तांत्रिक रात्रिसूक्तम् (भाग-१)
॥ तांत्रिक रात्रिसूक्तम् ॥ (भाग-१)
श्री दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराणांतर्गत येणारा हिंदु धर्मशास्त्रातील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ. दुर्गा सप्तशती किंवा नुसता सप्तशती हा शब्द ज्याने ऐकला नाही, असे हिंदु फार कमी असतील. आज श्रीमद्भग्वद्गीतेपेक्षा देखील फार मोठ्या प्रमाणात या ग्रंथाची उपासना होते. महर्षी मार्कंडेयांनी या दिव्य, प्रासादिक ग्रंथाची रचना केली. त्यावेळीस ते नाशिकमधील वणी येथील मार्कंडेय पर्वतावर साधना करीत होते व त्यांचा हा पाठ श्री भगवती लक्षपूर्वक ऐकत होती, असा पुराणांत उल्लेख आहे. त्यामुळेच श्री सप्तशृंगी देवीची मूर्ती काहीतरी लक्षपूर्वक ऐकत असल्यासारखी दिसते.
या सप्तशती ग्रंथामध्ये रात्रिसूक्त, शक्रादी स्तुती, देवीसूक्त आणि नारायणी स्तुती या अत्यंत महत्वपूर्ण व श्री भगवतीला अत्यंत प्रिय अशा ४ स्तुति समाविष्ट आहेत. त्यापैकी रात्रिसूक्त या प्रथम स्तुतीची आपण आज ओळख करून घेणार आहोत. ओळख हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. कारण मी काही कुणी अंतिम अधिकारी सत्पुरुष नाही जो यावर अधिकारवाणीने बोलू शकतो. मला माझ्या वाचनातून, चिंतनातून, समजशक्तीतून, अनुभवांतून जो काही बोध झाला तो तुमच्यापुढे ठेवत आहे. जर तुमच्यापैकी कुणी यावर अजून काही प्रकाश टाकू शकत असेल तर मला अतिशय आवडेल. कदाचित काही ठिकाणी मला स्पष्ट करायला जमलं नसेल, काही ठिकाणी चुकलं देखील असेल, अशा वेळीस कृपया आपण स्पष्ट करून सांगितलं, काही मदत केली, सूचना दिल्या तर खूप आवडेल.
हे रात्रिसूक्त दुर्गा सप्तशतीच्या प्रथम अध्यायात श्लोक क्रमांक ७० ते ८७ (गीता प्रेस, गोरखपूर आवृत्तीप्रमाणे, अन्य अनेक आवृत्त्या आहेत व त्यात थोडीफार भिन्नता आढळते)मध्ये समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे आणखी एक वैदिक रात्रिसूक्त म्हणून ऋग्वेदात आहे. परंतु ते येथे अपेक्षित नाही. आज सर्वाधिक प्रचलित असणारे सूक्त म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथांतर्गत येणारे सूक्तच होय. त्यालाच तांत्रिक रात्रिसूक्त असेही नाव प्रचलित आहे. कारण एकूणातच श्री भगवतीची उपासना प्रामुख्याने तंत्रमार्गाने केली जाते, आणि रात्रिसूक्त तर अशा प्रयोगांतील एक महत्वपूर्ण भाग आहे. असो, आता या रात्रिसूक्तामागील मुख्य कथानक काय आहे ते पाहू या.
पौराणिक कथाः- कल्पाच्या शेवटी, सृष्टीच्या महाप्रलयाच्या वेळीस विश्वाचे पालनकर्ता भगवान विष्णु क्षीराब्धीमध्ये अनंत नामक शेषावर निद्राधीन झाले, तेव्हा त्यांच्या कर्णमलातून मधु व कैटभ हे दोन असुर उत्पन्न झाले. त्या असुरांनी विष्णुंच्या नाभीकमळातील ब्रह्मदेवास पाहिले, तेव्हा त्याला मारून टाकण्याच्या हेतूने ते दोघे आपली शस्त्रे परजीत त्यांच्यावर धावून गेले. हे पाहून घाबरलेल्या ब्रह्मदेवाने भगवान विष्णुंना निद्राधीन करणा-या योगनिद्रेचे स्तवन सुरु केले. हेच ते १५ श्लोकांचे प्रसिद्ध रात्रिसूक्त होय. या स्तुतिमुळे प्रसन्न झालेल्या योगनिद्रेने भगवान विष्णुंची मायेच्या आच्छादनातून मुक्तता केली. तेव्हा जागे झालेल्या ईश्वराने मधु व कैटभ यांच्याशी पाच सहस्र वर्षेपर्यंत युद्ध केले. परंतु ते दोघेही असुर त्याला दाद लागू देईनात. तेव्हा महामायेने त्यांना आपल्या मायाशक्तीने भ्रमित केले. मग त्या दोघांनी भगवान विष्णुंना “तुझा पराक्रम पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, तुला जो इच्छित वर असेल तो माग” असा शब्द दिला.
तेव्हा भगवान विष्णुंनी त्यांना, माझ्या हातून तुम्हाला मृत्यु येऊ दे, असा वर मागितला. तेव्हा जलमय असलेली पृथ्वी पाहून, जेथे पाणी नसेल तेथे आम्हाला मार, असा त्यांनी वर दिला. तेव्हा भगवान विष्णुंनी तत्काळ त्यांना स्वतःच्या मांडीवर घेऊन स्वचक्राने त्यांचे शिर छेदून टाकले.
गूढार्थः- इथे भगवान विष्णु जीवाच्या मायेने आवृत्त अवस्थेचे प्रतीक आहेत. तर मधु व कैटभ म्हणजे नाम व रूपात्मक माया होय. (कर्णमलात ते उत्पन्न होतात याचा अर्थ इतकाच घ्यावयाचा की, आपली पंच कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये ही सातत्याने बाहेरून मिळणा-या stimuli (याला योग्य मराठी प्रतिशब्द सुचवा) किंवा प्रलोभनांमुळे आपल्या सच्चिदानंद स्वरूपाशी संपर्क करण्याच्या आपल्या प्रयत्नांत मोठाच अडथळा निर्माण करतात. एक सोपे उदा. म्हणजे सकाळी जप करायला तुम्ही बसलात आणि अचानक कुणीतरी मोठ्या आवाजात गाणी लावली तर ५ मिनिट देखील तुम्ही शांत बसू शकणार नाही. अशा वेळेस त्या आदिमायेलाच आळवणी करावी लागते की माझे प्रयत्न अपुरेच पडणार, तूच मला आता आधार दे.) ही माया किंवा अविद्या जीवातील परब्रह्माला आवृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हां दुर्बल जीवाने या मायेच्या साम्राज्ञीचा केलेला धावा म्हणजेच रात्रिसूक्त होय.
1) ॐ ब्रह्मोवाच -
ब्रह्मदेवाने स्तुती आरंभ केली.
इथे ब्रह्मदेव म्हणजे कुणी देवता अपेक्षित नाही, तर मायेच्या साम्राज्यातील संकटे, अडचणी व दुःखांनी गांजलेला जीव अपेक्षित आहे. या जीवाने श्री भगवतीला अशा आणीबाणीच्या प्रसंगी मारलेली हाक म्हणजे रात्रिसूक्त.
2) विश्वेश्वरीम् जगद्धात्रीम् स्थितीसंहार कारिणीम् ।
स्तौमि निद्राम् भगवतीम् विष्णोरतुल तेजसः ॥
“विश्वाची स्वामिनी, जगाची उत्पत्ती, स्थिती व संहार करणारी, भगवान विष्णुंच्या अतुलनीय अशा त्या तेजस्वी निद्रेचे मी स्तवन करतो.”
विश्व - जड आणि जीव यांचे अस्तित्व असो किंवा नसो, तरीदेखील अस्तित्वात असणारी प्रचंड अथांग प्रकाशहीन पोकळी, तिची स्वामिनी ती विश्वेश्वरी.
जगद्धात्री - आपण पाहतो त्या जड व चैतन्याने युक्त अशा जगाची उत्पत्ती करणारी
स्थिती संहार कारिणी - जेव्हा परब्रह्म मायेने मोहित असते तेव्हाच जगताची धारणा टिकून राहू शकते, म्हणून एक प्रकारे तीच विश्वाची स्थिती टिकवायला कारणीभूत आहे. तसेच जेव्हा परब्रह्म अविद्येच्या आवरणातून बाहेर येते तेव्हा आपोआपच पंचमहाभूतात्मक विश्वाचा नाश होतो. म्हणून संहारकारिणी.
आता येथे कुणी प्रश्न विचारेल की, जर अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय? त्याला माझे उत्तर असे, की काही झालं तरी शेवटी सर्वांनाच, पुण्यवान आणि महापापी, दोघांना देखील त्याच ठिकाणी परत जायचे आहे, तर त्याला कारणीभूत घटना हा महत्वाचा निकष होऊ शकत नाही. हां, आता येथे कुणी असे म्हणेल की सर्वांना परब्रह्माकडेच परत जायचे आहे तर मी एखाद्याचा खून केला तर काय बिघडेल? अशा माणसाला प्रश्न करावा की त्याच न्यायाने पहिले तुला मारले तर चालेल काय? म्हणूनच बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने Golden Rule सांगितलेला आहे की, लोकांनी तुमच्याशी जसं वागावं अशी तुमची इच्छा आहे, तसंच तुम्ही देखील त्यांच्याशी वागावं.
स्तौमि - मी स्तुति करतो
निद्रां भगवतीं – या देवतेला भगवान विष्णुंची योगनिद्रा म्हटलेलं आहे. निद्रा याचा अर्थ जेव्हा परब्रह्म मायेने मोहित असते तेव्हां ते आपोआपच आपल्या ईश्वरत्वाविषयी निद्रिस्त असते, तर जेव्हां मायेपासून मुक्त असते तेव्हां आपोआपच नामरूपात्मक जगताविषयी निद्रिस्त असते. उदाहरण म्हणजे सामान्य मनुष्य मायेने भ्रांत परब्रह्म असल्याने तो प्रपंचात अगदी रममाण असतो. दुःख, आजारपण, वेदना, मृत्यु, विषमता इ. जगातील कटकटी समजून देखील तो जगाला घट्ट चिकटून बसतो. त्याच वेळेस रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे सत्पुरुष मात्र या भ्रामक जगातून स्वतः बाहेर पडतात आणि इतर अनेक लोकांनाही त्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवतात. तर अशा या योगनिद्रेचे सर्वात सुस्पष्ट रूप म्हणजे नवदुर्गांपैकी सप्तमी दुर्गा भगवती श्री कालरात्रि होय. भगवतीचे या प्रकारे ध्यान करतच सूक्ताचा पाठ करणे अपेक्षित आहे.
विष्णोरतुलतेजसः - भगवान विष्णूंची अत्यंत तेजस्वी आणि अतुलनीय अशी.
3) त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार-स्वरात्मिका ।
सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता ॥
खरे सांगायचे तर मला या श्लोकाचा समाधानकारक अर्थ अजूनपर्यंत समजलेला नाही.
स्वाहा म्हणजे देवतांच्या मंत्रांद्वारे देवतांप्रीत्यर्थ केले जाणारे हवन होय. उदा. ॐ गं गणपतये स्वाहा।
स्वधा या मंत्राने पितरांच्या मंत्रांद्वारे पितरांप्रीत्यर्थ हवन केले जाते. उदा. ॐ अर्यमाये नमः स्वधा। आज पितरांप्रीत्यर्थ फारसे हवन कुठे होत असेल असे वाटत नाही.
वषट् या मंत्राद्वारे देखील देवतांप्रीत्यर्थ विशिष्ट हवन केले जाते. पण वषट् माझ्या वाचनात फारसे कुठे आलेले नाही. (जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.) पण इतका वरवरचा अर्थ सप्तशतीकारांना अपेक्षित असेल असे वाटत नाही.
माझ्या मनात दोनच दिवसांपूर्वी सहज आलेली कल्पना सांगतो. (हा लेख लिहिण्यापूर्वी मला या श्लोकाचा अर्थ काहीही करुन पाहिजे होताच. आणि लेख तर नवरात्रापूर्वी टाकावयाचा होताच. आणि अचानक जणू स्वर्गीय मदतच मिळाली.)
स्वाहा म्हणजे बाह्य वस्तुंकडून कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये आपणांस ज्ञान मिळवून देतात. ती प्रक्रियाही मायेच्या शक्तीमुळेच शक्य आहे. कारण केवळ ब्रह्माला. जो निर्गुण निराकार आहे, कसलेही ज्ञान होणे शक्य नाही.
स्वधा म्हणजे बाह्य वस्तु उपस्थित नसतानाही आपले मन एखाद्या पदार्थाची चव चाखू शकते, रंग पाहू शकते, एखादे गाणे मनातल्या मनात ऐकू शकते. उदा. चिंचेच्या नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटणे. मायेच्या या शक्तीला स्वधा म्हटले असावे.
वषट् म्हणजे आंतर्बाह्य ज्ञानेंद्रियांचे व्यापार थांबून मन देखील जेथे न-मन होते, तेव्हां केवळ आत्मरूपाने आत्मरूपाबाबत जाणून घेतलेले ज्ञान होय. हे देखील मायेचेच सामर्थ्य होय. कारण जोपर्यंत माया जीवाला बंधन्मुक्त करीत नाही, तोपर्यंत हे शक्यच नाही. हे ज्ञान शब्दांत मांडता येत नाही. खुणेने सांगता येत नाही.
(हा माझा अर्थ आहे. चुकलेला असू शकतो. कुणी व्यक्ती दुसरा दृष्टीकोण मांडत असेल तर नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.)
स्वरात्मिका - अ पासून अः पर्यंत जे 16 स्वर आहेत ते तुझेच रूप आहेत कारण त्यांच्याशिवाय व्यंजनांना पूर्णत्व येऊच शकत नाहीत. अ ते अः यांचे अस्तित्व भाषेत स्वतंत्ररूपाने असे दिसून येत नाही. सहजपणे दिसतात ती व्यंजनेच. अगदी त्याचप्रमाणे या विश्वात अनेक सजीव-निर्जीव वस्तुंचे ज्ञान आपणांस होत राहते. परंतु त्यासर्वांमागे मायाशक्ती हीच प्रधान आहे.
सुधा - अमृतस्वरूपी किंवा सु-धा, उत्तम प्रकारे जगताला किंवा शरीराला धारण करणारी, त्याचे पालन पोषण करणारी. आता श्री भगवती शरीराचे धारण करणारी कशी? आतमध्ये तर परमात्माच विराजमान आहे? तर याचे उत्तर असे की, जोपर्यंत अविद्येच्या आवरणाने परमात्मा भ्रमित होत नाही तोपर्यंत पंचभूतात्मक जगत् आकाराला येऊच शकत नाही.
त्वम् अक्षरे - तू अ-क्षरा आहेस म्हणजे जी क्षय पावू शकत नाही, जिच्यावर काळाचा “व्यवस्थेकडून अव्यवस्थेकडे जाणे हा वस्तूचा गुणधर्म आहे” असा नियम लागू पडत नाही, किंबहुना काळच जिचा नम्र, पदशरण किंकर आहे अशी ती महाकाली.
नित्ये - जिला सुरुवात देखील नाही व अंत देखील नाही.
त्रिधा मात्रात्मिका स्थिता - ॐकाराच्या अ, ऊ, म या तीन व अॅ ही अर्धी अशा एकूण साडेतीन मात्रास्वरूपी जी आहे, म्हणजे ईश्वराचा वाचक शब्द जो प्रणव आहे, तो तीच आहे.
(क्रमशः-1)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्री दुर्गा सप्तश्लोकी
रेफ्रंन्स गंडला नाही.
सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र आहे
सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र फार
काही बोलतो मनातलं. माझा
आता इथं हे थांबवून मूळ
तुमची कळकळ पटली. मात्र काळ
विवेक
धन्यवाद जोशी साहेब.
आम्हाला तरुणांच्या कल्पकतेचे
तुमच्या या प्रश्नाचे खुप
मला अजुनही (माझी) नेमकी एखादी
मांत्रिक भाऊ,
खरे तर नवरात्रीला लेख सुरु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pondicherry Vazhiyela... :- Irumbu Kuthirai५७ प्रतिसाद व १००० पेक्षा
मांत्रिकजी आपण नमनाला घडाभर
हेच लिहायला आलो होतो.
_/\_
आपणा तिघांना खूप धन्यवाद!
स्वारी मी मदतनीस नाही. अंजावर
बैलांचा उल्लेख न केल्याबद्दल
शुचिमामी, बाहुबली अन दमामि
मांत्रिकभौ,
मला ते ही चालेल. पण इतक्या
तर एका संपादकानेच मी चक्क
मी सश्रद्धच आहे.
तरीही आपल्या अनुभवाला
दोनच प्रश्न,
@ मांत्रिक,
समजून घ्ययचा प्रयत्न करत आहे
आणि एक महत्त्वाची गोष्ट
गैरसमज नको प्लीज
एक सांगू का?
अवांतरः
दही वाळत घातलं तर ते वाळायला
ओह्ह्क्के. धन्यवाद.
आणि शेवटी दही वाळवून तरी पनीर
;)
:):)
हो गुर्जी.
धन्यवाद बिका साहेब,
लेख वाचला.
याला साहित्यिक शब्द काय आहे
मांत्रिक भाऊ . उच्च
धन्यवाद! अर्थात असे गैर
कारण फक्त एकाच व्यक्तिने अशी
व्यक्तिशः मला स्वतःला ही असली
माझ्या लेखनात कुठेच
असो...
पण त्यांनी स्वतः जगदंबेविषयी