मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पत्र व्यवहार ... एक दुर्मिळ होत चाललेलं काम , कौशल्य ...काय म्हणाल ?

१००मित्र · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आजच सकाळी (रविवार) जुन्या गोष्टी हाताळत असताना एक जुनं पोष्ट-कार्ड (हो हो पो”ष्ट” च) हाती लागलं. फार जुनं नाही , १० एक वर्षांपूर्वीचं. पण “दुर्मिळ” वाटावं इतकी ही पत्र लिहिण्याची-पाठविण्याची सवय पार भूतकाळात गेल्यासारखी वाटतीये आता. ह्या पत्रामुळे अनेक गोष्टींची विचार शृंखला जागृत झाली, शिवाय रविवार असल्याने विचारांना पसरायालाही मी भरपूर वावही दिला. आता खरं म्हणजे इतरही वार मला असा वेळ नक्कीच देवू शकतात बरंका. पण “रविवार” डोस्क्यात बसलाय , तो त्याचं एक विशिष्ट स्थान घेवून. नोकरशाहीचा परिणाम , की “८ तास आठवडाभर वर्किंग व एक दिवस विश्रांती” ह्या कामाच्या व्यवस्थेमुळे हे असं झालंय, देवास ठाऊक. पण मुद्दा तो नाही. मुद्दा पत्र व्यवहारांचा आहे. http://phirasta.com/wp-content/uploads/20170312_094940-e1489296210930.jpg ही अशी पत्र लोकं लिहीत असत , आणि असा लोकांमध्ये बांध बांधला जात असे. आता संवाद साधताना लिहिण्याचाच मुळात प्रश्न उरलेला नाही , तर मग अशा बिचाऱ्या संगणक-अशिक्षित (साध्या मऱ्हाटी भाषेत Computer not savvy हो) मंडळींनी कुठे जायचं ? परवाच माझ्या कार्यालयातील एका सहकारीण भगिनीला ( जी अशी Computer savvy वगैरे आहे) एक पोस्ट कार्ड टाकायला दिलं , तर तिला आयुष्यात प्रथमच अशा गोष्टीचा म्हणे शोध लागला. बरोबरच आहे ना , कारण जेव्हा पासून तिनं होश वगैरे सावरला, म्हणजे तिला कळू वगैरे लागलं तेव्हापासून ती फक्त इमेल्स पाहतीये. अशी पत्र बित्र म्हणजे फक्त “जा-जा” गाण्याकारेता , अशी तिची ठाम समजूत होती तोपर्यंत. तरी बरं ; आम्ही काही वस्तू “Speed Post” ह्या मार्गाने पाठवितो म्हणून पोस्ट ऑफिस तरी ठाऊक झालाय ! पत्र-मैत्र माझी पत्नी, स्वाती हिला प्रचंड पत्र येत. येत म्हणजे.... ती अजूनही आहे, पत्र मात्र येत नाहीत. ती तिच्या सर्व मैत्रीणीत ह्याकरिता अगदी प्रसिद्ध होती. आमचं लग्न झाल्यावर मी अगदी चकित होवून जायचो. पोस्टमन रोज आमच्याकडे एक तरी पत्र टाकायचाच. स्वाती सुद्धा अत्यंत आत्म-मग्न होऊन तिच्या मित्र मैत्रिणींशी पत्र-संवाद साधायची. ती मूळ पोफळीची. तिने एकदा एका दिवसात २३ पत्र लिहिली होती, आणि एकदा तिला तब्बल १४ पत्र आली होती. तिचं काही जणींशी असं पत्र-मैत्र जरा खासच असायचं. तिची अनु नावाची एक खास मैत्रीण आहे. काश्मीर ट्रीप ला गेलेली असताना, ती रोज एक पत्र तिला पाठवित असे म्हणे. अशीच पत्र आमच्याकडे एक श्री.नानल नावाचे एक सद्गृहस्थ पाठवित असत. ह्यांचा आमचा काहीच संबंध नव्हता, कधी भेटलोही नाही त्यांना, परंतु ही व्यक्ती मात्र मला, माझ्या बहिणी वगैरेंना हमखास पत्रे पाठवीत असे. हे प्रसंग साधारणपणे परीक्षांची तयारी , त्यातील यश वगैरे ह्या संबंधी असायची. विशेष म्हणजे ही पत्र बऱ्यापैकी कलरफुल असायची. वेगवेगळ्या परीच्छेदांना ते वेगवेगळ्या रंगांच्या लेखण्यांनी रंगवायचे. खूपच छान पत्र असायची ती. हेही एक पत्र-मैत्रच. मी कोणताही अधिकृत-म्हणजे कार्यालयीन पत्र व्यवहार करताना त्याच्या साधारणत: ३ प्रती करायचो. पहिले त्या पार्टीला , दुसरी “जनरल” व तिसरी “मास्टर” फाईल ला जोडत असे. परिणाम असा व्हायचा की कोणताही कागदाचा कपटा सापडायचाच. सर्व्हर,कनेक्शन भानगड नव्हती. त्या यंत्रणेतले फायदे-तोटे हा विषयच इथे नाही, फक्त नोंदवतोय-झालं. बाहेर गावी गेलो, कि तिथून पत्र पाठवायचं, पुन्हा. माझा एक मित्र – श्री सुनील पवार हा त्याच्या बरोबरच्या मेडिकल प्रतिनिधींना (MR) प्रत्येक दिवशी त्या त्या ठिकाणाहून एक पत्र धाडायला सांगत असे. आपोआप “लोकेशन” ट्रेस व्हायचं. जीपीएस नसून सुद्धा. मग हळू हळू कुरियर, fax , मग कालांतराने इमेल , आता एसेमेस , whatsapp इ. येत गेलं. तातडीचा संवाद किंवा निरोप हा “तार” करून दिला जायचा. मला आठवतंय , अनेक साखर कारखान्यांच्या “मिटींग्ज” ची मला तारच येत असे. तार म्हणजे समथिंग अर्जंट – असा एक अलिखित समज होता. ही “तार” आली कि कोण धावपळ. तरी मी ह्या “तारे”च्या जमान्यातला नाही तितका. नुकतीच तार व्यवस्था हद्दपार झाली. पूर्वी Post and Telegraph ( p & t) हा एक खास विभाग होता. माझे आजोबा त्याच खात्यातून निवृत्त झाले; मुलुंड ला p & t कॉलनी सुद्धा होती, अजूनही असेल कदाचित. इमेल्स व कचरा सध्या हेच आपण सगळे इमेल्स करत असतो, राहतो. इमेल्स वगैरेचं महत्त्व , ते कसं अविभाज्य आहे, डिजिटल लिटरसी कशी महत्त्वाची आहे, हे मी सतत ऐकतच असतो; त्याबद्दल दुमत नाहीच , पण काळाच्या ओघात एखादं लुप्त होत चाललेलं नित्यकर्म - ह्याची ओळख-आठवण व्हावी इतकाच ह्या स्वैर लेखनाचा हेतू. एखादाच माझा गणेश गायकवाड सारखा मित्र मला कधीतरी पत्र लिहून पोष्टात टाकायला सांगतो, किंवा एखाद्या “मागास” भागात राहणारा माझा कुणीतरी सख्या हरी – जेव्हा त्याला इमेल पोचतच नाही , तेव्हाच फक्त मी पोस्ट ऑफिस चं तोंड पाहतो ! नाहीतर आहेच इनबॉक्स, स्पॅम , अर्थात ... कचरा. जय मार्केटिंग युग !

वाचने 11725 वाचनखूण प्रतिक्रिया 34

डॉ सुहास म्हात्रे 12/03/2017 - 12:04
कालमानाप्रमाणे येणार्‍या नवनवीन तंत्रज्ञानामुळे जसा वाहतूकीचा "पायी चालणे --> घोडा/बैलगाडी --> सायकल --> बाईक/चारचाकी/बस --> रेल्वे --> विमान" असा विकास झाला तसाच हा "प्रत्यक्ष बोलणे --> पोस्ट --> स्थिर फोन/तार/फॅक्स --> --> मोबाईल/इमेल/व्हॉट्सॅप/इ" असा मानवी संवादाचा विकास होणारच... त्याला कोणी रोखू शकत नाही, त्याप्रमाणे आपल्याला बदलणे भाग आहे ! मुख्य म्हणजे, या नवीन संवादाच्या सोईंमुळे, पूर्वी कधेमधे, वर्ष दोन वर्षांनी, संवाद साधणार्‍या लोकांना, एकमेकांपासून दूर जगाच्या दुसर्‍या टोकाला राहत असले तरी, सद्य कालात (ऑनलाईन, आत्ताच्या वेळेत, पत्राप्रमाणे अनेक दिवसांनी नव्हे), कोणत्याही जागेवरून, कोणत्याही वेळी आणि आपल्या हातातील फोनवरून (हँगआउट्स, स्काईप, इ वापरून) व्हिडिओसह संवाद साधता येतो. अर्थात हे दुधारी शस्त्र आहे आणि अतीउत्साही लोक याचा उपयोग करून (वात येईल इतके संदेश पाठवून) भंडावून सोडू शकतात. पण जराशी हुशारी दाखवून, अ‍ॅप्समधील असे संदेश गाळण्याची सोय वापरून, त्यांचा त्रास कमी करता येतो. तेवढे जमले न जमले तरीही, ऐन वेळेस तातडीने संपर्क साधण्याची निकड निर्माण झाल्यास, जुन्या पत्र किंवा अगदी तार या संदेशप्रणाली नवीन प्रणालींच्या पासंगालाही पुरणार नाहीत, हे नक्की. बाकी, जुन्या नष्ट होत चाललेल्या गोष्टींची माणसाला उगाचच अगम्य ओढ (नोस्टाल्जिया) वाटतेच, ती व्यक्त करण्यात काहीच वाईट नाही. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१००मित्र 12/03/2017 - 14:31
बाकी, जुन्या नष्ट होत चाललेल्या गोष्टींची माणसाला उगाचच अगम्य ओढ (नोस्टाल्जिया) वाटतेच, ती व्यक्त करण्यात काहीच वाईट नाही. :)
-- हे खरे. त्या त्या वेळेला त्या उशीरा पत्र पोचल्याने वैतागही आला असेल कदाचित , पण आठवणीत मन रमते. त्याला antique value प्राप्त होते. खेळ , दुसरं काय ? असो, लेकीन वो कहावत दुरुस्त है ... "हम गुजरे पल मी रहते हैं , यादों के सब जुगनू जंगल में रहते हैं " ....

सतिश गावडे 12/03/2017 - 14:34
ते पत्रलेखनाचा आनंद वगैरे ठीक आहे. मात्र ईमेल हे आजच्या घडीचे अतिशय प्रभावी आणि उपयुक्त असे माध्यम आहे. राहीली गोष्ट स्पॅमची, तर थोडीशी सतर्कता आणि थोडेसे ज्ञान वापरले तर स्पॅम बर्‍यापैकी नियंत्रित करता येतात.

In reply to by सतिश गावडे

प्रिय मित्र सतीश, उपयुक्तता - एकदम मान्य. परन्तु फक्त जलद पोहोचणे ह्या Context मध्ये , तसेच इतर व्यावसायिक बाबींवर. परन्तु हा मुद्दाच इथे घेतलेला नाही, कारण मी स्वतःही इमेल वगैरेच वापरतो-व्यावसायिक बाबतीत. परन्तु शेवटी त्यातही आपण स्माइल्या , कधी कधी हस्त्लिखित font का बरं वापरतो ? असो.ते सगळं बाजुला ठेवुन एकदा एखादं पत्र लिहून तर पहा राव ! आणि spam बद्दल म्हणाल, तर ह्या बाबतीत हा कचरा १% सुद्धा नाही बरं का ! असो, मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल आभार !

In reply to by १००मित्र

सतिश गावडे 12/03/2017 - 16:36
मी अगदी इंजियरिंगला असेपर्यंत पत्रे लिहीली आहेत. कार्पोरेट जगात प्रवेश केल्यावर माझं पत्रे लिहीणे बंद झाले. :)
कागदावर लिहिलेल्या शाईच्या अक्षरांमधील व्यक्तिगत अस्तित्त्व हे संगणकाच्या स्क्रीनवरील नीटनेटक्या फॉन्टमध्ये जाणवणार नाही. मी अजूनही पत्रे लिहितो. पण अर्थातच लोकांना त्यापेक्षा सरळ ईमेल किंवा त्यापेक्षाही सध्या व्हॉट्सऍप का काय असलं वापरायला आवडतं. असो. छान हातकागदावर शाईपेनाने लिहायला मजाही येते. भांडारकर रस्त्यावर हातकागदांचं एक बुटीक आहे. तिथे चांगले हातकागद मिळतात.

In reply to by एस

१००मित्र 12/03/2017 - 15:46
अगदीच ! सन्गणकावरील fonts जरी विविध असले तरी एकदा टाइप करायला लागल्यावर सगळं एकसारखेच. पण हस्त लिखिताचं तसं नाही. प्रत्येक अक्षरही वेगळे येवू शकते. तसेच प्रत्येक वेळेला मूडनुसारही. उगाच नाही , Graphology हे शास्त्र विकसित झालं ! अर्थात whatsapp व पत्र ह्यांची efficiency बाबतीत तुलनाच होवु शकत नाही. पण ते मला अपेक्षितही नाहीये. Whatsapp, Email हे प्रकार त्याबाबत उजवेच आहेत, परन्तु पत्रलेखनाची देखील वेगळीच गंमत आहे. टेस्ट क्रिकेट व वन डे अथवा २०-२० मध्ये जो फरक आहे तोच असेल कदाचित. मुळात , सतत वेगातच गम्मत असते असं नाही, एखादी गोष्ट आत्म-मग्न होवुन करुनही त्यात खूपच छान वाटू शकते. ताणाचा सामना करायला ह्या "स्लो" गोष्टीच कामी येतात !

In reply to by विशुमित

१००मित्र 17/03/2017 - 08:30
संगणक संस्कृती म्हणजे पटापट हातातली कामे वेगळी करायची , म्हणजे दुसऱ्यांना (सर्व्हिसेस) ना कामाला लावायचं - एकाच वेळी अनेक विंडोज नाही का ओपन ठेवत आपण ! एकातही धड राम नाही. इतरही कामं अशीच करायची सवयच लागून जाते अगदी ! असो; स्लो वर्ल्ड नावाचाही एक प्रकार अस्तित्त्वात आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

रेवती 12/03/2017 - 18:37
लेखन आवडले. पत्रव्यवहाराचा विसर पडावा इतकं आयुष्य ईमेल्सने व्यापलय. सगळे झटपट काम! पोष्टमनची वाट पाहण्याचे कारण उरले नाही. तरी पंधरा दिवसांपूर्वी महत्वाची कागदपत्रे पाठवताना मला एक पत्र मराठीत लिहावे लागले. त्यात ड, फ, ई ही अक्षरे लिहिणे आधी जमेना. एक पॅरेग्राफ कागदपत्रांविषयी लिहिला. पत्र आईवडिलांस धाडावयाचे असल्याने लिहिण्यास काही नव्हते कारण सतत फोन्स, ईमेल्स, व्हॉटस अप, चॅट यामुळे सगळे आधीच कळवलेले असते. तरी इकडचे तिकडे असे काहीतरी लिहिले. ता. क. ही एक ओळीचा लिहिला. पत्र पाठवले व तसे ईमेल करून कळवले. ;) दोन दिवसांनी एकदम आठवण आली की पत्र पाठवलय खरं, पण ते पोहोचलंच नाही तर? दहा बारा दिवसात ते मिळाले हे त्यांनी पाकिट, कागदपत्रे असे फोटू काढून व्हॉटस अपवर कळवले. मग बरे वाटले.

In reply to by रेवती

१००मित्र 17/03/2017 - 08:42
हे एक डबल चेकिंग , फारच वाढलंय आपलं हल्ली, तुम्ही प्लीज व्यक्तिगत घेऊ नका हं ! मध्ये एका जुन्या सत्यजित रें च्या सिरीयल मधले (८४ सालातील) काही संवाद पहिले. त्यात एक माणूस म्हणतो :- " सोचाथा , यहां से गुजर रहा था, सो आपके घर होके जाउं !" हा प्रकारच बाद झालाय का हल्ली ? कुठेही जाताना , फोन करून कन्फर्म करायचं म्हणे ! पुन्हा मुद्दा उपयुक्ततेचा येईलच , पण मला त्यांच्या पलीकडचच तर बोलायचय. एखाद्या वेळी एखादी व्यक्ती नाही भेटली , तर बिघडलं कुठे ? जाणं , तेही , आधीचे विधिनिषेध सोडून , हे राहिलंय का, आय मीन तो सहजपणा ? तसच पत्राचं.
दोन दिवसांनी एकदम आठवण आली की पत्र पाठवलय खरं, पण ते पोहोचलंच नाही तर? दहा बारा दिवसात ते मिळाले हे त्यांनी पाकिट, कागदपत्रे असे फोटू काढून व्हॉटस अपवर कळवले. मग बरे वाटले.
म्हणजे गोष्टी या जमान्यातही घडतात ! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

मितान 13/03/2017 - 11:47
पत्र हा आजही जिव्हाळ्याचा विषय आहे. सुदैवाने शाई पेन, सुंदर कागद आणि त्यावर लिहायला सुचणारे खास पत्र विषय यांच्याशी नाते अजून टिकून आहे :)

In reply to by मितान

सदर लेख "पैसा" ह्यांनी सुचविला , खालील एका धाग्यात, तो वाचला, केवळ सुरेख. त्यावर प्रतिक्रिया मी तिथेच दिलेली आहे. खूप सुंदर !

संजय क्षीरसागर 13/03/2017 - 15:52
मग ते पत्रं असो, इथले व्यनि असोत, इमेल्स असोत की वॉटस अ‍ॅपवर केलेलं कम्युनिकेशन असो. तुम्ही ते पत्रानं करता की आणखी कशानं यानी काही फरक पडत नाही. उलट आता सगळं सोपं आणि जलद झालंय.

In reply to by संजय क्षीरसागर

१००मित्र 17/03/2017 - 08:49
तुम्ही ते पत्रानं करता की आणखी कशानं यानी काही फरक पडत नाही
मला वाटतं , की पडतो. एखाद्या सुंदर अक्षर असणाऱ्या आपल्या एखाद्या मित्राने , अथवा भावंडाने आपल्याला जर इमेल + पत्र लिहिलं , तर इमेल हा "निरोप्या" होईल - उपयुक्ततेकरिता; परंतु ते पत्र म्हणजे खरा संवाद होईल - Heart to Heart ! असो. मन मोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

In reply to by संजय क्षीरसागर

१००मित्र 17/03/2017 - 09:00
अजूनही एक गोष्ट सुचली :- शरद ह्याचं जुनं लेखन "पैसा" ह्यांच्या सुचनेनंतर वाचण्यात आलं : आपणही जरूर वाचा : - ==> श्री. पंगुशेठ यांचा लेख वाचला आणि एक जुनी आठवण जागी झाली. त्यावेळी बराह, श्रीलिपी वगैरे उपलब्ध नव्हते. त्यामुळे पुण्याहून अमेरिकेतल्या आपल्या लाडक्या लेकीला ई-मेल पाठवतांना आईला इंग्रजीशिवाय पर्याय नव्हता. आणि हे माध्यम भावना, तळमळ कळवण्यास तसे निरुपयोगीच. हे त्यातलेच एक ! प

पैसा 13/03/2017 - 18:04
छान लेख. http://www.misalpav.com/node/17121 http://www.misalpav.com/node/15152 शरद आणि मितान यांचे सुंदर लेख आठवले. तुम्हालाही आवडतील.

In reply to by पैसा

१००मित्र 17/03/2017 - 09:12
दोन्ही लेख अगदी भरभरून वाचले. आपण संकलन करून , नंतर त्या लिंक्स आठवणीने पोस्ट केल्यात ह्याबद्दल अनेक आभार. अशी व्यासंगी मंडळी असल्यामुळेच विचार , प्रयोग , प्रसारतात. ही जाणीव एखाद्या निर्जीव forward मध्ये नसतीच झाली.

In reply to by १००मित्र

डॉ सुहास म्हात्रे 17/03/2017 - 16:12
"आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे दोन्ही लेख लिहिले आणि साठवून ठेवले होते" केवळ म्हणूनच "आधुनिक तंत्रज्ञान वापरून पैताईंना ते सहजपणे शोधता आणि तुमच्यापर्यंत पोचवता आले" आणि म्हणूनच तुम्हाला ते "आधुनिक तंत्रज्ञान वापरून सहजपणे घरी/ऑफिसमध्ये/प्रवासात असतानाही आरामात वाचायला मिळाले/मिळतील.". हा त्या लेखनाचा 'लेखकापासून वाचकापर्यंतचा (तुमच्यापर्यंतचा)' प्रवास लक्षात घेतल्यास नवीन तंत्रज्ञानाचे महत्व आपोआप अधोरेखीत होते, नाही का ? याशिवाय, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्या लेखनाचा आनंद घेण्यामध्ये तुम्हाला काही कमी जाणवली, असे तुमच्या प्रतिसादातून दिसत नाही. जर तो मजकूर एखाद्या कागदावर केलेल्या केलेल्या लेखनाच्या स्वरूपात कोणा एकाकडे पडून असता तर हे शक्य झाले असते का ? संवादतंत्रज्ञान आज इतके विकसित, सहज उपलब्ध आणि स्वस्त झाले आहे की स्वतःच्या घरात बसून आपण जगाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या आपल्या व्यावसायीकांबरोबर किंवा सुहृद-मुला-नातवंडांशी या आताच्या क्षणाचा (लाईव्ह) दृक्श्राव्य (व्हीडीओ) संवाद साधू शकतो ! या संवादप्रकाराशी, केवळ एका दिशेने पोचण्यास पोस्टाने अनेक दिवस-आठवडे लागणारे लेखी पत्र स्पर्धा करेल, असा आपण विचारही करू शकत नाही ! किंबहुना, 'पोस्ट ऑफिसेस बंद करून त्यांना केवळ कुरियर आणि बँकिंग सेवा बनविण्याच्या दिशेने सरकारची चाललेली वाटचाल' या दोन संवादमाध्यमांच्या तौलनिक उपयुक्ततेचा आणि बहुसंख्य लोकांच्या पसंतीचा वास्तवातला सबळ पुरावा आहे. अर्थातच, हाताने लिहिण्याचा छंद अथवा त्याचे अप्रूप असण्याला किंवा त्याबाबत भूतकालीक आत्मियता (नोस्टाल्जिया) असणे ही एक वैयक्तिक बाब आहे आणि तिला अजिबात विरोध नाही.. फक्त, त्याची नवीन तंत्रज्ञानाशी होणारी तुलना अस्थायी आहे... कारण, या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत. हाताने लिहून संवाद साधणे हा छंद असू शकतो हे नि:संशय; पण, दिवसेदिवस विकसित होणारे संवादाचे आधुनिक तंत्रज्ञान हा मानवाच्या संवादासंबंधीच्या वाढत असलेल्या आवश्यक गरजा कमी श्रमांत, कमी वेळेत, कमी खर्चात, भावनांची उत्कटता कमी न करता आणि उत्तम प्रतीने भागवणारा उपाय आहे, यात वाद नसावा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१००मित्र 17/03/2017 - 22:33
त्याची नवीन तंत्रज्ञानाशी होणारी तुलना अस्थायी आहे... कारण, या दोन फार वेगळ्या गोष्टी आहेत. हाताने लिहून संवाद साधणे हा छंद असू शकतो
बस , हेच तर म्हणायचय ना ! बाकी तुम्ही जे तन्त्रज्ञानाबद्दल वगैरे प्रतिपदित केलंय ना, ते तर अगदी आधीच मान्य करुन टाकलय की, आणि पुन्हा तेच... त्याच्या पलिकडचच तर पकडायचय ना ! त्याच्या विरोधी वगैरे सूर लावलेलाच नाही...!

डॉ सुहास म्हात्रे 14/03/2017 - 23:12
आजच हे पाहिले. पत्राच्या सहाय्याने असा उपक्रम जवळ जवळ अशक्य आहे. मात्र नवीन तंत्रज्ञानामुळे या उपक्रमासाठी कळीचा असलेला संवाद सहजसाध्य झाला... हल्लीचे संवादतंत्रज्ञान इतके विकसित झले आहे की केवळ आपली कल्पना करण्याची ताकद हीच एक सीमा त्याला आहे !