Skip to main content

श्रद्धेमुळे विकृती

लेखक यनावाला यांनी शुक्रवार, 01/12/2017 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धेमुळे विकृती........यनावाला ................................ रविवारच्या वृत्तपत्रात -(दि.२०-मार्च-२०१६)-"नातवासह आजोबांचा अंत" ही बातमी वाचून मन सुन्न झाले. आजोबा ( सुधीर शहा, वय ६५ वर्षें ) यांनी पहाटेच्या वेळी नातू (जिनय, १० वर्षे) याचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आठव्या मजल्यावरून खाली उडी टाकून आत्महत्या केली. मृत्युपूर्वीच्या पत्रात त्यांनी लिहिले., "कोर्टातील खटल्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे. " "जिनयला माझ्याबरोबर नेत आहे." हे वाक्य त्यांच्या चिठ्ठीत दोनदा आहे. असंभवनीय वाटणारी ही घटना सकाळी वृत्तपत्रात वाचल्यापासून डोक्यात घोळत राहिली. खटल्याला कंटाळून आत्महत्या का ? आणि लाडक्या नातवाची हत्या ? छे ! प्रतिष्ठित वृत्तपत्रात नावानिशी छापून आली म्हणून ही बातमी खरी म्हणायची. अन्यथा विश्वास बसतच नाही. आत्महत्येचा निर्णय का घेतला असेल? बहुधा सुधीर शहांची बाजू सत्याची असावी. विश्वास ठेऊन त्यांनी काही कागदांवर सह्या दिल्या असतील. प्रतिपक्षाने विश्वासघात करून त्यांच्याविरुद्ध खोटा पुरावा बनवला असेल. आपली बाजू सत्याची असूनही आपल्याला आता न्याय मिळणार नाही. हे दिसून आल्यावर सुधीर शहांना सात्त्विक संताप आला असेल. त्यांतून ,"हे जग काही सत्याचे नाही" अशी अगतिकता आली असेल म्हणून आत्महत्येचा निर्णय घेतला असेल. हे एक वेळ समजू शकते. पण लाडक्या नातवाचा जीव जाईपर्यंत गळा का दाबला ? श्वास कोंडल्यावर त्याने जगण्यासाठी धडपड केलीच असेल. हातपाय झटकले असतील. प्रत्येक सजीवाची ही नैसर्गिक प्रेरणा असते. तरी प्रेमळ आजोबांच्या हाताची पकड सैल कशी पडली नाही ? एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ? त्या दहा वर्षांच्या मुलाला अजून खेळायचे होते. शिकायचे होते. जग समजून घ्यायचे होते. अनुभवायचे होते. कर्तृत्व दाखवायचे होते. मोठे व्हायचे होते. पण वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच सगळे संपले. त्याच्या आवडत्या दादाजीनींच स्वहस्ते सारे संपवले. आपले आजोबा हे असे काय करीत आहेत हे त्याला समजले नसेल. सगळेच कल्पनेच्या पलीकडचे. सकाळी वाचले ते सारे असंभवनीय, अनाकलनीय वाटत होते. पण ही घटना सत्य असणार यात शंका नव्हती. बातमी पुन्हा शांतपणे वाचली. "जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे." या दोन वाक्यांनी आता उलगडा झाला. स्पष्टीकरण सापडले. अनाकलनीयता संपली. हे आजोबा आपल्या प्रिय नातवाला बरोबर घेऊन जात आहेत. ते कुठे निघाले आहेत ? मृत्युनंतर ते कुठे जाणार आहेत ? सुधीर शहा धार्मिक आहेत. देव-धर्माचे संस्कार त्यांच्या मनावर बालपणापासून बिंबवले असणार. त्यांना ठावूक आहे की मृत्युपश्चात् माणूस नरकात पडतो, किंवा स्वर्गात जातो अथवा मोक्षपदाला पोचतो. मोक्ष प्राप्त होणे दुर्मीळ. तो योगी, संन्यासी, साधु-संत यांना क्वचित् मिळतो. दुष्ट, पापी माणसे नरकात पडतात. हे शहांनी ऐकले आहे. वाचले आहे.....मी आयुष्यभर नीतीने वागलो. धर्माचरण केले. परंपरा पाळल्या. म्हणून मी स्वर्गाला जाणार. तिथे कोर्ट-कचेर्‍या, वकील-साक्षी-पुरावे काही नाही. शांत जीवन. केवळ सुखच सुख. पण स्वर्गात कितीही सुखे असोत. तिथे जिनयशिवाय मी राहूच शकणार नाही. त्याला बरोबर घेऊन जायला हवे. कसे न्यायचे ते ठरविले आहे. जिनय तर निरागस, निष्पाप, मुलगा आहे. त्याला स्वर्ग मिळणारच. आम्ही दोघे स्वर्गात जाणार. "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् ।" असे साक्षात् श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले आहे. ते भगवद्वचन असत्य कसे असेल ? मी आणि जिनय स्वर्गात जाणार यात शंकाच नाही. आकाशाच्या पलीकडे स्वर्गलोक आहे. तिथे नंदनवन आहे. कल्पतरूंच्या बागा आहेत. कामधेनूंची खिल्लारे आहेत. काठोकाठ भरलेले अमृताचे घट आहेत. नृत्य करणार्‍या अप्सरा आहेत. स्वर्गात राहाणे किती आनंददायी, किती सुखाचे असेल ! मी आणि जिनय तिथेच राहाणार. ..... असल्या स्वर्गवासावर त्यांची दृढ श्रद्धा होती. स्वर्ग संकल्पना खरी वाटत होती...स्वर्ग आहे असे धर्मग्रंथांत लिहिले आहे. साधु-संत, योगी-संन्यासी यांनी सांगितले आहे. त्यांची वाणी खोटी असूच शकत नाही. मृत्युसमयी आम्हा दोघांना काही क्षण वेदना होतील. पण पुढच्या निर्भेळ सुखासाठी ते सहन करायला हवे.... सुधीर शहा हे मध्यमवर्गीय सांसारिक गृहस्थ होते. त्यांनी व्यवसाय केला. पैसे मिळविले. आर्थिक स्थिती सुधारली. मुलाला शिक्षण दिले. ( त्यांच्याविषयी वृत्तपत्रात जे छापून आले आहे त्यावरून हे दिसते.) म्हणजे सर्वसाधारणपणे ते बुद्धिमान गृहस्थ होते. देव-धर्म-श्रद्धा आणि त्याच्याशी निगडित गोष्टी हे त्यांचे श्रद्धा-क्षेत्र होते. ते सोडता अन्य क्षेत्रांत त्यांनी स्वबुद्धी वापरून विचारपूर्वक निर्णय घेतले असणार असे दिसते. परंतु स्वर्ग ही संकल्पना त्यांच्या श्रद्धा क्षेत्रात मोडते. अशा संकल्पनेवर विचार करताना मन श्रद्धेने लिप्त होते. (म्हणजे मनावर श्रद्धेचा लेप चढतो). भावना प्रबळ होते. त्यामुळे बुद्धी पांगळी होते. ती तर्कशुद्ध विचार करू शकत नाही.....मृत्युनंतर आमच्या दोघांच्या (आजोबा आणि नातू) शरीरांचे दहन होईल. मग हे देह परत कसे मिळतील.? शरीरे नसतील तर स्वर्गात आम्ही कोणत्या स्वरूपात राहाणार ? एकमेकांना कसे ओळखणार ? कसे बोलणार ? देह नसतील तर स्वर्गातील सुखे कशी उपभोगणार? अशा शंका बुद्धीत उद्भवतच नाहीत. त्यामुळे आम्ही दोघे आहोत तसेच स्वर्गात जाणार. हे त्यानी गृहीत धरले. परगावी किंवा परदेशी नाही का जात? तसेच स्वर्गात जायचे. त्यामुळे "जिनयला बरोबर घेऊन जात आहे." असे वाक्य त्यांनी सहजतेने लिहिले. याप्रमाणे बुद्धी बाजूला पडून श्रद्धेच्या प्रभावाखाली निर्णय होतो. त्यामुळे प्रिय नातवाचा खून आणि आत्महत्या या गोष्टी अगदी योग्य किंबहुना आवश्यक वाटतात. त्याप्रमाणे कृती घडते. काही दिवसांपूर्वी "क्रौर्याची परिसीमा " या शीर्षकाखाली छापून आलेली बातमी अशाच स्वरूपाची होती. हस्‍नाईल वरेकर (वय ३५ वर्षे) याने आपले आई-वडील, पत्‍नी, मुले, बहिणी, त्यांची मुले अशा चौदा जणांचे गळे चिरून त्यांना ठार केले आणि स्वत: आत्महत्या केली. एवढे क्रूर कृत्य का घडले ? त्याची वैयक्तिक अथवा कौटुंबिक अशी कितीही गंभीर समस्या असती तर त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याने केवळ आत्महत्या केली असती. इतरांना मारले नसते. स्वत:च्या चार महिन्यांच्या मुलीचा गळा चिरला नसता. काही जण म्हणतील की तो वेडा झाला होता. एका अर्थी हे खरे असले तरी वेडाच्या झटक्यात केलेले हे कृत्य नव्हे. सगळे पूर्व नियोजित होते. जेवणाचा कार्यक्रम ठरवला. बहिणींना मुलांसह येण्याचे आमंत्रण दिले. मेव्हण्यांना बोलावले नाही. ते हस्नाईलचे रक्ताचे नातेवाईक नव्हते. पत्‍नीशी रक्ताचे नसले तरी प्रेमाचे नाते असते. तसेच चार महिन्यांच्या मुलीला स्वर्गात बघणार कोण ? दूध कोण पाजणार? असाही विचार असू शकतो. सुधीर शहांची जशी दृढ समजूत होती की ते आणि नातू स्वर्गात जाणार, तशीच हस्‍नाईलची ठाम कल्पना होती की आम्ही सर्वजण स्वर्गात जाणारच. तिथे गेल्यावर कुठली अडचण उरणारच नाही. स्वर्गात सगळ्यांना सुख मिळेल.आकाशाच्या मागे स्वर्ग आहे, असे त्याने अनेक मुल्ला-मौलवींकडून ऐकले होते. कुराणात तसेच लिहिले असणार अशी त्याची श्रद्धा होती. स्वर्गाविषयींच्या अनेक गोष्टी त्याने चित्रपटात पाहिल्या होत्या. गाण्यांत ऐकल्या होत्या. धर्मावर श्रद्धा असेल तर स्वर्गाच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे. हस्‍नाईल या भ्रामक स्वर्गकल्पनेच्या पूर्णतया आहारी गेला होता. त्याला कळत होते की कोणी सगे-सोयरे सर्व मृत शरीरांचे दफन करतील. मूठमाती देतील. आम्हा सर्वांचे मृत देह कबरस्थानात मातीखाली असतील. ..ते जिवंत होऊन स्वर्गात कसे येतील ? असा विचार त्याची बुद्धी करीत नाही. कारण स्वर्गाविषयीच्या श्रद्धेमुळे ती लुळी पडलेली असते. पवित्र ग्रंथातील वचने सत्यच असणार. त्यांविषयी शंका घेणे पाप आहे असे तो मानतो. आम्ही सगळे तिथे भेटणार. स्वर्गात सुखाने राहणार. असेच त्याला वाटत राहाते. त्यामुळे चौदा जणांचे गळे तो सहजतेने चिरतो. आपण काही वाईट कृत्य करतो आहोत असे त्याला वाटतच नाही. स्वर्गात जाणे वाईट कसे असेल ? मी जे करतो आहे ते या सर्वांच्या भल्यासाठी आहे. अशीच त्याची समजूत असते. आत्मघातकी आतंकवाद्यांची धर्मश्रद्धा अशीच अतूट असते. त्यांना वाटते आपण धर्माची आज्ञा पाळत आहो. देवाच्या मनात आहे ते करीत आहो. हे पवित्र धर्मकार्य करताना मृत्यू येणार. मग आपण स्वर्गात जाणारच. तिथे सर्व सुखे आपली वाट पाहात आहेत. या भ्रामक श्रद्धेमुळे ते मरणाला सामोरे जातात. आपला मुलगा देवा-धर्माच्या पवित्र कार्यासाठी शहीद होणार. त्याच्यावर अल्लाची कृपा होणार. तो स्वर्गात जाणार . तिथे तो इथल्यापेक्षा अधिक सुखात रहाणार. अशी त्याच्या पालकांचीही श्रद्धा असते. त्यामुळे ते या आत्मघातकी प्रकाराला विरोध करीत नाहीत. "आतंकवाद्याला धर्म नसतो." हे विधान भोंगळ आहे. आतंकवादी नखशिखान्त धार्मिक असतो. आतंकाची प्रेरणा त्याला धर्मामुळेच मिळते. प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रेरणा अधिकाधिक जगण्याची असते.. श्रद्धेमुळे घडणार्‍या अशा विकृत भयानक घटनांच्या बातम्या अधून-मधून येतच असतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली एक विलक्षण बातमी लक्षात राहिली. थोडक्यात गोष्ट अशी: दादा आणि बाबू हे दोन भाऊ म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी. परस्परांवर खूप प्रेम. त्यांचे तीन बैल. त्यांतील राजा बैलाचा दोघांनाही फार लळा. आधी स्वत:च्या हाताने राजाला हिरवा चारा भरवल्याविना दादा जेवत नसे. दादाचे सर्पदंशाने अकाली निधन झाले. बाबू व्याकूळ, सैर-भैर झाला. एके दिवशीं तो राजा बैलाच्या मानेवर कुर्‍हाडीने घाव घालू लागला. हंबरडा ऐकून लोक धावून आले. तोवर राजा मरणासन्न अवस्थेत पोचला होता. "तू हे असे का केलेस ?" हा प्रश्न विचारल्यावर बाबू म्हणाला," गेले दोन दिवस दादा माझ्या स्वप्नात येत होता. त्याने सांगितले की तिथे स्वर्गात सगळी सुखे आहेत. पण त्याला राजाची सतत आठवण येते. त्याच्यावाचून चैन पडत नाही. " त्यावर विचार केला आणि राजाला मारले. त्याच्यासारखे गुणी जनावर आता स्वर्गातच जाईल. तिथे दादाला भेटेल. दादाला खूप आनंद होईल. दादाला पाहून राजाही खुष होईल." अशी ही श्रद्धा. इथे हा मरून पडलेला बैल देहासह स्वर्गात कसा जाईल ? अशी शंका त्याच्या मनाला शिवतसुद्धा नाही. माणसाचे मन श्रद्धेने लिप्त झाले की त्याची बुद्धी पंगू होते हेच खरे. कोणी म्हणतील अशा दु:खद घटनांवर का लिहावे.? त्यांवर कायमचा पडदा टाकणे योग्य नव्हे काय ? या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक नव्हेत. अशा घटनांचे सर्वांगांनी विश्लेषण व्हायला हवे. कारणमीमांसा करायला हवी. ती बुद्धीला पटली तर त्यानुसार आपल्या कल्पना, विचार- आचार यांत योग्य ते बदल करायला हवेत. चुकीच्या, हानिकारक समजुतींचा त्याग करायला हवा. समाजस्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. असे मला वाटते. या तीन हृदयद्रावक घटनांवर साकल्याने, तर्कसंगत विचार करता वर लिहिलेल्या कारणमीमांसेपेक्षा अधिक समर्पक स्पष्टीकरण मला सुचत नाही. कोणी निदर्शनाला आणून दिल्यास ते मान्य करीन.

वाचने 33822
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

शहा श्रद्धाळू होते असं पण पेपर मध्ये लिहिलंय का? त्यांचा स्वर्ग नरक आणि आपण मेल्यावर या दोन्हीपैकी कुठेतरी जातो यावर त्यांची श्रद्धा होती असं पण पेपर मध्ये लिहिलंय का? बरं एवढेच अंधश्रद्धाळू होते तर मग हत्येसारखं पाप केल्यावर आपण नरकात जाऊ अशी भीती वाटून ते हत्या करण्यापासून परावृत्त का नाही झाले? का फक्त तेवढ्या वेळेपुरते ते अश्रद्ध झाले? एका पेपर वर तुम्ही एवढा विश्वास ठेवताय की अंधश्रद्ध होत चालला आहात. पेपर मध्ये असं पण लिहिलंय की त्या खटल्याच्या ताणामुळे ते मानसिक दृष्ट्या अस्थिर झाले होते. हे तुम्ही का दृष्टीआड केलंत? आता तुम्ही लिहिलंय की मृत्यूपूर्वीच्या चिठ्ठी मध्ये "जिनयवर माझे खूप प्रेम आहे.". एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर असलेलं प्रेम वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता येतं का? कोण कुठल्या परिस्थितीतून जातंय हे बाहेरून बघणाऱ्याला कळत नसतं. घरातला कर्ता पुरुष मी गेल्यावर माझ्या कुटुंबाचं कसं होणार या चिंतेतून सतत तयारी करत करत असतो. तुम्ही समाजाविषयी एवढी चिंता करता याचं मला आश्चर्य वाटत आलेलं आहे. शेवटी समाज ही पण एक संकल्पना आहे, प्रत्येक जण शेवटी एकटाच असतो. पण या लेखात नेहमीचा टच नाही जाणवला, उगाच ओढून ताणून संबंध लावल्यासारखं वाटतंय. असो. तुम्ही उत्तर देणार नाही हे माहित आहे. त्यामुळे अजून एक विनोदी लेख म्हणून जमा करतो.

In reply to by ट्रेड मार्क

तुम्हीपण काय प्रश्न विचारत आहात जणूकाही ते तुम्हाला उत्तरच देणार आहेत. कल्पनाशक्तीच्या उड्या मारून आपला मुद्दा सिद्ध करणे यापलीकडे या आणि याधीच्या लेखांमधे काहीही नाही. मागच्या लेखावर अजोंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणं अजून बाकी आहे.

In reply to by ट्रेड मार्क

श्री.ट्रेड मार्क लिहितात,
"शहा श्रद्धाळू होते असं पण पेपर मध्ये लिहिलंय का? त्यांचा स्वर्ग नरक आणि आपण मेल्यावर या दोन्हीपैकी कुठेतरी जातो यावर त्यांची श्रद्धा होती असं पण पेपर मध्ये लिहिलंय का?"
"मी जिनयला बरोबर घेऊन जात आहे ." असे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात शहांनी म्हटले आहे. ते जिनयला घेऊन कुठे जात आहेत ? याचे उत्तर" स्वर्गात" असेच असू शकते. म्हणजे स्वर्ग-नरक या संकल्पनांवर त्यांची श्रद्धा आहे. यावरून ते श्रद्धाळू आस्तिक आहेत. असाच निष्कर्ष निघतो. स्वर्गात केवळ सुखच असते. दु:ख नाहीच. हेही त्यांना मान्य आहे. तसेच मृत्युपश्चात आम्ही दोघे स्वर्गात जाणार अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे. अन्यथा त्यांनी आपल्या प्रिय पौत्राचा जीव जाईपर्यंत गळा दाबला नसता. असो. हे तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्यावे. प्रस्तुत लेखाला कोणी कितीही दूषणे दिली तरी ठीक आहे. प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच. ,,,,यनावाला

In reply to by यनावाला

खरे तर मी येथे प्रतिसाद द्ययला येणारच नव्हतो पण कदाचित तुम्ही विचर कराल अशी आशा वाटत असल्यामुळे लिहितोय.. सर्वसामान्यपणे माणूस आपल्या प्रिय व्यक्तींची आत्महत्या करण्यापूर्वी हत्या करतो, आणि त्याचे कारण त्यांनी म्रुत्युपश्चात आपली सोबत करावी हे नसून माझ्या माघारी त्यांना संकटांचा सामना करावा लागू नये असे असते. मी अशी कौटुंबिक आत्महत्येची केस अगदी जवळून पाहिली आहे, ज्यामध्ये अशी आत्महत्या करणारा आमच्या घरी आदल्या दिवशी येऊन गेला होता, आणि स्पष्ट शब्दात मी माझ्या कुटुंबाची हत्या करून माझे जीवन संपवणार आहे असे सांगून गेला होता. तो अस्तिक होता की नव्हता हा भाग वेगळा आहे, सर्वसामान्यपणे हिंदू धर्मामध्ये जे आस्तिक आहेत ते आत्महत्या आणि एखाद्याचा जीव घेणे (अकारण) पाप मानतात, त्त्यामुळे सदर घटना त्यांच्या आस्तिक असण्यावरच मुळात प्रश्नचिह्न निर्माण करते. किंबहुना देवावरचा विश्वास उडाल्यावरच सर्वसामान्य माणूस असे टोकाचे पाउल उचलायला प्रवृत्त होतो. त्यामुळे मुळात मृत्यूपश्चात आपल्या प्रिय व्यक्तींनी आपली सोबत करावी असे जर त्या व्यक्तीने स्पष्ट चिठ्ठीत लिहून ठेवले नसेल तर तसे गृहीत धरणे हे अतार्किक आहे. इस्लामबद्दल काही बोलण्यात अर्थ नाही, पण तरीदेखील त्या आत्महत्येच्या घटनेत देखील आपण म्हणता तसा हेतू असल्याचा कोणताही पुरावा दिसत नाही. कौटुंबिक आत्महत्या हा संपूर्णपणे वेगळा विषय आहे, याबाबत घाटपांडे सर कदाचित जास्त सांगू शकतील, बहुधा त्यांची पोलिस पार्श्वभूमी आहे. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.

In reply to by यनावाला

आनन्दा यांनी म्हणल्याप्रमाणे सर्वसामान्यपणे माणूस आपल्या प्रिय व्यक्तींची आत्महत्या करण्यापूर्वी हत्या करतो, आणि त्याचे कारण त्यांनी म्रुत्युपश्चात आपली सोबत करावी हे नसून माझ्या माघारी त्यांना संकटांचा सामना करावा लागू नये असे असते. हाच तर्क बरोबर वाटतो. शहांच्या घरातील परिस्थिती आपल्याला माहित नाही, त्यांची मानसिक स्थिती माहित नाही. उगाच एखाद्या दुर्दैवी घटनेचा आपल्याला सोयीस्कर अर्थ कशाला काढावा? खाली या प्रतिसादात अॅमी म्हणतात तसे सामूहिक धार्मिक आत्महत्या, जिहाद, नरबळी वगैरेवर निशाणा साधला असतात तर बहुतांशी सर्वांनी सहमती दर्शवली असती. पण या लेखात मात्र तुम्ही सगळंच गृहीत धरून लिहीत आहात. याचे उत्तर" स्वर्गात" असेच असू शकते - एवढीच पापपुण्याची भीती असती तर त्या भीतीने त्यांनी हत्या केली नसती ना? कारण श्रद्धाळूंच्या समजुतीप्रमाणे हत्या हे पाप आहे आणि पापी लोक नरकात जातात. आपल्या एवढ्या लाडक्या नातवाला ते कशाला नरकात घेऊन जातील? प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच हा मानभावीपणा म्हणावा का? एखाद्याला देव मानावासा वाटणे, रोज देवळात जावेसे वाटणे किंवा देवाची स्तोत्रे/ मंत्र म्हणावेसे वाटणे हे त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? आणि तुम्ही अश्या लोकांना बेअक्कल, मती भ्रष्ट झालेले म्हणता, त्यांनी श्रद्धा ठेवणे सोडून द्यावे म्हणता ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणायला पाहिजे.

In reply to by ट्रेड मार्क

आणि तुम्ही अश्या लोकांना बेअक्कल, मती भ्रष्ट झालेले म्हणता, त्यांनी श्रद्धा ठेवणे सोडून द्यावे म्हणता ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणायला पाहिजे.
कसे काय बुवा? ते फक्त म्हणतात तसे. अश्या लोकांना श्रद्धा ठेवणे किंवा देवळात जाणे, स्तोत्रे म्हणणे यापासून यनावाला रोखत आहेत का? अश्या सश्रद्ध व्यक्तिंना त्यांचे स्वातंत्र्य मिळू नये यासाठी यनावाला काही अ‍ॅक्टिव्ह प्रयत्न करतात का? ते फक्त अश्या कृतींविरोधात आपले मत सभ्य भाषेत व्यक्त करून आपले अभिव्यक्ति स्वातंत्र्य बजावीत आहेत.

In reply to by पुंबा

तुम्ही यनावालांचे इतर लेख वाचलेले दिसत नाहीत. या लेखात त्यांनी देवळात जाणाऱ्याला रोखायचा आणि मूर्ख ठरवायचा प्रयत्न केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे म्हणजे तुमच्या मते काय फक्त शारीरिक बळजबरी करणे का? चारचौघात एखाद्याला मूर्ख ठरवणे, एखाद्याच्या श्रद्धेवर सतत आक्षेप घेणे याला काय म्हणायचं? एक उदाहरण घेऊ. आपल्या बहुतेक सगळ्यांचा आपल्या पालकांवर खूप विश्वास असतो, त्यात आईवर तर श्रद्धा म्हणावी एवढा विश्वास असतो (अपवाद असतात). मग एखाद्याची त्याच्या आईवर श्रद्धा असेल तर त्याला मूर्ख म्हणायचं? ती व्यक्ती जर आईला रोज नमस्कार करत असेल तर इतर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? पण दुर्दैवाने आई कोणालाच जन्मभर पुरत नाही, मग आई शारीरिक दृष्ट्या समोर नसली तर त्या व्यक्तीने आईच्या फोटोला रोज नमस्कार करणे चालू ठेवले, याला मूर्खपणा म्हणायचे? आईने केलेले संस्कार, तत्वे त्याला जीवनात उपयोगी पडत आहेत. अडचणीच्या वेळेला आई आपल्या पाठीशी आहे अश्या श्रद्धेमुळे त्याला बळ मिळत असेल, अगदी खूप फ्रस्ट्रेशन आल्यावर आईच्या फोटोसमोर उभं राहिल्यावर मनाला उभारी येत असेल तर त्याला मूर्ख म्हणायचे का वेडा? प्रत्येकाचे असे विश्वासाचे, श्रद्धेचे स्थान वेगळे असते. आता स्वतः यनावालांची आपण सर्वज्ञानी आहोत अशी श्रद्धा नाही का? आपणच तेवढे शहाणे आणि बाकी सर्व मूर्ख असा अतिविश्वास आहे ना? आपल्याला जन्म कसा मिळाला/ मिळतो याचे सध्याच्या शास्त्राला माहित आहे तेवढेच ज्ञान त्यांना (आणि पर्यायाने आपण सगळ्यांना) आहे. पण तरीही जे माहित आहे त्यापलीकडे बरंच काही आहे हे मात्र त्यांना पटत नाही. उदा.गर्भ कसा राहतो इथपासून ते जन्म कसा होतो ही क्रिया म्हणून आपल्याला माहित आहे. पण मग त्यात प्राण येतो म्हणजे काय होते, कसे होते हे माहित आहे का? असा मनुष्यप्राणी आपण जैविकदृष्ट्या मिळवलेल्या स्त्रीबीज आणि स्पर्मशिवाय अथ पासून इतिपर्यंत प्रयोगशाळेत बनवू शकतो का? एवढाच कशाला जे सर्व प्राणिमात्रांसाठी अत्यावश्यक आहे असे रक्त प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवू शकतो का? ते नाही जमलं तर हा प्राण किंवा जीव नावाचा प्रकार नक्की काय आणि कुठे असतो हे माहित आहे का? आपले मन कुठे असते? भावना कुठे आणि कश्या येतात? म्हणजेच सध्याच्या विज्ञानाला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत त्यापेक्षा जास्त गोष्टी माहिती नसलेल्या आहेत. पण मग तरीही सध्याचे विज्ञान सांगेल त्यावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धाच नाही का? एखाद्या वैज्ञानिकाने शोध लावला की तुम्ही स्वतः प्रत्यक्ष त्याची तपासणी करता का? मग ही श्रद्धा तुम्हाला चालते पण एखादा देवळात जात असेल, मंत्र, स्तोत्र म्हणत असेल तर मात्र ते नाही चालत. यनावालांच्या बाबतीत तर ते एक वृत्तपत्रावर एवढा विश्वास ठेवतात की त्यात जी बातमी असेल ती १००% सत्यच असली पाहिजे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यांना त्या पत्रकाराने सांगितलेली मते पण १००% सत्य वाटतात.

In reply to by ट्रेड मार्क

तुमच्या पहिल्या उदाहरणातली श्रद्धा मुर्खपणाचे लक्षण नाही. प्रेम, करूणा, जिव्हाळा या उदात्त भावनांचेच ते प्रकटीकरण आहे. सरसकट सार्‍याच श्रद्धांना मुर्खपणा म्हणणे चुकीचेच आहे. यनावाला सश्रद्धांना मुर्ख म्हणतात, तुम्हाला हे चुकीचे वाटते आणि तुम्ही त्यांना महामुर्ख म्हणता हे ठीकच आहे. मुर्ख- महामुर्ख हे संसदीय शब्द आहेत माझ्या मते. त्यामुळे अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या कक्षेत येतात.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे म्हणजे तुमच्या मते काय फक्त शारीरिक बळजबरी करणे का?
माझ्या मते, तुम्हाला अभिव्यक्ति करण्यापासून रोखणे म्हणजे तुमचा जो व्यक्त होण्याचा न्याय्य हक्क आहे तो बजावण्यापासून रोखणे. यनावाला ढीग सांगतील देवळात जाऊ नका, पण ते थोडेच एन्फोर्सर आहेत या हक्काचे? तो हक्क तुम्हाला यनावाला देत नाहीत तद्वत ते काढूनही घेत नाहीत, घेऊ शकत नाहीत. ते जास्तीत जास्त तसे सांगू शकतात, त्यांचे न ऐकणार्‍यांचा निषेध करू शकतात. माझ्या मते ती अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी नाही.

In reply to by पुंबा

तुमच्या पहिल्या उदाहरणातली श्रद्धा मुर्खपणाचे लक्षण नाही. प्रेम, करूणा, जिव्हाळा या उदात्त भावनांचेच ते प्रकटीकरण आहे. आता आईविषयीच्या याच भावना एखाद्या आईला कधीही न पाहिलेल्या मुलामध्ये सुद्धा असू शकतात. त्या मुलाचे वडील किंवा आजी आजोबा आईविषयी जे सांगतात त्यावरून त्या मुलाच्या मनात एक प्रतिमा निर्माण होते आणि जरी आईला बघितलं नसेल, तिचा स्पर्श आठवत नसेल तरी त्या मुलाची मात्र आई आपल्या जवळपास आहे आणि थोडं आपल्या पाठीशी आहे अशी गाढ श्रद्धा असते. हे श्रद्धेचं उदात्त रूप झालं. आता जेव्हा प्रेम या उदात्त भावनेचं विकृतीकरण होते, तेव्हा मग आईचा मृतदेह दाहसंस्कार न करता घरातच ठेवणारे पण लोक आहेत. थोडक्यात सांगायचं उद्देश असा की भावनेचा अतिरेक झाला की विकृतीकडे वाटचाल होते. मग प्रेम असो वा श्रद्धा. तुम्ही त्यांना महामुर्ख म्हणता मी त्यांना कधीच महामूर्ख काय दुसरा कुठलाही अपशब्द वापरलेला नाहीये. असल्यास दाखवून द्यावा, मी बिनशर्त सपशेल माफी मागेन. या उलट मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही त्यांचे सगळे लेख, धागे, (जे काही देतात ते) प्रतिसाद वाचावेत. ते प्रतिसाद देत नाहीत किंवा सोयीस्कर प्रतिसाद देतात असा माझ्यासकट बरेच जणांचा आक्षेप आहे. जिथे त्यांच्या विरोधी मते मांडली जातात किंवा प्रश्न विचारले जातात तिथे प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे तुम्ही म्हणताय तशी चर्चा करणे शक्य नाही. माझ्या मते, तुम्हाला अभिव्यक्ति करण्यापासून रोखणे म्हणजे तुमचा जो व्यक्त होण्याचा न्याय्य हक्क आहे तो बजावण्यापासून रोखणे. यनावाला ढीग सांगतील देवळात जाऊ नका, पण ते थोडेच एन्फोर्सर आहेत या हक्काचे? तो हक्क तुम्हाला यनावाला देत नाहीत तद्वत ते काढूनही घेत नाहीत, घेऊ शकत नाहीत. ते जास्तीत जास्त तसे सांगू शकतात, त्यांचे न ऐकणार्‍यांचा निषेध करू शकतात. माझ्या मते ती अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी नाही. एखाद्याला चारचौघात त्याच्या श्रद्धेवरून बोलणे, हेटाळणी करणे, मूर्ख, बिनडोक, बुद्धी गहाण ठेवलेले म्हणणे हे फक्त निषेध व्यक्त करणे आहे का? मानसिकरित्या अस्थिर असलेल्या व्यक्तीने केलेल्या कृत्यावरून समस्त श्रद्धावान लोकांना विकृत ठरवणे हे निषेध वाक्य करणे आहे का? त्यांना जसे हे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच इतरांना देवावर श्रद्धा ठेवण्याचे, देवळात जाण्याचे स्वातंत्र्य का नसावे? त्यांच्या या लेखात इतर लोक त्यांच्या नास्तिकते विषयी बोलतात म्हणून आक्षेप घेतात पण मग इतके लेख लिहून ते आस्तिकांना दूषणे देतात त्याचं काय? बादवे - एक मुद्दा स्पष्ट करतो मी आस्तिक नाही. रोज किंवा एखाद्या ठराविक दिवशी मी देवळात रांग लावून दर्शन घेत नाही. रोज मंत्र, स्तोत्र ई म्हणतो असेही नाही. उपास करणे मला झेपत नाही. पण म्हणून जर कोणी हे करत असेल तर माझा काही आक्षेप नसतो. अगदी माझी बायको, मुली हे करायला लागल्या तरी माझा काही आक्षेप नसेल. पण नवरात्राचे ९ दिवस निर्जळी उपास किंवा बाकी कामं सोडून देव देव करायला लागल्या तर नक्कीच आक्षेप घेईन. त्या उप्पर कोणा बाबा बुवाच्या नादी लागणार नाहीत याची दक्षता आधीच घेईन.

In reply to by ट्रेड मार्क

बादवे - एक मुद्दा स्पष्ट करतो मी आस्तिक नाही. रोज किंवा एखाद्या ठराविक दिवशी मी देवळात रांग लावून दर्शन घेत नाही. रोज मंत्र, स्तोत्र ई म्हणतो असेही नाही. उपास करणे मला झेपत नाही. पण म्हणून जर कोणी हे करत असेल तर माझा काही आक्षेप नसतो. अगदी माझी बायको, मुली हे करायला लागल्या तरी माझा काही आक्षेप नसेल. पण नवरात्राचे ९ दिवस निर्जळी उपास किंवा बाकी कामं सोडून देव देव करायला लागल्या तर नक्कीच आक्षेप घेईन. त्या उप्पर कोणा बाबा बुवाच्या नादी लागणार नाहीत याची दक्षता आधीच घेईन.>>> ==>> माझ्या मते प्रत्येकाने एवढेच केले तरी पुरेसे आहे. जवळपास धागालेखकाच्या पारड्याकडेच तुम्ही झुकला आहात.

In reply to by विशुमित

मी श्रद्धाळू लोक देवळात जातात, उपास करतात म्हणून त्यांची चेष्टा करत नाही किंवा त्यांना मूर्ख वगैरे म्हणत नाही. अगदीच कोणी विचित्र काहीतरी करायला लागलं तर समजवायचा प्रयत्न करीन. जवळची व्यक्ती असेल तर शिव्या घालीन किंवा जास्तीच झालं तर कानाखाली आवाज पण काढीन. पण उठसूठ सगळ्यांना मुर्ख, बेअक्कल ईई म्हणत नाही आणि म्हणणारही नाही. तसेच एखाद्या वृत्तपत्रात दिलेली बातमी १००% सत्य आहे असेही मी मानत नाही. प्रत्येक गोष्टीचा देव, श्रद्धा यांच्याबरोबर ओढून ताणून संबंध जोडत नाही. धागा काढून त्यावर सोयीस्कर असेल तरच उत्तर देणे, अडचणीच्या प्रश्नांना बगल देणे असले प्रकार करून वर मी कसा श्रेष्ठ आणि बाकी सगळे कसे मूर्ख असे म्हणत नाही. त्यामुळे बराच फरक आहे. मुळात आक्षेप त्यांच्या नास्तिकतेविषयी नाहीये फक्त ते ज्या पद्धतीने विषय मांडतात, इतरांना दूषणे देतात, सोयीस्कर उत्तरं देतात, चर्चा करायला येत नाहीत त्यावर आहे.

In reply to by ट्रेड मार्क

श्री.ट्रेड मार्क लिहितात,
"आनन्दा यांनी म्हणल्याप्रमाणे सर्वसामान्यपणे माणूस आपल्या प्रिय व्यक्तींची आत्महत्या करण्यापूर्वी हत्या करतो, आणि त्याचे कारण त्यांनी म्रुत्युपश्चात आपली सोबत करावी हे नसून माझ्या माघारी त्यांना संकटांचा सामना करावा लागू नये असे असते."
हे अगदीच चुकीचे आहे. नातू काही पोरका नव्हता. त्याचे आई-वडील होते. "परेश शहा, त्यांच्या पत्नी, मुलगा (जिनय )मुलगी, आई, वडील( सुधीर शहा) असे सहा जणांचे कुटुंब होते. असे या वृत्तांकनात लिहिले आहे. त्यामुळे नातवाचा गळा दाबण्याचे कारण त्याच्यासह स्वर्गगमन हेच होते . तसेच हस्नैल वरेकर ने "या सर्वांना घेऊन मी स्वर्गाला जाणार." असे कांही जणांना सांगितले होते असे सबंधित वृत्तात होते. .....यनावाला

In reply to by यनावाला

इस्लामबद्दल माहीत नाही, पण हिंदू धर्माने आत्महत्या करणारा नरकात जातो असे सांगितले आहे. ते जर श्रद्धाळू असतील तर त्यांना हे माहीत असावयास हरकत नसावी.. मुळात आत्महत्या हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे, आणि त्याचे अश्याप्रकारे भांडवल करणे त्याहून दुर्दैवी

In reply to by आनन्दा

ते बहुधा जैन आहेत ना ? जैन समजुतीप्रमाणे मृत्यूपश्चात आत्मा लगेच पुढचा जन्म घेतो आणि सर्व पापे फेडल्यावरच मुक्त होतो, बरोबर ?

In reply to by यनावाला

सर्वप्रथम २ प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. पण इथेसुद्धा तुम्ही "सर्वसाधारणपणे" हा शब्द आणि "शहांच्या घरातील परिस्थिती आपल्याला माहित नाही, त्यांची मानसिक स्थिती माहित नाही." हे वाक्य नजरेआड केलंत. बातमीत असंही लिहिलंय की श्री. शहा हे मानसिक दृष्ट्या अस्थिर होते. ही अस्थिरता सश्रद्ध असल्याने आली नसून (तसा पुरावा तरी नाही) त्यांच्या कोर्टात चालू असलेल्या केस मुळे आली होती असं पण बातमीत लिहिलं आहे. मग अश्या मानसिक दृष्ट्या अस्थिर असलेल्या व्यक्तीने केलेलं कृत्य उदाहरण म्हणून घेऊन तुम्ही समस्त सश्रद्ध लोकांना त्यांच्या पंक्तीत का बसवत आहात? नातू काही पोरका नव्हता. त्याचे आई-वडील होते आईवडीलांचे परस्पर संबंध बिघडलेले असू शकतात किंवा ते त्या मुलाकडे लक्ष देतात की नाही या संबंधी तुम्हाला काही माहिती आहे का? या सारखेच अजूनही काही पैलू असू शकतात हे तुम्ही का लक्षात का घेतलं नाही? हस्नैल वरेकरच्या बाबतीत तो घरातला कर्ता पुरुष असू शकतो. त्यामुळे आपल्या नंतर आपल्या कुटुंबाचे कसे होणार याची काळजी त्याला वाटत असेल तर ते स्वाभाविक आहे.

मी तर्राट जोकर, पग आणि अन्य मंडळींना आव्हान देतो की त्यांनी हा लेख कसा बरोबर आहे हे सिद्ध करावे.. वैयक्तिक दृष्ट्या मला हा लेख दखल घेण्याइतपत देखील जमलेला नाही असे वाटत आहे

In reply to by आनन्दा

धागा लेखक आणि हे सगळे इकडे वाचनमात्र असतील. जरी प्रतिसाद दिला तरी तो या धाग्यासंबंधीत नसेल, फक्त श्रद्धाळू आणि देवावर विश्वास ठेवणारे कसे मूर्ख हेच परत परत सांगतील. धाग्यामधील विसंगतींवर चुकूनही भाष्य होणार नाही. खाली प्रा. डॉ. नी एकोळी प्रतिसाद देऊन ते सिद्ध करून दाखवलेलं आहे.

In reply to by ट्रेड मार्क

यना सर्मथन​ समिती कृपया कोपर्डी विकृती कश्या वरील श्रद्धा माफ करा अंधश्रद्धा असल्याने झाली​आहे ते कळवणे म्हणजे अगदी ज्ञान कण मिळतील अखिल मिपा वडाची साल पिंपळाला लावण्याची कलाबाज स्वयंघोषित सुधारक "चळ"असलेल्या पण "वळत"नाही अश्याच संघाच्या अतार्किक प्रतिक्रियांद्वारे​ पीडीत अज्ञ बालक नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

In reply to by ट्रेड मार्क

>>>>>श्रद्धाळू आणि देवावर विश्वास ठेवणारे कसे मूर्ख हेच परत परत सांगतील. जे दिसतं ते आम्ही सांगतो ....! -दिलीप बिरुटे (यना समर्थक समिती सदस्य)

श्रद्धेमुळे विकृती निर्माण होते की नाही हा वादाचा मुद्दा नक्कीच आहे पण ' मी अमक्यातमक्याशिवाय राहूच शकत नाही ' ही नक्कीच विकृती आहे. जगात कुणाचंही कुणावाचून अडत नाही. मनुष्य एकटाच जन्माला येतो (जुळे किंवा तिळे हे अपवाद. पण तेही एका वेळी एकच जन्माला येतात) आणि एकटाच मरतो. त्यामुळे अमक्यातमक्याशिवाय मी जगूच शकत नाही असं म्हणणं ही खरी विकृती. बाकी सगळ्या गोष्टी या त्यातून येतात. प्रेम आणि नातेसंबंध हीसुद्धा मग विकृतीच म्हणावी लागेल.

In reply to by बोका-ए-आझम

मी अमक्यातमक्याशिवाय राहूच शकत नाही किंवा अमकेतमके माझ्याशिवाय राहूच शकत नाहीत अशी समजूत असणे हि विकृतीच आहे. जगात कुणाचंही कुणावाचून अडत नाही. मनुष्य एकटाच जन्माला येतो (जुळे किंवा तिळे हे अपवाद. पण तेही एका वेळी एकच जन्माला येतात) आणि एकटाच मरतो. >> अगदी अगदी. प्रेम आणि नातेसंबंध हीसुद्धा मग विकृतीच म्हणावी लागेल. >> हम्म सॉर्ट ऑफ ;)

.....कोणी निदर्शनाला आणून दिल्यास ते मान्य करीन.
वरच्या ट्रेडमार्क आणि हातोळकरांचे खालील प्रतिसाद अंश पुरेसे बोलके आहेत. ....असो. तुम्ही उत्तर देणार नाही हे माहित आहे. .... संदर्भ .....तुम्हीपण काय प्रश्न विचारत आहात जणूकाही ते तुम्हाला उत्तरच देणार आहेत. ...........मागच्या लेखावर अजोंनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणं अजून बाकी आहे.... संदर्भ

......, तर्कसंगत विचार करता वर लिहिलेल्या कारणमीमांसेपेक्षा अधिक समर्पक स्पष्टीकरण मला सुचत नाही.
तर्कसंगततेची गरज असते हे आपणास मान्य आहे हे वाचून अंशतः आनंद झाला :), उरलेला, धाग्यात जिथे तर्कसंगतता आढळली नाही त्यासाठी राखून ठेवायला लागला :{

..."कारणमीमांसा करायला हवी. ती बुद्धीला पटली तर त्यानुसार आपल्या कल्पना, विचार- आचार यांत योग्य ते बदल करायला हवेत. चुकीच्या, हानिकारक समजुतींचा त्याग करायला हवा. समाजस्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. असे मला वाटते. ..." तत्वतः मान्य असणार्‍यांनाही आपल्या सदर धागा लेखातील कथित "कारणमिमांसांच्या काही जागा" तर्काला सुट्टी देत नाहीत ना हे पुन्हा तपासाण्याची जरुरी असावी किंवा कसे.

...या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक नव्हेत.....
विज्ञानवाद्यांनी आपले दावे नेमक्या आधारावर उभे रहाण्यासाठी नेमके संदर्भ नमुद करावयास नकोत का ? सद्य लेख सध्यातरी 'सत्यकथा' नावाच्या मासिके आणि कादंबर्‍यांमधल्या सारखा सत्यकथा म्हणत मधे मधे कल्पनेचे अनेक तारे तोडल्यासारखा झाल्या प्रमाने विनोदी वाटत नाही ना ? :) ( ह. घ्या.) sandarbha hava

...श्रद्धेमुळे घडणार्‍या अशा विकृत भयानक घटनांच्या बातम्या अधून-मधून येतच असतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली एक विलक्षण बातमी लक्षात राहिली. थोडक्यात गोष्ट अशी....:
१) इथे अंधश्रद्धेमुळे असा फरक असावयास हवा होता का ? लेखक अंध आणि डोळस श्रद्धांमध्ये फरक करणे टाळत असल्याचे दिसते. अर्थात हा सविस्तर वेगळ्या चर्चेचा विषय. २) अनेक अंधश्रद्धांना सांगोवांगी ऐकीव कथानकांवर आधारीत असतात. खालील कथा आणि मोरल ऑफ द स्टोरी बद्दल वाद नाही. पण अंधश्रद्ध लोक संदर्भ देणे टाळतात तसे विज्ञानवाद्यांनी संदर्भ हाती नसताना कथानके देताना उदाहरणाची कथानके आणि नेमके संदर्भ असलेल्या बातम्या यात फरक करावयास नको का ? कुणी तरी म्हणतय यनावाला म्हणतात म्हणजे गोष्ट खरीच असली पाहीजे असा अंधविश्वास निर्माण एखाद्या विज्ञानवाद्याने निर्माण करावा का ? या बद्दल साशंकता वाटते.
दादा आणि बाबू हे दोन भाऊ म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी. परस्परांवर खूप प्रेम. त्यांचे तीन बैल. त्यांतील राजा बैलाचा दोघांनाही फार लळा. आधी स्वत:च्या हाताने राजाला हिरवा चारा भरवल्याविना दादा जेवत नसे. दादाचे सर्पदंशाने अकाली निधन झाले. बाबू व्याकूळ, सैर-भैर झाला. एके दिवशीं तो राजा बैलाच्या मानेवर कुर्‍हाडीने घाव घालू लागला. हंबरडा ऐकून लोक धावून आले. तोवर राजा मरणासन्न अवस्थेत पोचला होता. "तू हे असे का केलेस ?" हा प्रश्न विचारल्यावर बाबू म्हणाला," गेले दोन दिवस दादा माझ्या स्वप्नात येत होता. त्याने सांगितले की तिथे स्वर्गात सगळी सुखे आहेत. पण त्याला राजाची सतत आठवण येते. त्याच्यावाचून चैन पडत नाही. " त्यावर विचार केला आणि राजाला मारले. त्याच्यासारखे गुणी जनावर आता स्वर्गातच जाईल. तिथे दादाला भेटेल. दादाला खूप आनंद होईल. दादाला पाहून राजाही खुष होईल." अशी ही श्रद्धा. इथे हा मरून पडलेला बैल देहासह स्वर्गात कसा जाईल ? अशी शंका त्याच्या मनाला शिवतसुद्धा नाही. माणसाचे मन श्रद्धेने लिप्त झाले की त्याची बुद्धी पंगू होते हेच खरे.
वर म्हटल्या प्रमाणे कथेचा दाखला आणि मोराल ओफ द स्टोरी अगदी मान्य पण आपण कथा सत्य असल्याचा दावा करावयाचा असेल तर संदर्भाचा आग्रह आहेच sandarbha hava

In reply to by माहितगार

१) इथे अंधश्रद्धेमुळे असा फरक असावयास हवा होता का ? लेखक अंध आणि डोळस श्रद्धांमध्ये फरक करणे टाळत असल्याचे दिसते. अर्थात हा सविस्तर वेगळ्या चर्चेचा विषय.
आपण यनावाला जर समजून घेतले तर आपल्या हे लक्षात येईल की श्रद्धा अंधश्रद्धा यात फरक नाही. एक शब्द चोन अक्षरी आहे तर दुसरा चार अक्षरी असे यनावाला सांगतात. ते खर ही आहे. अंधश्रद्धांची ही काही उपयुक्तता आहे म्हणून त्या टिकून आहेत असे मी मानतो. विज्ञानाचा प्रसार जसा होईल तशा त्या कमी होतील अशी माझी श्रद्धा आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विज्ञानाचा प्रसार जसा होईल तशा त्या कमी होतील अशी माझी श्रद्धा आहे.
'विज्ञानाचा वापर चांगल्या उद्दीष्टांसाठीच करावा' ही एक श्रद्धा आहे, ही श्रद्धा विज्ञानाच्या प्रसाराने दूर होईल का ? व्हावी का ? या प्रश्नाकडे बघण्याची इतरांची काही वेगळी पद्धत असेल तर समजून घेणे आवडेल.

In reply to by माहितगार

इथे चांगले वाईट हे सापेक्ष असल्याने विज्ञानाचा प्रसार चांगल्या गोष्टी साठी म्हणजे नेमके काय? असा प्रश्न उपस्थित होतो. तिथे तारतम्य उपयोगाला येते.

"आतंकवाद्याला धर्म नसतो." हे विधान भोंगळ आहे. आतंकवादी नखशिखान्त धार्मिक असतो. आतंकाची प्रेरणा त्याला धर्मामुळेच मिळते. प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रेरणा अधिकाधिक जगण्याची असते..
१) धर्मांध आतंकवादी टिकेस पात्र असतातच पण धर्म न मानणारे पण ग्रंथ आणि व्यक्तीपुजक नक्षलवाद्यांसारखे आतंकवादी सुद्धा तेवढेच टिकेस पात्र असतात. २) श्रद्द्धा आणि धर्म मानणारे सर्व लोक आतंक्वादी नसतात त्यातील अगदीच तोकडी संख्या अतंकवादी होते त्या शिवाय त्यातील तुरळक अपवाद वगळता पैसा आणि हेतुपुरस्सर शस्त्रपुरवठ्याचे पाठबळावर आतंकवाद बर्‍यापैकी अवलंबून असतो किंवा कसे

.....तशीच हस्‍नाईलची ठाम कल्पना होती की आम्ही सर्वजण स्वर्गात जाणारच....
एकतर त्य वरेकरांचे नाव इस्माइल नव्हे तर हसनैन असे काहीसे असावे, गूगल न वापरता स्मरणशक्तीवर अवाजवी भरवसा ठेवला की गल्लत होण्याचा संभव असतो. ग्रंथपुजा आणि अंधश्रद्धेने अतिरेक होऊ शकतो हे मान्य केले तरी वरेकर केस मध्ये धागा लेखक म्हणतो तसा पुरावा मला तरी कोणत्या वृत्तपत्रातील वृत्तात आढळला नाही. घटने नंतर बर्‍याच कालावधीने आलेल्या आढावा बातम्या बातमी १ बातमी २ मध्ये दिसत नाही. धागा लेखक महोदया कडे पुरावा असल्यास संदर्भ सादर करावा ही आग्रहाची विनंती. बुद्धी प्रामाण्यवाद्यांनी सुद्धा अंधश्रद्ध लोकांप्रमाणे सूतावरून स्वर्ग गाठला तर त्यास नुसते बुद्धीप्रामाण्य एवजी अंधबुद्धीप्रामाण्य म्हणावे लागेल. त्यांच्यात आणि अंधश्रद्धलोकात फरक तो काय राहीला ? ग्रंथपुजेवरून होणार्‍या विध्वंसासाठी लेखक महोदयांनी वेगळे संदर्भ शोधल्यास जरूर मिळतील. नेमका आधार नसलेले संदर्भ वापरून पुर्नलेखन करण्याची जरूरी असावी किंवा कसे. sandarbha hava

सुधीर शहांच्या केस मध्येही केवळ 'बरोबर घेऊन जात आहे" या वाक्यावरून नेमक्या पुराव्या अभावी तर्क बांधणीचा प्रयत्न दिसतोय. खून आणि आत्महत्या केवळ आस्तीकच करतात असे नाही नास्तिकही करू शकतात. धागा लेखाचा उद्देश्य आणि निष्कर्ष आधी ठरवून अपुरे आधार असलेल्या वृत्तांवर तर्क खपवण्याचा प्रयत्न ढिसाळ वाटतो. तर्कसुसंगततेची संस्कृती रुजवण्याची अपेक्षा करणार्‍या विज्ञानवाद्यांकडून असे ढिसाळपण अपेक्षीत नसावे किंवा कसे ? अधिक साधार तर्कसुसंगत उदाहरणांसहीत धागा लेखास पुर्नलेखनाची गरज आहे किंवा कसे. संदर्भ उदाहरणात नेमके पणा हवा sandarbha hava

शीर्षक सर्व श्रद्धांना विकृत ठरवत नाही ना ? तसे असेल तर विज्ञानावरील विश्वास आणि श्रद्धाही विकृत ठरतील, विज्ञानाचा उपयोग जसा चांगल्यासाठी होऊ शकतो तसा अयोग्य दिशेचा विज्ञानाचा वापर खलत्वासाठी होऊ शकतो नाही का ? तसेच श्रद्धेचेही नाही का ? श्रद्धा जशी विकृततेस कारणीभूत ठरताना दिसते तसे श्रद्धा अनेक चांगल्या गोष्टीही करताना दिसते. 'विज्ञानामुळे विकॄती' हे शीर्षक जसे अर्धसत्य आहे तसे 'श्रद्धेमुळे विकृती' हे शीर्षकही अर्ध सत्य नाही का ? अंधश्रद्ध व्यक्ती अर्धसत्याच्या जोरावर उड्या मारत असेल तर ठिक पण विज्ञानवाद्यांनी अर्धसत्याच्या बळावर उड्यामारणे हा बुद्धीस जाणवणारा अप्रामाणिक विनोद असतो किंवा कसे ? असो ***इति लेखन सिमा***

श्रद्धेच्याच नव्हे तर कुठल्याही भावनेच्या अतिरेकातून विकृती निर्माण होते. अर्थात विकृती ही समाज काल स्थल सापेक्ष आहेत

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडे सर आपले प्रतिसाद हे विचार करायला लावणारे असतात. तुम्ही लिहलेला हा प्रतिसाद खरच उत्तम आहे, खास परत शोधून वाचला. http://www.misalpav.com/comment/964587#comment-964587 ह्या लेखमागे यान वाला यांचा उद्देश चांगला दिसतोय परंतु त्यांच्या विरोधी विचार असणाऱ्या लोकांशी त्यांनी एंगेज व्हायला हवे, प्रतिसाद द्यायला हवेत. प्रत्येक श्रद्धा ही चुकीची किंवा नुकसानकारक असा दृष्टिकोन योग्य वाटत नाही.

In reply to by अमितदादा

परंतु त्यांच्या विरोधी विचार असणाऱ्या लोकांशी त्यांनी एंगेज व्हायला हवे, प्रतिसाद द्यायला हवेत. >> काहीजण खरंच चर्चा करू इच्छित असतीलही; पण पकडपकडी खेळत बसायची सवय/reputation असणाऱ्या आयडीकडे दुर्लक्ष केलंच पाहिजे...

In reply to by एमी

तुम्ही सांगताय तेही अगदी बरोबर आहे म्हणा, त्यासाठी कुणालाही वैयक्तिक उपप्रतिसाद न लिहता लोकांनी प्रतिसादातून उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढणारा जनरल प्रतिसाद लिहू शकतात. पूर्ण लेखावर लेखकाचा प्रतिसाद दुर्मिळ असणे काहीस ऑड वाटलं.

शिर्षक परफेक्ट आहे. आपण अश्रध्द असल्याची यनावालांची जी तीव्र श्रद्धा आहे, त्यामुळे त्यांनी ज्या मर्यादेपर्यंत कल्पनाशक्ती पळवली आहे विकृतिच आहे की.

मस्तच निष्कर्ष ! आम्ही त्याच गावात राहात असून अनेक गावकरी, रिक्षावाले यांच्याशी बोलणे झाल्यावरही अजुनही कोणी त्याच्या या कृत्याचे विश्लेषण करु शकले नाहियेत. पोलीसही वर्ष उलटून गेले तरी संभ्रमात आहेत मात्र तुम्ही सरळ निष्कर्ष काढूनच मोकळे झालात. खरेच तुम्ही ग्रेट आहात. आम्ही एवढे वर्षे आस्तिक राहून जी मिळवू शकलो नाहित ती दिव्यद्रुष्टी देवाने तुम्हाला नास्तिक राहूनही बहाल केली याबद्दल देवाचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. आपणाला आपले विचार मांडायचे, नास्तिकवादाचा प्रचार करायचे स्वातंत्र्य आहे आणि मी त्याचा आदरच करतो पण प्लीज असे वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर कल्पनेचे इमले बांधू नका ही विनंती !

श्रद्धेमुळे विकृती >> या हेडरखाली सामूहिक धार्मिक आत्महत्या, जिहाद, नरबळी वगैरे यायला पाहिजे ना?

मी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता,त्यामुळे आत्महत्येआधी मानसिकता हळवी झालेली असते,रॅशनॅलीटी वगैरे काही रहात नाही हे अनुभवाने सांगू शकतो.जैन यांनी चिठ्ठीत जे लिहीले आहे ते लिहीताना त्यांच्या मनाची आधीच शकले उडाली असणार त्यामुळे नातवाला घेऊन जाणार वगैरे त्यांनी विस्कळीत लिहले आहे.यावरुन यनांनी जो द्राविडी प्राणायाम चालवला आहे तो आश्चर्य करण्याजोगा आहे.यना मसंस्थळावर बरीच वर्षे नास्तिक,विवेकवादी विचारांचा प्रचार करत आहेत.मी स्वतः नास्तिक असलो तरी हा लेख व त्यावरुन काढलेले अनुमान पटले नाही.

माझ्या अल्पशा बुद्धिला हे धाग्याचे नावच पटत नाही. श्रद्धा जशी वाढते तसा तो भावनिक रित्या अधिक परिपक्व ह्यायला पाहिजे.वरील उदाहरणांमध्ये श्रद्धा दिसत नसुन ऐकतर मानसिक असंतुलन (ज्याची शक्यता जास्त आहे) किंवा तालिबानी धर्मांन्धेपणा अश्याच शक्यता आहे.

तुमचा लेख पटला(संपूर्ण नाही पण गाभा पटला) आणि आवडला. ही विकृती येण्यामागे पारलौकिक जगाच्या अस्तित्वावर भाबडी श्रद्धा हेच महत्वाचे कारण आहे असे मला देखिल वाटते. यासाठी सामान्य माणसाने अधिकाधिक विवेकवादी, इहवादी, विज्ञानवादी व्हायला हवे. अश्या विचारांचा प्रचार- प्रसार डोळसपणे, सातत्याने करणे गरजेचे आहे. माझ्यापुरते हे काम मी करायचे ठरवले आहे.

In reply to by पुंबा

तुमचा लेख पटला(संपूर्ण नाही पण गाभा पटला)
सांप्रतकाळी सर्व जगत् अशाच एका "श्रद्धेमुळे विकृती"च्या संकटाचा सामना करत आहे. फक्त "ते" नेत नाहीत तर पाठवतात आणि स्वतः जातात.

या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक नव्हेत. अशा घटनांचे सर्वांगांनी विश्लेषण व्हायला हवे. कारणमीमांसा करायला हवी. ती बुद्धीला पटली तर त्यानुसार आपल्या कल्पना, विचार- आचार यांत योग्य ते बदल करायला हवेत. चुकीच्या, हानिकारक समजुतींचा त्याग करायला हवा. समाजस्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. असे मला वाटते.
+१११ असे विश्लेषण सर्व बाजूने व्हायला हवे. वाद विवाद व्हायलाच हवेत. सश्रद्धांनी सुद्धा यनावालांना झोडपणे एवढेच ध्येय न ठेवता त्यांच्या धाग्यावर साधक बाधक चर्चा, तार्किक वाद झडावा असे प्रयत्न करावेत असे माझे वै. म.

In reply to by पुंबा

यनावालांनी देखील सरसकटपणे सर्व सश्रद्धांना झोडपणे सोडले पाहिजे. आम्ही पण त्यांना झोडपणे सोडू.

In reply to by आनन्दा

तो त्यांचा पिंड नव्हे! सश्रद्धांना झोडपणे हा त्यांच्या प्रबोधनाचा भाग आहे.ते म्हणतील तुम्ही आम्हाला झोडपले तरी चालेल पण आम्ही सश्रद्धांना झोडपणार. कारण आमच्या प्रबोधनाला तुम्ही झोडपणे म्हणता त्याला आम्ही काय करणार?

In reply to by प्रकाश घाटपांडे

झोडपणे आणि प्रबोधन यात फरक आहे.. समोरच्याच्या वागण्यातील विसंगती नेमक्या शब्दात दाखवून त्याला विचार करायला प्रवृत्त करणे म्हणजे प्रबोधन. प्रबोधन करणारा नेहमी चर्चेला तयार असतो, कारण तो आपल्याला समोरच्यापेक्षा उच्च मनात नाही समोरच्याच्या वागण्याचा कशाशीही बादरायण संबंध जोडून तलवारबाजी करणे याला झोडपणे म्हणतात. त्यांनी तालावर काढली तर आम्हाला पण तलवार काढण्याशिवाय पर्याय नाही.. यनावालांचे मागचे दोन लेख वाचले तर हे सहज लक्षात येईल की ते काही अपवादात्मक घटनांचा आधार घेऊन सरसकट सगळ्यांना झोडपतायत.. त्याला तुम्हाला प्रबोधन म्हणायचे असेल तर म्हणा बापडे.. अजून एक अंधश्रद्धा, दुसरे काय.

In reply to by आनन्दा

तुमच्या दृष्टीने असलेले झोडपणे हे त्यांच्या दृष्टीने डोळ्यात अंजन घालणे कि जो प्रबोधनाचा भाग आहे अशी ती गोष्ट आहे. त्यांचे पुर्वी उपक्रमावर भरपूर लेख आले आहेत अंगारकी चतुर्थी http://mr.upakram.org/node/3844 गॅस गणराज http://mr.upakram.org/node/3941 गुरुविण कोण लावितो वाट http://mr.upakram.org/node/3789 विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात http://mr.upakram.org/node/3719 कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प http://mr.upakram.org/node/3665 नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०) http://mr.upakram.org/node/3645 त्या मोरयाची कृपा http://mr.upakram.org/no de/3597 महाकाव्याचा विषय http://mr.upakram.org/node/3579 ज्ञानेश्वरील अकरा ओव्या http://mr.upakram.org/node/3526 चालविली भिंती मृत्तिकेची http://mr.upakram.org/node/3474 बुद्धीदाता http://mr.upakram.org/node/3379 अध्यात्मिक प्रवचन http://mr.upakram.org/node/3356 बिनडोकपणाचा कळस http://mr.upakram.org/node/3362 देव धर्म आणि गाजरचित्रे http://mr.upakram.org/node/3323 उदकी अभंग रक्षिले http://mr.upakram.org/node/3313 अशी एक शक्यता केवळ तर्क http://mr.upakram.org/node/3276 भयसूचक बातमी http://mr.upakram.org/node/3216 चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश http://mr.upakram.org/node/3161 ईश्वरे तृणे करुन रक्षण केले http://mr.upakram.org/node/2928 यात आश्चर्य ते काय? http://mr.upakram.org/node/2883 हा खेळ बाहुल्यांचा http://mr.upakram.org/node/2820 गूढ आश्चर्यकारक अनुभव http://mr.upakram.org/node/2525 कार्यकारण भाव http://mr.upakram.org/node/2503 विवेकवादी लेखनावर आक्षेप http://mr.upakram.org/node/2580 भ्रमाचा भोपळा http://mr.upakram.org/node/2388 सामान्य समज (कॉमनसेन्स) http://mr.upakram.org/node/2450

In reply to by प्रकाश घाटपांडे

यनावालांच्या पूर्वीच्या लेखनावर काहीच आक्षेप नाही, किंवा जिथे जिथे तो आहे, तिथे तो मी माँडलेलादेखील आहे, चर्चेचा प्रयत्न माझ्या बाजूने केलेला आहे, त्यांनी उत्तरे दिली नसली तरीही. परंतु हल्लीचे त्यांचे काही लेख पाहता ते आता असंबद्ध लिहायला लागले आहेत केव काय अशी शंका येते, आणि या असंबद्ध लेखनाचा पुरस्कार काहीजण ते केवळ विवेकवादी आहेत म्हणून हिरीरीने करायला येतात तेव्हा तर भयंकर मनस्ताप होतो. एखाद्या माणसाने कोठेतरी अक्कलखाती 30 लाख घालवले म्हणून आम्ही सगळे श्रद्धाळू दोषी कसे ठरतो? आणि या वरच्या लेखातील तर्कांबद्दल बोलनेदेखील हास्यास्पद आहे इतके ते बाळबोध आहेत. ते स्वीकारून आम्ही आमच्या श्रद्धा त्यागाच्या अशी त्यांची अपेक्षा आहे का?

In reply to by आनन्दा

अगदी सहमत ! मी त्यांच्या बाजुचा (नास्तिक नसलो) तरी त्यांचे पुर्वीचे लेख बरे असायचे. आताचे लेख म्हणजे बाळासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख आणि आता संजय राऊत लिहित असलेले अग्रलेख नावाचे विनोदी लिखाण एवढा फरक आहे.

In reply to by आनन्दा

चंद्रु तेथ चंद्रिका l शंभु तेथ अंबिका l संत तेथ विवेका l असणें कीं जी ll असे ज्ञानेश सांगतात. पण विवेकवादी असणे आणि विवेकी असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे तथाकथित विवेकवादी व्यक्तींच्या लिखाणातून वारंवार अधोरेखित होत आलेले आहे. असो.

In reply to by आनन्दा

मी केवळ झोडपणे एवढेच ध्येय न ठेवता असे म्हटले आहे. झोडपले तर चालते. परंतू, त्यामुळे चर्चा वेगळ्याच वळणाने जाऊ नये असे मी म्हणतो आहे. सांगोपांग चर्चा व्हावी. शेवटी, आपल्याला वाद -विवादातून एकमेकांकडून थोडेसे शिकायचेच आहे, नविन माहिती, विचारव्युह मिळाला तर ते हवेच आहे. जिंकणं किंवा हरणं अपेक्षित कुठे आहे?

In reply to by पुंबा

मला त्यांच्या आशयाबद्दल आधीच आक्षेप नाही. किंबहुना श्रदधांवर प्रश्न विचारलेच पाहिहेत, अन्यथा घुसळण कशी होणार? पण हे प्रश्न विचारताना सरसकटीकरण करू नये, जे यनावाला नेहमी करतात. मिपावरच अन्य कोणतेही नास्तिक टीकेचे लक्ष्य का बरे होत नाहीत? ते जे करत आहेत ते झोडपणेच आहे, त्यांचा बाज चर्चेचा नसून एखादे अंधश्रद्धेचे उदाहरण घेऊन मग सगळ्यांना 'बघा तुम्ही असेच आहात' असे खिजवण्याचा आहे असा संशय येतो. अश्याने प्रबोधन होत नाही, माझेही नाही आणि त्यांचेही नाही.

अश्रद्धेतून देखील विकृती निर्माण होते. हे काही डॊक्टरांनी ,माझ्याशी बोलताना व्यक्त केलेले मत आहे संदर्भ- स्वानुभवावर केलेले भाकित पुर्वीच वर्तवले आहे. मानसशास्त्र हा विषयच अजब आहे.

श्रद्धा या आशयावर चर्चा सुरु असल्याने सहभाग घेत आहे.. एका धर्मग्रंथात स्पष्टपणे म्हटलं आहे की, जी बदलते ती ‘श्रद्धा’ आणि जो कायम असतो, तो ‘विश्वास’! त्या ग्रंथामध्ये श्रद्धेला ‘पार्वती’ म्हटलं असून विश्वासाला ‘शिव’ म्हटलं आहे. जे त्रिकालबाधीत सत्य असते, त्यावर विश्वास असावा लागतो आणि जे काही काळापुरते असते, त्याला ‘श्रद्धा’ असावी लागते. यानुसार आपला देवावर विश्वास आहे की, श्रद्धा? जर विश्वास असेल तर तो सीध्द करण्याची आवश्यकता नाही आणि श्रद्धा असेल तर ती काळा नुरूप बदलनार आहे.. लेखाबाबत बोलायचे झाले तर मांडणी सुरेख आहे.. पण कुणी स्वर्गात जाण्यासाठी ह्त्या करेल हे थोड़ काल्पनिक वाटते.. जी तिन उदाहरणे लेखकानी दिली आहेत.. त्या घटनांमगिल वास्तव वेगळच् असाव.. कुटुंबियांची हत्या करुण आत्महत्या करण्याच्या बहुतांश घटनेत राग, किंव्हा आपल्या नंतर यांचे काय होणार? ही मानसिकता असते..

In reply to by सतिश गावडे

खरे तर अश्या लोकांना चाबकाचे फटके दिले पाहिजेत.. बाकी याच्या मागे देखील काही लॉजिक असते, पण दुसर्‍याच्या असहायतेचा/ विश्वासाचा फायदा घेउन पैसे उकळणे यासारखा गुन्हा नाही.

ट्रेड मार्क,
मुळात आक्षेप त्यांच्या नास्तिकतेविषयी नाहीये फक्त ते ज्या पद्धतीने विषय मांडतात, इतरांना दूषणे देतात, सोयीस्कर उत्तरं देतात, चर्चा करायला येत नाहीत त्यावर आहे.
अगदी शंभर टक्के सहमत. यनावाला मोठ्या आवेशात जाहीर करतात की तर्कशास्त्रात शब्दप्रामाण्यास थारा नाही. ठीके बुवा! मग त्यांना विचारलं की आधुनिक विज्ञानाचं महत्त्वाचं अंग क्वांटम मेकॅनिक्स आहे तिथे शब्दप्रामाण्याखेरीज पान हलंत नाही (मुद्दा क्रमांक १५). हे कसं का? तर यावर यनावालांनी कसलंही उत्तर दिलं नाही. जे आक्षेप ते अध्यात्मावर घेतात तेच आक्षेप आधुनिक विज्ञानास लागू केले की त्यांची अळीमिळी गुपचिळी होते. ही परिस्थिती खुल्या चर्चेस पूरक नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ज्या विज्ञानावर एवढा भरवसा ठेवतात त्या विज्ञानाने किती कोलांट्या उड्या मारल्यात याची काही उदाहरणं देतो. १. प्रकाशापेक्षा जास्त वेगाने काही प्रवास करत नाही असं आपण शिकत आलो आहोत. पण अलीकडेच लागलेल्या शोधामुळे असं म्हणतात की युनिव्हर्स ६८ किमी प्रतिसेकंद प्रति मेगापारसेक या वेगाने प्रसरण पावत आहे. १ मेगापारसेक म्हणजे ३.२६ मिलियन प्रकाश वर्षे. म्हणजेच १ मेगापारसेक अंतरावर असलेली आकाशगंगा आपल्यापासून प्रतिसेकंद ६८ किमी लांब जात आहे, २ मेगापारसेक असेल तर १३६ किमी प्रतिसेकंद लांब जाते. म्हणजेच आपण आपल्याला स्थिर वाटत असलो तरी आपण एवढ्या प्रचंड वेगाने प्रवास करत आहोत. मग हेच समजा कोणी १०० वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर त्याला मूर्खातच काढलं असतं ना? अजूनही आता सध्याचं विज्ञान म्हणून आपण ते सत्य मानतो पण अजून २५ वर्षांनी कोणी वेगळी गोष्ट सिद्ध केली तर? २. शास्त्रज्ञांना अजूनही ब्लॅक होल मध्ये नक्की काय असतं हे समजलेलं नाहीये. ब्लॅक होल सगळं ओढून घेतं एवढंच आपल्याला माहित आहे. पण आता शास्त्रज्ञ ब्लॅक होल म्हणजे पॅरलल युनिव्हर्सचं दार असावं असं म्हणायला लागलेत. ना जाणो काही वर्षांनी ते सिद्धही करू शकतील आणि मग आपण ते मानायला लागू. ३. पाहिली उदाहरणे जरा वरच्या स्तरातील होती. हे उदाहरण आपल्या रोजच्या जीवनातलं घेऊ. इतके वर्ष डॉक्टर लोक ओरडत होते कोलेस्टेरॉल तब्येतीला वाईट असतं, त्यात हृदयासाठी तर खूपच वाईट. त्यामुळे फॅट असलेलं खाणं लोक टाळायचे. आता म्हणायला लागलेत की कोलेस्टेरॉल आपल्यासाठी आवश्यक आहे आणि कोलेस्टेरॉल वाईट नसतं. इथे अधिक माहिती वाचा. ४. डीएनए वरून आपण एखाद्याचे आईवडील सहज शोधून काढू शकतो हे आपल्याला माहित आहे. पण जगात अश्याही व्यक्ती आहेत की ज्यांचे डीएनए त्यांच्या आईबरोबर सुद्धा जुळत नाहीत. याची माहिती फारच कमी लोकांना आहे. पोलिसही अजूनसुद्धा डीएनए मॅच सर्रास वापरतात. थोडक्यात सांगण्याचा उद्देश हा की आपण सर्वच कोणा ना कोणावर अतिविश्वास ठेऊन जगतोय. आज माहित असलेल्या विज्ञानाने एक गोष्ट खरी सांगितली की आपण ती मानतो उद्या विज्ञानानेच विरोधी गोष्ट सांगितली की ती पण मानायला लागतो. हा अंधविश्वासच नाही का? पुढे जाऊन मी तर असं म्हणेन की माणूस (मग तो शास्त्रज्ञ असो वा बुवा) तुम्हाला चुकीची गोष्ट सांगू शकतो कारण तो त्याच्या ज्ञानावर विसंबून सांगतोय. पण त्या वैश्विक शक्तीचं तसं नाही. ती शक्ती तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. मग ज्या मार्गाने तुम्हाला त्या शक्तीचा उपयोग करता येईल त्या मार्गाचा वापर करावा. मग ते ध्यानधारणा करून असो वा मंत्र म्हणून असो वा पूजा करून वा अजून कुठल्या मार्गाने, त्यासाठी बुवाबाबांची गरज नाही. अट फक्त एकच, की तो मार्ग चांगला असावा आणि त्याने दुसऱ्याला त्रास, इजा, हानी होऊ नये. आणि महत्वाचं म्हणजे त्याबरोबर कर्म पण करत राहणं आवश्यक आहे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी ही म्हण सिद्ध करायला जाऊ नये.

In reply to by ट्रेड मार्क

धर्मावर विश्वास ठेवला जातो तसा विज्ञानावर ठेवूच शकत नाही.
I often use the analogy of a chess game: one can learn all the rules of chess, but one doesn't know how to play well. The present situation in physics is as if we know chess, but we don't know one or two rules. But in this part of the board where things are operation, those one or two rules are not operating much and we can get along pretty well without understanding those rules. That's the way it is, I would say, regarding the phenomena of life, consciousness and so forth. God was invented to explain mystery. God is always invented to explain those things that you do not understand. Now, when you finally discover how something works, you get some laws which you're taking away from God; you don't need him anymore. But you need him for the other mysteries. So therefore you leave him to create the universe because we haven't figured that out yet; you need him for understanding those things which you don't believe the laws will explain, such as consciousness, or why you only live to a certain length of time--life and death -- stuff like that. God is always associated with those things that you do not understand. Therefore I don't think that the laws can be considered to be like God because they have been figured out. - Richard Feynman, Superstrings: A Theory of Everything, edited by P.C.W. Davies and J. Brown