✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झोंबाड

ज
जव्हेरगंज यांनी
Wed, 10/28/2015 - 22:51  ·  लेख
लेख
आभाळ भरुन आलं हुतं. सोसाट्याचा वारा सुटला हुता. धुळीचे लोट सगळ्या वावरात ऊठत लांबवर पसरत चाललं. आभाळातनं एकेक टिपका पडाय लागला. शेलामायनं गवताचा भारा ऊचलुन गोठ्यात ठिवला. भराभरा धुणं काढुन घरात ठिवलं. "आगं रेडकु तर सोड तेव्हढं" उंबऱ्यापाशी नुसतीच ताटकळलेली रुपी तशी भानावर आली. लगबगीनं जाऊन तिनं रेडकाचं दावं सोडलं. वढत वढत आणुन त्याला गोठ्यात बांधलं. आन पुन्हा ताटकळत तशीच ऊभी राहिली. रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच येतो. पण संध्याकाळच्या वेळेस आला की जोरदार कोसळतो. आणि अशा कातरवेळी तिच्या चित्तवृत्ती जाग्या करुन जातो. कोपऱ्यात धुणं ठेऊन शेलामायनं ऊदबत्ती पेटवली. देव्हाऱ्याच्या पुढं केळात खोचली. हाळदी कुकु लावुन फुलं ऊधळत निवद दाखवला. भक्तिभावानं होत जोडत माथा टेकवला. आभाळ फाटलं तरी शेलामायची रोजची पुजा कधी चुकली नाही. सकाळ संध्याकाळ तिचा पुजेचा कार्यक्रम ठरलेला. रुकडीआयची ती निस्सीम भक्त होती. घराम्हागं शेताच्या तुकड्यात एक छोटसं देऊळही तिनं बांधुन घेतलेलं. गळ्यात कवडीच्या माळा घालुन, सणावाराला परडी घेऊन घरोघरी ती जोगवाही मागायची. चुल पेटवुन शेलामाय धुराड्यात सैपाक करत बसली. रुपीनं काटकुटं ऊचलुन तिच्याम्होरं सरपानाला ठिवलं. तिचं पांढरफटक कपाळ बघुन शेलामायला पुन्हा एकदा कससचं झालं. बाहेर पावसाचा जोर वाढला. कंदिलाच्या मिनमीनत्या ऊजेडात रुपी भिताडाला टेकुन शुन्यात नजर लावुन बसली. अडीत-तीन वर्षाखाली तिचं लगीन झालेलं. पण आठवड्याभरातच नवरा खपलेला. तिला नवऱ्याचा चेहराही नीटसा आठवत नव्हता. त्याला नेमका कोणता रोग होता हे ही तिला नाही समजलं. पण तेव्हापासुन गोऱ्यागोमट्या रुपीचं काळं दिवस सुरु झालेलं. पुढं नुसताच अंधार वाढुन ठेवलेला. तिनं एकटक कुठेतरी बघत बसनं नित्याचचं झालं होतं. "हाय का शेलामाय घरात?" दार ऊघडुन भाऊसाहेब आत आला. तशी रुपीची तंद्री भंगली. "कोण भावसाब हायतं का?, या की" कंदिल ऊचलुन शेलामाय दरवाज्याकडं बघत नीट न्याहाळत म्हणाली. "व्हय मीच हाय, जेवन झालं का रुपे?" "न्हाय आजुन व्हय चय" रुपी खोल आवाजात बोलली. त्याचे तांबरलेले डोळे आणि हातातली बाटली तिच्या नजरेतुन सुटली नाही. भाऊसाहेबनं आत येऊन टावेलानं डोकं पुसलं. दुसऱ्या खोलीत जाऊन कापडं पण बदलली. मग तिथच खाटंवर त्यानं ताणुन दिली. शेलामायनं त्याला 'जेवायचं का?' म्हणुन पण विचारलं नाही. 'येवढ्या रात्री कसं आला?' हे पण विचारलं नाही. रुपीनं पण जास्त विचार केला नाही. भाऊसाहेब हा शेलामायच्या माहेरी नेहमी ऊठबस असणारा महत्वाचा माणुस. आपल्या लग्नाअगोदर ईकडं घरी नेहमी यायचा. नान्याला खेळवत बसायचा, फटफटीवरनं गावात फिरवुन आणायचा. पण आपलं हे असं झाल्यापासुन त्याचं घरी येणं जवळपास बंदच झालं होतं. आज तो बऱ्याच दिवसांतुन आला होता. ते पण येवढ्या रात्री. मुक्काम तर त्यानं आजपर्यंत कधीच केलेला न्हवता. रुपी विचारात हरवली. "जेवुन घी गं पोरे, आन आज पलिकडच्या खुलीत झोप, भावसाब झोपल्यातं खाटंवरं" शेलामायचा सैपाक अजुन झालाही न्हवता. पण रुपीला तिनं गळ घातली. जेवण ऊरकुन रुपीनं माजघरात अंधरुन टाकलं. हे माजघर अगदी छोटसं. तिथं बरच जुनं सामान रेचुन ठेवलेलं. घरात कोणीही पाहुणे आले तर रुपीची ही खोली ठरलेली. एरव्ही ती घरात खाटेवरच झोपायची. मिट्ट अंधारात रुपी पावसाची रिपरीप ऐकत पडली. माजघरातली ईकनं बघुन तिला तिचा बाप आठवायचा. आठ दहा वर्षापुर्वी तिचा बाप वारीला गेला होता. टाळ, मृदुंग आणि किर्तनात त्याचा जीव हरपला. घरी आला तो देवाचा नाद घेऊनच. मग पुन्हा वनवासाला गेला. तिथनं आल्यावर दाढ्या वाढवुन, कपाळावर भगवा लावुन, गळ्यात माळा घालुन गावोगावी फिरत राहिला. मग त्याचं घरी येणं बंदच झालं. रुपीला त्याचाही चेहरा काहीकेल्या आठवेना. बारका भाऊ नान्या घरी असल्यावर तिचा जीव रमायचा. मात्र तोही आता आजोळी गेला होता. नाही म्हणायला तिचा एक वर्गमित्र बाब्या जो पवाराच्या वस्तीत राहायचा तो अधुन मधुन तिचे हालहवाल विचारायचा. एरव्ही तिच्याशी बोलायला कुणीच नसायचं. घरात मायलेकी तरी किती बोलणार. रुपीचे दिवस असे हे मुकाट होत चाललेले. घरात एकटी पडल्यावर भुतकाळातला सारा पट तिच्यासमोर ऊलगडत जायचा. रात्री तिला लवकर झोपही यायची न्हाय. मग जुन्या आठवणींना कुरवाळत ती पडुन राहायची. त्यात तिला मौज ही वाटायची. पण आज येवढ्या पावसात अवेळी आलेला भाऊसाहेब तिच्यासाठी एक भलमोठ्ठं प्रश्नचिन्हं घेऊन आला होता. ऊघड्या दरवाज्यातुन बाहेर कोसळणारा पाऊस बघत ती हा गुंता सोडवत बसली. आधी हा भाऊसाहेब जेव्हा कधी यायचा, तेव्हा ऐण दुपारी दाराला आतुन कडी घालुन घरात झोपायचा. आपल्याला हे नवीन नव्हतं, पण शेलामायही कुठे नजरेस पडत नसायची तेव्हा आपला जीव खालीवर व्हायचा. मग बारक्या नान्याला खेळवत आपण गोठ्यातच बसायचो. ही आठवण खुपच जुनी. म्हणजे शेलामाय आणि भाऊसाहेब यांचं काही शिजत तर नसेल. बाहेर पावसाचा जोर अजुनच वाढला. पण येवढ्या धुवाधार पावसात आणि वाऱ्याच्या घोंघाटात पलिकडच्या खोलीतुन आलेली बांगड्याची किणकीण, हपापलेले श्वास, आणि पायांची धुसमुस तिच्या कानात शिरत गेली. रुपीची रात्र अजुनच गडद होत गेली. शेलामायनं तिला फसवलं होतं. शेलामाय ही एक निब्बर बाई होती. तिचा साजशृंगार बघुन गावकरी तिला नखरेल म्हणत. पण भांडखोर स्वभाव बघुन कोणाची तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची टाप होत नसे. रुपीला आपल्या आईचा अभिमान वाटायचा, पण आज तिनं सगळ्यालाच सुरुंग लावला होता. पलिकडुन येणाऱ्या हपापणाऱ्या श्वासांचा आवाज वाढतच चालला. रुपीच्या रोमारोमात धुंदी चढत गेली. 'सुख' म्हणजे काय हे जिला समजलंही नव्हतं तिच्या बाजुलाच ते ऊपभोगलं जात होतं. शरीरात पेटलेली धग तिला सहन होईना. मग माजघरातनं ऊठुन ती बाहेर मोकळ्या अंगणात आली. गडद अंधारात एका दगडावर बसुन ती चिंब भिजत राहिली. याआधीही जेव्हा जेव्हा तिचं शरीर बंड पुकारायचं, तेव्हा ती पावसात भिजत राहायची. पाऊस तिला आवडायचा, कारण पावसात तिचा निचरा व्हायचा. भान हरपुन रुपी तशीच बसुन राहीली. प्रश्न असा होता की शेलामायनं आजपर्यंत लपवुन ठेवलेलं गुपित आज आपल्यापुढं का फोडलं?. शेलामाय खरचं नखरेल बदनाम बाई होती का? नवरा घरातुन निघुन गेल्यावरही तिचं फारसं बिघडलं न्हवतं. घरामागच्या शेताच्या तुकड्यावरही पाटील नजर लावुन बसला होता. पण उलट तिनंच त्याच्याशी जमीनीचा सौदा सुरु केला. पाटीलही व्यवहार करायला घरी येत राहिला. पण शेलामाय त्याला खेळवत राहिली. शेतीची नांगरणी, पेरणी, खुरपणी सगळं त्याच्याकडुनचं करुन घेतलं. शेतीही ताब्यात राहिली, आणि पाटलासारख्या रांगड्या गड्याला अंगावरही घेत गेली. हा पाटीलही नंतर देशोधडीला लागला. नवरा निघुन गेला म्हणुन शेलामायनं कधी दु:ख नाही केलं. संसाराचं वाटोळं झालं म्हणुन रडत भेकत बसली नाही. कमरेला पदर खोचुन संसाराचा गाडा दिमाखानं ओढत राहिली. गरीबीची कुठलीही धग आपल्या मुलांना जाणवु दिली नाही. पाहिजे तेव्हा नव्या गड्याला जवळ करत गेली, पाहिजे तेव्हा त्यांच्याशी मनासारखं खेळत राहिली. कठोर परीस्थितीत शेलामाय आपल्या मर्जीनं जीवन जगत राहिली. रूपीनं विचार करतचं राहिली. तिच्या बोडक्या जिवनात कुठुनसा येणारा एक अंधुकसा किरण दिसायला लागला. आपण आपल्या वैधव्याचं दु:ख करत किती बसायचं. जीर्ण कापड नेसुन रडत कुजत आयुष्य घालवत लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा किती झेलायच्या. आता या सहानुभूतीवर थुंकायलाच हवे. आपणही आता निलाजरेपणाने जगायलाच हवे. आपल्याही शरीरात आग आहे, आणि ती आपल्या मर्जीनं भागवण्याचा अधिकार आपल्याला आहे. ताठ मानेनं जगत, पाहिजे त्याच्याशी खेळत, मनसोक्त जगण्याची मजा आपणाला अनुभवायलाच हवी. ऊद्याच्या बदनामीला आजची जिंदगी ओवाळुन टाकायलाच हवी. भले कोणी आपणाला नखरेल, चवचाल, बाजिंदी म्हणोत. दु:खी, कमजोर, बिचारी यापेक्षा त्या उपाध्या कधीही बऱ्या. आयुष्यात चढउतार येणारचं, पण म्हणुन आजचा क्षणिक ऊपभोग तरी का सोडायचा. आज शेलामायनं कळत नकळत तिला एक धडा घालुन दिला होता. समोरच्या वस्तीतला बाब्या आशाळभुत नजरेने आपल्याकडे बघतो. त्याच्या नजरा आपल्याला कळतचं नाही असं नाही. भर दुपारी उघड्याबंब शरीराने आपल्याकडे बघत राहतो. ऊद्या दुपारी जेव्हा घरी तो एकटाच असतो, तेव्हा त्याच्याकडे जायलाच हवे. रुपी खुदकन गालात हसली. तिला आयतचं एक माकड खेळवाय भेटणार होतं. पाऊसही आता ऊघडत चालला. पहाटेच्या गारठ्यात तिचा चेहरा टवटवीत झाला. मघापासुन हाताला झोंबणारे जास्वंदाचे एक चिंबाट फुल तिनं हलकेच तोडले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
19459 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

कथा आवडली !

नया है वह
Fri, 10/30/2015 - 19:17 नवीन
रुपीनं दु:खी, कमजोर, बिचारी बनुन रहाण्यापेक्षा स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी जीवन जगाण्याची निवड योग्यच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

नाही पटलं

इडली डोसा
Fri, 10/30/2015 - 23:30 नवीन
कोणी आपणाला नखरेल, चवचाल, बाजिंदी म्हणोत. दु:खी, कमजोर, बिचारी यापेक्षा त्या उपाध्या कधीही बऱ्या
एकतर मी म्हणेन कि नखरेल, चवचाल, बाजिंदी स्त्री वरवर जरी सुखी दिसली तरी ती खरचं सुखी, समाधनी असेलच असे नाही. अशी स्त्री खरतर दु:खी, कमजोर, बिचारीचं. सतत हा मला सोडुन गेला तर दुसरा कोण ही धास्ती तिच्या मनात असणारचं. शिवाय असे पुरुष फक्त तिची शारिरीक गरज भागवतील आपलं काम झालं की निघुन जातील. उद्या तिला काही दुखलं - खुपलं तर ज्यांना ती आत्ता नाचवते आहे ते कोणि तिची साधी विचारपुसही करणार नाहीत. हे फक्त तिने मिळवलेलं आभासी सुख असेल. आणि राहता राहिलं स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी जीवन बद्दल , जर तिचं आणि बाब्यचं खरचं एकमेकंवर प्रेम असतं. समाजची विधवेवरची बंधन झुगरुन ती त्याच्यासोबत पळुन जाऊन दोघांनी सहजीवन सुरु केलं असतं. अगदि लग्न जरी नसतं केलं तरी हरकत नाही पण एकनिष्ठ्ता असती तर त्याला स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी जीवन म्हणता आलं असतं. इथे जे चित्रण तुम्ही दाखवता आहात तो प्रकार म्हणजे स्वैराचार आहे. उद्या बाब्या ऐवजी गोप्या तिला अजुन काही आमिष दाखवुन भुलवु शकतो आणि जर तो मला अजुन सुख देतोय तर मी बाब्याला कशाला भाव देऊ या विचारने ती जर गोप्याला माकडं बनवायला लगली तर तुम्ही अश्या स्त्रीला स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी म्हाणाल का? स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी स्त्रीचं साहित्यातलं सशक्त उदाहरण म्हणुन मी जैत रे जैत मधल्या चिंधीकडे बघेन. तिनं नवर्‍याला टाकलयं पण ती नाग्या बरोबर एकनिष्ठ आहे आणि त्याच्यासाठी प्राणार्पण करायलाही तयार आहे. त्यामनाने रुपी फरच उथळ आणि बेगडी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

एकतर मी म्हणेन कि नखरेल,

जव्हेरगंज
Sat, 10/31/2015 - 18:41 नवीन
एकतर मी म्हणेन कि नखरेल, चवचाल, बाजिंदी स्त्री वरवर जरी सुखी दिसली तरी ती खरचं सुखी, समाधनी असेलच असे नाही. >>>>>>>> तसं म्हटलं तर जगात कोणीच सुखी समाधानी नसतं. जर तिचं आणि बाब्यचं खरचं एकमेकंवर प्रेम असतं.>>>>>>> बाब्याचा काय भरोसा , तोही पक्त तिच्या शरीराकडेच पाहत असेल तर. आणि एका विधवेशी प्रेम/विवाह करणे ही कल्पना खेड्यापाड्यात नक्कीच वास्तववादी नाहीये. त्यामनाने रुपी फरच उथळ आणि बेगडी वाटते.>>>>>> बाब्या आज ना उद्या तिला धोका देईलच. म्हणुन तिनं मनाची आधीच तयारी केलीय. खेळात माकड ठरवुन ती त्याच्यापेक्षा वरचढ असल्याचं तिनं दाखवुन दिलयं. तुम्ही म्हणता तसा शेवट केला असता तर ती एक गुडीगुडी प्रेमकथा वाटली असती. रुपीच्या चालू असलेल्या कठोर परीस्थितीत जास्तीत जास्त वास्तविक शेवट मला अपेक्षित होता. तिला शेलामायची जगण्याची पद्धत आवडली. मग तिनेही त्याच मार्गाने जायचं ठरवलं. रडत खडत जगण्यापेक्षा ताठ मानेनं कसं जगायचं हे तिला समजलयं हेच दाखवायचं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

आणि हो खेळाची सगळी सुत्रं ती

जव्हेरगंज
Sat, 10/31/2015 - 18:47 नवीन
आणि हो खेळाची सगळी सुत्रं ती आपल्याकडेच ठेवू पाहतेय. आपल्या जगण्याची दिशा आपण ठरवू शकतो हा आत्मविश्वास तिच्यामध्ये आलाय हे ही समजतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

हम्म

इडली डोसा
Sun, 11/01/2015 - 02:54 नवीन
तसं म्हटलं तर जगात कोणीच सुखी समाधानी नसतं>> फारच सरधोपट वाक्य. कसा काढलात हा निष्कर्ष ? तुमच्याकडुन असा प्रतिवाद अपेक्षित नव्हता. असो आपण जगतल्या सगळ्यांबद्द्ल तसही बोलत नाहीये.
तिच्या बोडक्या जिवनात कुठुनसा येणारा एक अंधुकसा किरण दिसायला लागला. आपण आपल्या वैधव्याचं दु:ख करत किती बसायचं. जुनं मळकं कापड नेसुन रडत कुजत आयुष्य घालवत लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा किती झेलायच्या. या सहानुभूतीवर आता थुंकायलाच हवं. आपणही आता निलाजरेपणाने जगायलाच हवं. आपल्याही शरीरात आग आहे, आणि ती आपल्या मर्जीनं भागवण्याचा अधिकार आपल्यालाच असणार. ताठ मानेनं जगत, पाहिजे त्याच्याशी खेळत, मनासारखं जगण्याची मजा आपल्याला अनुभवायलाच हवी. ऊद्याच्या बदनामीला आजची जिंदगी ओवाळुन टाकायलाच हवी. भले कोणी आपणाला नखरेल, चवचाल, बाजिंदी म्हणोत. दु:खी, कमजोर, बिचारी यापेक्षा त्या उपाध्या कधीही बऱ्या.
हे वाचुन मला आपलं वाटलं की रुपी हा नवा मार्ग सुखी होण्याच्या इच्छेने स्विकारतीये. जर तिचं आणि बाब्यचं खरचं एकमेकंवर प्रेम असतं.>>>>>>> बाब्याचा काय भरोसा , तोही पक्त तिच्या शरीराकडेच पाहत असेल तर. आणि एका विधवेशी प्रेम/विवाह करणे ही कल्पना खेड्यापाड्यात नक्कीच वास्तववादी नाहीये. त्यामनाने रुपी फरच उथळ आणि बेगडी वाटते.>>>>>> बाब्या आज ना उद्या तिला धोका देईलच. म्हणुन तिनं मनाची आधीच तयारी केलीय. खेळात माकड ठरवुन ती त्याच्यापेक्षा वरचढ असल्याचं तिनं दाखवुन दिलयं. >> या सगळ्या बाबतीत माझं एवढचं म्हणणं होतं की याला स्वाभीमान , स्वच्छंदीपणा आणि स्वावलंबन म्हणता येणार नाही. आपल्या खेड्यांत आजही अश्या असंख्य विधवा स्त्रिया आहेत ज्या अपार कष्ट करुन , स्वत:च्या हिंमतीवर शेती करतात, शेरडं करडं पाळुन उपजीविका भगवतात, पण शरिरीक देवाण घेवाण करुन त्याच्या बदल्यात परपुरुषाकडुन आपली शेतिची किंवा इतर कसलीचं कामं करुन घेत नाहीत. त्या खर्‍या स्ववलंबी, स्वाभिमानी स्त्रीया. तुम्हाला परपुरुषांना खेळवुन त्यांची माकडं करुन स्वत:चा स्वार्थ साधणारी स्त्री जर स्ववलंबी, स्वाभिमानी वाटत असेल तर मग विषयचं संपला. तुम्ही म्हणता तसा शेवट केला असता तर ती एक गुडीगुडी प्रेमकथा वाटली असती. रुपीच्या चालू असलेल्या कठोर परीस्थितीत जास्तीत जास्त वास्तविक शेवट मला अपेक्षित होता. तिला शेलामायची जगण्याची पद्धत आवडली. मग तिनेही त्याच मार्गाने जायचं ठरवलं. रडत खडत जगण्यापेक्षा ताठ मानेनं कसं जगायचं हे तिला समजलयं हेच दाखवायचं होतं.>> तुमच्या कथेचा शेवट रास्त आहे. मला तुम्ही तो बदलावा असं सुचवायचं नव्ह्तं. मी जे उदाहरण दिलं आहे ते फक्त तुमच्या आधिच्या प्रतिसादत तुम्ही
रुपीनं स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी जीवन जगायच ठरवलयं असा शेवट अभिप्रेत आहे.
असा उल्लेख केला होता. त्याप्रकारचं जीवन म्हणजे मला काय अभिप्रेत आहे ते सांगण्यासाठी चिंधीचं उदाहरण दिलं होतं. असो रुपीने तिच्या सद्य परिस्थितीला बदलण्यासाठी तिच्या शेलामायचाच मार्ग स्विकारला आहे. जर तिच्या मायने नव्या नव्या गड्यांचा अधार न घेता स्वतःच्या हिंमतीवरच मुलांना वाढवलं असतं तर कदाचित रुपीनेही त्यातुन प्रेरणा घेउन तसाच सदाचारी मार्ग अवलंबला असता. तुमच्या कथा चांगल्या आहेत . पण कथेकडे तटस्थपणे बघा. जे चुकिचं वागणं आहे ते चुकचं म्हणा. उगा सहानुभुती निर्माण करुन गैरवर्तनाचं उदात्तीकरण करू नका. आता खंबीर आणि धाडाडीच्या मायची ही एक कथा येउच द्या ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

ओके ईडो,

जव्हेरगंज
Sun, 11/01/2015 - 04:37 नवीन
ओके ईडो, " आयतचं एक माकड खेळवाय भेटणार होतं." हे वाक्य कथेच्या गाभ्याशी विसंगत वाटते याच्याशी सहमत. ते वाक्य काढलही असतं. पण याच वाक्यावरुन कथा सुचलीय. तुमच्या वरच्या प्रतिसादात पण काही समज खटकले, पण असो. रस घेऊन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

तुमच्या वरच्या प्रतिसादात पण

इडली डोसा
Sun, 11/01/2015 - 09:25 नवीन
तुमच्या वरच्या प्रतिसादात पण काही समज खटकले, पण असो. असो कशाला. मनात काही नका ठेऊ. काय पटलं नाही तुम्हाला माझ्या प्रतिसादात? करु चर्चा. मलाही काही वेगळा दृष्टीकोन कळेल. अर्थात पुढची चर्चा तुमची ईच्छा असेल तरच करु, नाहितर इथेच थांबु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

एकदा आपलं वागणं समर्थनीय

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 11:12 नवीन
एकदा आपलं वागणं समर्थनीय ठरवायचं म्हटलं की ते कसंही करता येतं. कथानायिका तसं का वागते याचं समर्थन ती कथालेखकाद्वारे करवत आहे. कथालेखकाची मानसकन्या असल्यानं तो देखील ते प्राणपणानं करेल. वन प्लेट इडली विथ साम्बार एण्ड डोसा विथ चटनी प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

हाहाहा

इडली डोसा
Sun, 11/01/2015 - 11:22 नवीन
ते तर आहेच हो. पण बघु तरी त्यांचं काय म्हणणं आहे.
वन प्लेट इडली विथ साम्बार एण्ड डोसा विथ चटनी प्लीज
फॉर हिअर ऑर टु गो सर? :) (आमच्या हाम्रिकेत सगळे टपरीवाले असचं विचारतात बर्का)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लं कार्त मदाम! म:सी.

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 11:34 नवीन
लं कार्त मदाम! म:सी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

लिव्हा हो जव्हेरभाउ. काय

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 11:59 नवीन
लिव्हा हो जव्हेरभाउ. काय खुलासे बिलासे देत बसायचे नाही. चाकोरीत बसणारे अन आदर्श जीवन सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. प्रत्येक जण तसा विचार करतही नाही. अशी मनोधारणा पाहिजे अन तशी विचारसरणी पाहीजे म्हणणारे नेऊन घाला बारा गडगड्याच्या विहिरीत. कथा आहे. कथा म्हणूनच वाचायला पाहिजे. अशा रुपीपेक्षा पण जास्त बंडखोर विचार करणारे कॅरेक्टर असतात. त्या प्रत्येकाला कथेचे नायकत्व मिळायचा हक्क आहे. त्यादृष्टीने जब्रा उतरलीय कथा. येऊ द्या अजून. अशा वाचकांना प्रा. व. बा. बोध्यांच्या कथा वाचायला द्यायला पाहिजेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

'जबरा' नीट लिहित जा रे. ;)

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 12:04 नवीन
'जबरा' नीट लिहित जा रे. ;) बाकी कथा वर संपली आहे. खाली PM सुरु आहे. ज्याची गरज नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हे पीएम झालेल्याच्या

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 12:08 नवीन
हे पीएम झालेल्याच्या नातेवाईकाला दिलासा द्यायचा प्रयत्न करतोय. अन ते मला आवश्यक वाटते. मी जसे उच्चारतो तसे लिहितो. शुध्द्लेखन शिकविणार्‍याला सुध्दा कुठे नेऊन घालायचे ते वरच्या प्रतिसादात लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

शुद्धलेखन. शुध्द्लेखन नाही.

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 12:13 नवीन
शुद्धलेखन. शुध्द्लेखन नाही. धन्यवाद. आणि उपलब्ध पर्यायापैकी एक म्हणून नायिकेनं एक पर्याय निवडला आहे. त्याचं समर्थन करायची अथवा नाही म्हणायची गरज नाहीये. ती आत्मविश्वासपूर्ण वर्तन करु लागली वगैरे पुस्तकी नसतंय रे. ते नंतर असतं. तोवर सगळं घडून जातं. आता बाकी खरंच बास. चल च्या पिवाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

प्रा. व. बा. बोध्यांच्या कथा वाचायला कधी देताय?

इडली डोसा
Sun, 11/01/2015 - 11:10 नवीन
पत्ता पाठवु का ऑनलाईन आहेत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गावाचे नाव सांगितलेय. जायचे

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 12:13 नवीन
गावाचे नाव सांगितलेय. जायचे असेल तर कसे जायचे ते तुम्ही पहा. वाचायला द्यायला पाहिजेत म्हणजे मीच द्यायला पाहिजेत असे नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

वाचायला द्यायला पाहिजेत म्हणजे मीच द्यायला पाहिजेत असे नाही.

इडली डोसा
Sun, 11/01/2015 - 11:16 नवीन
हे म्हणजे उंटावरुन शेळ्या हाकणे आहे बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अहो ईडली डोसा, उपमा तरी इचार

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 12:20 नवीन
अहो ईडली डोसा, उपमा तरी इचार करुन द्या. कैच्या कै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

वन प्लेट उपमा टू प्लीज.

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 12:24 नवीन
वन प्लेट उपमा टू प्लीज. विथ झीरो नंबर शेव भुर्भुरवके. ;) जव्हेरगंज सॉरी बरंका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अगदी

प्रदीप
Sun, 11/01/2015 - 14:01 नवीन
"काय खुलासे बिलासे देत बसायचे नाही" अगदी १०० % सहमत. मुळांत कथा काही सामाजिक प्रबोधन वगैरे करण्यासाठी लिहीली जात नसेत, तशी ती नसावी. मानवी मनाचे गुंते, त्याचे कानेकोपरे, त्याची होणारी फरफट इत्यादी अनेक गोष्टींचा गुंता कथेतून दिसावा. कथाबीज आवडले. काही जागा अतिशय नेमक्या शब्दात चोख आलेल्या आहेत. उदा. " तिचं पांढरफटक कपाळ बघुन शेलामायला पुन्हा एकदा कससचं झालं."ह्या एका वाक्यात रूपीच्या वैधव्याविषयी नेमकी माहिती वाचकांना सांगितली आहे. भावसाब व शेलारमाय ह्यांतील संबंधही सुरूवातीस व्यवस्थित उघड होतो. मात्र इतक्या सुंदर सुरूवातीनंतर कथेचा घाट बिघडला आहे. मग लांबलचक वाक्यांतून पात्रांविषयी 'माहिती द्यावी' लागली आहे ("शेलामायनं तिला फसवलं हुतं. शेलामाय ही एक निब्बर बाई हुती. तिचा साजशृंगार बघुन गावकरी तिला नखरेल म्हणत. पण भांडखोर स्वभाव बघुन कोणाची तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची टाप होत नसे"). ह्यानंतर कथा ढेपाळली आहे. हीच कथा रूपीच्या पॉईंट- ऑफ- व्ह्यूने लिहीली असती तर ती अजून बहारदार झाली असती. तसेच कथेत आता दिसत आहेत (भावसाब,र्शेलाबाय) व दिसत नाहीत (पाटील, रूपीचा बाप, बाब्या) अशा पात्रांची इन्ट्रोडक्शन्स, त्यांचे एकमेकांतील तसेच रूपीशी असलेले संबंध शक्यतोंवर घटनांतून आपसूक दिसावेत, 'माहिती देणारी' वाक्ये शक्यतोंवर कमीतकमी असावीत. हे सर्व टिकात्मक मुद्दाम लिहीले आहे, कारण तुमच्याकडे कथाबीजे उत्तम आहेत, आपल्या अंवतीभोवती सजग दृष्टिने पहण्याची तुमची कुवत आहे, आणि शब्द तुम्हाला वश आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा नेमका प्रतिसाद दिला आहात

जव्हेरगंज
Mon, 11/02/2015 - 23:58 नवीन
हा नेमका प्रतिसाद दिला आहात तुम्ही. आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

मस्तच

एक एकटा एकटाच
Fri, 10/30/2015 - 01:20 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

सर्वच प्रतिसादकांचा अत्यंत

जव्हेरगंज
Fri, 10/30/2015 - 18:53 नवीन
सर्वच प्रतिसादकांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद :) (कथेत छोटेमोठे सुक्ष्म बदल केलेत)
  • Log in or register to post comments

जबरदस्त लिहिलंय.

पद्मावति
Fri, 10/30/2015 - 19:20 नवीन
जबरदस्त लिहिलंय.
  • Log in or register to post comments

वा मस्त !!!

खटपट्या
Fri, 10/30/2015 - 19:46 नवीन
वा मस्त !!!
  • Log in or register to post comments

कथेचा ग्रामीण बाज आवडला :)

पियुशा
Fri, 10/30/2015 - 20:03 नवीन
कथेचा ग्रामीण बाज आवडला :)
  • Log in or register to post comments

कथा आवडली. भाषेवर छान पकड आहे

सतिश गावडे
Fri, 10/30/2015 - 23:44 नवीन
कथा आवडली. भाषेवर छान पकड आहे तुमची. मात्र "तिला आयतचं एक माकड खेळवाय भेटणार होतं." हे वाक्य कथेच्या गाभ्याशी विसंगत वाटलं.
  • Log in or register to post comments

मस्त !!!

शिव कन्या
Sat, 10/31/2015 - 00:13 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments

कथा अतिशय आवडली.

यशोधरा
Sat, 10/31/2015 - 00:32 नवीन
कथा अतिशय आवडली. वास्त़आकथाबीज आणि मानवी मनाचे बारकावे अत्यंत प्रांजळपणे टिपलेली कथा. अंगावर येते शेवटी! पण त्यातच तिचे यश आहे.
  • Log in or register to post comments

एक नंबरी

सत्याचे प्रयोग
Sun, 11/01/2015 - 11:10 नवीन
गावकडलं वातावरण शब्दांनीच जस्सच्या तस्स उभं केलय डिट्टो
  • Log in or register to post comments

मस्त छान...

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 11/01/2015 - 12:06 नवीन
आवडली मस्त आहे. शेवटही विसंगत वाटला नाही. असाच असायला हवा होता. तो थोडा विस्तृत पणे लिहिला असता तर कदाचित वाचक तिथे अडखळले नसते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

!!

तुषार काळभोर
Mon, 11/02/2015 - 10:52 नवीन
कथेतली पात्र अगदी आदर्श विचारसरणी असलेली व आदर्श जीवन जगणारी कशी असू शकतात? आता आहे रुपी तशी तर काय करायचं? आपण ज्या समाजात जगतो तिथे असं काही असू शकतं हे स्वीकारण्याची लोकांची मानसिक तयारीच नसते. स्वतःच्याच कोशात गुरफुटून 'असलं काही' अस्तित्वातच नाही, असं शहामृगासारखं म्हणायचं. एकदा कोणत्यातरी धाग्यावर 'इन्सेस्ट'वरून असंच गुर्‍हाळ केलं होतं. ज्या गोष्टी आहेत त्या कितीही चुकीच्या, अयोग्य, वाईट, धक्कादायक, लाजिरवाण्या असल्या तरी अ‍ॅटलीस्ट त्या 'अस्तित्वात' आहेत, हे तरी स्वीकारायला हवं.
  • Log in or register to post comments

ज्या गोष्टी आहेत त्या कितीही

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 18:05 नवीन
ज्या गोष्टी आहेत त्या कितीही चुकीच्या, अयोग्य, वाईट, धक्कादायक, लाजिरवाण्या असल्या तरी अ‍ॅटलीस्ट त्या 'अस्तित्वात' आहेत, हे तरी स्वीकारायला हवं.
जे झेपत नाही त्याचं अस्तित्वही सहन होत नाही हो लोकांना...आणि तरी इतरांना शहाणपण शिकवतात मोठ्या तोंडाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

+१ ...

अस्वस्थामा
Mon, 11/02/2015 - 18:43 नवीन
+१ ... वरुन प्रत्येक गोष्ट ही शाळकरी पाठ्यपुस्तकीय साच्यानुसार आदर्श (काही टाळक्यांनी ज्यांना आदर्श म्हणून मान्यता दिलीय असे) अशीच असावी असा एक अट्टाहास चालतो तो ही तसाच वैताग आणणारा असतो. जव्हेरगंज भौ.. वरती प्रदिप भौंच्या सुचना उल्लेखनीय आहेत बघा त्याला आपलं पण अंशतः अनुमोदन. पण बाकी तुमी ल्हिवत र्‍हावा आसंच.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वाचक म्हणून वाचकांनी सूचना

प्यारे१
Mon, 11/02/2015 - 18:50 नवीन
वाचक म्हणून वाचकांनी सूचना द्याव्यात का? एकदा कथा कविता प्रसिद्ध झाली की त्याचं लेखक कवीनं पुन्हा स्पष्टीकरण देण्याची गरज पडू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

मस्तच

अद्द्या
Mon, 11/02/2015 - 18:23 नवीन
मस्तच तुमच्या कथा नेहमी वाचतो . ग्रामीण बाज मस्तच पकडता तुम्ही . फक्त एक सूचना . . कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला पटेल अशीच तुम्ही लिहिली आहे . दुसऱ्याला पटावी म्हणून नाही . एवढ लक्षात ठेऊन प्रतिसाद कसा द्यायचा ते ठरवा :)
  • Log in or register to post comments

कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला

रातराणी
Mon, 11/02/2015 - 23:53 नवीन
कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला पटेल अशीच तुम्ही लिहिली आहे . दुसऱ्याला पटावी म्हणून नाही . हे सगळ्या नवकवी आणि लेखकांनी स्वाक्षरी म्हणून चिकटवावे इतक खरं आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

येस, टँट्स द पॉईंट, नोटेड!

जव्हेरगंज
Tue, 11/03/2015 - 00:02 नवीन
येस, टँट्स द पॉईंट, नोटेड!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

मिपावर नवकवी आणि लेखांची जर

अद्द्या
Tue, 11/03/2015 - 00:52 नवीन
मिपावर नवकवी आणि लेखांची जर चेष्टा झालीच आहे तर ती व्याकरणाच्या चुकांवरून , किंवा मग अगदीच जीप ला सायकल धडकून तिला पुलावरून खाली पाडवलो छाप कथा असतील तरच. इथे कित्येक नवीन आयडी आहेत ते खूप चांगलं लिहितात . त्यांना त्यांच्या कथा /कवितांसाठी दादच देत आलेत लोक . आणि काही बदल सुचवायचे असतील तर तसं इज्जतीने सांगत आलेत . माझ्यासारख्या ४ वर्षात ३ कथा कश्याबश्या पाडणाऱ्या मुलाला पण लोकांनी कथा विषय आणि आशय न बदलता अजून कशी चांगल्या प्रकारे सांगता आली असती हे सांगितलंय . त्यामुळे मी तसं लिहिलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

कथेवर चर्चा

इडली डोसा
Tue, 11/03/2015 - 07:55 नवीन
मिपावर कथा टाकल्यानंतर लोक त्यांना कथा जशी वाटेल तसे प्रतिसाद देणारच. कोणी काय प्रतिसाद द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कथा देणार्‍या लेखकांना त्यांच्या कथेवर वाचकांनी चर्चा करणे अपेक्षीत आहे असे वाटले होते म्हणुन प्रतिसाद दिले. वर झालेली कथेवरची चर्चा जर शांत डोक्याने वाचली असेल तर त्यात कुठेही कथेचा शेवट बदलावा अशी अपेक्षा केलेली नाही. तरीही असा समज करुन घेऊन काही प्रतिसाद आले आहेत. सगळ्यांनाच उत्तर देणे शक्य नाही पण कथेवर आलेल्या सगळ्या प्रकारच्या मतांचा आदर केला जावा एवढीच अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

इडलीडोसा...

चांदणे संदीप
Tue, 11/03/2015 - 08:12 नवीन
तुमचा या लेखावरचा पहिला प्रतिसाद पाहता. शेवट तुम्हाला अपेक्षित असा झाला नाही. त्याच अनुषंगाने पुढे चर्चा होत राहिली असे मला वाटते. शिवाय लेखातला जो परिच्छेद तुम्ही त्या प्रतिसादात चिकटवून शेवटाबद्दल "अनपेक्षित" अशा आशयाचे मत दिले, माझ्या मते, तिथेच कथेच्या शेवटाबद्दल काही अंशी भाष्य झालेले. शिवाय, आता कथालेखकाने सांगितलेले आहे म्हणून नाही तर, शेवटाचा अर्थ किंवा एकूण कथेचा अर्थ प्रत्येकाला हवा तसा लावता येतो. मी तर रूपी "व्यवहारिक" जगायला शिकली असे म्हणतो. तुमच्या "सगळ्या प्रकारच्या मताचा आदर....", याच्याशी सहमत! धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments

संदीपजी

इडली डोसा
Tue, 11/03/2015 - 10:38 नवीन
संदीपजी, सर्वप्रथम संयत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. रुपीचि प्रतिमा तरल , हळुवार भावनाप्रधान अशी ऊभी करताहेत असं वाटल्यामुळे शेवट अनपेक्षित वाटला पण म्हणुन तो बदलावा असं कुठे म्हंट्लं नाहीये. तुम्हाला जशी ती व्यवहारीक वाटाली तशी मला ती व्यभिचाराचा सोयिस्कर मार्ग स्विकारणारी वाटली एवढ्चं.
  • Log in or register to post comments

इडलीतै अगं माणूस तिथं

रातराणी
Tue, 11/03/2015 - 12:47 नवीन
इडलीतै अगं माणूस तिथं वेगवेगळ्या प्रवृती आल्या. कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागेल हे आपण खात्रीपूर्वक नाही सांगू शकत. ही तर कथा आहे. कल्पनेतल्या सर्वच गोष्टींना चूक बरोबरच्या चौकटीत ठेवून पाहिलं की त्यातली मजा निघून जाते असं मला वाटतं. त्या क्षणी त्याना रूपी तशी दिसली न जाणो उद्या एखाद्या खंबीर रूपीची कथाही त्याना सुचेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा

आवडली!

जातवेद
Tue, 11/03/2015 - 14:11 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments

सुरेख

सुमीत भातखंडे
Wed, 11/04/2015 - 11:54 नवीन
छान कथा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा