Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मांत्रिक on Mon, 10/05/2015 - 17:27
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
॥ तांत्रिक रात्रिसूक्तम् ॥ (भाग-१) श्री दुर्गा सप्तशती हा मार्कंडेय पुराणांतर्गत येणारा हिंदु धर्मशास्त्रातील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ. दुर्गा सप्तशती किंवा नुसता सप्तशती हा शब्द ज्याने ऐकला नाही, असे हिंदु फार कमी असतील. आज श्रीमद्भग्वद्गीतेपेक्षा देखील फार मोठ्या प्रमाणात या ग्रंथाची उपासना होते. महर्षी मार्कंडेयांनी या दिव्य, प्रासादिक ग्रंथाची रचना केली. त्यावेळीस ते नाशिकमधील वणी येथील मार्कंडेय पर्वतावर साधना करीत होते व त्यांचा हा पाठ श्री भगवती लक्षपूर्वक ऐकत होती, असा पुराणांत उल्लेख आहे. त्यामुळेच श्री सप्तशृंगी देवीची मूर्ती काहीतरी लक्षपूर्वक ऐकत असल्यासारखी दिसते. या सप्तशती ग्रंथामध्ये रात्रिसूक्त, शक्रादी स्तुती, देवीसूक्त आणि नारायणी स्तुती या अत्यंत महत्वपूर्ण व श्री भगवतीला अत्यंत प्रिय अशा ४ स्तुति समाविष्ट आहेत. त्यापैकी रात्रिसूक्त या प्रथम स्तुतीची आपण आज ओळख करून घेणार आहोत. ओळख हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. कारण मी काही कुणी अंतिम अधिकारी सत्पुरुष नाही जो यावर अधिकारवाणीने बोलू शकतो. मला माझ्या वाचनातून, चिंतनातून, समजशक्तीतून, अनुभवांतून जो काही बोध झाला तो तुमच्यापुढे ठेवत आहे. जर तुमच्यापैकी कुणी यावर अजून काही प्रकाश टाकू शकत असेल तर मला अतिशय आवडेल. कदाचित काही ठिकाणी मला स्पष्ट करायला जमलं नसेल, काही ठिकाणी चुकलं देखील असेल, अशा वेळीस कृपया आपण स्पष्ट करून सांगितलं, काही मदत केली, सूचना दिल्या तर खूप आवडेल. हे रात्रिसूक्त दुर्गा सप्तशतीच्या प्रथम अध्यायात श्लोक क्रमांक ७० ते ८७ (गीता प्रेस, गोरखपूर आवृत्तीप्रमाणे, अन्य अनेक आवृत्त्या आहेत व त्यात थोडीफार भिन्नता आढळते)मध्ये समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे आणखी एक वैदिक रात्रिसूक्त म्हणून ऋग्वेदात आहे. परंतु ते येथे अपेक्षित नाही. आज सर्वाधिक प्रचलित असणारे सूक्त म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथांतर्गत येणारे सूक्तच होय. त्यालाच तांत्रिक रात्रिसूक्त असेही नाव प्रचलित आहे. कारण एकूणातच श्री भगवतीची उपासना प्रामुख्याने तंत्रमार्गाने केली जाते, आणि रात्रिसूक्त तर अशा प्रयोगांतील एक महत्वपूर्ण भाग आहे. असो, आता या रात्रिसूक्तामागील मुख्य कथानक काय आहे ते पाहू या. पौराणिक कथाः- कल्पाच्या शेवटी, सृष्टीच्या महाप्रलयाच्या वेळीस विश्वाचे पालनकर्ता भगवान विष्णु क्षीराब्धीमध्ये अनंत नामक शेषावर निद्राधीन झाले, तेव्हा त्यांच्या कर्णमलातून मधु व कैटभ हे दोन असुर उत्पन्न झाले. त्या असुरांनी विष्णुंच्या नाभीकमळातील ब्रह्मदेवास पाहिले, तेव्हा त्याला मारून टाकण्याच्या हेतूने ते दोघे आपली शस्त्रे परजीत त्यांच्यावर धावून गेले. हे पाहून घाबरलेल्या ब्रह्मदेवाने भगवान विष्णुंना निद्राधीन करणा-या योगनिद्रेचे स्तवन सुरु केले. हेच ते १५ श्लोकांचे प्रसिद्ध रात्रिसूक्त होय. या स्तुतिमुळे प्रसन्न झालेल्या योगनिद्रेने भगवान विष्णुंची मायेच्या आच्छादनातून मुक्तता केली. तेव्हा जागे झालेल्या ईश्वराने मधु व कैटभ यांच्याशी पाच सहस्र वर्षेपर्यंत युद्ध केले. परंतु ते दोघेही असुर त्याला दाद लागू देईनात. तेव्हा महामायेने त्यांना आपल्या मायाशक्तीने भ्रमित केले. मग त्या दोघांनी भगवान विष्णुंना “तुझा पराक्रम पाहून आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, तुला जो इच्छित वर असेल तो माग” असा शब्द दिला. तेव्हा भगवान विष्णुंनी त्यांना, माझ्या हातून तुम्हाला मृत्यु येऊ दे, असा वर मागितला. तेव्हा जलमय असलेली पृथ्वी पाहून, जेथे पाणी नसेल तेथे आम्हाला मार, असा त्यांनी वर दिला. तेव्हा भगवान विष्णुंनी तत्काळ त्यांना स्वतःच्या मांडीवर घेऊन स्वचक्राने त्यांचे शिर छेदून टाकले. गूढार्थः- इथे भगवान विष्णु जीवाच्या मायेने आवृत्त अवस्थेचे प्रतीक आहेत. तर मधु व कैटभ म्हणजे नाम व रूपात्मक माया होय. (कर्णमलात ते उत्पन्न होतात याचा अर्थ इतकाच घ्यावयाचा की, आपली पंच कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये ही सातत्याने बाहेरून मिळणा-या stimuli (याला योग्य मराठी प्रतिशब्द सुचवा) किंवा प्रलोभनांमुळे आपल्या सच्चिदानंद स्वरूपाशी संपर्क करण्याच्या आपल्या प्रयत्नांत मोठाच अडथळा निर्माण करतात. एक सोपे उदा. म्हणजे सकाळी जप करायला तुम्ही बसलात आणि अचानक कुणीतरी मोठ्या आवाजात गाणी लावली तर ५ मिनिट देखील तुम्ही शांत बसू शकणार नाही. अशा वेळेस त्या आदिमायेलाच आळवणी करावी लागते की माझे प्रयत्न अपुरेच पडणार, तूच मला आता आधार दे.) ही माया किंवा अविद्या जीवातील परब्रह्माला आवृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हां दुर्बल जीवाने या मायेच्या साम्राज्ञीचा केलेला धावा म्हणजेच रात्रिसूक्त होय. 1) ॐ ब्रह्मोवाच - ब्रह्मदेवाने स्तुती आरंभ केली. इथे ब्रह्मदेव म्हणजे कुणी देवता अपेक्षित नाही, तर मायेच्या साम्राज्यातील संकटे, अडचणी व दुःखांनी गांजलेला जीव अपेक्षित आहे. या जीवाने श्री भगवतीला अशा आणीबाणीच्या प्रसंगी मारलेली हाक म्हणजे रात्रिसूक्त. 2) विश्वेश्वरीम् जगद्धात्रीम् स्थितीसंहार कारिणीम् । स्तौमि निद्राम् भगवतीम् विष्णोरतुल तेजसः ॥ “विश्वाची स्वामिनी, जगाची उत्पत्ती, स्थिती व संहार करणारी, भगवान विष्णुंच्या अतुलनीय अशा त्या तेजस्वी निद्रेचे मी स्तवन करतो.” विश्व - जड आणि जीव यांचे अस्तित्व असो किंवा नसो, तरीदेखील अस्तित्वात असणारी प्रचंड अथांग प्रकाशहीन पोकळी, तिची स्वामिनी ती विश्वेश्वरी. जगद्धात्री - आपण पाहतो त्या जड व चैतन्याने युक्त अशा जगाची उत्पत्ती करणारी स्थिती संहार कारिणी - जेव्हा परब्रह्म मायेने मोहित असते तेव्हाच जगताची धारणा टिकून राहू शकते, म्हणून एक प्रकारे तीच विश्वाची स्थिती टिकवायला कारणीभूत आहे. तसेच जेव्हा परब्रह्म अविद्येच्या आवरणातून बाहेर येते तेव्हा आपोआपच पंचमहाभूतात्मक विश्वाचा नाश होतो. म्हणून संहारकारिणी. आता येथे कुणी प्रश्न विचारेल की, जर अचानक पृथ्वीवर एखादी मोठी उल्का आदळली आणि सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तर ती काय जगदंबेची इच्छा समजायची काय? त्याला माझे उत्तर असे, की काही झालं तरी शेवटी सर्वांनाच, पुण्यवान आणि महापापी, दोघांना देखील त्याच ठिकाणी परत जायचे आहे, तर त्याला कारणीभूत घटना हा महत्वाचा निकष होऊ शकत नाही. हां, आता येथे कुणी असे म्हणेल की सर्वांना परब्रह्माकडेच परत जायचे आहे तर मी एखाद्याचा खून केला तर काय बिघडेल? अशा माणसाला प्रश्न करावा की त्याच न्यायाने पहिले तुला मारले तर चालेल काय? म्हणूनच बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने Golden Rule सांगितलेला आहे की, लोकांनी तुमच्याशी जसं वागावं अशी तुमची इच्छा आहे, तसंच तुम्ही देखील त्यांच्याशी वागावं. स्तौमि - मी स्तुति करतो निद्रां भगवतीं – या देवतेला भगवान विष्णुंची योगनिद्रा म्हटलेलं आहे. निद्रा याचा अर्थ जेव्हा परब्रह्म मायेने मोहित असते तेव्हां ते आपोआपच आपल्या ईश्वरत्वाविषयी निद्रिस्त असते, तर जेव्हां मायेपासून मुक्त असते तेव्हां आपोआपच नामरूपात्मक जगताविषयी निद्रिस्त असते. उदाहरण म्हणजे सामान्य मनुष्य मायेने भ्रांत परब्रह्म असल्याने तो प्रपंचात अगदी रममाण असतो. दुःख, आजारपण, वेदना, मृत्यु, विषमता इ. जगातील कटकटी समजून देखील तो जगाला घट्ट चिकटून बसतो. त्याच वेळेस रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे सत्पुरुष मात्र या भ्रामक जगातून स्वतः बाहेर पडतात आणि इतर अनेक लोकांनाही त्यातून बाहेर पडायचा मार्ग दाखवतात. तर अशा या योगनिद्रेचे सर्वात सुस्पष्ट रूप म्हणजे नवदुर्गांपैकी सप्तमी दुर्गा भगवती श्री कालरात्रि होय. भगवतीचे या प्रकारे ध्यान करतच सूक्ताचा पाठ करणे अपेक्षित आहे. विष्णोरतुलतेजसः - भगवान विष्णूंची अत्यंत तेजस्वी आणि अतुलनीय अशी. 3) त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार-स्वरात्मिका । सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता ॥ खरे सांगायचे तर मला या श्लोकाचा समाधानकारक अर्थ अजूनपर्यंत समजलेला नाही. स्वाहा म्हणजे देवतांच्या मंत्रांद्वारे देवतांप्रीत्यर्थ केले जाणारे हवन होय. उदा. ॐ गं गणपतये स्वाहा। स्वधा या मंत्राने पितरांच्या मंत्रांद्वारे पितरांप्रीत्यर्थ हवन केले जाते. उदा. ॐ अर्यमाये नमः स्वधा। आज पितरांप्रीत्यर्थ फारसे हवन कुठे होत असेल असे वाटत नाही. वषट् या मंत्राद्वारे देखील देवतांप्रीत्यर्थ विशिष्ट हवन केले जाते. पण वषट् माझ्या वाचनात फारसे कुठे आलेले नाही. (जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.) पण इतका वरवरचा अर्थ सप्तशतीकारांना अपेक्षित असेल असे वाटत नाही. माझ्या मनात दोनच दिवसांपूर्वी सहज आलेली कल्पना सांगतो. (हा लेख लिहिण्यापूर्वी मला या श्लोकाचा अर्थ काहीही करुन पाहिजे होताच. आणि लेख तर नवरात्रापूर्वी टाकावयाचा होताच. आणि अचानक जणू स्वर्गीय मदतच मिळाली.) स्वाहा म्हणजे बाह्य वस्तुंकडून कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये आपणांस ज्ञान मिळवून देतात. ती प्रक्रियाही मायेच्या शक्तीमुळेच शक्य आहे. कारण केवळ ब्रह्माला. जो निर्गुण निराकार आहे, कसलेही ज्ञान होणे शक्य नाही. स्वधा म्हणजे बाह्य वस्तु उपस्थित नसतानाही आपले मन एखाद्या पदार्थाची चव चाखू शकते, रंग पाहू शकते, एखादे गाणे मनातल्या मनात ऐकू शकते. उदा. चिंचेच्या नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटणे. मायेच्या या शक्तीला स्वधा म्हटले असावे. वषट् म्हणजे आंतर्बाह्य ज्ञानेंद्रियांचे व्यापार थांबून मन देखील जेथे न-मन होते, तेव्हां केवळ आत्मरूपाने आत्मरूपाबाबत जाणून घेतलेले ज्ञान होय. हे देखील मायेचेच सामर्थ्य होय. कारण जोपर्यंत माया जीवाला बंधन्मुक्त करीत नाही, तोपर्यंत हे शक्यच नाही. हे ज्ञान शब्दांत मांडता येत नाही. खुणेने सांगता येत नाही. (हा माझा अर्थ आहे. चुकलेला असू शकतो. कुणी व्यक्ती दुसरा दृष्टीकोण मांडत असेल तर नक्कीच जाणून घ्यायला आवडेल.) स्वरात्मिका - अ पासून अः पर्यंत जे 16 स्वर आहेत ते तुझेच रूप आहेत कारण त्यांच्याशिवाय व्यंजनांना पूर्णत्व येऊच शकत नाहीत. अ ते अः यांचे अस्तित्व भाषेत स्वतंत्ररूपाने असे दिसून येत नाही. सहजपणे दिसतात ती व्यंजनेच. अगदी त्याचप्रमाणे या विश्वात अनेक सजीव-निर्जीव वस्तुंचे ज्ञान आपणांस होत राहते. परंतु त्यासर्वांमागे मायाशक्ती हीच प्रधान आहे. सुधा - अमृतस्वरूपी किंवा सु-धा, उत्तम प्रकारे जगताला किंवा शरीराला धारण करणारी, त्याचे पालन पोषण करणारी. आता श्री भगवती शरीराचे धारण करणारी कशी? आतमध्ये तर परमात्माच विराजमान आहे? तर याचे उत्तर असे की, जोपर्यंत अविद्येच्या आवरणाने परमात्मा भ्रमित होत नाही तोपर्यंत पंचभूतात्मक जगत् आकाराला येऊच शकत नाही. त्वम् अक्षरे - तू अ-क्षरा आहेस म्हणजे जी क्षय पावू शकत नाही, जिच्यावर काळाचा “व्यवस्थेकडून अव्यवस्थेकडे जाणे हा वस्तूचा गुणधर्म आहे” असा नियम लागू पडत नाही, किंबहुना काळच जिचा नम्र, पदशरण किंकर आहे अशी ती महाकाली. नित्ये - जिला सुरुवात देखील नाही व अंत देखील नाही. त्रिधा मात्रात्मिका स्थिता - ॐकाराच्या अ, ऊ, म या तीन व अ‍ॅ ही अर्धी अशा एकूण साडेतीन मात्रास्वरूपी जी आहे, म्हणजे ईश्वराचा वाचक शब्द जो प्रणव आहे, तो तीच आहे. (क्रमशः-1)
  • Log in or register to post comments
  • 21028 views

प्रतिक्रिया

Submitted by सूड on Tue, 10/06/2015 - 14:55

In reply to सातच श्लोक आहेत. (स्मॉल व्हर्जन) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

श्री दुर्गा सप्तश्लोकी

श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र
सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र आहे तुम्ही म्हणताय ते (स्मॉल), आणि मांत्रिकबुवांचा लेख सप्तशती वर आहे (व्हास्ट व्हर्जन). रेफरन्स गंडलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 10/06/2015 - 17:21

In reply to श्री दुर्गा सप्तश्लोकी by सूड

Permalink

रेफ्रंन्स गंडला नाही.

मांत्रिक म्हणतात तेही बरोबर आहे आणि मी म्हणतो तेही बरोबर आहे. माझ्यावर विश्वास नसू देत या दुव्यावर तरी विश्वास ठेवा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 10/06/2015 - 17:43

In reply to रेफ्रंन्स गंडला नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र आहे

सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र आहे तुम्ही म्हणताय ते (स्मॉल), आणि मांत्रिकबुवांचा लेख सप्तशती वर आहे (व्हास्ट व्हर्जन)
हे परत वाचा. तरीही तुम्हाला वाटत असेल तुम्हीच बरोबर आहात; तर तसं समजा.
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Tue, 10/06/2015 - 17:49

In reply to रेफ्रंन्स गंडला नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र फार

सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र फार वेगळं आहे. ते सप्तशतीतील काही निवडक मंत्र एकत्र घेऊन बनवलेलं आहे. मी बोलतोय ती १३ अध्यायांची ७०० श्लोकांची सप्तशती.
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Mon, 10/05/2015 - 20:55

Permalink

काही बोलतो मनातलं. माझा

काही बोलतो मनातलं. माझा यामागे हेतु फक्त माणसाने माणसाशी चांगलंच वागावं. त्यासाठी अद्वैतमताचा प्रसार हे मी माझं कर्तव्य समजतो. माझं पूर्व आयुष्य अतिशय त्रास, अन्याय, अपमान, दारिद्र्य, कमतरता, विषमता सहन करण्यात गेलं. सगळे तपशील देऊ शकत नाही. पण अगदी अनेकदा आयुष्यही नकोसं वाटलं. अजून काय बोलू? माझे प्रयत्न इतकेच आहेत की अद्वैत मताच्या प्रसाराने माणसामाणसातील भेद, विषमता, अन्याय करण्याची वृत्ती नष्ट व्हावी. माझ्या अर्थचिंतनातून हे स्पष्ट होत नाही का? बरे, लेख अजिबात न वाचताच टीकेची झोड उठवायलाच काहीजण धावून आले. पुढे लेख नीट न वाचल्याचे कबूल केलेच म्हणा. ते असो. पण या सर्व विवेचनाचा खटाटोप केवळ माणूस हा परब्रह्माचाच अंश आहे व तो त्यामुळे ईश्वराचेच रुप आहे हे ज्ञानेश्वर विवेकानंद यांनी मांडलेल्या विचारांचाच प्रसार करण्यासाठी आहे. मग मी काय चूक केली? जे काम काही महामानवांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केले त्याचेच इथे माझ्या कुवती व समजे प्रमाणे करण्याचा प्रयत्न मी केला आहे. केवळ तंत्र मंत्र स्तोत्र इ. शब्द दिसले की नीट वाचन न करताच टीका सुरू? बरे! माझा अर्थचिंतनाचा उद्देश मी: मला माझ्या वाचनातून, चिंतनातून, समजशक्तीतून, अनुभवांतून जो काही बोध झाला तो तुमच्यापुढे ठेवत आहे. जर तुमच्यापैकी कुणी यावर अजून काही प्रकाश टाकू शकत असेल तर मला अतिशय आवडेल. कदाचित काही ठिकाणी मला स्पष्ट करायला जमलं नसेल, काही ठिकाणी चुकलं देखील असेल, अशा वेळीस कृपया आपण स्पष्ट करून सांगितलं, काही मदत केली, सूचना दिल्या तर खूप आवडेल. या दुसर्या परिच्छेदातच स्पष्ट केलाय! मग पहिले एक दोन पॅराही न वाचता टीका सुरू? काहीही सकारात्मक माहिती न मिळता धागा उगाच प्रतिसाद गोळा करत सुटलाय!!!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 10/05/2015 - 21:07

In reply to काही बोलतो मनातलं. माझा by मांत्रिक

Permalink

आता इथं हे थांबवून मूळ

आता इथं हे थांबवून मूळ विषयाकडे का वळत नाही? :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 10/05/2015 - 21:10

In reply to काही बोलतो मनातलं. माझा by मांत्रिक

Permalink

तुमची कळकळ पटली. मात्र काळ

तुमची कळकळ पटली. मात्र काळ बदलला आहे. आता मानवजातीने सलोख्याने राहण्यासाठी अद्वैतमताच्या नव्हे तर विवेकवादाच्या प्रसाराची आवश्यकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता जोशी on Tue, 10/06/2015 - 11:29

In reply to तुमची कळकळ पटली. मात्र काळ by सतिश गावडे

Permalink

विवेक

विवेक ( संस्कृत) = ability to distinguish good from bad ,right from wrong , true from false (conduct , thoughts , act , state etc.) धर्म तत्वज्ञान या विवेकावर आधारित आहे, किंबहुना धर्म विवेकच शिकवितो. या विवेक बुद्धीने मनुष्याने त्याची नेमून दिलेली कर्मे करावीत ( जगात वागावे) हा ( ज्याचा) त्याचा "धर्म". याच विवेकाचा उहापोह सर्व संतांच्या शिकवणुकीत पुन्हा पुन्हा येतो. याच विवेकाची कास धरली कि माणूस सदाचरणी बनतो किंवा बनवा असे अपेक्षित आहे. सदाचरणाची ज्याची त्याची व्याख्या वेगळी असू शकेल तेव्हा परत ती तपासून पाहण्यास विवेकाचीच गरज! योग्य अशा धर्म संस्कारांची गरज हि त्यासाठीच. जैन बौध, क्रिस्त किंवा हिंदू मला वाटत सगळ्याचा गाभा मनुष्याला समाज केंद्रित बनवण्याबरोबरच हा विवेक सांगत असतो. अर्थात या विवेकाने वागतांना माणसाला अनेक नैतिक आणि सामाजिक बंधने येतात. पण सध्या अनिर्बंध आचार हाच कुल (cool )आचार . म्हणजेच विवेक आणि धर्म विरोधी असत नाहीत. "अद्वैत" पुढची संकल्पना आहे आणि ती अध्यात्मिक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Tue, 10/06/2015 - 11:31

In reply to विवेक by दत्ता जोशी

Permalink

धन्यवाद जोशी साहेब.

धन्यवाद जोशी साहेब.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 10/06/2015 - 11:33

In reply to तुमची कळकळ पटली. मात्र काळ by सतिश गावडे

Permalink

आम्हाला तरुणांच्या कल्पकतेचे

आम्हाला तरुणांच्या कल्पकतेचे फार कौतुक आहे. तेच आज भवीष्य स्मर्थपणे पेलु शकतात याची खात्रीही आहे म्हणूनच जणून घ्यायचय..
विवेकवादाच्या प्रसाराची आवश्यकता आहे.
हा विवेकवाद म्हणजे काय ? तो संपुर्ण विवेकपुर्ण आहे की काही अविवेकीपणाचा अंश त्यात शिल्लक आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 10/07/2015 - 13:16

In reply to आम्हाला तरुणांच्या कल्पकतेचे by द-बाहुबली

Permalink

तुमच्या या प्रश्नाचे खुप

तुमच्या या प्रश्नाचे खुप सुंदर उत्तर तुम्हीच तुमच्या कृतीतून दिलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on गुरुवार, 10/22/2015 - 14:04

In reply to तुमच्या या प्रश्नाचे खुप by सतिश गावडे

Permalink

मला अजुनही (माझी) नेमकी एखादी

मला अजुनही (माझी) नेमकी एखादी विशीष्टकृती आपल्या नजरेत विवेकवादी (वा अविवेकवादी) कोणत्या ताळेबंदावर सिध्द होते याची अजुनही उकल आपण केलेली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता जोशी on Mon, 10/05/2015 - 21:06

Permalink

मांत्रिक भाऊ,

तुमचा हेतू उदात्त आहे पण व्यासपीठ चुकले आहे असे मला वाटते. विचार करा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 10/06/2015 - 09:30

Permalink

खरे तर नवरात्रीला लेख सुरु

खरे तर नवरात्रीला लेख सुरु करायचा होता. पण मनात आलं की लेख आत्ताच टाकायला सुरुवात करावी म्हणजे ज्या कुणाला नवरात्रीच्या पवित्रतम मुहुर्तावर श्री भगवतीच्या उपासनेला सुरुवात करावयाची असेल त्यांना सोयीचे पडेल. उत्तम विचार ! वाचतोय... लिहीत रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pondicherry Vazhiyela... :- Irumbu Kuthirai
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Tue, 10/06/2015 - 11:35

Permalink

५७ प्रतिसाद व १००० पेक्षा

५७ प्रतिसाद व १००० पेक्षा जास्त वाचने! अजून एकाने देखील माझ्या रात्रिसूक्ताच्या भावानुवादात मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. अति अवांतरेच चालू आहेत. काही जणांनी त्या निमित्ताने थेट जगदंबेलाच नावे ठेवून सूर्यावर थुंकू पाहणारे मूर्ख अजूनहि आहेत याची खात्री पटवून दिली. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 10/06/2015 - 11:52

Permalink

मांत्रिकजी आपण नमनाला घडाभर

मांत्रिकजी आपण नमनाला घडाभर तेल घातले आहे म्हणून लोकांना धुडगुस घालायला रान मोकळे मिळाले. राखीव कुरण मिळाले. इथला एकही विरोधक तुमच्या मताशी सरळ चर्चा करणार नाही पण डायरेक्ट उपरोधीक व खिल्लीदायक प्रतिसाद लिहुन, अथवा आपले मत मांडुन (जे योग्य का आहे याचा कोणताही गोषवारा न लिहता) मोकळा होइल परंतु हीच गोष्ट तुम्ही त्यांच्याबाबत केली तर ते तुम्हाला हमखास नावे मात्र ठेवतील. तुम्हाला विषय विनाकारण वाढवतोय भरकटवत आहे म्हणतील.... असो यापुढील लेख लिहताना तो अवधुत स्टाइल फॅंटसीच ठेवा बरे.. किमान लोकांची तोंडे बंद राहतील. तिकडे सुरंगी ताइंच्या धाग्यावर एकही व्यक्ती चकार विरोधी, खिल्लीत्मक सुर काढणार नाही. त्यांना अंधश्रध्दा, मनाचे खेळ , योगायोग आहेत म्हणून हिणवणार नाही, सगळे कौतुकच करणार (मी अपवाद का ते लक्षात आलेच असेल) पण इतरांबाबत ...? मिपा आहे हे असं आहे... आता हळु हळु लक्षात आलेच असेल की *** **लेल्या लोकांशी विनम्र, प्रगल्भ न्हवे तर थिल्लरच रहावे तेच परम सुखदायी असते. कारण ना त्यांना तुमच्या विनम्रतेची किंमत असते ना संतापाची फिकीर.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Tue, 10/06/2015 - 12:07

In reply to मांत्रिकजी आपण नमनाला घडाभर by द-बाहुबली

Permalink

हेच लिहायला आलो होतो.

हेच लिहायला आलो होतो. सुरंगीताईंच्या धाग्यावर एखाददुसरा अपवाद वगळता " वा छान अनुभव। भाग्यवान आहात" आणि इथे मात्र.....
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 10/06/2015 - 12:11

In reply to मांत्रिकजी आपण नमनाला घडाभर by द-बाहुबली

Permalink

_/\_

_/\_ द बाहुबली आणि दमामि यांना आणि धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Tue, 10/06/2015 - 12:19

In reply to _/\_ by असंका

Permalink

आपणा तिघांना खूप धन्यवाद!

आपणा तिघांना खूप धन्यवाद! भले शंभरात तिन चार जणं का असेनात पण मदतीला आलात याला महत्व आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 10/06/2015 - 12:31

In reply to आपणा तिघांना खूप धन्यवाद! by मांत्रिक

Permalink

स्वारी मी मदतनीस नाही. अंजावर

स्वारी मी मदतनीस नाही. अंजावर कोणाची मदत करायची नाही व घ्यायची नाही हे अनुभवातुन शिकलो आहे. इथली एक वेगळीच बुरखा संस्कृती जी आहे त्यातील उणे जे समोर येते त्यावर फक्त भाष्य करणेच काय ते थोडेफार जमुन जाते. आता बघना सुरंगी ताइ धार्मीक असत्या, सश्रध्द असत्या, स्व्भावने भोळ्या असत्या अन त्यांनी हाच अनुभव जसाचा तसा लेखात विषद केला असता तर त्यांची इथे उडवेली खिल्ली अथव केली जाणारी फजीती संवेदनशील मिपाकर म्हणून या डोळ्यांनी बघवली गेली नसती. पण काय आहे की त्या विषेश सश्रध्द नाहीत म्हटल्यावर विरोधकांना प्रश्न पडतो की आता गंमत करायचे तर डोके चालवावे लागेल कारन बिंडोक विधानाने समोरील व्यक्ती सश्रध्द नसल्याने व्यथीत नक्किच होणार नाही. अन समजा ते आळस वा सवय झटकुन चालवावे म्हटले तर प्रश्न येतो की ज्या व्यक्तीमागे "म" ची ताकत खणखणीत उभी आहे त्याच्याशी उगाच का बरे पंगा घ्या ? आणी हा ताकतवान "म" म्हणजे माणुसकी न्हवे बरं का.
भले शंभरात तिन चार जणं का असेनात पण मदतीला आलात याला महत्व आहे.
चालायचे... म्हशींच्या कळपात दोच चार रेडे पुरेसे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 10/06/2015 - 13:14

In reply to स्वारी मी मदतनीस नाही. अंजावर by द-बाहुबली

Permalink

बैलांचा उल्लेख न केल्याबद्दल

बैलांचा उल्लेख न केल्याबद्दल निषेध. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 10/06/2015 - 12:41

In reply to _/\_ by असंका

Permalink

शुचिमामी, बाहुबली अन दमामि

शुचिमामी, बाहुबली अन दमामि यांना सहमत. अगदी १०० टक्के.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Tue, 10/06/2015 - 12:43

Permalink

मांत्रिकभौ,

मांत्रिकभौ, माझा मंत्र तंत्र,देवी ने बोलावून घेतले, पुजार्याचे स्वप्न ई. गोष्टीवर काडीचाही विश्वास नाही. असतात एकेकाच्या मनाचे खेळ वा वैयक्तिक अनुभव. मी त्याचा आदर करतो. पण इथल्या प्रतिसाद देण्या न देण्याच्या वृत्ती वर मात्र बोलावेसे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Tue, 10/06/2015 - 12:48

In reply to मांत्रिकभौ, by दमामि

Permalink

मला ते ही चालेल. पण इतक्या

मला ते ही चालेल. पण इतक्या मेहनतीनं हा अनुवादाचा प्रयत्न केला त्यात सर्वांचीच मदत अपेक्षित होती. मी कुठे चुकलोय, कुठे बरोबर हेच मला पाहिजे होतं. तर एका संपादकानेच मी चक्क निर्मल बाबाचा दरबार चालू केल्यागत थयथयाट सुरु केला. ते पण लेख मुळीच न वाचता! बाकी गोष्टी जाऊ देत. पण किमान भाषांतर तरी तपासा. मला काय सांगायचंय ते लोकांपर्यंय पोचतंय का हे मला पहायचं होतं. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 10/06/2015 - 13:12

In reply to मला ते ही चालेल. पण इतक्या by मांत्रिक

Permalink

तर एका संपादकानेच मी चक्क

तर एका संपादकानेच मी चक्क निर्मल बाबाचा दरबार चालू केल्यागत थयथयाट सुरु केला
ते संपादक आहेत म्हणून त्यांनी थयथयाट केला असे नाही इतपत जाण मनात कायम असुदे.
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन सावंत on Tue, 10/06/2015 - 12:50

Permalink

मी सश्रद्धच आहे.

मी सश्रद्धच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Tue, 10/06/2015 - 13:06

In reply to मी सश्रद्धच आहे. by नूतन सावंत

Permalink

तरीही आपल्या अनुभवाला

तरीही आपल्या अनुभवाला "बिंडोकपणा" न ठरवलेजाण्याची कारणे ही तपासावीच लागतील. आपल्या श्रध्देला आलेले ते फळ आहे हे ही त्यात एक कारण असु शकेल. मुळात आपण धारीश्ट्याच्या आहात हे आपल्या लेखांतुन समोर आलेच होते म्हणूनच आपण असा अनुभव मिपावर लिहण्ञाचे धारिश्ट्य केलेच कसे हा प्रश्न माझ्या मनात आला नाही पण इतरांचे मात्र आपली खिल्ली उडवायचे धारीश्ट्य झाले नाही हे मात्र विषेश लक्षणीय होते. कारण अतर्क्य लिहुन मिपाकरांचे धारीश्ट्य (थोड्या फार प्रमाणात) खच्ची राखणे या आधी फक्त एका सदस्याला थोडेफार साधले गेल्याचे माझ्या स्मरणात आहे. बाकिच्यांचा बाजार मिपाकरांनी क्षनोक्षणी उठवला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 10/06/2015 - 17:37

In reply to तरीही आपल्या अनुभवाला by द-बाहुबली

Permalink

दोनच प्रश्न,

१. ज्या व्यक्तिमागे 'म' ची ताकत खणखणीत उभी आहे, - यातील 'म' नाही कळले. २. अतर्क्य लिहुन मिपाकरांचे धारीश्ट्य (थोड्या फार प्रमाणात) खच्ची राखणे या आधी फक्त एका सदस्याला थोडेफार साधले गेल्याचे माझ्या स्मरणात आहे. - कोण ते भाग्यवान, कळू द्या तरी.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 10/06/2015 - 13:26

Permalink

@ मांत्रिक,

लेख आणि त्याला अनुसरून न येत असलेल्या प्रतिसादांबद्दल बोलायचे तर, १. लेखातील बर्‍याच गोष्टी लोकांच्या समजण्यापलीकडे असू शकतात (मीही त्यातील एक). २. ज्या थोड्या लोकांना माहिती असेल त्यांनी प्रतिसाद न देण्यामागे - तुमचा लेख वाचलेलाच नसणे, तुमचा आयडी + हेतूबद्दल पुरेसा विश्वास नसणे, इथे लिहील्या जाणार्‍या गोष्टी कितीजण गंभीरपणे वाचतात याबाबत नसलेली खात्री, लिहीण्याबाबत अनास्था, अशी अनेक कारणे असू शकतात. ३. काही लोकांना इथे फक्त टवाळपणाच करायचा असतो त्यांच्यासाठी असे धागे म्हणजे पर्वणीच असते. मिपावर 'काय लिहीलंय पेक्षा कोणी लिहीलंय ते जास्त महत्वाचं असतं' असं कोणीतरी म्हणून गेलं आहेच. त्यामुळे अशा विषयांसाठी हे व्यासपीठ योग्य नाही हे समजून पुढे चलावे. आपली श्रध्दा ही फक्त आपलीच असते, शक्यतो ती इतरांसोबत शेअर करू नये आणि त्याचे विश्लेषणही करू नये, कारण असे की समोरचा माणूस आपल्या त्या वेव्ह्लेंथ वर असेल, आपली प्रामाणिक भावना समजून घेऊ शकेलच असे नाही. आपली श्रध्दा आहे, विश्वास आहे, तसे अनुभवही आलेत याची जाणीव आपल्यालाच असणे पुरेसे आहे. इतरांनीही आपले विचार मानावेत, आपल्याशी सहमत असावं ही अपेक्षा करणं व्यर्थ आणि त्रासदायकच ठरतं.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/06/2015 - 13:55

Permalink

समजून घ्ययचा प्रयत्न करत आहे

तंत्रमार्गाशी संबंधित गोष्टी कुप्रसिद्ध असल्याने तंत्र म्हणले की आम्ही लोक पहिल्यापासून चार हात लांब. तरीही सप्तशती वगैरे काव्य म्हणून अभ्यास करायला हरकत नसावी. त्यातील मधु कैटभाची कथा माहीत आहे. या कथेत आणि स्तोत्रात पुन्हा आदिमाया आणि श्रीविष्णु यांचा समन्वय साधलेला दिसतो. त्यावरून विवेक पटाईत साहेबांचा धागा आठवला. इतर गूढ अर्थ वगैरे तुम्ही सांगत आहात ते ठीक आहे. समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. काही विरोध झालाच तर तो का झाला याच्या मूळ कारणापर्यंत पोचून ते दूर करणे जास्त चांगले नाही का! त्यावर जर थंडपणे चर्चा केली तर लोकांना माहिती देण्याचा तुमचा उद्देश साध्य होईल आणि निदान पुढच्या धाग्यात अवांतर होणार नाही. ते करताना जरा थंडपणे लिहीत जा आणि कोणाला वैयक्तिक लिहिणे कृपया टाळा. इथे लिहिताना कोणीही एक सदस्य म्हणूनच आपली मते मांडत असतो. नाहीतर संपादकांनी एकही प्रतिक्रिया द्यायला नको होती! दुसरे महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकजण आपल्या बाजूने किंवा विरोधात असतो असे नव्हे. या सगळ्याशी देणे घेणे नसलेला असाही एक मोठा वर्ग असतो. ते चर्चेचा कल बघून कधी टवाळकी करतील तर कधी वाहवा देतील! तेव्हा हे सगळे न बघता लिहीत रहा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे "मला व्यनि करा" इ. लिहिणे कृपया टाळा, कारण तुमचा व्यवसाय वगैरे काहीही माहिती इथे कोणाला नाही. तर व्यवसायाची जाहिरात होते आहे का? असा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो. मूळ ग्रंथ वाचला नसल्याने भाषांतराबद्दल काही बोलू शकणार नाही. मात्र इंटरेस्टिंग विषय आहे. यावर वाचायला आवडेल. लिहीत रहा!
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Tue, 10/06/2015 - 14:05

In reply to समजून घ्ययचा प्रयत्न करत आहे by पैसा

Permalink

आणि एक महत्त्वाची गोष्ट

आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे "मला व्यनि करा" इ. लिहिणे कृपया टाळा, कारण तुमचा व्यवसाय वगैरे काहीही माहिती इथे कोणाला नाही. तर व्यवसायाची जाहिरात होते आहे का? असा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो.
धन्यवाद! पण माझा त्यामागे उदेश उपासनेबाबत चांगली पुस्तके, एखादी उपासनेला वाहून घेतलेली वेबसाईट वगैरे बाबत लोकांना माहिती देणे इतपतच आहे. कारण अशी माहिती ओपनमध्ये दिली की पुन्हा नास्तिक मंडळी टीका करणार हे माहितच आहे. अशी चांगली पुस्तके, वेबसाईट बाबत माहिती देऊ नये काय? आणि शिवाय या धाग्यात वरतीच अशी विनंती करण्याचे कारण
न्यास, ध्यान, विनियोग, फलश्रुती या केवळ उपासकाने करावयाच्या गोष्टी
आहेत. त्या इथे सांगत बसलो तर वेळ तर जाईलच, शिवाय नास्तिकांकडून थट्टा होणारच. मग यात मी काय चूक केलं? पाहिजे तर माझे व्यनि संपादकिय अधिकारात तपासून पहावेत. काही जाहिरातबाजी, तंत्र, मंत्र, आढळलं तर तुम्ही पुढील कारवाई करूच शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 10/06/2015 - 14:13

In reply to आणि एक महत्त्वाची गोष्ट by मांत्रिक

Permalink

गैरसमज नको प्लीज

संपादकांना व्यनि बघायचे अधिकार नाहीत आणि त्यात रसही नाही. मी फक्त मिपा धोरणाप्रमाणे काय योग्य तेवढेच सांगितले. कारण मिपावर कोणत्याही प्रकारे व्यवसाय, त्याची जाहिरात, पैशाची देवाण घेवाण होऊ नये हे महत्त्वाचे. इतर जास्तीची माहिती तुम्ही लोकांना व्यनि, खरड यातून देऊ शकताच! आणि ज्यांना तशी माहिती हवी असेल ना, ते स्वतःच संपर्क जरूर करतील! त्या सगळ्याला हरकत नाहीच. पुस्तके, वेबसाईट्स, संदर्भ यांचे यादी लेखाच्या शेवट दिली की मोठे काम होऊन जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/06/2015 - 15:01

Permalink

एक सांगू का?

एक सांगू का? आधी खरं तर तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा. मदत मात्र करू शकणार नाही. पण मूळात हा धागा भलत्या मार्गाने जाण्यात तुमचेही काही योगदान आहे असे वाटत नाही का? तुम्हाला टीका सहन झाली नाही. विरूद्ध मताला तुम्ही अगदी अभिनिवेशाने उत्तर द्यायला जाता. अर्थातच, जालावरील भांडणे किंवा वाद हे दही वाळत घालून भांडत बसल्यासारखे असल्यामुळे, तुमच्या अरे ला कारे येणारच. तुम्ही काही गोष्टी अनुल्लेखाने मारल्या असत्या तर इतके वळण लागले नसते. असेल एखाद्याला जबदंबेवर टीका करायची.... करू दे की. तुम्ही सहभागी होऊ नका, आणि स्पष्ट पण योग्य पद्धतीने असहमती दर्शवा आणि सोडून द्या. तुम्ही काही एक कार्य योजले आहे, ते नेटाने चालू ठेवा. तुम्हाला त्यातून मिळणारे समाधान हे खरे आणि पुरे असेल, तर प्रतिसाद आले न आले, मदतीचे प्रस्ताव आले न आले... वाईट वाटणे तर दूरच, पण मनातसुद्धा येणार नाही. परत एकदा तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 10/06/2015 - 15:03

In reply to एक सांगू का? by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अवांतरः

अवांतरः >>> दही वाळत घालून भांडत बसल्यासारखे याचं खरंच कुतुहल वाटलं. अर्थ काय याचा?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/06/2015 - 15:15

In reply to अवांतरः by प्यारे१

Permalink

दही वाळत घातलं तर ते वाळायला

दही वाळत घातलं तर ते वाळायला किती वेळ लागेल? भरपूर वेळ लागेल. म्हणजे भरपूर वेळ असेल हाताशी भांडायला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 10/06/2015 - 15:15

In reply to दही वाळत घातलं तर ते वाळायला by बिपिन कार्यकर्ते

Permalink

ओह्ह्क्के. धन्यवाद.

ओह्ह्क्के. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 10/06/2015 - 15:24

In reply to ओह्ह्क्के. धन्यवाद. by प्यारे१

Permalink

आणि शेवटी दही वाळवून तरी पनीर

आणि शेवटी दही वाळवून तरी पनीर होणार काय? नै ना. आले का लक्षात प्यारे?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/06/2015 - 15:30

In reply to आणि शेवटी दही वाळवून तरी पनीर by अभ्या..

Permalink

;)

;)
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Tue, 10/06/2015 - 15:31

In reply to आणि शेवटी दही वाळवून तरी पनीर by अभ्या..

Permalink

:):)

:):)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 10/06/2015 - 15:35

In reply to आणि शेवटी दही वाळवून तरी पनीर by अभ्या..

Permalink

हो गुर्जी.

हो गुर्जी.
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Tue, 10/06/2015 - 15:59

In reply to हो गुर्जी. by प्यारे१

Permalink

धन्यवाद बिका साहेब,

धन्यवाद बिका साहेब, प्यारेबुवा, अभ्यासाहेब..! आता कुठं बैठक बसल्यासारखं वाटू लागलं! जरा बरं वाटू लागलं. येतो. परत.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Tue, 10/06/2015 - 16:10

Permalink

लेख वाचला.

लेख वाचला. एक प्रश्न आहे- तुमी भावानुवाद करताय का भाषांतर ?
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Tue, 10/06/2015 - 20:39

In reply to लेख वाचला. by जेपी

Permalink

याला साहित्यिक शब्द काय आहे

याला साहित्यिक शब्द काय आहे माहित नाही. अनुवाद तर आहेच. पण तो अद्वैतमताच्या चौकटीत बसवायचा प्रयत्न केलाय. माझे वाचन, अनुभव, चिंतन यानुसार या अनुवादाला रूप दिलेय. काही स्वतःचे मत / व्हर्शन असेल तर ते ही कृपया मांडा.
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Wed, 10/07/2015 - 14:24

Permalink

मांत्रिक भाऊ . उच्च

मांत्रिक भाऊ . उच्च अध्यात्मिक लेख टाकायचं मी पा हे व्यासपीठ आहे का ? ज्ञान घेण्याच्या उद्देशाने वाचणारे अत्यंत कमी आणि टिंगल टवाली करणारे जास्त आहेत इथे . काय करणार . पंचपक्वानांच ताट समोर आणून ठेवलं तरी त्यांना शीळं , वास मारणारच अन्न आवडत असेल तर आपण जास्त विचार करायचा नाही . उगीच का गुरु-शिष्य परंपरेचं महत्व आहे ? असं ज्ञान फक्त योग्य व्यक्तीकडेच जायला हवं . नास्तिक , पापी , तामसी लोकांकडून त्याचा अपमान होऊ नये हा उद्देश आहे ना . इथे काही मंडळीना 'देवी घाबरलेली, डचकलेली, थोडी टेन्शनमधे असल्यासारखीच वाटली आहे.खुपच डोळे वटारुन कोणाला दमात घेत आहे अशीच वाटली आहे'. दुष्टांचा वध करायला निघालेल्या, लढाईच्या पवित्र्यात असणार्या वीराच्या चेहऱ्यावर वीररस नाही तर कारुण्य रस , हास्य रस असावा असा मंडळीचा समज असेल . देवीची/ अध्यात्मिक शक्तींची अशी टिंगल करणाऱ्यांच प्रत्येक कर्म कुठेतरी रेकॉर्ड होत आहे आणि वेळ आल्यावर त्याची किंमत चुकती करावी लागणार आहे हे बहुदा ते विसरले असावेत . सप्तशती मध्ये आलेल्या रात्रीसुक्त, कुन्जीका स्तोत्र , अर्गला स्त्रोत्र इ स्तोत्रपठणासाठी खूप श्रद्धेची आवश्यकता असते . आणि ती इथे कोणाकडे आहे ह्याबद्दल शंका आहे . तेव्हा असे लेख लिहू नयेत असं मला वाटतं .
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Wed, 10/07/2015 - 16:31

In reply to मांत्रिक भाऊ . उच्च by तुडतुडी

Permalink

धन्यवाद! अर्थात असे गैर

धन्यवाद! अर्थात असे गैर उद्गार काढणा-याकडे आता दुर्लक्षच करा. बरीच बोलाचाली होऊन गेलेली आहे. असा लेख टाकून मी काही चूक केली असे मला तरी अजून वाटत नाही. कारण फक्त एकाच व्यक्तिने अशी बाष्कळ बडबड केलेली दिसून येते. अन्य कुणीही सदस्य यात सामील नव्हता. आणि हा फक्त त्या स्तोत्रातील गहन आध्यात्मिक रहस्याची उकल करण्याचा एक प्रयत्न होता. या लेखात मी कुठेही त्या स्तोत्राशी निगडीत साधना मुद्दामच निर्देशित केलेल्या नाहीत. हां, पण यापुढे असे लेख नक्कीच टाकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 10/07/2015 - 20:10

In reply to धन्यवाद! अर्थात असे गैर by मांत्रिक

Permalink

कारण फक्त एकाच व्यक्तिने अशी

कारण फक्त एकाच व्यक्तिने अशी बाष्कळ बडबड केलेली दिसून येते. अन्य कुणीही सदस्य यात सामील नव्हता.
मांत्रिक साहेब, मिपा हे मुक्त व्यासपीठ आहे. आपण एखादा विचार मांडला की त्यावर वेगवेगळे पडसाद उमटणार. त्याची "बाष्कळ बडबड" म्हणून संभावना करणे योग्य नव्हे. तुमच्या एकंदरीत लेखनावरुन तुम्ही समंजस वाटता, तुम्ही तरी असे लिहू नये असे वाटते. व्यक्तिशः मला स्वतःला ही असली कसली कसली स्तोत्रे बाष्कळ बडबड वाटते. देव काय सरकारी कार्यालयातला कर्मचारी आहे का त्याची खुशामत करुन त्याला प्रसन्न करुन घ्यायला. तुमचा अशा लेखनातील गुढार्थ शोधण्याचा प्रकार तर खरंच अगम्य वाटतो. ग्रंथकर्त्याने जे लिहिलेच नाही ते तुम्ही कसे म्हणून शकता की यात असा असा गुढार्थ आहे? लिहिण्याचा मुद्दा हा की सगळ्यांनाच सगळे पटते असे नाही. काहींना दखल द्यावीशी वाटत नाही. ते दुर्लक्ष करतात. काही प्रा. डॉ. सारखे रोखठोक स्वभावाचे असतात जे उघड लिहितात. मात्र असे विरोधी मत आल्यानंतर त्याबाबतीत वैयक्तिक पातळीवर उतरुन "बाष्कळ बडबड" म्हणण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Wed, 10/07/2015 - 20:29

In reply to कारण फक्त एकाच व्यक्तिने अशी by सतिश गावडे

Permalink

व्यक्तिशः मला स्वतःला ही असली

व्यक्तिशः मला स्वतःला ही असली कसली कसली स्तोत्रे बाष्कळ बडबड वाटते. देव काय सरकारी कार्यालयातला कर्मचारी आहे का त्याची खुशामत करुन त्याला प्रसन्न करुन घ्यायला.
देवाची खुषामत हा शब्द मी कुठेच वापरला नाहीये. केवळ एका प्राचीन स्तोत्राचा गूढार्थ शोधण्याचा प्रयत्न आहे.
तुमचा अशा लेखनातील गुढार्थ शोधण्याचा प्रकार तर खरंच अगम्य वाटतो. ग्रंथकर्त्याने जे लिहिलेच नाही ते तुम्ही कसे म्हणून शकता की यात असा असा गुढार्थ आहे?
ग्रंथकर्त्याला काय अपेक्षित आहे हे शोधण्याचाच तर प्रयत्न आहे. त्यात इतरांनी मदत करण्याचं पण आवाहन केलंय.
काही प्रा. डॉ. सारखे रोखठोक स्वभावाचे असतात जे उघड लिहितात. मात्र असे विरोधी मत आल्यानंतर त्याबाबतीत वैयक्तिक पातळीवर उतरुन "बाष्कळ बडबड" म्हणण्याची गरज नाही.
पण त्यांनी स्वतः जगदंबेविषयी अनुदार उद्गार काढून माझ्या श्रद्धास्थानाला धक्का पोहोचवला. यात चूक काहीच नाही? कबूल आहे, पब्लीक फोरम आहे, पण असं श्रद्धास्थानाची घृणास्पद थट्टा करणं कितपत बरोबर आहे? एखादा मनुष्य आस्तिक विचारसरणीचा आहे म्हणून त्यानं इथं काही मत मांडलं तर त्याच्या श्रद्धास्थानावर टीका करणं कितपत बरोबर आहे? माफ करा. मोबल्यावर टंकतोय. फारसं लिहीता येत नाही. तुमच्याविषयी आदर आहे. तुमचं लेखन ही वाचलंय. आवडतं. पण केवळ एक वेगळा विषय मिपावर मांडूच नये का? मग मिपा हे फक्त नास्तिकांचा फोरम म्हणून घोषित करावे का? इतरांनी तिथे लिहण्यापूर्वी आपल्या श्रद्धास्थानाविषयी वाट्टेल ते ऐकायची तयारी ठेवावी का?
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Wed, 10/07/2015 - 20:37

In reply to व्यक्तिशः मला स्वतःला ही असली by मांत्रिक

Permalink

माझ्या लेखनात कुठेच

माझ्या लेखनात कुठेच चमत्काराचे दावे नाहीयेत, कोणतेच प्रलोभन नाहीये. फक्त माणसाला माणसातील ईश्वरी अस्तित्वाची जाणीव करून देणारा अद्वैतवाद मांडलाय. तोही एका प्राचीन स्तोत्राच्या अनुवादातून. कृपया पुन्हा सर्व लेखन वाचा. मी कुठंच काही अव्वाच्या सव्वा दावे केलेले नाहीत. जे आहे ते शुद्ध विवेचन, विश्लेषण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Wed, 10/07/2015 - 20:56

In reply to माझ्या लेखनात कुठेच by मांत्रिक

Permalink

असो...

या विषयांवरील प्रतिसाद ही न संपणारी मालिका असते. म्हणूनच अशा विषयांवर लिहिणे नको वाटते. मला जे प्रामाणिकपणे वाटलं ते लिहिलं.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 10/07/2015 - 21:18

In reply to व्यक्तिशः मला स्वतःला ही असली by मांत्रिक

Permalink

पण त्यांनी स्वतः जगदंबेविषयी

पण त्यांनी स्वतः जगदंबेविषयी अनुदार उद्गार काढून माझ्या श्रद्धास्थानाला धक्का पोहोचवला. यात चूक काहीच नाही?
नाही. अजिबात चूक नाही. श्रद्धास्थान तुमचे आहे, त्यांचे नाही.
कबूल आहे, पब्लीक फोरम आहे, पण असं श्रद्धास्थानाची घृणास्पद थट्टा करणं कितपत बरोबर आहे?
थट्टा ’घृणास्पद’ नसावी हे ढोबळ मानाने जरी मान्य केलं तरी ’घृणास्पद’ आहे की नाही हे कोण ठरवणार? ते कायमच सापेक्ष असेल. त्यामुळे, आपली रेष मोठी करणे हा एकमेव उपाय आहे.
एखादा मनुष्य आस्तिक विचारसरणीचा आहे म्हणून त्यानं इथं काही मत मांडलं तर त्याच्या श्रद्धास्थानावर टीका करणं कितपत बरोबर आहे?
टीका झाली आहे ती तुम्ही आस्तिक आहात म्हणून नव्हे. मूळात, टीकाच झाली नाही. लोकांनी आपापली मतं मांडली. दॅट्स ऑल.
माफ करा. मोबल्यावर टंकतोय. फारसं लिहीता येत नाही. तुमच्याविषयी आदर आहे. तुमचं लेखन ही वाचलंय. आवडतं.
सहमत. गावडेकाका छानच लिहितात. :D
पण केवळ एक वेगळा विषय मिपावर मांडूच नये का?
मांडा की. मिपाच्या धोरणात असं कुठेही लिहिलेलं नाहीये. ते मनाला लावून घेणं मात्र बंद करा.
मग मिपा हे फक्त नास्तिकांचा फोरम म्हणून घोषित करावे का?
तो अधिकार नीलकांत (आणि संपादक मंडळाकडे) आहे. त्याला वाटलं तर करेल तो. आपण कोण बोलणारे? जालावरील संस्थळं ही नि:शुल्क सेवा आहे हे एकदा नीट ध्यानात ठेवलं तर बराच त्रास वाचतो, किंबहुना, होतच नाही.
इतरांनी तिथे लिहण्यापूर्वी आपल्या श्रद्धास्थानाविषयी वाट्टेल ते ऐकायची तयारी ठेवावी का?
हो. हो. हो. (मी स्वतःही ऐकलेलं आहे. एकदा नाही, अनेकदा.) आणी फक्त 'तिथे'च नाही, सगळीकडेच. वाटल्यास प्रतिवाद करा किंवा दुर्लक्ष करा. (ते तुमच्या स्वभावप्रकृतिवर अवलंबून आहे). *** बाकी काय म्हणता? कसं चाललंय? :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com