Skip to main content

बॉलीवूड, टीवी आणि स्टिरियोटाइप.

बॉलीवूड, टीवी आणि स्टिरियोटाइप.

Published on गुरुवार, 30/07/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
एकदा माझी तामिळ मैत्रीण तावातावाने मला सुनवत होती होती...'यू नॉर्थ इंडियन पीपल'...हो, ती अशी हमरीतुमरी वर आली की मला नेहमी यू नॉर्थ इंडीयन्स वगैरे म्हणते न चुकता. आपल्याला कसं कमीतकमी चार दिशा माहीत असतात नं, तशा माझ्या या मैत्रिणीला दोनच दिशा माहिती आहेत. उत्तर आणि दक्षिण. तामीळनाडू, केरळ पासून वरती साधारणपणे हैदराबाद पर्यंत साऊथ इंडिया आणि हैदराबाद च्या वरती सगळा नॉर्थ इंडिया. बाकी महाराष्ट्र, गुजरात तिकडे बंगाल हे असले कॉंप्लिकेशन्स नकोच आपल्याला. असो. पण तिचा मुद्दा असा होता की आपल्या हिंदी चित्रपटांमधे दक्षिण भारतीय पात्रांना फारच विनोदी दाखवतात. विनोदी म्हणजे छान नाही पण काहीतरी विचित्र. ओढून ताणून यम, यन, वो, पी असे इंग्रजी बोलणारे, बायका कायम कान्जिवरम मधे. केसांमधे भलामोठा गजरा आणि वाक्यावाक्याला अय्ययो असे उद्गार. तिचं म्हणणं एकच की असे का? एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी बोलतांना का नाही दाखवू शकत तुम्ही लोक ? आमच्या लकबींवर, भाषेवर तुमची विनोद निर्मिती का? नंतर मी विचार केला तेव्हा जाणवलं की हे अगदी खरंय. म्हणजे मोजके सन्माननीय अपवाद सोडले तर तिचं म्हणणं खरंय. आपल्या हिंदी चित्रपटांमधे आणि हिंदी मालिकांमधे पात्रांचं, प्रसंगांचं फारच स्टिरियो टायपिंग, एक अती सरसकटीकरण होतं. आता हे बघा, उदाहरणार्थ मराठी बाई ही एकतर कामवाली नाहीतर भाजीवाली नाहीतर कोळीण. ती कशी बोलणार? ' मै बोलती तेरेकू, मेरेको ईतना पैसा मंगता म्हणजे मंगता' अरे....काय...? आणि मराठी पुरूष म्हटला की तो एकतर पोलिस पण तोही कमिशनर नाही - हवालदार. दुसरं म्हणजे एखादा भ्रष्ठ नेता- अमका तमका भाऊ आणि तिसरा प्रकार म्हणजे गॅंग्स्टर. हा तिसरा प्रकार जरा नवीन आहे. थोडाफार राम गोपाल वर्मा च्या सत्या पासून याची बहुतेक सुरूवात झाली असावी. आता पंजाबी खानदान. या समाजाला प्रचंड ग्लॅमर द्यायचं काम आधी चोप्रा आणि नंतर करण जोहर या मंडळींनी केलं. पण तिथेही अतिशयोक्ती. या लोकांच्या रीतीभाती, खाणं-पिणं, बोलणं याचं अती सिंप्लिफाइड चित्रण. एखादा सरदारजी मिनिटा मिनिटाला मित्राच्या पाठीवर दणादण बुक्के घालणार, गडगडाटी हसणार. मग हा स्वभावाने भयंकर विनोदी, मदतीला तत्पर आणि डोक्याने गरम अशा टाइप चा असणार. त्याची बायको पण तेव्हडीच विनोदी. कानात झुमके, वेणीला जरीचा गोन्डा आणि अधून मधून ' छड्डोजी 'वगैरे म्हणणे मस्ट आहे. हे पब्लिक एरवी घरात व्यवस्थित हिंदी बोलत असते पण मधेच यारा तुस्सी, गड्डी चला रहा हू, चल ओये असे शब्द सटासट वापरणे त्यांच्यासाठी फार आवश्यक गोष्ट आहे. या घरातली आजी म्हणजे 'बीजी' हे पात्र. या बीजी एकीकडे खानदान की इज़्ज़त का काय ते सांभाळत असतातच पण साइड बाय साइड आपली 'कूल' इमेज सिद्ध करण्याच्या दृष्टीने जरा डान्स फ्लोर वर नाचून बिचून पण घेतात. मग लाडका नात किवा नातू येऊन तिला माय सेक्सी दादी वगैरे म्हणतो. मग बीजी पण त्याला लाडाने ओये खोत्या (का खोते?) म्हणत त्याचा कान पीरगाळतात. हा सीन फक्त चित्रपटात नाही तर आजकाल टीवी वर सुद्धा अगदी कॉमन झालाय. तिसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे गोवेकर मंडळी. हा तिसरा प्रकार सत्तर, ऐंशी च्या दशकामधे भलताच फॉर्मात होता. चर्चातले शांत वातावरण. मग तिथे छान स्वच्छ इस्रीचा पोशाख केलेले आणि सात्विक हावभाव तोंडावर असलेले धर्मगुरू असतात. ते नेहमी माय चाइल्ड, माय चाइल्ड असे म्हणतात आणि दारात कोणीतरी टाकलेल्या बाळाला नियमीतपणे आसरा देत असतात. आता येते नायिका. ही फार सुंदर आहे. पण त्याचबरोबर गूढ रम्य, उदासरम्य आणि भाविक अशी मल्टिटेलेंटेड सुद्धा आहे. ती कॅण्डल घेऊन चर्च मधे गंभीरपणे बसलेली आहे. तिचा तो भावीक, प्रकाशात उजळलेला चेहरा पाहून हीरो तिच्या अजुन प्रेमात पडतोय ( आठवा--दिलवाले दुल्हनिया, मुझसे दोस्ती करोगे, खामोशी-मनीषा कोइरलाचा). आणखी एक छानपैकी ' वॉट मॅन ' किंवा 'यू नॉटी बॉय' असे वारंवार म्हणणारी मिसेस डिसूझा असते. ही बाई हमखास आपल्या चित्रपटाच्या हीरोची घरमलकीण असते आणि अधून मधून आठवणीने आपल्या हीरोला घरातून बाहेर काढण्याची धमकी देत असते. ही तोंडाने खूप फटकळ जरी असली तरी मनाने बाय डीफॉल्ट प्रेमळ. काटेरी फणस, नारळासारखी टणक, वरुन कडक आतून मायेचा झरा, वरुन काटे आत पिकलेला गर वगैरे, वगैरे. हिंदी चित्रपट आणि मालीकांमधे ब्रेकफास्ट हा पण टिपिकल प्रकार. जूस म्हणून ठेवलेले पण शेंदरी रसना नी भरलेले ग्लास, प्लेट मधे असलेली ब्रेड स्लाइसस ची थप्पी आणि बटर. ' चलो बेटा नाश्ता करलो' म्हणताच तो बेटा बसणार आणि ब्रेड बटर खाणार. सोप्पं काम. बरेच वेळा बेटा किवा बेटीला नाश्ता करायला वेळच नाहीये. मग आई बिचारी सो कोल्ड जूस चा ग्लास घेऊन मागे धावणार..'बेटा जूस तो पिलो'.....अगं बाई...रिकम्यापोटी ऑरेंज जूस? अ‍ॅसिडिटी नाही का होणार? दुसरं म्हणजे अल्लड कॉलेज कन्यका येणार आणि ब्रेकफास्ट न करता टेबलवरचं एक सफरचंद घेऊन खात खात पळणार. इथे सफरचंद हे फळ फारच डिमांड मधे आहे. कधीही चिकू, पेरू अशी फळं नाहीच ओन्ली सफरचंद. अर्थात सरसकट सगळ्याच हिंदी चित्रपटांमधे हे असे स्टिरियोटाइप असतात अस नाहीये. काही अपवाद आहेतच. पण असे अपवाद दुर्दैवाने खूप कमी असतात हे सत्य आहे. हे कबूल आहे की या वरच्या सगळ्या उदाहरणात थोडेफार तथ्य असतेच. नाही असे नाही. पण म्हणून काय आपण त्या इतक्याश्या चौकटीतच राहून विचार करायचा? बरेच गुणी दिग्दर्शक हे स्टिरियो टाइप्स टाळण्याचा प्रयत्न करतात. हे आशादायी आहेच पण आजकाल तर मला असही वाटतं की चित्रपटांच्या पेक्षा जास्तं हा प्रकार हिंदी मालिकांमधून होतो. खरंतर एखादे अस्खलित हिंदी बोलणारे सुब्रमण्यम स्वामी , एखादे पाटील, देशमुख किंवा देशपांडे आडनावाचे बडे उद्योगपती (मला वाटतं अशी एक हिंदी मालिका आहे सध्या) किंवा मग चष्मा लावणारे एखादे डॉ.कर्तारसिंग नावाचे सरदारजी अशी पात्रं दाखवायला काय हरकत आहे?
लेखनप्रकार

याद्या 17063
प्रतिक्रिया 84

मनोरंजक लेख! आतापर्यंत मी बघितलेल्या एकाच शिनेमात सौधिंडियन असूनही तसे न वाटणारी आलीया भट्ट दिसलीये. शिनेमाचे नाव टू स्टेटस. पंजाब्यांना जरा विश्रांती द्यायला हवीये इतका कंटाळा आलाय. त्यांचे प्राठे, हलवा, बीजी, खन्ना, पुत्तर, चाळणीतून चंद्र या सगळ्याचा कंटाळा आलाय. अजून एक म्हणजे मुसलमानी क्यार्‍याक्टरं! त्यांची ती अल्ला आणि मौला असे शब्द असलेल्या दर्ग्यातील कव्वाल्या! बेंबीच्या देठापासून ओरडत हृदयाला पीळ पाडू पाहणारे ते सानुनासिक आवाजाचे कव्वाल. एकदा का त्यांनी नि सा सा सा ग ग रे ग सुरु केलं की अरे बाबांनो तुमच्या लक्षात तरी कसं राहतं? असा प्रश्न पडतो.

In reply to by रेवती

कव्वाल्ल्यांना +१११११११११११ अरे सतत काय मौला.. खुदा.. शिंघम मध्ये नाही का दोघंही मराठी.. आणि गाणे म्हणताएत मौला.. प्यार का शुकरन का काहीतरी.. लेख एक नंबर जमलाय!!!!
पण त्याचबरोबर गूढ रम्य, उदासरम्य आणि भाविक अशी मल्टिटेलेंटेड सुद्धा आहे
पंचेस मस्त!!!

In reply to by रेवती

अती सहमत. खरोखर आता बस म्हणायची वेळ आलीय. प्रॉब्लेम असा आहे की हे प्रकार आता चित्रपटांमधून आता हिंदी मालिकांमधेही वाढायला लागले आहेत. दुहेरी हल्ला आहे.

In reply to by रेवती

हॅहॅहॅ!! सा प म रे, सा प म रे, ध नी म ग म रे!!! ची आठवण आली पटकन. चहा सांडला असता अंगावर सगळा =))

एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी बोलतांना कसा दाखवणार? तमिळांना हिंदी कुठे येते?

पुर्वी 'गाजर का हलवा' लोकप्रिय होता. चित्रपटातली मॉ आपल्या बेट्यासाठी तो नेहमी बनवायची.कृष्णधवल चित्रपटात अनेकवेळा हिरो टाय वगैरे घालून बागेत फिरत गाणे म्हणताना दिसायचे.
आपल्याला कसं कमीतकमी चार दिशा माहीत असतात नं, तशा माझ्या या मैत्रिणीला दोनच दिशा माहिती आहेत.
मराठी लोकही आहेत.माझ्या एका मित्राला 'साऊथ इंडियन' नावाची भाषा आहे व ती चारही राज्यांमध्ये बोलली जाते असा समज होता.काहींच्या मते प्रत्येक दक्षिण भारतीयाला 'मद्रासी' नामक भाषा येत असतेच.ह्या चारही राज्याची संस्कृती सारखीच आहे व ते राष्ट्रीय स्तरावर नेहमी एकमेकांना पाठिंबा देतात असेही अनेकांना वाटायचे.

In reply to by टवाळ कार्टा

येत नसावं उदा. कोथींबीर वडी,अळवाचे फदफदे,मूग्डाळीचा शिरा,थालपीठे इ. त्यामुळे मराठीतही ब्रेकफास्टला पाव-लोणी अनिवार्य.(लोक मोर्चा काढून सिनेमा बंद पाडतील अशी भिती वाटत असावी असा दाट सौंशय आहे खरा). नास्तालोजीयावाला नाखु

च्यामारी दक्षिनात्य लोक्स हिन्दी कधी बोलतात? परन्तु बाकिच्या लोकांचे काय? ते जरा अतीच होतय.

सौधींडियन लोकांचं कायमचं नुकसान 'पडोसन' नी केलेलं आहे. त्या धक्क्यातून अजूनही सावरता येत नाही. साउथचे कित्येक हिरो अभिनयगुणसंपन्न असूनही फक्त 'मद्रासी' पणामुळे पुढे येऊ शकले नाहीत. कमलहासन ने त्याच्या हिंदीची चुणूक 'एक दूजे के लिये' मधे दाखवूनही फारसा फरक पडला नाही. मात्र साउथच्या हिरवीणींना असा 'स्ट्रगल' करावा लागला नाही.

हाहा. मस्त लिहिलंय. भारतात जसे प्रत्येक राज्याप्रमाणे हे होते, तसेच भारताबाहेर पण बॉलीवुड मुळे भारतीयांची वेगळी इमेज असते. असे बरेच लोक असतात जे बॉलीवुड सिनेमे बघुन आणि त्याच कल्पना डोक्यात ठेवुन प्रत्येक भारतीयाला भेटतात. त्यांचाही काही पुर्ण दोष म्हणता येणार नाही. पण सिनेमात दाखवलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात तशी असतेच असे नाही हे बरेचदा कुणाच्या लक्षातच येत नाही.

जीने नही दूंगा....आर्या प्रेमवीर....अमका नी ढमका..... डोक्यावर अत्याचार नाही का होत आमच्या ? आम्ही बोलतो का काही? उगाच आपलं काहीतरी......

संपूर्ण भारतात ह्या दोनच भाषा असल्यासारखं वाटतं. बॉलीवुडचे चित्रपट एव्हढे का मनावर घ्यावेत. स्टिरिओटाइप दाखवणं हे काही नवीन नाहिये,त्याचा मोह हॉलिवुड पासुन कॉलीवुड, टॉलीवुड अनेक दृकश्राव्य माध्यमांतुन लोकांसमोर आदळतच असतो.अर्थात काही काही अपवाद असतात पण ते इतके कमी प्रमाणात दाखवले जातात कि आले कधी अन गेले कधी पत्ताच नाही लागत. इतक्यात तरी ह्यातुन सुटका नाहीये असं दिसतयं. तरी त्यातल्या त्यात एक समाधान हिंदी चित्रपट्सृष्टीतले अनेक गायक, गायिका, संगीत दिग्दर्शक- ए.आर, हरिहरन, शंकर महादेवन, हम्सिका अय्यर, एस.पी. बालसुब्रमण्यम, येसुदास, हे कुठेही हिंदी-तामिळ्-मराठी लुप मध्ये अडकुन बसले नाहीत. -मयुरा.

लेख आवडला. मागे याविषयावर मिपावरच भरपूर चर्चा झाल्याचं आठवतं.

आलिया भट्ट वगळता दक्षिणभारतीय आहे असे दाखवून तसे अजीबात न वाटलेला कोणतातरी खान 'गोरी तेरे प्यारमें' सिनेमा होता बहुदा. बाकी जे केंद्रिय विद्यालय वगैरे मध्ये शिकलेले असतात किंवा बर्‍याच पिढया पासुन उत्तरेत राहत असतात त्यांचे हिंदी चांगले असते. बाकी हिंदी सिनेमावाले खूप स्टिरियोटाइप आहेत हे मान्य. बाकी कामवाली बाई ही नेहमी नौवारी नेसुन आणि नथ वगैरे घालुन तोडक्या हिंदीत बोलत असते. कामवाली बाई कायम मराठीच का दाखवली जात असावी?

In reply to by जडभरत

हं याचाच राग येतो. ह्यांचे लोक नाही का धुणीभांडी करत? करतात की, पण नॉर्थ इंडियन बिजनेसमन, मुंबईत रहात असतील तर तिथे काय पंजाबी मोलकरीन दाखवतील? कुठल्या पंजाब/दिल्ली साईडला असलेल्या कुटूंबात पाहिली आहे का मराठी मोलकरीन किंवा नोकर?

In reply to by द-बाहुबली

अनुल्लेखानी मारल्यामुळे बॉमकेस बाबूंना राग आलेला दिसतोय. पद्मावती ताई बोंगालीबाबू बद्दल लिहायच राहिलंय. चूक सुधारा जरा.

आणि मार्मीक निरीक्षणः अस्साच प्रकार मराठी सिनेमातही बोकाळला होता. साल १९७० ते अगदी १९९० पर्यंत. नायकः: दोन शाळेत जाणार्या पोरांचा बाप दिसेल असा तरी कॉलेजला जातोय.(एकच पुस्तक घेऊन , मात्र कॉलेजात किमान एक जाड व बाकी पत्रावळी पुस्त्के+नायीका दिसायच्या कश्या ते उलगडले नाही) आणि संध्याकाळी हातात आचार्याच्या झार्‍याप्रमाणे बॅडमिंटन्ची रॅकेट फिरवत जिमखान्याला जाणे अनिवार्य. नायीका : दिसायला आणि आकारमान शाळेत जाणार्या (किमान ५-७ वीत तरी) लेकरांची माय. पण माया सुटलेल्या दोन वेण्या ऊडवीत कॉलेजला जाणार.डोळे फडफडत पदराशी चाळा करीत लाडीक बोलणारच. आई मैत्रीणीकडे जाऊन येते गं हे पेट वाक्यं आणि बापुस एक तर फोटोत नाही तर पेपेर वाचत असतोच (वेळ कुठलीही असू दे सकाळची/दुपार्ची/संध्याकाळची की अगदी रात्रीची). आई पात्र : तमाम जगातील अगतीकता इच्या ठायी नाही तर कमालीची कजागता+तोंडाळ्पणा मधली अधली बातच नश्शे !!! नायीका/नायक बाप : हे अगदीच "पात्र" असते. घरात घडणार्या प्रत्येक किरकोळ बाबींची माहीती असून आपला दिवटा/दिवटी काय दिवे लावतात याचीच फक्त माहीती सर्वात शेवटी लागणारा इसम. बायकोची कटकट झेलणे किंवा बायकोला सतत त्रास देणे अशी दोन टोकाचीच कामे मधले अधले काहीच नसते. जुन्या हिंदी बरोबरच मराठी सिनेमांचा गप गुमान प्रेक्षक

In reply to by नाखु

कुठल्या तरी मराठी सिनेमात सचिन सूट बूट टाय घालून कुठल्या तरी मोठ्या हाॅटेलात जावून काटे चमचा सुरीने समोसा खाताना दाखवलेला. कुणाला आठवतंय का नाव?

In reply to by नाखु

मस्तच.. एकेका वाक्याला टाळ्या..आणि नाखुन काकांचा प्रतिसाद हि भारिच :)

In reply to by पगला गजोधर

पद्मावतींना ड्यु रिस्पेक्ट देत म्हणतो, मी शप्पथ पुन्हा वर स्क्रोल करून लेखक कोण ते बघितलं. मला फारेन्ड आहेत वाटलं वाचताना.

बरयाच सिनेमांत पुर्वी पारसी अंकल व परिवार असे . त्यांचे 'डिक्रा' ऐकायला छान वाटत असे .

लेख छान जमला आहे. स्टिरीओटाइप असतात, हे सर्वसाधारण माणसालाही जाणवतात. विनोद निर्मितीसाठी ते ताणले जातात कधी कधी. काही अपवाद असतात पण मग ते अपवादच असतात. माझ्या एका बंगाली मित्राला मी नेहमी म्हणायचो तू बंगाली नही है तू व को व ही बोलता है ब नही बोलता. मराठी चित्रपटात कि्वा साहीत्यात दूधवाला हा भैयाच असतो. कानडी माणूस एक वेगळ्या सुरात बोलतो आणि शब्द गाळतो. मुळात बहुतेक कानडी जे मुंबई किंवा पुण्याला राहतात ते चांगले मराठी बोलतात. बाकी मराठी माणसाची हिंदी बोलण्याची लय परेश रावलने हेराफेरीमधे मस्त पकडली होती. तसेच विकी डोनर मधली पंजाबी फॅमिली वेगळी होती, तीच गोष्ट आखो देखीची (पंजाबी होती की आणखी कोण माहीती नाही). पिकू मधली बंगाली फॅमिली. बस फक्त दुर्गा पूजा आणि त्यानिमित्त्याने खाणे नव्हते.

कायतरीच!! हिंदी सिनेमा आहे तो.

जाम राग येतो हं विचार केला तर. पण विचार करत नसल्यामुळे हे भाग दुर्लक्षिले जातात. असो. तुम्ही मात्र खत्रा लिहीलंयत ! अचूक्क्क निरीक्षणं.... ह्ह्पुवा

लेख आवडला, पण " larger than life" दाखवण्याच्या नादात प्रचलित चौकट मोडण्याचे धाडस सहसा कोणी (निर्माते, दिग्दर्शक ) करीत नाहीत, एक तर जे ते दाखवणार आहेत ते स्वीकारल जाईल असा त्यांना विश्वास असतो, आणि पाहणारे हि तो सार्थ ठरवतात. आता यात दोष दाखवणार्याच्या की पाहणाऱ्याचा हा संशोधनाचा विषय आहे

पंजाब हा भारतातील एकुणातच दहा टक्के पेक्षा देखील कमी लोकसम्ख्येचा आणि आकारमानाचा प्रदेश. मात्र भारतीय संस्कृती म्हंटले की त्याना पंजाबी स्टाईलचे लग्नच ( हो मेहंदी,सगाई, फेरे ....बीदाइ सहीत...पूरे पाच फंक्षन) आठवते. कधीतरी चेम्ज म्हणुन सुद्धा एखाद्या चित्रपटात मुंडावळ्या बाम्धलेला नवरदेव दाखवतच नाहीत. याचे कारण म्हणजे बहुतेकदा फायनान्सर पम्जाबी असावेत. आणखी एक शंका : वेलकम चित्रपटात फिरोजखान आणि इतर सगळी मंडळी हिंदु दाखवलेली असताना देखील " इन्शा अल्ला " अशा आरोळ्या मारताना दाखवलीत. ती कधीच कोणाला खटकली नाहीत का?

माझे विधान कोणत्याही प्रकारे धार्मवादी नाहिय्ये. फक्त एक हिंदु जमाव कधीच अशाप्रकारे जल्लोश करणार नाही असे अवलोकन आहे.

इथे अमेरिकेत बर्याच अमेरिकन लोकांना भारतीय जेवण म्हणजे पंजाबी (रोटी , करी ) असाच समज आहे

मस्त लिहिलंय! तो गाजर का हलवा "मैंने अपने हाथों से बनाया है" असतो नेहमी. च्यायला, आम्ही काय पायाने स्वयंपाक करतो का मग? पंजाब्यांच्या आणि हिंदी सिनेम्यांच्या सांस्कृतिक आक्रमणाबद्दल सहमत आहेच. परवा पुण्याला एका दोन्ही पार्ट्या देशस्थ आणि शुद्ध पुणेकर मराठी असलेल्या लग्नात मेहंदी आणि नाचाचा प्रोग्राम होता त्या धक्क्यातून अजून सावरले नाहीये. बारात आणि डोली नाही याची मग तीन तीनदा विचारून खात्री करून घेतली होती.

पंजाबी आणि त्यातूनही सरदारजींचं लग्न हा अनुभवण्याचाच प्रकार आहे. तुम्ही जर बाराती (मुलाकडले) असाल तर नाचावं लागेलच आणि त्यांच्या गाण्यांचे बीट ऐकले की आपले पाय नकळत ताल धरायला लागतातच. शिवाय दारू ही पाण्यापेक्षाही जास्त वाहिली नाही तर ते पंजाबी लग्नच नाही. पाण्याच्या उपयोगांमध्ये दारू पातळ करायला हे उत्तर जर कुणी दिलं तर कुठूनतरी पंजाबी डीएनए आलेला अाहे हे नक्की. त्यावरून एक किस्सा आठवला. मी आणि माझे सासरे त्यांच्या एका सरदारजी मित्राच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा मी अजिबात पित नाही हे कळल्यावर त्यांनी सास-यांच्याकडे जी एक नजर टाकली होती - की हाच मिळाला तुला तुझ्या मुलीचं लग्न करून द्यायला!;)

छान लेख..!! काही वेळा मला प्रश्न पडतो की नायक/नायिका हिंदू असुन सुद्धा त्यांचा चर्चमध्ये एखादा सीन का असतो?

मंदिरामध्ये shooting करायला हजारो अडचणी येतात. मुख्य अडचण म्हणजे लोक अनवाणी असावे लागतात. त्यामुळे पूर्ण शाॅट घेता येत नाही. चर्चमध्ये तेवढ्या अडचणी येत नाहीत.

हे कसं वाचायचं राहून गेलं? मस्तच लिहिलय.. स्वाती

हिंदी सिनेमातली मराठी माणसे कायम सातारी पद्धतीनेच मराठी बोलताना दाखवितात. मराठी सिनेमात वा मालिकेत मृतदेहाभोवतीची माणसे पांढरे कपडेच घालून असणार. बाकी,कणेकरांनी लिहिल्याप्रमाणे, खडकम खडकम खडकम करणारी आई तर सर्रास असायची.

जुन्या पिच्चरात हिरो/हिरॉईन चा बाप बर्‍याचदा भिंतीवर असायचा. म्हणजे फोटोत हसत असायचा. हिरो चार-पोरांचा बाप वाटेल असा. घरी आला की आई आपली नेहमीचं काम - म्हणजे पांढरे कपडे घालून शिलाई मशीनवर शिवणकाम करत बसलेली असायची. आता इथे दोन शक्यता असायच्या - १) हिरो म्हणायचा "मा, मै फस्ट किलास फस्ट आ गया" (नशीब, सुटलं एकदाचं कॉलेज / यूनिवर्सिटी.). आई - (फोटोकडे बघत) "काश, आज वो जिंदा होते". २) हिरॉइनला घेऊन घरी यायचा आणि म्हणायचा "मा, ये मेरे साथ कालिज मे पढती है.". हिरोची आई एकदम किती जन्मांपासून तुझीच वाट बघत होते असे भाव चेहर्‍यावर आणून तिच्याकडे बघते. हिरॉइनला हिरो बरोबर गाणं गातांना बघितलं तर हिरॉइनचे वडील म्हणायचे - "आज से इसका कालिज जाना बंद". हिरॉइन पळत पळत आणि रडत रडत तिच्या खोलीत जाणार आणि बेडवर हळूच न बसता, पळता पळता तशीच ऊडी मारणार. हिरो - हिरॉइन एकमेकाला म्हणत आहेत - "सारा जमाना हमारे प्यारका दुश्मन हो गया है". आयला, "सार्‍या जमान्याला" तेव्ह्ढंच एक काम राहिलंय काय? हिरोची आई/बहीण आणि कधीकधी हिरॉईनला पण एक काम असायचंच - पिच्चर संपत आला की व्हिलन ह्या दोघी / तिघींना अंडर कंस्ट्र्क्शन बिल्डिंगच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर बांधून ठेवतो. हिरो त्यांना सोडवण्यासाठी फाइट करणार आणि शेवटी सगळे खीखीखी-खूखूखू करत "दी एन्ड" ...

झक्कास लेख... पद्मावतीतै... असे अजून खुसखुशीत लिखाण येवंद्या.... वाक्यवाक्य अगदी जबराटच आहे... प्रचंड्डडडड मजेशीर...

आयला हे कसं राहिलं बुआ?? पद्मावती ताई एकच नंबर लिहिलेत बघा तुम्ही! खुसखुशीत शैलीत एक गंभीर प्रश्न पुढे आलाय! बहुसांस्कृतिक देशात एकात्मता मजबूत करायला स्टीरियोटाइप तुटणे विलक्षण गरजेचे आहे, पण तुर्तास हे जरी बाजुला ठेवले तरी तुमचे लेखन विलक्षण आवडल्याचे नोंदवतो बाकी नोकरी निमित्त वगैरे आलेले स्टीरियोटाइपच्या मजेदार अनुभवांबद्दल नंतर इथेच एखाद्या पुरवणी प्रतिक्रियेत लिहितो! :)

ह्या लेखासाठी एक प्रदिर्घ प्रतिसाद (नेहमीच्या सवयीने) लिहिला तेव्हाच मिपा गळपाटलं आणि तो ब्लॅकहोलमदे गेला. परत ते सगळं लिहायची ताकत नव्हती राहिली. बघू जमलं तर परत कधी. लेख फक्कड जमलाय. वादच नाही!

सोन्याबाप्पू व डांगेअण्णांच्या अभ्यासू दीर्घ प्रतिसादाच्या प्रतिक्षेत....

छानच लिहिले आहे. वर योगी९०० यांनी चर्चचा उल्लेख केला आहे. फक्त व्यावहारिक सोय हे कारण काही मला पटत नाही.खूप लिहावे लागेल पण थोडक्यात लिहितो.मला वाटते हिंदी सिनेमावाल्यांना ख्रिश्चनधर्माचे अतिरिक्त आकर्षण आहे. किरिस्ताव लोक फक्त ०२% असूनही सिनेमात त्यांना जास्त महत्व आहे. याचे एक कारण म्हणजे ते भव्यदिव्य चर्च, बेल्स,गूढरम्य वातावरण,स्वच्छता ,हिरोईनींचे झगे, हिरोचे कोट,मेणबत्त्या, येशूच्या अन मदर मेरीच्या चेहर्‍यावरील करूण-दयार्द्र भाव वगैरे फारच सिनेमॅटीक मटेरीयल आहे.चर्चचा पाद्री कसा टीपटाप (नाजिर हुसैन)दाखवता येतो नाहीतर मंदिरातील भटजी कायम ढेरी सुटलेला,कळकट किंवा दरिद्री ब्राहमण (भारत भूषण)दाखवावा लागतो. दुसरे कारण म्हणजे हिंदी सिनेमा ब्रिटीश मुंबईच्या कलाकलाने वाढला त्याचाही हा एक परिणाम असावा.त्यातूनच मग हिंदी सिनेमातील बाथटबातील आंघोळी,ब्रेड बटरचा नाश्ता,स्विमिंगपूलवर पहुडलेले व्हीलन,पाइप ओढत 'सिलक का गाऊन' पहनत दडदड जिने उतरणारे चिनॉय सेठ, मेणबत्त्याविझवू बर्थडेपार्ट्या आणि ऑफकोर्स पियानो वगैरे आले असावेत असा कयास आहे. हिंदी सिनेमाचे आद्य प्रवर्तक,फायनानसर फार शिकले-सवरलेले नव्हते.आपल्याकडे जसे एखाद्या अशिक्षित माणसालाही त्याच्या तीन-चार वर्षाच्या मुलाने 'कॉन्वेंट'मध्ये टायवगैरे बांधून जावे,फाडफाड इंग्रजी बोलावे असे वाटते त्याच न्यूनगंडाचा हा सिनेमॅटीक परिणाम म्हणावा लागेल. त्यामानाने साउथच्या सिनेमात हिंदू वातावरण जास्त दाखवतात असे माझे निरीक्षण आहे. बायदवे,बाहुबलीसारख्या आजवरच्या सगळ्यात मोठ्या भारतीय सिनेमाचे तज्ज्ञ,जाणकार,साक्षेपी वगैरे क्लास सिनेसमीक्षकांकडून (जे बहुतांशी डाव्या चळवळी, एफटीआयआय आंदोलन,पुरोगामी वगैरे शब्दांशी निगडीत आहेत असे दिसेल) हवे तसे स्वागत न होण्यामागे त्यात दाखवलेले हिंदू वातावरण,भारतीय परंपरा हेही एक कारण आहे असा माझा वहीम आहे.हीच गोष्ट एखाद्या टिपू सुलतानची वगैरे दाखवली असती तर किती उदोउदो झाला असता? बाजीराव-मस्तानीसंदर्भात वाद निर्माण झाला नसता तर? असूद्या.चर्चा भलतीकडेच जाईल. एका सध्या स्ट्रगलिंग असलेल्या असिस्टंट डायरेक्टर मित्राशी झालेल्या चर्चेत मी त्याला विचारले, 'बाबा तू अजून बाहुबली पाहिला का नाही?'. यावर तो एक कमर्शियल सिनेमा आहे असे तुच्छतापूर्ण उत्तर मला मिळाले.मी त्याला तुम्ही सिनेमाचे विद्यार्थी असाल तर 'कोर्ट' सारख्या रटाळ सिनेमाइतकेच महत्व तुम्ही 'बाहुबली'लाही द्यायला हवे असे आणि इतर बरेच काहीकाही म्हणालो.असो.

In reply to by ए ए वाघमारे

बायदवे,बाहुबलीसारख्या आजवरच्या सगळ्यात मोठ्या भारतीय सिनेमाचे तज्ज्ञ,जाणकार,साक्षेपी वगैरे क्लास सिनेसमीक्षकांकडून (जे बहुतांशी डाव्या चळवळी, एफटीआयआय आंदोलन,पुरोगामी वगैरे शब्दांशी निगडीत आहेत असे दिसेल) हवे तसे स्वागत न होण्यामागे त्यात दाखवलेले हिंदू वातावरण,भारतीय परंपरा हेही एक कारण आहे असा माझा वहीम आहे.हीच गोष्ट एखाद्या टिपू सुलतानची वगैरे दाखवली असती तर किती उदोउदो झाला असता? बाजीराव-मस्तानीसंदर्भात वाद निर्माण झाला नसता तर? असूद्या.चर्चा भलतीकडेच जाईल. एवढे नसते तर प्रतिसाद छान जबरदस्त होता! राहिला प्रश्न त्याच्या तुच्छतापुर्ण प्रतिसादाचा तर असे आहे की ज्या व्यवसायात आपण असतो त्यात समव्यवसायींच्या काही मान्यता, प्रतिष्ठेचे मुद्दे असतात. प्रत्येक व्यवसायात असे 'भारी' आणि 'फाल्तू' समजले जाणारे गट असतात. त्याचे कारण त्या भारी भोवतीची प्रतिष्ठा आणि फाल्तु भोवतीची किव. दोघांचेही काम सारखे असले तरी फॅशन फोटोग्राफर आणि आर्ट फोटोग्राफर यांच्या वजनात फरक असतो. फिल्मजगतात 'फाइन आर्ट' हे 'प्योर आर्ट' समजले जाते तर 'कमरशिय्ल सिनेमा' पोटापाण्याची 'तडजोड'. सामान्य प्रेक्षकाला हे माहित नसते त्यामुळे दोन्हीला समान न्याय का लावत नाही असा प्रश्न पडणे साहजिक आहे. नवनवीन दिग्दर्शकांना ब्रेक मिळण्याचे एक स्रोत म्हणून त्यांनी दिग्दर्शित केलेले सशक्त आर्ट सिनेमा असतात. त्यामुळे कमर्शियलची सावली पडून आपली कला आधीच भेसळू नये म्हणून तो स्ट्रगलर अशा चित्रपटांपासून दूर राहत असावा.

In reply to by संदीप डांगे

कमर्शियल सिनेमाचं ग्लॅमर हवंहवंसं वाटतं पण त्यात शिरकाव करणं खूप कठीण आहे. त्यामुळे हा कोल्ह्याला द्राक्षं आंबट अशातला प्रकार आहे. स्वतःच्या मनाची समजूत घालण्याचा एक प्रयत्न, अजून काही नाही. FTII मध्ये तुम्ही जगभरातले उत्तमोत्तम चित्रपट पाहता. त्यातले सिटिझन केनसारखे काही चित्रपट हे पूर्ण कमर्शियल म्हणूनच काढले होते. आपल्याकडे विमल राॅयसारख्या दिग्दर्शकांनी आर्ट आणि कमर्शियल याचा सुरेख संगम साधला होता. या दिग्दर्शकांचा गोंधळ उडालेला असतो - फेस्टिव्हल आणि तिथला तथाकथित बुद्धिजीवी क्राऊड आणि पिटातल्या टाळ्या आणि शिट्ट्या यातलं नक्की काय करावं हा प्रश्न त्यांना पडतो. त्या असुरक्षिततेतून हा तुच्छतावाद येतो. तो इतर कुठल्याही तुच्छतावादाप्रमाणे केविलवाणा असतो, हेही तितकंच खरं आहे.

In reply to by बोका-ए-आझम

तुम्ही म्हणताय तेही बर्‍याच अंशी बरोबर आहे. 'लक बाय चान्स' ह्या सिनेमात ह्याची झलक बघावयास मिळते. कमर्शियल सिनेमा आणि आर्टफिल्म यात प्रेक्षक कमर्शियल ला उचलुन धरतात, पैसा प्रसिद्धी ग्लॅमर हवेच असते कोणालाही, पण तो खरा सिनेमा नाही हे तुम्हालाही माहित आहे. बाकी प्रत्येक चित्रपट असा काटेकोर आर्ट - का कमर्शियल असा स्पष्ट सांगू शकत नाही. ह्यांना तोच गोंधळ असतो तुम्ही म्हटला तो. बुद्धीजीवींच्या टाळ्यांनी पोट भरत नाही आणि कमर्शियल मधे मन मानत नाही. बाकी स्ट्रगल हे इतके मोठे विश्व आहे आणी त्याला इतके सगळे आर्थिक-मानसिक-सामाजिक पैलु आहेत की बोट ठेवून हेच ते असे म्हणू शकत नाही. खूप स्ट्रगलर पाहिलेत, प्रत्येकाची आपआपली तर्हा असते. कमर्शियल पेक्षा आर्टवर जास्त प्रेम असणार्‍यांना कमर्शियलमधे लवकर ब्रेक मिळतो हे पाहिलंय, त्यामुळे कमर्शियलला वरवर तुच्छ मानण्याचेही कारण असेल. काही सन्मानीय अपवाद सोडलेत तर मुख्य भूमिकांमधे असणारे नायक-नायिका क्वचित स्टेजवाले असतात. पण सहाय्यक, दुय्यम व्यक्तिरेखा वाले अभिनेते ९० ट्क्के स्टेजवालेच असतात.

In reply to by संदीप डांगे

कमर्शियल सिनेमा आणि आर्टफिल्म यात प्रेक्षक कमर्शियल ला उचलुन धरतात, पैसा प्रसिद्धी ग्लॅमर हवेच असते कोणालाही, पण तो खरा सिनेमा नाही हे तुम्हालाही माहित आहे. ं मग़ खरा सिनेमा कोणता? दीवार,नया दौर, दो बिघा जमीन ,विकी डोनर,मसान इ.इ. हे खरे सिनेमे नाहीत का? याचप्रमाणे अमर अकबर अ‍ॅन्थनी, रोटी,ओम शांती ओम, बाजीगर,शोले, कानून,घायल-घातक, दुल्हेराजा,पडोसन इ.इ.सुद्धा मला चांगले सिनेमे वाटतात.ही दुसरी यादी वाचून बुद्धीजीवी माझ्या बुद्धीवर शंका घेतील,पण जे आहे ते आहे. मला वाटते, खर्‍या सिनेमावाल्याने आर्ट की कमर्शियल या वादात पडू नये. सिनेमा एक तर चांगला असतो किंवा वाईट असतो. कमर्शियलला तुच्छ मानण्यामागे एक बुद्धीजीवी अहंगंडसुद्धा असतो.तो मी वर म्हटलेल्या इंग्रजी-साहेबी न्यूनगंडांचेच एक वेगळे बुद्धीजीवी रूप आहे.जसे श्रीमंत लोकांना एसटीबसने प्रवास करण्यात कमीपणा वाटतो(किती घाण माणसं!)त्याचप्रमाणे तथाकथित बुद्धीजीवी,अभिजन लोकांना कमर्शियल सिनेमाप्रती वाटते.याचेच वेगळे रूप साहित्य-संगीतातही दिसते.उदा. रहस्यकथा,गूढकथा,थरारकथा लिहिणार्‍यांना कमी लेखणे.माझ्याच बाबतीत माझी एक रहस्यकथा धनंजय दिवाळी अंकात आली असे सांगितल्यावर रहस्यकथा व धनंजय या दोहोंना 'ई...' करणारे अभिजन रसिक लोक मला भेटले. तू काहीतरी सामाजिक का लिहित नाही असेही मला विचारण्यात आले.पण त्यापेक्षा तुळशीबागेत स्टीलच्या भांड्यांचे दुकान चालवणार्‍या एकाने कथा आवडल्याचा केलेला फोन मला अधिक मोटीव्हेटींग वाटला.असो.

In reply to by ए ए वाघमारे

प्रत्येक कलाप्रकारात 'काहीतरी मूलभूत' असं असतं. त्यानुसार ते खरं समजल्या जातं. जशी पेड न्युज ही खरी पत्रकारिता नाही तसाच कमर्शियल सिनेमा हा खरा सिनेमा नाही. तसे नसेल तर पॉर्न-फिल्म्स ह्याही खरा सिनेमा म्हणायला पाहिजे. पिवळी पुस्तके व रेसिपी बुक्स हेही खरं साहित्य असलं पाहिजे, बारडान्सर्सचा डान्स हेही खरं नृत्य समजले पाहिजे. असो. चांगल्या विनोदी धाग्यावर गंभीर चर्चा नको. वाघमारे साहेब, वेगळा धागा प्लिज.

In reply to by संदीप डांगे

एवढे नसते तर प्रतिसाद छान जबरदस्त होता! आपल्या मताचा आदर आहे.पण मला जे जाणवले ते मी लिहिले.हा प्रकार फक्त बाहुबलीपुरताच मर्यादित नाही.ही एक टेण्डन्सी मला जाणवली आहे.(तिचा सध्याच्या राजकीय वातावरणाशी काही संबंध नाही).वेळ मिळाला तर सविस्तर लिहेन.

In reply to by ए ए वाघमारे

वाघमारे काकांशी पूर्ण सहमत. न्यूनगंड आणि अज्ञान यांनी बॉलीवुड पुरते ग्रस्त आहे. दाक्षिणात्य मंडळी तशी नाहीत. त्यांचा कित्ता इतरांनीही गिरवला पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

वाघमारे काकांशी पूर्ण सहमत वाघमारे काका ?..बस्स इत्ताईच सुन्नेका रह गया था!अरे आमचे 'प्रॉस्पेक्टस' इतक्यात कमी करू नका बॅटमॅनजी!अभी तो हम जवान है. इच्छुकांनी/इच्छुकींनी फे.बु.वर आमचा फोटो पाहून घ्यावा!इच्छुकींनी 'मॅरीटल स्टॅटसही' पाहायला आमची काही हरकत नाही.असो,पण आता डांगेजींचा सल्ला ताबडतोबीने ऐकायला हवा...गंभीर लिहिणे ताबडतोब बंद! धाग्याशी संबंधित मुद्दा- या वाघमारे आडनावाचाही प्रॉब्लेम आहे.सिनेमावाल्यांच्या लेखी वाघमारे हा माणूस फक्त पोलीस (तेही हवालदार,पीआय हे जाधव,इनामदार वगैरे असतात) किंवा शिकारी किंवा मारकुटा मास्तरच असू शकतो. आणि या वाघमारे नावाच्या माणसाला 'मिश्या' असणे मस्टच,बरं का? आता इथेच पाहा. वाघमारे आडनाव वाचूनच हा माणूस एक तर काका किंवा दादा (दुसर्‍या अर्थाने)असावा असा बॅटमॅनजींचा समज झाला की नाही बघा! यालाच म्हणतात सिनेमाचा परिणाम आणि ते स्टीरीओटायपिंग की कायसे!बिचार्‍या सिनेमावाल्यांना लोक(माझ्यासकट) उगाच दोष देताय.

In reply to by ए ए वाघमारे

ही जनरेशनची स्टीरिओटायपिंग आहे. आजचे तरुण पहिल्या नावाने स्वतःची ओळख देतात. आडनाव देवून पहिल्या व वडीलांच्या नावाची केवळ आद्याक्षरे ही जूनी पद्ध्त असल्याने बॅटमॅनचा गैरसमज होवू शकतो. पण तो तरुण पोलीस (हवालदार, फौजदार ई) काहीही असला तर मात्र तो स्वतःची ओळख आडनावानेच देणार (उदा: सिंघम , त्याची प्रेयसी पण त्याला सिंघमच म्हणते बाजीराव नाही. धन्य ते शेट्टी काका !!) अवांतर : माझा एक समवयस्क (म्हणजे तरुणच की हो) मित्र आहे, त्याला त्याचे नाव फारसे आवडत नाही म्हणून तो त्याची ओळख आडनावाने देत असतो.

आर्ट( की आर्त) फिल्म काढली आणी ती जोरदार चालली कि ती कमर्शियल फिल्म होते आणी कमर्शियल म्हणून काढली आणी आपटली कि तिला "आर्ट" फिल्म म्हणायचे आणी कमर्शियल फिल्मला आणी एकंदर बाजारीकरणाला शिव्या घालायच्या. असं आहे खरं .

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब, दिलवाले पडण्यामागे असहिष्णुतेचे कारण आहे? खरं कारण तो टिनपाट असल्याचे आहे. प्रतिसाद टंकतांना माझ्या मनात तर दूर दूर पर्यंत हे असहिष्णुता प्रकरण नव्हते. तुम्ही आठवण करुन दिलीत तेव्हा आठवले. हे सर्व सिनेमे पडण्यामागे असहिष्णुता कारण आहे हे नव्यानेच समजले.

In reply to by संदीप डांगे

डांगेसाहेब असहिष्णुता हे एक minor कारण आहे,पण आहे नक्कीच. बाकि तो चित्रपट टिनपाट होताच शिवाय त्याला असणारी बाजीराव मस्तानीची टक्कर वगैरे ही प्रमुख कारणे आहेत.

दिलवाले आपटल्यावर लै आनंद झाला. बाकि पंजाबी अतिक्रमण फार आहे हिंदीमध्ये. . . . बाजीराव मस्तानीमध्ये मराठी थाट आणि डायलाॅग बघून छाती फुगून गेली,म्हणून अशा चित्रपटांना समर्थन दिलं पाहिजे,आपण नाही बघायचं तर कोण बघायचं??

In reply to by प्रदीप साळुंखे

पण पंजाब हाही भारताचा भाग आहे आणि आपल्याला वाटतं पण आपल्या मराठी भाषेनेही हिंदीवर आक्रमण केलंय बरं का. आती क्या खंडाला - हे एक उदाहरण.

एखादा तमिळ माणूस नॉर्मल हिंदी बोलतांना का नाही दाखवू शकत तुम्ही लोक ?
कारण तामिळ माणूस नॉर्मल हिंदी बोलत नाही (२-५% अपवाद सोडून द्या) हिंदीच काय इंग्लिशचेही त्यांचे उच्चार अगदी अजब असतात (फक्त उच्चशिक्षित तरुणांचा काहीसा अपवाद...काहीसाच बरं). चेन्नईला बघा...इतके मोठे शहर आणि राज्याची राजधानी असून हिंदी बोलता येणारे खूप कमी सापडतील (फक्त एखादा मुस्लिम भेटल्यास सुखद धक्का)