संक्रांत!
"हे ऽऽ काऽऽऽप्पेऽऽऽ" असं बेंबीच्या देठापासनं ओरडत, उन्हानं तावलेल्या लालबुंद चेहेर्यानं गच्चीवरुन धावत जायचं आणि अनवाणी पायांना चटके बसत असले तरी गच्चीवरल्या कुंभीवर चढून कापला गेलेला पतंग कोणत्या पोरांचा होता हे टाचा उंच करुन शोधायचं हे दृश्य आता माझ्यासाठी तरी इतिहासजमा झालं आहे.
जानेवारी महिना आला तरी थंडी सुरुच असायची पण सकाळी-सकाळी उन्हात एकप्रकारचा प्रेमळ उबदारपणा जाणवायला सुरुवात झालेली असायची. संक्रांतीआधी तीनचार दिवस आम्ही मित्रमंडळीचा एककलमी कार्यक्रम पतंग बनवणे आणी मांजा सुतवणे. त्याची तयारी सुद्धा साग्रसंगीत असायची. आधी बाजारात जाऊन मजबूत धागा असलेला दोरा घेऊन येणे. त्यानंतर मांजा गुंडाळायला चक्री, काचेच्या बाटल्या, रंग, सरस, फडकी असे सर्व साहित्य गोळा झाले की तयारी झाली. आमच्यातली जरा मोठी मुलं होती ती कुठूनशा बियर वगैरेच्या बाटल्या पैदा करत त्याचं मला फार आश्चर्य वाटे. मग आम्ही जमवलेल्या साध्या काचेच्या बाटल्या आमच्यापेक्षा लहान मुलांना मांजा बनवण्यासाठी आम्ही उदारपणे दान देत असू! ती ही खूष आणि आम्हालाही मोठेपणा!
मग दुपारी जेवणे झाली की घरोघरी मोठ्यांची विश्रांती सुरु असे. घरात कार्ट्यांची कटकट नको म्हणून मग आम्ही भर रस्त्यात मांजा सुतवायला मोकळे! त्यावेळी, म्हणजे साधारण २५-२७ वर्षांपूर्वी, अहमदनगरला दुपारच्या टळटळीत उन्हात एखादा डबेबाटलीवाला, क्वचित कल्हईवाला, एखादी बोहारीण, एखादी कुल्फी आणि बर्फाचे गोळे विकणारी गाडी सोडली तर दुपारी रस्ते जवळजवळ सुनसान असत. त्याचा फायदा आम्ही घेतला नाही तरच नवल.
एका जाड फडक्यात घालून त्या बियरच्या बाटल्या विटेने बारीक कुटल्या जात. काचेची पूड अगदी एकसारखी होणे गरजेचे. चुकार तुकडे काढून टाकले की काच तयार. ती पूड एका जाड फडक्यात घ्यायची. मग एका वेताच्या जाड काडीच्या एका टोकाला 'V' आकाराची खाच पाडून घ्यायची. कोरा जाड दोरा घेऊन एक मुलगा उभा असे. दुसर्याने त्या दोर्याचे टोक चिकट सरस असलेल्या डब्यात 'V' आकाराच्या खाचेतून ओढून काढायचे. तिसरा मुलगा हातातल्या काचेच्या पुडीतून तो दोरा जाऊ देई. त्यामुळे काच दोर्याला चिकटे मग चौथा मुलगा रंगाच्या डब्यातून दोरा पुढे चालवी त्याने ती काच अधिकच घट्ट पकड घेई. थोड्या लांब अंतरावर पाचवा मुलगा चक्री गुंडाळत असे. अशी कामे आळीपाळीने वाटून भलामोठा मांजा सुतवणे पूर्ण होई. अजिबात गुंता न होऊ देता चक्रीवर मांजा गुंडाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असे. एरवी अभ्यास म्हटले की पळून जाणारी एकाग्रता अशा कामात मात्र काय जमून आलेली असे महाराजा! तहान-भूक हरपून काम सुरु असे. मांजा झाला की मग तो जरा वाळायला ठेवायचा आणि पतंग करायला घ्यायचे. वेगवेगळ्या आकारमानाचे, रंगांचे, शेपटीवाले, बिनशेपटीवाले, गोंडावाले, नक्षीदार असे ५० एक पतंग तरी आम्ही सहज करत असू!
पतंगाचा तोल बघून त्याला मधल्या काडीभोवती अचूक ठिकाणी भोके पाडून दोरा ओवणे आणि सूत्र बांधणे हेही कौशल्याचे काम! ते चुकले की पतंग उडायचा नाही किंवा गिरक्या घ्यायचा मग त्याला एका बाजूला कन्नी (म्हणजे सुतळीचे वजन बांधून बॅलन्सिंग) करणे असले प्रकार. हे सगळे साहित्य कोणा एकाच्या घरी जपून ठेवणे म्हणजे महाकठिण काम. एकतर "कसले धंदे चाललेत रे तुमचे?" म्हणून मोठी ओरडणार आणि ज्यांचे लहान भाऊ-बहीण आहेत ती तिथे जाऊन त्या वस्तूंना हात लावणार. अशा दोन्ही आघाड्यांवर सांभाळावे लागे.
संक्रांतीच्या आदल्या संध्याकाळी रंगीत तालीम असे. दोन चार 'टेस्ट पतंग' जुन्या मांजाला लावून उडवले जात तेव्हा एखाद्या विमानाची 'ट्रायल फ्लाईट' पूर्ण झाल्याचा आनंद मिळे. मग कोणाच्या गच्चीत किती वाजता जमायचे हे ठरून तो दिवस संपे. रात्री झोपा नीट लागत नसत इतके आम्ही उतावळे झालेले असू. कधी एकदा ते पतंग उडवतोय असे झालेले असे!
एकदाची संक्रांत येई! कधी नव्हे ते पटापट आवरुन आम्ही आईने केलेल्या गुळाच्या पोळ्या, तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्यावर लोणी, वांग्याचं भरीत, थंडगार ताक असलं मालामाल जेवण चापून पळत असू! जाताना चड्डीच्या दोन्ही खिशात तीळगुळाचे लाडू आणि रेवड्या भरुन जायचो. एकीकडे बाबांचे " पत्र्यावरुन चढून पळू नका. चौकाच्या फार बाजूला जाऊ नका, वरुन पडाल आणि हातपाय मोडून घ्याल!" अशा सूचना सुरु असायच्या "हो, नाही" करत त्या ऐकून घेतल्यासारखे करत सटकायचो!
मग आमची टोळधाड सर्व पतंग आणि मांजा घेऊन ठरलेल्या गच्चीवर जमत असे. आजूबाजूला निरीक्षण करून कोणकोणते पतंग आणि प्रतिस्पर्धी आहेत ह्याचा आदमास घेतला जाई. एकूणच 'वारा कसा वाहतोय' ह्याचा अंदाज घेऊन पतंग उडवायला सुरुवात होई! मग आमच्यातल्या थोड्या अनुभवी शिलेदाराला पहिला पतंग उडवायचा मान मिळे. चक्री धरुन मागे रहाणे हेही जोखमीचे काम असे. वारा भरपूर असला तर पतंग सरसरत वर जाऊ लागे तेव्हा आम्ही हर्षभरित होऊन जात असू. वारा जेमतेम असला तर मात्र उडवणार्याची दमछाक असे. आमच्या जुन्या वाड्याच्या सभोवताली अतिशय दाट वस्ती आणि इतरही जुने वाडे होते त्यांच्या गच्च्या एकमेकांना लागून-लागून असल्याने पतंगांच्या दिवसात फार फायदा होई. कुठूनही कुठेही पळणे आणि उड्या मारुन जाणे सहज शक्य असे. एकेक करुन आजूबाजूच्या घरांवरुन पतंग सरसरत वर जात असत. थोड्याच वेळात संपूर्ण आसमंत पतंगांनी भरुन जाई. मग एखाद्या जवळच्या गच्चीवरल्याच्या पतंगाला आव्हान देऊन आपला मांजा टेस्ट करायचा डाव साधायचा! त्याच्याशी गोत घेऊन त्याचा पतंग काटला की काय आनंद! ते पहिलं यश अमाप ओरडाआरड्याने साजरे होई! मग भीड चेपली की जरा लांबचे मोठे पतंग गाठायचे आणि कापून काढायचे. दे धमाल! कधी आपला कापला गेला की मग पलीकडचे जल्लोश करत त्यावेळी अपमानाने संताप होई!
त्यावेळी भराभर मांजा गुंडाळून घेणे हे अति कठिण काम असे!
एका वर्षी आम्ही सलग १३ पतंगांना 'धरती दाखवली' होती! :) त्यावेळचे रेकॉर्ड अजूनही लक्षात आहे! एकामागे एक पतंग कापले गेल्याने आमच्याशी गोत घ्यायला कोणी तयार नव्हते.
त्यावेळी टीव्हीचे अँटेना खूप उंच असत. कधी त्यात अडकून पतंग फाटला तर फारच वाईट वाटे. असा सगळा दिवस पार सूर्य बुडेपर्यंत पतंग उडवायचे. मग दिसेनासे झाले की खाली यायचे. हातपाय धुताना धारदार मांजाने कुठे कुठे कापले आहे ते लक्षात येई. मग जरा जास्त लागले असले तर औषध लावणे अन्यथा काही नाही!
मग घरात आजोबांकडून, आई-बाबांकडून, वाड्यातल्या सर्वांकडून तीळगूळ घेऊन बाहेर पडणे. आम्ही मित्र टोळक्याने आमच्या बर्याच शिक्षकांच्या घरी जात असू. प्रत्येक ठिकाणी आमचे अतिशय मायेने स्वागत होई. हातातल्या पिशव्यात, काटेरी हलवा, रेवड्या, तीळगुळाचे लाडू, चिक्की असला असली माल भरभरुन असे. मनात कुठेतरी एक आपुलकीची भावनाही असे पण ती तीव्रतेने जाणवण्याजोगे वय नव्हते असे आता वाटते. माझ्या सर्वात लाडक्या, मला चौथ्या इयत्तेत शिकवणार्या, रसाळ बाईंकडे गेल्याशिवाय संक्रांत साजरी झाल्यासारखे मला वाटत नसे. मी त्यांच्याघरी जाताच "ये रे ये. कसा आहेस बाळा?" असं म्हणून मायेनं पाठीवरुन हात फिरवला की कसं भरुन येई! त्यांच्या घरच्या तीळगुळाला मायेचा काही वेगळाच स्वाद असे.
त्यांच्या घरच्या विठ्ठलमंदिरातल्या त्या सावळ्याचं दर्शन घेऊन आणि तो तिळगूळ खाऊन मनाचं जे समाधान होई ते शब्दातीत आहे! आजही संक्रांत आली की मला बाईंची हटकून आठवण होतेच. गेल्या ४ वर्षात त्यांची भेट झालेली नाही आणि तो प्रेमळ खाऊ आणि मायेचा हातही पाठीवर टेकला नाही. ह्या लेखाच्या निमित्ताने त्या आठवणींना उजाळा मात्र मिळाला.
सर्व मिपाकरांना संक्रांत सुखाची आणि आनंदाची जावो आणि त्यांच्या यशाचा पतंग असाच आसमानात उडत राहो विषमतेचा आणि अपयशाचा मांजा कापून सगळे मिळून जल्लोश करु "हेऽऽ काऽऽप्पे"! :)
चतुरंग
वाचने
3707
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
मस्त चतुरंग
क्या बात है....
In reply to क्या बात है.... by संदीप चित्रे
एकदम खूप
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
:)
लेख आवडला
In reply to लेख आवडला by कोलबेर
हेच
सुरेख आठवणी.
वा वा!
+१
मस्त!!
'पतंग'
अच्छा