Skip to main content

रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा ??

लेखक अत्रन्गि पाउस यांनी शुक्रवार, 06/05/2016 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
पोलिसांच्या राजेबद्द्ल ची हि बातमी वाचून एक सलत असलेला विषय मांडावासा वाटतोय. आपल्या कडे एकूणच रजा घेणे हे काहीतरी चूक, पाप, अनैतिक किंबहुना अनावश्यक आहे ...नाईलाज म्हणून रजा हा प्रकार अस्तित्वात आहे अशी काहीशी मानसिकता आहे. रजा देणारा, स्वत:च्या खिशातून काहीतरी मेहेरबानी म्हणून दिल्यासारखी रजा देतो आणि घेणारा रजा मिळाली कि 'हुश्श' करतो असे सर्वसाधारणपणे दिसते. पुलंनी म्हटल्याप्रमाने (विनोदाने का होईना) "कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची १२०० सुलभ कारणे" वगैरे हे ह्याच मानसिकतेची अपरिहार्य परिणती आहे. आपल्याकडे आपण जनरली १ २ दिवस रजा घेतो पण ती घेतांना काहीशी चोरटे पणाची भावना असते... रजेवर गेलास तरी फोनवर उपलब्ध राहा अशी मूक आज्ञा बॉसच्या चेहेऱ्यावर स्वच्छ लिहिलेली असते ...आणि क्वचित वेळीप्रसंगी रजा रद्द करून परत यावे लागण्याची उदाहरणे पाहिलेली आहेत. पाश्चात्य जगात लोक २ -२/ ३- ३ आठवडे रजा वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा अगदी सहज घेतांना दिसतात .. ...कामाची काही का आग लागेना रजा रद्द करून परत आलाय किंवा रजेवर गेलाच नाही ...असे मी कधीही पहिले नाही ... जे हक्काच्या रजेचे तेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्ट्यांचे, आपल्याकडे कुणीही कधीही कुणालाही फोन करून कामाचे बोलू शकतो, पाश्चात्य जगात सुट्टी सोडा कामाचे तास सोडून कुणी फोनवर एरवी प्रतिसाद सुद्धा देणार नाहीत (ह्याला अपवाद म्हणजे खरोखरीचे काहीतरी जबरदस्त कारण असते). ह्याच्यावर कडी म्हणजे रजा किती साठवता येते ह्यावर दिवसेंदिवस येणारी बंधने ...म्हणजे वरच्या रजांचे नं पैसे मिळणार नं त्या पुढे घेण्याची सुविधा मिळणार ...आणि त्या फक्त वाया जाणार म्हणजे पर्यायाने कर्मचार्याचे नुकसान ... माझा अनुभव खाजगी क्षेत्रातला आहे पण सार्वजनिक क्षेत्रात फार बरी परिस्थिती असेल असे वाटत नाही .. हे असे का ? बदलायला नको का ?काय करता येईल ? जाता जाता : माझ्यापुरते बोलायचे तर मी माझ्या टीम्स मध्ये रजेला कधीही नाही म्हणत नाही, कारणांची उलटतपासणी नाही किंबहुना रजा घेण्यासाठी उद्युक्त करतो ... जेणेकरून टीम मध्ये एक तणावरहित वातावरण निर्माण होते .. लोक एकमेकांची जास्त काळजी घेतात आणि एकमेकांच्या रजांमध्ये कामाची खोटी होऊ देत नाहीत ...आणि त्यातून काही खोटी झालीच तर मी जबाबदारी घेऊन कुणाला झळ बसू देत नाही आणि ह्यामुळे खरे तर उरला सुरला तणाव सुद्धा नाहीसा होतो ...

वाचने 36789
प्रतिक्रिया 139

प्रतिक्रिया

सहमत

आमच हापिस एक सरकारी असल तरी ऑटोनॉमस बॉडी आहे. आम्हाला डायरेक्ट सांगतात रजा हा हक्क नाही म्हणुन . विषय कट.

In reply to by प्रीत-मोहर

आम्हाला म्हणतात की सुटी हक्क आहे तरी देणार नाही! करायला काय नसले तर इथं पाखरं हुलत बसा घरी जाऊन कुठला कुळव धरायचाय तुम्हाला :P

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

लोल. दुष्मन नाही सीमेवर मी जातो अस सैनिकाने म्हंटल तर कस व्हायच हो. (हलकेच घ्या बर का )

रजा हवीच. आपल्या मतांशी सहमत. एका वर्षात ७-८ दिवस सलग राजा घेऊन कामापासून दूर राहणे आवश्यक आहेच शिवाय मध्येच एखाद्या दिवसाची दांडी अत्यावश्यक आहे. अर्थात कामाविषयी खूप प्याशन असेल तर रजेचा मुद्दा गौण ठरतो. ब्रेक मिळाला की प्रोडक्टिविटी वाढते असे निरीक्षण आणि अनुभव आहे.

थोडेसे गुटखा/हातभट्टी दारू बाबत सरकारी धोरणासारखे आहे. खोटे कारण सांगून रजा मिळवली तर कधी कधी खरोखर्च्या निकड/तातडीच्या प्रसंगी मिळत नाही. निरल्लजपणे महिन्यातून दांडी मारणारे बहाद्दर ( आणि सगळ्यांसमोर बॉसकडून अपमानही हसत हसत पचवतात) आणि मग आपणही मुर्दाड मन बनवावे असे वाटू लागते. आणि मग फुटकळ सबबीखाली (पुर्वनियोजीत न ठेवता) रजा घेण्याची सवय लागते. गुटख्यावर बंदी आणल्यावर गुटखा सर्रास मिळतोय हे सगळ्य्यंना माहीती आहे पण मान्य करायचे नाही,आणि उत्पादनार बंदी नाही विक्रीवर आहे. तस्मात एकीकडून रजा शिल्लक ठेऊ नका सांगायचे आणि रजा द्यायचीही नाही असे असेल तर कर्मचारी काहीही कारणे देऊन (अकस्मीक रजा मोठ्या प्रमाणात घेतात) आणि शिल्लक रजा बुडीत (लॅपस) होण्याचा धोका पत्करत नाहीत. काही आंतरराष्ट्रीय आणि इथे असलेल्या आस्थापनात काटेकोर नियम असतील तर मर्यादेवरील शिल्लक रजेचे दरवर्षी नियमीत पैसे मिळत असतील तरी कर्मचारी वर्गाची हरकत नसते. पण रजा शिल्लक असून न देता वाया गेल्या तर ते दु:ख जास्त बोचते हेच खरे. पुर्वनियोजीत रजेचा पुरस्कर्ता नाखु

याविषयी मी म्हणेल.... निर्लज्जम सदा सुखी !! घेणारे निर्लज्जपणे घेतात तेंव्हा देणारे देतात अगदी सहज...फोन बंद करून सुट्टीवर जातात.. पण एखाद्याने अगदी गरज म्हणून एक दिवस जरी सुट्टी मागितली किंवा घेतली तर तो गुन्हा असतो..वरून दर दहा मिनिटांनी फोन !

साधारणपणे गणवेषधारक दलांमध्ये (uniformed services) म्हणजे लष्करी निमलष्करी आणि पोलिस दले यात मनुष्य बळाची सतत कमतरता असते त्यामुळे तुम्हाला हवी तेंव्हा रजा देणे हे वरीष्ठाना नेहमीच शक्य होत नाही. पोलिसांचे उदाहरण घेतले तर सतत कोणताना कोणता बंदोबस्त, नाकेबंदी, हाय आलेर्ट चालू असतो त्यामुळे आधीच कमी असलेल्या संख्येवर कायमच ताण असतो त्यामुळे वरिष्ठ अधिकारी सहसा रजा देण्यास नाखूष असतात. यात त्यांना स्वतःला सुद्धा पाहिजे तेंव्हा आणि पाहिजे तितकी रजा मिळतच नाही. याला साधे सरळ उत्तर नाही. माझ्या विभागातील लोकांना मी रजा "आपसातच" ठरवून घ्या असे सांगत असे. (भांडण केले तर कोणालाच रजा मिळणार नाही हे स्पष्ट केलेले असे.) रजेवर जाणार्या माणसाचे काम इतर लोकांवर पडत असे पण ते खुशीने करत कारण त्यांना माहित असे कि आपण हे काम केले तर आपल्याला हि पूर्ण रजा मिळू शकेल.काही वेळेस जेन्व्हा दोनच तंत्रज्ञ होते तेंव्हा तर माझ्या क्षकिरण तंत्रज्ञाला रोजच "कॉल" करावा लागे. परंतु त्याला इलाज नव्हता त=हे त्यानाही माहित होते. त्यामुळे माझ्या सरकारी नोकरीत मला असे प्रश्न फारसे आले नाहीत. मी स्वतः मला असलेली अर्जित रजा व्यवस्थित पणे घेत असे. माझी मुले लहान असल्याने मी वर्षाच्या सुरुवातीलाच रजा मागत असे (कारण मुंबईत सुटीवर येण्यास जानेवारी फेब्रुवारी हा सर्वात चांगला काळ आहे शिवाय रेल्वेच्या आरक्षणासाठी सुद्धा अजिबात त्रास होत नसे) या वेळेस मला रजा नाकारणे वरिष्ठांना शक्य होत नसे. नंतर नंतर तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच शुभेच्छा दिल्यावर माझे वरिष्ठ सर तुझा रजेचा अर्ज कुठे आहे हे हसत विचारत असत. याचे कारण त्यांना मुलांच्या सुटीच्या काळात ( एप्रिल मे मध्ये) मी हमखास उपलब्ध राहत असे हा मोठा आधार होता. हे सर्व केवळ खात्यांतर्गतच चालत असल्याने शक्य होते हे मला माहीत आहे पण तरीही विचार विनिमय करून रजा घेणे हा एक नक्की पर्याय आहे.

In reply to by सुबोध खरे

ह्याचे कारण एकंदर मनुष्यबळ गरज विरुद्ध पुरवठा ह्यात १००% रजा हि गृहीतच धरली जात नाही ...

अजुन एक मुद्दा म्हणजे रजेचे कंपनीगणिक वेगळे नियमः सध्याची कंपनी सोडुन नविन कंपनीत जायचे तर पुन्हा शुन्यापासुन सुरुवात. त्यात पण अधीच्या कंपनीत नोटीस पिरेड मधे रजा नाही, नविन कंपनीत सुरुवतीला रजा नाही वगैरे कटकटी. माझ्या आधीच्या कंपनीतील्या परदेशी बॉसने सांगितले होते की त्यांच्या देशात (कदाचित बेल्जियम)सर्व कंपन्यात रजेचे दिवस आणि विभागणी सारखीच असते. एका कंपनीतुन दुसर्‍या कंपनीत जाताना राहिलेल्या सुट्ट्या नविन कंपनीत कॅरी फॉरवर्ड होतात. आपले कामगार मंत्रालय असा निर्णय कधी घेईल देव जाणे..

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

एका कंपनीतुन दुसर्‍या कंपनीत जाताना राहिलेल्या सुट्ट्या नविन कंपनीत कॅरी फॉरवर्ड होतात. परफेक्ट. असे असायला हवे असे नेहमीच वाटत होते.

In reply to by मृत्युन्जय

डेन्मार्कमध्ये माझ्या क्लाएंटच्या कंपनीत सुट्ट्या आरामात देतातच वर रोज कंपनीचे गेट ६ ला बंद होते...त्यानंतर थांबायचे नाही...वायफायचा पास्स्वर्ड एक्स्पायर होतो =))

In reply to by टवाळ कार्टा

आणि तरीही त्यांच्या सिस्टिम्स अतिशय व्यवस्थित चालतात ...लोक आनंदी वगैरे वगैरे ... आपला साला बेसिक मधेच राडा

In reply to by यशोधरा

देव दयाळू आहे हे माहीत होते अता शिक्का मोर्तब झाले. इथे सोडताना सुट्ट्या घेऊ देत नाहीत आणि तिकडे फॉरवर्ड !!! हतबल नाखु

लेखाचे शीर्षक आणि मांडणी प्रथमदर्शनी लोकप्रीय होऊ शकली तरी शीर्षक फाल्स बायनरी ऑप्शन्स देते आणि मजकुर समतोलाची गरज न मांडता भावनीक भांडवल बनवताना दिसतो असे वाटते का ? चांगल्या उत्पादकतेसाठी मनुष्यबळ तंदुरुस्त असणे, आस्थापनेचे अवलंबीत्व व्यक्तीकेंद्रीत न रहावे म्हणून तसेच अज्ञात भ्रष्टाचारी लागेबांधे कुठे असतील तर त्यातील सातत्य तुटून ते उघड व्हावेत म्हणून रजा देणे ही व्यवस्थापनाचीही तेवढीच गरज असावी याची जाणीव बर्‍याच व्यवस्थापक आणि आस्थापनांना नसते हेही खरे; अर्थात त्याच वेळी आस्थापनेच्या व्यवसायाचा प्रकार, व्यक्तिच्या कार्याचा प्रकार, ग्राहकांना केलेली सेवा वचने (सर्वीस कमीटमेंट्स), उत्पादकतेचा आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा ताळमेळ ह्याही महत्वाच्या बाबी असाव्यात असे वाटते. यात आस्थापनेच्या आणि व्यवस्थापकाच्या मनुष्यबळ नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्याचा कस लागतो हे पण खरे.

In reply to by माहितगार

माहितगारसाहेब, आस्थापनेच्या व्यवसायाचा प्रकार, व्यक्तिच्या कार्याचा प्रकार, ग्राहकांना केलेली सेवा वचने (सर्वीस कमीटमेंट्स), उत्पादकतेचा आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा ताळमेळ ह्याही महत्वाच्या बाबी असाव्यात असे वाटते. यात आस्थापनेच्या आणि व्यवस्थापकाच्या मनुष्यबळ नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्याचा कस लागतो हे पण खरे ह्या सगळ्या बाबत विचार आणि नियोजन करतांना 'रजा' आणि त्यामुळे येणारी उपलब्धते मधील तूट हा भाग भारतीय मानसिकतेत विचारात घेतलीच जात नाही कि काय अशी परिस्थिती आहे ... एका कर्मचार्याचे महिन्याचे किमान तास १७८ धरणे हेच मुळी चुकीचे आहे (२२ दिवस x ८ तास) त्यात येणारे सार्वजनिक सुट्ट्या / त्याच्या अंदाजे २ रजा ह्या जमेस धरून नियोजन केल्यास आयत्यावेळी धावाधाव करावी लागत नाही ...

In reply to by अत्रन्गि पाउस

कामाचे दिवस केवळ वीसच धरावेत, असेच तुमचे म्हणणे आहे ना ? मज्जाच म्हणजे दोन दिवस काम केले की एक दिवस सुट्टी :), आणि टोटल सुट्टीचे दिवस भरतील तेवढ्या नव्या लोकांना कामावर घ्यायचे, आयडीया वाईट नाहीए, बेरोजगारी लौकर कमी करण्याचा साधा सोपा उपाय -बिनपगारी रजा चटचट दिल्याकी आर्थीक ताणही नाही आणि एकतृतीआंशानी अधिक रोजगार- हा उपाय यापुर्वी का बरे कुणाला सुचला नव्हता ;) (ह.घ्या)

In reply to by माहितगार

हलकेच घेऊनही हा हिशोब कळत नाहीये ! एका महिन्यात २० कामाचे दिवस मोजावे असे म्हणतोय मी

In reply to by अत्रन्गि पाउस

एका महिन्यात २० कामाचे दिवस मोजावे > म्हणजे २० दिवस काम १० दिवस सुट्टीचे >म्हणजेच २ दिवस काम केले की एक दिवस सुट्टी नाही का सुट्टीतर मिळाली पाहीजे उत्पादन अथवा सेवा तर खंडीत व्हावयास नको म्हणजे तेवढ्या अधिक माणसांची भरती करणे आले > भ्ररती वाढवली की रोजगार आपसूकच वाढतो फक्त वाढवावयाच्या माणूसबळासाठी पैसा कुठून उभा करावा ? ज्यांना सुट्टी पाहीजे त्यांच्याच पगारी सुट्टीला बीनपगारी करुन असे नाण्याची दुसरी बाजू दाखवण्यासाठी गंमतीने म्हणालो. माझ्या मते रजा ही दोन्ही बाजूने सुविधा आहे. असो.

In reply to by अत्रन्गि पाउस

:) कदाचित एखाद्या गोष्टीची सवय झालेली असली की गृहीत धरल्यागत होते होत असावे. चालायचेच.

इस दुनिया मे सिर्फ तीन ही चीझोंकी कीमत है: स्किल, स्किल, स्किल. तुमच्या तुमच्याकडे स्किल असेल (आणि मार्केट मध्ये ते कुठेच सहजासहजी उपलब्ध नसेल) तर बॉसला "देतोस, की जाऊ दुसर्‍या कंपनीत" असं विचारता येतं. तस्मात, तुमच्या कामावर प्रेम करा, स्किल वाढवा. कंपनी गेली खड्ड्यात.

In reply to by काळा पहाड

काळा पहाड बाडीस यावर मी अजून म्हणेन दर दहा वर्षांनी तुमचे कौशल्य/ कसब(skill) वाढवणे गरजेचे आहे कारण दहा वर्षात तुमच्यापेक्षा तरुण आणि उत्साही लोक त्याच कौशल्य पातळीचे (skillset) कमी पैशात उपलब्ध होतात. तेंव्हा आपल्याला स्पर्धेत दोन पावले पुढे राहण्यासाठी आले कौशल्य जपत आणि वाढवत राहणे आवश्यक आहे. अन्यथा नोकरी, रजा, पगारवाढ इ सर्व गोष्टीसाठी आपल्याला दुसर्याचे "मिंधे" व्हावे लागते. हि गोष्ट चाळीशी नंतर जास्त प्रकर्षाने जाणवू लागते.

In reply to by अप्पा जोगळेकर

२ वर्षे हा खूप जास्त काळ आहे. रोज काहीतरी नवीन शिकवच लागतं. २ वर्षात सगळ्या मोबाईल/संगणक प्रणाली, लोकप्रिय सेवा, तंत्रज्ञानातील ट्रेंड्स बदलताहेत, एकदम किती नवीन शिकणार ?!

In reply to by sagarpdy

सहमत. मी तर दररोज आढावा घेतो की मी आज काय नवीन शिकलो? त्यामुळेच मिपावर प्रतिसाद लिहिण्यापेक्षा एखाद्या वेबसाईट वर जावून फायनान्शियल टेक्नॉलॉजितले ट्रेंड्स पहाणे, नवीन अ‍ॅसेट क्लास शिकणे, एखादी श्वेत पत्रिका वाचणे, केस स्टडी वाचणे, सर्टिफिकेशन करणे, एखाद्या तज्ञाची मुलाखत पहाणे/वाचणे यावर माझा भर असतो. फायनान्शियल फिल्ड इतकं मोठं आहे की पुढची दोन वर्षे पुरेल इतकं मटेरियल माझ्याकडे सध्या तयार आहे. हे सगळं माझ्या नोकरीशी संबंधित असलं तरी ते करण्याची माझ्यावर सक्ती नाही. पण मी ते केलं नाही (आणि दररोज केलं नाही) तर मी औट डेटेड होईन हे नक्की. ऑफिसात काम करताना सुद्धा आमचा ग्रुप सतत चर्चा करत असतो आणि एखाद्या नवीन अ‍ॅसेट तयार करण्याच्या, श्वेत पत्रिका तयार करण्याच्या विष्यांचा शोध घेत असतो.

In reply to by काळा पहाड

मग तुमच्या ज्ञानाचा आम्हालाही काही फायदा होऊ द्या की. लेख लिहा अशी विनंती आहे. --/\--

In reply to by काळा पहाड

+१०० अजून एक... फक्त आपल्या आणि आपल्याच विषयातले आपले ज्ञान आणि जाण वाढवणे ही प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे समजणे पुरेसे होणार. किंबहुना वरीष्ठ पदाच्या स्थानासाठी "एखाद्या विषयात तज्ञ असणे" ही पात्रता अट कमी महत्वाची होऊन "कंपनीसाठी सर्व आवश्यक विषयांची पुरेशी माहिती असणे आणि त्यापेक्षाही जास्त त्या विषयातील अनेक तज्ञ टाळक्यांच्या टीमचे यशस्वी नेतृत्व करून त्यांच्याकडून योग्य तो परिणाम (आऊटकम) साधण्याची पात्रता असणे" ही अट कळिची बनते. म्हणजे, वरच्या पदावर जायचे असल्यास केवळ एका विषयाचा तज्ञ (सबजेक्ट मॅटर एक्सपर्ट) असणे पुरेसे नाही. बहुआयामी ज्ञान, व्यक्ती व्यवस्थापन (मॅन मॅनेजमेंट) कसब आणि कंपनी ज्या परिस्थितीत (एन्व्हिरॉनमेंट) काम करते आहे त्यात वाहणारे वारे ताडून त्यानुसार कंपनीचे/प्रोजेक्टचे शीड आणि रडार हलवण्याचे कसब आत्मसात असणे अनिवार्य आहे.

In reply to by काळा पहाड

इथे माझा कोणताही प्रॉब्लेम नाहीये :-D वरील बातमी वाचली आणि काही सहकारी टीम managers ची मानसिकता (विशेषत: भारतीय कंपन्यांमधून विदेशी बहुराष्ट्रीय कंपनीत आलेल्यांची) बघितल्यावर कित्येक दिवस जाणवत असलेली सल मांडली इतकेच ...

कंपन्या, तेथील कामकाज आणि मालक - (अतीच) जिव्हाळ्याचा विषय, खाजगी कंपनीत सगळा मनामानी कारभार असतो, रजा मिळणे पूर्णपणे मालकाच्या मनावर अवलंबून असते. त्यातही मालकाची मर्जी, पार्शलिटी, फेव्हरिटीझम हे प्रकार असतातच. प्रामाणिकपणे अ‍ॅप्लीकेशन देऊनही अनेकदा रजा मिळत नाही, कामाचे कारण पुढे केले जाते. आपण इमानदारीत काही वैयक्तिक कारण सांगितले तर तुमचा पहिला प्रेफरंस परिवाराला, खाजगी आयुष्याला आहे, कामाला नाही असे फुटकळ आरोप केले जातात. अशावेळेस मग लोकांनाही बेशिस्त बनून आधी न सांगता अचानक सुट्टी घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. शेवटी सीधी उंगलीसे घी ना निकले तो... मागे घरातील फंक्शनसाठी २-३ दिवस जोडून सुट्टीसाठी अर्ज दिला होता तर सध्या टीममध्ये इतर कोणी नाही, काम जास्त आहे म्हणून रजा नाकारली गेली, आणि पहायला गेलं तर त्याच सुमारास सार्वजनिक सुट्ट्या जोडून आल्यामुळे ऑफिसातील मॅक्झिमम लोकांनी सुट्ट्या घेतल्या होत्या, त्यांना मिळाल्याही होत्या, त्यामुळे विशेष कामही नव्हते पण बोलणार कुणाला. यानंतर मात्र थोडं जशाला तसं करायचं ठरवलं. ४-५ दिवस गोव्याला जायचा प्लॅन ठरत होता, ३ दिवस सुट्टी + शनिवार रविवार, बुकिंग केले, पोहोचलो, तिथून ऑफिसात फोन केला, अचानक ठरलं, आलो.. शिस्तीत ओरडत बसा म्हटलं. तिकडे त्यांची खाऊ की गिळू अवस्था झाली असेल, पण नाईलाज होता, ही वेळ त्यांनीच आणली होती. सतत काम एके काम करूनही माणूस वैतागतो, त्यालाही थोडी सुटका, विरंगुळा हवा असू शकतो, शिवाय असा रिफ्रेश होऊन आलेला माणूस दुप्पट जोमात काम करेल यातही त्यांचाच फायदा असतो, पण तेवढे समजून घेतले तर ना. परिस्थितीनुसार माणूस हुशार होत जातो आणि व्हायलाच पाहिजे त्याने. मालक लोक हमालासारखे लोकांना राबवून घेणार, त्यांच्या जीवावर लाखो कमावणार, एवढे करूनही त्यांच्या मेहनतीची किंमत अजिबातच नाही, आणि जरा कोणी सुट्टीचं नाव काढलं की लगेच यांचा जीव जळणार. माणसाला मशीन समजून नुसतेच कामाला जुंपणार्‍या मालकांबद्दल मग कामगारांच्या मनातही कुठलीच भावना राहत नाही, तेही निर्ढावत निर्विकार होत जातात, किंबहुना तसं व्हावं लागतं. ऑफिसात अनेक वर्षे इमानदारीत राहून वागून पाहिलं पण त्याने नुकसान आणि मनस्तापाशिवाय हाती काही लागलं नाही, प्रामाणिकपणाचा जमाना तर अजिबातच राहिलेला नाही, त्यामुळे जैसे को तैसा, शराफत छोड दी मैने, ही सध्याची ब्रीद वाक्य बनली आहेत :)

In reply to by नीलमोहर

आपण इमानदारीत काही वैयक्तिक कारण सांगितले तर तुमचा पहिला प्रेफरंस परिवाराला, खाजगी आयुष्याला आहे, कामाला नाही असे फुटकळ आरोप केले जातात.
म्हणजे काय??? हो आहेच म्हणावं परिवाराला पहिला प्रेफरन्स.. हा काय बावळटपणा आहे? कुणी कुटूंबापेक्षा जास्त ऑफिसला महत्व देईल का? जे देतात तेच अडकतात. झुकती है दुनिया... मी चालले असं "सांगायच".. विचारायचं नाही... मला कळत नाही.. आपन काम करतो महिन्याला आणि मग पुढच्या महिन्यात त्याबद्दल रजा मिळतात. "Earned" Leaves.. मग तुमच्याकडे रजा असतील तर नाकारण्याचा काय संबंध? मोबाईल बंद करुन बसायचं जर घरी कॉल करत असतील तर.. किंवा जॉब बदला शक्य असेल तर.. असल्या फालतु ठिकाणी का काम करायचं? किंवा वर तक्रार करता येते का तुमच्याकडे? आमच्याकडे येते.. कुणी नडलं तर आम्ही लगेच वर जाउन बोंब मारतो.. म्हणुन कुणी रजेला नाही म्ह्णतच नाहीत.

In reply to by पिलीयन रायडर

'कुणी कुटूंबापेक्षा जास्त ऑफिसला महत्व देईल का?' - त्यांच्या मते तुम्ही जिथे काम करता त्या ऑफिसप्रति तुमची बांधिलकी ही तुमच्या कुटुंबापेक्षा जास्त असली पाहिजे, अर्थात हे पटणारे लॉजिक नाहीच, पण सत्तेपुढे शहाणपण नसते. हम करे सो कायदा, पटत असेल तर थांबा नाहीतर निघा असा मामला आहे. आधी एका mnc मध्ये होते तिथे पध्दतशीर काम होतं, सहसा काही प्रॉब्लेम येत नव्हते, आताची मात्र खाजगी कंपनी फर्म सारखी आहे, बरीच नाटकं आहेत, प्लॅनिंग मॅनेजमेंटच्या नावाने बोंबच आहे. इतर पर्याय शोधत आहेच. 'मी चालले असं "सांगायच".. विचारायचं नाही...' - हो, यापुढे तेच, आता तर मोठी सुट्टी घ्यायचीय जी मागून मिळणे अशक्य आहे. 'वर तक्रार करता येते का तुमच्याकडे?' - बॉसच्या वर कुणी असते का ;) झुकती है दुनिया.. हे आत्ताशी कळतेय, अजून इतरांना झुकवायला लावणे जमले नाही.. इथून पुढे शिकणार :)

In reply to by नीलमोहर

कंपनीवर नव्हे. मी जर उद्या अतिकामाच्या अतिताणाने मरण पावलो तर कंपनी थोडीच बंद पडणार आहे? ती चालूच राहील. माझ्या जागी दुसरा माणूस येईल. त्यामुळे रजा ही घ्यायलाच पाहिजे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. आपल्याकडे दुर्दैवाने स्त्रियांना आॅफिसच्या रजेच्या दिवशी घरी काम करावं लागतं. अपवाद असतीलही पण बहुसंख्य स्त्रियांना पूर्णपणे रजा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे (maternity leave सोडल्यास).

In reply to by बोका-ए-आझम

कामावरच्या प्रेमासाठीच एवढी वर्षे काढलीत, अगदी आज आत्ताही त्यांचे कामासाठी प्रेशराईज करणे सुरूच आहे, पण मी आता ताण घ्यायचे सोडून दिलेय. एक व्यक्ति आख्ख्या टीमचे काम सांभाळतीय तरी आपण तिला किती राबवून घ्यावे, किती ताण द्यावा याचा माणूसकी म्हणूनही विचार न करणारे बॉस आलेत वाट्याला. 'बहुसंख्य स्त्रियांना पूर्णपणे रजा मिळत नाही,' - हा तर वेगळा काथ्याकूटाचा विषय होईल. घर आणि ऑफिसची दुहेरी कसरत करतांना स्त्रियांना सुपरवुमन बनावेच लागते, झेपत असो वा नसो.

वाक्यावाक्याशी सहमत. दर वर्षी प्रत्येकाने किमान १० दिवस सलग रजा घ्यावी यासाठी व्यवस्थापनानेच कर्मचार्‍यांना उद्युक्त केले पाहिजे. पण दुर्दैवाने परिस्थिती वेगळी असते. सुट्टी मागायला गेल्यावर बॉसच्या चेहर्‍यांवर आठ्या दिसु शकतात. बरेच बॉस तर विचित्रच असतात. सुट्टी देताना सरळपणे काही बोलु शकत नाहित त्यामुळे तो माणूस सुट्टीवर गेला की मुद्दाम त्याच्या कनिष्ठांना बोलावुन आडवे तिडवे प्रश्न विचारतात. कनिष्ठांकडे अर्थातच उत्तरे नसतात मग ते त्यांच्या बॉसला (म्हणजे सुट्टीवर गेलेल्या माणसाला) फोन लावतात आणि सुपर बॉसने कसे फायर केले याची तक्रार करतात. सुट्टीवर गेलेला माणूस आपला अजुन त्रास नको म्हणुन सुट्टी बाजुला ठेउन काम करतो आणि विचार करत बसतो की मधुनच हे काम कुठुन उद्भवले? शिवाय ही संधी साधुन सुपर बॉस सुट्टीवर गेलेल्या माणसावर तोंडसुख घेतो ते वेगळेच. हा बाब्या सुट्टीवरुन परत आला की झालेल्या गोष्टींचा काही मागमूसही नसतो. परत सुपर बॉस त्यालाच तूप लोणी लावुन सांगतो की तुच कसा रे सोन्या. तुझ्या टीममधल्या इतरांना काही येत नाही. शिकव त्यांना जरा वगैरे वगैरे. पुढच्या सुट्टीवर परत तीच कथा. सोन्याला कळते की सगळा त्याने सुट्टी घेतल्याचा परिणाम आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मग तो कमीत कमी सुट्ट्ञा घेतो. बर्‍याचदा कंपन्यांमध्ये पीअर्स पण विचित्र असतात. ती दोन गाढवांची गोष्ट आहे ना की ज्यात एक गाढव दुसर्‍यापेक्षा स्वतःला वरचढ ठरवण्यासाठी मरमर काम करतो. असे लोक बर्‍याच कंपन्यांमध्ये असतात जे सुट्ट्या न घेण्यात धन्यता मानतात कारण मग ते त्यांच्या पीअर्स पेक्षा अधिक कामसू, सिन्सिअर आणि कामाच्या बाबतीत पॅशनेट असल्याचे सिद्ध करु शकतात. हा धोका ओळखुन मग इतर पीअर्स देखील् सुट्ट्ञा टाळु लागतात. बॉसला काय तेच हवे असते. काही कंपन्यांमध्ये गोष्ती नेहमीच पेटलेल्या असतात, सुट्टी घ्यायची म्हणजे कर्मचारीच धास्तावतात की परत आल्यावर समोर काय वाढुन ठेवलेले असेल. माझे रजांबद्दलचे काही अनुभव खुप भीषण आहेतः १. एकदा शनिवार रविवारला जोडुन पुढे मागे १ - १ दिवस सुट्टी घेतली होती (शुक्रवार ते सोमवार). शनिवार वर्किंग होता आणि समोरचा बँकर काम करत होता. मी सुट्टीवर आहे हे माहिती असुनही वरुन ऑर्डर आली की काम अर्जंटली संपवा. माझ्या कनिष्ठांना जमण्यासारखे नव्हते त्यामुळे मग मी तारकर्लीच्या रम्य वातावरणात हॉटेलात बसुन ४ तास कॉनकॉलवर होतो. त्यात दोन वेगवेगळ्या फोनची बॅटारी संपली. सरतेशेवटी फोन चार्जिंगवर लावुन बोलुन काम संपवले. त्यात सुट्तीची एक पुर्ण संध्याकाळ वाया गेली. लगेच सोमवारी एका दुसर्‍या सिनीयरचा फोन आला आणि त्याला काही काम घोड्यावर बसुन करुन हवे होते. मी त्याला सांगितले की मी सुट्टीवर असल्याने आणि गाडीत असल्याने त्याचे काम करु शकत नाही त्यामुळे त्याने माझ्या बॉसशी संपर्क करावा पण काही अनाकलनीय कारणाने तो मलाच फोन करत राहिला. शेवटी कोकणात एके ठिकाणी मी संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेल्याने माझा फोन लागुच शकला नाही तेव्हा तो थांबला. नंतर कळाले की मी त्याचे काम केले नाही म्हणुन तो घुश्श्यात होता. २. सलग ८+ दिवसाची सुट्टी तर मी माझ्या १२ वर्षाच्या नौकरीत फक्त ३ दा घेतली आहे. त्यापैकी एकदा जोधपुरच्या मेन मार्केट मध्ये एक पुर्ण संध्याकाळ मी सायबर कॅफे शोधुन मेल चेक करुन, अ‍ॅग्रीमेंट वाचुन त्यात बदल सुचवुन समोरच्या माणसाबरोबर को_ऑर्डिनेट करण्यात घालवला कारण काही करुन काम त्याच आठवड्यात संपवावे असा निरोप मिळाला होता. ३. दुसरी ८+ दिवसाची सुट्टी घेतली होती तेव्हा काश्मीरात होतो. तिथे ब्लॅकबेरी बंद होते (केवढे ते नशीब) तर किमान ३ -४ जणांनी "नाही पण तु मग मेल करु शकतोस का लगेच" हा प्रश्न विचारुन भंडावुन सोडले. ४. तिसरी ८ _ दिवसांची सुट्टी मधुचंद्राला गेलो होतो तेव्हाची. पहिले २-३ दिवस शांततेत गेले. शनिवार रविवार आल्याने पण मग एका सिनीयर ने मागे काम लावले मी मधुचंद्राच्या सुट्टीवर आहे हे माहिती असुनही. मग जवळाजवळ तासभर माझी बायको भीमतालवर एकटीच बसुन होती आणि मी तिला बस अजुन ५ मिनिट्स म्हणुन कॉलवर होतो. नशीव तिने तिथल्या तिथेच घटस्फोट नाही घेतला. एकुणात सुट्टी घेतली तरी कामे सुटत नाहित. वरिष्ठ तुम्ही सुट्टी घेतली आहे याचा काहिही मुलाहिजा न बाळगता कामे मागे लावतात. ही खरेच भीषण परिस्थिती आहे. काही कंपन्यांमध्ये मॅनडेटरी लीव्हची संकल्पना आहे आणि प्रत्येक कर्मचार्‍याला १० दिवस सलग सुट्टी एकदा तरी घेणे बंधनकारक आहे. अर्थात यातुनही पळवाटा काढुन कर्मचार्‍यांना कधी कधी कामाला जुंपले जाते पण बर्‍याचदा सुट्टी मिळते. हे सगळीकडे कंपल्सरी केले पाहिजे

In reply to by मृत्युन्जय

मृत्यो !! तु महान आहेस असा एम्प्लॉयी आपल्या टीम मधे असावाच अशी सगळे बॉस प्रार्थना करत असतील !! बहुधा बँकिंग क्षेत्रात सलग ५ वर्किंग डेज ब्लॉक लीव्ह ची संकल्पना असते, खासकरुन जे ट्रेडिंग अन ईन्व्हेस्टमेंट्स मधे वगैरे काम करतात त्यांना. भारतात एच डी एफ सी मधे आहे हे मित्राकडुन माहित आहे, आणी वार्षिक रजा त्यांना घ्यायलाच लावतात.

In reply to by बेकार तरुण

मृत्यो !! तु महान आहेस असा एम्प्लॉयी आपल्या टीम मधे असावाच अशी सगळे बॉस प्रार्थना करत असतील !!
खरंच खरंच. मी असलं काही केलं असतं तर माझ्या बॉसेसनी माझ्या नावचा एक ताबूत बनवून ढोलताशे लावून मिरवणूक काढली असती ;)
बहुधा बँकिंग क्षेत्रात सलग ५ वर्किंग डेज ब्लॉक लीव्ह ची संकल्पना असते
हो - इंटर्नल ऑडिट प्रोसीजर्सचा भाग असतो. त्या दिवसांत कोणत्याही प्रकारे कंपनीशी संपर्क साधता येत नाही.

In reply to by मृत्युन्जय

मला तरी यात तुमचीच चुका जास्त वाटते.. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही एकटेच कसे जबाबदार आहात ? तुमच्या प्रत्येक उदाहरणात तुमच्याशिवाय काम अडलेले दिसतेय. याचा अर्थ सुट्ट्या घेताना तुमचे गणित चुकतेय. माझ्या कनिष्ठांना जमण्यासारखे नव्हते हे वाक्य बरेच काही सांगुन जाते. खुप लोकांना मीच काय तो एकटा शहाणा, माझ्याशिवाय सगळे अडले पाहिजे, बॉस व कनिष्ट माझ्या मागे फिरले पाहिजे हा दृष्टीकोन डुबवतो . उद्या माझ्याशिवाय काम चालायला लागले तर मला कोण विचारणार ही भीतीच आज प्रायवेट मध्ये जास्त आहे. मग अश्या सुट्या घेतल्या की काम अडणारच.. त्याचा बाऊ कशाला ?

In reply to by ब़जरबट्टू

सुट्ट्याचे गणित वर्षभरात कधीही सुट्टी घेतली तरी बिघडलेलेच असते मालक. माझ्या कनिष्ठांना जमण्यासारखे नव्हते याचे कारण ते नविन होते. सगळेच फ्रेशर्स होते. त्यावेळेस जे काम अडले ते आता अडत नाही पण मग सुट्ट्या घ्यायच्याच नाहित की काय? प्रत्येक गोष्तीसाठी मी जबाबदार आहे असे मला वाटतच नाही पण वरिष्ठांची तशी इच्छा असेल की गोची होते.

In reply to by मृत्युन्जय

साहेब, तुम्ही कोल घेतला नाही तर तुमची नोकरी जाणार नाही. बाकी अप्रेजल वगैरे मिथ्या आहे. पगारवाढ हवी तर नवीन मालकच शोधावा लागतो.

In reply to by मृत्युन्जय

मला तर माझ्या लग्नात सप्तपदी चालू असताना फोन आले होते काहीतरी प्राॅब्लेम झाला म्हणून. माझ्या बाॅसना पत्रिका देऊनही त्या विसरल्या होत्या. मी त्यांना आठवण करुन दिल्यावर साॅरी म्हणाल्या पण नंतर दीड-एक तासात परत फोन आला. तेव्हा आमची पंगत चालली होती.

In reply to by बोका-ए-आझम

पण तुम्ही लोक मधुचंद्राला किंवा सप्तपदी / पंगत चालु असताना फोन घेऊन का फिरत होतात? आणि बरं फिरलात तरी उचलत का होतात???? होमात टाकुन द्यायचा आधी फोन आणि मग जीवन मरणाच्या शपथा घ्यायच्या गोल गोल फिरुन.. मृत्यंजय.. तुमची काळजी वाटली.. तुम्ही दोन दिवस ऑफ द ग्रिड होऊन पहा बरं.. तिसर्‍या दिवशी सुद्धा कंपनी बंद पडलेली नसेल.. खात्री देते मी.. आपण उद्या अचानक गचकलो तर बंद पडणारे का काही???? मग कशाला इतकं अवाजवी महत्व द्यायचं कामाला? ह्यात तुमचीही तेवढीच चुक आहे.. कधीतरी सगळं काम बंद करुन संपुर्ण शांतता आवश्यक असते हो.. इतकं काम करत जाऊ नका. अगदी मनापासुन सांगते..

In reply to by पिलीयन रायडर

होमात टाकुन द्यायचा आधी फोन आणि मग जीवन मरणाच्या शपथा घ्यायच्या गोल गोल फिरुन. हा केवळ पिरा प्रतिसाद !! इतर सर्व परखड सत्य ! बादवे, ते बोका-ए-आझम, मृत्यंजय नाहीत... की तुम्ही त्यांचे गुपित उघडे केले आहे ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकाच प्रतिसादात दोन चार लोकांना रेफर करायची सवय आहे मला. काय तुम्ही लोक्स!!!!!

In reply to by पिलीयन रायडर

मी सप्तपदीच्या वेळी फोन का बरोबर घेऊन फिरत होतो हे मलाही आठवत नाहीये आज. मला वाटतं तो बहुतेक कुणाकडे तरी द्यायचा राहिला असावा. होमात टाकून न देण्याचं कारण बायकोनेच gift दिला होता.

In reply to by पिलीयन रायडर

होमात टाकुन द्यायचा आधी फोन
पेटत्या होमात फोन टाकला तर ब्याट्रीचा स्फोट होऊ शकतो. अपारंपारिक प्रकारे लग्न करायचं म्हटलं तरी अशा घातक गोष्टी करू नैत ;)

In reply to by मृत्युन्जय

निदान : याचा अर्थ बर्‍याच बाबतीत कंपनी तुमच्यावर अवलंबून आहे... पण त्याचबरोबर तुम्हाला "नाही" म्हणणे जमत नाही याचाही गैरफायदा घेतला जात आहे. ही केवळ तुमचीच नाही तर अनेक हुशार लोकांची समस्या आहे... कारण, बॉस लोक, इतर बाबतीत कितीही बावळट (दिसत) असले तरी, महत्वाचे काम आग्रह करून बुद्दू माणसाच्या (तेही तो सुट्टीवर असताना) गळ्यात मारून आपल्या पायावर धोंडा पाडून न घेण्याइतके नक्कीच हुशार असतात. उपाय : "How-to-say-no-at-work" अशी विचारणा गुगल्यावर करा. नको नको होतील इतके संदर्भ मिळतील. (या विषयांवर एक इंडस्ट्री तयार झालेली आहे आणि अनेक सल्लागार मिलिओनेर झाले आहेत.) त्यातून तुमच्या स्वभावाला आणि कंपनी कल्चरला साजेसे उपाय निवडा. एक एक करत टेस्ट डोज देऊन पहा. प्रयोगात उपयोगी ठरलेले सर्वात उपयोगी (एक/अनेक) उपाय जरूरीप्रमाणे वापरत जा.

In reply to by मृत्युन्जय

या सगळ्यात चूक तुमची आहे हे तुमच्या लक्षात आले का? एकदा गावाच्या बाहेर पडलं की ऑफिसमध्ये सांगितलेला मोबाईल (हा मुख्य मोबाईल पासून वेगळा ठेवावा) पाठिमागची बॅटरी काढून वेगळा केला तर पलिकडच्या माणसाला कायम औट ऑफ कव्हरेज एरियाचा मेसेज मिळतो. पण तसंही, मी मोबाईल नेणार नाहीये असं सांगता आलं असतं.

भावनेच्या भरात लेखातील मुख्य प्रश्नाचे उतर राहिलेच, रजा घेणे हा अक्षम्य गुन्हा, कशानेही भरून न येणारे पाप ज्याचे परिमार्जन दुप्पट-चौपट कामाचा बोजा उचलून, अशक्य डेडलाईन्स पार पाडून कामगारांनी करायचे.

कोणत्या क्षेत्रात काम करताय यावरुन रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा हे ठरते.. बस्स... :)

काही हरामखोर ३६५ दिवस कामावर राहायला बघतात शिवाय संध्याकाळी सायबाच्या घरी जाऊन कसले घंट्याचे प्रश्न सोडवतात ते माहित नाही परंतू अशामुळे रजा मागणारे निमकहराम ठरतात उगाचच.अशा एकाला वर्षभरात एकही सिक लीव रजा न घेतल्याबद्दल एक प्लास्टिकचा टॅार्च मिळालेला तो त्याने घरी जाऊन "ओळखपाहू आज तुझ्यासाठी काय आणले?" म्हणत दाखवल्यावर तो टॅार्च बायकोने फेकला अन तुटला.ही श्टोरी "बायकांना कशी आणलेल्या गोष्टींची किंमत नसते" या मथळ्याखाली अरध्या कंपनीत सांगून स्वत:चे 'कौतुक' करून घेतले होते.

In reply to by कंजूस

लौल - कहर किस्सा आहे.
तो टॅार्च बायकोने फेकला
याच्या ऐवजी तो टॉर्च बायकोने त्याच्या डोक्यात घातला आणि त्यानिमित्त सिक लीव्ह घ्यायला लागली, असा शेवट केला तर मस्त कथा बनेल.

In reply to by आदूबाळ

टॉर्च मागायला दुस्र्या दिवशी दाराबाहेर कंपनीतल्या कर्मचार्यांच्या बायकांची रांग लागली (फक्त माच मिनिटांसाठी क्ष रुपये या बोलीवर).... कथा हातभार या धोरणाअंतर्गत नाखु अस्तरवाला

In reply to by नाखु

टॉर्च डोक्यात मारण्याआधी गाणे.. तेरा दो टकियों का टॉर्च और मेरा लाखों का सावन जाये

In reply to by आदूबाळ

९७,९९ आणि २००० साली विआरएस आवाहन केले त्यात जे गेले त्यांना बाकी रजांचाही पूर्ण हिशोब दिला गेला.नंतर २)००२ साली अधिकृत रित्या कंपनी बंद करून कंपनीने फक्त एकमेकांना निरोप द्या सांगितले तेव्हा याचे पंधरा महिने पाण्यात गेले. पुर्वी एलआइसी डेव ओफिसर आणि ओक्ट्रोय नाका कारकुन अजिबात रजा घ्यायचे नाहीत "धंधा" बुडेल म्हणून. मुद्दा असा की रजा न देण्याचे मालकांचे /सायबांचे नकारात्मक धोरण होण्यास हे चिकटु लोकही कारण आहेत.मालकांची गोष्ट वेगळी असते.रोज येऊन गल्ल्याला कुरवाळायला त्यांना मजा वाटत असते.

पोलिसांबद्दल मला बोलायचे तर माझ्या मते कामाच्या जुनाट पद्धती, अपुरी शस्त्रे व साधने (वाहने, GPS), अपुरे प्रशिक्षण तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे परिणामकारकरितीने काम न करता येणे यामुळे जास्त मनुष्यबळ लागते. उदाहरण द्यायचे तर एखाद्या बंदोबस्तासाठी ३-४ शस्त्रधारी, चपळ, चलाख (योग्य ते प्रशिक्षण मिळाल्याने) पोलीस पुरे पडावेत पण तसे होत नसेल किंवा राजकीय दबावामुळे ७-८ पोलीस दिले जात असतील तर तो मनुष्यबळाचा अपव्यय आहे. बाकी खासगी क्षेत्रात कामाच्या स्वरुपाप्रमाणे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असेल. माझ्या ऑनसाईट असलेल्या टीममेंबर्सना कधी कधी मोठ्या रजेसाठी (भारतात येण्याकरिता) क्लायंडकडून परवानगी नाकारली जाते. पण क्लायंटकडे वर्षातून तीन वेळा एका आठवड्याची सुटी असते त्यावेळी जर त्या सुटीला जोडून रजा घेतली सहज परवानगी मिळते.