✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !

व
विवेक ठाकूर यांनी
Sat, 04/16/2016 - 14:53  ·  लेख
लेख
पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते . या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात . आणि त्याही पुढे जाऊन काम आनंदाचं झालं तर वेळ आणि पैसा बहुतांशी परिणाम शून्य होतात . कामाच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज असाये की मनाजोगतं काम नाही त्यामुळे मजा येत नाही . या गैरसमजामुळे फार मोठा अनर्थ ओढवला आहे. कारण हे म्हणजे, पत्नी मनासारखी नाही त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख नाही म्हणण्यासारखं आहे . त्यात पत्नी निदान व्यक्ती तरी आहे त्यामुळे तिच्याबाबतीत काही प्रमाणात कलह संभव आणि स्वाभाविक आहे . पण काम तर सर्वस्वी न्यूट्रल आहे. ते पूर्णपणे व्यक्ती निरपेक्ष आहे. त्यामुळे कामाच्याबाबतीत, ते करणार्‍याचा दृष्टीकोनच कायम निर्णायक आहे . थोडक्यात , एकदा का मनानं ठरवलंकी आपण करत असलेल्या कामात काही मजा नाही की जीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा . मग त्या कामात व्यतीत केलेला वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, फारसा आनंद देऊ शकत नाहीत . तर सांगायची गोष्ट अशी की मनाजोगतं काम ही आयुष्यात मनासारखी पत्नी मिळण्यासारखी दुर्लभ घटना आहे . बर्‍याच सायकॅट्रीस्टसनी यावर `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन '( किंवा वेल अॅडजस्टेड पर्सनॅलिटी ) हा एकमेव नामी पर्याय शोधला आहे . थोडक्यात , ` आहे त्याच्याशी विनातक्रार जुळवून घ्या , सुखी व्हाल', असा मनाला गप्प करण्याचा उपाय सुचवला आहे. आणि जगातल्या बहुतेक सर्व सो कॉल्ड हॅपी दिसणार्‍यांनी तोच आचरणात आणलेला दिसतो . असे लोक मग ` रिटायरमंट नंतर मजा करू ' अशी मनाची समजूत काढून, स्वतःला नेटानं कामाला जुंपून घेतात . सुट्टीच्या दिवशी जमेल आणि झेपेल तेवढी मजा करतात . सोमवारची नकोनकोशी आठवण मनाला पुढची काही तरी स्वप्न दाखवत सुसह्य करतात. ही झाली कर्मयोगाची सायकिक ट्रिटमेंट . आध्यात्मिक ट्रिटमेंट तर त्याहून भारी आहे आणि अर्थात असायलाच हवी ! आध्यात्मात `निष्काम कर्मयोग' किंवा ` फलापेक्षारहित कर्मयोग ' सांगितला जातो . थोडक्यात , पैशाकडे न बघता निव्वळ कामाचा आनंद घ्या हा तो राजमार्ग ! पण हा प्रकार जितका जोरात राबवाल तितका मानसिक दुफळी निर्माण करतो . कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; पब्लिक सकाळी उठल्यापासून कामाचा गाडा ओढत असतं. त्यात आता ` कोणतीही अपेक्षा न करता' ही सगळी झकमारी करायची म्हणजे अवघड होऊन बसतं . या कर्मयोगी विचारसरणीमुळे कामाला गौरव प्राप्त होणं तर दूरच, पैशाला अवाजवी महत्व मिळालंय. म्हणजे सरकारी कामात बेतहाशा भ्रष्टाचार आणि प्रायवेट सेक्टरमधे जीवघेणी स्पर्धा . सरकारी कार्यालयातला माणूस निब्बर झालायं आणि खाजगी क्षेत्रातला निव्वळ यंत्रवत काम करतोयं. कामाची मजा म्हणावी तर इकडेही नाही आणि तिकडेही नाही . तर काय असेल कामाच्या आनंदाचं रहस्य ? पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं . दुसरी गोष्ट, या `ऑप्शन नॉट टू वर्क' मधे कामाची कंटीन्यूटी आणि सृजनात्मकता दोन्हीही अंतर्निहित आहेत . असा विकल्प असेल तर काम किती आनंदाचं होईल याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि तिसरी गोष्ट, अशा कामात मग वेळ आणि पैसा दोन्ही दुय्यम होतात . कामाची ऐच्छिकताच, कामाचा इतका आनंद देऊन जाते की फलप्राप्ती बोनस ठरते. आणि जिथे आनंद आहे तिथे तणाव अशक्य आहे. काय आधार आहे या विचारामागे ? तर मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही. ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो . या विकल्पाचा दुसरा पैलू तर त्याहूनही थोर आहे . अशा चित्तदशेत काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत ..... आणि हा `ऑप्शन नॉट टू वर्क' आपल्याला कायमच उपलब्ध होता! तुमचं कामच तुमचा छंद होतं, मग ते कुठलही काम असो. कामाच्या आनंदामुळे फलाशा दुय्यम होते आणि वेळेचं मनानं निर्माण केलेलं ओझं दूर होतं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24694 वाचन

💬 प्रतिसाद (180)

प्रतिक्रिया

हम्म...

सस्नेह
Wed, 04/20/2016 - 13:30 नवीन
काल एक इंजिनिअर बेकार भेटला होता. त्याला वरील लेख ऐकवला. तो म्हणाला, 'मिपावर option to any work असं काही आहे का ?...'
  • Log in or register to post comments

:-))) मस्त !

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/21/2016 - 15:39 नवीन
:-))) मस्त ! आता, काय म्हणायचं या बेकार योगींच्या कर्माला ! :-)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !

प्रसाद गोडबोले
Wed, 04/20/2016 - 13:52 नवीन
संक्षी सर , सादर नमस्कार विनंती विशेष ! लेख निवांतपणे वाचला. आवडला ! आमचा सातार्‍यात एक मित्र आहे , तो माझ्याच वयाचा असला तरीही सातार्‍यातील अत्यंत सुप्रसिध्द डॉक्टर ऑलरेडी झालेला आहे !! त्याला मी म्हाणालेलो कि मुंबई पुण्यात चल , खोर्‍याने पैसे ओढशील. त्यावर तो म्हणालेला की कशाला ? मी इथे खुष आहे , नित्यनेमाने ९ तास काम करतो, रोज घरी येवुन आईच्या हातचे जेवण करतो , शनिवार रविवारी तुम्ही आलात की पार्टी करतो , काही टेंशन नाही , बस्स मजा आहे ! माझ्या आकलना नुसार आपण म्हणत आहात तो हा कर्मयोग आहे ! हाच मित्र आजिबात कंटाळा न करता रविवारीही क्लिनिकला जाऊन ९ तास काम करतो अन आम्ही ट्रिपला गोव्याला वगैरे जायचे मनात आणले की आठवडाभर आधीच प्लन करुन दि ऑप्शन नॉट टू वर्क आचरणात आणतो !! आता तोडे तात्विक बोलु: आपण वर्क हा शब्द वापरल्याने थोडासा घोळ झाला . काम , कर्म आणि कर्तव्य ह्यात नेहमीच लोकांचा घोळ होतो. स्वामी विवेकानंद काय म्हणाले की एका सच्च्या कर्मयोग्याला कर्तव्य (केलेच पाहिजे असे) असे काहीच नसते ! तो जे काही करत असतो तो ते त्याच्या इच्छेने. काहीही कंपल्शन नाही ! म्हणूनच तो कर्मयोगी ठरतो. पण हे सर्वसामान्य आयुष्यात , प्रपंचात, घडणे अवघड आहे : प्रपंच आला कि अन्न वस्त्र निवारा ह्यांची सोय करणे भाग आहे , प्रपंचात घर घेणे भाग आहे , घर घेतले की त्याचे कर्ज फेडणे भाग आहे , मग काम ( कर्म नव्हे) करणे भाग आहे . तर एकुणच दि ऑप्शन नॉट टू वर्क सर्वसामान्य आयुष्यात प्रापंचिक जनांना सहसा उपलब्द नसतो ! बहुतांश लोकं कायम गुलामासारखेच काम करत आयुष्य काढत असतात मग आता ह्याला उपाय काय ? ह्याचे उत्तर आपणास भगवद्गीता ज्ञानेश्वरी मध्ये सापडते : गीता काय मह्णते की एकदा फलाकांशा सोडली की कर्माशीही आपला संबंध तुटतो !! मनात आलेले काही श्लोक खाली क्वोट करीत आहे त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५ ॥ आपण कर्म करत नाहीच आहोत , आपण केवळ साक्षीस्वरुप आहोत , ही सारी प्रकृतीची सर्कस आहे जी आपण वर्चुअल रीयालीटी ( ऑक्युलस ) लाऊन पहात आहोत , पण ती एतकी खरी वाटत आहे की आपण त्यात पार अडकुन गेलो आहोत तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निपजती प्रकृतिधर्में । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥ मात्र हे सारे समजणे अवघड आहे , पण एकदा का समष्टी झाली की सारीच व्यामिष्रता लयाला जाईल , एकदा का ही ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली की मग आपण मोकळे !! यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२ ॥ आता होणार ते होयेना का | अन जाणार ते जायेना का | तुटली मनातील आशंका | जन्ममृत्याची | संसारी पुंडावे चुकले | देवाभक्ता ऐक्य झाले | मुख्य देवास ओळखले | सत्संगे करुनी || श्रीराम|| ही अशी काहीशी स्थिती आहे ती ! हाच तो कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !! असो . आता सरते शेवटी मला ओशोचा एक अप्रतिम व्हिडियो आठवला The Day I Became Enlightened - OSHO ह्यातील ओशोचे हे वाक्य फार सुरेख आहे - I became enlightened when I realised , there is nothing to do , there is no where to go, you are already perfect and you are already complete !! कर्तव्य असे काहीच नाहीये , आपण जे काही करीत आहोत असे आपल्याला वाटत आहे तो केवळ भास आहे , आणि म्हणुनच दि ऑप्शन नॉट टू वर्क हा आपल्या कडे कायमच आहे .... you just have to wake up from this dream !! चुकभुल देणेघेणे कळावे. आपला विनम्र प्रगो
  • Log in or register to post comments

प्रगो, भन्नाट प्रतिसाद!

विवेक ठाकूर
Wed, 04/20/2016 - 14:27 नवीन
धन्यवाद. I became enlightened when I realised , there is nothing to do , there is no where to go, you are already perfect and you are already complete !! OSHO ऑप्शन नॉट टू वर्क ही व्यक्तीत्वाकडून स्थितीकडे जाण्याची प्रोसेस आहे. तो आध्यात्मिक पैलू आहे. त्याविषयी लेखात शेवटी लिहीलंय : या विकल्पाचा दुसरा पैलू तर त्याहूनही थोर आहे . अशा चित्तदशेत काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत ..... आणि हा `ऑप्शन नॉट टू वर्क' आपल्याला कायमच उपलब्ध होता! तस्मात, ओशो आणि मी एकच सांगतोयं. ते सिद्धाची अवस्था सांगतायंत, मी त्या अवस्थेला पोहोचण्यासाठी कर्मयोग सांगतोयं. कारण काम (त्याला कर्म म्हणा की कर्तव्य) हे जाणीवेचा रोख खेचणारं सर्वात प्रमुख व्यावधान आहे. आणि जाणीवेचा रोख स्वतःकडे वळणं म्हणजे ध्यान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काम (त्याला कर्म म्हणा की

प्रसाद गोडबोले
Wed, 04/20/2016 - 15:40 नवीन
काम (त्याला कर्म म्हणा की कर्तव्य) हे जाणीवेचा रोख खेचणारं सर्वात प्रमुख व्यावधान आहे. आणि जाणीवेचा रोख स्वतःकडे वळणं म्हणजे ध्यान आहे.
+१०० अगदी शंभर टक्के खरे आहे. पण इथे एक छोटीशी आशंका आहे : बर्‍याचदा जाणीवेचा रोख स्वतःकडे वळवणं सोप्पं नसतं कारण १. जाणीवाच एतक्या सुक्ष्म असतात कि त्यांचा रोख समजणे हेच आवाक्याबाहेरचे असते आणि २.स्वतःकडे म्हणजे नक्की कोठे हे बर्‍याच जणांना समजत नाही कारण स्वतः म्हणजे शरीर असा काहीसा समज असतो. अशा स्थितीत कर्मयोग , राजयोग आणि ज्ञानयोग हे सारेच ( मला) दुष्प्राप्य वाटतात . भक्तीयोग मात्र ह्या सार्‍यातुन अलगद सोप्पा मार्ग काढतो असे मला वाटते. कर्मयोग कोणत्याही अर्थाने कमी आहे असे मी म्हणत नाही , तो फक्त थोडा क्लेषकर आहे ( असे मला वाटते ) क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् । अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥ यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् । यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥ हे आचरणात आणणे जास्त सोप्पे आहे आणि एकदा का मी अकर्ता आहे ह्या भावनेने सारेच कर्म भगवंताला परमात्म्याला अर्पण करायची सवय लागली की भगवंताने म्हणल्याप्रमाणे (ददामि बुधियोगं तं तेन मांमुपयान्ति ते) ज्ञानप्राप्ती होते आणि मग परमात्मा हा दुसरा तिसरा कोणी नसुन आपण स्वतःच आहोत हे अनुभवाला येते. अशा प्रकारे जाणिवांचे रोख खेचणारे , ववधाने निर्माण करणारे कर्म भगवंताचरणी अर्पण करुन आपण मोकळे रहाणे हा जाणिवांचा रोख स्वतःकडे वळवणेचा जास्त सोप्पा मार्ग आहे असे मला वाटते. असो . तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् । अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥ बाकी एकदा का मी अकर्ता आहे हे लक्षात आले की सन्तुष्टो येन केनचित् ही अवस्था अनायासे प्राप्त होतेच् ... ही अवस्था फारच मस्त आहे ह्यात तिळमात्र शंका नाही. :) मनःपुर्वक धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कर्मयोग

विटेकर
Wed, 04/20/2016 - 15:48 नवीन
भक्तियोग तुलनेने सोपा आहे असे आपण विधान केले आहे , तसे तर सोपे काहीच नाही , भक्तिमार्गात कमालीची अनन्यता लागते , आणि त्याला गुरुकृपा / संचित असायला हवे . मी म्हणेन कर्म योग ही सोपाच आहे ! एकदा हे मजचिस्तव जाहले | परि म्या नाही केले || हे कळायला हवे! आणि हे अकर्तेपण येण्यासाठी एकतर " राम कर्ता" हा भाव दृढ व्हायला हवा आणि कर्तेपणाचा अह्ंकार गळून पडायला हवा. म्हणजेच मी करतो ते काम { माझ्यापेक्षाही} महत्वाचे आहे हा भाव यायला हवा, work is worship.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

@ विटेकर

विवेक ठाकूर
Wed, 04/20/2016 - 21:24 नवीन
यापूर्वीच्या प्रतिसादात तुम्ही म्हटलंय .... अध्यात्म सोप्या शब्दातही सांगता येते , नव्हे त्यात अवघड आणि शब्दबंबाळ करण्याचे काहीच कारण नाही हे आपल्या प्रतिसादावरुन सपष्ट होत आहे ... त्यामुळे सोपं करण्याचं तुमचं कौशल्य जाणण्याची फार इच्छा होती, ती पूर्ण केल्याबद्दल आभार! भक्तिमार्गात कमालीची अनन्यता लागते, आणि त्याला गुरुकृपा / संचित असायला हवे . सॉलीड! म्हणजे आधी कामानं जीव चाललायं त्यात आता `संचित तपासणं' आणि `गुरुकृपा प्राप्त करणं' हे दोन नवे व्याप आले. अर्थात, तुम्हीच म्हटल्यामुळे तो पर्याय अवघड आहे, तस्मात बाद! आता कर्मयोगाबद्दल तुम्ही म्हणतायं ... हे मजचिस्तव जाहले | परि म्या नाही केले || हे कळायला हवे! ग्रेट ! आणि त्यासाठी निवडलेला हा मार्ग तर त्याहून ग्रेट .... हे अकर्तेपण येण्यासाठी एकतर " राम-कर्ता" हा भाव दृढ व्हायला हवा आणि कर्तेपणाचा अह्ंकार गळून पडायला हवा. म्हणजे आधी राम आहे हे मान्य करा. मग तोच काम करतोयं हा भ्रम सघन करा. आणि नंतर अहंकार संपण्याची वाट बघा. त्यात पुन्हा राम हा भक्तीमार्गीयांचा शोध आहे याचं विस्मरण झालेलं दिसतंय. शिवाय तो लोकल आयडॉल आहे याची तुमच्या सारख्या सूज्ञाला कल्पना असेलच. हा मार्ग तुम्ही अनुसरलायं का? असेल तर `राम कर्ता' हा भाव दृढ व्हायला किती काळ गेला? आणि सद्यस्थितीत अहंकाराची काय परिस्थिती आहे ? हो आणि हा मार्ग `कर्मयोगाचा' असेल तर तो भक्तीमार्गाला छेदत नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

विठा श्री

विटेकर
गुरुवार, 04/21/2016 - 15:17 नवीन
श्याप , काहिही कळले नाही , जरा वाईच इस्कटून सांगाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कळत नाही की तुमच्याकडे उत्तर नाही ?

विवेक ठाकूर
गुरुवार, 04/21/2016 - 16:17 नवीन
कारण प्रश्न सरळ आहेः हा मार्ग तुम्ही अनुसरलायं का? असेल तर `राम कर्ता' हा भाव दृढ व्हायला किती काळ गेला? आणि सद्यस्थितीत अहंकाराची काय परिस्थिती आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अहो

विटेकर
गुरुवार, 04/21/2016 - 16:30 नवीन
खरेच काहीही कळत नाही आहे , तुम्ही दोनदा सांगितले तरीही !! जरा उलगडून सांगाल का ? आणु अहंकार म्हणाल तर फार म्हणजे फारच झाला आहे , काही उपाव आहे का तुमच्याकडे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

कळत नाही की तुमच्याकडे उत्तर नाही ?

विवेक ठाकूर
गुरुवार, 04/21/2016 - 16:17 नवीन
कारण प्रश्न सरळ आहेः हा मार्ग तुम्ही अनुसरलायं का? असेल तर `राम कर्ता' हा भाव दृढ व्हायला किती काळ गेला? आणि सद्यस्थितीत अहंकाराची काय परिस्थिती आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अहो

विटेकर
गुरुवार, 04/21/2016 - 16:30 नवीन
खरेच काहीही कळत नाही आहे , तुम्ही दोनदा सांगितले तरीही !! जरा उलगडून सांगाल का ? आणु अहंकार म्हणाल तर फार म्हणजे फारच झाला आहे , काही उपाव आहे का तुमच्याकडे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व संक्षी सर

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/21/2016 - 13:23 नवीन
नमस्कार विटेकर बुवा ,
तसे तर सोपे काहीच नाही
आपल्या मताचा आदर आहे. पण मला जितके काही आकलन झाले त्यानुसार तर भक्तीयोगच सर्वात सोप्पा आहे. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी किंव्वा नाम घेता उठा उठी वगैरे अभंग आठवतात. फक्त एकच प्रोब्लेम आहे की लोकं नवविधा भक्तीतल्या सातव्या , दास्यभक्ती च्या पुढे जायलाच तयार नसतात ! लोकांना सख्य आणि आत्मनिवेदन हे अशक्य आहे अशी काही धारणा करुन दास्यात रहाणे सोप्पे वाटते. पण मग त्यांच्यात आणि सेमेटिक धर्मात फरक काय राहिला ? सख्य आणि आत्मनिवेदन जमले नाही तर समर्थ म्हणतात तसे - भोळी भक्ती भोळा भाव कैचा पाविजे देवाधिदेव || किंवा संक्षी म्हणतात तसे - व्यक्ती मुक्त होण्याच्या ऐवजी गुंतण्याची शक्यताच जास्त.' हेच खरे ठरेल !! अगदी दास्यभक्तीचा आदर्श आपला मारुतीरायाही म्हणाला आहे की - -'देहबुध्द्या तु दासोSहं जीवबुध्द्या त्वदंशकः| आत्मबुध्द्या त्वमेवाहमिति मे निश्चिता मति:|| पण लोकं त्याच्याकडे रीतसर दुर्लक्ष करतात असे आजवर पाहण्यात आलेले आहे. मागे एका चर्चेत मी एकनाथ महाराजांचा एका अभंगाचा संदर्भ दिला होता तेव्हा आपण म्हणाला होता की " आपण कोण , एकनाथ महाराज कोण , आपली लेव्हल काय त्यांची लेव्हल काय " वगैरे वगैरे ! वस्तुतः आपण आणि एकनाथ महाराज भिन्न नाहीच , भिन्न आहोत असे जे काही वाटते तो संदेह आहे ! आणि संदेह हेचि अज्ञान | नि:शेष तुटला तेचि ज्ञान | नि:संदेहि समान | होय आपैसे ||
राम कर्ता" हा भाव दृढ व्हायला हवा
आणि त्यापुढे जाऊन राम दुसरा तिसरा कोणी नसुन मीच आहे हा भावही दृढ झाला तरच भक्ती मार्गात यश आहे अन्यथा नव्हे !! दास्यभक्तीत सारे कर्म देवाला अर्पण करायचा अभ्यास करावा , पुढे सख्य भक्तीत तो आपला मित्रच आहे ह्याचा अभ्यास करावा आणि पुढे आत्मनिवेदनात ज्याला आपण देव देव म्हणतो तो दुसरा तिसरा कोणी नसुन आपणच आहोत असे 'जाणले' की झाले , मग जे काही कर्म कराल ते बंधनकारक नाही ... आणि मग तुमच्याकडे असेल ऑप्शन नॉट टू वर्क !! ( एकदा ही नवमी साधली कि पुढ्चे दशमी चे विसर्जन आणि एकादशीची ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती हे ऑप्शनल आहे ! जिथे कर्माशी संबंध तुटला तो माणुस पुढे काहीही करो त्याला ते बंधनकारक नाही कारण त्या माणसाकडे ऑप्शन आहे काम करण्याचा किंवा न करण्याचा {कारण अ‍ॅक्चुअल मध्ये तो काहीच करत नाहीये !!!} - योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः। यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दति एव ॥19॥ !) असो. आपल्या मताचा आदर आहेच. अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व संक्षी सर कळावे. लोभ असावा आपला विनम्र प्रगो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

प्रगो, तुझे प्रतिसाद इतके मनापासून आहेत

विवेक ठाकूर
गुरुवार, 04/21/2016 - 14:06 नवीन
की त्यात आवांतर काही नाही. पहिली गोष्ट, हा मार्ग तुला भावला असेल आणि उपयोगी होत असेल तर तो योग्य आहे. आनंदी माणसाला दु:खी करण्याचा माझा तरी स्वभाव नाही. तस्मात, गो अहेड . आता माझा स्टँड काय आहे ते लिहीतो. आत्मनिवेदनात ज्याला आपण देव देव म्हणतो तो दुसरा तिसरा कोणी नसुन आपणच आहोत असे 'जाणले' की झाले , मग जे काही कर्म कराल ते बंधनकारक नाही सांख्ययोगात किंवा अद्वैतवादात ही सुरुवात आहे. तिथे देवाला स्थानच नाही. जे काय आहे ते तुम्ही, तुमची मानसिकता आणि आकलन आहे. त्यामुळे कामावर असलेला जाणीवेचा रोख स्वतःकडे वळवला की झालं ! म्हणून `दि ऑप्शन नॉट टू वर्क ' हे साहस एकदाच करावं लागतं . त्यात कोणत्याही धारणेचा किंवा मान्यतेचा प्रश्न नाही. हल्लीच्या प्रगत विज्ञानयुगात धारणा अवघड आहे आणि समर्पण तर त्याहून कठीण. जिथे कर्माशी संबंध तुटला तो माणुस पुढे काहीही करो त्याला ते बंधनकारक नाही कारण त्या माणसाकडे ऑप्शन आहे काम करण्याचा किंवा न करण्याचा {कारण अ‍ॅक्चुअल मध्ये तो काहीच करत नाहीये !!!} - हे एकदम बरोबरे ! कारण काम हे कायम शारिरिक आणि मानसिक पातळीवरच चालू आहे. स्वरुपाला (किंवा आपल्याला) त्याची जाणीव होते पण स्पर्श होत नाही. तस्मात, कर्मबंध किंवा कर्मलेपाचा संबंधच उरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ह्म्म

विटेकर
गुरुवार, 04/21/2016 - 15:21 नवीन
न लगे मुक्ति आणि संपदा , संतसंग देई सदा ! तुका म्हणे गर्भवासी , सुखे घालावे आम्हांसी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ह्म्म

प्रसाद गोडबोले
Fri, 04/22/2016 - 12:59 नवीन
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥ ... दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोळवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

दत्त ही एक आधुनिक देवता आहे.

प्रचेतस
Fri, 04/22/2016 - 13:01 नवीन
दत्त ही एक आधुनिक देवता आहे. तुमच्यासारख्या टनाटनी लोकांनी तिचे ध्यान करणे म्हणजे असोच्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

टनाटनी लोकांनी =)_)

स्पा
Fri, 04/22/2016 - 13:05 नवीन
टनाटनी लोकांनी
=)_)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दत्त आहे का ते?

पैसा
Fri, 04/22/2016 - 17:06 नवीन
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
मी तर "सबाह्य अभ्यंतरी तू एक दुत्त" वाचते आहे. बुवां, आजचा चहा मिळाला असला तर या! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सेकंड करीयरचा कधी मनात विचार

सतिश गावडे
गुरुवार, 04/21/2016 - 16:17 नवीन
सेकंड करीयरचा कधी मनात विचार आला तर प्रवचनकार किंवा कीर्तनकार या पर्यायांचा अवश्य विचार करा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सतिशजी

विटेकर
गुरुवार, 04/21/2016 - 16:27 नवीन
हा सल्ला नेमका कुणाला दिला आहे ? गल्ली चुकली काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हा सल्ला प्रगोजी यांना दिला

सतिश गावडे
गुरुवार, 04/21/2016 - 16:34 नवीन
हा सल्ला प्रगोजी यांना दिला आहे. गल्ली चुकन्याचे दुष्परीनाम माहीती असल्याने आम्ही सहसा गल्ली चुकवत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

आणि

विटेकर
गुरुवार, 04/21/2016 - 16:36 नवीन
इथे काम न करण्याबद्दल चर्चा सुरु आहे , तुम्ही सेकन्ड करियर म्हणून अजून काम करायला सांगताहात ! भारीच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

चर्चा कशाबद्दल आहे हे कळलं

सतिश गावडे
गुरुवार, 04/21/2016 - 16:55 नवीन
चर्चा कशाबद्दल आहे हे कळलं असतं मग काय देवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

धन्यवाद गावडेसर !

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/21/2016 - 16:46 नवीन
धन्यवाद गावडेसर ! कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क हा ऑप्शन एकदा कळाला की करीयर असे काहीच रहात नाही , सच्च्या कर्मयोग्याला काहीही काम करण्यात आनंद येतो कारण तो काहीच करत नसतो !
काम (त्याला कर्म म्हणा की कर्तव्य) हे जाणीवेचा रोख खेचणारं सर्वात प्रमुख व्यावधान आहे. आणि जाणीवेचा रोख स्वतःकडे वळणं म्हणजे ध्यान आहे.
एकदा का जाणीवांचा रोख आत स्वतःकडे वळाला की माणुस तिथेच मोकळा झाला , मग करीयर असे काही रहात नाही ! हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनु ॥ ५२ ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुम्हाला सल्ला दिला त्याचा

सतिश गावडे
गुरुवार, 04/21/2016 - 17:00 नवीन
तुम्हाला सल्ला दिला त्याचा बदला घेण्यासाठी चावू नका. ;) शब्दांना कितीही गोल गोल फिरवलं तरी काम करणं चुकणार नाही. तुम्ही त्यात सुख माना, दु:ख माना किंवा अजून भारदस्त लेबल लावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

शब्दांना कितीही गोल गोल

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/21/2016 - 17:21 नवीन
शब्दांना कितीही गोल गोल फिरवलं तरी काम करणं चुकणार नाही. तुम्ही त्यात सुख माना, दु:ख माना किंवा अजून भारदस्त लेबल लावा. :)
मुद्दा शब्दांना फिरवायचा नसुन मनोवृतीला फिरवायचा आहे. काम करणं चुकणार नाहीच पण जाणीवांचा रोख कामावरुन स्वतःकडे वळवण्यात आला की काम केवळ शारिरिक पातळीवर घडत आहे आणि आपण केवळ साक्षीस्वरुप आहोत हे लक्षात येईल. हाच कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क आहे ! एकदा प्रयत्न तर करुन बघा राव. गाजराची पुंगी , वाजली तर वाजली नाहीतर मोडुन खाल्ली. आणि महत्वाचे म्हणजे आम्ही काय तुमच्याकडुन सुधारित सत्यनारायणाची विचारसरणीची दक्षिणा मागणार नाय =)))) असो ,आपल्या मताचा आदर आहेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

प्रगो, ग्रेट!

विवेक ठाकूर
गुरुवार, 04/21/2016 - 19:44 नवीन
मुद्दा शब्दांना फिरवायचा नसुन मनोवृतीला फिरवायचा आहे. काम करणं चुकणार नाहीच पण जाणीवांचा रोख कामावरुन स्वतःकडे वळवण्यात आला की काम केवळ शारिरिक पातळीवर घडत आहे आणि आपण केवळ साक्षीस्वरुप आहोत हे लक्षात येईल. हाच कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क आहे ! बरोबर ! यात न समजण्यासारखं काही नाही पण सदस्य मूळ मुद्दा सोडून उगीच चर्चा भरकटवतायंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हे बघा उगीच माझे नाव मध्ये

अद्द्या
गुरुवार, 04/21/2016 - 18:13 नवीन
हे बघा उगीच माझे नाव मध्ये अनु नका , तुम्ही आणि गावडे सर काय ते सोडवा आपल्या आपल्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

प्रगो, तू चर्चेत कमालीचा रंग भरलायंस !

विवेक ठाकूर
Wed, 04/20/2016 - 17:38 नवीन
अशा प्रकारे जाणिवांचे रोख खेचणारे , ववधाने निर्माण करणारे कर्म भगवंताचरणी अर्पण करुन आपण मोकळे रहाणे हा जाणिवांचा रोख स्वतःकडे वळवणेचा जास्त सोप्पा मार्ग आहे असे मला वाटते. हा मार्ग अनुसरायला भगवंत आहे(च) अशी धारणा प्रथम पक्की करायला लागते. त्यातून पुन्हा कामाची जवाबदारी स्वतःकडे घेण्याची वृत्ती लयाला जाण्याचा धोका आहे. सगळेच भगवंत करतो म्हटल्यावर मोबदल्याच्या बाबतीत संदिग्धता निर्माण होते ती वेगळीच ! तस्मात, व्यक्ती मुक्त होण्याच्या ऐवजी गुंतण्याची शक्यताच जास्त. भारतात कर्मगौरव लयाला जाण्याचं मुख्य कारण लोकांचा वैचारिक गोंधळ आहे. पाश्चात्य देशात मॉलमधला साधा हेल्प असिस्टंट सुद्धा समरसून काम करतांना दिसतो आणि आपल्याकडला राजपत्रित अधिकारी सुद्धा पैश्यासाठी लाचार दिसतो. तस्मात, ..... सारेच कर्म भगवंताला परमात्म्याला अर्पण करायची सवय लागली की भगवंताने म्हणल्याप्रमाणे (ददामि बुधियोगं तं तेन मांमुपयान्ति ते) ज्ञानप्राप्ती होते आणि मग परमात्मा हा दुसरा तिसरा कोणी नसुन आपण स्वतःच आहोत हे अनुभवाला येते. इतका उच्च परिणाम साधलेला माझ्या तरी पाहाण्यात नाही. शिवाय मानशास्त्राचा जो काही आभ्यास आहे त्यावरनं, सध्याच्या युगात माणूस `फलकामनामुक्त' काम करण्याची शक्यता शून्य. थोडक्यात, कर्म भगवंताला अर्पून एखादा निर्धास्त झाला आणि त्याच्या जाणीवेचा रोख कामाकडून स्वतःकडे वळला हे होणं सध्याच्या काळात तरी असंभव आहे. विज्ञानाची इतकी प्रगती झाली आहे की सर्वांप्रती भगवंत म्हणून पाहात काम करणारा संत व्यावाहारिक जीवनात टिकाव धरु शकणार नाही. मग इतक्या लोच्यात, आपल्या अकर्ता स्थितीची जाणीव होण्याची शक्यता, तर्क कितीही खेचला तरी दृष्टीपथात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

व्वा!!

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 18:03 नवीन
व्वा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

धन्यवाद प्रगो :))

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 04/20/2016 - 20:45 नवीन
धन्यवाद प्रगो :)) विठा सर माफ करा पण तुमचा लेख प्रगो च्या प्रतिसादा नंतर आता पुर्ण समजला आहे आणि पटला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ओशो आणि मी एकच सांगतोयं.

विटेकर
Wed, 04/20/2016 - 15:06 नवीन
ओशो आणि मी एकच सांगतोयं.
विठा उपाख्य संक्षी यांना ओशो -२ असा सन्मान द्यावा असा प्रस्ताव मांडतो , किमानपक्षी त्यांना मिपाचे ओशो हा सन्मान तातडीने द्यावा अशी संपादक मंडळाला इणंती करतो, हानुमोदन देणारे कुणी हाय का ?
  • Log in or register to post comments

ओशो ला विठा २ म्हणत असाल तर

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 15:17 नवीन
ओशो ला विठा २ म्हणत असाल तर कचकून अनुमोदन. आमचे संक्षी ओशो, बुद्ध, सगळ्या ऐर्‍यागैर्‍या संतांची फार धुवुन टाकतात. आहात कुठं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

प्रगो

विटेकर
Wed, 04/20/2016 - 15:10 नवीन
प्रगो , खूपच छान , आवडले ! अध्यात्म सोप्या शब्दातही सांगता येते , नव्हे त्यात अवघड आणि शब्दबंबाळ करण्याचे काहीच कारण नाही हे आपल्या प्रतिसादावरुन सपष्ट होत आहे ... पण असं सोप्प सोप्प करुन सांगितले तर काहिंचा बाजार उठेल ! हे वागणं बरं नव्ह !
  • Log in or register to post comments

चला, शंभर निमित्त सगळ्या

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 15:19 नवीन
चला, शंभर निमित्त सगळ्या नासमझ कामकर्‍या माशांना एक एक क्युबन सिगार देऊन सन्मानित करण्यात येत आहे, तुमच्या योगदानामुळे सेंचुरी शक्य झाली.
  • Log in or register to post comments

प्रगो, प्रतिसाद आवडला!

अजया
Wed, 04/20/2016 - 16:58 नवीन
प्रगो, प्रतिसाद आवडला!
  • Log in or register to post comments

हा पर्याय आर्थिक जबाबदाऱ्या संपल्यावर शक्य आहे

वीणा३
Wed, 04/20/2016 - 20:37 नवीन
तुम्ही म्हणताय तो पर्याय मी चाळीशी-पन्नाशी ला गेल्यावर वापरू शकते, शक्य आहे . जेव्हा माझ्या बऱ्याच आर्थिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतील. वरती ज्या लोकांनी मान्य केलंय (सुबोध खरे, चित्रगुप्त ) ते लोक सुद्द्धा हा पर्याय आधी २०-२५ वर्ष नोकरी (कदाचित व्यवसाय) केल्यावर मग आनंदाने स्वीकारतात. जे आत्ता शेक्षणिक कर्ज फेडत आहेत, आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे, नुकताच गृहकर्ज घेत आहेत त्यांना "काम नसणं / काम न करण " हा विकल्प आहे असं मनाशी म्हणणं बरेचदा शक्य नसतं. तुम्ही आत्ता विचार करून बघा कि कुठल्याही कारणाने तुमची सर्व मिळकत अचानक संपली (घर तुमच्या मालकीचा नाही, एकही रुपया खर्च करायला शिल्लक नाही ), उद्या डॉक्टर कडे जायचं पण पैसे नाहीत, भूक लागलीये पण खिशातले पैसे बघून केळं खाऊन घेताय. आणि मग वरचं लॉजिक लावायचा प्रयत्न करायला जमलं तर बघा.
  • Log in or register to post comments

बाईश्री

विवेक ठाकूर
गुरुवार, 04/21/2016 - 10:23 नवीन
तुम्ही म्हणताय तो पर्याय मी चाळीशी-पन्नाशी ला गेल्यावर वापरू शकते, शक्य आहे . जेव्हा माझ्या बऱ्याच आर्थिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतील. साहसाचं एक तत्व आहे, ते नेहेमी आत्ताच कारावं लागतं. भविष्यकालीन साहसाची खात्री नाही. शिवाय वाढत्या वयाबरोबर साहसी वृत्ती कमी होते. आणि मुख्य म्हणजे काम बहरात असतांनाच त्याची मजा येते. वरती ज्या लोकांनी मान्य केलंय (सुबोध खरे, चित्रगुप्त ) ते लोक सुद्द्धा हा पर्याय आधी २०-२५ वर्ष नोकरी (कदाचित व्यवसाय) केल्यावर मग आनंदाने स्वीकारतात. जीवनाच्या उत्तरार्धात त्यांना संधी मिळाली इतकाच त्याचा अर्थ होतो. मी ऐन तारुण्यात साहस केलं आहे. जे आत्ता शेक्षणिक कर्ज फेडत आहेत, आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे, नुकताच गृहकर्ज घेत आहेत त्यांना "काम नसणं / काम न करण " हा विकल्प आहे असं मनाशी म्हणणं बरेचदा शक्य नसतं. आर्थिक परिस्थिती आणि द ऑप्शन नॉट टू वर्कचा वरकरणी संबंध वाटतो. पण वर म्हटल्याप्रमाणे साहस वर्तमानात करावं लागतं. आणि साहस करुन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता शून्य कारण आपण काम थांबवत नाही. ते फक्त आपल्या मर्जीनं करतो. तुम्ही आत्ता विचार करून बघा कि कुठल्याही कारणाने तुमची सर्व मिळकत अचानक संपली (घर तुमच्या मालकीचा नाही, एकही रुपया खर्च करायला शिल्लक नाही ), उद्या डॉक्टर कडे जायचं पण पैसे नाहीत, भूक लागलीये पण खिशातले पैसे बघून केळं खाऊन घेताय. आणि मग वरचं लॉजिक लावायचा प्रयत्न करायला जमलं तर बघा. मी सर्वस्वी वर्तमानात जगतो. तस्मात, कल्पना आणि भीती कधीच सतावत नाही. थोडक्यात, तुम्ही वर्णन केलेली नेगटिविटी साहसापुढे टिकाव धरत नाही. प्रसंग आला तर त्याला सामोरं जाण्याची क्षमता असली की झालं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

कर्माचा योग!

निराकार गाढव
Wed, 04/20/2016 - 21:51 नवीन
मला वायफळ गप्पा मारण्याचं काम करायला खूप आवडतं. त्यात इतका आणंद होतो म्हणून सांगू... Image removed. काय कर्माचा योग दडलेला आहे त्यात बघा: वायफळ = Why + फळ ?
  • Log in or register to post comments

गुरुजींचा धागा आणि पट्टशिष्य

अनुप ढेरे
गुरुवार, 04/21/2016 - 20:13 नवीन
गुरुजींचा धागा आणि पट्टशिष्य आलेच! स्वागत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव

तुमचा विचार चांगला आहे आणि

राघव
गुरुवार, 04/21/2016 - 06:15 नवीन
तुमचा विचार चांगला आहे आणि त्यावरचे मत मी याच धाग्यावर आधीच नोंदवलेले आहे. पण साधारण चर्चेचा रोख बघता काही गोष्टी विचाराव्याशा वाटतात - १. लोकांच्या सरळ वा तिरकस प्रतिसादांवर तिरकस प्रतिसाद देण्याची गरज आहे का? मृदु अथवा सौम्य भाषेत स्वत:चा प्रतिसाद देता येणार नाही का? २. साधनेचे अनेक मार्ग असतात आणि प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे, विचारप्रक्रियेप्रमाणे, अनुभवांप्रमाणे मार्गक्रमण करत असतो. पण धाग्याच्या विषयापासून फारकत घेऊन दुसया मार्गावर कुणी काहीही लिहिले तरी त्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही का? ३. ही चर्चा आहे, तेव्हा त्यातून भांडणे होण्यासाठी हातभार लावण्यापेक्षा, काहीतरी चांगले निष्पन्न निघण्यावर तुम्ही भर देणे हे धागाकर्त्याच्या जबाबदारीतून जास्त योग्य नाही का? अगदीच काही ठोस निष्पन्न निघाले नाही तरीही चांगले ब्रेन स्टॊर्मिंग होणे हेही नसे थोडके?
  • Log in or register to post comments

राघवजी,

विवेक ठाकूर
गुरुवार, 04/21/2016 - 10:42 नवीन
१. लोकांच्या सरळ वा तिरकस प्रतिसादांवर तिरकस प्रतिसाद देण्याची गरज आहे का? मृदु अथवा सौम्य भाषेत स्वत:चा प्रतिसाद देता येणार नाही का? जिथे चर्चा भरकटवण्याचा किंवा बाष्कळ प्रतिसाद देण्याचा प्रयत्न होतो (उदा. वरचा नादान प्रतिसाद), तिथे चर्चा लाईनवर आणण्यासाठी भाषा अणखर केल्याशिवाय इलाज नसतो. तुमचा इंटनेटवरचा अनुभव असेलच. एकदा धुळवड सुरु झाल्यावर, चांगल्या चाललेल्या चर्चेत सुद्धा कुणीही विधायक बाजू उचलून धरण्याच्या भानगडीत पडत नाही. २. साधनेचे अनेक मार्ग असतात आणि प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे, विचारप्रक्रियेप्रमाणे, अनुभवांप्रमाणे मार्गक्रमण करत असतो. पण धाग्याच्या विषयापासून फारकत घेऊन दुसया मार्गावर कुणी काहीही लिहिले तरी त्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही का? भक्तीमार्गावर इथे चर्चा झाली आहे आणि मी माझे मुद्दे मांडलेत. कामाचा आनंद मिळवण्याविषयी इतर कुठलाही मार्ग कुणी सांगितलेला नाही. तसा मुद्दा कुणी मांडला तर त्यावरही विधायक चर्चा होईल. ३. ही चर्चा आहे, तेव्हा त्यातून भांडणे होण्यासाठी हातभार लावण्यापेक्षा, काहीतरी चांगले निष्पन्न निघण्यावर तुम्ही भर देणे हे धागाकर्त्याच्या जबाबदारीतून जास्त योग्य नाही का? अगदीच काही ठोस निष्पन्न निघाले नाही तरीही चांगले ब्रेन स्टॊर्मिंग होणे हेही नसे थोडके? अर्थात ! पण एक समंजस सदस्य म्हणून असंबद्ध, व्यक्तिगत किंवा निव्वळ बाष्कळ प्रतिसाद देणार्‍यांना समजावण्याची जवाबदारी तुम्हीही घेऊ शकाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

ह्म्म. मीही वरचे सगळे

राघव
गुरुवार, 04/21/2016 - 17:46 नवीन
ह्म्म. मीही वरचे सगळे वाचल्यावरच हे प्रश्न विचारलेत. त्यामुळं ते सगळं पुन्हा इथे मांडणं अनावश्यक आहे. असो. पण एक समंजस सदस्य म्हणून असंबद्ध, व्यक्तिगत किंवा निव्वळ बाष्कळ प्रतिसाद देणार्‍यांना समजावण्याची जवाबदारी तुम्हीही घेऊ शकाल का ? ही अट नाही असं मी गृहित धरतो. माझ्यापरीनं मला ज्यांना कुणाला सांगावसं वाटतं तसं मी सांगतोच. पण मुळातच तिरकस प्रतिसाद कमी झालेत तर बर्‍याच अनावश्यक गोष्टी टळतात हे मी अनुभवानं नमूद करू इच्छितो. बाकी आपण सूज्ञ आहातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

ऑप्शन नॉट टू रीड

शाम भागवत
गुरुवार, 04/21/2016 - 14:40 नवीन
ऑप्शन नॉट टू वर्क सारखे ऑप्शन नॉट टू रीड किंवा ऑप्शन टू इग्नोअर अस काही करता येणार नाही का?
  • Log in or register to post comments

टेलर

तिमा
गुरुवार, 04/21/2016 - 15:18 नवीन
लेडीज टेलर कायम सुखी असतो असे गृहीत धरले तर ते फळाची अपेक्षा न ठेवल्यामुळे की ठेवल्यामुळे ?
  • Log in or register to post comments

लेडीज टेलर कायम सुखी असतो असं

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/21/2016 - 17:51 नवीन
लेडीज टेलर कायम सुखी असतो असं का गृहित धरायचं ? काही विदा उपलब्ध आहे ? जेन्ट्स टेलर, होजियरीवाले, अंतर्वस्त्रवाले यांचं काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

काम "न" करण्याबद्दल धागा आला

पिलीयन रायडर
गुरुवार, 04/21/2016 - 16:22 नवीन
काम "न" करण्याबद्दल धागा आला म्हणुन १० वेळा इथे येऊन गेले. वाचायचा खुप प्रयत्नही केलाय. पण मला काहीही समजलेले नाही. कुणी ह्या लेखाचा कळेल असा सारांश देऊ शकेल का? १-२ ओळीत पुरे. संक्षी तुम्ही सुद्धा दिलात तरी चालेल.
  • Log in or register to post comments

खरच धमाल चाललीय इथे

शाम भागवत
गुरुवार, 04/21/2016 - 18:14 नवीन
मला काय कळलेय त्याचा सारांश देतोय. पण.. विठांना तसेच म्हणायचे असेल याची खात्री नाही. भक्ति व ज्ञानोत्तर भक्ति असे काही असते तसेच कर्म व ज्ञानोत्तर कर्म असे पण असते. ह्यातले ज्ञानोत्तर कर्म म्हणजे विठांचे ऑप्शन नॉट टू वर्क. मात्र ह्याबद्दल मी फार काही बोलणार नाहीय्ये. कामाला स्वतःची गोडी नसते. आपणच त्यात आपली आवड अथवा नावड किंवा असे बरेच काहीतरी घालतो. मग ते काम आनंददायी अथवा त्रासदायक वगैरे होते आणि तसे ते होण्याचे मूळ कारण आपणच आहोत. ते काम नव्हे. जर प्राप्त परिस्थितीत एखादे काम करायलाच लागणार असेल तर ते त्यात गोडी घालून करा. अशी सवय लागली की, हळूहळू आपल्याला ते काम आवडायला लागते व त्यात आपण समरस होऊ लागतो. आणि मग कधितरी आपल्या लक्षात येते हे काम करताना आपले वेळ काळाचे भान हरपले आहे. तसेच आपल्याला कोणताही थकवा आलेला नाही. जणू दुसरेच कोणीतरी ते काम करतेय व आपण ते फक्त पाहातोय. या स्थितीत मात्र काम हे निव्वळ काम असते त्यात आवडी नावडीचे कोणतेही मिश्रण झालेले नसते. आपण ते करत नसतो तर आपल्याकडून ते होत असते. अशी स्थिती होणे म्हणजे ऑप्शन नॉट टू वर्क. एकदाका हा अनुभव आला की मग कोणत्याही कामात आपली आवड निवड न घालता आपल्याला काम करता येऊ लागते. हुश्श...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हा प्रतिसाद वाचल्यावर पिलियन

रेवती
गुरुवार, 04/21/2016 - 18:18 नवीन
हा प्रतिसाद वाचल्यावर पिलियन रायडरला नक्की कळेल.........................की मूळ लेखच समजायला सोपा होता. (हलके घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा