Skip to main content

शृंगापत्ती

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 19/08/2016 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
शृंगापत्ती रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता. माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं. सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले. आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली. एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले. काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी. सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय" गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

वाचने 92930
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

In reply to by उडन खटोला

मी वर लिहिलेले आहे त्याप्रमाणे महिन्यातील एक दिवसच ( फार तर दोन दिवसच) गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याचा अर्थ काय कि एकदाच संबंध आला आणि गर्भार राहिली हि शक्यता ३० दिवसांपैकी १ दिवस म्हणजे ३. ३३ % इतकी कमी आहे. म्हणजेच एखादी मुलगी गरोदर राहिली तर तिचे एकदाच "भावनेच्या भरात" संबंध आला हि शक्यता ३% आहे आणि ९७ % शक्यता तीचा बऱ्याच वेळेस शरीर संबंध आला आहे असा आहे. हीच गोष्ट एखाद्या पुरुषाला अर्थातच लागू आहे. म्हणजे "ती वेळच तशी होती" one night stand नाही.बरेच स्टँड्स झालेले असतात यात "चुकून सेक्स" एक वेळ मान्य करता येईल परंतु "चुकून गरोदरपण" याची ३% शक्यता आहे.

In reply to by उडन खटोला

न जन्मलेला जीवाची म्हणजे गर्भाची हत्या ही हत्या नसते काय? गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत गर्भ आणि आईचा जीव वेगवेगळा नसतो काय? किती ती संवेदनाहीनता....
माझ्या मते ही हत्याच आहे. विशेषतः आईला आर्थिक, आरोग्याची, बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची अशी कोणतीच समस्या नसताना, गर्भात दोष असण्याची किंवा बाळंतपण गर्भाला किंवा आईला धोकादायक ठरेल अशीही समस्या नसताना, गर्भधारणा होईल हे माहीत असताना सुद्धा आणि आपल्याला गर्भ नको आहे हेही मनाशी ठरविलेले असताना सुद्धा स्वखुशीने असुरक्षित शरीरसंबंध ठेवून गर्भधारणा होऊन दिल्यावर गर्भपात करणे हे माझ्या दृष्टीने हत्या केल्यासारखंच आहे. जर आईला विनाकारण गर्भपात करण्याचा हक्क असेल तर गर्भाला सुद्धा जन्म घेण्याचा हक्क आहे.
काही बायका वर 'चुकून' गर्भधारणा किंवा 'चुकून' सेक्स वगैरे म्हणत आहेत. त्यांचे नेहमीप्रमाणेच कौतुक वाटले.
सहमत. या विशिष्ट मुलीच्या बाबतीत गर्भपाताचे समर्थन करणार्‍यांचे मलाही कौतुक वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

जर आईला विनाकारण गर्भपात करण्याचा हक्क असेल तर गर्भाला सुद्धा जन्म घेण्याचा हक्क आहे.
नक्की का? कारण वरच्या प्रतिसादात ठरावीक परिस्थितीत तुम्ही गर्भपाताला मान्यता देताय. उदा:
विशेषतः आईला आर्थिक, आरोग्याची, बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची अशी कोणतीच समस्या नसताना, गर्भात दोष असण्याची किंवा बाळंतपण गर्भाला किंवा आईला धोकादायक ठरेल अशीही समस्या
अशा परिस्थीतीत गर्भाचा काय दोष असतो ते सांगाल का?

In reply to by मार्मिक गोडसे

मी हेच केव्हाचं विचारतेय की ह्या केसेस मध्ये अचानक गर्भपात योग्य कसा होतो? बाळ बलात्कारातुन झालं म्हणुन त्याला मारता येतं???????

In reply to by उडन खटोला

परिस्थिती वेगवेगळी असली, भुमिका वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी "हत्या" होतेच आहे ना? तुम्हाला कुणालाही त्या मुलीची "फर्स्ट हॅण्ड" माहिती नाही. पण तरीही तिची "भुमिका" काय हे तुम्ही ठरवुन टाकलेलं आहे आणि तिने काय करावं हे ही. तिने तो निर्णय का घेतला हा खरं तर सर्वस्वी तिचाच प्रश्न आहे. मुल न होऊ देण्यामागे अनेक कारणं असु शकतात. अगदी लग्नानंतर सुद्धा कुणी हा निर्णय घेऊ शकतं. कदाचित कुणाला कधी आई व्हायचंच नसेल. कदाचित एकटीने आई होण्याची तयारी नसेल (आपल्या समजात ते सोपंसुद्धा नाही), कदाचित बाळाच्या बापासोबत लग्न तडजोड म्हणुनही करायचं नसेल.. पण अर्थातच ह्यातलं एकही कारण तुम्हाला "योग्य" वाटणार नाही. मात्र हिच गर्भधारणा जेव्हा बलातकारातुन होते तेव्हा मात्र तो जीव मारला तर ते चालतं. जर "जीवाला जगवणे, जन्म देणे" ही गोष्ट रुपालीच्या केस मध्ये तुम्हाला इतकी महत्वाची वाटते की खरं तर ससपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट मिळणार नाही हे ठाऊक असुनही आणि महत्वाचे म्हणजे तिचीच आई होण्याची इच्छा नसतानाही तिने बाळाला जन्म द्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं. पण तोच जीव बलात्कारिता असेल तर मात्र तितका महत्वाचा ठरत नाही. असं कसं? शिवाय ह्या बाळाला जन्म देताना आईची मानसिक तयारी नाही, आई वडीलांमध्ये प्रेम नाही, पण तडजोड म्हणुन लग्न होत आहे, किंवा कदाचित लग्न होणारही नाही आणि मुलगी एकटीच बाळ वाढवेल, आई-वडील-समाज अर्थातच हे सगळं आनंदाने मान्य करणार नाही, ही परिस्थिती तर कुणीच लक्षात घेत नाहीये. त्याचे बाळावर परिणाम होणार नाहीत का? अशा घरात बाळाला जन्म द्यावा का? मला जन्म देण्यापेक्षाही वाढवणं फार मोठी गोष्ट वाटते. त्यामुळे गर्भ रहाणं ही एकच गोष्ट जीवाला जन्म देताना पुरेशी नसते हेच माझं ठाम मत आहे. आणि ह्याच कारणासाठी बलात्कारातुन झालेली गर्भधारणा, अपंग / मतिमंद गर्भ पाडल्या जातो ते तुम्हालाही योग्य वाटत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

अहो त्या अनेक केसेस मध्ये होणारे परिणाम मान्य आहेतच की. डॉक्टरांनी सांगितलेल्या स्पेसिफिक किश्श्यात तशी स्थिती नाही हे त्यांनी स्पष्ट लिहिलंय म्हणूनच त्याचा राग आहे. वैयक्तिक मतानुसार जसा जीव जन्माला येईल तसा तो घालावा. ते त्या त्या जीवाचं आणि त्या बरोबर त्या पालकांचं प्राक्तन असतं.

In reply to by उडन खटोला

आपण डॉक्टरकडे जाणे सोडु, सगळ्या गोळ्या ज्या काही गोळ्या वगैरे घेत होतो, ते सगळं सोडुन देउ अन जीवन प्रांक्त्नावर सोडुन देऊ असं म्ह्ण्ट्लं तर काय वाटेल?

In reply to by पिलीयन रायडर

तुम्हाला कुणालाही त्या मुलीची "फर्स्ट हॅण्ड" माहिती नाही. पण तरीही तिची "भुमिका" काय हे तुम्ही ठरवुन टाकलेलं आहे आणि तिने काय करावं हे ही. तिने तो निर्णय का घेतला हा खरं तर सर्वस्वी तिचाच प्रश्न आहे.
बरोबर आहे आणि तिने तो निर्णय तिने आधी घेतलेलाचा आहे. हा धागा काढला नसता तर हा काथ्याकूट झालाच नसता. एकदा धागा निघाल्यावर वेगवेगळी मते येणारच.
मुल न होऊ देण्यामागे अनेक कारणं असु शकतात. अगदी लग्नानंतर सुद्धा कुणी हा निर्णय घेऊ शकतं. कदाचित कुणाला कधी आई व्हायचंच नसेल. कदाचित एकटीने आई होण्याची तयारी नसेल (आपल्या समजात ते सोपंसुद्धा नाही), कदाचित बाळाच्या बापासोबत लग्न तडजोड म्हणुनही करायचं नसेल.. पण अर्थातच ह्यातलं एकही कारण तुम्हाला "योग्य" वाटणार नाही.
मूल होऊन द्यायचंच नव्हतं तर गर्भधारणाच होऊन द्यायची नव्हती.
मात्र हिच गर्भधारणा जेव्हा बलातकारातुन होते तेव्हा मात्र तो जीव मारला तर ते चालतं. जर "जीवाला जगवणे, जन्म देणे" ही गोष्ट रुपालीच्या केस मध्ये तुम्हाला इतकी महत्वाची वाटते की खरं तर ससपोर्ट, घरच्यांचा सपोर्ट मिळणार नाही हे ठाऊक असुनही आणि महत्वाचे म्हणजे तिचीच आई होण्याची इच्छा नसतानाही तिने बाळाला जन्म द्यायला हवा होता असं तुम्हाला वाटतं. पण तोच जीव बलात्कारिता असेल तर मात्र तितका महत्वाचा ठरत नाही. असं कसं?
बलात्कारातून झालेली गर्भधारणा ही मनातून इच्छा नसताना लादलेली गर्भधारणा आहे. या मुलीच्या बाबतीत गर्भधारणा लादलेली नव्हती. स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवून ही गर्भधारणा झालेली आहे.
शिवाय ह्या बाळाला जन्म देताना आईची मानसिक तयारी नाही, आई वडीलांमध्ये प्रेम नाही, पण तडजोड म्हणुन लग्न होत आहे, किंवा कदाचित लग्न होणारही नाही आणि मुलगी एकटीच बाळ वाढवेल, आई-वडील-समाज अर्थातच हे सगळं आनंदाने मान्य करणार नाही, ही परिस्थिती तर कुणीच लक्षात घेत नाहीये. त्याचे बाळावर परिणाम होणार नाहीत का? अशा घरात बाळाला जन्म द्यावा का?
हे सगळं माहिती होतं तर गर्भधारणा मुळातच टाळायला हवी होती.

In reply to by पिलीयन रायडर

हा एक गहन विषय आहे आणि मी इतकी वर्षे बरयाच डॉक्टरांशी बोललो आहे त्यांना पण नक्की याचे उत्तर देता येत नाही. पलायन म्हणा किंवा आपली सद्सद्विवेकबुद्धी म्हणा. बहुसंख्य डॉक्टर लग्नानंतर शक्यतो गर्भपात करू नका असाच सल्ला देताना आढळतात. गर्भपातानंतर परत मूल न होण्याची शक्यता १ % पेक्षा कमी असते हे गृहीत धरले तरी कदाचित तयार झालेला गर्भ नष्ट करणे हे बहुसंख्य डॉक्टरना पटत नाही. मूळ जीव केंव्हा असतो हे हि सान्गणे कठीण आहे. मुलाचे हृदय पाळी चुकण्याचा ४० ते ४२ व्या दिवशी दिसू लागते. तेंव्हा पासून ते २८ आठवडे पर्यंत गर्भाची वाढ होत असते परंतु या कालावधीत जर गर्भ बाहेर काढला तरबहुसंख्य वेळेस तो स्वतः हुन श्वसन करू शकत नाही म्हणून तो जिवंत आहे (live) पण स्वतंत्रपणे वाढ होऊ शकेल (viable) असा नाही. २८ आठवड्यानंतर मात्र बाळ स्वतंत्रपणे वाढ होऊ शकेल (viable) असे असते त्यामुळे त्यानंतर त्याला गर्भपात म्हणत नाहीत. लग्नापूर्वीच्या गर्भधारणे बाबत डॉक्टर कायद्याचा आधार घेताना दिसतात. म्हणजे २० आठवड्या पर्यंत गर्भपात कायदेशीर आहे. ( आता हीच कालमर्यादा २४ आठवड्यापर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत कारण काही जन्मजात व्यंगे २४ आठवड्यपर्यंत दिसत नाहीत.) गर्भारपण चालू ठेवल्यामुळे मातेच्या जीवाला धोका असेल अथवा तिच्या मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्याला गंभीर धोका पोहोचेल किंवा बलात्कारातून गर्भ राहिला असेल तर अशा परीस्थितीत कायदा २० आठवड्यपर्यंत गर्भपाताची परवानगी देतो. नैतिकतेचा प्रश्न हा समाजाने सोडवायचा आहे. हा प्रश्न डॉक्टरांचा नाही.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर तुम्हाला तो प्रश्न विचारलाच नाहीये. कारण तुम्ही फक्त त्या गेलेल्या जीवाबद्दल दु:ख व्यक्त केलंय. त्या मुलीने त्या बाळाची हत्या केली असं म्हणलेलं नाही. कारण तसं कायदाही म्हणत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

कायदा सोयिस्कर वागतो. त्यात अनेक वेगवेगळ्या शक्यता असतात. मी त्याबद्दल सांगत नाहीये. ४ महिन्याचा गर्भ पाडायला काही वाटत नाही कारण त्याबद्दल 'तितकं' ममत्व नसतं. २ महिने/वर्षाच्या अपत्याबद्दल जीव तुटतो कारण त्याच्याबद्दल ममत्व निर्माण झालेलं असतं. त्याचा जीव वाचण्यासाठी आपण जीवाचं रान करतो.

In reply to by उडन खटोला

जी बाळं जन्माला येतात ती (बहुतांशी) तरी हवीच असतात पालकांना. इथे विषय नको असलेल्या बाळांचा आहे. आणि जी नको असलेली बाळं जन्माला येतात ती कचर्‍यात किंवा अनाथाश्रमात सापडतात. त्यांचे पालक त्यांच्यासाठी जीवाचे रान करत नाहीत. ते त्यांना फेकुन देतात. किंवा त्यांना नीट वाढवत नाहीत. (आई वडीलांनी लहान मुलांचे अक्षरशः हाल केले अशा किती बातम्या देऊ सांगा..) तेव्हा बहुतांश पालक मुलांसाठी जीवाचे रान करतात म्हणुन "सगळेच" करत नसतात. कायदा ह्याच "शक्यतांचा" विचार करत असतो.

In reply to by पिलीयन रायडर

पिरा ताई, १९८३ पासून मी वैद्यकशास्त्रात आहे परंतु अजूनही कुणी गर्भपात करण्यासाठी सोनोग्राफी साठी येतं तेंव्हा समोर दिसणाऱ्या गर्भा कडे पाहून वाईट वाटतं. एकाच वेळेस पहिली स्त्री असलेला गर्भ नको म्हणत असते आणि तिच्या नंतरची दुसरी स्त्री वंध्यत्वावर सर्व तर्हेचे उपाय करण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करताना दिसते. पुण्याला वंध्यत्व विभागात रोज ३०-४० बायका वंध्यत्वावर उपचारासाठी पाहत असताना एक श्रीमंत बापाची अत्यंत लाडावलेली मुलगी केवळ गरोदरपणाच्या उलटया सहन होत नाहीत म्हणून लागोपाठ चार वेळेस गर्भपात करताना पाहिलेली आहे. संतति प्रतिबंधक काम न केल्याने गरोदरपण आले यासाठी गर्भपात हे कारण दाखवून. अगतिकतेचा ती हद्द होती. आजही एक जोडपे लग्न ठरलेले आहे परंतु लग्नाअगोदर मूल नको म्हणून गर्भपात करायला सोनोग्राफीसाठी आले होते अशा केसेस पाहून आजही वाईट वाटते. असेच माझ्या मित्राला वाईट वाटले हेही लोक मान्य करायला तयार होत नाहीत याचे आश्चर्य आणि खंत वाटते. इतके भावना प्रधान असून चालत नाही म्हणून मी म्हणतो "माझ्या मना बन दगड"

In reply to by सुबोध खरे

गर्भपात करायला लागणं ही अत्यंत दु:खद गोष्ट आहेच. आणि डॉक्टरांना नियतीचे हे खेळ पाहुन त्रास होत असणारच.. मलाही सोफोश ह्या अनाथ आश्रमात गेल्यावर भयानक त्रास झाला होता. तिथे १०-१२ अत्यंत तान्ही बाळं पाहिली होती. अर्थातच इकडे तिकडे सापडलेली. त्यांना तर आयुष्यभर सहन करावं लागणार ना हे? त्याहीपेक्षा जास्त करुण होती ५-७ वर्षांची मुलं.. ज्यांना आता कुणीही दत्तक घेण्याची काहीही शक्यता नव्हती.. असंच वसतीगृहात राहुन आणि दुसर्‍यांच्या मर्जीवर जगत ते आयुष्य काढणार.. त्यापेक्षा ज्यांना गर्भातच संपवलं ते जास्त भाग्यवान नाहीत का? माफ करा पण लहान मुलांच्या खडतर आयुष्याकडे बघुन मला अशीच उद्विग्नता आलेली आहे. पालकांच्या चुकांची फळं मुलांनी भोगायची नसतात..

In reply to by उडन खटोला

उडन खटोला, पैलवान आणि गुरुजी. अहो जर गर्भपात ही हत्या असेल तर ती हत्या त्या मुलीने केलेली नाही. तिने फारतर हत्येची सुपारी दिली असे म्हणता येईल. हत्या करणारे वेगळेच आहेत. त्यांंनाही दोषी मानणार का?

In reply to by आजानुकर्ण

हो. काही अंशी तसं म्हणावं लागेल. (नैतिक दृष्ट्या) कायदेशीर दृष्ट्या वेगळे मुद्दे असतील. मुख्य जबाबदारी मुलीची. (हत्येचा कट करणारा मुख्य दोषी)

In reply to by आजानुकर्ण

हत्या न वाटण्याचं नेमकं कारण मला समजत नाहीये. समजावून सांगाल? वैदयकीय कारणांनी सातव्या महिन्यात गर्भ बाहेर काढून जगवला जातो त्या बद्दल काय म्हणावं? त्याला देखील विरोध आहे का?

In reply to by उडन खटोला

त्याला देखील विरोध आहे का?
ज्यांचं मूल आहे, त्यांनी निर्णय घ्यावा. दुसऱ्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्यात काय करावं याचा निर्णय घेणारा मी कोण?

In reply to by आजानुकर्ण

अस्सं कस्सं?? रुपालीची छटाकभरसुद्धा माहिती नसताना तिने जाणूनबुजुन असुरक्षित संबंध ठेवले आणि बेजवाबदारपणे गरोदर राहिली आणि वर तोंड करुन पोटातल्या जीवाची हत्या केली.. अशा मुली धनाढ्य माणसासाठी उद्या नवर्‍यालाही सोडून जातात.. अशा सडेतोड निष्कर्षावर कसे येणार मग तुम्ही? ह्यांना कारण माहितीही नाही, पण तरीही माहिती नसलेले कारण पटलेले नसल्याने ही हत्याच आहे बरं का! मुल कुणाला का वाढवयचे असेना, आपल्याला तर १००% घेणं देणं नाही, पण तरीही आपण इथे बसुन लोकांबद्दल जजमेंट्ल व्हायचं. आणि त्यांनी काय करायला हवं होतं हे सांगायचं. मस्तच!

In reply to by उडन खटोला

खटोला, तुम्ही धागा वाचलाय आणि तुम्हाला सगळं समजून आलंय. इथं रुपालीचा काही गुन्हा असेल तर अवश्य पोलीस कंप्लेंट करा. तिला काय व्हायची ती शिक्षा होईल.

In reply to by आजानुकर्ण

ऑ? असं का करता मालक? धागा लेखकाने काही लिहिलंय. त्यात स्पष्ट पणे गर्भपाताचा हेतू लिहिलाय, मुलगी काय प्रेरणा घेऊन डॉक्टर कडे आली होती याबाबत लिहिलंय तरी काहीही माहिती नसताना कसे काय लोक एखाद्या conclusion वर येतात असं पिरा लिहितात. त्यांच्या 'अस्सं कस्सं' चा बेस देखील समजायला हवा ना? त्यांचे बाण आमच्या पेक्षा जास्त हवेत मारले आहेत. (ते नेहमीच असतात म्हणा!)

In reply to by उडन खटोला

जो काही हेतू लिहिलाय तो गुन्हा कसा हे एकदा समजावून सांगता का? 'तुम्हाला वाटतं' म्हणून तो गुन्हा होत नाही.

In reply to by उडन खटोला

ते नेहमीच असतात म्हणा!
माताय.. आणि मी इथे चर्चा करतेय सिरीयसली!!! =))

In reply to by उडन खटोला

तुम्ही बरंच फॉलो करता वाटतं माझे प्रतिसाद!! मला मात्र तुम्ही लिहीलेलं अवाक्षरही आठवत नाहीये ..!आपला कधी कुठे काही वाद झालाय का? मला आठवत नाही बुवा. तरी तुम्ही माझ्याबद्दल इतकं वैयक्तिक होऊन लिहीताय. तुम्च्या शेपटावर पाय देणारं लिहीलंय वाटतं मी कधी तरी!! बघा जमल्यास मुव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करा. बाकी मी माझ्या वेळाचं काय करावं ह्याचा आपल्याशी काही संबंध नाही. तेव्हा फुकटचा सल्ला नाही दिलात तरी चालेल! तुम्ही तुमच्या बिझी शेड्युल मधुन गेले काही तास इथे वाद घालत आहात हे कौतुकास्पदच आहे. मी तसेही हवेत बाण मारत असते तेव्हा पुन्हा मला प्रतिसाद देऊन आपला बहुमुल्य वेळ वाया घालवु नये ही विनंती. (सल्ला नाही!) आपले ठोस आनी तर्कशुद्ध मुद्दे दुसर्‍या कुणासाठी तरी राखुन ठेवा. माझ्याही डॉक्याला कमी शॉट लागेल! माझा बराच टाईमपास केल्याबदल मंडळ आभारी आहे...

In reply to by स्रुजा

असा प्रकार आहे होय!! आधी माहिती असतं तर नादालाच लागले नसते ना राव... पण आयडी मागचा चेहरा माहिती नसुनही शेवटी चर्चेअंती निष्कर्ष तेच निघतात हे इंटरेस्टींग आहे!!

In reply to by आजानुकर्ण

आयुष्य कधी सुरू होतं हा लई मोठा डिबेट आहे. हृदय सहाव्या आठवड्यात सुरू होतं. त्याला जीव आहे म्हणाल का तुम्ही? गर्भपात हा ब्लॅक अ‍ॅंड व्हाइट विषय नक्की नाही.

In reply to by राजाभाउ

राजाभाऊ समानता हि कागदावर नाही मनात असायला पाहिजे. मी पुरुष आहे मी काहीही केले तर क्षम्य आहे. स्त्री हि कशी धुतल्या तांदुळासारखी असायला पाहिजे हा पुरुषी दांभिकपणा समाजात अजूनही फार मोठ्या प्रमाणावर आहे. हातात ग्लास घेऊन पटकन "आधुनिक" होता येतं बायकोला समान हक्क देता आले तर खरे आधुनिकत्व मॉडर्न सुटिंग्स ची एक जाहिरात २०- २५ वर्षांपूर्वीची आजही माझ्या मनात घोळत असते ती म्हणजे मॉडर्निझम इज नॉट जस्ट सुटिंग इट इज ए स्टेट ऑफ माईंड

In reply to by सुबोध खरे

मुद्दा बरोबर आहे पण वर ते (गापै) म्हणतायत कि "पुरुषी वर्चस्ववाद ही समस्या नाहीये" म्हणुन माझ्या मनात ही शंका आली.

In reply to by राजाभाउ

राजाभाऊ, होय, पुरुषांनाही लागू पडतं. पण पुरुषांच्या मनाची रचना अशी आहे की तो चटकन यातून बाहेर पडू शकतो. बेफिकिर राहून वा तसा आव आणून पुरूष पुढील आयुष्यास सज्ज होऊ शकतो. मात्र त्याच्या जागी स्त्री असेल तर तिला भयंकर मानसिक यातना सोसाव्या लागतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

समजा वर राही म्हणतात तसा समाज बदलत गेला (अस काही येव्हड्यात होईल असे वाटत नाही तरीही) व लग्नपुर्व मुक्त लैंगीक संबंध समाजमान्य झाले तर अशा मानसिक यातना स्त्री किंवा पुरूष कोणालाच सोसाव्या लागणार नाहीत ना ? संक्रमण काळा मध्ये तुम्ही म्हणता तशी परीस्थीती निर्माण होउ शकते. पण मग जो गोष्टी बदलतो तो अशा सर्व अव्हानांसाठी तयार असतोच किंवा किमानपक्षी असावा , केवळ याच नव्हे तर कुठ्ल्याही बाबतीत हे लागू आहे.

In reply to by राजाभाउ

राजाभाऊ गामा पैलवान म्हणतात त्यात थोडेसे तथ्य आहे. सर्वसाधारणपणे पुरुष हा भावनाप्रधान नसल्यामुळे एखाद्या ताटातुटीमध्ये त्याची मानसिक वाताहत स्त्री एवढी होत नाही. स्त्रिया जास्त भावनाप्रधान असतात आणि शारीरिक संबंधांमध्ये त्यांची शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक (INVOLVEMENTच नव्हे तर INVESTMENT) नक्कीच जास्त असते त्यामुळे अशा संबंधात बाधा अली तर स्त्रीला त्यातून बाहेर पडायला नक्कीच जास्त वेळ लागतो. उदाहरण दाखल -- प्रख्यात मराठी मॉडेल्स मधु सप्रे आणि मिलिंद सोमण यांचे लिव्ह इन रिलेशन( त्यांनी जाहीर केलेले होते) असताना (त्या काळात ते समाजाच्या विचारसरणीच्या आणि पचनाच्या बरेच पुढे होते) पुढे ते विलग झाले आणि मधू सप्रे निराशेच्या गर्तेत सापडली आणि मिलिंद सोमणचे करियर पुढे चालू राहिले. हा विषय तेंव्हा मनोविकारतज्ज्ञांमध्ये पण चर्चिला गेला होता. नात्यात स्त्रीची भावनिक गुंतवणूक नक्कीच जास्त असते. श्रीकृष्ण सामंत यांच्या धाग्यावर मी याच्या कारण मीमांसेबद्दल थोडेसे लिहिलेले आहे.

संदीप डांगे,
>> गा पै, प्रचंड गोंधळ हाये तुमच्याकडं...
होय. आहेच मुळी प्रचंड गोंधळ. मात्र तो माझ्याकडे नसून रुपालीकडे आहे. तिच्या वर्तनाची एक संगती लावायचा प्रयत्न करतो. त्यासाठी काही तथ्ये सुस्थापित करायला पाहिजेत. १. रूपाली गर्भपातासाठी डॉक्टर गुर्जरांकडे (काल्पनिक नाव) आली तेव्हा प्रथमेशच्या (= गर्भाचा बाप (काल्पनिक नाव)) पगाराची चर्चा करायची गरज खरंच होती का? नुसतं पोर नको म्हणून गप बसता आलं नाही का? की रुपाली दोलायमान मनस्थितीत होती म्हणून स्वत:शीच मोठ्याने बोलून निर्णयाचं लटकं समर्थन करंत होती? २. रुपालीने वेळेवर गोळ्या घेतल्या होत्या का? माझ्या अंदाजाप्रमाणे तिला उशीर झालेला असावा. खरे डॉक्टरच यावर प्रकाश टाकू शकतील. ३. ज्याअर्थी रुपाली डॉक्टर गुर्जरांना बघून प्रतिक्रिया देते आहे त्याअर्थी तिने पूर्वायुष्य लपवून ठेवलं आहे. तर आता गोंधळाकडे वळूया. गणिकेला हवा असतो तसा पैसा रूपालीला हवाय. मात्र गणिकेचं नातं तात्पुरतं असतं. तसं न ठेवता तिला कायमस्वरूपी पत्नीचं नातं हवंय. त्यासाठी ती पत्नीधर्माचं सोंग वठवायला तयार झालीये. रुपालीची गणिकाधर्म आणि पत्नीधर्म यांच्यात ओढाताण होते आहे. हे गोंधळाचं मूळ कारण आहे. आ.न., -गा.पै. तळटीप : रुपालीने वेळेवर गोळ्या घेतल्या होत्या का यावर प्रकाश टाकावा ही खरे डॉक्टरांना विनंती.

In reply to by गामा पैलवान

तळटीप : रुपालीने वेळेवर गोळ्या घेतल्या होत्या का यावर प्रकाश टाकावा ही खरे डॉक्टरांना विनंती.
+१ and i thought my jokes were funny.

In reply to by गामा पैलवान

गामा साहेब मी जेवढे लिहिले आहे तेवढेच मला माझ्या मित्राने सांगितले आहे. तिने संतती प्रतिबंधक साधने वापरली होती का इ. मला काहीही माहिती नाही. पुढची कथा मी त्यांना विचारणारही नाही (विचारली ही नाही)

In reply to by गामा पैलवान

गा. पैं.शी पूर्ण सहमत. ही मुलगी भविष्यात दुसर्ऱ्यांंशी संबंध ठेवण्याची किंवा नवऱ्याला सोडून एखाद्या धनाढ्याबरोबर जाण्याची बरीच शक्यता आहे.

दोन प्रश्नाम्चं एकत्र उत्तर .. या बाईने अ‍ॅबॉर्शन न करता मूल जन्माला घालायला हवं होतं. मग ते मूल त्या बाप न होण्याची इछा असलेल्याच्या बायकोला द्यायचं ! सगळे खुश

रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
धाग्यातल्या फक्त ह्याच भागावर जास्त फोकस होतोय का? अनावश्यक आहे हा भाग! संस्कृतिरक्षक चेकाळलेत त्यामुळे,

रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता. मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
धाग्यातल्या फक्त ह्याच भागावर जास्त फोकस होतोय का? अनावश्यक आहे हा भाग! संस्कृतिरक्षक चेकाळलेत त्यामुळे,

In reply to by संदीप डांगे

डॉक्टर साहेब वरील विनंतीला मान देवून धागा उसवून परत निट विणावा हि विनंती. जमल्यास त्यात तुम्ही स्वत: तुमच्या मित्राकडे त्यांच्या मुलासाठी रूपालीचे प्रपोजल घेवून गेला आहात असा सीन लिहा, म्हणजे जय वीरूचे स्थळ मौसी कडे घेवून गेला होता तसे काहीतरी. वैसे तो लडकी आछ्छी है...हँ....मगर

सज्जड हा शब्द लेखात आहे आणि काही प्रतिसादांतसुद्धा दिसला. उपवर मुलामुलींनी मॅट्रिमोनिअल साइट्सवर लिहिलेल्या आपल्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा पाहिल्या तर रंग. उंची, बिल्ट, जात, सवयी याबरोबर वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा ठळकपणे आणि नि:संकोचपणे नमूद केलेली असते. आजकाल मुली जोडीदारनिवडीबाबत अत्यंत व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असतात. ९९% प्रमाणात मुलींची अपेक्षा आपल्यापेक्षा जास्त कमावणारा नवरा असावा हीच असते. आणि ही ग्राउंड रिअ‍ॅलिटी आहे.

In reply to by राही

वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा ठळकपणे आणि नि:संकोचपणे नमूद केलेली असते. आजकाल मुली जोडीदारनिवडीबाबत अत्यंत व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असतात. राही ताई या उदाहरणात एक खोच आहे. ती म्हणजे रुपालीचे अगोदर दुसर्याशी शारीरिक संबंध होते ज्याच्याशी तिला लग्न करायचेच नव्हते. होणाऱ्या नवऱ्याच्या उत्पन्नाबाबत अपेक्षा ठेवणे मुळीच चूक नाही. पण तेंव्हा होणाऱ्या नवऱ्याला आपल्या पहिल्या शारीरिक संबंधाबद्दल प्रामाणिकपणाने सांगण्याचे धैर्य तिच्याकडे असायला हवे. लक्षात ठेवा हि गोष्ट भारतात घडते आहे जेथे ९९ % पुरुषांना स्त्रीचे विवाहपूर्व संबंध मान्य होणार नाहीत अमेरिकेत असते तर गोष्ट वेगळी आहे. (तिने नवऱ्याला सांगितले नसावे असे एकंदर माझ्या मित्राच्या अविर्भावावरून वाटते). अर्थात येथे डॉक्टर ओळखीचा निघाला म्हणून असे प्रश्न कदाचित उभे राहिले असावेत( उभे राहतील) अन्यथा असे सहसा होत नाही. माझ्याकडे मुलुंडला सोनोग्राफी साठी येणाऱ्या "मुली" "बोरिवली, माहीम, कुर्ला, दिवा " अशा दूरच्या ठिकाणहून यासाठीच येतात दांभिकपणा कृतीत नाही तर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी नाकारण्यात आहे. हे तुझे आहे तुजपाशी मधील अजरामर वाक्य आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर्साहेब, "ती पोरगी बघा किती चालू टैप आहे" एवढ्या एका वाक्यासाठी चालू आहे का हा सगळा खटाटोप..? मला तर वाटले डॉक्टरमित्राची खरेच नैतिक अडचण झाली आहे..

In reply to by संदीप डांगे

नाहीये का? पुरुषांना म्हटलं जातंच की. बायका चालु नसतात? काल एक बातमी आली होती- लग्न झालेली मुलगी वय 23 आणि लग्न झालेला मुलगा वय 21 ज्यांचं 6 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होतं नि दोघांच्याही लग्नानंतर देखील सुरूच होतं. मुलीचा नवरा कुठेतरी बाहेर गेल्यावर मुलीने प्रियकराला झोपायला बोलावलं. रात्री वाद झाला नि तो तिला मारु लागला. मुलीने प्रियकराचा गळा दाबून खून केला.

In reply to by संदीप डांगे

डांगे अण्णा हा आपण काढलेला अर्थ आहे. ( तो कसा काढावा हे सांगणारा मी बापडा कोण?) पण एकच विचारावेसे वाटते. आपल्या "भावाचे" अशा मुलीशी आपण लग्न करून द्याल का? खाली समीर सूर यांनी अचूक लिहिलं आहे. जग "सोयीने" चालते. बाकी "उदारमतवाद आधुनिकता" जालावर व्यक्त करायला काय जाते? वचने किं दरिद्रता?

In reply to by सुबोध खरे

आपल्या "भावाचे" अशा मुलीशी आपण लग्न करून द्याल का? "अशा" ह्या शब्दात येणारा अर्थही आपण स्वतःच काढत आहात की? तुम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे/नाही पण ती मुलगी 'तसल्याच टैप' ची आहे, हा ही तुमचा काढलेला दृष्टीकोनच झाला की नाही?
बाकी "उदारमतवाद आधुनिकता" जालावर व्यक्त करायला काय जाते? वचने किं दरिद्रता?
जरा सांभाळून. आपण अनिर्बंधपणे वैयक्तिक होत आहात. सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे ह्या भ्रमात राहून इतरांच्या (ज्या व्यक्तिंबद्दल तुम्हाला शष्प माहिती नाही) मतांची, अनुभवांची, विचारांची एकतर्फी खिल्ली उडवणे योग्य नव्हे. कधी प्रत्यक्ष भेटा, मग बोलू "वचने किं दरिद्रता" ह्या विषयावर. अधिकारी व्यक्तीने जबाबदारीने वागणे अपेक्षित असते. तेवढी काळजी घ्या म्हणजे बरं पडेल.