Skip to main content

अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 19/03/2018 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्‍या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात. हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील. आपण अन्नधान्याची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करतो, तेव्हा त्या अन्नाचे पोषणमूल्य जास्तीत असावे यासाठी उत्तम प्रतीच्या बियाणाचा वापर शेती करताना व्हावा याकडे आग्रह आपला असतो. पशुपालनात जास्तीतजास्त दूध देणार्‍या गाईम्हशी, कुक्कुटपालनासाठी जास्तीत जास्त अंडी देणार्‍या कोंबड्या मिळाव्यात यासाठी सर्व जनुकीय तंत्रज्ञान पणाला लावतो. नुकतेच एका प्रसिद्ध दुग्ध उत्पादकाच्या जाहिर मुलाखतीत असे कळले की म्हशीला हमखास म्हैसच होईल असे (म्हणजे लिंगनिश्चितीचे) तंत्रज्ञान आता विकसित झाले आहे. या सगळ्या उपद्‍व्यापामागे माणसे इतर जीवांसाठी जी मूल्ये विकसित करतात ती मूल्ये स्वत:साठी मात्र झिडकारतात. (उदा. द्यायचे झाले तर संततीच्या लिंगाची निवड किंवा उत्तम वाणाची संतती हा विचार मनुष्य स्वत:च्या बाबतीत स्वीकारणार नाही. असो.) मला जे गैरसोईचे सत्य सांगायचे आहे, ते समजण्यासाठी प्राथमिक जीवशास्त्राची उजळणी आवश्यक आहे. सर्व लैंगिक प्रजोत्पादन करणार्‍या जीवांमध्ये जेव्हा मादी गर्भ धारण करते तेव्हा अर्धी गुणसुत्रे (केंद्रकाम्ले) नराकडून शुक्रजंतुच्या मार्फत आणि अर्धी गुणसूत्रे स्त्रीकडून बीजांडाच्यामार्फत येतात आणि गर्भधारणेच्या वेळेला संयोग पावून गर्भ वाढायला सुरुवात होते. यात महत्त्वाचा आणि धक्कादायक पुढे आहे. सध्याच्या काळात शिकून नोकरी करणार्‍या स्त्रिचे लग्नाच्या वेळी सरासरी वय २८-३० असते. म्हणजे आज जन्माला आलेल्या मुलाचे बीजांड त्याच्या आईचा गर्भ तयार होत असताना (तिच्या आजीच्या गर्भधारणेच्या वेळी) तयार झालेले असते. म्हणजे आईकडून मिळणारा जनुकीय वारसा सुमारे ३०वर्षे या जगात अस्तित्वात असतो. त्यात मुंबई, कलकत्ता सारख्या बकाल शहरांमध्ये जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या आईच्या पोटातील बीजांडांवर तेथील प्रदूषण आणि जगण्याचा संघर्ष यामुळे केंद्रकाम्लावर घातक परिणाम होण्यास सुरुवात होते आणि अत्यंत संथपणे बीजांडे किडायला सुरुवात होते आणि सदोष संततीसाठी कारणीभूत ठरते. गर्भधारणेपूर्वी आईला धूम्रपान आणि मद्यपान यांचे व्यसन असल्यास याची गंभीरता अधिक वाढते. यातील काही सदोष संतती नैसर्गिक गर्भपाताच्या रुपाने बाहेर टाकली जाते. पण ते जन्माला येणार्‍या सर्वच जीवांच्या बाबतीत होत नाही आणि काही व्याधी किंवा दोष जन्मत:च घेऊन बाळ जन्माला येते किंवा काही दोष पुढे उत्तर आयुष्यात व्याधींना जन्म देतात. जन्माला येणार्‍या बाळाचा काही (अर्ध्यापेक्षा कमी) जनुकीय वारसा वडिलांच्याकडून येत असला तरी पुरुषांचे शुक्रजंतू तूलनेने ताजे असल्याने सदोष संततीचा दोष (दूर्दैवाने) स्त्रियांकडे जास्त जातो, हा गैरसोईच्या सत्याचा महत्त्वाचा भाग. शुक्रजंतूवर पण ताण आणि प्रदूषणाचे परिणाम होतच असतात आणि प्रजननाची समस्या किती गंभीर बनत चालली आहे, हे अधुनमधुन वाचायला मिळणार्‍या बातम्यांमुळे कळते. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत... सजीवांच्या पेशीतील केंद्रकाम्लाचा शोध १९५३ मध्ये लागला, त्यानंतर पेशीविज्ञानात अधिकाधिक प्रगतीच होत राहीली. संपूर्ण मानवी जनुकसंचाचे तसे़च पेशीकेंद्रकाच्या अंतर्रचनेचे रहस्य शास्त्रज्ञानी आता उलगडले आहे. पेशीच्या केंद्रकामध्ये केंद्रकाम्लाच्या लडी तयार झालेल्या असतात. हिस्टोन या प्रथिनांभोवती एखाद्या रिळाप्रमाणे केंद्रकाम्लाचे वेढे बसलेले असतात. हे वेढे बसण्याची कारणे गमतीदार आहेत - पेशीतील केंद्रकाम्लाची जर नुसती साखळी उलगडली (जिला इंग्लिश्मध्ये क्रोमॅटिन म्हणतात) आणि तिची लांबी मोजली तर ती सुमारे २ मीटर इतकी भरते. आता इतकी मोठी साखळी एका पेशीच्या सूक्ष्म केंद्रकामध्ये बसवण्याचे काम निसर्ग मोठ्या हुशारीने करतो. हिस्टोन हे धनभारित अल्कली गुणधर्माचे प्रथिन असते तर केंद्र्काम्ल ऋणभारित असते. हीस्टोन प्रथिनांना शेपट्या असतात. केंद्रकाम्लातील जनुक, हिस्टोनच्या शेपट्याना कोणते रेणू चिकटतात यावर ते सक्रिय होणे अथवा निष्क्रीय होणे अवलंबून असते. हिस्टोनच्या शेपट्याना सहसा मेथिल, ऍसिटील आणि फोस्फोरिल रेणू चिकटतात. या प्रथिनांभोवती गुंडाळले गेल्यामुळे केंद्रकाम्लाची लांबी आपोआप बरीच कमी होते आणि ते पेशीच्या केंद्रकात व्यवस्थित बसते. हीस्टोन प्रथिनांचे चार मुख्य प्रकार आहेत. ते h1, h2 h3 आणि h4 या सांकेतिक नावांनी ओळखले जातात. हिस्टोनच्या शेपट्याना कार्बन आणि नायट्रोजन यातील एका बाजुला कार्बनचा अणु आणि दूसर्‍या बाजुला नायट्रोजनचा अणु असतो. नायट्रोजनचा अणु असलेली शेपटी जरा लांब असल्याने ती केंद्रकाम्लाच्या हिस्टोनभोवती तयार झालेल्या गुंडाळीतून बाहेर डोकावते. ही हिस्टोन प्रथिने एखाद्या कळीप्रमाणे (स्वीच) जनुकांना सक्रिय, निष्क्रिय करण्याचे काम करतात. गर्भधारणेच्यावेळी आद्य पेशीमध्ये जेव्हा मातेचे आणि पित्याचे केंद्रकाम्ल संयोग पावते तेव्हा या लडीं हिस्टोनसह नवीन जिवामध्ये संक्रमित झालेल्या असतात. पूर्वी म्हटल्याप्रमाणे पित्याकडुन फक्त केंद्रकाम्लाची अर्धी साखळी शुक्रजंतू वाहून आणतात. हिस्टोनची देणगी मात्र आईकडूनच मिळते. पित्याकडून जेमेतेम १०% हिस्टोन मिळतात. आपले पर्यावरण, अन्न आणि जगण्याचा संघर्ष जनुकीय पातळीवर दूरगामी बदल घडवून आणतात, हे सांगणार्‍या अधिजनुकशास्त्राची मुहूर्तमेढ कोनरॅड वॅडींग्टनच्या संशोधनातून 1942 मध्ये रोवली गेली. तेव्हापासून या शाखेची वाढ वेगाने होत असून दरवर्षी प्रसिद्ध होणार्‍या संशोधन निबंधांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. आईवडिलांच्या आणि आईच्या आईच्या जीवनशैलीचे संततीवर जनुकांमार्फत कायमस्वरूपाचे दूरगामी परिणाम होतात, हा अधिजनुकशास्त्राचा महत्त्वाचा संदेश आहे. त्याच बरोबर आपले पर्यावरण, जीवनशैली आपल्या जनुकांना अधिजनुकीय बदलांद्वारे नियंत्रित करते. शारीरिक व्यंगापासून कर्करोगासारख्या गंभीर व्याधीपर्यंत अधिजनुकीय बदलांचा प्रभाव कारणीभूत ठरतो. नुकतेच दिवंगत झालेले विख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग आणि अनेक विद्वान मानवजातीच्या भवितव्यबद्दल धोक्याचे इशारे देत आहे आणि अधिजनुकशास्त्रातील संशोधन या इशार्‍यांना पुष्टी देत आहे. विज्ञानप्रसाराला वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती आणि संघटना याबाबत मूग गिळून गप्प आहेत. आपले जनुक आपल्या कर्तृत्वाचे कारण आपण आजवर मानत आलो आहोत. पण हे जनुक कार्यान्वित होणे अथवा निष्क्रिय होणे हे आपली जीवनशैली आणि पर्यावरण यावर अवलंबून असेल. त्यामुळे आपले कर्तृत्व मनगटापेक्षा आजुबाजुच्या वातावरणाने जास्त नियंत्रित होईल. खगोलशास्त्रापेक्षा जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र जर लोकप्रिय झाले तर समाजाचा जास्त फायदा होईल असे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 48913
प्रतिक्रिया 151

प्रतिक्रिया

In reply to by राही

गेल्या शतकाच्या सुरुवातीला हिंदुस्थानी स्त्रियांची लाइफ एक्स्पेक्टंसी अवघी तेवीस
आणि
पंधरासोळा अपत्यांपैकी .........
च्यायला, सॉलिड पर्फॉमन्स आहे कि.

@युयुत्सु स्थूलपणा, मधुमेह, बालदमा इ० असंख्य विकार हे किडकेपणाचे निदर्शक नाहीत का? मग हे किडके बीज काढून टाकायला काय करायला पाहिजे? आणि आयुर्वेदात मधुमेह तर इसवीसनापूर्वी पासून( चरक संहितेत) सांगितलेला आहे. म्हणजे हे किडकं बीज तेंव्हा पासूनच आहे तर? मुंबई कलकत्ता हि शहरे तर तेंव्हा नव्हतीच. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे तुकोबाराय लिहून गेले. तसे करायला हे किडकं बीज मुळातूनच नष्ट करून शुद्ध बीज निर्माण करायला पाहिजे म्हटले तर वंशविच्छेदच करायला लागेल. भारतात साधारण २० कोटी लोकांना मधुमेह आहे. त्यात साधारण एक कोटी दम्याचे रुग्ण आहेत. India Has Second Highest Number Of Obese Children In The World, Says New Study China with 15.3 million and India with 14.4 million had the highest numbers of obese children; https://www.huffingtonpost.in/2017/06/14/india-has-second-highest-numbe… अशा २२ कोटी लोकांना नष्टच करून टाकायला पाहिजे, नाही का?

श्री सुबोध खरे तुम्हाला ताजे प्रतिसाद पहाता अधिजनुकीय संक्रमण आणि जनुकीय संक्रमण यातला फरक तुम्हाला कळलेला नाही किंवा तो मान्य करायचा नाही असे दिसते, त्यामुळे मला आता तुमच्याशी युक्तीवाद करण्यात रस संपत आला आहे. तरीही तुमच्या खालील युक्तीवादातील फोलपणा दाखवून दिल्या शिवाय राहवणार नाही. "Children inherit new mutations when they build up in the father’s sperm and the mother’s eggs. Men pass on more mutations than women because they make sperm throughout their lives, using a process that is not perfect at copying DNA. And so, as the man ages, his sperm accumulate more and more mutations. Women pass on fewer mutations because they tend to be born with their full complement of eggs." आपण क्षणभर असे मानुया की म्युटेशन्स फक्त पुरुषांमध्येच होतात आणि बीजांडात ती होत नाहीत. तरीही स्त्रीकडून बीजांडाद्वारे पुढे जाणारे केंद्रकाम्ल (डिएनए) हे अगोदरच्या पिढीतील पुरुषांकडून आले असल्याने त्यात म्युटेशन्स असू शकतात. अधिजनुकीय वारसा जास्तकरून स्त्रीकडुन येतो. हा जनुकीय वारशापेक्षा वेगळा असतो याकडे तुम्ही जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहात. याशिवाय गर्भधारणा झाल्यावर म्युटेशन्स होत नाहीत किंवा गर्भ किडत नाही असे आपल्याला म्हणायचे का याचा खुलासा करावा व मी सर्वप्रथम दिलेला हा ताजा संदर्भ पहावा. Sheng Ren et al. Periconception Exposure to Air Pollution and Risk of Congenital Malformations, The Journal of Pediatrics (2017) http://www.jpeds.com/article/S0022-3476(17)31330-6/fulltext मला आता तुमच्या बरोबर युक्तीवादात रस उरलेला नाही!

In reply to by युयुत्सु

मला आता तुमच्या बरोबर युक्तीवादात रस उरलेला नाही! हांगाश्शी आता कसं लायनीवर आलात. अगोदर पांढरी पाच मध्ये गायचं आणि मग सूर तालाचा मेळ बसत नाही समजल्यावर या मैफिलीत श्रोत्यांना गायनाचे अंगच नाही म्हणून शेपूट घालायची. जाता जाता --गायकाचा "सूर चुकला" हे समजण्यासाठी स्वतः कसलेला गायक असावं लागत नाही. तुमच्या हाताला एक सुंदर मोती लागला तर तोच जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे म्हणून डांगोरा कशाला पिटायचा. जगात इतर अनेक उत्तमोत्तम रत्ने आहेत आणि अनेक रत्नपारखीही आहेत. मीच हुशार म्हणण्याचा काय फायदा? खगोलशास्त्रापेक्षा जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र जर लोकप्रिय झाले तर समाजाचा जास्त फायदा होईल असे वाटते. उगाच काहींच्या काही याऐवजी जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र पेक्षा पर्यावरण आणि त्याचे संवर्धन याचे शास्त्र जर लोकप्रिय झाले तर पर्यावरणाच्या हानीमुळे होणारे जनुकीय परिणाम थांबवून समाजाचा जास्त फायदा होईल असे मी म्हणेन. उगाच "जनुकशास्त्र आणि अधिजनुकशास्त्र" सारखे अतिशय किचकट विषय सर्वसामान्य माणसांमध्ये लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करून तुम्ही काय उखाडणार आहात.

In reply to by युयुत्सु

हायला http://www.jpeds.com/article/S0022-3476(17)31330-6/fulltext Increased exposure to PM2.5 in the periconception period is associated with some modest risk increases for congenital malformations. The most susceptible time of exposure appears to be the 1 month before and after conception. Although the increased risk with PM2.5 exposure is modest, the potential impact on a population basis is noteworthy because all pregnant women have some degree of exposure. हा दुवा तुम्ही स्वतः तरी नीट वाचला आहे का? मग मी दिलेला चुलीच्या धुरामुळे होणारे ग्रामीणस्त्रियांवरील दुवा Chulhas linked to 25% of pollution-related deaths in India https://timesofindia.indiatimes.com/india/chulhas-linked-to-25-of-pollu… वाचला का? नीट वाचा. The study found that the burning of biomass or solid fuel was the biggest source of PM 2.5 in both cities and villages.The situation could be worse as the study did not measure its indoor impact. त्यातून त्या अभ्यासाचं श्रेय मुंबई आय आय टी च्या संशोधकांकडे च जाते( आपलेच अल्मा मातेरं) उलट तुमच्या दुव्याचा आणि माझ्या दुव्याचा साकल्याने विचार केला तर २५ % ग्रामीण जनता किडलेली आहे असाच अर्थ निघतोय. याइतका सेल्फ गोल मिपाच्या इतिहासात झाला नसेल. आपली तारीफ करावी तितकी थोडीच.

In reply to by सुबोध खरे

उलट तुमच्या दुव्याचा आणि माझ्या दुव्याचा साकल्याने विचार केला तर २५ % ग्रामीण जनता किडलेली आहे असाच अर्थ निघतोय. मी हसून-हसून पुरता बेजार झालो आहे.

इथे श्री गोदे यांनी उकळत्या तेलात हात घालुन जिलब्या तळणार्‍या माणसाचे उदाहरण दिले आहे. इथे ही त्यांचा गोंधळ उडाला आहे
मुळात उदाहरण कश्यासाठी दिले आहे हे समजुन घ्या. उगाच गोंधळ उडवुन घेवु नका स्वता: चा अडॉप्शन कसं सुरु होतं हे समुजुन घेण्यासाठीची ती उदाहरणं आहेत. तुम्हाला समजावे म्हणुन उचकटून सांगतो. Goat यातील बक-या बघा त्यांचे खुर हे विशिष्ट पध्द्तीचे आहेत सोबतच शरीर रचना ही खुल्या मैदानात सापडणा-या बकरी पेक्षा वेगळी आहे. आता विचार करा, ही बकरी ह्या पहाडी -खडकाळ भागात खुल्या मैदानातुन पहील्या वेळेस गेली असेल तेंव्हा निश्चितच तिचे खुर त्या भागात रहाण्यासाठी पुरक नसणार पण सतत पिढ्यान पिढ्या तेथे राहील्या मुळे पुरक जेनेटीक बदल झाले आहे. विषय निट समजुन घ्या प्रतिक्रीया द्यायची घाई करु नका, आणि एकदम सगळ्यांना उकळत्या पाण्यात टाकुन कस होतं अडॉप्शन हे पाहण्याच्या मानसिकतेतुन बाहेर या. लहानपणी किडुक-मिडुक तब्बेत असलेल्या लोकांनी मोठ्यापणी दमदार कार्य केले, अशी भरपुर उदाहरणे आहेत.

ते आई कडून जास्त वारसा जातो वालं वाक्य सोप्या शब्दात सांगा की उलगडून. फारच इंटरेस्टिंग वाक्य आहे. आई आणि बाबा दोघे समान क्रोमोझोम्स देतात (काही तरी X आणि Y वाला फंडा होता, त्यात मुलींकडे Y नसतोच, त्यामुळे उलट काही दोष येत नाहीत असे काही तरी खूप बेसिक पाठयपुस्तकात वगैरे वाचल्या सारखं वाटतंय.) तरीही आई कडून जास्त वारसा का आणि कसा येतो? तो केवळ दोषच पुढे देतो की इतर काही चांगल्या गोष्टी सुद्धा?

In reply to by पिलीयन रायडर

अरे ह्या धाग्यावरच्या कुणीतरि अधिकारी, ज्ञानी, विचारवंतानी ह्यांना अपेक्षित असे उत्तर देउन टाका ना प्लीज.

In reply to by अभ्या..

किडकी प्रजाचा कधी कधी एकदम अर्थ लागूनच जातो.. असो.. आयुष्यात थोडीशी बायोलॉजी शिकल्याने इंटरेस्ट आहे. लेकरं बाळं आहेत त्यामुळे आईकडून मुलांना खरंच काही दोष अधिक प्रमाणात जातात का हे जाणून घेण्याची इच्छा आहे.(असतात लोकांचे काही ज्येनुईन प्रश्न). ज्यांचे मेंदू ही इवलीशी गोष्ट समजू शकत नसतील त्यांनी ते किमान माझ्या प्रतिक्रियेवर लावू नयेत. मंडळ ऋणात राहील.

In reply to by पिलीयन रायडर

श्री.अभ्या.., मी काही ज्ञानी,विचारवंत वगैरे नाही. तरीसुद्धा लिहिण्याचे धारिष्ट्य करीत आहे. ज्ञानी मोड ऑन : युयुत्सूंचे म्हणणे असे दिसते की (कां तर,)बीजांडे प्रत्यक्ष फलनापूर्वी प्रदीर्घकाळ (अगदी गर्भावस्थेपासून) स्त्रीशरीरात अस्तित्वात असतात आणि त्या मानाने शुक्रजंतू हे ताजे असतात; पर्यावरण, बदललेल्या जीवनपद्धतीचे ताणतणाव, खाणेपिणे वगैरेंचा परिणाम बाह्य शरीरावर आणि शरीरांतर्गतसुद्धा होत असतो; अशा स्थितीत बीजांडे प्रदीर्घकाळ शरीरात राहात असल्यामुळे त्यांच्यावर हा परिणाम शुक्रजंतूंपेक्षा अधिक प्रमाणात होत असतो. त्यातून अलीकडे (करीयर, नोकरी इ.मुळे- इति युयुत्सु) मुलींच्या लग्नाचे आणि प्रजोत्पत्तीचे वय वाढल्यामुळे बीजांडांना पूर्वीपेक्षा अधिक काळ अफलित राहावे लागते आणि तितका अधिक काळ अनिष्ट/प्रतिकूल बाबींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे फलनाच्या वेळी ती पूर्वीच्या काळापेक्षा अधिक प्रमाणात किडलेली असतात. त्यामुळे पूर्वीच्या काळापेक्षा सध्या अधिक प्रमाणात किडकी प्रजा निपजते. माझे ज्ञान संपले. ज्ञानी मोड ऑफ.

In reply to by राही

हा मुद्दा कळलाय मला. पण हे तेव्हा खरं आहे जेव्हा तुम्ही एखाद्या दोषाबाबत बोलत आहात. म्हणजे वारसा सारखाच जातोय (quantitatively) , हां आता वरच्या थिअरी नुसार क्वालिटीवाईज आईकडून दोष पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे. पण दोन सुदृढ निरोगी माता पित्यांकडून सारख्या प्रमाणात जनुकीय वारसा जात आहे. तो वारसा दोषी आहे किंवा कसे हा वेगळा प्रश्न झाला. शिवाय खरे काकांनी काही तरी एक दुवा दिलेला दिसतोय ज्यात स्पर्म्स मधून असे दोष जाण्याची शक्यता आहे असे काहीसे लिहिलेले दिसते. ते एक वाचून बघतेय.

In reply to by पिलीयन रायडर

पि रा ताई आई कडून जास्त वारसा का आणि कसा येतो कोणत्याही पेशींमध्ये डी एन ए हे प्रामुख्याने केंद्रात असतात याशिवाय मायटोकाँड्रिया या पेशीद्रव्यात(cytoplasm) असलेल्या अंगात पण काही डी एन ए असतात. जेंव्हा स्त्री बीजाचे आणि शुक्राणूंचे मिलन होते तेंव्हा शुक्राणूंच्या केंद्रकातील गुणसूत्रे हि स्त्रीबीजाच्या गुणसूत्रांशी एकत्र होतात. परंतु शुक्राणूंच्या पेशीद्रव्यात असलेल्या मायटोकाँड्रियाचाआपोआप ऱ्हास होतो. त्यामुळे गर्भ तयार होतो तेंव्हा शुक्राणू आणि स्त्रीबीज याच्या केंद्रकातील डी एन ए यांचे प्रमाण सारखे असते पण स्त्रीबीजातील मायटोकाँड्रिया मधील डी एन ए गर्भात उतरतात. यामुळे गर्भाच्या डी एन ए मध्ये आईच्या डी एन ए चे प्रमाण अंशतः जास्त असते. कालच हा प्रतिसाद जास्त सविस्तर दिला होता पण तो का गंडला कारण माहिती नाही.

In reply to by सुबोध खरे

अच्छा! आता समजले. अंशतः जास्त वारसा नक्की किती फरक पाडू शकतो? कारण युयुत्सु ज्या प्रकारे लिहीत आहेत, त्यावरून माझा असा समज झाला की आई बऱ्याच प्रमाणात गोष्टी कंट्रोल करते. मी तुम्हाला हे उत्सुकता म्हणून विचारते आहे. धाग्याकर्त्याचा उद्देश तर आता लक्षात आलाच आहे =))

आपली जीवनशैली, अधिजनुकशास्त्र आणि आरोग्य या विषयाशी संबंधित डॉ० जगन्नाथ दीक्षित (एम०डी०, अमेरिका) आणि मी लिहीलेले पुस्तक लवकरच प्रसिध्द करायचा आमचा प्रयत्न चालु आहे. या पुस्तकातील काही भाग अमेरीकतील ’एकता’ या नियतकालिकात अगोदरच प्रसिध्द झाला आहे. तेव्हा मिसळपाववर हा विषय हाणून पाडायचा जरी कितीही प्रयत्न झाला तरी ते चहाच्या पेल्यातील वादळ ठरेल याची मला खात्री आहे.

In reply to by युयुत्सु

हा विषय हाणून पाडण्याचा प्रश्नच नाही. कारण जी वस्तुस्थिती आहे ती आहेच पण तुम्ही जी हास्यास्पद आणि भंपक विधाने केली आहेत त्याला हा विरोध आहे. डॉ जगन्नाथ दीक्षित हे अत्यंत विद्वान डॉक्टर आहेत आणि त्यांची विधाने तुम्ही विपर्यस्त स्वरूपात मांडली आहेत एवढेच सांगणे आहे. खेड्यातील चुली तीलSpm 2.5 चा दुवा दिला आहे तोही तुम्ही नीट न वाचताच प्रतिसाद दिला आहे. अर्थात असे काही डॉ दीक्षित करणार नाहीत याची मला खात्री आहेच. आपल्या पुस्तकाला शुभेच्छा.

In reply to by मार्मिक गोडसे

माझा जेनेटिक इंजिनिअरिंगचा अभ्यास नाही. त्यामुळे मी त्यावर काही बोलु शकणार नाही.

In reply to by युयुत्सु

अशी पुस्तकं लै आहेत हो. जो माणूस कर्करोगाच्या उपचारात काम करतो (मी त्यात ९ वर्षे काम केले आहे) त्याला या गोष्टी "अभ्यासक्रमातच शिकवल्या" जातात हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण यावरून मुंबई कलकत्ता सारखी शहरं बकाल आहेत आणि खेड्यातील हवा शुद्ध आहे अशा तर्हेचा भंपक दावा तुम्ही केला. तो खोडूनहि दाखवला आहे अशा अनेक भंपक दाव्यांबद्द्लच आमचे आक्षेप आहेत. तर तुम्ही म्हणताय कि एपिजेनेटिक्स तुम्हाला मान्य नाही म्हणून तुमचा "थयथयाट" चालू आहे. हे तुमचे अनुमानच "बिनबुडाचे आणि भंपक" आहे. बाकी असे सनसनाटी दावे जर तुम्ही पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी करत असाल तर तो प्रयत्न निम्न दर्जाचा आहे असेच खेदाने नमूद करावे लागेल.

In reply to by सुबोध खरे

शहरांपेक्षा 'तुलनात्मक दृष्ट्या' बऱ्यापैकी स्वच्छ असते असे म्हणले तर आपल्यामते चूक का बरोबर असेल डॉक्टर सर? बाकी धागलेखकांचा इगो ह्या विषयावर नो कॉमेंट्स.

लेख आवडला आणि पटला देखील. तरीही सत्य हेच आहे की सध्या ज्या प्रकारे प्रजनन चालू आहे ते तसेच राहणार आहे

बाकी असे सनसनाटी दावे जर तुम्ही पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी करत असाल तर तो प्रयत्न निम्न दर्जाचा आहे असेच खेदाने नमूद करावे लागेल. असे दावे करणारे लेख उडवून लावावे.

"पण उत्तम संतती होण्याकरता 19 Mar 2018 - 6:43 pm | युयुत्सु "पण उत्तम संतती होण्याकरता तुम्ही उपाय सुचवले नाहीत" त्याविषयीचे संशोधन अजुन तरी माझ्या वाचनात नाही. काही उपाय सूचतात पण ते वादग्रस्त ठरू शकतात. - मुंबईसारख्या महानगरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलींशी लग्न न करणे ह्याचा अर्थ काय होतोय?

In reply to by मार्मिक गोडसे

ह्याचा अर्थ काय होतोय? खेड्यात शहरांपेक्षा हवा शुद्ध असू शकते (मोठे उद्योग जवळ नसतील तर) पण
ह्याचा अर्थ
खेड्यात हवा शुद्ध असते असा नक्की होत नाही. आकलनशक्तीचा आणि अधि जनुकीय बदलांचा काही संबंध असावा की काय याचा तपास आता करावा म्हणतो.

१००% शुद्ध असते असा दावा कोणी करत असल्यास तो जितका हास्यास्पद असेल तितकाच हास्यास्पद दावा म्हणजे शहरे अन खेडी ह्यांच्यात हवे संबंधी काहीच फरक नाही असे म्हणणेही असेल, इतर धाग्यावर मांडल्याप्रमाणे बाकी चालूद्या!

In reply to by मार्मिक गोडसे

माझा प्रश्नच मूलतः इतका खोलात जाणारा नाहीये, खेड्यातील हवा तुलनात्मक दृष्ट्या स्वच्छ असते की नाही का खेडी अन शहरे ह्यात कवडीचाही फरक नाही असे वाटते का? इतकंच विचारतोय, मला त्याहून जास्त कळत नाही पण म्हणून एक साधा प्रश्न मांडण्यावर बंदीही नसावी गोडसे साहेब, कसे?

अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान सगळी बरोबर/चूक मतमतांतरे वादविवादासाठी ठीक/क्षम्य आहेत, पण... लेखाच्या शिर्षकातील "एक गैरसोईचे विज्ञान" या शब्दांचे प्रयोजन समजले नाही ? "खळबळजन विधान करून आपल्याकडे लक्ष वेधणे" हा उद्येश असला तर तो राजकारणात आणि व्यापारात (येन केन प्रकारेन... न्यायाने) नेहमी वापरला जाताना दिसतो (तेथेही 'तो नीतिमान असतो की नाही' हे पण विवादास्पद आहेच). मात्र, शास्त्रिय व्यवहारात तो टाळणेच जास्त शास्त्रिय असेल ! कोणतेही विज्ञान मानवाच्या ज्ञानात भर टाकतेच... मग ते फायद्यांची कल्पना देणरे असो की धोक्यांची. कारण फायद्याच्या विज्ञानाने जसे मानवी जीवन विकसित करता येते त्याप्रमाणेच धोक्याचे ज्ञान देणार्‍या विज्ञानामुळे, त्या धोक्यांची नीट कल्पना आल्यामुळे, त्यांच्याविरुद्ध उपाययोजना शोधणे जास्त सोपे होते. थोडक्यात, कोणतेही विज्ञान गैरसोईचे नसते. पूर्ण विराम ! बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अगदी सहमत! नुसता चर्चेला विषय असता तर खरच आवडलं असतं. पण ही एक तर पुस्तकाची जाहिरात आहे, शिवाय उगाच सनसनीखेज टायटल मुळे हेतू अजिबातच सरळ वाटत नाहीत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गैरसोईचे सत्य सांगणारे विज्ञान म्हणून उपहासाने म्हटले . हे कळले नसले तर ते माझे दूर्दैव!!

In reply to by युयुत्सु

तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही तुमचे म्हणणे शास्त्रिय आहे असा आग्रह धरलेला दिसत आहे. उपहास फारतर, विनोदी, नाटकिय किंवा राजकिय लेखांमध्ये चपखल बसू शकतो. शास्त्रिय लेखात/विवेचनात, उपहास,... (अ) "अशास्त्रिय" गणला जातो, (आ) त्याला अनेक "साधार" नकारात्मक अर्थ फुटतात (उदा: हाती सबळ पुरावे/तर्क नसल्यामुळे विषयाचा रोख बदलण्यासाठी विरोधी मुद्द्याची/व्यक्तीची खिल्ली उडवणे, आपली/आपल्या विषयाची जाहिरात करण्यासाठी खळबळजनक विधान करणे, इत्यादी), आणि त्यामुळे, (इ) तो आपल्याच मूळ मुद्द्याचे महत्व/गांभिर्य कमी करतो, ...इकडे लक्ष वेधत आहे. बाकी तुमची मर्जी. :)

माझा प्रश्नच मूलतः इतका खोलात जाणारा नाहीये, मुळात हा विषय खोलात जाउन चर्चीला जाण्यासारखा आहे. खेड्यातील हवा तुलनात्मक दृष्ट्या स्वच्छ असते की नाही का खेडी अन शहरे ह्यात कवडीचाही फरक नाही असे वाटते का? खेड्यात हवेचं प्रदुषण नसतं असं आपल्याला म्हणायचं आहे काय?

In reply to by मार्मिक गोडसे

भरपूर प्रदूषण असतं खेडेगावात, नाही कोण मूर्ख म्हणेल. फक्त ते शहरांपेक्षा तुलनेने कमी असतं इतकंच म्हणायचा मी प्रयत्न करतोय, मी ग्रामीण नाही अन मुंबई-कलकत्त्याला राहणारही नाही, त्यामुळे मला तरी अमुक एकच व्यवस्था उत्तम बाकी टाकाऊ हा विचार मानवत नाही. बाकी कोणाच्या शेपटावर पाय द्यायचा उद्देश नव्हता. कोणाचा ग्रामीण/शहरी अहंगंड दुखावला असल्यास सपशेल माफी.

शुद्ध अशुद्ध राहू दे एक मिनिट. फार फार पूर्वी पार अगदी महाभारत काळात वगैरे सुदधा अपंग मूल जन्माला येत होतेच. आपल्या आजी आजोबांच्या काळात मृत्यूदर बराच जास्त होता, आयुष्यमानही कमी होते. तेव्हा तर इतका बकालपणा सुद्धा नव्हता. शेतात वाढलेल्या आणि अगदी शुद्ध म्हणता येईल असं अन्न मिळालेल्या माझ्या साबांना हृदयाचा मोठा त्रास जन्मतः आहे. त्यांच्या आईचं जीवन तर किती निरोगी असेल.. मुदलात दिवसेंदिवस अन्न पाणी हवामान हे खराब होत चालले आहे आणि त्यामुळे होणाऱ्या बाळाला असणारे धोके वाढत चाललेत हे कळायला पुस्तक लागत नाही. पण सोबतच ते धोके शोधू शकणारे तंत्रज्ञान सुद्धा विकसित होते आहे की. पूर्वी पेक्षा गर्भवती स्त्रियांना जास्त सोयी सुविधा, औषधे उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग होणारच.

In reply to by पिलीयन रायडर

पण सोबतच ते धोके शोधू शकणारे तंत्रज्ञान सुद्धा विकसित होते आहे की. पूर्वी पेक्षा गर्भवती स्त्रियांना जास्त सोयी सुविधा, औषधे उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग होणारच. हे मला पूर्णपणे पटलेलं आहे, किंवा अमुक शहरी जनता किडकी वगैरे म्हणणे मी निषेधार्ह मानतो(च). पण, तुमच्या साबांना जन्मतः त्रास होता म्हणून एखादा मुद्दा सिद्ध होतोच हे सार्वत्रिकरण मात्र मला नाकारावे लागते आहे. मुदलात दिवसेंदिवस अन्न पाणी हवामान हे खराब होत चालले आहे आणि त्यामुळे होणाऱ्या बाळाला असणारे धोके वाढत चाललेत हे कळायला पुस्तक लागत नाही. हे ही मान्यच, काही मुद्दे आहेत मांडायला पण असो, उगाच नकळत तुम्ही किंवा इतर कोणी दुखावलं तर पंचाईत होईल, त्यापेक्षा नकोच. (कॉन्फलिक्ट टाळणारा) वांडो

In reply to by जेम्स वांड

वैयक्तिक अजेंडे नसतील तर माझी तरी काही हरकत नाही कोणत्याच मुद्द्याला. साबा हे अर्थात एक उदाहरण आहे, मुद्दा इतकाच की पूर्वी सुद्धा अगदी खेडोपाडी (बकालपणा नसलेल्या ठिकाणी) जन्मतः काही त्रास असणारी मुलं जन्माला येत होतीच. मला जीवनमानाचा दर्जा घसरला आहे हे मान्य आहे, पण म्हणून जास्त अपंग मुलं जन्माला येत आहेत, ते ही शहरांमध्ये असे वाटत नाही. जीवनशैली बदलत आहे आणि त्यामुळे आरोग्य धोक्यात येतेय वगैरे ठिके. पण किडकी प्रजा हे मान्य नाही. त्याला काउंटर करणारे तंत्रज्ञान सुद्धा आले आहे.

इथल्या थयथयाटवीरांनी जिवाच्या आकांताने मी कसा चुकलो आहे हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला, पण त्यांना अधिजनुकशास्त्र काय कळलं आहे, हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची!

काही उपाय सूचतात पण ते वादग्रस्त ठरू शकतात. - मुंबईसारख्या महानगरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलींशी लग्न न करणे - गॅस सबसिडी सोडून देण्याचे जसे आवाहन करण्यात आले होते तसे प्रजननाचा हक्क सोडून द्यायचे आवाहन करायचे आणि अशा व्यक्तींचे भरपूर उदात्तीकरण करायचे. त्यांचे उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात जाईल याला प्राथमिकता द्यायची हि वाक्ये आपल्याच प्रतिसादातील आहेत मुबईसारख्या शहरात वाढलेल्या मुलींच्या बोजांडांवर इतर शहरात वाढलेल्या मुलींच्या बीजांडांच्या तुलनेने अधिजनूकीय परिणाम इतक्या फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे याचा तुमच्या कडे काहि सज्जड पुरावा आहे का? अन्यथा असा बेफाट आरोप या मुलींवर प्रचंड अन्याय करणारा आहे असे आपल्याला वाटत नाही का? प्रजननाचा हक्क सोडून द्यायचे आवाहन कुणाला करायचे? शहरात जन्माला आलेल्या मुलींना का? आणि त्यांचे उर्वरित आयुष्य "मुलाबाळांशिवाय" सुखासमाधानात जाईल याला प्राथमिकता कशी द्यायची. आपले वंश सातत्य कायम राहावे हि कोणत्याही जीवाची अत्यंत नैसर्गिक उर्मी आहे आणि आपण निसर्गाकडे जाण्यासाठी निसर्गाच्या विरुद्ध जायला सांगत आहात असे वाटत नाही का? अत्यंत गरीब आणि दीन माणूस सुद्धा आपल्या आजारी मुलासाठी जीवाचे रान का करतो? एक वेळचे जेवण सुद्धा ज्याला परवडत नाही असा माणूसही मूल होण्यासाठी कष्ट आणि पैसे खर्च का करतो? मतिमंद आणि कधीही स्वतःच्या पायावर उभे राहणार नाही हे माहित असताना सुद्धा आईबाप मुलासाठी आपले आयुष्य का वेचतात हे आपल्याला समजत नसेल तर काय म्हणायचे? अरेरे जीवशास्त्राबद्दल पुस्तक लिहिताना तुम्हाला मूलभूत जीवशास्त्र समजलेच नाही असेच वाटते.

In reply to by सुबोध खरे

अन्यथा असा बेफाट आरोप या मुलींवर प्रचंड अन्याय करणारा आहे असे आपल्याला वाटत नाही का? आपण क्षणभर असे मानूया की मी या मुलींवर अन्याय करतोय. पण याच मुली ज्या पिढीला जन्माला घालणार आहेत त्या पिढीवर मात्र १००० पट अन्याय होणार आहे. औषधीविज्ञानात प्रगती होत असली तरी त्यात जे असंख्य अथडळ्यांचे टप्पे असतात त्याचा अंदाज मला असल्याने मी भाबडा आशावाद बाळगू शकत नाही. तुम्ही माझ्याकडे पुरावा मागत आहात. माझ्याकडे तो पुरावा नक्की नाही. पण जे पुरावे उपलब्ध आहेत त्यातून जे इशारे मिळत आहेत त्यांचा अन्वयार्थ लावण्या इतका निर्बुद्ध मी नक्कीच नाही. मुळात जो पुरावा तुम्ही मागत आहात तो प्रश्न तपासण्यासाठी आवश्यक ते संशोधन भारतात केले जाईल का याची मला शंका आहे. आपण १० वर्षांनी परत भेटू आणि परिस्थितीचा आढावा घेऊ... इतर देशात अधिजनुकीय संशोधन नक्की पुढे गेले असेल. मला वैद्यकीय जगतात डॉक्टरांचे दोन प्रमुख प्रकार आढळले आहेत - १ला प्रकार लोकांना शहाणे करण्यासाठी झटतो. २र्‍या प्रकारातले डॉ. लोकं अडाणीच राहावेत याबाबत आग्रही असतात. तुम्ही मला या दूसर्‍या प्रकारातले दिसता. अधिजनुकशास्त्र बहुधा तुम्ही ऑप्शनला टाकले असावे. आणि हो, मला जर बेसिक जीवशास्त्र कळत नसत तर डॉ० दीक्षितांसारख्या विद्वानाने माझ्यासारख्याला ’सहलेखक’ म्हणुन बरोबर घेतले नसते. अवांतर - मला एक कळत नाहीये मी तुम्हाला प्रतिसाद देण्यात वेळ का घालवतोय?

In reply to by युयुत्सु

२र्‍या प्रकारातले डॉ. लोकं अडाणीच राहावेत याबाबत आग्रही असतात. तुम्ही मला या दूसर्‍या प्रकारातले दिसता. अधिजनुकशास्त्र बहुधा तुम्ही ऑप्शनला टाकले असावे. आपण काढलेले अनुमान चूक आहे. मिपावरच बऱ्याच वेळेस गरोदर असणाऱ्या/ होऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांना मद्यपान धूम्रपान करू नये अशा तर्हेचे अनेक प्रतिसाद मी दिलेले आहेत. याचे कारण मी स्वतः कर्क रोग क्षेत्रात ९ वर्षे काम केले आहे वंध्यत्व क्षेत्रात ७ वर्षे काम केले आहे आणि आजही जन्मजात व्यंग शोधण्याच्या सोनोग्राफीत मी काम करत आहे( गेली २७ वर्षे). तेंव्हा अधिजनुक शास्त्र ऑप्शन ला टाकणे हे मला शक्य नव्हते किंवा नाही. बाकी लोक अडाणी राहून मला काय फायदा होणार आहे हे समजले नाही. मी भयगंड (FEAR PSYCHOSIS) निर्माण करण्याच्या विरुद्ध आहे. मुंबई कलकत्ता सारखी शहरे बकाल आहेत म्हणून तुम्ही येथे किंवा अशा ठिकाणी राहणाऱ्या माणसांनी पुनरुत्पादन करू नका म्हणून जो भयगंड निर्माण करत आहेत त्याला माझा स्पष्ट विरोध राहील. आहार निद्रा भय मैथुन या चार नैसर्गिक उर्मी आहेत. याना सद् घालून आपले उत्पादन भरपूर विकत येते हा विपणनशास्त्राचा(MARKETING)आद्य धडा आहे. मी येथे काहीही विकायला येत नाही. मला मिळणाऱ्या पैशात मी समाधानी आहे आणि मला प्रसिद्धी मिळावी याची मला कोणतीही हाव नाही. माणसांच्या दुःखावर फुंकर घालता येत नसेल तर निदान त्याला घाबरवून सोडू नये एवढे मूलभूत वैद्यकीय शास्त्र मला समजते. बाकी अवांतर - मला एक कळत नाहीये मी तुम्हाला प्रतिसाद देण्यात वेळ का घालवतोय?हे मात्र खरे

In reply to by सुबोध खरे

बाकी अवांतर - मला एक कळत नाहीये मी तुम्हाला प्रतिसाद देण्यात वेळ का घालवतोय?हे मात्र खरे
:)

इथल्या थयथयाटवीरांनी जिवाच्या आकांताने मी कसा चुकलो आहे हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला आपल्यासाठी जीवाचा आकांत करावा इतके आपण स्वतः ला मोठे समजता का? तसे असेल तर त्याला delusion of grandeur म्हणावे लागेल https://psychcentral.com/encyclopedia/delusion-of-grandeur/ आणि तसे नसेल तर आपल्या मूळ समजूतीतच घोटाळा आहे असे समजायला हरकत नाही.

In reply to by सुबोध खरे

आपण स्वतः ला मोठे समजता का?
मी स्वतःला मोठा समजत नसलो तरी मी मांडलेला विषय नक्कीच मोठा आहे. अर्थात ते तुम्हाला समजले असते तर असा निरर्थक वाद घातला नसता.

आम्ही "किडकी प्रजा" जन्माला घालायची का? हा प्रश्न लोकांनी व्यवस्थेला विचारायला हवा. पण लेखाच्या सुरुवातीला कबूल केल्या प्रमाणे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा उद्योग मी केला असल्याने मला सुळावर चढवले जाइल याची मला कल्पना होतीच.

In reply to by युयुत्सु

"हा प्रश्न लोकांनी व्यवस्थेला विचारायला हवा" व्यवस्थेला म्हणजे नक्की कुणाला? कुठे अर्ज करायचा? कुणाच्या नावाने करायचा? त्याचा पाठपुरावा कसा करायचा?