मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बँकेचा असाही एक अनुभव...

पुणे मुंग्रापं · · जनातलं, मनातलं
बँकेचे व्यवहार करणे ग्राहकांना सुलभ व्हावे या दृष्टीने अनेक सुविधा अलिकडच्या काळात उपलब्ध झाल्या आहेत. विशेषतः नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सारख्या सुविधांमुले पैशाची देवघेव, खरेदी – विक्री, नियमित सेवांची बिले भरणे इत्यादी व्यवहार अक्षरशः एका बोटावर होत आहेत. ए. टी. एम. च्या सुविधेमुळे तर क्षणार्धात पैसा ग्राहकासमोर हजर होतो. या सुविधांबरोबरच गैरव्यवहाराच्या, सदोष सेवेच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. ए. टी. एम. सुविधेच्या बाबतीत बोलायचे झाले तर यंत्रात कार्ड घातल्यानंतर माहिती दिल्यानंतरही पैसे बाहेर न येणे, पैसे कमी आले तरी खात्यातून जास्त रक्कम वजा होणे या स्वरुपाच्या तक्रारी येत आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी येथील संसारचंद कपूर यांचा हा अनुभव पहा- कपूर यांचे मंडी येथील स्टेट बँकेत खाते होते, बँकेने त्यांना ए. टी. एम. कार्डही दिले होते. त्याचा ते माफक वापर करीत. त्यामुळे 10 नोव्हेंबर 2011 रोजी पंजाब नॅशनल बँकेच्या ए. टी. एम. मधून त्यांनी रु.10000/- काढल्याची नोंद त्यांच्या पासबुकात झालेली पाहून त्यांना धक्काच बसला! आपण त्यादिवशी पैसे काढले नसल्याने पंजाब नॅशनल बँकेच्या ए. टी. एम. केंद्रातील व्हिडीओ कॅमेराने केलेले चित्रीकरण आपल्याला मिळावे अशी मागणी त्यांनी स्टेट बँकेकडे केली. बँकेने त्यांना चित्रीकरण दाखविले. परंतु ते अतिशय पुसट होते. शिवाय चित्रिकरणाची वेळ व पैसे काढल्याची वेळ जमत नव्हती. त्यावरुन आपण पैसे काढल्याचे सिध्द होत नसल्याने स्टेट बँकेने रु. 10,000/- आपल्या खात्यावर जमा करावेत अशी लेखी मागणी त्यांनी केली. बँकेने त्यांची मागणी नाकारल्यामुळे त्यांनी स्टेट बँक व पंजाब नॅसनल बँक या दोन्ही विरुध्द मंडी जिल्हा मंचाकडे तक्रार दाखल केली. व्हिडीओ चित्रीकरणाची कॉपी मिळावी व आपण न काढलेले रु. 10,000/- आपल्या खात्यावर जमा करावेत, तसेच या प्रकरणी झालेला मनस्ताप व तक्रारीचा खर्च यापोटी नुकसान भरपाई मिळावी इत्यादी मागण्या त्यांनी आपल्या तक्रार अर्जात केल्या. मंचांने त्यांची मागणी मान्य केली. स्टेट बँकेने रु. 10,000/- ची रक्कम 9% व्याजासह , तसेच तक्रारीचा खर्च व नुकसान भरपाई पोटी प्रत्येकी रु. 3,000/- तक्रारदारास द्यावेत असा आदेश त्यांनी बँकेला दिला. या निर्णयाविरुध्द स्टेट बँकेने हिमाचल राज्य प्रदेश राज्य आयोगाकडे केलेल अपील आयोगाने फेटाळले. त्यामुळे स्टेट बँकेने तक्रारदार श्री. कपूर व पंजाब नॅशनल बँक यांच्याविरुध्द राष्ट्रीय आयोगाकडे सुधारणा अर्ज दाखल केला. आयोगापुढे स्टेट बँकेच्या वतीने असा युक्तीवाद करण्यात आला की तक्रारदाराचे ए.टी.एम. कार्ड व त्यावरील पिन क्रमांक वापरल्याशिवाय पैसे काढणे शक्यच नाही. तक्रारदाराने स्वतः पैसे काढले नसले तरी त्याच्याकडून सदर कार्ड गहाळ झाल्यामुळे किंवा ते दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यामुळे व पिन क्रमांकाबाबत गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा दुरुपयोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात या घटनेला श्री. कपूर यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे. त्यामुळे त्यांचे रु. 10,000/- खात्यात जमा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पंजाब नॅशनल बँकेच्या ए.टी.एम. केंद्रातील व्हिडीओ चित्रीकरण फारसे स्पष्ट नव्हते. तरीही ते कपूर व त्यांचे जावई यांना दाखविले होते, त्यामुळे बँकेच्या सेवेत कोणतीही उणीव नव्हती. राष्ट्रीय आयोगाने बँकेचे हे स्पष्टीकरण मान्य केले व रु. 10,000/- तक्रारदार कपूर यांना परत करण्याच जिल्हा मंच व राज्य आयोग यांचा आदेश रद्द केला. मात्र स्टेट बँकेने पंजाब नॅशनल बँकेच्या ए.टी.एम. केंद्रातील संबंधित घटनेच्या चित्रीकरणाची कॉपी कपूर याना दिली नाही ही बँकेच्या सेवेतील त्रूटी होती असे मत देऊन नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च यापोटी प्रत्येकी रु. 3,000/- देण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. तसेच या प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेच्या सेवेत त्रूटी नव्हती असे म्हणून त्यांना दोषमुक्त जाहिर केले. या संदर्भात अमेरिकेतील एका नातलगाच्या अनुभवाचा उल्लेख करावासा वाटतो. कपूर यांच्यासारखीच त्यांची तक्रार होती व तीही 25000 डॉलर्स इतक्या मोठ्या रकमेची! मात्र व्हिडीओ रेकॉर्डींग द्वारे ग्राहकानेच रक्कम काढल्याचे सिध्द करु न शकल्याने बँकेने संपुर्ण रक्कम विनातक्रार ग्राहकाच्या खात्यावर 15 दिवसांत जमा केली ! कपूर यांच्या बाबतीत व्हिडीओ रेकॉर्डींग स्पष्ट नव्हते, रेकॉर्डींगची वेळ व पैसे काढण्याची वेळ यात तफावत होती; शिवाय घटना घडली त्यावेळी ए.टी.एम. कार्ड आपल्याजवळच होते व ते आपण वापरले नव्हते हे कपूर यांनी शपथपत्रावर लिहून दिलेले होते आणि मुळात वादातील रक्कम रु. 10,000/- इतकी कमा होती. तरीही राष्ट्रीय आयोगाने त्यांना संशयाचा फायदा न देता बँकेच्या बाजूने निर्णय दिला. ग्राहक सार्वभौमत्वाच्या दिशेने भारताला अजून बरीच वाटचाल करायची आहे हेच यावरुन दिसून येते. पुर्वप्रसिध्दी – ग्राहकहित सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

वाचने 9155 वाचनखूण प्रतिक्रिया 14

सुबोध खरे 12/01/2016 - 12:00
तक्रारदाराने स्वतः पैसे काढले नसले तरी त्याच्याकडून सदर कार्ड गहाळ झाल्यामुळे किंवा ते दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यामुळे व पिन क्रमांकाबाबत गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा दुरुपयोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही मूळ मुद्दा त्यांचे ए टी एम कार्ड गहाळ झाले होते का? जर ते गहाळ झाले असेल तर श्री कपूर यांनी ते बंद करण्यासाठी बँकेला कळविले होते का? या गोष्टींचे खुलासा नाही.

In reply to by सुबोध खरे

मोदक 12/01/2016 - 13:10
तक्रारदाराने स्वतः पैसे काढले नसले तरी त्याच्याकडून सदर कार्ड गहाळ झाल्यामुळे किंवा ते दुसऱ्या व्यक्तीच्या हाती लागल्यामुळे व पिन क्रमांकाबाबत गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा दुरुपयोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही बँकेने शक्यता वर्तवली आहे आणि त्यानुसार निकाल दिला आहे. श्री कपूर यांच्या बाजुने कार्ड गहाळ झाल्याचा काहीही उल्लेख नाहीये.

अस्वस्थामा 12/01/2016 - 22:37
इथे एक शंका, तुम्ही ग्राहक पंचायत यांच्याशी संबंधित आहात काय ? असाल तर या धाग्यावर मी एक समस्या मांडली होती तेव्हा माझा ग्राहक पंचायतीबद्दलचा अनुभव लिहिला आहे तो खालीलप्रमाणे.
मध्यंतरी सातार्‍यातल्या ग्राहक न्यायालयाच्या ऑफिसात जावून चौकशी केल्यास कळाले की आता पूर्वीसारखे ग्राहक मंच नाहीत आणि दावा दिवाणी खटल्यासारखाच असेल आणि सुनावणीसाठी तुम्हाला (पक्षी: माझ्या वडिलांना) न्यायालयात तारखेस यावे लागेल. माझे वडील सातारा शहरापासून दूर आणि वयस्क असल्याने त्यांनी त्या साडे-आठ हजारावर पाणी सोडायचे ठरवले आहे कारण तारखा करणे त्यांना (आणि घरातल्या कोणालाच) शक्य नाही.
मी अशा सुरस कथा ऐकल्या आहेत परंतु जेव्हा गरज होती तेव्हा, १. कुठेही विश्वासार्ह असे संकेतस्थळ अथवा माहितीचा मार्ग मिळाला नाही. २. ग्राहक न्यायालय असा फलक असलेल्या ठिकाणी "आता पूर्वीसारखे ग्राहक मंच नाहीत आणि दावा दिवाणी खटल्यासारखाच असेल आणि सुनावणीसाठी तुम्हाला न्यायालयात तारखेस यावे लागेल." अशी माहिती मितुम्हीमग "मंडी जिल्हा मंच" काय प्रकरण आहे ? या सरकारी संत्रणा आहेत की कोणी स्वयंसेवी संस्था आहे की अजून काही ? ३. तसेच मग हे "ग्राहक पंचायत" नक्की काय आहे ? सरकारी संत्रणा आहेत की कोणी स्वयंसेवी संस्था आहे की अजून काही ? ४. भविष्यात गरज पडलीच तर नक्की मार्ग काय आहेत ? कशी तक्रार करावी, नक्की कुठे व कसा संपर्क करावा (की फक्त या सुरस कथा म्हणून वाचाव्यात आणि गप्प बसावे ?). [जेव्हा हवे होते तेव्हा तथाकथित ग्राहक मंच अथवा ग्राहक पंचायत अख्ख्या आंतर्जालावर न सापडल्याचा वैताग असलेला]

In reply to by अस्वस्थामा

बहुगुणी 13/01/2016 - 01:39
Address(es) of District Consumer Forums in Maharashtra हा दुवा कदाचित उपयोगी ठरावा. मुंबई ग्राहक पंचायत ही एक स्वयंसेवी संघटना आहे असं दिसतं. त्यांची पुण्यात शाखा सुरू होणार आहे असं या संस्थळावरील Events या sidebar वरून दिसतं: PUNE PETH Grahak Panchayat Peth arranged in 2015 gets overwhelming response. We are set to enter into PUNE in 2016. Grahak Panchayat Peth will be organized from 7.1.2016 to 11.1.2016 from 11.30 am to 8.30 pm. Venue : Lokamany Sabhagriha at Kesariwada, Narayan Peth, Pune, अर्थात्, पुण्यातली बिंदुमाधव जोशींची ग्राहक पंचायत देखील आहेच (पण त्यांच्या संस्थळाच्या पत्त्यात .com आहे, .org नाही हे जाणवलं.)

In reply to by बहुगुणी

अस्वस्थामा 13/01/2016 - 17:36
अहो, Address(es) of District Consumer Forums in Maharashtra यात दिलेल्या पत्त्यावरुनच सातार्‍यातल्या ग्राहक न्यायालयात पोचलो होतो. तिथलाच अनुभव सांगितला आहे. अर्थात कोणीही तज्ञ (ज्यांचेबद्दल मला फोरमवर माहिती अथवा कुठेही संपर्कास इमेल मिळाला आहे असे) मला आलेल्या अनुभवाबद्दल आजवर इथे अथवा इमेलवर काही उत्तर देण्यास इच्छुक दिसलेला नाहीय. :( हे म्हणजे दुनियेच्या सुरस कथा मांडायच्या ( हिमाचल प्रदेशचे कोण संसारचंद कपूर शोधायला जातोय इथून) त्या खर्‍याही असतील परंतु एकही जण मदत करु शकु नये अथवा मदत घेतलेला असु नये याचे खूपच आश्चर्य वाटले. (असो, माझी समस्या बँक कडून बँक-लोकपालाची भिती घातल्यावर किमान लक्षात घेतली गेली आणि नंतर बँकेकडूनच सोडवली गेली. परंतु ग्राहक न्यायालय हा व्यवस्थेबद्दल आश्चर्यकारकपणे निराशा पदरी आली त्यामुळे हा माझा पेसिमिस्टिक प्रतिसाद आहे इतकंच.)

In reply to by अस्वस्थामा

अस्वस्थामा, या बाबतीत अद्ययावत माहिती अशी की सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच व्यवस्थित कार्यरत आहे . पत्ता -524/1-A,सदर बाजार ,को -ओपरेटिव (co-opeative) कोर्टाजवळ, कोरेगाव रोड ,सातारा 415001 फोन.02162-237469 वरील क्रमांकावर फोन करुन खात्री करुन घेतली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचे तक्रार मार्गदर्शनाचे काम निःशुल्क व स्वयंसेवी पध्दतीने चालत असल्याने जेथे मुंबई ग्राहक पंचायतीचे अशा कामाकरीता प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत तेथेच तक्रार मार्गदर्शनाचे काम चालते. आम्ही पुण्यात गेले 2 वर्षे असे केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न करतोय. मुंबई ग्राहक पंचायत तक्रार मार्गदर्शन करते, तक्रार निवारण नाही, त्यामुळे सगळ्या प्रक्रिया तक्रारदारालाच पुर्ण कराव्या लागतात, मुंबई ग्राहक पंचायत तक्रारीकरीता अर्ज कसा करावा, पाठपुरावा कसा करावा अशा अनेक बाबतीत निःशुल्क मार्गदर्शन करते.

In reply to by मोदक

मुंबई ग्राहक पंचायत ग्राहक भवन, संत ज्ञानेश्वर मार्ग, कूपर हॉस्पीटलमागे, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई 400056 फोन नं. 02226281839, 02226209319 पुणे विभाग - संपर्क कार्याध्यक्षा - छायाताई वारंगे - 9552598851, कार्यवाह - मिलिंद चुटके - 9960391111, सदस्य - अजित कुलकर्णी - 9822290300 प्रकाश बापट - 9689563631

In reply to by बहुगुणी

@ बहुगुणी मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभाग गेले 5 वर्षे पुण्यात कार्यरत आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिक्षण विभागाच्या कार्यकर्त्या गेले 5 वर्ष विविध शाळांत जाऊन कन्झ्युमर क्लब सारखे उपक्रम राबवित आहेत. यात 9 वी व वरील इयत्तेतील मुलांना लेबल रिडींग, ISI मार्क, वजनमापे, ग्राहक संरक्षण अशा विविध विषयांवरची माहिती देत आहेत. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमात पुण्यातील विविध शाळा सहभागी होत आहेत. मुंबई ग्राहक पंचायत पुणे विभागात वितरणाचे काम मात्र गेल्या 3 वर्षापासुन सुरु आहे. पाषाण, बाणेर, कोथरुड, वारजे पासुन ते थेट डिएसके विश्व, नऱ्हे, अगदी तळेगांव पर्यंत दर महिन्याला मुंबईतुन रास्त व चांगल्या दर्जाचे वाणसामान पुरवठा सभासदांना केला जात आहे. पुणे विभागात असे 57 संघ आहेत. एक संघ किमान 11 सभासद मिळून होतो व असे संघ आपली दर महिन्याची वाण सामानाची मागणी नोंदवून रास्त दरात व चांगल्या दर्जाचे साहित्य घेत आहेत. ग्राहक पंचायत पेठ हा मुंबईत दादर, बोरिवली इत्यादी तसेच ठाणे दापोली येथे गेली 38 वर्षे चालणारा उपक्रम आहे. मुलाखतीतून निवडलेल्या उत्पादक, थेट विक्रेते यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. निवड केलेली असल्याने उत्पादनांबाबत खात्री, प्रत्येक वस्तूचे बिल देणे, विनातक्रार सदोष माल परत घेणे, प्रत्येक ग्राहकाला समान दर अशा विविध वैशिष्ट्यांमुळे मुंबई परिसरांत या पंचायत पेठा प्रसिध्द आहेत. पुण्यात मुंबई ग्राहक पंचायतीचे काम नवीन असल्याने या वर्षी पहिल्यांदाच अशी ग्राहक पंचायत पेठ लोकमान्य सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ पुणे येथे भरवली गेली व या पेठेला पुण्यातील ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 7 ते 11 जानेवारी 2016 या कालावधीत भरविलेल्या या पेठेत एकुण रु. 36,83,374/- ची विक्री झालीय.

विंजिनेर 13/01/2016 - 02:33
या संदर्भात अमेरिकेतील एका नातलगाच्या अनुभवाचा उल्लेख करावासा वाटतो.
अमेरिकन बँकेने ग्राहकाचे पैसे तप्तरतेने परत केले याचे कारण अमेरिकेतील बँका भारतातील बँकांपेक्षा उत्तम दर्जाची सेवा देतात हे नसून अमेरिकेत बँका तुमच्या एटीम कार्ड्/क्रेडीट कार्डाला "लायब्लिटी इंश्युरंस" पुरवतात - त्यामुळे सदर लेखातील $२५,००० ही रक्कम त्या अमेरिकन बॅंकेने त्यांच्या इन्शुरर कडून क्लेम करून ग्राह्काला दिली असणार. अधिक माहिती इथे आणि इथे. भारतात फ्रॉड प्रोटेक्श्न साठी इंश्युरंस प्रॉडक्ट्स नसावेत कदाचित

अन्नू 13/01/2016 - 17:25
इथे हाच प्रॉब्लेम आहे, सामान्य माणसालाच बरोबर बळीचा बकरा बनवला जातो. मग भले त्यात त्याची चुकी का नसेना! आणि हे बँकिंग नव्हे तर इतर क्षेत्रातही पहायला मिळते. आता एटीएमच्या बाबतीत बोलायचं तर, त्यात काम करणार्‍या सिक्युरिटीची गोष्टच न्यारी असते, त्यांना का आणि कशासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून ठेवलाय तेच कळत नाही. खरं म्हणजे त्यांच्याकडे बघून- त्यांनाच सिक्युरिटीची गरज असावी असं आपल्याला वाटायला लागतं! एटीएम मध्ये लावलेले कॅमेरीही त्याच जोडीचे. ज्या वयात त्यांना रिटायर व्हायचं असतं, त्याच वयात त्यांना पकडून तिथं लटकवलेलं असावं असं वाटतं! मध्ये एफ-एम वर आणि न्युज चॅनेलवरही अशा एटीएम च्या सेक्युरिटीची चर्चा झाल्याचे ऐकीवात आहे. या असल्या सिस्टीमच्या माध्यमातून चोरांना त्रास कमी व्हावा हाच उद्देश बहुदा बँकींग क्षेत्राचा असावा असं वाटतंय. ;)