मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरक्षणाशिवाय कसे जगावे?

संदीप डांगे · · काथ्याकूट
मित्रहो, मराठा मोर्च्याच्या निमित्त एका धाग्यावर आपल्या दणदणीत चर्चा झाल्या. त्याचा पुढचा भाग काढावा लागणार आहेच कारण अनेक मुद्दे अजून आलेले नाहीत. तर ते एक असो. हा धागा वेगळ्या विचाराने काढलाय व सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती आहे की यात जमेल तसे, तितके योगदान आपल्या अनुभव, कौशल्य, ज्ञान याद्वारे द्यावे. तर मंडळी, असे आहे की अनेक हुशार, कर्तबगार मुलांना, विद्यार्थ्यांना, होतकरु तरुणांना शिक्षण व रोजगार ह्या जीवनयापनासाठी अतिशय महत्त्वाच्या गोष्टींसाठी कसल्याही प्रकारचे आरक्षण नसल्याने झगडावे लागते आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर अनेक परिहार्य कारणांमुळे संधींची उपलब्धता कमी झाल्याचे, नसल्याचे जाणवत आहे. अशा नागरिकांना, आपल्या भारतीय बांधवांना जातपातीची आडकाठी येणार नाही व आपल्या क्षमतेनुसार योग्य ते शिक्षण व रोजगाराची संधी मिळू शकेल असे मार्गदर्शन करता येईल काय हा विचार मनात आला, म्हटले आपल्या मिपाकरांनाच विचारल्यास एक चांगला मार्गदर्शक धागा तयार होईल. काय अपेक्षित आहे? : १. कोणत्याही प्रकारची जातीवाचक टिप्पणी, दोषदर्शन नसावे. २. प्रतिसाद थेट मुद्द्याला धरुन असावे. ३. रोजगार वा शिक्षण संधींची माहिती देतांना हात आखडता घेऊ नये. ४. आपल्या माहितीतल्या कंपन्या, संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था ह्यांच्या कामाची माहिती. ५. हा 'खर्‍या गरजूं'साठी मदतीचा धागा आहे हे कायम लक्षात असू द्या. ६. आपले बहूमूल्य मार्गदर्शन. खूप खूप धन्यवाद!

वाचने 36641 वाचनखूण प्रतिक्रिया 131

सुबोध खरे Sun, 09/25/2016 - 00:25
प्रत्येक सुस्थित माणसाने एक दुसऱ्या जातीच्या मुलाच्यासंपूर्ण शिक्षण आणि नोकरी /व्यवसाय याची जबाबदारी घ्यावी.वयाच्या २५वर्षापर्यंत.

In reply to by सुबोध खरे

They say Fees of Good Schools is one of the main reason of not opting for second child ;) जोक्स अपार्ट, हा पर्याय कठीण वाटतो. कारण उत्तम ठिकाणच्या शाळा निदान भारताततरी महाग होत चालल्यात. मिड लेव्हल शहरांमध्ये देखील शाळेची फी लाखांच्या घरात गेलीये. अन नोकरीची जबाबदारी घ्यावी म्हणजे नेमकं काय कराव? जास्तीत जास्त कोणी प्रोफेशनल एज्युकेशन देऊ शकेल, पण नोकरी लाऊन देण, मला स्वतःला पटत नाही.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

त्रिवेणी Tue, 09/27/2016 - 09:14
सहमत. आपण कुणाच्या नोकरीची जबाबदारी कशी घेवू शकतो? जास्तीत जास्त मार्गदर्शन किंवा नोकरीच्या संधीची उपलब्धता या बाबतीत मदत करता येईल. आणी व्यवसायाला मदत वैगरे माझ्या मते खुपच मोठी बाब आहे. कारण कुठलाही व्यवसाय करायला भांडवल हे लागणारच. जिथे आपण आपले इन्कम आणि खर्च यांचा रेशो सांभाळत असतो तिथे इतका पैसा मी तरी दुसर्यासाठी नाही गुंतवू शकत. म्हणजे डाॅक्टर साहेबांनी केली असेल अशा स्वरुपाची मदत कुणाला पण सगळ्यांनाच शक्य होईल असे नाही. इथे अशा स्वरुपाची व्यवसायासाठी ची मदत कुणी केली असेल तर अनुभव नक्की शेअर करा.

In reply to by त्रिवेणी

सुबोध खरे Tue, 09/27/2016 - 18:31
नोकरीची जबाबदारी घ्यावी याचा अर्थ नोकरी लागेपर्यंत शक्यतो सर्व मदत करावी किंवा धंदा /व्यवसाय यासाठी लागणारी मदत कर्जासाठी तारण इ जमेल तितकी मदत करावी जेणेकरून एक होतकरू तरुण आपल्या पायावर उभा राहील. व्यवसाय त्या माणसाने स्वतःच चालू करायचा आहे किंवा चालवायचा आहे. त्याला करायची मदत अशा गोष्टी माझा भाऊ गेली काही वर्षे करीत आला. उदा. त्याच्या मित्राकडे औद्योगिक क्षेत्रात जागा विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळेस माझ्या भावाने एक गाळा विकत घेतला आणि तो त्या मित्राला व्यवसाय चालू करण्यासाठी दिला. पुढे व्यवसाय चांगला चालू झाल्यावर तो गाळा त्यालाच विकत दिला. आज त्याचा मित्र त्या गाळ्यात उत्तम तर्हेने व्यवसाय करीत आहे. दुसऱ्या एका तरुण इंजिनियर ( जो त्याच्या कारखान्यात कामाला होता) त्याला स्वतःचे कॉन्टॅक्टस वापरून व्यवसाय वर मानण्यासाठी मदत केली आणि जेंव्हा हा तरुण आपल्या पायावर उभा राहील अशा स्थितीत आला तेंव्हा त्याने भावाची नोकरी सोडून दिली आणि आता तो स्वतः दोन डिप्लोमा इंजिनियर्सना नोकरीवर ठेवून आहे. त्याच्या कडे एक उत्तर प्रदेशीय मुसलमान तरुण वातानुकूलन यंत्राच्या दुरुस्ती साठी येत असे. याचा धंदा नुसताच दुरुस्ती करणे आणि रोख पैसे घेणे असे होते. त्याच्या कडे स्थावर जंगम मालमत्ता काहीच नव्हते. माझ्या भावाने त्याला प्रथम बँकेत करंट अकाउंट (चालू खाते) उघडायला लावले आणि त्याला चेकनेच पैसे दिले आणि नंतर घ्यायला लावले. काही दिवसांनी त्याला एक गाळा भाड्याने घ्यायला लावला. कारण याचा ठावठिकाणा नसल्याने त्याला वातानुकूल यंत्र घेऊन जाण्यासाठी लोक नकार देत. एकदा त्याचे दुकान झाले त्यामुळे त्याला लोकांच्या घरी किंवा दुकानात कामाच्या वेळेपेक्षा नंतर काम करता येऊ लागले. जसे त्याला पैसे मिळू लागले तसे त्याचे आयकर रिटर्न्स भरायला लावून तीन वर्षाच्या रिटर्न्स वर त्याला कर्ज देववून एक आडजागी दुसरा गाळा विकत घ्यायला लावला. आता हाच तरुण इतर दोन नातेवाईकांना हाताशी धरून चांगला व्यवसाय करीत आहे. "ज्योतसे ज्योत जलाते चलो"

In reply to by सुबोध खरे

हेमंत लाटकर Sat, 10/01/2016 - 19:15
आपण एखाद्याला आयुष्यात उभे केले, आधार दिला, नौकरी दिली, पैसा दिला तर यापैकी कितीजण केलेली मदत लक्षात ठेवेल.

सचु कुळकर्णी Sun, 09/25/2016 - 00:39
छान सुरूवात. पण काहि आयडी धींगाणा घालतीलच. असो. व्यवसायोन्मुख शिक्षण पध्दतीचा विकल्प तयार करणे. त्यानंतर त्याना व्यवसाय उभा करण्यास अर्थ पुरवणारी सोपी आणि याचा दुरुपयोग होणार नाहि याची दक्षता घेणारी यंत्रणा. ह्यावर खुप सुचवावस अस आहे खर. मला जे वाटतय ते नक्कीच मांडतो.

सचु कुळकर्णी Sun, 09/25/2016 - 00:39
छान सुरूवात. पण काहि आयडी धींगाणा घालतीलच. असो. व्यवसायोन्मुख शिक्षण पध्दतीचा विकल्प तयार करणे. त्यानंतर त्याना व्यवसाय उभा करण्यास अर्थ पुरवणारी सोपी आणि याचा दुरुपयोग होणार नाहि याची दक्षता घेणारी यंत्रणा. ह्यावर खुप सुचवावस अस आहे खर. मला जे वाटतय ते नक्कीच मांडतो.

वगिश Sun, 09/25/2016 - 08:44
नमस्कार, 2011 साली EBC सवलतीसाठी उत्पन्न मर्यादा 15000 रूपये होती. (वालचंद सांगली), वार्षिक शुल्क 50000 होते. हा विरोधाभास दुर झाला तर अनेक गरीब शिक्षणाचा विचार करू शकतील.

तुषार काळभोर Sun, 09/25/2016 - 09:12
यांचा थेट संबंध असेलच असे नाही. म्हणजे यशस्वी करियरसाठी चांगले शिक्षण आवश्यक असले तरी आपण जे शिक्षण घेतो त्यात यशस्वी करियर होईलच असे नाही. माझ्या इंजिनियरिंग शिक्षणामुळे व नोकरीमुळे बरेच नातेवाईक (माझी सांगायची लायकी नसली तरी- मी कशातलाच तज्ञ नाही, शिक्षणातील तर अजिबात नाही) मला विचारतात पोरगं/पोरगी दहावीला आहे. दहावीनंतर काय करायचं? माझ्या गोतावळ्यात अगदी tier-३ नातेवाईकांपर्यंत बहुतेक सगळे शेतकरी. अजूनही 'काहीतरी' शिकलं की 'कुठेतरी' चिकटता येईल, ही मानसिकता. आणि शेतीच्या आकासणाऱ्या आकारामुळे नोकरी करण्यातली अपरिहार्यता. मी साधारण असं सांगतो: आपल्याला काय आवडतं? आपल्याला काय जमतं? आपल्याला काय परवडेल? आपल्याला काय झेपेल? आणि चांगल्या करियर साठी स्कोप कशात आहे? म्हणजे काय? (फक्त उदाहरण आहे) मला चित्रं काढायला आवडतात.पण मला ते नीट जमत नाही. त्यात शिक्षण घ्यायचं तर माझ्या गावात/जवळपास चांगले शिक्षण उपलबध नाही. बाहेर राहून शिकायचे तर कॉलेज+राहणे हा खर्च परवडेल का? आणि इतकं करून मला त्यात (आर्थिक व मानसिक समाधान देणारं) यशस्वी करियर करता येईल का? किंवा सगळ्यांप्रमाणे मला इंजिनियर होण्याची हौस आहे(आणि त्यात चांगलं करियर करता येईल असं वाटतंय). पण मला गणितात जास्त गती नाहीये किंवा विज्ञानातील बेसिक संकल्पनाच कळत नाहीत. मग कसं करावं? किंवा मला वैद्यकीय क्षेत्रात रस आहे व मी विज्ञानात हुशारही आहे. पण मला त्याची लाखो रुपये फी परवडणार नाही. मग काय करायचं? या सर्व समस्यांवर उपलब्ध असणाऱ्या गोष्टी (आर्थिक मदत/पर्यायी शिक्षण) याचं actual प्रमाण कमी आहे आणि त्यातून ते फार कमी जणांपर्यंत पोहोचतं. त्याच्यासाठी मग प्रचंड स्पर्धा. विद्यार्थ्यांनी व पालकांनी शिक्षण व करियरविषयी प्रॅक्टिकल ऍप्रोच ठेवणंसुद्धा आवश्यक आहे. आवड/समज असो व नसो, दहावीनंतर डिप्लोमा करून आपलं पोरगं डोक्यावर पिवळं हेल्मेट घालून धरणाच्या भिंतीवर उभा राहून drawing बघतंय, अशी फिल्मी स्वप्नं सगळ्यांनी पहिली तर त्यांचा 'रव्या' होऊ शकतो, हे समजावणारं कोणीतरी असावं.

प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला लवकरात लवकर रोजगार कसा मिळु शकेल हे बघावे,त्यासाठी नेहमीच्या मार्गाने न जाता आधी व्यवसायीक शिक्षण घ्यावे त्याच्याने रोजगार मिळु लागला कि पुढच्या शिक्षणाचे बघावे, बरेच जण १० वी १२ वी नंतर पदवी घेण्यामागे लागतात मध्येच कुठेतरी गुचक्या देउन व्यवस्थेच्या नावाने बोट मोडत बसतात्,त्यापेक्षा आपल्या भागात कसला व्यवसाय चालु शकेल हे बघुण त्याप्रमाणे शिक्षण घ्यावे व तो व्यवसाय सुरु करावा त्यासाठी केंद्र सरकारच्या भरपुर स्किम आहेत,प्रत्येक वेळेस सरकारी किंवा खाजगी नोकरीची वाट न धरता आपल्या शिक्षणाप्रमाणे एखादा लघु उद्योग सुरु करावा व त्या व्यवसायात आपल्या सारखेच बेरोजगार असलेल्या युवकांना रोजगार द्यावा.

चौकटराजा Sun, 09/25/2016 - 10:47
माणूस संधीने संचिताच्या साह्याने किंवा संचिताने संधीच्या साह्याने घडत असतो.मानवी मनाचे काही दशक पैलू आता शोधण्यात आले आहेत. आरक्षणाच्या मुळे फक्त संधी मिळते. संचित नाही. तीक्ष्न नजर चपळपणा या निसर्गदत्त देण्ग्या॑ आहेत त्यातून संधी मिळाली की उत्तम फिल्डरही बनता येते वा ड्रायव्हर. आपले दुरदैव असे की फिल्डरला एका दिवसाला पन्नास हजार मिळाले तर ड्राय॑व्हरला सहा महिन्याला तितके. म्हणून सर्वजण क्रिकेटर होईन म्हणतात. दुर्लभ ते किमती यापेक्षा उपयुक्त ते किमती हे ज्यावेळी मानव जात स्वीकारेल त्यावेळी लोखंण्डाचा भाव ५० रू किलो व सोन्याचा ५ रू किलो होईल.

In reply to by चौकटराजा

मुक्त Sun, 09/25/2016 - 11:07
चौरा काका लोखंड व sonyachi तुलना काही कळली नाही.जे दुर्मिळ आहे त्याची किंमत कमी कशी होणार. बाकी डांगेसाहेब माझे मित्र आहेत पण त्यांच्याएवढी विद्वत्ता नसल्याने वाचनमात्र असणार आहे.

In reply to by मुक्त

चौकटराजा Sun, 09/25/2016 - 17:11
काही गोष्टींना मिळणारी किंमत ते किती दुर्मिळ आहे यावर फक्त मानवी समाजा॑तील प्रवाह ठरवतात तर नैसर्गिक महत्व हे त्याचा मानवी व्यवहारातील महत्वाने ठरते. मानवी जगापलिकडे किंमत ठरवणे हा प्रकारच नाही. आपल्याला ड्रायव्हर झाल्याचे दु: ख दोन कारणानी होते. एक त्याला पगार चांगला नाही म्हणून व दुसरे त्याला प्रतिष्ठा नाही म्हणून. बाकी दुसरा प्रकार गौण आहे. कारण फॉरमुला वन मधला विनर ड्रायव्हरच असतो पण मानवी समाजाच्या नजरेत कोणतेही कल्याणकारी काम न करता॑ त्याला प्रतिष्ठा दुर्मिळ पणाने मिळते. टेनिस चा सामना हरणारा देखील मनोरंजन करीतच असतो पण त्याला निम्मे पैसे मिळतात . मानवी समाजात संपतीचे वाटप फार खुळेपणाने होत असते. सोन्याचे जे काही औद्योगिक उपयोग असतील त्यापेक्षा कितीतरी महत्वाचे उपयोग लोखंडाचे आहेत. पण बिचार्‍या लोखण्डाला चकाकी नाही व दुर्मिळपणा नाही या दोन न्रिरुपयोगी गुणांमुळे ते मानवी मनाला खूळ लावू शकते. एकही गुंज सोने विकत न घेणारा माझ्यासारखा दुर्मिळ पण मला दुर्मिळपणाचा मोठेपणा बिलकुल नको. मी किती उपयुक्त आहे हे माझ्या नजरेत महत्वाचे.

In reply to by चौकटराजा

sagarpdy Sun, 09/25/2016 - 20:14
उपयुक्ततेचे उदाहरण झेपत नाहीये. काय उपयुक्त आणि काय दुर्मिळ पण अनुपयुक्त हे कसे ठरवावे? भीमण्णा, पुल, अमिताभ इ. आणि एक सामान्य शेतकरी / एखादा IT अभियंता / हवालदार, यातील अधिक उपयुक्त कोण? कोणाला अधिक उत्पन्न मिळावे?

In reply to by sagarpdy

चौकटराजा Sun, 09/25/2016 - 20:46
पिन्डे पिन्डे मर्तिभिन्ना: .हे तर आहेच . पण मानवी समाजाचा विकास हा पहिला महत्वाचा निकष मानला की मला अन्न, वस्त्र, निवास, आरोग्य ,शिक्क्षण ,दळण वळण ,तंत्र विकास याच क्रमाने जाउन मग करमणूक क्रीडा साहित्य काव्य याकडे जायला आवडेल. भांडवल शाही विचारधारा व समाजवादी विचारधारा यात हाच मूलभूत फरक आहे.

In reply to by चौकटराजा

sagarpdy Sun, 09/25/2016 - 21:02
मूलभूत गरजांची पूर्ती करणाऱ्यास सर्वाधिक उत्पन्न असल्यास, त्या अधिक महाग व चैनीच्या गोष्टी स्वस्त असे होईल असे वाटत नाही का?

In reply to by sagarpdy

चौकटराजा Sun, 09/25/2016 - 21:25
मूलभूत गरजांची पूर्तता करणार्यास सर्वाधिक उत्पन्न अन त्या वस्तू यांच्या किमतीचा काय संबंध..? म्हण्जे शेतकरी, कापडवाला, बिल्डर, डोक्टर, रस्ते निर्मिती करणारे ई चे उत्पन्न्न वाढले तर त्या वस्तू महाग होतील ? अहो आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत तरीही डाळी १०० च्या वर आहेत. वस्तूची किंमत पुरवठा व त्यास येणारा उत्पादन खर्च व मागणी यांच्या समन्वयावरून ठरते असे मी तरी अर्थशास्त्रात शिकलोय. आत चैनीच्या गोष्टी एका विशिष्ट पातळी नंतर निर्माण होतातच कारण मूलभूत गरजांची गरज अमर्याद नसते. अन्न वस्त्र पुन्हा पुन्हा लागते जरूर पण जरूरी पाहिली तर २ पोळ्या व थोडा भात भाजी, ९००चौ फो चे घर व चार पाच शर्ट पुरेसे होतात. खरी समस्या निर्माण होते ती चैन चालू झाल्यावर. मग भीमसेनना एका कार्यक्रमाचे दोन लाख द्या , सलमानला ५० कोटी द्या असे आपण करतो व डाळ १०० ची १२० झाली की बोंब करतो.

In reply to by चौकटराजा

संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 21:31
अंतूबर्वा उवाच : "तो तुमचा गांधी, जगात गेला पण कोकणात नाय आला, कारण त्याला माहितीये, कोकणात त्याच्या पंच्याचं कोण कौतुक करणार, इथे सगळे पंचेवाले.." (सर्व तसंच्यातसं आठवत नाही, अंदाजपंचे लिहिलंय)

In reply to by संदीप डांगे

शाम भागवत Tue, 09/27/2016 - 19:48
कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतूशेटनी आपले भाष्य सुरू केले. "अहो, कसला गांधी ? जगभर गेला, पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो ! त्यास नेमकं ठाऊक --- इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्याहीपेक्षा उघडे ! सुताबितात तथ्य नाही हो ! आमचा शंभूशेट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला ! ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही ! तिसरं शस्र म्हणजे उपासाचं ! इथे निम्मं कोकण उपाशी ! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हांस कसलं ? नाही, माणूस असेल मोठा... पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर ? आणि स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकांशीही नाही." "म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं ?" "ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा ! पण इंग्रज गेला कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं ? धंदा बुडीत खाती जायला लागला --- फुकलंनीत दिवाळं !

In reply to by चौकटराजा

sagarpdy Sun, 09/25/2016 - 21:55
शेतकऱ्याला नगण्य मोबदला मिळतो तेव्हा डाळ १००-२०० च्या घरात आहे. मधली पूर्ण व्यापार साखळी तशीच ठेवून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवल्यास डाळीची किंमत नक्कीच वाढणार. व्यापार साखळी काही किमान प्रमाणात नक्कीच आवश्यक आहेच. त्यांचा खर्च देखील हमाली, साठवणूक करणे हे अत्यावश्यक कामांत येत असल्याने काहीशी वाढेल.
खरी समस्या निर्माण होते ती चैन चालू झाल्यावर
सत्य, पण चैन हि मानवी समाज घडण्याची/विकसित होण्याची आवश्यक पायरी आहे असे वाटत नाही का? अत्यावश्यक गरजा भागावण्याची कामे सामान्य प्राणी देखील करतातच. करमणुकीसाठी ते देखील जुजबी खेळ खेळतातच. सुरुवातीच्या शेतकरी/शिकारी समाजाला जेव्हा अत्यावश्यक गरजा भागवणे सहज शक्य होऊ लागले तेव्हाच तो चैनीकडे वळला व संशोधन / अभ्यास / कला / क्रीडा यांकडे वळाला. आता त्या चैनीची सवय झालीये. असो, शेतीखेरीज जी अन्य उदाहरणे जी आपण दिलीत, ज्यांचे उत्पन्न थेट ग्राहकांकडून मिळणाऱ्या मोबादल्यावर चालते, त्यात त्या वस्तू / सेवा महागतील कि नाही?

In reply to by sagarpdy

चौकटराजा Mon, 09/26/2016 - 07:48
चैन ही मानवी विकासातील पायरी काहीशी आहे. पूर्ण नाही. एखाद्या गोष्टीने रोजगार निर्मिती होते म्हणून ती गोष्ट करा असे जर ठरवले तर असासिनेशन हा देखील रोजगार होउन शकतो.डान्सबार ला मग बंदी कशासाठी दारू बंदी कशासाठी? आपल्यावर संयम असेल तर या प्रकारची रोजगार निर्मिती काय हरकत आहे ? अर्थव्यवस्थेत एकदा आवश्यक ची सोय झाली की चैन येणारच.आज अमेरिकेत धरण बांधणे हा विषयच नाही सबब तिथे नाईट क्लब काढला तर काहीच अडचण नाही .पंण इथे भारतात नाईट क्लब काढतो व लोड शेडिंगमुळे तो बंद ठेवावा लागतो किंवा सौर उर्जेवर न चालवता डिझेल वर चालावावा लागतो इथे गफलत आहे.नशीब फॉरम्युला वन सारख्या रेसेस आपल्या इथे चालत नाहीत.

In reply to by चौकटराजा

sagarpdy Wed, 09/28/2016 - 10:18
समाजवाद हि अविकसित/विकसनशील समाजासाठी चैनच आहे. चर्चा करण्यासारखे आहे. पण इकडे बरेच विषयांतर होतेय. त्यामुळे थांबतोय.

मारवा Sun, 09/25/2016 - 12:07
कुठल्याही करीयरमध्ये यशस्वी होण्यासाठी एक ध्यास जरुर बाळगावा "सर्वोत्कृष्ठते" चा एक्सलन्स चा म्हणजे त्याला एक अंतिम आदर्श मानुन सतत त्याच्या जवळ जाण्याचा एक आटोकाट प्रयत्न सातत्याने करत राहावा. रोज अगदी रोज नेहमी काल पेक्षा आपले आजचे काम "बेटर" कसे करता येईल. "वेगळ्या" रीतीने कसे करता येइल. "दोष" एक एक करुन कसे कमी करता येतील. याचा सतत प्रयत्न एक "व्यावसायिक" म्हणून करावा. अशी विचारसरणी ठेवावी. दुसरं "कॅपॅसीटी डेव्हलपमेंट" "क्षमता विकास" कसा करता येइल या दिशेनेही प्रयत्न करत राहावा. म्हणजे मुळ क्षमता उदा. जर आपल्याला आपल्या कामा संदर्भातील एकच सॉफ्टवेअर येत असेल. व एकुण अजुन तीन मध्ये आपल्या फिल्ड चे काम होत असेल तर इतर दोन सॉफ्टवेअर आपण शिकु तेव्हा आपल्या मुळ "क्षमते" चा विकास होतो. उदाहरण जमले नाही बहुधा सांगायचे तात्पर्य आपल्या क्षेत्रासंदर्भातील नविन आवश्यक शिक्षण सातत्त्याने घेत अपडेट करत राहावे. तिसरा मुलभुत गुणवत्तेवर भर द्यावा म्हणजे जग काहीही करो आपण आपल्या गुणवत्तीचाच आधार घेउन पुढे मार्गक्रमण करु लांडीलबाडी अ‍ॅडजस्टमेंट करायची नाही असा निर्धार ठेवावा. त्यानेच अंतिमतः स्वविकास साध्य होतो. मेरीट इज मेरीट आफ्टरऑल. त्यावरच फोकस ठेवला तर काहीच अवघड नाही. चौथा जे जे आपण आपल्या करीयरमध्ये वा एकुण जीवनातही यशस्वीरीत्या साध्य केलेल आहे. ज्या तंत्रावर हुकुमत मिळवलेली आहे त्याचा तात्काळ त्याग करावा. हे अशा अर्थाने की सोडुन द्याव अस नाही त्याच्या कौतुकातुन लवकरात लवकर बाहेर पडावे व पुन्हा पाटी पुसुन नव्याने नविन बाब शिकण्याकडे उर्जा वळवावी. कंटीन्युअस एज्युकेशन कंटीन्युअस इम्प्रुव्हमेंट असे धोरण बाळगावे. पाचवी बाब "सर्जनशीलता" जी आहे तिला भरपुर महत्व द्यावे. म्हणजे आपल्या अगोदर लाखोंनी करोडोंनी का होइना एकाच तर्‍हेने विचार वा काम केलेले असेल तर ते आपण टाळावे. प्रत्येक जुन्या बाबीला विचासरणीला कामाच्या रीतीला आव्हान द्यावे चॅलेंज द्यावे म्हणजे अर्थहीन मारामारी करा वांझ विरोधच करा या अर्थाने नाही तर याहुन अधिक चांगला "पर्याय" काय असु शकेल याचा विचार करत राहावा. हा बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटीफुल अ‍ॅप्रोच आयुष्यात फार महत्वाचा आहे. अ‍ॅथॉरीटीला चॅलेंज करणे नेहमीच वाईट नसते. ही निर्भयता बाळगावी. अजुन एक वेगळ्या आपल्यापेक्षा सर्वस्वी वेगळ्या सांस्कृतिक वैचारीक आर्थिक सामाजिक बौद्धिक स्तर असलेल्या व्यक्ती विचारांबरोबर "स्व" ची घुसळण करावी. त्याने स्व- विकास होतो. अशाच वेगळ्या पुस्तकांचे वाचन करावे अशा वेगळ्या व्यक्तींचा सहवास करावा. म्हणजे करीयर ला व त्यापेक्षा एकुण जीवनाकडे बघण्याचा एक विशाल दृष्टीकोण मिळतो. जो विशाल दृष्टीकोण "स्व" ला प्रगल्भ करतो ज्याने अतिंमतः आपण आपल्या करीयरसहीत एकुण जीवनात यशस्वी होतो. बदल व नविन अनुभव नविन आव्हाने त्रासदायकच असतात मात्र ती तितकीच प्रगत करणारीही ठरतात त्यामूळे बदलातील ताणाला सामोरे जावे. बदलाला व नविन आव्हानांना सहर्ष सामोरे जावे. यात विशेष वा नविन काहीच नाही. फक्त एक करीयर करतांना किंवा एकुण जीवनाच्या आव्हानाचा सामना करतांना असा अ‍ॅप्रोच उपयोगी ठरतो असे मला एक आपले वाटते असे माझे एक मत आहे. थोडाफार अनुभव आहे., पटेल तितके घ्यावे. अजुन एक टेड टॉक्स चे सेवन करत राहावे. बरेचसे टेड टॉक्स प्रेरणादायी आहेत. अनेक विलक्षण सुंदर नविन कल्पना नविन विचार यातुन प्राप्त होतात. यु ट्युब वर उपलब्ध आहेत. या काही लिंक्स. १-https://www.youtube.com/watch?v=JQ0iMulicgg&list=PLIAz2VA7_AMG0cJW17V25pGNKtTFg8IkF २-https://www.youtube.com/watch?v=86x-u-tz0MA&list=PLVYIA3Y7IGXvOfXsgzomBzoKO-4lwywqh ३-https://www.youtube.com/watch?v=4vl6wCiUZYc यातील प्रत्येक विचार पटेलच असे नाही वा नविनच असेल असेही नाही. मात्र यात नक्कीच एखादा तरी दमदार विचार प्रेरणा मिळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे एक आपल ट्राय करायला हरकत नाही.

In reply to by मारवा

सूड Mon, 09/26/2016 - 16:30
विचार करायला लावणारा प्रतिसाद आहे. टेड टॉक्स बघणेत येतील. आणखी देखील काही टेड टॉक्सच्या प्रेरणादायी लिंकोळ्या असतील तर व्यनि कराल का?

वीणा३ Sun, 09/25/2016 - 14:27
प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला सतत वाचन करायची सवय लावावी. अगदी लहानपणा पासून जितकं मुलाला जास्त पुस्तकाच्या सानिध्यात ठेवता येईल तेवढं ठेवावं. पाल्याला ज्या विषयात आवड असेल त्या प्रत्येक विषयावर लहान मुलांना (६ वर्षा पुढील) समजेल अशा भाषेत पुस्तक उपलब्ध आहेत. ती मिळवायचा प्रयत्न करावा. रोज कमीतकमी १ तास आपल्या मुलं बरोबर कुठल्यातरी विषयाच वाचन / डिस्कशन करण्यात घालवावा. कुठल्याही गोष्टीत त्याचं मत विचारावं, लहान आहे म्हणून सोडून देऊ नये. माझ्या एका मैत्रिणीने गेली २ वर्ष प्रत्येक सुट्टी मुलाला (वय वर्ष ८) प्लॅन करायला लावली. हॉटेल / रेंटल कार / कुठली ठिकाणं बघायची / पैसे किती लागणार याची एक्सेल शीट बनवायला लावली. लागेल तेवढीच मदत केली आणि ट्रिप नंतर चुका लिहून ठेवायला सांगितल्या, मुलाने जवळपास ८०% काम केल. मुलाच्या भविष्याची काळजी १०वी १२वी नंतर सुरु करण्याऐवजी लहानपणापासूनच सुरु केली तर खूप फायदा होईल, मुलाची आवड कल खूपच चांगल्या प्रकारे कळलेला असेल. अवांतर: आरक्षण आणि शिक्षणपद्धती आत्ता आली, ज्ञान आधीपासूनच होतं. आणि आंतरजालामुळे आता सहज स्वस्तात उपलब्ध आहे. माझ्या आसपास मी जी उदाहरणं बघितली त्यावरून मेडिकल सोडून इतर कुठल्याही अभ्यासक्रम केलेली मुलं आपलं शैक्षणिक ज्ञान सोडून भलत्याच क्षेत्रात करिअर करताना दिसतात , त्यामुळे एखाद्या विशिष्ट अभ्यासक्रमाचा आग्रह धरण्यापेक्षा १२ वी नंतर जे मिळेल ते शिकावं आणि एखादा स्पेसिफिक जॉब (आवडीप्रमाणे) टार्गेट करून त्यात प्राविण्य मिळवायचा प्रयत्न करावा.

In reply to by वीणा३

अप्पा जोगळेकर Mon, 09/26/2016 - 19:02
ह्यूमन बीईंग इज नॉट टू बी इंजिनिअर्ड. रोज कमीतकमी १ तास आपल्या मुलं बरोबर कुठल्यातरी विषयाच वाचन / डिस्कशन करण्यात घालवावा. कुठल्याही गोष्टीत त्याचं मत विचारावं, लहान आहे म्हणून सोडून देऊ नये. माझ्या एका मैत्रिणीने गेली २ वर्ष प्रत्येक सुट्टी मुलाला (वय वर्ष ८) प्लॅन करायला लावली. लहान मुलांची सुट्टी नासवणार्‍या पालकांचा फार राग येतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

आदूबाळ Mon, 09/26/2016 - 20:24
सहमत आहे. एक्सेल शीट बनवायला लावणार्‍या आणि रोज तासभर कॉन्फरन्समध्ये बसवणार्‍या पालकांपासून पळून जाण्यात बालपण जाईल.

In reply to by मोदक

आदूबाळ Tue, 09/27/2016 - 21:25
बौद्धिक आहे की नाही हा प्रश्न गौण आहे. डिस्कशन काय फॉर्ममध्ये होतं हे जास्त महत्त्वाचं. सहज पोराशी गप्पा मारता मारता आपण वाचलेलं पुस्तक*, त्याने वाचलेलं पुस्तक* याबद्दल बोलणं वेगळं. आणि "चल रे/ग आता आपला डिस्कशन टाईम" किंवा "कर बरं सुट्टी प्लॅन. मी दाखवतो/ते कशी करायची. स्टेप वनः ओपन अ‍ॅन एक्सेल शीट..." असा रामगोपालबजाजपणा करणं हे वेगळं. *पुस्तक हा प्लेसहोल्डर आहे. सिनेमा, अनुभव, ट्रेक, किस्सा, काहीही घ्या.

In reply to by आदूबाळ

वीणा३ Fri, 09/30/2016 - 08:36
वरचे आक्षेप बरोबर आहेत जर तुम्ही मुलांना नको असताना त्यांना काहीतरी करायला सांगत असाल तर. मैत्रिणीने हे जेव्हा पहिल्यांदी केलं तेव्हा मुलाला प्रचंड उत्सुकता होती एका विशिष्ट ठिकाणी फिरायला जाण्यासाठी (त्याने त्याबद्दल भरपूर ऐकलं होतं, त्याचे १-२ मित्र जाऊन आले होते आणि तो मागे लागल्यामुळेच ते तिकडे चालले होते ) त्यामुळे तिने ती उत्सुकता नीट वापरून घेतली, त्या मुलाने स्वतः खूप वाचन केलं ,(ती स्वतः तो लहान असल्यापासून त्याला खूप पुस्तक वाचून दाखवते, आणि आता तो पुस्तकांशिवाय राहू शकत नाही, स्वतःहूनच रोज काहीतरी वाचत असतो ) त्याच्या मित्रांनी तिकडे काय केलं होतं त्याची यादी केली, आपल्याला वेळ किती कसा कुठे घालवायचा हे ठरवलं. मित्रांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी त्याला करायच्या नव्हत्या, त्या त्याच्या त्याने काढून टाकल्या. सगळ्या प्रकारात तो जाम खुश होता कि जस तो ठरवेल तशी ट्रिप झाली. पुढच्या वेळी आदल्या वर्षीचा अनुभव असल्याने आणि त्यात जाम मजा आल्यामुळे तो आवडीने तयार झाला. रोजचं डिस्कशन / वाचन सुद्धा मुलाचा कल बघून खूप वेग-वेगळ्या विषयांवर होऊ शकतं. मुलाला कार्स अतिशय आवडतात, आमच्या इथे काही कार्स ची मासिक (तत्सम), लायब्ररी मध्ये दिसली तर आणली जातातच. अजून वाचन जमत नसल्याने (चळवळ जास्त असल्याने) प्रत्येक कार बघून "हि कुठली " विचारात असतो. आता रस्त्याने जाताना तोच मला "आई हि बघ xyz कार" सांगत राहतो. मी रोज ऑफिस मधून आल्यावर त्याला काहीतरी सांगते (आज मला रस्त्यात पिवळ्या रंगाची कार दिसली, एक मोठा ट्रक खूप कार घेऊन चालला होता, ऑफिस मध्ये मैत्रिणीने डब्याला xyz आणलं, खूप छान होतं इ ), आता त्याला पण ती सवय लागलीये. हे सतत चालू ठेवलं कि हळू हळू वेग-वेगळे विषय बोलता येतात (मुलाच्या वयाप्रमाणे). सांगायचा मुद्दा हा कि वाचनाची, वेग-वेगळ्या गोष्टी (मुलांचा कल -आवड) बघून करायची सवय लावली तर त्यांचाच आत्मविश्वास वाढेल. एखाद्या ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही म्हणून असं मूल निराश होण्याचा संभव कमी होईल. कधी काही गोष्टी चुकतात, आपल्याला हव्या ताशा होत नाहीत, पण कधी कधी आपण न ठरवलेल्या गोष्टी सुद्धा चांगल्या होऊ शकतात हे जास्त चांगल्या प्रकारे कळू शकेल.

पियुशा Sun, 09/25/2016 - 14:30
नगर मध्ये म्हणे ३० लाख लोक जमले होते मोर्चाला त्यातल्या एकेकाने १ रु दिला तरी ३० लाखात बर्याच मुलाचे शिक्षण सहज होइल अस मझ भाउ म्हणत होता काल :)

In reply to by पियुशा

विशुमित Tue, 09/27/2016 - 16:45

किती मुलांचे शिक्षण होईल ?

रु.3 लाख प्रति मूल म्हंटलं तर फक्त 10. बाकी लाखोंचं काय?

करु द्यात त्यांना मोर्चा. मोर्चाच्या माध्यमातून कोणाला त्रास दिला आहे का त्यांनी ?

In reply to by विशुमित

पुंबा Tue, 09/27/2016 - 16:57
सगळं शिक्षण स्पॉन्सर करायची गरज नसते मालक. वर्षाला १०, १२ हजार रु. जरी मदत मिळाली तरी गरीब पालकांवरचा ताण किती हलका होतो आणी आपल्या गुणवत्तेमुळे मिळालेल्या मदतीमुळे किती उभारी मिळते हे मी स्वतः अनुभवले आहे. माझे शिक्षण अनेक संस्थांनी केलेल्या मदतीमुळेच होउ शकले अन्यथा मला शिक्षण सोडावे लागले असते. एव्ढा मोठा जनसमुह एकत्र होतोय तर खरंच अश्या प्रकारची मराठा समाजातील गरीब पण गुणवंत मुलांना, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी एखादी संस्था स्थापन करण्याचा कुणीच विचार करीत नाही. समस्या निश्चीत आहेत, सर्वच मराठे तालेवार नाहीत आणि शिक्षण, नोकरीसाठी अनेक गरीब घरातील मुलांची परवड होते ही वस्तुस्थिती आहे परंतू, अश्या संकटावर मात करण्यासाठी आरक्षणाशिवाय इतर विधायक मार्ग नाही का असा प्रश्न विचारावासा वाटतो. पण असं काही विचारलं कि तुमचा प्रश्न "करु द्यात त्यांना मोर्चा. मोर्चाच्या माध्यमातून कोणाला त्रास दिला आहे का त्यांनी ?" हा असतो.. जो निरर्थक आहे..

In reply to by पुंबा

विशुमित Tue, 09/27/2016 - 17:46

अशा खूप संस्था आणि लोक कार्यरत आहेत जे गरजूना शैक्षणिक मदत करतात. यादी देऊन त्यांचे मला मूल्य कमी नाही करायचे.
आताची अशी वस्तूस्थिती आहे की चांगले गुण आणि पैसे असले तरी ऍडमिशन मिळत नाही. 30 लाख रुपये ओतले तरी ऍडमिशन मिळणार नाही.
माझा मुद्दा एवढाच आहे की त्या 30 लाखाने फक्त 10 च जणांचे शिक्षण होईल पण जर आरक्षण मिळाले तर कितीतरी लाख मुलांचा शिक्षणाचा प्रश्न मिटू शकेल (मी फक्त अंदाज व्यक्त करतोय. यदाकदाचित आरक्षण मिळाले आणि त्याची योग्य अंमलबजावणी झाली तर आकडे वेगळे सुद्धा असू शकतात.). ही तफावत मी दाखवत आहे.
बाकी जो रु.1 लोकांकडून गोळा केले जात आहेत ते मोर्चा साठी केले जात आहेत. हाच सल्ला साई संस्थान, बालाजी संस्थान, हाजी अली दर्गा, नागपूर चैत्यभूमी, पंढरपूरची वारी, कुंभमेळे, न्यू इयर बॅश, मल्टी प्लेक्स च्या समोर जाऊन तुम्ही देऊ शकाल का? उत्तर नाहीच असणार आहे .
मी बऱ्याच वेळा लिहतोय आरक्षण शिक्षण आणि नोकरीसाठी मागत आहेत, मंदिर, मदरशे, समाजमंदिर आणि गुरूंच्या शाखा खोलण्यासाठी नाही. मी अजून ही म्हणतो करू द्यात त्यांना मोर्चे, निरर्थक का असेनात पण लाखाचे ज्ञान देणारे नक्कीच आहेत.

In reply to by विशुमित

पुंबा Tue, 09/27/2016 - 19:04
बाकी जो रु.1 लोकांकडून गोळा केले जात आहेत ते मोर्चा साठी केले जात आहेत. हाच सल्ला साई संस्थान, बालाजी संस्थान, हाजी अली दर्गा, नागपूर चैत्यभूमी, पंढरपूरची वारी, कुंभमेळे, न्यू इयर बॅश, मल्टी प्लेक्स च्या समोर जाऊन तुम्ही देऊ शकाल का? उत्तर नाहीच असणार आहे . १. कशावरून उत्तर नाहीच असेल असे वाटले. २. प्रत्येकाकडून फक्त १ रू. घेतला जात आहे? लाखालाखाची दवलतजादा करत नाहीयेत मातब्बर मराठा नेते?

In reply to by पुंबा

संदीप डांगे Tue, 09/27/2016 - 19:13
आपण दोघांनीही कॄपया मराठा मोर्चासंबंधीत चर्चेसाठी दुसरा धागा वापरावा, ह्या धाग्यावर अवांतर करुन धाग्याचे मूल्य हरवू नये ह्याची आपली सर्वांचीच जबाबदारी आहे असे मला वाटते.

In reply to by विशुमित

sagarpdy Wed, 09/28/2016 - 10:28
1. आरक्षित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा (वाचा : फी माफी / सवलत) खर्च कुठून निघतो ? 2. 3 लाख प्रति विद्यार्थी हा आकडा कुठून आला ? हा प्रति वर्ष आहे का ? नसल्यास केवळ प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाचा आहे का ? सविस्तर माहितीस इच्छूक आहे.

सचु कुळकर्णी Sun, 09/25/2016 - 16:56
बच्चा काबिल बनो काबिल कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी वाक्य जरी सीनेमातल असल तरी ह्यामागे खुप मोठा अर्थ दडलाय. रीलेट करायच झाल्यास ईथेच मिपावर मला माहित असलेल्या कीत्येकांना हे लागु होतय. डांगेबॉ तुमचे होस्टेल किंवा ईतर लेख पाहता तुम्ही सुध्दा फिट बसता की. ** संपादक महोदय हा प्रतिसाद ह्याच धाग्यावर द्यायचा होता, चुकीने तो मराठा मोर्चा धाग्यावर टाकल्या गेलाय विनंति आहे कि तो तेथुन उडवुन टाकण्यात यावा.

सुबोध खरे Sun, 09/25/2016 - 19:10
सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावायला पाहिजे असा मी मागे सविस्तर प्रतिसाद दिला होता. आय ए एस अधिकाऱ्याच्या मुलीला( उदा डॉ. देवयानी खोब्रागडे) आरक्षण देणे हे आरक्षणाच्या मूळ हेतूला हरताळ फासल्यासारखे आहे. ज्या माणसाला महिना अडीच लाख रुपये पगार तो मागासलेला कसा ? तेच परत टंकण्याचा कंटाळा आहे.

मनिमौ Sun, 09/25/2016 - 19:52
मोर्चाला जवळपास 70 लाख लोक आले होते म्हणे या सर्वानी आपल्या गावातील आर्थिक दृष्टीने गरीब पण हुशार मुलांची यादी आणली असती तर मोर्चा मधे सर्वानी 1 रू जरी जमा केला असता तरी 100 मुलांच शिक्षण झाल असत

संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 20:24
ह्या धाग्याचा उद्देश आधीच नमूद केल्याप्रमाणे मराठामोर्चा, आरक्षण योग्य-अयोग्य, इत्यादी नाही हे लक्षात घ्यावे. त्यानुसारच प्रतिसाद यावेत अशी परत विनंती करत आहे. अन्यथ चांगल्या भावनेने काढलेल्या धाग्याचा आखाडा व्हायला वेळ लागणार नाही. अनेक लोकांना मराठा-मोर्चा, आरक्षण इत्यादीबद्दल अजून बरेच बोलायचे आहे पण त्यासाठी वेगळा धागा काढूयात. ह्या धाग्याला ऑलटाईम रेफरेन्स धागा म्हणून ठेवावा अशी माझी संकल्पना आहे.

संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 20:58
मित्रहो, व्यवस्था एका रात्रीत बदलत नाही, अनेक दिवस, अनेक वर्ष तर कधी कधी अनेक पिढ्याही व्यवस्था बदलण्यात खर्ची पडतात. पण मग एखाद्या अडलेल्याचे, खचलेल्याचे, गरजूचे जे आजचे प्रश्न आत्ताच्या आत्ता ताबडतोब सोडवायचे आहेत त्याचे काय करावे? प्रत्येकाच्या आयुष्यात व्यवस्थेमुळे अनेक अडचणी उभ्या राहत आल्या आहेत, अनेकदा आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. मग आपल्याला काय शक्य आहे ते आपण करायचं. आपलं आयुष्य बदलणं आपल्या हातात आहे. कोणीही बसल्या जाग्यावर आपल्या काहीही आणून देत नाही. आज उघड्या डोळ्यांनी मी जेव्हा भारताकडे बघतो तेव्हा मला हजारो संधी होतकरुंची वाट पाहत उभ्या असलेल्या दिसतात. कित्येक ठिकाणी भरमसाठ गॅप्स आहेत, त्या गॅप्स मेहनत करणार्‍या तरुणांची वाट पाहत आजही उभ्या आहेत. वीस वर्षांपूर्वी ज्या समस्या होत्या त्यावर अजूनही सर्वसमावेशक काम सुरु झालेले नाहीये. काम आणि पैसा दोन्ही हात जोडून उभे आहेत. आणि ह्या प्रकरणात आरक्षण कुणालाच नाही, ज्याच्या मनगटात जोर आहे, ज्याच्याकडे मेरिट आहे त्याच्यासाठी हे सर्व खुलं आहे. ज्याला मेरिटवर आपल्याला जोखलं जावं असं वाटतं त्याच्या मेरिटची अस्सल पातळी दाखवणारी ही स्पर्धा खुली आहे. जगण्यासाठीच्या समस्या अनेक आहेत, त्यावर आपल्या सर्वांना मिळून उत्तरं शोधायची आहेत. मदतीचे हात जमतील तसे द्यायचे आहेत. कुणीही आयुष्याचा रस्ता एका भींतीपुढे येऊन संपलाय असे समजू नये. त्यासाठीच हा धागा आहे. ...तुर्तास एवढेच.

रेवती Sun, 09/25/2016 - 21:10
विविध कोर्सेसची माहिती आपल्याला नसते. अनेक पर्याय उपलब्ध असतात त्याबद्दल एका सरकारी कार्यालयात पुस्तके मिळतात. त्यात बारीक छपाईमध्ये अनेक अभ्यासक्रम व त्याची सरकारी कॉलेजे याबद्दल माहिती असते. सर्व भारतभरातील माहितीसाठी निळ्या कव्हरचे पुस्तक व महाराष्ट्रातील माहितीसाठी गुलाबी कव्हरचे पुस्तक असे पंचविसेक वर्षांपूर्वी होते. ती पुस्तके कुठे मिलतात हे माहित नाही पण आमच्याकडे आणली गेली होती. माझे वडील त्यांच्या बजेटप्रमाणे एका मुलीला शैक्षणिक मदत करतात. मुलगी असणे, कमी उत्पन्न गट व ब्राह्मणेतर असे साधारण निकष असतात. मुलीचे आईवडील व्यसनी नसून त्यांचा मुलीस सपोर्ट आहे हे बघतात. मुलीचे गणित, शास्त्र हे विषय करून घेणे, बाहेरून मार्गदर्शन मिलवून देणे वगैरे जमेल तसे असते. यात मागे प्रभूमास्तरांचीही हेल्प झाली होती. दुर्दैवाने एका मुलीस गुण कमी मिलाले. आता काय होते की एकतर इंजिनियरींग नाहीतर जाऊ दे! ते जमले नाही तर लग्न करून ताकू नाहीतर अगदीच फुतकळ कोर्स करू देत. अशी मानसिकता आहे. त्यातून मुलीच्या घरच्या लोकांना बाहेर काढणे जमलेले नाही. त्यामुळे एका विद्यार्थ्याची जबाबदारी घेणे तितकेसे फायदेशीर झालेले नाही. आता वडील पुढे हे करत राहतील असे वाटत नाही पण बर्‍याच मुलींना काही ना काही मदत झालेली आहे. माझे दोन्ही भाऊ मात्र आपल्याच नात्यात कोणी गरजू आहे का हे पाहतात व मदत करतात.

निओ१ Sun, 09/25/2016 - 22:21
as per my thinking, you need only willpower. few year ago i lost my established business, lot everything. but not lost my hope. i started my new work, without any knowledge about anything new work. but i used google, youtube for understand works steps. i did 2 short study about my work. after that now... without investment and degree i started my full time working business,now i am working with worldwide clients with very good repo. No need any reservation for do work. need only hard-work and willpower. and i have reservation but i not used any right in my life from this reservation system. if anyone need help he can contact me anytime.

In reply to by निओ१

संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 22:26
मस्त हो निओसाहेब, तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर मराठीतून लिहिता आले तर अनेकांना मार्गदर्शन होइल. अर्थात तुम्हाला स्पर्धेची चिंता नसेल तर!

In reply to by संदीप डांगे

निओ१ Sun, 09/25/2016 - 22:38
Sure sir, few years ago i was good in Marathi typing but this keyboard typeset is different as per typing knowledge,. but now days I am using only English as per my work need. i am coming back to my root again.. but i planed when i join this team i will need good hand in Marathi typing. i am practicing daily about this need some extra time. i hope your team will understand my issue.

In reply to by मुक्त

संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 22:29
ओ साहेब, तुम्ही रागावलात काय? काय राव! प्रत्येक घटनेकडे बघण्याचा माझा वेगळा दृष्टीकोन असतो, प्रत्येक गोष्टीला आडवे जाणे म्हणतात, मी शोधतो वेगळं काही. स्वतंत्र. माझ्यापुरतं.

In reply to by संदीप डांगे

मुक्त Sun, 09/25/2016 - 22:35
kas आहे. मराठ्यांचे घरातले प्रॉब्लेम मिपावर fakt तुम्हालाच माहित आहेत. आम्हाला काहीच काळात नाही. तुम्ही सगळ्या जगाचे ज्ञान कोळून पाल्येत. इथे बाकी लोक म्हणजेkachara. तुमच्या भाषेत किंवा ithalya so ....

अविनाश लोंढे. Sun, 09/25/2016 - 22:49
१ .ज्याने आधी आरक्षण वापरून नोकरी मिळवली आहे त्यांनी आपल्या मुलांना आरक्षण घेऊ देऊ नये . पण आयती 'सवलत' सोडणार कोण ? २. जे लोक आज आरक्षणाविरोधी (निरर्थक) बडबडत आहेत त्यांनी आपली अर्धी संपत्ती (जमीन, गाडी , बागायत इ . ) ज्याला आरक्षणाची गरज आहे त्यांना द्यावी . (आर्थिक समानता ) . हे अवघड आहे पण जस 'आरक्षण घेणाऱ्या' घरात जन्म घेणे 'गुन्हा' नाही तसेच श्रीमंत घरात जन्म घेणे ह्यातही काही 'मोठेपणा नाही' पण आयती 'मिळकत 'सोडणार कोण ? दोन्हीही गोष्टी 'बाऊन्सर' आहेत , पण हे केल्याने नक्कीच आरक्षणाशिवाय जगता येईल .

मुक्त Sun, 09/25/2016 - 23:08
संदीप डांगे मिपा सोडून जग खूप मोठे आहे. एखादा मुद्दा मिपावर आला नाही म्हणजे तो जगातच आहि. हा ब्रहम सोडा. तुमच्याएवढे किंवा तुमच्यापेक्षा कमी जाणणारे लोक ह्या जगात आहेत हे लक्सात ठेवा.

धर्मराजमुटके Sun, 09/25/2016 - 23:46
मुळात आरक्षणामुळे आपल्यावर अन्याय होतो किंवा आपल्याला आरक्षण मिळाले नाही म्हणून(च) आपली प्रगती होणार(च) नाही ही समजूत जितक्या लहान वयात उपटून काढता येईल तितक्या लवकर बरेच प्रश्न सुटतील. घरातील मुलं १० वी / १२ वी ला गेलं की त्याला घरातून, आजुबाजूकडून आरक्षणामुळे आपल्यावर कसा अन्याय होतोय याची रडगाणी ऐकायला भेटतात. कॉलेजच्या तरुण वयात मग असा ओपनवाला रिझर्वेशनवाल्यांचा जन्मजन्मांतरीचा विरोधक होऊन जातो. मग सरकारी जावई, कमीपैकीचे, खालच्या जातीचे, राजवाड्यात राहतो का रे ? असे शब्द बोलण्यातून बाहेर पडतात. अर्थात विरुद्ध बाजू देखील काही कमी नसते. आमच्यावर पिढ्यानपिढ्या कसा अन्याय झालाय ! रामाने शंबुकावर कसा अन्याय केला, महाभारतात एकलव्यावर द्रोणाचार्यांनी कसा अन्याय करुन अजुर्नाला कसे झुकते माप दिले असल्या अगदी पुराण कालीन कालखंडातील कथांचे डोस पाजले जातात. चैत्यभुमीवर गेले तरी 'शुद्र कोण होते ?' 'राम कोण होता ?' असल्या पुस्तकांचा खप जास्त असतो. मग काय करायचे ? आपण अगदे युगानयुगीचे गुलाम आहोत आणी त्याचा बदला आपण घेतलाच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे ! नाही कुणाच्या बापाचे असल्या घोषणा बाहेर पडतात. दुसर्‍या कोणाबद्द्ल बोलत नाही पण तरुण वयात मी देखील असाच विचार करत होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोधक होत गेलो. त्यांना हक्कच हवे होते तर त्यांनी हिंदू धर्मात राहूनच सुधारणा करुन घ्यायच्या होत्या. धर्म बदलण्याची काय गरज होती ? तुमच्यात ताकद होती तर मग याच धर्मात राहून का बदल करुन दाखविला नाही असे विचार वेळप्रसंगी मनात यायचे. एक वेळ अशी आली की बाबासाहेंबाच्या विचारांचा विरोध करायचा तर त्यांचा लेखनाचा अभ्यास केलाच पाहिजे असे मनाने घेतले. सुरुवातीला रामाने शंबुकावर कसा अन्याय केला, महाभारतात एकलव्यावर द्रोणाचार्यांनी कसा अन्याय करुन अजुर्नाला कसे झुकते माप दिले, क्षुद्र मुळचे इथले मालक होते असल्या वाचनाने झाली पण असे वाचन केल्यामुळे एकतर आपण आपल्या दैवतांचा द्वेष करु किंवा त्यांच्या दैवतांचा द्वेष करु यापेक्षा तिसरी गोष्ट होणे नाही हे लक्षात आल्यावर असली वाचने त्वरीत थांबविली. जे घडून गेले आहे ते मी बदलू शकणार नाही, त्यामुळे त्याच त्याच अन्यायाच्या गोष्टी वाचणे, त्यावर फालतू चर्चा करणे यात काही राम नाही असे लक्षात आले. त्यामुळे फक्त गेल्या शे दिडशे वर्षात काय अन्याय झालाय त्यावरच लक्ष केंद्रीत करायचे असे ठरवले. दलित लेखकांची पुस्तके आवर्जुन वाचत होतो. त्यातले प्रश्न मनाला भिडत होते. जसजसे वाचन वाढत गेले तशातशा दोन्ही बाजू कळत गेल्या. आरक्षण अजूनतरी हवे आहे मात्र ते कधीतरी संपायला देखील हवेच आहे या मतापर्यंत प्रवास झाला. अशातच डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले आणि थायलंड इथून प्रकाशित झालेले बौद्ध धर्माविषयीचे हिंदी पुस्तक हाती लागले. या पुस्तकाने मला एका आठवड्यात बाबासाहेबांच्या विरोधकापासुन बाबासाहेबांच्या पुजकाच्या भुमीकेत आणून ठेवले. या पुस्तकाचा पगडा इतका जबरदस्त होता की जवळ जवळ २-३ महिने विचार करुन मी बौद्ध धर्म स्वीकारावाच या भुमिकेपर्यंत आलो. दुर्दैवाने ते पुस्तक एका मित्रास वाचावयास दिले ते त्याने परत केले नाही. चांगले मित्र आणि चांगली पुस्तके दुरावली की परत मिळत नाहित हा सुविचार मी प्रत्यक्ष जीवनात अनुभवला. आज जवळ जवळ या गोष्टीला २० तरी वर्ष झाली पण अजुनही मला पुस्तकाची आठवण येते. दुर्दैवाने मला त्या पुस्तकाचे नाव आठवत नाहिये. मात्र बरेच विचारमंथन केले तेव्हा ल्क्षात आले की माझा धर्मही काही म्हणावा तेवढा वाईट नाही. आहे तिथेच राहून स्वतःस बदलणे शक्य आहेच की. त्यामुळे शेवटी धर्मबदलाच्या विचारावर पडदा टाकला. अजूनही मी पुरेसा वैचारिकरित्या परिपक्क्व झालो आहे असे मला वाटत नाही. आणि काही बाबतीत होणे शक्य वाटत नाही. मात्र मी जेवढा बदलण्याचा प्रयत्न केला आहे तेवढा प्रामाणिकपणे केला आहे आणि तो मी प्रामाणिकपणे टिकवून ठेवीन यात मला शंका वाटत नाही. ----------------------------------------------------------------------- एकंदरीतच या प्रवासात काही गोष्ट प्रकर्षाने जाणवल्या त्या म्हणजे १. भुतकाळात जगणे हा आपल्या भारतीयांचा खास गुण आहे. दोन्ही गटांनी भुतकाळात काय घडलेय त्याचे ओझे उरावर बाळगून जो प्रवास चालवला आहे तो त्वरीत थांबविला पाहिजे. आपल्याला एकतर भुतकाळातला दिव्य दैदिप्यमान वारसा आठवतो किंवा पिढ्यानपिढ्या भोगलेले अत्याचार. आजच्या जर्मन जनतेची विचार करण्याची पद्धत आपल्याला अंगीकारता येईल काय ? आपण वर्तमानकाळात जगायला शिकू काय ? आपल्या भावी पिढीने आपल्या पुर्वीच्या पिढयांच्याच पराक्रमाचे पोवाडे गायचे की आपल्या पुर्वीच्या पिढयांच्याच अत्याचारांच्या कथा ऐकायच्या ? आपल्या पिढीच्या काहि चांगल्या आठवणी त्यांना देणार आहोत काय ? २. आपण नेहमीच एका तारणहाराच्या उदयाची वाट पाहत असतो काय ? किंवा आपण नेहमी आपल्या अपयशाचे खापर दुसर्‍या कोणावर तरी फोडायला तत्पर असतो काय ? ३. आपण आपल्या संतापाची / इगोची धार बोथट करु शकणार आहोत काय ? सारांश : पुढच्या पिढीची विचार करण्याची पद्धत लहान वयातच योग्य रितीने बदलण्याचे काम केले तरी मला वाटते की निम्मा प्रश्न तिथेच संपेल. बाकी तर केवळ औपचारीकता आहे. अर्थात हे दिवास्वप्न आहे याची देखील मला जाणिव आहे पण आशेवर जगायला काय हरकत आहे ? आपल्यापासून सुरुवात करायला काय हरकत आहे ? विशेष नोंद : हे माझे केवळ विचारमंथन आहे. त्यात काही जातीवाचक शब्द आले असतील तरी ते कोणालाही दुखावण्याच्या हेतुने नाहीत. ते शब्द केवळ त्यावेळच्या मनस्थितीचे यथार्थ दर्शन करणारे शब्द म्हणूनच वाचावेत. तरीही कोणी दुखावत असेल तर मी अगोदरच माफी मागतो. आरक्षण हवे की नको ? मराठ्यांना आरक्षण द्यावे की नको ? या चर्चेत मला भाग घ्यावासा वाटत नाही. कारण मी वयोमर्यादेने आणि मनाने कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाच्या पलिकडे गेलो आहे. वरील प्रतिसादातील कोणताही परिच्छेद , वाक्य वेगळे काढून केवळ तेवढ्या सिलेक्टीव रिडींगवरुन कोणाला निषेध करायचा असेल, जाब विचारायचा असेल अथवा कौतुक करायचे असेल तर माफ करा मी पुढील प्रतिसादासाठी हजर असेलच याची खात्री नाही.

In reply to by धर्मराजमुटके

खटपट्या Mon, 09/26/2016 - 19:55
प्रतिसाद आवडला. बाकी ते पुस्तक कोणाला दीलत हे व्यनीत सांगीतलेत तर होता होइल तेव्हढी मदत करेन...

In reply to by धर्मराजमुटके

रंगासेठ Wed, 09/28/2016 - 17:01
अतिशय उत्तम प्रतिसाद.शाळेत असताना एवढं जाणवलच नव्हतं की आरक्षण हे काय प्रकरण आहे. आणि नंतर मग इतरांकडून ऐकून एक मत बनवलं गेलं. मुळात माध्यमिक शिक्षणापर्यंत परिस्थिती level playing field अशी निर्माण करायला पाहिजे. नोकरी साठीच शिक्षण घ्यायची/पाठांतरे करुन गुण मिळवायचे हे पण बदलायला पाहिजे. बाकी तुम्हाला जाणवलेल्या तीनही गोष्टींना अनुमोदन. आपल्याकडे अजून ही मानसिकता आहे की कुणीतरी एक नेता/तारणहार येऊन आपल्या समस्या सोडवेल, पण तोपर्यंत आपण काहीच करायचे नाही. अवांतरः मला अशावेळी कायम शाळेतील 'महापुरुषांचा पराभव' हा धडा आठवतो, एकदम चपखल वर्णन आहे आणि तशीच परिस्थिती आहे.

संदीप डांगे Sun, 09/25/2016 - 23:49
मुक्तराव, मिपा सोडून जग खरंच मोठं आहे. आणि ह्या जगात बर्‍याच गमतीजमती आहेत, अनेक मुद्दे मिपावर येत नाहीत ह्याचा अर्थ तेही ह्या जगात नाहीत हा भ्रम तुम्हीही सोडलेला बरा. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणकार्+अनुभवी आहात हे मला पुरेसं लक्षात आहे. तेव्हा तुम्ही आपले मुद्दे मांडा धागे काढून. मी तर केव्हाचं बोंबलतोय. बाकी, खदखद सरल्यावर मला भेटा, सुमारे 'एक लाख' खर्‍या गरजूंची गरज आहे मला. कोणीही असेल, कोणत्याही जातीधर्मांच्या 'खर्‍या गरजूं'मधे तर जरुर कळवा. मेहनत करणार्‍याला संधींची कमतरता नाही. तेवढ्यासाठी धागा काढला आहे. पण स्वतःची लाल करणे हा हेतू तर मुख्य आहे, तो नेहमी असतो. फक्त मीच शहाणा आहे जगात, हे मला पक्के ठावूक आहे म्हणून जीवंत आहे, जगत आहे, रोज नवी नवी आव्हानं स्विकारत जिंकत जात आहे. मी माझी 'लाल' करतो, ज्याला ज्याची करायची असेल त्याने त्याची करावी. हाकानाका? मला जात-जात करणारे सख्खे आईबाप असले तरी आवडत नाहीत हे अंतिम सत्य आहे. शेवटी जसं तुम्ही योग्य समजाल ते.

In reply to by संदीप डांगे

मुक्त Sun, 09/25/2016 - 23:56
फक्त मीच शहाणा आहे जगात,
असो. आता जास्त charcha करण्यात काही artha नाही. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

In reply to by शलभ

संदीप डांगे Mon, 09/26/2016 - 00:51
शलभभौ, असू द्यात, ते आमचे चांगले मित्र आहे. माझ्या काही विचारांमुळे गैरसमज झाल्याने दुखावलेले आहेत. कायम असे राहणार नाहीत ही खात्री आहे. लेट द टाइम पास...!

लीना कनाटा Sun, 09/25/2016 - 23:50
समाजातल्या या वंचित वर्गावर शेकडो पिढ्या जो अन्याय झाला आहे त्यासाठी कमीत कमी २५० ते ३०० वर्षे ( दहा पिढ्या ) आरक्षण दिले तर ते अभिजनांच्या बरोबरीने उभे राहण्या इतके सक्षम होतील. मात्र एक गोष्ट करायला हवी. जर मागील पिढीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर पुढील पिढीला आरक्षण नाही फक्त प्राधान्य मिळावे. म्हणजे मागासवर्गीय आणि ओपन कॅटेगरी च्या उमेदवारांना सामान गुण असतील तर मागासवर्गीयाला प्राधान्य मिळावे. आणि हि बाब पदोन्नती किंवा बदली यासाठी देखील लागू करण्यात यावी.

संदीप डांगे Mon, 09/26/2016 - 01:17
१. मी जे शेतकर्‍यांसाठीची हेल्पलाईन सुरु करणार होतो त्याचे कामासाठी दहा जणांची टीम खेड्यापाड्यातून (लाख लाख रुपये फी भरुन बीबीए झालेल्या - परत लाख रुपये भरुन एमबीए करण्याची तयारी करणार्‍या, वडील गरिब शेतकरी असणार्‍या मुलांची) तयार केली होती. ताजी बातमी अशी की अज्ञात कारणाने प्रस्तुत टीमने अर्धवट काम सोडून दिले आहे. असो. नवीन टीमसाठी जुळवाजुळव करत आहे. कोणालाही खर्‍या गरजूंची, हुशार आणि मेहनतीस तयार तरुणांची माहिती असेल तर कृपया कळवावी. कोणतीही गुंतवणूक नाही. फक्त शारिरिक व बौद्धिक मेहनतीची तयारी हवी. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्‍यात असले तरी चालतील. २. सध्या महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना अनेक गंभीर समस्या भेडसावत आहेत. त्यात एक महत्त्वाची म्हणजे कुशल-अकुशल शेतमजूरांची उपलब्धता. सुमारे २५० रुपये ते ३५० रुपये रोज एवढा मेहनताना देऊनही मुबलक व मेहनती शेतमजूर मिळत नाहीयेत. जे मिळतायत ते कामाला बारा वाजता येऊन पाच वाजता घरी जातात. मधले एक तास जेवणात घालवतात. कंत्राटी पद्धतीवर चांगले मेहनती शेतमजूर पुरवणार्‍या कंपनीची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. २५ हजार खर्‍या गरजू, मेहनती, कामाचा कंटाळा न करणार्‍या शेतमजूरांची आवश्यकता आहे. ३. माझ्या एका आयटीआय झालेल्या मित्राने स्वतः दोन वर्ष संशोधन करुन एक अफलातून इलेक्ट्रिक पॉवर स्टेबिलायजर बनवला आहे. त्याची किंमत साडेसात हजार, साडेनौ हजार व चौदा हजार अशी आहे. शेतकर्‍यांना वीजेचे संतुलन करण्यासाठी, पाण्याचे पंप चालवण्यासाठी, घरातली उपकरणे चालवण्यासाठी अशा स्टेबिलायजरची गरज असते. प्रथम-वापरा-नंतर-पैसे द्या ह्या स्ट्रेटेजीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात सदर स्टेबिलायजर विकण्यासाठी थेट विक्री करणारे विक्रेते पाहिजेत. प्रत्येक यंत्रामागे पाचशे रुपये मानधन मिळेल. कोणतेही टारगेट नाही, जितकं काम कराल तितका फायदा मिळवा अशी योजना आहे. ह्या कामासाठी इलेक्ट्रिकचे ज्ञान असलेले खरे गरजू, मेहनती, इमानदार तरुण पाहिजेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही. फक्त मेहनत करा व पैसे मिळवा. ४. शेतकर्‍यांच्या जमिनीचे मातीपरिक्षण शासकिय अधिकारी करतात, बरेचदा त्याला विलंब होतो. किंवा प्रत्येक शेतकर्‍याला ते शक्य होत नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाऊन शेतावर-बांधावर जाऊन मातीपरिक्षण करु शकेल अशी फिरती प्रयोगशाळा/लेबोरटरी ची संकल्पना आहे. बारावी विज्ञान झालेल्या हजारो मुलांना उत्तम संधी मिळेल. प्रत्येक मातीपरिक्षण-पाणीपरिक्षण अहवालामागे कमीशन बेसीसवर कमाई होईल. बारावी विज्ञान नापास झालेले असले तरी खरे गरजू, मेहनती, इमानदार तरुण पाहिजेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही. फक्त मेहनत करा व पैसे मिळवा. ५. शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांना विकू शकणार्‍या अनेक उत्पादक-शेतकरी-कंपन्या निर्माण झाल्या आहेत. अशा किमान एक हजार कंपन्यांची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांकडून सर्व प्रकारची उत्पादने घेऊन, विशेष उत्पादने पिकवायला लावून त्याची विक्री राज्यात, देशात, परदेशात करण्यासाठी खर्‍या गरजू, मेहनती तरूणांची आवश्यकता आहे. संपूर्ण मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे. काम करण्याची कळकळ असलेली मुले पाहिजेत. पैसा उत्तम मिळेल ह्याची खात्री आहे. ६. महाराष्ट्रातल्या सुमारे साडेतीनशे तालुक्यांमधे १० जणांची एक टीम अशा प्रकारे सुमारे साडेतीनशे टीम्स संपूर्ण शैक्षणिक मार्गदर्शनासाठी हव्या आहेत. टिमला कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, मार्गदर्शन मोफत पुरवले जाईल. टीमकडे स्वतःचा बेसिक लॅप्टॉप, मोबाईल इन्टरनेट कनेक्षन हवे. बारावी कला-समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, अशा कोणत्याही विषयात- शिकलेले होतकरु व खरे गरजू हवे आहेत. आवश्यकता असलेल्या एकूण तरुणांची संख्या: सुमारे ३५०००. हमखास व कायमस्वरुपी चांगले उत्पन्न, तसेच आपल्या देशबांधवांसाठी काहीतरी विधायक केल्याचे समाधान मिळवून देणारा उपक्रम. ७. घनकचरा व्यवस्थापन, रद्दीपेपर कलेक्शन व रिसायकलिंग साठी महाराष्ट्रातल्या सर्व ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी शंभर जणांचे एक युनिट ह्याप्रमाणे ३६०० होतकरु व खरे गरजू लोकांची गरज आहे. एकूण प्रभावित रोजगारक्षमता; १८,०००. हमखास व कायमस्वरुपी चांगले उत्पन्न, तसेच आपल्या देशबांधवांसाठी काहीतरी विधायक केल्याचे समाधान मिळवून देणारा उपक्रम. ८. महाराष्ट्रातल्या सर्व नापिक+पडिक जमीनी घेऊन त्यावर सुधारित पद्धतीने शेती करण्यासाठी असंख्य गरिब तरुण हवे आहेत. मार्गदर्शन मोफत मिळेल. चांगला नफा, कायमस्वरुपी काम, राहायला जागा मिळेल. ९. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना पिकांचे नियोजन, व्यवस्थापन, विपणन ह्यासाठी चांगले मार्गदर्शन करु शकतील असे किमान दहा हजार तरुण हवे आहेत. कोणत्याही प्रकारच्या शेतीशिक्षणाची अट नाही, योग्य मार्गदर्शन व तेही मोफत केल्या जाईल. दहावी नंतर किमान पाच वर्षे (समांतरपद्धतीने कोणतेही शिक्षण घेत) शेतीचे मूलभूत ज्ञान घेणे आवश्यक. तिसर्‍या वर्षापासून कायमस्वरुपी चांगली कमाई व समाजात मान-सन्मान मिळेल. अशा दहा हजार खर्‍या गरजू, कामाची कळकळ, एखाद्या सैनिकाच्या तोडीसतोड कष्ट करण्याची तयारी, वकिल-डॉक्टरांच्या बौद्धिक पातळीवर मेहनत करण्याची तयारी हे गुण आवश्यक. १०. दहावी करुन आयटीआय झालेले अनेक तरुण भारतातल्या-महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने लागत आहेत. बिनकामाचे इंजिनियर्सला अहंकार मोठा, ज्ञान कमी त्यापेक्षा चांगल्या पैशात आयटीआयन्स मुलांना चांगली मागणी आहे, पाच वर्षात चांगले तरबेज होऊन, इण्जिनियरांचे पगार मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. असे कीती हजार तरुण लागतील आत्ता लगेच माहिती नाही. पण किमान पन्नासेक हजार तरी लागतील. ११. महाराष्ट्रात कमाई करता येऊ शकणार्‍या कोणत्याही क्षेत्रात (मसाला बनवणे, घरगुती मेस, किराणा-माल घरपोच, शेळीपालन, दुग्धौत्पादन, कुक्कूटपालन, मध-उत्पादन, साबण-शाम्पू-पावडर, तयार कपडे, सजावटीचे सामान बनवणे, ब्युटीपार्लर, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रीशियन सहित सुमारे दोनशे प्रकारच्या घरगुती सर्विसेस, घरपोच कारवाशिंग, ऑफिस मेन्टेनन्स, अकाउंटट्स, मार्केटींग एक्झुकेटीव, हाउसकिपिंग, घरकामवाल्या) सुमारे दहा टक्के जागा मेहनत करणार्‍यांसाठी खुल्या आहेत. इथे कोणतेही आरक्षण लागू होत नाही. चांगला पगार, मेहनताना, मोबदला, जीवन सुस्थितीत व आरामात जगण्याची खात्री असलेल्या अनेक संधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजू-होतकरु, हुशार तरुणांसाठी वाट पाहत आहेत. (वरिल सर्व अतिशय पोटतिडकिने लिहिले आहे. कोणी ह्याला 'स्वतःची लाल करणे' समजत असेल तर ते तसेच आहे. ओक्के!? आणि हे फक्त दहा आहेत, अजून ९० मुद्दे बाकी आहेत.)

In reply to by संदीप डांगे

नाखु Mon, 09/26/2016 - 08:59
पुण्यात आल्यावर किमान तीन तास राखून ठेवाच.....(आग्रहाची मागणी) मुद्दा क्र ५,६,७,८ साठी माझ्याकडून सक्रीय सहभाग राहील. आपल्या माहीतीतेल पण पुण्यात जागेच अडचण असलेल्या ( शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांना विकू शकणार्‍या अनेक उत्पादक-शेतकरी-कंपन्या ) असल्यास मी माझी २०० चौ फुट जागा वापरायला द्यायला तयार आहे अट पुर्वीचीच वप्रून झाल्यावर साफ सूफ करून देणे आणि परिसरात शेतीमाल (बाजारभावापेक्षा) किमान १०% कमी ठेवणे (आजबाजूला किमान १०-१२ तरी भाजीवाले आहेत. (ठाण्यामध्ये व डोंबीवलीत हीच युक्ती/तत्वे वापरून तीन उत्पादक-शेतकरी-कंपन्या संस्था गेल्या ४ महिन्यात शेतकर्यांना त्यांच्या नेहमीच्या दरापेक्षा चौपट फायदा मिळवून देत आहेत०) पुनर्प्रक्रीया बाबत मीच स्वतः घरगुती घन कचर्यापासून स्वयंपाकाचा बायोगॅस साठी पुन्हा सुरुवात करणार आहे. खेड्यातील गरजूंना बसवून द्यायलाही तयार आहे(मिपाकर मोदकानेही यात सहभाग दाखवला आहे)

सामर्थ्य आहे चळवळीचे,जो जो करिल तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे धर्माचे!

धर्माचे इथे धर्म म्हणजे प्रामाणिकता,सचोटी आणि पारदर्शकता हे आणि हेच अभिप्रेत आहे

In reply to by संदीप डांगे

अप्पा जोगळेकर Mon, 09/26/2016 - 11:17
साहेब, तुम्ही मोठे उद्योजक होऊ शकाल असे वाटते. पण चर्चेसाठी तुम्ही चुकीचा फोरम निवडला आहे. इथे फालतू टाईमपास आणि जालीय प्रसिद्धी या व्यतिरिक्त काही हाताला लागणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयडीयाज घेऊन सुयोग्य इन्व्हेस्टर शोधावा. हा आमचा एक आगाऊ सल्ला आहे. शुभेच्छा.

In reply to by अप्पा जोगळेकर

अभ्या.. Mon, 09/26/2016 - 11:59
अगदी अगदी. संदीप माझा मित्रच आहे त्या नात्याने त्याला कळकळीचा सल्ला (अनुभव ह्या आधिकाराने सध्या एवढेच देऊ शकतो) संस्थळावर वेळ न घालवता ह्या आयडीयाज वर प्रत्यक्ष काम सुरु करावे. अगदी लहान स्वरुपात का होईना चालू करावे. पैशाचे सुयोग्य पाठबळ उभे करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. एकाच वेळी ब्लास्ट टाईप ढिगभर आयडीयाज फोडण्याएवजी एकेक गोष्टीवर व्यवस्थित काम करुन ते सयोग्य हाती सूपूर्त करावे. त्यातून समाजहितासोबत काही आर्थिक फायदा असेल तर त्याचे योग्य नियोजन करावे. ह्या गोष्टींची कागदोपत्री नोंद ठेवावी. हे एका माणसाचे अन २४ तासाचे काम नाही. माझा स्वभाव थोडासा निगेटिव्ह आहे. अनुभवाने आलेला कडवटपणा म्हणू शकशील पण एखादा माणूस निस्वार्थीपणे दुसर्‍यासाठी काही करु शकेल हि आशाच लोप पावलीय लोकांची तस्मात आपल्या हेतूविषयी शंकाच जास्त उत्पन्न होतील. वरती उल्लेखलेल्या सर्व प्रोजेक्ट मध्ये तुला आवश्यक तसे मनुष्यबळ मिळणे म्हण्जे आयआयटीयन मिळण्यापेक्षा अवघड आहे. जेवढे कमी शिक्षण तेवढे ध्येयाविषयी प्रश्न जास्त हे लक्षात ठेवून अशा लोकांना / ह्या सर्वांना उत्तर म्हणजे आपले आपण प्रामाणिकपणे काम करत राहणे. त्यातूनच काही चांगले होऊ शकते असा माझा पूर्ण विश्वास आहे. कुणी याला खोडा घालणे/उत्साहावर पाणी टाकणे वगैरे वगैरे म्हणू शकतील पण मी तुझी आत्महत्येच्या धाग्यापासून वाटचाल बघितलेली आहे. ती सर्व जितकी प्रामाणिक आहे तेवढीच माझ्या एखाद्या मित्राचे काही वाईट होऊ नये हि माझी इच्छा प्रामाणिक आहे. धन्यवाद.

In reply to by अभ्या..

अप्पा जोगळेकर Mon, 09/26/2016 - 12:34
एकाच वेळी ब्लास्ट टाईप ढिगभर आयडीयाज फोडण्याएवजी एकेक गोष्टीवर व्यवस्थित काम करुन ते सयोग्य हाती सूपूर्त करावे. यु सेड इट. एखादा माणूस निस्वार्थीपणे दुसर्‍यासाठी काही करु शकेल हि आशाच लोप पावलीय लोकांची तस्मात आपल्या हेतूविषयी शंकाच जास्त उत्पन्न होतील निस्वार्थीपणे करणे तत्वतः अमान्य आहे. प्रॉफीट शिवाय धंदा होऊ शकत नाही.आणि नफा मिळवण्यात काही गैर नाही. 'आमटे स्टाईल' सेवाभाव हे सार्वकालिक मॉडेल होऊ शकत नाही. माझ्या मते डांगे बिझनेस व्हेंचरबद्दल बोलत आहेत. निदान माझा तरी तसा समज आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

अभ्या.. Mon, 09/26/2016 - 12:43
अर्थात आप्पासाहेब, समाजहितासोबत काही आर्थिक फायदा असेल तर त्याचे योग्य नियोजन करावे. ह्या गोष्टींची कागदोपत्री नोंद ठेवावी. हे लिहिलंच आहे.

In reply to by अभ्या..

पोप Fri, 09/30/2016 - 12:55
पण मी तुझी आत्महत्येच्या धाग्यापासून वाटचाल बघितलेली आहे.>>> हे वाचल्यानंतर मी डांगेंचे सगळे धागे वाचले आणि लक्षात आले नाही की ज्या माणसाकडे एवढे वर लिहलेले सगळे उपाय असताना हा माणुसाने धागा का काढला?कशासाठी तो आत्महत्येस प्रवृत्त झाला असेल? ते डांगे खरे की ज्याने फक्त हाताने स्पर्श केला तरी त्याच्याकडील सकारात्मकता इतर १० माणसांकडे रुपांतरीत/ संक्रमीत होईल ते डांगे खरे एवढी त्यांनी प्रगती केलेली आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा. तुम्ही इथेच एक मदत धागा काढावा आणि त्यामध्ये प्रत्येक संस्थेचा संपर्क पत्ता द्यावा. ज्याला लाभ घ्यायचा आहे तो मिपाकर, त्याच बरोबर वामा , अमिपाकर लाभ घेईल.

In reply to by पोप

मारवा Fri, 09/30/2016 - 19:28
जीवनातल्या एखाद्या कठीण प्रसंगी मनाच्या एखाद्या कमकुवत क्षणी एखाद्या माणसाला आत्महत्येचा विचार मनात आला त्यात एवढ आश्चर्य वाटण्यासारख काय आहे मला समजत नाही. प्रत्येक जण कधी ना कधी ( अपवाद असतीलही) जीवनात निराश होतो, एखादी टोकाची सिच्युएशन आयुष्य निर्माण करतं. तेव्हा माणुस मनाने कोसळतो तात्पुरता. परत काही काळ जातो परत तो सावरतो सुद्धा. आय मीन हे सर्व नॉर्मल आहे, होत असत. कोसळण सावरण उसळण हे माणसाच्या बाबतीत स्वाभाविकच नाही का ? तर तेव्हाचे विचार आणि फेज वेगळा असतो. म्हणुन त्या अगोदर व त्या फेज नंतर त्या माणसाने केलेल कार्य व त्याच मुल्य जराही कमी होत नाही. वा वाढतही नाही. ती एक फेज म्हणुन पाहावी व सारख सारख त्या माणसाला त्या फेजच्याच पार्श्वभुमी समोर बघणे टाळायला हवे. प्रत्येक नव्या क्षणी माणुस नवा असतो मुख्य म्हणजे अंतर्बाह्य माणुस बदलत असतो. बदलत्या माणसाला जुन्या फिक्स्ड इमेज मध्ये बघण सोयीच असल तरी टाळायला हव. किमान इथे सारखा सारखा त्याचा उल्लेख कोणाला कीती एम्बरॅसींग असु शकतो हे तरी लक्षात घ्यायला हव. हेमिंग्वे तर ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी सारखी तुफान फायटींग स्पीरीटची कादंबरी लिहीणारा होता त्याने आत्महत्या केली. मला हा प्रतिसाद अजिबात लिहायचा नव्हता मला सारख सारख जे डांगे यांना एम्बरॅसींग वाटेल असे प्रतिसाद येत आहेत ते थांबावेत असे वाटले म्हणुन बोललो. छोड दो यारो पुरानी बाते........ बाकी जनता जनार्दन प्रगल्भ आहेच.

In reply to by अप्पा जोगळेकर

मुक्त Mon, 09/26/2016 - 15:45
Appashi lai veLa sahamat. हे सगळे vachalyavar hech manat आले होते. 1-1 कल्पना yashaswipane ammalbajavni kara. ithe lihinyat kahi artha nahi. Kadhi kahi madat lagli tar man mokale panane sanga.

In reply to by संदीप डांगे

मुद्दे खुपच छान! ह्या विषयी क्ळक्ळ पण आहे. अन काही करायची ईच्छा देखील. सोसायट्यंशी भेटुन शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष भेटुन भाजी पिकवणे ह्यावरही अदमास घेउन बघीतला होता, फक्त मार्गदर्शन नसल्याने अन तो पार्ट टाईम असल्याने यशस्वी झालं नव्हत.

In reply to by संदीप डांगे

सूड Mon, 09/26/2016 - 16:42
महाराष्ट्रातल्या सुमारे साडेतीनशे तालुक्यांमधे १० जणांची एक टीम अशा प्रकारे सुमारे साडेतीनशे टीम्स संपूर्ण शैक्षणिक मार्गदर्शनासाठी हव्या आहेत. टिमला कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, मार्गदर्शन मोफत पुरवले जाईल. टीमकडे स्वतःचा बेसिक लॅप्टॉप, मोबाईल इन्टरनेट कनेक्षन हवे. .
माहीती मिळवायला आवडेल.
पण एखादा माणूस निस्वार्थीपणे दुसर्‍यासाठी काही करु शकेल हि आशाच लोप पावलीय लोकांची तस्मात आपल्या हेतूविषयी शंकाच जास्त उत्पन्न होतील
सेम हियर, एखादी व्यक्ती आपल्यासाठी एखादी गोष्ट करतेय म्हणताना; ते ती व्यक्ती का करतेय हा प्रश्न आधी पडतो.

In reply to by संदीप डांगे

विशुमित Tue, 09/27/2016 - 17:24

मुद्दा क्रमांक 9 साठी मी उत्सुक आहे.

मी एका खासगी कंपनी मध्ये काम करतो. काम फायनाशियल अन्यालीस्ट स्वरूपाचं आहे.
माझी स्वतःची काही एकर शेती आहे. नोकरी करताना जाणवलं आपल्या टीमच्या आर्थिक विश्लेषण वर विश्वास ठेवून कंपनी करोडो रुपयांचे निर्णय घेते, तेच विश्लेषण जर आपण आपल्या शेतीत वापरलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा "Decision Making" मध्ये मदत होईल म्हणून-
1) मी 4-5 पिकांचे "डिमांड सप्लाय, सेल्लिंग प्राईस ट्रेंड अनालयसिस" केले आहे. (काकडी, टोमॅटो, वांगी, गवार आणि ढोबळी)
2) वेगवेगळे रेशोज काढले.
3) शेती विषयक बिसनेस केसेस तयार केली
4) कॉस्ट एफ्फेक्टिव्ह ऊस शेतीचा पण अभ्यास केला आहे.

मी हे करत असताना प्रकर्षाने जाणवलं की शेतकऱ्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न त्याचे "वर्किंग कॅपिटल" हे होय. शेतकऱ्याला फंड मॅनॅजमेन्ट अजून सुद्दा नीट करता येत नाही म्हणून तो एका वर्षी तुपात असतो आणि पुढील 3-4 वर्षे जात्यात.
शेतकऱ्यांना फंड मॅनॅजमेन्ट चे सल्ले सोप्या पद्धतीने देण्याचा मानस आहे.

In reply to by विशुमित

हे असे डेली लागणार्‍या भाज्यांचे मॉडेल केले तर फायदा होऊ शकेल का? आजकाल मोठ्मोठ्या शहरांमध्ये चांगली भाजी मिळत नाही. जर शेतकरी लोकांनी मोठा गट स्थापन करुन डायरेक्ट सोसायटींशी किंवा हॉटेल्सशी व्यावसायीक भागिदरीत काम केले तर रेग्युलर इन्कम सुरु होऊ शकते.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

विशुमित Wed, 09/28/2016 - 11:32

<<<<जर शेतकरी लोकांनी मोठा गट स्थापन करुन डायरेक्ट सोसायटींशी किंवा हॉटेल्सशी व्यावसायीक भागिदरीत काम केले तर रेग्युलर इन्कम सुरु होऊ शकते.>>>>>

हा फॉर्मुला सहसा यशस्वी होताना नाही दिसत. कारण जे पुढाकार घेतात ते कालांतराने शेतकरी न राहता व्यापारी बनतात आणि आपली वेगळी चूल मांडतात.

मी जेवढा अनुभव शेतीमध्ये घेतला, माझ्या निदर्शनात आले की शेतकरी हा उत्पादकांचे काम व्यवस्थित करू शकतो पण विपणन म्हंटलं की नाक मुरडतो (त्याला कारणे ही तशी आहेत). शेतकऱ्याला 2-3 टन टोमॅटो ज्यादा काढायला सांगा तो काहीही खटपट करून काढू शकतो पण तोच माल विपणन करायचा म्हंटलं तर त्याच्या अंगावर काटा येतो.

In reply to by संदीप डांगे

मारवा Tue, 09/27/2016 - 20:05
संदीपजी आपण स्वतः प्रगल्भ आहातच हा सल्ला नसुन एक मित्राच्या नात्याने अगदी साधी सुचवणी आहे पटल्यास घ्यावी वा टाकुन द्यावी. आपण खरच एक एक फोकस करुन कार्य हाती घ्यावे. काय आहे की अगदी १०० पैकी एकच एक जरी फोकस करुन आणि त्याच्या लॉजिकल डेस्टीनेशन पर्यंत पोहोचवले. तर त्याचा अंतिम घटकालाही फायदा होतो व तुम्हालाही समाधान मिळते. शिवाय त्यातुन नेमक्या कुठे चुका होत आहेत त्या सुधारता कशा येतील आपण जो विचार करत आहोत तो प्रत्यक्षात किती रुजतो आहे. म्हणजे आपल्या आयडीयाज कठोर वास्तवाच्या मार्‍यात किती तग धरताहेत याचा विचार आढावा म्हणा घेऊन परत परत प्रयत्न करणे म्हणजे फोकस आणि पर्सिसंटन्स ने आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणणे महत्वाचे आहे असे वाटते. आपल्या मनातल्या ५० पैकी अगदी १ च आयडीया जरी सक्सेस झाली तरी त्यातुन मीळणारा आनंद मोठा आहे. कृपया सल्ला समजु नये सहज बोललो तुमच्या विचारांच फार मनापासुन कौतुक वाटल म्हणुन बोललो. कृपया आदरवाइज घेऊ नये. पण वरील जो प्रकल्प ज्यात ते तरुण सोडुन गेलेले आहेत तोच फोकस करावा व तसे का झाले असावे याचा अ‍ॅनालिसीस करण्यासच भर द्यावा. वन अ‍ॅट अ टाइम मगच पुढे सरकला तर बरे होइल असे मला आपले एक मनापासुन सांगावेसे वाटत होते कालपासुन पण आता सांगुन मोकळा झालो. लोभ असावा मारवा

In reply to by संदीप डांगे

सर्व योजनांत खूप पोटेंशियल आहे यात वाद नाही. इतरांनी अगोदरच म्हटल्याप्रमाणे... प्रत्येक योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प व नियोजन जरूर आहे. पुरेसे आणि योग्य मनुष्यबळ असेल तेवढाच/तेवढेच एक किंवा जास्त प्रकल्प हातात घेऊन सुरुवात करणे योग्य ठरेल.

एस Mon, 09/26/2016 - 10:07
खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता, तेरी रजा क्या है? - आणि अजून एक - ज्याची स्पर्धा स्वतःशीच आहे, त्याला हरवणारा कोण आहे?

साहना Mon, 09/26/2016 - 10:55
शैक्षणिक क्षेत्रांत स्वातंत्र्याची लढाई करणे सर्वच दृष्टिकोनातून भारतीय समाजासाठी साठी आवश्यक आहे. सरकारी निर्बंधा खाली असलेल्या शिक्षणाला भविष्य नाही. ते गेल्यांत जमा आहे. किमान खाजगी क्षेत्राला वाट्टेल त्या प्रकारच्या शाळा (स्वखर्चाने) उघडून,वाट्टेल ती प्रवेश प्रक्रिया वापरून आणि वाट्टेल ती फी आकारून आपल्या शाळा कॉलेजे उघडण्यास परवानगी दिली पाहिजे. मुरली मनोहर जोशींनी ह्या क्षेत्रांत फार चांगली पाऊले उचलली होती. त्यांच्या मुले आज किमान अमिटी सारखी युनिव्हर्सिटी अस्तित्वांत आहे. १००% शेक्षणिक स्वातंत्र्य, सरकारी गुलामगिरी शैक्षणिक क्षेत्रांतून हद्दपार. आमचे नशीब बरे आहे म्हणून अजून पर्यंत खाजगी क्षेत्रांत आरक्षण नाही. काँग्रेस सरकार हे आणण्याच्या प्रयत्नांत होते. खाजगी क्षेत्र जास्त विकसित आणि मोठे व्हावं आणि सार्वजनिक/सरकारी क्षेत्र जास्तीत जास्त कमी व्हावे ह्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत.

In reply to by साहना

हेमन्त वाघे Mon, 09/26/2016 - 11:24
सरकारी निर्बंधा खाली असलेल्या शिक्षणाला भविष्य नाही ?? हे कोठल्या आधारावर आपण विधान केलेत ?> कोणत्या खाजगी संस्था IIT आणि IIM पेक्षा चांगल्या आहेत ISB हि अजूनही IIM च्या खाली आहे - आणि अजूनही IIT ला खाजगी पर्याय आला नाही मुंबईत सर्व उत्कृष्ट मेडिकल आनंदी दांत विद्यालये सरकारी आहेत मुंबई महाविद्यालयाच्या खाली येणारी UDCT VJTI आणि SPCE हि कॉलेजेस आजही टॉप लाच आहेत. तसेच अनेक सरकारी निर्मान्ध असूनही मुंबईतील जमनालाल बजाज आपला दर्जा राखून आहे . पुण्यात COEP चा दर्जा घसरला का ? सर्व NIT बरबाद झाल्या का? तर यांचे भविष्य आपणाला कसे दिसले ?? आपण शिक्षणावर काहीबाही लिहीत असल्याने आपल्या या विषयात बरच कळत असावे असे वाटते .............

In reply to by साहना

हेमन्त वाघे Wed, 09/28/2016 - 14:44
खरेच आपण काय शिकला आहेत हे मला जाणून घेण्यास आवडेल आपणास भारतातील आणि खासकरून महाराष्ट्रातील इंजिनीरिंग शिक्षणाबद्दल काही माहिती नसावी असे वाटते COEP ला मी ठरवून चालणार नाही , तर माझ्या मुलीने engineer व्हायचे ठरवावे लागेल ( मला काहीही इच्छा नाही ) आणि तिला बरेच मार्क मिळवावे लागतील पुणे जी खाजगी इंजिनीरिंग कॉलेग ची पांढरी आहे तिथेसुद्धा सरकारचे COEP क्रमांक 1 चे कॉलेज आहे ( दर्जा खाली आला असेल तर कृपया तसे सांगावे) असो आणि बाकीच्या प्रश्नाचे उत्तर कोठे आहे ? IIT पेक्षा कोणती खाजगी इंजिनीरिंग कॉलेजेस चांगली आहेत ? ( आपणास IIT माहित आहे का ?) IIM पेक्षा कोणती खाजगी व्यवस्थापन कॉलेजेस चांगली आहेत ? ( आपणास IIM माहित आहे का ?) तसेच मुंबईत सर्वोत्कृष्ठ कला शाखेसाठी कॉलेजेस आहेत - सेंट झेविअर्स , रुईया , रुपारेल वाणिज्य शाखेसाठी - पोतदार , नरसी मंजी आणि सिडनहॅम हि विद्यालये सुद्धा संस्थेची असली तरी खाजगी नाहीत - ती सरकारचे सर्व नियम पळून सरकारी मदतीवर चालतात कायद्यासाठी मुंबईत सर्वात उत्कृष्ट आहे GLC गव्हर्नमेंट LAW कॉलेज वैयद्यकीय शाखेसाठी सर्वोत्कृष्ट 5 कॉलेज हि सरकारी आहेत . कला शाखेसाठी आणि स्थापत्य ( आर्किटेक्टर ) - सर जे जे - सरकारी तर साहना ताई मला मुंबईतील आणि काही बाबतीत भारतातील सर्वोत्कृठ खाजगी कॉलेज सांगाल का? कि आपणास काहीही माहित नसून आपण हवेत तिर मारता ? तसेच मुंबई हे भारतातील सर्वात विचित्र शहर असून बाकी सर्व भारतात खाजगी कॉलेज ने सरकारी कॉलेज ला तोडले का? दिल्लीत सेंट स्टिफन्स , लेडी श्रीराम आणि JNU खाजगी आहेत का ? हो आणि आज माझी मुलगी अभ्यासात हुशार निघाली असती तर मी वरीलपैकी कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाली असती तर मी आनंदाने रडलो असतो - कारण माझ्या अतिशय कमी माहितीत तरी हि उत्कृष्ट कॉलेज आहेत . पण सध्या ती चॊथीत असून तिचा प्लॅन आर्टिस्ट , अॅनिमेटर आणि रॅप स्टार बनणे असा खतरनाक आहे . मला ती फॅशन किंवा डिझाईन मध्ये गेली तर आवडेल - आणि भारतात शिकायचे तर आजच्या परिस्थितीत सर्वात उत्कृष्ट कॉलेज आहेत -फॅशन साठी NIFT आणि डिझाईन साठी NID किंवा IDC -IIT - हि सुद्धा सरकारी आहेत !!! आपल्या पूर्ण उत्तराच्या प्रतीक्षेत

In reply to by हेमन्त वाघे

हेमन्त वाघे Fri, 09/30/2016 - 07:55
साहना ताई गप्पा का ?? साहना ताई गप्पा का ?? दिल्लीत हि सर्व चांगली कॉलेज सरकारच दिसतायत मग हि तुम्ही सांगता ती खाजगी कॉलेज कोणती ??

In reply to by साहना

sagarpdy Wed, 09/28/2016 - 10:58
तुमचा एखादी शाळा उघडायचा प्लॅन होता का ? (ह घ्या) आरक्षण खाजगी शिक्षण संस्थांना लागू असते कि नाही ? असल्यास ते बंद व्हावे असे तुमचे म्हणणे आहे का ?

In reply to by साहना

हेमन्त वाघे Sat, 10/01/2016 - 13:55
आपण रोज हजेरी तर लावत आहेत , मग या धाग्यावरच गप्प का? आपल्याला भारतातील सर्व प्रकारच्या सरकारे कॉलेज पेक्षा उत्कृष्ट कॉलेज मिळाली का? आपण तर शिक्षण तज्ज्ञ आहेत ना?

डांगेबुआ, विचार आवडले, पोचले म्हणत नाही सद्ध्या, आम्हाला इतके उत्तुंग विचार प्रोसेस करायला वेळ लागतो, बाकी आज इथे तुम्ही आमचे मित्र असल्याचा फार अभिमान वाटतो हे जाहीर करतो मी :). बाकी आयडियाज वाचून मी पण अप्पा अन अभ्यासोबत सहमत आहे. :)

अजया Mon, 09/26/2016 - 21:03
डांगेभाऊ, इतके दिवस तुमचे प्रतिसाद वाचून माणूस एवढं लिहु कसा शकतो म्हणून थक्क होते! आज तुमचा वरचा प्रतिसाद वाचून लोक कसे आणि किती विचार करु शकतात बघून थक्क झाले आहे. _/\_

In reply to by श्रीगुरुजी

साहना Tue, 09/27/2016 - 12:24
जगत आहेत असे म्हणणे खरे तर अंडरएस्टिमेशन ठरेल. काही जातीच्या लोकांनी गरीब असून सुद्धा स्वबळावर प्रचंड प्रगती केलेली आहे.

आरक्षणाशिवाय कसे जगावे? सबलांनी दुर्बलांचे किमान जगता येईल असे सक्षमीकरण करावे. त्यासाठी मानवतावादी सहृदय समाज निर्माण होणे गरजेचे आहे. समानता म्हणजे न्याय व असमानता म्हणजे अन्याय या भ्रमातून बाहेर पडणे गरजेचे आहे. अधिक भाष्य राजीव साने यांच्या मुलाखतीत आहे

मारवा Tue, 09/27/2016 - 18:47
सर्वांनी आवर्जुन ऐकावी अशी आहे सानेगुरुजी झिंदाबाद! हे गुरुजी फार भारी आहेत फार च भारी सीरीयसली ही मुलाखत फारच सुपर्ब दोन भागात आहे. आणि एक आठवल आय पी एच ही ठाण्याची संस्था आपले आनंद नाडकर्णी यांची यांचा दरवर्षी एक करीयर गायडन्स चा फेस्टीवल असतो. अत्यंत सुंदर मार्गदर्शन असते. एकवेळ अवश्य माहीती घ्यावी अतिशय चांगला दर्जेदार उपक्रम आहे.

मारवा Tue, 09/27/2016 - 19:51
http://www.healthymind.org/2015-vedh.html This is a flagship event of IPH running successfully for more than two decades. VEDH is a career perspective conference which IPH started organizing way back in 1991. VEDH Thane will have its 23rd edition in December 2014. IPH with respective partners now organizes VEDH at Ahmednagar (8yrs.), Pune (3 yrs), Latur (3 yrs), Aurangabad (7yrs) and Nashik (3 yrs), Nagpur (2 yrs). This year the VEDH season will open with 50th Golden VEDH AT Pune on 19th and 20th September 2014. Every year Thane VEDH that spans over 16 hours and an entire week end attracts over 3500 students, teachers and parents. VEDH is documented in crisp DVD format by the AVAHAN team of IPH. याचे २०१६-१७ चे कॅलेंडर हा कार्यक्रम कुठे कुठे आयोजित होणार आहे ते दिलेल आहे. अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. ओळखीतल्या ज्यांनी याचा फायदा घेतलेला आहे त्यावरुन हा एक चांगला अटेंड करण्यालायक कार्यक्रम नक्कीच आहे.

संदीप डांगे Tue, 09/27/2016 - 21:03
धन्यवाद मित्रांनो, वरच्या दहा संकल्पनांपैकी माझ्या स्वतःच्या ओरिजिनल कन्सेप्ट्स ह्या एक-दोनच (शैक्षणिक मार्गदर्शन व शेती कॉलसेन्टर) आहेत. त्यात कोअर कन्सेप्चुअलायजेशन, ए टू झेड प्लानिंग, कोअर टेक्नॉलॉजी ब्रेकथ्रू ह्या माझ्या स्वतःच्या आहेत. त्या अर्थातच मी स्वतः जमेल तशा व तितक्या लवकर लॉन्च करणार आहे. त्याबद्दल ग्राउंड प्लानिंग व कोअर टिममेंबर शोधणे सुरु आहे. बाकी सर्व संकल्पना ह्या एकतर कोणीतरी आधीच करत असलेले व्यवसाय "लार्ज फॉरमॅट वर कसे दिसतील" ह्याचे विजुलायजेशन आहे किंवा सहज करता येतील अशा आहेत ज्यात फार काही 'अन्कन्वेन्शल, आउट ऑफ बॉक्स' नाही. वर नाखु यांनी म्हटल्याप्रमाणे 'सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करिल तयाचे' ह्याप्रमाणे ह्या संकल्पना आज उपलब्ध आहेतच फक्त त्या झटून, जीव ओतून देऊन करणार्‍यांची गरज आहे. इथे मांडण्याचे कारण ही बीजं आहेत, कुणीही ह्या बीयांना उचलून घेऊन जावे त्याचे वटवृक्ष करावे. त्याचा माझ्याच महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना फायदा होईल. तो फायदा व्हावा हाच एकमेव उद्देश आहे माझा. दुर्दैवाने माझे शंभर क्लोन बनू शकत नसल्याने माझ्यासारख्या विचारांच्या लोकांनी ह्यात सहभागी व्हावे, सर्वोदय करावा हीच इच्छा आहे. आज आपण बघितले तर ९० टक्के तरूणवर्ग झापडबंद अवस्थेत आहे. त्याला आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या संधी दिसत नाहीत, किंवा एका अजब स्वप्नवादामुळे त्या करायची इच्छा नसते. तसेच कोणी असंच करुन यशस्वी झाला की त्याचे 'फक्त यश' बघून कॉपी मारायला जातात आणि अपयश येऊन अशा वेगळ्या वाटांची बदनामी होते. मागे एकदा खरडफळ्यावर मी लिहिले होते, अनेक नवनविन कल्पनांचे व्यवसायात रुपांतर कसे करता येईल ह्यावर विचार करण्याचा मला छंद आहे. त्या व्यवसायांचे थेरॉटिकल स्वरुप, त्याला लागणारे भांडवल, मनुष्यबळ, सरकारी परवानग्या, मार्केट रिसर्च, ग्राहकवर्ग, स्पर्धा, भविष्यातली वाटचाल, स्वॉट अ‍ॅनालिसिस, तशीच मदत लागली तर भांडवल व मार्गदर्शन पुरवणार्‍या संस्था ह्यांच्यावर इत्थंभूत विचार व अभ्यास करुन त्याचा एक अहवाल बनवून ठेवणे ह्याचा किडा गेले अनेक वर्ष आहे. आतापर्यंत सुमारे चारशे व्यवसायांचे असे संकलन करुन ठेवले आहे. ह्याचसंबंधी काम करण्यासाठी एक बिजनेस कन्सल्टन्सी फर्मही स्थापन केली आहे, माझी इतरही व्यवधानं असल्याने त्याचे काम म्हणावे तसे सुरू झालेले नाही. अनेकांकडे पैसा असतो, काम करायची तयारी असते पण चांगली कल्पना किंवा अभ्यास नसतो किंवा नक्की काय करायचे ह्याची काहीच माहिती उपलब्ध नसते. अशावेळी मी मदत करु शकतो हे मला लक्षात आले. कारण मी प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा बिजनेस प्लानिंग, स्ट्रॅटेजीकल थिंकिंग, इत्यादी बैठे डोके चालवण्याचे काम हे चांगलं करु शकतो हे मागच्या तीन-चार वर्षाच्या अनुभवातून शिकलो. आपल्या सर्वांसाठी एक बोधकथा: (माहित असेलच) वादळामुळे समुद्रातून हजारो स्टारफिश किनार्‍यावर पडलेले असतात, एक माणूस एक एक उचलून परत समुद्रात फेक्त असतो. त्याला दुसरा बोलतो तु एकटा एवढे सारे जीव वाचवू शकणार नाहीस. तू असा काय मोठा फरक पाडणार आहेस?, त्यावर तो एक स्टारफिश उचलून परत समुद्रात फेकतो आणि म्हणतो "माहित नाही पण ह्याच्या जीवनात मोठा फरक पडला आहे." मला तुम्ही सगळे किमान एक स्टारफिशच्या आयुष्यात बदल घडवणारे व्हावे असे वाटते. तेवढ्यासाठी ह्या संस्थळावर टाकले आहे, अनेक प्रयत्नांमधला हाही एक प्रयत्न आहे. वाया जाईल की नाही ते आपल्या सर्वांवर आहे. अनेक चांगले प्रतिसाद येत आहेत, प्रत्येकाला व्यक्तिशः धन्यवाद देता येणे शक्य नाही. पण खरंच आभार्स यारो! धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. Wed, 09/28/2016 - 00:53
संदीप तुझी काहीतरी चांगले करुन दाखवायची कळकळ बघून खरेच समाधान वाटते. ह्यातली एक आयडीया शेतीचे कॉलसेंटर(हेल्पलाईन) हे तुझे स्वतःचे स्वप्न आहे म्हणतोयस तर आपण ह्यावर इथे चर्चा करण्यास काही हरकत नसावी. ह्यामध्ये काही ट्रेड सिक्रेट नसल्याने आणि तू स्वत: ह्या कल्पनेवर काम केले अस्ल्याने माझ्या काही शंकांविषयी आपण बोलणे गैर नसावे. हेल्पलाईन म्हणताच डोळ्यासमोर मोबाईल कंपन्यांची वगैरे कॉलसेंटर्स येतात. त्यांच्याकडे ग्राहकांना पुरवण्याची माहीती, फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स अशांचा अभ्यास करुन घेतलेले मनुष्यबळ उपलब्ध असते. किंबहुना ती माहीती फारच थोडी असते. फक्त ती योग्य नंबरला/योग्य अडचणीचे/योग्य निवारण कसे होईल ह्याचे मार्गदर्शन अशा प्रकारे असते. तुला काय वाटते, महाराश्ट्रातील शेतीसाठी असा डाटाबेस तयार आहे? शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यास समर्थ असे ज्ञान सांभाळणारी नॉलेज बँक आहे? त्यांची भाषा समजून घेणारे आणि त्वरीत त्याचे निराकरण करु शकणारे मनुष्यबळ होऊ शकेल उपलब्ध? निराकरण जरी झाले तरी आगामी मार्गदर्शनासाठी जी अनुभवी आणि द्र्ष्टी नजर असलेले अस्सल शेतीतले डोके लागते ते ह्या तंत्राला सरावेल? फक्त फोनवरुन संपर्क एवढ्याच भरोश्यावर कुठ्ल्या स्वरुपाची माहिती आपण प्रसारीत करु शकू? ह्या सर्वामध्ये आर्थिक बाजू काय असेल? ते बिझनेस मॉडेल यशस्वी झालेले आहे का? सरकारी/निमसरकारी/खाजगी अशा हेल्पलाईन्स उपलब्ध असताना त्यांना सद्यकालीन शेतकर्‍यांचा प्रतिसाद कसा आहे? सग्ळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा हेल्पलाईन्स चालवण्यात आपला रोल काय राहील? केवळ मॅनेजमेंट? की संपर्काचे तंत्रद्यान उपलब्ध करुन देणे? शेतकर्‍यांनी अर्थात एंड युझर्सनी विश्वास का ठेवायचा? त्यासाठी आपले क्वालिफिकेशन काय राहील? इतके प्रश्न लगेच उभे राहिले कारण मी स्वत: एक जिवंत हेल्पलाईन पाहिलीय, त्याला भेटलोय. आपल्या दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. शेतिमित्र वि.ग. राउळ. आमच्या येथील वैरागचे ते. मूळ तुमच्या विदर्भ खानदेशातीलच पण नोकरीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात आले आणो इथलेच होउन राहिले. चोवीस तास शेतीचा विचार करणारा माणूस. साध्या निरोपाने पदरमोड करुन बांधावर येणारा माणूस. कुठलाही स्वार्थ न पाहता केवळ शेती आणि निसर्ग ह्यातच रमणारा माणूस. शरद पवारासारखा नेता त्यांची भेट घेतल्याशिवाय कधी गेला नाही असा माणूस. माती परिक्षण असो की कीड नियंत्रण, चर आखणी असो की शेततळ्यातली मत्स्यशेती प्रत्येक गोष्ट ह्या माणसाने केली. नुसती केली नाही तर प्रयोग आणि टिपणासहित केली. सारे ज्ञान भांडार अगदी मोफत शेतकर्‍यांना खुले करुन दिले. अ‍ॅग्रोवन सारखे नियतकालिक तर सोडाच (त्यात त्यांचे कमीतकमी ३०० लेख असतील) लोकल पेपरमध्ये सातत्याने लेख लिहिले. तेल्यासारख्या संकटात प्रचंड प्रयोग केले, नवीन वाटा चोखाळण्याचा उत्साह शेतकर्‍यांना दिला. मोबाईल सर्वत्र झाल्यावर त्यांचा नंबर हीच हेल्पलाईन होती. असे अभ्यासाचे, नैतिकतेचे आणि प्रामाणिकपणचे अधिश्टान अस्ल्यावर शेतकरी हक्कने येतात, विचारतात. हि खरी हेल्पलाईन. आपण अशा प्रकारचे जरी नाही तरी अशा स्वरुपाचे मनुष्यबळ उभे करु शकू का? आपण हेल्प कधी करु शकतो तर त्या परिस्थितीचे आपणास संपूर्ण आकलन हवे, निराकरण करण्यास आवश्यक असे तंत्रज्ञान हवे नसता ज्या मार्गाचे मार्गदर्शन करु त्याचे पूर्ण रेफरन्सेस व आपली तेथे वट हवी. नसता नाशिकला कांद्याचा भाव काय चाललाय हो? दोन दिवसात पाउस उघडेल का हो? जिब्रालिकचा पर्णाम होईना आता काय घेऊ अशा प्रश्नांना उत्तरे देणारे पोपट हे स्वरुप हेल्पलाईनचे होऊ नये हि इच्छा. अजून बरेच प्रश्न आणि शंका माझ्या डोसक्यात असतात पण काय करणार? माझी घरची शेती पाहणारे लोक आता मला तिकडे फिरकू देत नाहीत. मी आधी करुनही पाहिले. वो मेरे बसकी बात नही म्हणून थांबलो, बस्स.

In reply to by अभ्या..

संदीप डांगे Wed, 09/28/2016 - 10:34
अभ्या.. प्रश्नांसाठी धन्यवाद मित्रा! तुझे प्रश्न अचूक आणि टू द पॉइन्ट आहेत. पण हेल्पलाईनची कल्पना वेगळी आहे. तू जसं समजत आहेस तसं ते नाही. म्हटलं तर 'ट्रेडसिक्रेट'ही आहे, पण सर्वांसाठीची विन विन सिचुएशनही आहे. त्यामुळे आत्ता जास्त सांगता करता येणार नाही. काही बाबतीत नुसत्या अचाट कल्पना मिळाल्या तरी कोणाला काही करता येत नसतं, कारण मूळ गाभा काय हे प्रत्येकाला लक्षात येईल हे शक्य नसतं. राऊळांसारखे विद्वान एका रात्रीत जन्माला येत नाहीत, आले तरी आपल्या लोकांना त्यांची 'फुकट' असल्याने किंमत नसते, शेतीवर बोलण्यासारखे, करण्यासारखे बरेच आहे. फोनवर चर्चा करु..

In reply to by संदीप डांगे

ट्रेड मार्क Wed, 09/28/2016 - 00:53
आमचा __/\__ स्वीकार करावा. खरंच छान कल्पना आहेत.
आज आपण बघितले तर ९० टक्के तरूणवर्ग झापडबंद अवस्थेत आहे. त्याला आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या संधी दिसत नाहीत, किंवा एका अजब स्वप्नवादामुळे त्या करायची इच्छा नसते. तसेच कोणी असंच करुन यशस्वी झाला की त्याचे 'फक्त यश' बघून कॉपी मारायला जातात आणि अपयश येऊन अशा वेगळ्या वाटांची बदनामी होते.
याला १००% सहमत.

रुपी Wed, 09/28/2016 - 06:16
चांगला धागा. डांगेसाहेब यांचे प्रतिसाद आवडले. मारवा यांचा प्रतिसादही खूप छान आहे. शाळेत परीक्षा देताना असो की कुठलेही काम करताना असो, माझ्या आईचे एक वाक्य ठरलेले असायचे "कठोर परिश्रमास पर्याय नाही". अभ्यास असो, स्वच्छता करणे असो की कपड्यांना इस्त्री करणे असो, ते असे करावे की त्यात आपल्या प्रयत्नांत काही कमी राहू नये. आरक्षण नसलेले एक कुटुंब पाहण्यात आहे. कष्ट आणि प्रयत्न करुन दिवस कसे पालटता येतात हे त्यांनी सर्वांनीच दाखवून दिले आहे. यांची दोन्ही मुले (एक मुलगा, एक मुलगी) साधारण माझ्याच वयाची. घरची आर्थिक स्थिती फार चांगली नसताना आई आणि आजीने घरगुती खानावळ चालवून हातभार लावला. शाळकरी वयापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलगा हॉटेल्ससाठी टीश्युपेपरच्या घड्या घालणे, प्रिंटींग प्रेसवाल्यांना मिठाईचे बॉक्स बनवून देणे अशी कामे करायला लागला. पुढे जाऊन लहान-मोठे व्यवसाय करत आता स्वतःचे दुकान सुरु केले आहे. मुलगी लहानपणीपासून बोलायला चुणचुणीत! दहावीच्या सुट्टीत टेली-मार्केटींग केल्यानंतर, शिक्षण सांभाळत कॉल-सेंटर असा प्रवास करत करत आता सेल्स स्पेशॅलिस्ट होऊन भारतभर आणि भाताबाहेर कामासाठी जात असते. दोघांनीही तसे पाहिले तर शिक्षण/ डिग्री फार काही घेतले नाहीत. पण स्वतःचा कल, आवड ओळखून, मेहनत करुन फार पुढे गेले आहेत.