✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुरोगामी - प्रतिगामी

स
संदीप ताम्हनकर यांनी
Sun, 12/11/2016 - 11:15  ·  लेख
लेख
पुरोगामी - प्रतिगामी मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले. पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल या दृष्टीने पुरोगामी व्यक्ती विचार करते. पुरोगामी विचाराच्या लोकांना हे माहित असतं की या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे. या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणा-या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणा-या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणा-या, असतात. एखादी व्यक्ती बालपणातून तरुणपणात प्रवेश करताना पुरोगामी विचारधारेची का आणि कशी होते आणि त्याच परिस्थितीतील दुसरी व्यक्ती सनातनी कशी होते हे पाहणे मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय असू शकतो. पण सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की व्यक्तीचे बालसंगोपन, आरोग्य, बौद्धिक आणि भावनिक क्षमता, अभ्यास, आकलन यातून व्यक्तीची भूमिका ठरत असते. संतुलित बालसंगोपन झालेली, अधिक बुद्धिमत्ता असणारी, अभ्यासू, ज्ञानी आणि चांगल्या संस्कारांची व्यक्ती पुरोगामी बनते. सुमार बुद्धीची पण स्वार्थ समजणारी, असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेली व्यक्ती सनातनी बनते असे सुचवण्याचा येथे दूरान्वयेदेखील प्रयत्न नाही, गैरसमज नसावा. या विवेचनाच्या आधारे आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेतले तर चांगले. मानवी प्रवृत्तींमधील पुरोगामी - प्रतिगामी हा विचारभेद अथवा झगडा चिरंतन आहे. आहार निद्रा मैथुन या जैविक प्रेरणांच्या पातळीवर असलेल्या आदिम मनुष्यप्राण्यांमध्येही असा प्रवृत्ती भेद असू शकणे शक्य आहे. अखिल मानवजातीचा विचार करताना ज्ञात मानवी इतिहासात आपल्याला स्पष्टपणे हा विचारभेद अथवा प्रवृत्तीभेद दिसतो आणि दिसत राहील. भारताच्या ज्ञात इतिहासात पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी शक्तींचा संघर्ष अनेकदा झालाय असे दिसून येते. यातील काही महत्वाचे आणि भारतवर्षाच्या इतिहासाला कलाटणी देणारे संघर्ष आपण पाहू. वर्ण व्यवस्थेत उच्च कुलीन नसलेल्या चंद्रगुप्त मौर्य राजांची १०-१२ पिढ्यांची पुरोगामी विचारांची राजसत्ता भारतात सुमारे २३०० वर्षांपूर्वी होती. महान सम्राट अशोक याच कुळातील राजा होता. पुढे मौर्य बृहदत्त राजा असताना त्याच्या वैदिक ब्राम्हण सरदार पुष्यमित्र शुंगाने, मौर्याची बहुजन आणि बौद्ध धर्मीय अहिंसावादी सत्ता, सैन्यात फितुरी माजवून संपुष्टात आणली. राजा बनून सनातन वैदिक ब्राह्मणी धर्माला राजाश्रय देऊन प्रसार केला. शुंगाने वेद, श्रुती, स्मृती, पुराणांचे आणि वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन घडवून आणले. भृगु कडून मनुस्मृती संकलित करवून घेतली. त्याच शुंगाने कौटिल्याचा अर्थशास्त्र हा त्याकाळचा प्रागतिक विचारांचा ग्रंथही यशस्वीरीत्या नष्ट केला. त्यानंतर अनेक शतके हा ग्रंथ विस्मृतीत गेलेला होता. (आजचे हिंदुत्ववादी कौटिल्याच्या (चाणाक्य) ग्रंथाचा हरघडी दाखल देताना दिसतात त्यांना हा इतिहास माहित आहे काय?) ज्ञानेश्वर - नंतरच्या काळातील हा संघर्ष संत ज्ञानेश्वर यांनी केला. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी संन्यास सोडून परत गृहस्थ बनलेल्या ज्ञानदेवांच्या मातापित्यांना तत्कालीन सनातन्यांनी एवढा जीव नकोस करून टाकला असणार की बिचा-यांनी कोवळ्या वयाच्या चार तेजस्वी पोरांना पोरकं करून त्यांनी नदीत आत्महत्या केली. सनातन्यांनी मुलांना वाळीत टाकले. तत्कालीन देववाणीत म्हणजे संस्कृत भाषेत असलेले ज्ञान ‘परि अमृताते पैजा जिंके’ अशा प्रकृत मराठी लोकभाषेत आणण्याचे बंडखोर कार्य याच ज्ञानदेवांनी केले. वेदांचे सार असणा-या श्रीमत्भगवतगीतेचे भावार्थदीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीत रूपांतरण हे त्यांनी जनसामान्यांसाठी केलेले एक मोठेच कार्य होय. अशा ज्ञानदेवांनी अकाली समाधी घेतली पण त्यांनी स्थापन केलेला समतावादी वारकरी संप्रदाय मात्र महाराष्ट्रात भरपूर वाढला. याच विचारांच्या अधिक बंडखोर तुकोबांनी ब्राह्मणी व्यवस्थेला जोरदार हादरे दिले. याच संप्रदायातील स्वतः निरक्षर असलेल्या गाडगे महाराजांनी बुद्धिप्रामाण्यवादाची सुरुवात केली. शिवछत्रपती विरुद्ध ब्राम्हणशाही - शिवछत्रपतीं पुरोगामी होतेच. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका’ अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याणकारी राज्याची, तेव्हाच्या काळात अनपेक्षित अशी भूमिका आणि कृती, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केली. अनेक वर्षांची गुलामगिरी संपवून आपल्यातला एकजण स्वतंत्र राजा होतोय याने आनंदी होण्याऐवजी अशा राजाच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी शक्तींनी जातीपातीच्या मुद्द्यावर विरोध केला होता. नंतरच्या काळात संभाजी राजे आणि ब्राह्मणी अष्टप्रधान हा संघर्ष अधिक टोकदार झाला आणि टप्प्याटप्प्याने सनातनी शक्ती शिरजोर होत गेल्या. राजाराम महाराजांची कारकीर्द, त्यांचे सल्लागारांवर अवलंबून असलेले राजकारण, नंतर शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यामध्ये पेशवाईची सुरुवात हा घटनाक्रम आपल्यासमोर आहेच. डोंगराएवढ्या कर्तृत्ववान बाजीरावालाही प्रतिगाम्यांनी छळलंच. उत्तर पेशवाईत जातीपातींचा आणि कर्मकांडांचा अतिरेक झाला. काही लोकांना अस्पृश्य मानून कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं अडकवण्याची सक्ती केली गेली. या उलट ब्रिटिशांनी त्याच अस्पृश्यांच्या कंबरेला मनाची तलवार आणि छातीवर शौर्य पदकं लावली आणि पेशवाईचा पराभव केला. सन १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध हा संघर्ष जुनी वैदिकधर्माधिष्ठित राजसत्ता परत स्थापन करण्याचा करण्याचा अयशस्वी उठाव होता. आधुनिक यंत्र तंत्र आणि विचारांच्या ब्रिटिशांचा त्यामध्ये विजय झाला. टिळक, आगरकर, शाहू, फुले - काँग्रेसची स्थापना होऊन रानड्यांच्या पुरोगामी नेतृत्वाला बाजूला सारून टिळकमहाराजांचे युग सुरु झाले. आचार विचार आणि कृतीने टिळक हे सनातनी ब्राह्मणच होते. आधी स्वातंत्र्य का आधी समाजसुधारणा या वादात टिळकांनी आगरकरांच्या विरुद्ध भूमिका घेतली. शाहू आणि सनातनी यांच्या वेदोक्त का पुराणोक्त या वादात टिळकांच्या समोर सोन्याच्या ताटात पेश केलेली, पुरोगामी भूमिका घेण्याची ऐतिहासिक सुसंधी आली होती. टिळकांची त्याकाळची राजकीय आणि सामाजिक ताकद पहाता त्यांनी जरी शाहूंच्या बाजूने बहुजनवादी भूमिका घेतली असती तरी त्यांना विरोध झाला नसता. पण टिळकांनी त्यांच्या प्रवृत्तीधर्माला अनुसरून सनातन्यांनी बाजू घेतली. मग शाहू महाराज आणि टिळक आयुष्यभर भांडत राहिले. गांधीजी - राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे धार्मिक होते पण त्याहूनही जास्त ते मानवतावादी होते. गांधीजी हे प्रच्छन्न हिंदू असून सनातनी धर्माला आतून पोखरून टाकतील याची अट्टल सनातन्यांना मोठी भीती होती. त्यातच गांधीजींची अस्पृश्यतानिवारणाची चळवळ, मुस्लिम अनुनयाचं राजकारण, फाळणी, मुस्लिमांचे अत्याचार असे ठपके ठेऊन शिक्षा सुनावून त्यांचा खून करण्यात आला. राष्ट्रपित्याचा खून करून गोंधळ माजवून देऊन त्या धुराळ्यात नवजात भारतवर्षाचा ताबा घ्यायचा असे सनातन्यांचे व्यापक कारस्थान होते, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण गांधीजींवर या देशातील जनता करत असलेले अपरंपार सच्चे प्रेम सनातन्यांना दिसू शकले नाही. देशवासीयांच्या एकत्रित शहाणपणाचे आकलनही हिंदुत्ववाद्यांना होऊ शकले नाही. उलट त्यांच्याच जातबांधवांना राखरांगोळी झालेली घरेदारे सोडून शहरात आणि नंतर परदेशात परागंदा होण्याची वेळ आली. आणीबाणी - इंदिराजींच्या वेळी आणीबाणी पूर्व काळात नोकरशाहीने अक्षरशः धुमाकूळ घातला. जनमानस विटले आणि विरुद्ध गेले. विद्यार्थ्यांची आंदोलने चालू झाली. विरक्त आयुष्य जगणा-या जयप्रकाश नारायणांना पुढे करून त्यांच्या मागे जनसंघी आणि सनातनी शक्ती एकजूट झाल्या. सैन्याने, पोलिसांनी सरकारचे आदेश पळू नये अशा चिथावण्या देण्यात आल्या. देश कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासन मोडून पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आणीबाणी आणावी लागली. पण इंदिराजी या नेहरूंच्या सर्वोत्तम शिष्या होत्या. त्यांनी घटनेच्या चौकटीतच तत्कालीन परिस्थितीवर उपाय शोधून काढले. तसेच त्यांचा लोकशाही मूल्यांवर अधिक विश्वास होता. त्यामुळे आणीबाणी व्यवस्थित स्थिरस्थावर झालेली असतांना आणि विशेष कोणतीही अनिवार्य परिस्थिती नसतानाही त्यांनी आणीबाणी उठवून निवडणूक जाहीर केल्या. त्यांचे टीकाकार म्हणतात की स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी इंदिराजींनी आणीबाणी उठवली पण असे कोणतेही आंतरराष्ट्रीय दडपण इंदिराजींवर नव्हते. या निवडणुकां नंतर सनातनी शक्ती सत्तेमध्ये भागीदार झाल्या. पण हि सत्ता टिकू शकली नाही. मोजक्या समाजवाद्यांना हा जनसंघी कावा समजला होता आणि त्यापैकी एक मधू लिमये होते. त्यांनी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्यामुळे हे सरकार पडले. राजीव गांधींचा खून - उच्चवर्गीय विचारांचा पगडा असलेल्या शक्तींनी तंत्रिकांशी आणि देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला. याचे खापर लिट्टे आणि प्रभाकरनवर फुटेल असा पुराव्यांचा डोलारा उभा केला. नेत्याचा खून घडवून आणल्यावर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली. राजीव गांधी सुधारणावादी होते पण राजकारणी म्हणून कच्चे होते. राम जन्मभूमीचे मंदिराचे कुलूप उघडणे, शाहबानो प्रकरणात कायदा बनवणे, श्रीलंकेत शांतीसेना पाठवणे या सारख्या चुका त्यांच्याहातून झाल्या. तरीही संगणक क्रांती, पंजाब करार, नागा करार, मध्यपूर्वेतील राजकारणात अमेरिकेच्या विरुद्ध भूमिका अशा अनेक गोष्टी त्यांच्या खात्यावर जमा आहेत. पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षातील अजून एक आध्याय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं खून करून सनातन्यानी लिहिलाय. तुम्ही डोक्यात विचार घालता आणि ते आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही तुमच्या डोक्यात गोळी घालू आणि तुम्हालाच संपवून टाकू असा हा उरफाटा तर्क आहे. सनातन्यांचे इतरांचा बुद्धीभेद करण्याचे तंत्र चांगलं आहे पण ते धार्मिक उन्माद आणि भावनेवर आधारित आहे. श्रुतिस्मृतिपुराणोक्ताने आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर थोडंही परिचलन (Deviation) कट्टर वैदिक सनातनी सहन करू शकत नाहीत. या बाबतीत थोडेसेही, कृतीचे तर सोडाच - विचारांचेही स्वातंत्र्य, कोणालाही नाही, हाच सनातनधर्म आहे. सध्याच्या आधुनिक काळात वैदिक सनातनी विचारांचे उच्च वर्णीय लोक, तोंडदेखला सर्वसमावेशकतेचा मुखवटा घेऊन, सतत हिंदुत्वाच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि प्रत्यक्ष लढायला बहुजन समाजातून अनुयायी मिळवतात. मूळ भारतीय समाज सहिष्णू आहे त्याला उन्मादावस्थेला नेण्याचे राजकारण वारंवार केले जाते. या सनातनी विचारामुळे भारतवर्षाच्या झालेली कुंठित अवस्था, एक हजार वर्षांचे अंधारयुग, पराभवांचा इतिहास, पारतंत्र्य, जातीपातींमध्ये दुभंगलेला समाज, दारिद्र्य, मागासलेपणा हा सगळा परिणामही आपल्या समोर आहेच. या दरम्यानच्या कालखंडात प्रतिगामी शक्तींनी मोदीजींच्या नेतृत्वाखालची सत्ता मिळवली आहे. वैचारिक असहिष्णुता, धार्मिक तेढ, सामान नागरी कायद्याची चर्चा, अल्पसंख्यांकांना असुरक्षित वाटेल असे सामाजिक वातावरण, धार्मिक उन्माद, राज्यघटनेविषयी बेगडी प्रेम, उच्चवर्गीयांची दादागिरी, भांडवलदार धार्जिणे निर्णय, हुकूमशाहीची भलावण, कायद्याची आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवणे, युद्धजन्य उन्माद पसरवण्याचा प्रयत्न, देशप्रेमाची स्वघोषित व्याख्या करून विरोधकांवर देशद्रोहाचा शिक्का मारणं, पुरोगाम्यांची निंदा नालस्ती करणं, हे उद्योग देशभर चालू आहेत. वरील विवेचनाच्या पार्श्वभूमीवर जर मी पुरोगामी विचारांचा असेन तर मला त्याची अजिबात शरम अथवा खंत वाटणार नाही उलट अभिमानच वाटेल हे नक्की. प्रत्येकाने स्वतःची स्वभाववृत्ती तपासून वरील उदाहरणांपैकी आपण कोणाला जवळचे मानतो, आपले मानतो हे नक्की ठरवल्यास गोबेल्स प्रचाराला बळी पडण्यापासून स्वतःला आणि पर्यायाने देशाला वाचवता येईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख

प्रतिक्रिया द्या
14854 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

काही धाडसी विधाने वगळता लेख चांगला आहे.

मारवा
Sun, 12/11/2016 - 11:53 नवीन
काही धाडसी व अनाकलनीय विधाने वगळता लेख चांगला आहे. संतुलित बालसंगोपन झालेली, अधिक बुद्धिमत्ता असणारी, अभ्यासू, ज्ञानी आणि चांगल्या संस्कारांची व्यक्ती पुरोगामी बनते. यातुन तुम्हाला काय सुचवायचे आहे ? चांगले संस्कार म्हणजे नेमके कोणते संस्कार ज्याने व्यक्ती पुरोगामी बनते उदा. १ , २ ,३ ? संस्कार म्हणजे कंडिशनींग करुन एखादी बाब एखादी गोष्ट ही आम्ही सांगतोय आम्हाला वाटतेय म्हणून आमच्या मुलांना आम्ही शिकवतो व त्याचा "संस्कार" करतोय. इंटरेस्टींगली पुरोगामित्वाचा " संस्कार " कसा करता येतो. व जर पुरोगामित्व हे संस्कारातुन येत असेल तर ते प्रतिगामित्वा पेक्षा मुल्यात्मक दृष्ट्या वेगळे कसे होइल ? जी गोष्ट संस्काराने शिकवता येते घडवता येते तेथे बुद्धिप्रामाण्यवाद चिकीत्सांती स्वनिर्णय असु शकतो का? तुमच्या विधानातील विसंगती तुमच्या लक्षात येत आहे का ? त्यांनी घटनेच्या चौकटीतच तत्कालीन परिस्थितीवर उपाय शोधून काढले. तसेच त्यांचा लोकशाही मूल्यांवर अधिक विश्वास होता. त्यामुळे आणीबाणी व्यवस्थित स्थिरस्थावर झालेली असतांना आणि विशेष कोणतीही अनिवार्य परिस्थिती नसतानाही त्यांनी आणीबाणी उठवून निवडणूक जाहीर केल्या. हे फारच धाडसी विधान आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

संदीप ताम्हनकर
Sun, 12/11/2016 - 12:09 नवीन
धन्यवाद. आणि चांगल्या संस्कारांची व्यक्ती पुरोगामी बनते. .............. 'असे सुचवण्याचा येथे दूरान्वयेदेखील प्रयत्न नाही, गैरसमज नसावा' हे पाहणे मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय असू शकतो, असे मी लेखात म्हटले आहेच. माझ्या मते संस्कार म्हणजे मला पटलेली भूमिका तुला शिकवतो असे नसून, तुझा तू स्वतंत्र विचार कर आणि भूमिका ठरव असा आहे, अर्थात हा अतिशय क्लिष्ट विषय असून येथे त्याची चर्चा अपेक्षित नाही, ही विनंती. 'तसेच त्यांचा लोकशाही मूल्यांवर अधिक विश्वास होता' हे विधान धाडसी आहेच. अन्यथा आणीबाणी उठवण्याची कारणमीमांसा कशी करणार? आंतरराष्ट्रीय प्रतिमा वगैरे लेखात म्हटले आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

इंटरेस्टींगली पुरोगामित्वाचा

आनन्दा
Sun, 12/11/2016 - 19:22 नवीन
इंटरेस्टींगली पुरोगामित्वाचा " संस्कार " कसा करता येतो. व जर पुरोगामित्व हे संस्कारातुन येत असेल तर ते प्रतिगामित्वा पेक्षा मुल्यात्मक दृष्ट्या वेगळे कसे होइल ?
फ्रेम करून ठेवावे असे विधान. आयुष्यभर लक्षात ठेवीन मारवा सर. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

काही विधाने वगळता उर्वरित लेख

एस
Sun, 12/11/2016 - 12:18 नवीन
काही विधाने वगळता उर्वरित लेख आवडला. विशेषतः सुरुवातीचा भाग.
  • Log in or register to post comments

सैन्याने, पोलिसांनी सरकारचे

मराठी_माणूस
Sun, 12/11/2016 - 12:34 नवीन
सैन्याने, पोलिसांनी सरकारचे आदेश पळू नये अशा चिथावण्या देण्यात आल्या. देश कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासन मोडून पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आणीबाणी आणावी लागली.
हे खरे कारण आहे ? मग ते निवड्णुकीतील गैरव्यवहार , कोर्टातील खटला इत्यादी इत्यादी हे काय आहे ?
  • Log in or register to post comments

या पैकी काहीही सुप्रीम

संदीप ताम्हनकर
Sun, 12/11/2016 - 12:52 नवीन
या पैकी काहीही सुप्रीम कोर्टात शाबीत होऊ शकलं नाही. तरीही तो मुद्दा या लेखाचा मूळ गाभा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

तरीही कारण तेच होते ना ?

मराठी_माणूस
Sun, 12/11/2016 - 13:16 नवीन
तरीही कारण तेच होते ना ? सत्ता हातातून न जाण्याची भीती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप ताम्हनकर

*कृपया हे "सत्ता हातातून

मराठी_माणूस
Sun, 12/11/2016 - 14:38 नवीन
*कृपया हे "सत्ता हातातून जाण्याची भीती" असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

बहौत खूब!!!

याॅर्कर
Sun, 12/11/2016 - 13:11 नवीन
बहौत खूब!!! पण,काही दळभद्री लोकांनी पुरोगामीत्वाचा मुखवटा चढवून ते बदनाम केले आहे.
  • Log in or register to post comments

गोंधळ व विसंगती

नगरीनिरंजन
Sun, 12/11/2016 - 13:52 नवीन
लेख गोंधळलेला वाटला आणि वस्तुनिष्ठ नाहीय. मारवाजी म्हणतात त्याप्रमाणे विसंगती तर भरपूर आहेत. शिवाय आधीच शेंदूर फासून ठेवलेल्या दगडांना देव मानण्याचा अट्टाहासही स्पष्ट दिसतोय. ह्याला मी तरी पुरोगामीपणा म्हणणार नाही.
गांधीजी - राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे धार्मिक होते पण त्याहूनही जास्त ते मानवतावादी होते. गांधीजी हे प्रच्छन्न हिंदू असून सनातनी धर्माला आतून पोखरून टाकतील याची अट्टल सनातन्यांना मोठी भीती होती. त्यातच गांधीजींची अस्पृश्यतानिवारणाची चळवळ, मुस्लिम अनुनयाचं राजकारण, फाळणी, मुस्लिमांचे अत्याचार असे ठपके ठेऊन शिक्षा सुनावून त्यांचा खून करण्यात आला. राष्ट्रपित्याचा खून करून गोंधळ माजवून देऊन त्या धुराळ्यात नवजात भारतवर्षाचा ताबा घ्यायचा असे सनातन्यांचे व्यापक कारस्थान होते, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण गांधीजींवर या देशातील जनता करत असलेले अपरंपार सच्चे प्रेम सनातन्यांना दिसू शकले नाही. देशवासीयांच्या एकत्रित शहाणपणाचे आकलनही हिंदुत्ववाद्यांना होऊ शकले नाही. उलट त्यांच्याच जातबांधवांना राखरांगोळी झालेली घरेदारे सोडून शहरात आणि नंतर परदेशात परागंदा होण्याची वेळ आली.
गांधींइतका सनातनी पुरोगाम्यांच्या कळपात दुसरा कोणी नसेल. गांधी व आंबेडकर वादाला जाणीवपूर्वक बगल मारली आहे. केवळ पुरोगामीपणाची झूल घेतली म्हणून मोहनदास व इंदिरा गांधींच्या प्रत्येक कृत्यामागे पुरोगामीत्व असेल असे नाही. ह्या असल्या गोष्टींमुळे लेख पूर्ण वाचवला नाही.
  • Log in or register to post comments

अतिशय विनोदी लेख

सुखीमाणूस
Sun, 12/11/2016 - 14:20 नवीन
हहपुवा आता सनातन्यानपेक्शा पुरोगाम्यानची भीती वाटायला लागली आहे
  • Log in or register to post comments

???

सुखीमाणूस
Sun, 12/11/2016 - 14:25 नवीन
राम जन्मभूमीचे मंदिराचे कुलूप उघडणे, शाहबानो प्रकरणात कायदा बनवणे, श्रीलंकेत शांतीसेना पाठवणे या सारख्या चुका त्यांच्याहातून झाल्या. ह्या चुका आहेत?
  • Log in or register to post comments

विचार उत्तम मांडले आहेत. पण

ज्योति अळवणी
Sun, 12/11/2016 - 14:46 नवीन
विचार उत्तम मांडले आहेत. पण काही ठिकाणी एककल्लीपणा वाटला
  • Log in or register to post comments

असे "अजेंडायुक्त" पुरोगामीत्व

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 12/11/2016 - 14:52 नवीन
असे "अजेंडायुक्त" पुरोगामीत्व असेल तर मला प्रतिगामी असल्याची अजिबात खंत वाटणार नाही वाटला तर अभिमानच वाटेल. पुरोगामीत्व म्हणजे डोळे उघडे ठेवून प्रत्येक गोष्टीचे वैचारिक आकलन करणे आणि योग्य तो मार्ग निवडणे एवढा सोपा प्रकार वाटत होता मला! पण हे भलतेच अवघड प्रकरण दिसतेय!
  • Log in or register to post comments

@पुरोगामी - प्रतिगामी ›››

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/11/2016 - 15:53 नवीन
@पुरोगामी - प्रतिगामी ››› अता कळ्ळ मला, पांडु मिपा सोडून का गेला. ;)
  • Log in or register to post comments

सुंदरधोंडा

गामा पैलवान
Sun, 12/11/2016 - 16:19 नवीन
संदीप ताम्हनकर, काय सुरेख धोंडा फेकलाय हो तुम्ही. तलवारीला धार लावायचा मोह आवरता येत नाहीये मला. तर मग करूया सुरुवात. १.
पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक.
इतिहासाविषयी वैज्ञानिक दृष्टी बाळगायची का हो? आणि वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय? २.
सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतीवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात.
अत्यंत ढोबळ विधान. ३.
साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी नसतात, मनुवादी नसतात, धर्मवादी नसतात, कर्मविपाकसिद्धांतवादी नसतात, शब्दप्रामाण्यवादी नसतात, कट्टर धार्मिक नसतात.
मनुवाद म्हणजे काय? तो आणि दैववाद एकंच आहे का? कर्मविपाकसिद्धांतवाद नामे कोणताही वाद अस्तित्वात नाही. उपरोक्त सर्व वाद तुमच्या डोक्यातून उत्पन्न झालेले आहेत. ४.
अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल या दृष्टीने पुरोगामी व्यक्ती विचार करते.
आगोदर स्वत:ची (वैचारिक) चड्डी सावरायला शिका. चाललेत अखिल मानवजातीचं भलं करायला. ५.
पुरोगामी विचाराच्या लोकांना हे माहित असतं की या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे.
नेमक्या याच निकषावर जगातले यच्चयावत लोकं आणि जनावरं पुरोगामी ठरवता येतील. ६.
या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणा-या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणा-या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणा-या, असतात.
मुस्लिम केवळ मुस्लिमांचं भलं कसं होईल याच विचारात असतात. निदान तसा समज आहे. मुस्लिम प्रतिगामी मानायचे का? बाय द वे, विज्ञानातदेखील शब्दप्रामाण्य असतं. तुम्हाला समजणार नाही ते. ७.
एखादी व्यक्ती बालपणातून तरुणपणात प्रवेश करताना पुरोगामी विचारधारेची का आणि कशी होते आणि त्याच परिस्थितीतील दुसरी व्यक्ती सनातनी कशी होते हे पाहणे मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय असू शकतो. पण सामान्यपणे आपल्याला असे म्हणता येईल की व्यक्तीचे बालसंगोपन, आरोग्य, बौद्धिक आणि भावनिक क्षमता, अभ्यास, आकलन यातून व्यक्तीची भूमिका ठरत असते. संतुलित बालसंगोपन झालेली, अधिक बुद्धिमत्ता असणारी, अभ्यासू, ज्ञानी आणि चांगल्या संस्कारांची व्यक्ती पुरोगामी बनते. सुमार बुद्धीची पण स्वार्थ समजणारी, असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेली व्यक्ती सनातनी बनते असे सुचवण्याचा येथे दूरान्वयेदेखील प्रयत्न नाही, गैरसमज नसावा. या विवेचनाच्या आधारे आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेतले तर चांगले.
मी कोण आहे हे समजून घेण्यासाठी उपरोक्त विवेचनाचा काडीमात्र उपयोग नाही. ८.
मानवी प्रवृत्तींमधील पुरोगामी - प्रतिगामी हा विचारभेद अथवा झगडा चिरंतन आहे. आहार निद्रा मैथुन या जैविक प्रेरणांच्या पातळीवर असलेल्या आदिम मनुष्यप्राण्यांमध्येही असा प्रवृत्ती भेद असू शकणे शक्य आहे. अखिल मानवजातीचा विचार करताना ज्ञात मानवी इतिहासात आपल्याला स्पष्टपणे हा विचारभेद अथवा प्रवृत्तीभेद दिसतो आणि दिसत राहील. भारताच्या ज्ञात इतिहासात पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी शक्तींचा संघर्ष अनेकदा झालाय असे दिसून येते. यातील काही महत्वाचे आणि भारतवर्षाच्या इतिहासाला कलाटणी देणारे संघर्ष आपण पाहू.
ठीके. हा परिच्छेद तत्वत: मान्य. अमान्य करण्यासारखं आहेच काय ह्यांत ! ९.
वर्ण व्यवस्थेत उच्च कुलीन नसलेल्या चंद्रगुप्त मौर्य राजांची १०-१२ पिढ्यांची पुरोगामी विचारांची राजसत्ता भारतात सुमारे २३०० वर्षांपूर्वी होती. महान सम्राट अशोक याच कुळातील राजा होता.
यावरून भारतातली लोकं जातीकुलापेक्षा पराक्रमास अधिक महत्त्व देत हे दिसून येतं. १०.
पुढे मौर्य बृहदत्त राजा असताना त्याच्या वैदिक ब्राम्हण सरदार पुष्यमित्र शुंगाने, मौर्याची बहुजन आणि बौद्ध धर्मीय अहिंसावादी सत्ता, सैन्यात फितुरी माजवून संपुष्टात आणली.
पुष्यमित्र शुंग ब्राह्मण नव्हता, तर सेनापती म्हणजे क्षत्रिय होता. ११.
राजा बनून सनातन वैदिक ब्राह्मणी धर्माला राजाश्रय देऊन प्रसार केला.
वैदिक म्हणजे ब्राह्मणी हे कोणी सांगितलं तुम्हाला? १२.
शुंगाने वेद, श्रुती, स्मृती, पुराणांचे आणि वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन घडवून आणले. भृगु कडून मनुस्मृती संकलित करवून घेतली.
यात काय चुकीचं आहे? याच मनुस्मृतीच्या आधारे आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहिलंय. १३.
त्याच शुंगाने कौटिल्याचा अर्थशास्त्र हा त्याकाळचा प्रागतिक विचारांचा ग्रंथही यशस्वीरीत्या नष्ट केला. त्यानंतर अनेक शतके हा ग्रंथ विस्मृतीत गेलेला होता. (आजचे हिंदुत्ववादी कौटिल्याच्या (चाणाक्य) ग्रंथाचा हरघडी दाखल देताना दिसतात त्यांना हा इतिहास माहित आहे काय?)
काहीही ठोकून देताय होय! १४.
ज्ञानेश्वर - नंतरच्या काळातील हा संघर्ष संत ज्ञानेश्वर यांनी केला. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी संन्यास सोडून परत गृहस्थ बनलेल्या ज्ञानदेवांच्या मातापित्यांना तत्कालीन सनातन्यांनी एवढा जीव नकोस करून टाकला असणार की बिचा-यांनी कोवळ्या वयाच्या चार तेजस्वी पोरांना पोरकं करून त्यांनी नदीत आत्महत्या केली.
जर तर विधान. अगदी आपेगाव व/वा आळंदीच्या लोकांनी वाळीत टाकलं त्यामागे कारण होतं. संन्यास सोडून गृहस्थी स्वीकारणं अनुचित होतंच, आहेच आणि असेलच. १५.
सनातन्यांनी मुलांना वाळीत टाकले.
मुलांचा दोष नाही हे मान्य. १६.
तत्कालीन देववाणीत म्हणजे संस्कृत भाषेत असलेले ज्ञान ‘परि अमृताते पैजा जिंके’ अशा प्रकृत मराठी लोकभाषेत आणण्याचे बंडखोर कार्य याच ज्ञानदेवांनी केले. वेदांचे सार असणा-या श्रीमत्भगवतगीतेचे भावार्थदीपिकेत म्हणजेच ज्ञानेश्वरीत रूपांतरण हे त्यांनी जनसामान्यांसाठी केलेले एक मोठेच कार्य होय. अशा ज्ञानदेवांनी अकाली समाधी घेतली पण त्यांनी स्थापन केलेला समतावादी वारकरी संप्रदाय मात्र महाराष्ट्रात भरपूर वाढला.
ज्ञानेश्वरांनी स्थापन केला तो भागवत संप्रदाय. वारी ज्ञानेश्वरांच्या आधीपासून चालू होती. १७.
याच विचारांच्या अधिक बंडखोर तुकोबांनी ब्राह्मणी व्यवस्थेला जोरदार हादरे दिले. याच संप्रदायातील स्वतः निरक्षर असलेल्या गाडगे महाराजांनी बुद्धिप्रामाण्यवादाची सुरुवात केली.
ब्राह्मणी व्यवस्था हा काय प्रकार आहे? जन्माने ब्राह्मण असलेल्या पण मुंज न झालेल्या ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला भागवत संप्रदाय ब्राह्मणी म्हणावा का? १८.
शिवछत्रपती विरुद्ध ब्राम्हणशाही - शिवछत्रपतीं पुरोगामी होतेच. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका’ अशी सक्त ताकीद ते आपल्या मावळ्यांना द्यायचे. लोककल्याणकारी राज्याची, तेव्हाच्या काळात अनपेक्षित अशी भूमिका आणि कृती, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर केली. अनेक वर्षांची गुलामगिरी संपवून आपल्यातला एकजण स्वतंत्र राजा होतोय याने आनंदी होण्याऐवजी अशा राजाच्या राज्याभिषेकाला तत्कालीन सनातनी शक्तींनी जातीपातीच्या मुद्द्यावर विरोध केला होता.
अरे हाट! ज्या कोणी शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकास विरोध केला त्यांना तुम्ही सनातनी म्हणून लेबल चिकटवत आहात. या विरोधाचा सनातन धर्माशी काहीही संबंध नाही. १९.
नंतरच्या काळात संभाजी राजे आणि ब्राह्मणी अष्टप्रधान हा संघर्ष अधिक टोकदार झाला आणि टप्प्याटप्प्याने सनातनी शक्ती शिरजोर होत गेल्या.
परत एक ढिसाळ विधान. संभाजीमहाराजांना विरोध करणारे सनातनीच असायला पाहिजेत हा तुमचा अट्टाहास आहे. वस्तुस्थिती नव्हे. औरंगजेब सनातनी आहे का हो? २०.
राजाराम महाराजांची कारकीर्द, त्यांचे सल्लागारांवर अवलंबून असलेले राजकारण, नंतर शाहू महाराजांची कारकीर्द आणि त्यामध्ये पेशवाईची सुरुवात हा घटनाक्रम आपल्यासमोर आहेच.
राजाराममहाराजांची प्रकृती क्षीण होती. त्यांच्या मृत्यूपश्चात ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी नर्मदेपार झेप घेतली. २१.
डोंगराएवढ्या कर्तृत्ववान बाजीरावालाही प्रतिगाम्यांनी छळलंच.
ढोबळ विधान. कहना क्या चाहते हो भाई? २२.
उत्तर पेशवाईत जातीपातींचा आणि कर्मकांडांचा अतिरेक झाला. काही लोकांना अस्पृश्य मानून कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं अडकवण्याची सक्ती केली गेली. या उलट ब्रिटिशांनी त्याच अस्पृश्यांच्या कंबरेला मनाची तलवार आणि छातीवर शौर्य पदकं लावली आणि पेशवाईचा पराभव केला.
कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं ही शुद्ध लोणकढी थाप आहे. ब्रिटिशांनी पेशव्यांना विरोध म्याणून अस्पृश्यांचा सन्मान केला असेलही. पण त्यांना शिक्षण नाकारलं होतं हे तुम्हाला माहितीये का? २३.
सन १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध हा संघर्ष जुनी वैदिकधर्माधिष्ठित राजसत्ता परत स्थापन करण्याचा करण्याचा अयशस्वी उठाव होता. आधुनिक यंत्र तंत्र आणि विचारांच्या ब्रिटिशांचा त्यामध्ये विजय झाला.
बरोबर. २४.
टिळक, आगरकर, शाहू, फुले - काँग्रेसची स्थापना होऊन रानड्यांच्या पुरोगामी नेतृत्वाला बाजूला सारून टिळकमहाराजांचे युग सुरु झाले. आचार विचार आणि कृतीने टिळक हे सनातनी ब्राह्मणच होते.
सनातनी ब्राह्मण असले तरी त्यांची तेल्यातांबोळ्यांचे पुढारी अशी संभावना का होत असे? भारतीय असंतोषाचे जनक म्हणून पदवी का मिळाली? ते जनमानसाचे प्रतिनिधी होते म्हणूनंच ना? मग ब्राह्मण असोत वा अन्यवर्ण, काय फरक पडतो? २५.
आधी स्वातंत्र्य का आधी समाजसुधारणा या वादात टिळकांनी आगरकरांच्या विरुद्ध भूमिका घेतली.
प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे. २६.
शाहू आणि सनातनी यांच्या वेदोक्त का पुराणोक्त या वादात टिळकांच्या समोर सोन्याच्या ताटात पेश केलेली, पुरोगामी भूमिका घेण्याची ऐतिहासिक सुसंधी आली होती. टिळकांची त्याकाळची राजकीय आणि सामाजिक ताकद पहाता त्यांनी जरी शाहूंच्या बाजूने बहुजनवादी भूमिका घेतली असती तरी त्यांना विरोध झाला नसता. पण टिळकांनी त्यांच्या प्रवृत्तीधर्माला अनुसरून सनातन्यांनी बाजू घेतली. मग शाहू महाराज आणि टिळक आयुष्यभर भांडत राहिले.
हे दोघे आयुष्यभर भांडत बसले नव्हते. इतकी परिपक्वता दोघांकडेही होती. काही काळाने टिळकांनी आपली भूमिका बदलली. २७.
गांधीजी - राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे धार्मिक होते पण त्याहूनही जास्त ते मानवतावादी होते.
गांधींना राष्ट्रपिता ही पदवी अखेरच्या पर्वात (१९३५ नंतर) मिळाली. त्यांचं मानवतावादी कार्य कोणतं? जरा उलगडून सांगणार का? २८.
गांधीजी हे प्रच्छन्न हिंदू असून सनातनी धर्माला आतून पोखरून टाकतील याची अट्टल सनातन्यांना मोठी भीती होती.
कुण्या किडूकमिडूक गांधीमुळे सनातन धर्म धोक्यात येईल ही कल्पनाच हास्यास्पद आहे. गांधीविरोधकांवर सनातनी हे लेबल चिकटवण्याचा खटाटोप कशासाठी? २९.
त्यातच गांधीजींची अस्पृश्यतानिवारणाची चळवळ, मुस्लिम अनुनयाचं राजकारण, फाळणी, मुस्लिमांचे अत्याचार असे ठपके ठेऊन शिक्षा सुनावून त्यांचा खून करण्यात आला.
आयला, अस्पृश्यतानिवारणामुळे गांधींचा खून? झोकून बसलात काय लिहायला? या तर्कटाने सावरकरांचा खून बराच आधी व्हायला हवा होता. आणि ही शिक्षा कोणत्या कोर्टात सुनावण्यात आली बरें? ३०.
राष्ट्रपित्याचा खून करून गोंधळ माजवून देऊन त्या धुराळ्यात नवजात भारतवर्षाचा ताबा घ्यायचा असे सनातन्यांचे व्यापक कारस्थान होते, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे.
हे इतिहासकार नसून जेम्स बॉंड आहेत. त्यांना शांततेचे नोबेल देण्यात यावे अशी मी शिफारस करतो. ३१.
पण गांधीजींवर या देशातील जनता करत असलेले अपरंपार सच्चे प्रेम सनातन्यांना दिसू शकले नाही. देशवासीयांच्या एकत्रित शहाणपणाचे आकलनही हिंदुत्ववाद्यांना होऊ शकले नाही. उलट त्यांच्याच जातबांधवांना राखरांगोळी झालेली घरेदारे सोडून शहरात आणि नंतर परदेशात परागंदा होण्याची वेळ आली.
दंगलीत निरपराध ब्राह्मणांचं जीवितवित्त नष्ट करण्याचं हे समर्थन आहे. तुम्ही दंभाजी ब्रिगेडचे चमचे आहात. आणि हो, ब्राह्मणांचं देशांतर (=ब्रेनड्रेन) होण्यामागे कुणाचा हात आहे हे स्पष्ट केल्याबद्दल आभार. ३२.
आणीबाणी - इंदिराजींच्या वेळी आणीबाणी पूर्व काळात नोकरशाहीने अक्षरशः धुमाकूळ घातला. जनमानस विटले आणि विरुद्ध गेले. विद्यार्थ्यांची आंदोलने चालू झाली. विरक्त आयुष्य जगणा-या जयप्रकाश नारायणांना पुढे करून त्यांच्या मागे जनसंघी आणि सनातनी शक्ती एकजूट झाल्या. सैन्याने, पोलिसांनी सरकारचे आदेश पळू नये अशा चिथावण्या देण्यात आल्या. देश कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासन मोडून पडण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आणीबाणी आणावी लागली. पण इंदिराजी या नेहरूंच्या सर्वोत्तम शिष्या होत्या. त्यांनी घटनेच्या चौकटीतच तत्कालीन परिस्थितीवर उपाय शोधून काढले. तसेच त्यांचा लोकशाही मूल्यांवर अधिक विश्वास होता. त्यामुळे आणीबाणी व्यवस्थित स्थिरस्थावर झालेली असतांना आणि विशेष कोणतीही अनिवार्य परिस्थिती नसतानाही त्यांनी आणीबाणी उठवून निवडणूक जाहीर केल्या. त्यांचे टीकाकार म्हणतात की स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी इंदिराजींनी आणीबाणी उठवली पण असे कोणतेही आंतरराष्ट्रीय दडपण इंदिराजींवर नव्हते. या निवडणुकां नंतर सनातनी शक्ती सत्तेमध्ये भागीदार झाल्या. पण हि सत्ता टिकू शकली नाही. मोजक्या समाजवाद्यांना हा जनसंघी कावा समजला होता आणि त्यापैकी एक मधू लिमये होते. त्यांनी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्यामुळे हे सरकार पडले.
हाहाहा! मोजक्या समाजवाद्यांना हा कावा समजला होता तर इतरांना समजावून देण्यात ते का अपेशी ठरले? या अपेशास बेअकलीपणा म्हणावे का? संघावर बऱ्याच दिवसांत दुगाण्या कोणी झाडल्या नव्हत्या. हे महत्कार्य केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. ३३.
राजीव गांधींचा खून - उच्चवर्गीय विचारांचा पगडा असलेल्या शक्तींनी तंत्रिकांशी आणि देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला.
हा तंत्रिक कोण? चंद्रास्वामी का? उघड नाव का घेत नाही तुम्ही? ३४.
याचे खापर लिट्टे आणि प्रभाकरनवर फुटेल असा पुराव्यांचा डोलारा उभा केला.
अरे वा. धानू हवेतून आपोआप उगवली का? ३५.
नेत्याचा खून घडवून आणल्यावर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली.
एव्हढ्या खंबीर काँग्रेसला देशी नेतृत्व मिळवण्यात काय अडचण होती? इटलीकडून नेतृत्वाची आयात का करावी लागली? ३६.
राजीव गांधी सुधारणावादी होते पण राजकारणी म्हणून कच्चे होते. राम जन्मभूमीचे मंदिराचे कुलूप उघडणे, शाहबानो प्रकरणात कायदा बनवणे, श्रीलंकेत शांतीसेना पाठवणे या सारख्या चुका त्यांच्याहातून झाल्या. तरीही संगणक क्रांती, पंजाब करार, नागा करार, मध्यपूर्वेतील राजकारणात अमेरिकेच्या विरुद्ध भूमिका अशा अनेक गोष्टी त्यांच्या खात्यावर जमा आहेत.
राजीव गांधी ठोंब्या होता. ३७.
पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्षातील अजून एक आध्याय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं खून करून सनातन्यानी लिहिलाय. तुम्ही डोक्यात विचार घालता आणि ते आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही तुमच्या डोक्यात गोळी घालू आणि तुम्हालाच संपवून टाकू असा हा उरफाटा तर्क आहे. सनातन्यांचे इतरांचा बुद्धीभेद करण्याचे तंत्र चांगलं आहे पण ते धार्मिक उन्माद आणि भावनेवर आधारित आहे.
राजीव हत्या तुमच्या मते लिट्टेच्या नावावर खपवली गेली आहे. मग त्याच प्रकारे दाभोलकरांची हत्या कशावरून सनातन संस्थेवर खपवण्यात येत नसेल? शिवाय दाभोलकर हा फ्रॉड माणूस होता/आहे . दाभोलकर पैशाचा घपला करून स्वत:च्या नशिबाने गेले, आणि बिल मात्र सनातन संस्थेच्या नावावर फाडलं जातंय. ३८.
श्रुतिस्मृतिपुराणोक्ताने आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर थोडंही परिचलन (Deviation) कट्टर वैदिक सनातनी सहन करू शकत नाहीत. या बाबतीत थोडेसेही, कृतीचे तर सोडाच - विचारांचेही स्वातंत्र्य, कोणालाही नाही, हाच सनातनधर्म आहे.
कुणाच्या पिताश्रींनी सांगितलं हे तुम्हाला? सनातन धर्म विज्ञानाच्या विरोधात नाही, हे तुमचं खरं दुखणं आहे. ३९.
सध्याच्या आधुनिक काळात वैदिक सनातनी विचारांचे उच्च वर्णीय लोक, तोंडदेखला सर्वसमावेशकतेचा मुखवटा घेऊन, सतत हिंदुत्वाच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि प्रत्यक्ष लढायला बहुजन समाजातून अनुयायी मिळवतात. मूळ भारतीय समाज सहिष्णू आहे त्याला उन्मादावस्थेला नेण्याचे राजकारण वारंवार केले जाते. या सनातनी विचारामुळे भारतवर्षाच्या झालेली कुंठित अवस्था, एक हजार वर्षांचे अंधारयुग, पराभवांचा इतिहास, पारतंत्र्य, जातीपातींमध्ये दुभंगलेला समाज, दारिद्र्य, मागासलेपणा हा सगळा परिणामही आपल्या समोर आहेच.
सनातनी विचारांमुळे भारताची अवस्था कुंठीत झाली हा तद्दन अपप्रचार आहे. आपणा शिवाजीमहाराजांची शिकवण विसरलो म्हणून नशिबी अंधारयुग आलं. ४०.
या दरम्यानच्या कालखंडात प्रतिगामी शक्तींनी मोदीजींच्या नेतृत्वाखालची सत्ता मिळवली आहे.
आता कसं बोललात! तुम्हाला मोदींवर शरसंधान करायचंय. यासाठी एव्हढा मोठ्ठा लेख खरडायची काय गरज होती? ४१.
वैचारिक असहिष्णुता, धार्मिक तेढ, सामान नागरी कायद्याची चर्चा, अल्पसंख्यांकांना असुरक्षित वाटेल असे सामाजिक वातावरण, धार्मिक उन्माद, राज्यघटनेविषयी बेगडी प्रेम, उच्चवर्गीयांची दादागिरी, भांडवलदार धार्जिणे निर्णय, हुकूमशाहीची भलावण, कायद्याची आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवणे, युद्धजन्य उन्माद पसरवण्याचा प्रयत्न, देशप्रेमाची स्वघोषित व्याख्या करून विरोधकांवर देशद्रोहाचा शिक्का मारणं, पुरोगाम्यांची निंदा नालस्ती करणं, हे उद्योग देशभर चालू आहेत.
जरा उदाहरणं देणार का? की बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात? ४२.
वरील विवेचनाच्या पार्श्वभूमीवर जर मी पुरोगामी विचारांचा असेन तर मला त्याची अजिबात शरम अथवा खंत वाटणार नाही उलट अभिमानच वाटेल हे नक्की.
मी वैदिक सनातनी हिंदू असल्याचा असाच अभिमान मला आहे. आणि सांगण्याची गोष्ट म्हणजे त्याकरिता मला उपरोक्त विवेचनाची आजिबात गरज नाही. सांगायचा मुद्दा काये की तुमचं विवेचन कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या लायकीचं आहे. ४३.
प्रत्येकाने स्वतःची स्वभाववृत्ती तपासून वरील उदाहरणांपैकी आपण कोणाला जवळचे मानतो, आपले मानतो हे नक्की ठरवल्यास गोबेल्स प्रचाराला बळी पडण्यापासून स्वतःला आणि पर्यायाने देशाला वाचवता येईल.
गोबेल्सचा प्रचार हे काय आहे? कोण करतोय गोबेल्सी प्रचार? असो. तुम्हाला दंभाजी ब्रिगेडचे भलामण करायची आहे हे उघड दिसतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

गा पै ...तुम्ही ग्रेट आहात

mandarbsnl
Sun, 12/11/2016 - 18:40 नवीन
गा पै... केवढा अभ्यास आहे तुमचा....खरंच ग्रेट आहात तुम्ही.... बी ग्रेड लेखकाचे बी ग्रेडी विचार ज्या पद्धतीने खोदून काढलेत आपण खरंच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

विचार आणि विपर्यास

गामा पैलवान
Sun, 12/11/2016 - 20:40 नवीन
धन्यवाद mandarbsnl ! खरंतर दंभाजी ब्रिगेडकडे विचार म्हणून काही नाहीच्चे. आहे तो केवळ विपर्यास. आता विपर्यास म्हंटलं की त्यातला अंतर्विरोध आपसूकच उफाळून येतो. तेव्हढा फक्त दाखवून दिला. बस, इतकंच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mandarbsnl

मस्त हो गा.पै.

बोका-ए-आझम
Tue, 12/13/2016 - 08:48 नवीन
आवाजच बंद केलात एकदम. जेव्हा अावाज न होता कानफटात बसते तेव्हा कसं वाटतं ते समजलं असेल लेखकाला. रच्याकने हे तेच ना ज्यांनी जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांचा पगार माझ्या tax मधून येतो वगैरे बडबड केली होती आणि पब्लिकने त्यांची virtual धिंड काढली होती? पण एक तक्रार आहे तुमच्याबद्दल. एवढा मोठा प्रतिसाद देण्याऐवजी - तुम्ही डावे आहात एवढंच म्हटलं असतं तरी चाललं असतं. सर्वदेवनमस्कारम् केशवम् प्रतिगच्छति म्हणतात त्याप्रमाणे सर्वगालीप्रदानम् वामपंथीयान् प्रतिगच्छति हे तुम्हाला माहित असेलच ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

चिरफाड

इरसाल कार्टं
Tue, 12/13/2016 - 15:41 नवीन
पार चिरफाड केलीत हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लेखकाचे नाव मी चुकून संदीप

आनन्दा
Sun, 12/11/2016 - 19:00 नवीन
लेखकाचे नाव मी चुकून संदीप चांदणे वाचले, आणि खाली वाचल्यावर बसलेला धक्का शब्दात मांडणे कठीण आहे.. गली चुकलो की काय असे वाटून गेले. मग परत नाव वाचल्यावर काय तो बोध झाला. तस्मात आपला पास.
  • Log in or register to post comments

मायावती सारकी सारकी मनुवादी

Ram ram
Sun, 12/11/2016 - 19:50 नवीन
मायावती सारकी सारकी मनुवादी मनुवादी करीत राहती, तिच्या चाहत्यानेच लिहेल हाये आसं वाटून राहले माला
  • Log in or register to post comments

राजीव गांधींचा खून -

Dipankar
Sun, 12/11/2016 - 20:11 नवीन
राजीव गांधींचा खून - उच्चवर्गीय विचारांचा पगडा असलेल्या शक्तींनी तंत्रिकांशी आणि देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला. याचे खापर लिट्टे आणि प्रभाकरनवर फुटेल असा पुराव्यांचा डोलारा उभा केला. नेत्याचा खून घडवून आणल्यावर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली एवढे उच्च विनोद कसे जमतात हो, राजीव हत्या निकाल १९९८ गुजराल सरकार च्या हयातीत लागला त्यात कुठेही संघाचा उल्लेख ही नाही,. त्या आधी काँगेस, देवेगौडा सरकार होते. म्हणजे त्याच खंबीर सरकारांनी संघाच्या बाजूने काम केलेले दिसते
  • Log in or register to post comments

तुम्ही सगळे सनातनी आहात

प्रान्जल केलकर
Tue, 12/13/2016 - 20:23 नवीन
राजीवजींची हत्या सनातन्यांनी तामिळी वाघांना सुपारी देऊन केली (सुपारी फुटली बाई सुपारी फुटली). त्यासाठी वाघांनी प्रथेप्रमाणे न जाता सनातनी वृत्तीप्रमाणे वाघिणींना मारायला पाठवले. शी शेवटी तामिळ वाघ पण सनातनी टणटणीच निघाले. सनातन्यांना घाबरून न्यायालयाने सनातनी वृत्ती प्रमाणे तामिळ वाघाला जवाबदार न धरता वाघिणिनां शिक्षा दिली किती सनातनी भारतीय कोर्ट . सर्वोच्च न्यायायातले न्यायधीश पण सनातनी टणटणी निघाले. किती दुर्दैव आपले. तुम्ही सगळे सनातनी आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar

बी ग्रेडी का हो तुम्ही ताम्हनकर

समीर वैद्य
Mon, 12/12/2016 - 01:55 नवीन
काल झोप कमी झालीये का रात्री अंमळ जास्त झालीये?
  • Log in or register to post comments

स्वतःला पुरोगामी म्हणवून

गुलाम
Mon, 12/12/2016 - 16:00 नवीन
स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे लोकच पुरोगामी विचारसरणीचे कसे जास्तीत जास्त नुकसान करु शकतात याचं हा लेख म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे. जर कुणाला पुरोगामी विचाराबद्दल फारशी माहिती नसेल तर कृपया या लेखावरुन आपले मत बनवू नये ही विनंती.
  • Log in or register to post comments

संदीपजी,

तेजस आठवले
Mon, 12/12/2016 - 18:38 नवीन
संदीपजी, तुम्ही एक पुस्तक का नाही काढत... साडेसात साडेसात रुपयात विकू शकता ते. मनाला वाट्टेल ते लिहायचं हं आणि त्यात. गा. पै., तुम्ही बरोबर लिहिले आहे, तरी पण तुमच्या स्पष्टीकरणाने धाग्याकर्त्याचा उद्देश सध्या झाला आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

पिवळी पुस्तकं आहेत कि मनोरंजन करायला

प्रान्जल केलकर
Tue, 12/13/2016 - 20:25 नवीन
पिवळी पुस्तकं आहेत कि मनोरंजन करायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

तुमच्या कडे असतील तर

तेजस आठवले
Tue, 12/13/2016 - 21:38 नवीन
तुमच्या कडे असतील तर संदीपजींना द्या.त्या वाचनात ते गुंतून राहतील आणि आम्हाला असल्या धाग्यांना प्रतिसाद द्यावा लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रान्जल केलकर

कहीं की ईंट कहीं का रोड़ा

विवेकपटाईत
Mon, 12/12/2016 - 19:21 नवीन
कहीं की ईंट कहीं का रोड़ा भानुमती ने कुनबा जोड़ा. तसाच काहीसा लेख आहे. बहुतेक लेखकाला ही माहित नसेल तो के लिहितो आहे अणि त्याचा अर्थ के आहे.
  • Log in or register to post comments

नाण्याची एक बाजू.

इरसाल कार्टं
Tue, 12/13/2016 - 15:48 नवीन
पूर्ण लेखात नाण्याची एकाच बाजू मीठ मसाला लावून दाखवल्यासारखी वाटली. मीही ब्राम्हण नाहीये आणि हे सनातन वगैरे माझ्या पचनी अजून तरी पडलेले नाहीये(म्हणजे मला अजून ते कळलेच नाहीये म्हणा हवं तर), पण मी एकच मानतो कि इतिहासातील वाईट गोष्टी बाजूला सारून जे जे चांगले आहे ते आपण उचलावे आणि एकोप्याने पुढे चालावे. तीच थडगी उकरून काढण्यात काही अर्थ नसून त्याने दुरावत वाढणार आहे. आधी मुघल आले, मग इंग्रज आणि आता अमेरिका किंवा चीन येईल.. आपण फक्त व्याख्या ठरवत/बदलत भांडताच जगायचे का?
  • Log in or register to post comments

निर्वाण पावले

पैसा
Tue, 12/13/2016 - 16:45 नवीन
निर्वाण पावले. ______/\______
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रसाद गोडबोले
Tue, 12/13/2016 - 16:52 नवीन
अभिनंदर संदीप ताम्हनकर ! इतका प्रचंड सारकॅस्टिक उपरोधिल लेख मिपावर गेल्या हजार वर्षात कोणी लिहिला नव्हता !
  • Log in or register to post comments

>मराठीतील एका वृत्तपत्राने

कानडाऊ योगेशु
Tue, 12/13/2016 - 17:18 नवीन
>मराठीतील एका वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखातून एकंदरीत पुरोगाम्यांवर दुगाण्या झाडल्या. त्यामुळे खरंतर मी हे लिखाण केले. खिक्क. ह्यावरुन तो जुना जोक आठवला. संता एका ट्युबखाली काहीतरी शोधत असतो. बंता: काय हुडकतो आहेस रे? संता: माझे नाणे हरवले? बंता: कुठे? संता: त्या तिथे जिथे अंधार आहे ना तिथे. बंता: मग इकडे कशाला हुडकतो आहेस. संता: अरे पण इकडे उजेड आहे ना म्हणुन.. आणि योगायोगाची बाब... संता = संदीप ताम्हनकर.
  • Log in or register to post comments

हसून हसून पुरेवाट झाली

प्रान्जल केलकर
Tue, 12/13/2016 - 20:26 नवीन
हसून हसून पुरेवाट झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

हगलो

चित्रगुप्त
Tue, 12/13/2016 - 23:17 नवीन
हसून हसून पुरेवाट झाली
......."हगलो" .... असे म्हणायचे आहे का ?? ...........हसून गडबडा लोळलो....??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रान्जल केलकर

आई ग

सामान्य वाचक
Tue, 12/13/2016 - 17:39 नवीन
काय चिखल करून ठेवला आहे लेखाच्या नावाखाली
  • Log in or register to post comments

ओके

अप्पा जोगळेकर
Tue, 12/13/2016 - 18:50 नवीन
ओके
  • Log in or register to post comments

हॅपी बड्डेच्या शुभेच्छा!

वामन देशमुख
Tue, 12/13/2016 - 19:06 नवीन
अरे बाळा संदीपा, तुला हॅपी बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा बरं का!
  • Log in or register to post comments

ताम्हणकर >>> बैलभातथाळीकर

वामन देशमुख
Tue, 12/13/2016 - 19:08 नवीन
पुरोगामी विचाराच्या लोकांना हे माहित असतं की या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे.
संदीप ताम्हणकर म्हणजे ताम्हण ज्यांच्या करात (पक्षी:हातात) आहे ज्यांच्या असे ते संदीप. तुम्ही आधी तुमचं आडनाव बदला पाहू. म्हणजे असं की, ताम्हण, पळी, पंचिपात्र, देवधर्म ही सर्व प्रतिगामीत्वाची प्रतीके आहेत ना, मग तुम्ही ताम्हणकर असे बुरसटलेले ना राहता, बैलभातथाळीकर व्हा! रच्याकने, हे असं काही लिहायला अजूनही पुरेसे पैसे मिळतात का? आइ मीन, नोटाबंदी झाल्यानंतरही, फुरोगामी साहित्य लिहिण्यात करियर स्कोप आहे का?
  • Log in or register to post comments

या उलट प्रतिगामी व्यक्ती

श्रीगुरुजी
Tue, 12/13/2016 - 19:22 नवीन
या उलट प्रतिगामी व्यक्ती सर्वसाधारणपणे सनातनी विचारांच्या, मागे बघून पुढे जाण्याचा प्रयत्न करणा-या, असहिष्णू, कट्टर धार्मिक, दैववादी, शब्दप्रामाण्यवादी, धर्मग्रंथवादी, मनुवादी, संकुचित विचारांच्या, आपल्याच कंपूचं फक्त कसं भलं होईल हे पाहणा-या, स्थितिवादी, सतत भूतकाळाचे दाखले देणा-या, असतात.
आणि आता वरील ओकारीत सापडलेली खालील रत्ने . . . (वर्तमानकाळातील पुरोगामी दाखले)
वर्ण व्यवस्थेत उच्च कुलीन नसलेल्या चंद्रगुप्त मौर्य राजांची १०-१२ पिढ्यांची पुरोगामी विचारांची राजसत्ता भारतात सुमारे २३०० वर्षांपूर्वी होती.
शिवछत्रपती विरुद्ध ब्राम्हणशाही - शिवछत्रपतीं पुरोगामी होतेच.
सन १८५७ चे पहिले स्वातंत्र्य युद्ध
ज्ञानेश्वर - नंतरच्या काळातील हा संघर्ष संत ज्ञानेश्वर यांनी केला. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी
बाकी टिळक, आगरकर, आणिबाणी इ. वर्तमानकाळातील दाखले आहेतच. ज्या व्यक्तीने ही ओकारी काढलेली आहे त्याच व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी त्यांना काश्मिरमध्ये सैनिकांनी सुरक्षेसाठी अडवून तपासणी केल्यावर संतापून "मी दिलेल्या कराच्या पैशातून सैनिकांना चड्डी, बनियन, पायजमे वगैरे मिळतात आणि तरी मला अडवण्याची यांची हिंमत कशी झाली" अशा अर्थाच्या जळजळीत शब्दात सैनिकांना जाब विचारून त्यांना खजिल केले होते. खालील निष्कर्षामुळे प्रस्तुत लेखक अत्यंत महामूर्ख आहे याची पुनःप्रचिती आली.
राजीव गांधींचा खून - उच्चवर्गीय विचारांचा पगडा असलेल्या शक्तींनी तंत्रिकांशी आणि देशाबाहेरील शक्तींशी हातमिळवणी करून उमद्या राजीव गांधींचा निर्घृण खून घडवून आणला. याचे खापर लिट्टे आणि प्रभाकरनवर फुटेल असा पुराव्यांचा डोलारा उभा केला. नेत्याचा खून घडवून आणल्यावर निर्नायकी झालेल्या पण सहानुभूतीच्या लाटेवर बहुमत मिळवलेल्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करून देश ताब्यात घेण्याचा हा मोठा कट होता. पण काँगेसजनांनी खंबीरपणा दाखवून ती परिस्थिती टाळली.
स्वतःला पुरोगामी, निधर्मी, मानवतावादी, उदारमतवादी, विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी इ. समजणारे प्रत्यक्षात अत्यंत सडक्या विचारांचे असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सुदैवाने भारतात असल्या लोकांना फारसा थारा मिळालेला नाही. यांच्या बुद्धीप्रामाण्यबाजीला भारतीयांनी कायमच नाकारलेले आहे.
  • Log in or register to post comments

लेखक महोदय

रामपुरी
Tue, 12/13/2016 - 20:02 नवीन
लेखक महोदय पळाले वाटतं. आता हि घाण कोण साफ करणार? रच्याकने - असल्या काँग्रेस, भाजप, इत्यादी सर्वप्रकारच्या प्रचारकी धाग्यांवर बंदी येईल तो सुदीन.
  • Log in or register to post comments

कसे काय एव्हढे सगळे विनोद

सही रे सई
Tue, 12/13/2016 - 20:06 नवीन
कसे काय एव्हढे सगळे विनोद एकदम सुचतात बुवा? लेख आणि त्या वरच्या प्रतिक्रिया वाचुन हहपुवा..
  • Log in or register to post comments

आमचे लेले काका ईतके कट्टर

अविनाशकुलकर्णी
Tue, 12/13/2016 - 23:13 नवीन
आमचे लेले काका ईतके कट्टर फुरोगामी आहेत कि मुलीने स्वजातित लग्न केले म्हणुन संबंध तोडले
  • Log in or register to post comments

हा पुनर्जन्म म्हणायचा का ?

अर्धवटराव
Wed, 12/14/2016 - 05:45 नवीन
संदीप ताम्हनकर... कुठेतरी वाचलय हे नाव. 'परा'चा कावळा छान झालाय लेखात :) खरच पुनर्जन्म असल्याअ वेलकम बॅक :) अपूर्ण मालिका धक्क्याला लावायचं मनावर घ्या अगोदर. मंदाकिनी आणि शिरवाळकरांची बाळे वाट बघताहेत.
  • Log in or register to post comments

आडनाव सारखं आहे अर्धवटराव

बोका-ए-आझम
Wed, 12/14/2016 - 09:39 नवीन
पण शैली पूर्णपणे वेगळी आहे. मला पहिल्या परिच्छेदापुढे वाचायला त्रास झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा