पूर्वतयारी आणि दिवस पहिला - अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
दिवस दुसरा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
दिवस तिसरा आणि चौथा-अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
दिवस पाचवा आणि सहावा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
दिवस सातवा आणि आठवा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
आजचा सुरु होणारा प्रवास १३७ किलोमीटर. मनाली ते जीस्पा. ( पण पोहोचलो केलोंग पर्यंत ११५ किमी )
प्रवासाला लागणारा वेळ ? माहित नाही . कमीत कमी ६ तास आणि जास्तीत जास्त कितीही.
मनालीची समुद्रसपाटीपासून उंची २००० मीटर आणि रोह्तान्गची उंची ४००० मीटर. मनाली ते रोह्तान्ग्चे अंतर ५१ किलोमीटर. फक्त ५१ किलोमीटर च्या अंतरामध्ये २००० मीटर उंचीची चढाई.
सकाळी लवकर म्हणजे ७ ला जाग आली. ७ वाजता निघायचे होते असे जरी मी सगळ्यांना सांगितल होत खरे तर 9 वाजता निघायचे होते आणि मी त्यांना मुद्दाम ७ सांगितले. सगळ्यांना उठवले.
सकाळी उठल्यापासून डोळ्यासमोर फक्त रोहतांग दिसत होता. आज कस असेल त्याचे रूप? सहज तो तिथपर्यंत आपल्याला पोहोचू देईल का? आणि त्याच्या पलीकडे काय असेल ?
८ पर्यंत मी तयार झालो, बाबा चमत्कार जी भाड्याने घ्यायची बायिक आहे ती आणायला निघून गेला. त्याला तिकडेच नाश्ता करायला सांगितले. आम्ही नाश्ता करायला खाली निघालो.
९ वाजले , १० वाजले , परिस्थिती जैसे थे तशीच. जुली पलंगावर लोळत होता, बाबाची ब्याग तशीच पडली होती अस्तव्यस्त. ती मीच भरली. बाबा जिकडे गेला तिकडेच गुल होता. जेम्स विचारात होता आज निघायचे आहे का.? आणखी 1 तास वाट पहिली. साडे ११ वाजले.
शेवटी मी माझे सामान उचलले. तेवढ्यात जुली म्हणाला अरे अजून बाबा यायचा आहे, त्यची अंघोळ बाकी आहे नाश्ता बाकी आहे. झाले. माझी सहनशक्ती संपली. ५ तास उशीर झाला होता निघायला, तरी अजून याची अंघोळ नाश्ता बाकी? अरे तुम्ही समजता काय ? आपण पिकनिक ला आलोय का ? रोहतांगला निघताना किती वाजता आणि का उठायचे हे तुम्हाला १ महिना आधीपासून समजावून सांगतोय कळत नाही का? इथे कधीही आपल्या मनाप्रमाणे उठून चालत नाही. १२ वाजता काय निघायची वेळ आहे का? बाचाबाचीला सुरुवात झाली, हळूहळू बचाबचीची जागा शिव्यांनी घेतली, इतके दिवस समजावून सांगितलेली गोष्ट त्यांनी अजिबात गंभीरपणे घेतली न्हवती, निदान आजच्या दिवशी तरी सगळ्यांनी लवकर उठणे अपेक्षित होते.
माझे सामान गोळा करून मी खाली आलो, पाठोपाठ जुली आणि जेम्सहि आला, माझे सामान मी गाडीवर बांधायला सुरुवात केली, आणि त्यांना आता विश्वास बसला कि खरच एकटा निघालोय, मग शिव्यांचा दुसरा अध्याय त्या रिसेप्शन समोर सुरु झाला. अवघी लॉबी दुमदुमून गेली, बेंबीच्या देठापासून शिव्या हासडताना, आम्ही आमची सभ्यापणाची सगळी लक्तरे व्यास नदीत फेकून दिली होती. हॉटेलचा स्टाफ आणि तो म्यानेजर हताशपणे सगळ पाहत होता, शेवटी गाडीला किक मारताना तो जवळ आला आणि म्हणाला, “ साबजी अकेले मत जाव.” “ डरो मत मै बहोत बर जा चुका हु रोहतांग.”
“ साबजी मै तो वो समज गया लेकीन इनको छोडके मत जाव.ये नये लग रहे है” परंतु मी आता ऐकण्याच्या मनस्थितीत न्हवतो.
गाडीला किक मारली आणि १२.१५ वाजता दुपारी मी निघालो, सगळ्यांना सोडून. पर्याय न्हवता. १ दिवस उशीर २ उशीर मी समजू शकतो, पण रोज रोज तेच? आजही उशीर? का ?
उशिरा निघण्याची कारणेही तशीच फालतू. रात्री कितीही उशीर झाला तरी पिल्याशिवाय झोपायचे नाही, दारू हि हवीच. झोपायचं नंतर बघू. मग सकाळी उशिरा उठायचं, लोळत पडायचं आणि मग अंघोळ नट्टापट्टा, बाबा चमत्कार तर अंघोळीनंतर निघताना पुन्हा थोबाडला फेस्वाश लावायला जायचा. किती नखरे ? कुठे आलोय आणि कशासाठी आलोय आपण याचे काहीतरी भान ठेवा. पुन्हा पुन्हा आपण इथे नाही येऊ शकत.
या हिमालयातले हवामानाबद्दल काही सांगता येत नाही, आता उन दिसतंय क्षणात ढग दाटून येतील आणि कधी पावूस सुरु होईल आणि त्यानंतर कधी बर्फ पडायला लागेल हे सांगता येत नाही. आणि मुख्यत्वे दुपारी इथले तापमान लगेच बदलते. आपण चाललोय तो रोहतांग तेवढा सोपा नाही . त्यात भर म्हणून इथल्या छोट्या रस्तावर नेहमी पर्यटकांची गर्दी जमलेली असते. ट्राफिक जाम जर झाला तर तासनतास अडकून पडावे लागते. त्यात आणखी जर कुठे दरड कोसळली तर बसून बोंबलाच.
थोडीशी अद्दल घडावी म्हणून मी त्यांना सोडून एकटाच निघालो, ते तिघेही इथे नवीन होते परंतु ३ तिघे होते त्यामुळे एकमेकांची मदत होईल त्यांना म्हणून मी एकट्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
वाटेत एक पेट्रोल पंपावर टाकी फुल करून घेतली. आणि हळू हळू निघालो, हळू हळू यासाठी कि ३ तिघे जर मागून निघाले कि मला गाठतील, आणि तसाही त्यांच्या गाड्यांचा स्पीड माझ्यापेक्षा जास्तच असणार.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्गाने दोन्ही हाताने केलेली उधळण पाहत निघालो होतो, बहांग, पलचन असे एक एक टप्पे पार करत कोठीपर्यंत पोहोचलो. तिथून खाली रस्ता पहिला तर ते तिघे दुरदुरपर्यंत कुठेच दिसत न्हवते. कोठीपासून अवघड वळणांचा रस्ता सुरु झाला. थंडी बोचू लागली. आणि वरून येणारे JK पासिंगचे ट्रक अडथळे वाटू लागले. सुसाट येणारे त्या ट्रकवाल्यांचा ग्रुप सरळ अंगावर गाडी घालतील का काय असे वाटू लागले. बऱ्याच वेळेला त्यांनी मला रस्त्याचे कडेला अक्षरश दाबले. रस्त्याच्या कडेला खोल दरी आणि केवळ त्यापासून काहीच इंच अंतर ठेवून मला गाडी थांबवावी लागत होती. च्याऐला हे मुद्दाम करत आहेत हे मग समजून आले. एकदा तर एक ट्रकवाला भरदाव उतरताना वळणावर पहिला, मी आधीच माझी गाडी इंचभर जागा ठेवून कडेला लावली , तरी तो ट्रकवाला मुदाम त्याबाजूला जागा ठेवून माझ्या सेडाल ब्यागला जवळ जवळ घासून गेला, आणि त्याच्या मागे असणारा दुसरा ट्रक वाला माझ्या कडे दात दाखवून हसत होता, त्यानेही त्याचीच री ओढली. मग शेवटी डोक फिरलं, याचं काय करायचं अस विचार करत बाजूला गाडी लावली आणि एक सिगारेट शिलगावली. खाली पहिले तर ते तिघेही अजून कुठेच दिसत न्हवते. आयडिया मिळाली. दरवाजाला कडी दोन्ही बाजूने लावता येते.
गाडी सुरु केली आणि आता मी माझे लक्ष आजूबाजूला दिसणाऱ्या सौंदर्याकडे न लावता समोर येणाऱ्या त्या JK पासिंगच्या ट्रकवर ठेवले. हिमाचल पासिंग्चे ट्रक शिस्तीत बाजूने जात होते, परंतु माझ सावज होत JK पासिंग. वरून एक झुंड येताना दिसला, वळणावरून उतरताना जसे माझ्यासमोर आले तसे मी माझी गाडी वाकडी तिकडी रस्त्याच्या मधून चालवायला लागलो. नवशिक्या जसा सायकल चालवताना ढेच्पालतो, वाकडी तिकडी चालवतो, आता पडेल आता पडेल असे वाटायला लागत, अगदी तशीच मी बायिक चालाव्यला लागलो.
बास. समोरच ट्रक थंड. जागच्या जागी थांबायचा, प्रसंगी मला जागा द्यायचा मी तशीच वाकडी तिकडी चालवत ट्रक पार करू लागलो. काही ट्रकवाले मला शिव्या घालू लागले, माझीही थोड्याच वेळापूर्वी शिव्यांची कडकडीत उजळणी झाल्याने अस्सल मराठीत शिव्यांची परतफेड करू लागलो. वाकडी तिकडी गाडी चालवण्याची आयडिया कामी आली.
मढी जवळ पोचलो आणि हळू हळू भीती वाटायला लागली, गाडी चालवताना दरीत पाहताना धडधड वाढायची, गाडीवरचा कंट्रोल निसटायला लागला, थंडी अजून वाढली, वरून येणाऱ्या गाड्या चुकवताना आतमविश्वास कमी झाला,कूच तो गडबड जरूर है.
मढी जवळच्या धरणावर गाडी थांबवली. पाणी प्यायलो, जरा बर वाटलं. विचार करू लागलो, च्यायला कसली भीती वाटतेय? इतक्या वेळेला इथे आलो, पण असं कधीच झाल नाही, आज मी स्वतः गाडी चालवतोय म्हणून भीती वाटतेय का? का हा फरक आहे कार आणि दुचाकीत्ला? का एकटा आहे म्हणून भीती वाटतेय?
थोडावेळ फोटो वेगैरे काढत बसलो , आणि सहज फोनच्या ग्यालारिमध्ये शिवसेनाप्रमुखांचा फोटो दिसला, अर्रेच्या !!!!!
एवढं मोठ प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व जवळ असताना मला भीती वाटतेय? त्यांची एक एक वाक्य कानावर यायला लागली, माझा शिवसैनिक दम खाणारा नाही, तो दम देणारा आहे. संकटांना घाबरू नका तर त्यांच्या छाताडावर बसून त्यांचा मुकाबला करा, अंगातली आग विझून देऊ नका राख होईल बिनकामाची. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव आहे. बास अजून काय पाहिजे होत?
मायला एवढं हट्ट करून एवढ्या जिद्दीने इथपर्यंत आलोय ते का घाबरायला? हि तर अजून सुरुवात सुद्धा नाही आणि घाबरायला काय धाड भरलीये?
मान वरून करून त्या हिमालयाला पाहिलं. अरे असशील तू भव्य दिव्य, असशील खूप मोठा, पण तू मला घाबरवू शकत नाहीस. तू इतका मोठा असलास तरी आतून ठिसूळ आहेस , मातीचा.
आमच्या सह्याद्रीसारखा कणखर कठीण काळ्या दगडासारखा तू नाहीस. तुझ रक्षण करायला किती वेळा आमचा सह्याद्री आलाय माहितीये न?
मी तुला त्रास देत नाहीये, तुला जवळून पाहायला येतोय , उगाच घाबरवू नकोस, समजलं का? मुकाट्याने परवानगी दे.
गाडीवर बसलो आणि एक गोष्ट लक्षात आली, आज इथे जत्रेला आल्यासारखे लोकांची आणि गाड्यांची गर्दी दिसत नाहीये, आज पाऊसही पडत नाहीये. वरच्या बाजूला दूर रोहातान्ग्कडे जाणाऱ्या रस्तायाकडे पहिले तर नेहमी दिसणारी मुंग्यांसारखी गाड्यांची रांग आज दिसत नाहीये.
थोडं वर जाऊन मढी मधल्या धाब्यावर गाडी थांबवली. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथले जागा बरीच रिकामी झाली होती, जवळ जवळ ८०% धाबे इथून हटवले होते. बर झालं.
रोटी राजमा आणि भात आणि शेवटी एक चहा मागवला, १८० रुपयेला फोडणी पडली. चव तीच नेहमीची, बेचव. जिभेच्या परवानगीशिवाय पोटात ढकलले.
थंडी आता खूपच वाढली धुके दाटून आले. धाब्याच्या बाहेर लावलेल्या गाडीची इंडिकेटर चालू करून पुन्हा आत येऊन बसलो. ते तिघे आलेच तर त्यांना माझी गाडी दिसेल हा हेतू. आणि हीच एक जागा आहे जिथे खाण्यापिण्याची थोडी सोय आहे, त्यामुळे ते आलेच तर इकडे नक्की थांबतील पण ते काही आलेच नाहीत.
पुन्हा एक चहा पिऊन निघालो. रस्ता खराबच होता. दगड माती चिखल पाणी आणि बर्फ आणि खड्डे.. मजा वाटत होती चालवताना. धुक्यातून चालवताना तर खूपच गंमत. रस्याच्या कडेची खोल दरी आता दिसेनाशी झाली. धुक्यामुळे दरी आणि खड्ड्यांचा अंदाज घेण कठीण झालं होत, यातच थ्रील वाटत होत.
मढी पासून पुढे गेल्यावर काढलेला हा फोटो. जे पठार दिसतंय ते मढी.
अजून थोडं पुढ गेल्यवर ३ दुचाकी थांबल्या होत्या, जवळून पहिले तर MH13. त्याच्याजवळ गाडी थांबली. २ होंडा हंक आणि एक यामाहा FZ. तो यामाहा वाला गाडीला किक मारत होता. म्हणजे याची गाडी बंद पडली होती. त्यांच्या अवतारावरून हे कुठल्या टायीपचे आहेत ते लक्षात आले थोडे. अडचणीत दिसत होते म्हणून म्हटल चला जरा मदत करूया.
मला अगदी तुच्छ नजरेने न्याहाळत म्हणाले, “अरे हे बघ हा डिस्कवर घेऊन आलाय. का रे गाडी टो करून आणलीस का इथपर्यंत?.” आणि खिदळायला लागले.
“ अमृतसर पासून इथपर्यंत सगळे घाट एवढे समान आणि डबल सीट सकट पार केलेत या गाडीने. थोडी पावर कमी पडते. इतकेच, पण ट्वीन स्पार्क आणि ४ वोल्व असल्याने माझी गाडी बंद नाही पडत जशी तुमची पडलीये.”. तो किक मारणारा हिरो चष्मा सांभाळत माझ्याकडे आणि गाडीकडे पाहू लागला. मी म्हटले का रे तुम्ही दर २ महिन्याने येता का रे इकडे? “ नै ओ आमी पाय्ल्यांदाच आलोय.” . म्हटले “ काय अभ्यास वेगैरे केला होता का असेच आले तोंड वर करून? यामाहा इकडे त्रास देते माहित नाही का तुम्हाला?.” आता मात्र त्यांची हवा टायीट झाली.
इकडे कुठे ग्यारेज वेगैरे आहे का ? म्हटले इकडून ४० किलोमीटर वर रोहतांग पार केल्यावर खाली कोक्सार मध्ये आहे. जा ढकलत.
मग मात्र ते सरकारच्या नावाने शंख करू लागले, कसले भिकारचोट सरकार आहे, रस्त्यात एवढे खड्डे, रस्ता बनवायला येत नाही यांना नुसते पैशे खातात, मोबयीलला नेटवर्क पण नाही ग्यारेज पण नाही जवळ इत्यादी इत्यादी. मनात आले कि पायातले गमबूट काढून डोक्यात हाणावे यांच्या.
उच्चभ्रू कुळातले डोळ्याला चष्मा लावून शाळेत पहिल्या बाकावर बसणारे, शेवटच्या बाकावरील मुलांशी अजिबात संबंध न ठेवणारे, खाऊच्या डब्यात ब्रेड आणि चीज खाणारे, या वयातही साधा रस्ता पार करताना आई वडिलांचा हात धरणारे, मोबायील आणि तत्सम ग्याजेटमध्ये पडीक असणारे, सगळे कसे लगेच अवेलेबल पाहिजे असा हट्ट धरणारे, जग म्हणजे आपल शहर आणि ७०% दुनिया हि खेड्यात वसलेली आहे यांची कल्पना नसलेले, आयुष्यात पहिल्यांदा मतदान करून मधले बोट सेल्फिसाहित सोशल नेट्वर्किंग साईट वर टाकणारे नंतर कदाचित कधी क्वचित मतदान केलेले, सगळ्या गोष्टीला सरकारच कसे जबाबदार आहे हे बोंबलून सांगणारे, आणि स्टडी कम्प्लीट झाल्यावर मी यु एस ला जाणार आहे अस अभिमानाने सांगणारे आणि हा देश माझ्यासाठी कसा योग्य नाही हे पटवून देणारे,, असले हे यो यो ड्यूड टायीपची पोर होती.
चला येतो म्हणन मी गाडीचा सेल्फ चालू केला.
रोहतांगला पोहोचलो बर्फ आणि धुके भरपूर होत, परंतु आज लोकांची गर्दी दिसत न्हवती, एवढं रिकामा रोहतांग मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. ५ मिनिटे थांबलो तिथे. फोटो काढायची इच्छा झाली परंतु हातातले ग्लोस काढायची मुळीच इच्छा न्हवती आणि धुक्यामुळे काही दिसतही न्हवते. तसाच पुढे निघालो. आणि काही अंतर पुढे गेल्यवर लक्षात आले कि रोहतांग आपण पार केलाय. अजिबात काहीच त्रास न देता, ट्राफिक जाम न होता, पाऊस न पडता हाय अल्टीट्युडचा अजिबात त्रास न होता रोहतांग पार झाला होता.
धुक्यातून अचानक लक्ख उन्हात प्रवेश केला, इथून खाली उतार होता, आणि डोळ्यासमोरचा तो नजारा वा वा. रस्ता चांगला होता. परंतु थोडं पुढ गेल्यावर खराब रस्ता सुरु झाला. उतारही तीव्र होता,आणि त्यात मरणाची धूळ, उतारावर खड्डे असल्याने गाडी जपून चालवावी लागत होती, पुढचा ब्रेक दाबून दाबून माझ उजवे फोराम्स सुजून कडक झाले होते. वेळ मावळतीला आल्याने आपण जीस्पा पर्यंत पोहोचणार नाही याची खात्री पटली. निदान केलोंग पर्यंत तरी पोहोचुया असे ठरविले, कारण रात्री मला गाडी चालवायची न्हवती, इथले सुंदर नजारे मला अंधारात गाडी चालवून दिसणारे न्हवते.गाडीचा स्पीड वाढवला. आता झाडे दिसू लागली. तंडीजवळ पोहोचण्याआधी रस्ता खूपच कठीण होता. चाळणीने माती चाळावी इतकी मऊ आणि बारीक मातीचा तो रस्ता होता. गाडी इकडून तिकडे सरकायची. तंडी पंपावर पोहोचलो, म्हटले टाकी फुल कर, तर त्याने फक्त ९० रुपयाचे पेट्रोल भरले. मी म्हटले अरे फुल कर बाबा. तर तो म्हणाला साबजी टाकी पेह्लेसे फुल है!!!!!!
मनालीला पेट्रोल भरले होते, एवढं घाट चढून 110 किमीसाठी फक्त ९० रुपयाचे पेट्रोल लागले? तरी जबरदस्तीने अजून १० रुपयाचे भरले. बजाज जिंदाबाद.
रोहतांग पार केल्यानंतर.
रोहतांग पार केल्यानंतर. जे धुकं दिसतंय तिथून गाडी येतेय, ते रोहतांग.
रोहतांग पार केल्यानंतर उताराचा खराब रस्ता.
कोकसर गावाजवळ.
कोकसर गावाजवळ.
तंडी पासून ३६५ किमीपर्यंत पेट्रोल पंप नाही. केलोनग्ला पोहोच्ल्यावर मुख्य्रास्त्यावर राहण्याची व्यवस्था शोधू लागलो. एकाने ५०० रुपये सांगितले. म्हटले नको. पुढे एकाने ३०० रुपये सांगितले, घर पहिल्या माळ्यावर आहे. म्हटले चालेल. तो म्हणाला टीवी वेगैरे नाही. म्हटल अरे टीवी पाहायला नाही आलो मी. गरम पाणी मिळेल न? तो म्हटला हो. चल तर मग. सामान घेऊन पहिला माळा चढलो, तो पर्यंत अंधार पडला होता, आणि जाणवले कि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलाय. सर्दीमुळे हैराण झालो होतो, आज परत डॉक्टरकडे जायला विसरलो. सर्दी जमा होऊन नाकाच्या वरच्या भागात साठून राहायची आणि थंडीमुळे ती घट्ट सुकायची, नाक साफ करताना प्रचंड रक्तस्त्राव, बेसिन आणि आसपासची भिंत आणि शर्ट रक्ताने लाल व्हायचं.
तंडीच्या आधी मऊ मातीचा रस्ता.
तंडीच्या आधी मऊ मातीचा रस्ता.
तंडीचा पेट्रोल पंप.
आता त्या तिघांबद्दल विचार करत बसलो. कुठे असतील? निघाले असतील का ? का मध्ये कुठे अडकले ? मला जस सुखरूप जाऊन दिले त्या रोहतांग ने तसेच त्यांनाही सोडले असेल का? त्या रोहातान्गचा काही भरवसा नाही, चांगला अनुभव आहे त्याचा.
माझ्या फोनला नेटवर्क न्हवते, आणि जवळ पास कुठे सार्वजनिक फोन सुद्धा न्हवता. मुंबईवरून येताना आम्ही जुलीच्या फोनला BSNL बिलिंग रुपांतरीत केले होते. त्यामुळे केलोंग आणि लेह मध्ये त्याला नेटवर्क मिळणार होते. पण संपर्क करायचा कसा? आणि कुठून? शेवटी माझी अडचण मी त्या हॉटेल मालकाला सांगितली तर त्याने माझ्या कडून ५० रुपये घेऊन गेला. थोड्या वेळाने परत आला आणि माझ्या हातात त्याचा मोबयील दिला म्हटला “ इसमे मैने ५० रुपये का रेचार्ज किया है, आप इस्तीमाल करो. ये BSNL है. लेकीन जब मेरी बिवी को फोन आयेगा तो मुझे आवाज देना मी नीचे दुकान मै हु.”
त्या मोबायील्वरून फोन करून पहिले. पण व्यर्थ. जुलीचा फोन लागत न्हवता. मग मी त्याच्या फोनवर म्यासेज करून ठेवला कि, मी या हॉटेल वर आहे. या ठिकाणी.
भूक लागली म्हणून खाली एक टपरीवजा हॉटेलात गेलो, खाण्यासाठी जास्त पर्याय न्हावतेच, तेव्हा रोटी, आलू कि सब्जी आणि चावल, राजमा ऑर्डर केली ६० रुपयांची.. सहज आजूबाजूला लोकांचे निरीक्षण करत होता तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली कि, इथे लोक एकमेकांशी बोलत आहेत, कोणीही फोनमध्ये व्हात्साप, फेसबुक यामध्ये डोक घालून बसला न्हवता. चौकशी केली कि इकडे फोनमध्ये इंतार्नेत मिळते का? ते म्हणाले हो मिळते.
जेवण अर्थातच बेचव. अर्धे खालले बाकीचे पोटात जायला तयार न्हवते. तसेच ठेवले. पैसे द्यायला गेलो तर तिने ४५ रुपये घेतलं. मी म्हटले आपने तो ६० रुपये बोला था?
“ हा ६० रुपये बोला, लेकीन आपने पुरा खाना नाही खाया. आधा राख दिया इसलिये १५ रुपया काम लिया.. “
जेवण करून बेडवर चादर घेऊन झोपी गेलो. थोड्या वेळाने मराठीत शिव्या ऐकू येऊ लागल्या, मला आधी वाटले कि मी स्वप्न बघतोय, नंतर परत मराठी शब्द ऐकू येऊ लागले, मी उठून खिडकीतून खाली पहिले तर जुली, बाबा चमत्कार आणि जेम्स गाड्या लावून आजूबाजूला काहीतरी चौकशी करीत होते, मी वरूनच आवाज दिला, “ अरे ये भडव्यांनो...” त्यांनी वर पहिले आणि पुन्हा शिव्याची उजळणी सुरु. मग त्यांनी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या , विटांचे काही तुकडे नेम लावून वर फेकले. मी त्वरित बाजूला होऊन सर्व चुकवले.
मग काय परत आम्ही ४ जण झालो. “ अरे काय घंट्याचा रोहतांग? काय एवढं घाबरवून ठेवलं होतास आम्हाला, आम्ही तर मस्त एन्जोय करत आलो. साला काही एक्सायटिंग झालाच नाय. जिंदगी झंडच आहे साला आपली.” जेम्स बरळत होता आणि बाकी सगळे त्याला होकार देत होते. मनात म्हटले खूप सुखी आहात तुम्ही अगदी नशिबवान. जे तुम्ही एवढे सुखरूप आलात ते.
चला आता परत जेवायला. जेवायला यांनी एक बर्यापैकि बार हुडकून काढला. मग काय परत बाटल्या हजर. आजही २ वाजल्या शिवाय हे झोपणार नाहीत हे नक्की. म्हणजे अजून ५ तास यांची मैफिल रंगणार होती. मी समजावून एवढं यांना एकट सोडून आलो तरी यांना काही फरक पडला न्हवता. उगाच आपण बोलून वायीट होण्यापेक्षा आपण देखील यांच्यात सामील होऊ असा विचार करून ग्लास उचलला. आमचा रुममालक देखील तिथे येऊन बसला. खूप आग्रह करून देखील त्याने खाण्यापिण्याला हाथ लावला नाही. गप्पा मारीत बसला. तेवढ्यात लायीट गेली मग काय यांना अजून उत आला. आजूबाजूला बर्फाचे डोगर, हा रुफ टोप बार, वर मोकळे आकाश, चांदण्या, आपण चौघे, घरापासून एवढ्या दूर, मरणाची थंडी, गेलेली लायीट, आणि मेणबत्ती लावून समोर दारू.
पी पप्या, पी तू.
दिवस आठवा
आजचा प्रवास केलोंग ते सारचू. १०८ किमी.
९ वाजता उठलो. अंघोळ करून नाश्ता करायला खाली निघालो तर दुसऱ्या रूम मधून जेम्सही बाहेर आला तोहि अंघोळ करून !! दोघेही नाश्ता करून वर आलो तर बाकीचे दोघे अजून झोपलेले. त्यांना उठवले आणि अंघोळ करून सोबत आणलेला नाश्ता खाऊ घातला. मग समान खाली नेऊन गाडीला बांधायची गडबड. १५ मिनिटात माझ्या गाडीला समान बांधून झाले. यांची अजून खटपट चालूच होती. निवांतपणे एक गोठ्यात जाऊन शेळ्यांशी खेळत बसलो. पुन्हा निघायला १२.३० झाले दुपारचे. मी आज आजीबात कोणावर रागावलो नाही. हॉटेलवाल्याने ३५ रुपये कमी घेतले, का तर काल जे ५० रुपयांचे रिचार्ज करायला त्याने माझ्याकडून पैशे घेतले, आणि त्या मोबायीलमध्ये ३५ रुपये बाकी होते म्हणून.
आमचा हॉटेल मालक.मागे दारूच्या दुकानावर आमच्या खोल्या होत्या.
आज मस्त उन पडले होते, रस्ता बर्यापैकी होता, त्या घाटातून गाडी चालवताना खूप मज्जा येत होती. क्वचितच एखाद्या गाडीशी गाठभेट होई. बाकी रस्ता रिकामा. एक गाडी जुली, आणि दुसरी गाडी बाबा चालवत होता. जेम्स त्याच्या मागे बसलेला. मी अगदी रमत गमत गाडी चालवत होतो तर बाकी हे दोघे गाडी पळव गाडी पळव म्हणून खूण करत होते. मी म्हटले तुम्ही पळवा, माझी डिस्कवर १२५ cc आणि तुमची २२० अवेंजर, तुलना नाही होऊ शकत. ते मला ओवरटेक करून पुढे गेले. मला उगाच गाडी पळवून आजूबाजूला दिसणारे निसर्ग सौंदर्य मिस करायचे न्हवते. जेवढी जास्त गाडी पळवणार तेवढ्या जलद डोंगर दऱ्या डोळ्यांच्या आड होणार.
केलोन्गच्या पुढे आल्यावर
थोड्या पुढे आलाय्वर यांच्या गाड्या थांबलेल्या दिसल्या, मी थांबवून पहिले तर हे सगळे एक नदीपात्रात शिरले होते फोटो काढायला. प्रवासाला सुरुवात करून फक्त पाऊण तास झाला होता. तब्बल सव्वा तास फोटोग्राफी करून हे वर आले. म्हटले निघायचे का.? हो चल निघूया.
नदीजवळ मीपण थोडी हिरोगिरी करून घेतली.
मजल दरमजल करीत विशाल ताल जवळ पोहोचलो. निळ्याशार पाण्याचे तळ. क्याप्टन विशाल याचा BRO सोबत काम करताना अपघाती मृत्यू झाल्याने या तळ्याला विशालचे नाव दिले.
गाडी बाजूला लावून उतरत असतानाच जबरदस्त दम लागला. ४ पावले चालणे देखील कठीण झाले होते. प्रचंड दोखेदुखी जाणवायला लागली. शरीर मरतुकड्या सारखे झाले होते. जरावेळ तळ्याकडे तोंड करून बसलो, शेवटी ती दायमोक्स नावाची गोळी खाण्याची वेळ आली होती. हाय altitude सिकनेस ची गोळी. खाऊन थोडा वेळ सगळे पडले होते. फोटो काढणे आणि डोळे उघडणे सुद्धा जीवावर आले होते. कसे बसे जाऊन गाडीवर बसलो आणि पुढल्या प्रवासाला निघालो. प्रत्येक ५ किमी नंतर निसर्गाचे एक वेगळेच रूप दिसत होते. किती डोळ्यात साठवू आणि किती क्यामेरात असे झाले होते. परंतु खर सांगतो गाडीवरून खाली उतरतानाच एवढं दम लागत होता. हातातून ग्लोस काढायची सुद्धा तयारी न्हवती आमची एवढी प्रचंड थंडी. मधेच रस्त्यात लागणारे ओढे आणि त्यातून गाडी काढण्याची कसरत. दुर्दैवाने आज कोणीच गमबूट न घालता सपोर्ट शुस घातले होते. परंतु आतापर्यंत तरी ओढ्यातून गाडी काढताना कोणचे पाय भिजले न्हवते. एकदा का पाण्यात गाडी घातली कि पाय गार्डवर ठेवून अजिबात पाण्याचा स्पर्श न होता गाडी पलीकडे काढत होतो. दुर्दैव का हे पुढे सांगतो.
विशाल तालजवळ हि दिलेली पोज न्हावे,आमची झालेली अवस्था आहे.
आता पुन्हा थोड्या वेळात अंधार पडणार हे दिसत होते, त्याधी आम्हाला सरचुला पोहोचणे गरजेचे होते. सारचू बद्दल आम्ही बरेच ऐकले आणि वाचले होते. या मोहिमेत बरेच जण सारचू या ठिकाणी स्वर्गवासी झाले आहेत. प्रचंड थंडी, जोराचा वारा, ऑक्सिजन जवळ जवळच काय दूर दूर पर्यंतही कुठे नाही. सारचू हे समुद्रसपाटीपासून १४००० फुटांवर म्हणजेच ४२०० मीटरच्या वर आहे. हे केवळ ३ महिन्याचं गाव. इथे पक्कं बांधकाम कुठेहि नाही ९ महिने प्रचंड बर्फ, केवळ उन्हाळ्यात ३ महिने इथे लडाखी लोक तंबू बांधतात आमच्या सारख्या पर्यटकांसाठी. तेच हॉटेल आणि तेच धाबा. इथूनच काश्मीरची सीमा सुरु होते. आर्मीचा एक तळ इथे आहे. फक्त तिथेच डॉक्टर उपलब्ध. सारचू जसे जवळ येऊ लागले तसे चांगला रस्ता दिसू लागला. अगदी सपाट मैदान. मग काय पळवल्या गाड्या. आता अंधार पडला. परंतु सारचू काही आले नाही.
इकडे आमच्या हृदयात धडधड वाढली. मैलोन मैल इथे माणूस आणि दुसरा जिवंत प्राणी आम्हाला दिसला नाही. एक बोर्डवर सारचू २ किमीचा उल्लेख वाचला. जीवात जोव आला.
सरचुच्या आधी.
हौसला वाढवणारे दृश्य.
सारचूच्या आधी एक लहान नदी लागते, आणि त्याआधी रस्त्यात एक ओढा लागतो, डाव्या हाताला खाली नदी आणि उजव्या हाताला डोंगर आणि त्यावरून खाली येणारे पाणी. त्यात प्रचंड खड्डे. आणि १०० किलोचे दगड. तो ओढ पार करताना माझ्याकडून एक चूक झाली. बाकी सगळे चिखलातून पाण्यातून गेले, परंतु मी थोड्या उंच भागातून गाडी काढण्याचा प्रयत्न केला, जिथे पाणी कमी होते, आणि गाडी अडकली, आणि माझा तोल गेला तो डावीकडे. जिथे उतार होता. माझे पाय जमिनीवर पोहोचलेच नाहीत आणि गाडीसकट खाली कालांडलो. गुडघाभर पाण्यात पाय टेकले आणि सामानासकट गाडी अंगावर. ती तशीच दोन्ही हातानी पकडून ठेवली. आयच्या गावात खाली बर्फाचे पाणी, वर मरणाची थंडी, पायात स्पोर्ट शुस, आणि अंगावर सामानासकट भरलेली गाडी ती माझ्यापेक्षा गुढघाभर उंचावर होती. माझाही इथेच स्वर्गवास होनार याची खात्री पटली. मला हलताही येत न्हवते, आणि श्वास घेताही येत न्हवता, थंडी सोसतही न्हवती. दुसरी आणखीन एक आव्हान असे होते कि मला माझ्या गाडीची स्याडल ब्याग भिजून द्यायची न्हवती, आणि मागच्या सीटवर बांधलेली ब्यागही खाली पडून द्यायची न्हवती. मी ती गाडी अधांतरीच पकडून ठेवली होती. तशीच एका हाताने होर्न वाजवायचा प्रयत्न केला, बाकीचे पुढच्या वळणावर पोहोचले होते, समोर एक ट्रक अगदी ५ फुटांवर येऊन थांबला, त्यानेही घाई केली नाही अगदी इंजिन बंद करून हेड लायीट लावून बसला. असल्या थंडीत खाली पाण्यात उतरण्याची त्याची हिम्मत झालीच नसेल. अर्थातच त्याच्या पायात गमबूट नसतील, कारण गमबूट घालून तो ट्रक चालवू शकत नाही आणि तशी त्याला कधी गरज पडली नसेल.
गाडीचा आवाज ऐकून जेम्स पळत यायला लागला, तो उतारावर होता आणि मी चढावर, म्हटले अरे पळू नकोस चालत ये दम लागेल. तो तसाच पाण्यातून पळत मला मदत करायला माझ्यापर्यंत पोहोचला. आणि ढेपाळला. झाला आता त्यालाच मला मदत करायची वेळ आली होती. साधारण ३- ४ मिनिटे दोघे तशेच पाण्यात बसून होतो, मग दोघांनीही श्वास एकत्र करून गाडी उचलली, आणि अगदी सरायीतपणे गाडी त्या पाण्यातून बाहेर काढली, आता मी अर्धा भिजलो होतो आणि जेम्सही. गुढघ्याच्या खाली मला काहीच संवेदना जाणवत न्हावत्या, चेक पोस्ट पाशी गाडी थांबवून मी खाली उतरलो आणि जरा पायाची हालचाल केली, थोडा व्यायाम केला, २-४ उठबाश्या काढल्या, माझे पाय मला परत मिळाले.
नाल्यात पडल्याचा प्रातिनिधिक फोटो.
चेकपोस्टपाशी प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे एक तंबू राहण्यासाठी मिळवला. त्याने २००० मागितले असते तरी आम्ही दिले असते अशी परिस्थिती होती. तंबूच्या आतमध्ये शिरल्यावर जरा उबदार वाटले. आतमध्ये ४ खाटा, आणि एक छोटासा LED बल्ब टांगला होता, त्या बल्बला जनरेटर मधून वीज मिळत होती, विजेच्या तर तिकडे न्हाव्त्याच.
ओले कपडे बदलून आम्ही जेवायला म्हणून त्या धाब्यावर गेलो बाजूलाच. जेवण येपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो, थोड्या वेळाने डोके दुखायला लागले, श्वास घेताना त्रास तर होताच होता, हळूहळू मेंदू काम करेनासा होत होता, आपण कोण कशाला आलोय इथे, सगळ विसरायला व्हायला लागलं, जेम्सची हलत खराब झाली. इतक्यात त्या धाबावाल्याने गाणी लावून नाचायला सुरुवात केली, त्याने आम्हालाही ठेका धरायला लावला, हिमाचली नृत्य करून दाखव म्हणून त्याने मला गळ घातली, २ स्टेप्स मधेच माझी हवा ठुस झाली. तो मात्र मजेत नाचत होता.
जेवण झाल्यावर झोपण्यासाठी गेलो, आणि सगळ्यांना सूचना दिल्या , कितीही थंडी वाजली तरी तोंडावर पांघरूण घेऊन झोपू नका, झोपेतच जाल वरती. धाबावाल्याने देखील तीच सूचना केली.
ऑक्सिजनच्या बाटल्या काढल्या आणि त्याचा डेमो घेऊन उशाजवळ ठेवून देवाला प्रार्थना केली, आम्हाला जिवंत ठेव. हृदयाच्या ठोक्यांचा आवाज कानापर्यंत येत होता.
बराच वेळ झोपण्याचा प्रयत्न केला पण कोणालाच झोप येत न्हवती. खूप वेळाने डोळा लागला.
रात्री कधीतरी जाग आली ती श्वास गुदमरल्याने, उठून बसलो, अक्षरशः श्वास खेचून घेत होतो, तसाच अंधारात ऑक्सिजनची बाटली शोधू लागलो, तर ती गायब होती, आजूबाजूला पहिले तर सगळे जागे होते, कोणीच झोपले न्हवते, नंतर जेम्सने हळूच त्याच्या उशाखालुन काढून दिली, ऑक्सिजन नाकाला लावले, थोडं बर वाटलं. लघुशंकेसाठी बाहेर जायला निघालो आणि दरवाजा उघडला तसा थंडगार वारयाचा झोत अंगावर आला. असहनीय.
कसाबसा बाहेर गेलो आणि वर आकाशाकडे पहिले, तर आकाश रंगीबेरंगी झाले होते, माझ्या अक्ख्या आयुष्यात एवढे सुंदर आकाश तेही रात्री मी कधीच पहिले न्हवते. नक्की काय होते?
आकाशाकडे बघत रहावेसे वाटत होते, परंतु थंडी सहन होत न्हवती म्हणून पळत आतमध्ये आलो. पुन्हा झोपलो.
रात्री मी पाहिलेल्या आकाशाचा फोटो आंतरजालावरून.
सकाळी ८च्या सुमारास उठलो, आपण जिवंत आहोत याचा आम्हाला आनंद झाला होता, देवाचे उपकार मानले.
प्रवासादरम्यान काढलेले काही फोटो खाली.
दीपक तालजवळ जेवण,जुली आणि मी.
जेम्स.
दीपक ताल
नुसत नाव जिंग जिंग बर. बाकी इथे काहीच नाही.
प्रतिक्रिया
5 Mar 2016 - 4:38 pm | बाबा योगिराज
फोटोचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. एकही फोटो दिसत नाहीये.
5 Mar 2016 - 5:27 pm | सतिश पाटील
बाकी कुणालाच दिसना का काय?
द्रोपबोक्स मधून चिकटवले होते.
5 Mar 2016 - 5:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ड्रॉपबॉक्सचा अॅक्सेस पब्लिक करा.
5 Mar 2016 - 6:03 pm | एस
फोटो दिसले असते तर अजून खुमारी आली असती. वर्णन छान आहे.
5 Mar 2016 - 7:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ड्रॉपबॉक्सच्या सेटिंग बदललेल्या आहेत. कृपया आपल्या इमेलचा पासवर्ड बदला आणि परत कोणालाही देउ नका. आता फोटो दिसायला लागलेले आहेत.
चुकुन गुगल सर्च इंजिन पेज ला गेलो तर तुमच्या इमेल अॅड्रेसने लॉग इन झालेलं होतं. कृपया पासवर्ड बदललात की बदलल्याचा एक मेसेज मला करुन ठेवा.
7 Mar 2016 - 11:17 am | सतिश पाटील
धन्यवाद क्याप्टन साहेब.
5 Mar 2016 - 7:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तो तंबु आणि तार्यांचा फोटो जब्राट आलाय.
7 Mar 2016 - 11:18 am | सतिश पाटील
तो फोटो आंतरजालावरून घेतलाय.
6 Mar 2016 - 1:40 am | बाबा योगिराज
इसको क्या अर्थ है?
मले अजून बी काईच दिसना.
6 Mar 2016 - 9:31 am | प्रचेतस
गणेशा.
6 Mar 2016 - 4:59 pm | त्रिवेणी
माझापण गणेशा झालाय.
7 Mar 2016 - 11:29 am | राजकुमार१२३४५६
पाटील साहेब फोटो अजून दिसत नाहीत. काही तरी करा. पिकासा वापरा एकदम सोपे आहे. खालील लिक्स वर जा....
http://picasaweb.google.com/
7 Mar 2016 - 1:26 pm | सतिश पाटील
आता बगा बर दिसत्यात का?
7 Mar 2016 - 2:13 pm | बाबा योगिराज
जमळं,
जमळं.
मस्त आहेत रे फोटो.
7 Mar 2016 - 2:14 pm | वेदांत
छान आहेत प्रचि .
7 Mar 2016 - 2:25 pm | सतिश पाटील
धन्यवाद , क्याप्टन ज्याक , नीलकांत,आणि राजकुमार.
7 Mar 2016 - 2:27 pm | जगप्रवासी
एकदम मस्त मजा आली सतीश भाऊ वाचायला
7 Mar 2016 - 2:43 pm | पियुशा
खुपच आवड्ले सगळे फोटो , लेखन शैली पण छान आहे :)
8 Mar 2016 - 4:22 pm | असंका
जब्बरदस्त फोटो वर्णन सगळंच!!
10 Mar 2016 - 10:57 am | सतिश पाटील
धन्यवाद