Skip to main content

अहंकार कमी कसा करावा?

लेखक नीलमोहर
Published on बुधवार, 27/04/2016
माणूस मोठा की त्याचा अहंकार, असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर असेल माणूस. अनेकदा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही, आपण स्वतःपेक्षा या 'अहं' ला जीवापाड जास्त जपतो. या अहंकाररूपी शत्रूला आपल्या मनातून, जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी आपण त्याचे कोडकौतुक करतो, त्याला डोक्यावर बसवून मिरवतो, खतपाणी घालून वाढवतो, जोपासतो. मात्र त्यानंतर हा अहं आपल्यालाच डोईजड कधी होऊ लागतो कळतही नाही, त्यापायी आपण इतरांशी शत्रुत्व पत्करत राहतोच, अणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचेही शत्रू बनत जातो. आपण स्वतःपुरता विचार केला तरी आपल्याला जाणवेल, आपल्यात अहंकार आहे की नाही.. असेल तर का आहे.. कशाबद्दल आहे.. नसेल तर अतिउत्तम. अशी निर्विकार, नि:स्वार्थी भावावस्था फार थोड्या लोकांना प्राप्त करता येते. सहसा सामान्यात सामान्य माणूस म्हटला तरी त्याच्यात कसला न कसला अहंकार असतो. आपल्यात काही चांगले गुण असतील तर त्याचा थोडाफार अभिमान असणे वाईट नाही, एखाद्याकडे तसेच कर्तृत्व असेल तर तो अहंकार त्याला शोभतोही, मात्र अती अहंकारी व्यक्ति इतर लोकांपासून, समाजापासून वेगळी पडत जाण्याची शक्यता जास्त असते. फक्त उदाहरण म्हणून इथलाच अलीकडील एक अनुभव सांगेन, येथील एका विभागाकडून लेखमालेसाठी लेख लिहीण्याबद्दल विचारणा झाली होती, विषय जिव्हाळ्याचा असल्याने मीही आनंदाने होकार दिला. नंतर त्या विभागातील काही सदस्यांबरोबर माझे किरकोळ मतभेद झाले, अशावेळेस आपल्यातील 'इगो' नामक प्रकार येता जाता दुखावून घ्यायला बसलेलाच असतो त्याप्रमाणे तो दुखावला गेला आणि मी तो लेख लिहू शकणार नाही असे त्यांना कळवून टाकले. इथे माझ्याकडून काही वेगळ्याच व्यक्तिंचा राग तिसर्‍याच गोष्टीवर, गरज नसतांना, संदर्भ नसतांना काढला गेला, फक्त 'अहं' मुळे. यात चूक पूर्णपणे माझी होती, नुकसानही माझेच होणार होते, तसे ते झालेच. अर्थात तो लेख मी काही झाले तरी लिहीणार होते, त्याप्रमाणे तो लिहीला, प्रकाशितही केला, त्याचे समाधान आहेच, मात्र केवळ इगोला महत्व देऊन एक अतिशय उत्तम संधी हातातून घालवली याचे दु:ख त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. (वरील उदाहरण हे फक्त प्रातिनिधीक म्हणून दिले आहे, तो लेखाचा आणि चर्चेचा विषय नाही.) माणसाचे व्यक्तिमत्व म्हणजे फक्त त्याचे वागणे बोलणे दिसणे इतकेच नसून, त्याचे 'असणे' ही महत्वाचे. हे असणे सुधारण्यासाठी, आपल्यातील सर्व दुर्गुण मिटवून सर्वार्थाने निर्विकार होण्यासाठी काय करावे..? हा अहं जो माणसाचा फार मोठा शत्रू आहे, ज्यापायी माणूस इतरांपासून, स्वतःपासूनही दूर जात असतो, स्वतःला हरवून बसतो, तो अहं हळूहळू, थोडाथोडा करत एक दिवस पूर्णपणे मिटवण्यासाठी, 'स्व' खर्‍या अर्थाने गवसण्यासाठी काय करावे ? आपल्याला माहित आहे की आपण या विशाल अवकाशातील मात्र एक अतिसूक्ष्म कण आहोत ज्याच्या असण्या-नसण्याने या चराचर सृष्टीला, अखिल ब्रम्हांडाला काहीएक फरक पडणार नाही, तर मग हा वृथा अहंकार कशासाठी... आपण सर्वज्ञानी नाही हे व्यवस्थित कळत असतांनाही आपण तसे आहोत हे कायम स्वतःला आणि इतरांनाही पटवून देण्याचा अट्टाहास कशासाठी... अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा ?

वाचन संख्या 26661
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

काही विचार.... १. मतभेद होणार असतील तर, वाद न घालता, सॉरी म्हणून मोकळे व्हावे. २. ह्या पृथीतलावर अद्याप एकही अमर माणूस जन्माला आलेला नाही, जे काही आपण इथे उपभोगत आहोत ते इथेच सोडून देणार आहोत.मग अनावश्यक वाद-विवाद कशाला? अर्थात वरील विचार अंमलात आणणे तसे थोडे कठीण आहे, पण अशक्य मात्र अजिबात नाही.हा स्वानुभव आहे. ३. अहंकारावर विजय मिळवायचा अजिबात विचार करू नका.त्यापेक्षा अंहकार मनांत येवूच नये, ह्यासाठी प्रयत्न करा. बर्‍याच वेळा काही कारणांमुळे, आपल्यात असलेल्या काही कौशल्यामुळे आपल्या मनांत गर्वाची भावना निर्माण होते आणि ती तशी असणे हा मनुष्यस्वभावच.त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला उत्तम जमते तशी इतरांना जमत नाही आणि मी म्हणेन तेच खरे, अशी भावना मनांत यायला लागली की, आपल्याला जमत नसलेल्या इतर गोष्टींकडे बघावे.पाय आपोआप जमिनीवर येतात.

In reply to by मुक्त विहारि

सुरुवाती-सुरुवातीलाच असला सामोपचाराचा प्रतिसाद टाकुन पुढे होवु घातलेल्या रणकंदनाला तत्काळ आळे घालण्याचा प्रयत्न केल्याकारणाने बर्‍याच दिवसांनी पण लगेचच मुवि यांचा घनघोर निषेध !......आमी नाय ज्जा ! सही..... "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

In reply to by मुक्त विहारि

अरेच्च्या.. लग्गेचं धुळवड थांबवलित. णीषेध. मुविंकडुन हि अपेक्षा नव्हती. जर्रा दुसर्‍यांचे धागे हजारी होउन द्यायचे नाहित. :/ पुर्वीचं मिपा र्‍हायलं णै राव!

माझ्या मते 'तळमळ' असणे सर्वात महत्वाचे, बदलण्याची, मग पुढचे होत जाते आपल्या गतीने, पद्धतीने… "The time that my journey takes is long and the way of it long It is the most distant course that comes nearest to thyself, and that training is the most intricate which leads to the utter simplicity of a tune." - टागोरांच्या गीतांजली मधून

माझ्या मते अहंकारावर विजय मिळवण्याचा एक अत्यंत जालीम उपाय म्हणजे जन्मालाच येऊ नये. आपण जन्माला येणार, आपल्याला स्वतःची जाणीव होणार, त्यातून अहंकार निर्माण होणार. कुणी सांगितलीय कटकट! त्यापेक्षा जन्माला येऊ नये. सगळे प्राॅब्लेम्स खलास!

In reply to by बोका-ए-आझम

बोकोबा, हे शक्य आहे का? डेबिट, क्रेडिट करत करत दोन्हीकडचा हिशोब शून्य, त्याच्यावर मिळणारं व्याज शून्य, असलेलं कर्ज शून्य, कुठल्या तरी संरक्षण खात्यात पडून असल्यासारखे बिलियन डॉलर्स विसरलेले नसणं इत्यादी इत्यादी सगळ्या उभ्या आडव्या तिरक्या आधीच्या नंतरच्या गुणाकार, भागाकरानंतर शिल्लक शून्य असलं तर च खातं बंद होईल. एक पै देणं अथवा घेणं जरी शिल्लक असेल तरी खातं सुरु राहतं ना!

In reply to by वैभव जाधव

हेच तर सांगायचंय. म्हणून तर म्हटलं ना की जन्मालाच येऊ नये. तेही आपल्या हातात नाहीये. त्यामुळे अहंकार पूर्णपणे नष्ट होणं शक्य नाही. पण त्याची तीव्रता कमी करता येईल. मलाच कळतं हा अहंकार. त्यापेक्षा मला कळतं, इतरांनाही कळतं ही वृत्ती जरी आली तरी पुष्कळ झालं.

मला असले धागे वाचण्यात आजकाल लै मज्जा यायलागलीय. पाडा आता एकेक प्रतिसादाचे आंबे. सिरियसली सांगायचे झाले तर इथले सल्ले वाचून आचरण करायचे ठरवले तर लंगोटी गुंडाळून हिमालयात जावे लागेल.

In reply to by अभ्या..

हाये फक्त लंगोटीही (इथेच) ठेवायला सांगतील आणि तसेच .... हिमालयात जावे लागेल. अता पहिली गोष्ट : असा काही आपल्यात आहे याची जाणीव होणे हे उत्तम लक्षण आणि त्याचा निपटारा करता आला (वेळचे वेळी तर अगदी सोनेपे सुहागा) नेम्कं या दो बाबीत घोड अडत पडतही आणि पुन्हा पुन्हा पेंड खातं !!! निरंकारी नसलेला सा़क्षात्कारी नाखु

नीलमोहर तुम्ही एका छान विषयाला चर्चा उपलब्ध करुन दिली आहे. तुमचा पूर्ण लेख मी वाचला. मांडणी पण छानच केलेली आहे. आता संपूर्ण लेखाचा रोख खालील एका प्रश्नाकडेच आहे: हा अहं जो माणसाचा फार मोठा शत्रू आहे, ज्यापायी माणूस इतरांपासून, स्वतःपासूनही दूर जात असतो, स्वतःला हरवून बसतो, तो अहं हळूहळू, थोडाथोडा करत एक दिवस पूर्णपणे मिटवण्यासाठी, 'स्व' खर्‍या अर्थाने गवसण्यासाठी काय करावे ? याला माझ्या मते तरी उत्तर आपापल्या आवडीनुसार, सवडीनुसार रोज सकाळ संध्याकाळ थोडा तरी वेळ उपासनेसाठी राखून ठेवणे. अवघड आहे वाटचाल. पण अनेक आत्मानुभावी संतांनी या मार्गाची स्तुती केलेली आहे. नुकसान तर काहीच नाही.

In reply to by विजय पुरोहित

रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतांना हेच म्हणत असते, सर्वांना चांगली बुध्दि द्या मात्र सगळ्यात आधी मला द्या. तुम्ही उपासना म्हणताय, तिचा अर्थ मेडिटेशन असे समजून लिहीते. मेडिटेशन हा प्रकारच जमत नाही, काय असेल ते असो, तसे पाहिले तर मेडिटेशन म्हणजे चित्त एकाग्र करून, लक्ष विचलित होऊ न देता श्वासावर लक्ष केंद्रित करून काही काळ शांत, स्वस्थ बसणे एवढी सोपी गोष्ट, पण करायला गेले की फार अवघड होऊन बसते. असे बसले की जगभराचे विचार मनात येत राहतात, मनातील गुंता अजून वाढतो, अर्थात नियमित केले तर मनावर ताबा मिळवणेही तेवढे कठीण नसावे. आर्ट ऑफ लिव्हींगचा कोर्स केलेला असल्यामुळे साधनेने येणारा मनःशांतीचा अनुभव प्रत्यक्ष घेतलाही आहे, तरीही तसा प्रयत्न केला जात नाही हे मात्र आहे.

In reply to by नीलमोहर

असे बसले की जगभराचे विचार मनात येत राहतात, मनातील गुंता अजून वाढतो,
आपल्या मनात दिवसभरात हजारो विचार येऊन जातात पण आपल्याला त्याचा पत्ता नसतो कारण आपण विचारांबरोबर वहात जात असतो. आपल्या मनात येणार्‍या विचारांवर लक्ष ठेवणे ही पहिली पायरी आहे. जेव्हा आपण साधना करायला लागतो तेव्हा मनात येणार्‍या विचारांबरोबर वाहवत न जाता मनात कोणते विचार येत आहेत याकडे लक्ष वेधले जाणे या पहिल्या पायरीवर येतो. खरे म्हणजे ही प्रगती मानायला पाहिजे व ही आनंदाची गोष्ट मानली पाहिजे. पण बरेच जण मन एकाग्र होत नाही म्हणून तक्रार करत बसतात व शेवटी जी काही साधना करत असतात ती सोडून देतात. ज्या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवायचे असेल ती गोष्ट आपल्यापेक्षा वेगळी असली पाहिजे. जर मनात येणार्‍या विचारांवर लक्ष ठेवायचे असेल तर मनाकडे वेगळे होऊन पाहाता यायला पाहिजे. मनाकडे वेगळे होऊन पाहायला शिकणे हेच कोणत्याही साधनेच्या पहिल्या पायरीवरचे उद्दिष्ट असते. थोडक्यात साधना करत असताना आपले साधनेत लक्ष नाहिय्ये, दुसरेच विचार मनात येत आहेत हे लक्षात येणे ही अधोगतीचे नव्हे तर प्रगतीचे लक्षण असल्याचे कळले की, साधनेमधे सातत्य येत जाते व त्याचबरोबर मनात येणार्‍या विचारांची संख्याही हळूहळू कमी व्ह्यायला लागते. या सगळ्याला "विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला" असे म्हटले जाते व हीच सर्व साधनांचे प्रथम उद्दिष्ट्य असते. अहंकार व त्यातून निर्माण निर्माण होणारे काम क्रोध मद मत्सर वगैरे कमी करणे अथवा त्यांवर विजय मिळवणे ही त्यानंतरची पायरी आहे.

अहंकार नष्ट का बुवा करायचा ? माझ्या मते अहं असावाच. तो रक्तदाब किंवा रक्तशर्करेसारखा असतो. कमी झाला तरी व जास्त झाला तरी वाट लागते. त्या दोन्ही गोष्टींसारखा अहंकार हि ताब्यात प्रमाणात असला तरच मनुष्यजन्म ना !!!

In reply to by मितान

यापेक्षा परिपूर्ण उत्तर खरच असु शकत नाही.
अहंकार नष्ट का बुवा करायचा ? माझ्या मते अहं असावाच. तो रक्तदाब किंवा रक्तशर्करेसारखा असतो. कमी झाला तरी व जास्त झाला तरी वाट लागते. त्या दोन्ही गोष्टींसारखा अहंकार हि ताब्यात प्रमाणात असला तरच मनुष्यजन्म ना !!!

पण अहं हा फक्त 'असतो', त्यात कमी जास्त, एवढाच पाहिजे जास्त नको असे ठरवून तो पूर्णपणे कंट्रोल करता येतो का? शिवाय अहंमुळे श्रेष्ठत्वाची भावना वाढीस लागून माणूस एखाद्या बेटासारखा बाकी लोकांपासून, समाजापासून लांब जाऊ लागतो, तेही चांगले नाही ना.

इगोला फार महत्व द्यायचे नाही. विसरायला आणि क्षमा करायला शिकायचे. हे वाचून बघ काही उपयोग होतोय का.

इगो असला पाहिजे पण त्याचा अतिरेक झाला की ' मी' म्हणजे सर्व आणि मी म्हणेल तसं झालंच पाहिजे असं सुरु होतं. आणि दुर्दैवाने अशी अहंकारी व्यक्ति स्वत:ला फार प्रामाणिक समजत असते, कधी तरी अति अहंकाराचा बुडबुडा फुटतोच, बस वेळ यावी लागते. "आपल्याला माहित आहे की आपण या विशाल अवकाशातील मात्र एक अतिसूक्ष्म कण आहोत ज्याच्या असण्या-नसण्याने या चराचर सृष्टीला, अखिल ब्रम्हांडाला काहीएक फरक पडणार नाही, तर मग हा वृथा अहंकार कशासाठी..." आवडलं. ''चराचर सृष्टीला,अखिल ब्रम्हांडाला'' या शब्दाच्या ऐवजी ''मिपाला'' असा शब्द वापरला असा शब्द वापरला असता तर वरील ओळी अजुन थेट भिडल्या असत्या. :) -दिलीप बिरुटे

असो. एकच पिंक टाकतो.. अहंकार काढणे फार कठीण. मला अहंकार नाही याचा पण अहंकार येतो. तस्मात पास. बाकी वाचत आहे.

In reply to by आनन्दा

मला अहंकार नाही याचा पण अहंकार येतो. असेच लिहायला आलो होतो. "मला कसलाच अहंकार नाही हाच एक अहंकार आहे" आणि एक अभिमान आणि अहंकार यात एक सूक्षम रेषा असते आणि ती आपण केंव्हा पार करतो हेच आपल्याला समजत नाही

अहंकारावर विजय कसा मिळवावा ?
स्वतःच्या कि दुसर्‍याच्या ;) ? स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणे हे तुर्तास बाजुला ठेवु ! तो मानसशास्त्राच्या क्षेत्रातील विषय आहे , गावडे सर आले की त्यावर सविस्तर चर्चा करुच !! दुसर्‍याच्या अहंकारावर विजय मिळवण्याकरिता १) चपखल उपमा कायम लक्षात ठेवाव्यात अन चान्स मिळताच सट्टकन माराव्यात - उदाहरणार्थ चॅपेलगुरुजी. २) अहंकारी लोकांच्या शब्दांचा अर्थाचा अनर्थ करणारे फोटो गुगल वर व्यस्थित शोध घेवुन शोधुन काढावेत अन मिपावर डकवावेत उदा. }०{ ३) अहंकारी व्यक्तीला अत्यंत प्रेमळ खरड टाकुन त्याच्या अहंकारावर उपरोधिक पण प्रेमळ टीका करावी. जमल्यास त्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करावा उदा. ... ४) अहंकारी व्यक्तीच्या लेखनातील विरोधाभास सतत वर आणत रहावा , म्हणजे एका धाग्यावर काही बोलल्यास तीच व्यक्ती अन्यत्र काही विरोधाभासी बोलली असल्याचे दाखवुन द्यावे उदा. ५) अजुन एक महत्वाचा उपाय , जो की कदाचित आपणाला ठाऊक आहेच , तो म्हणजे अहंकारी व्यक्तीच्या धाग्याचे अफाट विडंबन करुन मुळ लेखना पेक्षा जास्त प्रतिसाद मिळवावेत ह्या व्यतिरिक्त अजुन बरेच उपाय आहेत पण तुर्तास इतकेच पुरे ... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =))))

In reply to by किसन शिंदे

प्रिय मित्र किसन , स.न.वि.वि. बहुतेक तु सकाळीच व्हॉट्सअ‍ॅप्प वर आलेला फॉरवर्ड मेसेज पाहिला नसावा. किती लोकं कायम विखारी बोलत असतात हे अगदी स्पष्ट होते त्यावरुन ! शिवाय जुने आयडी नवीन आयडी घेवुन आले तरीही लोकं जुने जुन्या आयडींचेच हिशेब चुकते करत आहेत हेच खफवर अन विठाच्या धाग्यावरही दिसत आहे. झाल्या गोष्टी सोडुन देण्यात आणि पुढे चालण्यात आपल्याला कायम आनंदच आहे मात्र आपल्या ह्या विसरण्याला अन पुढे चालण्याला "कसे निरुत्तर केले पहा" असा रंग दिला जात असेल तर काय करायचे ? अशावेळी आम्हाला आमच्या तुकोबांच्या अभंगाची प्रकर्षाने आठवण होते अन सडेतोड प्रतिसाद दिला जातो -
सत्य आम्हा मनीं | नव्हे गबाळाचे धनी | देतो तीक्ष्ण उत्तरे | पुढे व्हावयासी बरें ||
तथापि आपल्या सल्ल्याचा मान राखुन शक्य तितके पुढे चालण्याचा प्रयत्न करत राहीन. कळावे. लोभ असावा . आपला विनम्र प्रगो

या धाग्यावर प्रतिसाद देवू का ? कुणाचा बरे आहे हा धाग ? ...अच्छा नीलमोहर. माझे अलिकडचे दोन-तीन धागे उघडून बघू का ? हं... नीलमोहर माझ्या धाग्यावर फिरकत नाही. जावुन दे मी तरी तिच्या धाग्यावर प्रतिसाद कशाला देवू ? अपनी कुछ इज्जत है यार...

खर म्हणजे ह्या प्रश्नामागे दडलेला प्रश्न असाही असु शकतो कि अहंकार कशामुळे उत्पन्न होतो ? ते जर समजले तर मुळावरच घाव घातला पाहिजे हे अधिक चांगले ! यासाठी इगतपुरी येथील " विपश्यना " केन्द्राशी वा आपल्या भागातील त्यांच्याच अन्य केन्द्राशी सम्पर्क साधावा. दहा दिवसांचे शिबिर अटेंड करा. चिंतन व मनन या सोबत प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी प्राप्त करा. कदाचित एका शिबिरात सर्वच गोष्टींचे आकलन होईल असेही नाही. पुन्हा पुन्हा दोन तीन वेळेस जावे लागेल. पण एकदा एक शिबिर अटेन्ड तर कराच. कदाचित अहंकार , यासोबत क्रोध, काम् ,वासना, लोभ , मोह अशा अन्य विकारांवरही मात करण्याची संधी प्राप्त होईल. अर्थात ज्याप्रमाणे योगाचा क्लास अटेंड करुन , प्रमाणपत्र घेवून, घरी टांगून ठेवले आणि शिकवलेली ' योग साधना " घरी केली नाही, तर त्याचा शरीरावर काही परिणाम होत नाही , त्याचप्रमाणे ' विपश्यना ' म्हणजे काय व ती साधना कशी करावी हे नुसते समजावून घेतले तर लगेच विकारांवर विजय मिळून, मनाला शांती मिळेल असं होणार नाही. घरी सुद्धा साधना करावीच लागेल. महाजालावर सर्व माहिती मिळू शकते.

In reply to by जेपी

त्याऐवजी अहंकार नष्ट/कमी करायचा आहे म्हणा, काही म्हटले तरी ते शब्दांचे खेळ फक्त, त्यामागील भावना महत्वाची..

अ‍ॅज लाँग अ‍ॅज यु आर हॅप्पी, काहि फरक पडत नाहि. अहंकार जर आपल्याच सुख-समाधानाच्या वाटेला यायला लागला कि डोळे मिटुन शांतपणे त्या दु:खाचे कारण शोधावे. आणि मन काय उपाय सांगते तो उपाय आचरावा.

ईगो प्रत्येकालाच असतो. जो असा दावा करतो की त्याने अहंकारावर विजय मिळवलाय तर तो खोटं बोलतोय असे समजावे. आपल्या ईगोने इतरांना त्रास होऊ नये इतकंच सुत्र मानन्यासारखं.आजीबात अहंकार नसलेली माणसं खरच नाही यशस्वी होऊ शकत.

नीलमोहोर, निरपेक्ष सेवा केल्याने अहंकाराचा ऱ्हास होतो. सर्वात चांगली सेवा भगवंतांची आहे. थेट ती करायला जमत नसेल तर घरातल्या वडीलधाऱ्यांना देव मानून त्यांची सेवा करावी. आ.न., -गा.पै.

अहंकार की लडाई ... { सगळ्यांनी विश्वामित्र यांनी ब्रह्मर्षि म्हणावे परंतु वशिष्ठ मात्र त्यांना राजर्षी म्हणत असे माझ्या वाचनात कुठेतरी आले होते. } खालची इष्टोरी जालावरुन... ऋषि वशिष्ठ और विश्वामित्र का बैर भी भागवत कथा का विषय रहा है । वशिष्ठ , विश्वामित्र को ब्रह्मर्षि नहीं मानते थे । क्रोधित होकर विश्वामित्र ने उनके सौ पुत्रों का वध कर दिया फिर भी उनका क्रोध शांत नहीं हुआ । एक बार वे वशिष्ठ को मारने का प्रयत्न करने रात्रि में उनकी कुटिया में पहुँच गए । कुटिया में वशिष्ठ अपनी पत्नी से बात कर रहे थे .." देखों अरुंधती ! आज पूर्णिमा का चाँद ऐसे चमक रहा है जैसे विश्वामित्र का यश । अरुंधती को पुत्रों के हत्यारे की मां के सामने प्रशंसा करना अच्छा नही लगा । अरुंधती ने कहा " फिर आप उन्हें ब्रह्मर्षि क्यूँ नहीं मान लेते हैं , जिससे यह वैर ही समाप्त हो जाए , मेरे सामने उन्हें ब्रह्मर्षि मानते हो , मगर उनके सामने क्यों नहीं " विश्वामित्र यह वार्तालाप छिप कर सुन रहे थे । ऋषि वशिष्ठ ने उत्तर दिया , " विश्वामित्र ज्ञानी व तपस्वी हैं अतः मैं उन्हें ब्रह्मर्षि मानता हूँ परन्तु उनमे अहंकार है , अतः उनके सम्मुख यह स्वीकार नहीं करता । इतना सुनते ही विश्वामित्र ने कुटिया में आकार वशिष्ठ के पैर पकड़ लिए । वशिष्ठ ने कहा " यह क्या कर रहे हो , ब्रह्मर्षि...? नम्रता से विश्वामित्र ने जवाब दिया..." अपना अहंकार गला रहा हूँ "

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बारिश... :- Yaariyan

स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी अहं हा येणारच ना. किती हि प्रयत्न केला तरी सोडणे अशक्य

अहं सोडायच्या पायऱ्या ... १) मिपावरचा आयडी सोडा. २) फेबु , ट्विटर , ब्लॉग, coc यावरचे आयडी सोडा. ३) gmail , yahoo, इत्यादी इत्यादी सगळे मेल आयडी सोडा. ४) मोबाईल सोडा. ५) नोकरी/व्यवसाय सोडा. ६) नातेवाईक, शेजारी, मित्र यांचा संपर्क सोडा. ७) मुलांशी संपर्क सोडा. ८) नवरा/बायकोशी संपर्क सोडा. ९) सगळी सेव्हिंग , बॕंक खाते रिकामे करा , सर्व रक्कम दान करा १०) घर सोडा, कुणाला फुकट द्या किंवा विकून आलेली रक्कम दान करा. ११) गंगेपर्यंत चालत जा एक डुबकी मारा. And you can feel तुमचा अहं सुटला आहे. . . . . आणि हे करण्यासाठी (म्हणजे पैसे कुणाला दान करावेत वगैरे )समस्या सोडवायची असेल तर व्यनि करा १००% मदत केली जाईल. ;-) विशेष सुचना:- हा प्रतिसाद फक्त धागाकर्त्यासाठी नसून सर्वांसाठीच आहे. ;-)

In reply to by उगा काहितरीच

समजा १-११ पर्यंत सर्व पायऱ्या पार केल्या, अगदी गंगेत डुबकीही मारली, अन बाहेर आल्यावर, what the.... !!!! झालं तर.. ??

In reply to by नीलमोहर

नाही होणार. जस्ट ट्राय इट ! आणि झालंच what the... तर मग अपडेटवा इकडे ! संमंला सांगून प्रतिसाद काढून टाकायला सांगतो. हाकानाका. ;-)

एक लांबलचक प्रतिसाद लिहिला होता, पण प्रकाशित करण्यापूर्वी बॅकस्पेस मारून खोडून टाकला. न जाणो कुणाचा अहंकार दुखावला गेला तर काय घ्या? :-)

अरेच्च्या! हा धागा वाचायचा 'मी' कशी बरे विसरले? ;) गंमत बाजूला ठेवता हे सांगावेसे वाटते की अहं बाजूला ठेवणे जमणार नाही. कमी करू शकेन.

अभिमानाचा अहंभाव सुरु झाला की अहंकार वाढीस लागतो. उदा. भीमाची आणि हनुमानाची कथा.

वाचायचा राह्यलाच की हा धागा..! मला स्वतःला अहंकार कमी होण्याचा अनुभव नाही. कदाचित वाढल्याचाच आहे म्हटले तर.. पण जे काही वाचले / ऐकले आहे त्यानुसार - संपूर्ण शरणागतीशिवाय अहंकार पूर्णपणे सुटणे अशक्य आहे. शरणागती कुणाकडे? भगवंताकडे/गुरुकडे. ही संपूर्ण शरणागतीची अवस्था म्हणजे अकर्ता होणे. म्हणजे जे काही कर्म तुमच्याकडून घडतंय त्याचं कर्तापण ज्याच्याकडे शरणागती दिली त्याच्याकडे लागणे. हे काया-वाचा-मने उमजणे म्हणजेच निष्काम अवस्था. ही अवस्था खूप पुढची असून सर्व प्रकारच्या अध्यात्मिक साधनेत ही अवस्था येते. याच्या पुढची अवस्था म्हणजे सहजसमाधी. पण त्याविषयी माझे विशेष वाचन नाही अजून.

असा कमी करावा : १. अ हं का र. २. अहं ... का? ३. अ हं. ४. अ. झाला अहंकार कमी. विचार करून पाहा.

आज बरेच दिवसांनी मिपावर आलो अन नेमका हा धागा वर आला : नीमो ताईनी मागे ह्या धाग्यावर गांभीर्याने उत्तर द्याव असे सुचवले होते म्हणुन प्रतिसाद टंकुन पळतो : " मिपावर आपल्याला ज्या विषयातले कळते त्या विषयातील (आणि कळत नाही त्या विषयांवरीलही) धाग्यांवर प्रतिसाद देण्याचा मोह आवरला की (स्वतःचा) अहंकार कमी व्ह्यायला बर्‍यापैकी मदत होते असे निदर्शनास आले आहे ! आणि विशेषकरुन प्रतिसादावर उपप्रतिसाद देण्याचा मोह आवरला की तुम्ही जिंकलात म्हणुनच समजा !! " ख्यॅ ख्यॅ ख्यॅ टाटा

अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा ?
अहंकार नष्ट कसा करावा...हे ठीक आहे... पण...त्यावर विजय कसा मिळवावा ? कशाला..??? विजय मिळाला कि डोक्यात हवा जाणार..म्हणजे परत अहंभाव आलाच कि..! त्यापेक्षा तो नियंत्रणात कसा आणावा..हे महत्वाचे. आणि शेवटी ज्याला याची जाणीव असते कि त्याच्यात अहंभाव आहे...ती व्यक्ती नक्कीच त्यावर नियंत्रण मिळवू शकते.

In reply to by पाटीलभाऊ

शेवटी ज्याला याची जाणीव असते कि त्याच्यात अहंभाव आहे...ती व्यक्ती नक्कीच त्यावर नियंत्रण मिळवू शकते.
अगदी अगदी त्याची जाणीव असणे हेच तर महत्वाच. तरच पुढचा प्रवास सुरू होण्याची शक्यता. थेट मुद्याच बोलतात बघा.

अहम च्या भावनेवर प्रचलित आध्यात्मिक वा प्रचलित विचारसरणी संदर्भात काही मांडता येणार नाही. मात्र व्यक्तीगत अनुभव व जेव्हा जेव्हा अहमचा विचार करतो तेव्हा खालील बाबी जाणवतात अहम सहसा नातेसंबंधात अधिक जिवंत सक्रीय होतो फुलतो. म्हणजे जर नातेसंबंधापासुन जेव्हा जेव्हा मी दुर गेलोय एकांतात तेव्हा अहम निष्क्रीय झालेला जाणवतो अर्थात सुप्तावस्थेत असेलही पण त्याची हालचाल मंदावलीय असे जरुर जाणवते. म्हणजे कसे की अहम जेव्हा असतो तेव्हा त्याचे एक "ओझे" मनावर असते. कारण आपण एक "भुमिका" घेत असतो एक "अविर्भाव" घेऊन वावरत असतो. जेव्हा आपण एकांतात जातो ( अर्थात हे सर्वांच्या बाबतीत वेगवेगळा अनुभव असेल मी माझ्या मर्यादीत अनुभवात मांडतोय) जेव्हा नातेसंबंध तात्पुरते का होइना ( नातेसंबंध एक विस्तृत पट गृहीत आहे) जेव्हा दुर होतात वा प्रभावहीन होतात. तेव्हा अहम ची भावना मंदावते. हा एक सुखद अनुभव असतो यात मन निर्भार होऊन जाते. यात मन सर्व प्रकारच्या भुमिका अविर्भाव इ. तुन मुक्त झाल्याने हलके होते. असे निर्भार मन फार सुंदर्र असते त्याची संवेदनशीलता कनेक्ट होण्याची विशेषतः निस्रर्गाशी फार वाढते. असे निर्भार मन जेव्हा नव्याने संवाद साधते तो ही अधिक प्रांमाणिक होत जातो. अहम स्वतःचा अहम लक्षात येणे ही देखील मोठी बाब आहे. म्हणजे केवळ तटस्थ निरीक्षणाने सहसा स्वतःचा अहम व त्याचे आवर्त्ने कंपने जाणवतात पण यात एक गंमत आहे. समजा "स्व" ची सात वर्तुळे आहेत. सर्वात बाहेरच्या सातव्या वर्तुळातील "स्व" ला जर आपण तटस्थतेने न्याहाळु लागलो त्याच्या क्रिया प्रतिक्रीयांना "बघु" लागलो तर अहम ची आवर्तने कंपने त्यामागे फरफटत जाणारं मनं हे जाणवु लागतं चुका ही दिसतात त्यातील व्यर्थताही जाणवते. पण होत काय की अहम संपत असा नाहीच. आता काय होतं तो आता केवळ अधिक सुक्ष्म होऊन नविन रुपात आपल्या आतल्या समजा क्रं ६ च्या "स्व" ला चिकटुन बसतो. उदाहरण वेडसर वाटेल पण अजुन दुसरा मार्ग मला हे माझ म्हणण मांडायला सापडत नाही. म्हणजे कसे की आता जो अहंकार मी बघितला तो अधिक सुक्ष्म पातळीवर जाऊन "स्व" म्हणतो " बघ कीती परखड आत्मपरीक्षण चालु आहे माझे, किती पारदर्शक आहे मी, किती ब्रुटली ऑनेस्ट माणुस मी" आता जो एखाद्या व्यक्तीशी बोलतांना दाखवलेला अहंकार होता बाहेरच्या पातळीवरचा जो लक्षात आला जाणवला तो न संपता आता तो अधिक सुक्ष्म होउन बघ मी किती परखड आत्मपरीक्षण करणारा माणुस असा होऊन बसला. आता हा ही पकडीत यावा तर अधिक अधिक तटस्थता असायला हवी अधिक आतुन "स्व" चा धांडोळा घ्यायला हवा. अर्थात हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळे स्तर. संभवतात. अजुन एक अहम विषयी जाणवते की अहम एका अ‍ॅक्सल सारख सायकलच्या अ‍ॅक्सल सारख काम करतं म्हणजे जर मनाचे विविध विचार भावना उर्मी या सर्व मिळुन जर विविध स्पोक्स समजले तर इगो चा अहम चा अ‍ॅक्सल त्या सर्वांना धरुन ठेवणारा सिंग्ल सेंट्रल फोर्स सारख काम करतो. आता तो पुर्ण संपवायचा तर विविध उर्मी भावना विचार आयडेंटीटी हे कसं मेंटेन होणार हा ही एक प्रश्न वाटतो. अर्थात हे अनाध्यात्मिक अर्थाने विचार करतोय. अध्यात्माच्या सेट थेअरीजचा तिटकारा आहे. अजुन अनेक विचार येतात पण लांबतय फार