चिठ्ठी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
" चहा हवा असेल तर साखर घेऊन या राजे " आईने ने आज्ञा सोडली . तसा मी लगेच निघालो हि , चहा साठी काय पण . गल्लीच्या कोपऱ्यावर दुकान. नेहमीप्रमाणे गर्दी होतीच . कशाला उगाच गर्दीत शिरा.गर्दी जरा कमी झाली कि दुकानदार आपणच सांगेल . त्याला किलोभर साखर बांधायला सांगितली . आणि बाजूच्या कट्ट्यावर उभा राहिलो . तसा हि वेळच काढायचा होता . हे दुकान म्हणजे रोजच्या गावभारातल्या बातम्या मिळवण्याचं सर्वोत्तम ठिकाण. नेहमीची मंडळी होतीच आजूबाजूच्या गल्लीतली . मला बघितल्या बघितल्या बाळ्या हसला .
"काय नाना , लई दिस खटे दिसला नैसाय ! "
व्हय. कामाची वेळ ठरलेली नसते गा . कदी ६लाच येताव , कदी १२ वाजत्यात - मी
पैश्यासाटनं करूस पैजेच कि गा . पगार देत्यात न्हवं टाइमवर ? - बाळ्या
देत्यात कधी . कधी ३-४ दिवस हिक्डी तिकडी होताय . पैसा मिळतंय खरं . - मी
"तेच म्हत्वाचं देवा . पैसा पैजेच बग नाना . " एवढं बोलून खाली मान घालून गप्प बसून राहिला .
मला नाना म्हणायचं कारण म्हणजे . माझे आजोबा, गावाभरातल्या सगळ्यांसाठी सगळं केलं . कोणाचं रेशन कार्ड मिळवून दे , कि गावच्या टोकापर्यंत बस येउदे म्हणून सगळ्यांना गोळा करून KSRTC ऑफिस वर मोर्चा काढून बस चालू कर . लोकांना रॉकेल मिळेना म्हणून कुठून तरी आपल्या पैश्याने शे दीडशे लिटर विकत आणून ते गरिबांना फुकट वाट . विनोबा , गांधी आणि संघ . अश्या सगळ्या विचित्र मिश्रणातून तयार झालेली हि पिढी . स्वतःचं घर गहाण जाई पर्यंत आणि त्यानंतर हि फक्त मदत करत राहायचं . हेच याचं आयुष्याचं ध्येय .
या अश्या नानांबरोबर मी कायम हिंडायचो . मी हिंडायचो म्हणण्या पेक्षा ते घेऊन जायचे . वाड्याच्या कुठल्याही टोकाकडून "आदित्य , चल जरा बाहेर जाऊन येऊ" असा त्यांचा पक्का खर्ज्याताला आवाज घुमला, कि आदित्य तयार . मग जसं ते मागे हात बांधून चालतील तसं आपणही चालायचं . त्यामुळे ते असताना सगळी मंडळी मला छोटा पर्बकार म्हणणार किंवा नाना . आणि ते गेल्यावर मग मलाच नाना .
तर असो . विषय बाळ्याचा होता . नाना आठवले . राहवलं नाही . बोटं मोडून घेईन तेवढ्या श्रीखंडाच्या गोळ्या , असा हिशोब करणारे नाना . तर , असोच .
विषय ,बाळ्याचा होता .
तो गप्प बसलेला बघून मीच म्हणालो . . " अण्णा , राजा फास लावला म्हणे . काय झालं हो? गाडी घेऊन दिलेला नवे? खुश दिसत होता परवा तर ! "
बाळ्या - व्हय . माझंच नशीब गांडू . मोट्टा मुलगा म्हणून लाड केलो , डोक्यावरून चढून बसला होता भूस्नाल्या, तेला कोणती गोष्ट नाही म्हणालो नाही . तीच चूक केली बग जीण्यात . ल्हान होता तवाच जरा नकार ऐकायची सवय लाव्लो असतो . आज असं झालं नसतं . . "
मी - जे व्हायचं ते होऊन गेलं अण्णा , त्रास होतंय खरं . अजून लहान मुलगा आहे . आपल्या त्रासात त्याच्यावर दुर्लक्ष नको करू . तो सांभाळेल सगळं नीट . हुशार पण आहे , पण एकदम फास का लाऊन घेतला ? "
बाळ्या - हे पैल्यांदा न्हाई . तुज माहिती हैच कि सगळं . मोबाईल पैजे म्हणून हात कापून घेत्लन . मग त्याच कॉलेज मध्ये पाहिजे नाहीतर परत हात कापतो म्हनला . कर्ज काढून डोनेशन भरलो . आता गाडी पीजे म्हणून एकदा फासाचा पर्योग झाला . मिया जीवाला घाबरून गाडी घेऊन बी दिली . पर एक रेष पार झाली नाना तेव्हा . गाडी दिली . पण देताना संगीत्लो . आता जे काही पाहिजे ते स्वतः कमवून घे . शिकव्लाव पाहिजे तेवढं . ह्येची आई खंगली गा हे असलं बघून .
परवा लाख रुपेय दे म्हणाला . कशा साटनं ते बी संगीना. बाई बी म्हाएरी गेली व्हती . ऐकेचना पोर . माज्या समोरच फास लावला गा . गळ्यात दोर अडकून म्हणाला . पैसे दे न्हाई तर खुर्ची लाथाडतो . माजं बी डोस्क फिरलं . मीच काढली खुर्ची . अन हातात ठेवली चिट्टी लिवून .
" आजपर्यंत आयुष्यात आई बापाला त्रास देण्याशिवाय काही करू शकलो नाही . यापुढे हि काही करू शकणार नाही , जगण्यास काहीच अर्थ नाही , त्यामुळे फाशी लाऊन घेतोय . कोणासही जबाबदार धरू नये "
हि असली गांडू औलाद असण्यापेक्षा नसलेली बरी . जे मागेल ते सगळं हातात देऊन पण काही करू न शकणारा मुलगा असेल तर काहीच अर्थ नाही रे नाना . तू म्हणलास ते बरोबर . छोटा लई हुशार आहे . एक गोष्ट स्वतःहून मागत नाही . आम्ही जे दिल त्यात सुख मानताय . बारावीला फस्क्लास काढतो म्हणतोय . आता चैत्रात परीक्षा झाली . कि सगळं तेच्या नावावर टाक्तु . आणि पोलिसात जातु . ह्यो मोठा , ज्याने जीव भरला त्यालाच धमकी देत हुता सुळ्या लेकाचा .
तेवढ्यात दुकानदार ओरडला .
"मालक . साखर बांधलिया . तीस रुपये देवा . "
प्रतिक्रिया
व्वा
जबरदस्त कथा!
सुरेख
चान्गलं फ्क्त
Pagination