Skip to main content

अस्वस्थ न्यायव्यवस्था?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी रविवार, 14/01/2018 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वस्थ न्यायव्यवस्था? विधिमंडळ,कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे या लोकशाहीच्या चार स्तंभांनी राज्यघटनेत अभिप्रेत स्वातंत्र्य, समता आणि न्याय या मूल्यांचे संवर्धन करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, संसद राजकारण्यांचा राजकीय आखाडा, प्रशासन सत्ताधाऱयांचे बटीक, तर प्रसारमाध्यमांमध्ये आरती ओवाळणारी व्यावसायिकता आल्याचा आरोप आज सर्रासपणे केला जातो. अशा अस्वस्थ वातावरणात न्यायपालिकेची टिकून असलेली विश्वासहर्ता जनसामान्यांसाठी मोठी दिलासादायक आहे. परंतु लोकशाहीचा महतवाचा स्तंभ असलेल्या न्यायदेवतेच्या घरातही अस्वस्थताच असल्याचे चित्र शुक्रवारी संपूर्ण देशाने अनुभवले. स्वतंत्र्य भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायमूर्तीनी माध्यमांसमोर येत सद्यकालीन न्यायव्यवस्थेबाबतचे आपले आक्षेप टीकात्मक पद्धतीने नोंदविले. ज्यांच्याकडून 'न्याय'चा आधार जनतेला आहे, तेच जर न्याय मागण्यासाठी चक्क जनतेच्या न्यायालयात येत असतील तर ही बाब नुसती धक्कदायक नाही तर चिंताजनकही आहे. त्यामुळे जनता संभ्रमात पडू शकते. त्यांचा विश्वास डळमळीत होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण देशात यावर साधक बाधक चर्चा सुरु झाली आहे. आज चारपैकी दोन न्यायमूर्तीनी "आम्ही केवळ ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आहे" असं म्हणत वादावर पडदा पडणार असल्याचे सुचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वोच न्यायालयातील न्यायाधीशांमधील विसंवाद संपण्याचे संकेत आहेत. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य टिकून राहण्यासाठी हा वाद लवकरात लवकर संपुष्टात यावा, हीच अपेक्षा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ यांनी पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीश यांच्या कारभारावर टीका केली. गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित चाललेला नाही. न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीही टिकणार नाही. खटले सुपूर्त करताना तत्त्वप्रणाली डावलून प्राधान्य असलेल्या पीठाकडे सोपविली जातात. न्यायालयाच्या कारभाराबद्दल लेखी तक्रार केल्यानंतर त्याकडेही दुर्लक्ष केले गेल्यामुळे अखेर प्रसारमाध्यमांसमोर आम्हास यावे लागले, असे स्पष्टीकरण या सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी दिले. एक सर्वोच्च न्यायाधीश आणि 25 न्यायाधीशांचे मंडळ यांनी युक्त असलेल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींची ही व्यथा अनेक गोष्टी उघड करते. सर्वोच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये न्यायदान करण्यासाठी अनेकदा न्यायपीठाची नियुक्ती केली जाते. न्यायपीठ नेमण्याचा अधिकारी सरन्यायाधीशांचा असला तर यासाठी अनेक नियमांचे आणि परंपरांचे पालन अपेक्षित असते. मात्र सरन्यायाधीशांकडून याबाबत मनमानी होत असल्याचा आरोप पत्रपरिषेदत करण्यात आला. त्यामुळे अपेक्षित निर्णय सुकर व्हावा यासाठीच काही विशिष्ट खटले विशिष्ठ न्यायपीठांकडे सुपूर्त केले जात असावेत. तसे होत असेल तर ही बाब गंभीरही आहे आणि चिंताजनकही. त्यामुळे न्यायमूर्तीच्या नियुक्त्या, काही खटले याबाबत न्यायव्यवस्था राजकीय प्रभावाखाली आहे, असा जो आरोप केला जातो, त्याला यातून बळ मिळते. ज्या स्तंभावर लोकशाही टिकून आहे. त्यांना स्वतःचे घटनात्म्क अधिकारक्षेत्र असून यापैकी कोणीही दुसऱ्याच्या अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ करू नये असा संकेत आहे. अर्थातच या अधिकारांच्या सीमारेषा ठळक नसल्याने त्यांचे सहजतेने उल्लंघन होताना दिसते. परंतु सध्या हे सीमोल्लंघन वारंवार होत असल्याचा रोख न्यायमूर्तींच्या आरोपांवरून समोर येते. आपल्या पसंतीच्या खंडपीठाकडे संवेदनशील खटले दिले जातात. यावर हा मुद्दा न्यायाधीश लोया यांच्याबाबत होता का, असा प्रश्न उपस्थित केला असता न्यायाधीश जोसेफ यांनी होय, असे त्याचे उत्तर दिले. त्यामुळे, न्यायव्यवस्थेतील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा चर्चेत येतो. सीबीआयचे न्यायाधीश बी. एच. लोया हे सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे न्यायाधीश होते. न्या. लोया हाताळत असलेल्या या खटल्यात भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आरोपी होते. नागपूर येथे एका लग्नसमारंभास न्या. लोया आले असता 1 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर या मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी, कारण तो अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झाला आहे, असे आक्षेप घेण्यात आले. कॅरव्हान या नियतकालिकाने हे संशयास्पद प्रकरण ऐरणीवर आणले आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. सदर प्रकरणाचा न्यायनिवाडा विशिष्ट खंडपीठाकडे दिल्याचा न्यायमूर्तींचा अनुरोध असेल तर हा निरपेक्ष न्यायदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आक्षेप म्हणावा लागेल. मध्यंतरी अनेक वरिष्ठ न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्या प्रकरणांचे पडसाद ही या नाराजीमागचा एक चेहरा असू शकतो. न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल, हे न्यायमूर्तींचे वाक्य ही तितकेच सूचक आणि प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावणारे आहे. लोकशाही टिकण्यासाठी न्यायव्यवस्था स्वतंत्र्य राहणे किती महत्वपूर्ण आहे, हे घटनाकारांनी घटनेतच विशद केलं आहे. दुर्दैवाने आज न्यायव्यस्थेच्या निरपेक्षपणवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जातेय. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी अशा प्रकारे माध्यमांसमोर येऊन मत व्यक्त करणे योग्य कि अयोग्य ? यावर समांतर मतप्रवाह सर्व देशभरातून समोर येऊ लागला आहे. सरकार, विरोधक, जनता सर्व या घटनेनें हादरून गेले आहे. काही चुकीचे घडत असेल तर त्याची दुरुस्ती करण्यात यावीच. पण त्यातून न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. 'विश्वास' हा छोटा शब्द असला, लिहायला आणि वाचायला एक सेकंद जरी लागत असला, तरी तो निर्माण करण्यासाठी दशकं उलटावी लागतात. भारतीय न्यायव्यवस्थेने आपल्या कृतीतून असा विश्वास फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात निर्माण केला आहे. आज जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाचा गौरव केला जात असेल तर या लोकशाहीच्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी न्यायपालीकेचे विशेषतः सर्वोच्च न्यायालयाचे योगदान जगपातळीवर नावाजलेले आहे. न्यायालयाने कोणत्याही दबावाला बळी न पडता अनेकांना ताळ्यावर आणल्याची अनेक उदाहरणे देता येतील. त्याचमुळे तर जनतेला न्याय व्यवस्थेवर अंतिम विश्वास वाटतो. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी जपून पाऊले उचलावी लागणार आहेत..!!!
लेखनप्रकार

वाचने 31731
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

मला वाटते धागा अ‍ॅड. उंबरकरांनी काढला आहे आणि अवमानने बद्दल दोन प्रतिसाद लिहिले आहेत. तरी सुद्धा अधिक माहितीसाठी the Contempt of Courts Act, 1971

सरकारी कर्मचाय्रांना निवृत्तीनंतर काही समितीचे काम दिले जाते. तर असे काही मिळण्याची शक्यता कुणास धूसर वाटू लागली असेल तर काय करावे?

In reply to by कंजूस

निवृत्ती नंतर माणसाने रिकामे बसावे आपल्या ज्ञान आणि क्षमतेचा उअपयोग करू नये असा नियम थोडाच आहे. घ्या काम कंजूसजी, कोणते काम मिळतेय ते घेऊन टाका ! कंजूसजी आगे बंढो हम आपके साथ है : }

In reply to by माहितगार

मी तर उलट म्हणेन इतके सारे चौकशी आयोगांचे, ट्रायब्युनलचे किंवा ग्राहक न्यायालयांचे काम जर सेवेत असलेल्या न्यायाधीशांनी पाहिले तर जनतेला कोर्टात मरेपर्यंत न्यायच मिळणार नाही अशी स्थिती निर्माण होईल. निवृत्त न्यायाधीश यांच्या अनुभवाचा जोवर ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी आहेत तोवर जरुर फायदा घेतला पाहिजे. अन्यथा एवढ्या वर्षाचे ज्ञान आणि अनुभव पाण्यात जाऊन राष्ट्राचा अपरिमित नुकसान होईल. जर वकील मरेपर्यंत काम करू शकतो तर न्यायाधीशांनी निवृत्त होऊन काहीच न करणे हा राष्ट्रीय संपत्तीचा घोर अपव्यय आहे. राम जेठमलानी ९४ वर्षे सोली सोराबजी ९१ वर्षे फली नरिमन ८९ वर्षे हि उदाहरणे पहा किंवा नानी पालखीवाला हे मृत्यूपर्यंत काम करत होते (८२ वर्षे) आणि अर्थसंकल्प मांडल्यावर त्यांचे त्याबद्दल विचार ऐकणे हे मोठे आनंदाचे असे.

मी आडवळणाने विचारले की या चौघांना हे सरकार कुठल्या चौकशी समितीवर नेमणार नाही अशी धारणा तर झाली नाही ना?

In reply to by कंजूस

ती कामे तशी राजकारणातील वकीलांच्या सोबत किती संपर्क अवलंबून असेल त्यावर असणार. पण मुख्य म्हणजे आधीच असलेले वेगळे राजकीय विचार असहिष्णूता विषयक वृत्तमाध्यामांच फोडणीस मुख्य न्यायाधीश ज्येष्ठता डावलाताहेत हा सूर हीच शक्यता अधिक याही पलिकडे जाऊन मुख्य न्यायाधीश अथवा इतर विशीष्ट केस असलेल्या न्यायाधीशांन बदनामीच्या भितीने ग्रस्त करून विशीष्ट केसेस विशीष्ट दिशेकडे जाऊ नयेत असे उपद्व्यापही ठरवून होऊ शकतात नाही असे नाही पण अशा गोष्टींबद्दल नेमके पणाने सांगणे कठीण असावे.

बय्राच खटल्यांची तड लागत नाही कित्येक वर्षे हे खरे आहे. निर्णय विरुद्ध गेलेला पक्षकार वेगळा मुद्दा घेऊन पुन्हा खटला दाखल करतो आणि त्या 'मेरिटवर' पुन्हा निकाल फिरतो. मालक भाडेकरू खटले याचे एक उदाहरण आहे. न्यायव्यवस्थेत वकील लोकांना अस्वस्थ होण्याची वेळ येत नाही. पाठीवरच्या शाबासक्या त्यांच्या अपेक्षेत नसतातच.

In reply to by कंजूस

उत्तर जरासे अनुषंगिक अवांतरात असावे, अलिक्डे सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाच्या पुढच्या स्टेजची जी चर्चा चालू आहे त्यात एक्सारख्या स्वरुपाच्या केसेस मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाच्या साहाय्यानी येत्या काळात निपटवल्या जातील असे सॉफ्टवेअर तज्ञांकडून आणि सम्बधीत बातम्यातून ऐकून आहे. भारतात परदेशा पेक्षा पाचेक वर्षे सहाजिक जास्त लागतील हे गृहीत धरुन चालावे लागेल.

In reply to by माहितगार

न्यायाधीशांचे सुद्धा काही विशिष्ट विषयात अधिक ज्ञान (specialization) असते. ( त्यांनी त्यात एल एल एम/ पी एच डी इ पदवी ग्रहण केली असू शकते किंवा त्या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे त्यांना अशी ज्ञानसंपदा प्राप्त झाली असू शकते). उदा. राज्य घटना, फौजदारी गुन्हे, सेवा विषयक कायदा, बौद्धिक मालमत्ता अधिकार, पेटंट इ. त्यामुळे अशा केसेस त्या त्या न्यायाधीशांकडे वर्ग केल्या जातात. उदा न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयात दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत मुबई नागरी विकास या विषयाचा कसून अभ्यास केला आणि त्याविषयात दाखल झालेल्या आणि एकत्र वर्ग केलेल्या काही डझन याचिका सुट्टी संपल्यावर एका महिन्यात निकाली काढल्या होत्या. यानंतर मुंबई विकास/ विकासक याबद्दल असणाऱ्या सर्व याचिका त्यांच्या कडे वर्ग केल्या जात असत. माझ्या स्वतःच्या केस मध्ये सरकारला सर्वोच्च न्यायालयात न्यायपीठ प्रतिकूल वाटले कि रजिस्ट्रीमधून पुढची तारीख घेत असत. या न्यायपीठात सरन्यायाधीश योगेश कुमार सभरवाल होते. ( त्यांनी वायुसेनेच्या एका केस मध्ये सरकारचे फार वाईट शब्दात वाभाडे काढले होते आणि त्यानंतर त्यांची ख्याती सरकारविरुद्ध निर्णय देतात अशी झाली होती). असे करत करत सात बेंच बदलून झाली ज्यात तीन वर्षे गेली. त्यांच्या दुर्दैवाने न्यायमूर्ती अरिजित पसायत हे दहाच्या दहा खंडपीठांवर होते आणि शेवटी त्यांच्या लक्षात सरकारचा चावट पण आल्यामुळे त्यांनी अतिरिक्त महाधिवक्ता (ASG) याना बॊलावून त्यांची कडक शब्दात हजेरी घेतली आणि हे प्रकरण निकाली निघाले. न्या. योगेश सभरवाल न्या. अरिजित पसायत हे सेवा विषयात(SERVICE MATTERS) तज्ज्ञ मानले जात. त्यांमुळे अशा केसेस त्यांच्याकडे वर्ग केल्या जात. (तसे रजिस्ट्रीमध्ये केस फाईलवर (SERVICE MATTERS) अशी नोंद असे असे ऐकले होते) तेंव्हा केवळ संगणकाने केसेस वर्ग करणे हा न्यायाचा अपहार होईल असे वाटते.

हे चार जज कोर्टात आलेल्या केसेसचे जजांत वाटप कसे होते या मेथडबद्दल तक्रार करत नव्हते त्यात (त्यांच्या मते) झालेल्या घोळाची तक्रार करत होते. न्यायालयात आलेल्या केसेस प्राधान्यक्रम कसा लागतो याची काही तक्रार? निर्भयाची केस पटकन निपटावली, तिच्या पूर्वी (नि नंतरही) ज्या मुलींसोबत दुश्कर्म झालं, त्यांनी काय घोडं मारलं होतं?

न्यायाधिशांचे विशिष्ट विषयातील ज्ञान गृहीत धरता येणार नाही. तज्ञ मंडळीचा शेरा घेऊनच त्याआधारे पुरावा ग्राह्य धरून निर्णय द्यायचा असतो. उदा० इंटरनेट, मोबाइल प्रणाली गुन्हे.

तज्ञ मंडळीचा शेरा घेऊनच मग यात न्यायाधीश स्वतःच तज्ज्ञ असेल तर काय वाईट आहे? जर वकील मंडळी एका विशिष्ट विषयात तज्ञ म्हणून व्यवसाय करत असतील(उदा. गुन्हे विषयक, कर सल्ला,कौटुंबिक वाद, नागरी प्रश्न इ) तर न्यायाधीश तज्ञ असेल तर अजूनच चांगले.

नाही,तसं नाही. अमुक एक पुरावा,मुद्दा कसा ग्राह्य धरला तर अमुक तज्ञाला पाचारण केलं आणि त्यावर हा निर्णय असं असतं. न्यायाधिशालाही माहित असेलच पण खटल्यात तसं करत नाहीत.

न्याय करणारा हा थोडासा संगणकासारखा काम करतो म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संगणक स्वत: काही करत नाही॥ तो फक्त तुम्ही दिलेल्या प्रश्नाला तुम्हीच दिलेल्या नियमावलीतून पुढे नेतो आणि उत्तर देतो. स्वत: नियम बनवत नाही. स्वत: न्याधिश कशात तज्ञ असणे गरजेचे नाही. शिवाय जो न्याय करायला बसला आहे तो "माझ्या अनुभवाने" असं म्हणणे अपेक्षित नाही. मुद्यावर येऊन -केसेसचे वाटप कुणालाही देता येते. शेवटी दिलेला निर्णय नोंदीत राहतो आणि त्यालाही वरच्या कोर्टात आव्हान दिले जाते तेव्हा पुन्हा अगोदरचा निर्णय राखलाही जातोच.

इतकं सोपं असतं तर तुम्ही आणि मी पण न्यायाधीश झालो असतो. न्यायाधीशाला एखादी गोष्ट नियमात कशी बसवायची किंवा नियम बाह्य आहे का यासाठी या नियमांचे मुळात सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. "चार बुके पाठ केलेला भिक्षुक आणि दशग्रंथ पचवून विनम्र झालेला व्युत्पन्न" यातील हा फरक आहे. जसे प्रयोगशाळेच्या रक्ताच्या चाचण्यांमध्ये एक नॉर्मलची रेंज दिलेली असते पण त्याचा अर्थ समजण्यासाठी डॉक्टर लागतो तसेच आहे. त्या त्या विषयातील अधीक माहिती / अनुभव असलेल्या न्यायधीशाकडेच त्या केसेस वर्ग करण्याचे हे कारण आहे.

नक्कीच. न्यायाधिश कोणीही होऊ शकतो, फक्त न कंटाळतो दोन्हीकडचे युक्तिवाद ऐकण्याचा संयम हवा. खुर्चीत बसल्यावर आपोआपच वृत्ती बदलतात. - पंच परमेश्वर, कथा - प्रेमचंद.

हे चारजण एकत्र येऊन त्यांनी पत्रकार परिषद बोलावली. ते कसे आणि कोणत्या विषयाचा विरोध करण्यासाठी एकत्र आले त्याचे टिलिफोन संभाषण, पत्रव्यवहार किंवा आपसापात चर्चा कुठे झाली,कोणी विषय काढला,कोणी माना डोलावल्या हे सर्व तारीखवेळेनुसार सांगतील काय? अचानक चौघांना एकाचवेळी साक्षात्कार होत नसावा. त्यांना असे केव्हा वाटु लागले प्रत्येकाला हेसुद्धा सांगितले पाहिजे म्हणजे जनतेला पटेल. अन्यथा जनता घाबरीघुबरी होऊन अस्वस्थता घालवण्यासाठी रक्तदान, सलाइन,गुलकोजच्या बाटल्या आणेल. ( जनतेच्या मनातल्या शंकाकुशंका आता त्यांनीच दूर कराव्यात.)