✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आपण एवढे उद्धट का?

र
रविकिरण फडके यांनी
Fri, 08/26/2016 - 22:26  ·  लेख
लेख
['या सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय' ह्यावर एक प्रतिक्रिया दिल्यानंतर आणि इतरांच्या वाचल्यानंतर काही विचार मनात आले तेव्हा लक्षात आले की हा थोडा general विषय होतो आहे. म्हणून हे नवीन लिखाण.] माझ्या स्वतःच्या आणि इतर जवळचे मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या परदेशातील विविध अनुभवावरून असे दिसते की आपण भारतीय लोक एकूणच सामाजिक व्यवहारात दुसऱ्यांशी उर्मटपणे किंवा उद्धटपणे वागतो, आपल्यात बऱ्याचदा किमान सौजन्याचासुद्धा अभाव असतो. हे असे का? असे काय झाले की ज्यामुळे आपण भारतीय असे 'वैशिष्ठ्यपूर्ण' बनलो? मी कुणी अभ्यासू, सामाजिक शास्त्रज्ञ, वगैरे नाही. मला पडलेल्या प्रश्नाचा मागोवा scientifically कसा घ्यावा मला माहीत नाही. म्हणून हे पोस्ट. माझ्या मते दोन कारणे संभवतात; एक, आपल्या समाजात समता हे तत्व कधीच नव्हते. त्यास जातीभेद हे बहुधा प्रमुख कारण असावे. जातीच्या उतरंडीत कुणीतरी माझ्या वर असतो, कुणीतरी खाली. बरोबर कुणी नाही. त्यामुळे मी लांगुलचालन करतो किंवा उर्मटपणाने वागतो. दुसरा माझ्यासमान आहे, त्याला माझ्याइतकेच हक्क आहेत, हे आमच्या रक्तातच शिरलेले नाही. ह्याची उदाहरणे द्यायची गरज नाही इतक्या संख्येने ती आपल्याला दिसतात. शिकली सवरलेली माणसे असंस्कृतपणे वागतात, आणि भारतात असेच वागायला हवे असे ते मानतात. दुकानात चार कस्टमर्स पुढे असतानाही मध्ये घुसून आपणास हव्या असलेल्या गोष्टींची मोठ्या आवाजात ऑर्डर देणे, रांगेत घुसणे, कुणी आपल्यापुढे (आपल्या दृष्टीने) जरा हळू गाडी चालवत असेल तर त्याला 'तुम्हारे बाप का रास्ता है क्या' विचारणे, आजूबाजूला कुणी आहे नाही हे न बघता थुंकणे, इ. गोष्टी सामान्य आहेत. एकदा You Tube वर कुणीतरी रफी साहेबांची त्याला आवडणारी गाणी टाकली आणि त्यांची थोडीशी माहिती दिली होती. त्यात रफीच्या जन्मतारखेत एक चूक झाली; 1924 चे 1942 झाले. तर एकाने comment काय टाकावी? 'अबे, तू क्या दो पेग पिया था क्या?' आपण इतके असहिष्णू व असभ्यपणे वागतो. आपण ईशान्य भारतातील लोकांना त्यांच्या दिसण्यावरून हिणवतो. कारण उच्च नीचता भाव आपल्यात भिनलेला आहे. शहरीकरण: लहान गावात ह्या उद्धटपणाला आपसूकच मर्यादा पडतात. सगळेजण एकमेकास ओळखतात. बँकेत काउंटरवरील माणूस मला संध्याकाळी बाजारात नाहीतर सिनेमागृहात भेटतो. आम्ही नावाने एकमेकाला ओळखतो. त्यामुळे उद्धटपणाला किंवा अरेरावीला एक स्वाभाविक मर्यादा पडते. शहरात तसे होत नाही. मी कुणावरही जोरजोरात ओरडू शकतो, भांडण करू शकतो. शहरी जीवनात ताणतणावही खूप अधिक असतात ज्यांचा परिणाम क्षुल्लक गोष्टींवरून वाद आणि भांडणात होतो. ज्यांनी मुंबईतील लोकल गाडीतून बऱ्यापैकी प्रवास केला आहे त्यांना हा मुद्दा लगेच पटेल. आणि हे शहरीकरण वाढतच जाणार आहे. आणि त्याबरोबर आपला उद्धटपणाही. कारण हे शहरीकरण कसे झाले पाहिजे, माणसे इतक्या दाटीवाटीने राहत असताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, ती सर्व घडी कशी घालायला हवी, ह्याबद्दल कोणताही विचार कुठल्याही पातळीवर झाला असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. आता तो होणेही दुरापास्त आहे. सिस्टीम जेवढी जास्त बिघडते तेवढी ती रुळावर आणणे कठीण होऊन बसते. मी माझ्या मुंबईतील, आणि काही प्रमाणात अन्य शहरातील, अनुभवावरून हे विधान करतोय. आणि शिवाय, सुधारणेची काही गरज आहे हे मान्य करणे ही पहिली पायरी असते. तीच जर कुणालाही चढायची नसेल तर पुढे बोलणे बंद. काही उदाहरणे: 1) रस्त्यावरील वाहतूक: ह्याची एवढी दुर्दशा झाली आहे की काही बोलणे व्यर्थ ठरावे. वाहतूक सुरळीत असण्यासाठी जे जे म्हणून घटक असतात त्यातील एकही धड नाही. वाहतुकीचे नियम, ड्रायव्हर्स चे प्रशिक्षण, सिग्नल सिस्टीम, रोड मार्किंग्स...कुठलाही एलिमेंट घ्या. आपली सरधोपट पद्धत म्हणजे 'प्रॉब्लेम आहे? मग अधिक पोलीस तैनात करा' ही आहे. एक साधा प्रश्न विचारा की कोणत्याही सिग्नलला चार पाच ट्रॅफिक पोलीस कशासाठी हवेत? तेच पोलीस अन्य जास्त महत्त्वाच्या कामाला लावता येणार नाहीत? (आज परिस्थिती अशी आहे की पोलीस नसतील तर कुणीही कुठलाही सिग्नल पाळणार नाही! पण ते कारण नव्हे, परिणाम आहे.) पण हा प्रश्न आपले ट्रॅफिक पोलीस कमिशनर विचारीत नाहीत. ते आपली तीन वर्ष ड्युटी करतात आणि बदली झाली की जातात दुसरीकडे. ह्यातून वाढीला काय लागते तर उद्धटपणा, अरेरावीची वृत्ती, नियम मोडण्याची प्रवृत्ती, प्रसंगी हिंसाचार. 2) जवळपास 1965-70 पर्यंत मुंबईत बस स्टॉपवर लोक रांग लावून बसमद्धे चढायचे. आता आम्ही बस आली की तिच्यावर हल्लाच करतो. हे थांबवणे सहज शक्य होते. बेस्टने फक्त एवढेच करायचे होते की एक जाहिरात द्यायची; रांग नसेल तेथे बस थांबणार नाही. आणि नाही थांबवायची बस जर स्टॉपवर रांग नाही दिसली तर. पण हे तेव्हा नाही केले आणि आता करणे अशक्य आहे. 3) पाश्चिमात्य देशांत, निदान मी हे इंग्लंड मध्ये तरी पहिले आहे, तेही आज नव्हे तर 30 वर्षांपूर्वी, अगदी पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणीसुद्धा common queue multiple service windows ही पद्धत असते. आपल्याकडे हे अजूनही अपवादानेच दिसते. का? आपल्याला करता येणार नाही? मुंबईतील रेल्वे स्थानकावर तिकिटाच्या रांगेत उभे असताना अचानक एक खिडकी बंद झाल्यानंतर (उदा, भोजनासाठी) लोक ज्या रीतीने दुसऱ्या खिडकीवर धावतात ते ज्यांनी अनुभवले आहे त्यांना त्यातला त्रास कळेल. पण रेल्वेला त्याचे काय होय? ही बेपर्वा वृत्ती - वि डोन्ट केअर - मग सर्व लोकांत उतरते. 4) सर्वात महत्त्वाचे, शहरात आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा रीतीने वर्तणूक ठेवण्याबद्दलचे नियम घालून देणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले. परिणामी, शहरे म्हणजे फक्त अवाढव्य वाढलेली खेडी असेच त्याचे रूप झाले. राहणे शहरात, मानसिकता मात्र खेडूतांची ह्या विरोधाचा जो काही परिणाम झाला तो आपणा सर्वांना दिसतोच आहे. शहरे कशी असावीत ह्याच्या सुस्पष्ट कल्पना जर राज्यकर्त्यांना असत्या आणि त्या त्यांनी अंमलात आणल्या असत्या तर ह्या भारतीय मानसिकतेला, जी मुळात असमानतेवर आधारलेली आहे, बऱ्याच प्रमाणात मुरड पडली असती. त्यायोगे सर्व समाज हळूहळू सुधारला असता. ती संधी आपण गमावली. सत्तर वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता एकूण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्येचे प्रमाण, ही दोन्ही प्रचंड वाढली आहेत. त्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे, राजकीय पक्षांचा / नेत्यांचा बेजबाबदारपणा. हे सर्व फार घातक रसायन (potent combination) आहे ज्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. नव्हे, तसे ते होतातच आहेत, फक्त लहान प्रमाणात. उदा. भारतात दर वर्षी एक दीड लाख लोक रस्ते अपघातात मरतात. लोकसंख्येचा विचार केला तरी हे प्रमाण फार जास्त आहे. इतर देशात ह्याच्यावर अतिशय गंभीरपणे विचार झाला असता. आपल्याकडे '80% अपघात हे मानवी चुकांमुळे होतात' असे निष्कर्ष काढले की काम भागते. मुद्दा असा आहे की कमीतकमी संघर्षाशिवाय माणसे आपापले व्यवहार करतील अशा सिस्टिम्स आखून दिल्या नाहीत व त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली नाही तर हम करेसो कायदा ही वृत्ती, अरेरावी, उद्धटपणा, मग्रुरी, ह्या गोष्टी वाढतच जाणार. नाहीतर, आपली असमानतेवर आधारलेली भारतीय मनोवृत्ती आणि त्यात अस्ताव्यस्त शहरीकरणाची फोडणी, म्हणजे 'आधीच मर्कट तशातही मद्य प्याला' अशी गट व्हायची. नव्हे, झालीच आहे. कालचा दही हंडीचा शिमगा दुसरे काय दर्शवितो? असो. हे माझे विचार झाले. तुम्हाला काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21382 वाचन

💬 प्रतिसाद (121)

प्रतिक्रिया

हा: हा: हा:

प्रभाकर पेठकर
Wed, 08/31/2016 - 20:28 नवीन
BMW घ्यायची ऐपत आली तर तेव्हढ्या पैशात मी एखादी सदनिका, दुकान किंवा जमिनीचा तुकडा विकत घेणे पसंद करेन. बाकी, पेढ्यांसाठी गणपती बाप्पाच्या नैवद्या पर्यंत थांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

कळकळ उत्तम मांडली आहे.

एस
Sat, 08/27/2016 - 10:59 नवीन
कळकळ उत्तम मांडली आहे. त्याचबरोबर कारणमीमांसाही छान आहे.
  • Log in or register to post comments

?

पगला गजोधर
Sat, 08/27/2016 - 11:08 नवीन
Not Sure...if Author is overly sensitive, Or Everyone's being rude in the world. Image removed.
  • Log in or register to post comments

अतुल्य भारत!!

बाजीप्रभू
Sat, 08/27/2016 - 11:08 नवीन
आपल्यात बऱ्याचदा किमान सौजन्याचासुद्धा अभाव असतो. हे असे का? असे काय झाले की ज्यामुळे आपण भारतीय असे 'वैशिष्ठ्यपूर्ण' बनलो?
सौजन्याचा अभाव का असतो हे मोठं कोडं आहे त्याचं उत्तरही माहित नाही पण भारतीयांचं सौजन्य कसं शेण खायला जातं याचं एक उधाहरण देतो. मी पटायात रहातो म्हणून इकडचं उधाहरण. बिच रोडवर चेपून दारू पिऊन मळमळून उलट्या करणाऱ्या जमातीत भारतीयांचा नंबर पहिला. इतर देशीय देखील करतात पण, १) तो जर युरोपियन असेल तर जवळच्या ७/११ शॉपमधून पाण्याची बाटली घेऊन येतो आणि स्वतः साफ करतो. २) तो जर मिडल ईस्टवाला असेल तर जवळच्या क्लीनरला पैसे देतो आणि साफ करून घेतो. ३) तो जर जापनीस असेल तर त्याची कृती पाहून आपल्या डोळ्यात पाणी येतं. तो प्रथम बीचवर असलेली एखादी चेअर रेंटवर टेम्पररी घेतो, उलटीला कव्हर करतो जेणे करून कोणाचा पाय पडू नये. मधल्या वेळात पाणी घेऊन येतो नाहीतर सफाई कामगाराला घेऊन येतो. आणि, तोच जर आपला परमपूज्य भारतीय असेल तर. निर्लज्जपणे निघून जातो. हटकलं तर म्हणतो हे सफाई कामगार काय फुकटचा पगार घेणारेत का? 'अतुल्य भारत' बिरुद अक्षरशः मिरवतात.
  • Log in or register to post comments

उर्मटपणावर लेख आहे

बोका-ए-आझम
Sat, 08/27/2016 - 11:36 नवीन
आणि पुणे, दिल्ली वगैरे नेहमीचे यशस्वी मुद्दे आले नाहीत? अरेरे! पूर्वीचं मिपा राहिलं नाही! - (नम्र मुंबईकर) बोका-ए-आझम.
  • Log in or register to post comments

१००% सहमत

मैत्र
Sat, 08/27/2016 - 12:42 नवीन
आपल्या मनातले विचार दुसर्‍या अनोळखी व्यक्तीने मांडल्यावर बरे वाटते की इतरही काही जणांच्या मनात हाच प्रश्न किंवा मुद्दा आहे. ट्रॅफिकमधल्या रोजच्या वादामुळे, रस्त्यावर कचरा फे़कणार्‍यांमुळे, प्रतिष्ठित सोसायटयांमध्ये कर्कश स्पीकर लावणार्‍यांमुळे असं वाटतं हे acute syndromes आहेत. chronic issue हा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा, इतरांकडे सरसकट दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीचा आहे. मी यात भारतीय अभारतीय वगैरे मुद्दे आणत नाही. हे मी भारतात तरी अनेक ठिकाणी पाहिलं आहे. जपान वगैरे गहिवरून टाकणारी उदाहरणे सोडून द्या. आणि परदेश अनुभवल्या शिवाय एक मूलभूत सभ्यपणा / सिव्हिक सेन्स येऊच नये काय?? यावर उपाय काही सुचलेला नाही. कारण नियम केला तर तो लगेच सोयीसाठी तोडण्याकडे कल असतो. सत्तेची, पैशाची, लोकबळाची (मॉब, ग्रूप इ.), गुंड सामर्थ्याची, सामाजिक स्थानाची मग्रुरी.. पण सभ्य नॉर्मल जॉब करणारे सुद्धा बेमुर्वत पणे वागताना पाहून जेवढी चीड येते तेवढेच अस्वस्थही वाटते की सुशिक्षित लोक असे कसे वागतात..
  • Log in or register to post comments

आपल्याकडची गोस्ट

चौकटराजा
Sat, 08/27/2016 - 13:23 नवीन
आपाल्याकड प्रगति हाय ! म्या माज्या बापाबरोबर ज्येव्ढा उद्ढट व्हतो ते परीस माज्या मुली माझ्यासी ज्यादा उड्धट हायती. हे देश बिश चं काय नाय हा प्यीडीचा फरक हाय !
  • Log in or register to post comments

अगदी सहमत

राही
Sat, 08/27/2016 - 13:35 नवीन
लेखातल्या विचारांशी पुरेपूर सहमत. उर्मटपणाविषयी आणखी एक मुद्दा सांगता येईल. आपल्याला एखादी सेवा देणारा समोरचा माणूस जर थोडी कमी दर्जाची समजली जाणारी (खरे तर असा दर्जा असू नये, पण..)सेवा देत असेल तर आपण त्याच्याशी अजिबात आय काँटक्ट करीत नाही. त्याच्याकडे लक्षही देत नाही. म्हणजे झाडूवाला, वॉचमन, रिक्शाचालक, बस ड्राय्वर-कंडक्टर, हाय वेवर टोल गोळा करणारे कर्मचारी, रस्त्यावर पॅट्रोलिंग करणारे पोलिस इत्यादि. मग थँक यू म्हणणे दूरच. परदेशात प्रत्येकाला ह्लो, तुम्ही कसे आहात एव्हढे तरी विचारतात. शिवाय मला वाटते आपली भाषाच आदेशात्मक आहे. आपण दुकानातल्या विक्रेत्याला 'मला अमुक द्या, तमुक दाखवा',असे म्हणतो. परदेशात 'मी हे विकत घेऊ का/ घेऊ शकतो का?' असे विचारतात. एकदा परदेशातून निघताना एक वापरलेले जुनट दिसणारे भारतीय ऑइंटमेंट चुकून हातपिशवीत राहिले होते. समोरच्या बाईंनी 'हे बरोबर बाळगता येणार नाही' असे सांगितल्यावर तोंडातून चुकून 'हो. हो. काढून टाका ते' असे निघून गेले. त्यावर त्या बाईंच्या झालेल्या प्रतिक्रियेचा अर्थ बर्‍याच वेळाने उमगला.
  • Log in or register to post comments

तुमच्या विचारांशी सहमत.

स्वीट टॉकर
Sat, 08/27/2016 - 14:41 नवीन
मात्र एका मुद्द्यावर नाही. "पण हा प्रश्न आपले ट्रॅफिक पोलीस कमिशनर विचारीत नाहीत. ते आपली तीन वर्ष ड्युटी करतात आणि बदली झाली की जातात दुसरीकडे." मला आठवतंय की पुण्याच्या म्युनिसिपल कमिशनरनी दहा एक वर्षांपूर्वी हे धाडस केलं होतं. फुटपाथवरील भाजीवाल्यांनी केलेली अतिक्रमणे हटवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अतिक्रमणे नगरपालिकेनी काढून टाकली की काही दिवसात परत येतात तेव्हां नगरपालिका काय करीत असते? वगैरे प्रश्न तिरिमिरीने विचारले जात होते. तेव्हां कमिशनरसाहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले, "आम्ही आमच्या परीने अतिक्रमणे उठवतो. मात्र ती परत का येतात? ज्या जनतेला ह्या अतिक्रमणाचा त्रास होतो त्यांनी रस्त्यावर भाजी खरेदी करणे थांबवले तर आपसूकच अतिक्रमण थांबेल! रस्त्यावरच्या भाजीवर भयानक प्रमाणात धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे रसायनांसहित कार्बन बसलेला असतो. चार पावलं जास्त चालून मार्केटमध्ये जाण्याऐवजी आपणच फुटपाथवरची भाजी विकत घेतो आणि मग नगरपालिकेच्या नावानी दवंडी पिटतो." झालं! सगळे नगरसेवक त्यांच्यावर तुटून पडले! पुढच्या सात दिवसात ते सात वर्षांनी वयस्क झाले असणार! प्रत्येक काम सरकारचंच आहे अशी जोपर्यंत आपली मनोधारणा आहे तोपर्यंत आपण असेच खितपत पडणार यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

सेम.

अभ्या..
Sat, 08/27/2016 - 15:18 नवीन
सेम. रिक्शावाल्यांच्या आडदांड वागणुकीला त्यांच्या ट्राफिक रुल न पाळण्याला असेच उत्तर कमिशनरांनी दिले होते. "तुम्ही रिक्शा स्टोपपर्यंत जाता का? मधेच थांबवता का? मीटरचा आग्रह धरता का? रिक्शावाल्याला फास्ट चल असे हुकुम सोडता का? तीनपेक्षा जास्त जण बसता का? सगळे गप्प बसले अथवा परवडत नाही अशी कारणे देत गेले. रिक्शावाल्यांच्या बाबतीत न बोलणेच बरे पण सर्वसामान्यांनी स्वतःची सोय बघताना दुसर्‍याला त्रास होउ नये एवढे पाह्यले तरी ठिक. ज्यांना सगळ्याच गोष्टीचा त्रास होतो त्यांच्याबद्दल न बोलणे इष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

भारत देश महान नव्हे युद्धमान

चौकटराजा
Sat, 08/27/2016 - 15:20 नवीन
भारत देशात विविधतेचा वृथा अभिमान आपल्या प्रतिज्ञेतच आहे. आपण या विविधतेला मान तुकवून प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे कायदे घटनेत मान्य करून अक्षम्य चूक केली आहे. सार्वजनिक जागेच्या पवित्रतेची आपल्याला आजिबात चाड नाही. न्यायालयांच्या निकालांची चाड नाही. आपल्याला मिळणार्या भत्यांची पगाराची चाड नाही. असो जास्त लिहित नाही नाहीतर देशद्रोहाचा खटला व पाकिस्तानला चालते व्हा ची धमकी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर

अतिशय सहमत

पैसा
Sat, 08/27/2016 - 16:45 नवीन
अतिशय सहमत! लोकांना राजकीय स्वातंत्र्य आधी हवे का सामाजिक सुधारणा या वादात आगरकर जास्त बरोबर होते असं आता वाटायला लागलंय. आपल्याला फक्त स्वातंत्र्य पाहिजे, जबाबदार्‍या नकोत.
  • Log in or register to post comments

खरच सुंदर धागा.

शाम भागवत
Sat, 08/27/2016 - 17:58 नवीन
खरच सुंदर धागा. आपले काहीतरी चुकतेय हे सर्वांनी इतके मनापासून मान्य केलेय की बस्स. धागा भरकाटावयाचे २-३ प्रयत्न होऊनही तो मूळ रस्त्यापासून तसूभरही लांब गेला नाही. तसेच ह्या सर्व चुकीच्या गोष्टी बंद व्हाव्यात ही तिव्र इच्छा तर इतकी जाणवली की त्याला तोड नाही. Collective cautiousness मधे प्रचंड ताकद असते. त्यामुळेच मला अस वाटायला लागलय की, आपण नक्कीच बदलणार. _/\_
  • Log in or register to post comments

+११

अमितदादा
Sat, 08/27/2016 - 18:49 नवीन
नक्कीच चांगला बदल घडेल. आता थोडी चांगली बातमी फक्त प्रतक्ष्यात येऊदे म्हणजे झालं. सकाळ मधील बातमी कोल्हापूर:डॉल्बीच्या विसर्जनाचा वज्रनिर्धार http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5632686659589245849&SectionId=28&SectionName=ताज्या%20बातम्या&NewsDate=20160827&Provider=-%20सकाळ%20वृत्तसेवा&NewsTitle=कोल्हापूर:डॉल्बीच्या%20विसर्जनाचा%20वज्रनिर्धार(Video)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

काही मुद्दे आपण लक्षात घेतले

सुबोध खरे
Sat, 08/27/2016 - 20:02 नवीन
काही मुद्दे आपण लक्षात घेतले तर असे का होते हे लक्षात येईल १९४७ मध्ये आपली लोकसंख्या ४० कोटी होती आणि आता १२५ कोटीच्या वर गेली आहे. म्हणजे तिपटीपेक्षा जास्त. आपल्या पायाभूत सुविधा तिपटीपेक्षा जास्त वाढल्या का? नाही हे खेदाने म्हणावे लागते. काल बसने जाणारे प्रवासी १०० होते आणि बस ४ होत्या आणि आज प्रवासी ३०० असतील तर प्रगती झाली म्हणण्यासाठी बस १२ नव्हे तर १५ ते २० हव्या होत्या पण प्रत्यक्षात बस ८ च आहेत. हिच स्थिती सर्व शहरांमध्ये पायाभूत सुविधानमध्ये आहे. एक्स्प्रेस वे चालू झाला तेंव्हा त्यावरून जाणारी वहाने किती होती आणि आता हि संख्या किती प्रचंड प्रमाणात वाढली आहे हे पाहून आपल्याला लक्षात येईल. आता मी नागरी जाणीव (सिव्हिक सेन्स) ठेवून स्त्रिया, मुले आणि वृद्धांना पहिल्यांदा जागा द्यायला लागलो तर शक्यता अशी आहे कि मला चार तास तरी बस मिळणार नाही आणि बस मिळाली तरीही त्यात बसायला जागा नक्कीच मिळणार नाही. हे जर रोज व्हायला लागले तर माणूस अगतिक होतो आणि म्हणतो खड्यात गेला सिव्हिक सेन्स. एखाद माणूस खैरनार व्हायचा प्रयत्न करतो पण त्याला सुद्धा मर्यादा पडतात. इतकी दुरवस्था असूनही आपल्याकडे दंगली किंवा जाळपोळ हि इतकी जास्त होत नाही हे थोडेसे आपल्या सहिष्णू वृत्तीत आहे. जेथे जेथे माणसे कमी असतील तेथे माणसाची किंमत जास्त असते. मानवी मूल्ये हि एक भागिले लोकसंख्या अशी असते यामुळे स्वातंत्र्याचे वेळेस असलेले मानवी मूल्य आता १/३ झाले आहे.
  • Log in or register to post comments

पूर्णपणे सहमत,

संदीप डांगे
Sat, 08/27/2016 - 22:28 नवीन
पूर्णपणे सहमत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हे जर रोज व्हायला लागले तर

असंका
Sun, 08/28/2016 - 01:46 नवीन
हे जर रोज व्हायला लागले तर माणूस अगतिक होतो आणि म्हणतो खड्यात गेला सिव्हिक सेन्स.
कहर हसलो...! एकदम सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

किंचित असहमत.

राही
Sun, 08/28/2016 - 20:04 नवीन
विमानात बोर्डिंग करताना आसन क्रमांक ठरलेले असतात, प्रत्येकाला आगाऊ माहीतही असतात. प्रवेशासाठी क्रमवारीनुसार पुकारले जाणार हेही ठाऊक असते. पण भारतीय प्रवासी आपल्या कॅबिन बॅगा पायांशी धरून इतरांची वाट अडवत दरवाजापाशी कसेही उभे असतात. डोमेस्टिक फ्लाइट असेल आणि दोन तीन मित्रांचे एक दोन ग्रूप असतील तरीही इतका कालवा असतो की कर्मचारिणी जे क्रमांक पुकारते ते ऐकूही येत नाहीत. दिल्लीहून एखादा ग्रूप शिरला तर विचारायलाच नको. आसनाच्या हातांवरून तंगड्या मार्गिकेमध्ये सोडून मार्गिकेपलीकडच्या आसनावरील मित्राशी समोर तोंड करून गप्पा हाणणे, क्रूने सरळ बसा म्हणून सांगूनाही न जुमानणे, लँड होताना पट्टे घट्ट बांधायचे तर दूरच राहिले, उलट आपापल्या बॅगा वरून खाली घेण्याची शर्यत लागणे, लँडिंग पूर्ण होऊन दरवाजे उघडण्यापूर्वीच निर्गमनदारापाशी रांग लावण्यासाठी इतरांना ढकलून पुढे जाणे, जे हलत नाहीत त्यांना चलो चलो (सिग्नल सुटण्याआधीच पें पें सुरू होते तसे) अशी घाई करणे असले प्रकार पाहिले आहेत. मुळात सौजन्याची कमतरता आहे हेच खरे. न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेतले भारतीयांचे वर्तन सर्वात बेशिस्त असते. उतरायचे नसेल तरीही दरवाजाजवळ उभे राहाणे, उतरणार्‍यांना जागा करून न देणे, गर्दीत अंग चोरून आणि दुसर्‍याला कमीत कमी स्पर्श होईल असे न उभे राहाता धसमस करणे, दरवाजे उघडताच कारण नसताना धाडकन आत घुसणे, स्थिर उभे न राहाता (इतर लोक स्थिर उभे असतात तरी) निष्कारण हातांपायांची हालचाल करणे, कोपर पुढेमागे करणे असे अनेक प्रकार दिसतात. समूहाने समूहात जगण्याची सवय नसणे किंवा सभोवतालाचे आणि स्वतःचे भान नसणे ही दोन कारणे संभवतात. मुंबईत तर दुपारच्या वेळी लोकल गाड्यांना फारशी गर्दी नसते आणि तीन मिनिटांनी पुढची गाडी असते तरीही जिन्यावरून एक पायरी सोडून धाड धाड उतरत धावत येऊन गाडीत उडी टाकताना जवळ उभे असलेल्यांना धक्का बसून ते गाडीच्या दिशेने फेकले जाऊ शकतात इतकेही भान राहात नाही. किंवा काही तिकिट खिडक्या दहाच्या पटीत भाडे असलेल्या तिकिटांसाठीच किंवा काही ठराविक स्थानकांसाठीच्या तिकिटांसाठीच असतात, तसे वर ठळक लिहिलेले असते पण ते न वाचताच (हे अशिक्षित नसतात.)कुठेही रांग लावणे आणि नंबर आल्यावर तिकिट नाकारले गेले तर 'इतना टाइम खडे हैं' म्हणून कांगावा करणे अशा छोट्या छोट्या गोष्टी नेहमी दिसतात. सुविधा कमी आहेत हे खरेच पण आपत्काळातही काही देशांतील लोकांचे वर्तन अतिशय धीरोदात्त असते. दुसर्‍या महायुद्धात ब्रेडच्या एका तुकड्यासाठी शिस्तशीर रांगा लावल्या गेल्याची उदाहरणे आपण वाचतो. माझी स्वतःची आवडती कारणमीमांसा अशी आहे की हे आधुनिकीकरण आणि शहरीकरण (अर्बनाय्ज़ेशन) अजून आपल्यात पुरते मुरलेले नाही. अजूनही मनाने आपण मुक्त मोकळ्या अशा वनवासी आदिम अवस्थेत आहोत. ही भूमी, हे जल, आकाश सारे आपलेच आहे आणि ते कसेही वापरावे ही ट्राय्बल मानसिकता आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. इथे आपल्यामध्ये म्हणजे अर्थातच मिपावासीय नव्हेत तर बहुसंख्य भारतवासीयांमध्ये. शिवाय जातीच्या उतरंडीचा थोडासा प्रभावही अजून आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

या विशिष्ठ वाक्याशी नम्रपणे असहमत

चतुरंग
Sun, 08/28/2016 - 20:40 नवीन
अजूनही मनाने आपण मुक्त मोकळ्या अशा वनवासी आदिम अवस्थेत आहोत. ही भूमी, हे जल, आकाश सारे आपलेच आहे आणि ते कसेही वापरावे ही ट्राय्बल मानसिकता आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
नाही. माझ्यामते आदिवासी उलट निसर्गाच्या जास्त जवळ असतात त्यामुळे ते उपलब्ध गोष्टी अतिशय योग्य प्रकारे वापरतात. आपण जर नासधूस केली तर आपल्यालाच त्रास होईल हे त्यांना ठाऊक असते. जे आहे ते सर्वांचे आहे हेही ते जाणून असतात. बाकी मूळ चर्चेचा विषय हा पीचडीचा आहे त्यामुळे सध्या तरी त्यावर काही भाष्य करता येईल असे दिसत नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

थोडे वेगळे

राही
Mon, 08/29/2016 - 07:08 नवीन
ट्राय्बल लोक निरागस असतात. पण तो अप्रगत टप्प्यावरचा निरागसपणा असतो. लहान मूल मोठे होताना त्याला बाह्य जगाचे व्यवहार समजू लागले की त्याच्यातली निरागसता लोपते तसेच. मला ग्रामीण जीवन आणि शहरीकरण यांच्यातला फरक मांडायचा होता, जो धागालेखकानेही अधोरेखित केला आहे. नवनवी सार्वजनिक उपकरणे आणि सोयी पुरेशा अवधानाने वापरल्या जात नाहीत. पूर्वीचे रेल्वे स्टेशनांवरचे सार्वजनिक टेलेफोन किंवा रेल्वेची तिकिट छापून देणारी यंत्रे किंवा अलीकडे झोपडपट्टीपुनर्निर्माण योजनेखाली बांधलेल्या इमारतीतल्या लिफ्ट्स इतक्या आडदांडपणे वापरल्या जातात की त्या लगेचच नादुरुस्त होतात. शहरांचे काही नियम असतात. यात ड्रेनेज, सार्वजनिक मालमत्तेचा योग्य आणि हळुवार वापर,(यात पाणी, वीज, वाहातूक साधने वगैरेही येतात.) दुसर्‍याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला, मालमत्तेला धक्का न लावणे या गोष्टी येतात. पण या गोष्टींचे महत्त्वच मनावर ठसलेले नसते. दुसर्‍याच्या कुंपणावरची फुले फळे तोडताना आपल्याला काही वावगे वाटत नाही. फुलांसाठी फांदी ओढता ओढता ती तुटली तरी अपराधी वाटत नाही. आमच्या इथे मी लावलेल्या रोपांना आधारासाठी वाळलेल्या फांद्या रोवून रोपे त्यांना बांधली होती तर शेजारच्या उंच झाडाची फुले तोडण्यासाठी गोखली म्हणून त्याही बिनदिक्कत उपटल्या जातात. त्यात लहान रोपांचे नुकसान झाले त्याचा विचार/ खंतच नाही. हा विचारच नसणे किंवा याचे भानच नसणे हे मला आदिम संस्कृतीचे लक्षण वाटते. आदिम संस्कृतीमध्ये प्रयेक गोष्ट उपयुक्ततेवर मोजली जाते. घरातला म्हातारा आजारी पडून शिकार किंवा अन्नासाठी बाहेर पडेनासा झाला की त्याचा घरातून मिळणार्‍या अन्नाचा वाटा कमी केला जातो. रोख ठोक व्यवहार आणि उद्याची प्रोविजन नाही. आज हाताशी आहे त्यानिशी जगून घ्यायचे. सभोवतालाचा पोत बिघडला तर उठून दुसरीकडे जायचे ही ती ट्रायबल मानसिकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

...

चंपाबाई
Mon, 08/29/2016 - 09:27 नवीन
अजिबात पटले नाही.... आदिवासी लोक निसर्गाच्या अधिक क जवळ असतात व ते शिस्तबद्ध जीवन जगतात. सगळ्या नात्यांचा ते आदर करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

आदिवासी

राही
Mon, 08/29/2016 - 10:42 नवीन
मला आदिम म्हणजे प्रिमिटिव आणि ट्राय्बल म्हणजे टोळ्यांनी राहाणारे भटके विमुक्त असा अर्थ अपेक्षित होता. हे लोक आधुनिक संस्कृतीच्या आदिम टप्प्यावर असतात आणि बाहेरचा समाज जितक्या सहजपणे आधुनिकतेला, शहरीकरणाला सामोरा जाऊ शकतो तितक्या सहजतेने हा टोळ्यांचा समाज ते स्वीकारू शकत नाही. आपला भारतीय समाज थोडासा असाच आहे असे म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

सहमत

सोनुली
Mon, 08/29/2016 - 18:57 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

@ चंपाबाई....

मुक्त विहारि
Mon, 08/29/2016 - 17:00 नवीन
मनोरंजक प्रतिसाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई

राहींशी सहमत, मागास

संदीप डांगे
Mon, 08/29/2016 - 10:04 नवीन
राहींशी सहमत, मागास माणसांच्या अवतीभवती अचानक ध्यानीमनी नसतांना, त्यांचे त्यात काहीही कॉण्ट्रीबुशन नसतांना प्रगत व आधुनिक व्यवस्था उभी राहिली की काय होतं ह्याचं उदाहरण म्हणजे भारतीय समाज. लहानपणी मी आमच्या खेड्यात एकदा बसमधे चढत होतो, तेव्हा वय १०-१२ वर्षे स्वत:चा विचार स्वतः करायला लागायचे. रांगेत चढावे, गर्दी करु नये असे शाळेत शिकवलेले तत्व पाळत होतो. वडील माझ्यावर ओरडले, अरे मागे उभा राहशील तर गाडीत जायला मिळणार नाही, घुस आत जोरात. तेव्हा वडील, ती जनता ह्या सगळ्यांबद्दल एक विचित्र भावना दाटून आली. नंतर थोडं मोठं झाल्यावर विचार केला, जाउ द्या ते लोक अशिक्षित, गावठी होते. गेल्या वर्षी माझी बायको दोन मुलांना घेऊन एकटीच ठाण्याला गेली नाशिकहून, येतांना खोपट बसस्थानकावरुन बस होती, पूर्ण रिजर्वेशनची बस होती. सर्वांच्या सीट्स बुक्ड होत्या. तरीही लोकांनी प्रचंड हल्लकल्लोळ करुन घाईघाईने आत चढायला सुरुवात केली, कारण काय तर बस दिड तास उशिरा आली होती. जणू ह्यांनी घाई केल्याने तो दिड तास भरुन निघणार होता. ह्या धावपळीत माझ्या मोठ्या मुलाचा जबडा पायर्‍यावर आपटला. हे सगळे ऐकुन माझा पारा पारच चढला, तीला सांगितले ह्यानंतर कधीही सार्वजनिक वाहनाने मुलांना घेऊन प्रवास करायचा नाही. ही सर्व माणसे सुशिक्षित, सुसंस्कारी, मध्यमवर्गीय होती, पण रानटीपणात गावठी लोकांपेक्षा चार पावलं पुढे. आता तिसरा किस्सा, विमानातला. वर काही प्रतिक्रियांमधे आलंय तसंच अनुभवलं. तिन्ही किश्शांमधल्या पब्लिकच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अंतर असले तरी वागण्यात एकसमानता आहे. कारण ही सर्व जनता एकच जिन्नस आहे. आ, सा, शै ही सगळी वरवरची पुटं आहेत. खर्‍या अर्थाने आपण सिविक सेन्सवाले नैच. एखादी व्यवस्था उभारण्यात ज्यांच्या पिढ्यांपिढ्या गेल्यात, ती लोकं नीटपणे त्या व्य्वस्थेचा उपभेग घेत सुधारणा करत राहतात. आपल्याकडे भस्सकन आधुनिकता आली आहे. तीचं प्रयोजन, आवश्यकता, मार्गदर्शन हे काहीही समजून न घेता वापर सुरु झाला, त्यामुळे जुन्याच मानसिकता नव्या गोष्टींवर लादल्या जात आहेत व गोंधळ होतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

ह्यानंतर कधीही सार्वजनिक

सुबोध खरे
Mon, 08/29/2016 - 13:17 नवीन
ह्यानंतर कधीही सार्वजनिक वाहनाने मुलांना घेऊन प्रवास करायचा नाही. डांगे अण्णा हे आपल्याला परवडते म्हणून शक्य आहे. चिपळूणहुन मुंबईत येण्यासाठी मी पॅसेंजरचे तिकीट काढले ते होते ३८ रुपये माणशी( आम्ही चौघे होते) . त्याच वेळेस मागुन नेत्रावती एक्स्प्रेस येणार हि घोषणा झाली. म्हंणून मी हि तिकिटे रद्द करून १७० रुपये भरून स्लिपरचे तिकीट काढले. येणाऱ्या पॅसेंजरमध्ये तोबा गर्दी होती त्यात चिपळूण स्टेशननवरील अजून गर्दी चढली. मी तिच्या मागून येणार्या नेत्रावती एक्स्प्रेसच्या स्लीपर मध्ये आरामात झोपून वर पॅसेंजरच्या एक तास अगोदर आलो. मला त्यासाठी १७० x ४= ६८० रुपये + रद्द करण्यासाठी माणशी २० प्रमाणे ८० रुपये = ७६० रुपये इतका चार्ज पडला बहुसंख्य माणसे हे ५२८ रुपये( चार माणसांना) परवडत नाही म्हणून असे मेंढरांसारखे प्रवास करतात हि दुःखद वस्तुस्थिती आहे. बाकी रिझरव्हेशन असेल तरी आपल्या जागेवर कोणी बसला तर त्याला उठवायला होणारी कटकट टाळण्यासाठी लोक अगोदर जागेवर बसून घ्या असेच म्हणतात. ठाण्याला आपण रेल्वे गाडीत चढण्यासाठी गेलात तर आपल्या जागेवर कोणी बसून आला नाही ना या भीतीने माणसाना आपल्या जागेवर बसेपर्यंत मनात धाकधूक असते. हे सर्व केवळ लोकसंख्या आणि पायाभूत सुविधा यातील व्यस्त होत जाणाऱ्या प्रमाणामुळे आहे. गणपती उत्सव "संपल्यावर" कोकणात जाणाऱ्या बसमध्ये माणूस शोधावा लागतो. तेंव्हा चालक आणि वाहक सोडून कोणत्याही सीटवर बसायला जागा मिळते. अशा वेळेस हि परिस्थिती होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

गणपती उत्सव "संपल्यावर"

सतीश कुडतरकर
Mon, 08/29/2016 - 13:56 नवीन
गणपती उत्सव "संपल्यावर" कोकणात जाणाऱ्या बसमध्ये माणूस शोधावा लागतो. तेंव्हा चालक आणि वाहक सोडून कोणत्याही सीटवर बसायला जागा मिळते.:-)) ho kharay he.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुमची उदाहरणे माझ्या

संदीप डांगे
Mon, 08/29/2016 - 14:47 नवीन
तुमची उदाहरणे माझ्या मुद्द्याशी विसंगत आहेत, एसटी असो वा शिवनेरी कि विमान लोकांची वागणूक समान असते, परवडण्याचा मुद्दा असा की हे चैन परवडावी म्हणून भयंकर मेहनत केली आहे, बहुसंख्य लोक ती करू इच्छित नाहीत म्हणून आहे तिथेच किड्यामुंग्यांसारखे जगतात,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहमत

चंपाबाई
Mon, 08/29/2016 - 14:50 नवीन
आळशी लोकांमुळे प्रश्न निर्माण होतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

परवडण्याचा मुद्दा असा की हे

sagarpdy
Tue, 08/30/2016 - 15:51 नवीन
परवडण्याचा मुद्दा असा की हे चैन परवडावी म्हणून भयंकर मेहनत केली आहे
बहुधा खाजगी वाहनाने प्रवास करावा व तो परवडावा म्हणून आपण मेहनत घेतली, ती सफल झाली. अभिनंदन. रस्त्यावरील ट्रॅफिक आणि त्यात भयंकर प्रकारे गाड्या हाकणारे वाहक वारंवार भेटू लागले कि काय करणार ? अजून भयंकर मेहनत करून खाजगी रस्ते बांधणार, हेलिकॉप्टर घेणार कि किड्यामुंग्यांसारखे जगायला सुरुवात करणार ? असो, शुभेच्छा! [बाकी धाग्याचे शीर्षक/विषय भयंकर आवडले आहे] http://economictimes.indiatimes.com/magazines/panache/indians-have-highest-ego-per-unit-of-achievement-narayana-murthy/articleshow/53718294.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

पुढचे टार्गेट हेलिकॉप्टरच,

संदीप डांगे
Tue, 08/30/2016 - 17:36 नवीन
पुढचे टार्गेट हेलिकॉप्टरच, why settle?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

;)

पगला गजोधर
Tue, 08/30/2016 - 18:46 नवीन
अरे काय या २० व्या शतकातील टेक्नोलोजीमधे विचार करताय... पुढचे टार्गेट - टेलेपोर्टेशन....(स्टार ट्रेक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सहमत

खटपट्या
Mon, 08/29/2016 - 00:44 नवीन
सहमत आसन क्रमांक ठरलेला आहे, प्रत्येकाला जागा मिळणार आहे हे माहीत असुन एसटी पकडायला धावतात तसे धावतात, जसे काय विमान यांना घेतल्याशिवाय निघून जाणार आहे. तसेच बसायची आंणि मग सामान कोंबाकोंबीची घाइ करतात. हीच गोष्ट उतरताना - विमान जमीनीला लागल्या लागल्या पट्टे उघडून आपापल्या बॅगा काढायची घाइ. कधी कधी विमानाचे दरवाजे उघडायला अर्धा तास लागतो तरी तेवढे वेळ हातात बॅग घेउन उभे रहाणार. एवढी घाइ करुन कुठे जाणार माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

सहमत.अगदी योग्य

सोनुली
Mon, 08/29/2016 - 07:28 नवीन
सहमत.अगदी योग्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

राहींच्या मूळ प्रतिसादाशी

समीरसूर
Mon, 08/29/2016 - 10:14 नवीन
राहींच्या मूळ प्रतिसादाशी सहमत. आम्ही मलेशियाला फिरायला गेलो असतांना आमची खूप कष्ट करून जगणारी गाईड आमच्या बस चालकाला मदत होईल म्हणून काहीबाही विकत होती. त्या वस्तू बस चालकानेच आणल्या होत्या. ही गाईड फक्त त्या वस्तू बसमध्ये विकत होती. यात काहीच वावगे नाही. किंमती साधारण रु. 300 पासून पुढे होत्या. ती म्हणत होती की काहीतरी घ्या म्हणजे तुम्हाला या सहलीची आठवण राहील. आमच्या मागच्या सीटवरच्या काकू मराठीत म्हणाल्या "हिच्या काय बापाचं जातंय सांगायला काहीतरी घ्या म्हणून." तिला हे कळलं नाहीच पण अशा विचारांमधून आपली मूळ वृत्ती दिसून येते. कुणालाही आदर न देणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. माझी बायको ज्या शाळेत लहान मुलांना शिकवते त्या शाळेत केजीमध्ये शिकणाऱ्या 2-3 मुलांच्या पालकांनी तक्रार केली की मुलं घरी टॅब आणि मोबाईल खूप वापरतात. शिक्षकांनी त्यांना या वस्तू वापरण्याच्या सवयींपासून परावृत्त केले पाहिजे आणि मुलांना ही शिस्त शिक्षकांनीच लावली पाहिजे असा त्या पालकांचा आग्रह होता. मुलं शाळेत 2-3 तास असतात. मुलांना या वस्तू पालकच देतात. मग पालकांची काहीच जबाबदारी नाही का? सगळं शिक्षकांवर ढकलून पालकांना काय फक्त व्हॉट्सएपवर टाईमपास करायचा असतो का? त्या पालकांनी बायकोशी या मुद्द्यावर हुज्जत घातली. मी बायकोला (अर्थात गमतीनं) म्हटलं मुलांना तुम्ही असं शिकवा की हातात बापाने किंवा आईने टॅब किंवा मोबाईल दिला की सरळ त्यांच्याच कपाळावर आदळेल अशा रीतीने नेम धरून जोरात मारून फेकायचा. मग ही बिनडोक तक्रार आपोआप बंद होईल. :-) काही पालक इतके तावातावाने भांडतात म्हणे शाळेत की जणू शाळेनेच त्यांच्या मुलांचं संपूर्ण संगोपन करावं असा त्यांचा हट्ट असतो. अर्थात सगळेच असे नसतात. नम्रपणे बोलणारे, समस्या समजून घेणारे आणि आपल्या परीने प्रयत्न करणारे पालकदेखील असतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

लोकसंख्या

हुप्प्या
Sat, 08/27/2016 - 20:58 नवीन
लोकसंख्या अवाच्या सवा वाढल्याचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मर्यादित सेवासुविधा असतील तर त्या आपल्यालाच मिळाव्यात म्हणून लोक आक्रमक बनतात. पण नम्रपणा, सौजन्य ह्यांना दुबळेपणा मानण्याकडे आपला कल असतो. औद्धत्य, कर्कश्शपणा, अरेरावी म्हणजे आपण कुणीतरी आहोत असे सिद्ध करणे असे लोकांना वाटते. माझ्या अनुभवानुसार ही वृत्ती उत्तर भारतात प्रकर्षाने जाणवते. पण हळूहळू सगळीकडेच हे दिसू लागले आहे. सौजन्य हे वंगणाप्रमाणे असते. दोन वस्तूतील घर्षण कमी करुन ते सौम्य करते असे शिकवले गेले आहे पण आज ते कुणी मनावर घेत नाही.
  • Log in or register to post comments

हे कितपत खरे आहे, कळत नाही

सामान्य वाचक
Sun, 08/28/2016 - 19:06 नवीन
केनिया मध्ये आत्यंतिक गरिबी आहे सुविधा सोडा, बऱ्याच लोका ना दिवसेंदिवस बरेसे खायला मिळत नाही मी बघितलेली सर्व माणसे polite होती, वर्कर कॅटॅगरीतली सुद्धा नैरोबी मध्ये ट्राफिक जाम मध्ये सुद्धा कुणीही भांडणे, honking, पुढे घुसणे इ इ प्रकार करत नव्हते हे फक्त परदेशी लोकांशी नाही, तर आपापसात वागताना सुद्धा हे सर्वसामान्य माणसाविषयी झाले, गुंडगिरी काय तिथेही आहेच त्यामुळे ,अभाव , हे कितपत driving कारण आहे, कल्पना नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

माझा अनुभव - Private Sector मधला

टिके
Sat, 08/27/2016 - 22:22 नवीन
लायकी/गुणवत्ता नसताना, जे लोक वरच्या पदावर पोहोचतात , ते उद्धट असल्याचे माझे निरीक्षण आहे . उत्तर भारतीय मंडळी मध्ये उद्धटपणा जास्तच , या मताशी पूर्ण सहमत . काही विशिष्ट समाजाचे /भाषेचे लोक उद्धट असतात (टक्केवारी कमी जास्त असू शकेल ), पण असतात .
  • Log in or register to post comments

काही विशिष्ट समाजाचे /भाषेचे

खालीमुंडी पाताळधुंडी
Sun, 08/28/2016 - 18:21 नवीन
काही विशिष्ट समाजाचे /भाषेचे लोक उद्धट असतात (टक्केवारी कमी जास्त असू शकेल ), पण असतात .
याचीच वाट पाहत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिके

प्रत्येक गोष्टीशी झगडा

अनिरुद्ध.वैद्य
Sat, 08/27/2016 - 23:04 नवीन
आज्काल प्रत्येक गोष्ट झगडुनच मिळवावी लागतेय. शिवाय सार्वजनीक ठिकाणी रहदारीशी झगडा, ऑफिसमध्ये स्पर्धा, शिक्षणात स्पर्धा, त्यामुळे आपण एखादी गोष्ट मिळवली की ती गोष्ट आपल्यासाठीच बनवली असल्याचा दुराभिमान येतोय. मग काय, मी मानेल तसा वागणार तुम्ही कोण विचारणारे? असा अनुभव येत जातो.
  • Log in or register to post comments

जोपर्यंत माझा मोठेपणा माझ्या

आनंदी गोपाळ
Sun, 08/28/2016 - 20:36 नवीन
जोपर्यंत माझा मोठेपणा माझ्या न्यूसंस व्हॅल्यूच्या समप्रमाणात ठरतो, तोपर्यंत आपला उर्मटपणा संपणार नाही.
  • Log in or register to post comments

+१ एका वाक्यात उत्तरे द्या!!

चतुरंग
Sun, 08/28/2016 - 20:44 नवीन
पर्फेक्ट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

घरट्यातील जे पिल्लू अन्नासाठी

शाम भागवत
Mon, 08/29/2016 - 07:50 नवीन
घरट्यातील जे पिल्लू अन्नासाठी जास्त जोरात ओरडते त्या पिल्लाला सर्वात जास्त भरवले जाते. तस काही म्हणायचे आहे का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

चर्चा

तिमा
Sun, 08/28/2016 - 20:43 नवीन
नुकताच आलेला गुजरातेतला अनुभव. कार मधून प्रवास करत होतो. आमच्या एक वयस्कर नातेवाईक बाई गाडी चालवत होत्या. सोसायटी बाहेर आल्याक्षणी, एक बाईकस्वार चुकीच्या दिशेने जोरात आला. आमची टक्कर थोडक्यांत चुकली. आम्ही काही बोलायच्या आंत, तोच या बाईंना, "इडियट लेडी' अशी पदवी देऊन गेला. बाईंचा संताप अनावर झाला. त्यांनी मला म्हटलं, 'अशा माणसाला काय उत्तर देणार ?' मी सुचवलं, अत्यंत सौम्य आवाजात, त्याला 'थँक यू' म्हणावे. अशानेच तो ओशाळण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

:-)) खरयं

शाम भागवत
Mon, 08/29/2016 - 07:46 नवीन
:-)) खरयं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

त्या मुलाला पश्चात्ताप होत

असंका
Mon, 08/29/2016 - 09:46 नवीन
त्या मुलाला पश्चात्ताप होत असेल असं बोलल्याबद्दल. क्षणिक रागात असं बोललं जातं, खंत आयुष्यभर रहाते. गाडी चालवतानाची चुक कुणाची त्याचा काही संबंध नाही याच्याशी. आपल्या तोंडून काही वाईट गेलं की बोच रहातेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

101% सहमत

समीरसूर
Mon, 08/29/2016 - 09:54 नवीन
लेख उत्कृष्ट लिहिलाय. आणि लेखातील प्रत्येक शब्दाशी 101% सहमत. आणि मला 102% खात्री आहे पुढच्या 100 वर्षात तरी यात बदल होणार नाही. उलट हा उद्दामपणा वाढतच जाणार आहे.
  • Log in or register to post comments

१०००००% सहमत.

मास्टरमाईन्ड
Mon, 08/29/2016 - 12:40 नवीन
बाकी इथे उपस्थित झालेले बहुतेक सगळे मुद्दे मान्य असल्यानं मी वेगळं काही लिहायची आवश्यकता वाटत नाही.
बहुसंख्य मिपाकर सहमत असलेला (कमीत कमी विरोधी मतप्रदर्शन असलेला) हा एकच धागा असावा काय?
डॉ. खरे साहेबांचं म्हणणं पण पटण्यासारखं आहे. (बर्याच वेळेस त्यांची मतं पटतात ब्वॉ आपल्याला.)
  • Log in or register to post comments

...

चंपाबाई
Mon, 08/29/2016 - 13:41 नवीन
मला उर्मटपणा आवडतो. माझा उद्दाम असा आyaDeehee होता.
  • Log in or register to post comments

बरं मग?

सुबोध खरे
Mon, 08/29/2016 - 13:49 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा