Skip to main content

देव आहे का नाही...वाद कशाला? स्वतःच पडताळून पाहा आणि ठरवा

लेखक क्रिप्ट यांनी मंगळवार, 27/02/2018 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
इथे गेले अनेक दिवस देव आहे की नाही, आस्तिक विरुद्ध नास्तिक अश्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. तसेही हा विषय काही नवीन नाही. गेली अनेक वर्षे हे सुरु होते आणि पुढेही सुरु राहील. देवावर श्रद्धा असलेले आस्तिक त्यांची आस्था सोडणं अवघड आहे आणि त्यांच्या श्रद्धेवर तुटून पडण्यापासून माघार घेणं हेही नास्तिकांना अवघड आहे. परंतु भारतीय अध्यात्मशास्त्राने यावर सोपे उत्तर आधीच देऊन ठेवलेले आहे. खर म्हणाल तर उत्तर एक्दम सोपे आणि म्हणाल तर अवघडही आहे. ते असे की तुम्ही स्वतःच तपासून पहा की देव आहे कि नाही ते! स्वतः प्रयत्न करा...अनुभव घ्या आणि मगच आपले ठाम मत तयार करा. हे खरे कि येथे ९९.९९९९% लोकांनी मग ते आस्तिक असोत कि नास्तिक, प्रत्यक्ष देव काही पाहिलेला नाही. काहीवेळा आस्तिकांना त्या शक्तीचा कदाचित थोडाफार अनुभव आलेला असावा अथवा काही योगायोगामुळे त्यांचे तसे मत झाले असावे परंतु नक्की कशामुळे अनुभव आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न काही कोणी करत नाही. त्यापेक्षा सहजपणे श्रद्धा ठेऊन ते मोकळे होतात. त्याचप्रमाणे देवावर विश्वास नसलेले नास्तिक देखील देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता तो नाहीच असे ठामपणे म्हणत असतात. एखाद्या गोष्टीचे अस्तित्व सहजपणे दाखवता किंवा अनुभवता येत नसेल तर ती अस्तित्वातच नाही हे म्हणणे अगदी सोप्पे असते. थोडक्यात काय तर आस्तिक असो व नास्तिक कोणीही देवाचा शोध स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आता तुम्ही विचाराल कि शोध घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? आता आपल्यापैकी अनेकजण शाळेमध्ये गणित शिकलेले असालच. आता मी तुम्हाला सांगितले कि १११ गुणिले १११ याचे उत्तर १२३२१ असे आहे तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही उत्तर माहित नसताना देखील मी सांगितलेल्या उत्तरावर विश्वास ठेवाल, किंवा ते उत्तर चुकीचेच आहे असे म्हणाल. दोन्ही मार्ग तसे चुकीचेच. योग्य मार्ग हाच कि शाळेमध्ये जो आपण गुणाकार शिकलेलो आहे त्याचा वापर करून स्वतः उत्तर काढणे आणि पडताळून पाहणे. आता शाळेत शिकताना आपण काय केले तर बाई/सर जे शिकवीत आहेत ते प्रमाण मानून गुणाकार शिकला आणि स्वतः पडताळून पाहिले. देवाच्या शोधाप्रीत्यर्थ इथेही तेच करायचे आहे. गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय? आता आपले दुर्दैव हेच कि ज्या गोष्टींचे उत्तर असंख्य लोकांना ज्या पद्धती वापरून मिळाले आहे ते सर्व आपल्याकडे खूप पूर्वीपासून उपलब्ध असूनही सध्याच्या काळातील असंख्य लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. एवढेच काय तर माहित असूनही न उत्तर न शोधता किंवा पद्धती न वापरता त्या कश्या चुकीच्या किंवा खोट्या आहेत किंवा वापरणारे कसे मूर्ख आहेत याचा डंका पिटण्यात आनंद मानणारे हि बरेच आहेत. भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो. उपनिषदे वाचलीत तर लक्षात येईल सर्व प्रमुख उपनिषदे ही संवाद रूपी किंवा प्रश्नोत्तर रुपी आहेत. Fools argue and wise discuss या उक्तीवरच ती आधारित आहेत. उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा. पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत. आता चित्तवृत्तींचा निरोध कसा करावा त्यासाठी काय मार्ग आहेत हे जाणण्यासाठी पतंजली योगसूत्रे नक्की वाचा. मनोविज्ञानातही झाला नसेल तेवढा मनाचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी मोजक्या शब्दात मांडला आहे. काहीच मिळाले नाही तरी यात मनाची काही अद्भुत रहस्ये नक्की कळतील. त्यामुळे आस्तिक असाल वा नास्तिक पतंजली ने सांगितलेला अष्टांग योग आचरणात आणण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. जर तुम्ही आस्तिकतेकडे झुकला असाल तर तुमच्यासाठी गीता आहे. देवाचा प्रत्यक्ष प्रमाण अनुभव आला नसेल तर केवळ श्रद्धा असून काय उपयोग? परंतु त्याच श्रद्धेचा उपयोग गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्ती किंवा कर्मयोगाचा वापर करून देवाचा अनुभव घेण्यासाठी केला तर नक्कीच काहीतरी गवसेल. थोडक्यात काय तर देव आहे किंवा नाही असे सरधोपटपणे दुराग्रही विधान करण्याऐवजी आपला सांस्कृतिक वारसा असलेल्या अध्यात्मशात्रात लिहिल्याप्रमाणे स्वतः प्रयत्न करून पहा आणि मगच आपले मत ठरवा...बघा पटतंय का?

वाचने 89074
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

छान डीक्रिप्ट केले आहेस रे क्रिप्टा.

नास्तिक व आस्तिक यात वाद काहीही असोत. एक प्रश्न असा आहे की देव हा साक्षीदार आहे की पक्षकार . त्याला भावना आहेत का ? तो असलाच तर त्याच्या ठायी निर्णयक्षमता आहे का ? या प्रश्नाची उत्तरे उपनिषदात मिळतात का ?

In reply to by चौकटराजा

देवाची भूमिका न्यायाधीशाची असेल तर तो ज्या निकषावर न्याया देतो त्या निकषांचा निर्माता कोण ?

In reply to by चौकटराजा

जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर आहे त्यात ज्यूडिशिअरी आहे नि तिच्या प्रोसिजर्स या आपल्या मानवांच्या ज्यूडिशिअरीसारख्याच आहेत हे कसं गृहित धरलंत?

In reply to by arunjoshi123

जगाचं जे अध्यात्मिक स्ट्रक्चर आहे त्यात ज्यूडिशिअरी आहे नि तिच्या प्रोसिजर्स या आपल्या मानवांच्या ज्यूडिशिअरीसारख्याच आहेत हे कसं गृहित धरलंत? आमचं ग्रुहीत चूक असेल तर आध्यात्मिक ज्यूडिशिअरी आहे याचे भान आपल्याला आहे हे गृहित आपण कसं धरलंत ते सांगा ! इथं तुमची अध्यात्मिक खोली आहे तरी किती हे कळू द्या सर्वाना !

In reply to by चौकटराजा

आध्यात्मिक ज्यूडिशिअरी आहे याचे भान आपल्याला आहे
माझी वाक्ये पुनश्च वाचा. मी कोणतंही गृहितक केलेले नाही.

पण हे सगळं नाही अभ्यासलं तरी काही बिघडणार नाही. ज्यांना देव मानायचा त्यांनी तो मानत रहावा आणि ते मानत राहतीलच. ज्यांना तो नाही मानायचा ते नाही मानणार. माझ्या मते विज्ञानाच्या पुस्तकात देव नाही, 'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही. इलेक्ट्रॉन , प्रोटॉनही मी स्वतः बघायला गेलो नाही पण अनेक शास्त्रज्ञांनी त्याचे अस्तित्व मान्य केलेय तर मी ही ते मान्य केलंय. आता माझा पोटापाण्याचा उद्योग सोडून मी शास्त्रज्ञ बनू शकत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

'देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही.
प्रत्येक सत्यास पुरावा असतोच हे मानत बसायचे कारण काय असावे?

In reply to by arunjoshi123

देवाच्या अस्तित्वाचा पुरावा /दाखले देणारे' शोध प्रसिद्ध झाले नाहीत तर मला देव मानत बसायचे काही कारण नाही.
यातला 'मला' हा शब्द महत्वाचा आहे असं नाही वाटत नाही का तुम्हाला ? वाटत असेल तर मला 'देव आहे' असं न मानण्याचं स्वातंत्र्य आहेच आहे हे तुम्ही मान्य कराल अशी माझी अपेक्षा. धन्यवाद

देव माना किंवा मानू नका, त्याने फारसा फरक पडत नाही, पण... १. आपल्यासारखाच इतरांनाही आपले स्वतंत्र मत असण्याचा हक्क आहे, हे ध्यानात ठेवा... याला समता (equality) म्हणतात. २. आपल्या मताचा इतरांना उपद्रव होणार नाही याची काळजी घ्या... याला सभ्यता (civility) म्हणतात. ३. दुसर्‍याचा मताचा आदर करा आणि आपले मत दुसर्‍याला पटवून देताना ते त्याच्यावर जबरदस्तीने लादले जाणार नाही याची काळजी घ्या... याला सहिष्णुता (tolerance) म्हणतात. ४. अनेक मतमतांतरे असली तरीही किमान मानवी मुल्यांच्या पायावर समाज सामंजस्याने राहू शकतो व विकास साधू शकतो, यावर विश्वास ठेवा... याला बंधुभाव (brotherhood) म्हणतात. वरचे सर्व मुद्दे समजून उमजून वर्तन केले तरच मानवी समाज स्वातंत्र्यात व सुखसमाधानात राहू शकेल. मानवी हक्कांच्या सद्य कल्पना मानवी विचारातूनच निर्माण झालेल्या आहेत. काळाबरोबर परिस्थिती जसजशी बदलत जाईल तसतशा या कल्पनांत विकास/बदल होत राहील. त्याकरिता देवाचे, धर्माचे किंवा एखाद्या विचारधारेचे अधिष्ठान असणे नसणे ही गोष्ट महत्वाची नाही, किंबहुना ते आवश्यकसुद्धा नाही. मानवी मनाचा प्रामाणिकपणा, समजूतदारपणा, चांगुलपणा व न्यायभावना पुरे होतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या साठीच मी निरीश्वरवादी असलो तरी पूजा करतो , आरती करतो.भजन म्हणतो . प्रसाद घेताना मस्तकी लावतो . देवळात गेलो की तेथील सर्व नियम पाळतो . ( उदा लुंगी घालून जाणे - पदमनाभ मंदीर त्रिवेंद्रम ) . पण हे सर्व करताना मागत काहीच नाही .

In reply to by चौकटराजा

जितक्या निरर्थकपणे आपण धार्मिक कर्मकांडे करता तितक्याच निरर्थकपणे आपण निरिश्वरवादी असण्याची संभावना आहे काय?

In reply to by arunjoshi123

जितक्या निरर्थकपणे आपण धार्मिक कर्मकांडे करता तितक्याच निरर्थकपणे आपण निरिश्वरवादी असण्याची संभावना आहे काय? जगात प्रत्येकाला अर्थ असलाच पाहिजे असा नियम आपला आहे काय ? आत खरे उत्तर - मी जे करतो त्यास मी उपासना म्हणत नाही भक्तांप्रमाणे . त्यात करमणूक आहे ! बस इत्तकेच ! ती करमणूक मधुबालेचा पिकचर पाहिल्यावर मिळते. या दोन्ही आनंदात मी फरक करीत नाही. सबब ती करमणूक असल्याने खाली गावडे यानी म्हटल्याप्रमाणे कुणालाही त्याचा त्रास नाही. देवळाच्या लाईनीत रखडताना ज्याना अत्यानंद मिळतो त्यानी तो जरूर घ्यावा . मला त्यात देवळाचा नियम पाळल्याचा आनंद मात्र नक्कीच मिळतो.

In reply to by चौकटराजा

जगात प्रत्येकाला अर्थ असलाच पाहिजे असा नियम आपला आहे काय ?
हे माझ्या प्रश्नाचं हो असं उत्तर आहे. =======================
मी जे करतो त्यास मी उपासना म्हणत नाही भक्तांप्रमाणे . त्यात करमणूक आहे !
धर्म पाळणं करमणूक तर आहेच. पण केळ खाणारानं ते पांढरं असतं म्हणून खावं, ते मऊ असतं म्हणून खावं, ते स्वस्त असतं म्हणून खावं पण त्यात अन्नमूल्य आहे म्हणून खाऊ नये ही देखील आमच्यासाठी एक करमणूकच आहे.

In reply to by arunjoshi123

इरतत्र खडवहीवर ही तुम्ही हे प्रतिसाद गमतीने लिहित असता असे लिहिले आहे. नास्तिकांच्या " चिकित्सक " व्रुतीची शाब्दिक चिरफाड हा तुमचा छंद आहे करमणूक आहे हे वाचून आनंद वाटला. असाच आनंद घेत रहा !

In reply to by चौकटराजा

मग कडवे नास्तिक तुम्हाला बूर्झ्वा बूर्झ्वा करुन अस्तिकांच्या गटात ढकलतील व तुम्हाला अस्पृश्य मानतील. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा प्रतिसाद कट्टर नास्तिक लोकांनी देवभोळ्या लोकांवर तुटून पडण्यापूर्वी मार्गदर्शक तत्वे म्हणून वाचला तर ते नास्तिक आस्तिक लोकांवर तुटून पडणारच नाहीत. =)) सरसकट श्रद्धेला विरोध न करता श्रद्धेच्या अनुषंगाने येणाऱ्या अपप्रवृत्तींना विरोध व्हायला हवा. उदा. कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची पूजा करत असेल तर तो त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून असलेला अधिकार आहे, त्याला विरोध नको. मात्र गणपती पूजेचा उत्सव होऊन रस्त्यावर मंडप घालून वाहतुकीला जो अडथळा होतो, लाऊड स्पीकर आणि ढोल वाजवून जो मोठ्या आवाजाचा त्रास होतो त्याचा कडाडून विरोध करायला हवा. किंबहूना असा विरोध होण्यापेक्षाही सश्रद्ध लोकांनी विवेकी वृत्तीने वागून आपल्या श्रद्धेचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

In reply to by सतिश गावडे

सामान्यपणे सश्रद्ध लोक देवाच्या कृपेसाठी यातले कोणतेही प्रकार करत नाहीत. हे सगळे करणार्‍यांचे हेतू वेगळे असतात, इतके नमूद करून खाली बस्तो.

In reply to by आनन्दा

सामान्यपणे सश्रद्ध लोक देवाच्या कार्यक्रमात असे प्रकार करतात असे निरीक्षण आहे. इथे मिपावरच गणेशोत्सवात ढोल बडवण्याचे समर्थन झाले होते एके काळी. :)

In reply to by सतिश गावडे

रस्त्यावर साज-या होणा-या सर्व जातीधर्मांच्या सर्व सण/उत्सव/समारंभांवर बंदी हवी.

In reply to by श्रीगुरुजी

धर्म ही एक सार्वजनिक गोष्ट आहे. लोकशाही विफल आहे म्हणून लोकशाही बर्खास्त करायची का? सार्वजनिकता हा धर्माचा अविभाज्य भाग आहे.

In reply to by सतिश गावडे

श्रद्धा आणि परंपरा या वेगळ्या गोष्टी आहेत.. श्रद्धा आणि श्रद्धेचा बाजार या देखील वेगळ्या गोष्टी आहेत.. आणि ढोल वाजवणे ही श्रद्धा तर नाहीच, पण परंपरा पण नवीनच आहे.. व्यक्तिशः मी श्रद्धाळू असूनदेखील कधीही मिरवणूक बघायला जात नाही, ढोल एक वेळ ठीक आहे, डीजे तर मला सहनच होत नाही.. जिथे गर्दी असेल तिथे मी सामान्यतः जात नाही.. माझं यनावालांच्या बरोबर पण हेच भांडण आहे.. ते सांगत असलेलया बऱ्याच गोष्टी मी मुळातच करत नाही, पण मी श्रद्धाळू आहे.मी व्यक्तिगत आयुष्यात ईश्वर मानतो. मग सरसकटीकरण करून तीच सगळी विशेषणे ते मला पण का लावतात हा मुख्य प्रश्न आहे..

In reply to by आनन्दा

सही पकडे हो. आणि हे सगळं दीडशहाणे लोक नास्तिक झाल्यामुळं झालं आहे. धर्म पाळणारे लोक मंजे नुसता गाळ उरला आहे. आणि धर्म न पाळणारे लोक व्यवस्थाविकृतीकरणात गुंतले आहेत.

In reply to by सतिश गावडे

घरीच काय सार्वजनिक स्थळी देखील ईश्वर मानावा या विचाराचा असलो तरी पुण्यात आल्यापासून गणपती हा शब्दही मला आवडत नाही. इथले गणेशोत्सव बिभत्स असतात.

In reply to by सतिश गावडे

कुणी घरात भक्तिभावाने गणपतीची पूजा करत असेल तर तो त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून असलेला अधिकार आहे, त्याला विरोध नको. अगदी बरोबर, परंतू त्याचरोबर घरातील नास्तिक व्यक्तीवर सोवळे ओवळे व खाण्यापिण्याची बंधनेही घालू नये. श्रद्धा स्वतःपूर्ता मर्यादित ठेवल्यास कोणालाच त्रास होणार नाही. विनाकारण बंधने कोणीच स्वीकारणार नाही मग तो आस्तिक असो वा नास्तिक.

In reply to by मार्मिक गोडसे

परंतू त्याचरोबर घरातील नास्तिक व्यक्तीवर सोवळे ओवळे व खाण्यापिण्याची बंधनेही घालू नये.
राष्ट्रगीताच्या गायनाच्या वेळी ज्यास घटनात्मक संचारस्वातंत्र्य आहे त्यास एकाच ठिकाणी थांबण्याचे बंधन घालू नये. त्याला सैरावैरा पळू द्यावे. त्या वातावरणाची एकूणता अशी काही नसते. प्रत्येक जण सुटा सुटा असतो.

In reply to by arunjoshi123

राष्ट्रगीताबाबत तसं काही बंधन नसल्यास ,हो. मुळ मुद्द्याला बगल देण्यासाठी असंबद्ध उदाहरण देऊन विषय भरकटवणे हाच तुमचा कायम उद्देश असतो.

In reply to by मार्मिक गोडसे

असा समंजसपणा असला की वाद होत नाहीत. माझी पत्नी अस्तिक तर मी नास्तिक आहे पण आमचे (निदान या विषयावरुन) कधी वाद होत नाहीत. शिवरात्रीलाही ती माझ्याकरिता नेहमीचा स्वयंपाक करते तर तिच्या इच्छेखातर मी तिच्यासोबत शिर्डीच्या मंदिरात रांगेत तासभर उभा होतो (कारण तिला एकटीला रांगेत उभ रहायला सांगणे मला योग्य वाटलं नाही) आणि मग दर्शनाची वेळ आल्यावर मी हात न जोडताच पुढे सरकलो याबद्दल तिलाही काही वाटले नाही.

देव कसा आहे याबद्दल विविध धर्म, पंथ, ग्रंथ इत्यादींमध्ये एकवाक्यता नाही मग देव आहे की नाही याचा पडताळा कसा घ्यायचा बरे?

In reply to by सतिश गावडे

त्यासाठी एखाद्या सत्पुरूषाचे मार्गदर्शन घ्या किंवा गतकाळातील सत्पुरूषांनी लिहिलेल्या ग्रंथात सांगितलेल्या मार्गाने जा किंवा कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:च शोध घ्यायचा प्रयत्न करा.

In reply to by श्रीगुरुजी

माझा प्रश्न पुन्हा वाचा. हवं तर धर्म, पंथ आणि ग्रंथ या यादीत सत्पुरुषही जोडा. :)

In reply to by सतिश गावडे

विविध धर्मामध्ये एकवाक्यता खरे तर आहे. फक्त माणसांनी ग्रंथांमधील अर्थाचा अनर्थ केला. जर रूढार्थाने पहिले तर सर्वच धर्म ईश्वराचा/उच्च अध्यात्मिक शक्तीचा स्वीकार करतात. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मात निर्गुण, निराकार ईश्वराचा उल्लेख आढळतो. बायबल मध्येही ईश्वराचा उल्लेख आहे. हिंदू धर्मात ओम तत् सत हि संकल्पना आहे तशी ख्रिस्त लोकांमध्ये Trinity आहे. बुद्ध जैन आणि शीख हे धर्म हिंदू धर्माच्याच शाखा मानल्या जातात आणि बर्याचश्या ईश्वरीय संकल्पना हिंदू धर्मातूनच आल्या आहेत. सारांश विविध धर्मामध्ये एकवाक्यता खरी तर आहे. परंतु समस्या तेंव्हा निर्माण होते जेंव्हा माझा धर्म दुसऱ्या धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते.

In reply to by क्रिप्ट

नास्तिकांचे प्रकार अस्तिकांच्या प्रकारांपेक्षा अगणित आहेत. सतिशजींना नास्तिक बनताना हाच प्रश्न का पडत नसावा?

In reply to by सतिश गावडे

सतिशजी, विविध धर्म, पंथ, विचारधारा, इ चा संदर्भ घ्यायचाच कशाला? आपल्याला कोणते प्रश्न पडतात, त्यातल्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे आवश्यक आहेत नि ती काय आहेत हे पुरेसं नाही का? बाकी लोकांनी अनालिसिस करताना काय दिवे लावले त्याच्याशी आपल्याला संबंध नसावा.

In reply to by सतिश गावडे

गौतम बुद्धाला॑ देवाचे अस्तित्व मान्य नव्हते हे खरे का ? ते असेल तर बौद्ध धर्म इतका जगात का पसरला ? की गौतमाचे तत्वद्नान ही " निरर्थक " म्हणायचे ?

देव बीव काय नसतं. वास्तवात आणि स्वत:वर विश्वास ठेवून जगा....आधुनिक विचारांची कास धरा. देवा बिवाच्या नादी लागू नका. असतील दिवस वाईट तर खचू नका, तेही दिवस निघून जातील. ''जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है'' असं म्हणून जगा इंजॉय करा आयुष्य. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयुष्य हे शेअर मार्केटसारखे असते. चढउतार येणारच. जेव्हा आयुष्य उंची गाठते तेव्हा राजा असल्यासारखे वागू नका. त्या उंचीचा अंदाज घेऊन आयुष्याचं कल्याण करा. आणि जर पडता काळ असेल तर घाबरुन जाऊन माघार घेऊ नका. पुन्हा चांगले दिवस येणारच असतात. जसा सेन्सेक्स बराच पडून पुन्हा उसळी मारतो तसे. शुभ रात्रकाळ

In reply to by arunjoshi123

लय भारी पेटून उठता राव तुम्ही. तुमचे हे पेटून उठणेच आम्हाला प्रतिसाद द्यायला मजबूर करते बघा. ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

----देव बीव काय नसतं. देवा बिवाच्या नादी लागू नका -----दिलीपजी, हेच सरसकट विधान अनुभवाच्या जोरावर तपासून घ्या असे आपले अध्यात्म सांगते. मी लेखात म्हणल्याप्रमाणे ज्यांनी तो प्रयत्न पूर्वी केला त्यांना अगदी याउलट अनुभव आला आहे. आणि असे अनुभव कालातीत आहेत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है'' मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगा

In reply to by विजुभाऊ

>>>>>मास्तर अच्छे दिन कधी येणार आहेत ते तरी सांगा ! विजुभौ, भक्तांचं देवाचं वेड गेल्याशिवाय अच्छे दिनाची शक्यता वाटत नै. बाय द वे, विजुभाऊ तुम्हाला कोंचा देव आवडतो ? तेहतीस कोटी पैकी, भारी वगैरे वाटतो ? प्रसन्न वगैरे होईल आणि म्हणेल बेटा मांगो, तुम्हे जो मांगना है वह मांगो ? काय मागाल तुम्ही ? :) -दिलीप बिरुटे (विजुभौच्या लेखनाचा भक्त) ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

६ कोटी लोक मारणार्‍या माओला पुजणारे पु ल देशपांडे इत्यादि अज्ञानी लोक जोपर्यंत नास्तिक अंधपणे फॉलो करणे सोडणार नाहीत....तोपर्यंत अच्छे दिन येणार नाहीत.

In reply to by arunjoshi123

हे काहीतरी नवीनच वाचतो आहे. ह्याबद्दल ऐकले किंवा वाचले नव्हते काही पुरावा आहे का कुठल्या लेखात वा त्यांनीच कुठल्या पुस्तकात असे लिहिले आहे ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देव बीव काय नसतं. वास्तवात आणि स्वत:वर विश्वास ठेवून जगा....आधुनिक विचारांची कास धरा. देवा बिवाच्या नादी लागू नका. असतील दिवस वाईट तर खचू नका, तेही दिवस निघून जातील. ''जब अच्छे दिन रुक नही सकते तो बुरे दिनों की क्या औकात है'' असं म्हणून जगा इंजॉय करा आयुष्य.
देव बीव काय नसतं मंता? वास्तव आणि तुम्ही स्वत: काय शून्यातून टपकले? चांगल्या विचारांची कास धरा (जनरली आधुनिक विचार घाण असतात). पुरोगाम्यांच्या नादी लागू नका. असतील दिवस चांगले तर माजू नका, तेही दिवस निघून जाऊ शकतात. दिवस काही चांगले वाईट नसतात. ईश्वराला भजून सारे दिवस आनंदात राहा.

In reply to by arunjoshi123

भाषेवर कण्ट्रोल ठेवा काका. देवाला राग येईल तुमच्या भाषेने आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते, देवा बीवांचं खुळ सोडा. व्यक्तिगत रोखाची भाषा सोडून लिहिता आलं तरी तुमचा देव तुम्हाला पावला असे म्हणू या....बाकी तुमचं चालू द्या.....शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बहुतेक तुम्हाला माजू नका असं म्हटलेलं आवडलेलं दिसत नाही. ठिक आहे , ते मातू नका असं वाचा किंवा तुम्हाला जे काय शिष्ट वाटतं ते वाचा. तुम्ही जे काय नास्तिकी डोस दिलेत त्याचं मी अस्तिकी रुपांतरण केलं आहे. स्वतःचं काहिही बोललेलो नाही. मूळ उद्देश तुमच्याइतकाच चांगला आहे.
देवाला राग येईल तुमच्या भाषेने आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते,
नास्तिकांना वठणीवर आणण्यासाठी ईश्वराशीही पंगा घेणं वर्थ आहे. आधुनिकतेच्या नावाखाली नास्तिकांनी अपप्रचार करून सगळ्यांची अस्तिकता खोखली गेली आहे. आमचा ग्रह नासवला. आमची मूल्यं नासवली. आमची जीवनशैली नासवली. आमची मनं नासवली. ============================= जे काही लिहिलं आहे ते "नास्तिकांना" उद्देशून लिहिलं आहे (जसं यनावाला वैयक्तिक लिहित नाहीत म्हणता तसं.). आपला व्यक्तिगत आदर आहे. ते तुमच्या विधानाचं उत्तर असल्यानं गैरसमज होऊ शकतो हे समजू शकतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि असेल ना देव तर अगोदर तुमचा माज उतरवेल असे वाटते,
अर्रे देवा! म्हणजे अजून संशय आहेच तर! मला वाटलं कन्फर्म झाले असेल आतापर्यंत देव नाहीये ते. माणसाने कसं सुबुद्ध नास्तिक असावं, निर्बुद्ध तर....असो!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणेल जग आम्हास मद्यपि परवा कसली मग त्याची ! परसुनि त्याचे शब्द रूढीचे दास झणी ते खवळू द्या देव दानवा नरे निर्मिले हे मत लोका कळवू द्या

(1) उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. (2) तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा. आपल्या विधानांवरून आपला उपनिषदांचा खोल अभ्यास दिसून येतो. कृपया कोणत्या उपनिषदांमध्ये (1) देव पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा व मग ठरवा असे लिहले आहे व (2) कोणत्या उपनिषदांत "पद्धती" सांगितल्या आहेत हे स्पष्ट केलेत तर माझ्या सारख्याला अभ्यास करणे सोपे जाईल. उपनिषदाचे नाव, अध्याय, मंत्र असे दिल्यास वाचणे सोपे होईल. जर वरील (1) व (2) प्रमाणे स्वच्छ उल्लेख नसतील तर कोणत्या श्लोकांवरून आपल्याला तसे वाटले हे जरी सांगितले तरी उपयोग होईलच. (हातात समिधा घेऊन प्रश्न विचारणारा नम्र जिज्ञासू) शरद

In reply to by शरद

माझा स्वतःचा उपनिषदांचा अभ्यास नगण्य आहे. पण जो काही आहे तो या पुस्तकावरूनच आहे - "उपनिषदांचा अभ्यास". लेखक - के. वि. बेलसरे. तुमच्या प्रश्नाचं सरळ उत्तर त्यात आहे की नाही हे मला माहित नाही. अजून तेवढा अभ्यास झालेला नाही. पण कदाचित तुम्हाला फायदा होईल म्हणून सांगितले. राघव

In reply to by शरद

शरदजी, उपनिषदे १०८ आहेत परंतु शंकराचार्यांनी १० उपनिषदांवर टीका लिहिली आहे त्यामुळे ते महत्वाचे मानले जातात. त्यांची नावे येथे देतो ईश, केन, कठो, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्य बाकी वर दिल्याप्रमाणे उपनिषदे वाचलीत तरी तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. Youtube वर रामकृष्ण मिशन चे स्वामी सर्वप्रियानंद यांचे मांडुक्य उपनिषद वर खूप छान व्याख्यान आहे IIT मध्ये दिलेले. तेही पहा. https://www.youtube.com/watch?v=eGKFTUuJppU&t=436s आणि जमल्यास त्यांची बाकी व्याख्याने पण ऐका.

In reply to by क्रिप्ट

माननीय श्री. क्रिप्टजी, मी आपणास उपनिषदांची संख्या वा नावे विचारली नाहीत. श्री. साधले त्यांच्या उपनिषद्वाक्य महाकोश या द्विखंडात्मक ग्रंथामध्ये 239 उपनिषदांचा उल्लेख केला आहे. तेव्हा नावे व संख्या सोडा. तसेच स्वामी सर्वप्रीयानंद यांची व्याख्याने वाचा हा सल्लाही इथे असंबंधित आहे. मला पाहिजे असलेली माहिती इथे परत एकदा लिहतो. त्याबद्दल लिहा ही नम्र विनंती. (1) उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. (2) तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा. आपल्या विधानांवरून आपला उपनिषदांचा खोल अभ्यास दिसून येतो. कृपया कोणत्या उपनिषदांमध्ये (1) देव पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा व मग ठरवा असे लिहले आहे व (2) कोणत्या उपनिषदांत "पद्धती" सांगितल्या आहेत ? हे संबंधित उपनिषदाचे नाव, अध्याय (वल्ली) मंत्र क्रमांक या क्रमाने सांगा. आपला नम्र, शरद,

In reply to by शरद

"मी आपणास उपनिषदांची संख्या वा नावे विचारली नाहीत. श्री. साधले त्यांच्या उपनिषद्वाक्य महाकोश या द्विखंडात्मक ग्रंथामध्ये 239 उपनिषदांचा उल्लेख केला आहे. तेव्हा नावे व संख्या सोडा" शरदजी, मला वाटते मी तुम्हाला उत्तर आधीच दिलेले आहे. तसेच आपल्या विधानामध्ये विरोधाभास दिसत आहे. एकीकडे विचारता कोणत्या उपनिषदात विचारलेले लिहिले आहे आणि दुसरीकडे म्हणता मी नाव विचारले नाही. पुन्हा सांगतो मी सांगितलेली १० उपनिषदे वाचा तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल (वाचली नसल्यास निदान सुरुवात तरी करा). आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर २३९ उपनिषदे असतील तर मी तुम्हाला १० च सांगितली आहेत यावरूनच समजले पाहिजे होते की मी तुम्हाला २३९ मधून निवडक १० सांगितली आहेत ते केवळ संख्या आणि नावे देण्याकरिता नाही तर तुमच्या प्रश्नांचे उत्तर त्यात दडले आहे म्हणून. असो. "तसेच स्वामी सर्वप्रीयानंद यांची व्याख्याने वाचा हा सल्लाही इथे असंबंधित आहे." -- तुम्ही व्याख्याने ऐकलीत का? कदाचित त्यामधून तुम्हाला तुमचे उत्तर मिळू शकले असते. न ऐकताच ते असंबंधित आहे असे म्हणणे बरोबर नाही. आता याही १० मधून जर तुम्हाला हवे असेल मांडुक्य उपनिषद आणि केनोपनिषद वाचा. केनोपनिषद प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. आणि शेवटी उत्तर म्हणून जे सांगितले आहे ते कसे प्राप्त करावे याचेही मार्गदर्शन आहे. मांडुक्य उपनिषदात ओम वरील ध्यान सांगितले आहे (मंत्र क्रमांक मुद्दामच देत नाही (माहित असूनही). थोडे कष्ट तुम्हीही घ्या :) )

आध्यात्मिक ग्रंथ शेकडो आहेत. कपाटांत तर आहेतच पण जालावरही आहेत. अनेक जण ते वाचत असतील. (खरे )संतसुद्धा अनेक आहेत. त्यांचे हजारोंनी सच्छिष्य आहेत. या सगळ्यांचे मार्गदर्शन देवाकडे नेणारे नसून ते स्वतःकडे नेणारे, आत्मभान देणारे असते. कोsहम् , मी कोण आहे, मी काय आहे, माझे गुण कोणते, दोष कोणते, माझी क्षमता किती, या सगळ्याला जोखून मी किती उड्या माराव्यात अथवा शांत राहावे, सुखदु:खांना कसे सामोरे जावे हेच मुख्यतः शिकायचे असते. स्थिरचित्त होऊन विवेकबुद्धी धारदार करायची असते. हे घडले की 'लीलया भवजलं तरणीयम्' ही पायरी गाठायला कितीसा वेळ? असा स्थिरबुद्धि मनुष्य इतरांपेक्षा एक पायरी वर उंचावर असतो. या उंचीमुळे त्याचे क्षितिज विस्तारते. इतरांना ज्या शक्यता, संभाव्यता जाणवत नाहीत त्या, तो अविकारी झाल्यामुळे त्याला जाणवतात. त्याच्या संवेदना तीक्ष्ण होतात. सहकंपन वाढते. इतरांचे दु:ख, वेदना, हर्ष त्याला चटकन कळतात. स्वतः स्थिर असल्याने इतरांना दिलासा देण्याचे काम तो करू शकतो. दु:खमोचनाचे काही व्यावहारिक म्हणजे आवाक्यातले मार्ग सुचवू शकतो. थोडक्यात तो संतपदाकडे वाटचाल करीत असतो. हीच शिकवण पोथ्या, ग्रंथ, सद्गुरू सदैव वितरित करीत असतात. पण परमसंतांच्या सर्वच शिष्यांना हे आत्मदर्शन होईलच असे नव्हे. 'वितरति गुरु: प्राज्ञे विद्यां,यथैव तथा जडे, न तु खलु तयोर्ज्ञाने वृद्धीं करोति, अपहरति वा'. पण सूर्यप्रकाश अंगावर पडल्यावर मणि चकाकतो, मातीचा गोळा नव्हे. 'मणि:, न मृदां चयः' याचे कारण प्रत्येक मनुष्य वेगळा आहे. प्रत्येकाच्या मर्यादा आणि क्षमता वेगळ्या आहेत. जेव्हढे दान मिळाले आहे, ते पुरेपूर वापरणे इतकेच आपल्या हातात असते. आणि तेच शिकायचे असते. तुझा तूच उद्धारकर्ता असेही संत सांगतातच. देव म्हणजे शब्दशः ' one who shines forth'. असे तेजस्वी, ओजस्वी बनण्यासाठी चित्तस्थैर्य आणि विवेकाची जरूरी असते. मग आपणच देव आणि आपला देह हेच देवाचे मंदिर.

In reply to by चौकटराजा

देव नाहीच देव्हार्यात देव नाही देवालयी कुथे शोधीसी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी शोधीशी मानवा राउळी मंदिरी. नांदतो देव हा आपल्या अंतरी नसे राउळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी. देव ही एक संकल्पनाच आहे. ती कोणी एन्टीटी नाही.सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही त्या संकल्पित देवाची उपासना आहे. आमची आजी म्हणत असे " देव आपल्यावर काही घेत नाही "आजोबा म्हणत .. लग्नाच्या मंत्रात बे चा पाढा घुसडला तरी ते कुणाला कळणार नाही इतकेच त्याकडे लोकांचे लक्ष असते. मी गीतेचा पंधरावा अध्याय अस्खलित म्हणून दाखवल्यावर मामा म्हणाला " अर्थ किती श्लोकांचा उलगडला ? " आजीने आईला आई लहान असताना बजावले होते " दुधावरची साय खाल्ल्याने आई मरते. " माझी आई प्रयोग करून मत बनविनारी होती. तिने दुधाची साय खाऊन पाहिली. त्यानंतर माझी आजी सुमारे ४० वर्शानी मरण पावली. मी एका धार्मिक घरात जन्माला आलो. उतरवून टाकलेल्या लिंबाचे सरबत करून ही पिऊन बघितले . आज ६५ व्या वर्शीही कोणत्याही भुताला मला हात लावायला जमले नाही.भावाच्या अंत्या विधीला जानवे लागेल ते नव्हते म्हणून पुडी च्या दोर्याचे जानवे करून घातले गायत्री मम्त्र न म्हणता. काही बिघडले नाही. माझे आजोबा गणपती बनवीत व न खपलेले गणपती सहज मोडून टाकीत . म्हणत " अरे त्या तर मातीच्या मूर्ती ! " म्हणूनच मी म्हटले आहे तुम्ही किती प्रयोगमार्गी आहात यावर तुमचे पुढील जीवनात तत्चज्ञान ठरत असते. आजही भू: ..... या सात पातळ्या गायत्री मम्त्रात सांगितलेल्या आहेत त्याचा अर्थ किती भक्ताना माहीत आहे मला शंका आहे. एक तरी ओवी अनुभवावी हेच खरे ! पण तथाकथित भक्त ती तरी अनुभवून पहातात का .. हा आत्मशोध घेण्यातील मुख्य मुद्दा आहे. अद्यात्माच्या वृक्षाचे मूळ बह्य कृपेत नसून ते स्वतः ने स्व्तः वर केलेल्या कृपेतच आहे. हे सांगायला कोणाही संताची गरज काय ?

In reply to by चौकटराजा

अतिशय आवडला. संपूर्ण सहमत. उरलेल्या गणपतिमूर्तींच्या विल्हेवाटीचा किस्सा तर अगदी रॅशनल विचार दाखवतो. अलीकडे मुंबईत विसर्जन झालेल्या मूर्तींची विटंबना होते अशी हाकाटी असते. काही स्वघोषित स्वयंसेवक अशा मूर्ती समुद्रातून 'वाचवतात'. म्हणजे ओहोटीच्या वेळी किनाऱ्याला लागल्या तर त्यांची भग्न अंगे गोळा करून हारीने ठेवतात. पूजाबिजा आरतीबिरती होते आणि साग्रसंगीत पुन्हा विसर्जन होते. आता ही उत्सवप्रियता आणि पुढे पुढे करणे नव्हे तर काय? विसर्जित भग्न मूर्ती पाहून भावना का दुखावल्या जाव्या? पुढच्या भरतीच्या वेळी जे काही व्हायचे ते होईलच ना? फार तर मोठ्या ट्रकमधून नेऊन त्या श्रेडर किंवा तत्सम यंत्रामध्ये घालाव्यात. एरवी किनाऱ्यावर घाण साचते ती उचलायला कोणी नाही. नको तिथे उत्सव आणि टाळ चिपळ्या कशाला?

In reply to by चौकटराजा

सद्वर्तन व अहंकाराचा त्याग ही त्या संकल्पित देवाची उपासना आहे.
+१. अशा अन्य अनेक उपासना आहेत. ======================
देव ही एक संकल्पनाच आहे. ती कोणी एन्टीटी नाही.
संकल्पना एंटीटी नसते हि एक विचित्र आणि अर्धवट थेरी आहे. चलनातील मूल्याला मूर्त रुप देण्यासाठी नाणे बनवले जाते. मग काय मूल्य ही एक संकल्पनाच आहे, ती एक एंटीटी नाही असं म्हणणार? प्रत्येक संकल्पना ही एक एंटिटी असते. भौतिकशास्त्रातील उर्जा ही देखील थेट मोजता येत नाही. थेट डिटेक्ट करता येत नाही. म्हणून काय उर्जा हि एंटिटि नसते म्हणता? मग द्रव्यात रुपांतर तिचंच होतं ना? कृपया ज्या शब्दांचं मूलभूत आकलन नाही ते वापरून जी विचारधारा तुमची नाही तिकडे विक्षिप्त मते देऊ नकात. ==============================
हा आत्मशोध घेण्यातील मुख्य मुद्दा आहे. अद्यात्माच्या वृक्षाचे मूळ बह्य कृपेत नसून ते स्वतः ने स्व्तः वर केलेल्या कृपेतच आहे.
नास्तिक असाल तर आत्मशोध कशाला पाहिजे? आत्मशोध इ हे नास्तिकी वर्तन नाही. त्यांचे आत्म म्हणजे त्यांचा देह. ७०% ऑक्सिजन, १५% हायड्रोजन, १०% कार्बन, इ इ. याच्यापलिकडे स्वतःत शोधायला काही नसतं त्यांचेकडे.

In reply to by arunjoshi123

नास्तिक माणसाविषयी आपल्या कल्पना भलल्याच रंजक आहेत. तुम्हाला कोणी सांगितले की नास्तिक माणूस मनाचे अस्तित्व नाकारतो म्हणून. तुम्हाला कोणी सांगितले त्याला दैव ही पूर्ण पणे सम्कल्पना अमान्य आहे म्हणून. ? तुम्हाला कोणी सांगितले की तो कंप्लिट अश्रद्ध असतो म्हणून? देव नाही ही देखील त्याची श्रद्धाच असते. ती प्रयोगाअंती, चिंतना अन्ती, अनुभवा अंती, निरिक्षणाअंती झाली आहे ही नाही हे महत्चाचे. जसे जानवे हे ब्रहम्गाठीचे कवच असणारे दिव्य असे काही नाही तो एक साधा दोरा आहे. हे मी प्रयोगाअन्ती मान्य केले आहे. नास्तिक माणूस हा फक्त हैड्रो कार्बन व कर्बो हैद्रेट ची भाषा जाणतो असा आपला कयास असला तर तो दुरूस्त करून घ्या ! ( आता यावर असा माझा कयास आहे हे तुम्ही गृहित कसे धरले असा तुमचा प्रश्न मला व इथे इतराना ही अपेक्शित आहेच ! हेवेसानल ! ) असो. नास्तिक माणूसही कलाकार, आस्वादक, रसिक असू शकतो बरे ! त्याचा अस्तित्व मानण्याला देखील विरोध नाही. त्याचा प्रश्न एकच आहे तो निगोशिअबल आहे की नाही ? आणि जर असेल तर त्याला अनुरणिया थोकडा की आकाशा एवढा हे कसे समजायचे ?