पण माझीच चूक आहे असं का वाटतंय मला?
साला हा एक विचार मनातून जातच नाहीये, आजचा दहावा दिवस. घरी बसून आहे मी, उद्यापासून ऑफिस ला जावच लागणार, नाहीतर नोकरी जायची.
कितीही मन रमवायचा प्रयत्न केला तरी ती रात्र डोक्यातून जातच नाही. ट्रेन चा भयंकर गोंधळ झाला होता त्या रात्री.नाहीतर ११ :३५ ची कसारा किती रिकामी असते. पण त्या दिवशी तब्बल ३ तास ट्रेन बंद होत्या, आणि त्यानंतर सुटणारी हि पहिली ट्रेन होती.
काय भयंकर गर्दी होती.मी कसाबसा लटकत भायखळ्याहून आत चढलो. आत कसला जेमतेम दारात उभं राह्यला मिळेल इतकीच जागा होती.ट्रेन दणदणत निघाली,पुढील स्टेशन दादर. मागून लोंढा अंगावर कोसळला, पण आत जायला जागाच नव्हती.