✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत

र
राजेश घासकडवी यांनी
Sat, 12/19/2015 - 21:12  ·  लेख
लेख
'नावात काय आहे? गुलाब कुठल्याही नावाने तितकाच सुंदर दिसेल.' असे शेक्स्पीयर म्हणून गेला आहे. पण नावांमध्ये बरेच काही असते. आपण संकल्पनांना नावे देण्यासाठी शब्द वापरतो. या शब्दांचा आपल्या विचारांवर, त्यांच्या मांडणीवर आणि त्यामुळेच आपल्याला जग कसे दिसते यावर प्रचंड परिणाम होतो. आपल्याला पडणारे प्रश्न आपण भाषेतच मांडतो, आणि त्या प्रश्नांच्या आकलनावर आणि आपल्या उत्तर शोधण्याच्या पद्धतीवर शब्दांच्या मर्यादा पडतात. त्यामुळे अनेक संकल्पना त्यांना दिलेल्या नावांच्या खोक्यांत बंदिस्त होतात. याचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे सजीव आणि निर्जीव, किंवा सचेतन आणि अचेतन या कल्पना. सजीवांसारख्या सुंदर, क्लिष्ट, वैविध्यपूर्ण 'रचना' शून्यातून कशा निर्माण होऊ शकतील हा सर्वांनाच प्रश्न पडतो. आणि तसा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, कारण दगडासारख्या निर्जीव वस्तू या समजायला आणि तयार व्हायला सोप्या असतात. ज्वालामुखीचे उद्रेक, भूकंप, पाऊस-वारा या पंचमहाभूतांना आता आपण सजीव मानत नाही. त्यांतून तयार होणाऱ्या वस्तू आणि घडणारे बदल आपल्याला काहीतरी नियमांनुसार समजून घेता येतात. दगड हे अशाच सर्वसाधारण, नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. पण निर्जीवापासून सजीव नैसर्गिक प्रक्रियेने कसे निर्माण होऊ शकतील? निर्जीव आणि सजीव हे तर परस्परविरोधी शब्द आहेत. त्यांच्या अध्येमध्ये काही नाही. वाळू निर्जीव - कुत्रा सजीव, पाणी निर्जीव - हत्ती सजीव हे इतके सरळसाधे आहे. या दोन काळ्या-पांढऱ्या कल्पनांमध्ये कुठेच राखाडी छटा नाहीत. मग अचेतनापासून सचेतन काहीतरी होईलच कसे तयार? किंबहुना याच ध्रुवीकरणातून 'सजीव हे वेगळ्याच कुठच्यातरी पदार्थाचे बनलेले असतात' किंवा 'त्यांच्यात कार्य करणारी काही एक वेगळीच शक्ती असते' अशा प्रकारचा युक्तिवाद 'प्राणवाद' (व्हायटॅलिझम) म्हणून प्रसिद्ध होता. आता आपल्याला माहीत आहे की आपण सगळेच नैसर्गिक मूलद्रव्ये आणि रेणूंपासून बनलेलो आहोत - बहुतांशी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून. पण तरीही ही द्वैती विचारसरणी पूर्णपणे टाकून दिलेली नाही. रेने देकार्तचा द्वैतवाद - शरीर व मन हे दोन वेगवेगळे भाग आहेत असे म्हणतो. अजूनही आपण शरीर आणि आत्मा अशी विभागणी करतोच. शरीर म्हणजे अवयव आणि आत्मा हा त्यांचे नियंत्रण करणारा आपला 'स्व'. आपल्या डोळ्यासमोर असलेल्या स्वतःच्या उदाहरणामुळे सजीव हे 'स्व'ची जाणीव असलेले असतात हे कुठेतरी गृहित धरतो. त्यामुळे सजीव आणि निर्जीव यांमध्ये जमीन आस्मानाचं, न ओलांडता येणारे अंतर आहे असे आपल्याला सहज पटते. मग जड, स्थिर पदार्थापासून चालतेबोलते, श्वास घेणारे, विचार करणारे प्राणी तयार होणे शक्यच नाही असे वाटणे साहजिकच आहे. मग या कोड्याचे उत्तर शोधायचे कसे? अचेतनाच्या सपाटीपासून सचेतनाच्या कड्यावर उडी कशी मारायची? निर्जीवतेच्या निबिड काळ्या अंधारापासून सजीवतेच्या प्रकाशापर्यंत पोचायचे कसे? याचे उत्तर शोधण्याआधी प्रथम आपण या प्रश्नाच्या मर्यादा समजून घेऊ. अचेतन आणि सचेतन हे दोन शब्द आपल्या विचारांवर बंधन घालतात. आणि जगात दिसणारी प्रत्येकच वस्तू आपल्याला या दोन खोक्यांपैकी एकात घालायला भाग पाडतात. बदलणारी अक्षरे या चित्रामध्ये दोन अक्षरे "अ" आणि "स" दाखवलेली आहेत. त्यातल्या मधल्या आकृती ह्या अधल्यामधल्या अवस्था आहेत. मुळातच त्या दोन अक्षरांमध्ये साम्य असल्यामुळे ही चित्रे काढणे मला तितके कठीण गेले नाही. अ च्या उजवीकडे गेलो तर पहिल्या काही दोन निश्चितपणे अ वाटतात. मधली आकृती अर्धवट अ वाटते. तसंच स पासून डावीकडे गेलो तर होते पण मधली आकृती अर्धवट स वाटते. बहुतेकांना यात तीन अ, तीन स व एक त्यामधले काहीतरी असे दिसते. (काही लोक तीन अ व चार स म्हणतील) इथे डावीकडून उजवीकडे "अ"पण हळू हळू कमी झालेले आहे व "स"पण वाढलेले आहे या क्रमिक स्वरूपात मांडल्या आहेत. जर तुम्हाला मी या आकृत्या या क्रमाने न दाखवता मधूनच उचलून एक एक करून दिली असती तर तुम्हाला हे लक्षात आला असते का? तुम्हाला हो असे खात्रीने वाटत असेल तर इतर अक्षरे झाकून फक्त डावीकडून दुसर्‍या अक्षराकडे पहा व म्हणा "हा थोडासा स आहे" (१/६ स +५/६ अ)- तुमचे मन त्याला हे बरोबर नाही असे म्हणेल. आपण प्रत्येक आकृतीसाठी आपण अ आहे का? स आहे का? या प्रश्नाची हो किंवा नाही अशी डिजिटल उत्तरे शोधतो. आणि त्यांचे दोन गठ्ठे करून ते दोन खोक्यात भरतो. या खोक्यांच्या द्वारे विचार केल्यामुळे आपल्याला हळुवार फरक दिसत नाही. या खोक्यांमधून आपण जेव्हा सजीवांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या आसपास दिसणारे कुत्रा, मांजर, गायी, बैल, हत्ती, वनस्पती असतात. किडे-मुंग्यांनाही आपण सजीव म्हणतो. पण हे झाले आपल्या डोळ्यांसमोर दिसणाऱ्या सृष्टीबद्दल. जीवाणू सजीव आहेत का? अमीबा सजीव आहे का? अमीबा निदान एक पेशी तरी आहे - आणि आपल्याला माहीत असते की इतर सजीवही पेशींनी बनलेले असतात. मग निव्वळ काही हजार अणूंचा समूह असलेल्या विषाणूंचे काय? त्यांना आपण सजीव म्हणावे का? त्यांना सजीव म्हटले तर पंचाइत येते, कारण प्रयोगशाळेत असे विषाणू तयार केले गेले आहेत. ते जर योग्य पेशींमध्ये सोडले तर आपल्या प्रतिकृती तयार करतात - म्हणजेच सजीवांप्रमाणे कार्य करतात. मग सचेतन आणि अचेतनात नक्की फरक काय? माणूस-कुत्रा वगैरेंसारखे बुद्धिमान जीव, किडे-मुंग्यांसारखे काहीसे यांत्रिक जीव, वनस्पतींसारखे मेंदूही नसलेले जीव, ऑक्सिजनशिवाय जगणारे जीव अशा सर्व सजीवांना सामावून घेऊ शकेल अशी नक्की व्याख्या काय? हालचाल करणे, श्वास घेणे, विचार करणे, पाहाणे या सजीवांच्या क्रिया असतात. पण यातले नक्की एक काहीतरी बोट ठेवून खात्रीने म्हणता येत नाही की हे सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण. हालचाल यंत्र करतात, काही सजीव श्वासोच्छ्वास करत नाहीत, अनेक सजीवांना अवयव नसतात. पण एक गोष्ट सर्व सजीव निश्चित करतात. ती म्हणजे पुनरुत्पादन. अनुकुल परिस्थिती मिळाली तर परिसरातून कच्चा माल मिळवून आपल्यासारखीच दुसरी प्रतिकृती करण्याची क्षमता असणाऱ्यांना आपण सजीव म्हणतो. पुनरुत्पादन हेच सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. एकदा पुनरुत्पादनावर लक्ष केंद्रित केले की मग आपल्याला अचेतन आणि सचेतन यांच्यातली दरी नाहीशी करता येते. कारण या प्रकारचे 'पुनरुत्पादन' अगदी सोप्या स्वरूपात आपल्याला निर्जीवांमध्येही दिसते. उदाहरणार्थ मीठ. मीठाचा एक रेणू म्हणजे सोडियम आणि क्लोरीनचे एकमेकांना चिकटलेले अणू. जेव्हा मिठाचे द्रावण सुकते, तसतसे सोडियम आणि क्लोरीनचे पाण्यात विरघळलेले आयन एकत्र येतात. इतर तसेच आयन त्यांना चिकटत जातात. आणि हळूहळू मिठाचा स्फटिक वाढत जातो. याला अर्थातच आपण रूढ अर्थाने पुनरुत्पादन म्हणणार नाही. कारण नवीन तयार झालेली प्रतिकृती तिथेच चिकटून राहाते. आणि ती नवीन प्रतिकृती तयार करते. म्हणजे मिठाला मेंदू आहे, आणि ते ठरवून तशा प्रतिकृती तयार करते असा अर्थ नाही. किंबहुना पुनरुत्पादनाची ही अत्यंत सोपी, जुजबी अवस्था आहे. मिठाऐवजी आपल्याला जर वेगळ्या प्रकारच्या रेणूची कल्पना करता येईल. यात, प्रतिकृती तयार झाल्यावर ती मूळ 'पालका'पासून सुटी होते. आता बाहेरचे रेणू घेऊन हे दोन्ही रेणू प्रतिकृती तयार करू शकतात. आता एकाचे दोन, दोनाचे चार असे करत संपूर्ण क्षेत्र त्याच रेणूने व्यापले जाऊ शकेल. आता काही कारणाने या रेणूंभोवती एक साधंसे कवचसदृश काही तयार झालं, तर आपल्याला पहिली जुजबी पेशी मिळेल. ही प्रक्रिया जर काही कारणाने अधिकाधिक क्लिष्ट झाली तर आपल्याला सजीव आणि निर्जीव; सचेतन आणि अचेतन अशी काळ्यापांढऱ्या स्वरूपाची विभागणी टाळून अचेतनाच्या अ पासून ते सचेतनाच्या स पर्यंत चढत्या भाजणीने जाणारी मालिका दिसेल. आणि मग आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास होऊ शकतो ही कल्पनातरी करता येईल. थोडक्यात, ज्या संकल्पनांचा विचार आपण "असते/नसते" अशा काळ्या पांढऱ्या स्वरूपात करतो त्या बऱ्याच वेळा मधल्या अवस्थांना नाव न दिल्याने आपण या किंवा त्या खोक्यात टाकलेल्या असतात. हे चुकीचे आहे असे नाही - कारण तशी वर्गवारी करणे उपयुक्त असते. फक्त आपण ते करतो आहोत याचे भान विसरता कामा नये. कारण जेव्हा एका स्थितीचा दुसऱ्या स्थितीत बदल होतो तेव्हा त्या मधल्या अवस्थांचाच विचार करावा लागतो. साध्या रेणूंपासून ते विचार करणाऱ्या जीवांपर्यंतचा प्रवास बघायचा असेल, तर मधल्या अवस्था महत्त्वाच्या ठरतात. "जडतेला मना मनाचा पोत" कसा आला हे पाहायचा असेल तर... "अ"चेतनाचा "स"चेतन कसा झाला हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला हे निरुपयोगी खोके तोडून टाकले पाहिजेत व खोक्याच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे. (मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

Book traversal links for विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत

  • ‹ विश्वाचे आर्त - भाग ६ - जंबोजेट दृष्टान्त
  • Up
  • विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
17899 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

आइन्स्टाइनने हे कुठे

राजेश घासकडवी
Tue, 12/22/2015 - 10:13 नवीन
आइन्स्टाइनने हे कुठे म्हटल्याचा उल्लेख नाही. त्याने म्हटलेलं जवळातलं जवळचं विधान असं आहे It can scarcely be denied that the supreme goal of all theory is to make the irreducible basic elements as simple and as few as possible without having to surrender the adequate representation of a single datum of experience. त्याच्या या विधानात अर्थातच ऑक्कॅमचा रेझर अपेक्षित आहे. ते रॉजर सेशन्स नावाच्या एका कंपोझरने 'सिंपल' करून everything should be as simple as possible, but not simpler असं म्हटलं :) संदर्भ - http://quoteinvestigator.com/2011/05/13/einstein-simple/. पण लोकांना हे सिंपलर व्हर्जनच आवडतं बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

भावनाओं को समझो…

sagarpdy
Tue, 12/22/2015 - 11:15 नवीन
भावनाओं को समझो…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

स्वत:च्या अस्तित्वाची काळजी

नगरीनिरंजन
Tue, 12/22/2015 - 05:29 नवीन
स्वत:च्या अस्तित्वाची काळजी घेणारे व त्यासाठी आवश्यक ते करणारे (त्यात स्वत:च्या बुद्धीची फसवणूकही आली) जीवच नैसर्गिक निवडीत टिकतात. त्यामुळे बहुतेक डिनायल मोड मधल्या किंवा माणसाचं अस्तित्व काहीतरी विशेष आहे असे दामटून सांगणाऱया प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले नाही. ऊर्जेचा पुरवठा वाढता राहिला नाहीतर यीस्ट सारखीच मानवी नागरसंस्कृतीची अवस्था होते आणि होणार या साध्या तत्त्वाच्या डिनायलमागेही हेच कारण आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा