Skip to main content

बिथरलेले हिंदूत्व

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 03/04/2018 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला. त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली. पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले. यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले. "बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले. हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले. ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले. यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले. हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो. सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते. या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्‍या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले. पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते. पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली. आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका. निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे. असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले. दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले. सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या. ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले. राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला. सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले. कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात. लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले. मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही. पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 48407
प्रतिक्रिया 196

प्रतिक्रिया

नर्मदेचा गोटा , ईतका मोठा लेख लिहीला म्हणजे तुम्हाला माहीती असायलाच पाहीजे कि तुम्हाला "हिंदु" म्हणजे कोण अपेक्षित आहे ! स्वतंत्र भारतात हिंदु बिथरणे कधी सुरु झाले ?

In reply to by पगला गजोधर

गजोधर साहेब, तेच तर त्यांना लै येळा इचारण्याचा प्रयत्न झाला. हिंदु आणि हिंदुत्ववादी यांची व्याख्या काय आणि शिवाय फरक काय?

In reply to by बिटाकाका

आहो आम्हीच तुम्हास आधी विचारले, पण तुम्ही उत्तर देण्यास टाळंटाळ करत आहात हे पाहिल्यावर मग इंटरेस्ट गेला. आधी तुम्ही सांगा, मग दुसऱ्यास विचारा.

In reply to by पगला गजोधर

वाईच परत जाऊन वाचा वर. मी माझी व्याख्या तिसऱ्याच प्रतिसादात दिली होती. पण तुम्ही लेखकाला विचारले नाही म्हणजे तुम्ही अमुक एक व्याख्या गृहीत धरलेली असायला हवी ना? लेखकाने तर स्पष्टीकरण दिलेच नाही शिवाय बाण, वर्तुळ, जैन, शहा असा बराच घोळ घालून अजून आपलीही व्याख्या यायचीच आहे.

In reply to by बिटाकाका

ठीक आहे, माझ्या वैयक्तिक मते, भारतीय "सेक्युलर" नागरिक हे "हिंदू" आहेत, व 'भारतीय-सेक्युलर-विरोधक' हे 'हिंदूत्ववादी' आहे.

In reply to by पगला गजोधर

माझ्या वैयक्तिक मते, भारतीय "सेक्युलर" नागरिक हे "हिंदू" आहेत, व 'भारतीय-सेक्युलर-विरोधक' हे 'हिंदूत्ववादी' आहे.
उगाच आपली शंका म्हणुन विचारतो : तुमच्या व्याख्ये मध्ये सगळे ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट सारखे डायकोटोमस आहे की मधे काही ग्रे अरीया देखील आहे ? उदाहरणार्थ काही लोक हिंदु बौध्द जैन शीख लिंगायत(?) वगैरे भारतीय धर्मांना ( आणि पारशी , निरीश्वरवादी अन्य कोणत्याही विचारधारांना देखील) समान मानतात त्यांच्या बाबब्त सेक्युलर आहेत पण अब्राहमिक धर्मांना , जे की स्वतःचाच धर्म श्रेष्ठ आणि बाकी सारे हीन काफीर असा प्रचार करतात त्यांना परके मानतात त्यांना तुम्ही काय म्हणणार , हिंदु की हिंदुत्ववादी ? हिंदू--------?----------हिंदूत्ववादी

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमच्या साठी परत एकदा अपडेटवून परत लिहितो. . माझ्या वैयक्तिक मते, "सर्व भारतीय सेक्युलर नागरिक" हे "हिंदू" आहेत, व 'भारतीय-सेक्युलर-विरोधी' हे 'हिंदूत्ववादी' आहे. त्याच तर्कांने हिंदु = सुफी तर हिंदुत्ववादी = तालिबानी

In reply to by sagarpdy

सेक्युलर मुस्लिम हिंदू आहेत का ? थोडे लॉजिक लावून हिंदू धर्म नसून जीवनपद्धती आहे का ? .... तुमच्या वैयक्तिक मते बरं ....

न गो ! हिंदु बिथरला असा लेख लिहुन तुम्ही जो काही विचका केला आहे त्याची तुम्हाला कल्पनाच नाही. १९४७ साली देशाची घर्माधारीत पाळणी केली गेली ! त्याच वेळेला देशातला हिंदु बिथरला !! देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी ह्या फाळणीला काही विचार न करता मान्यता दिली होती !! मुसलमान धर्माच्या लोकांना एक देशाचा एक तुकडा काढुन दिला गेला पण तो भाग काही मुस्लिम बहुल भाग नव्हता! ज्या भागात मुस्लिम लिग जिंक त आलेली तो वेस्ट बंगालचा व हैदराबादचा भाग त्यावेळेस भारतातच होता. एका क्षणात फाळ्नीनंतर पाकिस्तानातले मुस्लिम सोडुन ईतर धर्माचे लोक मारले जाऊ लागले, लाखो हिंदुम्ची कत्तले आम झाली. ह्या हिंदुंची कत्तले आम होताना त्यांना कोणी विचारले नाही की बाबा तु दलित आहे का उच्च वर्णिय आहेस !! त्या काळात देशात ८० टक्के हिंदु होते अस धरल तर त्या काळात ल्या पाकिस्तान भागातही ८०% असायला पाहीजेत मग त्या हिंदुंना सुरक्षित बाहेर काढ्ण्या अगोदर पाकिस्तानची निर्मिती करण्याची घाई का झालेली होती ? अस लक्षात घ्या की ज्या दिवशी फाळणीची घोषणा केली गेली असेल त्या वेळेला आताच्या पाकिस्तानात असलेल्या अति सामान जनतेला काय होत आहे ह्याची कल्पना तरी आली असेला का ? त्याकाळी बराचसा समाज हा अशिक्षीत होता म्हणजे रेडीयो, पेपर वरुन त्यांना माहीती मिळणे दुरापास्त होते. समाजातील सधन लोक जरी भारतात पळून यायला सक्षम होते पण जे गरीब होते ते तर त्या असहाय्य परिस्थीतीत कसे राहीले असतील ? त्या काळच्या पाकिस्तान मधल्या ८०% हिदु लोकातील किती लोक जिवंत राहीले ? भारतात परतले ? त्या हिंदुंच्या परतण्यासाठी त्या वेळच्या सर्वो च्च नेत्यांनी काय काय प्रयत्न केले ? पाकिस्तानातील हिंदुना गेल्या ७० वर्षात मारून टाकलेले आहे पण भारत सरकार मात्र डोळे झाक करुन होती. त्या हिंदु लोकांचा ह्या परिस्थीतीच्या मागे काही हात नव्हता मग त्यांना अशी शिक्षा का दिली गेली ? वेळो वेळी छोट्या छोट्या बाबीवर उपासाला बसणारे बापु हिंदु लोकांच्या कत्तली आम वर फार काही करताना दिसले नाहीत , का त्यांनी काही केल नाही ? पाकिस्तानच्या पुर्ण लोकसंख्येच्या १८ ते २० कोटी लोकांत फक्त २% हिंदु आज पाकिस्तानात जिवंत आहेत. आज भारतातले हिंदु गंगा माताच्या नावाने पुजा करण्यात धन्यता मानतात पण आपल्या हिंदु संस्कृतीची मूळ ओळख सिंधु संस्कृती भारतात नाही ह्याची जरा सुद्धा खंत बाळगत नाहीत. श्री रामाचे दोन पुत्र लव व कुश ह्यां नी वसवलेली दोन शहरे आज पाकिस्तानात आहे. लाहोर व कसुर ही ती दोन शहर. आज भारतातल्या ९९% हिदुंना ही माहीतीच नाही !

In reply to by डँबिस००७

१९४७ साली देशाची घर्माधारीत पाळणी केली गेली ! डँबीस साहेब, ते सर्व मला माहीत आहे आणि तुमची चीड सुद्धा मी समजू शकतो. पण मी पाणी नासणारच या हट्टाबद्दल तुमचे मत सांगा.

बरे, मी पाणी नासणारच !! अस जरी कोणी म्हंटल्यामुळे पुर्ण हिंदु धर्माला व पुर्ण हिंदु जनतेला दोष देणे थांबवा ! हिंदु धर्म व हिंदु लोक तुमच्या ह्या मता पेक्षा खुपच महान आहेत !!

In reply to by डँबिस००७

बरे, मी पाणी नासणारच !! अस जरी कोणी म्हंटल्यामुळे पुर्ण हिंदु धर्माला व पुर्ण हिंदु जनतेला दोष देणे थांबवा ! या गोष्टी हे लोक हिंदुत्वाच्या नावाखालीच करत आहेत.

In reply to by डँबिस००७

बरे, मी पाणी नासणारच !! अस जरी कोणी म्हंटल्यामुळे पुर्ण हिंदु धर्माला व पुर्ण हिंदु जनतेला दोष देणे थांबवा !
या गोष्टी हे लोक हिंदुत्वाच्या नावाखालीच करत आहेत.

In reply to by नर्मदेतला गोटा

हा गोटा एक अवघड प्रकार आहे. ----------------------------------------- तुम्ही जगणे थांबवाल का जरा??? प्लिझ. फार प्रदूषण करताय. हा लेख जो तुम्ही पाडलाय, किंवा तुमच्यासारखे हिंदुत्वविरोधी पर्यावरणबंधु पाडतात त्यात जितके लॅपटॉप, संगणक, इ जितका वेळ उघडे राहिले तितका वेळ ते चालू ठेवण्यासाठी जी वीज निर्मावी लागली ती निर्मायला जितके पाणी लागले ते महाराष्ट्राच्या एका होळीच्या एक्सेस कंजप्शनपेक्षा जास्त होते. आता गप्प बसा.

In reply to by arunjoshi123

जोशानु हा एकच लेख नाही, त्यांचे आतापर्यंतचे सर्व लेखन असेच आहे, मिळणारे उदंड प्रतिसाद हेच त्यांचे यशाचे मीटर आहे. बाकी ना कुठला अभ्यास, ना कुठला बारकाईने विचार ना समाजभान. केवळ दुसर्याचा तवा दुसर्याच्या शेगडीवर तापवायचा अन स्वता च्या पोळ्या भाजून घ्यायच्या.

In reply to by अभ्या..

अभ्या..., हे लोक काय आपले दुश्मन नाय. मिळू दे कि त्यांच्या धाग्याला टीआर्पी. उलट अशा ठिकाणी तुंबलेली घाण नक्की कशी आहे तिच स्पष्ट रुप पाहायला मिळतं.

In reply to by arunjoshi123

जोशी सर, एखादे उदाहरण दिले की त्याला तुम्ही प्रदूषणाची इतर उदाहरणे उभी करत आहात. प्रत्यक्षात जो कुठलीही लढाई जमिनीवर उतरून करत नसतो त्याला दुसरे काही शक्यही नसते. माझा अतिशय साधा सरळ प्रश्न आहे तो म्हणजे मी पाणी नसणारच या अट्टाहासामुळे हिंदूत्व बदनाम होते आहे की नाही ? आपण काही तरी करतो आहे ते चुकीचे आहे हे आपल्याला कुठे तरी जाणवतेही आहे पण त्याला आपण समर्थनाच्या सबबी उभ्या करतो आहोत. यालाच कुणी तरी आधी बाण मारणे आणि नंतर मग भोवती वर्तुळ काढणे असे म्हटलेले आहे. त्यामुळे आपल्या घरातले पाणी आपण नासले तर आपलीच गैरसोय होणार आहे त्यातून हिंदूत्व कसे काय बळकट होणार आहे ?

In reply to by नर्मदेतला गोटा

नगो, तुम्ही ज्याला 'पाणी नासवणे' म्हणता त्याला आम्ही 'पाणी नासवणे' म्हणंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by नर्मदेतला गोटा

यालाच कुणी तरी आधी बाण मारणे आणि नंतर मग भोवती वर्तुळ काढणे असे म्हटलेले आहे
काहीजणांनी यालाच दांभिकता म्हटलेले आहे हेही निदर्शनास आणून देतो. वर्षभर स्वतःच्या घरी दारी बदाबदा पाणी सांडणारे, होळी (रंगपंचमी) आली की पाणी वाचवण्याच्या गोष्टी करू लागतात. शहरातून राहणारे सोसायट्यांच्या पार्किंग मध्ये गाड्या धुण्यावर जाणाऱ्या पाण्यावर कधी तितक्याच तीव्रतेने बोलताना दिसत नाहीत. वर जोशी साहेबांनी आकडेवारीनुसार हेच सांगायचा प्रयत्न केला. पाण्याची चिंता हा मुख्य मुद्दा असेल तर नैसर्गिकरित्या कोणीही जिथून पाण्याचा अपव्यय टाळल्याने फायदा जास्त आहे तिथे लक्ष केंद्रित करेल. ============================== तीच गत दिवाळीच्या वेळेसच्या प्रदूषणाची. वर्षभर डोळ्यासमोर भकाभका धूर सोडणाऱ्या गाड्या फिरताना दिसत आहेत म्हणून कोणी आजवर आरटीओ मोर्चा काढल्याचे कधी दिसले नाही. स्वतः वर्षभर कार पुलिंग वगैरेचा प्रचार/पुरस्कार केला नाही असे लोक दिवाळी आली कि प्रदूषणाच्या गोष्टी करू लागतात तेव्हा इतरांना तो दांभिकपणा वाटणे साहजिक आहे. ============================== तस्मात या दांभिकपणामुळे या अशा गोष्टींमध्ये धर्म जबरदस्ती गुंतवण्याचा प्रकार चालू आहे असा समाज दृढ होण्यास हातभार लागत आहे. इथे धर्माच्या मूळ तत्वांचा काही एक संबंध नाही.

In reply to by नर्मदेतला गोटा

माझा अतिशय साधा सरळ प्रश्न आहे तो म्हणजे मी पाणी नसणारच या अट्टाहासामुळे हिंदूत्व बदनाम होते आहे की नाही ?
नाही.

In reply to by arunjoshi123

जोशी, तुम्हाला जे वाटतं ते हो नाही तुम्ही स्वच्छपणे सांगता, ही गोष्ट अत्यंत स्वागतार्ह आहे. पण बाकी लोकांचं मात्र तसं नाही. ते स्वतःचंच शेपूट तोंडात पकडायला जातात आणि विचारतात ही दुनिया गोल गोल का फिरते आहे ?

In reply to by नर्मदेतला गोटा

असो. ------------------ आपण कोणत्याही विषयातील सर्वात गंभीर समस्येवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे इतकं म्हणून विषयाला विराम देऊ.

लेखात असंख्य मुद्दे आहेत. प्रतिक्रिया मध्ये अजून कितीतरी. नक्की कोण काय सांगतोय आणि काय वाद घालतोय हे कळायचे बंद झाले. आपल्या धाग्यांचा खरड फळा करणे याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दाखविल्याबद्दल नर्मदेतला गोटा यांचे हार्दिक अभिनंदन!

तुम्ही मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. १. हिंदुत्वाचे राजकारण - फाळणी होण्याचे मुख्य कारण म्हणजे मुसलमानांना त्यांचा वेगळा देश पाहिजे होता. जेव्हा तो दिला गेला तेव्हा स्वतःला मुस्लिम देश म्हणवणाऱ्या पाकिस्तानची निर्मिती झाली. पण तरीही हिंदू बहुसंख्य असलेल्या भारत देशाला हिंदू देश म्हणवून घ्यायची लाज अजूनही वाटते. तेव्हापासून जे मुस्लिमांचे कौतुक सुरु आहे ते अजूनही संपले नाहीये. जेव्हा बहुसंख्य असूनही हिंदूंना फक्त मुसलमानांच्या सोयीसाठी वाकायला लावले जाते तेव्हा आपल्याला डावललं जातंय ही भावना निर्माण होण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाची गरज नाही. उदाहरण म्हणजे मुंबईत रस्त्यांवर नमाज पढणे चालू झाल्यावर, हिंदूंनीही आरती चालू केली. पण याबद्दल दोन्ही गटांना समजावण्याची भूमिका न घेता फक्त हिंदूंवर टीका करण्यात आली. दुसरं उदा. म्हणजे मुस्लिम नेत्यांनी, लेखकांनी आणि अभिनेत्यांनी हिंदू देवदेवतांवर कसेही बीभित्स प्रदर्शन केलेले चालते, त्यावर हिंदूंनी आक्षेप घ्यायचा नसतो कारण ते मुस्लिमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. पण एखाद्या हिंदूने फक्त पैगंबराविषयी वा कुराणाविषयी वा नुसत्या मशिदीविषयी काही बोलले तरी त्याच्यावर कारवाई होते. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे कमलेश तिवारीची केस घ्या. अखलाखला मारण्यात आलं म्हणून एवढा गवगवा झाला पण गायींना वाचवण्यासाठी झटणाऱ्या प्रशांत पुजारीची भर बाजारात हत्या झाली तेव्हा अखलाखच्या १% सुद्धा गवगवा झाला नाही. अजूनही केरळमध्ये आणि प. बंगाल मध्ये हिंदू लोकांवर अत्याचार होत आहेत त्यावर सार्वजनिक मौन का आहे? २. लव्ह जिहाद - अगदी खरं खरं प्रेम जुळून लग्न केलं तर कोणालाच काही आक्षेप असायचं कारण नाही. पण मग या प्रेमात पत्नीने धर्म बदलावा अशी मागणी आणि जबरदस्ती का होते? रश्मी शाहबाजकरचं उदाहरण घ्या, धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती होऊ लागली म्हणून मग तिला पोलीस कम्प्लेंट करावी लागली. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या लोकांचे म्हणणे वाचा इथे आणि इथे. तरीही तुम्हाला वाटू शकतं की हे सर्व खोटं सांगत आहेत. त्या वाटण्याला कोणी काही करू शकत नाही त्यामुळे स्वतः सजग राहून आजूबाजूला बघा आणि अनुभव घ्या. परिसरातल्या वयात येणाऱ्या मुलींवर नजर ठेवून सगळी माहिती काढली जाते. ती मुलगी कुठे जाते, कधी जाते, बरोबर कोण असतं, तिच्या आवडीनिवडी काय आहेत ईई. दुसरीकडे जरा बऱ्या दिसणाऱ्या मुस्लिम मुलांना ग्रूम केलं जातं, या मुलींपैकी एखादी मुलगी त्याला टार्गेट करायला सांगितलं जातं. मुलाला चांगले कपडे, मोबाइलला पैसे दिले जातात तसेच मुलीवर खर्च करण्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात. एकदा मुलगी जाळ्यात फसली की मग एक तर शरीरसंबंध प्रस्थापित करून ब्लॅकमेल करायचे किंवा लग्नाचे अमिष दाखवायचे. दोन्हीची परिणीती शेवटी धर्मांतराच्या जबरदस्तीमध्ये होते. 3. ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले. या वाक्यातच तुम्ही मान्य करताय की हिंदू धर्म धोक्यात आहे असं वाटायला लावणाऱ्या घटना घडत आहेत. 4. सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते. यात नुसती बोंब ठोकली जात नाहीये तर सत्यता पण आहेच ना? कुठल्या हिंदू यात्रेसाठी सबसिडी दिली जाते ते सांगा. दुसरीकडे इस्लामिक जाणकार सांगतात की हज यात्रेसाठी कोणाची मदत घेऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे सबसिडी घेतल्यावर फक्त एअर इंडिया ची विमानसेवा वापरायला लागायची. उलट आता कुठलीही विमानसेवा वापरून बऱ्याच कमी पैश्यात जात येतं. सबसिडीतून वाचलेले पैसे मुस्लिम मुलींच्या शिक्षणासाठी वापरायचा निर्णय घ्यायची हिम्मत सुद्धा याच "हिंदुत्ववादी" सरकारने दाखवली. या आधीच्या सरकारांनी फक्त लांगुलचालन केलं. 5. आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका. आणि रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे. मी लहान असल्यापासून आमच्या आजूबाजूला सगळीकडे होळीसाठी अगदी कमी लाकडं ती सुद्धा अगदी कुचकामी असलेली वापरायचो. बाकी सुकलेल्या काटक्या, नारळाच्या झावळ्या यांनी सजावट व्हायची. लाकूड जपायला पाहिजे हे खरंच आहे पण होळी साठी कोणी झाडं तोडून लाकूड वापरत नाही कारण सुकं लाकूड पाहिजे असतं. रंगपंचमी मुख्यतः रंगांनी खेळली जाते, ते धुवायला मात्र अंघोळ करताना जास्त पाणी वापरलं जातं. आता प्रॉब्लेम कुठे आहे हे बघा.... पाणी वाचवलं पाहिजे हे खरंच आहे, पण मग जेवढा विरोध रंगपंचमीला पाण्याची नासाडी होते म्हणून होतो तेवढाच विरोध त्याच कारणासाठी बकरी ईदला होतो का? केला तर परिणाम माहित आहेतच. दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले. दिल्लीमध्ये प्रदूषण मुख्यतः वाहने आणि विविध कारखान्यांमुळे होते. त्यात भर पडते जेव्हा हरियाणा आणि आसपासच्या प्रदेशात शेतं जाळली जातात. फटाक्यांनी पण प्रदूषण होते पण वर्षातल्या २-३ दिवसांच्या फटाक्यांनी असा कितीसा फरक पडत असेल? हे वाचा. या निर्णयाला विरोध व्हायचं दुसरं मुख कारण म्हणजे अगदी दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला. जे फटाके तयार होऊन बाजारात आले आहे त्यांचं काय करायचं? ज्या कारागिरांनी ते तयार केले आहेत त्यांच्या पोटावर पाय आला तसेच ज्या व्यापाऱ्यांनी ते घेऊन ठेवले त्यांना पण आर्थिक नुकसान होणार. याचा विचार झाला का? ध्वनिप्रदूषणाबद्दल तुम्ही बोलला नाहीत पण २-३ दिवसांतल्या संध्याकाळच्या काही तासांच्या फटाक्यांपेक्षा, ३६५ दिवस रोज ५ वेळा लाऊड स्पीकर वर वाजणाऱ्या हाकेने जास्त ध्वनीप्रदूषण होत नसेल? माझा तर कुठल्याही प्रसंगी वाजणाऱ्या लाऊडस्पीकरला विरोध आहे, मग ते रोज ५ वेळा वाजणारी बंग असो व गणेशोत्सवात वाजणारी गाणी असोत. माझा थोडक्यात मांडायचा मुद्दा असा की एका घरातील दोन भावंडांमध्ये जर एखाद्याला सतत झुकते माप दिले जात असेल तर दुसऱ्या भावाला त्याची जाणीव होतेच. त्यासाठी कोणी पढवायची गरज भासत नाही. जर कालांतराने सुद्धा मिळणाऱ्या वागणुकीत फरक पडला नाही मग ही अन्यायाची भावना वाढीस लागून त्याचे रूपांतर बंडात होते.

In reply to by ट्रेड मार्क

+ १

सर्वप्रथम सविस्तर उत्तराबद्दल मनापासून धन्यवाद, आनंद वाटला. तुमचे मुद्दे माझ्या लक्षात आले. बहुतेक मुद्द्यांबद्दल माझी सहमती आहे. जोवर तुम्ही दुसऱ्याशी लढाऊपणे संघर्ष करीत आहात तोवर माझा कुठलाच आक्षेप नाही. पण आपल्याच घरातले पाणी नासल्यामुळे उद्या आपल्यालाच पाण्याचा तुटवडा भासणार आहे आणि आपली गैरसोय होणार आहे. आपल्या घरासमोर फटाके उडवल्याने आपल्याच अंगणात कचरा होणार आहे आणि धुराचा त्रास देखील आपल्यालाच होणार आहे. अशाप्रकारे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून आपण दुसऱ्यांचा बंदोबस्त कसा करणार आहोत ? ही माझी शंका आहे. दुसऱ्याच्या घरातलं पाणी नासलं तर मी समजू शकतो.

In reply to by नर्मदेतला गोटा

पाण्याच्या नासाडीची व प्रदुषणाची ईतर असंख्य कारणे आहेत.. उदा . गाड्या धुणे.. शाॅवरखाली अंघोळ करणे..कत्तलखाने.. वाहनांचा धूर ...लिस्ट प्रचंड मोठी आहे... कदाचित ही कारणे तुमच्यालेखी दुय्यम असतील व त्यावरून हिंदूत्वावर आरोप करणे अवघड असेल...

In reply to by यश राज

हे त्यांना आकडेवारीसह आधीच सांगून झालंय, पण हिंदुत्ववादाशी हे मुद्दे पूर्वग्रहाने जोडले असल्यास उपाय काय? --------------------------------------------- जो स्वतःच्या घरात, आजूबाजूला प्रत्येक संधीचा फायदा घेऊन पाणी वाचवायचा प्रयत्न करत असेल, त्याचा रंगपंचमीला पाणी वाचवायचा सल्ला संशयामुळे डावलायला कोण जाईल? उलट अशा लोकांचा पॉजिटीव्ह परिणाम होताना दिसतो. याउलट इतर वर्षभर तो काही आपल्या समोरचा महत्वाचा मुद्दा नाही पण रंगपंचमी आली कि इको फ्रेंडली, पाणी वाचवा वगैरे उपदेश येत असतील तर त्याचा परिणाम विपरीतच होणार. याशिवाय धर्माचा संबंध जोडल्यावर तर कल्याणच आहे.

In reply to by नर्मदेतला गोटा

दुसऱ्यांचा बंदोबस्त म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही बिथरलेल्या हिंदुत्वाबद्दल बोलताय तर मी हिंदू का बिथरलेत ते सांगितलंय. खरं तर मला हिंदुत्व का आणि कसं बिथरू शकतं हे कळलं नाही. म्हणजे हिंदू असलेली/ असलेल्या व्यक्ती बिथरू शकतात पण हिंदुत्व कसं काय बिथरेल? माझं म्हणणं आहे की जर पर्यावरणाची एवढीच काळजी आहे तर आक्षेप ज्याने पर्यावरणाचा नाश होतो त्या सगळ्यांवरच घ्यायला पाहिजे. मग त्यात फक्त हिंदूंचे सण किंवा दुसऱ्या जाती धर्माचे सण यात भेदभाव नको. प्रॉब्लेम हा आहे की आक्षेप फक्त हिंदूंवर, हिंदू पद्धतींवर आणि त्यांच्या सणांवर घेतला जातो. हेच आक्षेप घेणारे लोक जेव्हा इतर धर्मांच्या चालीरीतींवर आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर बोलायची वेळ आल्यावर त्यांच्या त्यांच्या धर्माच्या आड आपण यायला नको म्हणून वेळ मारून नेतात. दुसऱ्याच्या घरातलं पाणी नासलं तर मी समजू शकतो. इथे आपल्याच घरातली लोकं नासली आहेत त्याचं काय? सध्या तर हिंदू चालीरीती पाळणे अगदीच डाउनमार्केट समजले जाते. साधा वटपौर्णिमेसारखा किंवा गुढी पाडव्यासारखा सण किंवा करवा चौथ वगैरे सण साजरे करणं म्हणजे अगदीच गावंढळपणा असतो. त्यापेक्षा थँक्स गिविंग, क्रिसमस किंवा ईद वगैरे कसे भारदस्त वाटतात. ईदच्या दिवशी पठाणी वेष घालून भाईजान लोकांना मिठ्या मारणे म्हणजे आपण किती पुढारलेले असतो पण पाडव्याच्या दिवशी झब्बा सलवार घालून आपल्या भाऊबंदांना शुभेछया द्यायच्या म्हणजे अगदीच काहीतरी वाटायला लागतं तेव्हा समजावं आपल्याला पुरोगामित्वाचा रोग जडलाय. देवळात जाणं म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणं असतं. पण तरुण लोक सुद्धा जर कट्टर मुस्लिम चालीरीती पाळत असेल तर तो त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असतो. घरात कोणी साधा सत्यनारायण केला तर गुरुजी त्यांना फसवत असतो. पण मौलाना पैसे घेऊन निकाह हलाला करत असेल तर मात्र ते धार्मिक असतं. स्वतःला आधुनिक पुरोगामी समजणाऱ्या लोकांना राखी पोर्णिमेसारखे किंवा भाऊबिजेसारखे सण साजरे करायला पण आजकाल लाज वाटते. स्वतःच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा आणि चालीरीती यांना मूर्खपणा मानणे या मानसिक प्रदूषणाचे काय करणार ते सांगा.

In reply to by बिटाकाका

दिवसांनी मिसळीत झणझणीत रस्सा लाभला !!! छोटू दोन पाव आणखी दे आणि कांदा-लिंबू आणि. मिसळपाव गिर्हाइक नाखु रोखीवाला आमचे इथे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन मिळेल अश्या दु"कानांवर"पासून सावध रहा,मिपाहितार्थ जारी

फटाके तुम्ही कुणाच्या वस्तीत जाऊन उडवता का ? पाणी तुम्ही इतरांच्या घरातले नसता का ? अफझल खानाचे पोट फाडणे आणि स्वतःचे पोट फाडून घेणे यामधला फरक लक्षात येत असेल तुमच्या.

In reply to by नर्मदेतला गोटा

फटाके तुम्ही कुणाच्या वस्तीत जाऊन उडवता का ? पाणी तुम्ही इतरांच्या घरातले नसता का ?
पाणी कुठेही नासले तरि ते नासलेलेच असते.. प्रदुषण कुठेहि झाले तरी ते प्रदुषणच आहे.. पण मग सिलेक्टीव विरोधच का?... वर्षातुन १ दा येणार्या सणांवर बोलण्याअगोदर सोईस्कररीत्या ३६४ दिवस होणार्या समस्यांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्श करताय.. तुमचा वैचारिक गोंधळ उडालेला दिसतोय.. कदाचित यालाच " बिथरलेले पुरोगामित्व " म्हणावे लागेल..

In reply to by यश राज

यश राज,
पाणी कुठेही नासले तरि ते नासलेलेच असते.. प्रदुषण कुठेहि झाले तरी ते प्रदुषणच आहे.. धन्यवाद, अजून काय पाहिजे मला

In reply to by नर्मदेतला गोटा

खरंच तुमचा गोंधळ झालेला दिसतोय. तार्किक दृष्ट्या विचार केला तर जरी मी माझ्या अंगणात फटाके लावले तरी जमिनीवर झालेला कचरा मी झाडून साफ करू शकतो. पण हवेत झालेल्या किंवा आवाजी प्रदूषणाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा त्रास माझ्यापेक्षा इतरांना जास्त होणार. याचे साधे कारण म्हणजे मी फटाके उडवतोय आणि त्याचा आनंद घेतोय. जर परिणामांचा विचार करायचा झाला तर तो माझ्यावर व आजूबाजूच्या सगळ्यांवर होणार. बरोबर? आता ३६५ दिवसांचा विचार केला तर त्यातले ३-४ दिवस मी फटाके उडवणार, ते सुद्धा संध्याकाळी फार तर १ तास. जर आवाजी प्रदूषणाचा विचार केला तर बांग ३६५ दिवस रोज दिवसातून ५ वेळा दिली जाते. यात पहाटे ४.३०/५ ला पहिली बांग होते ज्यावेळेला सगळे झोपलेले असतात. आजूबाजूची आजारी माणसे, हॉस्पिटल्स याचा विचार न करता रोज हे नित्यनेमाने होत असतं. याचा किती लोकांना त्रास होत असेल याचा विचार करा. याविरुद्ध कोणी आवाज उठवला तर काय होतं यासाठी सोनू निगमचं उदाहरण समोर आहेच. याचबरोबर आपली गणपतीमंडळं सुद्धा १० दिवस का होईना आवाजी प्रदूषण करतात, जे थांबलं पाहिजे. गाडी चालवताना उगाच हॉर्न वाजवला जातो त्याचा त्रास तुम्ही परदेशात राहून आल्यावर कळतो. हवेतील प्रदूषणाचा विचार केला तर कारखाने, गाड्या यामुळे ३६५ दिवस रोज प्रदूषण होताच असतं. विहिरीवरचं डिझेल इंजिन लावून जेव्हा पहिल्यांदा डुक्कर रिक्षा आल्या तेव्हापासून तर अर्धवट इंधन जाळणाऱ्या इंजिनमुळे प्रदूषणात किती वाढ झाली याची कल्पना आहे का? तरीही केवळ स्वतःची सोय म्हणून या रिक्षा भरभरून वापरल्या जातातच ना? शक्य आहे ते दुचाकी, चार चाकी वापरतातच ना? ऑफिसला जाताना किती लोक कारपूल किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात? कारखाने २४ तास जहरी धूर सोडत असतात. पाण्याच्या नासाडीबद्दल आणि प्रदूषणाबद्दल बोलायचं तर शहरांमध्ये रोज गाडी धुण्यासाठी माणूस लावला जातो. रोज गाडी धुण्याची गरज आहे का? शहराच्या बाहेर गेलं की जिथे पाणीसाठा दिसेल तिथे ट्रक/ जीपवाले आपापल्या गाड्या धुवत असतात. दुसऱ्या बाजूला लोक कपडे धुवत असतात. शहरांमध्ये कारखान्यातील नको असलेल्या द्रव्यांचे आऊटलेट्स जवळच्या ओढ्यात किंवा पाणीसाठ्यात सोडलेले असतात. असो. थोडक्यात माझं मत असं झालंय की अजून तुमचे विचार पक्के झालेले नाहीयेत किंवा अजून गोंधळ आहे. धागा बिथरलेल्या "हिंदुत्वा"वर आहे. पण मधेच त्यात पर्यावरण घुसडलंय. हिंदू का बिथरलेत याची कारणं मी आधीच सांगितली आहेत. बिघडलेल्या पर्यावरणाचा विचार करायचा झाला तर याला फक्त हिंदू आणि हिंदू सण जबाबदार नसून संपूर्ण मानवजात आहे. त्या जबाबदारीमधे जातीधर्माचा भेदभाव कशाला करायचा?

In reply to by ट्रेड मार्क

वर्षाचे ३६५ दिवस सातत्याने प्रदूषण करणा-या अनेक गोष्टींकडे संपूर्ण कानाडोळा करून रंगपंचमी, गणेश विसर्जन इ. वरच भर देणे म्हणजे एखाद्याला अपघातात झालेल्या अनेक गंभीर जखमांवर उपचार न करता किरकोळ खरचटलेल्या ठिकाणीच उपचार करत बसण्यासारखं आहे.

पाणी कुठेही नासले तरि ते नासलेलेच असते.. प्रदुषण कुठेहि झाले तरी ते प्रदुषणच आहे.. हे मान्य झाल तर !! त्या पुढे जाऊन हिंदु सुद्धा बिथरलेले आहेत !! हे आता मान्य व्हायला हरकत नाहीय !

In reply to by डँबिस००७

हे मान्य झाल तर !! त्या पुढे जाऊन हिंदु सुद्धा बिथरलेले आहेत !! हे आता मान्य व्हायला हरकत नाहीय !
मुळात माझा आक्शेप होळी व इतर सण यांच्यावर होणार्या आरोपांवर होता.. माझे व बहुतांश मिपाकरांचे एवढेच म्हणणे होते व आहे की बाकीच्या इतर कारणांमुळे होणार्या प्रदुषणाकडे मुद्दाम दुर्लक्श करुन फकत या सणांच्या च्या नावाने खडे फोडणे हे बरोबर नाहि.

बिथरलेले हिंदुच आता युवराजाला जनऊधारी बनण्यास भाग पाडतात आणी त्या २०१९ ला परत हिंदु धार्जिणे सरकार घेऊन येणार !!

In reply to by नर्मदेतला गोटा

आता ही लिंक पहा (इंग्रजी दुवा). १% हिंदूंपैकी कोणाची हिंमत आहे का जय श्रीराम म्हणायची? तेही बलात्कार करून? काय बकवास लावलाय? -गा.पै.

In reply to by नर्मदेतला गोटा

आता या बाबतीत पण कसा भेदभाव केला जातोय बघा. असेच अजून ६ प्रकार गेल्या २-३ महिन्यांमध्ये घडलेत. पण ते कदाचित कोणाला माहीतही नसतील कारण मीडियामध्ये त्याला एवढं कव्हरेज मिळालं नाही. राजकारणी तर त्यांची पोळी भाजून घेण्यात मग्न आहेत. हे वाचा. समस्त कलाकार आणि पुरोगामी वगैरे मंडळी लगेच हिंदू असल्याची लाज वाटते म्हणायला लागली. अश्या आणि या पेक्षा कितीतरी भयानक घटना घडल्या आहेत ज्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक आरोपी आहेत. एका तरी मुस्लिम कलाकाराने किंवा विचारवंताने मी मुस्लिम असल्याची लाज वाटते असं एकदा तरी म्हणलं आहे का? हिंदू पुरोगामी, वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेल त्या घटनेची बातमी देताना किंवा चर्चा करताना मात्र धर्माचं नाव कुठेही येणार याची काळजी घेतात. पण हेच हिंदू आरोपी असले की मात्र धर्मावर आरोप चालू होतात? या मागचं कारण सांगू शकाल का? महंमद अफरोज कोण ते आठवतंय का? एवढं भयंकर कांड करूनही महंमद अफरोजला त्याच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याला २-३ महिने कमी आहेत म्हणून ३ वर्ष किरकोळ शिक्षा होऊन सोडून दिलं. वर आपल्या लाडक्या केजरींनी त्याला १० हजार रुपये मदत देऊन लेडीज टेलर होण्यासाठी मशीन घेऊन दिलं. त्यावेळेला किती पुरोगामी लोकांना आणि मुस्लिम कलाकार/ विचारवंतांना मुस्लिम धर्माची लाज वाटली होती? यावर तुमचं मत सांगा. नुसतं गुळमुळीत इतर घटनांमध्ये पण गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे असं नको. या धाग्यात जसं हिरीरीने हिंदुत्व बिथरलेलं म्हणताय तास अजून एक मस्त धागा काढा ज्यात मुस्लिम/ ख्रिश्चन लोकांनी केलेल्या अत्याचारावर सणसणीत ताशेरे ओढलेले असतील.

पाणी नासावण्यापासुन मुलगी नासवण्या पर्यंत, कस ही करुन हिंदु बिथरलेत हे सिद्ध करायच दिसतय !! कठीण आहे ! बाय द वे , कठुआ केस झाली १७ जानेवारीला , आता ऐप्रिल मध्ये केस बाहेर येतेय !! ह्या केस मध्ये बरच काळ बेर आहे ! पुरी डाळच काळी आहे ! ज्या हिंदु मुलाने तथाकथित रेप केली मर्डर केला तो त्याच दिवशी त्याच वेळेला कठुआपासुन दुर मुज्जफराबादमध्ये परीक्षा केंद्रावर परीक्षा देत होता.