Skip to main content

अजय-अतुल लाईव्ह वगैरे...!

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 18/10/2016 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच अजिंठा महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी, अजय-अतुल यांच्या लाईव्ह कार्यक्रमात गाणे सुरु असताना मधेच ट्रॅक बंद झाल्याने गाणे थांबले आणि ही जोडी फक्त ओठ हलवत गाण्याचा अभिनय करत असल्याचे प्रेक्षकांना पहायला मिळाले. प्रेक्षकांना हा धक्का होताच, पण मोठ्ठ्या रकमेचे तिकीट घेऊन असे झाल्याने फसवणुकीची भावना झाली, आणि बरेच प्रेक्षक उठून गेले असे बातम्यांवरून समजते. कांही वृत्तवाहिन्यांच्या बातमीप्रमाणे ट्रॅक बंद पडल्यावर गायक आणि वादकांनी खरेच गायला-वाजवायला सुरुवात केली तेव्हा एनर्जी लेव्हल मधे कमालीचा फरक पडून गाणे नीरस झाले. बातमी: या जोडीची सगळी नाही तरी अनेक गाणी आवडतात. कलाकार म्हणून ते पुढेही आवडत रहातीलच. पण त्यांच्या किंवा अन्य कुणाच्या लाईव्ह कार्यक्रमात जाणे आता नकोसे वाटेल. तुमचे मत काय? या निमित्ताने मनात आलेले कांही प्रश्न असे: १. तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकार नेहेमीच होत असतो का, आणि आपण आता त्याची सवय करायला हवी का? २. अन्य कलाकार असेच करत असतात का? ३. त्यांच्या नवनिर्मितीच्या मर्यादा संपल्याने नाव असेतो झटपट पैसे मिळवण्यासाठी असे कार्यक्रम घेतात का? ४. काल सर्व मराठी वृत्तपत्रांच्या संस्थळावर ही बातमी होती, ती का/ कशी हटवली गेली असेल? की असे कांही झालेच नाही? ५. नुकत्याच सैराट चित्रपटाच्या एका गाण्यासाठी त्यांनी हॉलीवूडचा कुठलासा स्टुडिओ वापरला आणि साठ का कैतरी लाख खर्च केले म्हणे. त्याची खरी गरज होती, की तेही प्रसिद्धीसाठी होते? ६. या कार्यक्रमात फजिती झाल्यावर मकरंद अनासपुरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, ते योग्य होते का? ७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल/ किंवा प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत मागता येतील का?

वाचने 24153
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

नाही. एवढ्या मोठ्या ताफ्यामध्ये गायकाची गरज आहे का ? असे वाटले. कारण तो ही आवाज आता संगणकावर काढता येतो. आणि इथे लाईव्ह कार्यक्रम काही लोक त्यांच्या "दर्शनासाठी" गेले होते असे वाटत नाही. बाकी घरात "बोस" किंवा "हर्मन" सारखी उच्च दर्जाची होम थिएटर असणारी मंडळी भारतात कमी नाहीत. हे जर असे "रेकॉर्डेड" (ध्वनिमुद्रित) संगीत ऐकायला कोणी "लाईव्ह" कार्यक्रमाला भरपूर पैसे मोजून जात असतील असे वाटत नाही. बाकी चालू द्या.

अजय अतुलला लाईव्ह बघण्यासाठी जातात वगैरे मान्य नाही. लाईव्ह कार्यक्रमात आणि रेकॉर्डेड कार्यक्रमात वेगळेपणा आहे आणि असायलाच हवा. हे प्रिरेकॉर्डेड असले तरी चालतय वगैरे न्यू नॉर्मल आहे. मुळात तसे नसावे. शास्त्रीय संगिताच्या मैफिली जर लाईव्ह होऊ शकतात तर हे कार्य्क्रम का नाही? शेकडो वादक घेऊन येणे (गरज आहे की नाही माहित नाही) किंवा आकाशातून धरणीवर पडणे, नाहीतर पृथ्वीवरून आकाशात झेप घेऊन गाणे वगैरे अचाट करण्यापेक्षा जी गाणी गायचीयेत ती रेकॉर्डेडपेक्षा वेगळी भासणार आहेत याची कल्पना प्रेक्षकांना असायला पाहिजे. मलातरी लाईव्ह कार्य्क्रम आवडत नाहीत. गाणे ऐकताना गाण्यावर लक्ष देता येत नाही तर झगमगीत कपडे, काहीतरी करामती पहाव्या लागतात. बरं, हे केलं नाही तर कार्यक्रम निरस वाटण्याचा धोका असतो हेही मान्य! परदेशातल्या कुठल्यातशी लाईव्ह शोमध्ये कविता कृष्णमूर्ती हिने इतकी साधी साडी नेसली होती की ते ही बरे वाटत नव्हते (तूनळीवर दिसले). एकंदरीतच विचित्र प्रकरण असतं असं वाटतय. कलाकारांसाठीही ते फारसं सोयिचं नसावं. एखादे दिवशी घसा बसलेला असला (खासकरून परदेशी बर्फाळ थंडी असताना, जास्त मैफिली करून पिट्टा पडलेला असताना), दमलेला आवाज, वादकांपैकी कोणाची तरी फ्लाईट उशिरा, लवकर येणे वगैरेतून जमवाजमव करायची हे सोपं असेल असं नाही. हिकडे राहूल देशपांडेच्या कार्य्क्रमालाही एकदा उशीर झाला होता (त्या कार्य्क्रमाला मी गेले होते). कारण फार सिरियस नसेल पण उशीर होऊ शकतो.

७. या निमित्ताने कांही सकारात्मक बदल होऊन अश्या कार्यक्रमांच्या जाहिरातींत डिस्क्लेमर टाकावा लागेल
टाकावाच. त्यामुळे वादकांच्या ताफ्याचा खर्चही वाचेल व कमी दरात लोकांना आपल्या आवडत्या कलाकारांचा 'लाईव्ह' शो बघायला मिळेल.

मी डोंबिवलीत फुले नाट्यगृहात 'पुन्हा सही रे सही ' नाटकाचा रेकॉर्डेड प्रयोग पाहिलेला आहे साधारण वर्षभरापूर्वी.

In reply to by विजय नरवडे

नाटकाचा ? तो कसा असतो? म्हणजे पात्रे अभिनय करतच असतील तर बोलत का नाहीत?