Skip to main content

४७ डोकी मारली!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 03/01/2016 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
२०१६ सुरु होते न होते तोच सौदी अरेबियाने ४७ लोकांचा एकाच दिवशी शिरच्छेद करुन त्यांना मृत्यूदंड दिल्याचे जाहीर केले. इतकी पराकोटीची रानटी शिक्षा जाहीरपणे चौकात देणारा आणि तरीही सुसंस्कृततेचा टेंभा मिरवणारा सौदी हा एकमेव देश असेल! कमालीची श्रीमंती असल्यामुळे त्यांची ही दादागिरी सगळे चुपचाप सहन करतात. तशात इस्लामचे हेडक्वार्टर असल्याचाही तोरा ते मिरवतात कारण मक्का आणि मदीना ही दोन इस्लामी तीर्थक्षेत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. त्यातूनही ते भक्कम पैसे मिळवतात. ह्या ४७ लोकांमधे एक शिया धर्मगुरू आहे ज्याला शिया लोकांमधे बराच आदर होता त्यामुळे त्या पंथाचे लोक आता आंदोलन करत आहेत. अर्थात ते चिरडून टाकले जाईलच. पण इराणसारखा शिया देश, तिथल्या लोकांनी सौदी अरेबियाच्या वकिलातीवर/दूतावासावर हल्ला केल्याच्या बातम्या आल्या आहेत. सौदीच्या तुरुंगात अनेक राजकीय कैदी अनेक दिवस डांबलेले आहेत. राजकीय सोयीनुसार त्यातले अशा प्रकारे ठार केले जातात. कदाचित ह्यामुळे शिया आणि सुन्नीमधील संघर्ष वाढेल. आयसिस शिया लोकांना धर्मभ्रष्ट मानते. सौदीही त्याच माळेतला मणी आहे. अशा प्रकारे वरिष्ठ शिया धार्मिक नेत्यांना संपवून अजून एक आग भडकवत आहे. २०१६ च्या हिंसेची ही नांदी म्हणायची की काय?

वाचने 8245
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

शिया-सुन्नी वादात सामंजस्याने , रक्तपात न करता काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का ? दोन्ही पक्षातील लोकांनी एकत्र येऊन शांततामय मार्गाने काही तरी तोडगा काढायला पाहिजे .

शिया सुन्नी जेव्हा केव्हा आपले भेदभाव विसरतील तेव्हा विसरतील. पण सौदी अरेबिया कधीतरी जाहीर शिरच्छेदाची शिक्षा रद्द करेल का? अमेरिकेशी खांद्याला खांदा लावून बसणारे "मित्रराष्ट्र" ह्या बाबतीत इतके रानटी कसे आणि त्याबद्दल कुणी देश ब्र ही काढत नाही हे अनाकलनीय आहे. अशा प्रकारची शिक्षा देण्यामागे त्यांचा इस्लाम कारणीभूत आहे का सौदी अरेबियातील स्थानिक संस्कृती? जिथे सुसंस्कृत देश मृत्यूदंड रद्द केला जावा की नाही अशी चर्चा करतात तिथे हा देश इतकी क्रूर आणि निर्घृण शिक्षा कशी देतो आणि सढळ हस्ते तिची अंमलबजावणीही करतो?

In reply to by हुप्प्या

त्या प्रदेशावर, सौद घराण्याचे राज्य चालते. आणि तेलाच्या अर्थकारणामुळे बलाढ्य देश ह्या भानगडीत पडत नाहीत.

जाहीर शिरच्छेद असे कुठे वाचले? ४७ अतिरेक्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे. कोर्टाच्या निकालाप्रमाणे. शिरच्छेद किंवा फाशी किंवा अजून कुठलाही मार्ग तितकाच समर्थनीय किंवा असमर्थनीय असू शकतो.

हुप्प्या, अमेरिकेने डोळे वटारले असते तर सौदींची मुंडकी उडवायची हिंमत झाली नसती. आयसिसचा बाजार उठायला आल्यामुळे आता अमेरिका सौदींच्या आडून मध्यपूर्वेत युद्ध भडकावू पाहतेय. आ.न., -गा.पै.

सौदी देशाच्या सहाय्याने अमेरिका ISIS मदत करतो. अरब देशात शस्त्र निर्मिती होत नाही. ISIS जवळ असलेले ८०% शस्त्र अमेरिकन आहेत. यालाच आपण परम शक्तिमान भगवंताची (US) माया म्हणू शकतो. अमेरिकेचे खरे राष्टाध्यक्ष शस्त्र विक्रेते आहे. अमेरिकेची श्रीमंती शास्त्राच्या व्यापारावारच टिकून आहे. दुसर्या देशांच्या शेती, धंधा उद्योगांचा निकाल लावण्याची अमेरिकन पद्धत.

मानवाधिकार समिती म्हणजे खरेच एक जोक आहे राव तरीही, काही प्रश्न १ त्यांनी त्यांच्या देशात त्यांच्या देशाचे कायदे पाळले आता ह्यात तुमचे आमचे काय गेले? २ त्यांना शिया चिरडणे हा गरजेचा भाग वाटतो त्याच्यासंबंधी ते अन इराण काय तो गोंधळ घालो आपल्याला काय त्याचे? ३ सगळे ४७ राजकीय कैदी होते का? की अमली पदार्थांची तस्करी करणारे (त्यांच्याकडे खसखस सुद्धा अलाउड़ नसते ऐकिव माहीतीनुसार), बलात्कारी किंवा व्यभिचारी वगैरे होते? असल्यास एका तोंडाने आपण तावं तावं "बलात्काऱ्याचे लिंग छाटा" "चौकात फासावर द्या" वगैरे म्हणतो "चौरंगा केला पाहिजे" म्हणतो तसे त्यांनी केले आहे का सगळेच राजकीय उडवले आहेत , हे कळले की पुढे निषेध किंवा त्याला धक्कादायक वगैरे म्हणता येईल तोवर तो एक असा देश आहे जिथे "मुत्तवे" अर्थात धार्मिक पोलिस हे रेगुलर पोलिसांइतकेच ताकदवान असतात हे लक्षात असलेले बरे माझ्या वैयक्तिक मतानुसार

भीमा कोरेगाव लढाईचा हॅपी बर्थडे झाला. त्यावर धागा काढायचा सोडुन दुसर्‍याच्या घरात कशाला बघायचे ? .....

In reply to by मोगा

आपणास भीमा कोरेगावच्या लढाईत जास्त स्वारस्य असेल तर त्यावर जरूर चर्चा सुरू करा. आपणांस हा विषय त्याज्य वाटत असेल तर आपण त्यापासून जरूर अलिप्त रहा. आपल्याला तो अधिकार आहे. मला ह्या विषयात आहे आणि म्हणून मी चर्चा सुरु केली. आणि मलाही तो अधिकार आहे. अनेक भारतीय लोक सौदी मधे काम करतात. अनेक लोकांवर अत्याचार होतात. कदाचित काही लोकांना कपटाने कुठल्या गुन्ह्यात अडकवून असे क्रूरपणे मारलेही जात असेल त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल चर्चा होणे चूक नाही. आपल्याकडे दंगली हल्ले वगैरे झाले की अन्य देशात गवगवा होतोच की. इंटरनेटमुळे जग छोटे झाले आहे. अशा प्रकारची शिक्षा इस्लामच्या धर्मग्रंथात लिहिली आहे का? तसे असेल तर जिथे जिथे इस्लामवर आधारित कायदे आहेत तिथे अशी शिक्षा अवलंबली जाईल किंवा तसा प्रयत्न होईल. आणि लोकांच्या धर्मावर कशी टीका करायची म्हणून बाकी देश संकोचाने गप्प राहतील अशी शक्यता आहे. ह्याही घातक आहेत.

शिया-सुन्नी वादात सामंजस्याने , रक्तपात न करता काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का ? दोन्ही पक्षातील लोकांनी एकत्र येऊन शांततामय मार्गाने काही तरी तोडगा काढायला पाहिजे . हा एक मुर्ख विचार आहे आणि नाहि सुध्दा. आज शिया/सुन्नी/वहाबी/इतर अतिरेकी आहेत. जेव्हा शिया/सुन्नी/वहाबी/इतर वादात तोडगा तोडगा निघेल जगात फक्त इस्लाम अतिरेकी राहिल, जी एक विचित्र डोकेदुखी पुर्ण जगास होइल. असे झाले तर छान बाब अशी कि सपुर्ण जगास फक्त याविरुध्द लडावे लागेल

In reply to by लिओ

२० टक्के शियाबरोबर ८०टक्के सुन्नी समझोता करतील. पहिल्यांदा इस्लाम शुद्ध करु नंतर जगाला इस्लाममय करु हाच सुन्नी मुस्लिमाचा एजेंडा राहिला आहे

ह्या बातमीनन्तर पाकिस्तानमधे सौदी विरुद्ध निदर्शने झाली आहेत. पाकिस्तान, हा हां, जिथे शियाना किडेमुंग्याप्रमाणे मारले जाते, त्यांनी शिया धर्मगुरुच्या शिरकाणाबद्दल मगरीचे अश्रू वाहवले जातात. वर्षाच्या सुरवातीला हसवले बाबा. अमेरिका धोकादायक खेळ करत आहे. एके ठिकाणी तो सौदिचा मित्र असल्याचे भासवतो व दुसरीकडे इराणला अणुकार्यक्रमासाठी रस्ते मोकळे करत आहे. याचा परिणाम इस्राएल जो सौदिचा पारंपारिक शत्रु आहे तो सौदिशि वार्ता करायला बघत आहे. तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी कदाचित इथुन पडेल.

In reply to by भंकस बाबा

एकेकाळी पाकिस्तान हा सौदीचा मिधा होता. तो आता त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहे. सौदी पाकिस्तानला येमेनमधील बंडाळी मोडण्यासाठी बोलवत आहे. पण दोन मुस्लिमांच्या लढाईत आपण का पडायचे असा पाकला पेच पडला आहे. कारण दोन्ही बाजूंनी मुस्लिमच मरत आहेत. आणि एखाद्या गुलामासारखे पाकला वागवले जाणे हेही तिथल्या काही लोकांना संतापजनक वाटते. त्यामुळे लढाईऐवजी समझोता करावा असे त्यांना वाटत असावे. तिकडे सौदी सैन्यात येमेनचे लोक असल्यामुळे कोण कितपत भरोशाचा आहे ह्याबद्दल सौदी राज्यकर्ते साशंक आहेत. त्यामुळे येमेनच्या बंडाळीत ते सर्वशक्तिनिशी उतरत नाहीत. पाकमधील ही प्रतिक्रिया ह्या संबंधातील तणावांचा एक नवा टप्पा असेल कदाचित.

हीसुद्धा शिया-सुन्नी संघर्षच आहे. येमेनी लोक अरब आणि सुन्नी आहेत तर तिथे उठाव करणारे हाऊथी लोक हे शिया आहेत आणि त्यांना इराणचा पाठिंबा आहे.

सध्या कट्टर अरबी वहाबींची कट्टरता आणि महत्त्व वाढत चालले आहे. हे लोक सार्‍या जगाला आणि विशेषतः अमेरिकेला डोईजड होत चालले आहेत. तेव्हा इराणला बळ देऊन एक मुस्लिम देश अरबांविरुद्ध उभा करावा अशी अमेरिकेची रणनीती असू शकेल. शिया अल्पसंख्य आहेत हे खरे, पण पैसा आणि लश्करी ताकत यांद्वारे काहीही घडू शकते. आपल्या दृष्टीने इराण बलवान झाला तर दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने तो थोडाफार सुसह्य असेल. शिवाय शिवाय तेल आणि वायुवाहिन्यांचे प्रलंबित काम लवकर तडीस जाऊ शकेल. पाकिस्तानलाही एक बलवान विरोधी राष्ट्र शेजारी बनल्यामुळे पश्चिम सीमेवर अधिक लक्ष्य ठेवावे लागेल. कदाचित भारताकडे कमी लक्ष राहील. बलदंद इरानच्या धाकामुळे कदाचित पाकिस्तानातल्या शियांना बळ मिळेल. कदाचित शिया-सुनी झगडे कमी होतील किंवा शियांची ताकत वाढल्यामुळे दंगे वाढतीलही. कदाचित एका भस्मासुराला नमवण्याच्या अमेरिकी प्रयत्नातून दुसरा भस्मासुर निर्माण होऊ शकेल. अर्थात ही सगळी जर-तरचीच भाषा आहे.

In reply to by राही

इराणच्या आयातुल्ला खामिनेई यांनी शेख निम्र अल निम्र या शिया धर्मगुरुला दिलेल्या देहांतशासनाबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनीही सौदी राजवटीच्या निर्णयावर टीका केलेली आहे, पण खामेनेईंपेक्षा त्यांचे शब्द सौम्य आहेत. त्यांनी सौदी राजदूतावासावर हल्ला करणाऱ्या इराणी नागरिकांवर कठोर कारवाईचे संकेतही दिलेले आहेत. इराकचे राज्यकर्तेही शिया पंथीय असल्यामुळे त्यांचे आणि सौदीचे संबंध कदाचित बिघडू शकतात. पण कितपत बिघडतील हे सांगणं कठीण आहे. अमेरिकेला जर शिया-सुन्नी दरी वाढवायची असेल तर इझराईलला आवर घालावा लागेल कारण इराणची ताकद वाढणं या गोष्टीला इझराईलचा विरोध आहे. इराण पुरस्कृत हेझबोल्लाह या अतिरेकी संघटनेने लेबेनाॅनमधून इझराईलवर अनेक वेळा हल्ले केलेले आहेत. १९७९ च्या इराणी इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिकेला शिया हे potential अतिरेकी वाटत होते, पण अल कायदा आल्यावर सुन्नी अतिरेकी हा मोठा धोका आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे इराण आणि सौदी यांना झुंजत ठेवणं हे अमेरिकेचं धोरण असू शकतं.

In reply to by राही

राही, वहाबी हे अमेरिकेस डोईजड झालेले नाहीत आणि पुढेही कधीच होऊ शकणार नाहीत. कारण ते मुळातून अमेरिकेच्याच तालावर नाचणारे आहेत. अमेरिका केंव्हाही त्यांना चूप बसवू शकते. मात्र असं केल्यास शिया खरोखरीचे डोईजड होऊ शकतात. यावर एक मार्ग म्हणजे शिया आणि सुन्नी दोन्ही बाजूंना शस्त्र व धनपुरवठा करणे. शिया सुन्नी रक्तपात अमेरिकेस सर्वात फायदेशीर पर्याय आहे. त्यानुसार पावले टाकणे सुरू आहे. नुकतेच मागील आठवड्यात दुबईतले एक सुवर्णव्यापार आस्थापन (= गोल्ड ट्रेडिंग कंपनी) बुडीतखाती गेले. हे आस्थापन तुर्कस्थानातून सोने आयात करून गुप्तपणे इराणला विकत असे. अशा रीतीने अमेरिका तुर्कस्थानमार्गे इराणला पैसा पुरवीत आहे. या बनावट अस्थापानाची कहाणी इथे आहे : http://www.zerohedge.com/news/2016-01-01/trail-dubais-stolen-gold-clien… या आतबट्ट्याच्या व्यवहारात अबुधाबीच्या सुलतानाच्या मुलाचा हात आहे. त्याच्या आशीर्वादानेच ही लूट झाली आहे. हा अमिरातीतल्या सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार नसून तिथल्या भ्रष्ट सरकारने गाठलेली नीचतम पातळी आहे. भांडणाऱ्या दोन्ही पक्षांना मदत करण्याची अमेरिकेची खेळी खूप जुनी आहे. आ.न., -गा.पै.

ताज्या बातम्या एकदम ताज्या

In reply to by याॅर्कर

आपण कोण? कौरव की पांडव? आपण पण आत्ताच अमेरिकाकडून चिनूक व् अप्पाचि हेलिकॉप्टर घेतली. आणि पाकिस्तानकड़े F१६,मज्जा आहे बुवा!

In reply to by भंकस बाबा

आपण पांडव जरी झालो तरी बरीच हानी सोसावी लागणार. अकरा अक्षहौणी सेना मरणार आणि पाच-सातजणच जिवंत राहणार, म्हणजे सैन्य मरणार आणि आमचे मंत्री एसीची हवा खात बसणार!

७० च्या दशकात सौदी अरेबिया आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत होते. पण तिथल्या मूलतत्त्ववाद्यांना ते खुपत होते. १९७९ मधल्या मक्केच्या उठावानंतर सौदी अरेबियाने दोन आघाड्या उघडल्या, बंडखोर मूलतत्त्ववाद्यांना चिरडणे आणि स्वतः आधुनिकता सोडून मूलतत्त्ववादी बनणे ज्यामुळे अशी बंडे पुन्हा होणार नाहीत. अर्थात कितीही आव आणला तरी सौदी राज्यकर्त्यांच्या विलासी, ऐषारामी शैलीमुळे ते अस्सल वहाबी लोकांना आजही खुपतात परंतु राजेशाहीमधे सौदी नेत्यांना अमर्याद अधिकार आहेत, त्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेत कुठलीही पारदर्शकता नाही, कुणालाही कसले उत्तरदायित्व नाही त्यामुळे हे सगळे आवाज दाबले जातात. हे ४७ शिरच्छेद हे ह्याच प्रकारचे उदाहरण आहे. अर्थात जर यदाकदाचित सौदी राजवट उलथली तर त्याहून जहाल मूलतत्त्ववादी राजवट तिथे सत्तेवर येणार हे दुर्दैवी सत्य आहे.