Skip to main content

बार, कॉलेज गॅदरिंग आणि काळी पिवळीमध्ये वाजणाऱ्या गाण्यांचा बादशहा

लेखक पिंपातला उंदीर यांनी बुधवार, 27/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
कलाकारांची एक बिरादरी असते. सर्वसामान्य जनतेमध्ये ते किंवा पडद्यामागे काम करणारे असतील, तर त्यांचं काम तुफान म्हणावं इतकं लोकप्रिय असतं. पैसा आणि प्रसिद्धी पायाशी लोळण घेत असते. पण समाजातला 'उच्चभ्रू ' किंवा आपली अभिरूची हीच सर्वोत्तम आहे, असा गंड बाळगणारा अभिजन वर्ग या कलाकारांचं कुणी नाव घेतलं तरी नाक मुरडतो. समीर अंजान उर्फ शीतला पांडे हा असाच एक पडद्यामागचा कलाकार आहे. गीतकार या जमातीला अगोदरच आपल्याकडे प्रसिद्धी मिळत नाही. त्यातच 'मासेस'साठी काम करणाऱ्या कलाकारांवर तर अनेकदा वेगवेगळे ठप्पे मारून त्यांना अदखलपात्र ठरवण्याचं उद्योग नेहमीच चालू असतात. मागे एक किस्सा वाचनात आला होता. आशा भोसले टॉप फॉर्ममध्ये होत्या, तेव्हा कुणीतरी महान संगीत दिग्दर्शक नौशाद यांना आशा भोसले यांच्याबद्दल त्यांचं मत काय आहे, असं विचारलं. "उनके आवाज से अभी वो 'बाजारूपन' नहीं गया." अशी प्रतिक्रिया नौशाद यांची होती. तर या 'बाजारूपन'च्या लेबलपासून आशा भोसले यांच्यासारखी महान गायिका सुटली नाही, तर समीरसारख्या गीतकाराची काय अवस्था असेल? डेव्हिड धवन आणि गोविंदाच्या सिनेमांसाठी गाणी लिहिणारा, मिथुनच्या उटी वास्तव्यात तयार झालेल्या सिनेमांची गाणी लिहिणारा, 'दिल, धडकन, मोहोब्बत' अशा पाच सहा शब्दांमध्येच खेळ करून लिहिणारा गीतकार असे अनेक शिक्के समीरवर मारले गेले. पण समीर शांतपणे काम करत राहिला. तो नव्वदच्या दशकात जितकं काम करत होता, तितकंच काम तो आजच्या एकदम वेगळ्या सांगीतिक युगातही करत आहे. सर्वाधिक गाणी लिहिण्याचा (पाच हजारपेक्षा जास्त ) दुर्मिळ विश्व विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. अर्थातच एवढ्या प्रमाणावर काम केल्यावर दर्जात्मक घसरण होणं अपेक्षित असतंच. समीरच्या कामातही असे पॅचेस दिसतातच. पण त्यामुळे त्याचं बाकीचं कर्तृत्व दुर्लक्षित होऊ नये, असं प्रामाणिकपणे वाटतं. नव्वदच्या दशकातली ती विशिष्ट शैलीतली गाणी आज पण तुफान लोकप्रिय आहेत. कुमार सानू, उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, सोनू निगम, नदीम श्रवण, आनंद मिलिंद, जतिन ललित आणि अनु मलिक हे त्या सांगीतिक युगाचे चेहरे. पण या सगळ्या मोठ्या नावांना जोडणारा सामायिक दुवा म्हणजे समीर. या सगळ्यांचं समीरशिवाय पान हलत नव्हतं. पण गायकांभोवती किंवा संगीत दिग्दर्शकांभोवती जे वलय असतं, तसं गीतकारांभोवती फार कमी वेळा असतं. त्या काळातली जी सगळी हिट गाणी आहेत, ती बहुतेक गाणी समीरने लिहिली आहेत. समीरचा जन्म बनारसचा. प्रचंड श्रीमंत सांस्कृतिक वारसा असणारं बनारस. समीरचे वडील अंजान हे स्वतः एकेकाळचे प्रसिद्ध गीतकार. वडिलांचेच गुण मुलामध्ये उतरले. समीरला लहान वयापासूनच शब्दांशी खेळण्याचा चस्का लागला. समीरची फिल्मी कारकीर्द सुरू झाली ती १९८३ साली 'बेखबर' नावाच्या सिनेमापासून. वडील चित्रपटसृष्टीत असूनही समीरचा संघर्ष व त्यातून येणारी अवहेलना चुकली नाही. अनेक लोकांना संशय होता की, समीर जी गाणी लिहितो ती त्याला त्याचेच वडील लिहून देतात. या संशयातून अनेक दिग्दर्शक-निर्माते त्याला 'ऑन द स्पॉट' गाणे लिहून द्यायला सांगायचे. समीरने हे अपमान मुकाटपणे गिळले. समीरचा तारा बुलंद होण्यासाठी १९९० साली 'आशिकी' यावा लागला. 'आशिकी’मधली गाणी छप्परफाड हिट झाली. 'नजर के सामने, जिगर के पास', 'दिल का आलम', 'अब तेरे बिन जी लेंगे हम' ही गाणी घराघरात वाजायला लागली. असं म्हणतात की, ‘आशिकी’चा अल्बम रिलीज झाल्यावर पुढच्या दोन दिवसांत समीरने बारा पिक्चर साईन केले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'दिल'ची गाणी तुफान गाजली. मग समीरला मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही. पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत समीरने अपवाद वगळता सिनेजगतामधल्या सगळ्या दिग्गज निर्माता, दिग्दर्शक, नायक-नायिका, संगीत दिग्दर्शक, गायक-गायिकांसोबत काम केलं. कित्येक सुपरहिट चित्रपटांची आणि आपण डेली बेसिसवर गात असलेल्या गाण्यांचे बोल समीरचे आहेत, हे आपल्याला माहीत नसतं. 'दिवाना', 'बेटा', 'दिलवाले', 'राजा हिंदुस्तानी', 'सिर्फ तुम', 'कुछ कुछ होता है', 'धडकन', 'तेरे नाम', 'सावरीया', किती नाव घ्यावीत? या चित्रपटांची खासियत म्हणजे या चित्रपटांमधलं प्रत्येक गाणं हिट होतं. संगीत दिग्दर्शकांच्या तब्बल चार पिढ्यांसोबत समीरने काम केलं आहे. राजेश रोशन आणि लक्ष्मीकांत प्यारेलालसारख्या 'ओल्ड स्कुल' संगीत दिग्दर्शकांसोबत समीरने काम केलं आहे. मग नव्वदीच्या दशकात आनंद मिलिंद, नदीम श्रवण, जतीन ललित आणि अनु मलिक यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. २००० नंतर उदयाला आलेल्या शंकर-इशान -लॉय ,हिमेश रेशमिया आणि प्रीतमसारख्या लोकांच्या गाण्यांनाही शब्द दिले आहेत. आणि आता अरमान मलिकसारख्या नवीन संगीत दिग्दर्शकासोबत तो काम करत आहे. संगीतकारांच्या या प्रत्येक पिढीची काम करण्याची पद्धत, त्यांची संगीत देण्याची शैली, वाद्य संयोजन यांच्यात प्रचंड फरक आहे. समीरने या सगळ्यांसोबत स्वतःला जुळवून घेतलं. वर उल्लेख केलेले अनेक संगीत दिग्दर्शक आऊटडेटेड झाले, काही होण्याच्या मार्गावर आहेत, पण समीर मात्र अजून टिकून आहे! त्याचं 'शिकारी' चित्रपटातलं 'बहोत खूबसूरत गजल लिख रहा हू' हे आदेश श्रीवास्तवने संगीतबद्ध केलेलं गाणं माझं सर्वाधिक आवडत गाणं आहे. 'कुछ कुछ होता है'चं टायटल साँग, 'तेरे नाम'मधलं 'तुमसे मिलना बाते करना', 'आशिकी'मधलं 'अब तेरे बिन'ही अजून काही प्रचंड आवडती गाणी. समीरच आगमन होण्यापूर्वी आपल्या गाण्यातल्या हिंदीवर उर्दूचा बराच प्रभाव होता. उर्दू ही एक सुंदर भाषा आहेच यात वाद नाही. पण खूपदा श्रोत्यांना गाण्यांमधल्या शब्दांचा अर्थच लागायचा नाही. समीरच सगळ्यात मोठं यश म्हणजे त्यानं गाणी समजून घेणं माझ्यासारख्या सर्वसामान्य श्रोत्यांसाठी सोपं केलं. साधे, सरळ, आपण रोजच्या बोलचालमध्ये वापरतो, ते शब्द वापरून त्याने गाणी लिहिली. त्यामुळे त्याचा 'मासेस'शी जो कनेक्ट आहे, तो फार कमी गीतकारांचा आहे. हाच समीर जेव्हा 'मैं तो रस्ते से जा रहा था'सारखं गाणं लिहितो, तेव्हा त्याच्या टीकाकारांच्या भुवया उंचावतात. किंवा 'ओले ओले'सारखं गाणं असेल. समीरच्या वाईट गाण्यांची यादी काढायची तर ती मोठी आहे. पण या सगळ्यात तुम्हाला गीतकाराचीही एक बाजू समजून घ्यावी लागते. डेव्हिड धवनच्या सिनेमातली गाणी लिहिताना गीतकारानं अप्रतिम हळुवार शब्दातली गाणी लिहिणं अपेक्षित आहे का? पिटातल्या प्रेक्षकाला अपील होणारी, हलकी फुलकी विनोदी सिच्युएशनमधली गाणी बनवण्यात डेव्हिड धवनचा हातखंडा आहे. तिथं अशी हळुवार गाणी लिहून कसं चालेल? शेवटी सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तिथं त्याचाच शब्द चालतो. कुठलाही गीतकार सतत मनाप्रमाणे सुंदर गाणी लिहू शकत नाही. कारकिर्दीचा मोठा भाग मनाविरुद्ध व्यावसायिक तडजोडी करण्यातच जातो. त्यातूनच मजरुह सुलतानपुरीसारख्या प्रतिभावंताला 'सी ए टी कॅट माने बिल्ली'सारखं गाणं लिहावं लागतं आणि राजेंद्र कृष्णनसारख्या गीतकाराला 'ईना मीना डिका'सारखं गाणं करावं लागतं. समीर वर अनेकदा अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या जावेद अख्तर साहेबांनाही हे भोग चुकलेले नाहीत. समीर ज्यांना आपला आदर्श मानतो, त्या आनंद बक्षींनाही अनेकदा तडजोडी कराव्या लागल्याचं. हे अनेक सर्जनशील व्यक्तींचं प्राक्तन आहे. यातून सुटका नाही. समीरला कधीही जावेद अख्तर, गुलजार, मजरुह सुलतानपुरी, शैलेंद्र यांचा दर्जा मिळाला नाही. उलट 'मासेस'साठी गाणी लिहिणारा आणि मर्यादित कुवत असणारा गीतकार म्हणून हेटाळणीच त्याच्या पदरी आली. हेच प्राक्तन त्याने ज्यांच्या सोबत जास्त काम केलं आहे, अशा डेव्हिड धवन, गोविंदा, आनंद मिलिंद अशा लोकांच्याही नशिबी आलं आहे. त्याची काही कारणं आहेत. आपल्याकडे अजूनही साठीचं दशक, संगीताचा तथाकथित सुवर्णकाळ, राज कपूर-देव आनंद-दिलीपकुमार, अमिताभ बच्चन यांचा हँगओव्हर लोकांच्या आणि विशेषतः माध्यमात लिखाण करणाऱ्या लोकांच्या मनातून उतरलेला नाही. नव्वदच्या दशकातला सिनेमा आणि संगीत हे काही अपवाद वगळता पिटातल्या आणि श्रमिक वर्गाला समोर ठेवून तयार केला जायचा. सध्याचा जो अभिजन आणि ओपिनियन मेकर म्हणवून घेणारा वर्ग आहे, त्याने याला कायमच नाकं मुरडली. अर्थात आपापली आवडनिवड असते हे मान्य आहेच. पण यांच्या नाक मुरडण्यामुळे त्या काळातला सिनेमा-संगीत जे आजही ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये पाहिलं आणि ऐकलं जातं, त्याची नोंद कधीच माध्यमांमधल्या मुख्य प्रवाहांनी घेतली नाही. समीरसारख्या कलावंताला या अनावस्थेचा फटका बसला. त्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव हे की, जो वर्ग त्याची गाणी ऐकत होता आणि आज ऐकतो त्यालाही ही गाणी समीर नावाच्या गीतकारानं लिहिली आहेत हे माहीत नाही. त्याच्या गाण्यांना एक तर गायकाच्या नावाने (उदाहरणार्थ - कुमार सानूची गाणी) किंवा अभिनेत्याच्या चेहऱ्याने (उदाहरणार्थ - अजय देवगणची गाणी) ओळखलं जातं. कुणीही ‘समीरची गाणी’ असा या गाण्यांचा उल्लेख करत नाही. कुठल्याही कलावंताला याच्यापेक्षा मोठी वेदना असूच शकत नाही. समीरच्या नशिबी हीच वेदना वारंवार आली. आजही छोट्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भारतातल्या काळ्या पिवळ्या, अनधिकृत ट्रॅव्हल्स गाड्या, प्लॅस्टिकच्या खुर्च्या असणाऱ्या आणि चकण्यात फुटाणे कॉम्प्लिमेंटरी देणाऱ्या बारमध्ये समीरची गाणी वाजतात. समीरच्या गाण्यांना कुठल्याही उच्चभ्रू मुशायऱ्यांमध्ये किंवा गजल नाइट्समध्ये स्थान नाही. पण कॉलेज गॅदरिंगमध्ये 'तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है' किंवा 'तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम'सारखी गाणी पोर वर्षानुवर्षे म्हणत आली आहेत . प्रत्येक शापाला उशाप असतो असं म्हणतात. प्रेक्षक, अभिजन वर्ग यांच्याकडून मिळालेल्या समीरला मिळालेल्या दुर्लक्षाच्या शापावर, सर्वसामान्य लोकांनी त्याच्या गाण्यांवर केलेलं बेहद प्रेम हा उ:शापाचा उतारा असावा. लेख 'अक्षरनामा' मध्ये पूर्वप्रकाशित http://www.aksharnama.com/client/article_detail/1080
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6732
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

लेख नेहमीप्रमाणे चांगला आहे. थोडा हिंदीचा प्रभाव तुमच्या मराठी लिखाणावर जाणवतो. समीर यांचं 'तुझे अपना बनाने की कसम खाई है' हे 'सडक' मधलं गाणं आवडतं.

नेहमी प्रमाणेच लेख उत्तमच. हा लेख वाचून माझ्या मनात नकळतच एक अस्थानी तुलना चालू झाली. भारतीय भूमीमधे असे, समाजातील उच्चभ्रू / अभिजात वर्गाने अन्नूलेखामुळे घुसमटवलेला, परंतु तत्कालीन मासेसने उचलून धरल्यामुळे तगून राहिलेली, आणखी काही उदाहरणे म्हणजे माऊली ज्ञानेश्वर व तुकाराम... तत्कालीन समाजातला 'उच्चभ्रू ' किंवा 'आपली अभिरूची हीच सर्वोत्तम आहे, असा गंड बाळगणारा अभिजन वर्ग' आणि ओपिनियन मेकर म्हणवून घेणारा वर्ग आहे, त्याने यांना कायमच नाकं मुरडली. संस्कृत वेद / पुराणांतील तथाकथित सुवर्णकाळ यांचा हँगओव्हर २१ व्या शतकातील काही मनातून आजही उतरलेला नाही. तर माऊली व तुकारामांच्या काळी हँगओव्हर किती भीषण असेल याची कल्पनाच करू शकतो. या संतांनी, सर्वसामान्य बहुजन (मास पब्लिक) श्रोत्यांसाठी अध्यात्म सोपं केलं. साधे, सरळ, आपण रोजच्या बोलचालमध्ये वापरतो, ते शब्द वापरून त्यानी अध्यात्माचा 'मासेस'शी जो कनेक्ट प्रस्थापित केला. अभिजन वर्ग यांच्याकडून, ज्ञानेश्वर तुकारामांना मिळालेल्या दुर्लक्षाच्या शापावर, सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या साहित्यावर केलेलं बेहद प्रेम हा उ:शापाचा उतारा असावा.

In reply to by पगला गजोधर

हा लेख वाचून माझ्या मनात नकळतच एक अस्थानी तुलना चालू झाली.>> ==> बरेच अभिजन लोक संगीताची सुद्धा सहज उतरंड करताना दिसतात. शास्त्रीय संगीत उच्च गजल भावगीते मध्यम लावणी, लोक संगीत, गोंधळ, कौवाली वगैरे कनिष्ठ. ----- मी सत्यशील देशपांडेंच्या जेवढा निःसीम चाहता आहे तेवढाच आनंद शिंदेंचा देखील आहे. मान्य शास्त्रीय संगीत लोकांना खूप अवघड आणि किचकट वाटते, पण त्याचे जर योग्य वयात शिक्षण आणि तालीम केली तर खूप सिम्पल आहे शास्त्रीय संगीत गाणे. विशेष म्हणजे शास्त्रीय गायनाला चांगला आवाज नसला तरी चालतो, अलंकारांची नुसता घोकंपट्टी केली तरी श्रोत्यांच्या कानाला सुंदर वाटते. * आनंद शिंदेंचा आंबेडकर जयंतीला एक कार्यक्रम पाहिला होता, काय जबरदस्त भारदस्त आवाज आणि सादरीकरण होते माय गॉड..! पंजाब साईडला त्या नुराणी सिस्टर्स, मास्टर सलीम यांचे आवाज पण लाजवाब. पण त्यांना किती किंमत आहे हे माहित नाही. (कोणाला यांच्या बद्दल अधिक माहिती (वैयक्तिक नाही) असेल तर कृपया सांगा) ----- आनंद बक्षी, समीर आणि गुरु ठाकूर आवडते गीतकार.

In reply to by विशुमित

==> बरेच अभिजन लोक संगीताची सुद्धा सहज उतरंड करताना दिसतात.
अहो संगीताच काय, देवांना सुद्धा सोडलं नाही, देवांची सुद्धा प्रतवारी केलेली आढळेल, या अभिजनवर्गातील कांहींनीं ... बाल्कनी => शिवशंकर ड्रेससर्कल => खंडोबा स्टॉल => म्हसोबा बाल्कनी => पार्वती ड्रेससर्कल => म्हाळसा स्टॉल => मरीआई

In reply to by विशुमित

मान्य शास्त्रीय संगीत लोकांना खूप अवघड आणि किचकट वाटते, पण त्याचे जर योग्य वयात शिक्षण आणि तालीम केली तर खूप सिम्पल आहे शास्त्रीय संगीत गाणे. विशेष म्हणजे शास्त्रीय गायनाला चांगला आवाज नसला तरी चालतो, अलंकारांची नुसता घोकंपट्टी केली तरी श्रोत्यांच्या कानाला सुंदर वाटते. हे इतकं साधं सोपं नसतं हो. चार परीक्षा दिल्या आणि विशारद झालं म्हणजे गाणं येतं असा नाही. आयुष्य घालवल्यावरही गाणं जेमतेम कळलं असं वयाच्या ८४ व्या वर्षी सुद्धा प्रेक्षकांसमोर नतमस्तक होणाऱ्या गानसरस्वती श्री किशोरी आमोणकर म्हणाल्या. मागच्या वर्षी पाहायला गेलो होतो त्या कार्यक्रमात ८४ व्या वर्षी प्रेक्षकांना डोके टेकून नमस्कार करणाऱ्या किशोरीताईना पाहून डोळ्यात पाणी उभे राहिले. वयाच्या ७६ व्या वर्षी अभी अभी ताल का कुछ अंदाज आ रहा है म्हणणारे उस्ताद अहमद जान थिरकवाँ यांसारख्या दिग्गजांनी आपली आयुष्य घालवली तरी संगीताच्या सागरातील दोन चार रत्ने त्यांच्या हातात लागली असे त्यांचे म्हणणे आहे. गजल सम्राट श्री जगजीत सिंह यांना आपल्याला चांगल्या आवाजाची देणगी "दैवी" आहे असे सांगितल्यावर ते म्हणाले तसे असले तरी त्यावर जितकी तुम्ही मेहनत घ्याल तितकी थोडीच आहे. त्यांच्याच शब्दात मूर्ती करण्यासारखा दगड निसर्गात सापडतो पण त्यातून तुम्ही जितकी जास्त त्यावर शिल्पकारी कराल तितकी जास्तीत जास्त सुंदर मूर्ती तयार होईल.

In reply to by सुबोध खरे

जेवढे घासाल तेवढे चमकणारच ना ! सगळ्याच क्षेत्रासाठी ते लागू आहे. दिगज्ज लोकांना असे बोलावे पण लागते. त्यामुळे त्या क्षेत्रात येणाऱ्या पिढयांना अपार कष्ट करण्याचा योग्य संदेश जातो. ... योग्य शिक्षण आणि तालीम ह्या बद्दल मी नमूद केलेच आहे. --- त्यात शास्त्रीय संगीत शिकवणारे बऱ्याच वेळा हातचे राखून शिकवताना दिसतात. फक्त त्यांना वाटेल आणि शक्यतो जवळच्या गोटामध्येच ते ज्ञान वाटतात, असे निरीक्षण आहे.

In reply to by विशुमित

काही शास्त्रीय संगीत शिकवणारे हातचे राखून शिकवतात. याचे कारण आजचा समाज आहे. सहा महिन्यात मुलाला "सा रे गा मा" स्पर्धेत भाग घेता येईल एवढे राग शिकवा. गाणं त्याला येतंच.पैसे तुम्ही म्हणाल तेवढे असे म्हणणाऱ्या माऊल्या डझनांनी आहेत हो.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही दिलेल्या प्रातिनिधिक उदाहरणांबद्दल माझे हे मत नव्हते. --- ज्यांना गंभीरपणे या क्षेत्रात काम करायचे आहे त्यांच्या बद्दल मी बोलत आहे. काही वेळा जाणून बुजून शिकवण्यासाठी वेळ लावला जातो. पण खासगीत आपल्या गोटातील (घरातील) माणसाला सगळ्या गोष्टी लवकरात लवकर शिकवण्याची हातोटी असते. माझ्या ओळखीचे एक पंडित जी होते. (ते गाव सोडून गेले आहेत, आता कोठे आहेत माहित नाही) जे लता दीदींच्या कोरस मध्येसुद्धा गायले होते. त्यांच्या गुरूंनी स्वकुटुंबाच्या व्यक्तीला वर आण्यासाठी त्यांना पुढील शिक्षण देण्यासाठी अप्रत्येक्ष नकार दिला होता. --- असा अनुभव पुण्यामध्ये मला सुद्धा आला होता पण मी छंद म्हणून करत होतो त्यामुळे ती बात अल्विहदा. हे माझ्या निरीक्षणांतील अनुभव आहेत. त्यासाठी आवर्जून "काही शास्त्रीय संगीत शिकवणारे हातचे राखून शिकवतात." असे नमूद केले आहे. सगळेच असे असतात असा माझा दावा नाही आहे.

अजय देवगण, सन्नी आणि आता समिर गालिब यांच्यावर तुम्ही लिहिलेले तिनही लेख अप्रतिम आहेत. आवडण्याचे कारण म्हणजे हे तिघेही जण अतिशय जवळचे वाटतात. समिर गालिब बद्दल तर काय बोलावे? समिर आणि आनंद-मिलिंद ही काँबीनेशन तर अफलातून होती. रक्षक - सुंदरा सुंदरा, गोपी किशन - हाय हुकु हाय हुकु हाय हाय, लाडला - लडकी है क्या रे बा बा, राजाबाबु - अ आ ई उ उ ओ मेरा दिल ना तोडो अनाडी - फुलो सा चेहरा तेरा बोल राधा बोल - तु तु तु तुतु तारा तोडो ना दिल हमारा बेटा - धक धक करने लगा, कोयल सी तेरी बोली, सैयाजी से चुपके हुवी क्या तेरी बात वंश - आके तेरी बाहोमे प्रेम कैदी - प्रियतमा ओ मेरी प्रियतमा दिल - मुझे निंद न आये, दम दमा दम, खंबे जैसी खडी है आणि ओ पिया प्रिया किती तरी गाणी आठवतात समिर आणि नदिम श्रवण हे त्रिकुटही भन्नाट होते वर म्हटल्या प्रमाणे आशिकीची सगळी गाणी, त्या शिवाय धडकन , सिर्फ तुम, राजा हिंदुस्तानी, दिवाना, साजन, फुल और काटे, दिल है की मानता नही या सिनेमांमधली समिरची गाणी अतिशय श्रवणिय होती. पैजारबुवा,

जी गाणी मी वर्षानुवर्षे आवडीने ऐकतोय त्याचा गीतकार कोण आहे हे आज समजले. धन्यवाद समीर.

सुरेख लेख छान माहिती मिळाली. धन्यवाद!

एक जबरी गाणं यावरून आठवलं (गीतकारः नीतिन राइकवार- चित्रपट : आँखे (२००२)) फटेला जेब सिल जाएगा जो चाहेगा मिल जाएगा तेरे भी दिन आएंगे छोटे अच्छा खासा हिल जाएगा रुकने का नईं थकने का नईं लाइफ़ में चलते रेने का अरे भेजा क्‌यूं सरकाने का सई बोलताए सई बोलताए टेनशन काए को लेने का सई बोलताए सई बोलताए फटेला जेब सिल जाएगा … खाने का है Chicken-Curry उसको मंगता पत्ती हरी जेब में तेरे दस रुपया पी ले cutting खा ले भजिया किस्मत पे रोने का नईं केलेण्डर बदलते रेने का अरे भेजा क्‌यूं सरकाने का … आज तो है अंधेरा कल होगा उजाला अरे अपनी दीवाली होगी किसी और का होगा दीवाला कल देख लेना पैसा होगा भर कर Income-Tax officer वो हाथ धो के ही पीछे पड़ जाएगा फटेला जेब सिल जाएगा … अरे भलताइच पकड़ा बाप Line में आ Line में आ तेरे भी दिन आएंगे छोटे …

In reply to by अनन्त्_यात्री

चित्रपट : -जोश अपुन बोला तू मेरी लैला वो बोली फेकता है साला अपुन जब भी सची बोलता है ए उसको झूठ कैको लगता है रे ये उसका स्टाइल होइगा होठो पे ना दिल मे हा होइगा ये उसका स्टाइल होइगा होठो पे ना दिल मे हा होइगा आज नही तो कल बोलेगी ए तू टेंशन कई को लेता है रे चित्रपट :- गुलाम ऐ क्या बोलती तु ऐ क्या मैं बोलूं सुन, सुना आती क्या खंडाला? क्या करूँ आ के मैं खंडाला घूमेंगे, फिरेंगे, नाचेंगे, गाएँगे ऐश करेंगे और क्या ऐ क्या बोलती तु... पैजारबुवा,

सहज सोप लिहिणारी माणसे आवडतात ! समीरची गाणी सहज ओठावर येतात , लीरीक्स आठवावे लागत नाहीत !

खरं आहे, गीतकारांना योग्य ते श्रेय मिळत नाही. बहुधा इतर कवीही चालीत शब्द बसवणाऱ्याना जरा कमी समजत असावेत.

पगला गजोधर,
संस्कृत वेद / पुराणांतील तथाकथित सुवर्णकाळ यांचा हँगओव्हर २१ व्या शतकातील काही मनातून आजही उतरलेला नाही. तर माऊली व तुकारामांच्या काळी हँगओव्हर किती भीषण असेल याची कल्पनाच करू शकतो.
तुमचं हे विधान वाचून माझ्या मनात नकळतच एक सुस्थानी तुलना चालू झाली. भारतीय भूमीमधे असे, समाजातील स्वयंघोषित उच्चभ्रू / अभिजात वर्गाने अन्नूलेखामुळे घुसमटवलेला, परंतु तत्कालीन मासेसने उचलून धरल्यामुळे तगून राहिलेली, आणखी काही उदाहरणे म्हणजे नरेंद्र मोदी व कर्नल प्रसाद पुरोहित... तत्कालीन समाजातला 'उच्चभ्रू ' किंवा 'आपली अभिरूची हीच सर्वोत्तम आहे, असा गंड बाळगणारा अभिजन वर्ग' आणि ओपिनियन मेकर म्हणवून घेणारा वर्ग आहे, त्याने यांना कायमच नाकं मुरडली. सोव्हियेत / चिनी सांस्कृतिक क्रांतीतील तथाकथित सुवर्णकाळ यांचा हँगओव्हर २१ व्या शतकातील काही मनातून आजही उतरलेला नाही. तर स्वातंत्र्योत्तर काळी हँगओव्हर किती भीषण असेल याची कल्पनाच करू शकतो. या दोघांनी, सर्वसामान्य बहुजन (मास पब्लिक) श्रोत्यांसाठी देशप्रेम सोपं केलं. साधे, सरळ, आपण रोजच्या बोलचालमध्ये वापरतो, ते शब्द न वापरताही त्यानी देशप्रेमाचा 'मासेस'शी जो कनेक्ट प्रस्थापित केला. अभिजन वर्ग यांच्याकडून, मोदीपुरोहितांना मिळालेल्या दुर्लक्षाच्या शापावर, सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या चारित्र्यावर केलेलं बेहद प्रेम हा उ:शापाचा उतारा असावा. आ.न., -गा.पै.

गीतकार समीर यांची माहिती देणारा हा लेख आवडला . हॅरीस जयराज या बॉलिवूडला नवीनच असलेल्या संगीतकाराचे RHTDM मधले उत्कृष्ट संगीत हे समीर लिखित गाण्यांमुळेच गाजण्याला मदत झाली .