Skip to main content

सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर - सहलिबाबत मार्गदर्शन

लेखक विक्रान्त कुलकर्णी यांनी सोमवार, 12/10/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर असे दिवाळीनंतर पाच ते सहा दिवस फिरायचे ठरवीत आहे. मी ठाण्याला राहतो. सोलापूरला मुख्य मुक्काम ठेऊन आजूबाजूची ठिकाणे पाहणे सोयीस्कर ठरेल असे एकंदरीत वाटते. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच वरील उल्लेखाव्यतीरिक्त आणखी कोणती पाहण्याची ठिकाणे आहेत का? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

वाचने 30802
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

विजापूर सोडून इतर ठिकाणे महाराष्टात आणि धार्मिक आहेत.कुठून येणार आणि रेल्वे/बस/कार लिहिलं नाहीये.

ठाण्यातून हे वाचलं.सोलापूर स्टेशनची रेल्वेची रिटाइंग रूम एसी आणि नान एसी चांगली आणि स्वस्त आहे असं ऐकलं होतं.

In reply to by राघवेंद्र

आम्ही सिद्धेश्र्वर ने गेलो होतो गेल्यावर्षी , स्टेशन खरच गलिच्छ वाटल होत तेव्हा

In reply to by कंजूस

रेल्वेची रिटायरिन्ग रुम जर खरोखर चान्गली असेल तर पर्याय ट्राय करायला हरकत नाही.

तुम्ही सोलापुरात राहून खालील एक दिवसाच्या ट्रीप कार भाड्याने घेऊन करू शकता. १. सोलापूर - अक्कलकोट - गाणगापुर (दत्त मंदिर ) २. सोलापूर - अक्कलकोट - तुळजापूर - बाळे खंडोबा मंदीर ३. सोलापूर -कुडळ संगम - विजापूर ४. सोलापूर - तुळजापूर - रामलिंग - बार्शी ५. सोलापूर - पंढरपूर - कुर्डूवाडी ( परतीचा प्रवास ) सोलापुरात सिध्देश्वर मंदिर पाहण्या सारखे आहे.

In reply to by राघवेंद्र

दोन वर्षान्पूर्वी अक्कलकोट केले आहे. त्यामुळे यावेळी अक्कलकोट करायचा विचार नाही. मात्र आपण सुचविलेले पर्याय चान्गले वाटतात. धन्यवाद.

In reply to by राघवेंद्र

माझे फक्त इतकेच सांगणे आहे कि गाणगापुर ला अक्कल कोट मार्गे जाऊ नका. हा रस्ता फार खराब आहे. १५ दिवसां पुर्वी जाउन आलोय मी.

In reply to by राघवेंद्र

बाळे खंडॉबा मन्दीर कोठे आहे ? कुडाळ संगमला काय आहे ? रामलिंग - बार्शीला पाहण्याजोगे काय आहे ?

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

बाळे हे सोलापुरात बार्शी रोड वर आहे. मंदिर छान आहे. रामलिंग बद्दल माहिती http://ourosmanabad.blogspot.com/2010/12/yedashi.html तसेच जवळच येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर डोंगरावर छान आहे. http://ourosmanabad.blogspot.com/2010/02/yermala.html बार्शी येथे भगवंताचे मंदिर आहे. बार्शी शहर खूप जुने आहे. (रस्ते खूप लहान आहेत.) कुडाळ संगम या गावाचे नाव हत्तरसंग कुडाळ आहे. ते विजापूर रोड वर टाकळी गावाजवळ आहे. तिथे शिव मंदिर व उत्तरेकडून येणाऱ्या भिमा आणि पश्चिमेकडून येणाऱ्या सीना नदीचा संगम आहे. सोलापुरात भुईकोट किल्ला बाग, तिथेच पार्कची खाऊ गल्ली आहे आणि जवळच सुप्रजा पावभाजी प्रसिद्ध आहे. नवी पेठ मध्ये बरेच दुकाने आहेत त्यात भाग्यश्री वडा (पाव विना) प्रसिध्द आहे, तसेच पेठेची शेंगा चटणी छान असते. पुलागम चे छोटे दुकान नवी पेठेत सुध्दा आहे.

In reply to by राघवेंद्र

प्रतिसादाबद्दल धन्यवाद...खाउ गल्लीला नक्कीच भेट देईन.. पावभाजी हा घरच्यांचा व वडा माझा फेवरेट आयटम आहे. त्यामूळे ते मस्ट आहे.

In reply to by राघवेंद्र

नसले ची शेंगा चटणी विसरलात तुम्ही..पेठे पेक्षा ती जास्त चांगली

सोलापुरात पुलगम फॅक्टरी आऊटलेटला भेट द्यायला विसरू नका.चादरी,नाप्किंस,पायपुसणी,सॉफ्ट टॉईज,टॉवेल्स,पडदे,वॉलहँगिंग्ज,आणि बरेच काही रास्त दारात मिळते.खरेदीचा आनंद मिळतो.

In reply to by नूतन सावंत

हे असं आउअटलेट फक्त सोलापुरातच आहे का? पुण्यात चांगल्या चादरी वगैरे कुठे मिळतील कुणाला काही आयडीया? (सॉरी हां भाऊ.. तुमचा धागा जरासा हायजॅक करतेय... )

In reply to by पिलीयन रायडर

पिराताई ह्या चादरी (जेकार्ड म्हणतात) पेटंटेड सोलापूर चादरी म्हणून्च आहेत. सोलापुरातच बनतात. कॉटन असते. वापरायला अन धुवायला सोप्या असतात. उबदार असतात. तुलनेने स्वस्त असतात. सुंदर डिझाइन्स असतात. वेगवेगळ्या आकारात अन जाडीत मिळतात. मुख्य म्हणजे खूप कारागीरांना रोजगार मिळतो. हुश्श्श्श. झाले मार्केटिंग. आता सल्ला. सोलापूर चादरी या नावाने दुसरीकडे ही तयार होतात. तो दर्जा नसतो. सोलापुरातील ४-५ मिल्स चे आउटलेट पुण्यामुंबईत आहेत. बरेच जण येथून नेऊन तिथे विकतात. व्हरायटी सोलापुरातच पहायला मिळते. अस्सल दर इथे कळेल, सोबत बेडशीट्स, वॉल हँगिंग, टॉवेल, नॅप्कीन्स, कुशन कव्हर पण असतात. तुम्हीच ठरवा काय करायचे ते. सोलापुरात पुलगम चे मार्केटींग जोरात आहे पण अस्सल चादरी चिल्का, क्षीरसागर, गांगजी हे तयार करतात. एमेच १२ - १४ गाड्या दिसल्या की रेटमध्ये फरक पडणार. ;) रिक्शाने जावा. जमत असेल तर सातारी बोलीत बोला. फरक पडेल.

In reply to by अभ्या..

चादरीसाठी सोलापुअरची ट्रिप कशी करावी हो!! पण तुळजापुरला चक्कर झाली तर नक्कीच ह्या दुकानांमध्ये ट्राय करेन. चिंचवडमध्ये प्रेक्षागृहाजवळ एक सोलापुर चादर डेपो आहे. परवा तिथे गेले होते. पण निव्वळ ४ बेडशीट्स दाखवले. २ डिझाईन्स चे २ -२ . आईकडे ह्या चादरी आणि बेडशीट्स आहेत त्यामुळे दर्जा माहिती आहे. कित्येक वर्ष वापरतो आहोत तरी आजही उत्तम स्थितीत आहेत. पुण्याला भले थोडा भाव जास्त देऊन का होईना पण चांगला माल कुठे तरी मिळायला हवा.

In reply to by पिलीयन रायडर

खूप जुनं दुकान आहे लक्ष्मी रोडवर अशा सर्व वस्तुंसाठी. शनिपाराजवळही एक दोन दुकानात अशा चादरी चांगल्या मिळायच्या. कुमठेकर रोडवर जोंधळे चौकात एक दुकान होतं. (थोडी जुनी माहिती आहे. आता दुकानं हलली असतील तर सांगता येत नाही). पण भयंकर मजबूत दणकट चादरी..

पूर्ण माहिती मिळू शेकेल. राघव ८२ यांनी दिलेली माहिती ही बरोबरच आहे. बाकी खरेदीसाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत.

सोलापुरहुन सकाळी ९.३० ची चेन्नई मेल मिळते , अर्ध्या तासात अक्कलकोट स्टेशन लागत पण न उतरता पुढे जा कारण गाणगापुरला येजा करायला जास्त ट्रेन्स नाहीत, सोलापुरहुन दिड तासात गाणगापुर स्टेशन , तिथन टमटमने एक तासात गाणगापुर मन्दीर लगेच दर्शन झाल तर गाणगापुर स्टेशनहुन ४ -४.३० ची परतीची चेन्नई मेल 5.30 पर्यन्त अक्कलकोट स्टेशन येईल. छोट्या रीक्षेने अर्ध्या तासात क्षक्कलकोटमठ (वटव्रुक्ष निवासीस्वामी असा बोर्ड आहे तिथे), अक्कलकोट बस स्टापवरुन १५-१५मिनिटानी सोलापुर बसेस आहेत , ४५ मि ते १तासात सोलापुरात पोहोचाल अन एका दिवसात दोन ठीकाणे होतील , ही दोनच ठीकाणे एकादिशेला आहेत बाकी तुळजापुर दुसर्‍या दिशेला तर पन्ढरपुर तिसर्‍या दिशेला राहील,

In reply to by कविता१९७८

दुसर्‍या दिवशी पन्ढरपुर करा ,सोलापुर बस स्टापवरुन १५-१५ मिनीटानी पन्ढरपुरसाठी बसेस आहेत ' दीड तासात पन्ढरपुर वनवे ५७/-ताकीट होत गेल्यावर्षी, गर्दी असली तरी ३ वाजे पर्यत सोलापुरात परत याल मग सोलापुर फीरा , पुलघम मधे जा , मोगले दुकानात जाउन ईरकल साड्यान्ची खरेदी करु शकता , तिसर्‍या दिवशी तुळजापुरला सोलापुर बस स्टाप वरुन सकाळीच बस पकडा म्हणजे तीन वाजेपर्यत सोलापुरला परतु शकता परत आल्यावरसोलापुर प्रसिद्ध सिध्देश्र्वर मन्दीर पहा . असा कार्यक्रम आखुन मी आणी मैञीण गेल्यावर्षी फीरलो होतो त्यामुळे प्रवास ही आरामाचा झाला , थकायला झाले नाही

In reply to by कविता१९७८

ह्या सगळ्या प्रतिसादासाठी ठेंक्यु कविताताई. मलाही हे माहीत नाही सगळे. पुण्यामुंबईच्या लोकांची प्लॅनिंग अचाट. भारी हां. स्टेशन कॉमेंट बद्दल बोललो असतो पण जाऊ दे आता. ;)

In reply to by अभ्या..

प्लानिन्ग करावीच लागली कारण दोघीच होतो, सोलापुरची आणि या ठीकाणान्ची काहीच माहीती नव्हती, जाण्यापुर्वी मिळेल ती माहीती जमवली पण रामभरोसेच होत सगळ काही, हाताशी तीनच दिवस होते आणी मला तर मुम्बईला येउन जाउन ५ तास लागतात . मैञिण कल्याणला उतरली ती लवकर घरी पोहोचली. फक्त राहायला सोलापुरला कलीगच्या बहीणीकडे होतो.

In reply to by कविता१९७८

चेन्नई मेलचे आरक्षण ठाण्याहून करा आणी सरळ गाणगापूरला जा आणी त्यानंतर चा कार्यक्रम कविताताईनी सांगितल्याप्रमाणे करा. संध्याकाळी सोलापूरला येऊन दुसर्या दिवशी पूर्ण सोलापूर फिरा. तिसर्या दिवशी एक गाडी करून तुळजापूर पंढरपूर करून परत या आणी रात्रीचे चेन्नई मेल चे परतीचे आरक्षण करू शकता.

In reply to by सुबोध खरे

सॉरी ५-६ दिवसाचा कार्यक्रम आहे त्यात मधल्या दिवसात विजापूर निम्बाळ नळदुर्ग ई. करता येईल.

In reply to by कविता१९७८

त्याबाबतची चपखल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

केव्हा निघणार आहात ते सान्गा म्हणजे तिथले अनुभव आणि माहीती देते तुमच्या कामी येईल

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

बरं सोलापुरात राहुन सगळी ठीकाणे फीरणे सोयीस्कर पडते, जर सोलापुरात राहणार असाल आणि आधी बुकींग करुन ठेवले असेल तर सिद्धेश्वर ट्रेन ने जा, ७ वाजता सोलापुरात पोहोचते, त्याच दिवशॉ गाणगापुर अक्कलकोट करणार असाल तर घाई होईल कारण ९.३० ला चेन्नई मेल सोलापुरात पोहोचते (थोडाफार उशीर होतो) आणि ११ ते ११-३० च्या दरम्यान गाणगापुर स्टेशनला पोहोचते. डायरेक्ट गाणगापुर ला जात असाल तर सी.एस.टी. चेन्नई मेल सोयीस्कर , कदाचित तीच एक ट्रेन आहे जी मुंबई हुन अक्कलकोट रोड मार्गे गाणगापुरला जाते. सोलापुर सोडल्या नंतर दुसरे स्टेशन होदगी (नाव नीट आठवत नाही) स्टेशन गेल्यावर महाराष्ट्र बॉर्डर संपते आणि कर्नाटक बॉर्डर लागते आणि फोनला रोमिंग सुरु होतं अक्कलकोट आणि गाणगापुर दोन्ही ठीकाणी रोमिंग लागलं होतं . गाणगापुर स्टेशन एकदम शांत आणि साधं आहे, अगदी सिनेमात दाखवल्या प्रमाणे ३-४ तासाने एखादी ट्रेन पास होते, स्टेशन वर ब्रिज ही नाहीये. स्टेशन्च्या प्लॅटफॉर्म वरुनच सरळ चालत चला टुवर्ड्स कर्नाटका प्लॅटफॉर्म जिथे संपतो तिथुन वेस्टलाच बाहेर पडा (त्याच प्लॅटफॉर्मला चेन्नी मेल थांबते म्हणजे ईस्ट वेस्ट गोंधळ होत नाही) , तिथेच रेल्वे फाटक आहे आणि ३-४ छोट्या रिक्षा (मधे ४ जण आणि मागे ३-४ बसण्याची सोय असलेल्या रिक्षा) असतात गाणगापुर मंदीरासाठी. माणशी ३० रु होते गेल्यावर्षी ., शेअरींग किंवा स्पेशल दोन्ही नेउ शकता. १ तास तर लागतोच, मधे तेव्हा थोडा रस्ता खराब होता पण रिक्शावाला आणि रिक्षेतले बाकी पॅसेंजर म्हणाले सोलापुर ते गाणगापुर रस्ता याहुन जास्त खराब आहे. दत्तमंदीरा आधी काही जणे संगमावर जाउन येतात, आम्ही ही गेलो , तीच रिक्षा पुढे ४ की, मी. गेली होती. जाताना मनाची तयारी करुन जा, दुर्गंधी , बकालपणा सगळीकडे पाहायला मिळतो, मी माझ्या डोळ्याने पाहुन आले, आम्ही मंदीरात पोहोचलो तेव्हा आरती सुरु झाली होती आणि गर्दी दिसत होती आम्हाला परतायचं ही टेंशन होतच पण गेल्या गेल्या समोर रांग दिसली , २० -२० रु जमा करत होते, नंतर कळालं ते वि.आय.पी. दर्शन होते. नाहीतर बाकी कुठुन तरी पायर्‍यांवरुन चढुन रागेत उभे होत होते, मंदीर अगदी छोटे आहे, आजु बाजुचा परीसर गलिच्छ आहे , राहायची सोय आहे पण परीसर पाहील्यावर राहायची ईच्छाच होणार नाही., इथनं जाताना एका सोलापुरकरला माहीती विचारताना गाणगापुरला राहायची सोय विचारल्यावर त्याने तिथे राहुच नका तुम्हाला आवडणार नाही हे का सांगितले होते ते तिथे गेल्यावर पटले. नंतर परतताना ट्रेन मधे एका माणसाने सांगितले की तिथे राहायचे असेल तर मंदीरातल्या पुजार्‍यांकडे सोय होते , ते सोवळ्यातच असल्याने राहण्याची जागा स्वच्छ असते. परतताना बहुतकरुन गाणगापुर अक्कलकोट अशा शेअरींग मधे जीप, ओम्नी कींवा रीक्षा असतात, पण १ तासाहुन जास्त प्रवास जर चारचाकी वाहनाने केला तर मला गाडी लागते त्यामुळे आम्ही रिक्षेचा आणि बसचाच ऑप्शन ठेवला. आम्हाला परत येताना रिक्षा मिळत नव्हती तर स्पेशल रीक्षा केली येताना २५०/- दिले त्याला तो तयार झाला, येताना मागच्या साईडला त्याने पब्लिक भरुन घेतली , मधे मात्र त्यानेच कुणाला बसु दिले नाही. स्टेशनवर पोहोचलो, आणि ट्रेन थोडीफार लेट असतेच , ५.३० नंतर अक्कलकोट रोडला पोहोचलो, ते स्टेशनही साधेच आणि वेस्टला बाहेर निघाल्यावर २-३ छोट्या रीक्षा उभ्या होत्या आणि बसही जाते असे ऐकले होते पण बाकीचे उभे असलेले म्हणाले की रिक्शेने लवकर पोहोचाल अर्ध्या तासात, तसे पोहोचलो ही. तो परीसर चांगला आहे , आम्ही साधारण ६-१५ ला मठात पोहोचलो, सगळीकडे वटवृक्षनिवासी महाराज संस्थान असे बोर्ड होते म्हणुन आम्ही सर्वांना अक्कलकोट महाराजांचा मठ कुठे आहे असेच विचारत होतो आणि सगळे तेच रस्ता दाखवत होते, शेवटी मठ जवळ आला आणि तिथे ही तेच नाव दिसले तेव्हा कुठे माहीत पडले महाराजांचे मुळ नाव वटवृक्षवासी स्वामी असेच आहे. जागा लहान असली तरी पुणा मुंबईची माणसे जास्त असतात राहणीमानावरुन पटकन ओळखु ही येतात. मठाच्या आवारात जास्त माणसे दिसली नाहीत तरी मठातुन बसस्टॉपवर गेल्या वर कळाले गर्दी काय असते, जरी १५-१५ मि. नी सोलापुरला बस असली तरीही अतिशय गर्दी होती , नंतर कळाले बसस्टॉप वर एक काउंटर आहे तिथुन काही बसेस चे तिकिट मिळते आणि जितक्या सीटस असतात तितकीच तिकीटे देत असल्याने गर्दी नसते. पण आम्हाला माहीत नसल्याने आम्ही त्या बसमधे जाउ शकलो नाही, बसमधे बसल्यावर तिकीट काढु हा ऑप्शनही नव्हता कारण बसमधे कंडक्टर नसतो असे एकाने सांगितले. बरं बसला लावलेला बोर्ड हा कर्नाटकी भाषेत असतो. हा आमचा पहील्या दिवशीचा प्रवासाचा अनुभव, दुसर्‍या दिवशीचा वेळ मिळाला की टाकते.

In reply to by कविता१९७८

गाणगापुरला मंदीरातच पिठले - भाकरी असा प्रसाद मिळाला होता, आणि मंदीरात बर्‍याच जणांच्या अंगात संचारलेले असते म्हणुन जरा आजुबाजुला लक्ष ठेवा, एकीने मला पाठी मागुन जोरात ओरडुन घाबरवायचा प्रयत्न केला होता पण मला काही फरक पडला नाही तिच्या आविर्भावावरुन तरी ते मानसिक मानणं असावं असच वाटत होतं. किंवा अंगात भुत किंवा देव देवी संचारणं यावर माझा विश्वास नसल्याने असेल.

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

दुसर्‍या दिवशी आम्ही पंढरपुर जायचे ठरवले होते , सकाळी लवकर उठुन सोलापुर बस स्टॉपला जाउन ७.१५ ची पंढरपुर बस पकडली (थोड्याफार उशीरानेच सुटतात) , सोलापुर हुन सुटत असल्याने बस मधे आरामात जागा मिळाली, साधारण ५० रु. ते ५७ रु माणशी असे तिकीट होते, १.३० ते २.०० तासात पोहोचलो पंढरपुरला. बालमैत्रीणीचे सासर पंढरपुर असल्याने तिने सक्त ताकीद दिली होती की दोघीच आहात तर सासरचं कुणी पाठवते बरोबर एकट्या फीरु नका, दुष्काळी भाग आहे, खुप चोर्‍या आणि खुन ही होतात (आमच्या हुन जास्त तिलाच टेंशन आले होते) तिने तिच्या नणंदेच्या मुलाला सांगितले होते की आम्हाला मंदीर वगैरे फीरवुन सोलापुर बस मधे बसे पर्यंत घरी जाउ नकोस, तो बरोबर ९ च्या दरम्यान आम्हाला पंढरपुर बस स्टॉप ला घ्यायला आला होता. मंदीराजवळ आलो आणि सगळीकडे अस्वच्छता जाणवु लागली. वारी २-३ दिवसावर येउन ठेपली होती असे माहीत पडले, मंदीराच्या एकदम जवळ एक उजव्या हाताला एक चांगले हॉटेल सापडले नाश्ता छान झाला, नाव आठवत नाहीये पण लाकडी वाडा जसा असतो तसे त्याचे इंटीरीयर होते, नंतर मैत्रीणीच्या भाच्याने सांगितले सुरुवात चंद्र्भागा नदीपासुन आणि पुंडलिकाच्या मंदीरापासुन करुया, नदीला पाणी नाही पात्र आणि आजुबाजुच्या परीसराची अतिशय बकाल अवस्था , दुर्गंधी . मंदीरात तर जिथे तिथे बाजार, भट सतत कुणी पाया पडायला आले तर नाव विचारुन देवाला स्वतःच सांगतात "देवा -- - माणसाकडुन ५१ रु आले, आणि माणसे धडाधड काढुन देत होती, छोटसं मंदीर पण २-३ ठीकाणी पैसे मागणे सुरु होते, मी कुठल्याही मंदीरात गेले तरी पैसे आणि हार वाहत नाही त्यामुळे त्याने माझे नाव पुकारले तरी मी काही पैसे घातले नाही आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसुन तो पहातच राहीला, ५ पावले पुढे आलो तर तीथे कसलस तिर्थ की काय मिळत होते, पैसे टाकल्याशिवाय देत नव्हते नाही घेतले, तसही आजुबाजुची बकालवस्ती पाहता तिर्थ घेउच नये असे वाटते, त्यानंतर मंदीरात आलो, मैत्रीणीच्या नातेवाईकांचे मंदीराला लागुन फुले विकण्याचे दुकान असल्याने जवळचे सामान आणि चपला तिथे ठेवता आल्या, मंदीरात महीलांना वीतभर आकाराची पर्स नेण्यास परवानगी आहे त्यामुळे आम्ही तेवढी पर्स हातात घेतली होती आणि लेडीज पोलिस नसल्याने महीलांची चेकींग होत नव्हती त्यामु़ळे त्यात छोटा बेसिक फोन ही नेता आला, मंदीराची दुरावस्था पाहुन धक्का बसला, मंदीरात जवळपास १-२ महीने झाडले नसेल इतकी धुळ होती , खुप गर्दी , आणि टॉयलेट्स नुसते नावाला , ज्यांच्या कडे लहान मुले होती ती तर रांगेतच धक्क्यावर लघुशंका उरकत होते, पश्चात्ताप वाटला इथे आल्याचा, २.३० ते तीन तास रांगेत होतो. आमच्य पुढची एक व्यक्ति मात्र पांडुरंगाच्या भजनात तल्लीन होती, त्यांना बाहेरच्या जगाचा अगदी विसर पडला होता ते तीन तास ते अखंड भजन गात होते, मंदीर पाहुनच माझा जीव अक्षरशः कावला होता शेवटी अगदी जवळ आलो , जेव्हा विठ्ठ्लाची मुर्ती समोर आली तेव्हा मनाला इतकी शांतता मिळाली की त्या तीन तासांचे त्रास विसरुन गेलो (एक साईबाबांचे दर्शन सोडले तर बाकी ठीकाणी दर्शन घेताना असे आंतरीक समाधान मिळणे माझ्या बाबतीत खुप कमी होते). बाहेर आलो. पंढरपुरला शेगावच्या गजानन महाराजांचा मठ आहे, राहायची सोय ही उत्तम आहे, वॉशरुम ला जायला बाहेरचे ही लोक जाउ शकतात, मैत्रीणीच्या भाच्याने सांगितले की पुर्ण पंढरपुर मधे हे असे एकच ठीकाण आहे जिथे स्वच्छता आहे. आम्ही तिथेच जेवण ही केले आणि पंढरपुर बस स्टॉप वरुन बस पकडुन ३.३० वाजेच्या दरम्यान सोलापुरात परत आलो. आल्यावर मोगले गाठले, इरकल साड्यांची खरेदी केली आणि पुलगम मधे गेलो, तिथे खरेदी करुन ८ वाजे पर्यंत आमच्या राहायच्या ठीकाणी आसरा एरीयात आलो, मग तिथे स्मोकीज पिझ्झा इथे जाउन मस्त चिकन पिझ्झा हाणला. आणि खुप थकल्याने झोपी गेलो, आम्ही ज्या कलिगच्या बहीणी कडे राहत होतो तिच्या नवर्‍याला तातडीने हॉस्पीटलाईज करावे लागले होते आणि ते आय.सी.यु. मधे होते, त्यामुळे त्यांच्या घरात आम्ही दोघीच होतो , आम्ही हॉटेल मधे शिफ्ट होण्याचा विचार केला पण त्या ताई म्हणाल्या मला खुपच वाईट वाटेल जर तुम्ही गेलात तर मी काहीच करु शकले नाही , मी नसले तरीही तुम्ही प्लीज इथेच राहा शेवटी त्यांच्यासाठी आम्ही तिथेच राहीलो.

In reply to by कविता१९७८

मंदीराची दुरावस्था पाहुन धक्का बसला, मंदीरात जवळपास १-२ महीने झाडले नसेल इतकी धुळ होती , खुप गर्दी , आणि टॉयलेट्स नुसते नावाला , ज्यांच्या कडे लहान मुले होती ती तर रांगेतच धक्क्यावर लघुशंका उरकत होते, पश्चात्ताप वाटला इथे आल्याचा, २.३० ते तीन तास रांगेत होतो. .......... मंदीर पाहुनच माझा जीव अक्षरशः कावला होता थोडेसे विषयाबाहेरचे - माझ्या एका भारतभर फिरलेल्या अभारतीय मित्राने विचारलेल्या प्रश्नाला मला उत्तर सापडलेले नाही - प्रश्न होता "बरीच हिन्दू धर्मस्थळे अतीशय गलिच्छ आणि कुठलीच व्यवस्था नसलेली अशी असतात, पण इतर धर्मियान्ची धर्मस्थळे तेव्हढीच गर्दी होणारी अशी असली तरी जास्त स्वच्छ आणि व्यवस्थित असतात. असे का?"

In reply to by कविता१९७८

सोलापुर सोडल्या नंतर दुसरे स्टेशन होदगी (नाव नीट आठवत नाही) स्टेशन गेल्यावर महाराष्ट्र बॉर्डर संपते आणि कर्नाटक बॉर्डर लागते आणि फोनला रोमिंग सुरु होतं अक्कलकोट आणि गाणगापुर दोन्ही ठीकाणी रोमिंग लागलं होतं . > सोलापूर नंतर 'होटगी' स्टेशन लागते मात्र कर्नाटक बोर्डर अजून पुढे आहे. आणि अक्कलकोट महाराष्ट्रातच येते (सोलापूर जिल्हा) तिथून पुढे काही अंतराने कर्नाटक सुरु होते. गाणगापूर मात्र कर्नाटकात आहे. सोलापुरात रोमिंग नसेल तर अक्कलकोटमध्ये पण नसणार.

In reply to by कविता१९७८

सोलापूर नंतर 'होटगी' स्टेशन लागते मात्र कर्नाटक बोर्डर अजून पुढे आहे. आणि अक्कलकोट महाराष्ट्रातच येते (सोलापूर जिल्हा) तिथून पुढे काही अंतराने कर्नाटक सुरु होते. गाणगापूर मात्र कर्नाटकात आहे. सोलापुरात रोमिंग नसेल तर अक्कलकोटमध्ये पण नसणार.

In reply to by अदि

आद्याच ना जोशाचा तू? कधी आला होतास रे न सांगता? समोर तर हपिस हाय माझे. आपले किसनदेव अणी मालकांणी पण चव चाखलीय अंगराज ची. भारी नाही पण ओके आहे.

In reply to by अभ्या..

मी मुलगी आहे, अदिती.. गेल्याच्या गेल्या वर्षी आलो होतो सोलापुरात. पण आता परत आले तर नक्की येइन हापिसात... ;)

In reply to by कोमल

आमचा जाहिरातवाला आदिजोशी समजलो म्या. दातं काढायची गरज नै. तू आलीस तर तेथे जेवू देऊ नका म्हणून सांगण्यात येईल.

In reply to by विक्रान्त कुलकर्णी

अशा लै डीट्टेल चौकश्या केल्या तर आमच्या सोलापुरात 'पैले ये तर बे." असे उत्तर द्यायची पध्दत आहे. ;) आणि अर्थातच अश्या चौकश्या करुन ट्रीपा ठरवायची आमच्या हितं लोकांना सवय नाही. झाली तर झाली गैरसोय. सगळेच आपल्या मनासारखे अन प्लॅनड करायला आपण काय वीणा नायतर केसरी हावोत काय.

In reply to by चौथा कोनाडा

देऊळ आहे तिथं नदीच्य काठावर, घाट पन मस्त आहे नदीवरचा. शांत ठिकाण आहे. गजबजाटात राहनारांना तर नक्कीच आवडेल.

मी मुद्दामहून पंढरपूर आणि विजापूर - बदामी धाग्याबद्दल उल्लेख केला नाही.माझ्या मते धार्मिक सहलींत तुळजापूर पंढरपूर वगैरे भाविक असणे गरजेचे आहे कारण अस्वच्छता फार आहे. शिवाय कधीकधी दर्शनरांगा फार असतील तर तुमचे वेळापत्रक कोलमडू शकते.श्रद्धेचा बाजारही असतो.( त्याबद्दल कधीतरी नंतर . )शांतपणे दोन तीन ठिकाणेच पहा. दोन वर्षांपुर्वी सोलापुर एसी रिटाइरिंग रूम रू ५५०/ आणि साधी रू ३५०/ होती. मला विजापूर ट्रिप दर्म्यान भेटलेल्या एका डॅाक्टरने सांगितले रूम चांगल्या होत्या.अगदी सकाळी तुळजापुरला गेल्यास गर्दी अजिबात नसते.दुपारच्या वेळेस पंढरपूर करा. इथूनच( सोलापूर) सकाळी सहाला सुटणारी हुबळी इक्सप्रेस साडेआठला विजापूरला जाते.वरती रूमवरच असल्याने धावपळ होणार नाही.विजापूर पाहून ( गोलगुंबज, इब्राहिम रोजा)) संध्याकाळी परत येता येईल.

अलमट्टी धरण: विजापूर ते बदामी रेल्वेप्रवासात अलमट्टी धरण फुकट पहायला मिळते कारण रेल्वे ( सोलापूर- हुबळी) वीस मिनीटे कडेकडेधेच जाते.बस मात्र थोडी दुरून जाते. सोलापुरी जडजड चादरी धुवायला फार त्रास पडतो त्यापेक्षा को-ओप्टेक्स च्या बेडशीटस वापरणे बरे पडते. सध्या तीस टक्के दसरा सेल आहे मुलुंड,मुंबईला.

In reply to by कंजूस

कंजूस साहेब आपल्या माहिती बद्दल आभारी आहे. तसेहीकोत्ठेही मी खरेदीच्या पूर्ण विरुद्ध आहे. माझा अनुभव असा आहे की त्याच रेट्मध्ये मुम्बै मध्ये तीच वस्तु खत्रिशिर पणे मिळते.

सोलापूर मधील काही न चुकावावेत असे खाद्य पदार्थ: १} भाग्यश्रीचा बटाटे वडा २} पार्क किंवा सात रस्ता येथील डिस्को भजी ३} सुधा ची इडली / गणेश चा उत्तपा आणि डोसा ४} पार्क येथील भैयाची भेळ ५} सराफ कट्ट्याजवळ मनोज भेळ ६} कन्दले किंवा पुणेकर कामठे उसाचा रस बाकी हॉटेल्स पुष्कळ आहेत आणि तिथे सगळ मिळते

In reply to by chetanlakhs

हे भेळ प्रकरण गाणगापुरला जाताना ट्रेनमधे खायला मिळाले , काही पदार्थ जे मुम्बईची स्पेशालिटी आहेत उदा. भेळ , पावभाजी , बटाटावडा , ईडली ई ती बाहेर काही केल्या चव येत नाही हे माझे वैयक्तीक मत. प्रत्येक ठीकाणी चव बदलते.

वर ज्या काहि लोकानि सोलापुर रेल्वे स्टेशन च्या अस्वछ्तेबाबत लिहिलय ते सगळ खोट आहे आपण या सोलापुर ला मग कळेल किति स्वछ आहे ते. स्वछ्तेबाबत सोलापुर स्टेशन कायम जागरुक आहे अणि कायम सोलापुर ला त्याचि ट्रोफि मिळते आपण सोलापुर ला या अणि पाहा.

अक्कलकोट्ला गेलात तर एस. टी. स्टॅड जवळचा राजवाडा आणि छोटेखानी म्युझिअम पाह्ण्यास विसरु नका. स्टॅडपासून १० मिनीटावर आहे. मासनूरला गेलात तर जवळच असणारा औरन्ग्जेबाने बान्धलेला किल्ला जरुर पहा. नळ्दुर्ग किल्ला हि असेच न चुकवता येणारी जागा.

सोलापुरात सात रस्त्याजवळ डॉमिनोज आहे. भागवत पाशी अ‍ॅडलॅब आहे. मॅक्डी अन केएफसी तिथेच होतेय. बिगबाझार अन तळवलकर जवळ जवळ आहेत. चोकोलेड लै ठिकाणी आहे. ली रँग्लर लिनन क्लब वूडलँड पीएनजी अन लीवाईस एका लैनीत व्हीयापी रोडवर आहेत. वोल्व्होच्या लोफ्लोअर सिटीबस आहेत. बाकी उरलेले सोलापूर जरासे गलिच्छ आहे. ;)

In reply to by प्यारे१

मिरची भजी अर्धवट तळून बाहेर काढायची. त्याचे उभे काप करायचे. (मिरची सुध्दा विभागली जाईल.) आणि ती परत तळायची. यात थोडा चाट मसाला सोबत खायची. बहुतेक दोनदा तळतात म्हणुन डिस्को असे म्हणतात.

In reply to by मांत्रिक

जे मिरची भजी खावू शकतात त्यांना डिस्को भज्यानी काहीही होणार नाही..सोलापुरकारांसाठी मिरची भजी ही तिखट प्रकारात मोडत नाहीत..तिथली माणसे जास्त तिखट आहेत

कविता१९७८ फार उपयोगी माहिती दिली आहे.जो कोणी पुढे जाईल त्यास ट्रीप ठरवायला फारच उपयोगी पडेल.प्रवासाचा वेळ आणि सोयी कळल्याने तिथे मुक्काम करायचा अथवा पाहून परत यायचं यासाठी बारीकसारीक तपशील महत्त्वाचा असतो. नरेन,कुठे गेल्यावर मी उगाच चौकशा करतो त्यामुळे सोलापूर रिटाइरिंग रूमबद्दल त्या डॅाक्टरकडून समजले.ते विजापुरात हेरिटेज हॅाटेलमध्ये (मयुरा अदिलशाही अनेक्स )राहिले होते रु अडिच हजारात हेरिटेज चांगले होते असे त्यांचे म्हणणे होते

यांच्याशी पूर्ण सहमत. सोलापूर रेल्वे स्थानक अतिशय स्वच्छ आहे. रेल्वे फलाटावर पिचकाऱ्या अजिबात दिसत नाही.खाण्यासाठी अजुन एक ठिकाण म्हणजे कन्ना चौकातील पाणी पुरी..पवार बंधू यांचे साड्यांचे दुकान मोठे आहे. तसेच सोलापूर महापालिका कार्यालय इंद्र भुवन पाहणे पण चुकवू नका. बाकी अजून काही मदत हवी असल्यास सांगा.

In reply to by मनिमौ

सोलापूर शहरात सिद्धेश्वर मन्दीर, तलाव व किल्ला या व्यतिरिक्त पहाण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत ?

कडक भाकरी हा प्रकार तर सांगायचा राहूनच गेला..अफलातून चीज आहे..

नॉन व्हेज वाल्यासाठी शीग मटन. चकोले मटन भाजनालयातले (भोजनालयातले नव्हे). शाकाहारीसाठी कडक भाकरी, शेंगा भाजी, घट्ट दही, मटकी फ्राय, पेंडपाला, हुग्गी, शेंगा पोळी, खवा पोळी हे सर्व हॉटेलात मिळतात. ब्राह्मणी जेवणासाठी (तसा बोर्ड आहे) अनादी च्या दोन शाखा. पूर्व भागात आंध्रा लोणचे, रायचूर (आंध्रा) भजी, चारु बोवा, हिरवे मटण, दालचा हे पण मिळते. नाश्त्याला अगदी ५ रु डिशपासून ८० रु. पर्यंत ईडलीच्या व्हरायटी डिशेस मिळतात. पुरी भाजी ही वेगवेगळ्या ४-५ प्रकारात मिळते. पंजाबी खाऊ घालायला भरपूर ठिकाणे आहेत. तिथे जात नाही.

वेळ असेल तर पद्मशाली चौकात मिळणारी पाणी पुरी ट्राय करू शकता .

बाब्बौ! चौकशीचा धागा शंभरीकडे वाटचाल करतोय.. विक्रांतकाका शेंगा चटणी आणा हो येताना ;) @धन्या, कवा जायचं बे सोलापूरला?

शतकी धागे ही काय फक्त पुण्या-मुंबईची मक्तेदारी आहे काय? खादाडी बाबतीत पुण्यापेक्षा जास्त विविधता आहे सोलापुरात..