Skip to main content

मराठीची गळचेपी किंवा मराठीची हत्या, आपणच करत आहोत का?

Published on रवीवार, 28/02/2016
विचारमथनाचा स्त्रोत : http://www.misalpav.com/node/35035 गेली ५ दशके मी या ना त्या रुपात भाषेचा वापर करतो.गुजरात, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यांव्यतिरिक्त थोडे दिवस गल्फमध्ये पण पाट्या टाकत होतो.(पैसे मिळवायला जे काम करतो ते पाट्या टाकणे आणि मनाला समाधान करणारे काम करणे, म्हणजे कार्य करणे.ह्या विचारमंथनाचा काथ्याकूट परत कधी तरी....) इकडे-तिकडे भटकतांना आलेले काही अनुभव. सन १९७५ मी आणि किराणामाल वाला.दुकानदार मारवाडी आहे.दुकान नेहमीसारखेच अस्ताव्यस्त. मी : दादा, २ किलो साखर आणि एक नारळ पाहिजे. दुकानदार : खात्यावर टाकू की पैसे देणार? मी : आईने पैसे दिले आहेत. दुकानदार त्याच्या नोकराला मराठीत सांगतो आणि मला बिलाचे पैसे पण मराठीतच सांगतो. ============================== सन २०१५, तेच दुकान आणि तोच दुकानदार.दुकान टापटीप.अगदी ६-सिग्माच्या प्रमाणे. मी : १ किलो शेंगदाणे. दुकानदार, शेंगदाण्याची १ किलोची पिशवी हातात ठेवतो आणि म्हणतो, "साब,ये देखो नया चावल आया है.सालभर भरनेका है तो बोलो.पैसा बाद में दो." मी तांदूळाच्या गोणीची मागणी नोंदवतो. दुकानदार नोकराला मारवाडी भाषेत, माझा पत्ता आणि किती वाजता घेवून जायचे.इत्यादी माहिती देतो. १९७५ ते २०१५ पर्यंत ग्राहक आणि दुकानदार ह्यांच्यात काय फरक पडला ते सुज्ञांना सांगायला नकोच. ================================================== १९७५ मी भाजी-बाजारात, आई बरोबर. आई भाजीवाल्यांकडून भाजी घेतांना मराठीत बोलत होती. ------ सन २०१५ त्याच भाजी बाजारात , बायको बरोबर. बायको भाजी वाल्याकडून हिंदीत बोलत होती.भाजीवाले बदलले. ================================================= १९७५ ते २०१५ ह्या कालावधीत, रोजचा व्यवहार हिंदी भाषेत जास्त होतो आणि तो पण महाराष्ट्राच्या राजधानीत.मग तो बस प्रवास असो, किंवा रिक्षावाले, किंवा रेल्वे प्रवास. तीच गत अन्न आणि औषधे पुरवणार्‍या दुकानांबाबतीत. ====================================== गुजरात, तामिळनाडू इथे मात्र अद्यापही रोजचे व्यवहार त्यांच्याच बोलीभाषेत होतात. गल्फमधील प्रत्येक सेवा देणार्‍या लोकांना अरबी येत असतेच.अरबी लिहिता-वाचता येत नसले तरी. माझे निरिक्षण : मराठीचा असो किंवा इतर कुठल्याही भाषेचा सार्वजनिक वापर, सेवा पुरवणार्‍या लोकांकडून जास्त होतो.आपण जर मराठीतच बोललो तर दुकानदार पण मराठीतच उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. असो, बरेच दिवस ह्या विषयी मिपाकरांशी बोलायचे होते, म्हणून बोललो.मनांतले शल्य आपल्याच माणसांबरोबर बोलले की, मन पण जरा हलके होते. वरील लेख वैयक्तिक वाटल्यास किंवा इतर भाषांचा अनादर करणारा वाटला, तर मी क्षमा मागतो.

वाचन संख्या 7340
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

सहमत आहे. मी आवर्जून मराठी भाषेतच संवाद साधतो. समोरचा कितीही हिंदीत बोलत असला तरी मी मराठी सोडत नाही. मग तो आपोआप मराठीचा गिअर टाकतो. :-)

In reply to by एस

+१. मी पण असेच करतो. ९० ते ९५ % टक्के वेळेला दुसरा माणूस लगेच मराठीत बोलायला सुरुवात करतो, निदान तसा प्रयत्न करतो... महाराष्ट्रातच आपण पहिल्यापासून असा गैरसमज करुन घेतो कि समोरच्या माणसाला मराठी येणार नाही, आपण हिन्दीत बोलावे... मराटीत संवाद साधायचा प्रयत्न करावा. अगदीच त्याला येत नसेल तरच हिंदी.. ग्राहकवर्ग बदलला आहे. सोसायटी जास्त मिक्स्ड झाली आहे. त्यामुळे समोरच्या माणसाला मराठी येते का नाही असा संभ्रम उत्पन्न होत असावा.

:)

वरील समस्या कदाचीत महानगरात जाणवत असावी. माझा अनुभव असा आहे की,आमच्या इथे भेळ विक्रेता भैय्या पण उत्तम मराठी बोलतो. कधिकधी मीच एखाद वाक्य हिंदीत बोलुन जातो.

जेपीशी सहमत! माझ्याशी तर डाॅक्टर म्हणून उगाच इंग्रजीत बोलणारे लोक पण असतात.ते इंग्रजी फाडत असतात मी मराठी.मग कधीतरी त्यांच्या लक्षात येतं या बाईला इंग्रजी येत असून ती मराठीत बोलतेय.मग तेही मराठीत सुरु होतात :) हा प्रकार तथाकथित उच्चशिक्षित लोक जास्त करतात ;) आमचे गाववाले ताई दात उक्काळतोय सांगतात ठणठणीत आवाजात!

In reply to by अजया

तंतोतंत. जुन्या कंपनीत हा अनुभव वारंवार येत असे. मी मुख्यालयाशी ईग्रजीत बोललयावरच ह्या "घाटी-मराठी"ला इंग्रजी समजते यावर विश्वास बसत असे. बरेच नव-अभियंते उत्तरभारतीय अधिकार्यींशी इंग्रजीत बोलत आणि ती मंडळी यांना हरियाणवी-बिहारी हिंदीवर आणून ठेवत. शविवारच्या लोकसत्तात दोन चांगले लेख आले आहेत. एक मराठी तील प्रतीशब्दांसाठी केलेल्या प्र्यत्नांबद्दल आहे. घरी दारी आवर्जून मराठी बोलणारा "घाटी" नाखु लोकसत्तातून साभार
कालच्या ‘मराठी दिना’च्या निमित्ताने या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उगाळला गेला असेल. असा दर्जा मिळाल्याने सरकारदरबारातून अधिक अनुदान मिळण्याखेरीज नक्की काय होणार, हे अभिजात दर्जावाल्यांनाच ठाऊक. तो मिळेल तेव्हा मिळेल. परंतु यानिमित्ताने मराठीच्या भवितव्याचा मुद्दाही चच्रेत चघळला गेला असेल. भाषा ही त्या व्यक्तीच्या विचारांची निदर्शक असते. याचा अर्थ एखाद्याला स्वच्छपणे सरळ एका भाषेत काही सांगता येत नसेल, तर त्याची विचारप्रक्रिया दोषपूर्ण आहे. या असल्यांच्या विचारप्रक्रियेमुळेच आज आसपास ना धड मराठी, ना इंग्रजी, आणि हिंदी तर नाहीच नाही, अशा र्अधकच्च्या भाषा बोलणारे बरेच दिसतात. अशा मंडळींनी आपली भाषा सुधारावयाची असेल तर आधी स्वत:च्या विचारप्रक्रियेवर काम करावे आणि ते झाल्यावर भाषेकडे लक्ष द्यावे. या दोन्ही कामांत अशा इच्छुकांना रामदासांचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर होऊ शकतो. ते कसे, ते पाहण्याआधी भाषेच्या वापराबाबतचा आणखी एक मुद्दा ध्यानात घ्यावयास हवा. तो म्हणजे भाषा ही प्रसंगोपात बदलावयाची असते. महाविद्यालयीन काळात सवंगडय़ांसमवेत आपण ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत वाडवडील वा अन्य वडिलधाऱ्यांशी बोलतो काय? नाही. तसेच भाषा ही प्रसंगानुसारही बदलणे गरजेचे असते. म्हणजेच एखाद्या औपचारिक व्यावसायिक उद्दिष्टांसाठी करावयाचे एखाद्या प्रसंगाचे वर्णन आणि कौटुंबिक सहलींचे वर्णन यांची भाषा एकच असता नये. तसेच या दोघांत गल्लत करूनही चालत नाही. म्हणजे व्यावसायिक कारणांची भाषा ही सहलीच्या वर्णनासाठी वापरणे हास्यास्पद ठरेल. उलट झाल्यासही तसेच होईल. भाषेचा वापर समयोचित कसा करावा, हे समजून घेण्यासाठी त्यामुळेच रामदासांच्या वाङ्मयाचे परिशीलन आवश्यक ठरते. आता हेच पाहा. मराठी घरांत लोकप्रिय असलेल्या दोन आरत्या समर्थ रामदासांनी लिहिलेल्या आहेत. या दोन्ही कथित देवांची स्वभाववैशिष्टय़े वेगळी. त्यांचे गुणधर्म वेगळे. ते ध्यानात घेऊन रामदासांनी त्यांचे वर्णन करताना भाषा किती सहज बदलली आहे, ते पाहा. उदाहरणार्थ, काहीशा लडिवाळ, क्षमाशील, कलासक्त गणपतीचे वर्णन करताना ते म्हणतात- रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा चंदनाची उटी कुंमकुमकेशरा हिरेजडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया.. पण तेच रामदास जेव्हा डोक्यात राख घालून घेणाऱ्या गणपतीच्या वडिलांचे वर्णन करतात तेव्हा लिहितात- लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकीं बाळा तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझुळां.. म्हणजे गणपतीचे वर्णन करावयाचे शब्द आणि शंकराच्या वर्णनाची भाषा यांत किती फरक आहे ते पाहा. हेच रामदास जेव्हा देवी भवानीस- तुझा तु वाढवी राजा शीघ्र आम्हांसि देखता.. असे शिवाजी महाराजांविषयी म्हणतात तेव्हा त्यातील आर्तता ही वेगळी असते. ती भाषेतून समोर येते. याच देवीचे वर्णन करताना रामदास म्हणतात- दुग्रे दुर्घट भारी तुजविण संसारीं अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारीं वारीं वारीं जन्म-मरणातें वारीं हारीं पडलों आतां संकट निवारीं.. भाषेचे हे वैविध्य शिकण्यासारखेच. एका बाजूला गणपतीचे वर्णन करताना आलेले ‘रुणझुणती नूपुरे’ यासारखे नादमय शब्द. पण हीच नादमयता कडय़ावरून पडणाऱ्या नदीच्या प्रवाहाचे वर्णन जेव्हा रामदास करतात तेव्हा वेगळी भासते.. गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे धबाबा लोटल्या धारा धबाबा तोय आदळे.. या वर्णनातून त्या प्रपाताची भव्यता वाचकाच्या डोळ्यांसमोर उभी राहीलच राहील. आपले सर्व लेखन हे रामदासांनी कोणास काही ना काही सांगण्यासाठी, शिकविण्यासाठीच केले. उगाच वेळ जात नाही म्हणून ते कथा-कविता करीत बसले असे झालेले नाही. तरीही त्यांचा मोठेपणा म्हणजे- आपण काही आता तुम्हाला शिकवणार आहोत, असा त्यांचा आविर्भाव कोठेही आढळत नाही. शिकविणाऱ्याला दडपण येता नये आणि शिकणाऱ्याला कंटाळा येता नये, याची काळजी रामदास पुरेपूर घेतात. ही काळजी घ्यायची म्हणजे काय करायचे? तर- मुलाचे चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे तसे जनासि सिकवावे हळुहळु.. असे रामदासांचे सांगणे आहे. ते सांगतानाची भाषादेखील पाहा किती समजावण्याची आहे. तीत अभिनिवेश नाही. तो आला, की समोरच्याच्या मनात एक प्रकारचा दुरावा तयार होतो. रामदासांना तो टाळायचा आहे. त्यासाठीच ते भाषेला देत असलेले महत्त्व लक्षात घ्यायला हवे. अलीकडे अनेक विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांविषयी वारंवार तक्रार करीत असतात. बऱ्याचदा त्या तक्रारी रास्तही असतात. कारण विद्यार्थ्यांशी कसे बोलावे, त्यांना कसे आपलेसे करावे, आणि त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांच्या मनाचा ठाव कसा घ्यावा, हे त्यांना कोणी सांगितलेलेच नसते. अशा शिक्षकांची मग भाषाही त्यामुळे कोरडीठाक असते. तीत ओलावा नसतो. तो कसा आणावयाचा, हे समजून घ्यावयाचे असेल तर अशांनी रामदास वाचावा. सोपा मंत्र परी नेमस्त साधे औषध गुणवंत साधे बोलणे सप्रचीत तसे माझे.. समर्थ रामदासांच्या नंतर ३०० वर्षांनी जन्मलेल्या विख्यात संशोधक आइनस्टाईन याचे एक वाक्य आहे. तो म्हणतो : एखाद्याला एखादा विषय सहज-सोप्या भाषेत मांडता येत नसेल, समजावून सांगता येत नसेल तर त्याला त्या विषयाचे पुरेसे आकलन झालेले नाही असे खुशाल समजावे. रामदासांनी वेगळ्या शब्दांत हीच बाब सतराव्या शतकातच सांगून ठेवलेली आहे. जे आपल्याला सांगावयाचे आहे, त्यावर मुळात आपले प्रेम हवे. ते असल्यास आपल्या विषयाचा सखोल अभ्यास हवा. आणि त्यानंतर हा अभ्यास प्रकट करणारी साजेशी भाषा हवी. हे नसेल तर सर्व व्यवहार कंटाळवाणा होतो. भक्तीहीन जे कवित्व तेचि जाणावे ठोंबे मत आवडीहीन वक्तृत्व कंटाळवाणे म्हणजे विषयाचे आकलन हवे आणि तो विषय समजावून सांगणारी साजेशी भाषाही हवी. याखेरीज आणखी एक मुद्दा असा की- एकदा का भाषेवर हुकमत आली, की ती भाषा आपणास हवी तशी वाकवता येते. शब्दांचे फुलोरे मांडता येतात. शब्द वाकवता येतात. आपल्याला हवे तसे तयार करता येतात. ते करण्याचे कौशल्य आणि त्याअभावी होणारी वरवरची कारागिरी यांतील फरक रामदासांच्या लिखाणातून स्पष्ट समजून घेता येतो. आता हेच पाहा- खटखट खुंटून टाकावी खळखळ खळांसी करावी खरे खोटे खवळो नेदावी वृत्ती आपली.. त्यांच्या शब्दकळेचा आणखी एक नमुना- गर्वगाणे गाउ नये गाता गाता गळो नये गौप्य गुज गर्जो नये गुण गावे एका बाजूला हे असे लिहिणारे रामदास दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने सद्गदित होतात आणि लिहून जातात.. त्रलोक्य चालिला फौजा सौख्य बंदी विमोचने मोहीम मांडिली मोठी आनंदवनभुवनी.. तेव्हा या भाषिक आनंदासाठी तरी आपण दासबोध आणि समर्थाच्या अन्य वाङ्मयाचा आनंद घ्यावा. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने इतके जरी आपण करू शकलो तरी त्यामुळे मराठीचे भले होण्यास मदतच होईल

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. तिला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवणारे ग्रेटच. मी जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मराठी बोलतो, वाचतो, लिहितो आणि टंकतो.

माणसाने जेवढ्या शिकता येतील तेवढ्या भाषा शिकाव्यात. त्याचा वेगवेगळ्या संस्कृतींशी परिचय होतो आणि मग आम्ही सहिष्णू आहोत असा झेंडा न उभारता अंगी सहिष्णुता येते. एकमेकांची भाषा बोलणं, एकमेकांचं जेवण जेवणं आणि आंतरभाषिक विवाह करणं यामुळे सहिष्णुता नक्कीच वाढते. तिसरी गोष्ट काहीजणांना आता शक्य नाही ;) पण पहिल्या दोन नक्कीच करु शकतो. रच्याकने मराठी भाषेचा अभिमान आहे म्हणून वाट्टेल त्या फालतू मालिका आणि चित्रपट बघणं मला पटत नाही. काय म्हणता?

माझे निरिक्षण : मराठीचा असो किंवा इतर कुठल्याही भाषेचा सार्वजनिक वापर, सेवा पुरवणार्‍या लोकांकडून जास्त होतो.आपण जर मराठीतच बोललो तर दुकानदार पण मराठीतच उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
अशा गोष्टी निदान मराठी संकेतस्थळावर तरी बोलायच्या नसतात, लोक संकुचित मनोवृतिचे म्हणतात. शिवाय प्रांतियवाद बाळगल्याचा अरोपही होतो. झालच तर शुद्ध मराठी शब्द वाचताना 'दाताखाली खडे आल्यागत वाटले' असा अभिप्राय मिळतो. तामिळ भाषिक बाळगत असतील अभिमान त्यांच्या भाषेचा आणि तिथे येणारे परप्रांतिय आवर्जुन त्यांची भाशा तिथे राहताना, वावरताना शिकत असतीलही पण आपण असा संकुचितवाद बाळगायचा? त्यापेक्षा मराठी माणसाचं हिंदी यावर फर्मास विनोदी वाक्ये लिहा, भरपूर दाद मिळेल.

मराठीची गळचेपी आणि मराठीची हत्या या संदर्भातील चर्चेत किमान विचारमंथन आणि स्रोत हे शब्द व्यवस्थित लिहावे ही अपेक्षा फार नाही असे वाटते. विचारमथनाचा स्त्रोत ?????

In reply to by आजानुकर्ण

टंकनचूक असेल हो. एव्हढं काय मनाला लावून घेता. अंतरीचा भाव महत्वाचा. :) मलाही मी टंकलेल्या "चूक" या शब्दातील चु पहीला की दुसरा याची खात्री नाही. =)) रच्याकने, खुप दिवसांच्या सुप्तनिद्रावस्थेतून बाहेर आला आहात. ब्लॉगवर लिहीणे सुरु केले का पुन्हा?

In reply to by आजानुकर्ण

नक्की शब्द काय आहे? स्त्रोत की स्रोत? स आणि र च्या मध्ये त आहे की नाही? मी तर लहानपणापासून स्त्रोत च म्हणत / लिहीत आलोय. (अर्थः उगम या अर्थाने)

हे मराठीचे फार जुने दुखणे आहे ! :( परप्रांतात लोक प्रथम आपल्या मायबोलीत बोलतात आणि मग दुसर्‍याला शक्य नसल्यास (काही अपवाद वगळता) इंग्लिश, हिंदी किंवा शक्य असल्यास दुसर्‍याच्या मायबोलीत बोलतात, असा अनुभव आहे. याविरुद्ध मराठी माणसाला मोडक्यातोडक्या हिंदीत आणि जमल्यास इंग्लिशमधे बोलण्याचा खूप सोस आहे ! कित्येक मराठी रिक्षा/टॅक्सी/ई-कारवाल्यांना "अरे, तू मराठी, मी मराठी. मोडक्या हिंदी ऐवजी मराठीतच बोल ना." असे सांगूनही ते दोन वाक्यांनंतर परत हिंदीची मोडतोड सुरु करतात. हल्ली बर्‍याच मराठी लोकांत बंबय्या हिंदी बोलणे फ्याशनेबल झाले आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

+१ अनेक मराठी लोकांनाच मराठीतून बोलणे कमीपणाचे वाटत असेल तर परप्रातीयांकडून काय अपेक्षा ठेवणार ?

पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि मराठीची गळचेपी होतेय अशी ओरड करायची सध्या फॅशन आली आहे.मराठीचा ठेका घेतलेल्या राजकारण्यांची पोरं कॉन्व्हेंटात शिकतात,हिंदीतून कवीता करतात तिथे सामान्यांची काय कथा! इंग्रजी शाळांमुळे मराठीचे महत्व कमी होत आहे अशी ओरड करणारे मराठी साहीत्यीकांच्या मुली झाडून अमेरीकेत राहतात ,या साहित्यीकांची नातवंडे अमेरीकेत तिथल्या शाळेत शिकतात,हे साहीत्यीक मात्र साहित्य संमेलनामध्ये मराठीविषयी फार मोठी काळजी असल्यागत मतांच्या पिचकार्या टाकत असतात.

पोरं कॉन्व्हेंटला टाकायची आणि मराठीची गळचेपी होतेय अशी ओरड करायची सध्या फॅशन आली आहे. या मतात किंचित अर्थ आहे पण ते पूर्णसत्य नाही हे स्वानुभवावरून सांगू शकेन. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर माझे मराठीत लिहिणे-शिकणे व काम करणे बंदच झाले. व्यवसायानुरूप घर सोडून इतर ठिकाणी मराठी वापरणे बंद झाले. तेव्हापासून, अनेक दशकांनी, चार एक वर्षांपूर्वी मिपावर लिहायला लागलो तेव्हा मी मराठीत सलग चार वाक्ये (अक्षरशः सलग चार वाक्ये) पहिल्यांदा लिहिली ! माझ्या मुलाचे बालवाडी ते उच्च्च शिक्षणापैकी निम्म्यापेक्षा जास्त शिक्षण परदेशी आणि अर्थातच इंग्लिशमधे झाले आहे. त्याला मराठी हा विषय शाळा-कॉलेजात कधीच नव्हता. पण घरात कटाक्षाने मराठीचा वापर असल्याने माझा मुलगा अस्खलित मराठी बोलतो हे मी अभिमानाने सांगून शकतो. पुल त्याचे आवडते लेखक आहेत. मराठी नाटक सिनेमांना तो नाक मुरडत नाही. किंबहुना, "बालगंधर्व" हा सिनेमा बघायला आवर्जून घेऊन जावून त्याने मला जरासा आश्चर्याचा धक्का दिला होता ! त्याच्या बोलण्यावरून, शाळा-कॉलेजात त्याला मराठी विषय कधीच नव्हता, यावर लोकांचा विश्वास बसत नाही. विशेषतः शास्त्रिय विषयावर चर्चा चाललेली नसली तर आमच्याकडून इंग्लिश व इंग्राजळेली मराठी विचार न करता "स्वाभाविकपणे" टाळली जाते. आजही दोन वेगवेगळ्या देशांतून एकमेकाशी बोलताना "आमची मराठी"च सहजपणे वापरली जाते. मराठीत शिकलेल्या अनेक पालकांच्या (त्यात माझे अनेक नातेवाईकही आलेच) मुलांना "आज तू पिंक ड्रेस घालून स्कूलमध्ये जा. ते टायगरचं पिक्चर घेतलंस ना मिसना शो करायला? टिफिन एंप्टी करून आणायचा हां." असं बोलताना ऐकली की हसू का वैषम्य वाटून घेऊ असा प्रश्न पडतो :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मराठीत शिकलेल्या अनेक पालकांच्या (त्यात माझे अनेक नातेवाईकही आलेच) मुलांना "आज तू पिंक ड्रेस घालून स्कूलमध्ये जा. ते टायगरचं पिक्चर घेतलंस ना मिसना शो करायला? टिफिन एंप्टी करून आणायचा हां." असं बोलताना ऐकली की हसू का वैषम्य वाटून घेऊ असा प्रश्न पडतो :(
हे चित्र हल्ली सर्वत्र दिसते. मराठी घरातील मुलांना हल्ली सर्रासपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले जात असल्याने कदाचित असे होत असावे. शाळेतील इंग्रजीमय वातावरण आणि घरातील मराठी वातावरण यांच्यामध्ये पाल्यांची मधल्यामध्ये ओढाताण होऊन नये म्हणून कदाचित पालकांनी स्विकारलेला हा मध्यममार्ग असावा. वाक्याचा ढाचा मराठी, मात्र त्यातील शब्द इंग्रजी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

...आणि हो, त्याला पाश्च्यात्य गोष्टींचा तिटकारा आहे असे अजिबात नाही, उलट पाश्च्यात्य लेखन/कला/संगीत यांची आवड व जाण आहे. मला पाश्च्यात्य गायनातले शब्द (लिरिक्स हो ;) ) बर्‍याचदा समजायला कठीण जातात (शप्पत !, याबाबतीत आम्हाला कंट्री म्युझिक जास्त झेपते). मी त्या गाण्यांची चेष्टा केली की त्याला राग येतो :) (कधी भेटलात तर हे मी तुम्हाला सांगितले हे त्याला सांगू नका ;) )

मी तुमच्या feelings समजू शकतो,पण ते काय आहे ना आश मधे मधे आमाला इंग्लिश बोलाव लगता है,त्या शिवाय आम्हाला modern कोण म्हणनार.☺

काल विडीओकॉन डी२एच ला काही कारणाने फोन केला होता. पलीकडची मुलगी हिंदीत काहितरी विचारत होती त्याला मीही हिंदीत उत्तर दिलं. दिलेलं उत्तर बरोबर आहे का म्हणून मी आईला विचारलं- ते मराठीत. त्या तिकडच्या मुलीने ऐकू नये म्हणून फोन लांब धरलेला त्या वेळी. अर्थात तिने ते ऐकलंच. पुढचा प्रश्न तिने सरळ मराठीतच विचारला. मग सगळं काम झाल्यावर म्हणाली की आपली निवडलेली भाषा हिंदी झाली आहे, ती मराठी करून देउ का? - मी खुशीत म्हणालो, वा वा, का नाही! नक्कीच!! शेवटी तर तिने पार सिक्सरच मारला ! काय बोलून तिने संवाद संपवला असेल? "जागतिक मराठी भाषा दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!!" आनंद लपवायचा मी जराही प्रयत्न केला नाही. मोठ्याने हसून मी तिला धन्यवाद दिले.

In reply to by असंका

बँकेतून येणारे फ़ोन वा सेवा पुरवणारे यांच्याशी तुम्ही मराठीत बोललात तर ते देखिल मराठीत उत्तर देतात. समजा एखाद्याने मराठी बोलण्यास असमर्थतता दाखवली तर त्याला किंवा तिला नम्रपणाने बोला की मला हिंदी वा इंग्रजी येत नाही. त्यांच्यासमोर असलेल्या संगणकात तशी नोंद होते व् आपसुक आपली मराठी येणारी माणसे ठेवण्यास त्या संस्थेला भाग पड़ते.

मराठी लोक भांडखोर म्हणतात पण जास्तच सहिष्णु आहेत. केरळ, तामिळनाडु, कर्नाटक सगळीकडे बघितलंय. लोकांना हिंदी कळलं तरी अजिबात बोलायला बघत नाहीत. त्यांच्या भाषातच बोलतात. हॉटेलचे स्टाफसुद्धा अपवाद नाहीत.

गळचेपी, हत्या हे शब्द वाचून मोठे गुन्हेगार असल्यासारखे वाटले. मग धागा वाचला. आपण इतके कै वाईट नै व तुरुंगात जायला लागणार नाही हे लक्षात आल्यावर हायसे वाटले. ;) मिपावरून लॉग औट केले की मराठीचा संबंध संपतो. त्याला इलाज नाही. इथं आजूबाजूला माझ्या वयाचे (म्हणजे पन्नाशीचे............आता वय लपवणे नाही हे ठरलेय ना!) ;) एकच कुटुंब राहते पण त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रात नव्हते म्हणून ते त त प प करत का होईना मराठी बोलात. इतर चार मराठी कुटुंबे म्हणजे नवे नवे संसार आहेत. त्यांची बाळे आत्ता कुठे रांगत्या वयातील आहेत. सगळेजण इंग्रजी माध्यमातून शिकलेले असल्याने फार अपेक्षा ठेवता येत नाहीत. वरील प्रतिसादात डॉ. सुहास म्हात्रे म्हणतात तसे आपण घरात मराठी बोललो तर सवय राहते. आमचाच मुलगा नव्हे तर कट्यार काळजात घुसली पहायला आलेल्या तमाम प्रेक्षकवर्गात जेवढी मुले होती ती सगळे आधी गोंधळलेली होती. नक्की काय अपेक्षा ठेवावी हे त्यांना समजत नव्हते. शिनेमा सुरु झाल्यावर इंग्रजी भाषांतर वाचून, मध्येच आधीचा संदर्भ आठवून, रोजचे बोली मराठीचे संवाद आठवून सगळ्यांनी चाम्गले निभावले. हाच अनुभव इंग्लीश विंग्लीश हा शिनेमा थेट्रात पाहताना आला होता. आमच्या लेकासकट बर्‍याच मुलांनी वाचायला पुस्तके व लहान दिवे आणले होते. वाचन विसरून सगळ्यांनी मूव्ही एन्जॉय केला. सध्या माझ्याकडे मामेदीर आलेले आहेत. ते कायम महाराष्ट्राबाहेर राहिल्याने इंग्रजी शाळेत गेलेत. त्यांना मराठी फारसे समजत नाही. अमूक पदार्थ वाढू का? तमूक गोष्ट करू का? एवढेच कळते. पदार्थांची नावे समजतात. आता काय करणार? त्यांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे- त्यांचे नातेवाईकांकडे येणेजाणे फारसे नसायचे. मग त्यांच्या आत्याने एकदा जेवताना बरीच कानउघाडणी केली की तू कसा येत नाहीस व अशाने सगळ्यांशी संबंध बिघवतोस वगैरे. यांना त्या भाषणातील एकही वाक्य समजले नाही व आत्याचे बोलून झाल्यावर "ते सगळे खरे आहे, पण श्रीखंड पुरी आवडली" असे म्हणाले. घरी जाताना ट्रेनमध्ये त्यांच्या वडिलांनी म्हणजे मामांनी आत्या काय रागावली ते सांगितले. माझी आतेबहिण महाराष्ट्राबाहेर राहते. ती एकदा काहीतरी बोलताना "आता अमूक एक गोष्ट करण्याशिवाय चारा नाही" असे म्हणाल्यावर हसून पोट दुखले होते. त्याला आम्ही चारा घोटाळा म्हणतो. ;)

In reply to by रेवती

चारा घोटाळा मस्तंच. माझ्या अशाच मराठी पण महाराष्ट्राबाहेर बरीच वर्ष काढलेल्या मित्राने आजकाल भेटत का नाहीस यावर "आता परीक्षा आली आहे त्यामुळे आईने "तांबी" दिली आहे" असं सांगितलं होतं त्याची आठवण झाली. :) पण महाराष्ट्रात यत्र-तत्र-सर्वत्रच मराठीचा कत्ले-आम सुरु असतो. आपण BSNL/MTNL च्या नंबरला फोन लावला आणि फोन व्यस्त असल्यास ती बाय मंजुळ आवाजात म्हणते "आम्ही क्षमस्व आहोत." पहा म्हणजे एकाच दगडात आमची माय मराठी आणि आज्जी संस्कृत दोघींचीही मस्त वाट लावली गेली आहे. पुढे जाऊन हेच जर लोक शुद्ध मराठी म्हणून ग्राह्य धरू लागले तर...कठीण आहे. तीच गत "सोबत" ह्या शब. झी मराठीची कुठलीही मालिका बघा. "मी अमक्या तमक्या सोबत बोललो." वगैरे वाक्य असतात. अर्थ वगैरे व्यक्त होतो हे सर्व मान्य आहे मला. पण हे बोली मराठी नक्कीच नाही. मराठीची गळचेपी/हत्या आपणच करत आहोत का? हो. लेखनसीमा.

शक्य तिथे मराठीतून बोलणे हे आपल्या हातात असते. तितके तर आपण पुढेही नक्कीच करत राहू - त्या काळच्या बदललेल्या मराठीतून का होईना. सध्याच्या महाराष्ट्रभूमीवर वास करणारा दहा-बारा कोटी लोकांचा समाज जी कोणती भाषा बोलतो/बोलत असेल, ती मराठीच असेल. फक्त ती आपल्याला माहीत असणारी किंवा आपल्याला आवडणारीच अशी मराठी नसेल कदाचित. समाजव्यवहारांचा संस्कृतीवरचा रेटा जबरदस्त असतो. त्यामुळे जे बदल घडून येतात, ते सहसा सकारात्मकच असतात. बदल हे उत्क्रांतीचेसुद्धा एक महत्त्वाचे लक्षण आहे.

गरीब चिमणा आणि राही यांच्या प्रतिसादाशी सहमत. सर्वसाधारणपणे ज्यांची पोटे टम्म फुगून ढेकरा देत आहेत असे लोक - त्यातही परदेशस्थ - ही मराठीची उठाठेव करत असतात असं एक सामान्य निरीक्षण आहे. उगीचच मराठीचा कैवार घेऊन इथेतिथे चर्चाविषय चघळत बसल्याने आपले भाषाप्रेम सिद्ध होत असावे असा कदाचित एक गैरसमज असावा. मी पण मराठी वाचवा-मराठी जगवा असा जयघोष करणाऱ्या टोळ्यांच्या प्रभावाखाली आधी तसाच विचार करत होतो. परंतु आता स्वतंत्रपणे विचार करायला लागल्यावर एक गोष्ट लक्षात आली आहे की मराठी जगली किंवा मेली तरी त्याची काहीही तोशीस माझ्यासकट इथल्या किंवा महाराष्ट्रातल्या कोणालाही लागणार नाही. भाषेतले बदल स्वीकारणे आवश्यक आहे. भाषेने कायम काष्टा सांभाळून डोक्यावर पदर घेऊन, पोटरी न दाखवता इथेतिथे सोवळेपणाने वावरले पाहिजे ही अपेक्षा हास्यास्पद आहे. मुळात मराठी मरणार अशी आवई उठवणे हेच चुकीचे आहे. इथं वर कोणीतरी 'आज तू पिंक ड्रेस घालून स्कूलमध्ये जा' याचं वैषम्य वाटतं. असं म्हटलंय. हे तर अधिकच हास्या्स्पद आहे. "आज तू पिंक ड्रेस घालून स्कूलमध्ये जा" हे वाक्य मराठी नाही हे आधी सिद्ध करुन दाखवा. मराठीचे सर्व व्याकरणनियम पाळलेले हे वाक्य संपूर्ण मराठी आहे. आज सुशिक्षित मराठीजनांमध्ये पिंक हा शब्द उच्चारल्यास पिचकारी आणि गुलाबी या दोहोंपैकी कोणता अर्थबोध होण्याची शक्यता जास्त आहे याचा विचार करा. ड्रेस हा शब्द मराठी नाही का? की स्कूल हा शब्द मराठी नाही? शाळेत जाणाऱ्या पोराची स्कूलबस असते की शाळागाडी? इंग्रजाळलेली मराठी वाईट आणि संस्कृताळलेली मराठी चांगली हे कोणी ठरवले? उगीच भाषेचे अहंकार जपून आम्ही बोलतो तीच अस्खलित मराठी असा आव आणून मराठीचे काहीही भले होणार नाही. मी पूर्वी आवर्जून कॉलसेंटर वगैरे सेवा पुरवणाऱ्यांनी मराठी बोलावे असा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असे. आता बिनधास्तपणे हिंदी इंग्रजी बोलतो. माझी अडचणनिवारण होणे महत्त्वाचे. उगीच दहाबारा हजारासाठी कॉलसेंटरमध्ये रात्रपाळी करणाऱ्याला माझ्या भाषिक अहंकारासाठी हुज्जत घालून त्रास देणे आता मला पटत नाही. भाषा हे साध्य नसून साधन आहे. भाषेला (किंवा धर्माला!) जगवण्याची(!) कोणतीही जबाबदारी माझ्या खांद्यावर नाही. उगीच हिंदू खतरे मे, इस्लाम खतरे मे, मराठी खतरे मे अशा हाकाट्या पिटल्याने फारसे भले होणार नाही. कुणीतरी राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी असे धर्म, भाषा, जात धोक्यात असल्याचे पिलू सोडून देत असतात त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन नीट विचार करुन त्याप्रमाणे वागावे. महाराष्ट्रात राहणारे लोक जी भाषा बोलतात ती मराठी!

In reply to by आजानुकर्ण

काही मरत नाहीय मराठी. चांगली जित्तीजागती आहे. उगीच भयगंड आणि न्यूनगंड कशाला बाळगायचा? मराठीचे जिवंत झरे तळागाळाशी आहेत. वरवरचे पाणी अशुद्ध झाले असेल तर ते उपसून टाकून मूळ झर्‍यांना मोकळेपणाने श्वास/उसळी घेणे शक्य होईल अशी परिस्थिती निर्माण करणे आपल्या हाती आहे. दणदणीत प्रतिसाद.

आजकाल चर्चा करत नाही या विषयावर. कृती करायचा माझ्यापरीने प्रयत्न करत आहे. अनेक समविचारी लोक सोबत येत आहेत. त्यामुळे हे असले वाद प्रतिवाद करून लोकांच्या डोळ्यांवरची झापडं काढण्याचे निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा दृष्य बदल करता येतो का हे बघणे, हे धोरण अवलंबले आहे.

असे नका म्हणू हो! काही लोक आपण किती हुषार, आपल्याला इतर भाषा कश्या येतात, आपण किती वाचन केले आहे, निरनिराळ्या देशातून हिंडून आलो आहोत हे दाखवण्यासाठी असे धेडगुजरी भाषेत बोलतात. मला अनेक लोक भारतात भेटले. जिथे चपखल मराठी म्हणी लागू पडतील तिथे सुद्धा उगीचच "फ्रेंच मधे असे म्हणतात... "वगैरे म्हणायचे! आजकाल अमेरिकेतच आमचे मराठी मित्र आपसात जास्त करून मराठीत बोलतात - तेव्हढे मराठी मला, मुंबईत काय, पुण्यात पण ऐकायला मिळत नाही. असो. असे म्हणतात, पूर्वीच्या संस्कृत प्रचूर बोजड शब्दांपेक्षा आधी मराठीत नि नंतर सगळ्यांना समजेल अश्या हिंदी, इंग्रजी शब्दां चा वापर सुरु झाला असावा ( भाषा "प्रगल्भ, समृद्ध " झाली!)

मुविकाकांनी चघळायला विषय देऊन काढता पाय घेतला आहे. =)) आज माझ्या मराठी म्यानेजरशी अर्धा तास इंग्लिशमध्ये बोललो. तो हिरव्या देशात असतो ना!!

पांडू मोड ऑन बरं मग काय करायचं आता आपण!? पांडू मोड ऑफ.

हे आधीही कधी लिहिलं असेल, पुनरावृत्ती असल्यास क्षमस्व. अतिरेकी प्रचारामुळे असेल कदाचित, पण मला असं वाटायचं की मराठी माणूस अन्यभाषीय लोकांच्या संमिश्र घोळक्यात मराठी बोलायला लाजतो. पण उलटेच अनुभव येत गेले. मराठीच काय, अमराठी माणसांनीही आवर्जून मराठीत संवाद साधायचे प्रसंग वारंवार घडले, घडतात. काही वानगीदाखल: 1. आमच्या व्यावसायिक क्षेत्रात दोन थोर व्यक्ती आहेत. एकीचं आडनाव राव आणि दुसऱ्याचं ओस्तवाल. यांना मराठी येत असेल अशी शंकाही मला कधी आली नाही. एका कॉन्फरन्समध्ये हे दोघंही भिंतीवर माझं आडनाव बघून थेट मराठीत सुरू झाले. आंतरराष्ट्रीय स्थळ आणि लोक, आमच्या वयातला फरक, मराठीत बोलायची तथाकथित लाज हे काहीही आड आलं नाही. (रावबाई मूळच्या तामिळ पण हुजूरपागेच्या विद्यार्थिनी, आणि ओस्तवाल सोलापूरचे.) 2. एका विमानप्रवासात मी आणि माझा मुलगा आपापसांत मराठीत बोलत होतो. आजूबाजूला हिंडणारी एक चिनी दिसणारी हवाई सुंदरी उगाचच आमच्याकडे बघून हसत होती. थोड्या वेळाने मी झोपलो, आणि ती काहीतरी ज्यूस वगैरे घेऊन आली. माझ्या मुलासमोर ट्रे नेऊन "कुठला ज्यूस हवा तुला?" वगैरे विचारणा करायला लागल्यावर मी खडबडून उठलो. तर या हवाई सुंदरी ताई होत्या चिनी, पण आई/आजोळ मराठी. मुंबईत लहानाच्या मोठ्या झालेल्या. 3. माझ्या हापिसात एक डच/बेल्जीयन बाई आहेत. एक दिवस चक्क "सुप्रभात" म्हणाल्या! चौकशीअंती असं लक्षात आलं की त्यांची सख्खी मैत्रीण बेळगावची आहे. या बाई दिवाळीला तिकडे जातात आणि ती इस्टरला इकडे येते. बाईंचं मराठी थेट बेळगावी वळणाचं आहे - लंपनसारखं.

In reply to by आदूबाळ

तुमचे अनुभव बर्‍यापैकी अपवादात्मक आहेत असे वाटते. इथे आमच्या बंगाली रूममेटला आमच्यामुळे मराठी पूर्ण समजत असले तरी संभाषणाचा प्रयत्न काय करत नाय यूसलेस लेकाचा. (तसा चांगला पोरगा आहे, मासेबिसे खिलवत असतो)

डॉ. ली श्लेसिंगर - हे युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मध्ये मानववंशशास्त्राचे (अँथ्रपॉलॉजी) प्राध्यापक आहेत - १९७० च्या दशकात सातार्‍याजवळच्या एक खेड्यात जाउन काही वर्ष राहिले होते. आणि त्यानंतसुद्धा अनेक वेळा भारतात जाउन आलेले आहेत. ते जेव्हा मराठी त्यांची मातृभाषा नसूनही प्रयत्नपूर्वक मराठी बोलतात तेव्हा मला तसा प्रयत्न करायला फारसे अवघड जाउ नये असे प्रामाणिकपणे वाटते आणि मी तसा प्रयत्नही करतो. विशेषतः इंग्रजी आणि हिंदी शब्दांना सहज, सोपे आणि रोजच्या वापरातले मराठी प्रतिशब्द असतील तर का नाही वापरायचे? डॉ. ली श्लेसिंगर मराठी बोलताना https://www.youtube.com/watch?v=OF7hxzDmKMU

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

ली श्लेसिंगर बोलतात चांगले, पण इरिना ग्लुश्कोव्हा नामक अजून एक रशियन संशोधक आहेत. त्यांचं मराठी ऐकलं तर हे कैच वाटणार नाही. अहो बाकी सोडा, ळ आणि ण व्यवस्थित बोलतात म्हणजे बघा. अन्य वर्णही एकदम नेटिव्हासारखे. भारत इतिहास संशोधन मंडळात त्या आल्या असताना त्यांच्याशी चार वाक्ये बोलायचा योग आला होता. अवाक झालो त्यांचं मराठी ऐकून.

In reply to by बॅटमॅन

ळ आणि ण बोलू शकतात हे छानच. परंतु ल/ळ आणि न/ण हे दोन्ही विकल्प प्रमाण/बोली भाषेत असतातच. मराठी उत्तम बोलता येण्याची खरी खूण म्हणजे, 'च' आणि 'ज' चे दोन्ही उच्चार करता येणे!

In reply to by सुनील

ज चे दोन्ही उच्चार करता येणे तुलनेने सोपे आहे. च बद्दल बोलायचे तर खुद्द रशियन भाषेत चमचावाला च हा उच्चार आहे, सबब त्यांना तेही येते. आणि विकल्प असूद्यात. प्रमाण भाषेपुरतं बोलतोय.

मराठी लोकच एकमेकांशी मराठीत बोलायला कचरतात हे निरीक्षण आहे. काही बिगरमराठी पण त्यातल्या त्यात हुच्च लोक, मी मराठी शिकलो/ली आहे. पण बोलता येत नाही असं सविनय सांगतात. मग या चालीवर हल्ली मी, मी हिंदी शिकलो आहे पण नीट बोलता येत नाही असं सांगायला सुरु केलं आहे, कारण तीन वर्ष हिंदी मग संस्कृत शिकलो वैगरे वैगरे. मग इंग्रजी किंवा मराठी हे दोनच ऑप्शन शिल्लक उरतात. त्रागा करण्यात अर्थ नाही. तुम्हाला जसं शिकूनही मराठी बोलता येत नाही तसं मला शिकूनही हिंदी न बोलता येणं अत्यंत साहजिक आहे.

कॉलेज संपल्यावर हुच्च हॉटेलमधे जायचा प्रसंग आला तेव्हा मित्रांची भाषा बदललेली दिसली. ओल्या कट्ट्याला बर्फ आण सांगितल्यावर ३/४ चड्डीवाला पेठीय म्हणाला , अरे आईस म्हणायचा . मी सांगितला , कुठेही हॉटेल मधे गेलात तर मराठी मधे बोला , कारण मराठी माणसे अशा हुच्च ठिकाणी येतात असे त्यांना कळेल. लोका हुच्च ठिकाणी आपोआप हिंदी, ईंग्रजी बोलु लागतात , कसला न्युनगंड आहे कळत नाही . सर्व सेल्समन , कॉल सेंटर, महाराष्ट्रातील सार्वजनिक सेवा यांच्याशी मराठीतच बोलावे.