Skip to main content

डिसेंबर महिन्यामध्ये कुटुंबाबरोबर कुठे जाता येईल फिरायला ?

डिसेंबर महिन्यामध्ये कुटुंबाबरोबर कुठे जाता येईल फिरायला ?

Published on गुरुवार, 21/09/2017 प्रकाशित
नमस्कार, हा माझा पहिलाच प्रश्न / लेख मिपा वर. जरा माहिती हवी होती. डिसेंबर महिन्यामध्ये कुटुंबाबरोबर २-३ दिवस कुठेतरी चांगला वेळ घालवायचा मानस आहे. जवळ पास २०-२५ लोकांचे कुटुंब आहे. माझा विचार असा होता कि कोकणा मध्ये कुठे तरी जायचे फिरायला? तुम्हाला काय वाटते? कि दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाऊ ? आणि कोकणा मध्ये एखादे ठिकाण जिथं संपूर्ण कुटुंब मज्जा करू शकते, राहायची सोय वैगरे अशी काही माहिती असेल तर ती पण सुचवा. मी नासिक मध्ये राहत असल्याने नासिक पासून सोयीस्कर पडेल असे सुचवा ! लिहिताना काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मनावर घेणार नाहीत ह्याच खत्री आहे. मिपाकराचे मन मोठे आहे. :-) धन्यवाद !! ज्ञानेश.

याद्या 11560
प्रतिक्रिया 31

In reply to by अभिदेश

घरगुती रिसॉर्ट असल्याने कायमच सर्वांना उत्तम अनुभव येईल असे नाही. पण तिथले हे सर्वाधिक लोकप्रिय राहण्याचे ठिकाण आहे. आम्ही दिवे आगरला दोनदा गेलो होतो. परंतु फार अगोदर न ठरवल्याने आनंदयात्रीचे बुकींग दोन्ही वेळा मिळाले नाही. त्यांच्या थोडे पलिकडेच मेहंदळे यांच्या बंगल्यावर बेड अ‍ॅन्ड ब्रेकफास्ट पद्धतीने रुम्स मिळतात तिथे राहिलो होतो. आम्ही जिथे जेवलो होतो ते ठीक ठीक वाटले होते.

२५ जण कसे प्रवास करणार..? प्रत्येक कुटुंबाच्या कार आहेत की एक बस ठरवणार..? बजेट किती..? लहान मुले आणि ६० च्या पुढचे सिनीयर सिटीझन किती..? फिरायला जायचे म्हणजे नक्की काय टारगेट आहे..? एकत्र मिळून गप्पा आणि खादाडी करायची आहे की देवदर्शन करायचे आहे की समुद्र बघायचा आहे की एखाद्या जंगलात जाऊन निवांत रहायचे आहे..?

In reply to by मोदक

शक्यतो बसनेच जाऊ अथवा २ मिनी टेम्पो ट्रॅव्हलर. बजेट चे असा काही प्रॉब्लेम नाही. होऊ द्या खर्च !! ८ लहान मुले. ७ सिनियर सिटीझन आणि बाकीचे सर्व ३० ते ४५ वयोगटातले. फिरायला जायचे म्हणजे नक्की एकत्र मिळून गप्पा टप्पा मारायच्या , भरपूर खायचे प्यायचे , काही गेम्स वैगरे असले तर बरे होईल. समुद्र किनारा असेल जवळपास तर आणखीनच छान. कॅम्प फायर वैगरे करता येईल. जास्त चालणे नको आणि जास्त फिरणे नको. एका ठिकाणी असेल तरी चालेल. खूप दिवस झाले असे फॅमिली गेट टुगेदर करून.

In reply to by ज्ञानेश

तुमच्या अपेक्षेमध्ये समुद्र किनारा अगदी शेवटी शेवटी आला आहे त्यामुळे नाशिकहून कोकणात जाण्याऐवजी एखादे असे खेडेगांव बघा जिथे इतक्या लोकांच्या जेवणाची आणि मुक्कामाची सोय होईल. अ‍ॅग्रो टुरीझमवाले अशा सोयी करतात. अगदीच चांगला यजमान असेल तर शेतावर वगैरे नेऊन आणतात. मुलांना त्याचे आकर्षण असेल तर ठीक.. तुमची घरची शेती असेल तर शेतीचा ऑप्शन कटाप करा. एखादे जंगलातले रिसॉर्ट बघा. नाशिक ते कोकण प्रवासात ट्रान्स्पोर्ट + टोल + पार्किंग + प्रवासाने होणारी दमणुक या हिशेबाने जवळचे रिसॉर्ट स्वस्त पडेल. गेम्स / अ‍ॅक्टिवीटी वगैरे गेट टुगेदरला येणार्‍या तीन चार कुटुंबातल्या मुलांच्या गळ्यात घाला आणि वयाने मोठा कुणीतरी एक जण त्यावर देखरेख करा. मुलांचे एकमेकांमध्ये बाँडिंग नसले तर तयार होईल. फॅमिली गेट टूगेदर अशी कल्पना असेल तर जास्ती प्रवास करू नका. एकत्र जमून भरपूर गप्पा मारा. पत्त्याचे तीन चार कॅट न विसरता सोबत न्या. बुद्धीबळ, बॅडमिंटनसारखे खेळ सोबत नेऊ नका. काचा कवड्या आणि विटी दांडू / लगोरी सारखे खेळ खेळणे शक्य असेल (सिनीयर सिटीझन वगळून) तर असे खेळ खेळा आणि शिकवा. दोन तीन सिनीयर सिटीझनना त्यांच्या काळचे पण आज लुप्त होणारे खेळ शिकवायला सांगा. गप्पांच्या सेशनमध्ये जुन्या लोकांना आठवणी सांगायला सांगा. हे जरा ट्रिकी असते कारण पिकल्या पानांना कधीकधी चांगल्या आठवणी आठवत नाहीत आणि रडारड होते. प्रत्येक फॅमिली मेंबरला लक्षात राहिल अशी एखादी पर्सनलाईज्ड गिफ्ट द्या. उदा. फोटो छापलेला मग किंवा नांव कोरलेले पेन. यात फोटोंमध्ये वैविध्य आणता येते.

In reply to by मोदक

ऍग्रो टुरीझम बद्दल अजून काही माहिती मिळू शकेल का? म्हणजे तुमच्या माहितीतील काही संकेतस्थळ किंवा काही फोन नंबर वैगरे ? तस मी पण शोधतो इंटरनेटवर. बाकी आपण जी माहिती दिली ती खरंच खूप छान आहे. अगदी जसे मला हवे तसे प्लांनिंग सांगितलं तुम्ही.

In reply to by ज्ञानेश

पालघर येथील एक पाटील यांचे एग्रो टुअरिजमबद्दल सह्याद्री चानेलवर मुलाखत पाहिलेली . इथून समुद्र,केळवा माहिम बीच जवळ आहे. १३ किमी. हीच साइट आहे का माहित नाही परंतू विचार करू शकता. हे सर्व नाशिकपासून आवाक्यात आहे. कोकणातल्यापेक्षा जवळ.

In reply to by ज्ञानेश

धन्यवाद. माझ्या माहितीत आहेत ती अ‍ॅग्रो टुरीझम रिसॉर्ट कोकणात आहेत आणि नाशिक साईडला कधीच येणे झाले नाहीये त्यामुळे तिकडची कल्पना नाही. आता इथे मदतीचा धागा काढला आहे तसा ट्रिप नंतर एक वृत्तांताचा धागा जरूर लिहा. :)

२५ जणांची जबाबदारी घेणारे चारजणतरी हवेत. पुर्वीचा अनुभव काय आहे कुणाला हे पाहा. कमितकमी आठ रुम्स लागतील आणि सापुतारा येथे अचानक शनिरविवारी कधिकधि प्राब्लेम येऊ शकतो. समुद्रकिनारा नाशिककडून -त्र्यंबकेश्वर-जव्हार- डहाणू असा जवळ पडेल. वापी येथे नानी/मोटी दमण सर्व सोयी आहेत . पर्यटन केन्द्र आहे. परंतू चारजणांनी अगोदर पाहून येणे उत्तम.

In reply to by कंजूस

जबाबदारी घेणारे तसेच बरेच आहेत. आणि हो ८ रूम्स पेक्षा आम्ही विचार करत आहोत कि मोठे हॉल्स किंवा तत्सम काही असेल तर मज्जा येईल. म्हणजे कसं झोपताना पण तेवढ्याच गप्पा गोष्टी :-) आपण सांगितलेली ठिकाण पण योग्य आहेत. बघतो कसं जमत तस जाऊन बघून येतो पहिले.

In reply to by ज्ञानेश

रस्टिक हॉलिडेज म्हणून सर्च करा फेसबूकवर, मी गेलो नाहीय अजून पण एकंदरीत फोटोज बघता चांगलं असावं असं वाटतंय.

जवळच्या ठिकाणांपैकी फॅमिलीसाठी सापुतारा, माळशेज, भंडारदरा चांगली आहेत. सापुतारा (गुजरात राज्य) हे ड्राय पर्यटनस्थळ आहे याची नोंद घ्यावी. अपेयपान तिथे होणार नाही. आवश्यकता नसेल तर उत्तमच. लहानसं ठिकाण आहे. तलावाभोवती अनेक रिसॉर्ट आहेत. जनरली शाकाहारी गुजराती जेवण मिळतं बहुतांश ठिकाणी. माळशेज हे जरी गदारोळ करणा-या मद्यप्यांमुळे एकेकाळी बदनाम असलं तरी "साज रिसॉर्ट बाय द लेक" हे ठिकाण मिळाल्यास तिथे गेट टुगेदर करा. बुकिंग ऐनवेळी मिळणं अवघड. लोणावळा या अत्यंत घिस्यापिट्या जागी फॅमिली गेट टुगेदरला मात्र उत्तम ठिकाणं उपलब्ध आहेत. बॅसिलिका हॉलिडे होम हे ठिकाण ट्राय करा. २-३-४ बीएचके बंगले मिळतात. जेवणखाणाची उत्तम सोय आहे. पिण्याचा प्लॅन असल्यास त्यासाठीही फ्रेंडली आणि नसेल तरीही ग्रुप/ फॅमिली वातावरणासाठी छान.

पावनखिंड रिसॉर्ट - आंबा घाटातले हा चांगला ऑप्शन आहे अश्या प्रकारच्या गेटटुगेदर ला. http://pawankhind.in/Mpage_0.htm

नासिक पासून जवळ (सुमारे ४० कि.मी.) इगतपुरी पासून भावली धरणाकडे जाणारा जो रस्ता आहे त्यावर मुंबई - नासिक हायवे पासून ३ कि. मी. वर "गोविन्द हिल व्ह्यू रिसॉर्ट"आहे. पोहोणे, बोटिंग, अ‍ॅडवेंचर पार्क, सायकलिंग इ. ची उत्तम व्यवस्था आहे. जवळच भव्य व हिरवेगार डोंगर, भातशेती वगैरे आहे. शाकाहरी जेवण मिळते पण बहुधा मांसाहाराची व्यवस्था (रूम वर ) करता येत असावी. २५-३० जणांना २-३ दिवसासाठी उत्तम ठरेल.

मोराच्या चिंचोलीला "जय मल्हार " नावाचे चांगले ऍग्रो टुरिसम रिसॉर्ट आहे .http://www.morachichincholi.com/ तिथे मोर हि बघायला मिळतात ,रुचकर जेवण खेळ इ .

In reply to by सन्घमित्रा

"मोराची चिंचोली" हे काही लोकांच्या वैयक्तिक श्रद्धेचा भाग असू शकतो, परंतु "चोरांची चिंचोली" अशीच महती त्या जागेबद्दल ऐकिवात आहे.

दिवेआगर , श्रीवर्धन आणि मुरुड जंजिरा असा दौरा ठरला आहे तर. आपलया माहिती मधे जर काही संपर्क असेल तर कृपा करून कळवा. एखादा वाडा वैगरे चालेल. १० मोठे आणि ८ लहान मुले आहेत. जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोया हवी. धन्यवाद. !!

In reply to by ज्ञानेश

दिवेआगार साठी- सृष्टी विला srushti villa ८७९३३२२८२१- विजय. वेबसाइट तपासून पहा. नारळ सुपारीच्या बागेत, ३ मजली घर आहे. एकून ८ खोल्या. घराच्या मागेच समुद्र आहे. जेवण तर खुपच सुंदर. बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील इथल्या जेवणाचे कौतुक केले आहे. जो जेवण बनवतो आणि बाकी व्यवस्था पाहतो त्याचे नाव विजय. १६०० रूपये प्रती व्यक्ति त्यामधे वास्तव्य, नाश्ता आणि एक वेळचे मांसाहारी जेवण. बाकी घासाघिस तुम्ही करू शकता. जाण्याच्याआधी त्या तारखेला विजय आहे का याची खात्री करा. कारण हरिहरेश्वरचे MTDC वाले त्याला तिथे आचारी म्हणून घेउन जातात. दिवेआगार ला आलो की मी नेहमी इथेच राहतो.

१ डिसेंबर शुक्रवार इद, मुरुड भागात गर्दी, ३ डिसेंबर रविवार चौल रेवदंडा,मुरुड दत्ताची जत्रा असते. श्रीवर्धनमध्ये विचारे यांचे आस्वाद जेवणासाठी( वेजनॅानवेज थाळी) पाहा.