Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उपयोजक on Wed, 07/26/2017 - 17:34
सध्या काही मित्रांनी त्यांच्यासाठी वधुसंशोधनाच्या कामात मलाही सामील करुन घेतलंय.बरेचसे मित्र हे ब्राह्मण समाजातील आहेत.त्यानिमित्याने विविध वधुवरसंशोधन संस्थांना भेटी देणं सुरु आहे.बहुतेक मित्र हे पौरोहित्य करणारे किंवा अल्पउत्पन्न गटातील आहेत.शिक्षणही आर्टस किंवा कॉमर्स शाखेतून पदवी,पदव्युत्तर असेच आहे.वयंही साधारण २८ ते ३५-३६ या गटातील आहेत.सगळे दक्षिण महाराष्ट्रातील म्हणजे सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,सिंधुदुर्ग या जिल्ह्यातले आहेत. वधुवरसंशोधन संस्थांमधील बर्‍याचशा मुली या पुणे,मुंबई,अौरंगाबाद,नाशिक अशा ठिकाणी चांगल्या पोस्टवर,चांगल्या पगारावर नोकर्‍या करणार्‍या आहेत.फार थोड्या मुली या १२ वी किंवा फक्त BA,B.com अशा आहेत. जी समस्या सध्या सगळीकडे आहे तीच इथेही जाणवली.मुलींच्या अवाजवी अपेक्षा! मुलगी नको मुलगा हवा या हट्टाचे दुष्परिणाम हे आता असे समोर येत आहेत. मुलगा इंजिनियर किंवा तसंच शिक्षण असणारा,मुंबई किंवा पुणे,बंगळूर अशा मोठ्या शहरात राहणारा,महिना किमान ४० हजारांवर पगार असणारा,स्वत:चा फ्लॅट असणारा हवा.अशा अपेक्षा आहेत या मुलींच्या! चांगल्या पोस्टवर असणार्‍या,बर्‍यापैकी मिळवणार्‍या मुलींच्या अपेक्षा समजण्यासारख्या आहेत,पण १२ वी किंवा BA असं शिक्षण असणार्‍या जेमतेम पगार मिळवणार्‍या मुलींनादेखील लग्नासाठीचा मुलगा इंजिनियर किंवा तसंच एखादं ग्लॅमरस शिक्षण असणारा किंवा सरकारी नोकरी असणारा हवा आहे. मुलींची वयं २९,३२,३४ झाली तरीही या अपेक्षा कमी होत नाहीत. आपल्या जातीत कमी शिकलेल्या मुली मिळत नसतील तर दुसर्‍या जातीतील मुली करुन घ्या, हा ही सल्ला मुलांना देऊन झालाय.पण पौरोहित्य करणार्‍या किंवा छोट्या गावांमधे नोकरी करणार्‍या मुलांना किंबहुना त्यांच्या पालकांना पटणारा,रुचणारा नाही.कदाचित यामुळे त्यांच्या व्यवसायावर किंवा कुटूंबातील अन्य सदस्यांच्या विवाहात अडचणी येऊ शकतात.आंतरजातीय विवाहासाठी खरंतर प्रबोधन करायला लागेल पण सध्या तेवढा वेळ देणं शक्य नाही.कारण आधीच या मुलांची लग्नाची वयं उलटून चाललेत. मग यावर बरंच डोकं खाजवून काही उपाय सापडले आहेत. ते असे, १) भारतातल्या अन्य राज्यांमधेही ब्राह्मण समाज आहे.या राज्यांमधे भौगोलिकदृष्ट्या मागासलेले असे काही भाग आहेत.तेथील पालकांना आपल्या मुलींना फार खर्चिक शिक्षण देणं किंवा त्यांच्या विवाहावर फार खर्च करणं शक्य होत नाही.अशा भागातल्या या पालकांशी संपर्क साधून त्यांना अशा आंतरराज्यीय विवाहासाठी राजी करणे.अर्थात भाषा आणि काही प्रमाणात संस्कार वेगळे असणारंच पण हा काही फार मोठा इश्यु नसावा! २) हल्ली नोकरीच्या निमित्ताने किंवा बदललेल्या जीवनशैलीमुळे रोजचं जीवन हे खुप दगदगीचं झालेलं आहे.बर्‍याचदा प्रसारमाध्यमांतून असं वाचायला,ऐकायला मिळतं की तिशीनंतर मुलींसाठी अपत्यप्राप्ती ही सहजसाध्य नसते.मग काही वेळा खर्चिक डॉक्टरी उपायांनंतर हे साध्य होतं. तर यात कितपत तथ्य आहे? हे जर सरसकट होत असेल,अपत्यप्राप्तीला असा विलंब हमखास होतंच असेल तर यासंबंधी शास्त्रीय माहिती मुलींना देऊन योग्य वयात विवाह करण्यासंबंधी त्यांचं प्रबोधन करावं.मतपरिवर्तन करावं (यासंबंधी शास्त्रीय माहिती,लिंका इथे कोणी दिल्या तर आभारच!) ३) होणार्‍या नवर्‍याला तिशीच्या आतच गलेलठ्ठ पगार असावा अशी बर्‍याच मुलींची किंबहुना त्यांच्या आईवडीलांची तशी अपेक्षा असते.वाढलेली महागाई हे कारण त्यांच्याकडून पुढे केलं जातं. आता ही महागाई कुठे भेडसावते?तर काही मुख्य गोष्टींमधे म्हणजे, * मुलानं घर/फ्लॅट घेतला असेल तर त्याचा हप्ता, * हल्ली प्रत्येक घरात किमान दुचाकी तरी असतेच त्यासाठी लागणारं पेट्रोल,किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केल्यास होणारा खर्च. * घरखर्च. * होणार्‍या अपत्याच्या इंग्रजी माध्यामातल्या शिक्षणाचा खर्च.(त्यासाठी हल्ली खुप आधीपासून बचत करावी लागते!) या सगळ्या खर्चांबाबत फक्त मुली त्यांचे पालक आणि एकुणच समाजाचं काही प्रमाणात प्रबोधनाचा प्रयत्न करणे.कारण बर्‍याचदा आपण आंधळेपणाने दुसरा तसं करतो म्हणजे आपणही(ऐपत,क्षमता नसताना) असं असंच केलं पाहिजे या सामाजिक दबावाला बळी पडतो. ४) काही असे कोर्सेस किंवा व्यवसाय ज्यांमधे आर्थिक प्राप्ती चांगली आहे पण त्यांना तितकसं ग्लॅमर नाही.उदा. ITI किंवा पौरोहित्य. माझे पती ITI आहेत किंवा भटजी आहेत हे सांगण्यात मुलींना कमीपणा वाटतो. दुर्दैवाने आताशा या ग्लॅमरस शिक्षणालाच जास्त महत्व आलंय. काहीवेळा ITI झालेल्या व्यक्तीच्या नोकरीची स्थिरता अधिक असू शकते. हा गैरसमज दूर करुन अशा कोर्सेसना,पौरोहित्याला ग्लॅमर यावं म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. ५) पती-पत्नी दोघांनी मिळून कष्ट केले,विश्वास ठेवला,लग्नानंतरही सुरुवातीची काही वर्षे दोन्हीकडच्या पालकांनी थोडाफार आर्थिक,मानसिक पाठींबा या जोडप्याला मिळाल्यास पुढील वाटचाल सुसह्य होईल असा विश्वास निर्माण केला पाहिजे. आता हे सगळे उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी काय काय करता येईल? किंवा अजून काही उपाय असतील तर तेही सुचवले जावेत. आज हा प्रश्न ब्राह्मण समाजात प्रकर्षाने जाणवत असला तरी काही वर्षांनी इतर समाजातही जाणवू लागेल किंवा लागलाही असेल.इथे पुरोहितांना नाकारलं जातंय,इतर समाजात कदाचित शेतकरी मुलगा नाकारला जाईल. एकंदरीत या प्रश्नाचा काही निकाल लागावा, परिस्थिती बदलण्यास मदत मिळावी यासाठी हा लेखनप्रपंच!
  • Log in or register to post comments
  • 41177 views

प्रतिक्रिया

Submitted by अभिजीत अवलिया on गुरुवार, 07/27/2017 - 17:34

In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे

Permalink

स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न

स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न करणे हि चूक आहे. पैसे किंवा मालमत्ता हि नंतर कमावता येते पण हातातून निसटून गेलेले वय परत येत नाही
सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 07/27/2017 - 19:45

In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे

Permalink

परत एकदा धन्यवाद डॉ. साहेब!

पण स्वतःचे घर होईस्तोवर लग्न न करणे हि चूक आहे. पैसे किंवा मालमत्ता हि नंतर कमावता येते पण हातातून निसटून गेलेले वय परत येत नाही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय.पण मुलींच्या अवास्तव मागण्या कशा रास्त आहेत हे सांगण्याचा काहीजण प्रयत्न करताहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/27/2017 - 21:30

In reply to परत एकदा धन्यवाद डॉ. साहेब! by उपयोजक

Permalink

पण मुलींच्या अवास्तव मागण्या

पण मुलींच्या अवास्तव मागण्या कशा रास्त आहेत हे सांगण्याचा काहीजण प्रयत्न करताहेत. त्यातील एक मी आहे. ;) पण रास्त उगीच आहे ला आहे करत नाहीये तर हिशोब घालून दाखवतिये. ग्रोसरी, युटिलिटीची बिले यांना कोण काय करणार? आटा, दाल तर उदाहरणे देण्यासाठी प्रसिद्ध आहेतच. ;) हां, आता उगीच सात्राशेसाठ कपडे, दागिने , फर्निचर, मौजमजा यावर नियंत्रण असावे हे मान्य आहे. आवड नसल्याने माझे आपोआप होते पण काही नातेवाईक स्रिया आहेत की कपाटे भरून वाहतायत व पैसे फार खर्च होतात म्हणून काळजीत असतात. ग्रोसरीही वाया जाईल इतकी करू नये वगैरे व्यावहारिक व काटकसरीचे प्रयोग करून सरावाने संसार शिकता येतो. किंबहुना माझे लग्न झाले तेंव्हा संसार हे काटकसरीचे असत. अनेक मिपाबायकांचे संसारही दोन भांडी व एक सतरंजी यांनी सुरु झाले होते/आहेत. त्यामुळे अनेकांना अनुभव आहे. मला प्रश्न हा वैद्यकीय बिले चुकवताना आला. तिथे कोण माफ करणार? असुरक्षितता ही तिथे आली. आजारपणे, पडणे, धडपडणे, अपघात सांगून होत नाहीत. दवाखान्याची येणारी बिले संसारात अस्थिरता निर्माण करतात. बाळे फटाफट झाली तर ठीक पण काही कारणाने उपचार करावे लागणे, इमर्जन्सी होणे याने जीव जायची वेळ येते, पेशंट व पालकांचा! अशावेळी स्थिरता हवी वाटली तर चूक कोणती? घराचा आकार जाऊ द्या हो, संसार एका खोलीतही होतोच! ती अ‍ॅडजस्टमेंट, नाईलाज असू शकेल पण 'गोल' असू शकत नाही. लहान खोली असू द्या नाहीतर महाल.......आपले घर व त्यात दोन चित्रे भिंतीवर लावणे ही हौस असतेच असते. भावनांवर संसार चालत नसला तरी संसार चालवायला प्रेम हा मोठ्ठा इन्ग्रेडियंट लागतोच! सगळीकडे एकच तक्रार सध्या आहे की मुले मुली जास्त वयाचे होऊन चाललेत. अशी हौस कोणाला असेल? (ज्यांना लगीन करायचेच नाही त्यांचा प्रश्न इथे नाही). कोणतीतरी भीती ही बागुलबुवा होऊन मानेवर बसलिये खरी. याला दोष द्या, त्याला दोष द्या करत बसण्यापेक्षा मी माझ्या मुलाला काटकसरीचा संसार करून दाखवणे, व कमी पैशात सुरुवातीला संसार करू शकतो हे उदाहरण द्यावे. लोकांच्या मुलींकडे बोट दाखवण्याआधी माझ्या मुलाला काय शिकवत नाहीये याकडे डोळे उघडे ठेवून मी बघणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 07/27/2017 - 21:42

In reply to पण मुलींच्या अवास्तव मागण्या by रेवती

Permalink

रेवती ताई सहमत!

रेवती ताई सहमत! आयुष्यात अप डाऊन असतात, अपेक्षा जरूर असाव्यात पण समजूतदारपणा देखील हवा. माझा जेव्हा वाईट काळ सुरू झाला तेव्हा बायकोने घर संभाळले व आज ही ती घर संभाळत आहे व मी माझ्या मुलीला. सर्व शक्य असते, फक्त इगो मध्ये आला की अडचण होते. मी केर ही काढतो, कपडे ही वाळत घालतो आणि पोरींचे शी पण साफ करतो पण त्या वेळी मी हे बायको वेळेत कामाला जाऊ दे व तिचा कार्यालयीन सम्मान देखील राहावा हा हेतू मनात ठेवून करतो हे देखील सत्य.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 07/27/2017 - 21:49

In reply to माहित गार साहेब by सुबोध खरे

Permalink

डॉक, स्वतःचे घर नसलेल्या

डॉक, स्वतःचे घर नसलेल्या मुलाला होकार देणारी मुलगी (आणि तिचे पालक) दुर्मिळ झाले आहेत सध्या. अगदी आमच्या कोकणातील खेडेगावातील जेमतेम पाचवी सहावी शिकलेल्या मुलींना (आणि त्यांच्या आई वडीलांनाही) मुलगा मुंबईत कामाला असलेला आणि मुंबईत स्वतःची रूम असलेला हवा असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on गुरुवार, 07/27/2017 - 19:34

In reply to वय आणि प्रजननक्षमता यांचा by सुबोध खरे

Permalink

डॉक्टर साहेब धन्यवाद.

मोलाची माहिती दिलीत!
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 07/28/2017 - 17:27

In reply to वय आणि प्रजननक्षमता यांचा by सुबोध खरे

Permalink

खूप माहितीपूर्ण माहिती.

खूप माहितीपूर्ण माहिती.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 07/27/2017 - 10:50

Permalink

माझ्या स्वतःच्या मुलीला किंवा

माझ्या स्वतःच्या मुलीला किंवा पुतण्यांना भाच्यांना मी पंचविशीपर्यंत लग्न करा असाच सल्ला देतो म्हणजे मग त्यानंतर दोन ते तीन वर्षे एकमेकांना समजून घेण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी देता येतात आणि मूल होण्यासाठीही थांबता येते. मुळातच ३० -३२ ला लग्न झाले आणि मग बराच उशीर झाला वाटून मूल होत नाही म्हणून वर्षभरातच उपचाराला येणाऱ्या अनेक जोडपी मी रोज पाहतो आहे. दवाखान्याच्या जवळच असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या के जी मधील बहुसंख्य मुलांच्या आया ३५ आणि ४० च्या मधील आणि खाऊन पिऊन सुखी आणि ( क्वचित कधीतरी दिसले तर) बाप त्याही पेक्षा जास्त वयाचे दिसतात. हि शाळा उच्चभ्रू असल्याने हे उदाहरण उच्चभ्रू वर्गातीलच प्रातिनिधिक म्हणून घेता येईल सर्वसामान्य वर्गातील नव्हे.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 07/27/2017 - 17:30

In reply to माझ्या स्वतःच्या मुलीला किंवा by सुबोध खरे

Permalink

लाखभर रूपये पगार आणि

लाखभर रूपये पगार आणि स्वकमाईतून दोन / तीन BHK हे पंचवीशीतच कसे काय जमणार..? ..आणि एक कॅच सांगतो. घर दोघांच्या पसंतीने घेणे सर्वसंमत आहे किंवा माझ्यामते तसे असले पाहिजे. मग सुरूवातीपासून दोघांच्या संमतीने सजावट, सुखसोयी करता येतात. वेगळ्या एरीयामध्ये घर, वेगळ्या लाईनवरील एरीया वगैरे प्रकार माहिती असतीलच..! मग असे असताना लग्नाआधी मुलाचे स्वतःचे घर असावे ही अपेक्षा याच गृहितकाला छेद देत नाही का..?
  • Log in or register to post comments

Submitted by शरद on गुरुवार, 07/27/2017 - 17:52

Permalink

कोकणातील स्थळे

माझ्या माहितीप्रमाणे कोकणातील मुलींना कोकणातील स्थळ नको असते. कारण खेडेगाव किंवा तालुका-जिल्हाचे मुख्य गावही त्यांना मागासलेले वाटत असावे. मुंबई-पुणे यानाच पसंती. माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम आहे. प्रशस्त घर, दोन-तीन किफातशीर व्यवसाय, आंब्याच्या बागेचे उत्पन्न १० लाखापेस्षा जास्त, तरी शिकलेल्या पदवीधर मुलांची लग्ने जमत नाहीत. शेवटी कर्नाटकातील ब्राह्मण मुली लग्न करून घरी आणल्या. भाषेचा प्रश्न सहज सुटला. पंजाब मधील मुले आता लग्न जमवावयाला केरळ किंवा गआसाम गाठतात असेही वाचनात आले आहे. शरद
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on गुरुवार, 07/27/2017 - 18:07

Permalink

मुलगी नको मुलगा हवा या

मुलगी नको मुलगा हवा या हट्टाचे दुष्परिणाम हे आता असे समोर येत आहेत.
केअशु साहेब, हा मुलींचे प्रमाण कमी असण्याचे दुष्परिणाम आहे असे वाटत नाही. सध्या महागाईचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळे आपली मुलगी आर्थिक दृष्ट्या सुखी संपन्न घरात जावी असे प्रत्येक आई बापाला वाटणारच. त्यात काही चुकीचे नाही. समजा हजार मुलांमागे हजार मुली हे प्रमाण असते तरी देखील जे मुलगे फारशी आर्थिक प्राप्ती करत नाहीत अथवा इंजिनियर किंवा तसंच एखादं ग्लॅमरस शिक्षण किंवा सरकारी नोकरी करत नाहीत त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झालाच असता.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/27/2017 - 18:13

In reply to मुलगी नको मुलगा हवा या by अभिजीत अवलिया

Permalink

सध्या महागाईचे प्रमाण खूपच

सध्या महागाईचे प्रमाण खूपच वाढले आहे. धन्यावादच धन्यवाद हे म्हटल्याबद्दल. मागील महिन्यात डीमार्टला खरेदी करण्यासाठी गेले असताना काही रोचक निरिक्षणे व बिलांचे आकडे समोर आले त्यावरून पुणेकर लोकांना किंवा परवाहून आलेल्या बेताच्या परिस्थितीतील लोकांना त्यांच्या गावा शहरावरून नावे ठेवण्याची गरज नाही हे दिसले पण फार डिटेल्स द्यावे लागतील म्हणून थाम्बतिये.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/27/2017 - 18:14

In reply to सध्या महागाईचे प्रमाण खूपच by रेवती

Permalink

परवाहून आलेल्या

परवाहून आलेल्या परगावाहून आलेल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 07/27/2017 - 18:46

Permalink

माझा स्वतःचा खर्च मुंबईत

माझा स्वतःचा खर्च मुंबईत (नवरा बायको आणि दोन मुले यांचा) . दरमहा २००० रु सोसायटी भाडे(स्वतःचे घर). रु १५००/- वीज बिल, १५००/-मोबाईल, स्थिर दूरध्वनी आणि इंटरनेट/ वाय फाय सकट १२००/- दरमहा, वाणसामान १०,०००/-, पेट्रोल बिल १०००/- महिना ( घरापासून दवाखाना १ किमी, मुलाचे कॉलेज ७ किमी, मुलीचे १ किमी). टीव्ही केबल बिल ५०० रुपये कपडा लत्ता खर्च साधारण २५००/- (३०,०००/- वर्षाला). इतर किरकोळ खर्च (हॉटेलिंग आठवड्यात एकदा धरून) ५ हजार जरी पकडले तरी महिना २५,०००/- हा ढोबळ खर्च आहे. यात नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा खर्च सहज निघेल. तेंव्हा ३०-३५हजार रुपये उत्पन्न असलेल्या जोडप्याला पुण्यात भाड्याच्या घरात(१२ हजार) खाऊन पिऊन नक्की सुखी राहता येईल. इतर शहरात पाच हजार कमी. मुलांच्या शिक्षणाचा किंवा चैनीचा यात समावेश नाही हे गृहीत. काही मोठा खर्च राहिला असेल तर लक्षात आणून देणे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 07/27/2017 - 19:22

In reply to माझा स्वतःचा खर्च मुंबईत by सुबोध खरे

Permalink

धन्यवाद डॉक्टरसाहेब.

धन्यवाद डॉक्टरसाहेब. धागाकर्त्याने उल्लेखलेली रक्कम ४० ह. रू. प्रतिमाह (हा एक नंबर मानायचा म्हणून मानला आहे). उत्पन्नावरील कर धरायला हवा, भविष्य तरतूद, वैद्यकीय निधी. या गोष्टी मुले जन्मायच्या आधीपासून लागतात. मुलांच्या शिक्षणाचा समावेश खर्चात केल्यास खर्चाची रक्क्म वाढते. अगदी जवळच्या साध्या शिशूविहारापासून सुरुवात करायची म्हटले तरी गणित बदलते.
  • Log in or register to post comments

Submitted by उदय on Sun, 07/30/2017 - 11:00

In reply to माझा स्वतःचा खर्च मुंबईत by सुबोध खरे

Permalink

काही मोठा खर्च राहिला असेल तर

काही मोठा खर्च राहिला असेल तर लक्षात आणून देणे. >>> घराचा हप्ता (EMI) किंवा घरभाडे मिळून खर्च किती येईल. नवीन लग्न झालेल्या जोडप्याचे स्वतःचे पेडऑफ घर असण्याची शक्यता किती? (माझ्या माहितीनुसार आज मुंबईत १ बी.एच.के. ची किंमत १ कोटी धरली तर महिना EMI १ लाख (चुभूदेघे) किंवा भाडे २५-३० हजार असेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 07/27/2017 - 19:04

Permalink

बरेचजणांनी चांगले मुद्दे

बरेचजणांनी चांगले मुद्दे मांडले आहेत परंतू खरी परिस्थिती "मला अस्सा नवरा नक्कोच" ही आहे. शरद यांनी कोकणातले दिलेले उदाहरण हेच सत्य आहे. मुलींना त्या वाढल्या त्याच कोकणात अजिबात राहायचे नाही॥
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 07/27/2017 - 19:57

Permalink

नैसर्गिक न्याय व अक्कल

माझ्या माहितीत केवळ पत्रिका या विषयावर भर दिल्याने आयुष्यभर अविवाहित रहाण्याची शिक्षा ( व संधी ) आलेले दोन जण आहेत. मी तरी माझ्या मुलीला १. गुण २. रूप ३. पैसा असे प्राधान्य क्रम सारखे सुचवीत असतो व तिला ते पटत चालले आहेत. विभक्त कुटंब पद्धतीचे तोटेही तिला परोपरीने समजावीत आहे. बाकी मला शहरातच रहायचे आहे , मला परमनंट नोकरीचा दाखला हवा असे हट्ट असणार्‍या मुलीना कालपरत्वे अविवाहित रहाण्याची शिक्षा व संधी मिळेल यात शंकाच नाही. शेवटी काळ हा कोणा एका साठी आपला प्रवाह बदलीत नाही. काळ आला की जन्म हयात व मरण हा क्रम आलाच. सबब पैसा ,स्थैर्य न पहाता आईवडीलांशी जमवून घ्यावे.लवकरात लवकर लग्न करावे मुले जन्माला घालावीत. असे धोरण आखण्यातच शहाणपण आहे. बाकी आपल्याला शिक्षा व संधी आपली अक्कल व नशीब यांचा संकराने मिळत असतेच.
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Fri, 07/28/2017 - 01:31

Permalink

पूर्वी टका आणि मुवि यांचे असे

पूर्वी टका आणि मुवि यांचे असे धागे वाचून मजा यायची, पण आता स्वतःच अश्याच परिस्थितीतून जात आहे. अरेंज करण्यापेक्षा लव marriage केला असता तर चाललं असत असा आता वाटायला लागलाय. आधी नोकरी/career यात settle होऊ मग मुलगी बघू असा त्यामागचा विचार. वर सांगितलेल्या मुलांकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करून सुद्धा मुलगी मिळणे कठीण वाटतं आहे. यात चांगल्या मुलींची (नुसत्या रूपाने नाही बाकी factors पण गृहीत धरले आहेत) आधीच लग्न झालेली, त्यामुळे थोडा उशीर झाला. पूर्वी फेसबुक वर उगाच फ्रेंड रेक्वेस्त पाठवणे आणि चाट करणे हे cheap आणि despo वाटायचे ( उदा. रोझ with रोझ etc. ;) ), आता ते केल असत तर एखादी चांगली पोरगी तरी पटली असती असं वाटतं. असो, या पुरोहित वर्गातील मुलांना एवढेच सांगणे आहे कि unless तुम्ही एखाद्या बड्या corporate देवस्थानाचे पुजारी नसाल तर पौरोहित्य हा तुमच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत ठेवू नका, त्या बरोबरीने काही तरी दुसरा एखादा उद्योग धंदा किंवा नोकरी करा, तरच तुमचा टिकाव लागेल. स्वगत : साधा मुलगा नाव बदलून ट.का. द्वीतिय असे ठेवण्याची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रुपी on Fri, 07/28/2017 - 01:40

In reply to पूर्वी टका आणि मुवि यांचे असे by साधा मुलगा

Permalink

उत्पन्नाचा दुसरा स्रोतबद्दल

उत्पन्नाचा दुसरा स्रोतबद्दल सहमत आहे. माझ्या ओळखीतल्या तीन मुलांनी त्यांचे घरचे यशस्वी व्यवसाय असताना बी.कॉम. नंतर डिप्लोमा किंवा LLB केलं. लग्न जमण्यासाठी म्हणून तर ठीक आहेच , पण एकंदरीतच उत्पन्नाचा आणखी एखादा स्रोत असणं सर्वच दृष्टींनी फायद्याचं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Fri, 07/28/2017 - 04:13

In reply to पूर्वी टका आणि मुवि यांचे असे by साधा मुलगा

Permalink

होईल हो लग्न! असं तुम्हाला का

होईल हो लग्न! असं तुम्हाला का वाटतंय हे समजु शकते. मिपावर खरं लग्नाच्या लहान जाहिराती देता यायला हव्यात. अवांतर - टक्याचं झालं का लग्न? दिसत नाही आताशा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/28/2017 - 11:34

In reply to पूर्वी टका आणि मुवि यांचे असे by साधा मुलगा

Permalink

चांगल्या वधुवर सूचक मंडळात

चांगल्या वधुवर सूचक मंडळात नाव नोंदवा. बऱ्या वाटणाऱ्या स्थळाबरोबर चर्चा करा? चेहरा आवडतो कि नाही हे पहिल्या नजरेतच समजते. ( ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा पाहिल्यावर पहिल्या नजरेत आवडला नाही तर पुढे जाऊच नका. "रोज" सकाळी उठल्यावर ज्याचा / जिचा चेहरा डोळ्यासमोरसुद्धा नको वाटेल अशा" शी/ अशी"शी आयुष्यभर संसार कसा करणार? मुलगी होतकरू आहे एवढे पहा आणि स्वभाव जुळतील हे पहा. ( चर्चा केल्यावर थोडं फार लक्षात येतं). मुलगी जुळवून घेणारी आहे एवढं पाहिलं पाहिजे. बाकी पैसा, घर इ. गोष्टी दुय्यम आहेत. त्या कालांतराने येतातच.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/28/2017 - 13:17

In reply to चांगल्या वधुवर सूचक मंडळात by सुबोध खरे

Permalink

खरे सर, इथे धागे काढून झैरात

खरे सर, इथे धागे काढून झैरात करु नका ही सूचना आगाऊ पणे चिकटवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/28/2017 - 21:34

In reply to खरे सर, इथे धागे काढून झैरात by अप्पा जोगळेकर

Permalink

हायला

हायला इथे रुग्णांपासून "खाजवायला" फुरसत नाही आणि मी कशाला वधुवर सूचक मंडळ काढू? झैरात कसली आणि कशाची करू हो?
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Sat, 07/29/2017 - 10:29

In reply to चांगल्या वधुवर सूचक मंडळात by सुबोध खरे

Permalink

ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा

ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा पाहिल्यावर पहिल्या नजरेत आवडला नाही तर पुढे जाऊच नका. "रोज" सकाळी उठल्यावर ज्याचा / जिचा चेहरा डोळ्यासमोरसुद्धा नको वाटेल अशा" शी/ अशी"शी आयुष्यभर संसार कसा करणार? >> दणकून सहमती. फक्त आधी आपले स्वतःचे थोबाड आरशात पाहून घ्यावे म्हणजे झाले :D
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 07/29/2017 - 21:40

In reply to ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा by एमी

Permalink

ऍमी ताई

ऍमी ताई वयाच्या २५ व्य वर्षी तुम्ही दिसायला सुंदर नसलात तर ते तुमचे दुर्दैव आहे. पण २५ व्य वर्षी तुमचा जोडीदार दिसायला सुंदर नसेल तर ती तुमची चूक आहे. अर्थात सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते हा महत्त्वाचा भाग गृहीत आहेच. पण ज्या मुलाचा किंवा मुलीचा "चेहरा" दाखवण्याच्या कार्यक्रमातच "टाकाऊ" दिसतो (जेंव्हा चेहरा पासून कपड्या पर्यंत सर्व गोष्टी चमकावलेल्या असतात). तो एखाद्या उदास संध्याकाळी विस्कटलेल्या कपड्यात आणि केसात काय उजेड पडणार आहे. दाखवण्याच्या कार्यक्रमाला मुलगा किंवा मुलगी "जशी" दिसते त्यापेक्षा तो किंवा ती जास्तीत जास्त १० टक्के सुधारणा करू शकेल. आणि जसे वय वाढत जाईल तशी परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडतच जाईल. हे वयाच्या २५ व्य वर्षी लक्षात घेणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Sat, 07/29/2017 - 21:53

In reply to ऍमी ताई by सुबोध खरे

Permalink

एखादी सो कॉल्ड सुंदर नसलेली

एखादी सो कॉल्ड सुंदर नसलेली ब्यक्ति माझ्याशी जर २ तास गप्पा मारु शकत असेल तर मी तिचा जोडीदार म्हणुन नक्कीच विचार करेन. जर एखाद्याचं मन आणि बुद्धिमत्ता सोन्यासारखी असेल तर मला सुदैवाने रुपाच्या पलीकडेही जाऊन पहाता येतं. कारण वयाच्या साठीत सौंदर्य महत्वाचं नसेल, पण ज्याच्यात रमुन जाता येईल असं माणूस नक्कीच जवळ असलेलं बरं..
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 07/29/2017 - 22:36

In reply to एखादी सो कॉल्ड सुंदर नसलेली by पिलीयन रायडर

Permalink

प्रचंड सहमत!

प्रचंड सहमत! वरील उदाहरण मीच आहे की ;)
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Sun, 07/30/2017 - 05:03

In reply to ज्या मुला किंवा मुलीचा चेहरा by एमी

Permalink

डॉक आणि पिरा दोघांशी असहमत.

डॉक आणि पिरा दोघांशी असहमत. एखाद्या स्वतः छान दिसणार्या व्यक्तीने 'माझ्यासोबत शोभेल असाच जोडीदार मला हवा आहे' अशी अट ठेवायला हरकत नाही. पण स्वतः छान दिसत नसताना जोडीदाराने छान दिसलेच पाहिजे ही अपेक्षा पटत नाही आणि 'एखाद्याचं मन आणि बुद्धिमत्ता सोन्यासारखी असेल तर रुपाच्या पलीकडेही जाऊन पहाता आले पाहिजे' हेदेखील पटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Sun, 07/30/2017 - 05:22

In reply to डॉक आणि पिरा दोघांशी असहमत. by एमी

Permalink

अर्थातच कुणी कुणाकडुन काय

अर्थातच कुणी कुणाकडुन काय अपेक्षा ठेवावी हे आपण नाही सांगु शकत. प्रचंड श्रीमंत नवरा हवा किंवा अत्यंत सुंदर बायको हवी असं कुणाला वाटत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि अर्थात त्यात काही चुक नाही.. हार्ट वॉन्ट्स व्हॉट हार्ट वॉन्ट्स.. माझा मुद्दा पहिल्यापासुन एकच आहे, रंग रुपाचा लग्नात फारसा उपयोग नसतो. "नाईस टु हॅव्ह" गोष्ट. पण स्वभाव हा नक्कीच "मस्ट हॅव्ह" आहे. अत्यंत सुंदर पण महामुर्ख माणसाशी संसार होऊ शकत नाही. पण सुंदर"च" जोडीदार हवा"च" अशी काही मानसिकता नसेल तर दिसायला सुंदर नसलेल्या पण ज्याच्याशी स्वभाव जुळताएत अशाशी नक्कीच सुखाचा संसार होऊ शकतो. माझ्या आयुष्यात असे अनेक लोक आहेत बुवा ज्यांचे दिसणे मी कधी नोटीसच केले नाहीये. अगदी नवराही मित्र म्हणुन पहिल्यांदा भेटला तेव्हाही. पण अर्थात ज्याची त्याची आवड..
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Sun, 07/30/2017 - 09:28

In reply to अर्थातच कुणी कुणाकडुन काय by पिलीयन रायडर

Permalink

येस! कोण कोणासोबत कशासाठी

येस! कोण कोणासोबत कशासाठी लग्न सेक्स मुलंबाळं करतंय हा ज्याचात्याचा प्रश्न झाला. हा काही matter of public interest होऊ शकत नाही. पण तरी त्याच्यावर धागे निघत राहतात, चर्चा होत राहते आणि प्रबोधन वगैरे केलं जातं =))
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 07/28/2017 - 06:40

Permalink

इथे बरेचजण लवकर लग्न करा

इथे बरेचजण लवकर लग्न करा सल्ला देतायत. आत्ता एवढ्यातच 25व्या वर्षी लग्न करणार्या आणि 6 महिन्यात घटस्फोट घेतलेल्या दोनजणी भेटल्या. पहिली निम्नमध्यमवर्गातली, डिप्लोमा केलेली, मेकॅनिकल कंपनीत नोकरी करणारी. 5 वर्ष डेटिंग करून लग्न केलेलं. सासूची अपेक्षा कि हिने अख्खा पगार आपल्या हातात द्यावा. मुलीला मात्र माहेरी थोडे पैसे द्यायचे होते. दुसरी phd करणारी. ITतल्या मुलाशी पत्रिका वगैर जुळवून अरेंज लग्न. तो शरीरसंबंध ठेवण्यास अक्षम निघाला. हे आत्ताच्या पिढीतलं. मागच्या पिढीतल्या अशाच दोघी सहज आठवल्या. लग्न - मूल - 7 वर्षांची खाज - शाळेतल्या क्रशसोबत एक रात्र उभा - मग नवर्याकडून लहान मुलांसमोर मारहाण, सेक्स अबूसे वगैरे... दुसरी निम्णवर्गातली, 35 वयात आजी झालेली. तिचं नंदेच्या की बहिणीच्या नवर्यासोबत अफेअर चालुय.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रे on Fri, 07/28/2017 - 07:12

In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी

Permalink

5 वर्ष डेटिंग करून लग्न

5 वर्ष डेटिंग करून लग्न केलेलं. सासूची अपेक्षा कि हिने अख्खा पगार आपल्या हातात द्यावा. मुलीला मात्र माहेरी थोडे पैसे द्यायचे होते.
बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही आला का मुलांच्या घरच्यांचा?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/28/2017 - 11:17

In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी

Permalink

मागच्या पिढीतील हे "अपवाद"

मागच्या पिढीतील हे "अपवाद" वाटतात नियम नाही. लवकर लग्न केल्याने विचारधारा लवचिक असते आणि जसे वय वाढते तशी मते घट्ट आणि अपरिवर्तनशील होतात आणि अहं (इगो) सुद्धा वाढत जातो. सेक्सची आसक्ती हा एक तरुण वयात नाते जुळवण्यासाठी फार मोठा चालना देणारा स्रोत असतो (ड्राइव्हिंग फॅक्टर). जसे वय वाढते तसा तो पण कमी कमी होत जातो. यामुळे स्त्रीपुरुषांची एकमेकांबद्दल ओढही कमी होत जाते. यावर अचल विचारसरणी आणि फुगलेला इगो तडजोड करण्याच्या आड येतो म्हणून जसे वय वाढत जाते तसतसे लग्न करणे जास्त कठीण होऊन बसते. मी माझ्या मुलाला सुद्धा २६-२७ वयालाच लग्न करण्यासाठी आतापासूनच हळू हळू त्याच्या नकळत सूचना करीत आहे. २६ २७ च्या मुलाला २४-२५ ची मुलगी मिळणे सहज शक्य होते.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Fri, 07/28/2017 - 11:22

In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी

Permalink

तुम्ही नमूद केलेल्या

तुम्ही नमूद केलेल्या उदाहरणांमध्ये लवकर केलेले लग्न हे घटस्फोटाचे कारण आहे असे मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 07/28/2017 - 11:58

In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी

Permalink

बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही

बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही आला का मुलांच्या घरच्यांचा? >> नसेल आला. किंवा अंदाज घ्यायचा प्रयत्नच केला नसेल. प्रेम अनुबंध कृतज्ञता वगैरेवर तरून जाऊ वाटले असेल. === मागच्या पिढीतील हे "अपवाद" वाटतात नियम नाही. >> मागची पिढी म्हणजे फार म्हातारे नाहीत. सध्या वय 35-40 असलेलं लोकं आहेत. हो सेक्स हा ड्रायविंग फॅक्टर असू शकतो मान्य. पण कधीकधी त्याच बाबतीत टोकाची मिसमॅच/इंकंपतिबिलिटी असू शकते === तुम्ही नमूद केलेल्या उदाहरणांमध्ये लवकर केलेले लग्न हे घटस्फोटाचे कारण आहे असे मला वाटत नाही. >> नसेलही. पण लवकर लग्न केल्याने सगळे ठीक होईल असेदेखील नाही. कदाचित प्रॉब्लेम अजूनच वाढेल कारण एक किंवा दोघेखेरीज अजून मुलं देखील येतील... === एनिवे भविष्यात मुलींचे कितीही प्रबोधन केले आणि एकूनेक मुलीने लग्न केले तरी सध्या <१५ असलेल्या १.५ कोटी मुलांना अविवाहित राहवेच लागणार आहे. त्यामुळे 'लग्न-मुल हेच आयुष्याचे इतिकर्तव्य समजू नका. you can live happily single life. there are many other more interesting things todo than raising a kid' हे मुलगा/गी दोघांना सांगायला चालू केले तर बरे होईल. हेमावैम.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 07/28/2017 - 12:02

In reply to बोंबला! पाच वर्षात अंदाज नाही by एमी

Permalink

(No subject)

<१५ असलेल्या १.५ कोटी मुलांना अविवाहित राहवेच लागणार आहे. त्यामुळे 'लग्न-मुल हेच आयुष्याचे इतिकर्तव्य समजू नका. you can live happily single life. there are many other more interesting things todo than raising a kid' हे मुलगा/गी दोघांना सांगायला चालू केले तर बरे होईल. हेमावैम.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 07/28/2017 - 12:06

In reply to (No subject) by एमी

Permalink

प्रतिसाद पूर्ण का दिसत नाहीय

प्रतिसाद पूर्ण का दिसत नाहीय :-( १५पेक्षा कमी वय असलेल्या १.५ कोटी मुलांना अविवाहित राहवेच लागणार आहे. त्यामुळे 'लग्न-मुल हेच आयुष्याचे इतिकर्तव्य समजू नका. you can live happily single life. there are many other more interesting things todo than raising a kid' हे मुलगा/गी दोघांना सांगायला चालू केले तर बरे होईल. हेमावैम.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 07/29/2017 - 21:48

In reply to प्रतिसाद पूर्ण का दिसत नाहीय by एमी

Permalink

you can live happily single

you can live happily single life. there are many other more interesting things to do than raising a kid' या दोन्ही गोष्टी परस्परांपासून अलग आहेत. MUTUALLY EXCLUSIVE. लग्न करणे हे आपल्याला एक समविचारी आणि भिन्न लिंगी जोडीदार असावा या आंतरिक उर्मीतून येणारी गोष्ट आहे. एकटेपण हा सर्वानाच झेपेल अशी गोष्ट नाही. कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतलेले माझे काही मित्र आहेत आणि ते आजही आनंदी आहेत. माझे दोन मित्र आणि त्यांच्या बायकांनी विचारपूर्वक मूल नको म्हणून निर्णय घेतलेला आहे आणि ते त्याबद्दल पूर्ण समाधानी आहेत. तशीच आपल्याला मूल व्हावे हि पण एक आंतरिक उर्मी आहे पण त्या दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेतच असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रानरेडा on Fri, 07/28/2017 - 18:58

In reply to इथे बरेचजण लवकर लग्न करा by एमी

Permalink

लवकर लग्न आणि घटस्फोट

लवकर लग्न आणि घटस्फोट हे बऱ्याचदा बरे ठरते .. माझ्या एका मैत्रिणीचे आणि तीन मित्रांचे दुसरे संसार आंदण सुरु आहेत . तसेच विदेशतीतील ऐक मैत्रीण ( भारतामधून मुंबई मधीं गेलेली) लागोपाठच्या दोन वाईट अनुभवातून बाहेर येऊन आता तिसरयांदा ऐका गोऱ्या माणसाबरोबर गेल्या ६-७ वर्षात लिव्ह इन मध्ये राहत आहे . तिशीनंतर लग्न झाले कि आवडी निवडी निबर झालेल्या असतात पण अनेकदा नकोस निर्णय घेता येत नाही. आणि आयुष्य नकोशा व्यक्ती बरोबर काढावे लागते ..
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Sat, 07/29/2017 - 10:33

In reply to लवकर लग्न आणि घटस्फोट by रानरेडा

Permalink

लवकर घटस्फोट हे बऱ्याचदा बरे

लवकर घटस्फोट हे बऱ्याचदा बरे ठरते. >> याला सहमती. मी दिलेल्या पहिल्या दोन मुलींनी अगदी योग्य केलं. बाकी परतपरत लग्न करणाऱ्यांच्या पेशन्स आणि positive attitudeला सलाम _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by टर्बोचार्जड फिलॉसॉफर on Fri, 07/28/2017 - 11:30

Permalink

इतर समाजात हे प्रश्न नाहीत

इतर समाजात हे प्रश्न नाहीत असे नाही पण ब्राह्मण समाजात तीव्र आहेत. माझ्या एका ब्राह्मण मित्राच्या घरी हाच विषय निघाला ,मित्राची आई सांगत होती की मुलींच्या अपेक्षा खूप आहेत,म्हणून लग्न जमत नाही आहे वगैरे.मी सहज आंतरजातीय विवाहाचा विषय काढल्यावर," अरे खालच्या जातीत,तुमच्याकडे हे चालत असेल पण आमच्याकडे सरमिसत चालत नाही वगैरे मलाच सुनावले.असे विचार असतील तर कसे जमायचे ब्राह्मण मुलांचे,!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/28/2017 - 12:22

In reply to इतर समाजात हे प्रश्न नाहीत by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

Permalink

खालच्या जातीत,तुमच्याकडे हे

खालच्या जातीत,तुमच्याकडे हे चालत असेल तथाकथीत (तुम्हीच लिहिले आहे म्हणून) खालच्या जातीत आंतरजातीय विवाह किती होतात हो? प्रत्येकाला आपल्या जातीचा "दुराभिमान" फार आहे हि वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रानरेडा on Fri, 07/28/2017 - 19:36

In reply to खालच्या जातीत,तुमच्याकडे हे by सुबोध खरे

Permalink

आंतरजातीय विवाह

माझे एक निरीक्षक आहे कि मुंबई ठाणे रायगड मध्ये असलेल्या बऱ्याच जातीमध्ये मिश्रा विवाह होता किंवा ते प्रेमविवाह असतील तर घरात फारसा विरोध होत नाही ..या जाती म्हणजे कुणबी . भंडारी ,पाचकळशी , कासार , आगरी , कोळी इत्यादी . मी २००३-४ मध्ये शादी , मराठीमट्रिमोनी आणि इतर साईट वरून मुलगी शोधून आंतरजातीय विवाह केला होता आणि अनुभव ठीक ठाक होता .म्हणजे प्रतिसाद बराच चांगला मिळाला होता , म्हणजे त्या काळात तरी आसा विचार करणारे बर्यपैली लोक होते .
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/28/2017 - 11:58

Permalink

आश्चर्य हे आहे की सगळीकडे

आश्चर्य हे आहे की सगळीकडे मुलीच्या अशा अटी आहेत, त्यांना इतका पगार हवा आहे वगैरे कारणे सांगून मुलगेच का फक्त रडत आहेत. मुलगा म्हणून तुमच्या स्वतःच्या काही आर्थिक अटी नाहीत का. माझे लग्न झाले ३ वर्षांपूर्वी तेंव्हा मुलीला अमुक इतका पगार हवाच अशी माझी स्वतःची पण अट होती कारण घराचे डाउन पेमेंट, लोन काढणे वगैरे उपद्व्याप मी एकट्यानेच केले होते. त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने इएमायची दमडी सुद्धा न देता माझ्याबरोबर फुकट राहावे हे मला मान्यच नव्हते. ही अट आठवली की आजही बायको टिंगल करते तो भाग वेगळा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 07/28/2017 - 12:11

In reply to आश्चर्य हे आहे की सगळीकडे by अप्पा जोगळेकर

Permalink

आप्पा काय हे?

आप्पा काय हे? खरंच अशी अट घालून लग्न केलात की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Fri, 07/28/2017 - 13:15

In reply to आप्पा काय हे? by अभ्या..

Permalink

असेच असते साहेब. 'आम्ही काहीच

असेच असते साहेब. 'आम्ही काहीच मागितले नाही, मुलीकडच्यांनी दिले' म्हणून हुंडा घेणारे मिरवतात. फटकळ पणे कन्स्ट्रेण्ट सांगणार्‍यांना 'काय हे ? अशी अट' म्हणतात. :) चालायचच.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 07/28/2017 - 14:46

In reply to असेच असते साहेब. 'आम्ही काहीच by अप्पा जोगळेकर

Permalink

रिझनेबल

रिझनेबल
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Fri, 07/28/2017 - 12:23

In reply to आश्चर्य हे आहे की सगळीकडे by अप्पा जोगळेकर

Permalink

त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने

त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने इएमायची दमडी सुद्धा न देता माझ्याबरोबर फुकट राहावे हे मला मान्यच नव्हते. >> अगदी योग्य अप्रोच आहे. आयुष्यभर बापाच्या नवऱ्याच्या मुलाच्या जीवावर उच्च/मध्यमवर्गीय आयुष्य जगणाऱ्या आणि 'भाकर्या बडवण्याला' प्रतिष्ठा मागत फिरणाऱ्या बायका डोक्यात जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 07/28/2017 - 12:26

In reply to त्यामुळे लग्न झालेल्या मुलीने by एमी

Permalink

अर्रर्रर्र

अर्रर्रर्र ऍमी ताई तुम्ही त्या "होममेकर" वगैरे( आजकाल हाऊस वाइफ म्हटलं तर अंगावर येतात) बायकांची लाजच काढताय हो.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com