Skip to main content

विश्वाचे आर्त - भाग २ - नासदीय सूक्त

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 04/12/2015 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका ऋग्वेद १०.१२९ । ऋषिः परमेष्ठी प्रजापतिः । छन्दः त्रिष्टुप् । देवता भाववृत्तम् । नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् । किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥ न मृ॒त्युरा॑सीद॒मृतं॒ न तर्हि॒ न रात्र्या॒ अह्न॑ आसीत्प्रके॒तः । आनी॑दवा॒तं स्व॒धया॒ तदेकं॒ तस्मा॑द्धा॒न्यन्न प॒रः किं च॒नास॑ ॥ २ ॥ सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही. धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं. काही झाकलेलं नव्हतं, की लपलेलं नव्हतं. त्या क्षणी ना मृत्यू होता, ना मृत्यूपासून सुटका. एका निर्वात, निरावकाशाने स्वतःला जेव्हा आणलं, आणखी काही काही तिथे नव्हतं. ---- कुठल्यातरी तप्त वायूंची एक तबकडी स्वतःभोवती भिरभिरली. त्यातला मुख्य भाग गुरुत्वाकर्षणाने केंद्राकडे खेचला गेला. हा आपला सूर्य. त्या तबकडीच्या काही भागांत इतर वायू गोळा झाले. त्यांचे जागोजागी गोळे झाले. ते अव्याहतपणे गुरुत्वाकर्षणाने सूर्याभोवती फिरत राहिले. पोटात कमीजास्ती आग राखून ठेवून थिजले. आपापल्या परीने घट्ट-विरळ, ओले-कोरडे, थंड-गरम झाले. हे आपले सूर्यमालेतले ग्रह. त्यातलीच एक आपली पृथ्वी. पृथ्वीच्या उकळत्या लाव्ह्यावर थंड सायी आल्या, त्यांची जमीन झाली. पोटातून निसटणारी वाफ पाणी होऊन जमिनीवर स्थिरावली आणि वातावरणाचं पांघरुण टिकून राहिलं. त्यातच आपल्याला दिसणारी सर्व जीवसृष्टी फुलली. ही गेल्या साडेचार अब्ज वर्षांची कथा आहे. पण मुळात ही तप्त वायूची तबकडी आली कुठून? त्यासाठी आपल्याला अजून मागे जावं लागतं. गेल्या लेखात आपण पृथ्वीच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी एक वाव पसरून उभा राहिलेल्या माणसाची प्रतिमा डोळ्यांसमोर आणली. पण संपूर्ण विश्वाचा उगम बघायचा झाला तर त्या माणसाच्या अलिकडे अजून दोघांना वाव पसरून उभं राहावं लागेल. कारण विश्वाचं वय पृथ्वीच्या वयाच्या जवळपास तिप्पट आहे - १३.८ अब्ज वर्षं. हे वय आपल्याला अगदी अचूकपणे माहीत आहे - त्यातली संभाव्य त्रुटी हजारात पाच इतकीच आहे. आता हे वय कसं मोजलं? हे समजावून घेण्यासाठी आपल्याला महास्फोटाचा सिद्धांत (ज्याला सामान्यपणे बिग बॅंग असं नाव आहे) थोडासा समजावून घ्यावा लागेल. दूरदूरच्या दीर्घिकांचा (आपल्या आकाशगंगेप्रमाणेच इतर तारकासमूहांचा) अभ्यास करताना शास्त्रज्ञांना हे लक्षात आलं की प्रत्येक तारकासमूह आपल्या आकाशगंगेपासून दूर दूर चाललेला आहे. हे काहीसं चक्रावून टाकणारं होतं. कारण पृथ्वी हे विश्वाचं केंद्रस्थान नाही, तो एका साध्यासुध्या दीर्घिकेतल्या साध्यासुध्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आहे हे उघड होऊनही शतकं लोटली होती. मग आता बरोब्बर आपणच केंद्रस्थानी असल्याप्रमाणे विश्व का वागत होतं? थोडी गणितं केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे तारकासमूह नुसतेच दूर जात आहेत असं नाही, तर जितके लांबचे तितके अधिक वेगाने दूर जात आहेत. याची सांगड कशी लावायची? लवकरच त्यांना उत्तर सापडलं. हे तारकापुंज फक्त आपल्यापासून दूर जात नसून, सगळेच सगळ्यांपासूनच दूर जात आहेत. किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर हे विश्वच प्रसरण पावतं आहे. अवकाशाची व्याप्तीच वाढते आहे. गुलाबजाम तळायला टाकला की तो मोठा होतो हे आपण अनुभवलेलं आहे. आता कल्पना करूया की त्या गुलाबजामच्या आतमध्ये सगळीकडे पसरलेले बरेचसे वेलचीचे दाणे आहेत. आपण कुठच्यातरी वेलचीच्या दाण्यावर बसून इतर दाण्यांकडे बघत आहोत अशीही कल्पना करू. जसजसा गुलाबजाम मोठा होत जाईल, तसतसे तुमच्या मागचे पुढचे, वरचे खालचे सर्वच दाणे आपल्यापासून दूर जाताना दिसतील. कारण आख्खा गुलाबजाम फुलतो आहे. आता हा गुलाबजाम म्हणजे संपूर्ण विश्व, त्यातला खवा म्हणजे अवकाश, आणि वेलचीचे दाणे म्हणजे तारकासमूह हे समजून घेतलं की सर्वच तारकासमूह आपल्यापासून दूर का जात आहेत याचं कोडं सुटतं. किंवा हीच कल्पना एका फुग्याचं उदाहरण घेऊनही सांगता येते. समजा, एका फुग्यावर अनेक ठिपके काढलेले आहेत. यापैकी कुठल्याही दोन ठिपक्यांमधलं अंतर फुग्याच्या पृष्ठभागावर रेषा काढून मोजता येतं. आपण जसजसा फुगा फुगवू तसं प्रत्येकच ठिपक्यांच्या जोडीतलं अंतर वाढताना दिसेल. तर विश्व विस्तारतं आहे. याचा अर्थ आपण जसजसं इतिहासात जाऊ तसतसं ते लहान होत जाणार. आणि एक क्षण असा येईल की ते एका बिंदूमध्ये सामावलं असेल. तिथपासून ते आत्तापर्यंतच्या विस्ताराची कथा भौतिकीच्या (फिजिक्सच्या) नियमांच्या आधारे सांगणारा सिद्धांत म्हणजे महास्फोट सिद्धांत - बिग बॅंग थियरी. या सिद्धांताच्या आधारे या स्फोटानंतरच्या अगदी काही मिलीसेकंदांपासून पुढे काय झालं याचं अगदी स्पष्ट टप्प्याटप्प्याचं चित्र मांडण्यात शास्त्रज्ञ यशस्वी ठरलेले आहेत. या मांडणीमुळे अर्थातच 'इतक्या अब्ज वर्षांनी अमुक अमुक गोष्टी दिसतील इतक्या इतक्या प्रमाणात दिसतील' अशा प्रकारची काही भाकितं करता येतात. त्यातली एक म्हणजे विस्ताराचा वेग. एका विशिष्ट प्रकारच्या सुपरनोव्हांचा - अत्यंत प्रखर ताऱ्यांचा - अभ्यास करून हा वेग मोजला. तो बरोब्बर १३.८ अब्ज वर्षांनी जितका असायला हवा तितका आला. कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड रेडिएशन वापरून तापमानात होणारे चढउतार मोजले. तेही त्याच सिद्धांताच्या गणितानुसार १३.८ अब्ज वर्षांनी जितके असायला हवे तितकेच आहेत हे दिसून आलं. तसंच तारकासमूहांचं एकमेकांपासूनचं सरासरी अंतर किती असेल याचंही महास्फोट सिद्धांतानुसारचं गणित आणि सध्याचं निरीक्षण यामधूनही १३.८ अब्ज वर्षांचाच आकडा मिळतो. थोडक्यात या सिद्धांताच्या तीन अंगांचा अभ्यास केला तर तिन्हींमधून उत्तर एकच येतं - आणि सत्याशी मिळतंजुळतं ठरतं. यापलिकडे अवकाशात प्रत्यक्षात दिसणाऱ्या अनेक गोष्टींची संगती लागते. महास्फोटाच्या सिद्धांतानुसार हायड्रोजन आणि हेलियम विश्वात प्रचंड प्रमाणात असतील आणि तसेच ते दिसतात. 'कॉस्मिक मायक्रोवेव्ह रेडिएशन दिसायला हवं' हेही महास्फोट सिद्धांताचं - आता खरं ठरलेलं भाकित आहे. म्हणजे आरोपीच्या हाताचे ठसे शस्त्रावर मिळणं, मृत व्यक्तीच्या कपड्याचे तंतू आरोपीच्या अंगावर सापडणं, शस्त्र विकत घेतल्याची पावती त्याच्याकडे सापडणं असे तीन स्वतंत्र पुरावे सापडले तर आरोपीच खुनी आहे हे ओळखू येतं. त्याहीपलिकडे त्याच्याकडे खून करण्यासाठी सबळ कारण असणं, आधी त्याने धमकी दिलेली असणं, त्या वेळेसाठी त्याच्याकडे दुसरीकडे असण्याचा पुरावा नसणं हेही दिसून आलं तर त्यावर शिक्कामोर्तबच होतं. इतकेच किंवा त्याहूनही अधिक भक्कम पुरावे महास्फोट सिद्धांतासाठी आहेत. याचा अर्थ सगळेच बारीकसारीक प्रश्न सुटलेले आहेत असं नाही. पण म्हणून आत्तापर्यंत सापडलेलं उत्तर टाकून देण्याची पाळी येणार नाही इतकं चांगलं सर्वसाधारण उत्तर सापडलेलं आहे हे निश्चित. पण मग १३.८ अब्ज वर्षांपूर्वी काय होतं? हा महास्फोट का झाला? तो कोणी घडवून आणला का? हे प्रश्न थोडे फसवे आहेत. कारण काळ आणि अवकाशच सुरू होण्याचा तो 'क्षण' आहे. अवकाश म्हणजे काही खरोखरचा गुलाबजाम नाही, जो आधी कोणीतरी तयार करावा लागतो. आख्खं विश्वच त्या एका बिंदूत सामावलेलं होतं. तिथपासून वेळेची मोजणी सुरू झाली. असं असताना 'त्याआधी काय होतं?' हा प्रश्नच निरर्थक ठरतो - शून्याने भाग देण्यासारखा. वर उद्धृत केलेल्या नासदीय सूक्तात म्हटलेलं आहे - 'सृष्टीच्या सुरूवातीला काहीच नव्हतं. असणं नव्हतं किंवा नसणंही.' ही न-असण्याची स्थिती आपल्याला डोळ्यासमोर आणता येत नाही. 'धुळीची जमीन नव्हती, की वर आकाश नव्हतं.' या वस्तुमान अवकाश नसण्याच्या स्थितीची कल्पनाही आपल्याला करता येत नाही. नासदीय सूक्ताच्या कर्त्याला अर्थातच महास्फोट सिद्धांताचं ज्ञान नव्हतं. कारण या कळसापर्यंत पोचण्यासाठी आधी न्यूटन, नंतर आइन्स्टाइन आणि त्यानंतर आलेल्या अनेक शास्त्रज्ञांनी बांधलेल्या पाया, पायऱ्या आणि खांबांचा आधार लागतो. जर कोणीतरी काढलेल्या चित्रात आजच्या देवळाच्या कळसासारखा आकार दिसत असेल तर त्यावरून त्याकाळी आख्खं देऊळ होतं असं म्हणणं योग्य ठरत नाही. नासदीय सूक्तातलं वर्णन हे काव्यात्म वर्णन आहे. सत्य परिस्थितीच्या जवळ जाणारं आहे इतकंच. शब्दांच्या, भाषेच्या मर्यादा या सूक्तातही जाणवतात - कारण काळच सुरू झालेला नसतानाही तिथे-तेव्हा असे स्थितीकालदर्शक शब्द वापरल्यावाचून त्या परिस्थितीचं वर्णन करता येत नाही. त्यामुळे हा महास्फोट कोणी केला, कधी केला, कुठे केला हे प्रश्नच काहीसे निरर्थक बनून जातात. तो झाला हेच निश्चितपणे म्हणता येतं. (मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29544
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by pacificready

धन्यवाद! हरकत नाही. तुम्हालाही वाटेल ते वाटून घ्यायचा अधिकार आहे. या गृहीतकांच्या समर्थनार्थ मिळणार्‍या पुराव्यांवर विश्वास ठेवणार्‍यांशी वाद घालण्यात वेळ घालवणे व्यर्थ आहे; तरीही लेखमालेत पुढे "सजीव आपोआप निर्माण झाले अशी शास्त्रज्ञमान्य थियरी आहे" वगैरे गोष्टी येणार आहेत त्या वाचून परत हेच आक्षेप तिथेही नोंदवण्याचे स्वातंत्र्यही आहे सर्वांना. स्वातंत्र्याचा आणि लॉजिकचा काहीही संबंध नाही. :-)

विज्ञानाच्या कुठच्याही थियरीबद्दल 'अधिक सबळ पुरावा असलेली थियरी सापडली की ही टाकून देऊ आणि नवीन स्वीकारू' ही भूमिका असते.
धन्यवाद. कहारेतर आधीच लिहिणार होतो पण तुम्ही स्वतःच लिहिली आहे तर. लेखात एक चोतोशी सुधारणा सुचवू इच्छितो. तो असा कि एकतर लेखाखाली हा disclaimer लिहावा किंवा जी AFFERMATIVE ( होकारार्थी) वाक्ये आहेत तिथे "असावे", "असू शकेल", "असेल असे वाटते", "असे माझे किंवा शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे" असा बदल करावा. मागे कोणत्यातरी धाग्यात तुम्हाला काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरे मिळाली नाहीत. पण परत एकदा वेद आणि वैज्ञानिक गृहीतके यांची सरमिसळ का करत आहात किंवा त्या गृहितकांना मजबुती देण्यासाठी वेदांचा आधार घेण्याची वेळ का येते आहे असे विचारणे जास्ती सयुक्तिक ठरेल.
पण म्हणून आत्ताच्या थियरीसाठी प्रचंड पुरावा आहे ही गोष्ट नाकारता येत नाही.
कोणता पुरावा? दूरवरच्या तार्यांवरून येणारा प्रकाशाची तीव्रता मोजून त्या ताऱ्याचे वय आणि / किंवा पृथ्वीपासूनचे अंतर निश्चित कर्णे हि अत्यंत ढोबळ आणि सदोष पद्धत आहे पण आजमितीला दुसरी कोणतीही पद्धत आपल्या हातात नाही म्हणजे हे बिनचूक आहे असे नव्हे. प्रसरण पावणारे विश्वाच्या प्रसारणाचे मोजमाप घेवून काही निष्कर्ष काढताना ( extrapolate )करताना २-३ दशकात केलेली निरीक्षणे इतक्या मागे नेणे निर्दोष / अचूक असूच शकत नाही. म्हणजे आता जे प्रसरण/ expansion होत आहे त्याचा दर/ rate काय? त्याचे सातत्य काय? हे expansion 'लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल' याची कोणतीही माहिती नाही. किंवा ते plot करणे अशक्य आहे. अर्थात मी जे लिहितो आहे ते समजून घेणे सोपे नाही पण हे सत्य आहे म्हणूनच हि सर्व गृहीतके आहेत हे मान्य करावेच लागेल. या अनुषंगाने एक प्रश्न : प्रकाशाचा वातावरणातील वेग काय याचे उत्तर सुधा निःसंदिग्धपणे मिळत नाही. तुम्हाला या विषयी काही माहिती आहे काय ? असल्यास कृपया थोडी माहिती द्यावी. तो अलिखित डिस्क्लेमर असतो. पण म्हणून आत्ताच्या थियरीसाठी प्रचंड पुरावा आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि जेव्हा एवढा प्रचंड पुरावा असतो तेव्हा मूळ थियरी नष्ट न होता ती किंचित काही सुधारली जाते.

In reply to by दत्ता जोशी

हे expansion 'लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल'
लिनेअर' आहे कि 'एक्ष्पोनेन्तिअल हे कृपया "linear आहे कि exponential " असे वाचावे.

In reply to by दत्ता जोशी

दूरवरच्या तार्यांवरून येणारा प्रकाशाची तीव्रता मोजून त्या ताऱ्याचे वय आणि / किंवा पृथ्वीपासूनचे अंतर निश्चित कर्णे हि अत्यंत ढोबळ आणि सदोष पद्धत आहे पण आजमितीला दुसरी कोणतीही पद्धत आपल्या हातात नाही म्हणजे हे बिनचूक आहे असे नव्हे.
१. विज्ञानातली कोणतीही पद्धत १००% खात्रीशीर नसते; जर १००% खात्रीशीर मोजमापं करता आली असा दावा कोणी करत असेल तर त्यांनी त्यांची मापनपद्धती बदलण्याची गरज आहे असं खुशाल समजावं. अगदी आपण आपलं वस्तुमान मोजलं, ज्याला सर्वसामान्यपणे वजन म्हणतो, त्यातही दोष असतो. आपलं वजन मोजण्याच्या काट्याचा लीस्ट काऊंट - वजनात किती फरक झाल्यावर काट्यावर दिसेल तो जर १०० किलो असेल तर निराळा काटा वापरण्याची गरज आहे. आपल्या मोजमापात किती त्रुटी (एरर) आहे याचा योग्य अंदाज करता येणं विज्ञानात फार महत्त्वाचं असतं. २. आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रकाशातून काय आणि किती गोष्टी कळतात याची कल्पना तुम्हाला कितपत आहे हे माहीत नाही. पण या प्रकाशातून ताऱ्यांचंच नाही तर दीर्घिकांचं वय, त्यांचं वस्तुमान, त्यांचा आकार, त्यांच्यात काय-काय घटकद्रव्यं आहेत या अनेक गोष्टी सांगता येतात. ताऱ्यांकडून, दीर्घिकांकडून येणाऱ्या प्रकाशाची फक्त तीव्रता मोजत नाहीत; त्यांचा वर्णपट शोधला जातो, त्यात निरनिराळे बदल कसे होतात यांचा अभ्यास होतो. कधी हा प्रकाश, भिंगातून आल्यासारखा वाकडा येतो, त्याचा अभ्यास होतो. ३. तुम्ही ज्याला एकच पद्धत म्हणत आहात, ती पद्धत एकच नाही. तीव्रतामापन, वर्णपट, गुरुत्वीय भिंग, अशा अनेक पद्धती आहेत. ज्यांचं मापन करून वेगवेगळ्या पद्धतींनी उत्तरं आणि त्यांच्यामधल्या त्रुटी किती हे समजतं. त्यातून वयाचा अंदाज केला जातो. त्यातल्या त्रुटी किती यांचंही गणित केलं जातं.
प्रसरण पावणारे विश्वाच्या प्रसारणाचे मोजमाप घेवून काही निष्कर्ष काढताना ( extrapolate )करताना २-३ दशकात केलेली निरीक्षणे इतक्या मागे नेणे निर्दोष / अचूक असूच शकत नाही.
२-३ दशकं निरीक्षण केलेलं असलं तरीही आपल्याला 'दिसतात' ते काही क्वेझार्स काही अब्ज वर्षं जुने आहेत. थोडक्यात २-३ दशकं निरीक्षणं करून आपण काही अब्ज वर्षांमागे काय घडलं हे आज बघू शकत आहोत.
जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येत नाही, जिला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव नाही ती विज्ञानाला अमान्य असते.
जी गोष्ट गणिताने सिद्ध करता येते, त्या प्रत्येक वस्तुला वस्तुमान, रंग गंध, वजन, चव असेलच असं नाही. उदाहणार्थ प्रकाशकण, अर्थातच फोटॉन. डार्क एनर्जी हा प्रकार काय आहे हे अजूनही खगोलशास्त्रज्ञ आणि/किंवा कणभौतिकशास्त्रज्ञांना समजलेलं नाही. हिग्ज बोसॉन दिसला तोही अगदी अलीकडेच.
"सिंग्युलॅरिटी" - याचा अभिप्रेत अर्थ "एकतत्व" किंवा "अद्वैत" असा आहे. अगम्य असा नाही.
"सिंग्युलॅरिटी" याचा अर्थ एका कणात - ज्याला लांबी, रुंदी, उंची काहीही नाही, त्यात सगळं सामावलेलं होतं असा आहे. ते अजूनही अगम्य आहे. ते गमतं का गमत नाही याचा त्या शब्दाशी काहीही संबंध नाही. ते नक्की काय होतं हे कदाचित समजेल, कदाचित समजणारच नाही असं गृहितक कदाचित उद्या मांडलं जाईल. --- अवांतर - लेखनावर प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचेच आभार. विज्ञान, विज्ञानाची पद्धत, खगोलशास्त्र, विश्वरचनशास्त्र या विषयांबद्दल चांगल्या, सवंग भोंदूपणा नसलेल्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत लेखनाची किती गरज आहे हे या धाग्यांमध्ये दिसत आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर माहीतीपुर्ण प्रतिसादांची मालिका खंडीत होऊ नये कारणीभुत कोणीही होवो. काहीही होवो. कुठलाही प्रश्न होवो. इतकीच एकच इच्छा.

काय ठरलय मग? विज्ञानाला मानायच. अध्यात्माला मानायच. दोघांना मानायच. की दोघांनाही नाही मानायच. काही सुचेनास झालय ही चर्चा वाचून.

In reply to by विलासराव

स्वतः बनवलेलं रॉकेट घेऊन बालाजीच्या चरणी आशिर्वादासाठी जायचं. नवा कंप्युटर, कार घरी आणल्यावर त्याला पाच कुंकवाचे टिके लावायचे. सॅटेलाईटचा वापर करून शेकडो किलोमीटरच्या केबलमधून येणार्‍या इंटरनेटवरून साइबाबाची ऑनलाईन आरती करायची. डीटीएच टीवीच्या डिशमधून फुल्ल एच्डी ७० इन्च टीवीतून दिसणार्‍या आसाराम बाप्पुला नमन करायचे. अजून बरीच मोठी लिस्ट आहे काय करायचं त्याची... मानणे न मानण्याने काय होणार? ज्यांना हे कळतं त्यांना अजून काय कळायची आवश्यकता आहे...?

गहन विषय आहे.पण छान चाललीय चर्चा. सृष्टीसे पहले कुछ नहीं था... सत भी नही, असत भी नही अंतरिक्ष भी नहीं , आकाश भी नहीं था... छिपा था क्या ,कहां,किसने ढका था.... उस पल तो आगम,अटल जल भी कहां था... सृष्टीका कौन है कर्ता ?... कर्ता है वा अकर्ता ? आवडलं.

फारतर "त्याच्याआधी काय होते हे सध्याच्या थेरीला समजले नाही" असे म्हणा. प्रश्न बाय इटसेल्फ निरर्थक नाहीये. पेनरोज या शास्त्रज्ञाने आजवर असे अनेक बिगबँग झाले असावेत असाही एक कयास मांडलेला आहे.

In reply to by बॅटमॅन

पेनरोज या शास्त्रज्ञाने आजवर असे अनेक बिगबँग झाले असावेत असाही एक कयास मांडलेला आहे. सहमत. या विश्वातली प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते.नष्ट होते.परत उतपन्न होते. परत नष्ट होते. असे वर्तुळ न आदि न अंत चालूच आहे. अगदी दीर्घिकाही याला अपवाद नाहीत. लाइफसायकल मोठी असेल पण अंत होतो. मला फार योग्य शब्दात मांडता नाही येत.असो.