Skip to main content

शाकाहार का मांसाहार

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/12/2015 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आपण काय खावं हे कोणीतरी तिसरी व्यक्‍ती ठरवणार असेल तर जगणं मुश्कील आहे. अमूक एका समूहाच्या लोकांनी आमच्या वस्तीत स्वत:चं घर बांधूनच नव्हे तर भाड्याच्या खोलीतही राहू नये असं कोणी ठरवणार असेल तर भयावह आहे. अमूक खाणार्‍यांनी आमच्या वस्तीत येऊ नये असा फतवा निघणार असेल तर ते त्याहूनही भयंकर आहे. आपल्या कळपाला मान्य नसल्यामुळे अमूक एकाकडून अमूक एक गोष्ट घडली म्हणून मार देणे वा जीवंत मारून टाकणे हे रानटी मानवी टोळ्यांचे काम होते. आजच्या सभ्य माणसांच्या समूहांचे नाही. आपण नेमके आज मानवी समाजात राहतो का आपापल्या जाती- धर्माच्या कळपात राहतो. मानवी समाजात निधर्मी सहजीवन जगता जगता आपण अंतर्गत पातळीवर आपल्या माणसांच्या हिंसक टोळ्या जमवायला लागलोत की काय? शाकाहार म्हणजे काय? मांसाहार म्हणजे नेमकं काय? अजून कुठूनतरी शुध्द शाकाहार अशीही व्याख्या ऐकू येते. शुध्द शाकाहारी असल्याचा दावा करणार्‍या जागोजागी हॉटेल्सही दिसतात. हा काय प्रकार आहे? भारतातल्या सर्व जनतेने मांसाहार (मासे, चिकन, मटण आदी) खाणे बंद केले तर भाजीपाला कोणालाच खायला मिळणार नाही. भाजीपाला उपलब्‍ध झाला तरी गरीबालाच काय मध्यमवर्गीय माणसालाही विकत घ्यायला परवडणार नाही. एकविसाव्या शतकाच्या आणि जगात महासत्ता होण्याच्या गमजा मारणार्‍या देशात मांसाहार करणार्‍यांचा व्देष करणे हा रानटीपणा आहे. मांसाहार करणार्‍यांकडे तुच्‍छतेने पाहणे हा सुसंस्कृतपणा असू शकतो का? मनुष्यप्राणी हा मिस्त्र आहारी प्राणी आहे. म्हणजे जो शाकाहार करू शकतो आणि मांसाहारही. माणसांच्या दातांची रचनाही मिश्रआहारी आहे. खरं तर कोणी कितीही दावा करत असलं तरी ते शुध्द शाकाहारी आहेत असं म्हणणं आज धारिष्ट्याचं ठरेल. शाकाहार करण्यामागे कोणत्याही जीवाची हत्त्या करू नये हा विचार असेल तर शाकाहारी लोक भ्रमात आहेत. आपण ज्या हिरव्या भाज्या (वनस्पती) खातो त्याही जीवंत असतात. त्यांच्या जीवाचा बळी देऊन आपण भाज्या खात असतो. प्राण्यांमध्ये जसं लाल रंगाचं रक्‍त असतं तसं वनस्पतींमध्ये हिरव्या रंगाचं हरितद्रव्य असतं. म्हणून रक्‍त आणि हरितद्रव्य यांच्याकडे एकाच दृष्टीने पहावं लागेल. रक्‍ताला पाहून आपण हळहळतो तसे हिरव्या हरितद्रव्याला पाहूनही आपण हळहळायला हवं. सृष्टीत भाज्या वा फळे आपल्यासाठी उगवत नाहीत. आपण त्यांचा खाण्यासाठी वापर करतो. गहू, बाजरी, तांदूळ आदींसह सर्व प्रकारच्या डाळी देणारे धान्यही बीज स्वरूपात असते. या सर्व प्रकारच्या धान्यांपासून जमिनीत रूजून नवीन जीव तयार होणार असतो. त्या बीजाला दळून- भरडून आपण पोळ्या आणि भाकर्‍यांसाठी पीठ तयार करतो. ही सुध्दा क्रूर हिंसाच आहे. आता कोणी म्हणेल की सृष्टीने वा देवाने भाजीपाला आणि धान्य आपल्याला खाण्यासाठीच उगवले आहे, तर मग इतर प्राण्यांकडेही त्याच दृष्टीने पहावे लागेल. शेवटी फिरून निसर्गाच्या अन्नसाखळीकडेच आपण येतो. दूधाला तरी आज शुध्द शाकाहार म्हणता येईल का? विज्ञान सांगतं, आजचं दूध शाकाहारी नाही. (भाकड वनस्पती आणि भाकड प्राणी यांचं काय करायचं याचा प्रश्न सृष्टीला कधीच पडला नाही. पण भाकड माणसांनी आज जो उच्‍छाद मांडला आहे तो मात्र नक्कीच चिंताजनक आहे.) आता प्रश्न उरतो तो अध्यात्मिक आणि धार्मिकतेचा. खरं तर हा आज धार्मिक प्रश्न उरलाच नाही, हा सरळ सरळ राजकीय प्रश्न आहे. माणसं मारायची आणि त्यांच्यावर राजकारण खेळायचं ही मध्ययुगीन पाताळयंत्री व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे, असं नाईलाजाने म्हणावं लागतं. मध्ययुगीन हुकुमशहा राजे- राजवाड्यांनीही इतक्या टोकाचा धर्माचा गैरवापर कधीही केलेला नाही, तितका आज लोकशाही राज्य व्यवस्थेत सत्तेत येण्यासाठी धर्माचा अधर्म केला जातोय. सात आठ वर्षांपूर्वी ‘बोंबीलचा वास’ नावाची कथा मी लिहून ठेवली आहे. ह्या कथेत बोंबीलच्या वासावरून मैत्री तुटते, हे वाचकांना पटणार नाही असं वाटल्यामुळे ती कथा मी बाजूला ठेऊन दिली होती. (आता रोखठोक 2015 च्या दिवाळी अंकात प्रकाशित.) पण आज मुंबईपासून संपूर्ण देशभर जे काही चाललंय, ते पाहून ही कथा वास्तवापेक्षा फारच गुळमुळीत आहे असं लक्षात आलं. ‘बोंबीलचा वास’ ही कथा आणि ‘देव हातात हात घालून’ ही कविता हे दोन्हीही माझे कलाविष्कार तसे जुनेच. पण जुन्या कथा कवितांना असे नवे दिवस या हिंस्त्र पार्श्वभूमीवर यावेत हे दु:खदायकच. पैकी ‘देव हातात हात घालून’ या कवितेने या लेखाचा शेवट करतो: आधी डुक्कर मरतं मग माणसं अथवा आधी गाय मरते मग माणसं. आधी भगवा जळतो मग माणसं अथवा आधी हिरवा जळतो मग माणसं. केव्हा हा ईश्वर हसतो केव्हा तो देव टाळ्या वाजवतो. दंगलीची मॅच संपताच दोन्ही देव खिलाडू वृत्तीने चेंडूंसारखी माणसं लाथाडून हातात हात घालून निघून जातात आपापल्या पोथ्या पुराणात... - माणसं अशा देवांना कवटाळत कडेकोट घरात लपून बसतात, की एका अफवेच्या काडीने घरांतल्या जीवंत माणसांसह आख्खं गाव जसं होतं की नव्हतंच बेचिराख... (दिनांक 15-10-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स – नाशिक विभाग- मध्ये प्रकाशित झालेला लेख सर्वांसाठी पुन्हा देतोय. या ब्लॉगमधील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) - डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22495
प्रतिक्रिया 95

प्रतिक्रिया

"माणसांच्या दातांची रचनाही मिश्रआहारी आहे." सा निष्कर्ष आपण कोणत्या आधारावर क्काधला आहे हे समजेल काय? सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून माणूस हा फलाहारी मर्कट( FRUIT EATING PRIMATE) आहे असे सिद्ध होते. पटले नाही. माणूस कोणता प्राणी पकडून कच्चा खाऊ शकेल हे समजेल काय? माणसाला मांस फाडण्यासाठी आवश्यक असणारे सुळे नाहीत किंवा माणसाची आतडी मांसाहारी प्राण्यासारखी फार लहानही नाहीत. माणसाच्या लाळेत पिष्टमय पदार्थ पचवण्यासाठी विकर(ENZYME) असतात जे कोणत्याही मासाहारी प्राण्यांच्या लाळेत नसतात. मासाहारी प्राण्यांचा मेंदू किटोन बॉडी वापरू शकतो पण मानवी मेंदूला पूर्ण वेळ (२४ तास) ग्लुकोज ची गरज पडते जी कोणत्याही मांसाहारी पदार्थातुन पूर्ण होत नाही.फळात असलेली साखर मानवी मेंदूला फारशी प्रक्रिया न करत थेट वापरता येते. तेंव्हा माणूस हा मिश्राहारी आहे हि गोष्ट चूक आहे. किंवा भारतीय माणसाने पूर्ण शाकाहार केला तर अन्न पुरे पडणार नाही हा पण एक चुकीचा समज आहे. हरित क्रांती मध्ये मांस पदार्थांची क्रांती झाली नसताना भारत अन्न धान्याबाबत स्वयंपूर्ण झाला हि वस्तुस्थिती आहे. राहिली गोष्ट मांसाहाराची ज्यांना ते खावेसे वाटते त्यांनी ते खावे आणी ज्यांना पटत नाही त्यांनी ते खाऊ नये इतकी साधी गोष्ट आहे. यासाठी मांसाहाराचे समर्थन करायचीही गरज नाही तसेच मी पूर्ण शाकाहारी आहे ( म्हणजे मी श्रेष्ठ आहे )आणी मांसाहारी लोक तामस आहेत असेही म्हणायची गरज नाही. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, मी लेख काही पूर्ण वाचला नाही. पण तुमच्या प्रतिसादावरुन मला काही प्रश्न पडलेत ते विचारून घेतो. आपण बघतो की प्रत्येक प्राण्याची त्याच्या आहाराचे वैशिष्ट्य हे त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते. काही प्राणी शाकाहारी तर काही मांसाहारी असतात. त्यांच्यातही वेगवेगळे गट आहेत. काही स्वतः शिकार करुन खातात, काही दुसर्‍यांची पळवतात, काही उरलेली हाडं साफ करतात. काही शाकाहारी विशिष्ट प्रकारचे झाडपाला खातात, दिसेल ते हिरवं चरत नाहीत. तशीच त्यांच्या शरिराची रचनाही असते. भौगोलिक रचनेचा प्राण्यांच्या आहार-शरिररचनेवर प्रभाव दिसतो तसा माणसाच्या दिसत नाही. हे का घडत असावे याबद्दल मेडिकल सायन्समधे काही संशोधन झाले आहे काय? म्हणजे एस्किमो असो वा विदर्भातला शेतकरी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमधे भयंकर तफावत असली तरी शरीररचनेत आढळते का? आहारामुळे मूळ शरिररचनेत बदल घडण्याची काही उदाहरणे आहेत काय?

In reply to by सुबोध खरे

डॉ.साहेब, १. मनुष्यात व्हेस्टिजिअल / निरुपयोगी असलेले अपेंडिक्स प्राण्यांत काय काम करते ते सांगू शकाल काय? कच्चे मांस खातात ज्याला कोल्ड कट्स, सुशी इ. म्हणतात. कच्ची अंडी निरशा दुधात घालून प्याल्याने 'शक्ती येते' अशी लहानपणी कन्सेप्ट होती. २. माणसाला मांस फाडण्यासाठी आवश्यक असणारे सुळे नाहीत??? सुळे वापरून मांस फाडावे लागेल अशी परिस्थिती अन्न शिजवण्याच्या शोधाबरोबरच कमी झाली. त्यासोबत त्यांचा आकार थोडा लहान झाला, पण आपल्या तोंडात जे "कॅनाईन्स" असतात, ते कशासाठी? फणस फाडण्यासाठी की काय? ३. लाळेत असलेले कार्बोहायड्रेट 'पचवणारे' एंझाईम माणसात असते, ते "मांसाहारी प्राण्यांत" नसते. ओक्के. पण माणूस मिश्राहारी आहे, हेच बोलणे सुरू आहे. मांसाहारी म्हणजे काय झडप घालून शिकार करणारा अन तोंडाने फाडून खाणाराच प्राणी हवा की काय? ४. कार्बोहायड्रेट्सचे फॅट व फॅट्सचे कार्बोहायड्रेट्समधे मेटॉबॉलिझम कसे होते, याबद्दल काही सांगू शकाल काय? कोणत्याही मांसात फक्त प्रोटीन असतात असे आपणांस म्हणायचे आहे काय? वाघ-सिंहासारख्या प्राण्यांचा मेंदू "कीटोन बॉडी" वापरू शकतो म्हणजे काय??? बाकी,
राहिली गोष्ट मांसाहाराची ज्यांना ते खावेसे वाटते त्यांनी ते खावे आणी ज्यांना पटत नाही त्यांनी ते खाऊ नये इतकी साधी गोष्ट आहे. यासाठी मांसाहाराचे समर्थन करायचीही गरज नाही तसेच मी पूर्ण शाकाहारी आहे ( म्हणजे मी श्रेष्ठ आहे )आणी मांसाहारी लोक तामस आहेत असेही म्हणायची गरज नाही.
याच्याशी सहमत.

In reply to by आनंदी गोपाळ

१. मनुष्यात व्हेस्टिजिअल / निरुपयोगी असलेले अपेंडिक्स प्राण्यांत काय काम करते ते सांगू शकाल काय? शाकाहारी रवंथ करणाऱ्या प्राण्यात अपेंडिक्स सेल्युलोज ( गवताचा मोठा भाग -यात उसाचे चिपाड ही येते- हा सेल्युलोज चा बनलेला असतो म्हणूनच तो पचवण्यासाठी उपयोगी येते. यासाठी माणूस गावात पचवू शकत नाही २)२. माणसाला मांस फाडण्यासाठी आवश्यक असणारे सुळे नाहीत??? सुळे वापरून मांस फाडावे लागेल अशी परिस्थिती अन्न शिजवण्याच्या शोधाबरोबरच कमी झाली. त्यासोबत त्यांचा आकार थोडा लहान झाला, पण आपल्या तोंडात जे "कॅनाईन्स" असतात, ते कशासाठी? फणस फाडण्यासाठी की काय? फणस पूर्ण पिकल्यावर हाताने पण फोडता येतो. आपले सुळे हे मांस "फाडण्यासाठी" नव्हे तर कठीण कवचीची फळे (भूईमुग अक्रोड ई) किंवा सुका मेवा "फोडण्यासाठी" उपयोगात येतो. ४. कार्बोहायड्रेट्सचे फॅट व फॅट्सचे कार्बोहायड्रेट्समधे मेटॉबॉलिझम कसे होते, याबद्दल काही सांगू शकाल काय? कोणत्याही मांसात फक्त प्रोटीन असतात असे आपणांस म्हणायचे आहे काय? चरबी पासून ग्लूकोनीओजेनेसीस साठी तुम्हाला उर्जा खर्च करावी लागते आणी प्रथीनातून ग्लुकोज निर्माण करणे म्हणजे मूल्यवान प्रथिनांचा गैरवापर आहे. हि परिस्थिती फार काळ उपास केल्यावर स्नायुतील प्रथिनातील अमिनो आम्ले काढून टाकून(DEAMINATION) कर्ब पदार्थ निर्माण केले जातात. ऊडा. ग्लुटामिक आम्ल मधून अमिनो गट बाहेर काढून ग्लुटारिक आम्ल तयार होते आणी त्याचे परत ग्लुकोज मध्ये रुपांतर करावे लागते. आपण फळे खाल्ली कि त्यातून ग्लुकोज सरळ मिळते आणी Unlike glucose, which is metabolized widely in the body, fructose is metabolized almost completely in the liver in humans, where it is directed toward replenishment of liver glycogen and triglyceride synthesis.[1] Under one percent of ingested fructose is directly converted to plasma triglyceride.[2] 29% - 54% of fructose is converted in liver to glucose, and about quarter of fructose is converted to lactate. 15% - 18% is converted to glycogen.[3] Glucose and lactate are then used normally as energy to fuel cells all over the body.[2] पहा विकी वाघ-सिंहासारख्या प्राण्यांचा मेंदू "कीटोन बॉडी" वापरू शकतो म्हणजे काय??? वाघ सिंह जे अन्न खातात त्यात अजिबात कर्ब पदार्थ नसतात. ते जे मांस खातात त्यात फक्त चरबी आणी प्रथिने असतात यातील चरबीचे रुपांतर यकृतात किटोन बॉडी मध्ये करून त्यांचा मेंदू त्या उर्जेसाठी वापरतो. मानवी मेंदूला असे करण्यासाठी फार कष्ट करावे लागतात. The brain gets a portion of its energy from ketone bodies when glucose is less available (e.g., during fasting, strenuous exercise, low carbohydrate, ketogenic diet and in neonates). In the event of low blood glucose, most other tissues have additional energy sources besides ketone bodies (such as fatty acids), but the brain likely has an obligatory requirement for some glucose.[5] After the diet has been changed to lower blood glucose for 3 days, the brain gets 25% of its energy from ketone bodies.[6] After about 4 days, this goes up to 70%[citation needed] (during the initial stages the brain does not burn ketones, since they are an important substrate for lipid synthesis in the brain). Furthermore, ketones produced from omega-3 fatty acids may reduce cognitive deterioration in old age.[7] पहा विकी

In reply to by सुबोध खरे

Ketone body utilization Tissues that can use fatty acids can generally use ketone bodies in addition to other energy sources. The exceptions are the liver and the brain. The liver synthesizes ketone bodies, but has little b-ketoacyl-CoA transferase, and therefore little ability to convert acetoacetate into acetyl-CoA. The brain does not normally use fatty acids, which do not cross the blood-brain barrier; under ordinary circumstances, the brain uses glucose as its sole energy source. The metabolic rate of the brain is essentially constant. While other tissues reduce their metabolic requirements during starvation, the brain is unable to do so. After a few days of fasting, the brain undergoes metabolic changes to adapt to the decreased availability of glucose. One major change is increased amounts of the enzymes necessary to metabolize ketone bodies. हि परिस्थिती फार दिवस उपास केल्यावरची आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे (adaptation)

In reply to by सुबोध खरे

याला काय अर्थ आहे डॉक्टरसाहेब? असं एकाच प्रतिसादात तुम्ही धाग्यातली हवाच काढून घेतली तर धागाकर्त्याने काय करायचं? एवढं त्यांनी हमखास यशस्वी होणारा " शाकाहार - मांसाहार " वाद उकरून काढलाय आणि तुम्ही त्यावर पाणी ओतलं. छ्या... असहीष्णुता बोकाळली आहे.

In reply to by मोदक

पण इथे थोडी सुट द्यायला हरकत नाही :-
पण आज मुंबईपासून संपूर्ण देशभर जे काही चाललंय, ते पाहून ही कथा वास्तवापेक्षा फारच गुळमुळीत आहे असं लक्षात आलं.
;) म्हणजे गाडी योग्य मार्गाने जात नसली तरी स्टेशन पक्के ठरलेले आहे.

भौगोलिक रचनेचा प्राण्यांच्या आहार-शरिररचनेवर प्रभाव दिसतो तसा माणसाच्या दिसत नाही
एकाच प्रकारच्या स्पेसिजमध्ये असा फरक असलेलेल्या प्राण्याचे उदाहरण देऊ शकाल का?

In reply to by मार्मिक गोडसे

एकाच प्रकारच्या स्पीसीज म्हणजे काय हे आधी ठरवायला लागेल. कारण वाघ, सिंह, बिबट्या यांचे शरिररचना व शिकार करण्याची शैली वेगळी असली तरी आहारवैशिष्ट्य एकच आहे (असावे). तेच गायी, म्हशी, शेळींबद्दल. पण चायनिज, आफ्रिकन, भारतीय, युरोपियन वैगेरे लोकांचे आहावैशिष्ट्ये स्थलकालाप्रमाणे बदलतात त्याचे त्यांच्या शरिररचनेवर काय परिणाम झालेत त्याबद्दल काही अभ्यास झालेत का असा माझा प्रश्न होता.

In reply to by संदीप डांगे

वाघ सिंह बिबळ्या आणी चित्ता हे जरी एकाच ठिकाणी राहत असले तरीही त्यांचे भक्ष्य वेगवेगळे आहे. चित्ता हा लहान पण वेगवान हरणे पाठलाग करून पकडून मारतो. बिबळ्या कोणतेही जनावर लपून राहून एकदम हल्ला करून मारतो यात लहान सहान प्राणी कोंबडा कुत्रा मांजर शेळी मेंढी डुक्कर पासून मध्यम आकाराची हरणे, माकडे, वानर मुंगुस येतात. त्यामुळे तो जंगलातच काय मनुष्य वस्ती जवळ शहरातही राहू शकतो. वाघ किंवा सिंह स्वतः जास्त शक्तिवान असल्याने आणी भूकही जास्त असल्याने मोठ्या प्राण्यांची उदा जिराफ, रानरेडा, सांबर, चितळ ई प्राणी मारून खातात तसेच शाकाहारी जनावरांचे आहे-- मेंढ्या बकर्या झाडाझुडूपांचा पाला खातात पण त्यांना मोठे गवत पेंढा पचवता येत नाही. ते गवत मोठे रवंथ करणारे प्राणी म्हणजे गाई म्हशी मोठी हरणे हे प्राणीच खाऊ शकतात. म्हणजेच प्रत्येक प्राण्याचे आहार वैशिष्ट्य वेगवेगळे आहे ते एकच नाही. कारण एकाच जंगलात राहून ते वेगवेगळ्या तर्हेचे अन्न खात असल्याने त्यांची आपसात स्पर्धा अपोआप कमी होते.आणी त्या अन्नाच्या उपलब्धतेनुसार त्या प्राण्यांच्या शरीरात बदल झालेले दिसतात. उदा चित्त्याची नखे आत घेता येत नाहीत पण त्यामुळे त्याला खिळ्य़ान्सारखी जमिनीची पकड घेता येते. याउलट बिबळ्याची नखे( मांजरासारखी) आत ओढून घेता येतात त्यामुळे त्याला पंजाच्या खाली असलेल्या मौ गाडीवर अजिबात आवाज न करता भक्षाच्या जवळ जाता येते आणी ती आत वळलेली असतात त्यामुळे त्याला झाडावर लीलया चढता येते. राहिली गोष्ट मानवाची. मानवाच्या शरीररचनेत जगभरात फारसा बदल नाही. परंतु मानवाचे परंपरागत अन्न हे तो राहत असलेल्या वातावरणासाठी अतिशय अनुकूल असे आहे . उदा एस्किमो लोक मोठ्या प्रमाणावर मासे खातात ज्यात भरपूर चरबी असते जी त्यांना अति थंड वातावरणात शरीर गरम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अशीच परिस्थितीत युरोपात आहे जेथे थंडीमुळे लोक जास्त मास खातात ज्यातून त्यांना चरबी आणी उर्जा मिळते.भारत हा उष्ण प्रदेश आहे. येथे मास खाण्याची तेवढी आवश्यकता नाही विशेषतः दक्षिण भारतात. दुर्दैवाने आपण युरोपातील अन्न पद्धती उचलली आहे( त्यांची अफाट कष्ट करण्याची प्रवृत्ती मात्र उचलली नाही) ज्यामुळे अति मांसाशन किंवा अति चरबीयुक्त पदार्थ खाल्याने आपल्यात हृदय विकाराचे आणी पक्षाघाताचे प्रमाण मात्र वाढले आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्यात मांसाहार आणी इतर चरबी युक्त पदार्थ कमी करावे आणी थंडीत वाढवावे.पण आपण तिन्ही मोसमात दाबून खाणे पसंत करतो.

In reply to by सुबोध खरे

भारत हा उष्ण प्रदेश आहे. येथे मास खाण्याची तेवढी आवश्यकता नाही विशेषतः दक्षिण भारतात.
उत्तरेत उकाडा केवढा असतो हो. दक्षिणेपेक्षा उत्तरेत हाल होतात उन्हाळ्यात.

In reply to by बॅटमॅन

दक्षिणेत थंडीत सुद्धा तसा उकाडाच असतो आणी उन्हाळ्यात दिवसच काय पण रात्रीपण गरम होते. म्हणून म्हणालो. उत्तरेत उन्हाळ्यात रात्री गार असतात. आणी हि मास आणी चरबीयुक्त पदार्थ खाण्याची "आवश्यकता" युरोपच्या तुलनेत आहे.

In reply to by सुबोध खरे

उत्तम प्रतिसाद. धन्यवाद. एकदोनच मुद्द्यांबाबत अधिक काही म्हणावंसं वाटतं. १.
वाघ सिंह बिबळ्या आणी चित्ता हे जरी एकाच ठिकाणी राहत असले तरीही
एक्झॅक्टली असं नाहीये. वाघ-बिबळ्या यांचं हॅबिटॅट चित्ता-सिंहांपेक्षा पूर्ण वेगळं आहे. अनुक्रमे दाट जंगलं ते विरळ गवताळ मैदानी प्रदेश असा फरक आहे. केवळ असे (तुलनेत) सपाट गवताळ प्रदेश थेट शेतीखाली आणायला जास्त सोपे असल्याने ते सर्वात आधी मनुष्याने अतिक्रमित केले आणि भारतीय चित्ता पूर्ण नष्ट होण्यामधे शिकारीसोबत हेही कारण तितकंच मोठं ठरलं. सिंहाचीही अवस्था जवळजवळ नामशेष अशीच आहे. बिबळे बदलत्या हॅबिटॅटसाठी वेळोवेळी अ‍ॅडाप्ट झाल्याने तगले. वाघ तुलनेत तितके फ्लेक्झिबल राहू शकले नाहीत. तरी सिंहांपेक्षा बरी स्थिती म्हणायची. २. युरोपमधे थंडी म्हणून मांस योग्य ठरणं हे पूर्वीही अनेक ठिकाणी वाचलंय. पण तिथेही आताच्या युगात थंडीत उघडावाघडा कोण फिरतो? बहुतांश लोक शक्य तितका काळ सेंट्रली हीटेड घरं आणि हपीसांत असतात. कपड्यांमधेही बरीच सुधारणा झाली आहे. अशावेळी थंडीला तोंड देण्यासाठी मांसातून, विशेषतः चरबीतून क्यालरीज घेण्याची तितकी गरज उरली असावी का? त्यांनाही ते अपायकारकच ना?

In reply to by गवि

लाल मांस हे हानिकारक आहे हे अमेरिका, युरोप मधील फूड एक्स्पर्ट सांगत आहेतच. त्यामुळे या प्रदेशातील बरेच लोक सध्या वेगन फूडच्या मागे लागलेत. बऱ्याच काळापासून जेवायला फक्त सलाड खाणाऱ्यांची संख्या तर खूप आहे. रेड मीट जास्त प्रमाणात खाणाऱ्यांची शरीरयष्टी (?) काय वर्णावी. तसेच त्यांच्या अंगाला पण एक विशिष्ट वास (घाणच) येत असतो आणि व्याधींचं प्रमाण पण जास्त असतं. .

In reply to by ट्रेड मार्क

लाल मांस म्हणजे नेमके कुठल्या प्राण्याचे? त्याला लाल मांस का म्हणतात? नॉन-लाल मांस असे काही असते का?

In reply to by बॅटमॅन

त्यांना लाल मांस ही राजस्थानी रेसिपी म्हणायचे असेल!! असो, तुम्ही सिरियसली विचारता आहात हे गृहित धरून सांगतो - शेळी, मेंढी, गाय, म्हैस, डुक्कर इत्यादी ज्या प्राण्यांचे मांस हे शिजवल्यानंतर लाल रंगाचे दिसते, ते रेड मीट. कोंबडीचे मांस शिजवल्यावर पांढरे दिसते, तेव्हा ते व्हाइट मीट! बादवे, रेट मीटसोबत रक्त-वारुणी आणि व्हाइट मीटसोबत श्वेत-वारुणी हा साहेबी रिवाज आहे आणि मी शक्यतो तो पाळायचा प्रयत्न करतो!!

In reply to by सुनील

धन्यवाद, हे खरेच माहिती नव्हते. म्हणजे चिकन हे रेड मीट नव्हे हे माहिती होते पण तितपतच. म्हणून विचारले आपले. पुनश्च धन्यवाद!

आहाराचा माणसाच्या शरिररचनेवर प्रभाव न दिसण्याचे प्रमुख कारण म्हणजे हे अन्न मिळविण्यासाठी साधनांचा केलेला वापर. जसे मासे पकडण्यासाठी गळ व जाळ्याचा वापर, प्राण्यांच्या शिकारीकरता बंदूक,धणुष्यबाण किंवा इतर साधनांचा वापर ज्यामुळे शारिरीक कष्ट व हालचाल कमी होते.

आपल्या कळपाला मान्य नसल्यामुळे अमूक एकाकडून अमूक एक गोष्ट घडली म्हणून मार देणे वा जीवंत मारून टाकणे हे रानटी मानवी टोळ्यांचे काम होते. आजच्या सभ्य माणसांच्या समूहांचे नाही.
याच्याशी सहमत. पण आजच्या काळात सुद्धा मार देणे आणि जीवंत मारून टाकणे (म्हणजे काय असतं ब्वा?) हे खूपच जास्त प्रमाणात घडतंय. पण मुद्दे मांडण्यात जरा गडबड झालीये. शाकाहारी विरुद्ध मांसाहारी या वादाविषयी बोलताय का मांसाहारामधेच असणाऱ्या गटांबद्दल बोलताय? जैन लोक पूर्ण शाकाहारी असतात आणि ते आपल्या बिल्डींगमध्ये मांसाहारी लोकांना राहू देत नाहीत. परंतु ते त्यासाठी कोणाला मारत नाहीत. मांसाहारामधेच असलेल्या गटांबद्दल बोलायचं तर जास्त शक्यता फक्त गायीचं मांस आणि डुकराचं मांस या मधेच वाद असतात. डुकराबद्दल असहिष्णू असलेले लोक तर केवळ डुकराचं चित्र आणि इसिस चा झेंडा एकत्र केले म्हणून पण दंगा करतात. कारण काय तर इसीस च्या झेंड्यावर त्यांच्या दृष्टीने पवित्र शब्द लिहिले आहेत. पण मग इसिसने केलेले अत्याचार चालतात आणि बिचाऱ्या डुकराचे चित्र पण चालत नाही. बाकी कोणी काय खावे हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी त्याचा आजूबाजूच्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. उद्या तुमच्या अगदी शेजारी एखादा रोज बोंबील घरासमोर वाळवायला ठेवणारा आणि घरी शिजवणारा माणूस आला किंवा हलाल खायचं म्हणून त्याच्या दारासमोर एखाद्या प्राण्याची गळ्याची नस कापून रक्त वाहून देत राहिला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? किती सहिष्णू रहाल? मनुष्याची शरीर रचना या विषयावर आपला पास… बाकी बरेच डॉक्टर आहेत त्यावर बोलायला. अवांतर: तुम्ही कसले डॉक्टर आहात, म्हणजे MBBS का PHd?

In reply to by ट्रेड मार्क

जैन लोक पूर्ण शाकाहारी असतात आणि ते आपल्या बिल्डींगमध्ये मांसाहारी लोकांना राहू देत नाहीत. परंतु ते त्यासाठी कोणाला मारत नाहीत.
जैन लोक काही कमी नाहीत... राहत्या घरी मांसाहारी जेवण करतात म्हणून नाट्‌यनिर्माते गोविंद चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याच इमारतीत राहणार्‍या जैनांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना हल्लीच वाचल्याची आठवतेय.

In reply to by बाजीप्रभू

एवढेच कशाला, मांसाहार करतात म्हणून निघून जाण्याबद्दलचे धमकीपत्र आणि त्यात त्या मांसाहारी माणसाच्या मुलीवर बलात्कार करू अशी धमकीही दिली होती. आणि म्हणे हे सात्विक. हाड तेच्यायला.

In reply to by बॅटमॅन

असं म्हणायचं होतं. सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की सरसकट कत्तल करत नाहीत. बाकी सगळे जैन काही साधू संत आणि सात्विक असतात असं माझं म्हणणं नाहीये.

In reply to by ट्रेड मार्क

हिटलर हा पिव्वर व्हेज होता बरंका. कंबोडियाचा हुकूमशहा पोल पॉट- तोच तो २० लाख लोकांना ठार मारणारा- तोही व्हेजच होता.

संक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. हा त्यांच्या ब्लॉग वरील परिचय आहे.

डॉ. देवरे फक्त धागा काढतात आणि परत बघत सुद्धा नाहीत. एकाही प्रतिसादावर प्रतिवाद नाही किंवा कसलं स्पष्टीकरण नाही. आपण आपले विचार मांडायचे आणि सोडून द्यायचं किंवा गम्मत बघत बसायचं असा खाक्या दिसतोय बहुतेक.

राहिली गोष्ट मांसाहाराची ज्यांना ते खावेसे वाटते त्यांनी ते खावे आणी ज्यांना पटत नाही त्यांनी ते खाऊ नये इतकी साधी गोष्ट आहे. यासाठी मांसाहाराचे समर्थन करायचीही गरज नाही तसेच मी पूर्ण शाकाहारी आहे ( म्हणजे मी श्रेष्ठ आहे )आणी मांसाहारी लोक तामस आहेत असेही म्हणायची गरज नाही.
सदरहू वाक्य मसीहा धाग्यांप्रमाणे अश्या धाग्यांवर आपोआप यावे असी आकाशातल्या बाप्पाकडे* प्रार्थना... जे *त्याला मानत नाहीत त्यांनी त्यांश्या आवडीचे/सवडीचे स्थान तिथे कल्पावे. उगा तो बाप्पा आहे का नाही याचा काथ्या कुटू नये. त्या दळणासाठी वेगळी गिरणी आहे तिथेच जावे. तरकारी नाखु.

आपण काय खावं हे कोणीतरी तिसरी व्यक्ती ठरवणार असेल तर जगणं मुश्कील आहे. aapan kay rajkaran karaw he koni tisra paksh samuh tharwnar asel tar NIWDUN yene mushkil ahe. aho jase prani mansachya khanyasathi janmale ahet . tasech samanya praja RAJKIY NETYACHYA sattesathi ahe, Ugach tumhala bolta yete mhanun mansanwar honarya anyayasathi tumhi tond ughadu shakt. kahihi khayche asel tar udya mi MANUS khalla tari konas problem yawayas nako.

‘बोंबीलचा वास’ ही कथा आणि ‘देव हातात हात घालून’ ही कविता हे दोन्हीही माझे कलाविष्कार तसे जुनेच. पण जुन्या कथा कवितांना असे नवे दिवस या हिंस्त्र पार्श्वभूमीवर यावेत हे दु:खदायकच.
स्वतःच काही लिहून त्याला स्वतःच कलाविष्कार म्हणणं म्हणजे जरा जास्तच झालंय. जर विनोद करत असताल तर अस्थानी आणि त्यामुळे पाचकळ झालेला आहे. वर त्या कवितेला नवीन दिवस आलेत हेही आपण स्वतःच जाहीर करत आहात? जसं की फार पूर्वी या कवितेनं अख्खा महाराष्ट्र हलवला आहे असं वाटावं... बाकी मतं मांडायला काहीच हरकत नाही. प्रत्येकाला मत असावं आणि त्यानं ते जरूर मांडावं. (फारतर काय, एखाद्या विषयातलं आपल्याला कितपत कळतं ते सगळ्या वाचकांना कळेल; या पलिकडे काय होइल?)

काय काय माकडं पन पक्षांची पिल्ल/अंडी खात्यात आसं ऐकलय, मंग त्यांच्यात पन आसला शाकारी मौन्सारी वाद होत आसल का बर?

In reply to by भीमराव

सर्वच माकडे शाकाहारी नसतात. काही माकडे( वानर) उदा बाबून चिम्पान्झी इ. इतर प्राण्याचे मास खाताना आढळतात. काही वेळेस ते लहान हरीण, पक्षी, फ्लेमिंगो इ प्राण्यांची प्रत्यक्ष शिकारही करतात. या सर्व माकडांचे सुळे (उदा. बाबून) अतिशय मोठे आणि धारदार असतात त्याने ते या प्राण्यांची मान चावून त्यांचा प्राण घेतात.

In reply to by सुबोध खरे

सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून माणूस हा फलाहारी मर्कट( FRUIT EATING PRIMATE) आहे असे सिद्ध होते.
परंतु
चिम्पान्झी इ. इतर प्राण्याचे मास खाताना आढळतात. काही वेळेस ते लहान हरीण, पक्षी, फ्लेमिंगो इ प्राण्यांची प्रत्यक्ष शिकारही करतात.
आणि माणूस हा चिम्पांन्झीच्या सगळ्यात जवळचा आहे (>९५% डीएनए) ना? नाही, आमची आपली एक बाळबोध शंका!! :)

In reply to by पिवळा डांबिस

https://www.google.com/search?q=canines+chimpanzees&rlz=1C1CHNY_en-ININ… https://www.google.com/search?q=CANINES+OF+BABOON&rlz=1C1CHNY_en-ININ37… या प्रतिमा पहा म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि या मर्कटांचे सुळे माणसापेक्षा कसे वेगळे आहेत ते.माणसाच्या सर्वात जवळचा प्राणी म्हणजे मर्कट असे असूनही त्यांच्या मेंदूत (आणि पर्यायाने बुद्धिमत्तेत) प्रचंड फरक आहे. राहिली गोष्ट चयापचयाची यात सुध्धा हि माकडे जास्त करून फलाहारीच आहेत. परंतु प्रथिनांची आणि चरबीची कमतरता पूर्ण करण्यासाठी ते संधीसाधूपणे शिकार करताना आढळतात परंतु शिकार हा त्यांचा मुख्य आहार नाही.

In reply to by सुबोध खरे

राहिली गोष्ट चयापचयाची यात सुध्धा हि माकडे जास्त करून फलाहारीच आहेत. परंतु प्रथिनांची आणि चरबीची कमतरता पूर्ण करण्यासाठी ते संधीसाधूपणे शिकार करताना आढळतात परंतु शिकार हा त्यांचा मुख्य आहार नाही.
तसेच भारतीय मांसाहारी माणसे सुद्धा अख्खं ताट भरून मांस खात नाहीत. त्यांच्या जेवणात ८०% शाकाहारच असतो, भात, चपाती, भाजी, कोशिंबीर, सोलकढी, वगैरे... एकावेळेस एक किंवा फारतर दोन मांसाहारी जिन्नसच पानात असतात! :)

In reply to by पिवळा डांबिस

पि डां साहेब माणूस फलाहारी मर्कट आहे म्हणजे तो मांस पचवू शकत नाही असे नव्हे तर जीवशास्त्रीयदृष्ट्या शाकाहारी आहे. पानात पडलेले सामिष पदार्थ शिजवलेले आणि हत्यारांच्या सहाय्याने मारलेले असतात. स्वतःच्या दात आणि नखांनी नव्हे. जसे वरील मर्कट किंवा मांसाहारी प्राणी करतात. अगदी घनदाट जंगलात माणूस फळे आणि कंद खाउन व्यवस्थित जगू शकेल. तेथे शिकार करण्यासाठी निसर्गाने त्याला कोणतीही शारीरिक प्रणाली दिलेली नाही एवढाच त्याचा अर्थ आहे. मी स्वतः मांसाहार करतो पण शाकाहार किंवा मांसाहार कशाचाच पुरस्कार करीत नाही. कोणतीही हलणारी वस्तू किंवा प्राणी खाणारे मांसाहारी केरळी असा किंवा कट्टर जैन असा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.

In reply to by सुबोध खरे

मी स्वतः मांसाहार करतो पण शाकाहार किंवा मांसाहार कशाचाच पुरस्कार करीत नाही. कोणतीही हलणारी वस्तू किंवा प्राणी खाणारे मांसाहारी केरळी असा किंवा कट्टर जैन असा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
डॉक्टरसाहेब, मी ही तेच म्हणतो. "जो जे वांच्छील तो ते खावो!!" पण माणूस हा मुळात वा जीवशास्त्रीय दृष्ट्या शाकाहारीच आहे असं जे काही शाकाहारी मंडळी प्रतिपादन करतात त्याला माझा विरोध आहे. माणसाने त्याला अग्नीचा शोध लागल्यावर मांस शिजवून खायला सुरवात केली पण त्याआधी तो न शिजलेले मांस खातच नसेल याला काहीही पुरावा मलातरी आढळलेला नाही. एखाद्या माणसाला शाकाहार रुचत असेल तर त्याने तो जरूर खावा, माझी ना नाही. किंबहुना पूर्ण पाठिंबाच आहे. पण त्या शाकाहारी माणसाने मांसाहारी माणसांना 'शाकाहारच कसा योग्य' याविषयी ज्यास्त श्यानपना शिकवायला माझा विरोध आहे. जर मांसाहारी लोक शाकाहार्‍याला मांसाहाराचा उपदेश करायला येत नाहीत (क्वचित थट्टा करत असले तरी) तर ह्या शाकाहार्‍यांना हा उद्योग करायची गरज काय, हा माझा आक्षेप आहे.

In reply to by पिवळा डांबिस

हा आक्षेप बरोबर आहे. जो जे वांछील तो ते खावो हे मान्य. पण मांसाहारी लोक पण शाकाहारी लोकांची थट्टा करतात ( घासफूस ई ई) ते हि चूक आहे. मूळ कोणताच आहार श्रेष्ठ नाही. परंतु शाकाहार हा आरोग्यास मांसाहारापेक्षा(मत्स्याहार वगळून) जास्त हितकर आहे असा सध्याच्या संशोधनातून निघालेला निष्कर्ष आहे. त्यामुळे कदाचित सारस्वत आणी बंगाली लोकांचा आहार (शाकाहार + मासे) हा चांगला असावा अशी शक्यता आहे. खालील दुवे हे कोणत्याही धार्मिक किंवा सांप्रदायिक संघटनेचे नसून इंग्लंड अमेरिकेतील सरकारी आरोग्य संघटनांचे आहेत. http://www.nhs.uk/news/2013/06June/Pages/Vegetarian-diet-linked-to-long… http://ajcn.nutrition.org/content/78/3/526S.long http://healthland.time.com/2013/06/04/vegetarians-may-live-longer/

In reply to by सुबोध खरे

रच्याकने-- मी मांसाहार करतो तो केवळ "चवीसाठी" करतो.त्याचे समर्थनही करत नाही कि त्याचा अधिक्षेप हि करीत नाही. आरोग्य वजन इ. दुय्यम गोष्टींचा विचारही त्यात येत नाही.

In reply to by सुबोध खरे

पण मांसाहारी लोक पण शाकाहारी लोकांची थट्टा करतात ( घासफूस ई ई) ते हि चूक आहे.
हो ते चूक आहे. काही येडझवे तसं का करतात हे मलाही लहानपणापासून न उलगडलेलं कोडं आहे!!!
त्यामुळे कदाचित सारस्वत आणी बंगाली लोकांचा आहार (शाकाहार + मासे) हा चांगला असावा अशी शक्यता आहे.
थॅन्क्यू! धन्य मी, कृतार्थ मी!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

तुम्ही सारस्वत आहात का? ( म्हणजे बंगाली असण्याची शक्यता कमी म्हणून हो) दाबून मासे खा( आरोग्य मिळवा) आणि खिलवा( पुण्य मिळवा). "मासे"- (पण कठीण कवचाचे म्हणजे खेकडे, शिंपले, झिंगे नव्हे)

In reply to by सुबोध खरे

आरोग्यासाठी सर्वात चांगला मासा म्हणजे बांगडा, सर्वात स्वस्त अस्ला तरीही सुरमई किंवा रावस किंवा पापलेट पेक्षा पोषण मूल्यात कितीतरी चांगला आहे. मी आवर्जून गरोदर स्त्रियांना बांगडा खाण्याचा सल्ला देतो रच्या कने -- एतद्देशिय फळे उदा आवळा पेरू बोरे आंबे इ हि सफरचंद, पेअर, किवी इ विदेशी फळांपेक्षा पोषण मूल्यांत किती तरी अग्रेसर आहेत. तेंव्हा महाग गोष्टीच चांगल्या हा हुच्च्भ्रू लोकांचा समज चुकीचा आहे

In reply to by सुबोध खरे

मासा अन्नसाखळीत जितका वर तितके हेवी मेटल डिपॉझिट्स जास्त असं माहिती आहे. त्यामुळे सुरमई, मोरी, ट्युना वगैरे अत्यंत कमी फ्रीक्वेन्सीने खावे असं म्हणतात.

पण मी काय म्हणतो काका की सगळे जग जर मांसाहारी (गेला बाजार मिश्राहारी) झाले तर मग मांसाहारी लोकांना मांस कमी पडायला लागेल. चिकन १२०० रुपये किलो होइल (ते एक दिवस होणारच आहे म्हणा). मटन २००० रुपये किलो होइल. कसे परवडणार हो गरिबाला?? आखाड तरी साजरा करता यिल का? आणि मग कोणीतरी अजुन एक धागा काढेल की कसे चिकन खाणारे झुरळ खाणार्‍या लोकांना आपल्या वसाहतीत येउ देत नहित. कशी त्यांना झुरळं, किडे, अळ्य पकडुन खाणर्‍या माणासांची किळस वाटते. माणसामाणसा मध्ये होणार्‍या या भेदभावावर कोणीतरी सडकुन टीका करेल. मंग सगळेच लोक झुरळं खायला लागतील. आलम दुनियेतील झुरळांची प्रजाती धोक्यात येइल. झुरळ मारण प्रतिबंधक कायदे तयार केले जातील. टीव्हीवर जाहिराती येतील की भारतात केवळ १४ लाख झुरळे उरली आहेत. देशाचा खर्च होइल. तेव्हा झुरळांची प्रजाती संपुष्टात येउ नये म्हणुन काही तुच्छ लोकांनी शाकाहारी राहणे समाजहिताचे आहे असे नमूद करु इच्छितो.

खाणं हे साधन बनवुन भेदभाव केला जातो हे सत्य आहे. म्हणजे अमुक खाणं खाणारा श्रेष्ठ वा अमुक न खाणारा श्रेष्ठ वा अजुन वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये वापरुन. आता खाणं हे एक साधन झालं भेदभाव करण्याचं, श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविण्याचं , सत्ता गाजवण्याचं पण फक्त ते अनेक असंख्य साधनांपैकी एक आहे. आर्थिक स्तर, भाषा, वर्ण , जात , भौगोलिक स्थान, राष्ट्र, अनेक अनेक साधनांनी माणुस तेच काम साधत असतो. भेदभाव करण्याचं, श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविण्याचं , सत्ता गाजवण्याचं मुळ प्रश्न यावेळेस कुठल साधन वापरलय खाणं पुढच्या वेळेस ते वर्ण असेल नंतर राष्ट्र असेल नंतर आर्थिक स्तर असेल हा नाहीच. मुळात एक माणुस दुसरयावर सत्ता गाजविण्यासाठी, त्याला कनिष्ठ ठरवण्यासाठी, का केव्हा कसा कोणत्या प्रेरणांनी प्रवृत्त होतो वा एक माणुस वरील सर्व टाळुन सहकार्य संवेदना व्यक्त करत दुसर्या माणसाशी समरस होण्यास का केव्हा कसा कोणत्या प्रेरणांनी प्रवृत्त होत असतो. हे शोधण्याचा यावर चिंतन करण्याचा आहे. ठीक आहे आज खाणं साधन आहे उद्या साधन रीप्लेस होइल अजुन एखादा दुसरं साधन असेल पण मुळ प्रवृत्ती सत्ता गाजवणे वर्चस्वाची भावना अहंकार तो तर मुलभुत आहेच ना. साधना पेक्षा साधना मागील प्रवृत्तीवर मुलगामी चिंतन होणं गरजेच आहे असे प्रामाणिकपणे वाटते. हा मोठा कुतुहलाचा विषय आहे एक माणुस प्रेमाकडे सहकार्य संवेदनशीलता समरसते कडे कसा प्रवृत्त होतो व दुसरा विरोधी भावनेने.

डॉ साहेब एक प्रश्न की आपण जे खातो / पितो ते सर्व स्वच्छ, शरिराला पचेल असे पदार्थ खातो. मग प्राण्यांचा असा काय मेटॅबोलीसम असतो की ते काही खावु शकतात आणि कुठलेही पाणी पिवु शकतात (रस्त्यावर पडलेले पावसाचे पाणी पिवुनही पक्षी, प्राणी ते पचवु शकतात पण आपल्याला मात्र गाळलेले, उकळलेले पाणी लागते. ) आणि गाय ही रवंथ करणारी असुन सुध्दा मी तिला मासे खाताना पहिलेले आहे. हे कसे शक्य आहे. म्हणजे मांसाहार पण ती रवंथ करत असेल काय?

In reply to by प्रमोद देर्देकर

ते काही खावु शकतात आणि कुठलेही पाणी पिवु शकतात
हे बरोबर नाही. प्राण्यांना पण अपचन, वीषबाधा, पोटातला जंतूसंसर्ग वगैरे होतच असतो.

In reply to by प्रमोद देर्देकर

प्रमोद राव प्राणी कुठलेही पाणी पितात त्यामुळे त्यांना जंतू आणि जंत दोन्हींचा संसर्ग होतोच. गायींच्या पोटात १० किलो प्लास्टिक निघाले अशा बातम्या आपण वाचतो त्या प्लास्टिक पचवता येते? फरक एवढाच आहे कि निसर्गात प्राणी शक्तिपात झाल्यावर जगतच नाहीत. मांसाहारी प्राणी अपंग किंवा अशक्त झाल्यावर शिकार करू शकत नाहीत त्यामुळे उपासमारीने मृत्यू होतो आणी शाकाहारी प्राणी अपंग किंवा अशक्त झाल्यास (उदा. जंतू संसर्गामुळे एखादे हरीण अशक्त झाले तर) पटकन शिकारी प्राण्यांच्या भक्ष्य स्थानी पडतात. त्यामुळे निसर्गात अशक्त वृद्ध आणी अशक्त प्राण्यांना स्थान नाही. फक्त माणसात गलितगात्र,अपंग, वृद्ध झालेल्याना "जगवले" जाते. म्हणूनच याला "माणुसकी"म्हणतात. निसर्ग कठोर असतो. राहिली गोष्ट गाय म्हैस रानरेडा यासारखे प्राणी जंगलात घाई घाईने गवत न चावता गिळतात ते त्यांच्या जठराच्या एका भागात (RUMEN) साठवले जाते (त्यांच्या जठराचे चार भाग असतात) जेंव्हा हे प्राणी सुरक्षित अशा ठिकाणी येतात तेंव्हा हे पोटातील अर्धवट चावून गिळलेले गवत परत तोंडात आणून व्यवस्थित चावून लाळे बरोबर मिसळून परत गिळले जाते यात गवतातील सेल्युलोज या प्रमुख घटकाचे आंबवून लहान घटकात रुपांतर करण्याची प्रक्रिया होते. या प्रक्रियेला रवंथ म्हणतात. मांस पदार्थ पचवण्यासाठी या प्रक्रियेचा( आंबवून पचवणे) उपयोग होत नाही. पहा https://en.wikipedia.org/wiki/Ruminant

काय काय माकडं पन पक्षांची पिल्ल/अंडी खात्यात आसं ऐकलय, मंग त्यांच्यात पन आसला शाकारी मौन्सारी वाद होत आसल का बर?

अजून साधारणतः २५-५० वर्षांनी मानवाला कीटक (Insects) खायला लागतील. वाढणारी लोकसंख्या आणि कमी होणारी शेती, तसेच कमी होणारी प्राण्यांची संख्या याचा एकत्रित परिणाम म्हणून लोकांनी कीटक खाण्याच्या पर्यायाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. U.N. Food and Agriculture Organization चा लेख. National Geographic मध्ये लिहिलेला लेख…. त्यातील काही भाग खाली दिला आहे. U.N. Food and Agriculture Organization reminds us that there are more than 1,900 edible insect species on Earth, hundreds of which are already part of the diet in many countries. In fact, some two billion people eat a wide variety of insects regularly, both cooked and raw; only in Western countries does the practice retain an "ick" factor among the masses. कोणाला जर काही वेगळं खाऊन बघायचं असेल तर आजकाल Cricket Cookies पण मिळतात. अधिक माहिती इथे.

In reply to by ट्रेड मार्क

टांझानिया, केनिया, युगांडा इथे लोक आपण वेफर्स खातो तसे तळलेले टोळ आणि नाकतोडे खातात. आपल्या देशात छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातले आदिवासी लाल मुंग्यांची चटणी करुन खातात. ती त्यांच्यामध्ये delicacy समजली जाते. त्यामुळे मानवाला अजून काही वर्षांनी कीटक खाऊन जगावे लागेल हे म्हणणे चुकीचे आहे. मानव अात्ताच कीटक खायला लागलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

सांगण्याचा उद्देश होता की सध्या आपल्या इथे जसं चिकन, मटण खातात तसं कीटक पण खायला लागतील. पूर्वापार जेथे खातात त्यांच्यासाठी हे तसं पण लागू नाहीच होणार.

In reply to by बोका-ए-आझम

बाकी किडेबिडे जाऊद्यात, पण मुंग्यांची चटणी एकदा खाऊन बघायची इच्छा आहे. मटणाचे लोणचे करतात तर मुंग्यांच्या चटणीनेच काय घोडे मारलेय की. रच्याकने मुंगी चिरडल्यावर एक उग्र वास आला होता बाकी हाताला. (खाल्ली नाही हेवेसांनल) फॉर्मिक अ‍ॅसिड का कायतरी असावे बहुधा.

In reply to by बॅटमॅन

भिलाला (भिल्ल नव्हेत) या जातीचे आदिवासी लाल मुंग्यांची चटणी खातात. सुरभी हा जो सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांचा कार्यक्रम होता, त्याच्या एका भागात त्यांनी हे दाखवलं होतं. ही होळीच्या सुमारास केली जाणारी delicacy आहे. एका वारुळातून २०-२५ लोकांना पुरेल एवढी चटणी बनते. ती जेवणानंतर उरली (फारच कमी शक्यता) तर दुस-या दिवशी मोहाच्या दारुबरोबर खातात. ही सगळी माहिती त्या स्टोरीमधून मिळालेली आहे. माझा मित्र रवींद्र पालेकर आणि मी या स्टोरीचं संकलन केलं होतं. प्रत्यक्षात बस्तरला जायचा योग आलेला नाही.:(

In reply to by ट्रेड मार्क

किडे/कीटक खाण्यात काहीही चुकीचं / वाईट नाही.. जी 'किळस' बहुतांश शुद्ध शाकाहार्‍यांना मांसाहारी लोकांबद्दल असते, तीच किळस बहुतांश मांसाहारी लोकांना किटक खाणार्‍यांबद्दल असते. खरंतर किडे हे 'प्रोटीन रीच डाएट' आहे. किडे/प्राणी खाण्याची संस्कृती असलेल्या लोकांमध्ये कुपोषणाचे प्रमाणपण कमी असते. किडे पकडण्याच्या ट्रीक्सपण भारी असतात.. (रोस्टेड हिरवे टोळ आणि 'सिल्कवर्म्स' ट्राय केलेला) चिगो

In reply to by चिगो

वाईट आहे असा अर्थ ध्वनित होतोय का? yuk factor आहेच आणि तो असणं स्वाभाविक असावं. अगदी विविध प्राणी/ पक्षी खाणाऱ्यांना पण नको वाटू शकतं. आख्खा कीटक प्लेट मध्ये न देता जर वेगळ्याप्रकारे दिला आणि कोणी नकळत खाल्ला तर कदाचित शक्य आहे अन्यथा भारतात असं सरसकट कीटक खाणं जरा अवघड आहे असं मला वाटतंय.

In reply to by ट्रेड मार्क

कीटक हे तसेच न देता त्यांचे तयार पदार्थ बनवून दिले तर ते आपल्याला कळणार पण नाही. असेही अमेरिकेत मिळणारे २५ % सामिष पदार्थ शाकाहारी ( सोय पासून बनवलेले असतात.

In reply to by चिगो

माझ्या एका अासामी मित्राने खासी लोकांबद्दल बोलताना हेटाळणीच्या सुरात - ते तर किडे आणि गोगलगाय पण खातात. त्यांनाही सोडत नाहीत वगैरे ऐकवलं होतं. टांझानियात बिनशंखाची आणि झाडांची मुळं आणि पानं खाऊन वाट लावणारी जी गोगलगाय आहे ती खातात आणि तीही delicacy समजली जाते.

In reply to by बोका-ए-आझम

बरोबर.. मी मेघालय मध्ये आहे. अहोमिया (आसामी नको म्हणायला) लोकं आपल्याकडच्यासारखेच मांसाहारी आहेत, त्यामुळे त्यांना हे सगळं 'यॅक' वाटणारच.. माझ्यामते, ह्या सगळ्या इन्हिबीशन्स आहेत. झिंगा/जवला म्हणजे किडा अळीच की.. खेकडा काय आहे दुसरा? खाली बॅट्या बोललाय, तसं गोगलगाय ही 'डेलिकसी' मोडते बर्‍याच युरोपीयन देशांत, पण हेच लोक चायनीज/ द्क्षिणपुर्व आशियाई खाण्याला नाकं मुरडतील.. शेवटी काय, तर आपला तो बाब्या, हेच खरं..