Skip to main content

मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म

लेखक यनावाला यांनी रविवार, 03/01/2016 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
......... सजीव येई जन्मासी ।अटळ असे मृत्यू त्यासी ।जाणीव प्रत्येक व्यक्तीसी ।जी का असते सज्ञानी ॥१॥ अनुभव आणि निरीक्षण । परस्पर संवाद , वाचन । निष्कर्ष तर्काने शोधून । जाणीव विकसित होतसे ॥२॥ सजीवासी मृत्यू अटळ । प्राण्यांना नकळे सकळ । सज्ञानी मानव केवळ । या सत्यासी जाणतसे ॥३॥ व्याघ्र-सिंह- ससे-भेकरे । मेंढ्या-बकर्‍या-गाई-गुरे । मरणाधीन असती सारे । परि ते सत्य न जाणती ॥४ ॥ पुराणांतरी सात जण । अश्वत्थामा-बळी-बिभीषण । परशुराम-व्यास-हनुमान । तैसा कृप पैं सातवा ॥५॥ यांसी म्हणितले चिरंजीव ।कल्पना केवळ मानीव । त्या त्या काळी सजीव ।ते असतील सातही ॥६॥ परंतु काळीं सांप्रत । या सातांतील जिवंत । कोणीही नसे निश्चित । वैज्ञानिक सत्य हे ॥७॥ देव मानिले अजरामर । नाही मरण नसे आजार । स्वर्गीं तयांचा संचार । सारे कल्पित डोलारे ॥८॥ तैसेचि ते अमृतसत्त्व। नाही तयासी अस्तित्व । मानव इच्छिती अमरत्व । मानसिकता ऐसी दिसे ॥९॥ मरण अटळ सर्वां पटे । परी अंतरी भीती दाटे । मरणासंबंधी शब्द वाटे । अशुभ, अभद्र, अमंगळ ॥१०॥ मयत-प्रेत-मढे- स्मशान । चिता-मर्तिक आणि सरण । तिरडी-गोवर्‍या-मसण । ऐशा शब्दां घाबरती ॥११॥ दशक्रिया-अकरावे-बारावे । शब्द अपवित्र न उच्चारावे । शुभकार्यीं अवश्य टाळावे । पाळिती संकेत अलिखित॥१२॥ भान औचित्याचे असावे । भय शब्दांचे नसावे । कोठे काहीही बोलावे । ऐसा अनर्थ न घ्यावा ॥१३ ॥ घडण्याची जें निश्चिती । टाळणे न कोणा हाती । तयाविषयीं ऐसी भीती । वाटे कोण्या कारणे ?॥१४॥ विवेकी व्यक्तीस ऐसे भय ।अनावश्यक अशोभनीय । मरणी भयदायक काय ।घटना एक नैसर्गिक ॥१५ ॥ वेदकाळी वदले चार्वाक । मरणीं गूढ न काही एक । जीवनी भोगावे सुख । आनंदाने मनुजाने ॥१६॥ यद्यपि मरण नैसर्गिक । जगावे काळ अधिकाधिक । प्राणिमात्रासी प्रत्येक । स्वाभाविक ऊर्मी ही ॥१७ ॥ म्हणौनि मृत्यू अप्रिय । टाळण्या सजीव सक्रिय । परंतु मानवा मरणभय । कदापीही नसावे ॥१८॥ प्रत्येकासी येते मरण । याचे जैविक कारण । जीवशास्त्रज्ञां उमगले जाण । सर्वमान्य असे हे ॥१९ ॥ टेलोमियर-जिनोम-जीन । गुणसूत्रे पेशी विभाजन । जिनोम लांबी त्रुटीकरण । प्रकरण ऐसे बिकट हे ॥२० ॥ द्यावे इथेच सोडोन । परी ऐसे जाणोन । नैसर्गिक मरणाचे कारण । ज्ञात आता मानवा ॥२१ ॥ अटळ मरण नि:संदेह । कांही न उरे जाता देह । जगाचा ऐसा चिर विरह ।असह्य वाटे मनुजासी ॥२२॥ यास्तव आत्मा असे अमर । ऐसा रचिला विचार । नाशवंत केवळ शरीर ।आत्मा जन्मे पुन:पुन्हा ॥२३॥ आत्मयासी शस्त्र छेदीना ।आत्मयासी अग्नी जाळीना । आत्मयासी पाणी भिजवीना । ऐसी ख्याती आत्मयाची ॥२४॥ आत्मा नाही देहीं कोठे । आत्म्याचे अस्तित्वचि खोटे । परी श्रद्धाळूंसी सारे पटे । कारण अमरत्व इच्छिती ॥२५ ॥ शरीर म्हणजे मी नोहे । ओळख माझी आत्मा आहे । तो अमर म्हणौनि पाहे । मीही अमर जाहलो ॥२६॥ विचार करिता खोटे सारे । श्रद्धावंता वाटे खरे। जगी वेगे असत्य पसरे । सत्या लागे विलंब ॥२७॥ संतवाणी- कथा -कीर्तने । गोष्टी-गाणी- आख्याने । नाटके-चित्रपट-प्रवचने । अनेक माध्यमे प्रभावी ॥२८॥ यांद्वारे पुनर्जन्म संकल्पना ।सातत्याने जनमना--। वरती बिंबविली भावना । मनी ठसोनी दृढ झाली ॥२९॥ असोनी असत्य आघवे। सश्रद्ध मानिती भावे । शंका काही न उद्भवे । सत्यासत्याविषयींची ।।३० ॥ आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म । त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥ आपण प्रयत्‍न करावे । गतजन्मीचे काही आठवावे । तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥ याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देतील लोक । पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥ गतजन्मीचे काहीही । आठवते ना कोणाही । पुनर्जन्म कल्पना ही । सत्य कैसी मानावी ? ॥३४॥ अपत्यरूपे माता-पितरे । पुन्हा जन्मासी येती खरे । जनुक-संक्रमण आधारे । मानणे हे शक्य दिसे ॥३५ ॥ परंतु माता-पितयाचा । अर्ध-पुनर्जन्मचि साचा । अपत्यजनुकीं दोघांचा समान वाटा निश्चित ॥३६ ॥ जिवंतपणी माय-तात । अर्धपुनर्जन्म देखतात । अपत्य पाहते प्रत्यक्षात । गतजन्म दोन अर्धेची ॥३७ ॥ शरीरशास्त्रग्रंथी देख । आत्म्याचा ना नामोल्लेख । इंद्रियांचे कार्य हृदयादिक । तयांचे वर्णन परिपूर्ण ॥३८॥ शरीर अंतर्बाह्य अभ्यासिती ।शल्यकर्म यशस्वी करिती । परी आत्म्याचे ना नाम घेती । कधीही देहीं न दिसे तो ॥३९॥ यापरी आत्मा नाही नाही । कोणाच्याही हृदयीं देही । तैं पुनर्जन्म कोण घेई । असत्य पुनर्जन्म संकल्पना ॥४०॥ पहिला तैसाचि शेवटचा । एकचि जन्म प्रत्येकाचा । गतजन्म-पुनर्जन्म कोणाचा । शक्य नसे कालत्रयी ॥४१॥ जाणावे आपण सर्वांनी । शंका असली काही मनीं । विचारे विवर-विवरोनी । निरसन पूर्णत्वे करावे ॥४२॥ असे सत्य वैज्ञानिक । जाणिती मानिती जे विवेक । पूर्वग्रहपीडित भाविक । अज्ञानासी कवटाळिती ॥४३॥ आत्मा-पुनर्जन्म-संचित ।अज्ञान सारे खचित । यास्तव याची संगत । निश्चये आपण सोडावी ॥४४॥ वृथा भीती मरणाची ।काढून टाकावी अंतरीची । अंतिम घटना आयुष्याची । काही न राही नंतर ॥४५॥ अर्चिरादि मार्ग सूर्यलोक । चंद्रलोक-विद्युल्लोक । पितृयान- देवयान -ब्रह्मलोक ।कल्पित सार्‍या भरार्‍या ॥४६॥ जाणणे हे आवश्यक । मानव प्रजातीं जन्म एक । लाभला गेला निरर्थक । ऐसे होईल अन्यथा ॥४७॥ ...................................................................................

वाचने 25204
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

यनावाला, तुमची ३३ वी ओवी निखालास खोटी आहे : >> याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देतील लोक । पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥ पुनर्जन्म आहे. पूर्वजन्माची स्मृती असलेल्या छोट्या बालकांना प्रश्न करून त्यावरून पूर्वजन्मातील नातेवाईक शोधले गेलेले आहेत. अधिक माहितीसाठी डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांची ही पुस्तके वाचावीत : १. Children Who Remember Previous Lives: A Question of Reincarnation http://www.amazon.co.uk/Children-Remember-Previous-Lives-Reincarnation/… २. Twenty Cases Suggestive of Reincarnation http://www.amazon.co.uk/Twenty-Cases-Suggestive-Reincarnation-Stevenson… आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

एक नक्की की माहिती पुरवविण्याचा ेपुस्तक हां महत्वाचा मार्ग आहे पण प्रयोगाविना या युगात काहीही सिद्ध होत नसते .प्रयोगान्ती निष्कर्ष नमूद करण्या करिता पुस्तक काढावेच लागते पण म्हणजे हरेक पुस्तक हे सत्याचा पुरावा असतेच असे नाही मग ते आज वाचनात येणारे रामायणासारखे पुस्तक ही असो वा चार्ली चापलिनचे आत्मवृत्त .

In reply to by चौकटराजा

चौकटराजा, तुम्ही म्हणता की प्रयोगाविना हल्ली काहीही सिद्ध होत नाही. मला ते मान्य नाही. एकतर या प्रसंगी कशासंबंधी प्रयोग करायचा आहे ते स्पष्ट नाही. प्रयोगाचे उद्दिष्ट काय असायला पाहिजे यावर प्रकाश टाकावा. दुसरी गोष्ट म्हणजे पुनर्जन्म सिद्ध करण्यासाठी अचूक निरीक्षण पुरेसं आहे. प्रत्यक्ष प्रयोगाची आवश्यकता नाही. ज्योतिषशास्त्रात ( म्हणजे astronomy ) प्रयोग करता येत नाहीत. केवळ निरीक्षणेच करता येतात. तरीपण ते शास्त्र मानले जाते. याच धर्तीवर पुनर्जन्माचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयोगाची आवश्यकता पडू नये. केवळ निरीक्षणे पुरेशी ठरावीत. आ.न., -गा.पै.

In reply to by चौकटराजा

प्रयोगाविना या युगात काहीही सिद्ध होत नसते
ह्याचा अर्धवट उपयोग आजकाल स्वयंघोषित विज्ञानवादी करतात. जर पुनर्जन्म आहे हा दावा प्रयोगा अभावी करता येत नसेल, तर पुनर्जन्म नसतो हे सिद्ध करणारा प्रयोग आहे का? जर अस प्रयोग नसेल तर तुमचा दावाही तितकाच वायफळ आहे. An atheist can not be a scientist. A scientist can only be an agnostic!

In reply to by पॉइंट ब्लँक

नाही हो, सिद्धतेचं काम असं चालत नाही. 'जोपर्यंत असिद्ध होत नाही तोपर्यंत सत्य' असं नसून 'सिद्ध होतं ते सत्य' अशा पद्धतीने सत्याची शोधणी चालते. हे समजून घेण्यासाठी रसेलची किटली ही संकल्पना उपयोगी पडते. रसेलची किटली 'Russell wrote that if he claims that a teapot orbits the Sun somewhere in space between the Earth and Mars, it is nonsensical for him to expect others to believe him on the grounds that they cannot prove him wrong.' नल हायपोथेसिस In inferential statistics, the term "null hypothesis" usually refers to a general statement or default position that there is no relationship between two measured phenomena, or no difference among groups.[1] Rejecting or disproving the null hypothesis—and thus concluding that there are grounds for believing that there is a relationship between two phenomena (e.g. that a potential treatment has a measurable effect)—is a central task in the modern practice of science, and gives a precise criterion for rejecting a hypothesis. थोडक्यात, इथे 'पूनर्जन्म नसतो' हा नल हायपोथिसिस आहे. 'पुनर्जन्म असतो' हे म्हणणारांवर तो प्रयोगांतून खोडून काढण्याची जबाबदारी असते. रसेलची किटली अस्तित्वात नाही हे सिद्ध करण्याची इतरांवर जबाबदारी नाही.

In reply to by राजेश घासकडवी

पुन्हा जन्म होतोय की नाही हे तपासून बघणारा "प्रयोग" कसा काय करायचा? कोण करणार? ;) अशा वेळेस पूर्वग्रह दूषित नसलेल्या लहान मुलांच्या 'आठवनींवर' विश्वास का ठेउ नये??

In reply to by राजेश घासकडवी

छान शब्द, अर्थ मात्र काडीचा निघत नाही.
it is nonsensical for him to expect others to believe him on the grounds that they cannot prove him wrong
इथेच सगळी गोची आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा असं कुणी म्हणतचं नाहीये. तुम्हाला फक्त चुक आणि बरोबर इतकेच दोन पर्याय दिसतात. अज्ञात नावाचीही एक गोष्ट असते. जेव्हा एखादी गोष्ट अज्ञात असते तेव्हा ती चुक असे म्हणायचे नाही आणि बरोबर असेही म्हणायचे नाही. विज्ञान आणि तत्वाज्ञानात परत गफलत कराताय.
इथे 'पूनर्जन्म नसतो' हा नल हायपोथिसिस आहे.
अरेरे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. स्टॅटिस्टिकल इनफरन्स इथे कसा लावायचा हा मुद्दा हा विषय जरा बाजुला ठेवू. पण नल हायपोथिसिसची संकल्पना इथे नक्कीच गंडली आहे. Null hypothesis can only be rejected. It is never accepted. When you can not reject null hypothesis, only conclusion one can draw is that, there is not enough evidence to reject it. Inability reject a null hypothesis does not give anyone an authority to accept it. Going beyond that the rejection when achieved, is only probabilistic, and susceptible to both type 1 and type 2 errors. त्यामुळे जबाबदारी कुणाची का असेना, तुम्हाला स्टॅटिस्टिकल इनफरन्सचा दुरुपयोग करायचा अधिकार नक्कीच नाही. तुम्हाला समजावे म्हणून परत एकदा भावार्थः आक्षेप पुनर्जन्म आहे की नाही ह्याला नसून तुम्हाला त्याविषयी अथवा त्याच्या विरोधात विधान करायचा अधिकार अद्याप विज्ञानाने दिला आहे असा गोड गैरसमज करून घेण्याला आहे. दोन गोष्टींमधला फरक समजला तर विज्ञानातील बुवाबाजी टाळता येईल.

In reply to by पॉइंट ब्लँक

दोन गोष्टींमधला फरक समजला तर विज्ञानातील बुवाबाजी टाळता येईल. +१०० "आम्हाला सगळं खात्रीने माहीत आहे (पक्षी, आम्ही ब्रम्हज्ञानी आहोत)." असा दावा करणारे आस्तिक/नास्तिक आणि धार्मिक/आधुनिक शास्त्रवाले इतके स्वमतांध असतात की दोघांनाही आपण बुवाबाजी करतो आहे हे दिसतच नाही ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"आम्हाला सगळं खात्रीने माहीत आहे (पक्षी, आम्ही ब्रम्हज्ञानी आहोत)." असा दावा करणारे आस्तिक/नास्तिक आणि धार्मिक/आधुनिक शास्त्रवाले इतके स्वमतांध असतात की दोघांनाही आपण बुवाबाजी करतो आहे हे दिसतच नाही ! :)
मला जे काही म्ह्णायचं होतं ते जास्त चांगल्या शब्दात लिहलं आहे तुम्ही. धन्यवाद.

In reply to by पॉइंट ब्लँक

याच प्रतिसादात 'पूनर्जन्म होणं' याजागी 'गुरू आणि शनिच्या मध्ये कुठेतरी एक चहाची किटली सूर्याभोवती फिरत असणं' हे घालून बघा. त्यातून जी वाक्यं तयार होतात ती तुम्ही तितक्याच जोरकसपणे मांडता येतात का ते तपासून बघा. नल हायपोथिसिस म्हणजे कुठच्यातरी सिद्ध न झालेल्या हायपोथिसिसला 'विरोध करणं' असा नसतो. 'जोपर्यंत पुनर्जन्म/गुरुजवळची किटली/इतर अनेक कल्पित गोष्टी - यांसंबंधात पुरेसा पुरावा नाही, त्यामुळे या गोष्टी अस्तित्वात नाहीत हे गृहित धरून चालणंच योग्य' याला नल हायपोथिसिस म्हणतात. ज्यांना त्या आहेत हे सिद्ध करायचं अाहे त्यांनी ते पुरावे द्यावेत. इतकी शतकं प्रयत्न करूनही पुरेसे पुरावे नाहीत म्हटल्यावर नल हायपोथिसिस खंबीर होत जातो. 'विज्ञानातली बुवाबाजी' हेदेखील 'जीवशास्त्राचा पाया डळमळीत झाला आहे' यासारखं विधान का? एखाददोन लेख त्यावर लिहीत का नाही तुम्ही? का त्यासाठी मिपा ही योग्य जागा नाही?

In reply to by राजेश घासकडवी

इतकी शतकं प्रयत्न करूनही पुरेसे पुरावे नाहीत म्हटल्यावर नल हायपोथिसिस खंबीर होत जातो.
हे कुठल्या स्टॅटिस्टिकच्या पुस्तकात दिले आहे जरा सांगा, माझे अज्ञान जरा दूर होईल.
'विज्ञानातली बुवाबाजी' हेदेखील 'जीवशास्त्राचा पाया डळमळीत झाला आहे' यासारखं विधान का?
ज्या लेखावर तो प्रतिसाद दिला आहे तिथून तर पळ काढलात, इथे किडा करून काय उपयोग. तिथे काय ठरलं होतं ह्याची आठवण करून देतो. तुम्ही तुमच्या लेखातल्या आणि प्रतिसादातल्या दाव्यांना संदर्भ द्यायचे (पियर रीव्हुड जरनल, ब्लॉग नाही) मग मी माझ्या विधानांना संदर्भ देइन. मग पुढे बोलू. उगाच हवेत बाण मारून पळवाटा काढू नका. आता तुमच्या अवकाशातल्या किटली विषयी - कुणाला माहित, उद्या एखादा तुमच्यासारखा हुशार, जंबोजेट दृष्टांत लावून सांगेल की किटली तिथे आपोआप तयार झाली असेल. आणि थोड्या अब्जावधी वर्षांनी आपोआपच तिथे चहा पण तयार होईल. तसही किटली आणि चहा सजीवांपेक्षा कमीच क्लीष्ट. लक्षात येतोय का विरोधाभास?

In reply to by पॉइंट ब्लँक

तुम्ही तुमच्या लेखातल्या आणि प्रतिसादातल्या दाव्यांना संदर्भ द्यायचे
मी जे सांगतो ते शाळांमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, पाठ्यपुस्तकांतून शिकवलं जातं. इतकं प्रस्थापित ज्ञान आहे ते.
उद्या एखादा तुमच्यासारखा हुशार, जंबोजेट दृष्टांत लावून सांगेल की किटली तिथे आपोआप तयार झाली असेल. आणि थोड्या अब्जावधी वर्षांनी आपोआपच तिथे चहा पण तयार होईल. तसही किटली आणि चहा सजीवांपेक्षा कमीच क्लीष्ट. लक्षात येतोय का विरोधाभास?
जंबोजेट दृष्टांत हा लेख तुम्ही नीट वाचलेलं दिसत नाही. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की असे चमत्कार एका झटक्यात घडत नसतात. त्यासाठी अब्जावधी वर्षं सुधारणा करत नेणारी प्रक्रिया लागते. असो. तुम्ही विज्ञानात बुवाबाजी कशी चालते यावर स्वतंत्र लेखन कराच. वाचायला प्रचंड आवडेल.

In reply to by राजेश घासकडवी

मी जे सांगतो ते शाळांमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, पाठ्यपुस्तकांतून शिकवलं जातं. इतकं प्रस्थापित ज्ञान आहे ते.
काय सांगताय काय? आयला आम्हीच कुठल्या दळभद्रि शाळेत आणि विश्वविद्यालयात गेलो होतो माहित नाही. बिच्यार्यांनी विश्वविद्यालायात तर, चांगल्या जरनल मधले पेपर पन नियमितपणे वाचा म्हणून सांगतिलं होत. आम्ही आपले मूर्खासारखं आजपर्यंत तेच करत आलो आहोत.
जंबोजेट दृष्टांत हा लेख तुम्ही नीट वाचलेलं दिसत नाही. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की असे चमत्कार एका झटक्यात घडत नसतात. त्यासाठी अब्जावधी वर्षं सुधारणा करत नेणारी प्रक्रिया लागते.
मी तर कुठ म्हंटल की किटली एका झटक्यात तयार होईल. झाली असेल हळू हळू.
असो. तुम्ही विज्ञानात बुवाबाजी कशी चालते यावर स्वतंत्र लेखन कराच. वाचायला प्रचंड आवडेल.
करू आम्ही आमच्या मर्जीनं, सोयीनं आणि सवडीनं. तोपर्यंत प्रतिसाद गोड मानून घ्या.

वृथा भीती मरणाची, भाऊ पुनर्जन्म असेल तर माणसाला मरणाची भीती राहणार नाही. एकच जन्म असेल तर माणसाला मरणाची भीती राहणारच. ४५वी ओवी पचली नाही. या जन्मात तर आपण बाबूच राहिलो. मेलो तरी काही चिंता नाही, बघू पुढच्या जन्मी ... राजयोग आहे कि नाही.....

चार्वाक काय बोलुन गेले ते आपण ऐकलेत पण आपली संत परंपरा काय बोलोन गेले ते ऐका. 8399999 जन्म घेतल़े की मनुष्यजन्म प्राप्त होतो.

पुढे आता कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ।। सर्वथाही फिरो नये । ऐसी सोय लागलिया ।। पांडुरंगा ऐसी नाव । तारू भाव असता ।। तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ।। ============================= तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याचा जन्म मिळाल्यावर आता यापेक्षा अधिक वेगळ्या कसल्या जन्माची अपेक्षा ठेवायची, कारण मनुष्याचा जन्म जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवण्यास माणसास मदत करू शकतो. ते म्हणतात एकदा का माणसाचा जन्म मिळाला की या त्याचा एका योनीतून दुसऱ्या योनीत फिरणारा प्रवास संपतो, कारण मनुष्याच्या जन्माला येउन माणसाला इच्छित साध्य करून घेत येते. ते म्हणतात पांडुरंग नावाची होडी आपल्याला या भवसागरातून सोडवू शकते, पार नेऊ शकते, एवढेच नव्हे तर हा पांडुरंग जन्म-मरणाच्या फेऱ्यातून देखील सोडवू शकतो फक्त माणसाची त्याच्यावर नितांत श्रद्धा हवी.

छान काव्य ! बा़की सगळे ठीक आहे पण अन्यथा छान सारासारावर चाललेले काव्य एका ठिकाणी मानसशास्त्रावरून घसरून अध्यात्मात पडले आहे. "वृथा भीती मरणाची । काढून टाकावी अंतरीची ।" हे दुसर्‍याला सांगणे सोपे आहे. पण, कोणताही (आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी किंवा इतर कोणताही) झेंडा हाती धरलेल्या मानवात जीवनाची आसक्ती नसणे हे अत्यंत अभावानेच दिसते. आपले आयुष्य आनंदाने उपभोगता यावे अशी जन्मभर इच्छा धरणारा मानव त्या आयुष्याचा शेवट आल्यावर... काही सन्माननिय अपवाद वगळता... कावराबावरा होतोच. मानवाला मरण अटळ आहे हे सगळ्यांनाच मान्य असते. पण मृत्युची भिती न बाळगणे बहुसंख्य माणसांच्या ताकदीपलिकडचे असते... ... आणि त्यात तसे फार वाईट काहीच नाही. कारण, "जगण्याची आसक्ती" हे मानवी प्रजातीला आतापर्यंत पृथ्वीवर टिकवून ठेवण्यासाठी एक फार महत्वाचे कारण ठरले आहे. इतर वेळेस वाघ असलेले, पण मरणाच्या भितीने चळचळा कापणारे किंवा मरणाच्या मार्गावर असताना त्या कल्पनेनेच गलितगात्र झालेले, खूप नास्ति़क पाहिले आहेत. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इतर वेळेस वाघ असलेले, पण मरणाच्या भितीने चळचळा कापणारे किंवा मरणाच्या मार्गावर असताना त्या कल्पनेनेच गलितगात्र झालेले, खूप नास्ति़क पाहिले आहेत. :)
मला अस वाटत की लोक मरणापेक्षा वेदनेला घाबरतात. मरण कुणाला टळलेल नाही हे प्रत्येक जाणतोच पण ते कसे येणार आहे हे जाणत नाही. म्हणून वेदनादायी मरण येवू नये अशी इच्छा असते. यावरील काही चर्चा परमसखा मृत्यू: किती आळवावा १) परमसखा मृत्यू : किती आळवावा.... http://www.mr.upakram.org/node/1386 २) सुखांत http://www.mr.upakram.org/node/2168 ३) पुन्हा एकदा सुखांत! http://www.mr.upakram.org/node/2491 ४) सन्मानाने मरण्याचा हक्क http://www.aisiakshare.com/node

In reply to by प्रकाश घाटपांडे

भय मृत्युचं नसुन त्यामुळे येणार्‍या जाणत्या/अजाणत्या दु:खाचं असतं.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी "मरणाची भिती" लिहिलेय, "वेदनेसह आलेल्या मरणाची भिती" असे लिहीले नाही. त्या वाक्यातील शब्दांमागे कोणताही गर्भित अर्थ नाही. :) "ठासून बोलणे" आणि "प्रत्यक्ष तशी वेळ आल्यावर वागणे" यात बराच (?जमीन-अस्मानाचा) फरक असणे हे माणसात अजिबात विरळ नाही ;)

In reply to by अर्धवटराव

तुम्हाला अर्थाबद्दल बोलायचय की काव्याबद्दल?! कुणाच्या काव्यगुणाचा अनादर करू नये हो अर्धवटराव. :)

७ ओळी (श्लोक) कमी केल्या असत्या तर यनावाला चालीसा झाली असती ! जाऊ द्या यनावाला सत्तेचालीसा म्हटलेले चालेल का ? रच्याकने इतकं मोठं काव्य कसं काय केलं हो ? रचलं ?सुचलं ? झालं ? का स्फुरलं ?

In reply to by उगा काहितरीच

उ.का., सत्तेचालीसा वरून ४७ डोकी मारल्याचं आठवलं : http://misalpav.com/node/34341 यास काव्याचा प्रेरणास्रोत म्हणण्यास हरकत नसावी ! ;-) आ.न., -गा.पै.

काही प्रश्न 1)पुनर्जन्म आहे म्हणणार्यांना स्वतःचा काही अनुभव? 2)पुढच्या वेळी अमेरिकेत जन्म मिळावा यासाठी कोणत्या प्रकारचे कर्म करावे. 3)पुरूषाला स्त्रीचा आणि स्त्रीला पुरूषाचा जन्म मिळतो का? 4)पुनर्जन्माबाबत स्मृती असलेल्या उदाहरणांपैकी एकही असं उदाहरण नाही कि तो मागच्या जन्मी कुत्रा,बैल,गाढव,घोडा,मासा,साप,हत्ती होता असे सांगत आहे, कारण तसं सांगितल्यावर खात्री करायला कोण जाणार? नाही का? 5)लोकसंख्या वाढत आहे म्हणजेच आत्म्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.पण आत्म्याचे विभाजन तर होऊ शकत नाही.मग हे वाढीव आत्मे कोठून येत आहेत? म्हणजे 1920 साली भारताची लोकसंख्या 40 कोटी होती म्हणजेच 40 कोटी आत्मे होते, आता ती लोकसंख्या 125 कोटी आहे,म्हणजे मधल्या काळात 85 कोटी नवीन आत्म्यांचं प्रोडक्शन झालं म्हणायचं? 6)कर्मानुसार त्याचं फळ मिळतं.म्हणजे दुसरा जन्म मिळतो,पण वाघाला जर माणसाचा जन्म घ्यायचा असेल तर त्याने कोणते कर्म करावेत? कारण दररोज प्राणीहिंसा करून तो वाघ पापच करत आहे.मग त्याला मनुष्य जन्म मिळणार कसा?

In reply to by याॅर्कर

5)लोकसंख्या वाढत आहे म्हणजेच आत्म्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.पण आत्म्याचे विभाजन तर होऊ शकत नाही.मग हे वाढीव आत्मे कोठून येत आहेत? म्हणजे 1920 साली भारताची लोकसंख्या 40 कोटी होती म्हणजेच 40 कोटी आत्मे होते, आता ती लोकसंख्या 125 कोटी आहे,म्हणजे मधल्या काळात 85 कोटी नवीन आत्म्यांचं प्रोडक्शन झालं म्हणायचं? हँ, हे एकदम सोप्पाय ! या दुष्ट, क्रूर (आणि बरेच काही असलेल्या) मानवांनी स्वच्छता आणि आरोग्याच्या नावाखाली कीटकनाशके वापरून एकंदर किती कीटक मारले, आधुनिक वैद्यकाच्या नावाखाली अँटिबायोटिक्स वापरून एकंदर किती बॅक्टेरिया मारले आणि शिकारीच्या नावाखाली बंदुका वापरून एकंदर किती प्राणी मारले (आणि किती प्रजाती नामशेष केल्या) याचा हिशेब लावलात तर, गेला बाजार, टोटलमध्ये आत्मे कमी पडणे तर सोडाच, पण कित्ती कित्ती तरी आत्मे रिझर्वमध्ये नव्या जन्माची वाट पहात रांगेत उभे असतील हे नक्की पटेल. ;) =)) =))

In reply to by याॅर्कर

लोकसंख्या वाढत आहे म्हणजेच आत्म्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.पण आत्म्याचे विभाजन तर होऊ शकत नाही.मग हे वाढीव आत्मे कोठून येत आहेत?
काहीतरी यडपणासारखा प्रश्न. एकतर आत्मा अमर आहे पण म्हणून नवीन तयार करता येत नाही असं कोणी सांगितलंय? आणि नवीन करण्याची गरज तरी काय? साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एक महाप्रचंड उल्का पृथ्वीवर आदळली आणि त्यात सगळे डायनोसॉर मेले. त्यांंचेच आत्मे कित्येक लाख योनींमधून जाऊन आता ह्यूमन फॉर्ममध्ये दिसत आहेत, समजलं?
कारण दररोज प्राणीहिंसा करून तो वाघ पापच करत आहे.मग त्याला मनुष्य जन्म मिळणार कसा?
प्राणीहत्या करणं हेे वाघाचं कर्मच आहे. त्याचं तो मुकाट्याने पालन करतो. मात्र तो इतर वाघांची पोरंदेखील मारून खातो. आता हेदेखील त्याच्या कर्माचाच भाग आहे किंवा कसं हे माहीत नाही. त्यामुळे त्याला पुनर्जन्म चांगला मिळायला मदत होते की नाही हेही तज्ञांनाच विचारायला हवं.

जगबुडीच्या वेळेस सर्वच आत्मे एकाच वेळेस वर जातील. त्यानंतर पृथ्वीवर पुन्हा अनुकूल परिस्थिती होईपर्यंत ते पुनर्जन्म घेणारच नाहीत का ? की त्यांचे अमीबा होतील ?

मरण अटळ आहे हे समजते.म्हणून नैसर्गिक मृत्यूची भीती नाही.मला ७५ व्या वर्षीं नाही.पंचविसाव्या वर्षीं नव्हती, म्हणजे जीवनाची आसक्ती नाही असे नाही. आनंदाने अधिकाधिक जगायचे आहे. जगाविषयीचे सत्यज्ञान मिळवायचे आहे. इतरांना सांगायचे आहे, नैसर्गिकमृत्यू येणार हे समजते. पण जबडा पसरलेला वाघ अचानक समोर आला तर भीती वाटणारच. त्याचे सुळे शरीरात घुसल्यावर ज्या वेदना होतील त्यांची भीती आहे. पण अशा प्रसंगाची संभवनीयता नगण्यच. म्हणून मरणाला चळचळा कापण्याचे काहीच कारण नाही.अनेकांचे शांत मृत्यू पाहिले आहेत.माझ्या ज्येष्ठ बंधूचे निधन हे जवळचे उदाहरण आहे,

In reply to by यनावाला

.मला ७५ व्या वर्षीं नाही
नमस्कार करतो हं आजोबा. . . . . ज्यांनी ज्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांचा फार छळ केलाय समाजाने.(नकळत तुमचाही होत असेल?)

In reply to by यनावाला

मृत्युला तयार आहे. जगण्यात रस वाटतो आहे. वेदनेला घाबरत आहे .नास्तिक आहे पण जन्म पालन व मरण हे ईशवराचे सर्वोत्तम डिझाईन आहे असे मानतो. मी ही शांतपणे आलेले मृत्यु पाहिले आहेत. मला स्वतः ला असे वाटते की खर्या मृत्यूवेदना येण्यापूर्वी माणूस जाणीवांच्या पलिकडे जात असावा.कन्वल्शन कोमा व डेथ अशा तीन अवस्थातून .

आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म । त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥ आपण प्रयत्‍न करावे । गतजन्मीचे काही आठवावे । तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥ भारतातले सोडुन द्या लास्ट बर्थ रिग्रेशन थेअरी वाचा. परदेशी सायकोलोजीस्ट ने मांडलेली थेअरी आहे. मग पटणारच. योग सुध्दा आधी परदेशात गाजला मग भारतीय लोकांना पटला.

In reply to by नितीनचंद्र

तुमचा प्रतिसाद उपरोधिक असावा असे वाटते तरीही...
भारतातले सोडुन द्या लास्ट बर्थ रिग्रेशन थेअरी वाचा. परदेशी सायकोलोजीस्ट ने मांडलेली थेअरी आहे. मग पटणारच.
फुल फेकाफेकी केली आहे त्या "परदेशी सायकोलोजीस्ट" ने. रच्याकने, ते डॉ. महाशय सायकॉलॉजिस्ट नसून सायकियाट्रीस्ट आहेत. त्या पुस्तकाला त्यांनी "पेहले मैं ऐसी बाते करनेसे बहुत डरता था. क्योंकी मैं एक सायकियाट्रिस्ट था. अक्सर मैं यही सोचता था की लोग मेरे बारेमे कहेंगे की मै एक सायकियाट्रिस्ट होने के बावजूद ऐसे बाते कैसे कर सकता हूं..." अशा चालीची प्रस्तावना की मनोगत लिहिले आहे.

In reply to by नितीनचंद्र

परदेशी सायकोलोजीस्ट ने मांडलेली थेअरी आहे. मग पटणारच.
इतकी वर्षं परदेशी राहून लक्षात आलेलं आहे की वायझेड लोक सगळीकडेच असतात. पु. ना. ओक काय किंवा एरिक व्हॉन डॅनिकेन काय... वायझेडपणाला धर्म, वर्ण, भूगोल काही नसतं.

In reply to by राजेश घासकडवी

घासूगुरुजी पु.ना.ओक = वायझेड ? मग कुठल्याश्या फ्रेंच जवाहिऱ्याच्या सांगण्यावरून ताजमहाल शहाजहानने बांधल्याचा दावा करणारं भारत सरकार काय ट्रिपलेक्स का ? तुमच्यासाठी एक प्रत्यक्ष कथा सांगतो. कर्णावती (म्हणजे अहमदाबाद बरंका) येथे एका हिंदू बांधकाम व्यावसायिकाची इमारत मुस्लिमांनी पडायला लावली. कारण म्हणे ती वास्तू माशिदीपेक्षा उंच होती ! पुढे खटला उभा राहिला. पु.ना.ओकांनी युक्तिवाद सुचवला की ती मशीद भद्रकाली देवीचं मंदिर आहे. हे ऐकल्यावर वादींनी मुकाट्याने खटला मागे घेतला. मुस्लिमांना सत्य बाहेर यायला नको होतं ना ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अोक थोर वाटत असतील प. वि. वर्तकांचं नाव घ्या, किंवा 'अमुक मंत्र म्हटला की बलात्कार होत नाही, बलात्कार करणारा नपुंसक होतो' वगैरे काहीतरी म्हणणारे कोणतेतरी बापू घ्या. किंवा 'हस्तमैथुन केलं तर स्वर्गात गेल्यावर हात गरोदर राहातील' म्हणणारा कोणतासा मौलवी घ्या. किंवा 'खरोखर बलात्कार झाला असेल तर त्यातून संतती होत नाही' असं म्हणणारा अमेरिकन सेनेटर घ्या... हाय काय नाय काय. मुद्दा बदलत नाहीच. वायझेडपणाला धर्म, जात, भूगोल वगैरे काही नसतं. (एक उदाहरण तुम्हीच दिलंत की!)

In reply to by गामा पैलवान

वाय-झेड शब्दाचा खरा अर्थ असली लाल किताब मध्ये जो दिला आहे तो असा. वाय-झेड हे यॉर्कशायरी-झेंडु चे संक्षिप्त रुप आहे. नावाप्रमाणेच याचा उगम यॉर्कशायर मध्ये झालेला असला तरी हा कुठेही सहज फोफावतो. याची लागवड करावी लागत नाही हा काँग्रेस गवता सारखा कुठेही फोफावतो. युनिव्हर्सीटीतही हा आढळतो तसेच प्रार्थनास्थळांतही आढळतो. यास्काचार्यांच्या निरुक्तातही यावर निरुपण आलेले आहे. याची व्युत्पत्ती "झ" या क्रिया .... असो. तर यापासुनच झंडु बाम या वेदनाशामकाची उत्पत्ती झालेली आहे. झंडु बाम वैचारीक वेदनांचे शमन प्रभावीपणे करुन एक दिलासा....हवाहवासा.... प्रदान करतो. तर एक जुन्या लोकांना आठवत असेल मराठीत एक भावगीतही आहे " प्रिया मी झंडुबाम जाहले प्रिया मी केवळ तुजसाठी " येडी बाभळ ही याची थोरली बहीण झारा याचा धाकला भाऊ.

In reply to by मारवा

हा हा हा. एके काळी 'वायझेड' नावाचा माउंटेनियरिंग क्लब होता. ते त्याचं विस्तृतीकरण यंग झिंगारो असं करत.

In reply to by राजेश घासकडवी

श्री.राजेश म्हणतात त्याप्रमाणे असले हे सारेच लेखक वाय.झेड. असतात असे नाही. बहुतेक जण धूर्त आणि लबाड असतात. आपण लिहितो ते खोटे, बनावट आहे याची त्यांना पूर्ण जाणीव असते. राजेश लिहितात ते विशेषण त्या लबाडांच्या गिर्‍हाइकांना मात्र लावता येईल. ही गिर्‍हाइके श्रद्धाळू असतात. पुनर्जन्मासारख्या कल्पनांवर त्यांची श्रद्धा असते. या कल्पना खोट्या आहेत असे वैज्ञानिक लिहितात, बुद्धिवादी सांगतात,तेव्हा ते हताश होतात. पुरावे सापडून आपल्या श्रद्धा दृढ व्हाव्या म्हणून तळमळतात. पुराव्यांसाठी हपापतात. समाजातील ही गरज कांही लबाड प्रकाशक, लेखक नेमकी हेरतात. मग असली बनावट पुस्तके काढतात. श्रद्धाळूंना आनंद होतो."चला, चला! पुरावा आला. पुनर्जन्म सिद्ध झाला!" असे म्हणत पुस्तकावर उड्या टाकतात. लक्षावधी प्रती खपतात. अशी ही गिर्‍हाइके सर्वकाळी, सर्व समाजांत असतात. त्यांना गंडवणारे भामटे असतातच.श्रद्धाळूंना अज्ञानात खितपत ठेवण्यातच त्या हितसंबंधीयांचा लाभ असतो.तो ते बरोबर उठवतात.

"बहूनि व्यतीतानि जन्मानि तवचार्जुन|तान्यहंवेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप|"[अर्जुना, तुझे अनेक जन्म झाले.पण ते तुला आठवत नाहीत.]म्हणजे कोणालाच आपला पूर्वजन्म आठवत नाही,हे व्यासांना ठाऊक होतेच.आपणा सर्वांचा अनुभव असाच आहे."आम्हांला गतजन्म आठवत नाही.कुणाला आठवत असेल तर त्याचे अनुभव आम्ही का ऐकू नयेत? ...ऐकावे! ऐकावे! कान भरून ऐकावे. मनभरून ऐकावे.कोण नको म्हणेल ?पूर्वी गतजन्माच्या आठवणीची एखादी बातमी येत असे.आता मुळीच नाही.कारण अशा दाव्याचा खोटेपणा लगेच उघडा पडतो.पण दुसर्‍याचे कशाला ? तुमचे स्वतःचे अनुभव ऐकण्यासाठी हिप्नॉटिक रिग्रेशनची बुवाबाजी आहे ना!हा माणूस तुम्हाला संमोहित करून भूतकाळात मागे मागे नेतो.तुम्ही मागच्या जन्मात जाता.मग त्या जन्मातील हवे तेवढे अनुभव तो सांगतो.बरीच फी द्यावी लागते एवढेच. मागील जन्मविषयी कोणालाच काही आठवत नाही.तर कुणीही मानू शकेल की गतजन्मी मी सार्वभौम राजा होतो.वैभवशाली, ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत होतो.तर ते खोटे कसे म्हणता येईल?पुनर्जन्माची ही हास्यास्पदता लक्षातच येत नाही का? उगीच पुनर्जन्म !पुनर्जन्म म्हणत उड्या मारण्यात काय अर्थ आहे? वास्तवात जग आहे तसे स्वीकारावे. स्वबुद्धीने विचार करावा,ग्रंथातले अज्ञान ग्रंथात राहू दे.

पुनर्जन्म म्हटले की लोक तुटुन पडणार हे तर माहितीच होते. त्यातुन चर्चा आत्म्याकडे भरकटणार हे ही नक्कीच. आत्मा म्हणजे शरीराच्या आत कुठलीतरी अदृष्य / अस्पष्ट आकृती असते आणि मनुष्याच्या मृत्युनंतर ती कुठेतरी निघुन जाते आणि मग परत दुसरे शरीर धारण करते इतका लिमिटेड अर्थ मी तरी नाही काढत. असे म्हणतात की माणूस जन्मतो तेव्हा त्याच्या हातात माती असते. याचे शास्त्रीय कारणही असेलच काहितरी. मला नाही माहिती. पण माणूस मेल्यानंतर त्याला जाळा, पुरा अथवा त्याला गिधाडांना खायला घ्याला. अंततः त्या शरीराची मातीच होणार. मातीसकट उगवलेला जीव परत मातीतच जातो. थोडक्यात एक चक्र पुर्ण होते. त्या मातीतुनच नविन सजीवाची निर्मिती होते. तस्मात जीवाची झालेली ती माती हाच तो त्या जीवाचा आत्मा ज्यातुन एक नविन जीव निर्माण होतो. घासुगुर्जींच्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे एकपेशीय जीवातुन अनेक पेशीय जीव निर्माण झाले. त्याच्याही मागे जाउन बघितले तर कदाचित निर्जिवातुन सजीवाची निर्मिती झाली. ज्यातुन तो जीव जन्मला ती निर्जीव अथवा जीव निर्माण करणारी सजीव नसलेली शक्ती म्हणजे आत्मा. अंततः ती त्या घटकाची जीव निर्माण करण्याची शक्ती आहे. त्यातुन एकच जीव निर्माण होइल असे नाही आणी त्यातुन मानवच निर्माण होइल असेही नाही. ८४ योनींच्या चक्रामागेही काही विज्ञान असेल. आजघडीला आपल्याला माहिती नाही. थोडक्यात आत्मा म्हटल्यावर डोळ्यासमोर जी प्रतिकृती उभी रहते तसेच काही असेल असे नाही पण आत्मा म्हणजे मनुष्यामधील मृत्युपश्चात पुनरुत्पादन करण्याची शक्ती देखील असु शकते. अवांतरः हे सगळे खुप विस्कळीत आहे हे मान्य. पण तुर्तास माझे विचार या धर्तीवर आहेत. भविष्यात जुन माहिती मिळाल्यास अथवा विचार केल्यास बदलु शकतात.

ऋणम कृत्वा घृतम पिबेत असे संस्कृत वचन चार्वाकाने अनंत काळापुर्वी दिले आहे. या वचनाला मानणारी पिढी आता नसेल तर नवल. चार्वाकला सुध्दा महर्षी किंवा ज्याला आदरयुक्त संबोधता येईल असा दर्जा भारतीय संस्कृतीने दिला आहे. मग आत्मा नाही म्हणणारी आजची मंडळी सुध्दा त्याच संबोधनाला पात्र आहेत. तुम्ही तुप प्या आम्ही अध्यात्माचे अमृत पितो.

यनावाला, तुमच्या तर्कशुध्द विवेचनात न पटलेला भाग असा. शरीरशास्त्रग्रंथी देख । आत्म्याचा ना नामोल्लेख । इंद्रियांचे कार्य हृदयादिक । तयांचे वर्णन परिपूर्ण ॥३८॥ शरीर अंतर्बाह्य अभ्यासिती ।शल्यकर्म यशस्वी करिती । परी आत्म्याचे ना नाम घेती । कधीही देहीं न दिसे तो जे दिसते ते सत्य मानले तर शरीर फाडल्यावर मन कोठे दिसते ? तरी सायकेट्रिस्ट अश्या पदव्या आहेत शिवाय देशोदेशीच्या लोकांनी ही उपचार पध्दती मान्य केली आहे. तुम्ही शरीरात मन नसते मग ते का मानले जाते ?

In reply to by गॅरी शोमन

"अंगुष्ठमात्रो पुरुषोSन्तरात्मा सदा जनानां हृदये संनिविष्ट:।" असे कठोपनिषदात म्हटले आहे. माणसाच्या हृदयात आत्मा असतो असे सर्व (दहा) उपनिषदांत आहे. शरीरातील अंर्तर्बाह्य खडान् खडा गोष्टी आधुनिक वैद्यकशास्त्राला ज्ञात आहेत. शरीरात नखाएवढा आत्मा असता तरी तो वैद्यकशास्त्रज्ञांना दिसलाच असता. ते असो. तुम्ही म्हणाल आत्मा दिसत नाही म्हणून त्याचे अस्तित्व नाकारायचे का? मन कुठे दिसते ? पण ते असतेच ना? हे पाहा ,मन आणि बुद्धी या अमूर्त कल्पना असल्या तरी त्यांचे अधिष्ठान मेंदू आहे. मेंदूत उद्भवणार्‍या सर्व भावनांचा समुच्चय म्हणजे मन. आनंद, दु:ख, राग, मत्सर इ. भावनांचा आविष्कार स्पष्टपणे दिसतो. त्यावरून मन आहे हे समजते. पण त्या मनासाठी मेंदू आणि मेंदूसाठी शरीर असणे आवश्यक आहे. शरीर नसेल तर मनाचे (तसेच बुद्धीचेही) अस्तित्व संभवत नाही. तद्वतच अशरीरी आत्मा असणे सर्वथैव अशक्य आहे, हे कॉमनसेन्सने कळते. आत्मा अस्तित्वात असता तर त्याचा उल्लेख शरीरशास्त्राच्या एका तरी अधिकृत पुस्तकात असता. पण कुठेच नाही. यावरून आत्मा नाही असाच निष्कर्ष निघतो.("आत्मा आणि मानवी मेंदू" या विषयावर एक लेख ग्लोबल मराठीवर आहे. शक्य झाल्यास वाचावा.)

In reply to by यनावाला

यनावाला, सन्निविष्ट म्हणजे जड अस्तित्व नव्हे. हृदयापाशी 'स्व'ची जाणीव असते. तिलाच आत्मा म्हणतात. जाणीव ही देहाहून वेगळीच असते. आत्मा जाणीवस्वरूप असल्याने देहाहून वेगळाच असणार आहे. तो देहाच्या आत सापडायला पाहिजे ही अपेक्षा व्यर्थ आहे. प्रचलित विज्ञानानुसार इलेक्ट्रॉन अणुगर्भाशी लिप्त असतो. तो अणुकेंद्राच्या आंतही नसतो आणि बाहेरही नसतो. फक्त संबंधित असतो. मग आत्म्यानेच काय घोडं मारलंय? आ.न., -गा.पै.

बुडती हे जन पाहवेना डोळा ।'यने' धार्ष्ठ केले गोळा। कोळीष्ठके फिरवला बोळा ।विवेकाचा यनावाला मनी उठती तरंग ।ते हे अभंग । वाचा निष्शंक ।तर्कशुध्द लिहिणे नसे पोरखेळ।यमके व नेमके शब्दमेळ।ना ना मतांची भेळ।व्हावी कदर

खरच आत्म्याचे अस्तीत्व मान्य करणे कठीण विषय आहे. योगसुत्र नावाचा ग्रंथ सुध्दा तर्काने आत्मा जाणावा असे सुचवतो. मनाचा व्यापार तर्काने जाणणे शक्य आहे. प्रत्यक्ष मन आजच्या शरीरशास्त्राला दिसले नाही तरी. आत्मा कसा आहे हे लिहताना आद्य शंकराचार्य म्हणतात. मनो बुद्धि अहंकार चित्तानी नाहं नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे नच व्योम भूमि न तेजो न वायु चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम ||1|| जो ना शरीराशी एकरुप नसतो त्याचे अस्तित्व इंद्रीयामार्फत प्रकट होणे अशक्यच. अनुभुती हा शब्द अनेक जण वापरतात. ही अनुभुती सर्वांना येणे अशक्यच. सबब आत्मा नसतोच हा तुमचा तर्क सामान्य रुपाने स्विकारला जाणे अपरिहार्य आहे. ज्याला वेद श्रुती स्मृतीवर भरवसा आहे ते बापडे करोत प्रयत्न.