✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उंदरांची शर्यत

स
सुबोध खरे यांनी
गुरुवार, 07/18/2013 - 10:15  ·  लेख
लेख
काल माझ्याकडे एक लहान मुलगी आली होती वय वर्षे ३. मुत्र्मार्गाला जंतुसंसर्ग झाला( URINARY INFECTION) म्हणून बालरोग तज्ञांनी मुत्र मार्गाची तपासणी करण्या साठी सोनोग्राफी साठी पाठविले होते. तिची आई फारच काळजीत होती कारण तिला असे दुसऱ्यांदा झाले होते. आणी असे दोन दिवस शाळा (?) बुडल्याने तिच्या "पर्फोर्मंस"वर परिणाम होतो असे आईचे म्हणणे होते. हि मुलगी नर्सरीत होती. कालच एक माझी जुनी रुग्ण( म्हणजे प्रसुतीच्या वेळेस ३ - ४ वेळेस सोनोग्राफी साठी आलेली) सिझेरियन झाल्यानंतर टाके दुखतात म्हणून आली होती. तिच्या ४ वर्षाच्या मुलाला नाव विचारले तो म्हणाला अर्णव. मग विचारले कि कोणत्या शाळेत जातोस तर तो म्हणाला किंग जॉर्ज आणि सिल्वर क्रेस्ट. त्यावर त्याचे वडील म्हणाले कि अरे शाळा किंग जॉर्ज आणि ट्युशन सिल्वर क्रेस्ट असं सांगायचं. हा मुलगा ज्युनियर के जी त आहे. तसेच कालच आमच्या सौभाग्यावतींकडे एक बाई आल्या होत्या त्यांची मुलगी बाळंतीण झाली होती. मुलीला सासू नाही म्हणून आई आली होती आणि आई सांगत होती कि मुलगी माहेरी येण्यास तयार नाही मला दुसरी मुलगी आणि यजमान आहेत ते बीडला आहेत. मला इथे फार दिवस राहता येणार नाही.मी तिला सांगते आहे कि तू मुलाला घेऊन माहेरी चल मी तुझे बाळंतपण तेथे व्यवस्थित करते.आमच्या सौ नि मुलीला विचारले तू माहेरी का जात नाहीस? तिचे म्हणणे मुलाची शाळा बुडवणे शक्य नाही. मुलगा साडे तीन वर्षांचा आहे आणि नर्सरीत जातो. एकाच दिवशी तीन मुले पाहून माझ्या मनात एकाच विचार आला कि वय वर्षे ३ ते ५ या वयातील मुलांना शाळा इतकी महत्त्वाची आहे का? आणि ४ वर्षाच्या मुलाला ट्युशन ची गरज आहे का ( त्याला शिकवणी म्हणायचे नाही ते डाऊन मार्केट वाटते) आमच्या लहानपणी जी मुले अभ्यासात कमी असत त्यांना शिकवणी लावली जात असे. शिवाय इतक्या कमी वयात यांच्या खांद्यावर एवढे अपेक्षांचे ओझे टाकले तर हि मुले पुढे काय करणार. परत आता हि मुले घोका आणि ओका असा अभ्यास करतील पण एका विशिष्ट पातळीनंतर त्यांना हे झेपेनसे झाले कि त्यांचे गुण कमी होतात आणि यानंतर आई वडील अभ्यास कमी पडतो म्हणून अजून त्यांच्या डोक्यावर बसणार. हे कुठवर चालणार आहे. माझा मुलगा पहिला आलाच पाहिजे या हव्यासात तुम्ही त्याला या उंदरांच्या शर्यतीत(rat race) पळवत आहात पण हि शर्यत जिंकली तरी शेवटी तुम्ही फारतर उंदराचा राजा( ace rat) होता. माणूस कधी होणार?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
51768 वाचन

💬 प्रतिसाद (203)

प्रतिक्रिया

आमच्या कडे या उंदीर शर्यतीच्या उलट्या बोंबा आहेत.

बाबा पाटील
Fri, 07/19/2013 - 13:37 नवीन
दोन महिन्यांपुर्वी कन्यारत्न पहिलीत गेले.आणी शाळेतुन आल्यावर पहिल्याच दिवशी,"पपल्या उद्या शाळेत चल्,प्रिनसिपल बाईंना सांग क्लासटीचर बदलुन पाहिजे"आयच्या गावात मला चौथीपर्यंत आमच्या मातोश्रीच शिकवायला असल्यान वर्गात काहीही घडो पहिला मार अस्मादीकांनाच मिळायचा त्यामुळे शिक्षकांविषयी अनादर दाखवायची कधी हिंमतच झाली नाही.त्यामुळे बाइसाहेबांना खोदुन खोदुन विचारल्यावर कळल की बाळाने दुसर्‍या एका मुलाने बॉयकट वरुन चिडवल म्हणुन त्याला धोपटला त्यामुळे वर्गशिक्षिकाबाईंनी कोपर्‍यात उभे करायची शिक्षा दिली होती. असेही कन्या रत्न मागचे सहा महिने अभ्याससोडुन कराटे क्लास ,स्केटींग ,क्रिकेट असे सगळेच रिकामे उद्योग करतय. पिस्तोल शुटींग शिकायला निघाल होत पण वय बसत नसल्यामुळे एडमिशन मिळाली नाही. यावर्षी पोहायला शिकवायच वचन माझ्याकडुन कधीच घेतलय. माझ्या मते मुलांना त्यांच्या जबाबदारीवर सोडुन द्याव,आताची चिल्ली पिलीही त्यांना काय करायच आहे याचे निर्णय सभोवतालच्या परिस्थीतीनुसार बरोबर घेतात्,आपण फक्त त्यांना योग्य दिशा सांगायची. आजची पोर आपलीही बाप आहेत्,जमाना बहोत बदल गया है बॉस.........
  • Log in or register to post comments

राजे...

अर्धवटराव
Mon, 07/22/2013 - 18:33 नवीन
लय भारी कन्यारत्न. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

लई भारी गोष्ट, यासाठीच मी

५० फक्त
Sun, 07/28/2013 - 01:17 नवीन
लई भारी गोष्ट, यासाठीच मी पोराला शाळेत उशीरा घातलंय अगदी बायकोशी वाद घालुन, आता पोरगं आणि मी दोघंही जाम सुखात आहोत, निदान आम्ही दोघं तरी असं मानतो. आणि हो सध्याचा जमाना पाहता कराटे आणि पोहणं आलंच पाहिजे पोरांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

आईवडीलांची रजा शिल्लक नाही

रेवती
Fri, 07/19/2013 - 14:13 नवीन
आईवडीलांची रजा शिल्लक नाही म्हणून कितीतरी लहान मुले तशीच शाळेत येताना पहात होते. मग एकदा शाळेनेच दटावणारे पत्र पाठ्वले सगळ्यांना! आजारी मुलांची हेळसांड होतेच आणि वर तब्येत बरी असणार्‍यांना संसर्ग! मुलांना फार पळवत ठेवणारे पालक नात्यागोत्यात, मित्र मंडळीत दिसतात. एकीनं तर चक्क विचारलं होतं की तिच्या मुलीला जसं अठवड्याचे ६ वेगळाले क्लासेस असतात तसे माझ्या मुलाला नसल्याने "का गं, परवडत नाही का?" आनंदानं "नाही" असं सांगितलं. मग पुढे एका चांगल्या पोहण्याच्या वर्गाच्या शोधात असताना तिनं माहिती दिली "ए, पण जरा महाग आहे हां तो क्लास, परवडेल ना?" तशाच आनंदानं "हो" म्हणून सांगितलं. ;)
  • Log in or register to post comments

"परवडत नाही का?" असा प्रश्न

मृत्युन्जय
Fri, 07/19/2013 - 14:33 नवीन
"परवडत नाही का?" असा प्रश्न विचारणारी ती माऊली महान आहे. माझ्यातर्फे तिला एक दंडवत घाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

चालायचच!

रेवती
Fri, 07/19/2013 - 15:04 नवीन
चालायचच! ;) फक्त एका डॉक्टर मैत्रिणीनं मात्र प्रामाणिकपणे सांगितलं की दोन्ही मुलांना पाच पाच क्लासेस लावलेत पण त्यात ती रमत नाहीत आणि मुलांना वेळ देऊ शकत नसल्याचा अपराधीपणा मनातून जात नाही म्हणून बिचारी मुलं मात्र पळत असतात. असेही भेटतात म्हणून वर उल्लेख केलेल्यांचा वेडेपणा खपून जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

छान लेख...

पिलीयन रायडर
Fri, 07/19/2013 - 14:14 नवीन
एक तर मुळात खुप पैसा म्हणजे यश हे समीकरणच चुकीच आहे. खुप शिक, मोठा हो, मग खुप पैसा मिळेल, मग मोठं घर होईल, मग गाडी होईल, मग परदेशवारी होईल.. म्हणजे लोक चारदा नाव घेतील.. मग तु खुप यशस्वी "म्हणवला" जाशील.. कुणी असं का म्हणत नाही की खुप वाच..खुप ऐक, सम्रुद्ध हो, खुप खेळ, निरोगी रहा, खुप माणसं जोड, हसत रहा, लोकांना मदत कर, संवेदनशील हो आणि मुख्य म्हणजे समाधानी रहा.. मग तु "यशस्वी होशील"... तुमच्या मुलात ह्यातले काही जरी गुण असले तरी तो आनंदी आयुष्य जगेल, ह्या पेक्षा जास्त काय हवं.. पैसा , नोकरी, शिक्षण हे सगळं शेवटी आनंदी रहाणे ह्या साठीच आहे ना.. आता आनंद हा काही विकत मिळत नाही.. तो मानावा लागतो. मी तर म्हणेन की काही शिकवायच असेलच मुलांना तर "आनंद कसा मानावा" हे शिकवा.. ह्या रॅट रेस पायी वखवखलं मुल ह्या दुनियेत सोडुन तुम्ही त्याच्याच आयुष्याच नुकसान करताय.. त्याला कितीही मिळालं तरी ते असमाधानीच असणार.. कारण सतत मिळवत रहायची, पुढे जायची वृत्ती तुम्हीच त्याच्यात निर्माण केलीत.. असं नसतं तर तथाकथित मोठ्या संस्था (आय.आय्.टी) आणि कंपन्या मधील(हुषार आणि मोठे पॅकेजेस असणार्‍या) मुलांनी मानसिक ताणामुळे आत्महत्या नसत्या केल्या. अनेक लोक असे दिसतात जे वरकरणी अल्पसंतुष्ट वाटतील, पण ते लहान सहान गोष्टीं मध्ये पण खुश असतात. सतत आनंदी असतात.. तुमची आजी पहा.. तुम्हाला तिचा पांडुरंग खरा की खोटा असे प्रश्न पडत असतिल.. पण ती मात्र ह्याच्या पुढे जाऊन जेव्हा हरिपाठ वाचत असते, तेव्हा समईच्या मंद प्रकाशातला तिचा चेहरा पहा. ते समाधान तुम्हला करोड रुपये देऊन तरी मिळेल का? मग ती अडाणी (?) बाई जास्त यशस्वी की तुम्ही? आज तुम्ही हॉटेलात जाऊन हजारो रुपये उधळण्याच्या लायकीचे झालात, पण आई जसं जेवण बनवते ती चव आणि माया तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकला नाहित तर पालक म्हणुन तुम्ही यशस्वी की तुमचे मवाळ, मध्यमवर्गीय अल्पसंतुष्ट आई बाप? तुमचा वेळ, तुमची उबदार कुस, तुमच्याशी मारलेल्या गप्पा ह्या त्या मुलाला कोण देऊ शकतं? शालेय शिक्षणा मध्ये पुढे जायला शाळा/ ट्युशन असु शकतात.. पण पुढे जाताना जो ताण वाढत जातो त्याला तोंड द्यायला तुम्ही आणि तुमचे मुल दोघही भावनिक द्रुष्ट्या तयार आहात का? स्पर्धेत भाग घेणं वाईट नाहीचे, पण आयुष्याला स्पर्धा मानणं चुक.. स्पर्धा आयुष्याचा भाग असु शकते.. आयुष्य नाही..
  • Log in or register to post comments

एक धागा (सुखाचा).

प्रभाकर पेठकर
Fri, 07/19/2013 - 14:26 नवीन
मी तर म्हणेन की काही शिकवायच असेलच मुलांना तर "आनंद कसा मानावा" हे शिकवा..
तुमच्या मुलाला मिसळपावचे सदस्य बनवा. इथे 'आनंद कसा मानावा', 'जगावे कसे' ह्यावर एक धागा (सुखाचा?) आहे. तो वाच म्हणावं आणि तेच अंतिम सत्य आहे हेच मानलेस तर आणि तरच यशस्वी आणि सुखी होशील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अय्या विसरलेच मी...

पिलीयन रायडर
Fri, 07/19/2013 - 14:44 नवीन
अय्या विसरलेच मी... असं सोप्पं सोप्पं कसं बुवा चालेलं.. मी असं म्हणायला हवं होतं का.. मुला तुझं मन तुझ्या बहेर आहे आत नाही, तुला वाटतं की तु तु आहेस.. नाही.. तु तुझं मन आहे.. तुला जे वाटतय ते खरं तर तुझ्या मनाला वाटतय जो तु नाहीस.. आता जो तु नाह्चेस त्याला तु सम्जाव कि तो तु नाहियेस आनि ह्या सत्याला तु बिनशर्त स्वीकार.. मग बघ तु कसा सुखी होशील.. आणि हे सगळं तुला समजत नसेल तर तुझी चित्तदशा विमन्स्क आहे.. आणि तु नीट वाचतहि नसशील.. तरीही शांतपणे वाच.. समजलच नाही तर "एक धागा सुखाचा" वाच.. ते आपलं आयुष्य जगण्याचं नवनीत गाईड आहे.. तिथे सोपं करुन सांगितलय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१११

सुबोध खरे
Fri, 07/19/2013 - 19:17 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

स्पर्धा आयुष्याचा भाग असु शकते.. आयुष्य नाही..

सुबोध खरे
Fri, 07/19/2013 - 19:33 नवीन
@ पिलीयन रायडर क्या बात है ? + १ १ १ १ १ १. . . . . . . १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

खरं आहे.

साती
Fri, 07/19/2013 - 20:30 नवीन
खरं आहे. आमच्या मुलाच्या (वय साडेतीन) शाळेत ' व्हॉट यू वाँट यूवर चाईल्ड टू बी' असं फॉर्मवर भरून घेतलं . 'अ काईंड हार्टेड गुड नेचर्ड ह्युमन बिईंग' असं आम्ही लिहून दिलंय . बाकी सगळ्यानी डॉक्टर, इंजिनीयर , आय ए एस. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

'अ काईंड हार्टेड गुड नेचर्ड

काळा पहाड
Fri, 07/19/2013 - 23:05 नवीन
'अ काईंड हार्टेड गुड नेचर्ड ह्युमन बिईंग'
त्यांना कळलं नसेलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

साती आणि पिरा सुंदर विचार.

मोदक
Sat, 07/20/2013 - 14:15 नवीन
साती आणि पिरा सुंदर विचार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

छानच..

उपास
Tue, 07/23/2013 - 00:27 नवीन
वाचनीय आणि मननिय प्रतिसाद पिलीयन रायडर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पिलीयन रायडर

स्रुजा
Mon, 07/22/2013 - 09:14 नवीन
खुप शिक, मोठा हो, मग खुप पैसा मिळेल, मग मोठं घर होईल, मग गाडी होईल, मग परदेशवारी होईल.. म्हणजे लोक चारदा नाव घेतील.. मग तु खुप यशस्वी "म्हणवला" जाशील.. कुणी असं का म्हणत नाही की खुप वाच..खुप ऐक, सम्रुद्ध हो, खुप खेळ, निरोगी रहा, खुप माणसं जोड, हसत रहा, लोकांना मदत कर, संवेदनशील हो आणि मुख्य म्हणजे समाधानी रहा.. मग तु "यशस्वी होशील"... मला तुमचा comment पटला . फक्त एक मला highlight करावसं वाटतं . तुम्ही म्हणता तसं यशस्वी होण्यासाठी म्हणजे सुखी समाधानी संवेदनशील वगैरे होताना तुम्हाला पैसा पण कमावता येतो. या दोन व्याख्या mutually exclusive नसाव्यात . मला अशी खूप लोकं माहिती आहेत जी दोन्ही अर्थानी यशस्वी आहेत. आहे त्यात समाधान मानण आणि अल्पसंतुष्ट असणं यात आपल्याकडे नेहमीच घोळ होतो. ज्याला आपण rat race म्हणतो आहोत ते बर्याच अंशी peer pressure असतं . आणि ते पालक च ओढवून घेतात. लोकांचे हस्तक्षेप आणि आपला लोकांमध्ये हस्तक्षेप अशा दोन्ही भूमिकांमध्ये आपण कधी न कधी असतोच. मुळात आपल्याकडे boundry issues खूप आहेत . कुठे थांबायचा हे अनेकांना कळत नाही . मला अजून मुलं वाढवायची वेळ आलेली नाही . त्या मुळे पालकांच्या अनेक problems चा किंवा peer pressure ला बळी पडण्यच्या वृत्ती ला judge करण्याचा काही उद्देश नाही . मला एक च वाटतं एखाद्या गोष्टीची आवड नसणं आणि एखादी गोष्ट अजिबात च न कळणं या अतिशय भिन्न गोष्टी आहेत . त्यामुळे CBSC चा अभ्यास कठीण आहे असं म्हणणं मला फारसं पटत नाही . जर नीट शिकवलं तर ती गोष्ट निदान कळू शकतेच. आधुनिक मानव इतका "ढ " नाही . त्या विषयात अंगभूत गती असणं किंवा नसणं आणि ती गोष्ट न कळणं या वेगळ्या गोष्टी वाटतात मला . आपल्याकडे शिकवणं हे बर्याचदा त्या विषयासाठी नावड च निर्माण करतं . त्या मुळे ज्या विषयात गती नाही तो एखादा प्रवाहातला विषय असला तर तुम्हाला न्यूनगंड येतोच. कुठली ही गोष्ट लहान मुलांना नीट समजावून सांगितली कि कळते . मी हे मात्र स्वानुभवाने सांगू शकते. माझ्या भाची ला मी बटाटे कुस्कर्ण्यापासून ते भांडी लावायला मदत करणे आणि abcd , रंग ओळखणे पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत . आणि हे अनेकदा ती खेळायला कंटाळली आहे म्हणून तिचं मन रमवायला केलेले उद्योग आहेत. ती आत्ता फक्त ३ वर्षांची आहे. यातल्या बर्याच कामांची ती कास सोडून देणार जशी मोठी होत जाईल तशी. मात्र एखादी गोष्ट कुणी समजावत असताना ती समजून घेऊन अनुकरण करणं हा अनुभव किंवा धडा तिच्या आयुष्यभर कामी येणार . शिवाय making difference हे feeling तीला मिळतं हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा . आपण पहिली दुसरी मध्ये जे शिकतो किंवा कुठल्याही टप्प्यावर जे शिकतो त्याचा काय उपयोग हा प्रश्न मला म्हणून च पटत नाही . पालकांना वेळ नसणं आणि त्यातून मुलं कुठे कमी पडायला नको म्हणून proxy उभी करणं हा अगदी core उद्देश असावा nursery , day care किंवा tuition चा . यात आणखीन एक खूप मोठा point आहे . आपलं क्षितीज वाढवण्याचा . आई ची माया आणि तिच्या हाताची चव या गोष्टींना तोड नाहीच पण सुजाण आणि carrer केलेल्या आई नी तुमच्या aspirations वाढव्ण्यासाठी किंवा तुम्हाला मोठी स्वप्नं बघण्यास उत्तेजन देण्यासाठी केलेले प्रयत्न ही तितकेच मोलाचे असतात . त्याला कमी लेखण्यात काही अर्थ नाही. आयांनी सुद्धा केवळ घरी जेवण बनवलं नाही म्हणून guilty वाटून घेऊ नये असं माझं ठाम मत आहे. एक पुस्तक मध्ये वाचलं होतं - घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती . त्यात असं म्हणलं होतं की जन्माला येणारं प्रत्येक मूल हे ज्ञानेश्वरांच्याच प्रतिभेचं असतं मात्र त्याचं संगोपन पुढची दिशा ठरवतं . ज्ञानेश्वरांची प्रतिभा ते अयशस्वीते चा शिक्का इथपर्यंत एखादं मूल कसं पोहोचतं याचा विचार सगळ्यानीच करायला हवा. हा लेख आपल्याला विचार करण्यास भाग पाडतोय हे नक्कीच कौतुकास्पद आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आहे त्यात समाधान मानण आणि

बाळ सप्रे
Mon, 07/22/2013 - 12:14 नवीन
आहे त्यात समाधान मानण आणि अल्पसंतुष्ट असणं यात आपल्याकडे नेहमीच घोळ होतो. ज्याला आपण rat race म्हणतो आहोत ते बर्याच अंशी peer pressure असतं
परफेक्ट !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

बाळ सप्रे

स्रुजा
Tue, 08/20/2013 - 04:22 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

तुमचं म्हणणं पटलं मला..

पिलीयन रायडर
Mon, 07/22/2013 - 13:09 नवीन
तुमचं म्हणणं पटलं मला.. पैसा मिळवणं आणि समाधानी असणं ह्या गोष्टी mutually exclusive नाहीचेत.. पण आपण अशा पालंका विषयी बोलतोय ज्यांच्या साठी पैसा मिळवणं ही यशाची व्याख्या आहे. एखादं मुलं ह्या ठराविक कॅटेगरी मध्ये बसत नसलं तर ते अयशस्वी.. हे चुक आहे.. पैसा हा महत्वाचा आहे.. पण ते आपल्याला जे हवं ते मिळवण्याचं एक साधन आहे... साध्य नव्हे.. मला वाटतं गफलत इथे होते. मुलं ह्या मुळे भौतिक गोष्टींना जास्त प्राधान्य द्यायला लागतात. जसं की आई वडीलांचा सहवास, एखादी बागेतली सहल ह्या पेक्षा मॅक्-डी मधील बर्गर जास्त प्रिय होते.. एकंदरित ही जी एक संवेदनशीलता नष्ट होते ती वाचन, खेळ, संगीत ह्यांच्या पेक्षा अभ्यास आणि मार्क आणि नोकरि आणि पैसा ह्याला अवास्तव महत्व दिल्याने. मी स्वतः नोकरी करते आणि मला एक मुलगा आहे. माझी आईपण नोकरी करत होती आणि आम्ही पाळणाघरात राहिलो.. मला माझ्या आईच्या करिअरबद्दल अभिमान आहे आणि मी आभारी आहे की तिने नोकरी केल्याने आम्हाला थोडी गैरसोय जरी सहन करावी लागली तरि त्या बदल्यात १०० फायदे झाले. मी पाळणाघरात राहीले पण माझ्या आइने ह्या बद्दल स्वतःला कधीच गिल्टी समजले नाही. उलट तिने आणि वडीलांनी तिच्या नोकरि मुळे होणार्‍या अगणित फायद्यांची सतत जाणिव करुन दिली. त्यामुळे गिल्ट पोटी आमचे जास्त लाड करणे,नेहमी बाहेर खायला नेणे, आम्हाला शिकवणी लावणे असले प्रकार केले नाहीत. ती लक्ष पुर्ण द्यायची अभ्यासा कडे ,पण समोर बसवुन एक एक अक्षर बघणे इतकं पण तिने कधी केलं नाही. त्यामुळे आमचा अभ्यास आम्हीच करायचो, कसा, कधी ,किती हे आम्हीच ठरवायचो.. तिला आमच्या बुद्धिमत्तेची जाणिव होती. तिने तेवढ्याच अपे़षा ठेवल्या. आणि किमान त्या तरी ती पुर्ण करायला लावायची. तिथे बहाणे चालायचे नाहीत. पण १ ला नंबर च हवा अशा दुसर्‍यांशी तुलना होईल अशा अपेक्षा केल्या नाहीत. तुझी लायकी ९०% ची आहे, तेवढे तुला मिळाले पाहीजेत. तिथे आळस नको. अर्थात निकाल काहीही लागला तरी तिने नेहमी तो पेढे वाटुन साजराच केला. तिला कायम तिच्या मुलींचे कौतुक वाटत आले आहे. बाकी तिच्या अनेक मैत्रीणींची मुले परदेशात आहेत. पण तिच्या मुली भारतात आहेत आणि सर्व साधारण पैसे कमावतात. मी परदेशात मुल जावे म्हणुन देव पाण्यात घालुन ठेवलेले लोक पाहीलेत. आमचे पालक, आमच्या मुली किती वाचतात, किती धीट आहेत अशा विषयांवर कौतुकाने बोलत बसतात. त्यांना आमचे पगार आणि पोस्ट ह्यात फारसे स्वारस्य नाही. पण त्यातले किती आम्ही संस्थाना दान करतो हे मात्र ती नीट बघते. मी तिला पंचतारंकित हॉटेलात नेलं तरि तिला त्याचं अप्रुप वाटत नाही पण माझ्या मुलाचं वजन नीट भरलं नाही तर ती कच्चुन शिव्या घालते. मला वाटतं की आई बाबांना कुठे थांबाव हे कळालय, आम्ही शर्यतीत पळतोय ना नीट, हे त्यांनी पाहिलं, पण आम्ही तेवढं एकच एक काम कर करत नाही ना हे ही पाहिलं... काहीही करा, हवं वाटलं तर उर फुटेस्तोवर धावा ह्या शर्यतीत, फक्त त्यातला आनंद मिळत रहायला हवा. peer pressure ला आपण खरचं बळी पडतो.. ते खरं तर नाही होऊ द्यायला पाहिजे.. मी माझ्या आइ बाबांसोबत होते तोवर peer pressure ला नाही फारशी बधले.. जशी नोकरी सुरू झाली, पैसा आला, माहेर सुटलं, स्वतःच घर हातात आला सांभाळायला... मी peer pressure पुढे गुडघे टेकत गेले.. आता माझी इच्छा आहे.. किमान मुलावर तरी ते येऊ नये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

तिला आमच्या बुद्धिमत्तेची

स्रुजा
Tue, 08/20/2013 - 04:37 नवीन
तिला आमच्या बुद्धिमत्तेची जाणिव होती. तिने तेवढ्याच अपे़षा ठेवल्या. आणि किमान त्या तरी ती पुर्ण करायला लावायची. तिथे बहाणे चालायचे नाहीत. पण १ ला नंबर च हवा अशा दुसर्‍यांशी तुलना होईल अशा अपेक्षा केल्या नाहीत.
लाख मोलाची गोष्ट आहे ही . बर्याच पालकांना आपल्या पाल्याची गती एखाद्या तथाकथित प्रवाहापेक्षा वेगळया विषयात असेल तर त्याचं कौतुक वाटून पण व्यवहारात याचा काय उपयोग हा प्रश्न सतावत असावा . असो. या लेखावरच्या माझ्या पहिल्या प्रतिसादा नंतर मला प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही . पण यशोधरा, बाळ सप्रे आणि पिल्लियन रायडर च्या प्रतिक्रिया मला उत्साह वर्धक वाटल्या - धन्यवाद ! त्यामुळे उशीर झालेला असून ही मला ते acknowledge करणं महत्त्वाचं वाटलं .
काही बाबतीत मोठ्या माणसांच्या शर्यतीबद्दल प्रतिसाद आले आणि धागा थोडा भरकटला (असो त्यामुळे दुसरे आणि वेगळे विचार वाचायला मिळाले हि एक दुसरी उपलब्धी/फायदा ).
हे वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा धागा भरकटवण्यात माझा नकळत सहभाग होताच :P . पण विषयाची व्याप्ती अशी होती की ते आपो आप झालं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सुरेख पोस्ट सुजा.

यशोधरा
Wed, 07/24/2013 - 21:43 नवीन
सुरेख पोस्ट सुजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

एक नंबर !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/26/2013 - 11:05 नवीन
स्पर्धेत भाग घेणं वाईट नाहीचे, पण आयुष्याला स्पर्धा मानणं चुक.. स्पर्धा आयुष्याचा भाग असु शकते.. आयुष्य नाही.. एक नंबर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

+१

भावना कल्लोळ
Fri, 07/26/2013 - 18:58 नवीन
पिरा, माझ्या मनातले बोललीस, खरे तर काय प्रतिक्रिया देऊ हेच समजत नव्हते, आजची गरज म्हणुन मुलांना ssc इंग्लिश मिडीयम मध्ये घातले आहे, पण दोघांना हि टयूशन लावले नाही, तरी माझी दोन्ही मुले स्वतःच्या अभ्यास स्वः क्षमते वर करून चांगले मार्क्स काढतात, एकदा माझ्या मुलाने स्वतः मला विचारले कि आई मी काय होऊ? असे तुला वाटते, मी त्याला एवढेच म्हंटले जे तुला आवडेल पण एक चांगला माणुस हो, चांगला नागरिक हो … एवढे ऎकुन माझ्या ९ वर्षाच्या मुलाने मला घट्ट मिठी मारली. मी तिथेच भरून पावले. मी स्वतः जास्त शिकले नाही आहे, पण मला खूप वाटते माझ्या मुलांनी खुप शिकावे, पण त्यासाठी मी कधीच त्यांना बळजबरी केली नाही, करणार नाही, कारण शैक्षिणिक अनुभव तर ते दोघेही घेतील, स्वतःची आर्थिक प्रगती करतीलच यात शंका नाही, पण हे होताना व्यवहारिक जगात त्यांच्यातला माणुस हि तेवढाच समृद्ध व्हायला हवा असे मला तरी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आणि हा पेठकरकाकांचा उत्तुंग

सौंदाळा
Fri, 07/19/2013 - 14:30 नवीन
आणि हा पेठकरकाकांचा उत्तुंग षटकार ;)
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Fri, 07/19/2013 - 16:27 नवीन
२ वर्षे पूरी झाली की लगेच शाळेत घालतात ? त्याबद्दल काय वाटते आपल्याला.
  • Log in or register to post comments

सापेक्ष आहे ते.

धमाल मुलगा
Fri, 07/26/2013 - 21:00 नवीन
गेल्यावर्षीपर्यंत अशा लोकांना मी तोंडावर शिव्या घालायचो. आमच्या पोट्ट्यालाही २ वर्षांचा झाल्यावर शाळेत पाठवण्याचं टुमणं सुरु झालं होतं...चारचौघात मिसळायची सवय लागते, लवकर अभ्यास आत्मसात होतो वगैरे कारणं देणं सुरु झालं होतं. एकदा ठणकाऊन सांगितलं, "तुमच्यापेक्षा जास्त लोकांमध्ये असतं पोरगं. मिपाकर भेटले की त्यांच्या जोडीनं दंगा घालतं, पूनमसारख्या हाटेलातल्या सगळ्या स्टाफसोबत गप्पा मारतं, हिंडून येतं! आणखी काय चारचौघात मिसळायची वेगळी सवय लावायचीये? अन अभ्यासात पडलं मागं तर पडू द्या. त्याचा बा खंबीर आहे." ३ वर्षं पुर्ण झाल्यावर आत्ता शाळेत जायला लागलं पोरगं. मास्तरणींचे अभिप्राय - लक्ष देऊन शिकतो. शी शू चा त्रास देत नाही (बाकीची बरीचशी लेकरं शाळेत पोचायच्या गडबडीत बहुतेक तशीच येतात त्यामुळं शिकता शिकता कार्यक्रम उरकतात.). सगळ्यांशी मिसळून असतो. इ.इ.इ. आता ह्या सगळ्याचं क्रेडिट जातं पोराच्या आयशीला. तिनं चांगल्या सवयी लावल्या..पोरानं त्या आत्मसात केल्या. त्यासाठी त्याला शाळेत जायची गरज पडली नाही. अन २ वर्षापासून शाळेत जाणार्‍या पोरांची प्रगती तशी पाहता ज्या पातळीवर व्हायला हवी होती तशी ती दिसत नाही. मग काय उपयोग लेकरांच्या आयुष्यातलं हुंदडायचं एक वर्ष मारुन मुटकून वाया घालवण्याचा? आता दुसरा अनुभव - एका मित्राचा मुलगा काही केल्या बोलायलाच शिकत नव्हता. एकलकोंडा झालेला. आजी, आई आणि बाबा ह्यापलिकडे कुणाकडं पहायचाही नाही. त्याच्या डॉक्टरांनी सल्ला दिला, शाळेत घाला...शिकेल आपोआप. आता वर्षाभरानंतर किमान जाणवण्याइतपत तरी प्रगती आहे. ह्या समोर पाहिलेल्या अनुभवाअंती माझं मत बरंच बदललंय. सरसकट २ पुर्ण झालेल्या पोरांना शाळेत घालण्याची आवश्यकता मुळीच नाही, ते प्रगतीसापेक्ष आहे. असं माझं वैयक्तिक मत झालेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

.

आशु जोग
Fri, 07/19/2013 - 17:10 नवीन
मिसळीच्या मालकांनाही हा धागा उपयोगी आहे. धाग्याचा छान आहेर झाला.
  • Log in or register to post comments

सहमत!

साती
Fri, 07/19/2013 - 19:58 नवीन
लेखातील विचारांशी सहमत!
  • Log in or register to post comments

४ वर्षाच्या मुलाला ट्युशन

सुबोध खरे
Fri, 07/19/2013 - 20:13 नवीन
माझा मूळ विषय हा चिमुकल्या मुलांच्या खांद्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादून त्यांना या उंदीर दौडीत उतरवणाऱ्या आणि त्यांचे बालपण हरवणाऱ्या/ नासवणार्या पालकांबद्दल होता. काही बाबतीत मोठ्या माणसांच्या शर्यतीबद्दल प्रतिसाद आले आणि धागा थोडा भरकटला (असो त्यामुळे दुसरे आणि वेगळे विचार वाचायला मिळाले हि एक दुसरी उपलब्धी/फायदा ). मूळ मुद्दा इतक्या लहान मुलांच्या पालकांसाठी होता. वैयक्तिक दृष्ट्या माझे मत असे आहे कि शैक्षणिक यश हे यशस्वी आयुष्य जगण्यास फार तर दहा टक्के जबाबदार आहे(academic success is at the most 10% responsible for success in life ) . त्यामुळे त्याचा इतका बाऊ करणे हे गैरलागू आहे.
  • Log in or register to post comments

आमच्या लेकीच्या वर्गातल्या

शिल्पा ब
Sat, 07/20/2013 - 01:08 नवीन
आमच्या लेकीच्या वर्गातल्या एका मुलीची आई तिला किंडरगार्टन पासुनच क्लासला पाठवते.. कमाल वाटली ! अजुन एक - आता उन्हाळ्याची सुट्टी आहे तर मुलं घरीच म्हणुन दर आठवड्याला कसलातरी कँप लावलाय. खरं तर बाकीचे लोकं मुलांना इतकं रेटताना बघुन वाटतं आपलं पिल्लु मागे तर नाही राहणार ना ! कधीकधी थोडा ताण वाटतो तेवढाच.
  • Log in or register to post comments

न्यूनगंड

सुबोध खरे
Sat, 07/20/2013 - 09:56 नवीन
शिल्पा ताई, हा ताण नोकरी करणाऱ्या बायकांना अजूनच जाणवतो कारण ज्या बायका घरी असतात त्यांना अशा सर्व वर्गाना मुलांना आणायला आणि पोचवायला वेळ असतो आणि त्यावर काहीना आम्ही किती सुजाण पालक आहोत हे दाखवायची हौस असते(जितके जास्त क्लास किंवा छंद यांची शिबिरे तितके जास्त सुजाण) यातून त्या नोकरी करणाऱ्या बायकांना न्यूनगंड देत असतात. आधीच त्या दुप्पट मेहनत करीत असतात वर अशा बायकांचे सूचक उद्गार ( घरी असलं कि कसं मुलांवर संस्कार करता येतात इ इ) म्हणजे झालेच. चैनीची वस्तू गरजेची केंव्हा होते? जेंव्हा तुमचा शेजारी ती विकत घेतो तेंव्हा. आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टीला अग्रक्रम द्यायचा ते आपण ठरवले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तुमच्या प्रतिसादामुळे वेगळा

रेवती
Mon, 07/22/2013 - 22:28 नवीन
तुमच्या प्रतिसादामुळे वेगळा धागा काढवा लागेल असे दिसते. ;) पण न्यूनगंड देणे इ. दोन्ही बाजूकडून तेवढ्याच उत्साहाने चालते याचा अनुभव मी नोकरी करत असताना आणि सोडल्यावर घेतलाय. गृहिणी म्हणजे घरी बसून झोपा काढणारी व्यक्ती असे किंवा याप्रकारचे दुसर्‍याकडून म्हटले गेल्यावर मग समोरचा मनुष्य जवळ असल्या नसल्या वैचारिक भांडवलावर ;) विरुद्ध पार्टीला नामोहरम करू इच्छितो (किंवा उलट). खरेतर नोकरी करणे किंवा न करणे ही फक्त त्या त्या वेळची परिस्थिती असते व दोन्ही गोष्ती चांगल्या किंवा वाईट नसतात याकडे दुर्लक्ष होते. ताण जाणवणे हे खरेतर आपण स्विकारलेल्या परिस्थितीनुसारच असते. वेळाच्या दृष्टीने नोकरी करताना थोडी कमतरता जाणवते तशी दुसर्‍या बाजूलाही वेगळे काही जाणवत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रेवती ताई

सुबोध खरे
Tue, 07/23/2013 - 10:16 नवीन
तुमच्या प्रतिसादामुळे वेगळा धागा काढवा लागेल असे दिसते. जरूर वेगळा धागा काढा. या निमित्ते एक प्रश्नाची उहापोह होईल. माझी आई सुरुवातीला माझा आणी माझ्या भावाचा जन्म होईपर्यंत मैट्रिक होती. आमच्या बरोबर तिने आपलेपण शिक्षण पूर्ण केले (एम ए, बी एड) आणी शेवटी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. माझी बायको डॉक्टर असून माझ्या लष्करी नोकरीमुळे थोड्या आणी लांब कालावधी साठी गृहिणी झाली होती आणी माझी वहिनी संगणक अभियन्ति असून मुलांच्या संगोपनासाठी मधील काळ गृहिणी झाली होती. त्यामुळे हा प्रश्न मी फार जवळून पाहिलेला आहे आणी माझी काही मते ठाम बनली आहेत तरीही मला दुसरी बाजू जाणून घेणे नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

घरकाम की नोकरी.

प्रभाकर पेठकर
Tue, 07/23/2013 - 11:36 नवीन
बायकोने नोकरी करावी की नाही हे परिस्थितीनुरुप, दोघांनी विचारविनिमय करून, ठरवावे. गृहीणीला नोकरीकरणार्‍या बाईपेक्षा कमी व्याप असतात आणि 'अशा बायका' (तुमचाच, मला न पटलेला शब्दप्रयोग) नोकरी करणार्‍या बायकांना न्यूनगंड देतात हा निव्वळ भ्रम आहे. नोकरीत किंवा गृहकृत्यात स्त्रीला कितपत रस आहे ह्यावर होणारा त्रास अवलंबून असतो. जे काम मनाविरुद्ध करावे लागते त्यात प्रचंड त्रास होतो आणि त्याचे दुष्परीणाम, त्या व्यक्तीसह, कुटुंबातील इतरांना सोसावे लागतात. गृहीणीची भूमिका निभवायची की नोकरी करायची ह्यातून एकाची निवड करण्याची संधी निदान कांही स्त्रीयांना तरी असते. (पुरुषांना तशी संधी मिळत नाही. झक्कत नोकरी करावीच लागते) जेवढी मोठी स्वप्ने बघावीत तेवढी वाढीव अर्थार्जनाची 'गरज' आणि अपरिहार्यता निर्माण होते. दोघांच्या विचारविनिमयातून घरच्या स्त्रीला नोकरी करण्याची गरज असेल तर नवर्‍याने घरकामात मदत केलीच पाहिजे. पत्नी गृहीणी असेल तर नवर्‍याने घरकामांत मदत करणे ऐच्छिक असू शकते. बाकी , नवर्‍याला आवड असेल (जशी मला स्वयंपाकाची आहे) तर त्याने सोयीनुसार घरकाम जरूर करावे पण त्यात उपकाराची भावना असता कामा नये. तसेच, 'तुम्ही काय दिवसाचे १०-१२ तास बाहेर असता, मी ह्या चार भिंतीत गाडलेली असते' असा बायकोचा सूर असू नये. बायकोच्या घरकामास कमी लेखले तर तीला घरात काय काय कामे करावी लागतात ह्याची यादी ऐकावी लागते. तेंव्हा सूज्ञ नवर्‍याने तो मोह टाळावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गृहीणीची भूमिका निभवायची की

बॅटमॅन
Tue, 07/23/2013 - 11:55 नवीन
गृहीणीची भूमिका निभवायची की नोकरी करायची ह्यातून एकाची निवड करण्याची संधी निदान कांही स्त्रीयांना तरी असते. (पुरुषांना तशी संधी मिळत नाही. झक्कत नोकरी करावीच लागते)
लाख बोललात इतकेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१

दादा कोंडके
Tue, 07/23/2013 - 11:25 नवीन
त्यावर काहीना आम्ही किती सुजाण पालक आहोत हे दाखवायची हौस असते(जितके जास्त क्लास किंवा छंद यांची शिबिरे तितके जास्त सुजाण) यातून त्या नोकरी करणाऱ्या बायकांना न्यूनगंड देत असतात.
सहमत. बहुतेक (सो क्वाल्ड) होममेकर बायकांवर गृहिणीपण लादलेले असते. कारण विविधं असतात. शिक्षण नसणे, नवर्‍या मागोमाग (दुसर्‍या गावात/राज्यात/देशात) शेपुट म्हणून गेल्यामुळे नोकरी करायची परवानगी नसणे/वाव नसणे वैग्रे वैग्रे. मग या न्युनगंडातून 'आम्ही मुलांना वेळ देतो', (किरकोळ घरगुती जमाखर्च बघत असले तरीही) 'घराचं अर्थकारण सांभाळतो' वैग्रे वृथासमर्थन सुरू होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

.

आशु जोग
Tue, 07/23/2013 - 21:26 नवीन
कोंडके दादा, कुणी गृहीणी बनावे, कुणी नोकरी करावी हा विषय नाही पण त्याचा मुलांना काय फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे. विषय मुलांवरच्या ओझ्याचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

'वृथा'समर्थन आणि न्युनगंड

धमाल मुलगा
Fri, 07/26/2013 - 20:46 नवीन
शेठ, हे जरा जास्तच जनरायलेझन होतंय असं नाय का वाटत? हे म्हणजे 'चंगळवादासाठी अन पैशाच्या हव्यासापायी पोटच्या पोरांची आबाळ करुन नोकर्‍या करणार्‍या स्त्रियांना स्वतःच्या कर्तुत्वाचा माज असतो' असं म्हणल्यासारखं नाही का वाटत? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

ह्या धाग्याच्या निमित्ताने

प्रसाद गोडबोले
Sat, 07/20/2013 - 03:18 नवीन
ह्या धाग्याच्या निमित्ताने खलिलभाऊंना क्वोट करत आहे "Your children are not your children.They are the sons and daughters of Life's longing for itself. They come through you but not from you, And though they are with you yet they belong not to you." -- खलिल गिब्रान http://www.katsandogz.com/onchildren.html
  • Log in or register to post comments

काही वर्षांपूर्वी म्हणजे

नर्मदेतला गोटा
Mon, 07/22/2013 - 00:40 नवीन
काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण २००८, २००९ असेल. झी टीवीवर सारेगमप लिटल चँप सुरु होते. त्यात नात्यातल्या एका मुलीचा समावेष होता. तिच्या घरच्यांकडून तिच्या गाण्याचे फार कौतुक ऐकले होते. प्रत्यक्ष टीवी वर तिचे गाणे पाहताना इतर स्पर्धकांपेक्षा तिच्या गाण्यात अनेक दोष, कमतरता आहेत हे जाणवत असे. परंतु तिचे आईवडील तिच्या गाण्याचे कौतुक ऐकवताना थकत नसत. विशेष करुन आजोबांनी तिला महागायिका बनवण्याचा चंगच बांधला होता. या स्पर्धेमधेही ती फारशी टिकली नाही. त्याबद्दल तिच्या घरच्यांना कारण विचारले असता 'पॉलिटिक्स दुसरे काय ?' असे उत्तर ते देत असत. अशी उदाहरणे पाहिल्यावर एक गोष्ट प्रामाणिकपणे वाटते ती म्हणजे "आपला छंद हा आपल्या रोजीरोटीचे साधन होवू शकेलच असे नाही" याची जाणीव लहान मुलांना करून द्यायला हवी. किंवा "बाळा, तूझे गाणे अगदीच सुमार आहे त्यामुळे गाण्याचा नाद तू सोड" असे सांगणारा गुरु भेटायला हवा.
  • Log in or register to post comments

चांगला गुरू.

प्रभाकर पेठकर
Mon, 07/22/2013 - 02:17 नवीन
तूझे गाणे अगदीच सुमार आहे त्यामुळे गाण्याचा नाद तू सोड"
सारेगमपच्या स्पर्धेची पात्रता फेरी उत्तीर्ण झाली म्हणजे गाणे अगदीच सुमार नसणार. गाण्याचा नाद सोड असे सांगून तिचे खच्चीकरण करण्याऐवजी तिला चांगला गुरु मिळवून देऊन त्यावर सर्व जबाबदारी टाकावी. तिच्यात कांही गंभीर दोष असतील आणि ते दोष निवारता येण्याजोगे नसतील तर तिचे गुरूच तिला योग्य तो सल्ला देतील. पण आपल्याला जे गंभीर दोष वाटत आहेत ते पक्क्या गुरूला कदाचित क्षुल्लक चुका वाटतील आणि तो त्या दूर करेल. अगदीच गाण्याकडे पाठ फिरविण्यापेक्षा आणि सारेगमपला 'ऑस्कर दर्जा' बहाल करण्यापेक्षा तिला चांगल्या गुरूकडे सराव करू द्यावा. 'सारेगमप' हे संगीत क्षेत्रातील अंतिम पान नाही. निदान ती स्वान्तसुखाय तरी गाऊ शकेल. तिच्या आयुष्यातला तो आनंद आपण का हिरावून घ्यावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

'पॉलिटिक्स दुसरे काय ?'

सुबोध खरे
Mon, 07/22/2013 - 14:54 नवीन
सा रे ग म मध्ये राजकारण होते हे निर्विवादच. माझा एक अतिशय जवळचा नातेवाईक त्यात स्पर्धक होता आणि उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्याच्या वडिलांनी मला प्रांजळपणे सांगितले होते कि इतर स्पर्धक आमच्या मुलापेक्षा निस्संशय चांगले आहेत पण विविक्षित स्पर्धक पहिला येणार हे ठरलेले आहे आणि ते जातीचे राजकारण आहे त्यात गुणवत्ता असूनहि चांगले स्पर्धक जिंकणार नाहीत. कारण मिळणारे एस एम एस कसे फिरवायचे हे त्यांचे ठरलेले आहेत त्यामुळे स्पर्धेचे परीक्षक काहीही म्हणोत. असो आपले अपयश प्रांजळपणे कबुल करणे हे सहसा विरळच आहे. no situation in life is so bad that it cant be blamed on somebody else
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

झी मराठी ने जेव्हा आर्य

अभिजित - १
Sat, 08/10/2013 - 01:00 नवीन
झी मराठी ने जेव्हा आर्य आंबेकर / प्रथमेश लघाटे यांना बाजूला करून कार्तिकी गायकवाड ला निवडले तेव्हा पासून मी हा कार्यक्रम बघणे बंदच केले. माझ्या ओर्कुट प्रोफिले वरचा लेख इथे पोस्ट करतोय ----------- आत्ताच झि मराठि चा लिट्ल चॅम्प कार्यक्रम बघितला. आणि निकाल बघुन झिच्या निर्लज्ज पणाचि कमाल वाटलि. झी च्या सिडीवर बहिष्कार टाका .. प्रथमेश ला ५१ वेळा नी देउन शेवटि त्याचि अशि मारायाचि होति तर त्याला आधिच काढुन टाकायचा. सगळे ऐरे गैरे लोक ठेवायचे फ़क्त, जर का कार्तिकिला विजयि करायचे होते तर .. पण मग तुमचा कार्यक्रम कोणि बघितला असता ? आधि गानरेडा कोसम्बि आणि आता हि रेकराणि कार्तिकि. धन्य हो झी मराठि. बाकि देवकि, सुरेश वाडकर या लोकाना लाज वाटायला पाहिजे या झिच्या सेटिन्ग बाजित सामिल होताना. हे पण लोक विकाउ असतिल असे वाटले नव्हते. प्रथमेश , आर्या यानि सम्पुर्ण स्पर्धेत आपल्या कामगिरित सातत्य दाखवुन वेळोवेळि "नी" किवा त्याच्याहि वर मार्क मिळवले. ते हि वेगवेगळ्या बाजाचि गाणी गाउन. केवळ अभन्ग आणी ग्रामिण / लोकसन्गितामधिल १ / २ प्रकार गाउन नाहि. ( जे कार्तिकि ने केले ). झी चे हे आधिच ठरले होते कि कार्तिकि हिच त्यान्चि महागायिका असणार आहे. पण हे पाप आपल्या एकट्याच्या डोक्यावर नको म्हणुन अवधुतने इतर लोकाना पण, देवकि, वाडकर, अभ्यकर ज्युरि / जज म्हणून घ्यायला लावले. कार्तिकि चा आवाज हा खडा आणी एकसुरि आहे. भावगिते , श्रुगारिक, नाट्यसन्गित, क्लासिकल गाणि ति कधिच गायलि नाहि.झी च्या रमण्यावर जगणार्या या आधुनिक भिक्षुकानि ( अवधुत, देवकि, वैशालि सामन्त, सुरेश वाडकर, अभ्यकर etc ) स्वत:ला विकले. आणि खरया टॅलेन्टचा गळा घोटला. झीचा निषेध .. कोणिहि या झीचि सिडी विकत घेउ नका . बाकि देवकिचे बोलणे, स्पष्टवक्तेपणा , करारि बाणा या सगळ्या फ़क्त दाखवायच्याच गोष्टि होत्या हे आता कळले. हे म्हणजे .. मि नाहि त्यातलि आणी कडी लाव आतलि !! शाबास देवकि , शाब्बास .. झीच्या टोणग्याला आत्तापर्यन्त झालेलि अपत्ये .. अभिजित कोसम्बि - गानरेडा कार्तिकि गायकवाड - रेकराणिआता विचारु नका कि म्हैस कोण म्हणुन ? अरे आपल्या सर्वाचि आवडति , लाडकि, कर्तव्यकठोर, नि:पक्षपाति, आणी जाणकार अशि देवकि पन्डीत - जिचे ब्रिदवाक्य आहे - मी नाहि त्यातलि , कडी लाव आतलि .. आणि या महान प्रसुति समयि मदतिला होते - अवधुत गुप्ते, वैशालि सामन्त, श्रिधर फ़डके (?), अभ्यकर , खाडीलकर आणी जे पैसे फ़ेकले कि काहिहि करु शकतात असे सुरेश वाडकर ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सात्विक संताप

सुबोध खरे
Sat, 08/10/2013 - 09:46 नवीन
साहेब, आपला सात्विक संताप समजण्यासारखा आहे परंतु हा संताप नपुंसक आहे. आत्तापर्यंत तरी कला क्रीडा आणि लष्कर हे जातीच्या राजकारणापासून दूर होते. कलेमध्ये हे राजकारण घुसले आहे. खेळात घुसवण्याचे प्रयत्न होत असतात. लष्करात राजकारण आणण्याचा एक प्रयत्न एका संस्था करीत आहे ते मी काही दिवसापूर्वी एका लेखाला दिलेल्या प्रतिसादात लिहिले होते. दुर्दैवाने मतांचे आणि जातीचे राजकारण देशाला किती खालच्या पातळीवर नेईल ते सांगता येत नाही. एवढेच म्हणू शकतो आपला रक्तदाब वाढवण्यात काही हशील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

सालंकृत काठीने गाय

lakhu risbud
Sat, 08/10/2013 - 11:49 नवीन
याच विषयावर मिपावर गरमागरम (हा पण शब्द फिका पडेल) अशा चर्चा झाल्या आहेत. मग आत्ताचा या विषयाची ठसका,उबळ येण्यासारखे काय घडले ? का आपल्या अस्तित्वाचा "पुरावा म्हणून गडे हुये मुडदे उखाड रहे हो ". दुर्लक्ष करा ना राव ! त्यांनी धंद्याची गणिते लक्षात घेऊन वासरू मारलं तर तुम्ही तुमच्या प्रतिसादातील गानरेडा,टोणग्या, रेकराणि अशा सालंकृत काठीने गाय मारत आहात. विचारांची एवढी खोली,शब्दरूपी रत्नांचा एवढा सुंदर वापर सध्याच्या काळात क्वचितच बघण्यास मिळतो. हा विचारांचा आणि शब्दारत्नांचा नजराणा भेट देऊन मिपाच्या आणि सामान्य मिपाकरांच्या अल्प अशा मतीत आणि शब्दसंग्रहात मोलाची भर टाकल्याबद्दल धागाकार्त्याचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १

लेख तर सुरेखच आहे.

रुमानी
Mon, 07/22/2013 - 12:18 नवीन
लेख तर सुरेखच आहे. आज सगळे प्रतिसाद वाचले, प्रतिसाद ही तितकेच मस्त.....!
  • Log in or register to post comments

लेख आणि त्याद्वारे झालेले विचार-मंथन आवडले.

विटेकर
Mon, 07/22/2013 - 18:18 नवीन
academic success is at the most 10% responsible for success in life
हे डॉक्टर साहेबांचे वाक्य पुरेपूर पट्ले. आयुष्यात यशस्वी होण्याचे गणित , गणिताच्या पुस्तकात नक्किच नाही. याचा काही विदा (academic success Vs professional success) उपलब्ध आहे का ? माझा स्वतःचा प्रोब्लेम वेग्ळाच आहे.. आमच्या ११ वी तल्या मुलाला आपल्याला कमी मार्क पडले याचे खंतच वाटत नाही! आयुष्याकडे गांभिर्याने बघण्याचे हे वय नव्हे का ? कमालिची बेफिकिरी कोठून येते ? त्याचा स्वतःचा आत्म विश्वास प्रचंड आहे. त्याने स्वतः सांगितले होते तेवढेच मार्क त्याला मिळाले. पण पूर्ण ताकदिनिशी प्रयत्न करावेत असे त्याला का वाटत नाही ? आमचेच काही चुकते का ? त्याला मिळालेले मार्क त्याने केलेल्या प्रयत्नाच्या प्रमाणात नाही, जास्त आहेत. प्रयत्न न करता हे मिळालेले मार्क पुढील आयुष्यासाठी चान्गले नाही. त्याला मार्क किती पडले त्यापेक्षा त्याने प्रयत्न केले नाहीत याचा मला जास्त त्रास होतो. शैक्षिणिक यश हे चन्चु प्रवेशासाठी लागते ना ? त्यासाठी प्रयत्न करायला नको का ? की या वयात मुले अशीच वागतात ?
  • Log in or register to post comments

ही नीड्स टु जोईन द डॉट्स.

अर्धवटराव
Mon, 07/22/2013 - 22:09 नवीन
तुमचा मुलगा प्रचंड आत्मविश्वास बाळगतो ना, म्हणजे इंजीन पुरेसं स्टाँग आहे आणि त्यात इंधन देखील भरपूर आहे. त्याच्या डोळ्यासमोर उद्याचं नेमकं चित्र सध्या क्लीअर नसेल. ते क्लीअर व्हायला त्याला मदत करा. हे काम अगदी एक बैठकीत होणार नाहि. पण एकदाका तो शेवट बिंदु दिसला कि त्याला आजच्या परिस्थितीशी जोडता येईल व तो आपला मार्ग आपोआप अनुसरेल. त्यात विद्यापीठाच्या डीग्रीचा थांबा असेल वा नसेल. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

खरे आहे तुमचे ..

विटेकर
Tue, 07/23/2013 - 12:48 नवीन
सध्या काही दिवस थोडे स्वस्थच असावे असे म्हणतोय. लेट इट बी शेप ऑन इट्स ओन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

खूप उदाहरणे दिसतात अशा पालकांची!

अनन्न्या
Mon, 07/22/2013 - 18:21 नवीन
माझ्या लेकाच्या बॅडमिंटन स्पर्धांच्या वेळी एक मुलगा पहिलीच मॅच हरला, १३-१४ वर्षांची मुले अजून शिकणारी! पण त्याच्या आईने कोर्टवर जे काही महानाट्य केले, त्या बिचाय्रा मुलाला आपण हरलो म्हणजे फार मोठा गुन्हा केला असेच वाटले असेल. स्वतः आई मात्र त्याला जो ड्बा घेऊन आली त्यात मुंग्या आलेली खराब केळी आणि कुरकुरे! रडत रडत तो आपला डबा खाण्याचा प्रयत्न करत होता, आई केव्हाच तडतडत घरी निघून गेली होती. आम्ही इतर पालकांनी त्याची समजूत घातली, त्याला मुलांच्या डब्यातला खाऊ दिला. पण प्रत्येक स्पर्धेत आपले मुल पहिलेच आले पाहिजे अशी मानसिकता अनेक पालकांची असते, आणि या अर्धवट वयात ती मुलांच्या मनावर विपरीत परीणाम करते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा