Skip to main content

"एवढ्यातंच काय बचत केलीत?"

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 24/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर खरेदीचे बरेच धागे आहेत.एवढ्यातच/हल्लीच काय खरेदी केलंत असे! मग एवढ्यातच काय बचत केलीत असा धागा का असू नये? बचत सुध्दा महत्वाची आहेच की! पैसा खेळता राहिला तरच अर्थव्यवस्था सुरळीत राहते हे खरं! पण खरेदीचा अतिरेक किंवा अनावश्यक खरेदी टाळता येऊ शकते का? किंवा तीच वस्तू कमी दरात कुठे मिळेल हे आधीच समजलं तर?आधी कळालं असतं तर थोडे पैसे वाचले असते ही चुटपूट मनाला लागून राहते. कोणती खरेदी गरजेची आणि कोणती अनावश्यक हे व्यक्तीपरत्वे बदलू शकतं;पण वस्तूचं मोहक रुप किंवा अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी गरज नसताना खरेदीला उद्युक्त करु शकते.किंवा काही वेळा "तिच्याकडे आहे माझ्याकडे का नको?" ही ईर्षाही अशा अनावश्यक खरेदीला कारणीभूत ठरते. मग यातूनच काही वेळा घरात वादही होतात.आधीची वस्तू असताना ही नवीन घेतल्यामुळे जोडीदाराची किंवा घरातल्या इतरांची चिडचिड होऊ शकते. हौसेला मोल नसतं,पैसा खेळता राहिला तरच अर्थव्यवस्था टिकते हे ही खरं पण सध्या नोकर्‍या कमी होताहेत.अशा अनावश्यक खरेदीमुळे गरजेच्या गोष्टीला किंवा अचानक उद्भवणार्‍या खर्चासाठी पैसे कमी पडू शकतात.तो ताण असतोच. किंवा पैसे जरी चिक्कार असले तरीही दिसेल ती प्रत्येक गोष्ट जराही विचार न करता खरेदी करुन जागा अडवण्यात किंवा ती काही दिवस वापरुन नंतर टाकून देऊन कचर्‍यात भर घालावी का? मग बचत करण्यासाठी तुम्ही काय करता? अनावश्यक खरेदीचा मोह कसा टाळता? खरंच गरज आहे का हे कसं ठरवता? हे झालं मानसिक नियंत्रणाबद्दल.पण प्रत्यक्ष कृती करुनही काही बचत करता येईल का? घरात आधीच असलेल्या वस्तूंचा थोड्याशा दुरुस्तीने किंवा थोडी मॉडीफाय करुन नवीन वस्तूऐवजी जुन्याच वस्तूचं रुपांतर नवीन वापरयोग्य वस्तूत करणे(Recycle) हे प्रकार केले असतील तर तेही सांगा(फोटो टाकलेत तर अधिक चांगलं) प्लॅस्टीक आणि पेट्रोल यांच्या वारेमाप उपयोगाबद्दल तर न बोलणं चांगलं! थोडक्यात पैशांची बचत आणि वस्तूचं कचर्‍यात होणारं रुपांतर टाळण्यासाठी काय काय करता येऊ शकतं त्यावर चर्चा व्हावी. त्यासाठी मात्र तुम्हाला तुमचा नेटचा थोडा बॅलन्स आणि प्रतिसादासाठी थोडाफार वेळ खर्च करावाच लागेल.त्याला पर्याय नाही!

वाचने 9358
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

खुप छान आणि महत्वाचा धागा. नवीन फ्लॅट घेतला तेव्हा ठरवून घरातील एकूण एक दिवे एल.ई. डी. घेतले, टि.व्ही. सुध्दा एलल.ई.डी.आहे. उन्हाळा सोडला तर बील २५०/- वर जात नाही. खरेदी बाबत म्हणाल तर प्रत्येक वेळी थोडे थांबुया हा एकच मंत्र वापरतो. बर्याच वेळा असे दिसते एखादी वस्तु बघितल्यावर आवडली तर लगेच घेण्याचा मोह होतो, पण थोडे थांबले तर काही काळाने तीच तेवढी उपयोगी नाही हे लक्षात येते. विशेषतः बाजारात काही नवीन कि घ्यावेसे वाटते. पण रिव्हयु वाचल्याशिवाय गडबड करायची नाही, हे धोरण ठेवतो. मि.पा. वरच काढलेले खरेदीचे धागे याबाबत उपयोगी पडतात. शिवाय बर्याचदा ऑनलाईन घेणे फायदेशीर ठरते. शक्यतो वस्तु एकदाच पण चांगल्या दर्जाची घ्यावी, थोडे पैसे गेले तरी चालतील. त्यामुळे सारखी दुरुस्ती होउन खर्च वाढत नाही. तसाही मेकँनिकल ईंजिनिअर असल्याने किरकोळ दुरुस्ती माझ्या मी नक्कीच करू शकतो. कॉलेज ला घेतलेले टुल किट हे आजही घरी तसेच ठेवले आहे. त्याचा खुप चांगला होतो.

In reply to by दुर्गविहारी

शक्यतो वस्तु एकदाच पण चांगल्या दर्जाची घ्यावी, थोडे पैसे गेले तरी चालतील. त्यामुळे सारखी दुरुस्ती होउन खर्च वाढत नाही. +११११११

In reply to by उपयोजक

उलट वस्तू थोड्या कमी दर्जाची आणि स्वस्त घ्यावी. म्हणजे कंटाळा आला की टाकून देता येते. मोडली, फुटली तरी काही वाटत नाही. नादुरुस्त किंवा कालबाह्य झाली तर सरळ नविन घेता येते.

छान धागा. दहा एक वर्षांपासून ग्रोसरी करताना त्यांच्या कॅरीबॅग्ज घेत नाही. रियुजेबल आहेत त्या वापरते. अजिबातच प्लास्टिक बॅग्ज वापरत नाही असे नाही पण नाईलाज असेल तर. याशिवाय मागील अठवड्यापासून ग्रोसरीत प्रत्येक भाजीसाठी मिळणार्‍या प्लास्टिक पिशव्या घेणे बंद केले आहे. म्हणजे, काकड्या, टोमॅटोज, ढब्बू मिरच्या या एका मोठ्या बॉक्समध्ये आणतिये. छोट्या कापडी पिशव्या कश्या मिळवता येतील हे शोधतिये. वर्षाला आमच्या कुटुंबाच्या जेवढ्या ट्रॅश बॅग्ज होतात त्यात कमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. उदा. महिन्याला आमच्या १३ गॅलनच्या सहा ट्रॅश बॅग्ज होतात. आता त्या चारवर आणणार हे ध्येय आहे. गाठायला वेळ लागेल पण ते होईल. उन्हाळ्यात लोकल फार्मर्सकडून भाज्या घेतिये.हिवाळ्यात इलाज नाही. भाज्या धुण्याचे प्रोड्यूस वॉश विकत न आणता घरी तयार केलेय. आम्हाला मानवणार्‍या फार्मचे दूध आणताना त्यात प्लास्टिक व काच असे दोन प्रकारच्या कंटेनर्समध्ये मिळते. प्लास्टिक कॅन्स टाकून देता येतात पण कचरानिर्मिती कमी व तब्येतीस उपकारक म्हणून बाटल्या आणतिये. त्या परत मात्र कराव्या लागतात पण जायला सुरुवात करून एक वर्ष होत आलेय. सवय लागतिये. आता लक्ष्य हे डीशवॉशर लिक्विड/ पावडर घरी करणे. पुढील अठवड्यात करीन. त्याने पैशांची बचत असेल व पर्यावरणास हानिकारक काही नसेल. गाडीला घरीच वॉश देतिये. कारवॉशमध्ये साबणाचा ऊग्र दर्प येतो. त्याने आजूबाजूच्या जीवसृष्टीस त्रास होत असणार. मलाही होतो म्हणून जात नाही. पैसे वाचतायत ते चांगलेच आहे.

In reply to by रेवती

आता लक्ष्य हे डीशवॉशर लिक्विड/ पावडर घरी करणे. --- हे कसे करणार त्याची माहिती देता का ? इथेच टाका , सगळ्यांना उपयोगी पडेल.

In reply to by अभिदेश

तूनळीवरील रेसिपी पाहून करणार आहे. ट्रायल्स चालू राहतील. आमच्या कुटुंबाला कोणती मानवतिये त्यानुसार रेसिपी बदलून पाहीन. जी आवडेल ती वेगळा धागा काढून देईन.

मग एवढ्यातच काय बचत केलीत?
DSLR किंवा तत्सम महागडा कॅमेरा घेणे टाळले. मोबाईलने बऱ्यापैकी चांगले फोटो निघतात. हे महाग कॅमेरे जड असतात, ट्रिप ला गेलं की नसती कटकट घेऊन हिंडावे लागते. परत बॅटरी प्रॉब्लेम आहेच. आणि एवढं सगळं करूनही आपण काही खूप भारी फोटोग्राफी करणार नाही आहोत हा विश्वास. म्हणून हा कॅमेरा घेतला नाही आणि १५,००० ते ५०,००० रु वाचवले.

In reply to by अत्रे

हाच विचार करून आम्ही सुद्धा डिजिटल कॅमेरा घेतला जो DSLR च्या निम्म्या किंमतीत मिळाला. शिवाय DSLR ला प्रत्येक टाईप साठी वेगळी लेन्सही घ्यावी लागते. तो खर्चही वाचलाच.

त्या निमित्ताने काही गोष्टी नसल्या तरी किती फरक पडेल/अथवा नाही पडणार हे कळेल . मी सध्या किंडल घ्यायचे टाळले आहे १५-२० हजाराची बचत . घेईनही नंतर . पण अत्यावश्यक वाटत नाहीये सध्या .

कोणी जुन्या वस्तुला जुगाड करुन नवीन वापरयोग्य किंवा शोभेची वस्तु बनविली असेल तर वाचायला आवडेल.(शक्य झाल्यास फोटो टाका.)

In reply to by उपयोजक

हिरो पॅशनप्रोचा एअर फिल्टर गेलेला. तो बदलला. fजुना फिल्टर साफ करुन त्याचा बेस लावला. हपिसातल्या प्रिंटरची राहिलेली शाई(रंगीत असते, काळी नै) फासली. मस्त पेन स्टॅन्ड तयार झाला. फोटो देत नाही कारण ह्याची ऑर्डर मिळेल आणि मला ती करायची नाहीये.

In reply to by तुषार काळभोर

हिंदकेसरी आपला मोबाईल आणि व्हाटसाप बंद आहे. त्वरीत चालू करावे ही लम्र विनंती.

पण माझा भर बचत करण्यापेक्षा गुंतवणूक करण्यावर अधिक आहे. तरीदेखील ,,, एक दोन गोष्टी सांगते. मुलीला हॉस्टेल वर खाऊ पाठवायचा तो घरी करून पाठवला, बेसन लाडू, चिवडा. मला असे संकिर्ण पदार्थ करता येत नाहीत आणि आतापर्यंत गरज देखील पडली नाही कधी. सगळंच विकत मिळतं. पण आता करते, स्वस्त आणि मस्त हे केल्यावरच कळालं. शिवाय आजकाल स्वैपाक जेवढ्यास तेवढाच करायचा प्रयत्न करते. उरा-उरी नको म्हणून. तेल कमी वापरते. स्वतः साठीची खरेदी टाळते. मॉल मध्ये जरी गेलो तरी आवश्यक तेवढ्याच वस्तू घेऊन बाहेर यायचा प्रयत्न असतो. शक्यतो यादी करून खरेदीला जाते म्हणजे घरात वस्तू double होत नाहीत.

Bugatti आज बुगाटी घेण्याचे टाळले 4.8 million $ ची बचत केली

In reply to by कपिलमुनी

तुम्हाला एक गाडी देत आहे . . . . घेऊन टाका . . . . !

In reply to by कपिलमुनी

ती बुगाटी नाही मुनिवर्य . मॅकलैरेन आहे बहुतेक

२०१४ मध्ये २७ लाख रुपये खर्चून ( त्यातील २१ लाख कर्ज, २७००० हप्ता- कर्ज काढले म्हणजे पैसे बाजूला पडतात असे अफाट लोजिक आहे विटूकाकूचे) तळेगांवात वन बीएच के घेतला .. आता तेवढ्या पैश्यात टू बी एच के येतोय ! नुस्कान झाले .. कर्जाचे हप्ते अजून फेडतोय ! येईल त्या किंमतीला विकून टाकू की किमती वाढतील म्ह्णून वाट पाहू? तीच गंमत बंगलोर च्या घराची ! २००८ मध्ये त्याची किंमत १ कोटी होती ... आणि आज ही २०१७ मध्ये १ कोटीच आहे ! अजून नुस्कान ! ( आपण स्वतः बांधलेले घर कोणी विकतं का ? आणि भाडं येतेय ना ?............. या लॉजिकला माझ्याकडे उत्तर नाही ! १ कोटी किमतीच्या घराला गेली ३ वर्षे महिना २०,००० भाडे येतेय , कर भरावा लागतो तो वेगळाच ! ) कसलं सेव्हिन्ग करु ? हल्ली पगार पूर्ण संपवून टाकतो , सेव्हिन्ग वर शून्य विश्वास आहे ! आपण मिळवलेले पैसे आपणच खर्च करावेत. आपली बचत पोरान्च्या कामी येत नाही. त्यांच्या आकांक्षा ऐरावताच्या .. आपली पोट मारुन वाचवलेली तट्टाणी त्यांच्या उपयोगाची नसते ! आपले भविष्य सुपर अन्युएशन आणि प्रोव्हिडन्ड फन्डावर सोपवून पगार मस्त खर्च करावा .. देश - विदेश हिन्डावेत ! रोज मटार उसळ आणि शिकरण खावे ... चार्वाकाचा विजय असो ! आलीच गरीबी तर बघून घेऊ पुढे !

In reply to by विटेकर

घराच्या गुंतवणूकीचं व्याज (रेंटल यिल्ड) काढलं तर २/२.५% एवढंच येतं. बाकी परतावा घराची किंमत वाढेल तेवढा(च). ही गुंतवणुक देखील लगेच लिक्विडेट करता येत नाही. विक्रीपश्च्तात ट्याक्स, भाड्यावर ट्याक्स वगैरे प्रकार आहेतच. === पूर्ण पॉसिबल कर्ज काढुन घर घेणे, ज्याची किंमत पाच वर्षात दुप्पट होईल आणि नॉर्मल भाडं मिळेल ही गुंतवणुक एकीकडे आणि घराच्या डाउन पेमेंटइतकी एफ्डी + कर्जाच्या हफ्त्याऐवजी तितक्याची आर्डी यात दुसरा पर्याय जास्तं परतावा देतो असं क्याल्कुलेशन आलेलं कुठ्ल्याश्या पेप्रात. आता कर्ज स्वस्त आहे आणि व्याज कमी आहे. पण अजुनही दुसरा पर्याय चांगला आहे असं मत आहे.

शक्य तिथे बचत चालूच असते.घरात शक्य तेवढे एलीडी वापरणे वगैरे. खाण्यापिण्याच्या वस्तून बचत नाही. तयार वस्तू विकत आणू नये एवढेच. सोन्याच्या दागिन्यांची अजिबात हौस नाही त्यामुळे कधीच घेत नाही. घर आणि गाडी आवश्यक तेवढेच खर्च करून घेतली आहे. अंथरूण पाहून पाय पसरावेत आणि आपण कोणावर कधी अवलंबून असू नये हा सगळ्यात पहिला विचार. जर गाडीच्या ब्रेक्सची दुरुस्ती आज करायला हवी असेल तर मी शिकून घेऊन कधीतरी करीन याला बचत म्हणता येणार नाही. ती आज आता झालीच पाहिजे. अशा खर्चाना पर्याय नसतो. एखादी वस्तू घेण्याचे पुढे ढकलणे म्हणजे बचत नव्हे तर अनावश्यक खर्च टाळणे म्हणजे बचत. त्यासोबत बँक डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, सोने, जमीन यात गुंतवणूक करताना विचारपूर्वक बचत कता येते.

In reply to by पैसा

गाडीच्या ब्रेक्सची दुरुस्ती आज करायला हवी असेल तर मी शिकून घेऊन कधीतरी करीन याला बचत म्हणता येणार नाही. ती आज आता झालीच पाहिजे. वेळेवर घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो.खरंच!

बाथरुमच्या टाईल्स मधून लिकेज होऊन टाईल्सच्या खालून कॅपिलरीज तयार झाल्या होत्या आणि पाणी झिरपून भिंतीपर्यंत पोचले होते. २ व्हेंडर लोकांना विचारले. त्यांनी अनुक्रमे १२००० आणि १६००० असा खर्च सांगितला. शेवटी बाजारातून १०० रुपयाचे टाईल ग्राऊट आणून स्वतःच लावून टाकले आणि लिकेज थांबले. १२-१५००० वाचले.

मी काही गोष्टी करते त्ये खालील प्रमाणे दुध गवळी देतो ती प्लॅस्टिक पिशवी वाचली. घरातले ट्युब आणी बल्ब led आहेत. गॅलरी रोज फक्त पुसुन घेते त्यामुळे बादलीभर पाणी वाचते. स्वयंपाक करताना भाजी तासभर आधी फ्रीजमधुन काढुन ठेवते. आणी लागणारे साहित्य हाताशी ठेवते. यामुळे गॅसची बचत होते. ज्या खोलीत कोणी नाही तिथले दिवे बंद करून ठेवते. भाजी किराणा आणताना घरातून कापडी पिशव्या घेऊन जाते तसेच गाडीत एक पिशवी कायम ठेवली आहे

भारताबाहेर असल्यामुळे , पंचकुलाला ना जाऊन माझा जीव वाचवला. किंमत किती ते माहीत नाही.

५.५. लाखात नवीन पेट्रोल गाड़ी घेण्याचे ठरले होते, परंतु चांगली वापरलेली डिझेल गाड़ी २.६५ लाखात मिळाली. अश्या प्रकारे अंदाजे ३ लाख वाचवले.

किंमती काहींच्या बाही वाढल्या आहेत. मधे सोलापूर फेरी झाल्याने तीन चार महिन्यात लागेल इतकी तूर मुगाची डाळ आणून ठेवली अंदाजे पाचेकशे रूपये वाचले.

In reply to by अमर विश्वास

आम्हालापण सांगा की एक दोन चांगले फंड्स , म्हणजे ३-५ वर्षात चांगला परतावा मिळेल असे. मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय करायची आहे.