मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साजन चले ससुराल........

गणपा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
या घटेनेला आता दिड दोन वर्षं होतं आली. आजतागत हे गुपीत माझ्या बायको आणि मेव्हणी व्यतिरिक्त कुण्या चवथ्या व्यक्तीस माहित नाही. तेव्हा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या घटनेची कृपया बाहेर कुठेही वाच्यता करु नका. मागच्या सुट्टीत एका भल्या पहाटे तांबड फुटायच्या आत अस्मादिकांच विमान मुंबापुरीत येऊन दाखल झाल. संपुर्ण विमान प्रवासात कधी नव्हे ते यावेळी राम नामाचा जप चालू होता. (कर्टसी गवि.) पुर्वी विमानतळावर जाताना वा तिथुन येताना नातेवाईक सहकुटुंब सोडायला/घ्यायला येत. पुढे पुढे माझ येण्या जाण्याच प्रमाण इतकं वाढलं तस रोज मरे त्याला कोण रडे. फक्त बाबा तेवढे घ्यायला आणि सोडायला येत असत. (नातेवाईक न येण्याचं खर कारण म्हणजे मी नंतर नंतर भेटवस्तु आणायची टाळा टाळ करु लागलो. ;) अहो पुर्वी ठिक होतं, आपल्याकडे बाहेरच्या वस्तु आजसारख्या सर्रास मिळत नसत. आता चायनाचा आणि आपल्याकडचाच माल परदेशातुन दुप्प्ट किमतीला आणुन भेट म्हणुन देण्यात काही अर्थ आहे का?) हल्ली हल्ली तर मी बाबांनाही विमानतळावर येऊ देत नाही. उगाच त्यांची झोप मोड करुन विमानतळावर ताटकाळत उभ करण मला पटत नाही. शेवटी विमानतळावरचे सगळे सोपस्कार आटोपून मी एक काळीपीवळी बुक केली. टॅक्सीवाल्या भय्याशी शिळोप्याच्या गफ्फा हाणत घराच्या दिशेने कुच केल. मुंबईच्या वाहतुक कोंडीतुन मजल मारत मारत एकदाचा दहिसरला पोहोचलो. घरी अर्धांगीनी वाटच पहात होती. लेकीला माझ्या येण्याची कल्पना दिली नव्हती. ती अजुनही साखर झोपेतच होती. हात-पाय धुवून सरळ तिच्या पांघरुणात शिरलो. नेहमी प्रमाणे तिचे पापे घेत साखरझोप मोडु लागलो. डोळे उघडताच क्षणात तिच्या चेहर्‍यावरचे क्रमाक्रमाने बदलत जाणारे वैताग-आश्चर्य-अत्याआनंद आदी भाव टिपुन घ्यायला मला फार आवडतात. आई बाबा गावालाच होते म्हणुन संध्याकाळ्च्या गाडीनेच गावाल जायचं ठरल होतं. रात्र थोडी नी सोंगं फार अशी अवस्था होती. थोड्या वेळात बरीच काम आटोपायची असल्याने जास्त वेळ न दवडता चहा फराळ करुन घरा बाहेर पडलो. थोडी बँकेतली आणि ईतर कामं आटोपली आणि १०-१०:३० च्या सुमारास सासरी निघायची तयारी केली. संध्याकाळी सासुरवाडीहुनच पुढची गावाला जाणारी गाडी पकडायची होती. एक मोठी सॅक सोडली तर बाकी दुसरं काही सामान नव्हत. मला रेल्वेचा प्रवास आवडतो. मग कितीही मरणाची गर्दी का असेना. तिकिटं काढुन फलाटावर आलो. गर्दीच्या उलटा प्रवास (दहिसर ते विरार) असला तरी पण ती वेळ ऐन कामाची असल्याने फलाटावर बर्‍यापैकी गर्दी होती. थोड्या वेळात गाडी आली. दसर्‍याला सोनं लुटायला निघावं त्या त्वेशाने लोकं तुटुन पडली. पण आश्चर्य म्हणजे आम्ही जिथे उभे होतो तिथे प्रथम दर्जा नसुनही फारशी गर्दीच नव्हती. थोडं आश्चर्य वाटलं पण ते व्यक्त करत बसण्या इतका वेळ नव्हता हाताशी. काही बाया बापडे त्या डब्यात शिरत होते आम्ही पण शिरलो पटकन. आत जरा नेहमी पेक्षा वेगळीच आसन व्यवस्था होती. मग बायकोची ट्युब पेटली की हा विकलांगांचा डबा आहे. पुढल्या स्थानकात डबा बदलायचा विचार केला होता पण आजु बाजुला नजर टाकली तर अर्ध्याहुन अधिक डबा धडधाकट माणसांनी भरलेला होता. त्यामुळे थोडी भीड चेपली. दरवाज्यात उभ राहुन हवा खायची जुनी सवय उफाळुन आल्याने बसायला जागा असुनही मी सॅक घेउन दारा जवळच्या जागेत (दारात नव्हे) उभा होतो. भाईंदर स्थानकात गाडी शिरली आणि तितक्यात दोन इसम आत शिरुन सरळ माझ्या जवळ आले. एकान हळुवार माझ्या खांद्यावर हात दिला दुसर्‍यानं मनगट पकडलं आणि अत्यंतीक प्रेमाने म्हणाले "चलिये." म्हटल टिकिट तपासनीस असतील. मी तिकिट दाखवायचा प्रयत्न केला पण ते ऐकेनात. गाडी सुटायला आली होती. लेकी समोर तमाशा नको म्हणुन मी गप गुमान उतरलो आणि बायको लेकीला घेउन गाडी मार्गस्थ झाली. फलाटावर उतरल्यावर त्या दोघा इसमांनी मला एका गणवेशातल्या हवालदाराकडे सोपवलं आणि ते दोघे नवं पाखरू हुडकण्याच्या कामगिरीवर रवाना झाले. बायको लेकीची तिकीटं माझ्याकडेच होती. त्यामुळे त्या दोघींना परत पुढे कुणी पकडल तर काय? याची काळजी वाटायला लागली. अश्या परिथितीत एखादा सर्वसामान्य माणुस जे करतो तेच करायचं ठरवलं. मामाला हे प्रकरण तिथल्या तिथेच मिटवायची गळ घातली. पण तो पण राजा हरिश्चंद्राची अवलाद निघाला. खर तर त्या अवस्थेतही मला त्याचा आदरच वाटला. मग म्हटल हव तर रितसर पावती फाडा मी दंड भरतो. माझी बायको मुलगी पुढे गेल्या आहेत आणि त्यांची तिकिटं माझ्याकडेच आहेत. पण तो बधला नाही. "सहाब के पास चलो." म्हणत माझी वरात काढत निघाला. मागाहुन कळलं की तो रेसुबवाला (रेल्वे सुरक्षा बल) मामा होता. मग माझी थोडी तंतरली. हे प्रकरण काही साध दिसत नाही. कारण हे लोक कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. आमची वरात स्थानका बाहेर आली. आजु बाजुचं पब्लीक "साला कपड्यावरुन तर झंटलमन दिसतोय" अश्या नजरेने पहात होते. माझी ही पहिलीच खेप असल्याने निर्ढावल्याचे भाव प्रयत्न करुनही चेहेर्‍यावर आणता येत नव्हते. पुढे काय वाढुन ठेवलय या चिंतेने आतल्या आत गुदमरत होतो. रेल्वेपुलाच्या जिन्या खालच्या पोकळीत लोखंडाचे गज बसवून त्यात काही पाखरं कोंडुन ठेवलीली दिसली. तितक्यात एक दुसर्‍या मामाला त्या छोटेखानी तुरंगाच दार उघडुन एकाला आत ढकलताना पाहिलं. मी त्या प्राण्याकडे भुतदयेने पाहील. मला मामाने एका खोली बाहेर उभ केलं आणि दुसर्‍याला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगुन स्वतः आत गायब झाला. पाच मिनिटाने तो बाहेत आला. मला म्ह्णाला 'चलो'. मी मी मुकाट त्याच्या मागे चालु लागलो. आता माझ्याकडे भुतदयेने पहाण्याची इतरांची पाळी होती. मला त्या जिन्या खालच्या कुबट जागेत कोंडून मामा पसार झाला. तिकडे बायकोला मला कुणी आणि का पकडलय त्याचा काहीच अंदाज लगेना. ती बिचारी घाबरी घुबरी झाली होती. नजाणो लग्ना आधीच मी केलीली लफडी आता उफाळुन वर आली असावीत असाही एक विचार चाटुन गेला असेल. लेकीची फरफट नको म्हणुन तिला माहेरी सोडुन यावं की आधी नवर्‍याच काय झालय ते पहाव ते तिला क्षण भर सुचेना. ईथे मी माझ्या परीने त्या मामाला, साहेबाशी निदान दोन शब्द बोलायची परवानगी तरी द्या म्हणुन नाना परीने विनवण्या केल्या. साहेब बाहे गेलेत आणि अर्ध्या तासाने येतील अस कळल. आता सरकारी अर्धा तास म्हणजे दिड दोन तासांना मरण नाही. आजु बाजुला नजर फिरवली. बरीच कळकट्ट मळकट्ट अवतारातले गर्दुल्ले मंडळी दिसत होती. काही वेठबिगार दिसत होते. माझ्या सारखा झंटलमन कुणीच दिसेना. एका दोघांनी विचारणा केली 'क्या रे? क्या किया?' म्हटलं चुकुन अपंगाच्या डब्यात शिरलो होतो. 'बांस इतनाईच. फिर इतना डरता कायकु? शाम को कोरट मे लेके जायेंगे. उधर बेल होजायेगी. फिकर मत करो. बस घरसे किसीको बुलवालो.' माझ्या एका सेलमेट वकिलाने विना मोबदला सल्ला कम धिर दिला. आयला आता आलीका पंचाईत. हे कोर्ट प्रकरण वगैरे माझ्यासाठी नवीनच होतं. 'शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये' या ऐकिव सल्ल्याला जागुन आजतागत कधी कोर्टाच तोंड पाहिलं नव्हत. (हा मागे एकदा एका मित्राला मदत म्हणुन पळुन जाउन कोर्टात लग्न करायला मदत केली होती, पण ते वायलं.) परत वर जामिन म्हणुन कुणाला बोलवावे? हाही प्रश्न होताच. बायको-लेकी समोर फरफट होऊ नये अस मनापासुन वाटत होतं. बाबा तर गावाला होते. सासरेबुवा !!! बापरे नकोच. साला सासरी इज्जत नाय गेली पाहिजे. बर माझ्याकडे भारतातला भ्रमणध्वनीही नव्हता, की जेणे करुन मामाला (माझा सख्खा मामा) बोलवता येईल. त्यात आठवड्यातला मधलाच वार असल्याने लगेच कुणाची मदत मिळेल का ही शंका होतीच. शेवटी माझ्याकडे असलेल्या मोबाईलवरुन बायकोला आंतरराट्रिय कॉल लावला. माझी रवानगी भाइंदरच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कोठडीत झाल्याच कसबस कळवलं आणि तितक्यात माझ्या भ्रमणध्वनीने मान टाकली. बोलण अर्धवटच राहिल. माझा परत फोन न आल्याने बायको अधिकच काळजीत पडली. तिने फोन लावायचा प्रयन केला पण माझा भ्रमणध्वनी बंद असल्याचा संदेश मिळाला. इथे माझी पंचाईत अशी झाली होती की चुकुन सॅक तपासली तर काय करायच? माझ्या सॅकमध्ये (सप्रेम भेट म्हणून द्यायला आणलेल्या) ३ बाटल्या होत्या. त्यांची ही येवढी काळजी नव्हती म्हणा. पण माझ्याकडे थोडी वाजवी पेक्षा जास्त रक्कम होती. (स्वतःच्या घामाचा पण नडीमुळे काळा झालेला पैका होता.) जर तपासात ती रक्कम हाती लागली तर मग माझं काही खरं नाही. एक साहेबवजा दिसणारा माणुस कोठडीच्या बाहेर उभा होता. त्याला परत विनवणी केली. बहुतेक माझा अवतार पाहुन त्याला दया आली असावी. त्याने बाहेर काढले. माझं म्हणण ऐकुन घेतल. चिंता करु नका आता अडिचच्या लोकलने तुम्हाला वसईला कोर्टात घेउन जाऊ. तिकडे तुमचा निकाल लागेलच. अस म्हणुन माझी विकेट काढली... बाबौ डायरेक्ट निकाल??? इतक्यात तो मोठा साहेब आला. त्याला परत माझी हरीकथा ऐकवली. म्हटलं आजच सकाळी बाहेर गावाहुन आलो. आणि दुपारच्या गाडीने गावाला चाललोय. गडबडीत चुकुन अपंगांच्या डब्यात शिरलो. गावच्या गाडीच रिझर्वेशन वैगरे आधिच झालय. काही दंड वगैरे असेल तर तो मी आत्ता इथे भरायला तयार आहे. मला सोडा. गाडी चुकेल. पण साहेबही कच्चा गुरुचा चेला नव्हता. त्याने गावाच नाव आणि रिझर्वेशन दाखवायला सांगीतल. गावाच नाव सांगायच मी खुबीनं टाळलं. (तिकडेच पितळ उघडं पडलं असत) माताय आता आली का थाप अंगाशी. पण एकदा खोटं बोललो की मग त्यातुन सुटका नाही. मी परत थाप मारली की, मला पकडलं त्याच ट्रेनने बायको पुढे गेली आहे. तिकिटं तिच्याकडे आहेत. पण साहेब काही बधला नाही. माझी रवानगी पुन्हा कोठडीत झाली. येव्हाना तिथे अजुन काही नविन मेंबरांची भर झाली होती. त्यातले दोघं माझ्या सारखे बावरलेले झंटलमन दिसत होते. त्यांनी माझ्याकडे संवाद साधला 'भाईसाब, मै तो सिर्फ पटरी पार कर रहा था. तो ईन्होने धर दबोचा. अब आगे क्या होगा? ये लोग क्या करंगे?' म्हटलं "बेट्या कुठ वशिला-बशिला असेल तर तो आजमावयाची हीच संधी आहे. नाही तर मग जमानतीची सोय करुन घे." येव्हाना निगरगट्ट झालेलो मी माझी सॅक उराशी कवटाळुन गजां पल्याडची सृष्टी निहाळु लागलो. 'चल उडजा रे पंछी..' 'आकाशी झेप घे रे पाखरा...' ही आणि अशीच गाणी नकळत ओठांवर यायला लागली. फलाटावरच्या चेहेर्‍यांत मला माझे आई, बाबा आणि इतर आप्तस्वकिय दिसु लागले. एक तर चक्क माझ्या बायकोसारखीच दिसत होती. म्हणुन टक लावून पाहिल तर ती बायकोच निघाली. सोबत लेकही होती. (शेवटी बायकोची नवर्‍यावरची माया दिसुन आली. ;)) बायकोची भिरभिरती नजर माझा शोध घेत होती. माझ्या नशिबान लेकीच माझ्याकडे लक्ष गेल नाही. माझ्या अश्या अवस्थेत तिन मला पाहु नये अस वाटत होत. :( बायकोने भाईंदरला येई पर्यंत काही ओळखी पाळखी काढत फोना फोनी केली होती. एक बोरिवलीचे ओळखीचे स्टेशन मास्तर निघाले. पण बेट्यानं नेमका त्या दिवसाचाच मुहुर्तसाधुन रजा टाकली होती. फोनही लागत नव्हता. पोलिस मामाला विनवणी करुन सॅक बायकोकडे देण्याची सोय केली. सॅक तिच्या हाती जाताच म्हटलं की तु आता घरी जा लेकीला आणि सॅक घरी ठेव आणि मग वसईला कोर्टात ये. पण बायको काही इतक्यात हार मानायला तयार नव्हती. म्हटल अगं दंड वैगरे भरू पण ही जोखिम जवळ नको. उगा प्रकरण वाढलं तर मग सगळी सुट्टी चक्की पिसण्यात जायची. बायकोने मदतीला तिच्या सख्ख्या बहिणीला बोलवूण घेतलं होतं. तिच ऑफिस जवळच असल्याने ती आली होती. तीनही इथुन तिथुन ओळखी काढायला सुरवात केली. दोघींची फोना फोनी चालुच होती. बहुतेक साहेबांना दोन चार फोन पोहोचले असावेत. त्यांनी माझं गाठोडं कोठडीतुन बाहेर काढलं. पण अजुन सुटके बद्दल कसलीच शाश्वती नव्हती. तितक्यात मामाने एक एक करुन कोठडीतल्या सगळ्यांना बाहेर काढुन कसल्याश्या अर्जावर त्यांच नाव, गाव-पत्ता इत्यादी नोंदी भरायला सुरवात केली. मी रांगेतल्या माझ्या मागच्या सगळ्यांना कधी नव्हे ते उदार मनाने पुढे जायची संधी देत होतो. पण शेवटी रांग संपलीच. माझा नंबर आला. सरकार दफ्तरी माझ्या नावाची नोंद होऊ नये म्हनून मी चालवलेली टाळा टाळ काही टळेना. शेवटचा प्रयत्न म्हणुन एकदा परत मोठ्या साहेबांना भेटायला त्यांच्या खोलीत शिरलो. तितक्यात साहेबाचा भ्रमणध्वनी खणाणला. त्याने संभाषणा दाखल केवळ चार पाच हुंकार भरले. मामाला हाक मारुन मला परत बाहेरच्या बाकड्यावर नेऊन बसवायला सांगीतल. येव्हाना लेकीलाही काही तरी बिनसलय हे समजल, तिन मला मिठी मारुन आधी मुसमुसुन आणि नंतर मोठ्ठ्यान गळा काढला. साहेबही दचकून काय झाल म्हणुन बघायला बाहेर आला. मामा करवी निरोप धाडला की अजुन फक्त थोडा वेळ बसावं लागेल. बाकीच्यांची 'नावळ' निघणार आहे. सर्वांच्या समक्ष सोडता येणार नाही. थोडी कळ सोसा. सगळी मंडळी निघुन गेल्यावर साहेबांनी अस्मादिकांची पेश्शल शाळा घेतली. पुन्हा असली घोडचुक करणार नाही असं माउलीच्या रेड्यावाणी माझ्या कडुन दहा दहा वेळा वदवून घेतलं. आणि (माझ्या खर्‍या सासुरवाडीला जायला) मी सुटलो.

वाचने 32608 वाचनखूण प्रतिक्रिया 49

कुंदन Fri, 03/02/2012 - 22:32
लैच भारी अनुभव की रे ..... >> रेसुब ......कारण हे लोक कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. अंमळ हसु आले हे वाचुन. सीएसटी वर कसाब अन कंपनीला रेसुब वाले थांबवु शकले असते ना...पण त्यांचा सगळा तोरा आपल्यासारख्या सामान्य लोकांसमोरच चालतो.

दादा कोंडके Fri, 03/02/2012 - 22:33
पण, भ्रष्टाचाराच्या नावानं गळा काढणारा सामान्य माणूस वेळ आली की गुन्हा करुनही सुटकेसाठी पैसे देउन, वशिल्यानं काय वाट्टेल त्या मार्गानी किती हपापल्यासारखा प्रयत्न करतो ते कळलं! :)

तर्री Fri, 03/02/2012 - 23:14
ही पाकृ छानच लिहिली आहेस. "एक तर चक्क माझ्या बायकोसारखीच दिसत होती. म्हणुन टक लावून पाहिल तर ती बायकोच निघाली". खिक्क..

स्मिता. Sat, 03/03/2012 - 00:14
एकदम जबरा अनुभव आहे. तोही मस्त रंगवून सांगितलाय. वाचून आमचा विकलांगांच्या डब्यात गडबडीत चुकून शिरल्याचा अनुभव आठवला. आधीच गावाहून येणारी ट्रेन लेट झाल्यामुळे पुढचं कनेक्टिंग विमान चुकलं होतं. त्यात गडबडीत लोकलच्या समोर दिसलेल्या डब्यात मी मागे ओरडणार्‍या नवर्‍याकडे दुर्लक्ष करून बॅग घेवून चढले (मुंबईच्या लोकलमधे मी बॅग घेवून चढले याचा तेवढ्यातही अभिमान वाटून गेला.) आता मी बॅग घेवून आत चढून गेल्यावर त्यालाही दुसरी बॅग घेवून येणं भागच होतं. तो आत येवून 'अगं हा विकलांगांचा डबा आहे' असं म्हणतो न म्हणतो तोच त्याच्याही खांद्यावर हात येवून पडला. पुढची सगळी कथा तुमच्या सारखीच झाली असती पण पुढच्या स्टेशनवर रू. हजार दंड देवून आमची सुटका झाली. आता ते हजार रुपये दंडाचे होते की मामाच्या खिश्यात गेले देवच जाणे!

मराठे Sat, 03/03/2012 - 00:43
अरे बापरे ! चुकून अपंगांसाठीच्या डब्यात शिरलं तर इतकं रामायण? नुसतं पावती फाडून काम झालं नसतं का? कोर्ट कचेर्‍या कशासाठी? बाय द वे: जर तिथल्या कोणाला तुझ्या एकेका डिशेसचे फोटो दाखवले असते तर त्यांनी तुला अजिबात सोडलं नसतं !

दीपा माने Sat, 03/03/2012 - 02:53
जगातली दोन जेवणं खासच बनवलेली असतात्-एक आपल्या आईच्या हातचे घरी आलेल्या मुलासाठी आणि दुसरे सासुबाईंच्या हातचे जावई जेवणाचे! गणपा, दोन्हीकडे जेवताना एरवीच्या भेटीतले मनातले भाव ह्यावेळी नुकत्याच घडलेल्या अकल्पित घटनेमुळे वेगळेच तर नाही ना दिसले चेहर्‍यावर? फारच छान ओघवती भाषाशैली आहे तुमची. आणखी लेखन वाचायला आवडेल.

मराठमोळा Sat, 03/03/2012 - 03:16
हाहाहा किस्सा लै भारी.. म्हणून मला त्या मुंबैच्या लोकलचा प्रवास नको वाटतो ब्वॉ.. हजार प्रकारचे लफडे... बस-रिक्षा नाहीतर टॅक्सीच बरी.. :)

हुप्प्या Sat, 03/03/2012 - 08:29
तुमचा अनुभव भीतीदायक आहे. घडून गेल्यावर त्याच्याकडे बघणे वेगळे आणि त्यातून जाणे वेगळे. ह्यात रेसुबचा मुजोरपणा वाटतो. मऊ लागले की कोपराने खणायची वृत्ती दिसते. जर गुन्हा केलेली व्यक्ती दंड भरायला तयार असेल तर तिची तात्काळ मुक्तता झालीच पाहिजे. उगाच डांबून ठेवणे, कोर्ट बिर्ट वगैरे प्रकार हे सत्तेच्या गुर्मीतून केले गेले आहेत. कोर्टाचा कामातील उरक बघता शक्य तेवढे त्या भानगडीत न गुंतलेलेच उत्तम. अशा परिस्थितीत सामान्य लोकांचे भारतात हालच होतात हे खरे. आणि इंग्रजांच्या काळातील सरकारी अधिकार्‍यांची गुर्मी साहेब गेल्यावर पन्नास वर्षे उलटल्यावरही कमी होत नाही असेच दिसते. लोकलने प्रवास करताना ठराविक स्टेशने आली की तिकिटचेकर, रेल्वे पोलिस इ. सरकारी मंड्ळी बेमालूम गायब व्हायची अशी मला आठवण आहे. (उदा. दिवा, मुंब्रा, ठाकुर्ली इ.)

प्यारे१ Sat, 03/03/2012 - 09:46
मस्स्त लिहिलंयस. अशा प्रसंगात आपली कशी तंतरलेली ते आठवून नंतर हसू येतं खरं. इंजिनिअरींगला असताना सी एस टी वर आम्हाला टी सी नं पकडलेलं. तेव्हा '१० वी तक पढा हू' म्हणून 'अभी तिकीट निकालने ही जा रहे थे' असं सांगून मान वाचवली होती. >>>(नातेवाईक न येण्याचं खर कारण म्हणजे मी नंतर नंतर भेटवस्तु आणायची टाळा टाळ करु लागलो. अहो पुर्वी ठिक होतं, आपल्याकडे बाहेरच्या वस्तु आजसारख्या सर्रास मिळत नसत. आता चायनाचा आणि आपल्याकडचाच माल परदेशातुन दुप्प्ट किमतीला आणुन भेट म्हणुन देण्यात काही अर्थ आहे का? 'तिकडच्या' कुठल्याही मॉल मधल्या 'कॅरी बॅग्स' जरा जास्त घेत जा की.... ;) खरेदी इकडं आल्यावर करुन या भेटवस्तू त्या कॅरीबॅगमध्ये टाकून द्यायच्या. लोक खुश आपण खुश. हाय काय नी नाय काय! ;) (आमच्या जुन्या कंपनीतल्या 'पारसी बावा'चं डोकं :) )

In reply to by प्यारे१

सोत्रि Sat, 03/03/2012 - 12:37
खरेदी इकडं आल्यावर करुन या भेटवस्तू त्या कॅरीबॅगमध्ये टाकून द्यायच्या.
जबरा, तुमच्या त्या 'पारसीबावा'ला माझा साष्टांग दंडवतच ! - (जुन्या कंपनीतल्या पारसीबावाचा पंखा) सोकाजी

In reply to by प्यारे१

मृत्युन्जय Sat, 03/03/2012 - 14:10
हे मी चॉकोलेट्सच्या बाबतीत बर्‍याच वेळा केले आहे. अजुन तरी कोणी पकडलेले नाही. हा पण दुबै आणि सिंगापोरमध्ये चॉकोलेट्स खरेच स्वस्त मिळत्यात हा

sneharani Sat, 03/03/2012 - 10:10
मस्त लिवलय! वाचायला मजा आली!! येऊ दे अजुन असं लिखाण!! आमची वरात स्थानका बाहेर आली. आजु बाजुचं पब्लीक "साला कपड्यावरुन तर झंटलमन दिसतोय" अश्या नजरेने पहात होते. चित्र डोल्यासमोर आलं ;) ;)

दिपक Sat, 03/03/2012 - 10:16
जबराट अनुभव लिहलाय गणपा. कुर्ल्याला कधी नव्हे ते एकदा घाईत पटरी क्रॉस करताना हे सगळं दिव्य अनुभवलं आहे. त्या कोठडीत माझ्यासमोर २ युपीवाल्या पोरांना त्यांच तोंड फुटेपर्यंत मारत होते तेव्हा जीव गळ्याशी आला होता.

छोटा डॉन Sat, 03/03/2012 - 12:11
गणपाशेठ, अनुभव खरोखर गंमतशीर वाटला. तुमचं आपलं थोड्क्यात निभावलं हे बरं झाला. फोटुगिटु टाकले असते तर जास्त मजा आली असती असे सांगतो ;) - छोटा डॉन

सोत्रि Sat, 03/03/2012 - 12:43
त्या सॅक मधल्या बाटल्या, त्याही चक्क ३-३, मामाच्या हातात (की घश्यात ?) नाही गेल्या ह्याचा अपार आनंद झालेला है, गणपाला त्या साहेबाने सोडून दिल्याच्या आनंदापेक्षाही जास्त :D - (टी.सी. कडून अनंत वेळा पकडला गेलेला) सोकाजी

स्वातीविशु Sat, 03/03/2012 - 13:22
लेख एकदम झकास साधला आहे. सर्व प्रसंग डोळ्यासमोर घड्तायत असे वाटले. :) बिचार्‍या तुमच्या बायकोला मात्र तुम्ही बराच प्रवास घडवला ब्वा...

परदेशात असताना छोट्यातला छोटा नियम पाळणारे, तिथल्या न्याय व्यवस्थेचे वारेमाप कौतुक करणारे, भारतात आल्यावरती मात्र कायदा धाब्यावरती बसवतात आणि कायद्याला भ्रष्ट मार्गाने वाकवायला देखील बघतात हे बघून खरच वाईट वाटले. वरती पुन्हा आपण कुठलाही दंड न भरता, शिक्षा न भोगता कायदा मोडून देखील कसे सुखरुप सुटलो त्याची 'विजयगाथा' लिहितात आणि तिची कौतुकाने दखल देखील घेतली जाते हे अजून एक दुर्दैव.

In reply to by गणपा

चिंतामणी Sat, 03/03/2012 - 16:14
त्यातुन तीकडे गेल्यावर लेख टाकला आणि "तीन बाटल्या" जवळ असल्याचा उल्लेख केला. जखमेवर मीठ चोळायची कामे नका करू. वायदे प्रत्यक्षात आणून दाखवा. Facebook smileys

यकु Sat, 03/03/2012 - 15:03
>>> मी त्या प्राण्याकडे भुतदयेने पाहील. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) >>> 'चल उडजा रे पंछी..' 'आकाशी झेप घे रे पाखरा...' ही आणि अशीच गाणी नकळत ओठांवर यायला लागली. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) >>> पुन्हा असली घोडचुक करणार नाही असं माउलीच्या रेड्यावाणी माझ्या कडुन दहा दहा वेळा वदवून घेतलं. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) खो: खो: खो: आणि खी: खी: खी: लै मज्जा आली नै.. आम्हाला पण पोलिसांनी एकदा उचलून आत (म्हणजे डायरेक आत नै, फोलिस ठाण्‍यात) टाकलेलं. झालं काय की तो दिव्य मराठी औरंगाबादला नवीन आला होता - अजून सुरु झाला नव्हता. लोकांच्या मुलाखती, नियुक्त्या, नियुक्त केलेल्या लोकांनी डमी पेपर काढणे सुरु होते. तिथल्या स्टेट एडिटर साहेबांनी मध्‍य प्रदेशातून त्यांचा पीए आयात केलेला, तो, येण्‍यापूर्वी तीन मह‍िने ती लफडी मी बघायचो.. आणखी मध्‍यप्रदेशातूनच एक उपसंपादकही आला होता.. एके भयाण रात्री त्या दोघांना बियर पिण्‍याची हुक्की आली.. रात्री साडेनऊ वाजता. बियर दुकानातूनच घ्यायच्या, बारमध्‍ये जायचं नाही असा त्यांचा आग्रह.. औरंगाबादच्या कॅनॉट सर्कलमधून बिअर घेतल्या आणि पठ्‍ठे तिथंच उघडून प्यायला लागले.. इसको तो अभी दस मिनट में निपटा लेते है म्हणे.. मध्य प्रदेशात बिअर अशीच रस्त्यावर पितात म्हणे.. मी त्यांना चारचारदा सांग‍ितलं, इथं असं रस्त्यावर बिअरसुद्धा प्यायला जमत नाही.. पण कसंच काय न काय.. मी आपली माझी बाटली पटकन संपवली (हो, खोटं कशाला बोला) आणि उभा राहिलो.. त्यांचे दस मिनीट काही संपेनात... तसेच बाटल्या टेकत-उचलत ते संपवत होते.. शेवटी जे व्हायचं तेच झालं.. रात्रीच्या पेट्रोलिंगला जीपसह लवाजमा घेऊन आलेल्या पीआय् नं बरोब्बर आम्हाला हटकलं.. सोबतच्या हवालदारांना म्हणे, आधी त्या बाटल्या ताब्यात घ्या, आणि या साल्यांना जीपमध्‍ये बसवा.. मग सगळ्यांची तंतरली.. मी आपलं तेवढ्‍यातल्या तेवढ्‍यात ''साहेब, हे इथे नवे आहेत, यांना माहित नाही इथं रस्त्यावर पीत नाहीत'' वगैरे अतिमऊसूत, निष्‍पाप, सरळ आवाजात बडबड करुन पाहिली.. पण तो ऐकायला तयार नाही.. ठाण्‍यात चला म्हणे.. एकदाचे ठाण्‍यात घेऊन गेला. तिथल्या अंमलदाराला रिपोर्ट लिहायला सांगून तो पीआय् गायब. तो हवालदाराचा प्रश्न विचारण्‍याचा खाक्या, रात्री मेडीकल आणि सकाळी जामीन झाल्याशिवाय तुम्हाला सोडता येणंच अशक्य आहे वगैरे ऐकून ते दोघे फक्त रडायचेच बाकी होते.. कारण त्यातला एकजण नव्या पेपरच्या स्टेट एडिटरचा पीए.. कुटुंब वगैरे म.प्र. मध्‍ये सोडून महाराष्‍ट्रात नोकरीला आलेला.. तो उपसंपादकही तसाच.. आणि वरुन पुन्हा आमचा पेपर अजून बाजारात आलेला नव्हता.. स्पर्धक पेपरांना या लफड्याची कुणकुण लागली असती तर दुसर्‍या दिवशी फोटो, बातमीतील तिखटमिठासोबत सगळेच बाराच्या भावात जाणार.. त्यांनी रिपोर्टमध्‍ये खोटी नावं सांगितली. काहीतरी कर म्हणे. मी शेवटी आमच्या संपादकांना फोन लावला. आमच्या पेपरच्या सिटी ‍चीफ् ला पाठवतो म्हणे. (मनातल्या मनात किती शिव्या मोजल्या असतील देवजाणे.. ) सिटी चीफ्, त्याचे दोन बातमीदार, आमचा गुन्हे बीटचा प्रमुख आणि एक फोटोग्राफर एवढा लवाजमा आम्हाला सोडवायला आला. बरं ते आले तर पोलिसांना एवढ्‍या अजिजीनं असे बोलायला लागले की आत्ताच आम्ही लोकांनी खून केलाय ! मग मी तापलो.. सरकार सालं किराणा दुकानातही बियर ठेवायला परवानगी देत आहे.. आणि तुम्ही फक्त रस्त्यावर बियर घेतली म्हणून आम्हाला आत टाकणार काय वगैरे. आमचा सिटी चीफ् म्हणे, यशवंत तुला चढलीय, तु गप्प बस.. च्यामारी !! आता काय बोलणार. त्यांनी पोलिसांनी लिहीलेले ते सगळे रिपोर्ट वगैरे फाडून टाकायला लावले. वरुन त्या हवालदारांनी जाताना आम्हाला प्रत्येकी पाचपाचशे रुपये मागितले. ठाणे अंमलदार म्हणे, आम्ही तुमच्या स्पर्धक पेपरवाल्यांना बोलवलं नाही, ही खैर माना. आमच्याच जप्त केलेल्या बाटल्या समोर धरुन हलवत म्हणे - ''हॅहॅहॅ, तुमी घेतलीत, आता आमचं काय??'' आमचे सगळे दोस्तलोग म्हणे देऊन टाका... त्या सोबतच्या पीएनं स्वखुशीने सगळे पैसे पोलिसांना देऊन टाकले... म्हटलं टाक बेट्‍या.. तुम्हालाच किडा आलेला रस्त्यावर प्यायचा.. पोलिस स्टेशनमधून सुटुन आठ दिवस झाले तरी तो पीए तसाच टेन्शन मध्‍ये. ''स्टेट एडिटरला कळालं तर काय??'' मी म्हटलं छोड ना यार! आता ऑफिसमधल्या एवढ्‍या लोकांना कळालंय तर स्टेट एडिटरला कळणार नाही काय.. आधी काशी घातलीस आणि आता चिंता करतोस. जे व्हायचं ते होईल. पंधरा दिवस तो तसाच टेन्शनमध्‍ये. एक दिवस येऊन म्हणे ''हो गया रे भई!' म्हटलं क्या हो गया? म्हणे सर ने आज उस पोलिस स्टेशन के लफडे के बारे में पूछा. म्हटलं काय म्हणाले? ''अरे यार, बियर ही पी थी ना? खून तो नहीं किया था ना? फिर क्यों परेशान हो रहे हो?'' म्हटलं व्वा! इसबात पर तो पार्टी बनती है.. ;-) त्यानं जन्मात पुन्हा महाराष्‍ट्रात असताना दारुचं नाव काढलं नाही.

विसुनाना Sat, 03/03/2012 - 15:46
वाईट अनुभव. पण असे कोणाच्याही बाबतीत होणे शक्य आहे. मुंबईत तर सहजपणे शक्य आहे. 'केवल विकलांगों के लिए' डब्यात चुकून शिरणारा धडधाकट मनुष्य या पोलिसी ससेमिर्‍यानंतर शारिरीक नसेल पण मानसिकदृष्ट्या तरी नक्कीच विकलांग होतो.

इरसाल Sat, 03/03/2012 - 16:06
म्हटलं....निळ्या रेघांचा शर्ट घातलेला सोज्वळ (बाब्याला) माणसाला असे का बरे नेत असावेत.आणि थैलीतुन किणकिणाट पण ऐकू येत होता.;)

गणपा लेख मस्त जमला आहे. विशेतः सुरवातीला नातेवाईकांच्या भेटवस्तूंचा उल्लेख आवडला. माझा त्या महाभागाला सादर प्रणाम ज्याने अमेरिकेतून भारतात नातेवाईकांना वाटायला विविध रंगांच्या चांद्या असलेली चोकलेट ( अमेरिकन खाऊ ) आणण्याची प्रथा सुरु केली. आमच्या लहानपणी अमेरिकेतून एखादा नातेवाईक किंवा एरियातील कोणी अमेरिकेतून आला की हा गोळ्या वाटपाचा कार्यक्रम व्हायचा. पण आता जमाना बदलला आहे. आज भारतात अनेक गोष्टी स्वस्त नी मस्त मिळतात. तेव्हा भारतात भेटवस्तू आणणे अव्यवहार्य ठरते. किंबहुना ह्या वेळी मी भारतात आलो तेव्हा किमान १५ जर्मन लोकांसाठी आपले मसाले राजस्थान मधील बाजारातून घेतले. छोट्या गणेश मूर्ती , पश्मीना शाल अश्या अनेक गोष्टी भारतातून नेल्या ( परदेशात त्या प्रचंड महाग मिळतात) .माझ्या परिचयातील अनेक परदेशस्थ भारतीय भारत वारीवर आले की मनीष मार्केट मध्ये जाऊन परदेशी गोळ्या आणी सुगंधी साबण व सौंदर्य प्रसाधने व वस्तू स्वस्तात विकत घेऊन त्याचे वाटप करतात. तुझ्या रेल्वे प्रवासाची कहाणी वाचून माझ्या रेल्वे प्रवासातील अनेक गमतीदार आठवणींचा उबाळा आला. तुझ्या घटनेशी साधर्म्य असणारी एक आठवण वानगीदाखल देतो. ( एक स्वतंत्र लेखच पाडतो)

मस्त रे गंपा. च्यायला, मुंबईत त्या पट्ट्या मारलेल्या लोकलच्या रिकामा वाटणार्‍या डब्यात आम्ही घुसलो होतो आणि शिकारी डब्यात मठ्ठपणे बसलेला असुनही चढत्यावेळी काही बोलला नाही. चांगली एक दोन ष्टेशनं गेल्यावर बेट्यानं इकडं कसं काय अशी चौकशी करुन दंड भरायला लावला होता त्याची आठवण झाली. -दिलीप बिरुटे

चिगो Sun, 03/04/2012 - 13:51
लै भारी किस्सा, गणपा.. मुंबईत सांभाळून रहायला हवे ब्वॉ लोकलमधी चढतांना..

In reply to by प्रचेतस

गंपा कधीकाळी मिपाचं उत्तम लेखक आणि पाककृती कलाकार होता, आताही आहे. पण वयोमानाने आता सकाळी वयस्कर लोकांबरोबर मॉर्निंग वॉक. हरिनाम यात व्यस्त आहे असे सुत्राकडून कळते. ;) (पळा गंपा यायच्या आत) -दिलीप बिरुटे (गंपाच्या कोलंबीफ्रायचा फॅन)