युती संपली, पुढे काय?

श्रीगुरुजी काथ्याकूट
जे होणे अटळ होते, जे व्हायलाच हवे होते, जे होणार हे नक्की होते परंतु कधी होणार हा फक्त काही काळाचाच प्रश्न होता, जे व्हावे अशी अनेकांची मनापासून इच्छा होती . . . ते अखेर घडून आलेले आहे. भाजप-शिवसेना यांच्यात मागील २७-२८ वर्षांपासून असलेली महाराष्ट्रातील युती अधिकृतरित्या संपुष्टात आली आहे. २६ जानेवारीला उद्धव ठाकरेंनी युती संपल्याची अधिकृत घोषणा केली. ही घोषणा करतानाच आम्ही आता एकटे लढून महाराष्ट्रावर स्वतःच्या जीवावर भगवा फडकावणार, युतीत आम्ही २५ वर्षे सडलो, आता यापुढे युतीसाठी भिकेचा कटोरा घेऊन कोणाच्या दारात जाणार नाही, तुमची वज्रमूठ मिळाली तर समोरच्याचे दात पाडून टाकू, मुंबईत ११४ जागा मागून आमचा अपमान केला . . . अशी नेहमीचीच फुशारक्या मारणारी विनोदी वाक्ये होतीच. तशी यांची युती विधानसभा पातळीला २०१४ मध्येच संपुष्टात आली होती. महाराष्ट्रात भाजपचा जनाधार पक्षाच्या स्थापनेपासूनच, म्हणजे १९८० पासून, शिवसेनेच्या तुलनेत जास्त असताना व तो एखाद्या विशिष्ट भागात साचलेला नसून महाराष्ट्राच्या सर्व भागात अस्तित्वात असताना, १९८४ च्या लोकसभेत फक्त २ जागा मिळविलेल्या भाजपने, पक्षविस्तार करण्यासाठी पडती भूमिका घेऊन १९८९ मध्ये शिवसेनेशी युती केली. वास्तविक पाहता ही युती म्हणजे स्कूटरला पुढचे चाक स्कूटीच्या चाकाच्या आकाराचे व मागचे चाक मोटरसायकलच्या चाकाच्या आकाराचे अशी विपरीत जोड होती. शिवसेचेची १९६६ मध्ये स्थापना झाल्यावर १९८५ पर्यंत महाराष्ट्रात ५ वेळा विधानसभा निवडणुक झाली. यापैकी १९६८, १९७३, १९७८ व १९८० च्या निवडणुकीत शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता, तर १९८५ मध्ये फक्त १ आमदार निवडून आला होता. नाही म्हणायला १९६८ मध्ये मुंबईत कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांचा खून झाल्यावर (ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय हत्या समजली जाते व यात हत्येचा आरोप शिवसेनेवर होता) झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक निवडून आले होते. म्हणजे ५ विधानसभा निवडणुकीत फक्त २ आमदार ही शिवसेनेची कामगिरी. याउअट भाजपने आपल्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाच्या अवतारात १९७७ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत थोडेसे आमदार निवडून आणले होते. अगदी थोडे आमदार निवडून आणले असले तरी पक्षाचे अस्तित्व त्यातून दिसत होते. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यावर केवळ दीड महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसची मोठी लाट असतानासुद्धा भाजपने महाराष्ट्राने प. महाराष्ट्र वगळता इतर सर्व भागातून आपले एकूण १२ आमदार निवडून आणले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेला आधीच्या सर्व निवडणुकांप्रमाणे भोपळा मिळाला होता. मुंबई व ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे या भ्रमात अगदी सुरवातीपासून सेना होती. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे २ तुकडे झालेले होते. इंदिरा काँग्रेस व यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटिल, यशवंतराव मोहिते इ. चा समावेश असलेल्या काँग्रेस नेत्यांची रेड्डी काँग्रेस असे दोन्ही तुकडे एकमेकांविरूद्ध लढले. केंद्रात बहुमताने सत्तेवर आलेला जनता पक्ष हा तिसरा पक्ष निवडणुकीत होता. बहुसंख्य मते या ३ पक्षातच विभागली जाणार हे उघड होते. अशा परिस्थितीत आपला बालेकिल्ला समजला जाणार्‍या निदान मुंबई-ठाण्यात तरी सेनेला किमान १०-१२ ठिकाणी विजय मिळायला हवा होता. सेनेने एकूण ३५ उमेदवार उभे करून एकही आमदार निवडून आला नाही. सेनेला मुंबई-ठाण्यातील काही ठराविक वॉर्डांपलिकडे स्थान नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. परंतु ही वस्तुस्थिती सेनेने किंवा सेनेबद्दल सुरवातीपासूनच सॉफ्ट कॉर्नर असलेल्या मराठी माध्यमांनी कधीच उघडपणे मान्य केली नाही. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत देशभर इंदिरा गांधींची प्रचंड लाट होती. भारतातील ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी तब्बल ३५५ मतदारसंघात इंदिरा काँग्रेसने विजय मिळविला होता. महाराष्ट्रात सुद्धा इंदिरा काँग्रेसला ४८ पैकी ३९ जागी विजय मिळाला होता. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती करून शिवसेनेला मुंबईतील २ जागा सोडल्या होत्या. महाराष्ट्रात व देशात इंदिरा गांधींची प्रचंड लाट असताना व याच पक्षाबरोबर युती करून आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुक लढविणार्‍या सेनेने मुंबईतील दोन्ही जागा खरं तर मोठ्या मताधिक्याने जिंकायला हव्या होत्या. प्रत्यक्षात दोन्ही जागांवर सेनेचा पराभव झाला. मुंबईत फक्त आपलाच आवाज चालतो व मुंबई हा आमचा बालेकिल्ला आहे हा शिवसेनेचा भ्रम पुन्हा एकदा सिद्ध झाला होता. शिवसेनेने १९७३ मध्ये ठाणे महापालिकेत सत्ता मिळविली होती व नंतर १९७४ मध्ये मुंबईत सत्ता मिळविली होती. ती सत्ता अर्थातच सेनेने पुढील निवडणुकीत गमावली. मुंबई-ठाणे हा आपला बालेकिल्ला आहे हा भ्रम तेव्हापासूनच उराशी बाळगलेला आहे. मुंबई-ठाण्याच्या बाहेर तर सेनेला हिंग लावून कोणी विचारत नव्हते. १९८५ मध्ये सुद्धा सेनेने स्वबळावर विधानसभेच्या काही जागा लढविल्या होत्या. परंतु माझगाव मधून निवडून आलेल्या छगन भुजबळांचा अपवाद वगळता इतर सर्व जागांवर सेनेचा पराभव झाला होता. या निवडणुकीत भाजपने जनता पक्ष, पवारांची समाजवादी काँग्रेस व शेकाप यांच्या युतीत निवडणुक लढवून १६ जागा जिंकल्या होत्या. भाजपला जरी युतीचा फायदा मिळाला होता तरी १९८० मध्ये भाजपने पूर्णपणे स्वबळावर इंदिरा काँग्रेसच्या लाटेत १२ आमदार निवडून आणले होते हे विसरता येणार नाही. एकंदरीत १९८९ मध्ये युती होण्यापूर्वी आधीच्या निवडणुकीवरून जे चित्र दिसत होते ते असे होते की शिवसेनेला मुंबईत थोडेसे स्थान आहे तर भाजपला सेनेच्या तुलनेत मुंबईसकट इतर सर्व भागात जास्त जनाधार आहे. त्यामुळे युती होताना भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत हवा होता. परंतु १९८४ च्या लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या अनुभवावरून, प्रसंगी पडती भूमिका घेऊन, स्थानिक पक्षांशी युती करून आपला पक्षविस्तार करायचा असे पक्षाध्यक्ष अडवाणींनी ठरविले होते. त्या धोरणानुसार तामिळनाडूच्या धर्तीवर शिवसेनेशी युती करण्याचे ठरविले गेले. लोकसभेत भाजप ३२ व सेना १६ व विधानसभेत याच्या बरोबर उलटे जागावाटप असे ठरविले गेले. या युतीचे प्रमुख शिल्पकार होते बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन. विधानसभेसाठी भाजप १०५ व सेना १८३ असे विषम जागावाटप भाजपने का मान्य केले हे अनाकलनीय आहे. युतीत पहिल्यापासूनच शिवसेना दादागिरीच्या भूमिकेत होती. आपल्यापेक्षा सेनेचा जनाधार कमी आहे हे स्पष्ट असूनसुद्धा भाजपने दुय्यम भूमिका का स्वीकारली हे एक गूढच आहे. सेनेने फारशी शक्ती नसूनसुद्धा २८८ जागांमधील मोठा वाटा मिळविला व त्याचबरोबरीने भाजपने जोपासलेले व बांधलेले काही मतदारसंघ घशात घातले. १९८० व १९८५ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या अण्णा जोशी यांनी निसटता विजय मिळविला होता. भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ सेनेने घशात घातला. १९९० ते २००९ या काळात सलग ५ निवडणुकीत या मतदारसंघातून सेनेचा उमेदवार विजयी झाला. मते होती भाजपची पण उमेदवार शिवसेनेचा. हा मतदारसंघ आपलाच आहे हा आधी शिवसेनेचा दावा होता आणि नंतर आपल्या उमेदवाराला मिळालेली मते ही आपलीच आहेत असा भ्रम शिवसेनेला झाला. मतदारांनी शिवसेनेचा भ्रम दूर केला तो २०१४ मध्ये. यावेळी दोघेही एकमेकांविरूद्ध लढले व त्या लढतील भाजपच्या मेधा कुलकर्णींनी आपल्या सेना प्रतिस्पर्ध्यावर तब्बल ६५००० मतांच्या फरकाने विजय मिळविला. सेनेने जसा शिवाजीनगर ढापला तसाच ठाणे व कल्याणही ढापला. शिवसेनेची ही ढापाढापी २००९ पर्यंत सुरु होती. २००९ मध्ये गुहागरमधून १९८० पासून सातत्याने निवडून येणार्‍या डॉ. नातू पितापुत्रांना डावलून सेनेने हा मतदारसंघ आपल्या घशात घातला. भाजप नेते, आधी महाजन, नंतर मुंडे व गडकरी असहायपणे सेनेसमोर मान तुकवित होते. यात बदल झाला तो एकदम २०१४ मध्ये. २०१३ मध्ये मोदी-शहा जोडगोळीच्या हातात भाजपची सूत्रे गेल्यावर त्यांनी सेनेची दादागिरी मोडून काढण्याचे ठरविले. समान जागावाटप होत असेल तरच युती नाहीतर स्वबळावर लढण्याची ताठर भूमिका घेऊन सेनेसमोर नमते घेण्यास त्यांनी नकार दिला. महाराष्ट्रात आपणच भारी हा भ्रम तोपर्यंत सेनेच्या मनात ठाम रूजला होता. त्यामुळे सेनेनेही नमते घेण्यास नकार देऊन स्वबळावर निवडणुक लढविली. शेवटी भाजपने १२२ जागा जिंकताना सेनेला फक्त ६३ जागाच जिंकता आल्या व महाराष्ट्रात कोण भारी यावर शिक्कामोर्तब झाले. तसेही यापूर्वीच्या सर्व निवडणुकात भाजपचा स्ट्राईक रेट हा कायमच सेनेपेक्षा जास्त होता. १९९० मध्ये भाजप १०५ पैकी ४२ तर सेना १८३ पैकी ५२, १९९५ मध्ये भाजप ६५ तर सेना ७३, १९९९ मध्ये भाजप ५६ सेना ६९, २००४ मध्ये भाजप ५४ सेना ६२ अशी परिस्थिती होती. भाजपपेक्षा किमान ५० जागा जास्त लढवूनसुद्धा सेनेला भाजपपेक्षा जेमतेम ८-१० जास्त मिळायच्या. २००९ मध्ये तर भाजपने ११९ जागा लढवून ४६ जागा जिंकल्या तर सेनेने तब्बल १६९ जागा लढवून फक्त ४४ जागाच जिंकल्या. चित्र अगदी स्पष्ट होते. परंतु स्वत:च्या ताकदीच्या भ्रमात गर्क असणार्‍या सेनेची वस्तुस्थिती मान्य करण्याची तयारी नव्हती. २००९ मधील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ जागांपैकी ६ जागा मनसेने, ५ सेनेने व ४ भाजपने जिंकल्या होत्या (भाजपने अर्थातच सेनेपेक्षा खूप कमी जागा लढविल्या होत्या). सेनेचे मुख्यालय 'मातोश्री' ज्या मतदारसंघात आहे, त्या मतदारसंघात सुद्धा सेनेचा पराभव झाला होता. २०१४ मध्ये भाजप व सेना या दोघांनीही स्वतंत्र लढून अनुक्रमे १५ व १४ जागा जिंकल्या. भाजप सेनेपेक्षा मुंबईत सुद्धा जास्त ताकदवान आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अशा परिस्थितीत २०१७ च्या महापालिका निवडणुकीत युती करायची असेल तर आम्ही ११४ जागा व सेना ११३ जागा ही भाजपची मागणी योग्यच होती. परंतु याहीवेळी सेनेने अहंकार व वस्तुस्थिती मान्य न करण्याचा हेकेखोरपणा यामुळे हे वाटप मान्य केले नाही आणि आता शौर्याचा आव आणून युती स्वतःहून तोडण्याची घोषणा केली आहे. भाजपने सेनेबरोबर युती अजिबात करू नये किंवा केल्यास स्वतःच्या अटींवर करावी असे माझे पूर्वीपासूनच मत होते. त्यामुळे सेनेने स्वतःहून युती तोडल्यामुळे मला आनंद झाला आहे. माझ्या मते फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार्‍या ११ महापालिकांच्या निवडणुकीत खालील चित्र असेल. १) मुंबई: भाजप ८०-९०, शिवसेना ४०-५०, काँग्रेस ५०-६० २) ठाणे: मला ठाण्यातील फारशी माहिती नाही. परंतु इथे राष्ट्रवादीसुद्धा प्रबळ आहे. माझ्या मते ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल. भाजप व सेनेला किती जागा मिळतील हे सांगता येणे अवघड आहे. ३) पुणे: भाजप ६०-७० जागा मिळवून सर्वाधिक मोठा पक्ष असेल. त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस व तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. ४) नाशिकः भाजप प्रथम क्रमांकावर व शिवसेना द्वितीय क्रमांकावर असेल. ५) पिंपरी-चिंचवडः राष्ट्रवादी काँगेस सर्वाधिक मोठा पक्ष असेल. ६) नागपूरः भाजपला बहुमत मिळेल. ७) अकोला: बहुजन महासंघ, काँग्रेस व भाजप या तीन पक्षात जोरदार चुरस असेल. ८) अमरावती: अमरावतीबद्दल फारशी माहिती नाही. ९) सोलापूरः काँग्रेस प्रथम क्रमांकावर व भाजप दुसर्‍या क्रमांकावर असेल. १०) उल्हासनगर: इथे कलानी घराण्याची मोनोपॉली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर असेल. ११) भिवंडी: फारशी माहिती नाही. भाजप महापालिका पातळीवर अजूनपर्यंत तरी कच्चा खेळाडू आहे. महाराष्ट्रातील २१-२२ महापालिकांपैकी फक्त नागपूरमध्ये भाजप सत्तेवर आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस प्रत्येकी ४-५ महापालिकेत सत्तेवर आहेत. नाशिकमध्ये मनसे, वसई-पालघर मध्ये बहुजन विकास आघाडी, अकोल्यात बहुजन महासंघ, कोल्हापूरमध्ये स्थानिक आघाडी सत्तेवर आहेत. २०१७ मध्ये भाजप नागपूरव्यतिरिक्त पुणे, मुंबई व नाशिकमध्ये सत्तेवर येण्याची शक्यता आहे. शिवसेनेला मुंबई व ठाणे या दोन्ही महापालिकात सत्ता गमवावी लागेल. या दोन्ही महापालिका म्हणजे शिवसेनेचा प्राणवायू आहे व प्राणवायूचा पुरवठा बंद झाला की मृत्यु अटळ असतो. शेकाप, मनसे, मगोप अशा स्थानिक पक्षांप्रमाणेच शिवसेना देखील पूर्णपणे irrelevant होणार आहे. त्याची सुरूवात २०१४ मध्ये झाली, २०१७ मध्ये त्यावर शिक्कामोर्तब होईल व २०१९ मध्ये शिवसेना पूर्णपणे अस्तित्वहीन झालेली असेल. निदान २०१७ च्या निकालानंतर तरी शिवसेनेच्या फुशारक्या व बढाया थांबाव्यात अशी अपेक्षा आहे. शिवसेना लगेचच फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेईल असे वाटत नाही. परंतु तशी चूक केल्यास चांगले काम करणारे सरकार अस्थिर केल्याचा व मध्यावधी निवडणुकीचा दोष शिवसेनेच्या माथ्यावर येऊन त्यांना किंमत द्यावी लागेल.

226 टिप्पण्या 39,299 दृश्ये

Comments

श्रीगुरुजी नवीन

In reply to by संदीप डांगे

तुम्हीच याद्या मेंटेन करता की. आधीच्याच प्रतिसादात लिहिलंत ना की देऊ का यादी. आणि अभ्यास आणि भाषेचे म्हणाल तर "२० लाख रोख" हा ज्यांचा अभ्यास आणि "हरामखोर" ही ज्यांची भाषा त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे?

संदीप डांगे नवीन

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला हरामखोर ह्या शब्दात काय बोचलं??? वीस लाखाच्या ट्रकने तुमचं काय नुकसान केलंय???

गामा पैलवान नवीन

गॅरी ट्रुमन, तुमची काही विधानं रोचक आहेत. १.
महापालिका पातळीवर कोण सत्तेत येतो त्यामुळे खरोखरच काहीही फरक पडत नाही. रस्त्यावरचे खड्डे, अनधिकृत बांधकामे वगैरे गोष्टी कोणीही आले तरी तशाच चालू राहणार आहेत त्यामुळे माझा या निवडणुकांमधला इंटरेस्ट फक्त शिवसेना पराभूत व्हावी इतकाच
मपात सत्तेवर कोणीही आल्याने काहीच फरक पडणार नाही. मग शिवसेना पराभूत व्हायचा आग्रह कशासाठी? त्यापेक्षा भाजप विजयी व्हावा असं म्हणणं योग्य नाही का? २.
एकीकडे बोलताना समाजकारणाचा जप करायचा पण दुसरीकडे गुंडगिरी करायची
तरीपण लोकं सेनेला निवडून देतात. याचं कारण हणजे खाकी वर्दीतल्या गुंडांपेक्षा शाखेवरचा गुंड सामान्यांना परवडतो. शाखागुंड निदान ऐकून तरी घेतो. कधीमधी दरबार भरवतो आणि तक्रारी निस्तरतो. वर्दीगुंड यांतलं काहीच करंत नाही. उलट खऱ्या गुंडांना तक्रारदाराची टीप देतो (ऐकीव माहिती). बघा, समाजकारण म्हणजेच गुंडगिरीच नव्हे काय? आ.न., -गा.पै.

गॅरी ट्रुमन नवीन

In reply to by गामा पैलवान

मपात सत्तेवर कोणीही आल्याने काहीच फरक पडणार नाही.
याविषयी दुमत नसावे. जर तुम्हाला असे वाटत असेल की भाजप किंवा काँग्रेस सत्तेत आल्यामुळे शहरातील रस्ते खड्डेमुक्त होतील किंवा नगरसेवक आणि बिल्डर यांची युती बंद होईल तर ते जरूर सांगावे.
मग शिवसेना पराभूत व्हायचा आग्रह कशासाठी?
याचे एकच कारण म्हणजे २०१४ पासून उध्दव ठाकरेंनी जे एकेक प्रकार चालवले आहेत ते. सत्तेत असून विरोधी पक्षांप्रमाणे वागायचे, मधूनमधून सामनामधून जाहिरपणे भाजपला टोले लगावायचे, गोव्यात जितकी तितकी ताकद असेल ती घेऊन भाजपमधून फुटून निघालेल्या गटाबरोबर युती करायची इत्यादी इत्यादी. उध्दव ठाकरेंच्या या मुजोरीचा स्त्रोत मुंबईतील सत्ता आहे. म्हणूनच ती जायला पाहिजे असे वाटते.

संदीप डांगे नवीन

In reply to by गॅरी ट्रुमन

कॉन्ग्रेसवाले 'गठबंधन की मजबूरी' सांगून मित्रपक्षांच्या किडेकारवायांकडे दुर्लक्ष करायचे तेच सेनेने भाजपबद्दल करायला हवे होते तर...? बाकी, भाजपला डिवचल्यानेच आपला सेनेवर राग आहे हे स्पष्टपणे कबूल केल्याबद्दल अभिनंदन. आजकाल फार कमी लोक अशी स्पष्ट बाजू घेतात.

गामा पैलवान नवीन

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, तुमच्या या संदेशाशी सहमत आहे. नावाप्रमाणे 'ट्रु'मॅन आहेत आपले ग्यारीभाऊ! :-) आ.न., -गा.पै.

हतोळकरांचा प्रसाद नवीन

शिवसेनेला पारदर्शिकतेवरून घेरण्याची तयारी केलेल्या भाजपला तोंडघशी पडण्याची वेळ आलेली दिसतेय. अर्थमंत्रालयाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात मुंबई महानगरपालिकेचा कारभार सर्वात पारदर्शक आणि अकाऊंटेबल असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेनेच यावरून आता भाजपला घेरण्याची तयारी केलेली दिसतेय.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

शिवसेना काय डोंबल घेरणार भाजपला? युतीच्या जीवावर पर्यायाने भाजपच्या मतांच्या जीवावर इतके वर्ष सेना उड्या मारत होती. आता युती नसल्यामुळे सेनेचा प्राणवायूचा पुरवठा बंद व्हायची वेळ आली आहे.

हतोळकरांचा प्रसाद नवीन

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, "पारदर्शिकतेच्या" मुद्द्यावरून शिवसेना घेरेल असे म्हणालो मी, एकूणच घेरेल कि नाही हे काळ ठरवेल. बाकी शिवसेना मुंबईत उड्या मारत होती कि नाही हे २३ तारखेलाच कळेल. मुंबईत शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष ठरेल असे मला वाटते. फक्त कुणाचा पाठिंबा घ्यायची वेळ येते हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

वरुण मोहिते नवीन

हे काय सरकार आहे? असे कोण अहवाल देत का??? सुईच्या अग्रापासून ते मंगळावर जाणाऱ्या याना पर्यंत सगळं भाजप ने केलं आहे . कोणीच भाजप ला रोखू शकत नाही आता . प्रत्येक पक्षाला भाजप ची मदत झाली आहे . आता खमकं नेतृत्व आलंय भाजप ला . आता माघार नाही .

फेदरवेट साहेब नवीन

युतीच्या जीवावर पर्यायाने भाजपच्या मतांच्या जीवावर इतके वर्ष सेना उड्या मारत होती.

बा य स्ड वि धा न

कैच्याकै. नालायकपणाचा कळस विधान. कॉमेंटकर्त्याला पूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या बेसिसवर सेनेने केलेलं ग्राउंडवर्क नाकारायची इच्छा दिसते.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by संदीप डांगे

म्हणजे तुमच्या ट्रकचालकाच्या खिशातले विडीकाडीचे चार आठ आणे तुमच्यासाठी २० लाख रूपये होते तसंच का?

संदीप डांगे नवीन

In reply to by श्रीगुरुजी

बाकी, गुरुजींकडे काय राहिलं नाय.... नुसता थयथयाट चाललाय.. गुरुजी पुरते उघडे पडलेत. जितकं बोलत जाल तितके अजून उघडे पडाल....

श्रीगुरुजी नवीन

In reply to by संदीप डांगे

आता याच्यात कसला आलाय थयथयाट? मी फक्त तुम्हीच रचलेल्या एका सुरस कहाणीची उपमा दिली. स्वतःच रचलेल्या कहाणीचा उल्लेख केल्याने मुद्दा तुमच्या जास्त चांगला लक्षात येईल असे वाटले म्हणून तो संदर्भ दिला. त्याच्यात कोठून आला थयथयाट? काहीतरीच हं दी.

संदीप डांगे नवीन

In reply to by श्रीगुरुजी

भाजपच्या जीवावर शिवसेना मोठी झाली हे वक्तव्य काल्पनिक आहे, सुरस कहाणी आहे असे तुम्हीच म्हणताय कि काय? तिकडे नाशिक मध्ये बघा भाजप 2-2 लाख मागतात उमेदवारीचे... तिकडे बघा जमलं तर, फार गैरसोयीचे असल्याने आता मराठीदेखील समजणार नाही बहुतेक... =)) ट्रक फिरवायला नंतर वेळ काढा....

श्रीगुरुजी नवीन

In reply to by संदीप डांगे

>>> भाजपच्या जीवावर शिवसेना मोठी झाली हे वक्तव्य काल्पनिक आहे, सुरस कहाणी आहे असे तुम्हीच म्हणताय कि काय? हे वक्तव्य काल्पनिक नसून ती अनेकदा सिद्ध झालेली वस्तुस्थिती आहे. >>> तिकडे नाशिक मध्ये बघा भाजप 2-2 लाख मागतात उमेदवारीचे... तिकडे बघा जमलं तर, फार गैरसोयीचे असल्याने आता मराठीदेखील समजणार नाही बहुतेक... =)) असली अनेक स्टिंग प्रकरणे असंतुष्टांकडून तयार केली जातात. त्याला काहीही अर्थ नसतो व त्यातून काहीही निष्पन्न होत नसते. २-४ दिवस थांबा. हा फुसका बार असल्याने सिद्ध होईल.

जय२७८१ नवीन

भाजप २ लाख घेऊन तिकीट विकतय. हि आहे संपूर्ण पारदर्शकता....! ( व्हिडीओ पहा ) http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/bjp-leader-demanding-2-lakh-rupees-for-ticket-video-viral/articleshow/56969030.cms

संदीप डांगे नवीन

In reply to by अप्पा जोगळेकर

त्यांचं म्हणजे अग अग म्हशी मला कुठं नेशी चाललंय! नुसत्या शब्दांचे बाण सोडायचे...

NiluMP नवीन

निवडणुकीत उभा राहलेला प्रत्येक उमेदवार म्हणतो मी मुंबईचा विकास करणार मी म्हणलो ५ वर्षानी या माझं मत तुमच्याच

NiluMP नवीन

निवडणुकीत उभा राहलेला प्रत्येक उमेदवार म्हणतो मी मुंबईचा विकास करणार मी म्हणलो ५ वर्षानी या माझं मत तुमच्याच

श्रीगुरुजी नवीन

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने युती तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव आणि शिवसेनेचा तिळपापड झाला होता. शिवसेनेचे सर्व नेते मोदी व शहांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत होते. प्रचारात त्यांनी मोदींचा बाप सुद्धा काढला. मोदी व शहा हे दोघेही गुजराती असल्याने गुजराती लोकांवरही यथेच्छ टीका झाली. महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प, पाणी, कंपन्या गुजरातला हलविण्यात येत आहे असा खोटा प्रचार करून देखील झाला. तरीही मुंबईच्या मतदारांनी या खोट्या प्रचाराला भीक न घालता शिवसेनेपेक्षा भाजपचे जास्त आमदार मुंबईत व इतरत्र निवडून दिले. आता २०१७ मध्ये त्याच शिवसेनेला आणि उद्धवला मुंबईतील गुजराती मतांसाठी हार्दिक पटेल नामक मूर्ख व उपद्रवी गुजरात्याचे पाय धरावे लागले. बाळासाहेबांनी आपल्या हयातील जातीवर आधारीत राखीव जागांना कायम विरोध केला. मते गमाविण्याची पर्वा न करता त्यांनी मंडल आयोगाला विरोध केला होता. बाळासाहेबांचे नाव सांगणार्‍या उद्धवने मात्र मराठा जातीला राखीव जागा ठेवण्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गुजरातमध्ये पटेलांना राखीव जागा मागणार्‍या हार्दिक पटेलचे पाय त्यांनी धरले आहेत. बाळासाहेबांनी आपल्या हयातीत आपण केलेल्या कोणत्याही कृत्याची कधीही माफी मागितली नव्हती. 'सामना'तील व्यंगचित्रावर मात्र उद्धवने माफी मागितली. उद्धव आणि शिवसेना मोदीद्वेषाने इतके पछाडलेले आहेत की ते हार्दिक पटेलबरोबरच उद्या कन्हैया कुमार, केजरीवाल, ओवैसी इ. चे सुद्धा मतांसाठी पाय धरतील. तशीही शिवसेनेने १९६० च्या दशकात मुस्लिम लीगबरोबर युती केलीच होती. नंतर प्रजा समाजवादी पक्षाबरोबर चुंबाचुंबी केली. नंतर इंदिरा कॉंग्रेसबरोबर युती केली. नंतर भाजपबरोबर पाट लावला. आता हार्दिक पटेलबरोबर शय्यासोबत सुरू आहे. 'यांचे शांती पटेल, त्यांचे रजनी पटेल हे मराठी मनाला कसे पटेल?' अशी बाळासाहेबांनी ४ दशकांपूर्वी घोषणा देऊन काँग्रेसच्या मुंबईतील अमराठी नेतृत्वावर टीका केली होती. २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ७१ व काँग्रेसला ६९ जागा मिळून सत्तावाटपासाठी काँग्रेसचे अहमद पटेल व राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे वाटाघाटी करीत असताना 'हे दोन पटेल महाराष्ट्राचे भवितव्य कसे ठरविणार?' अशी बाळासाहेबांनी टीका केली होती. आता उद्धवने हार्दिक पटेलला सन्मानाने मातोश्रीवर बोलावून त्याचा सत्कार करून त्याच्याकडे गुजराती मतांची भीक मागणे हे बाळासाहेबांना कसे पटेल?

जय२७८१ नवीन

वास्तव असे आहे कि, शिवसेनेच्या तिकिटावर पश्चिम उपनगरात पालिका निवडणूक लढविणाऱ्या गुर्जर भाषिक मित्राला (आता सेनेला मराठी उमेदवार मिळाला नाही का? असा प्रश्न विचारू नका) शुभेच्छा प्रदान करण्यासाठी आणि जमल्यास त्याच्या प्रचारासाठी हार्दिक मुंबईत आला. मुंबई - महाराष्ट्रात येणारी अनेक नेते मंडळी मातोश्रीवर जाऊन ठाकरे परिवाराची शुभेच्छा भेट घेतात. पूर्वनियोजित नसलेली हि भेट जेव्हा व्यापक चर्चा करून संपते तेव्हा हार्दिक पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी म्हणतो "शेर जंगल मे रहे या पिंजरे मे, शेर शेर ही होता है, इनको (शिवसेना) किसकी जरुरत नाहीं, यह लोगो की मदत करते है. इन्होने मुझे बुलाया नही बल्की मै इनके आशिर्वाद लेने आया हूं. " राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा, इ राज्यात शिवसेनेने शिरकाव केल्यानंतर गुजरात मध्ये त्यांना हार्दिकचा चेहरा मिळणार असेल आणि सेनेचे पाय रोवले जाणार असतील तर त्यात वावगे ते काय ? हार्दिक पटेल आणि कन्हैय्या कुमार या दोन भिन्न व्यक्ती आणि प्रवृत्ती आहेत. हार्दिक राष्ट्रद्रोही वक्तव्ये न करता पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी गुजरात मध्ये लढा देतोय तर कन्हैय्या आपलेच खाऊन आपल्याच मातीत राहून राष्ट्द्रोही भाषणे देतोय. राहिला प्रश्न त्याचि मदत घेण्याचा. त्याची मदत मागायला कुणी गेले नव्हते. त्यामुळे समाजमाध्यमात चालत असलेल्या चर्चेला तेथेच पूर्णविराम मिळतो. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे मुंबई शहरात २२% मराठी आणि उर्वरित ७८% अमराठी भाषिक रहातात. शिवसेनेने जात - पात - भाषा - प्रांत भेद कधी मानला नाही. हिंदुस्थानात हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रात मराठी माणसासाठी शिवसेना लढत राहिली. मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व राखण्यासाठी हार्दिकला प्रचारासाठी उतरविले जाणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. आम्हांस कालपासून भेटलेल्या अनेक अमराठी मंडळींनी देखील या घटनेचे स्वागतच केले आहे. मोदी - शहा या जोडगोळीच्या मनमानी कारभाराला उत्तर देणे गरजेचे आहे आणि मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे राखून तसे उत्तर देण्याची नामी संधी मुंबईकर मतदारांना प्राप्त झाली आहे. २२% लोकसंख्येतील काही मंडळी शिवसेनेचे कायम विरोधक म्हणूनच भूमिका निभावत आले. समाज माध्यमात या घटनेकडे नकारार्थी दृष्टीने पाहून सेनेला दोष देणारे मराठीच आघाडीवर आहेत. ईश्वर या सर्वांचे भले करो.

गॅरी ट्रुमन नवीन

In reply to by जय२७८१

हार्दिक राष्ट्रद्रोही वक्तव्ये न करता पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी गुजरात मध्ये लढा देतोय
तीच तर गोम आहे. स्वतः बाळासाहेबांनी कायमच जातीवर आधारीत आरक्षणाचा विरोध केला होता आणि या हार्दिकचा मुख्य मुद्दा जातीवर आधारीत आरक्षण हाच आहे. म्हणजे हार्दिकला शिवसेनेने गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवले तर शिवसेनेने बाळासाहेबांच्या या मुद्द्याला हरताळ फासला असा अर्थ घ्यायचा का त्याचा? Politics makes strange bedfellows असे म्हणतात. मागे आआपने शिवसेनेची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करावी अशी मागणी केली होती. हार्दिकने काहीही टिवटिवाट केला की लगेच तो केजरीवाल रिटिवटिवाट करतात आणि हार्दिकला आपल्या बाजूकडे वळवून घ्यायचे प्रयत्न केजरीवालांनीही केले होते. आता त्याच हार्दिकबरोबर शिवसेना आणि शिवसेनेची मान्यता रद्द करावी कारण ५० वर्षात शिवसेनेने द्वेषाचे राजकारण सोडून दुसरे काही केले नाही अशी मागणी करणारा आआपही!!
मोदी - शहा या जोडगोळीच्या मनमानी कारभाराला उत्तर देणे गरजेचे आहे आणि मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे राखून तसे उत्तर देण्याची नामी संधी मुंबईकर मतदारांना प्राप्त झाली आहे.
एकूणच कुठलेतरी काल्पनिक शत्रू उभे करायचे आणि त्यापासून केवळ आपणच लोकांचे रक्षण करू शकतो असे चित्र उभे करायची कला शिवसेना सोडून इतर कोणालाच इतक्या पूर्णपणे जमलेली नाही. भाजपवाले मोदींच्या नावावर महापालिका निवडणुकांमध्ये मते मागत असतील तर ते जितके चुकीचे आहे तितकेच महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने मोदी-शहा जोडगोळीला उत्तर द्यायची अपेक्षा करणे. महापालिकेत शिवसेनेची कामगिरी काय आहे? मुंबईतले रस्ते कसे आहेत हे सर्वांनाच माहित आहे. प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी मुंबई बंद पडतेच. आणि मुंबईत गेल्या ३२ पैकी २८ वर्षे महापौर देणार्‍या आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविणार्‍या शिवसेनेवर या प्रश्नाचे उत्तर द्यायची जबाबदारी सर्वात जास्त आहे. ते न करता आपल्या अपयशाला झाकण्यासाठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार व्हावे लागेल वगैरे कोल्हेकुई करायची याला काय अर्थ आहे? तुम्ही जर महापालिका निवडणुकांमध्ये मोदींचे नाव वापरणार असाल तर मग त्या नावावर भाजप मते मागायचा प्रयत्न करत असेल ते चुकीचे कोणत्या तोंडाने म्हणणार? या निवडणुकांमध्ये मोदी हा मुद्दा नाहीच आणि शहा तर त्याहूनही नाही. तुमच्या महापालिकेतल्या कामगिरीविषयी बोला आणि त्या आधारावर मते मागा. ती कामगिरी अत्यंत सुमार आहे. म्हणूनच सगळ्यात महत्वाचा मुद्दा-- तुमची कामगिरी सोडून इतर सर्व गोष्टींविषयी बडबड चालू आहे. आणि मनमानी म्हणाल तर शिवसेनेत अगदी सगळे लोकशाही मार्गानेच चालते नाही का?
२२% लोकसंख्येतील काही मंडळी शिवसेनेचे कायम विरोधक म्हणूनच भूमिका निभावत आले. समाज माध्यमात या घटनेकडे नकारार्थी दृष्टीने पाहून सेनेला दोष देणारे मराठीच आघाडीवर आहेत. ईश्वर या सर्वांचे भले करो.
तांत्रिकदृष्ट्या माझे नाव मुंबईच्या मतदारयादीत नाही त्यामुळे मी त्या २२% पैकी नाही. पण शिवसेनेचा विरोधक मात्र नक्कीच आहे. अगदी पहिल्यापासून शिवसेनेची गुंडगिरी, शिवराळ भाषा, उगीचच भावना भडकावायची वाईट खोड या सगळ्या गोष्टी कधीच आवडल्या नाहीत. तरीही वाजपेयींसारखे नेते बाळासाहेबांना मान द्यायचे म्हणून माझ्यासारखे अनेक लोक इच्छेविरूध्द शिवसेनेचे समर्थन करत होते. आता बाळासाहेब नाहीत आणि वाजपेयीही सक्रीय नाहीत. अशा परिस्थितीत उधोजीरावांनी त्यांचे खरे रंग दाखवून दिल्यानंतर शिवसेनेचे समर्थन करायची अजिबात गरज मला तरी वाटत नाही. तरीही आमचे भले व्हावे यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात त्याबद्दल आभारी आहे. खरे सांगायचे तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली, स्वतंत्र झाली, केंद्रशासित झाली तरी नक्की काय फरक पडणार आहे? तो निर्णय घेताना केवळ तसे केल्याने मुंबईचा कारभार सक्षमपणे चालायला मदत होईल का हा आणि हाच एकमेव मुद्दा हवा. मराठी बाणे वगैरे गेले उडत. मी मुंबईत दररोज नोकरीनिमित्ताने जातो तेव्हा मला मुंबईत चांगले रस्ते, बेस्टच्या मार्गांवर भरपूर बस, पावसाळ्यात पाणी न तुंबणे अशा माफक अपेक्षा आहेत. या अपेक्षा महापालिकेच्या कार्यकक्षेत आहेत. त्या पूर्ण झाल्या की झाले. मग मुंबई महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या किंवा मुंबई गुजरातमध्ये जाऊन गुजरात सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या किंवा केंद्रशासित राहून केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या काय-- नक्की काय फरक पडतो? शिवसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्‍यांनाही त्यामुळे खरा तर घंटा काही फरक पडणार नाही पण होते असे की मराठी बाणा ही अफूची गोळी शिवसेनेने देऊन ठेवली आहे त्यामुळे महत्वाच्या मुद्द्यांपेक्षा लोक असल्या फालतू मुद्द्यांना भूलतात.

अनुप ढेरे नवीन

In reply to by गॅरी ट्रुमन

बाकी उओधोजीरावांनी काय विचार करून हार्दिकला गुजरात मुख्यमंत्री उमेदवार बनवलं समजत नाही. हार्दिक पटेल आत्ता २३ वर्षाचा आहे. आमदार होण्यासाठी वयाची २५ वर्ष पूर्ण केलेली असणं अपेक्षित आहे. गुजरात निवडणुका याच वर्षी आहेत. कस्काय मुख्यमंत्री बनणार तो?

श्रीगुरुजी नवीन

In reply to by अनुप ढेरे

एवढा सारासार विचार करण्याची पात्रता शिवसेनेकडे नाही. आदित्यला २०१७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभे करणार हे पण ते उद्या जाहीर करतील.

गामा पैलवान नवीन

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन,
खरे सांगायचे तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली, स्वतंत्र झाली, केंद्रशासित झाली तरी नक्की काय फरक पडणार आहे? तो निर्णय घेताना केवळ तसे केल्याने मुंबईचा कारभार सक्षमपणे चालायला मदत होईल का हा आणि हाच एकमेव मुद्दा हवा. मराठी बाणे वगैरे गेले उडत.
ये हुई ना बात. असे स्पष्ट विचार पाहिजेत. तर मराठी बाण्याचा आणि गटारं तुंबण्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. मुंबई केंद्रशासित करून हे प्रश्न सुटण्याची जराही ग्वाही देता येत नाही. दिल्लीत कचऱ्याचे ढीग जागोजागी जमले आहेत. कचरावाल आणि त्याचं मंत्रिमंडळ जगभर उंडारण्यात मग्न आहेत. केंद्रशासित राहून काय मोठे दिवे लावलेत दिल्लीने? थोडं स्वातंत्र्यलढ्याकडे वळूया. त्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र आघाडीवर होते. आज पंजाब आणि बंगाल अर्धे कापले गेले आहेत. महाराष्ट्र कापायचा का? मुंबई केंद्रशासित करणे याचा अर्थ महाराष्ट्राचे तुकडेतुकडे पडणे असाच आहे. गटारं तुंबतात म्हणून शिवसेनेस जबाबदार ठरवणं सोपं आहे. पण आज कित्येक हजार लोक दररोज मुंबई आणि परिसरात येऊन आदळत आहेत याची तड लावायची कोणी? आ.न., -गा.पै.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by गॅरी ट्रुमन

खरे सांगायचे तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली, स्वतंत्र झाली, केंद्रशासित झाली तरी नक्की काय फरक पडणार आहे? तो निर्णय घेताना केवळ तसे केल्याने मुंबईचा कारभार सक्षमपणे चालायला मदत होईल का हा आणि हाच एकमेव मुद्दा हवा. मराठी बाणे वगैरे गेले उडत. मी मुंबईत दररोज नोकरीनिमित्ताने जातो तेव्हा मला मुंबईत चांगले रस्ते, बेस्टच्या मार्गांवर भरपूर बस, पावसाळ्यात पाणी न तुंबणे अशा माफक अपेक्षा आहेत. या अपेक्षा महापालिकेच्या कार्यकक्षेत आहेत. त्या पूर्ण झाल्या की झाले. मग मुंबई महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या किंवा मुंबई गुजरातमध्ये जाऊन गुजरात सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या किंवा केंद्रशासित राहून केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण केल्या काय-- नक्की काय फरक पडतो? शिवसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्‍यांनाही त्यामुळे खरा तर घंटा काही फरक पडणार नाही पण होते असे की मराठी बाणा ही अफूची गोळी शिवसेनेने देऊन ठेवली आहे त्यामुळे महत्वाच्या मुद्द्यांपेक्षा लोक असल्या फालतू मुद्द्यांना भूलतात.
मुंबई महाराष्ट्रातच हवी. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करणे महाराष्ट्रासाठी हानिकारक ठरेल. एक तर मुंबई हा महाराष्ट्रासाठी भावनिक मुद्दा आहेच. तसाच तो आर्थिक मुद्दा सुद्धा आहे. एकट्या मुंबईतून प्रचंड प्रमाणात कर गोळा होतो. त्यातला काही वाटा केंद्राला जातो तर काही राज्याकडे येतो. मुंबईतून राज्याला मिळणारा सर्व कर फक्त मुंबईसाठीच वापरला जातो असे नाही. तो फक्त मुंबईसाठीच वापरला जावा असे कायदेशीर बंधनही नाही. महाराष्ट्रात इतरत्र त्याचा वापर होऊ शकतो. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली तर राज्याला मुंबईतून मिळणारा महसूल बंद होईल. त्याचा उर्वरीत राज्याला सुद्धा फटका बसेल. मुंबई महाराष्ट्रात असल्याने काही प्रमाणात तरी तिथे मराठी लोकांना संधी उपलब्ध आहेत. मुंबई बाहेर गेली तर आहेत त्या थोड्याफार संधीही संपुष्टात येतील. मुंबईच्या दुर्दशेला फक्त महापालिका, राज्य किंवा नाकर्ते राज्यकर्ते कारणीभूत नाहीत. मुंबईत रोज मोठ्या संख्येने येऊन कायमस्वरूपी मुक्काम ठोकणार्‍या परप्रांतियांचा सुद्धा मुंबईची वाट लावण्यात वाटा आहे. बेस्टने रस्त्यावर किती बसेस आणाव्यात किंवा किती लोकल्स रोज पळाव्यात यावर मर्यादा आहेत. उद्या मुंबईची लोकसंख्या २ कोटींऐवजी ४ कोटी झाली तर लगेच बसेस किंवा लोकल्स दुप्पट करता येणार नाहीत. मुंबईत येण्यासाठी परमिट व्यवस्था सुरू करणे आवश्यक आहे. एखाद्या शहरात राहण्यासाठी राज्यघटनेने बंदी घातलेली नाही याचा अर्थ असा नाही की सर्वांनीच तिथे जाऊन मुक्काम ठोकावा आणि स्वतःबरोबरच इतरांचे जगणेही अवघड करून टाकावे.

गॅरी ट्रुमन नवीन

In reply to by श्रीगुरुजी

हा प्रतिसाद श्रीगुरूजी आणि गामा पैलवान या दोघांनाही आहे. मुंबई वेगळी करावीच किंवा करूच नये यापैकी मी काहीही म्हणत नाही. ज्यामुळे प्रशासकिय सोय होईल आणि शहराच्या विविध समस्या सोडवायला अधिक सोपे जाईल तो निर्णय घ्यावा आणि जो कुठचा निर्णय होईल त्यात केवळ मुंबईच्या समस्या कशा दूर होतील हाच एकमेव आधार असावा. फुकाच्या मराठी बाण्यांना फाट्यावर मारावे एवढेच माझे म्हणणे आहे. मुंबई कुठेही असेल तिथे-- महाराष्ट्रात, गुजरातमध्ये की केंद्रशासित प्राथमिकता ही या समस्या सोडवायलाच असायला हवी.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by गॅरी ट्रुमन

मुंबईच्या समस्या सोडविणे यालाच प्राथमिकता असायला हवी हे बरोबर आहे. परंतु त्यासाठी मुंबई वेगळे राज्य करणे किंवा केंद्रशासित करणे हा उपाय नाही. असे करणे म्हणजे "रोगापेक्षा इलाज भयंकर" अशी अवस्था होईल.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by जय२७८१

वास्तव असे आहे कि, शिवसेनेच्या तिकिटावर पश्चिम उपनगरात पालिका निवडणूक लढविणाऱ्या गुर्जर भाषिक मित्राला (आता सेनेला मराठी उमेदवार मिळाला नाही का? असा प्रश्न विचारू नका) शुभेच्छा प्रदान करण्यासाठी आणि जमल्यास त्याच्या प्रचारासाठी हार्दिक मुंबईत आला. मुंबई - महाराष्ट्रात येणारी अनेक नेते मंडळी मातोश्रीवर जाऊन ठाकरे परिवाराची शुभेच्छा भेट घेतात.
या बातमीत पूर्णपणे वेगळीच माहिती आहे. ही भेट अचानक झालेली नसून पूर्वनियोजित होती. या वृत्तानुसार "विधानसभा निवडणुकीत भाजपने युतीबाबत दिलेला धक्का लक्षात घेता शिवसेनेने पालिका निवडणुकीसाठी अत्यंत सावधपणे रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने मुंबईमधील पाटीदार समाजाला आपलेसे करण्यासाठी हार्दिक पटेलची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. "
पूर्वनियोजित नसलेली हि भेट जेव्हा व्यापक चर्चा करून संपते तेव्हा हार्दिक पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी म्हणतो "शेर जंगल मे रहे या पिंजरे मे, शेर शेर ही होता है, इनको (शिवसेना) किसकी जरुरत नाहीं, यह लोगो की मदत करते है. इन्होने मुझे बुलाया नही बल्की मै इनके आशिर्वाद लेने आया हूं. " राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवा, इ राज्यात शिवसेनेने शिरकाव केल्यानंतर गुजरात मध्ये त्यांना हार्दिकचा चेहरा मिळणार असेल आणि सेनेचे पाय रोवले जाणार असतील तर त्यात वावगे ते काय ? हार्दिक पटेल आणि कन्हैय्या कुमार या दोन भिन्न व्यक्ती आणि प्रवृत्ती आहेत. हार्दिक राष्ट्रद्रोही वक्तव्ये न करता पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी गुजरात मध्ये लढा देतोय तर कन्हैय्या आपलेच खाऊन आपल्याच मातीत राहून राष्ट्द्रोही भाषणे देतोय. राहिला प्रश्न त्याचि मदत घेण्याचा. त्याची मदत मागायला कुणी गेले नव्हते. त्यामुळे समाजमाध्यमात चालत असलेल्या चर्चेला तेथेच पूर्णविराम मिळतो.
ही भेट पूर्वनियोजितच होती. या भेटीची तयारी अत्यंत गुप्ततेने करण्यात आली होती. त्यासाठी एक खाजगी विमान ठरविलेले होते. भाजपला अंधारात ठेवण्यासाठी तीन वेगवेगळ्या राज्यांचा प्रवास करून हे खाजगी विमान शेवटी मुंबईत उतरले. गुजराती मते मिळविण्यासाठीच त्याची मदत शिवसेनेने मागितली आहे. इतर राज्यात शिवसेनेने पाय पसरण्यात काहीच वावगे नाही. परंतु मुंबईत गुजरात्यांना शिव्या द्यायच्या आणि त्याच गुजरात्यांच्या मतांसाठी गुजराती हार्दिकचे पाय धरायचे हा विरोधाभास नाही का? आयुष्यभर जातीवर आधारीत राखीव जागांना विरोध करायचा आणि राखीव जागांची मागणी करणार्‍याचेच पाय धरायचे हा विरोधाभास नाही का? हार्दिक स्वतः दुसर्‍या वर्गात बी कॉम झालेला आहे. अशी सामान्य कामगिरी करणार्‍याने गुणवत्तेच्या गफ्फा माराव्यात हे आश्चर्यकारक आहे. राखीव जागांचे आंदोलन करताना "पोलिसांवर हल्ले करा", "पोलिसांना मारून टाका", "नासधूस करा" असे तो आपल्या सहकार्‍यांना फोनवरून सांगत होता व त्याचे फोनकॉल्स पोलिसांनी रेकॉर्ड केले होते. याच कॉल्सच्या आधारावर पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता व न्यायालयाने देखील त्याच्यावरील देशद्रोहाच्या गुन्ह्याचे कलम काढण्यास नकार दिला होता.
सगळ्यांत महत्वाचे म्हणजे मुंबई शहरात २२% मराठी आणि उर्वरित ७८% अमराठी भाषिक रहातात. शिवसेनेने जात - पात - भाषा - प्रांत भेद कधी मानला नाही.
शिवसेनेने हा एक मोठा भ्रम पसरविला आहे. सुरवातीच्या काळात शिवसेना दाक्षिणात्यांविरूद्ध आंदोलन करीत होती. नंतर बिहारी, उत्तर प्रदेशांविरूद्ध आंदोलन झाले, त्यानंतर गुजरात्यांना शिव्या हासडून झाल्या. शिवसेना कायम एक काल्पनिक शत्रू उभा करून आपण त्या शत्रूविरूद्ध लढत आहोत असा आभास निर्माण करीत असते. अगदी जातीची फूटपट्टी लावायची झाली तर शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी तब्बल फक्त १४ खासदार एकाच जातीचे कसे आहेत याचे उत्तर उधोजी देतील का?
हिंदुस्थानात हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रात मराठी माणसासाठी शिवसेना लढत राहिली.
महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी व हिंदूंसाठी शिवसेना लढत राहिली हा अजून एक भ्रम पसरविला गेला आहे. काँग्रेस व इतर पक्षांपासून आपले वेगळेपण दाखविण्यासाठी शिवसेनेने मराठी मुद्दा उचलला. प्रत्यक्षात शिवसेनेने मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबई व इतर शहरातील अमराठींचे लोंढे रोखण्यासाठी फारसे काहीही केलेले नाही. ज्यांची मुले कॉन्वेंटमध्ये शिकली त्यांचा मराठीपणाचा मुद्दा म्हणजे तद्दन भंपकपणा आहे. शिवसेनेने आजवर अनेक अमराठी नेत्यांना व उद्योगपतींना राज्यसभेची तिकिटे विकली (राम जेठमलानी, चंद्रिका केनिया, प्रीतीश नंदी, संजय निरूपम, राजकुमार धूत, राहुल बजाज, मुकेश पटेल इ.). राज्यसभेची खासदारकी देताना यांना मराठी चेहरे आठवले नाहीत? मुंबईत येणार्‍या अमराठींना शिधापत्रिका, दाखला इ. देऊन त्यांचे मुंबईतील वास्तव्य कायमस्वरूपी करण्यामध्ये इतर पक्षांबरोबरच शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आहेत. परंतु यात जास्त दोष शिवसेनेचा आहे कारण महापालिकेत अनेक वर्षे सत्ताधारी पक्ष असल्याने त्यांचीच जबाबदारी जास्त आहे.
मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व राखण्यासाठी हार्दिकला प्रचारासाठी उतरविले जाणार असेल तर त्याचे स्वागतच आहे.
शिवसेनेचे नगरसेवक भाजपच्या जीवावर निवडून येत होते. भाजपमुळेच त्यांना अमराठी मते मिळत होती. आता भाजप स्वतंत्र लढत असल्याने शिवसेनेला फारशी अमराठी मते मिळणार नाहीत. या वास्तवाचे भान आल्याने गुजराती मतांसाठी उधोजींना हार्दिकचे पाय धरावे लागले. मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व गगैरे राखण्यासाठी हार्दिकला प्रचारासाठी उतरविले जाणार नसून त्याच्या माध्यमातून अमराठी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न होत आहे.
आम्हांस कालपासून भेटलेल्या अनेक अमराठी मंडळींनी देखील या घटनेचे स्वागतच केले आहे. मोदी - शहा या जोडगोळीच्या मनमानी कारभाराला उत्तर देणे गरजेचे आहे आणि मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे राखून तसे उत्तर देण्याची नामी संधी मुंबईकर मतदारांना प्राप्त झाली आहे. २२% लोकसंख्येतील काही मंडळी शिवसेनेचे कायम विरोधक म्हणूनच भूमिका निभावत आले. समाज माध्यमात या घटनेकडे नकारार्थी दृष्टीने पाहून सेनेला दोष देणारे मराठीच आघाडीवर आहेत. ईश्वर या सर्वांचे भले करो.
मोदी-शहा हे राष्ट्रीय राजकारणात आहेत. महापालिकेचा व त्यांचा संबंध नाही. मुंबई महापालिकेत कोणालाही सत्ता मिळाली तरी त्यांना शष्प फरक पडणार नाही. शिवसेनेने मराठी मराठी असा घोष करीत मराठी माणसांचीच फसवणूक केली आहे. अशा पक्षाला शिक्षा मिळालीच पाहिजे. शिवसेना व त्यांचे नेते यांचे बांगलादेशचा क्रिकेट संघ व तेथील जनता यांच्यात विलक्षण साम्य आहे. बांगलाच संघ तसा लिंबूटिंबू. पण प्रचंड माज करतात. बहुतेक वेळा ते इतरांकडून हरतात. क्वचित कधीतरी जिंकतात. अनेक सामने लागोपाठ हरल्यानंतर जेव्हा एखादा विजय मिळतो तेव्हा आपण फार थोर आहेत असे दाखवित प्रचंड माज करतात व दुसर्‍या संघाला अत्यंत खालच्या पातळीला जाऊन खिजवतात. त्यामुळे बांगलाच्या प्रेक्षकांवर व संघावर इतर सर्व देश अत्यंत चिडून आहेत. गतवर्षी भारत बांगलात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका १-२ अशी हरल्यावर त्यांनी कोहली व इतर खेळाडूंचे बांगलाच्या गोलंदाजांनी मुंडने केल्याचे अत्यंत असभ्य व्यंगचित्र छापले होते. मागील वर्षी ट-२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरूद्ध शेवटच्या ३ चेंडूत विजयासाठी फक्त २ धावा हव्या असताना भारताने तीनही चेंडूंवर बांगलाचे ३ फलंदाज बाद करून सामना १ धावेने जिंकला होता. नंतर उपांत्य फेरीत भारताचा विंडीजकडून पराभव झाल्यावर बांगलाच्या मुशफकीरने ट्विटरवरून अत्यंत आनंद व्यक्त केल्यावर गावसकरने भारताने जिंकलेल्या सामन्याचे शेवटच्या क्षणाचे चित्र टाकून "आता हसून दाखव" असा टोमणा मारल्यानंतर त्याने घाईघाईत आपले ट्विट काढून टाकले होते. २०१५ च्या विश्वचषक स्पर्द्घेत भारताकडून पराभव झाल्यावर तर संपूर्ण बांगलादेशाने थयथयाट केला होता. त्यांच्या क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षाने (जो आयसीसी चा सुद्धा अध्यक्ष होता) तर अंतिम सामन्यावरच बहिष्कार टाकला. त्यांच्या पंतप्रधाने शेख हसीना यांनीही सामन्यावर टीका केली होती. एका सामन्यातील पराभव इतका जिव्हारी लागावा हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या संघाने बांगलात जाऊन बांगलाला हरविताना बांगलाच्या खेळाडूंनी इंग्लिश खेळाडूंना खिजविणारे टोमणे मारल्याने इंग्लिश खेळाडूही भडकले होते. शिवसेनेचं बांगलासारखंच आहे. कधीतरी एखाद्या नगरपालिकेची निवडणुक जिंकल्यावर अगदी जग जिंकल्याच्या थाटात ते आनंदोत्सव साजरा करतात. जेव्हा त्यांच्यावर टीका होते किंवा ते हरतात तेव्हा ते अत्यंत खालच्या पातळीवर उतरतात. फुशारक्या आणि वल्गना तर विचारायलाच नको. भाजपबरोबर युती तोडली हा निर्णय त्यांनी अत्यंत परिपक्वतेने स्वीकारणे आवश्यक होते. परंतु परिपक्वतेचा संपूर्ण अभाव असल्याने त्यांचा थयथयाट सुरू आहे.

मोदक नवीन

In reply to by श्रीगुरुजी

बाकी जाऊद्या.. पण हार्दिक स्वतः दुसर्‍या वर्गात बी कॉम झालेला आहे. अशी सामान्य कामगिरी करणार्‍याने गुणवत्तेच्या गफ्फा माराव्यात हे आश्चर्यकारक आहे. या न्यायाने मी मिपावर प्रतिसाद दिले तर चालतील ना..? माझी शैक्षणीक कामगिरी अत्यंत सामान्य आहे.

चिर्कुट नवीन

In reply to by श्रीगुरुजी

हार्दिक स्वतः दुसर्‍या वर्गात बी कॉम झालेला आहे. अशी सामान्य कामगिरी करणार्‍याने गुणवत्तेच्या गफ्फा माराव्यात हे आश्चर्यकारक आहे. >> एवढा मोठ्ठा फुलटॉस..?? आपल्या 'एंटायर पॉलिटिकल सायन्स' वाल्या प्रधानसेवकांनी किंवा येल युनिव्हर्सिटी वाल्या इराणी काकूंनी मात्र जगातल्या कुठ्ल्याही विषयावर गफ्फा हाणल्या तरी चालतं का?

जय२७८१ नवीन

(स्वतः बाळासाहेबांनी कायमच जातीवर आधारीत आरक्षणाचा विरोध केला होता ) हो आजही शिवसेनेची हीच भूमिका कायम आहे मात्र सरकार एका जातीला आरक्षण देते आणि दुसर्या जातीला वाऱ्यावर सोडतेय. तुम्ही आरक्षण देताच आहेत तर मागासलेल्या सर्वच जातींना आरक्षण द्या. हि ठाम भूमिका शिवसेना मांडते. भाजप वाले पुढे जाऊन मोदी-शहाना ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना सुद्धा बोलावू शकतात. आणि त्यात काही नवल नाही. कारण मुळी त्याच्याच नावावर हे पोट भरतात. आता बघाना भाजप मध्ये कुणाला हि घ्या. कसा स्वच्छ व पवित्र होतो. मग तो जेलची हवा खाणारा खुनी पप्पू कलानी का नसो. सब धूल जात है. ह्यांना फक्त शिवसेनेची ऍलर्जी ....! मुंबई महानगर पालिका शिवसेने कडे म्हणजे संपूर्ण मुंबई शिवसेने कडे असे होत नाही. MMRD मुख्यमंत्री पाहतात तर काही भाग केंद्रसरकार पाहते . मागे लालबागचा ब्रिजला भेगा पडल्या म्हणून बंद केला. तर म्हणे BMC काय करते, पैसे खालले असतील, अमुक-तमुक ....आणि तो ब्रिज MMRD चा होता. तसेच मुंबई मधील अनेक भाग केंद्रसरकारच्या अखत्यारीत येतात. काही रस्ते तर खाजगी मालकीच्या जागेत हि आहेत. पण सगळ्याला जवाबदार शिवसेना .....! मुंबई मध्ये येणारे परप्रांतीय, दिवसेन दिवस वाढतच आहेत. आणि त्या मुळे येथील प्रत्येक साधन सामुग्रीवर प्रचंड भार येतोय. जर इतर राज्याची व गावांची प्रगती झाली. त्यांना तिथे रोजगार मिळाला. तर मग तुमच्या सारख्याना नोकरीनिमित्ता मुंबई यायची गरज भासणार नाही. असो तुम्ही शिवसेनेला विरोध करत राहा आणि २२ % चे २ % कधी होतात त्याची वाट पहा.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by जय२७८१

(स्वतः बाळासाहेबांनी कायमच जातीवर आधारीत आरक्षणाचा विरोध केला होता ) हो आजही शिवसेनेची हीच भूमिका कायम आहे मात्र सरकार एका जातीला आरक्षण देते आणि दुसर्या जातीला वाऱ्यावर सोडतेय. तुम्ही आरक्षण देताच आहेत तर मागासलेल्या सर्वच जातींना आरक्षण द्या. हि ठाम भूमिका शिवसेना मांडते.
नाही. जातीवर आधारीत राखीव जागा न देता त्या आर्थिक आधारावर दिल्या पाहिजेत अशी सेनेची भूमिका होती. यांना देत आहात तर त्यांना पण द्या अशी त्यांची भूमिका नव्हती. परंतु आता मराठ्यांना राखीव जागा देण्यासाठी पाठिंबा देऊन व राखीव जागांचे आंदोलन करणार्‍या हार्दिकचे पाय धरून शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. बदलण्यास हरकत नाही. पण निदान बदललेल्या भूमिकेवर तरी ठाम रहा.
भाजप वाले पुढे जाऊन मोदी-शहाना ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना सुद्धा बोलावू शकतात. आणि त्यात काही नवल नाही. कारण मुळी त्याच्याच नावावर हे पोट भरतात. आता बघाना भाजप मध्ये कुणाला हि घ्या. कसा स्वच्छ व पवित्र होतो. मग तो जेलची हवा खाणारा खुनी पप्पू कलानी का नसो. सब धूल जात है. ह्यांना फक्त शिवसेनेची ऍलर्जी ....!
जर एखादा पक्ष आपल्या सर्व शक्तिनिशी निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यात चुकीचे काय? त्यात काही घटनाविरोधी, बेकायदेशीर, अनैतिक किंवा चुकीचे आहे का? स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारे शरद पवार सुद्धा महापालिका निवडणुकीत हिरिरीने प्रचार करतात. स्वच्छ आणि पवित्र म्हणाल तर शिवसेनेतील खिमबहादुर थापा, राणे इ. मंडळी आठवत असतीलच. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाहेरून येणार्‍यांना तिकिट देणार्‍या पक्षांमध्ये शिवसेना प्रथम क्रमांकावर होती.
मुंबई महानगर पालिका शिवसेने कडे म्हणजे संपूर्ण मुंबई शिवसेने कडे असे होत नाही. MMRD मुख्यमंत्री पाहतात तर काही भाग केंद्रसरकार पाहते . मागे लालबागचा ब्रिजला भेगा पडल्या म्हणून बंद केला. तर म्हणे BMC काय करते, पैसे खालले असतील, अमुक-तमुक ....आणि तो ब्रिज MMRD चा होता. तसेच मुंबई मधील अनेक भाग केंद्रसरकारच्या अखत्यारीत येतात. काही रस्ते तर खाजगी मालकीच्या जागेत हि आहेत. पण सगळ्याला जवाबदार शिवसेना .....! मुंबई मध्ये येणारे परप्रांतीय, दिवसेन दिवस वाढतच आहेत. आणि त्या मुळे येथील प्रत्येक साधन सामुग्रीवर प्रचंड भार येतोय. जर इतर राज्याची व गावांची प्रगती झाली. त्यांना तिथे रोजगार मिळाला. तर मग तुमच्या सारख्याना नोकरीनिमित्ता मुंबई यायची गरज भासणार नाही. असो तुम्ही शिवसेनेला विरोध करत राहा आणि २२ % चे २ % कधी होतात त्याची वाट पहा.
मुंबईत येणार लोंढे थांबविण्यासाठी हे अधिकार महापालिकेला असतात ते तरी सेनेने वापरले होते का? परप्रांतियांना १५ वर्षे वास्तव्याचा अधिवास दाखला देणे, शिधापत्रिका मिळवून देणे, मतदार यादीत नाव नोंदविणे इ. प्रकार करण्यामध्ये सेनेचेही नगरसेवक होते. किती सरकारी/खाजगी भूखंडांवरील अतिक्रमणे/झोपडपट्ट्या सेनेने उठविल्या? १९९७ ते १९९९ या काळात सेना महापालिका, राज्य व केंद्र अशा तीनही ठिकाणी सत्तेत होती. त्या काळात हे काम करण्यास कोणाचीही आडकाठी नव्हती. तरीसुद्धा सेना का गप्प राहिली? १९९९ मध्ये पुण्यातील अतिक्रमणे हटविणार्‍या आयुक्त अरूण भाटियांची फक्त ६ दिवसात कोणी हकालपट्टी केली? ४-५ महिन्यांपूर्वी आयुक्त तुकाराम मुंडेंना हटविण्यात कोणाकोणाचा सहभाग होता? आपण मराठीचे कैवारी अशा सेना फक्त गफ्फा हाणते. प्रत्यक्ष कागगिरी शून्य आहे.

वरुण मोहिते नवीन

In reply to by श्रीगुरुजी

तुकाराम मुंढेंना हटविण्यात मंदा म्हात्रे आघाडीवर होत्या ज्या भाजप च्या आहेत .सगळे पक्ष आले कारण अनधिकृत बांधकाम आणि मुळात पाडल्यावर सोय कशी करणार लोकांची हा प्रश्न त्यामुळे सर्वपक्षीय होते . अरुण भाटियांनी हकालपट्टी बाबत हि तसेच सर्वपक्षीय . ४००४ आणि २००९ ला मग पुणेकरांनी त्यांना निवडून का दिले नाही ??काहींच्या काही स्टेटमेंट आणि रोख सेनेवर .. भाजप ची एक सेल आहे मुंबईत उत्तर भारतीय विकास मंच म्हणून त्यात किती मतदार यादीत नवे नोंदवली गेली ते पण अनधिकृत पणे हे हि पाहून घ्या . मुंबईवर येणारा लोंढाच इतका आहे कि अनधिकृत बांधकाम झोपडपट्ट्या रातोरात हटवणे सोपे नाहीये . पर्यायी योजना काय ,केंद्र सरकार ,राज्य सरकार ,धोरण ,मतदार असे अनेक मुद्दे आहेत .सर्वच शहरांना हि परिस्तिथी लागू आहे . उदाहरण म्हणून दिल्ली महानगर पालिका पाहावे . स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणणारे शरद पवार -तो त्यांचा पक्ष आहे त्यांनी स्थापन केलेला त्यामुळे ते प्रचार करणारच . फक्त पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने पालिकेसाठी प्रचार करू नये असे संकेत आहेत . बाकी पक्षवाढीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करणारच ना. मागे नाही का विधानसभेला गुजरात वरून आमदारांची फौज मागवलेली गुजरात वरून . हार्दिक चे पाय वैग्रे धरून जरा अतीच होतंय का ? का भाषेला धार आलीये :) असं असत तर प्रचारात नसत का उतरवलं . भाजप वालेच ह्या घटनेला अजून प्रसिद्धी का देत आहेत बरं:)

श्रीगुरुजी नवीन

In reply to by वरुण मोहिते

तुकाराम मुंडेंना हटविण्याच्या ठरावावर फक्त भाजपच्या ६ नगरसेवकांनी विरूद्ध मतदान केलं होतं. उर्वरीत सर्व पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी त्यांना हटविण्याच्या बाजूने मतदान केलं होतं. नंतर फडणविसांनी आपल्या अधिकारात तो ठराव कचर्‍याच्या टोपलीत फेकून दिला व मुंड्यांना हटविले नाही. भाजप पक्ष या नात्याने मुंडे यांच्या बाजूनेच उभा राहिला. अरूण भाटियांच्या हकालपट्टीला काही नगरसेवकांनी विरोध केला होता. ते कोणत्या पक्षाचे होते ते आता लक्षात नाही. लिंक मिळाली तर देईन. अरूण भाटिया २००४ व २००९ मध्ये निवडून आले नाहीत कारण त्यांच्यामागे कोणताही पक्ष नव्हता. अपक्षाने निवडून येणे अवघड असते. पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने पालिकेसाठी प्रचार करू नये असा संकेत आहे आणि मोदी पालिकेसाठी प्रचार करणारच नाहीत. जरी तसे करणे बेकायदेशीर नसले तरी ते इतर सर्व माजी पंतप्रधानांप्रमाणे पालिकेच्या प्रचारात उतरत नाहीत.

वरुण मोहिते नवीन

In reply to by श्रीगुरुजी

कारण भाजपचे ६ नगरसेवकच आहेत पालिकेत . आणि या मोहिमेच्या प्रमुख मंद म्हात्रे होत्या . ज्या भाजपच्या आमदार आहेत

श्रीगुरुजी नवीन

In reply to by वरुण मोहिते

भाजप या पक्षाची भूमिका मुंडे यांच्या बाजूनेच होती व त्यानुसारच नगरसेवक व मुख्यमंत्री मुंडे यांच्या बाजूने उभे राहिले.

जय२७८१ नवीन

(ही भेट अचानक झालेली नसून पूर्वनियोजित होती.) शी गुरुजी आपण तर या आत्मविश्वासाने हे बोलता आहेत कि जसे तुम्ही हि त्याच विमानाने फिरत हार्दिक सोबत गप्पा मारत मुंबईत उतरलात.

श्रीगुरुजी नवीन

In reply to by जय२७८१

मी बातमीची लिंक दिलेली आहे. त्यात माझ्या मनचे काहीही नाही. जर भेट पूर्वनियोजित नसून अचानक झाली होती तर भेटीच्या आदल्या दिवसापासून "उद्या हार्दिक पटेल मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेणार" या बातम्या सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवर सातत्याने कशा आल्या असत्या?

संदीप डांगे नवीन

जर एखादा पक्ष आपल्या सर्व शक्तिनिशी निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यात चुकीचे काय? त्यात काही घटनाविरोधी, बेकायदेशीर, अनैतिक किंवा चुकीचे आहे का? स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारे शरद पवार सुद्धा महापालिका निवडणुकीत हिरिरीने प्रचार करतात. स्वच्छ आणि पवित्र म्हणाल तर शिवसेनेतील खिमबहादुर थापा, राणे इ. मंडळी आठवत असतीलच. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाहेरून येणार्‍यांना तिकिट देणार्‍या पक्षांमध्ये शिवसेना प्रथम क्रमांकावर होती.
श्रीगुरुजी, वरील विधानांचा अर्थ 'सर्वच पक्ष सारखेच' असा होतो... मग कायम भाजपचाच प्रचारकी किल्ला लढवत राहण्यामागची तुमची भूमिका काय आहे? कमाल आहे पण.. भाजपकडे बोट दाखवलं की गुरुजी दुसरीकडे बोट दाखवतात. भाजपवर भाजपशीच संबंधीत थेट प्रश्नांची थेट उत्तरे देत नाहीत. थेट बोललं की ह्यांना भाषा समजत नाही, वेगळा धागा काढून हवा असतो, पक्षाचं धोरण, इ. इ. कोलांट्याउड्या ठरलेल्याच!

श्रीगुरुजी नवीन

In reply to by संदीप डांगे

'सर्व पक्ष सारखेच' असा माझ्या विधानांचा अर्थ होत नाही. तसा सोयिस्कर अर्थ तुम्ही स्वतःच्या डोक्याने काढलेला आहे. एखाद्या नेत्याने निवडणुकीत प्रचारासाठी जाणे यात बेकायदेशीर काहीही नाही. जसे मोदी विधानसभेच्या प्रचारासाठी जातात तसेच पूर्वीचे पंतप्रधान सुद्धा जात होते. राजीव गांधी सुद्धा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आले होते.

संदीप डांगे नवीन

In reply to by श्रीगुरुजी

दुसरे दोन अडचणीचे मुद्दे (गुंड आणि इन्कमिंग) डावलले? हरकत नाही! तरीही कांग्रेस ने काय केलं हैचे दाखले देत आहात... काँग्रेस चे वागणे भाजपसाठी बेंचमार्क आहे जणू! :-)

श्रीगुरुजी नवीन

In reply to by जय२७८१

हार्दिक पटेलवर देशद्रोहाचे आरोप आहेत. शिवसेनेसारख्या प्रखर देशभक्त पक्षाला असा माणूस कसा चालतो? हार्दिक पटेल गुजरातमध्ये पटेल जातीसाठी राखीव जागा मिळाव्यात यासाठी आंदोलन करीत आहे. शिवसेने जातीआधारीत राखीव जागांना कायम विरोध केलेला आहे. असा राखीव जागांचा समर्थक शिवसेनेला कसा चालतो? हार्दिक पटेल मराठी नसून गुजराती आहे. शिवसेनेने सातत्याने विशेषतः २०१४ पासून गुजरात्यांना विरोध केलेला आहे. आता असा गुजराती माणूस शिवसेनेला कसा चालतो आणि गुजरात्यांची मते कशी चालतात?

पुंबा नवीन

१०) उल्हासनगर: इथे कलानी घराण्याची मोनोपॉली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर असेल.
आता कलानीचा दिवटाच भाजपच्या उमेदवारीवर लढतोय. भाजपाच्या फलकावर पप्पूसह मोदींची छबी झळकतेय. आता भाजपच पक्के हो उल्हासनगरात. टेन्शन नका घेऊ.

पुंबा नवीन

In reply to by संदीप डांगे

असेल ब्वा.. आता तिथले सच्छील, साधनशुचीता माननारे भाजपेयी कलानी घराण्याला अंतर्बाह्य शुद्ध करणार म्हणजे. खरं हो, भाजप आहे म्हणून नैतिकता टिकून आहे, वाल्यांचे वाल्मिकी करण्याच्या या धंद्यात अशा- नमो जोडीला यश मिळो.

श्रीगुरुजी नवीन

२०१४ पासून अनेक चुकीचे निर्णय घेणार्‍या उधोजींनी एकच योग्य निर्णय घेतला. तो म्हणजे त्यांनी मनसेशी युती करण्याचे टाळले. मनसेसारख्या मृतवत पक्षाशी युती करून त्या पक्षाला नवसंजीवनी देणे व आपला एक नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला विरोधक पुन्हा उभा करणे हे त्यांनी टाळून एक योग्य निर्णय घेतला.

जय२७८१ नवीन

मुंबईकरांनो, हा हिंदुस्थान टाईम्स मध्ये २७ सप्टेंबर, २०१६ ला प्रदर्शित झालेला लेख आहे. त्याची लिंक इथे देत आहे. .. http://www.hindustantimes.com/.../story... ... हे भाजपवाले, काँग्रेसवाले, मनसेवाले आणि राष्ट्रवादीवाले बोलत आहेत की, शिवसेनेने मुंबई महापालिका खड्यात घातली. पण या रिपोर्ट मध्ये असे दिसत आहे की, मुंबई खड्यात घालण्याचे काम हे भाजपचे "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस" व भाजपचे सार्वजिन बांधकाम खाते "मंत्री चंद्रकांत दादा पाटील" यांनी केले आहे. कारण मुंबई मधील खड्डे हे या दोघांच्या अखत्यारीतील असलेल्या म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडे असलेल्या MMRDA , मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडे असलेल्या PWD आणि MSRDC या दोन मंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे व या दोन खात्यांच्या ढिसाळ कारभाराचे मुळे मोठ्या प्रमाणात मुंबईत खड्डे पडलेले होते. पण या जुमलाबाजाच्या नेत्यांनी म्हणजे शेलार मियाँ व किरीट सोमैया या बोलबच्चन लोकांनी मीडियाशी हात मिळवणी करून यांच्या मंत्र्यांच्या खात्यांचे खापर मुंबई महानगर पालिकेच्या माथी फोडले व मुंबई महापालिकेची बदनामी केली आणि या बोलबच्चन लोकांच्या बोलबच्चनगिरीला तुम्ही भुलून तुम्हाला चांगले व दर्जेदार रस्ते, सेवा व सुविधा, चांगली आरोग्य सेवा, बेस्ट वाहतूक सेवा, मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई महापालिकेला तुम्ही वस्तू स्थिती न जाणून घेता शिव्या घालू लागलात. महापालिकेचा तिरस्कार करू लागलात. खरं तर त्या मध्ये तुमची चुकू नाही. तुम्हाला या सर्व गोष्टीची माहिती न्हवती त्यामुळे तुम्ही तसे केले असाल. पण आता सुज्ञ मुंबईकर व्हा. जागे व्हा.. खरं तर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील रस्ते हे मुंबई महापालिकेने चांगल्या प्रकारे मेनटेन केले होते व थोडे फार खड्डे उरले होते, त्याची जबाबदारी महापालिकेने घेतली होती व ते भरले पण होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री यांनी नेमलेल्या व त्यांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या आयुक्तांनीच याची कबुली दिली होती. आणि असेही सांगितले होते की मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी म्हणजे २०१५ च्या तुलनेत २०१६ ला फारच कमी खड्डे पडलेले आहेत, परंतु जे राज्य शासनाच्या अखत्यारी आहेत ते आम्ही भरू शकत नाही, तरी पण आम्ही मुंबईकरां खातीर जिथे जिथे शक्य झाले ते राज्य शासनाच्या अखत्यारीतील खड्डे महापालिकेने भरले आहेत. आता जे आरोप करत आहेत त्यांच्या बुडाखालीच अंधार होता पण तो लपवण्यासाठी त्यांनी त्याचे खापर महापालिकेवर,शिवसेनेवर फोडले. परंतु सत्य कधी लपून राहत नाही.

गॅरी ट्रुमन नवीन

In reply to by जय२७८१

खरं तर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील रस्ते हे मुंबई महापालिकेने चांगल्या प्रकारे मेनटेन केले होते व थोडे फार खड्डे उरले होते, त्याची जबाबदारी महापालिकेने घेतली होती व ते भरले पण होते
वाटेल त्या थापा मारू नका. मुंबईतल्या रस्त्यांवरचे खड्डे, प्रत्येक पावसाळ्यात मुंबई एकदा तरी बंद होणे हे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहेत.

जय२७८१ नवीन

वा हे बरे आहे. बीजेपीची ती सत्य वचने. बाकी सगळ्यानच्या थापा. महाड पूल १८० दिवसात बांधणार होते. पण पारदर्शक असल्याने तो दिसत नाही. राम मंदिराचे हि तेच .....प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख .....हा तर कहर होता पण असो भाजप म्हंटल कि कस सगळ स्वच्छ होते. मग तो पप्पू कलानी असो कि कि संबंध हिंदुस्तानातील गुंड्ड भाजपात आले कि वाल्याचे वालमीकी होतात. आणि मुख्यमंत्री ट्रक भर पुरावे कधी देतायेत तेही एकदा विचारा .....!

श्रीगुरुजी नवीन

आज घरी वॉर्डातील शिवसेनेच्या ४ उमेदवारांचे प्रचारपत्रक आले. रंगीत प्रचारपत्रक अगदी चकचकीत, गुळगुळीत कागदावर छापलेले आहे. पहिल्या पानावर चारही उमेदवारांचे चित्र व त्याखाली त्यांची नावे दिली आहेत. पक्षचिन्ह व पक्षाचे नाव आहे. दुसर्‍या पानावर राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष किती वाईट आहेत व दोन्ही पक्षांनी गेल्या अनेक वर्षात पुण्यात किती वाईट कामे केली आहेत याबद्दल १५-१६ बुलेट पॉईंट्स दिले आहेत. तिसर्‍या पानावर भाजप किती वाईट आहे, भाजपचे पुण्यातील आमदार व खासदार किती वाईट आहेत हे सांगणारी १०-१२ मुद्द्यांची जंत्री आहे. चौथ्या पानावर केंद्र सरकार किती वाईट आहे, मोदी किती वाईट आहेत, मोदींच्या राजवटीत इंधन तेलाचे भाव किती वाढले, सर्जिकल स्ट्राईक करूनसुद्धा अतिरेकी हल्ले कसे सुरू आहेत, अजून काळा पैसा बाहेर आला नाहीत वगैरे वगैरे सांगणारे १०-१२ मुद्दे आहेत. याव्यतिरिक्त या प्रचारपत्रकात काहीही नाही. शिवसेनेच्या उमेदवारांचं शिक्षण किती, पात्रता किती, आजवर त्यांनी कोणकोणते समाजकार्य केले याविषयी चारही पानात चकार शब्द नाही (शिक्षण जाहीरपणे सांगण्याइतकं घेतलं नसावं बहुदा). आपला पक्षा शिवसेना इतर पक्षांच्या तुलनेत कसा चांगला आहे, निवडून आल्यावर आपण नक्की काय करणार आहोत, पुणे शहराविषयी आपल्याकडे काय योजना आहेत, या शहरातील समस्या आपण कशा सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत यावर सुद्धा चारही पानात चकार शब्द नाही. संपूर्ण पत्रक "इतर पक्ष किती वाईट आहेत" या मध्यवर्ती कल्पनेवर केंद्रीत आहेत. समजा इतर पक्ष खूप वाईट असले तरी त्यामुळे शिवसेनावाले आपोआप चांगले ठरत नाहीत. मोदींविषयीचे मुद्दे तर हास्यास्पद आहेत. समजा पुण्यात शिवसेनेला बहुमत मिळाले तरी शिवसेनेचे पुण्यातले नगरसेवक इंधन तेलाचे भाव कमी करू शकणार आहेत का? ते पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया थांबवू शकणार आहेत का? गल्लीतल्या निवडणुकीत मोदींचा संबंध काय? अर्थात हे प्रश्न शिवसेनेला पडतच नाहीत. जेव्हा त्यांचे सर्वोच्च नेते उधोजी हेच प्रचाराचा संपूर्ण रोख शिवसेना कशी चांगली हे न सांगता मोदी/फडणवीस किती वाईट यावरच ठेवत आहेत, तिथे त्यांचे बगलबच्चे काय करणार? इतका नकारात्मक प्रचार आजवर पाहण्यात आला नाही. या सैल जिभेच्या नकली वाघोबांचा पराभव नक्की आहे.

अप्पा जोगळेकर नवीन

In reply to by श्रीगुरुजी

या सैल जिभेच्या नकली वाघोबांचा पराभव नक्की आहे. अं, त्यांना ८०-९० सीट मिळून तो सगळ्यात मोठा पक्ष ठरला तरी वाटच लागणार. कारण बीजेपी सोबत जावे तर राज्यातले सरकार पाडता येणार नाही. म्हणजे फडणवीसांच्या बरोबर फरफटत जायचे. राष्ट्रवादीसोबत जावे तर पवारांच्या नाकदुर्‍या काढाव्या लगणार. त्यांना ११७ + सीट मिळवाव्या लागतील. तेवढी लायकी नाही. एकूण उधोजी राजांनी अपमान झेलायची तयारी करुन ठेवलेली दिसते. बाकी काही असो पण या माण्साची क्षमता बाळासाहेबांच्या १०% सुद्धा नाही.

अभ्या.. नवीन

In reply to by श्रीगुरुजी

आज घरी वॉर्डातील शिवसेनेच्या ४ उमेदवारांचे प्रचारपत्रक आले.
सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो.
रंगीत प्रचारपत्रक अगदी चकचकीत, गुळगुळीत कागदावर छापलेले आहे.
न्युजप्रिंटवर छापायचे दिवस गेले आता. आजकाल सगळेच आर्ट पेपर वर छापतात. अपक्ष उमेदवार देखील. तुम्ही तर पुण्यामुंबईत राहता.
पहिल्या पानावर चारही उमेदवारांचे चित्र व त्याखाली त्यांची नावे दिली आहेत. पक्षचिन्ह व पक्षाचे नाव आहे.
सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो.
दुसर्‍या पानावर राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोन्ही पक्ष किती वाईट आहेत व दोन्ही पक्षांनी गेल्या अनेक वर्षात पुण्यात किती वाईट कामे केली आहेत याबद्दल १५-१६ बुलेट पॉईंट्स दिले आहेत.
सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो.
तिसर्‍या पानावर भाजप किती वाईट आहे, भाजपचे पुण्यातील आमदार व खासदार किती वाईट आहेत हे सांगणारी १०-१२ मुद्द्यांची जंत्री आहे.
सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो. विरोधी पक्ष बदलतात फक्त.
चौथ्या पानावर केंद्र सरकार किती वाईट आहे, मोदी किती वाईट आहेत, मोदींच्या राजवटीत इंधन तेलाचे भाव किती वाढले, सर्जिकल स्ट्राईक करूनसुद्धा अतिरेकी हल्ले कसे सुरू आहेत, अजून काळा पैसा बाहेर आला नाहीत वगैरे वगैरे सांगणारे १०-१२ मुद्दे आहेत.
सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो. इथले बीजेपीवाले सेनेला शिव्या देतात.
याव्यतिरिक्त या प्रचारपत्रकात काहीही नाही.
सगळ्यांचा तोच फॉर्म्याट असतो. . एकूण पाहता गुर्जी एक सांगतो बघा. प्रचाराचे फॉर्म्याट, अगदी पॅम्प्लेटपासून ते रिक्षातल्या ऑडिओपर्यंत ठरलेले असतात. मी स्वतः त्या व्यवसायात आहे. आम्ही फक्त उमेदवारांची नावे, प्रभाग क्र. अन चिन्हे बदलतो. टार्गेट पक्ष दिलेला असतो. त्यांना फॉर्म्याट्नुसार रीतसर शिव्या दिल्या जातात. सो. शिवसेनेने फार काही वेगळे केलेले नाहीये तसेच भाजपानेही.
इतका नकारात्मक प्रचार आजवर पाहण्यात आला नाही.
अगदी खरे. बीजेपीचा प्रचार पाहता तेच आढळले
या सैल जिभेच्या नकली वाघोबांचा पराभव नक्की आहे.
सगळ्यांच्याच सुटल्यात सैल. सगळे हरले तरी भारी वाटेल. (परत इलेक्शन, परत काम ;) )

वरुण मोहिते नवीन

In reply to by अभ्या..

आमच्याकडे वेगळा फॉरमॅट आहे प्रचारपत्रांचा भाजपच्या. पहिली गोष्ट प्रचारपत्रक अगदी साधं आहे गुळगुळीत वैग्रे काही नाही . साधी राहणी उच्च विचार सरणी हे तत्व आहे पक्षाचं . पहिल्याच पानावर फक्त उमेदवाराच्या डिग्र्या ,शिक्षण ,श्रेणी ह्याची माहिती आहे . दुसऱ्या पानावर विकासात्मक कामाचा अहवाल आहे. तिसऱ्या पानावर पुढे काय करणार ह्याची मांडणी आहे. कोणावर टीका नाही काही नाही मुद्याला धरून अगदी चक्क मोदींचा फोटो पण नाही वापरलाय . मोदींच्या नावावर मत पण नाही मागितलं . गरज काय अश्या निवडणुकांमध्ये केंद्र पातळीवरील गोष्टींची . चौथ्या पानावर भारत सरकार ची विकासकामे (इथे पण मोदी सरकार नाही म्हटलंय प्रचारपत्रकात )म्हणजे काळा पैसा,इंधनाचे भाव कसे कमी झाले , अतिरेक्यांचा बंदोबस्त ,कॅशलेस इंडिया वैग्रे वैग्रे उत्तम १०-१२ मुद्दे आहेत .आहे कि नाही मस्त प्रचारपत्रक .

श्रीगुरुजी नवीन

In reply to by अभ्या..

रोचक माहिती आहे. सेनेचं प्रचारपत्रक फारच नकारात्मक वाटलं म्हणून लिहिलं. इतरांच्या पत्रकात स्वत:विषयी, आपल्या कामाविषयी, आश्वासने, पक्षाविषयी थोडीशी माहिती आहे, पण सेनेच्या पत्रकात तसे काहीच दिसले नाही.

जय२७८१ नवीन

आत्ताच... 15 मिनिटापूर्वी घरी एक उमेदवार आला... पक्षाचं पत्रक वगैरे दिलं... आणि म्हणाला... "लक्ष ठेवा आणि आशिर्वाद असू द्या... राष्ट्रवादी समोरचंच बटण दाबा... आठवणीनं... " मी नेहेमीप्रमाणे मान हालवली... आणि दरवाजा लावून घेतला.... दोनंच मिनिटात परत बेल वाजली.... पुन्हा तोच उमेदवार.... चेहरा थोडा कावराबावरा करुन म्हणाला... "बी जे पी....बी जे पी समोरचं बटण दाबा...बरं का... चुकून राष्ट्रवादी तोंडात आलं.. सॉरी.. " अजून दरवाजा उघडाच आहे... काय माहित... अजून काही चेंज असेल तर.. परत येईल तो...

गामा पैलवान नवीन

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हप्र, असा कोणी लाजाबिजायला लागला तर आजिबात म्हणजे आज्जिब्बात मत देऊ नका. लोकप्रतिनिधी कसा निर्लज्ज हवा. आ.न., -गा.पै.

श्रीगुरुजी नवीन

सध्या कायअप्पावर एक पोस्ट फिरत आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणविसांनी मुंबईतील डंपिंग ग्राऊंड भ्रष्टाचार प्रकरणाचा उल्लेख केल्यावर लगेच त्याच दिवशी उशीरा शिवसेनेचे ४ मंत्री फडणविसांना भेटायला गेले होते. त्यांना भेटून बाहेर आल्यावर 'आम्ही शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी ही मागणी करण्यासाठी गेलो होतो' असा हास्यास्पद खुलासा त्यांनी केला होता. प्रचारसंहिता सुरू असताना कर्जमाफी घोषणा करणे शक्य नाही हे सर्वांना माहित असताना असा खुलासा करणे हास्यास्पद होते. त्यापाठोपाठ किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकर्‍यांचा ७ वेगवेगळ्या कंपन्यांशी संबंध असून त्यातून मनी लाँडरिंग होत आहे असा जाहीर आरोप केला आहे. मनी लाँडरिंगचा संबंध आला की लगेच ईडीची कार्यवाही सुरू होते. ईडीचा ससेमिरा उधोजींच्या मागे लागतो की काय या विचाराने सेना नेते वैतागले आहेत. खरे खोटे खुदा जाने.

श्रीगुरुजी नवीन

सकाळी मत द्यायला गेलो होतो. मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या नावासकट त्यांचे उत्पन्न, शिक्षण, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत इ. ची यादी लावली होती. पुण्यात ४ प्रभागांचा एक वॉर्ड केलेला आहे. प्रत्येकाला ४ मते द्यायची आहेत. चारही प्रभागात मत देण्यालायक एकही उमेदवार सापडला नाही. महिलांसाठी राखीव असलेल्या एका प्रभागात ६ महिला उमेदवारांपैकी सर्वाधिक शिक्षण घेतलेली महिला फक्त ५ वी पास होती, तर त्यातल्या ३ अशिक्षित होत्या. उर्वरीत प्रभागातील उमेदवारांपैकी बहुतेक उमेदवारांचे शिक्षण मॅट्रिक किंवा त्यापेक्षा कमी होते. अनेकांवर गुन्हे दाखल होते. कोरी पाटी फार थोड्या जणांची होती. शेवटी चारही प्रभागात 'नोटा'ला मत देऊन घरी आलो.

जय२७८१ नवीन

पार्टी विथ डिफ़रन्स अशी आपली ओळख मागल्या शतकाच्या अखेरीस भाजपाने करून दिलेली होती. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीनंतर कॉग्रेसचा अस्त होऊ लागल्यावर भाजपाने देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने पाऊल टाकताना, अन्य राजकीय पक्ष व त्यांच्या शैलीपेक्षा वेगळ्या मार्गाने जाण्याचा पवित्रा घेतला. इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, म्हणजेच आपण फ़ारच सभ्य व सुसंस्कृत आहोत, असा टेंभा भाजपा मिरवत होता. म्हणूनच अन्य पक्षातले गुंड गुन्हेगार वा भ्रष्ट नेत्यांवर आरोप करीत, आपली साधनशुचिता दाखवण्यावर भाजपाचा भर असायचा. पण मागल्या लोकसभा मतदानात संसदेतील बहुमतापर्यंत मजल मारली आणि भाजपाने आपणही अन्य कुठल्याही पक्षापेक्षा भीषण असू शकतो; असे सिद्ध करण्याची भूमिका घेतली. मात्र त्यांनी आपल्या भीषण असण्याला बिभीषण असे सोज्वळ पौराणिक संबोधन घेतले. मागल्या दोन वर्षात देशभर सोडाच महाराष्ट्रातही एकामागून एक नमूने शोधून त्यांना भाजपात आणण्याची प्रक्रीया इतकी वेगवान करण्यात आली, की मुळच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाही आपल्या पक्षाची ओळख जाणवेनाशी झाली. आचार, विचार, निष्ठा वा चारित्र्य याच्याशी जणू काडीमोड घेतल्यासारखा पक्षाचा विस्तार करत, कुठलाही कचरा गोळा करण्याचा सपाटा लावला गेला. सत्तेसाठी बहूमत आणि बहूमतासाठी काय पण, कोणी पण; हा एककलमी कार्यक्रम हाती घेतला गेला. त्याविषयी बोलताना विधानसभा प्रचाराच्या दरम्यान देवेंद्र फ़डणवीस यांनी बिभीषणाची कहाणी सांगत, आपण रामराज्य आणणार असल्याची ग्वाही दिलेली होती. रामालाही विजय संपादन करण्यासाठी रावणाच्या गोटातला बिभीषण आपल्याकडे घ्यावा लागला होता. हा निकष लावताना भाजपाने कुठले कुठले हिरण्यकश्यपू वा दु:शासन पक्षामध्ये भरती करून घेतले, तेही आता मुख्यमंत्र्याला आठवेनासे झाले आहे. पंढरपूरचे परिचारक त्यापैकीच एक असावेत. विधान परिषदेत आपले संख्याबळ वाढावे म्हणून पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांना भाजपाने सहयोगी सदस्य म्हणून पक्षात सामवून घेतले होते. त्यांनी कालपरवाच एका प्रचारसभेत मुक्ताफ़ळे उधळली आहेत.