Skip to main content

शोध उत्तरांचा : आपण सारे गुलाम आहोत का?

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 22/02/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सारे गुलाम आहोत का? हा धागा वाचला आणि लक्षात आलं की यातील काही प्रश्न मलाही सतावत असतात. गेले काही वर्ष मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. ही उत्तरे शोधताना मी जमेल तितके वाचले. त्यावर विचार केला. आणि आपल्याला थोडं फार कळत आहे असं वाटू लागले. त्याआधारे मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. जिथे माझे आकलन चुकीचे असेल तिथे नक्की सुधारणा सुचवा.
आपण सारे गुलाम आहोत का?
आपण या प्रश्नाला मुख्य प्रश्न समजू या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय मानता यावर अवलंबून आहे. तुम्ही काय मानता हे तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला तुमच्या आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच (ज्याला आपण नेहमीच्या भाषेत पिंड म्हणू शकतो) आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती यावर अवलंबून आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे देता येत नाही. ते हो, नाही, काही प्रमाणात हो आणि काही प्रमाणात नाही यापैकी काहीही असू शकते. शिवाय हे प्रमाणही व्यक्तीगणिक वेगळे असू शकते.
1. "All men are created equal" has been called an "immortal declaration," and "perhaps [the] single phrase" of the American Revolutionary period with the greatest "continuing importance". अमेरिकन राज्यघटना हे उच्चरवाने सांगते ...
असं अमेरीकेच्या घटनाकारांचं मानणं आहे. हे एक प्रकारचे तत्वज्ञान आहे. मानवी मन (खरं तर मानवी मेंदू) उत्क्रांत होत असताना ज्या नैतिकतेच्या कल्पना तयार होत गेल्या त्या कल्पना अंमलात आणण्यासाठी, समाज गुण्यागोविंदाने नांदावा म्हणून हे असं "मानण्यात" आलं. हेच कुठल्याही लोकशाही देशाच्या घटनेला लागू होईल. किंबहूना हुकुमशाही असलेल्या देशांमध्ये नागरीकांसाठी जी काही नियमावली असेल त्यातही असे काही तरी "मानलेले" असेल आणि त्या देशाच्या नागरीकांना ते बंधनकारक असेल.
2. असे असताना आज जगात जे चित्र दिसते त्यानुसार आपण सर्वजण पैशाचे व पर्यायाने पैसेवाल्यांचे गुलाम आहोत .
"आपण सारे गुलाम आहोत का?" या मुख्य प्रश्नाचे उत्तर इथेही लागू होते. "नाही" या उत्तराचा विचार करता पैशाची गुलामगिरी झिडकारून जंगलात झोपडी बांधून नैसर्गिक अन्नावर जिवंत राहण्याचा पर्याय आपल्या प्रत्येकाकडे आहे. मात्र ते आदिमानवाचं जगणं होईल. किंबहूना आपला उत्क्रांत मेंदू आपल्याला ते पाऊल उचलूच देणार नाही. तसे नसते तर कुंभमेळ्याला आलेल्या साधूंकडे मोबाईल आणि लॅपटॉप दिसले नसते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर खुपच कमी लोक "नाही" असे देतील. हो आणि नाही च्या मधले बरेच जण असतील. पुण्यात पाच खोल्याच्या घराच्या कर्जाचे हप्ते भरणारी मंडळी या प्रश्नाचे उत्तर "हो" असे देतील.
3. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला या पृथ्वीतलावर जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते .
ही काळाच्या ओघात उत्क्रांत झालेल्या मानवी मेंदूची करामत आहे. एका प्रतिसादात डॉ. सुहास म्हात्रे म्हणाले होते की "उत्क्रांत मेंदू" हा माणूस या प्राण्याचा आजार आहे. ते तंतोतंत पटते. प्राण्यांचा मेंदू तीन टप्प्यात प्रगत होत गेला. १. रेप्टीलियन ब्रेन - सरपटणार्‍या प्राण्यांचा मेंदू २. लिम्बिक ब्रेन - निसर्गाने सस्तन प्राण्यांच्या मेंदूला रेप्टीलियन ब्रेनच्या वर अजून एक थर दिला तो हा लिम्बिक ब्रेन. या भागामुळे सस्तन प्राणि सरपटणार्‍या प्राण्यांपेक्षा "प्रगत" झाले. ३. निओ कॉर्टेक्स - हा मेंदुच्या सर्वात वरचा थर जो फक्त माणसाकडे आहे. आपलं माणूसपण ही या निओ कॉर्टेक्सची करामत आहे. त्याचबरोबर आपले माणूस म्हणून असलेले प्रश्नही याच निओ कॉर्टेक्समुळे आहेत. अन्नासाठी दाही दिशा भटकणार्‍या मानवाला योगायोगाने शेतीचा शोध लागला. मुबलक पीक येऊ लागल्याने अन्नाची ददात मिटली. स्वतःची अन्नाची गरज भागवून झाल्यानंतर धान्य उरू लागल्याने हे धान्य इतरांना देता येऊ लागले. त्यामुळे काही लोक शेती न करता ईतर गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. यातून उद्योगधंदे विकसित झाले. एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी बलुतेदारी पद्धत अस्तित्वात आली. पुढे काळाच्या ओघात "श्रमाच्या बदल्यात श्रम" ही संकल्पना नष्ट होऊन "पैसे" नावाच्या गोष्टीचा माणसाने शोध लावला. आणि ओघानेच पैसा असेल तरच माणसाला सेवा "विकत" मिळू लागल्या. अन्नासाठी दाही दिशा भटकणार्‍या माणसाला तंत्रज्ञानाच्या एकविसाव्या शतकात आणून सोडले ते त्याच्या मेंदूच्या सर्वात वरच्या थराने. अर्थात निओ कॉर्टेक्सने. इतर प्राण्यांमध्ये ही निओ कॉर्टेक्सची भानगड नाही. नाही म्हणायला कपी वर्गाच्या ईतर प्राण्यांमध्ये अतिशय प्राथमिक स्वरूपाचा निओ कॉर्टेक्स असतो. तो मानवाईतका प्रगत नसल्याने ते माणसांच्या भानगडीतून सुटले.
4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल 5. म्हणजेच पुरुष अथवा मनुष्यप्राणी आपल्या हार्मोनिक (लैंगिक )गरजा भागवण्यासाठी देखील अनावधानाने विरुद्धलिंगी व्यक्तीचे म्हणजेच पर्यायाने पैशाचे लांगूलचालन अथवा गुलामी करतो .
अशी काही उदाहरणे आपल्या पाहण्यात येत असली तरीही हे सरसकट म्हणता येत नाही. प्रेमापोटी आपल्या सधन, उच्च सामाजिक स्तर असलेल्या आई वडीलांच्या विरोधाला न जुमानता आपल्यापेक्षा कनिष्ठ आर्थिक आणि सामाजिक स्तर असलेल्या तरूणाबरोबर लग्न करणार्‍या मुली आपण आजूबाजूला पाहतो. सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. आपण बालपन - पौगंडावस्था - तारुण्य अशा अवस्थांमधून जात असताना आपल्या मनात आपल्या जोडीदाराची प्रतिमा हळूहळू आकार घेत असते. इथेही पुन्हा आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती हे प्रभावी घटक ठरतात. या प्रतिमेशी थोडी फार मिळती जुळती व्यक्ती संपर्कात आली की माणूस "प्रेमात पडतो". मेंदूतील डोपॅमाईन आपले काम सुरु करतो. दिवस रात्र तिच्याशिवाय/त्याच्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे पैसा हा एकमेव घटक जोडीदार निवडताना नक्कीच नसतो.
6. ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे .
अध्यात्म कळायला खुप सोपं आहे. आचरणात आणणे महाकठीण. वेदकाळापासून ते आजतागायत प्रत्येक चौकस व्यक्ती आपल्या अस्तित्वाविषयीच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. "मी कोण आहे?" "मी कशासाठी जन्माला आलो?" हे आणि असेच ईतर प्रश्न भुंग्याप्रमाणे माणसाचा मेंदू पोखरत आहेत. काही जण "मी कोण आहे?" या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहचले. माणूस आपल्या शरीराबद्दल, त्याच्या अवयवांबद्दल उल्लेख करताना "माझे शरीर, माझे हात, माझे पाय" असा करतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराहून वेगळे आहोत ही जाणिव माणसाला झाली. मी म्हणजे माझे शरीर नाही तर मग मी कोण? शारीरीक वेदनांच्या पलीकडेही दु:ख म्हणून काहीतरी आहे. माझ्या शरीराला वेदना होतात आणि मी दु:खी होतो. म्हणजेच मी माझ्या शरीराहून वेगळा आहे. हा जो मी आहे तो "स्व". तेच "अस्तित्व". दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत माणसाचे एकंदरीत निसर्गनियमांचे आकलन मर्यादीत होते. त्याला कळत नव्हते हा सभोवतालचा निसर्ग, पशू, पक्षी आणि तो स्वतः कसा तयार झाला. दिवसा प्रकाश देणारा सूर्य नामक आगीचा गोळा, रात्री शीतल प्रकाश देणारा चंद्र, ढगांचा गडगडाट, विजांचे चमकणे, पाऊस पडणे हे सारे त्याच्या डोक्याच्या वर असणार्‍या "आकाशात" घडत होते. त्यामुळे त्या विशाल आकाशात हे सर्व घडवणारी कुणीतरी शक्ती राहत असावी असा त्याचा ग्रह झाला. आपल्या अस्तित्वाला माणसाने "आत्मा" असे नाव देऊन आकाशातील शक्तीला "परमात्मा" असे नाव दिले. आत्म्याची परमात्म्याशी सांगड घातली. आता आपण विसाव्या शतकात येऊ या. माणसाने मेंदूत कोणत्याही प्रकारचे उपकरण किंवा हत्यार न खुपसता मेंदूत घडणार्‍या हालचाली पाहण्याचे तंत्र (noninvasive imaging techniques) विकसित केले. माणसाचे मन हा त्याच्या मेंदूने शरीरांतर्गत तसेच बाह्य उत्तेजक संवेदनांना (stimuli) दिलेला प्रतिसाद आहे हे त्याच्या लक्षात आले. किंबहूना माणसाची सारी सुख दु:खं हा त्याच्या मेंदूतील चेताप्रक्षेपकांचा कल्लोळ आहे हे कळू लागले. अगदी कालपरवापर्यंत माणूस ज्याला "स्व" किंवा "अस्तित्व" म्हणत होता तीसुद्धा मेंदूचीच करामत असावी असा कयास त्याने बांधला. आजही या जाणीवेचे मेंदूतील स्थान किंवा जाणीव (consciousness) मेंदूत कशी तयार होते यावर संशोधन चालू आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. जियुलिओ टोनोनी (Giulio Tononi) यांनी जाणीवेसंदर्भात "एकत्रित माहिती सिद्धांत" (Integrated Information Theory) मांडला. मेंदूच्या विविध भागातून माहिती एकत्र येऊन त्याची सलग अशी जाणिव तयार होते अशा अर्थाचा तो सिद्धांत आहे. यात "स्व" ची जाणीवही आलीच. अर्थात हा सिद्धांत विज्ञान जगताने स्विकारलेला नसून यावर अधिक संशोधन चालू आहे. ही सारी माहिती घेतल्यानंतर आपण पुन्हा आपल्या "ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे" या मुळ मुद्दयाकडे वळू या. आज होमो सेपियन्स हा प्राणी काळाच्या अशा टप्प्यावर उभा आहे की जिथे पैसा नसेल तर त्याचे आयुष्य भयावह बनेल. जगण्यासाठी माफक प्रमाणात का होईना, पण पैसा हवाच. पैशाची सर्वथा गुलामगिरी नको असेल तर माणसाला पुन्हा एकदा आदि मानवाची जीवनशैली अंगिकारावी लागेल. Materialistic problems need materialistic solutions. नुसती "स्व"ची जाणीव झाल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी माफक प्रमाणात का होईना पैशाची गुलामगिरी स्विकारावी लागेल किंवा आदिमानवासारखे जंगलात जाऊन कंदमुळं, फळं खावी लागतील. पशू मारावे लागतील. (अर्थात हे ही स्वातंत्र्य नाहीच. जंगल कुणाच्या तरी मालकीचे असू शकते. पशू हत्येस कायद्याने बंदी असू शकते) थोडक्यात, तुमच्या-माझ्यासारख्याला पैशाची गुलामगिरी चुकणार नाही. मात्र आपण "स्व"ची जाणीव तेवत ठेवून ती गुलामगिरी कितपत पत्करायची यावर नियंत्रण ठेवू शकतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12396
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

किती हा यमकांचा सोस =))
ते यमकांचे गुलाम असावेत बहुधा ! (पण यमक न वापरता लिहिलेले त्यांचे भावविश्व मात्र खरेच सुरेख आहे ह्यात शंका नाही )

प्राण्यांचा मेंदू तीन टप्प्यात प्रगत होत गेला. १. रेप्टीलियन ब्रेन - सरपटणार्‍या प्राण्यांचा मेंदू २. लिम्बिक ब्रेन - निसर्गाने सस्तन प्राण्यांच्या मेंदूला रेप्टीलियन ब्रेनच्या वर अजून एक थर दिला तो हा लिम्बिक ब्रेन. या भागामुळे सस्तन प्राणि सरपटणार्‍या प्राण्यांपेक्षा "प्रगत" झाले. ३. निओ कॉर्टेक्स - हा मेंदुच्या सर्वात वरचा थर जो फक्त माणसाकडे आहे. आपलं माणूसपण ही या निओ कॉर्टेक्सची करामत आहे. त्याचबरोबर आपले माणूस म्हणून असलेले प्रश्नही याच निओ कॉर्टेक्समुळे आहेत. सगा लेख छानच झालाय.

पण इतरेजनांच्या लेखातून, प्रतिसादातून आणि विचारातून ते आपोआप चूक ठरतात. स्व गवसलेलेल्या त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. म्हणजे काय ?

उत्तरं आवडली.

विठा जी यान्चे अनेक आभार् व धन्यवाद ,,,, मला माझ्या धाग्यात जे म्हणायचे होते ,ते तुम्ही पर्फेक्टली सान्गितलंत सतीश जी आपणास माझ्या धाग्यावरुन प्रेरणा मिळाली हे पाहुन आनन्द झाला असो ... रोचक चर्चा .............चालुद्या

In reply to by उडन खटोला

धन्यवाद उडन खटोला. विवेक ठाकुर यांच्या उत्तरांनी तुमचे शंका समाधान झाले हे उत्तम झाले. राहीली गोष्ट या धाग्यावरील चर्चेची. मी तुमच्या प्रश्नांचा धागा पकडून मी माझे या विषयाचे आकलन मांडले. ते अंतिम सत्य आहे असा माझा मुळीच दावा नाही. किंबहुना "मी म्हणतो तेच अंतिम सत्य आहे" असा दावा कुणी करत असेल तर तो भ्रमात आहे हाच त्याचा अर्थ.

ते अंतिम सत्य आहे असा माझा मुळीच दावा नाही. किंबहुना "मी म्हणतो तेच अंतिम सत्य आहे" असा दावा कुणी करत असेल तर तो भ्रमात आहे हाच त्याचा अर्थ. बाडिस सगा सर ;)

षोडशोपचार पूजा नीट क्रमवार सांगुन शेवटी आरती मंत्रपुष्पाचे सूर मनाला समाधान देत जावेत तसा काहिसा फील लेख वाचताना येत गेला.. आणि शेवटी या तीर्थ प्रसादाने @
थोडक्यात, तुमच्या-माझ्यासारख्याला पैशाची गुलामगिरी चुकणार नाही. मात्र आपण "स्व"ची जाणीव तेवत ठेवून ती गुलामगिरी कितपत पत्करायची यावर नियंत्रण ठेवू शकतो.
@ पूजेची सांगता उत्तम जाहली आहे.. :) आता हा लेख मी (आपल्या नावासह..) प्रसाद म्हणून इथपर्यंत पोहोचलेल्यांना द्यायला मोकळा. ;) धन्यवाद.

एकदा कॉलेज ला असतांना एक रामकृष्ण मिशन चा कार्यक्रम अटेंड करावा लागला होता, वक्ता मुंडण केलेला, मिशन चे लोक घालतात तसला भगवा ड्रेस्...वक्त्याने लोकांना प्रश्न केला. मि म्हणजे काय ? हा माझा हात आहे, म्हणजे मि नव्हे. हे माझे डोके आहे म्हणजे मि नव्हे. असे सगळे मानवि अवयव मोजुन झाले, आत्मा सुद्धा झाला.... माझा आत्मा..म्हणजे मि नव्हे. नंतर त्यांनि मि म्हणजे काय वर एक छान छोटेखानि प्रवचन दिल, काहि कारणाने पण त्या वेळेस मि तिथे नव्हतो. मिस्ड दॅट्...पण जेव्हा पुन्हा परतलो तेव्हा वक्ता कॉलेज च्या मुलांच्या प्रश्नांचे उत्तर अगदि हसतमुखाने ओघवत्या भाषेत आणि तरिहि घास कोंबुन खाउ घातल्यासारखे न करता देत होता. आमच्या ग्रुप मध्ये मुस्लिम मुले-मुलि हि होत्या स्वेच्छेने आलेल्या. कोंबुन खाउ घालणे:- फोर्सफुली आपले मत पटवुन देणे

सर्वसाधारणपणे कुठलीही व्यक्ती शक्य असेल तर आपल्याला "क्लिक" झालेल्या व्यक्तीलाच आयुष्याचा जोडीदार म्हणून स्विकारते. आपण बालपन - पौगंडावस्था - तारुण्य अशा अवस्थांमधून जात असताना आपल्या मनात आपल्या जोडीदाराची प्रतिमा हळूहळू आकार घेत असते. इथेही पुन्हा आई वडीलांकडून मिळालेला जनुक संच आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असतानाची परिस्थिती हे प्रभावी घटक ठरतात. या प्रतिमेशी थोडी फार मिळती जुळती व्यक्ती संपर्कात आली की माणूस "प्रेमात पडतो". मेंदूतील डोपॅमाईन आपले काम सुरु करतो. दिवस रात्र तिच्याशिवाय/त्याच्याशिवाय चैन पडत नाही. अभ्यासपूर्ण आणि स्पष्ट लेख.आपणाकडून असेच दर्जेदार वाचायला मिळावे हि अपेक्षा. लिहित रहा, गावडे सर.

हे विधान, तसेच निओ कॉर्टेक्स मुळे प्रश्न उद्भवले हे विचार निराशावादी वाटतात. खरे तर उत्क्रान्त मेन्दू वा निओकॉर्टेक्स चा वापर कसा करायचा हे त्या दोन गोष्टीन्मुळेच कळते. शिवाय नैसर्गिक आपत्ती पासून बचाव करणे, जंगली, हिम्सक विचारानच्या ऐवजी दया क्षमा शान्ति हे कसे चान्गले हे सगळे उत्क्रान्त मेन्दू मुळेच कळले. अणुशास्त्र शिकल्यावर त्यापासून बाँब बनवणे वा उर्जा उत्पन्न करणे हे दोन्हीहि त्या उत्क्रान्त मेन्दूमुळेच शक्य आहे. तर या उत्क्रान्त मेन्दूला शाप, प्रष्नमूलक समजावे की त्यापासून विधायक कार्य कसे करता येईल याचा विचार महत्वाचा. व तो करायलाहि योग्य मार्गाने विचार्‍ करणारा उत्क्रान्त मेन्दूच पाहिजे. यासाठी उत्क्रान्त मेन्दूचा वापर करून धर्म नावाची कल्पना काढून त्यात निरनिराळ्या विद्वानान्नी जगाला मार्गदर्शन केले. पण त्याचा विपरित अर्थ करून जगणे म्हणजे शाप - अनेक प्रश्न हे सगळे दिसते. म्हणून मग शाप प्रष्न असे निराशावादी विचार. आशा आहे की हेच विचारवन्त पुढे जाऊन त्यातून मार्गहि काढतील नि उत्क्रान्त मेन्दू हा केव्हढा वर आहे हे दाखवून देतील.

जॉर्ज कार्लीन यांचा हा विडीओ जरूर पाहावा..