Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मनो on Fri, 02/02/2018 - 13:38
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
पार्श्वभूमी हे किस्से म्हणजे पुराव्यासकट सिद्ध करता येण्यासारखा इतिहास नव्हे. कुणी पाहिलेल्या, ऐकलेल्या, त्यात स्वतःची भर घालून सांगितलेल्या अश्या या दंतकथा आहेत. त्यामुळे त्यांना फार गंभीरपणे घेऊ नये अशी एक सूचना. यातले काही 'मंत्रावेगळा' कादंबरीकार ना. स. इनामदार यांनी लिहिले आहेत. काही विंचूरकरांच्या इतिहासात आहेत. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामांत लढलेल्या नानासाहेब पेशवे यांच्या चरित्रात काही सापडते. प्रतुलचंद्र गुप्ता या माणसाने दुसऱ्या बाजीरावावर ईस्ट इंडिया कंपनीचा पत्रव्यवहार वाचून जे अनमोल संशोधन केले आहे त्यात काही सापडते. मला सगळी पुस्तके एकत्र मिळाली नाहीत, त्यामुळे काही बाबी स्मरणशक्तीवर विसंबून टाकल्या आहेत, त्यात किरकोळ चुका नक्कीच असतील. (पुढला भाग 'मागणी तसा पुरवठा' या तत्वावर लिहिला जाईल, तेंव्हा लेख आवडल्यास प्रतिक्रिया जरूर टाका) दुसरे बाजीराव पेशवे (बहुदा शिळा प्रेस चित्र) bajirao ३ जून १८१८ पेशवे दुसरे बाजीराव अखेर अशीरगडाजवळ धूळकोट येथे माल्कम साहेबाबरोबर वाटाघाटी करून त्याला शरण गेले. तहातील अटीनुसार बाजीरावास लगेच एका दिवसाच्या आत इंग्रजांच्या स्वाधीन होऊन महाराष्ट्राबाहेर उत्तरेत जावे लागले. या वेळीसुद्धा बाजीरावासोबत बापू गोडबोले बक्षी, हुजुरातीच्या पागा आणि स्वार, बापू गोखले यांच्या निसबतीतील रामचंद्र वेंकटेश, बाळाजीपंत मराठे, भिकाजी जगताप, विंचूरकरांचे दिवाण बाळोबा सालकाढे, ढमढेर्यांचे सरदार श्रीधर बापू दामले यांची पागा अशी काही नावे सापडतात. बुंदेलखंडात अजूनही शांतता प्रस्थापित झाली नसल्यामुळे पेशव्यास राजपुताना मार्गे अजमेर, मथुरा या दिशेस जावे लागले. हा प्रवास चालू असतानाच उत्तरेत नक्की कुठे बाजीरावास ठेवायचे याचा निर्णय ठरत होता. सुरुवातीस काशी ही जागा सर्वांस पसंत होती, पण नंतर इतर पर्याय पुढे आले. त्यापैकी मुंघेर, गोरखपूर हे पर्याय तिथल्या गरम हवामानामुळे बाजीरावास मान्य झाले नाहीत. शेवटी गव्हर्नर जनरलच्या निर्णयानुसार गंगेकाठचे बिठूर म्हणजे ब्रह्मावर्त (कानपूरपासून १४ मैल) ही जागा बाजीरावास मान्य करावी लागली. बाजीरावाचा आग्रह असा होता कि त्याला पंतप्रधान अथवा पेशवे असाच संबोधले जावे. पण इंग्रजांनी त्यास 'महाराजा' बाजीराव अशी नवीनच पदवी लावली. एका अर्थे बाजीराव १८१८ साली पेशवाईच्या 'मंत्रा'वेगळा झाला, त्यामुळे इनामदारांनी कादंबरीस दिलेले शीर्षक अगदी समर्पक आहे. पेशव्यांना भरपूर वार्षिक तनखा मंजूर करण्यात इंग्रजांची अशी अटकळ होती की बाजीराव फार काळ जगणार नाही, कारण पेशवे घराण्यातले पुरुष या आधी फार जगले नव्हते. पण इंग्रजांची अपेक्षा खोटी ठरवत बाजीराव पेशवे ७६ वर्षे जगले. त्यामुळे पेशव्यांना मिळणार्या वार्षिक रकमेचा एकूण एकदा प्रचंड मोठा झाला. त्याबद्दल इंग्रज अधिकाऱ्यांनी एकदुसर्याला दोष दिलेला सापडतो. पेशव्यांचे उत्पन्न मोठे असले तरी त्यांनी ते सर्व खर्चही करून टाकले. त्यामुळे त्यांचा मुलगा नानासाहेब पेशवे यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. १८५७ नंतर तर पेशव्यांच्या खुणा सांगणाऱ्या साऱ्या वास्तू मुद्दाम जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यामुळे आज आपल्याला त्यातले फार थोडे पाहायला मिळते. उध्वस्त पेशवे वाडा wada इंग्रजांनी बाजीराव पेशव्यास दक्षिणेबरोबर कोणताही पत्रव्यवहार करण्यास बंदी घातली होती. कोणीही महाराष्ट्रातून त्यांना भेटू नये असा इंग्रज सरकारचा आदेश होता. बाजीरावाचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या मुंजीची आमंत्रणेसुद्धा इंग्रज सरकारने बाजीरावास पाठवू दिली नाहीत. सरकारचा असा संशय होता की बाजीरावास शिंदे, होळकर, गायकवाड आणि भोसले हे सामील होतील आणि मग सर्व मराठे एक झाले तर त्यांना हरवणे फार कठीण होईल. बिठूरच्या ककमिशनरच्या अहवालात आपल्याला अनेक कारस्थाने, गुप्त पत्रव्यवहार याचे वारंवार उल्लेख सापडतात. बहुतेक सगळ्या वेळी पेशवे सैन्यासह दक्षिणेत पुण्यास जाणार अशी अफवा उठलेली दिसते. पेशवे जसे वृद्ध होत गेले तसे या अफवा कमी होत गेल्या. अशीरगड https://www.youtube.com/watch?v=AXJEgR1VA-I बऱ्हाणपूर जवळचा अशीरगडाचा किल्ला त्या वेळी शिंद्यांच्या ताब्यात होता. इंग्रजांनी शिंद्यावर दडपण आणून तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. शिंद्यांचे तसे हुकूम घेऊन इंग्रज सेनाधिकारी अशीरगडावर किल्ला ताब्यात घेण्यासाठी गेले. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्या वेळी किल्लेदाराबरोबर झालेला इंग्रज सेनाधिकाऱ्याचा संवाद मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. किल्लेदार लाड असे म्हणतात की माझे धनी शिंदे यांची माझ्यावर आता खास इतराजी (म्हणजे नाखुषी, नाराजी) होणार हे नक्की. इंग्रज सेनाधिकाऱ्यास काही कळेना - तो म्हणतो की तुमचे धनी शिंदे यांनीच तुला किल्ला ताब्यात दिल्याचा हुकूम केला आहे, मग हुकुमाचे पालन केल्यावर शिंद्यांची इतराजी का होईल? किल्लेदार म्हणतांत, तुम्हा युरोपिअन लोकात असे कागदी हुकूम मानायची पद्धत असेल. (किल्ल्याकडे हात करून) हा असा बलदंड किल्ला इतक्या सहज शत्रूच्या ताब्यात द्यायचा नसतो. त्यापेक्षा लढून मरून का गेला नाहीस असं धनी मला विचारतील. ============= हा प्रसंग विंचूरकरांच्या घराण्यातील एकाने ना. स. इनामदार याना मंत्रावेगळा कादंबरी प्रकाशित झाल्यावर सांगितला. सरदार विंचूरकरांच्या घराण्याचा राघोबादादांच्या काळापासून पेशव्याच्या या शाखेशी घनिष्ट संबंध होता. विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे राघोबादादांच्या गोटातले समजले जात. त्यांचे वंशज रघुनाथ विठ्ठल विंचूरकर यांनी उत्तरेस तीर्थयात्रेच्या निमित्ताने बराच प्रवास केला. अश्या एका यात्रेत ते १८५० साली काशीच्या वाटेवर असताना ब्रह्मवर्तास येऊन पेशवे बाजीराव यांना मुद्दाम भेटले. त्या वेळी पुण्यात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या शतपत्रात पेशवाईवर सडकून टीका केली होती. अखेरच्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने राज्य घालवले, तो विलासी, स्त्रीलंपट होता, पराक्रम गाजवणाऱ्यापेक्षा त्याचे व्यक्तिगत विलास पुरवणार्यांना तो जवळ करत होता असा त्यातून अर्थ निघत होता. सरदार विंचूरकर यांनी आपल्या धन्याला म्हणजे पेशव्याला ह्या बातम्या दाखवल्या. लोकहितवादींचे वडील हरी देशमुख गोखल्यांच्या पदरी कारकून होते ही गोष्ट पेशव्यांना स्मरली. पेशवे विषादाने म्हणाले - 'हरीच्या मुलाने असं लिहावं?'. मग काही काळ पेशवे गप्प होते. पेशव्याचे नंतरचे उद्गार असे होते - 'हरी देशमुखांना आम्ही एक वाडा बांधून दिला होता. त्यांच्यावर आम्ही कृपा केली आहे ती याच कारणासाठी असं त्याला म्हणायचे आहे का?' ============= ब्रह्मवर्ताचा शनिवारवाडा प्रवेशद्वार wada1 नंतर बांधलेल्या बिठूर रेल्वेस्टेशन जवळ पेशव्यांचा दोन चौकी, दोन मजली वाडा होता. पण पेशव्यांना तो त्यांचा मान-मरातबास साजेसा नाही, लहान आहे असे वाटले. म्हणून त्यांनी एक नवा वाडा बांधला. तो कित्येक एकर जमिनीवर पसरला होता. त्याला 'शनिवार वाडा' असच नाव दिले होते. गालिचे, आरसे, चिनी वस्तू, हस्तिदंत यांनी तो वाडा सजवलेला होता. काचेची सुंदर झुंबरे टांगली होती. पेशव्यांच्या सर्व पूर्वजांची चित्रे भिंतीवर टांगलेली होती. ओवरी wada2 वाड्याला बाहेरून तट बांधलेला होता. आत ७ मोठ्या विहिरी होत्या. एक मोठे देऊळ होते. उध्वस्त दालने wada3 wada4 ब्रिटिशांनी या साऱ्याचा विध्वंस केला. फक्त ७ विहिरी काय त्या आज वाचल्या आहेत - त्या ही का तर त्यात खजिना दडवला आहे या अफवेमुळे त्या वाचल्या. ============= सरस्वतेश्वर महादेव मंदिर mahadev हे मंदिर स्थानिक लोक पेशव्याचे मंदिर म्हणून ओळखतात. महाराष्ट्रातून येताना पेशव्यांबरोबर वाराणसीबाई आणि सरस्वतीबाई अश्या दोन बायका होत्या. सरस्वतीबाईंचे निधन ब्रह्मावर्त इथे झाल्यावर गंगेकाठी त्यांना अग्नी देण्यात आला. त्या जागेवर पेशव्यांनी घाट आणि एक महादेवाचे मंदिर बांधले. त्याला सरस्वतेश्वर महादेव मंदिर असे नाव दिले. मला या मंदिराचे नवीन छायाचित्र सापडले नाही. कुणाला हा भाग माहित असल्यास नवीन छायाचित्र मिळाले तर इथे जोडता येईल. पेशव्याचे सर्व वाडे आणि मंदिरे १८५८ साली इंग्रजांनी कानपूरच्या हत्याकांडाचा नानासाहेब पेशव्यांवर सूड म्हणून सुरुंग लावून जमीनदोस्त केली. हे एकमेव मंदिर लखनौचे नवाब यांनी स्थानिक जनतेच्या वतीने मध्यस्ती केल्यामुळे वाचले. ============= पेशव्यांच्या पूजेतील गणेश बिठूरमध्ये 'दूबे' नावाचे घराणे फार दिवसांपासून आहे. त्यांच्या देवघरातला गणेश पाहण्यासाठी लोक येतात (निदान १९६१ साली येत होते). पांढऱ्या संगमरवराची माध्यम आकाराची ही मूर्ती आहे. पेशव्यांच्या खाजगी देवघरात ही मूर्ती होती. १८५८ च्या विध्वंसात वाडाच नष्ट झाला पण ही सुंदर मूर्ती कशीतरी वाचली आणि दुबे यांच्या पूर्वजांकडे आली. तेंव्हापासून दुबे आपल्या देवघरात तिची रोज पूजा करतात. बाजीरावाची या गणेशावर फार श्रद्धा होती आणि पेशवे रोज एक सोन्याची मोहोर गणपतीच्या पायाशी अर्पण करत असत अशी आख्यायिका आहे. मला या गणेशाचे अथवा दुबे यांचे काहीच संदर्भ इंटरनेटवर सापडले नाहीत. त्यामुळे आज या गणेशाची काय अवस्था आहे याची काहीच कल्पना नाही. ============= राजा शिवप्रसाद पेशव्यांच्या भेटीस राजा शिवप्रसाद हा मुर्शिदाबाद इथल्या राजघराण्याशी संबंधित परिवारात जन्मला होता. नंतर १८८३ साली तो व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये मेम्बर बनला. तो एक प्रसिद्ध लेखक होता. त्याचे आत्मचरित्र 'सावन ए उमरी' मध्ये त्याने पेशव्यांशी संबंधित एक किस्सा दिला आहे. शिवप्रसाद दिल्लीहून काशीस निघाला होता. त्या काळातली एक सामान्य समजूत होती की बाजीराव पेशव्यांकडे एके काळी एकूण ३ लाख स्वार होते. चार महाराजे - शिंदे, होळकर, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड हे त्याच्या सिंहासनाचे चार खांब. कानपुर जवळ पोचल्यानंतर त्याला आतून एक उत्कट इच्छा झाली की अश्या प्रख्यात पेशव्यास जाऊन भेटावे. मग शिवप्रसाद बिठूरला गेला आणि एका पंड्याच्या मदतीने तो पेशव्याचे दिवाण यांच्या घरी गेला. दिवाण महादेवाची पूजा करण्यात गुंतले होते, पण त्यांनी पटकन पेशव्यांच्या भेटीची व्यवस्था केली. शिवप्रसाद शर्ट-पॅंट या कपड्यात असल्यामुळे त्याला असे कपडे घालून आदरणीय पेशव्यासमोर जाता येणार नव्हते. म्हणून दिवाणसाहेबानी एका धोतराची व्यवस्था केली. पेशव्यासमोर पोचल्यावर त्याला एका आसनावर बसवण्यात आले. पेशवे स्वतः एका रेशमी दोर्यांनी बांधलेल्या झोपाळयावर एक फूट जाड गादीवर बसले होते. झोपाळा इतरांचा पेशव्यांना स्पर्श होणार नाही अश्या पद्धतीने पुरेसा दूर बांधला होता. शिवप्रसादने त्याचे पेशव्यांबरोबर काय बोलणे झाले त्याची नोंद केलेली नाही, पण त्याला वाड्याच्या भिंतीवर टांगलेली २५ घड्याळे मात्र नोंद घेण्याजोगी वाटली. ही फार मौल्यवान होती. ब्रिटिश अधिकाऱयांकडून पेशव्यास वेळोवेळी ही घड्याळे भेट म्हणून मिळाली होती. पण इतकी घड्याळे असूनही पेशव्यांना त्यांचा वेळ पाहण्यासाठी काहीच उपयोग नव्हता, कारण पेशव्यांकडे वेळ सांगण्यासाठी ठराविक वेळी एक घड्याळजी नेमला होता. ती सारी घड्याळे भिंतीवर डेकोरेशन म्हणून वापरली होती! ============= तनखा गंगार्पण इंग्रज सरकारकडून पेशव्यांना मिळणारा तनखा हा अनेक हप्त्यांमध्ये मिळत असे. पण तो योग्य पद्धतीने पेशव्यांचा मान राखून दिला गेला पाहिजे असा पेशव्यांचा कटाक्ष असे . अश्या एका प्रसंगी बाजीराव पेशवे गंगास्नान करून पूजेनंतर गंगेस प्रसाद अर्पण करत होते. कंपनीं सरकारच्या माणसांना दम धरवला नाही. त्यांनी घाईघाईने नाण्यांची पोती असलेली बैलगाडी गंगाकिनारी जात पेशवे होते तिथे नेली. तिथे पेशव्यांजवळ जाऊन त्यांना तनखा आल्याचे सांगण्यात आले. पेशव्यांनी एक क्षणाचाही विलंब न करता सर्व नाणी गंगार्पण करा असा हुकूम सोडला. त्यांच्या हुकुमाची अंमलबजावणी करण्यात आली. आपल्या दैन्यावस्थेतही पेशवा आपल्या पदाचा असा अभिमान बाळगून होता.
  • Log in or register to post comments
  • 43996 views

प्रतिक्रिया

Submitted by आनन्दा on Fri, 02/02/2018 - 13:57

Permalink

छान माहिती..

छान माहिती..
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 02/02/2018 - 13:57

Permalink

आवडले! अजून...अजून....:)

आवडले! अजून...अजून....:)
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 02/02/2018 - 13:57

Permalink

आवडले! अजून...अजून....:)

आवडले! अजून...अजून....:)
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 02/02/2018 - 13:57

Permalink

आवडले! अजून...अजून....:)

आवडले! अजून...अजून....:)
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 02/02/2018 - 13:57

Permalink

आवडले! अजून...अजून....:)

आवडले! अजून...अजून....:)
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Fri, 02/02/2018 - 14:07

Permalink

वाड्याची चित्रे आंतरजालावरून

वाड्याची चित्रे आंतरजालावरून इथून साभार घेतली आहेत http://1.bp.blogspot.com/-3H3faO1WVQQ/Usral4hO0gI/AAAAAAAABD8/hPAGM7-vtoI/s1600/IMG_8011.JPG हा उल्लेख लेखात करायचा राहिला.
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Fri, 02/02/2018 - 14:17

Permalink

आवडले. अजुन लिहा.

आवडले. अजुन लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 02/02/2018 - 14:50

Permalink

छान लेख

माहिती आवडली ! अवांतर : >>पेशवा आपल्या पदाचा असा अभिमान बाळगून होता. : हसावे की रडावे ते कळेना ! पदाच्या अभिमानासाठी लढून शहीद झाला असता तर आज पूज्य असता
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 02/02/2018 - 16:17

In reply to छान लेख by कपिलमुनी

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 02/02/2018 - 19:02

In reply to छान लेख by कपिलमुनी

Permalink

त्या काळाचा महिमाच तसा होता,

त्या काळाचा महिमाच तसा होता, दुसऱ्या बाजीरावास दोष देण्यात काही फारसा अर्थ नाही, मला वाटतं पेशव्यांच्या अस्तानंतर फक्त शीख राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात जायचे राहिले होते, बाकी अखिल भारतातील सर्वच राज्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेलीच होती, १७५७ च्या प्लासीच्या लढाईने त्याची सुरुवात झालीच होती, दोष द्यायचाच असेल तर तत्कालीन भारतातील सर्वच राजवटींना द्यायला हवा. पेशवे केवळ ब्राह्मण म्हणून त्यांना नेहमीच आकसाने पाहिले जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 02/02/2018 - 22:16

In reply to त्या काळाचा महिमाच तसा होता, by प्रचेतस

Permalink

सहमत आहे

सहमत आहे. लिखाण आवडले, अजून येऊ द्या किस्से.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sat, 02/03/2018 - 02:46

In reply to त्या काळाचा महिमाच तसा होता, by प्रचेतस

Permalink

दोष आणि अभिमान

बाजीरावास दोष देत नाही. तत्कालीन परिस्थितीनुसार राज्यकर्ते निर्णय घेतात पण एकदा मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर त्यांच्या वागण्याला सध्या पदाचा अभिमान वगैरे विशेषण लावणे वैयक्तिकरित्या पटले नाही. हे म्हणजे गिरे तो भी टांग उपर असे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 02/03/2018 - 08:29

In reply to दोष आणि अभिमान by कपिलमुनी

Permalink

हे तुझ्याबद्दल नाहीच रे,

हे तुझ्याबद्दल नाहीच रे, ज्यांना पेशवे म्हणल्यावर लगेच पोटशूळ उठतो त्यांच्याबद्दल लिहिलेय :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 02/02/2018 - 19:19

In reply to छान लेख by कपिलमुनी

Permalink

हकीरतेक

हसावे की रडावे ते कळेना ! पदाच्या अभिमानासाठी लढून हुतात्मा झाला असता तर आज कोणाला ठाऊकही नसता. -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sat, 02/03/2018 - 02:42

In reply to हकीरतेक by गामा पैलवान

Permalink

कोणाला ठाऊकही नसता

जशी झाशीची राणी कोणाला माहितीच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by हरवलेला on Mon, 02/05/2018 - 07:12

In reply to कोणाला ठाऊकही नसता by कपिलमुनी

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on Fri, 02/02/2018 - 15:16

Permalink

खरोखर रोचक माहिती आहे.

खरोखर रोचक माहिती आहे. प्रतिसाद देण्यास येत नसलो तरी वाचनमात्र असतो आणि पुढचे भाग वाचेन. तुम्ही पुढचे भाग लिहावेत अशी विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by सिद्धार्थ ४ on Fri, 02/02/2018 - 15:27

Permalink

आवडले! अजून...अजून....:)

आवडले! अजून...अजून....:)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 02/02/2018 - 15:44

Permalink

The Last Peshwa And The

The Last Peshwa And The English Commissioners 1818 1851 अर्काईव्ह डॉ ट ऑर्गवर गावले लेखकाचा धागा लेखात उल्लेख केल्यामुळे शोधता आले आता वाचतो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 02/02/2018 - 20:56

In reply to The Last Peshwa And The by माहितगार

Permalink

@ मनो , प्रतुलचंद्र गुप्तांचे

@ मनो , प्रतुलचंद्र गुप्तांचे, दुसर्‍या बाजीरावाच्या उत्तर आयुष्याबद्दलचे संशोधन पुर्ण पुस्तक वाचले. अशाच स्वरुपाचे सुधा शहांचे संषोधन पूर्ण लेखन रत्नागिरीस्थित ब्रम्ह देशचा नजरबंद सम्राट थिबाबबद्दल गूगल बुक्स वर उपलब्ध आहे. हे दोन्ही वाचले की दक्षिण आशियातली सत्ताधीश घालवताना धरले तर चावते सोडले तर पळते अशा डोकेदुखी सत्ताधीशांना त्यांना मारले तरी जनता उठाव करेल आणि जनतेच्या सन्नीध राहील्यास तेच कारवाया करतील अशांना मोठी तनखा देऊन जनतेच्या नजरेपासून दूर नेऊन नजरबंद ठेवण्याची ब्रिटीश स्टृअ‍ॅटेजी यशस्वी झालेली दिसते. प्रतुलचंद्र गुप्तांचे, पुस्तक वाचल्या नंतर दुसर्‍या बाजीरावाचा रामचंद्रपंत नावाचा सुभेदार सरळ सरळ फितुर असण्याची शक्यता दिसते. नंतरच्या काळात दुसर्‍या बाजीरावास देखील हे लक्षात आलेले दिसते, त्यामुळे स्वतःच्या तनख्याचा मोठा भाग बाजीराव नंतर या रामचंद्रपंतास देण्यास तयार झाल्याचे दिसते. यात ही रामचंद्र पंत आणि ब्रिटीश कमिशनरांचे व्यक्तिगत संबंधाचे साटेलोटे असण्याची शक्यता जाणवते. वस्तुतः ब्रिटीशांनी जेवड्।ई आमिषे रामचंद्रपंताला दाखवली असतील तेवढा आर्थीक परतावा ब्रिटीशांकडून त्याला मिळालेला दिसत नाही हे लक्षात येई पर्यंत त्या रामचंद्रपंताची हयात संपली असावी. हा रामचंद्रपंत दुसर्‍या बाजीरावाच्या केव्हा पासूनसानिध्यात आला -म्हणजे नेमकी ही फितुरी केव्हा पासून चालत असली पाहिजे आणि दुसरा बाजीराव त्यावर अवलंबीत्व का वाढले याची अधिक माहिती वाचणे आवडेल. दुसर्‍या बाजीरावा बद्दल मराठेशाहीत आधिच नाराजी होती , दुसर्‍या बाजीरावाच्या मर्यादाही असतील पण त्याची अधिक बदनामी करण्याच्या संधीनेही ब्रिटीशांचे फावले असण्याची शक्यता सुद्धा जाणवते . दुसर्‍या बाजीरावाच्या उत्तर आयुष्याबद्दलच्या माहितीही तशी कमी उपलब्ध असणे आणि पुर्वायुष्यातील बदनामीसाठी वापरली गेलेली माहिती आणि वास्तव यातले खरे खोटे करणे आधीच अवघड आहे. त्यामुळे दुसर्‍या बाजीरावा बद्दल अधिक वाचणे आवडेल पण प्रतुलचंद्र गुप्तां सारखे भक्कम स्रोत आणि केवळ ऐकीव असलेले दोन्ही माहिती द्याव्यात पण त्या वेगवेगळ्या नमुद कराव्यात असे वाटते. १८५७ च्या उठावाची मानसिक तयारीत दुसर्‍ञा बाजीरावाचा हात कितपत असण्याची शक्यता असावी . या अंगाने काही माहिती मिळत असल्यास रोचक ठरु शकेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Fri, 02/02/2018 - 23:19

In reply to @ मनो , प्रतुलचंद्र गुप्तांचे by माहितगार

Permalink

राजवट बदलल्यानंतर आपली इनामे

राजवट बदलल्यानंतर आपली इनामे कायम ठेवायची तर सरदारांना इंग्रजांशी निष्ठा दाखवणे भाग होते. इंग्रजांशी निष्ठा ठेवली तर ज्या पेशव्याचे इनाम आजवर भोगत आलो त्याच्याशी बेईमानी केली असा ठपका येतो. तो टाळायचा असेल तर मग आपला धनीच कसा लायक नव्हता आणि अश्या धन्याशी स्वामिनिष्ठ राहणे शक्य नव्हते म्हणून आम्ही इंग्रजांना मिळालो असा मार्ग काढलेला दिसतो. सर्व पुरावा पाहताना एका लक्षात ठेवले पाहिजे की तो बहुतेक सगळा इंग्रजी दफ्तरातला आहे. बाजीरावाचे स्वतःचे दप्तर १८५८ मध्ये बिठूरच्या पेशवे वाड्यात नष्ट झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Fri, 02/02/2018 - 15:44

Permalink

जबरदस्त लेख, माहितीचा खजिनाच

जबरदस्त लेख, माहितीचा खजिनाच जणू, मंत्रावेगळा वाचले आहे आणि आवडले पण होते. पुढील भाग लिहाच मालक.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलभाऊ on Fri, 02/02/2018 - 16:18

Permalink

मस्त माहिती

अजून येऊ द्या..!
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Fri, 02/02/2018 - 16:22

Permalink

अरेरे

किती स्वार्थी अन लहरी वृत्तीचे होते !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 02/02/2018 - 17:16

Permalink

अजून लिहा

रुक्ष इतिहासापेक्षा असे किस्से खूप मनोरंजक असतात!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 02/02/2018 - 18:56

Permalink

लेखातील किस्से आवडले, अजूनही

लेखातील किस्से आवडले, अजूनही अशीच ऐतिहासिक माहिती येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Fri, 02/02/2018 - 19:43

Permalink

आवडले

अर्थात वाईट वाटले सगळा प्रकार वाचून. आपल्याच प्रजेवर अन्याय करणाऱ्या आणि राजेपदाचा व्रुथा माज करणाऱ्या राजाना कधी मनात विचार आला नसेल का की आपल्या वागण्यामुळे शत्रू निर्माण झाले तर आपल्या पुढच्या पिढ्या त्याचा त्रास काढतील. मजा आली वाचायला. येऊदे पुढचा भाग लवकर.
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Fri, 02/02/2018 - 19:44

Permalink

रोचक माहिती

रोचक माहिती . पेशवाईतील घडामोडींवर आधारीत "तोतयाचे बंड" या नाटकाचा एक प्रयोग दुस-या बाजीरावांच्या मुली समोर सादर झाला होता अशी एक घटना ऐकीवात आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by अरविंद कोल्हटकर on Fri, 02/02/2018 - 20:59

In reply to रोचक माहिती by सिरुसेरि

Permalink

होय, असे घडले होते.

दुसर्‍या बाजीरावाची मुलगी कुसुमाबाई (जन्म १६ जानेवारी १९४७) ह्या ग्वालेरच्या आपटे घराण्यात दिल्या होत्या. त्यांचे सासरचे नाव सरस्वती. विवाहानंतर वय लहान असल्याने त्या माहेरीच नानासाहेबाजवळ राहत होत्या आणि नानासाहेब परागंदा झाल्यावर पेशवे कुटुंबातील अन्य स्त्रियांबरोबर त्या नेपाळला गेल्या. कालान्तराने श्वशुर बाबासाहेब आपटे ह्यांनी त्यांना परत ग्वाल्हेरला आणले. पतिनिधनानंतर १८८४ च्या पुढेमागे त्या कायमच्या मुक्कामासाठी वाराणसीमध्ये स्थायिक झाल्या. १९१३ मध्ये बाई पुण्यास आल्या होत्या. त्या मुक्कामात किर्लोस्कर थिएटरामध्ये (वसन्त टॉकीजची जागा) त्यांनी न.चिं .केळकरांचे 'तोतयाचे बंड' हे नाटक पाहिल्याची नोंद ११ फेब्रुअरी १९१३ च्या 'केसरी'मध्ये मिळते. बाई १९ जून १९१७ ह्या दिवशी वाराणसीमध्ये वारल्या. त्या घटनेवर अच्युत बळवंत कोल्हटकरांनी 'संदेश'मध्ये लिहिलेला 'शेवटची वेल सुकली' हा अग्रलेख बराच गाजला होता. (आधार - 'पेशवे घराण्याचा इतिहास' ले. प्रमोद ओक.) (सवडीने ह्याच पुस्तकातील बाईंचे तरुण आणि वृद्ध वयातील छायाचित्र देतो.)
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 02/02/2018 - 21:34

In reply to होय, असे घडले होते. by अरविंद कोल्हटकर

Permalink

दुसर्‍या बाजीरावाची मुलगी

दुसर्‍या बाजीरावाची मुलगी कुसुमाबाई (जन्म १६ जानेवारी १९४७) ह्या ग्वालेरच्या आपटे घराण्यात दिल्या होत्या. त्यांचे सासरचे नाव सरस्वती.
कुसुमाबाईसाहेबांचा जन्म भारतीय स्वातंत्र्य वर्षी झाला, असा उल्लेख मिपा संस्थळी, भा प्र वे फेब 2, 2018 रोजी रात्री 8 वा 30 मिनिटांनी , जसे आढळले तसें... तरी सदर उल्लेख , नजरचुकीने झाल्या असल्याची शक्यता गृहीत धरता, सदर नोंद मिपा दफतरी रुजवात करून घेऊ नये, अशी विनंती. . . आणि हो, हे राहीलच, . . अस्मादिकांची ही प्रतिक्रिया प्रताधिकार मुक्त म्हणून गृहीत धरावी, सबब त्याचा यथा इच्छा भोगवटा उपभोगण्यास, आमची कोणतीही हरकत नाही, आम्ही हल्लागिल्ला करणार नाही, व भोगवटा धारकास कोणतीही तोशीस लागू देणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Fri, 02/02/2018 - 22:20

In reply to दुसर्‍या बाजीरावाची मुलगी by पगला गजोधर

Permalink

..

दुसर्या बाजीरावास पुत्र वारस नव्हता .. नानासाहेब दत्तक होते. वारसासाठी अनेक लग्ने केली , असे उल्लेख आहेत . मुली होत्या का , ते माहीत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 02/03/2018 - 11:54

In reply to .. by manguu@mail.com

Permalink

अभ्यासक प्रतुलचंद्र गुप्ता

अभ्यासक प्रतुलचंद्र गुप्ता च्या पुस्तकानुसार दुसर्‍ञा बाजीरावाच्या मृत्यूसमयी त्यांच्या दोन विधवा मैनाबाई आणि सईबाई दोन दत्तक पुत्र नाना साहेब आणि बाळासाहेब दोन अविवाहीत मुली योगाबाई आणि कुसुमबाई तर अजून एक दत्तक मुलगी मतीया बाई असावयास हवी होती जिची माहिती त्यांना मृत्यूसमयीच्या कागदपत्रात आढळली नाही. असा स्वतःचा परिवार होता. सदाशिवरावांचा मुलगा पांडूरंगराव आणि खापर पणतू चिमणाजी अप्पा दुसर्‍या बाजीरावाच्या कुटूंबाचा भाग होते.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Sat, 02/03/2018 - 01:02

In reply to दुसर्‍या बाजीरावाची मुलगी by पगला गजोधर

Permalink

काय कळंना !!!

दुसरा बाजीराव 'गेला' १८५१ मध्ये. तोतयाचे बंड हे पुस्तक आले १९१३ साली. १९४७ ला मुलगी कुठून आली ? की तोतया नाटक बघायला मुलगीही तोतयाच आणली ?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 02/03/2018 - 12:04

In reply to काय कळंना !!! by manguu@mail.com

Permalink

१९४७ ला मुलगी कुठून आली ?

१९४७ ला मुलगी कुठून आली ?
१८४७ वाचा की , टायपिंअ मिस्टेकच असणार न हो ती. १८४७ बरोबर असेल तर तो पर्यंत दुसर्‍या बाजीरावाचे वय चक्क ७२ च्या आसपास आसावे. १८४१ नंतर लकवा सदृष्य व्याधीने दुसरा बाजीराव ग्रस्त असावा. शेवटपर्यंत घोड्याचा पागा सांभाळला पण बिठूरला गेल्यमात्रर त्याने व्यायाम सोडाच घोड्यावर स्वार होण्याचेही टाळून केवळ पालखीचा वापर केला असावा. इंग्रज अधिकार्‍ञांनी या गोस्।टीची मात्र नोंद ठेवत होते तो फारसा व्यायाम करत नसल्याने लवकर गचकेल आणि कंपनी सरकारचा मोठा खर्च वाचेल अशी त्यांची अपेक्षा मा त्र दुसरा बाजीराव चक्क ७५ वर्षे जगल्याने यशस्वी झालेली दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 02/02/2018 - 20:01

Permalink

रोचक

रोचक किस्से
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Fri, 02/02/2018 - 22:26

Permalink

किस्से रोचक आहेत. अजून

किस्से रोचक आहेत. अजून येउद्या
  • Log in or register to post comments

Submitted by निशाचर on Fri, 02/02/2018 - 23:25

In reply to किस्से रोचक आहेत. अजून by ज्योति अळवणी

Permalink

+१

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 02/02/2018 - 23:35

Permalink

रोचक माहिती ! पुभाप्र.

रोचक माहिती ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 02/03/2018 - 00:42

Permalink

मस्त किस्से

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by diggi12 on Sat, 02/03/2018 - 00:53

Permalink

मस्त

पुढील भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

Submitted by gaikiakash on Sat, 02/03/2018 - 01:23

Permalink

बयाबाई आपटे (१८४६-१९१७) असे

बयाबाई आपटे (१८४६-१९१७) असे त्यांचे नाव होते. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sat, 02/03/2018 - 02:38

Permalink

अतिशय रोचक लेख. तुमच्याकडून

अतिशय रोचक लेख. तुमच्याकडून अजून बरेच वाचायची इच्छा आहे. दुसरा बाजीराव हा आधीच्या कर्तबगार पेशव्यांच्या लायकीचा नव्हता हे निश्चित, पण त्याच्याकडे जातीच्या आकसाने न पहाता, वस्तुनिष्ठपणे पहाण्याचा दृष्टीकोन फार आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Sat, 02/03/2018 - 11:55

In reply to अतिशय रोचक लेख. तुमच्याकडून by तिमा

Permalink

माझं काम कथाकाराचं, जे ऐकलं,

माझं काम कथाकाराचं, जे ऐकलं, वाचलं ते मांडायचं. वाचून आपापले निष्कर्ष काढण्यात मि. पा. कर हुशार आहेतच! ☺️
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sat, 02/03/2018 - 03:09

Permalink

दुसरा बाजीरावासमोरील आव्हानं

सुखीमाणूस,
आपल्याच प्रजेवर अन्याय करणाऱ्या आणि राजेपदाचा व्रुथा माज करणाऱ्या राजाना कधी मनात विचार आला नसेल का की आपल्या वागण्यामुळे शत्रू निर्माण झाले तर आपल्या पुढच्या पिढ्या त्याचा त्रास काढतील.
माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या बाजीरावाने प्रजेला त्रास दिला नाही. तसेच राजेपणाचा वृथा माजही दाखवला नाही. तो जरा जास्तंच विलासी होता हे खरंय. पण त्यामुळे राज्य बुडालं हे पूर्णपणे खरं नव्हे. त्याचा बराचसा काळ राज्यव्यवहार शिकण्यात फुकट गेला. शिवाय त्याला अमृतराव नावाचा दत्तक अग्रज ( = मोठा भाऊ) होता. तोसुद्धा पेशवेपदाच्या शर्यतीत होता. विसाव्या वर्षी अचानक कैदेतून मुक्त होऊन थेट पेशावेपदी बसायला लागल्याने प्रशिक्षण वगैरेची बोंब होती. सुरुवातीस त्याला धड लिहिता वाचताही येत नसे. त्यातूनही त्याने जिद्दीने मार्ग काढला. राजकारणाचा प्रत्येक डाव त्याला स्वानुभवाच्या खडतर मार्गाने शिकवा लागला. त्याला कोणीही विश्वासू सल्लागार नव्हते. खुद्द नाना फडणीस त्याला दाबून ठेवायला बघंत असे. नाना मेल्यावर (इ.स. १८००) त्याला थोडा मोकळा श्वास घेता येऊ लागला. पण तोवर राजकीय परिस्थिती पार हाताबाहेर गेलेली होती. अशा परिस्थितीत त्याने इ.स. १७९४ ते १८०२ पर्यंत सातेक वर्षं राज्य केलं. पुढे अमृतराव, शिंदे, होळकर व तो स्वत: वगैरेंच्या आपसांतल्या सततच्या झगड्यांपायी पदच्युत झाला. मग कुंपणी सरकारला गाठून वसईच्या तहान्वये वेलस्लीकडून परत पेशवेपदी बसला. पण तरीही धडपड आणि राजकारण चालूच राहिलं. १८०२ नंतर दोन इंग्रज-मराठा युद्धं झाली. त्यापैकी १८१७ साली झालेल्या दुसऱ्या (आणि एकंदर तिसऱ्या) इंग्रज-मराठा युद्धात शिंदे/होळकर/भोसले इत्यादिंची मदत आलीच नाही. इंग्रज एकट्या पेशव्याला भारी पडले आणि १८१८ साली पेशवाई संपुष्टात आली. सांगायचा मुद्दा काये की दुसरा बाजीराव केवळ विलासी नव्हता. त्याने धडपडही भरपूर केली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sat, 02/03/2018 - 03:28

Permalink

पेशवाई

एवढे सगळे घडत असताना छत्रपती घराणे कुठे होते ? युद्धात त्यांच्या वंशजांचा काही सहभाग असल्याची नोंद मिळते का ? कारण राजे पेशवे नसून छत्रपती होते. छत्रपती शाहू (पहिले ) नंतर पुढे फार उल्लेख येत नाहीत म्हणून पृच्छा .
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Sat, 02/03/2018 - 07:36

In reply to पेशवाई by कपिलमुनी

Permalink

...

युद्ध करण्यात त्याना interest असता तर राज्य स्वत:कडेच ठेवले असते की , पेशव्याना कशाला दिले असते ?
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Sat, 02/03/2018 - 09:43

In reply to पेशवाई by कपिलमुनी

Permalink

मलाही हाच प्रश्न नेहमी पडतो.

1818 साली इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव करून सत्ता सोडायला लावली. पण राज्य तर छत्रपतींचे होते. त्यांनी ते वाचवायची काही धडपड केली होती की नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 02/03/2018 - 11:29

In reply to मलाही हाच प्रश्न नेहमी पडतो. by बबन ताम्बे

Permalink

छ. प्रताप सिंगसाठी धडपडीचा

छ. प्रताप सिंगसाठी धडपडीचा जो काही प्रयत्न झाला तो इंग्रज आधिकार्‍यांच्या लक्षात आला. त्यामुळेच बिटीश सरकारने त्यास पदच्यूत करून बनारसला पाठवले आणि सातारा गादी खालसा केली. ( तर कोल्हापूरकर छत्रपतींनी दुसर्‍ञा बाजीरावास हटवण्या चा अयशस्वी प्रयत्न केला पण इंग्रजांशी पंगा घेतला नसावा चुभूदेघे) सातार छत्रपतींनी किमान दुसरा बाजीराव इंग्रज स्वाधीन झाल्यावरतरी किमान नॉमीनल पेशवे आणि सेनापती अपॉईंट करत बदलत राहीले असते तरी इंग्रजांची बर्‍ञा पैकी नाकात नऊ आले असते असे काही वेळा वाटते. खासकरुन स्वातंत्र्यचळवळीत सहभाग असावयास हरकत नव्हती.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Sat, 02/03/2018 - 12:02

In reply to मलाही हाच प्रश्न नेहमी पडतो. by बबन ताम्बे

Permalink

सातारकर निलेश झोरे यांच्याशी

सातारकर निलेश झोरे यांच्याशी काही दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. ते छत्रपतींचे संपूर्ण चरित्र लिहितायत. त्यांचा आजच्या छत्रपतींशी संपर्क आहे. त्यामुळे ते प्रकाशित झाले की छत्रपती घरण्याविषयी अजून माहिती मिळेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Sat, 02/03/2018 - 11:32

In reply to पेशवाई by कपिलमुनी

Permalink

त्या वेळी छत्रपती राजे

त्या वेळी छत्रपती राजे प्रतापसिह हे होते. बाजीरावाने इंग्रजांशी लढाई करण्याचा निर्णय त्यांच्या संमतीने घेतला. स्वतः छत्रपती पेशव्याच्या सैन्यात होते. गोपाळ-अष्टीच्या लढाईत सेनापती बापू गोखले पडले. त्यावेळी स्वतः छत्रपती हाती तलवार घेऊन घोड्यावरून निघाले. इंग्रजांचा पाठलाग चालू होताच. इंग्रज सैन्याने गाठल्यावर चिटणीसानी 'सातारकर छत्रपती आहेत.' असे सांगून छत्रपतींना सुरक्षित ताब्यात दिले. आम्ही सापडलो, आम्हास काढून न्या असा बाजीरावास निरोपही गेला, पण ते शक्य झाले नाही. उत्सुकता असेल तर ते सगळे प्रसंग मूळ मराठीत देतो पुढच्या भागात.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com