Skip to main content

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

लेखक यनावाला यांनी शनिवार, 12/12/2015 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता. प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले, " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" " मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. " "कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?" " हो. कुठल्याच देवाला नाही." थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला. " मग मंदिरात कसे आला ?" " तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो." " तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?" "नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो. "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे. "नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो." " देवाला नाही आणि माणसांना का बरे?" "कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." "तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला. "जशी तुमची इच्छा" मी म्हणालो. थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच. तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती. "आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला. बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल." " आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला. "ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. " "आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले. "खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते." " ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला. " त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?" " सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. " " ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?" " अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या. " चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो. " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या. " आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे. "तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही." " पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला. " ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. " "गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले. " ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा." गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे. .................................................................................

वाचने 108329
प्रतिक्रिया 421

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद१९७१

मी वर तेच म्हणतेय.. बॉसला न घाबरता बोलणारे बोलतीलही. हा स्वभावाचा भाग झाला. न बोलणारे हे नेहमी घाबरत असतीलच असही नाही, तो त्यांच्या स्ट्रॅटजीचाही भाग होऊ शकतोच. नोकरी हे प्रकरण राजकारणाने भरलेले असते. तिथे नक्की किती लोक आपले खरे विचार उघड करतात हाच एक प्रश्न आहे. माणसाचे अनेक अंतस्थ हेतु असतात इथे. बॉसला नाही म्हणायचं नाही म्हणुन दारु सिगरेटही नाही म्हणत नाही लोक.. प्रसाद का नको म्हणतील..?! शिवाय बहुदा यनावालांनीच इथे लिहीलय वाटतं, की एरवी प्रसाद खाल्ला असताच. पावती पुस्तक घेऊन आल्याने त्यांनी नाकारला. लक्षात घ्या, इथे फरक आहे. मी तरी आजवर कुण्या नास्तिकाने केवळ प्रसाद म्हणुन अन्न नाकारले हे पाहिलेले नाही. गोडधोड खायला कोण नाही म्हणतय हो!! पण पावतीपुस्तक आले की परत तो सगळा कर्मकांडाचा व्यवहार आला.. पैसाताइ म्हणते की ती ११/- ची पावती फाडुन मो़कळी होते. कोण डोकं लावणार? तिला तो मार्ग सोयीचा वाटतो. पण यनावाला किंवा ह्या प्रसंगात अगदी मी सुद्धा देवस्थानात एक रुपयाही देऊ शकत नाही. मला कळत नाही की ह्यात आम्ही आमच्या पुअरते आमचे विचार फॉलो करत असताना, लोकांनी प्रश्न उपस्थित करावेच कशाला? हा नास्तिकाचा खाजगी प्रश्न नाही का? यनावाला लोकांना बोलले असते की प्रसाद खाऊ नका तर तुम्ही प्रश्न उभे करा. रादर करालच. पण कुणी प्रसादाचे काय करावे हे आस्तिकच ठरवणार का आता? हो हो.. तुम्ही परत तेच म्हणणार की हे सगळं बॉस समोर कराल का वगैरे वगैरे... परत पहिली ओळ वाचा..
आस्तिक कधीच मॉरल हायग्राऊंड घेउन बोलत नाहीत.
नक्की? खुपच ठाम विधान आहे हे. एकदा फेरविचार करुन सांगा. मग बोलु.

In reply to by पिलीयन रायडर

वाचनीय प्रतिसाद, अगदी मुद्देसूद! प्रतिसादाची वाचनखूण साठवता येते का? (मिपा वर) :)

सगळी चर्चा वाचली. बनेल होमो सेपियन च्या बनेल वागणूकीबद्दलची चर्चा नेहमीच गमतीदार असते! तशीच वाटली! देवाचे काय म्हण णे आहे या सगळ्याबद्दल ते मात्र कळले नाही! ;)

लोकहो, यनावाला समारोपाच्या वाक्यात म्हणतात की माणसाने आशावादी असावे. पण आशा म्हणजे नक्की काय? च्यामारी, नास्तिकाने दाखवला की आशावाद आणि अस्तिकाने दाखवला की अंधश्रद्धा ! लय भारी ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

देवाला नवस केल्याने मुल(गा) होईल असे म्हणणे म्हणजे अंधश्रद्धा, आणि मुल होत नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घेऊन घेणे आणी कोणताच दोश नसेल तर आज न उद्या (प्रयत्नांती) मुल होईल ही अपेक्षा बाळगणे म्हणजे आशावाद.

In reply to by मराठे

कोणताच दोश नसेल तर
"उपलब्ध वैद्यकिय विज्ञान शरीरातील सर्व दोषांचा खात्रीशीर शोध लावू शकते व उपलब्ध आधुनिक विज्ञानाने शरीरात कुठलाही दोष नाही म्हटले म्हणजे नसणारच" हे मानणे म्हणजे अंधश्रद्धा. बाकी चालु द्या..

In reply to by संदीप डांगे

जर आपल्याकडे पैसा आणि वेळ असेल तर सर्व वैज्ञानिक प्रयोग स्वतः करून आपण खात्री करून घेऊ शकतो. त्यामुळे ती अंधश्रद्धा ठरत नाही. मूळ फरक इथे आहे. "आजवरच्या ज्ञानाप्रमाणे आपल्या शरिरात दोष नसेल" असंही म्हणू शकतो पण ते प्रत्येक बाबतीतच लागू होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा म्हणायची गरज नाही. याउलट देवाची मर्जी असं एकदा म्हटलं की पुढे बोलणंच खुंटलं! शिवाय देव स्वतः काहीच बोलत नाही, त्यामुळे तिथे अंधपणे विश्वास ठेवण्यापलिकडे काहीच करता येत नाही.

In reply to by मराठे

मराठे, जर एखाद्या रोगाचं निदान (उदा. कर्करोग) सर्व ज्ञान व पैसा पणाला लावूनही झालं नाही. मग जर देवाची मर्जी म्हंटलं तर चालेल का? इथे मानवी प्रयत्न अगोदरच खुंटलेले आहेत. आ.न., -गा.पै.

भावना नक्कीच सगळ्यांनाच असतात , पण प्रसादाबद्दलच्या भावना आस्तिकांनाच असतात, नास्तिकांना नाही. नास्तिकांना प्रसादाबद्दल , देवाबद्दल त्या नसतात म्हणूनच कदाचित ते त्याचा पदार्थ म्हणून स्वीकार करू शकतात. अर्थात तुमचे स्वच्छता वगैरे बद्दल चे विचार बरोबरच आहेत ते त्या वेळेस लागू पडत असतील तर आणि तेच निकष सगळ्याच (धाब्यावरच्या हि ) पदार्थांना लावत असाल तर ! खुपदा आपण गोष्टींना brain पेक्षा भावनेने तोलत राहतो, भावना बाजूला ठेवुन विचार केला तर दुसर्यांना समजून घेणे जर सोपे होते. आस्तिक माणसाला देव या संकल्पनेबद्दल असा ब्रेन ने विचार करणे जर अवघड असते त्यामुळे त्यांच्या भावना न दुखावता मत मांडले तर ...कदाचित नाही पटले तरी ओपिनिअन दिफ्फेर्स असा विचार करत जगणे सोपे होऊ शकते… by the way इथे कोणताच आस्तिक नास्तिकाच्या नावाने बोंब मारत नाहीये हो, उगीच मुद्दा सोडून काहीही बोलू नका.

आस्तिकांचा बाय डिफॉल्ट चमत्कारावर विश्वास असल्याने काही गोष्टींच्या बाबतीत त्यांनी सारासारविवेक सोडणे सहज शक्य आहे; पण आम्ही फक्त शास्त्रिय विचारच करतो असा दावा करणारे नास्तिक जेव्हा सारासारविचार सोडून बोलतात/करतात व "फक्त मलाच्च अंतिम सत्य माहित आहे आणि ते इतरांवर लादण्याचा हक्कही आहे" असे म्हणतात तेव्हा ते खूपच विनोदी दिसते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टरसाहेब, "फक्त मलाच्च अंतिम सत्य माहित आहे आणि ते इतरांवर लादण्याचा हक्कही आहे" असं कुठे दिसलं तुम्हाला? मलातरी लेखात असे विचार मांडलेले दिसले नाही. नास्तिकांना नेहमीच वाटते की चर्चा करून, उदाहरणे देऊन, स्वानुभव सांगूंन एखद्याचे मतपरिवर्तन करता आले तर करावे. जमलंच तर ठिकच आहे नाहीतर त्यांची मते त्यांच्याजवळ, आपली मते आपल्याजवळ असं म्हणून वादातून माघार घेतली जाते. (नास्तिकाकडून). आस्तिकाला माघार घेणे पसंद नसते. त्याच्या भावना जास्त तीव्र असतात. त्यामुळे तार्किक उत्तरे नाहीच जमली (जी जमत नाहीतच) तर 'आमची/माझी श्रद्धा आहे' असे म्हणून चर्चेला पूर्णविराम दिला जातो. निर्भया प्रकरणाच्या काळात अनिरुद्ध बापूंनी म्हंटले होते,' निर्भयाने अनिरुद्ध चालीसा वाचलं असतं तर तिच्यावर बलात्कार झाला नसता.' एव्हढच काय पण 'अनिरुद्ध चालीसा वाचूनही कोणी बलात्कार केलाच तर तो पुरुष नपुसंक होईल.' माझ्या एका अनिरुद्ध भक्त मित्राला हे सांगून यूट्यूब वरील त्यांचे भाषण ऐकवून जेंव्हा विचारलं तुला हे पटतं का? त्यावर तो गप्प बसला त्याच्याकडे उत्तर नव्हतं. पण आपलं कांही चुकतंय, आपण चुकीच्या ठिकाणी आपल्या श्रद्धा अर्पण करतो आहोत हे कबूल करायचे धाडस त्याच्यापाशी नव्हते, अजूनही नाही. तो उच्चशिक्षित आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर, एमबीए आहे. पण त्याने 'आमची श्रद्धा आहे' हे पूर्णविरामी वाक्य माझ्या तोंडावर फेकून पुढील चर्चेलाच बूच मारून ठेवलंय. अर्थात ह्या वादातून आमचे संबंध बिघडले वगैरे नाहीत. अजूनही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत पण जेंव्हा जेंव्हा भेटतो तेंव्हा त्याला माझी आणि मला त्याची मते माहित असल्यामुळे हा विषय टाळून बोलतो. अजूनही त्याची अनिरुद्ध भक्ती तितक्याच तीव्रतेने आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नास्तिकांना नेहमीच वाटते की चर्चा करून, उदाहरणे देऊन, स्वानुभव सांगूंन एखद्याचे मतपरिवर्तन करता आले तर करावे.
इथेच लादणे दिसते पेठकर काका. कोणी आस्तिक माणुस जर निमंत्रण देत असेल नास्तिकाला की या आणि माझ्या विचार्/मता ची चिकित्सा करा तर ठीक आहे. पण हे नास्तिक थेट चर्चा झाली च पाहीजे असे म्हणतात. तुमचेच उदाहरण बघाना, तुमचा मित्र संभ्रमात पडला होता का आणि तुमच्या कडे सल्ला मागायला आला होता का? नाही पण तुम्हीच त्याला प्रश्न विचारुन चर्चेला आव्हान देत आहात.

In reply to by प्रसाद१९७१

पेठकर काका तुमचा मित्र आस्तीक आहे क ते माहीत नाही पण जरा जगातल्या वेगवेगळ्या छटा पहा आणि ठरवा सगळयांना एकाच श्रेणीत ठेवायचे का ?
रूढार्थाने काही व्याख्या अशा करता येतील. देव - या विश्वाचा कारभार सहेतुकपणे चालविणारा कोणीतरी . आस्तिक- असा सहेतुकपणे चालविणारा नियंता मानवाप्रमाणेच मंगल अमंगलाच्या कल्पना बाळगून आहे व त्याचीच कृपा आपल्यावर असावी असे वाटणारे लोक. ( सगुण परमतत्व) अस्तिक नास्तिकाच्या मधले.- देव दिसला नाही तरी तो असू शकेल असे मानणारे सबब असलाच तर तो प्रसन्न व्हावा म्हणून धडपडणारे. नास्तिक- असा सहेतुकपणे जग चालविणारा कोणीही नाही. जग्॑ हे एक परस्परावलंबी संरचना आहे. तिला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर तिने मांडलेले स्प्ष्ट नियम पाळले पाहिजेत असे मानणारे लोक. हटवादी नास्तिक - यात देवळात काय जायचे? दगडाला काय नमस्कार करायचा ? पूजा कशाला करायची? असा पराकोटीचा व्यवहारवाद पाळणारे लोक. अध्यात्मवादी - नेहमीच्या अर्थाने - गुरू, अनुग्रह, जप, साधना, सप्ताह, पोथीवाचन, मंत्रजागर, संप्रदाय, पुनर्जन्म, ई त रमणारे कर्मकांडवादी- पूजा,कुळाचार, व्रतवैकल्ये, उद्यापने, उपासतापास, भोजने, पितरशान्ती, ई गोष्टी आदराने भीतीने वा आवडीने करणारे. वेगळा अध्यात्मवाद - बाह्य शक्ती उदा देव गुरू ई ई च्या कृपेच्या शोधात निघण्यापेक्षा आतल्या अवाजाच्या जवळ जाणे मी इथे कशासाठी आलो. त्यात कितपत गुंतायचे ? ममत्वाच्या लफड्यात कितपत पडायचे मी स्वतः ला कसे बघायचे व बोधायचे याचा अभ्यास .
संपूर्ण माहीती चौराकाकांच्या माहीती पूर्ण प्रतिसादातून : तुम्ही स्वतः च वरती कुठे तरी सांगीतले की, तत्व निष्ठा+कठोरता तुम्ही घरच्या सदस्यांबाबत तेवढी टोकाची दुराग्रहाची ठेवत नाहीत ( त्या वेळी त्यांचे मन राखणे, भावनांची बूज हा जास्ती महत्वाचा निकष असतो) तीच बाब सर्व जण सांगण्याचा प्रयत्न करतात तुमचा मित्र अध्यात्मवादी आहे आणि तुमच्या सांगण्याने त्याला काहीही फरक पडणार नाही. एखाद्याने नुसता देवाला किंवा जेष्ठ व्यक्तीला नमस्कार केल्याने काही ब्रम्हांड कोसळणार नाही. अर्थात त्याने दे रे हरी खाटल्यावरी असे करू नये (हाच फरक जुण्या खरोखरच्या संतांमध्ये आणि आत्ताच्या "संस्कार्/आस्था फेम निरमल बाबा/आसाराम यांच्यात आहे. साप समजून भुई धोपटू नये या करिता हा प्रतिसाद प्रपंच. सहजीवनात भावनांनाही व्यवहाराईतकेच महत्व आहे असे जाणणारा नाखु

In reply to by नाखु

>>>> तत्व निष्ठा+कठोरता तुम्ही घरच्या सदस्यांबाबत तेवढी टोकाची दुराग्रहाची ठेवत नाहीत ( त्या वेळी त्यांचे मन राखणे, भावनांची बूज हा जास्ती महत्वाचा निकष असतो) तीच बाब सर्व जण सांगण्याचा प्रयत्न करतात. इथे मित्राच्या बाबतीतही मी तोच निकष लावला आहे. त्याच्या अंधश्रद्धेमुळे मी त्याच्याशी मैत्री तोडलेली नाही. आम्ही अजूनही चांगले घनिष्ट मित्र आहोत. एव्हढ्या एका विषयात आमच्यात मतभिन्नता आहे हे दोघांनीही स्विकारले आहे. त्यामुळे घरच्या सदस्यांबाबत एक भूमिका आणि इतरांबाबत दूसरी भूमिका असा दुटप्पीपणा माझ्या वागण्यात नाहीये. दुर्दैवाने मी दिलेली लिंक कोणी उघडून पाहिलेली दिसत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

>>>>इथेच लादणे दिसते पेठकर काका. नाही. हे लादणे होऊ शकत नाही. मैत्रीत, विविध विषयांवर, चर्चा नेहमीच होत असतात, व्हाव्यात. वादे वादे जायते तत्व बोधः मैत्रीत आपण देशाच्या पंतप्रधानांपासून गल्लीतल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तींच्या वागण्यावर चर्चा करीत असतो. ह्या चर्चेतूनच आपले ज्ञान वाढत असते. नाहीतर ते तसेच पडून राहून गंजू लागेल. आपल्या धर्मातही चर्चेला, मतप्रदर्शनाला अडकाठी नाही म्हणून आपण विचारांनी लवचिक आहोत. मुसलमान धर्मात अशी परवानगी नसल्यामुळे त्यांची प्रगती खुंटली आहे. चर्चा करणे, उदाहरणे देणे, स्वानुभव सांगणे हे दोन्ही बाजूंनी होत असते. त्यात कोणी कोणावर आपले विचार लादत नसून ती समोरच्याचे विचार जाणण्याची प्रक्रिया आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

पण आपलं कांही चुकतंय, आपण चुकीच्या ठिकाणी आपल्या श्रद्धा अर्पण करतो आहोत हे कबूल करायचे धाडस त्याच्यापाशी नव्हते, अजूनही नाही. तो उच्चशिक्षित आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर, एमबीए आहे. पण त्याने 'आमची श्रद्धा आहे' हे पूर्णविरामी वाक्य माझ्या तोंडावर फेकून पुढील चर्चेलाच बूच मारून ठेवलंय.
यावरुन मला औषध उतारे आणि आशिर्वाद हे आठवले

निम्मी चर्चा तर प्रसादाच्या लाडू वरच चाललीये!! :D प्रसादाच लाडू तू का न्हाई खाल्ल, भक्तांच्या देवाला तू का र डावल्ल!! (चाल सांगायची गरज नसावी!)

श्री यनावाला ह्यांनी कुठेही त्यांच्या लेखात आस्तिक निर्बुद्ध आणि नास्तिक बुद्धीवान असे म्हंटल्याचे मला जाणवले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार आस्तिक आणि नास्तिक मध्ये भावनेने विचार करण्याचा आणि भावनेला बाजूला ठेवून मेंदूने विचार करण्याचा फरक आहे. >>>> आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. ह्या मध्ये, 'तुम्हा सर्वांना बुद्धी आहेच फक्त त्यावर भावना नियंत्रण ठेवते आहे म्हणून कांही गोष्टी तुम्हाला समजू शकत नाहित' असे ते म्हणताहेत. म्हणजेच आस्तिकांनाही बुद्धी असल्याचेच त्यांचे म्हणणे आहे. आस्तिकांना त्यांनी निर्बुद्ध म्हंटलेले नाही. बरं, आस्तिकांचे वागणे कसे होते? " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." म्हणजे पाहा. संवादाला सुरुवात आस्तिकांनी केली. नास्तिकाने नाही. त्यांना 'अहंकारी' ही संज्ञा आस्तिकांनीच दिली. नास्तिकाचे वागणे पटले नसल्याचे, कारण नसताना, एका आस्तिकानेच बोलून दाखविले. प्रसादाचा लाडू नाकारण्याचा निषेध करून त्याचे दुष्परीणाम भोगायला लागण्याची गर्भित सूचनाही आस्तिकाने दिली. आस्तिकानेच नासक्या आंब्याची उपमा नास्तिकाला दिली. जो सहप्रवासी स्वखर्चाने आणि आयोजकाच्या विनंती नुसार आला आहे त्याला 'तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते' असे अवमानकारक बोलणेही आस्तिकाचेच. गप्प बसा. खूप ऐकले तुमचे. हे कांही अधिकार नसताही एखाद्याला रागे भरणे आस्तिकाचेच. एव्हढे होऊनही नास्तिक स्वतःला बुद्धीवादी समजतात. आस्तिकांना निर्बुद्ध समजतात. आस्तिकांच्या भावना दुखावतात वगैरे वगैरे आरोप हे निखालस खोटे आणि असहिष्णूतेचे आहेत. चर्चा जरूर करावी. त्यासाठीच हा धागा आहे. पण तारतम्य सोडून लेखन करू नये. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

लेख आणि त्यावरचे सगळे प्रतिसाद वाचताना नेमके हेच जाणवत होते. यनावालांची भाषा सौम्य, जे घडले ते काही अतिशयोक्ति न करता वर्णन करणारी, तिरकसपणा टाळलेली अशी होती. त्यांनी कुणावरही असले आरोप केलेले दिसले नाहीत. उलट कित्येक विरोधी प्रतिसाद हे थेट आरोप करणारे, टिंगलटवाळी टोंमणे वापरलेले, आक्रमक असे होते. नेहमीच दिसते की आस्तिकांच्या श्रद्धा ह्या समूहाने किंवा कधीकधी झुंडीने प्रगट होणार्‍या, समूहाचे मानसशास्त्र बाळगणार्‍या असतात. विरोधी विचारांच्या अल्पसंख्यांना त्रास होईल इतपत विज़िबिलिटी असणार्‍या असतात. शिवाय आपल्या श्रद्धांचा आवाजी प्रसार करणार्‍या, कसली तरी भीती अथवा कसले तरी आमिष दाखवून कळपात ओढू पाहाणार्‍या असतात. नास्तिकांचा गट असू शकतो पण त्याची झुंड बनत नाही कारण विवेक हेच त्यांचे अधिष्ठान असते. सध्या ते अल्पसंख्य आहेत म्हणून दबून राहातात असेही नाही. त्यांची बहुसंख्या झाली तरी त्यांच्या सामाजिक वर्तनात फरक पडत नाही. कारण एकच, विवेक, सदसद् विवेक. जे चैतन्य विश्वात दिसते, ते आहे, इतके म्हणणे पुरेसे आहे. त्याला लोटांगण घालण्याची जरूरी नाही हे पिरांचे वाक्य अगदी मार्मिक आहे. पिरा, प्रभाकर पेठकर, मराठी कथालेखक यांचे प्रतिसाद विशेष आवडले.

In reply to by राही

नास्तिकांचा गट असू शकतो पण त्याची झुंड बनत नाही कारण विवेक हेच त्यांचे अधिष्ठान असते. सध्या ते अल्पसंख्य आहेत म्हणून दबून राहातात असेही नाही. त्यांची बहुसंख्या झाली तरी त्यांच्या सामाजिक वर्तनात फरक पडत नाही. कारण एकच, विवेक, सदसद् विवेक.
बाकी चालू द्या. सदसद्विवेक ही व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. त्याचा अस्तिकतेशी किंवा नास्तिकतेशी काहीही संबंध नाही. असो. यावर अधिक न बोलणे उत्तम.

In reply to by प्रभाकर पेठकर

हि एका नास्तिकाने कथन केलेली घटना आहे. याचा अर्थ हि नास्तिकाने मांडलेली आपली बाजू आहे असं मला वाटतं. हि घटना अशीच्या अशी घडली असं गृहीत धरून नास्तिक कसे आणि आस्तिक कसे (वागले किंवा वागतात) हे मांडणंच मुळी चुकीचं वाटतं. त्या घटनेतला एखादा आस्तिक बाजू मांडायला असता तर जमला असता हा तिय्या! बाकी निर्बुद्ध नव्हतं म्हणायचं तर "पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते" यातून नेमकं काय म्हणायचं होतं. नास्तिकांना (सगळ्या नसलं तरी यनावाला यांसारखे काही) अभिप्रेत असलेले आस्तिक लोक बुद्धी लावून श्रद्धेने लिप्त होत नाहीत तर बुद्धी न लावता श्रद्धेने लिप्त होतात असं? याबद्दल नास्तिकांना काही अडचण असण्याचं कारण नसावं असे मज पामरास वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

"पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते"
याचा अर्थ मनात श्रद्धा असेल तर तुम्ही त्या बाबतीत सारासार विचार करत नाही. हे काही फक्त देवाच्या बाबतीतच नव्हे, तर जर तुम्ही एखादी गोष्ट श्रद्धेने मानली की तुम्ही त्या बाबतीत चिकित्सा करणे सोडून देता. अगदी साधे उदा. पहा - तुमचा एक मित्र आहे जो तुम्हाला शेअर बाजाराच्या टिप्स देतो, त्या टिप्स खर्‍या ठरतात, असे समजा. जर तसे झाले तर तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्याअ टिप्सची चिकित्सा कराल का? अगदी उद्या त्याच्या टिपच्या विरुद्ध बाजार जाताना दिसला तरी देखील तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेऊन व्यवहार कराल. पण हेच जर तुमची श्रद्धा नसेल, आणि तुम्ही त्याच्या टिपचा डोळसपणे स्वीकार करत असाल, तर मात्र तुम्ही ती टिप तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहाल, कआचित तुम्हाला पटेल, कदाचित नाही. म्हणूनच जिथे श्रद्धा आहे, तिथे बुद्धी नाही. हे अगदी मी आस्तिक असलो तरी देखील मान्य करेन. जिथे मला बुद्धी लावता येते, तिथे मी बुद्धी लावेनच. श्रद्धा ठेवण्यापूर्वी सगळी शक्य असलेली चिकित्सा करीन, पण नंतर बुद्धीचा वापर कमी, असलाच तरी तो समोरच्या व्यक्तीचे म्हणणे खरे आहे की खोटे आहे हे शोधायला होणार नाही, तर समोरच्या व्यक्तीला नेमके काय अभिप्रेत आहे हे शोधायला होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

कृपया त्यांचे सर्व लेख वाचा. इथेच त्यांच्या लेखांची यादी दिलेली आहे. त्या लेखांचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की जे नास्तिक असतात तेच बुद्धिवादी असतात आणि बहुतेक सर्व बुद्धिवादी नास्तिक असतात. देवाला मानणे हि एक मूर्खपणाची गोष्ट आहे, एवढेच नव्हे तर या ठिकाणी ते लिहितात "आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते." यातच पुढे लिहितात "जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो." त्यांचा हा लेख तर वाचाच. मंत्रांचा वापर कसा करून बघताहेत ते वाचून करमणूक होईल. बादरायण संबंध कसा लावलाय ते बघा. आता एखाद्याला एक मंत्र म्हणून बरं वाटत असेल तर केवळ तो मंत्र आहे म्हणून ते चुकीचं आहे? माझी मुलगी अगदी लहान असल्यापासून रात्री झोपताना रडायची. काही केल्या थांबायची नाही. डॉक्टरनी पण सांगितलं होतं की तिला शारीरिक तसा काही त्रास नाहीये. विविध प्रयोगांचा एक भाग म्हणून एकदा रामरक्षा लावली तर अक्षरशः ५ मिनटात झोपली. नंतर तिला काय कळतंय म्हणून दुसरी (विविध चालींची) गाणी लावली तर ते नको होतं तिला. फक्त रामरक्षाच ऐकून झोपायची. आता याचं काही बुद्धिवादी स्पष्टीकरण आहे का? मग आता या ठिकाणी एखादा नास्तिक असता तर म्हनला असता का की मुलगी कितीही रडली तरी चालेल पण असले मंत्र वगैरे लावायचे नाहीत? आपण कुठले अनुभव सांगितले की तुम्ही विश्लेषण करा, आपलं म्हणणं मांडल तर त्याला ते उत्तर देतच नाहीत कारण ते त्यांच्या समजूतीविरोधात आहे. एवढेच कशाला, प्रतिसादातला आपल्याला अनुकूल भाग घेवून उत्तरं देतात. पाहिजे तर तुम्ही एकदा प्रयोग करून बघा. असो. ज्याचा त्याचा देव ज्याच्या त्याच्या जवळ, तुम्ही मानलं तरी किंवा नाही मानलं तरी.

विचारप्रवर्तक लेख ... शुभ- अशुभ, पवित्र-अपवित्र .. या प्रकारांच आपल्याकडे अति अवडंबर माजवले जाते असं मलाही वाटतं . त्यातही पायगुण हा प्रकार अति भयंकर . त्या पायी कित्येक निषपाप मुलींचे आयुष्य इध्वस्तं झाले असेल याला गणतीच नाही. देवळात गेल्यावर मी देवापुढे हात जोडते, अंगारा लावून घेते . असं म्हणतात ना .. व्हेन इन रोम.. डु अ‍ॅज रोमन्स डु . पण मी असे केले नाही तर आकाश कोसळेल असं मला वाटत नाही. एक कथा आठवते.... मुसळधार पाऊस पडत असतो. सगळ गाव पाण्याखाली बुडलेले असते. टेकडीवरच्या देवळात काही जीव वाचवून आश्रयाला आलेले असतात. त्यात पुजारी, जमिनदार, गुरूदेव, डॉक्टर असे प्रथितयश असतात. त्यात एक स्त्री असते. समाजात मान्यता नसलेली, वाळीत टाकलेली आणि तिरस्करणीय. पावसाचा जोर वाढतच असतो. विजा चमकत असतात. देवळाच्या अगदी माथ्यावर. लोक जीव मुठीत धरून बसलेले. ती वीज कधीही पडेल असे वाटत असते, पण पडत नसते. धर्मगुरूला लोक याचा अर्थ विचारतात. ते सागतात, आपल्यात कुणीतरी पापी आहे. त्याला घेऊन जाण्यासाठी वीज येते, परंतु काही पुण्यात्मांच्यामुळे परत जाते. मग ते सांगतात ,, प्रत्येकाने काही काळासाठी देवळाचा आश्रय सोडून अंगणात जायचे. जो पापी असेल त्याच्यावर वीज पडेल. आणि बाकीचे वाचतील. प्रथम जायचे कुणी. मग त्यांनी प्रत्येकाचा क्रमांक ठरवला. प्रत्येकजण आपल्या पापपुण्याची मनात उजळणी करत होते. ती बाई मात्रं एका कोपर्‍यात शांत बसलेली. एकेकजण बाहेर जाऊन परत येत. येताना त्यांचा चेहरा उजळलेला असे. आता फक्त ती स्त्री राहीली होती जायची. सगळे तीच्यावर तोंडसुख घेत होते. हीच्यामुळे.. हीच्यामुळे.... ती उठली . देव्हार्‍याकडे पाहून हात जोडले. मग तेथल्या प्रथिष्ठितांना अभिवादन केले, आणि पायर्‍या उतरू लागली. आता वीजांचा जोर फारच वाढला. सारा अंधारलेला परिसर वीजांच्या प्रकाशात उजळलेला. मग जोरात कानठळ्या बसणारा आवाज झाला आणि आकाशातली वीज जमिनीवर झेपावली. दुसर्‍यादिवशी पाउस ओसरला , उबदार सूर्यकिरणे पसरली. आणि आपले ओले कपडे सावरत ती स्त्री टेकडी उतरू लागली. उध्वस्त झालेले देऊळ परत बांधायचा मनोमन निश्चय करीत...

स्वत: पूर्ण आस्तिक असलो तरी अनुभव कथन आवडले.

http://www.misalpav.com/user/91/authored इथे मिसळपाव वर यनावालांचे अन्य लेख असले तरी त्यांनी आंतरजालावर प्रचंड लेखन केलेले आहे. उपक्रम या संकेतस्थळावर त्यांचे भरपूर लेखन आहे तिथे त्यांनी तर्कक्रिडा ही मालिका चालवली होती. यनावाला हे कठोर नास्तिक म्हणून बुद्धीवादी वर्तुळात प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेखनातील काही लिंक खाली देत आहे वाचून दमाल.पण त्यातून त्यांची शैली व विचार यांचा परिचय होईल. या पार्श्वभूमीवर मग प्रतिक्रिया दिल्यास ते उचित ठरेल. अंगारकी चतुर्थी http://mr.upakram.org/node/3844 गॅस गणराज http://mr.upakram.org/node/3941 गुरुविण कोण लावितो वाट http://mr.upakram.org/node/3789 विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात http://mr.upakram.org/node/3719 कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प http://mr.upakram.org/node/3665 नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०) http://mr.upakram.org/node/3645 त्या मोरयाची कृपा http://mr.upakram.org/node/3597 महाकाव्याचा विषय http://mr.upakram.org/node/3579 ज्ञानेश्वरील अकरा ओव्या http://mr.upakram.org/node/3526 चालविली भिंती मृत्तिकेची http://mr.upakram.org/node/3474 बुद्धीदाता http://mr.upakram.org/node/3379 अध्यात्मिक प्रवचन http://mr.upakram.org/node/3356 बिनडोकपणाचा कळस http://mr.upakram.org/node/3362 देव धर्म आणि गाजरचित्रे http://mr.upakram.org/node/3323 उदकी अभंग रक्षिले http://mr.upakram.org/node/3313 अशी एक शक्यता केवळ तर्क http://mr.upakram.org/node/3276 भयसूचक बातमी http://mr.upakram.org/node/3216 चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश http://mr.upakram.org/node/3161 ईश्वरे तृणे करुन रक्षण केले http://mr.upakram.org/node/2928 यात आश्चर्य ते काय? http://mr.upakram.org/node/2883 हा खेळ बाहुल्यांचा http://mr.upakram.org/node/2820 गूढ आश्चर्यकारक अनुभव http://mr.upakram.org/node/2525 कार्यकारण भाव http://mr.upakram.org/node/2503 विवेकवादी लेखनावर आक्षेप http://mr.upakram.org/node/2580 भ्रमाचा भोपळा http://mr.upakram.org/node/2388 सामान्य समज (कॉमनसेन्स) http://mr.upakram.org/node/2450

In reply to by प्रकाश घाटपांडे

@ प्रकाश घाटपांडे ............ धन्यवाद प्रकाशजी ! अनेक लेखांचे दुवे (लिंक्स्) असे एकाच प्रतिसादात द्यायचे मला जमले नसते. आधी हे सगळे लेख शोधून काढायचे म्हणजे कठिणच. त्यांतील "बिनडोकपणाचा कळस " हा लेख माझा नाही.तो श्री.प्रभाकर नानावटी यांचा आहे. तुम्ही उल्लेख केला त्या तर्कक्रीडा कोड्यांचे उपक्रमच्या सदस्यांनी चांगले स्वागत केले. डॉ.धनंजय यांनी बहुतेक कोडी अचूक सोडवली. असो.पुनश्च धन्यवाद !.. यनावाला.

In reply to by यनावाला

त्यांतील "बिनडोकपणाचा कळस " हा लेख माझा नाही.तो श्री.प्रभाकर नानावटी यांचा आहे. होय.नजरचुकीने झाले.

इतके रेफरन्सेस दिल्यावर, आता या धाग्याची वाचनखुण साठवलीच पाहिजे.

ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे.जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी.
वेळ आली कि ते हि होईल . काळजी नसावी . माज उतरेल
देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही.
कर्म करताना लोकांना अडवण हे देवाचं काम नाहीये . आपल्या जबाबदारीवर चांगली वैईत कर्म प्रत्येकाने करावीत . देवाचं काम कर्मांची फळ देण्याचं आहे .
देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय?
फक्त गाडीतून देवदर्शनाला जाणारी माणस देवभक्त असतात हा भयानक मोठा गैरसमज आहे . तुमची कर्म वाईट . देवाला दाखवण्यासाठी मात्र देवदर्शनाला जायचं. मग तुम्हाला अपघातातून वाचवायला देव काय तुमच्या बापाचा नोकर आहे ? एखादी चांगली गोष्ट झाली कि देवाच्या कृपेने झाली असं आपल्याला म्हणता येत नसेल तर वाईट गोष्ट घडल्यावर सुधा देवाच्या कोपामुळे झाली असं म्हणण्याचा अधिकार कुणाला नाही . सात्यानारायानाच्या पूजेबद्दल माझ्या पण मनात संभ्रम आहे . पण हि पूजा करताना आधी गणेश , भूमी , विष्णू , नवग्रहांची पूजा सुधा करतात . म्हणून आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो . देव विनाकारण तुमचा अपमान करत नाही . मग तुम्हालाही देवाचा अपमान करण्याचा हक्क नाही

In reply to by तुडतुडी

मला इन जनरलच एक प्रश्न पडलाय. ताईंच्या प्रतिसादाने तो उफाळुन आला!
देव विनाकारण तुमचा अपमान करत नाही . मग तुम्हालाही देवाचा अपमान करण्याचा हक्क नाही
नास्तिकाने देवाबद्दल जे प्रश्न पडतात (आणि ज्यामुळेच त्याला नास्तिकता जास्त सुसंगत पर्याय वाटत असतो) ते विचारले तर तो आस्तिकांना देवाचा अपमान का वाटतो? देवाच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करायला नक्की काय हरकत आहे? कुणी संयत भाषेत प्रश्न विचारत असेल, अक्कल काढत नसेल आणि प्रामाणिकपणे विचारत असेल तर नक्की आक्षेप कशाला असतो? आणि त्याला माज का म्हणतात?

In reply to by पिलीयन रायडर

अहो पिरा असं काय करताय... (मिपावर अस्तित्वात असलेल्या समस्त पाटीलांची माफी मागून) गावात एखादा नवीन माणूस /अधिकारी आला आणि त्याने पाटलांच्या वाड्यावर रितसर हजेरी लावली नाही आणि उलट "का जायचे आहे ? कशासाठी ?" असे अगदी नम्रपणे जरी विचारले तरी पाटलाच्या चेल्यांना वाटतेच ना की "लईच माज दिसतोय याला, पण पाटील लवकरच माज उतरवतील याचा मग कळेल" इथे तर आपण ईश्वराचे अस्तित्व नाकारतोय मग भले आपण कितीही सभ्य भाषेत बोलत असलो तरी लोकांची डोकी भडकणारच हो..

In reply to by तुडतुडी

एखादी चांगली गोष्ट झाली कि देवाच्या कृपेने झाली असं आपल्याला म्हणता येत नसेल तर वाईट गोष्ट घडल्यावर सुधा देवाच्या कोपामुळे झाली असं म्हणण्याचा अधिकार कुणाला नाही .
याचा अर्थ असा घ्यायचा का कि जो चांगल्या गोष्टीचे क्रेडिट देवाला देतो त्यालाच वाईट गोष्टींचे बदक्रेडिट देवाला देण्याचा अधिकार आहे इतरांना नाही.
फक्त गाडीतून देवदर्शनाला जाणारी माणस देवभक्त असतात हा भयानक मोठा गैरसमज आहे
खर आहे. देवळात जाणारे सगळेच भक्त वा सश्रद्ध अस्तिक असतात असे नाही. दरोडा घालणारा दरोडेखोर देखील माझा दरोडा यशस्वी होउ देत से देवाला साकडे घालत असतो. तसे तपास करणारा पोलिस देखील माझा तपास यशस्वी होउ दे असे देवाला साकडे घालतो. खर तर ईश्वर ही संकल्पना म्हणजे सर्वसामान्यांचा स्वस्तातला सायकियाट्रिस्ट/ सायकोथेरपीस्ट/कौन्सिलर आहे. तो निर्गुण निराकार ही आहे सगुण साकार ही आहे भक्तवत्सल करुणाघन ही आहे.जळी स्थळी काष्ठी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र आहे. ईश्वर हा आपल्या हृदयात आहे याचा अर्थ त्याचे स्थान आपल्या मेंदूत आहे असा आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>>>देवळात जाणारे सगळेच भक्त वा सश्रद्ध अस्तिक असतात असे नाही. दरोडा घालणारा दरोडेखोर देखील माझा दरोडा यशस्वी होउ देत से देवाला साकडे घालत असतो. तसे तपास करणारा पोलिस देखील माझा तपास यशस्वी होउ दे असे देवाला साकडे घालतो. दरोडेखोर आणि पोलीस दोघेही श्रद्धेनेच देवाकडे येत असतात. ते भक्त वा आस्तिक असतातच. भलेही त्यांची कार्ये एकमेकांविरुद्ध असू देत. पण म्हणून त्यांची देवावरील श्रद्धा-भक्ती कमी कशी होते?

In reply to by प्रभाकर पेठकर

१) देवळात जाणारे सगळेच भक्त वा सश्रद्ध अस्तिक असतात असे नाही. २)दरोडा घालणारा दरोडेखोर देखील माझा दरोडा यशस्वी होउ देत से देवाला साकडे घालत असतो. तसे तपास करणारा पोलिस देखील माझा तपास यशस्वी होउ दे असे देवाला साकडे घालतो दोन वेगळे मुद्दे आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

तुमचा मुद्दा नीट कळला नाही. देवळात जाणारे सगळेच सश्रद्ध आस्तिक असतात असे नाही. असे विधान केल्यानंतर देवळात जाणार्‍या अश्रद्ध नास्तिक माणसाचे उदाहरण यायला हवे होते. जसे, तिथला सफाई कामगार किंव माझ्यासारखा (स्वतःच्या) पत्नी बरोबर फक्त तिचे मन राखण्यासाठी जाणारा नवरा. पण जो देवळात जाऊन देवाकडे कांही मागणे मागतो त्याचा देवावर विश्वास असतो आणि तो सश्रद्ध आस्तिकच असतो. दरोडेखोर आणि पोलीस देवाकडे कांही मागणे मागत आहेत आणि ते पूरे व्हावे अशी मनोकामना व्यक्त करीत आहेत तेंव्हा तेही सश्रद्धच झाले. 'देवळात जाणारे सगळेच सश्रद्ध आस्तिक नसतात' ह्या विधानाला बळकटी देऊ शकत नाहीत.

In reply to by प्रभाकर पेठकर

जत्रेत जसे हौशे गवशे नवशे असतात तसेच देवळात जाणारेही असू शकतात एवढाच मुद्दा आहे तो. ते तुम्हाला पटेल असे सिद्ध करण्याची बौद्धीक क्षमता माझ्यात नाही. त्या माझ्या मर्यादा समजाव्यात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>>>> ते तुम्हाला पटेल असे सिद्ध करण्याची बौद्धीक क्षमता माझ्यात नाही. अहो घाटपांडे साहेब, भलतेच काय? तुम्हाला काय मी आज ओळखतो का? तुमचे अनेक लेख/प्रतिसाद वाचले आहेत मला पटले आहेत. ज्योतिष, अंधश्रद्धा ह्यावरील तुमच्या अभ्यासपूर्ण लेखनाचा मी चाहता आहे. मला लाज वाटेल अशी वाक्ये पेरू नका. मनाला क्लेष होतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

:) अहो हल्ली टंकलेखनाचा त्रास होतो व या विषयाच्या मंत्रचळाची भीती वाटते म्हणून मी असे विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो.

In reply to by तुडतुडी

प्रतिसादात वापरलेली भाषा अत्यंत चुकीची आहे. त्याकरता, मनःपुर्वक निषेध व्यक्त करतो.

In reply to by मराठी कथालेखक

+१ संयत प्रतिसाद दिला तरी आपले म्हणणे मांडता येईलच.प्रत्येक वेळी कोणाच्या तरी अंगावर धावुन गेल्यासारखे प्रतिसाद दिले की आपले म्हणणे खरे ठरते असे वाटते का तुडतुडी?

नावाला हे कठोर नास्तिक म्हणून बुद्धीवादी वर्तुळात प्रसिद्ध आहेत.
म्हणजे आस्तिक निर्बुद्ध असतात ? खिक . ह्यालाच माज म्हणतात . जितकी बुद्धी जास्त तितका माज, अहंकार , दुसर्याला तुछ लेखण्याची वृत्ती जास्त असा ह्याचा अर्थ असेल तर अश्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी

In reply to by तुडतुडी

नास्तिकाने आपण नास्तिक असल्याची जाहिरात का करावी? आस्तिक करतो म्हणुन? जगाचे लक्ष वेधावे म्हणुन? ताई, सयंमी प्रतिसाद हवा होता.

नास्तिकाने देवाबद्दल जे प्रश्न पडतात (आणि ज्यामुळेच त्याला नास्तिकता जास्त सुसंगत पर्याय वाटत असतो) ते विचारले तर तो आस्तिकांना देवाचा अपमान का वाटतो? देवाच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करायला नक्की काय हरकत आहे?
नास्तिकाने दुसर्‍या नास्तिकाशी हे प्रश्न विचारुन चर्चा करावी. आस्तिकालाच हा प्रश्न विचारायला का जावे? आस्तिक आमंत्रण करतोय का ही माझ्या विचारांची चिकित्सा करा म्हणुन? एक उदाहरण गे लोकांनी त्यांना गे संबंध ठेवायचे असतील तर ठेवावेत, पण स्ट्रेट लोकांना तुमचे संबंध कसे चुकीचे आहेत हे का सांगावे. हेच उदाहरण तुम्ही उलटे करुन पण वापरु शकता. प्रश्न इतकाच आहे की नास्तिकांना दुसर्‍यांची मतांची चिकीत्सा त्यांच्या बरोबर च ( हे महत्वाचे आहे ) करण्याची परवानगी कोणी दिली. काय हवे ते नास्तिक क्लब काढावेत आणि यथेच्छ चिकीत्सा करावी आपापसात.

In reply to by प्रसाद१९७१

नास्तिकाने दुसर्‍या नास्तिकाशी हे प्रश्न विचारुन चर्चा करावी. आस्तिकालाच हा प्रश्न विचारायला का जावे? आस्तिक आमंत्रण करतोय का ही माझ्या विचारांची चिकित्सा करा म्हणुन?
मला वाटतंय पहिली खोड अनेकदा असिकच काढतात , सहसा हा संवाद (की वाद ?) "तुम्ही मंदिराच्या आत का येत नाहीत ?" असा सुरु होतो. "मी नास्तिक आहे" इतक्या छोट्या आणि स्पष्ट उत्तराने त्यांचे समाधान होत नाही. मग "कधीच जात नाही का ? कुठेच श्रध्दा ठेवत नाही का ? कुठेतरी ठेवायला हवी" ई ई पुराण चालू होते. मग इतके आमंत्रण दिल्यावर नास्तिक कशाला माघार घेतोय ... वरील लेखातही "तुम्ही प्रसाद का घेत नाही" म्हणत अस्तिकानेच सुरुवात केली. भक्तिभावाने दर्शन घेतानाही त्यांचे लक्ष बाजूचा काय करतोय याकडे होतेच..आणि तो चुकीचा वागत असेल तरी देव काय ते पाहून घेईल असा विश्वास पण नाही म्हणून स्वतःच मैदानात उतरला ...असो.

आता इतका वादविवाद झाला, आणि आपापला प्रतिसाद तर्कावर आधारलेला आहे असा बहुतेक सर्व प्रतिसादकांचा प्रामाणिक दावा असणारच... आणि म्हणुनच एक शास्त्रिय व सारासारवादी प्रश्न उपस्थित करणे आवश्यक वाटते. तो असा... ( ;) ) लेखक स्वघोषित आणि इतरांनाही पूर्वीपासून माहीत असलेले नास्तिक आहेत. त्यांनी आपले (पक्षी नास्तिकाचे) म्हणणे या लेखात लिहीलेले आहे. पण, आस्तिक काय म्हणाले हे पण त्यांनीच लिहीले आहे. म्हणजे दोन्ही बाजू एकाच बाजूच्या व्यक्तीने लिहील्या आहेत. म्हणजे केवळ हा लेख इतके मटेरियल शास्त्रिय व सारासारवादी वादविवादासाठी पुरेसे नाही. कारण, संभाषणातील एखादा शब्द लेख लिहिताना इकडे-तिकडे झाला (?केला) असला तर संपूर्ण वाक्याचा अर्थ बदलू शकतो. अर्थात, यनावालांना त्यांचा मुद्दा खरोखरच सिद्ध करायचा असेल तर त्यांनी त्या प्रसंगातल्या इतर लोकांपैकी कोणा एक/अनेकांना तोच प्रसंग त्यांच्या शब्दात लिहायला सांगितला पाहिजे. अन्यथा हे त्या प्रसंगाचे एकांगी आणि म्हणून शास्त्रिय वादाला योग्य नसलेले वर्णन होईल... किंवा साध्या मराठीत, "बाजारात तुरी...." सारखे ! बोला, यनावाला सर, काय म्हणता ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यनावालांसारख्या बुद्धिवादी माणसाला असं कसं वाटलं की मिपा वरची मंडळी पुरावा दिल्याशिवाय आपलं म्हणणं मान्य करतील? पण आश्चर्याची गोष्ट अशी की बाकीच्या नास्तिक बुद्धिवादी लोकांनी पुरावा मागितलाच नाही. गम्मत आहे! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आस्तिक काय म्हणाले हे पण त्यांनीच लिहीले आहे. म्हणजे दोन्ही बाजू एकाच बाजूच्या व्यक्तीने लिहील्या आहेत
+११११११११. अगदी सहमत. मी पण हेच मत वर माडले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टर साहेब, मिपावर जेव्हढे म्हणून स्वानुभव कथन आहे (मिपाचे कट्टे वगळता) ते सर्व त्या त्या सदस्याच्या शब्दातच आले आहे. (जिथे जिथे आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ कांही लिंक देणं शक्य असतं ते वगळता) म्हणजे एकतर्फीच आहे. तिथे तिथे आपण मुद्देसुद वाद घातले आहेतच. आत्ताच इथे वेगळा न्याय का? हाच मुद्दा पुढे न्यायचा म्हंटल्यास त्या घटनेत कोणी मिपाकर (आस्तिक मिपाकर) नव्हते मग अशा वेळी अनुभव शेअर करायचा असेल तर मिपाकराने काय करावे? एक मार्ग म्हणजे, मिपाकराने सर्व संभाषण रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकून इथे लिंक दिली पाहिजे. अशी अट सध्यातरी अस्तित्वात नाही. हे कोर्ट नाही. मित्रमंडळींचे चर्चास्थान आहे. त्यामुळे धागाकर्त्याने कथन केलेला प्रसंग तसाच असणार ह्या गृहितकावरच आजपर्यंतच्या सर्व चर्चा, काथ्याकुट आधारीत आहेत. यनावाला ह्यांच्यासाठी वेगळा न्याय का?

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब, आपल्याबरोबर चर्चा करण्या मजा येते, आपल्या विचारांचा आदर आहे आणि ते आवडतात हे काही पहिल्यांदा सांगत आहे असे नाही. म्हणूनच केवळ गैरसमज टाळण्यासाठी हा प्रतिसाद लिहिला आहे... आणि तो या लेखाशी संबंधित असल्याने, सगळ्यांसाठीही आहे, त्यामुळे इथेच लिहिला आहे. प्रथम म्हणजे मी आस्तिक किंवा नास्तिक यांची कोणाचीच बाजू घेत नाही. कारण मी दोन्ही नाही तर "अज्ञेयवादी" आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे विचार ऐकण्यात मला रस असतो... कारण "देव आहे की नाही ?" हा अनादी प्रश्न अजून अनुत्तरीत आहे आणि कोणाकडूनही काही ज्ञानवर्धन झाले तर ते मला हवेच आहे. मात्र एक गोष्ट नक्की की, देव म्हणजे कोणी "हिशेब ठेवून त्याप्रमाणे शासन अथवा प्रमोशन देणारी यंत्रणा किंवा लालूच दाखवून (नवस, इ) आपले काम करवून घेऊ शकतो अशी यंत्रणा" नाही. देवाच्या नावाखाली जे रुढी-प्रथांचे अवडंबर बनवले गेले आहे त्यात माझा अजिबात विश्वास नाही, ती मानवी स्वभावाचा फायदा घेऊन स्वतःचे हितसंबंध साधण्यासाठी केलेली मानवी व्यवस्था आहे असे मी मानतो. परंतू त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही, किंबहुना अश्या प्रकारात नमस्कार करून प्रसाद खाण्यास व त्या माणसाचे समाधान वाढवण्यात माझी ना नसते. असो. इतक्या जरूर असलेल्या प्रस्तावनेनंतर मुख्य मुद्द्यावर वळूया... लेखकने धागा मुद्दा समंजसपणे आणि शास्त्रिय पद्धतिने विचार करून लिहिला आहे असा आभास निर्माण केला आहे असे म्हणायला वाव आहे. ते का ? तर त्याची कारणे अशी आहेतः १. बाविस नास्तिक व एक आस्तिक (लेखक) यांचे हे संभाषण आहे. यात एक नास्तिक (लेखक) सगळे अगदी समंजसपणे, एकही चुकीचा शब्द न वापरता बोलतो आहे. हे सगळे एकतर लिहून काढलेल्या वाक्यांचे पाठांतर करून (उदा: नाटकातले उतारे) अथवा अगदी उत्तम प्रतीच्या वादविवादपटूच्या तोंडून नैसर्गिकपणे वेचक वाक्ये यावी तसे वाटते. इथल्या वादासाठी व लेखकावर अन्याय नको म्हणून आपण त्याच्यामध्ये दुसर्‍या प्रकारचे कसब आहे असा संशयाचा फायदा त्याला देऊया. २. मात्र, एकूण २२ आस्तिकांपैकी बोलणारे सगळेच असमंजस आणि असहिष्णू बोलत आहेत, एकाही आस्तिकाला "प्रत्येकाला आचार-विचाराचे व त्याप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे" असे किंवा तत्सम बोलल्याचे लेखात लिहिलेले नाही. बावीस आस्तिकांत एकही समंजस, समतोल आणि सहिष्णू व्यक्ती नसावी आणि असल्यास तिने एकही समंजस शब्द उच्चारू नये, हे काही पचनी पडत नाही, बुवा ! आणि मग लेखनाला एकांगी म्हटले तर फारसे वावगे होणार नाही... आणि म्हणूनच मी "लेख विश्वासू होण्यासाठी" आस्तिकांची बाजू त्यांच्यापैकी कोणीतरी मांडायला पाहिजे असे म्हटले होते. ३. इतर २२ जणांत एखादा नास्तिक असू शकतो. तशी स्पष्ट विचारणा केल्याचे लेखकाने लिहिले नाही. तर मग तो नव्हताच हे गृहितक समंजस व शास्त्रिय विचार करणार्‍या लेखकाने लेखाच्या शीर्षकात लिहिण्याइतके महत्वाचे का मानले? हा प्रश्नही उरतोच ! थोडक्यात, लेख एकांगी आणि काही विशिष्ट हेतूने लिहिलेला आहे असे म्हणण्याला वाव आहे... त्याची खालील इतर काही कारणे यनावालांच्या या व इतर धाग्यांवरील (माझ्या नव्हे, इतरांच्या) प्रतिसादांत नोंदलेली आढळतील : १. यनावाला धागा/काडी टाकून गायब होतात. २. फारतर कोणाच्यातरी फक्त त्यांच्या बाजूच्या एखाद्या मुद्द्याची वाहवा करतात व विरोधी मुद्द्यांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात. ३. स्वतःच्या विधानांचे स्पष्टीकरण करण्याकडे त्यांचे तितकेसे लक्ष दिसत नाही. उलट इतरांमध्ये होणार्‍या उलटसुलट वादविवादाची मजा बघण्यात त्यांना जास्त मजा येते असे वरील मुद्दा २ मधील कृतीतून दिसते असे म्हणायला वाव आहे. यनावालांचे धागे व प्रतिसांद डोळ्याखालून घातले तर वरच्या निरिक्षणांमध्ये अर्थ आहे असे दिसते. आता माझा प्रतिसाद वरच्या पार्श्वभूमीवर बघितलात तर तुमच्या ध्यानात येईल की माझा प्रतिसाद तुमच्यासाठी किंवा तुमच्यासारख्या इतर समंजस व समतोल प्रतिसादकांसाठी नव्हता, तर परखड शास्त्रिय भूमिका मांडण्याचा आभास निर्माण करण्यार्‍या लेखनासंबंधी, परखड शास्त्रिय भूमिका कशी असावी याबाबतचे सामान्य नियम सांगणारा प्रतिसाद होता. लेखाच्या लेखकाला जर हे निरिक्षण मान्य नसेल तर त्याची बाजू वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"पीडीत मानसिकतेचा (व्हिक्टीम मेंटॅलिटीचा) तडका मारलेला, समतोलपणा-समंजसतेचा आभास निर्माण करता येणे", हे राजकारणात अत्यंत उपयोगी हत्यार समजले जाते... आणि ते बर्‍याचदा दोन गटांना एकमेकांशी खेळवून स्वतःचा फायदा साधणे आणि / अथवा गंमत बघणे यासाठी यशस्वीपणे वापरले जाते :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टर साहेब, श्री. यनावाला ह्यांचे ह्या आधीचे लेखन मी वाचलेले नाही. मी सद्य लेखातील शब्द नाही, तर मुद्दा लक्षात घेऊन त्यावर मी माझे भाष्य केले आहे. जसे हिंदीत वाक्प्रचार आहे, 'बाल की खाल निकालना' तसा प्रकार खुपशा प्रतिसादांंमध्ये दिसून येतो. मूळ मुद्दा बाजूला ठेवून लाडू का खाल्ला नाही, देणगी न देता लाडूचे मुल्य देऊन तो प्रसाद न समजता लाडू (पक्षी: मिठाई) म्हणून का नाही खाल्ला वगैरे वगैरे मुद्द्यांवर भर दिला जाऊन चर्चा भरकटविण्याचे यशस्वी प्रयत्न दिसून येतात तेंव्हा एक मिपाप्रेमी म्हणून वाईट वाटतं. तुम्ही म्हणता की आजवरचा श्री यनावाला ह्यांच्या बाबतचा अनुभव असा आहे की, 'त्याना हवे असतील ते मुद्दे मिपावर मांडून एकतर गायब होतात आणि फक्त निवडक मुद्द्यांना (जे त्यांच्या बाजूचे आणि सोयिस्कर असतात) उत्तरे देतात.' असे असेल तर नक्कीच अत्यंत चुकीचे आहे. श्री यनावाला ह्यांनी चर्चेला तोंड फोडले आहे त्यांनी त्यांच्या मुद्द्याच्या विरोधातील प्रतिसादांना देखिल उत्तरे देऊन आपली भूमिका विस्तृत आणि तपशिलवार मांडावी अशी मी त्यांना ह्या प्रतिसादाद्वारे विनंती करेन. तुमचा एक मुद्दा आहे, त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही ह्यात कोणा एका वक्तीला त्रास होतो अशातला भाग नाही तर ह्यातून अव्यवहार्य कर्मकांडाचे महत्व वाढील लागून आख्या समाजाच्या वर्तनावर परिणाम होतो असे मला वाटते. आजूबाजूची माणसे नवस बोलतात, नैवेद्य ठेवतात, देणग्या देतात, तिर्थस्थानांना भेटी देतात, जुलूस काढतात वगैरे वगैरे पाहून हे आज पर्यंत न केलेला माणुसही करायला सुरुवात करतो. आणि आपल्या कर्मावर, कृतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी देवाच्या कृपेवर अवलंबून राहायला शिकतो, हातावर हात ठेवून अनुकुल घटना घडतील अशी निष्क्रिय विचारसरणी अवलंबितो. सती प्रथा का बंद केली गेली? हुंडा विरोधी चळवळ चालविण्यामागे काय हेतू आहे, हे लक्षात घ्यावे. जीला सती जायचे आहे तिला जाऊ द्यावे, किंवा ज्यांना ज्यांना हुंडा देणे परवडते त्यांना देऊ द्यावा. इतरांनी त्यावर आपली मते लादू नयेत असे म्हणणे सयुक्तिक होईल का? हे भोळ्या देवधर्मालाही लागू होते. आस्तिकता, नैवेद्य, देणग्या ह्याचा तुम्हा-आम्हाला थेट त्रास होत नसला तरी गरीब, भोळ्या जनतेवर ह्याचा खोलवर पारिणाम होतच असतो. कुठल्याही संकटाला तोंड देण्याचे मानसिक बळच ते हरवून बसतात. देवाला संकट निवारण्यासाठी कामाला लावले (नवस, नैवेद्या मार्फत) की आपण कांही करण्याची गरजच नाही विचारसरणी रुजत जाते. कांही जणांच्या कांही ठोस मागण्या असत नसतीलही पण ' हे देवा माझ्यावर कृपादृष्टी असू दे रे बाबा!' ही सर्वसामान्य मागणी असतेच. कोणी म्हणेल सती आणि हुंडा ह्या सारख्या अनिष्ट चालींशी देवधर्माशी तुलना चुकीची आहे. पण मला वाटते ही आस्तिकता, नवस, नैवेद्य, तिर्थक्षेत्रे आदींमुळे समाजाला 'स्लो पॉईझनींग' होत रहाते. समाजाची कृतीशिलता नष्ट पावत राहते. प्रयत्नवाद मागे पडतो. पर्यायाने समाज, प्रदेश आणि देश मागे पडतो. पुन्हा सांगतो, श्रद्धा जरूर असावी. ती तुमच्या घरापुरती सिमित असावी. सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर देवापुढे दिवा लावणे, एखादे स्तोत्र म्हणावे, एखादी आरती करावी किंवा शांत बसून नामस्मरण करावे आणि देवाने मला आवश्यक ती शक्ती बहाल केली आहे ह्या विचाराने, आत्मविश्वासाने दिवसाला सुरुवात करून, आपल्या समस्या आपणच सोडविण्यासाठी १००% प्रयत्नशील असावे. बस, ह्याहून जास्त देवधर्म करण्याची, व्यक्तीशः मला तरी आवश्यकता भासत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचा एक मुद्दा आहे, त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही ह्यात कोणा एका वक्तीला त्रास होतो अशातला भाग नाही तर ह्यातून अव्यवहार्य कर्मकांडाचे महत्व वाढील लागून आख्या समाजाच्या वर्तनावर परिणाम होतो असे मला वाटते. मानवी मनाची जडणघडणच अशी आहे की बहुसंख्य माणसांना स्वबळावर स्वतंत्रपणे परखड आचारविचार जमत नाही. त्यांना कोणा ना कोणाचा कमीजास्त प्रमाणात मानसिक आधार लागतो. यामुळेच धर्मापासून राजकारणापर्यंत नेते तयार होतात व लोक त्यांच्या मागे कधी डोळसपणे, तर बहुदा अंधपणे जाते. ही जीवशास्त्रीय वस्तूस्थिती आहे. आता माझ्या मताने सामान्य जीवनातली वस्तूस्थिती : या जगात पूर्ण पांढरे किंवा पूर्ण काळे असे काहीच नाही... सगळ्या करड्या रंगाच्या छटा आहेत. तेव्हा एका टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाने दुसर्‍या टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाचे काही एका ठराविक सीमेपर्यंत मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण त्या सीमेपलिकडे अश्या प्रयत्नांचा परिणाम हवा त्यापेक्षा उलटा होऊन टाळू शकणारी त्रासदायक / दुखःद परिस्थिती अथवा संघर्ष निर्माण होतो. अश्या वेळेस माझ्या वर म्हटल्याप्रमाणे, "इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही, किंबहुना अश्या प्रकारात नमस्कार करून प्रसाद खाण्यास व त्या माणसाचे समाधान वाढवण्यात माझी ना नसते." अश्या सगळ्या माणसांपासून माझी वरच्या प्रतिसादात लिहिलेली मते लपलेली नसतात... किंबहुना मी ती स्पष्टपणे सांगितलेली असतात. हे जग विविधतेने भरलेले आहे आणि काही थोडे अतिरेकी अपवाद सोडल्यास ही विविधताच जग जास्त सुंदर, मनोरंजक व आनंददायक बनवते. सर्वच बाबतीत सगळे जग माझ्यासारखेच वागले पाहिजे नाहीतर ते माझ्या जीवनाचा भाग होऊ शकत नाही (याला इंग्लिश्मध्ये सुंदर चपखल वचन आहे : माय वे ऑर हाय वे.) हे म्हणणे मला ठीक वाटत नाही. असे करणे अतिरेकी / ऑटोक्रॅटीक / कम्युनिस्ट व्यवस्थेचे लक्षण आहे. नव्या पिढीचा कर्मकांडांसंबंधी विचार/कृती पाहिली तर त्यांचे महत्व काळाबरोबर कमी होईल असेच दिसते... जसे मागच्या पिढीच्या तुलनेत आपल्या पिढीत झाले आहे. शिवाय आधुनिक काळातल्या वाढत जाण्यार्‍या धकाधकीत निरुपयोगी प्रथा-कर्मकांडे कमी कमी होत जातील असेच दिसते. काही गोष्टींना थोडा वेळ देणे जास्त श्रेयस्कर होईल असे वाटते. प्रत्येक कृती करण्यात वा न करण्यात फायदा आणि तोटा असतोच... त्यांचे तौलनिक प्रमाण पाहून ते फायदेशीर असल्यासच ती कृती करावी अथवा न करावी असे मला वाटते. मानवी इतिहास पाहिला असती हेच दिसते की सतत जुन्या प्रथा-कर्मकांडे जाऊन त्यांची जागा नवीन प्रथा-कर्मकांडे घेत असतात... ज्या काळात सामाजिक-मानसशास्त्रियदृष्ट्या लोकांना जरूर वाटते व परवडते ते टिकते, नाहीतर ते नष्ट होते व त्याची जागा नवीन काहीतरी घेते. कारण, मानसशास्त्रिय/वैचारीक/तात्वीक निर्वात अवस्थेत (आयडियालॉजिकल व्हॅक्क्युम) माणूस आनंदी/खुशाल राहू शकत नाही. जसे सर्व १००% मानवांची शरीरे (उंची, वजन, आरोग्य, इ बाबतीत), १००% वेळेस, १००% एकसारखी नसतात, तसेच मनाचे आहे. अर्थातच, वास्तव जीवनात छोटे-मोठे विसंवाद अपेक्षितच आहेत... जोपर्यंत हे विसंवाद धोकादायक किंवा असह्य नसतात, तोपर्यंत त्यांना शल्यचिकित्सेची गरज नसते, सुसंवादाने त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करावा, तेही न जमल्यास "असहमतीवर सहमती (अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री)" या तत्वावर आनंदी सहजीवन शक्य असते; असे माझे मत आहे. वरच्या कृतीने ; (अ) आजचे आनंदी सहजीवन (जगा आणि जगू द्या) शक्य होईल, (आ) मी माझी मते स्पष्टपणे सांगत असल्याने, आत्ता कर्मकांडांवर विश्वास ठेवणार्‍यांचे भविष्यात मतपरिवर्तन होण्याची शक्यता असते... याउलट संघर्षाचा परिणाम अहं (इगो) दुखावून माणूस मूळ मतांशी (चूकीची असली तरी) जास्त घट्ट चिकटण्याची शक्यता वाढते. हा प्रतिसाद जरा मोठा झाला. पण माझा निर्णय केवळ "सोपी तडजोड" म्हणून केलेला नसून त्यामागे मला पटलेला काही विचार आहे हे सांगण्यासाठीच हा खटाटोप केलेला आहे. मुख्य म्हणजे : लेखकाने इतर काही सोईस्कर प्रतिसादावर मतप्रदर्शन केले आहे. पण, माझ्या प्रतिसादात मांडलेल्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले आहे (जे इतरांच्या अगोदरच्या प्रतिसादांप्रमाणे अपेक्षित होते). याचा अर्थ माझे मुद्दे लेखकाला मान्य आहेत असे वाटते आहे. असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

>>>>तेव्हा एका टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाने दुसर्‍या टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाचे काही एका ठराविक सीमेपर्यंत मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण त्या सीमेपलिकडे अश्या प्रयत्नांचा परिणाम हवा त्यापेक्षा उलटा होऊन टाळू शकणारी त्रासदायक / दुखःद परिस्थिती अथवा संघर्ष निर्माण होतो. आपले विचार परखड पणे मांडणारी तथाकथित नास्तिक मंडळी ही एका टोकावर असतात हे गृहीतकच चुकीचे आहे. अन्यायकारी आहे. >>>>सर्वच बाबतीत सगळे जग माझ्यासारखेच वागले पाहिजे नाहीतर ते माझ्या जीवनाचा भाग होऊ शकत नाही (याला इंग्लिश्मध्ये सुंदर चपखल वचन आहे : माय वे ऑर हाय वे.) हे म्हणणे मला ठीक वाटत नाही. असाही आग्रह नास्तिकांचा कुठे दिसून आला नाही. नास्तिकांचे 'मी असा आहे' हे प्रतिपादन असते. त्याशिवाय त्यांची भूमिका इतरांना कशी समजावी. प्रसाद म्हणुन नाही तर मिठाई म्ह्णून लाडू खायला पाहिजे होता ही आस्तिकांची सततची मागणी ते दुसर्‍या 'टोकाला' आहेत असे दर्शवित नाहीत का? ते कुठे ग्रे एरियात दिसत नाहीत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता प्रत्येकाने चर्चेवर विचार करून आपली मते बनवावित.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब, वर तुम्ही उधृत केलेली वाक्ये तुमच्याबद्दल किंवा इतर कोणाबद्दलही व्यक्तीगत वचने नव्हती. माणसाने सर्वसाधारणपणे कसे असावे / नसावे याबद्दलचे माझी मते होती. शिवाय, ती मते आस्तिकाच्या अथवा नास्तिकाच्या भूमीकेतून नव्हती तर एका अज्ञेयवादीच्या भूमीकेतून होती... अज्ञेयवादी त्या दोघांपैकी कोणाचीच बाजू घेत नाही, पण (देव आहे की नाही याबाबतचे) आपले अज्ञान लपवायची त्याला गरज वाटत नाही आणि स्वतःचे ज्ञान वाढविण्यासाठी, पूर्वग्रह न ठेवता, आस्तिक-नास्तिक-(इतर)अज्ञेयवादी या तिघांचेही मत जाणून घ्यायला मात्र तो उत्सुक असतो. सर्वच आस्तिक, नास्तिक आणि अज्ञेयवादी शेवटी माणसेच आहेत. वरच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, सर्वच विचारप्रणाली गटांतले मानव, पूर्ण पांढरे अथवा पूर्ण काळे (पूर्णतः एकसारखे) नाही तर वर्णपटातील विविध करड्या छटांत येतात, काही जण वर्णपटांच्या या किंवा त्या टोकांजवळ तर इतर जण मधे कोठेतरी असतात. त्यामुळे, सर्वच गटांत संयमाने आपले मत सांगणारे असतात, तसेच अत्यंत टोकाची भूमिका घेऊन दुसर्‍यावर जहरी टीका करणारे असतात आणि या दोन्ही टोकांच्या मधल्या वर्णपटातील अनेकविध छटांचे लोकही असतात... पिडित मानसिकतेचा बुरखा घेउन आपले म्हणणे गळी उतरवणारेही सुद्धा यात असतातच असतात. त्यामुळे मला स्वतःला कोण काय दावा करतोय याबरोबरच किंवा कणभर जास्तच (अ) तो दावा कोणत्या अंगाने प्रस्तुत होतोय व (आ) त्या प्रस्तुतीमागे दडलेले नक्की खरे ध्येय काय आहे (रिडिंङ बिटविन द लाईन्स) हे जाणून घेण्यातही रस असतो... हे करताना त्या व्यक्तीला कोण्या एका गटाचा सदस्य असे न बघता, केवळ एक व्यक्ती असेच बघण्याचा माझा प्रयत्न असतो... कारण, म्हणतातच ना की, "व्यक्ती तितक्या प्रकृती" !

ज्यांना आपापल्या आस्तिक वा नास्तिकपणाचा माज आला असेल, त्यांना "स्व'स्तिक म्हणावे.

In reply to by तिमा

हॅहॅ माजावर असणे याला कालमर्यादा असते. सदासर्वदा एखादी व्यक्ती 'माजावर' असू शकत नाही. तो कधी ना कधी उतरतोच

मग काय ठरलं ? लाडु खायाचा की नाय खायाचा ?

In reply to by इरसाल

खायचा ना!! आस्तिक पावत्या फाडुन खाणार... नास्तिक फुकट मिळाला तर!!!

In reply to by पिलीयन रायडर

वाद घालण्यात फुकट जाणारी १० मिनिटे आणि डोक्याचा ताप वाचवण्यासाठीची ११ २१ ५१ रुपये जी काय असेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. गळ्यात रुमाल, कपाळी शेंदूर टिळा आणि हातात कडीवाले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते देणग्या मागायला येतात तेव्हा आपण वाद घालणे कितपत शहाणपणाचे ठरेल हे आपले आपण ठरवायचे. ते लाडू पण देत नाहीत. =))

In reply to by पैसा

>>>>>ते लाडू पण देत नाहीत. तुमचं दु:ख मोठं आहे. ......ह.घ्या. देवालयांमधून दिल्या जाणार्‍या देणग्या, मिठाई, नारळ, लांब लांब रांगांमधून होणारा वेळेचा व्यय आणि देवावर भरवसा ठेवून येणारी निष्क्रियता विचार करण्याजोगी आहे. मिठाई, नारळ जरी भक्तांनाच परत मिळत असले तरी त्या निमित्ताने ग्रहण होणार्‍या अनावश्यक कॅलरीज भक्तांच्या आरोग्यास घातकच असतात. दुष्काळग्रस्त आणि कुपोषित प्रदेशांमध्ये सकस अन्नाचे वाटप होण्याऐवजी, न खाणार्‍या देवाच्या मुर्तिंसमोर कोट्यावधीची मिठाई प्रसाद रुपाने देण्यात काय शहाणपण आहे? निदान....निदान सुशिक्षितांनी तरी ह्यावर सखोल विचार करावा. दोन हात, मस्तक आणि मनातील सद्विचार एव्हढेच पुरते देवाला. देवालयाकडे वाहणारा पैशांचा ओघच देवालयांची दुकाने होण्यास कारणीभूत आहेत. ह्या गुळासाठीच मुंग्या-मुंगळे गोळा होतात. मुळात गुळच ठेवला नाही तर मुंग्या-मुंगळे येणार नाहीत. कडीवाले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते येतीलच कशाला? समाजाला सुधारण्याच्या प्रयत्ना पेक्षा प्रत्येकाने स्वतःला सुधरावं. समाज आपोआप सुधारेल. चराचरात देव भरलेला आहे. प्रत्येक माणसात देव आहे अशी शिकवण आहे आपल्या धर्मात. त्या शिकवणीचा स्विकार न करता आपण देवालयाकडे धाव घेतो. घरातला देव वेगळा, सार्वजनिक उत्सातला देव वेगळा, देवालयातील वेगळा आणि तिर्थस्थानातील देव वेगळा असा देवांच्या बाबतीत भेदभाव करणे किती सयुक्तिक आहे? कशाकरीता जावे लागते मंदिरात आणि तिर्थक्षेत्री? सार्वजनिक उत्सवांना जाऊन तिथल्या देवाच्या पायी प्रसाद, वर्गणी आणि आपली भक्ती वाहण्यात काय हशील आहे? तुमच्या घरचा देव तुमच्या इच्छा आकांक्षा पुर्‍या करण्यास असमर्थ आहे? सद्वर्तन, सद्विचार, परोपकार आणि सहिष्णूता हिच इश्वरभक्ती ह्या विचारांची आस धरा तसा प्रसार करा.

In reply to by पैसा

तायडे.. मी सगळीकडेच वाद घालत फिरत नाय गो!! तसं वाटायचा फुल स्कोप आहे खरा ;) गणपतीलापण आपण पावती फाडत नाय! दारावर येणार्‍या कोणत्याच देवाधर्माच्या गोष्टीला आपण एन्टरटेन करत नाय.. सॉरी आम्ही पैसे देत नाही असं म्हणुन दार लावतो. रस्त्यावरच्या लोकांशी हुज्जत कोण घालणार बाय!