मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाहुबली २ - The Conclusion

समीर_happy go lucky · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दक्षिण भारतीय चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा ते निर्विवादपणे नायक प्रधानच असतात. नायक प्रधान अन कहाणी असूनही कहाणीत नायकाच्या चारित्र्याला वेगळ्या उंचीवर सामान्यांच्या आवाक्याबाहेर पोचवणारे. अमोल पालकरांच्या छोटी सी बात सारखे हलके फुलके करमणूक प्रधान चित्रपट दक्षिण भारतात बनतात कि नाही दे जाणे. अर्थात "देव जाणे" कारण भाषा सीमा. तर हा भाग बाजूला ठेवू पण बाहुबली २ म्हणजे भारतीय किंबहुना दक्षिण भारतीय सिनेमा हा खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर पोचला असेच म्हणावे लागेल. एखादा हॉलिवूडचा सिनेमा ज्या शिताफीने कम्प्युटर ग्राफिक्सचा उपयोग करून सजलेला असतो, त्याला टक्कर देणारी कम्प्युटर ग्राफिक्सची करामत बाहुबली २ मध्ये आहे. जवळपास प्रत्येक फ्रेम मध्ये असणारी कम्प्युटर ग्राफिक्स ची करामत जेंव्हा तुम्हाला कोठेच ओळखू येत नाही पूर्ण वेळ, तेंव्हा निश्चितच अप्रतिम पातळीवर पोचलेला सिनेमा असे याचे वर्णन करावेच लागेल. बाहुबली २ म्हणजे बाहुबली १ च्या कथेबरोबर होणारी तुलना हे अपेक्षितच आहे. पण लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या पटकथेबरोबर ज्या शिताफीने कथेची मांडणी केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे. कारण बाहुबली २ हा कोठेही कहाणीसाठी बाहुबली १ वर अवलंबून वाटत नाही, जेथे आहे तेथे कहाणीचा संदर्भ संवादांच्या माध्यमातून बेमालूमपणे पडद्यावर उभा करण्यात आला आहे. जेणेकरून प्रेक्षकांना कोठेही "समजले नाही" असा फील येतच नाही.अडीचशे कोटींचे शब्दश: महाप्रचंड बजेट असलेल्या चित्रपटाकडून हे अपेक्षितही होतेच म्हणा.पण तरीही असं वाटण्याचं execution अप्रतिमरीत्या पडद्यावर केलेलं आहे हे नक्की. मागच्या बाहुबली १ मध्ये कटप्पा ने बाहुबलीला का मारलं याचा उल्लेख कमीत कमी या कथेत होईल असे वाटते पण नाही, कथेत/संवांदांत तो संदर्भ आहे पण तुटपुंजा आहे अगदी. प्रभास चा बाहुबली, राणा दग्गुबत्तीचा बल्लालदेव अन सत्यराजचा कटप्पा हे नायक आणि अनुष्का शेट्टीची देवसेना या सगळ्या नायक नायिकांची कामगिरी उल्लेखनीय या सदरात मोडते. तमन्नाहि आहे काही प्रसंगात पण अगदी काहीच प्रसंगात. प्रभास ने ज्या कमांड ने बाहुबली (अमरेंद्र + महेंद्र) उभा केलेला आहे त्याला खरोखर तोड नाही. बल्लालदेवचा राजा बनण्याचा हव्यास, त्यासाठी तो करत असलेले षडयंत्र, कटप्पाची बाहुबलीला असलेली साथ इत्यादी इत्यादी विषयाबरहुकूम प्रसंगात प्रत्येक जण शोभून गेलेला आहे. अनुष्का शेट्टीही मुख्य नायिका आहे पण ती शब्दश: सुंदर दिसलेली आहे पूर्ण सिनेमात. अगदी शेवटच्या काही प्रसंगात तिचे म्हातारे दिसणे आवश्यक होते. पण ती कदाचित प्रयत्न करूनही म्हातारी दिसू शकलीच नाही. प्रभास अन राणा दग्गुबत्ती हे दोघेही फिजिकली शब्दश: प्रचंड मेहनत घेत असल्याचे जाणवून देतात कैक प्रसंगात. तुलना करु नये पण आपला हिंदीतला अक्षय कुमार सोडून कोणीही करोडपती अभिनेता इतकी मेहनत घेऊ शकत नाही हे नक्की. आपली खानावळ जिम वगैरे करून "दाखवू" शकतात फिजिक पण ज्या मेहनतीची जाणीव प्रभास करवतो तसे हिंदीत कुणालाच शक्य नाही आणि मराठी तर कुठे स्पर्धेतही नाही करोडोंच्या. आपल्या मराठीला आता सैराटचीच पुण्याई शंभरएक वर्षे पुरेल आणखी.......... एस एस राजामौलीनचे दिग्दर्शन हे बाहुबली श्रुंखलेचे सगळ्यात मोठे यश. मान्य कि सगळे अभिनेते आपापल्या भूमिकांत शोभले पण अडीचशे कोटींच्या जहाजाचा कॅप्टनच कचखाऊ असता तर?? अडीचशे कोटींचा प्रोजेक्ट धुळीला मिळाला असता. पण एस एस राजामौलीचे खरोखर कौतुक. कारण त्यांनी दुसरा भाग असूनही प्रेक्षकांना कुठेही 'न समजल्याची' भावना येऊ दिली नाही. तीन तासांच्या चित्रपटांत प्रत्येक फ्रेम इंग्रजी शब्द आहे ना "लॅव्हिश" त्याप्रमाणे चित्रित केली. बाकीचे जाऊ देऊ देऊ डिटेल्स पण प्रभासची एंट्री हि खास असली पाहिजे हा एक उल्लेखनीय असा त्यांचा कटाक्ष. पहिल्या बाहुबलीत खांद्यावर शिवलिंग घेत त्याचे महत्व सांगत तर दुसऱ्या बाहुबलीत राजमातेची अग्नीला घेऊन जाण्याची कवायद सुरु असतानाची हत्तीच्या फायटिंग मधली एंट्री. मान्य कि या फायटिंगमधला बराचसा भाग हा कम्प्युटर ग्राफिक्स असावा. पण हा एंट्रीचा महत्वाचा भाग हा भरपूर मेहनत करून किंवा कम्प्युटर ग्राफिक्स असल्यास भरपूर पैसे खर्च करून चित्रित केल्यासारखा वाटतो. पहिल्या बाहुबलीत एंट्री नंतर पूर्ण चित्रपटभर प्रभास भरून राहिला होता. या त्याच्या 'भरून राहण्यात' त्याच्या एंट्रीचा महत्वाचा वाटा होता. तेच काम बाहुबली २ मध्येही त्याच्या एन्ट्रीमुळे घडते. या लहानश्या निरुपद्रवी पण अतिशय महत्वाच्या गोष्टीसाठी एस एस राजामौलीचे विशेष कौतुक. एम एम करीम चे संगीत बाहुबली २ ला लाभलेले आहे. एम एम करीम मला जिस्म मधल्या 'आवरापन बंजारापन" या गाण्यामुळे आठवतात अन आवडतात. बाहुबली २ मध्ये एकदम छप्पर फाड के अत्युत्तम संगीत नाही. पण कमीही पडत नाही कुठेच. अमरेंद्र बाहुबलीचा मुलगा महेंद्र बाहुबलीची एंट्री कथेत झालेली आहे. त्यामुळे बाहुबली ३ पुढच्या काही वर्षात पडद्यावर आल्यास आश्चर्य वाटायला नको. हॅरी पॉटर चे अनेक भाग, सगळे सारख्याच पात्रांचे पण कथेच्या नाविन्यामुळे आम्हीच भारतीय दर वेळेस डोक्यावर घ्यायचो. मग बाहुबलीची आणखीही भाग आले तर प्रेक्षकांनी स्वीकारण्यात काहीही हरकत नाही कारण टेक्निकली बाहुबली २ हा बाहुबली १ पेक्षा हाताळणीत सरस वाटला मला. म्हणजेच एस एस राजामौली अनुभवांतून शिकताहेत हे नक्की. कोणतीही खोट नसलेल्या बाहुबली २ ला मी पाच पैकी पाच (५*) देईन, बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा . -समीर

वाचने 14215 वाचनखूण प्रतिक्रिया 48

संजय क्षीरसागर 29/04/2017 - 21:38
नक्की पाहाणार आणि अर्थात, इ-स्क्वेअरला स्क्रीन ५ वर !

In reply to by संजय क्षीरसागर

सतिश गावडे 30/04/2017 - 14:48
तुम्ही इ-स्क्वेअर स्क्रीन ५ ला पाहणार हा चित्रपट? तिथे कुणीही नोकरदार जाऊ शकतो चित्रपट पाहायला. तुमच्यासारख्या व्यक्तीने खरे तर आयमॅक्स थियेटरला जायला हवे.

उपेक्षित 30/04/2017 - 12:17
कालच पाहिला, अतिशय बकवास सिनेमा आहे, काही ठिकाणाचे स्पेशल इफेक्ट्स हास्यास्पद वाटले आहेत, ओढून ताणून दुसरा भाग बनवला आहे असे वाटत होते सतत. असो ज्याची त्याची आवड. बाकी अनुष्का बाई शेट्टी अतिशय सुंदर दिसल्या आहेत डोळ्याचे पारणे फिटते तिला पाहून.

In reply to by उपेक्षित

चित्रगुप्त 30/04/2017 - 16:17
याच ना त्या? . अनुष्का बाई शेट्टी अतिशय सुंदर दिसल्या आहेत डोळ्याचे पारणे फिटते तिला पाहून. चला, मग तेवढ्यासाठी बघायला हरकत नाही.

In reply to by उपेक्षित

अभ्या.. 30/04/2017 - 17:48
काय कमाल आहे ह्या बाईची. एकही हिंदी चित्रपट न करताही मिपाच्या सुरुवातीपासून हि बया फेवरीट आहे. तात्याच्या स्पेशल "हि आमची अनुष्का, हिच्यावर आमचा फार जीव" वाल्या कोनाड्यापासून ते चित्रगुप्ताच्या चित्रखजिन्यापर्यंत अनुष्काच अनुष्का.

In reply to by चित्रगुप्त

अगम्य 03/05/2017 - 01:58
तेवढ्या एका कारणासाठी बघायलाही हरकत नाही. अनुष्का कमालीची सुंदर दिसली आहे आणि अभिनय सुद्धा खूप चांगला केला आहे. राजसभेतल्या प्रसंगात तिला पाहून द्यूतसभेतल्या तेजस्विनी द्रौपदीची आठवण झाली.
बकवास मुद्दे १-अनेक सीन मध्ये स्पष्ट कळते की हा सीन नकली आहे इफेक्ट ग्राफीक क्रुत्रीमते ला लपवण्यात अपयशी उदा प्राणी वर्ग २-काही आधुनिक २१ व्या शतकातले तुकडे फॅन्टसीत डुंबु देत नाही उदा एका सीन मध्ये हीरो चक्क टी शर्टात आहे ३- अनुष्का बहुधा वशिल्यातुन भरती असावी. अती साधारण लो बजेट , सुरुवातीच्या दुरदर्शन कालीन, मराठी सिरीयलातील, उप अभिनेत्री ही किमान काही रोमांचक नाजुक भाव निर्माण. करते असो आपली आपली आवड ४-कथानक बालीश, चांदोबा,चंद्रकांता संतती,रामायण याचे मिश्रण करुन एकता कपुरीश तडका मारुन बनवलेय. अजुन बरेच काही जमल्ास लिहीतो

समीर_happy go lucky 30/04/2017 - 23:48
सर्वांत आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. बाहुबलीचा सेट, काही स्पेशल इफेक्टस, स्टारकास्ट आणि मार्केटिंग जबरदस्त आहे. त्याबद्दल त्याचं कौतुक आहे. एक प्रादेशिक सिनेमा जागतिक स्तरावर चर्चिला जातो यात कौतुक आहेच. पण सिनेमात अनेक 'Physics just died ' दृश्य आहेत. अनेक तर्क-विसंगत गोष्टी आहेत. ['GOT चालतं ना मग हे का नको' हा वाद या ठिकाणी घालू नये.. माझ्यामते GOT मध्ये सुद्धा अनेक पुरातन कथांचे संदर्भ सापडतात. असो...] मी कथानकाबद्दल लिहीत आहे जे कमकुवत आहे, किंबहुना अनेक गोष्टींची सरमिसळ आहे. त्यातही महाभारत हा मुख्य स्रोत आहे. बिज्जलदेवच्या शारीरिक व्यंगामुळे त्याचा राज्याभिषेक न होता त्याच्या धाकट्या भावाचा, विक्रमदेवचा राज्याभिषेक होणं - धृतराष्ट्र आणि पंडू. धृतराष्ट्राचा आंधळेपणामुळे तो राजा न होता पंडू राजा होणं.. दोन भावांची सिंहासनासाठी भांडणं, एक भाऊ समाजप्रिय आणि दुसरा सत्ताप्रिय - पांडव आणि कौरव(अनुक्रमे).. नदीच्या पाण्यातून बाळ वाहत येणं - कर्ण. कुमारी माता कुंतीने लोकलाजेस्तव बाळाला पाण्यात सोडून देणं.. वाहत आलेल्या बाळाचा सांभाळ एका वनवासी (क्षत्रिय कुळापेक्षा कनिष्ठ मानल्या गेलेल्या) जमातीने करणं - पुन्हा एकदा कर्ण. अधिरथ आणि राधा माता या सारथी कुलोत्पन्न दाम्पत्याकडून कर्णाचा सांभाळ होणं.. बाहुबलीच्या अनेक पराक्रमांमुळे पंचक्रोशीमध्ये त्याचा दबदबा निर्माण होणं - पुन्हा एकदा कर्णच. शिवगामी पूजा करत असताना अमरेंद्र बाहुबलीने विंचू चावलेला असतानाही हसतमुख असणं - पुन्हा एकदा कर्णच. महेंद्र पर्वतावर परशुरामांकडून ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी गेलेला असताना गुरुची झोप मोडू नये म्हणून कर्णदेखील विंचू चावूनही गप्प राहतो. [तिथेच परशुरामांना खरं काय ते कळतं, असो.. तो आत्ताचा विषय नाही..] भल्लालदेवने देवसेनला डांबून ठेवणं - रावणाने सीतेला अशोकवनात बंदी बनवणं.. भल्लादेवला उत्तोमोत्तम सैन्य मिळणं आणि तरीही अमरेंद्र बाहुबलीचा विजय होणं - कौरवांना श्रीकृष्णाची प्रचंड मोठी आणि कुशल सेना मिळणं तरीही पांडवांचा विजय होणं... देवसेनेला सोडवायला आलेल्या बाहुबलीने माहिष्मतीमध्ये आग पेटवणं - सीतेची खुशाली विचारायला आलेल्या हनुमानाने अशोकवन जाळून टाकणं... कालकेय - पुराणकाळात वर्णन केलेले असुर. असुरांनी देवांना स्वर्गप्राप्तीसाठी त्रास देणं हे अनेक वेळा झालंय.. कटप्पाने बाहुबलीची खरी ओळख पटल्यावर त्याचा पाय आपल्या मस्तकी लावणं - बळीराजा आणि वामन अवतार. बळीराजाला जेव्हा वामन हा विष्णूअवतार आहे हे कळतं [तीन पावलं जमीन हवी ती गोष्ट] तेव्हा तो स्वतः नतमस्तक होतो आणि वामनाचा पाय आपल्या मस्तकी घेतो... कटप्पा - पितामह भीष्म. राज्याप्रती आपली निष्ठा वाहिली असल्याने राजा चुकतोय हे कळूनही असहाय्य होणं.. देवसेना - 'मेरा बेटा मुझे लेने आयेगा.' राखी.. 'मेरे करन-अर्जुन आयेंगे.. मेरे बेटे आयेंगे...' भल्लालदेव - दुर्योधन. सत्तेसाठी भावाचा काटा मोडण्यासाठी तयार असणं. (तो सैनिक जो कालकेयला राज्याची गुप्त माहिती पोहोचतो, त्याला पकडतानाचं दृश्य) कालकेयच्या टोळीची अगम्य भाषा. GOT मधली डोथ्राकी भाषा सध्यातरी एवढं आठवलं. माझा त्या सिनेमावर राग नाहीये. फक्त तो सिनेमा ओव्हररेटेड आहे असं म्हणणं आहे... कसंय, महर्षी व्यासांनी एवढं कैच्या कै कल्पना करून लिहिलं आहे ना, नवीन येणाऱ्या अनेक history fictional stories कुठे ना कुठे तरी महाभारताशी जोडल्या जातात. यात लेखकांचा नाईलाज आहे. ते तरी काय करणार बिचारे... ------------------------------------- कमतरता बाहुबलीच्या सौजन्य तन्मया पंचपोर-वझे

सिरुसेरि 01/05/2017 - 19:04
"चंद्रा चंद्रमुखी सलाम आलेकुम सुमुखी " हे अनुष्का शेट्टीवर चित्रीत झालेले सुपर गाणे प्रसिद्ध आहे .

राघवेंद्र 01/05/2017 - 19:15
बैलांच्या शिंगाना मशाली लाऊन, शत्रूचे लक्ष दुसरीकडे करणे ही महाराजांची युक्ती या सिनेमा मोठ्या कल्पकतेने वापरली आहे. तसेच त्याला पोच 'जय भवानी' ची घोषणा करून दिली आहे त्यामुळे सिनेमा आवडुन गेला. सिनेमा ची सुरुवात आणि शेवट माहिती असूनसुद्धा अडीच तास मस्त करमणूक होते.

In reply to by राघवेंद्र

पिलीयन रायडर 01/05/2017 - 19:47
"जय भवानी"शी सहमत! आम्ही पण लगेच आमच्यासोबत आलेल्या दिल्लीवाल्याला "ही आमच्या महाराजांची आयडीया आहे" असं सांगुन टाकलं. सोडतो की काय! ३ तास अगदी पुरे झाली करमणुक म्हणेस्तोवर सिनेमा चालतो. एकदा डोकं बाजुला काढुन हा एका भारतीय सुपरहिरोचा पिक्चर आहे असं ठरवलं की मज्जा येते बघायला. कथानक वगैरे काही फार दमदार नाहीये. फार ट्विस्ट सुद्धा नाहीत. पण जे काही आहे ते तेवढ्यापुरतं मनोरंजक आहे. चुकाही असतीलच चित्रपटात. पण ठिके. मला तर आवडला बाहुबली.

अभिजीत अवलिया 01/05/2017 - 20:02
असले अतर्क्य चित्रपट मला झेपत नाहीत. कंपनीतल्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी बाहुबलीला जायचा प्लॅन केला. तेव्हा मी बाहुबली-१ सुद्धा पाहिलेला नाही हे समजताच माझ्याकडे पाल/झुरळ/जगातला सगळ्यात मोठा मूर्ख असल्यासारखे कुत्सितपणे बघितले गेले. :)

पिलीयन रायडर 01/05/2017 - 20:33
बरं एक महत्वाचं राहुनच गेलं. प्रभास सोबतच भल्लालदेवचे काम करणार्‍या राणाचे कामही अप्रतिम झाले आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याला एका डोळ्याने दिसतच नाही. ज्या डोळ्याने दिसते तो सुद्धा नेत्रदानाद्वारे मिळालेला आहे. हे कळाल्यावर तर त्या माणसाबद्दल प्रचंड आदर वाटला. इथे त्याची मुलाखत मिळेल - http://www.rajnikantvscidjokes.in/baahubali-star-rana-daggubati-blind-one-eye-never-made-anyone-feel-respect/

In reply to by पिलीयन रायडर

अभ्या.. 01/05/2017 - 21:53
इतकेच नाही, बॉलीवुड ला कशी कपूर मुखर्जी फ्यामिलिज आहेत तशी तेलुगु सिनेफ्यामिलि दगुबाती चा तो वारस आहे (डी रामानायडू म्हणजे दागुबाती रामानायडू) वेंकटेश नागार्जुन वगैरे सारे नातेवाईक आहेत त्याचे. रक्तातच चित्रपट असलेला आहे तो. त्याला स्वतःला व्हिएफेक्स कोऑर्डिनेट साठी अवार्ड्स आहेत. तो व्हिएफेक्स मुळेच बाहुबलित जास्त एक्टीव्ह आहे. शिवाय तेलुगु इंडस्त्रित त्या दागुबाती फयामिलिशिवाय काही करता येत नाही. प्रभास तसा सेल्फ मेड आहे.

विशुमित 01/05/2017 - 21:47
एक प्रश्न: मिपाकरांपैकी किती जणांनी चेपुवर बाहुबली २ बघतोय म्हणून स्थिती टंकली आहे ?

amit१२३ 03/05/2017 - 13:25
बाहुबली म्हणजे भारतीय सिनेसृष्ठीसाठी व्ही एफ एक्स च्या दुनियेतील मैलाचा दगड आहे. कल्पनेपलीकडील विश्व् साकारण्याचे काम या चित्रपटात झाले आहे त्यामुळे कदाचित नवीन डायरेक्टर सुद्धा असा विचार सुरु करतील. आता काही ठिकाणी जाणवून येत कि हे व्ही एफ एक्स आहे ते पण इट्स ओके..सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. चित्रपटाला साजेशी भव्य दिव्यता पडद्यावर दाखवण्यासाठी मेहनत आणि पैसा भरपूर लागतो आणि ते सक्सेस करण्याचं काम राजामौली यांनी पार पाडले आहे. मला वाटते हि तर फक्त सुरुवात आहे ...आधी मगधीरा , ईगा आणि आता बाहुबली ..भारतामध्ये पण क्रिस्तोफर नोलान बनतोय..विजयेंद्र प्रसाद आणि राजामौली यांची जोडी

In reply to by उपेक्षित

अभ्या.. 03/05/2017 - 17:58
अ‍ॅक्चुअली तो पुनर्जन्माचा फंडा काढला तर बाहुबलीची पायाभरणी सारी मगधीरातच झालेली. मगधीरातले उदयगढ हे जवळपास माहीष्मतीच आहे. मुख्य टीम तीच अ‍ॅज ईट इज आहे. कास्ट चूज करायची मेथड पण. प्रभासची रेबेलस्टार म्हणून इमेज आहे आंध्रात. ती बाहुबलीशी जुळती असल्याने त्याची निवड झाली. त्यानेही ३ ४ वर्षे फक्त ह्याच सिरिजवर काम केले. स्वतःचा फॅण क्लब जबरस्त कामाला लावलेला त्याने. अगदी सोलापुरापर्यंत पैसे येत होते. मार्केटिंगचे सगळे फंडे वापरले गेले. मगधीरातला शेरखान्/सॉलोमन भुमिका करणारा श्रीहरीचे निधन झाले नाहीतर कट्टप्पाचा रोल त्याचाच होता.

In reply to by अभ्या..

"नुवस्तानंदे नेंदोत्ताना" ( सोलापुरमधे एका टॉकिजला या फिल्मची डब्ड आवृती " तुम अगर आना चाहती हो तो मैं ना कैसे कहु " या नावाने तेव्हा प्रदर्शीत झाली असल्याचे आठवते .) मधला दांडगोबा भाउ श्रीहरीने मस्त साकारला होता .

In reply to by सिरुसेरि

अभ्या.. 04/05/2017 - 19:31
२००५ साली आलेला 'नुवु वस्तानंटे नेनुवदंटाना' (तू येतेस तर मी नाही का म्हणू) हा सिध्दार्थचा पिक्चर प्रभुदेवाचा अ‍ॅज अ डायरेक्टर पैला पिक्चर. प्रभुदेवानेच त्याचा रिमेक २०१३ ला श्रुती हसन ला घेऊन 'रमय्या वस्तावैय्या' नावाने काढला.

In reply to by उपेक्षित

मगधीरा - जॅकी चेनच्या "द मिथ" वरुन जसाच्या तसा ढापलाय राजमौलीचे स्किल हे की ती स्टोरी भारतीय साच्यात कन्व्हर्ट केली. दोन्ही चित्रपट परत बघा. मग लक्षात येईल की थेट कॉपी पेस्ट आहे :D

सुमीत भातखंडे 03/05/2017 - 23:14
आजच बघितला. जबरदस्त पिक्चर आहे. पहिल्यापेक्षा दुसरा भाग जास्त आवडला.

In reply to by सुमीत भातखंडे

किसन शिंदे 03/05/2017 - 23:18
पहिला कैक पटीने सरस आहे दुसऱ्या भागापेक्षा.

रुपी 03/05/2017 - 23:33
मीही नक्की बघणार. पहिला भाग पाहिला नव्हता, म्हणून यूट्युबवर पाहून घेतला. फार जबरदस्त होता. थिएअटरमध्ये तर नक्कीच भारी वाटणार. इथे रिलीज झाला तेव्हा त्याचे ३० डॉलर्स तिकीटदर होते!

सच्चिदानंद 04/05/2017 - 22:25
ते 'Physics just died' आणि लॉजिक या सारखे मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी पहिला भाग कथा म्हणून जरा तरी जागेवर होता. धबधबा चढून जाण्याचा सीन तर कलात्मकदृष्ट्यादेखील अप्रतीम जमला होता. भव्यता अशी थक्क करत जाते पहिल्या भागात आणि शेवटी युद्धप्रसंग तर कळस होता. कंटेट म्हणून पहिल्या भागाला जे साधता आलं ते दुसर्‍यामध्ये मिस होत गेलं असं राहून राहून वाटत राहिलं. एक अनुष्काचा वावर सोडला तर इतर गोष्टी लेच्यापेच्या झाल्या दुसर्‍या भागात. पहिल्या भागातल्या कटप्पा/शिवगामीच्या भक्कम अशा प्रतिमा या भागात खूपच डळमळीत केल्यात. तमन्ना आणि बंडखोरांना काही काम नाही. इतर काही पात्र या भागात बिल्ड होताना दिसत नाहीत आणि ते पण एक खूप मोठं कारण असेल कथा ठिसूळ वाटण्याचं या भागात.

तेजस आठवले 05/05/2017 - 14:54
मला तर आवडला बुआ. बाकी मॅट्रिक्स रेवोल्युएशन मधले मारामारीचे दृश्य असेल किंवा हॅरी पॉटर सारखी बिनडोक चित्रपटांची मालिका असेल, त्यापेक्षा हा फारच सरस आहे. १९९७ सालाचा जुरासिक पार्क हा चित्रपट ज्यांनी थेटरात पहिला असेल आणि २०१५ ला आलेला जुरासिक वर्ल्ड पहिला असेल त्यांना जुरासिक वर्ल्ड हा किती फालतू आहे हे समजले असेल.मी तर तो अमेरिकेत १२ $ देऊन पहिला होता आणि वेड्यासारखा हसत होतो :) असो. थेटरात भव्य स्क्रीन पाहण्याची जी काही मजा आहे बस...

दशानन 10/05/2017 - 14:58
बाहुबली-2 पाहिला, आवडला नाही आवडला यात आहे, पहिल्या अर्धातासात न जाणे का पुढील पूर्ण कथा समजली व चक्क झोप आली. आणि शेवटच्या अर्धातासात आपला अंदाज खरा ठरला हे पाहून आसुरी आंनद मात्र वाटला नाही. (रामायण महाभारत ज्यांना पाठ असेल त्यांना समजेल मी काय म्हणतोय ते ;) )
स्पेशल इफेक्ट्स... कलाकारांची मेहनत... हे सगळे मुद्दे गौण ठरतात जर चित्रपट अपेक्षा पूर्ण करु शकला नाही तर. बाहुबली १ हा सुरुवातीपासून ते शेवटचा सस्पेन्स निर्माण करेपर्यंत खिळवून ठेवतो. प्रेक्षकांचे लक्ष खेचू शकत नाही तो चित्रपट धंदा जरी करण्यात बाजी मारत असला तरी इपिक मुव्ही नाही ठरु शकत. आणि बाहुबलीची होणारी सगळी कमाई ही पहिल्या भागाने निर्माण केलेल्या सस्पेन्स च्या पुण्याईवर आहे. नकारात्मक बाजू उदाहरणार्थः १. अमरेन्द्र बाहुबलीची एन्ट्री : हत्ती जेव्हा शिवगामीदेवीच्या अंगावर चालून येत होता तेव्हा तो बंद दरवाज्यामागे एवढे कोणते महत्त्वाचे काम करत होता? की जेणे करुन तो दरवाजा फोडून रथ ओढत आणावा लागला? की वाट बघत होता कधी डायरेक्टर दरवाजा तोड ची ऑर्डर देतो? धमाकेदार एन्ट्री दाखवण्याच्या नादात कथानक हास्यास्पद होऊन जाते अशा प्रसंगात. २. जेव्हा पिंढारी रात्री आक्रमण करतात तेव्हा त्याची चाहूल फक्त बाहुबलीला लागते तेही महालात झोपलेला असताना. कोणत्याही राज्याचे १००% सैन्य कधीही निद्रेत नसते. आणि ते येणारे संकट कित्येक तास आधी माहिती करुन घेतात व त्या प्रथेप्रमाणे राजपरिवाराला कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी हलवले जाते. एकीकडे अनुष्का सारखी तेज तर्रार राजकुमारी दाखवतात आणि दुसरीकडे असला भंपकपणा. ३. मागच्या भागात पडद्यांना तेल लावून शत्रू सैन्य जाळायच्या अफाट कल्पनेची दुसर्या भागात बरोबरी करण्याच्या नादात काहीही फालतू सीन दाखवलाय. बाहुबली एक वेळ नारळाच्या झाडाची स्प्रिंग बनवून जाऊ शकतो हे एक वेळ त्याच्या अफाट ताकदीला गृहीत धरुन मान्य करु शकता येईल. पण तुटपुंजे आणि नवशिके सैनिकही ढालीचा वापर करुन उडत जातात आणि लॅन्ड केल्यावर (खरे तर आपटल्यावर) त्यांना कोणतीही इजा न होता ते सैनिक थेट युद्धाला सुरुवात करतात. मग जादूच दाखवायची ना. वास्तव लढाई दाखवण्याचा आभास कशाला करायचा? ४. बाहुबली-१ ची जवळपास सगळी गाणी लक्षात राहण्यासारखी होती. बाहुबली-२ चे नंदलाला कन्हैय्या सोडले तर कुठलेच गाणे लक्षात नाही रहात. बजेट जास्त असुनही संगीताचा देखील दर्जा तेवढा उंचावला नाही. एकंदरीत ग्राफिक्स आणि प्रभास (अमरेन्द्र बाहुबली रोल मधील) व कट्ट्पा यांच्या काही प्रसंगांना सोडले तर इतर चित्रपट प्रेक्षकांना खिळवू शकत नाही. डोके गहाण ठेवून बघितला तरी बाहुबली-१ च्या तुलनेत बाहुबली-२ एवढा कॅची वाटला नाही.