✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लबाड सभ्य

स
सृष्टीलावण्या यांनी
Sat, 08/25/2012 - 06:30  ·  लेख
लेख
सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो. हे तेच गोपीनाथपंत आहेत जे स्वराज्यावर अफझलखानासारखी विलक्षण धूर्त, कपटी आणि कावेबाज वावटळ आली असताना शिवाजी राजांना ओतप्रोत विश्वासाने म्हणतात, “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ शिवाजीराजे म्हणजे लखलखता हिरा तर त्यांचे सहायक मंत्रीगण म्हणजे जणू सोन्याचे कोंदण. पाहाण्यासारखी गोष्ट आहे की खान राजांच्या मुलुखात आल्यावर साम-दाम-दंड भेदाने राजांची माणसे फोडायचा प्रयत्न करतो. वतनाच्या लोभाने त्याला बळी पडणार्‍यांत मंबाजी भोसले (महाराजांचे चुलत काका), केदारजी व खंडोजी खोपडे, जाधवराव, रविराज ढोणे, शेडगे, धायगुडे, कोकरे, इंगळे, सुलतानजी जगदाळे ह्यांच्यासारखी माणसे आहेत पण गोपीनाथपंत बोकीलांसारखा सामान्य कुलकर्णी मात्र राजांशी एकनिष्ठ राहतो. आज गोपीनाथपंत बोकीलांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही पण सासवड जवळील हिवरे गावाचे जोशी-कुलकर्णीपद ह्यांच्याकडे पूर्वापार चालत आले होते. शिवाय सुपे परगणा आणि कर्यात बारामतिचे देशकुलकर्णी पदाचे वतनही त्यांच्याकडे चालत आलेले असावे. १६४० मध्ये ते पुण्याचे मुजुमदार होते आणि १६५६ पासून राजांचे चिटणीस. ह्या तालेवार, मातब्बर असामीला राजांच्या कुटुंबात एखाद्या ज्येष्ठ माणसाप्रमाणे मान होता. त्यांचा घरोबा होता इतका की सगळे त्यांना काकाच म्हणत, ‘पंताजी काका ह्यांचा मान तो इतका की त्यांनी आऊसाहेबांसोबत सोंगट्या खेळाव्या’ असा त्यांचा उल्लेख आढळतो. राजे पंताना म्हणतात की खानाने बोलणी करताना बेलभंडारा (क्रियाशपथ) मागीतला तरी खुशाल द्यावा. अनमान करू नये. त्या काळात शत्रुचाही ब्राह्मणांच्या सत्यकथनावर विश्वास होता. त्यामुळे शपथेवर खोटे बोलणे पंतांना किती कठीण असेल पण त्यांनी स्वराज्यासाठी तेही केले.खानाने पंताकडून जानव्याची शपथ घेतली. ह्याच कपटी खानाने श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला तहाच्या मिषे बोलावून त्याचा खून केलेला असतो. त्यामुळे अश्या धूर्त, चाणाक्ष व विजयासाठी कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध न बाळगणार्‍या ह्या खानाला आपल्या वाक्पटुतेने जावळी सारख्या कुबल जागी बोलवून आणणे ही पंतांच्या बुद्धिचातुर्याची कमालच म्हणायला हवी. आपल्याकडे विनोदाने म्हणतात की चीनशी भारताच्या वाटाघाटी म्हणजे वाटा त्यांना आणि घाटा आपल्याला. पण पंत इतकी सावध पण लाघवी बोलणी करतात की खानासारखा कसलेला मुत्सद्दी पण पाघळतो आणि सह्याद्री हे मृत्युमुख आहे हे माहित असताना सुद्धा राजांना अपेक्षित अटींवर जावळीत येतो. हे घडणे केवळ पंतांच्या कौटिल्याचे फळ आहे. पंत खानासोबत केवळ वाटाघाटीच करतात असे नाही तर खानाच्या छावणीत राहून खानाचे विचार, त्याचे सैन्य, प्रमुख सेनानी, सैन्यरचना, अश्वदळ, तोफखाना इ. बित्तंबातमी काढतात. म्हणूनच बाबासाहेब पुरंदरे गोपीनाथपंतांना सभ्य लबाड किंवा लबाड सभ्य म्हणतात, वकील असावा तर असाच. पण पंतांचे हे प्रसंगावधान, ही धूर्तता इथेच संपत नाही. खान व राजांच्या भेटीच्या दिवशी गोपीनाथपंत खानाला आणण्यासाठी खानाच्या छावणीत पोहोचले. पाहातात तो खानाने ठरलेल्या अटींना डावलून १५०० हशम सोबत घेतले होते. सुरूवातीला पंतांनी ह्या सैन्याला हरकत घेतली नाही. मात्र खानाचा हा लवाजमा जनीच्या टेंबाच्या पायथ्याशी “खाड्याच्या खोंडात“ आल्याबरोबर पंत काहीतरी अचानक जाणवल्यागत उभे राहिले आणि बोलले, “इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धास्त खाईल. माघारा गडावरी जाईल. भेटी होणार नाही.... शिवाजी म्हणजे काय? त्यास इतका सामान काय करावा?“ खानाचा आता नाईलाज झाला. ह्या तुकडीचे येणे ठरलेल्या अटींच्या विरूद्ध होते हे खरेच आणि परत भेटीची वेळही पुढे पुढे सरकत होती. अश्या रीतीने पंतांनी खानाच्या खास तुकडीला खानापासून वेगळे केले व अडनिड्या जागी आणून ठेवले. परकी मुलुख आणि जावळीसारखे घनदाट, कीर्र जंगल. खानाच्या हत्येनंतर सर्वप्रथम ही तुकडी विनासायास कापली गेली. अजून एक अतिशय स्तुत्य गोष्ट म्हणजे वृद्ध पंतांना वारंवार खानाच्या भेटीला जावे लागते. थकलेले, वाकलेले काका प्रतापगड १६ कोस हे अंतर कधी पायी तर कधी पालखीतून तर कधी घोड्यावरून करतात. बरं हा मार्ग तरी साधा, सोपा, सरळ आहे का?... तर नाही.एकतर जावळीचे घनदाट जंगल त्यातून अर्ध्या कोसाचा प्रतापगड उतरायचा, दीड कोसाचा महाबळेश्वराचा डोंगर चढायचा, परत दीड कोसाचा पसरणीचा घाट उतरायचा. हे श्रम विलक्षणच म्हणायला हवेत. ह्यावरून कळते की अफजलखानाच्या ससैन्य विनाशात पंतांची कामगिरी किती महत्त्वाची आहे आणि हे जाणूनच राजांनी पंतांचा विशेष सत्कार केला. त्यांना एक लक्ष (आकडा पुन्हा वाचावा) होन इनाम दिले. त्यांचे राहते गाव मौजे हिरवे तर इनाम दिलेच पण सोबत शिरवळ परगण्यातील मौजे भोळी व मौजे मांडकी येथे प्रत्येकी १ चावर जमीन इनाम दिली. तसेच त्याच शिरवळ परगण्यातील मौजे घरवाडा व मौजे मांडकी येथे सेटेपणाचे वतन इनाम दिले. खरोखरच माणसे निवडून, वेचून, जोडून त्यांच्याकडून ईश्वरी कार्य घडवावे आणि त्या कार्याची दखल घ्यावी ती जाणत्या शिवाजी राजांनीच. असो. गोपीनाथपंतांच्या उत्तरायुष्याबाबत अधिक माहिती मिळत नाही पण वाईमध्ये सर्वात जुना वाडा गोपीनाथ पंत ह्यांचा आहे अशी माहिती महागणपतिवाई ह्या संकेतस्थळावर मिळते. अर्थातच गोपीनाथपंतांसारख्या अनमोल रत्नावर अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे आणि तेही मनात कोणतेही किल्मिष न ठेवता. कारण जोतिबा आपल्या फुले रचनावली २/७७ येथे म्हणतात – हरामखोर गोपीनाथपंतांच्या मदतीने शिवाजीने दगलबाजीने अफजलखानाची हत्या केली. सहाजिकच मनात प्रश्न येतात – १) शिवाजीराजांना “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ असे आत्मविश्वासाने सांगणारे स्वराज्याशी एकनिष्ठ आणि निबिड अरण्यातून १६ कोस अंतर कापून अनेकदा खानाच्या भेटीला जाणारे आणि हिंदवी स्वराज्यासाठी खानाच्या सैन्याविषयी बित्तंबातमी काढणारे गोपीनाथपंत हरामखोर कसे? 2) श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला आणाशपथा देऊन तहासाठी बोलावून त्याचा खून करणार्‍या अनैतिक, कपटी खानाचा जर शिवाजीराजांनी भेटीला बोलवल्यावर स्वसंरक्षणासाठी जर कोथळा बाहेर काढला तर ती दगलबाजी कशी काय? ३) (प्रेमात आणि) युद्धात सर्व काही क्षम्य असते. मानवाचा वैश्विक स्तरावरील राजकारण व युद्धेतिहास हा धोका, धूर्तता, दगलबाजी, विश्वासघात, गनिमी कावा ह्यांनीच भरलेला आहे. प्रश्न केवळ इतकाच असतो की हे सर्व करणार्‍याचा अंतर्हेतु काय आहे. शिवाजीराजांचे राज्य हे लोककल्याणासाठीच होते हे जोतिबांना ठाऊक नव्हते का? ४) केवळ विशिष्ट जमातीविषयी द्वेष मनात ठेऊन पूर्वग्रहदूषित, एकांगी इतिहासलेखन करणे म्हणजे सत्यशोधन होते का? संदर्भग्रंथ :– वेध महामानवाचा – लेखक - डॉ. श्रीनिवास सामंत राजा शिवछत्रपति - लेखक – ब. मो. पुरंदरे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
इतिहास
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
मत
आस्वाद
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
15228 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

आपल्याला

सृष्टीलावण्या
Wed, 08/29/2012 - 16:17 नवीन
गोपीनाथ पंतांना म. फुल्यांनी हरामखोर म्हटलेलं नाही.
केवळ शब्द योजायचा होता का? कारण वर (हरामखोर शब्दाच्या आसपास) दिलेला दुवा आपण वाचलेला दिसत नाही. लेख पुन्हा काळजीपूर्वक वाचण्याची तसदी घ्यावी म्हणजे "नजरचुका" टळतील.
  • Log in or register to post comments

आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/30/2012 - 07:39 नवीन
आपला लेख काळजीपूर्वकच वाचला आहे. गोपीनाथपंत थोर होते. पंतांचे प्रसंगावधान, पंतांची धूर्तता आणि पंतांचे कार्य अलौकिकच आहे. गोपीनाथ पंतासारख्या रत्नांवर संशोधन झालं पाहिजे. त्यांच्या कार्याचे लेख शाळा-महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात लागले पाहिजेत. एवढं बोलुन.....दोन शब्द संपवतो. बाकी, दीर्घ प्रतिसाद लिहिण्याचे ठरवले होते. पण तो विचार तूर्तास क्यान्सल केला आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी. सर्वांचे मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

.

सृष्टीलावण्या
Fri, 08/31/2012 - 09:52 नवीन
दीर्घ प्रतिसाद लिहिण्याचे ठरवले होते. पण तो विचार तूर्तास क्यान्सल केला आहे
शतशः धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थत्तेचाचांशी १००% बाडीस.

मितभाषी
Sun, 06/16/2013 - 08:12 नवीन
थत्तेचाचांशी १००% बाडीस. आजची स्वाक्षरी: अगर गोपिनाथपंत ना होता तो शिवाजी ना होता, सबकी सुंता होती......
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Sun, 06/16/2013 - 15:44 नवीन
चांगले माहितीपर लेखन सृष्टीलावण्या बादवे महाराजांचे नाव घेऊन अतिघाण लिहिणार्‍याबद्दल खोडकर माणसांबद्दल काय बोलावे. त्याने तर फारच बदनामी केली आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा