चाळिसाव्या कोसावर
लेखनप्रकार
इतिहासात अमुकतमुकुद्दीन खानाची कारकीर्द लिहिली जाते, तशी माझ्या वाचनाची लिहिली तर ती १९६२ ते आज अशी लिहावी लागेल.
आमचं घर वाचकांचं घर होतं. आमच्या घरात सगळे – म्हणजे त्यात सख्खे, चुलत, आते, मामे, मावस आणि शेजारी असे सगळेच – वाचक होते. त्यामुळे मी शाळेत जाण्यापूर्वीच वाचायला शिकलो. त्याचं घरात फार काही वेगळंसं कौतुक नव्हतं. बोलायला लागण्याआधी वाचायला लागलो असतो, तर कदाचित कौतुक झालं असतं.
घर नागपूरला. तिथे ‘तरुण भारत’ यायचा. सकाळी एम्प्रेस मिलचा भोंगा वाजण्याआधी उठून पेपरवर ताबा मिळवायला चढाओढ लागावी, इतकी तुडुंब माणसं असत.
मग चौथीत असताना इंग्रजी वाचायला लागलो आणि ‘हितवाद’चा वाचक झालो. आमच्या घरमालकांकडे ‘हितवाद’ यायचा. ते शी करायला जाताना पेपर घेऊन जायचे आणि वाचूनच बाहेर पडायचे, म्हणून मी आधीच गुपचूप पेपर चाळून घ्यायचो.
चौथीत असताना पहिली कादंबरी वाचली. ‘सत्तावनचा सेनानी’. वसंत वरखेडकरांची.
‘अस्तनीतला निखारा’ हा शब्द त्यात पहिल्यांदा वाचला. त्या वेळी अर्थ विचारायची अक्कल नव्हती. मी बरेच दिवस अस्तनीतला निखारा म्हणजे काखेतला निखारा असंच समजत राहिलो. कुठल्या ना कुठल्या शब्दानं भुरळ घालायचे ते दिवस होते.
वडलांच्या खणात एक महानुभावांचं पुस्तक मिळालं. त्यात ‘सर्वज्ञे भणीतले’ असं लिहिलं होतं. मग बरेच दिवस ‘मी भणतो… तू भण…’ अशी गंमत चालू होती.
मग काही दिवसांनी ‘चांदोबा’त ‘भल्लूक’ नावाचं एक पात्र भेटलं. मग काही दिवस ‘भल्लूक-भल्लूक’!
अगदी तेव्हापासून पक्कं केलं होतं – घर बांधलं, तर त्याला ‘काशाचा किल्ला’ किंवा ‘दुर्गेश नंदिनी’ असं नाव द्यायचं.
इथेच सगळे लोचे सुरू झाले. मेंदूच्या अस्तराच्या आत शब्द भूसुरुंगासारखे लपून राहायला लागले. जरा कुठे एखाद्या शब्दावर पाय पडला, की स्फोट सुरू! चित्रं बघितली, तरी ती शब्दांमध्ये रूपांतरित होऊनच मेंदूत शिरायची. एक नवीन बोली भाषा डोक्यात तयार व्हायला सुरुवात झाली होती.

चित्रश्रेय: अमुक
इंदे म्हणजे काय, दर म्हणजे घर, सुदर म्हणजे देऊळ, बाखुळ म्हणजे भांडण… असलं काहीच्या काही.
एक दिवस मी घरी सांगितलं, की आपल्या घरासमोरून रोज छोटू आणि धनंजय जातात. सगळी पुस्तकं जप्त झाली. वाचनावर बंदी आली. मी रागाच्या भरात आमच्या आप्पांना म्हणालो, “तुम्ही गेस्टाप्प्पो आहात!”
झालं! आता सगळ्यांची जास्तच तंतरली. रोज दप्तराची तपासणी सुरू! वह्यांची फाडलेली पानं दिसली की चौकशी आयोगाच्या बैठका सुरू!
सरतेशेवटी वाचन बंद आणि संध्याकाळी शाखा कंपलसरी करण्यात आली.
घरी गेस्टाप्पो आणि बाहेर घेट्टो!
हा सगळा चुत्यापा हाताबाहेर बळावत जाणार होता, इतक्यात काकोडकरांचं एक पुस्तक हातात आलं आणि मग रोम्यांस एक्स्प्रेसची सफर सुरू झाली. अनेक स्टेशनांवर थांबत थांबत रोम्यांस एक्सप्रेस बरीच वर्षं धावत होती.
अजूनही धावतेय, असं म्हटलं असतं. पण ते थोडं खोटं असेल. कारण आता मेंदूत लपलेले इतर सुरुंग न सांगताच फुटत राहतात. पहिल्या महायुद्धात न फुटलेले जिवंत सुरुंग अधूनमधून उत्खननात सापडावेत आणि फुटावेत, तसं काहीतरी होत राहतं.
*
सुरुवात गिरीपेठेतल्या पापारावांच्या घराच्या पायर्यांवर बसून ऐकलेल्या एका कथेतून होते.
सिनेमाच्या जाहिराती वाटणारा माणूस आणि एक लहान मुलगा यांची ही गोष्ट आहे. जाहिराती घेण्याऱ्या मुलांच्या गर्दीत तो मुलगा असतो. वाटणारा माणूस फक्त अशांच्याच हातात पत्रकं देत असतो, जी त्याच्या मते वाचण्याच्या वयात असतील. हा लहान मुलगा त्या माणसाला अजिजीने सांगतो, “अहो, मला वाचता येतंय.”
एकदाचं त्याला ते पत्रक मिळतं आणि हातात पत्रक मिळाल्याचा आनंद त्याच्या चेहेर्यावरून ओसंडून वाहत राहतो. मध्यंतरी काही दिवस जातात. माणूस पुन्हा कसलीशी पत्रकं वाटायला येतो. त्याची नजर नकळत मुलाला शोधत राहते. पण तो लहान मुलगा दिसत नाही. मग कुणीसं सांगतं, की तो मुलगा कसल्याशा आजारानं गेला.
लहानपणी ‘ऐकलेली’ ही गोष्ट बिब्ब्याच्या फुलीसारखी मनावर चरचरीत ‘बुकमार्क’ करून गेली.
असले बुकमार्क्स विरतात, पण जाता जात नाहीत. उसवलेच, तर व्रण ठेवून जातात.
*
असे अनेक बुकमार्क्स सहन करूनही वाचनाच्या वेडातून सुटका होत नाही. पण अवसेपोर्णिमेला अपस्मारासारखे दिवस येतात, वेडाची झिंग वाढत जाते.
‘मैं अच्छा न हुआ, बुरा न हुआ’ असे दिवस आहेत.
या वेडाचा शेवट मला माहिती आहेच आणि तो प्रत्येक वाचकालापण कळायला हवा.
*
एका माणसाला देव पावला आणि देवानं त्याला सांगितलं, “दर दहा कोसांवर खणून बघ. जे मिळेल त्यानं समाधान झालं, तर ते तुझंच. पण नाही झालं, तर पुढच्या दहा कोसांवर काहीतरी मिळेल. शेवटचा मुक्काम चाळिसाव्या कोसावर आहे.”
पुढची गोष्ट सोपी आहे.
आधी चांदी, मग सोनं, नंतर हिरे मिळाले. पण चाळिसाव्या कोसावर आणखी काही असेल, म्हणून तो माणूस चालतच राहिला. चाळिसाव्या कोसावर एक विचित्र दृश्य दिसलं. तिथे उभ्या असलेल्या माणसाच्या डोक्यावर एक काटेरी चक्र फिरत होतं. रक्ताच्या ओघळांनी शरीर माखलं होतं. हे अनपेक्षित होतं.
त्या रक्तबंबाळ माणसाला पहिल्या माणसानं विचारलं, “हे कसं झालं रे बाबा?”
तत्क्षणी ते चक्र उडून विचारणाऱ्या माणसाच्या डोक्यावर बसलं आणि आधीचा माणूस हसत निघून गेला.
दहा-दहा कोसांवर खणत, शोधत वणवणणारा वाचक होता आणि चाळिसाव्या कोसावर उभा असलेला लेखक होता हे सांगायला नकोच.
मी बरीच वर्षं चाळिसाव्या कोसावर उभा आहे इतकंच मला सांगायचं आहे!
– रामदास
पूर्वप्रसिद्धी: रेषेवरची अक्षरे - बालसाहित्य विशेषांक

वाचने
14084
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
काय लिहीलंय काका!! आणि मी
सुंदर
वा, कधी जमणार असे लिहायला
आमचा तिसावा कोस.
In reply to आमचा तिसावा कोस. by एस
(कुणीतरी निदान फॅन फिक्शन
In reply to (कुणीतरी निदान फॅन फिक्शन by आदूबाळ
आबा, तुम्ही
निव्वळ सुंदर..
सुंदर ! प्रतिमा तर अशक्य !
अगदी अगदी।
अतीव सुंदर
बरेच दिवसांनी रामदास काका
In reply to बरेच दिवसांनी रामदास काका by मृत्युन्जय
+१०००
सुंदर
अनुभवी अन सुंदर लेखन.
निव्वळ अप्रतिम !!!_/\_
वाचनवेडे व्हावे
_/\_
फार सुंदर
सुंदर लिखाण
छानच , प्रकाश संंतांंच लिखाण
In reply to छानच , प्रकाश संंतांंच लिखाण by palambar
+ १
व्वाह.. मजा आया.
जबरदस्त!
वा!
अफाट!
नाही पटले
In reply to नाही पटले by मराठी कथालेखक
सहमत!
In reply to सहमत! by शब्दबम्बाळ
हाच लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने असता
In reply to हाच लेख कोण्या दुसऱ्याच्या नावाने असता by धर्मराजमुटके
मला वाटतेय एखादे लेखन उघडून
In reply to नाही पटले by मराठी कथालेखक
मराठी कथालेखक
40 वा कोस अनुभवलेला
सुरेख लेखन!अहो मला वाचता येतं
दैवी लेखक!!
मस्त लेख !
मस्तच