच आहे किशोरने पण पहिल्या अंतर्‍यातली 'निकल आया घटा से चांद' यातल्या "आया' या शब्दावर त्याने जी काही जीवघेणी जागा घेतली आहे त्यानं माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मन भरतच नाहीये ती जागा ऐकून..काळजातून आरपार सुरी जाते! __/\__

काही काही गाणी अशी काही डोक्यात रूतून बसतात की ती सततच आपल्यासोबत असतात, आणि मग त्यांच्यात फिरण्याचा मनाला चाळाच लागतो. असंच एक रूतून बसलेलं गाणं म्हणजे जुर्माना मधलं लताचं सावन के झूले पडे तुम चले आओ. अतिशय अफाट असं हे गाणं आहे. एकतर गाण्याची लय संथ आहे त्यामुळे गाणं एखद्या मैफिलीसारखं रंगत जातं. एखद्या नदिच्या वळणावळणाच्या पात्रागत गाणं पुढे सरकतं. लताबाईंचा आवाज एखद्या षोड्षेचा न वाटता एखद्या पुरंध्रीसारखा पक्व व पुष्ट वाटतो. ह्या काळात त्यांनी आणि पंचमसाहेबांनी काही अप्रतिम गाणी केली आहेत, जसं सनी मधलं जाने क्या बात है, नींद नही आती बडी लंबी रात है. लताबाईंच्या ह्याच आवाजाची जादू कल्याणजी आनंदजींनीसुद्धा दिल तो है दिल, दिल क ऐतबार क्या कीजे मधे अचूक पकडल्येय. अमिताभपटांना कल्याणजी आनंदजींनी मस्त संगीत दिलंय. पार यारी है ईमान मेरा पासून ते अपनी तो जैसे तैसे पर्यंत चांगली रेंज त्यांनी दिली,पण मला त्यांचं अतिशय रोमँटीक असं समा है सुहाना सुहाना, अतिशय ऊदास, खिन्न असं मेरा जीवन कोरा कागज आणि भक्तीरसाने ओथंबलेलं सुख के सब साथी दुख में ना कोई ही गाणी प्रचंड भावली. एकाच वाक्यात सांगायचं झालं तर अतिशय अचूकपणे मूड पकडलेल्या संगीत-रचना आहेत ह्या. समां है सुहाना मधला कोरस, मेरा जीवन कोरा कागज मधली भवनांचा कल्लोळ व विषाद दर्शविणारी सुरेल व्हायोलिन्स..विशेषतः पहील्या कडव्यानंतरचा जो व्हायोलिन्सचा तुकडा आहे तो खूपच जबरदस्त आहे. सुख के सब साथी मधे जो सुंदर भजनी ठेका पकडलाय त्याला तोड नाही. सोबत अतिशय गोड असे सतार, बांसरी चे तुकडे!!! एक अप्रतिम भजन वा भक्तीगीत. किशोरची गाणी आठवताना राजेश रोशनची दोन मस्त गाणी आठवतात एक म्हंजे तुमसे मिला था प्यार कुछ् अच्छे नसीब थे आणि दुसरं किशोरचं सोलो लेहेरों की तरह यादें...तूफान म्हटलंय राव किशोरनं गाणं!!! तसं लता किशोरचं खेळकर खट्याळ चांद चुराके लाया हूं चल बैठे चर्च जे पीछे गुणगुणायला खूप मजा येते. असंच अजून एक सत्तत आवडतं गाणं म्हणजे सरदार चित्रपटातलं तू कहीं है के नही, सामने आ..सामने आ...सामने आ. बाकी जुनी गाणी तर खरंच पोत्यानी आहेत...लता हेमंत चं शंकर जयकिशनच्या तरूण, ताज्या टवटवीत चाल व वाद्यरचनेने नटलेलं आ नीले गगन तले प्यार हम करें ऐकलं की थेट आपल्या प्रिये बरोबर चांदण्या राती डोंगरात गूज करतोय असंच वाटतं. त्यात खोल दरीतून वर यावेत असे लता व हेमंतचे गंभीर आवाज...शंकर जयकिशनचा सुरेख वादयवॄंद.....हे गाणं मला अजून दोन गाण्यांची आठवण करून देतं. पहीलं गाणं आकाशात चंद्र व आपण डोंगरात असल्याचा फील अगदी तंतोतंत देतं..हे आहे मदन मोहनचं चांद मध्यम है आसमां चूप है-रल्वे प्लॅट्फॉर्म. तोच नीरव शांततेचा भास, लताचा आवाजात तोच खोलावा, तीच शांतता...फक्त हे गाणं विषण्ण, दु:खी भाव व्यक्त करतं..साहिरने पण कमाल केल्येय..दूर वादी में दुधिया बादल, झुक के पर्बत से प्यार करते है| दिल में नाकाम हसरते लेकर हम तेरा इंतजार करतें है....ह्या गाण्यावर मन जातं ते अण्णा चितळकरांच्या मेंडोलिन व व्हायोलिन्सवर बसून परत लता हेमंत कडेच...शतरंज मधलं बदली मे छुपे चांद ने कुछ मुझसे कहा है..विशेषतः मधल्या कडव्यांचं तर फारच साम्य आहे. तीनेही गाण्यात तीच शांतता, तीच रात्र, तोच गोडवा......रात्र, चंद्र म्हटलं की एक फार फार नाजूक गाणं अलगद आठवतं...डिटेक्टीव्ह मधलं लता हेमंत चं मुझको तुम जो मिले ये जहं मिल गया...ऊफ्फ्फ्फ कसलं नाजूक गाणं आहे..हेमंत गीताच्या आवाजातला गोडवा आणि प्रेम अगदी घायळ करून जातं..दोघांनाही गुणगुणायला व तना घ्यायला फार छान सुरावटी दिल्या आहेत....परत अचान्क अण्णा रामचंद्र आठवतात बारिश मधलं फिर वो ही चांद वो ही हम वो ही तनहाई है आणि आ गया मजा प्यार का नशा ही त्यांनीच अनुक्रमे लता व आशा बरोबर गायलेली द्वंद्वंगीते. रात्रीसाठी हमखास आठवणारी अजून काही गाणी म्हणजे कहीं तो मिलेगी कभी तो मिलेगी बहारों की मंजिल राही, अब क्या मिसाल दूं मै तुम्हारे शबाब की आणि केवळ केवळ जादू असं बार बार तोहे क्या समझाए पायल की झनकार..(तिनही आरती मधील)लता रफी खरंच डेडली काँबो आहे.अधे मधे आशाबाई पण डोकावतात...महेंद्र कपूर बरोबरचं हाथ आया है जबसे तेरा हाथ में हे केवळ आशाबाईंचच गाणं आहे. काय मस्त भाव पकडलेत त्यांनी!!! मदन मोहन कडे त्यांनी व रफी साहेबांनी कभी तेरा दामन ना छोडेंगे हम हे अगदी टेचात म्हटलंय!! आशबाईंचं अजून एक गोड गणं म्हणजे झुका झका के निगाहे मिलाए जाते है हे मिस कोका कोला मधलं मुकेशसोबतचं गाणं, आणि तलत सोबत म्हटलेलं अगदी नाजूक नाजूक दो दिल धडक रहे हैं और आवाज एक है.तलतच्या नाजूक आवाजाला अगदी चोख साथ दिली आशाबाईंनी...त्याच दोघांचं रेशमी रूमाल मधलं मस्त आंखें है के पैमाने दो व मन्नादां सोबत म्हटलेलं जुल्फोंकी घटा लेकर सावन की परी आई कसं विसरता येईल?? ह्याच चित्रपटात मुकेशचं गर्दीश मे हो तारे ना घबराना प्यारे पण आहे आणि तलतचं ऑल टाईम ग्रेट जब छाए कभी सावन की घटा......शकीला ही नायिका ह्या चित्रपटातली..तिला पाहून मला का कोण जाणे सुरैय्या आठवते आणि सुरैय्या म्हटलं की एकामागे एक गाणी आठवतात..ओ दूर जानेवाले, तेरी नजर मै मै रहूं आणि माझी सदाहरीत गाणी...ये कैसी अजब दास्तां हो गई है, बिगडी बनानेवाले आणि वो पास रहे या दूर रहे, नजरों में समाए रेहेते है,इतना तो बताए कोई हमें क्या प्यार इसी को केहेते है...ह्या गाण्याचं गारूड पुढच्या जन्मातही ऊतरणार नाही. सुरैय्या बरोबरच नूरजहांची दोन गाणी आठवतात..मिर्झा साहिबां मधील, क्या येही तेरा प्यार था आणि हाथ सीने पे जो रख दो तो करार आ जाए....ही दोनच गाणी गाऊनही ती ग्रेट ठरली असती. आणि कितीतरी आहेत...तलत तर मनातच असतो....कधी सोडून जातच नाही.....आज खूप दिवसांनी अनेक गाणी आवर्जून परत ऐकली. धागाकर्ता व प्रतिसादकांचे आभार.

जे माझ्या मनात होते , तेच येथे शब्दात वाचावयास मिळाले. यादी करणे कठीण आहे. काही काही गाण्यांकडे , यापूर्वी आपले लक्ष कसे गेले नाही याचेच मलाच नवल वाटत राहाते, आणि त्याच गीताची बाधा होवून , दिवसभर छळते. " : उन्हें ये ज़िद थी के हम बुलाते हमें ये उम्मीद वो पुकारें है नाम होंठों में अब भी लेकिन आवाज़ में पड़ गई दरारें " आणि ' घन ओथंबुन आले , पिकात राघु ओगिरती " "कसा सुर्य अंधाराच्या, वाहतो पखाली " छे छे , यादी करणे कठीणच आहे , मनातच ठेवतो.