Skip to main content

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 24/08/2015 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते. अधिक आषाढ महिना संपून निज आषाढातील पोर्णिमा येईल तेव्हा सुरू करून श्रावण पौर्णिमे पर्यंत करावे लागते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहेे. हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते. व्रत महिनाभराच्या पुण्यकाळात कुणी महिनाभर, कुणी 3 दिवस, कुणी 1 दिवस करतात. हे व्रत ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनींनी शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमाला हिला सांगितले. कोकीळा व्रताची कहाणी: ब्रह्मदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती,, त्याला 101 कन्या होत्या. जेष्ठ कन्या दाक्षायणीचा शंकराशी, 27 कन्या चंद्राला व इतर कन्यांचे विवाह इतर देवांशी करून दिले. दक्षाला पुत्र नव्हता म्हणून कपीलमुनीनूी त्यास पुत्रकामेष्टि यज्ञ करण्यास सुचविले. दक्षाने मग एका विशाल मैदानात यज्ञाची सिद्धता केली. दक्षाने सर्व देवांना, ऋषिनां आमंत्रणे पाठविली, पण शंकराला मात्र वगळले कारण दक्षाला शंकराचे वेदबाह्य वर्तन, स्मशानात राहणे, भुतांचा सहवास, नागांची भुषणे व अघोरी वागणे आवडत नसे. यज्ञाच्या वेळी सर्व देवांनी दक्षाला शंकराच्या अनुपस्थितीविषयी विचारले तेव्हा त्याने शंकराला बोलावण्यास स्पष्ट नकार दिला. मग यज्ञाला आरंभ झाला, पण नारदमुनी (कळलावे) तिथून थेट कैलासावर आले व दक्षाच्या यज्ञाचे रसभरीत वर्णन सांगितले. ते ऐकून शंकर शांत बसले पण दाक्षायणीला मात्र आपल्या वडिलांनी सर्वांना बोलावले पण शंकराला बोलावले नाही याचा राग आला. (बायकांना आपल्या नवर्याला माहेरी बाेलावले नाही तर फार राग येतो.) शंकराने गणपती, शिवगणांचे सैन्य, वाहन नंदी यांना दाक्षायणी सोबत माहेरी पाठवले. तेथे यज्ञ धुमधडाक्यात चालला होता, तेथे वडिल व आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले, हे दाक्षायणिला जिव्हारी लागले. तिने रागाने कुणाला काही कळण्याआधी यज्ञकुंडात उडी घेतली. अग्नीने काही क्षणातच तिची आहुती घेतली. सर्वजण स्तंभीत झाले. काही वेळाने सर्व भानावर आले. सर्वत्र हाहा:कार माजला. नारद गुपचूप निघून कैलासावर गेले व त्यानी शंकराला सर्व सांगितले. हे ऐकूण शंकर ताडकन उठले व रागारागाने आपल्या जटा एका शिळेवर आपटल्या. त्या क्षणी तिथे एक विराट पुरूष (वीरभद्र) प्रगटला. शंकराने त्याला आज्ञा केली सर्व सैन्यानिशी तेथे जाऊन यज्ञाचा विध्वंस करा तसेच सर्व निमंत्रितांचा संहार करून दक्षाला मृत्युदंड द्या वीरभद्र त्वरेने मोठ्या सेनेसह यज्ञस्थळी पोहचला. त्याने हल्ला सुरू केला, सर्व देवांनी व ऋषि-मुनींनी वेदमंत्रांनी दर्भ शक्तीयुक्त करून प्रतिकार केला. वीरभद्राने व त्याच्या सैन्याने भयानक संहार केला, वीरभद्राने तलवारीने दक्षाचे मुडंके छाटून यज्ञात फेकले. बह्मा, विष्णू व नारदाने वीरभद्राने केलेला संहार सांगून वीरभद्राला शांत करण्यास सांगितले. तेव्हा शंकर उठले व यज्ञभूमीवर आले व सर्वांना जिवंत केले. बह्माने आपला पुत्र दक्षाला जिवंत करण्याची पार्थना केली. शंकराने त्याचे मुंडके आणण्यास सांगितले पण ते यज्ञात जळून खाक झाले होते. मग कोणतेही शिर आणा असे शंकर म्हणाले. तेव्हा जवळ पडलेले बोकडाचे मुंडके दक्षाच्या मानेवर ठेवले व त्याला जिवंत केले. नारदाने दाक्षायणिला (शंकराची पत्नी) जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकराने सांगितले की तिचे दर्शन तुम्हाला घडवितो परंतु तिचे शरीर नसल्यामुळे ती पुर्नजीवित होणार नाही. असे म्हणून यज्ञकुंडातील राख हवेत फेकली तेव्हा दाक्षायणी प्रगटली. तिने हात जोडून शंकराची क्षमा मागितली. परंतु शंकर म्हणाले, प्रिये रागाच्या भरात तुझ्याकडून आत्महत्या व यज्ञाचा अपमान हे दोन अपराध घडले. त्याचे फळ अटळ असल्यामुळे पुढील दहा हजार वर्ष तुला काळ्या रंगाची व कुरूप पक्षिणी व्हावे लागेल. दाक्षायणिने उ:शाप मागितला तेव्हा शंकर म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील. शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 34517
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

यापूर्वी १९९६ साली कोकिळाव्रत झाल्याचे स्मरते. माझ्या आईनेही केले होते. आमच्या शहरातल्या एका आघाडीच्या गणपती मंडळाचा देखावाही तेव्हा यावर आधारीत होता.

नवीनच माहिती आहे ही. कडवा चौथपेक्षा ऐकायला चांगली वाटली! ;) ते ऐकून शंकर शांत बसले पण दाक्षायणीला मात्र आपल्या वडिलांनी सर्वांना बोलावले पण शंकराला बोलावले नाही याचा राग आला. (बायकांना आपल्या नवर्याला माहेरी बाेलावले नाही तर फार राग येतो.) ... शंकराने गणपती, शिवगणांचे सैन्य, वाहन नंदी यांना दाक्षायणी सोबत माहेरी पाठवले. या बाबतीत ऐकलेली/लहानपणी वाचलेली गोष्ट किंचीत वेगळी होती. उमेला वाटते की चुकून बोलावले नसेल. शंकर वास्तवाची शक्यता सांगतो पण उमाला तिचे वडील असे वागतील असे वाटत नाही. म्हणून जाण्याचा हट्ट करते. आणि तिकडे गेल्यावर आपल्या नवर्‍याचा झालेला अपमान लक्षात येतो आणि ती यज्ञात उडी मारते... अजून एक घोटाळा दिसतोय म्हणजे गणपतीस पाठवणे. गणपती हा उमे नंतरच्या पार्वतीचा मुलगा, त्यामुळे तो तेंव्हा तिथे कसा असेल? यावरून जसाच्या तसा नाही पण महादेवशास्त्री जोशी यांनी मानिनी नावाचा चित्रपट काढला होता. फक्त त्यात नवर्‍याचा अपमान झालेली (मला वाटते जयश्री गडकर) अधुनिक मानिनी परत माहेरी जात नाही. त्यावेळेस असलेले वरील पौराणिक कथेवरचे गदीमालिखित खाली दिलेले गाणे खूप छान आहे... मानभंग हाचि झाला मंडपी आहेर उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर

खूप छान लाटकर भाऊ! अतिशय उत्तम माहिती दिलीत. पण जरा लवकर द्यायला हवी होतीत. तसेच व्रतविधी दिला असता तरी बरे झाले असते! संमं ला विनंती करून व्रतविधी पुन्हा अॅड करू शकता.

In reply to by मांत्रिक

हे व्रत एका दिवसातही करता येते. पुजेचे साहित्य: 2 पाट व त्यावर वस्त्रे, अभिषेकासाठी ताम्हण किंवा पसरट भांडे, दोन तांबे, पळीपंचपात्र, घंटा, शंख, समई तेलवातीसह, निराजंण तूपवात भरून, उदबत्त्या, काड्यापेटी, हात पुसण्यासाठी वस्त्र, पाणी. हळद कुंकू, गुलाल, रांगोळी, 2 नारऴ, 10 सुपार्या, तादुळ-गहू प्रत्येकी अर्धा किलो, गंध, पंचामृत (दूघ, दही, साखर, तूप व मध मोठ्या वाटीत एकत्र करून), शेंदूर, काजळ, 6 हिरव्या काचेच्या बांगड्या, गळेसरी, मणिमंगळसूत्र, नैवेद्याला पेढे, गणेश पूजेच्या नैवेद्यासाठी खोबर्याची अर्धी वाटी तिच्यात गुळ टाकून, अत्तर, बदाम, काळे तीळ, साखर, दर्भ, कापूरवड्या, कुंकू लावून तांबडे केलेल्या अक्षताचे भांडे, कापसाच्या सोळा मण्यांची 2 वस्त्रमाळ, तुळसी, दूर्वा, बेल, फुले, सानचाफ्याची फुले, आंब्याची पाने, विड्याची 25 पाने, चाैरंग, कोकीळेची मूर्ती किंवा फोटो (लॅमिनेशन केलेला), कलसात टाकण्यासाठी नाणे, विड्यावर ठेवण्यासाठी 10 रू ची नाणी, पुरोहितांसाठी दक्षिणा. वरील सर्व साहित्य पूजेच्या अगोदर ताटांमध्ये तयार ठेवावे, म्हणजे पूजेच्या वेळी उठावे लागणार नाही. पूजेची मांडणी: पूजा करायची जागा स्वच्छ करावी मोठा चौरंग भिंतीसमोर ठेवून त्याच्यासमोर पूजकासाठी पाट व उजवीकडे पुरोहितासाठी पाट. चौरंगावर गव्हाची रास करून तिच्यावर तांब्या पाण्याने पाऊण भरून ठेवावा. चौरंगावर विड्याची 2 उताणी पाने त्यावर 1 सुपारी व 1 नाणे असे 7 विडे तयार करावे. चौरंगावरील कलसावर तबक ठेवून त्यावर तांदुळ पसरून कोकीळेची मूर्ती किंवा फोटो ठेवावी व गणपतीपूजनासाठी सुपारी ठेवावी. पूजेला सुरवात करण्यापूर्वी समई व उदबत्ती पेटवून ठेवावी. सर्वप्रथम घरातील देवांना, पतीला, वडिल माणसांना व पुरोहितांना नमस्कार करावा. पूजेसाठी आसनावर बसल्यावर प्रथम स्वत:च्या हाताच्या मधल्या बोटाने कुंकुमतिलक लावावा. व हस्तप्रक्षालन करून पूजेला सुरूवात करावी. बाकी माहितीसाठी कोकीळाव्रताची पोथी घ्यावी व त्याप्रमाणे हे व्रत करावे.

In reply to by हेमंत लाटकर

खूप खूप धन्यवाद! मी परवा नाशिकला आलो होतो तर तिथे या व्रताची अगदी जोरात तयारी पाहिली. गंगाघाटापासचं मार्केट व्रतांशी संबंधित गोष्टींनी फुलून गेलं होतं. त्या मानाने पश्चिम महा. व कोकणात अनभिज्ञता आढळते.

छान माहिती दिलात.
यावरून जसाच्या तसा नाही पण महादेवशास्त्री जोशी यांनी मानिनी नावाचा चित्रपट काढला होता. फक्त त्यात नवर्‍याचा अपमान झालेली (मला वाटते जयश्री गडकर) अधुनिक मानिनी परत माहेरी जात नाही. त्यावेळेस असलेले वरील पौराणिक कथेवरचे गदीमालिखित खाली दिलेले गाणे खूप छान आहे...
विकास हेच लिहायला आले होते. महादेवशास्त्री जोशी यांची आई-मुलीच्या प्रेमावर आधारित नितांतसुंदर कथा(जरी मूळ कथेचे बीज वरील गोष्ट असली तरी),गदिमांचे काळजाला भिडणारे परिपूर्ण शब्द,सुधीर फडकेंचे सुरेल संगीत आणि जयश्री गडकारांचा अप्रतिम अभिनय याच्यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे.

व्रत विधी सांगता का? या व्रताबद्दल यावर्षीच पहिल्यांदा ऐकलं. अन आता तुमच्याकडून सव्विस्तर माहिती मिळाली.

In reply to by स्पंदना

पुजेचे साहित्य: 2 पाट व त्यावर वस्त्रे, अभिषेकासाठी ताम्हण किंवा पसरट भांडे, दोन तांबे, पळीपंचपात्र, घंटा, शंख, समई तेलवातीसह, निराजंण तूपवात भरून, उदबत्त्या, काड्यापेटी, हात पुसण्यासाठी वस्त्र, पाणी. हळद कुंकू, गुलाल, रांगोळी, 2 नारऴ, 10 सुपार्या, तादुळ-गहू प्रत्येकी अर्धा किलो, गंध, पंचामृत (दूघ, दही, साखर, तूप व मध मोठ्या वाटीत एकत्र करून), शेंदूर, काजळ, 6 हिरव्या काचेच्या बांगड्या, गळेसरी, मणिमंगळसूत्र, नैवेद्याला पेढे, गणेश पूजेच्या नैवेद्यासाठी खोबर्याची अर्धी वाटी तिच्यात गुळ टाकून, अत्तर, बदाम, काळे तीळ, साखर, दर्भ, कापूरवड्या, कुंकू लावून तांबडे केलेल्या अक्षताचे भांडे, कापसाच्या सोळा मण्यांची 2 वस्त्रमाळ, तुळसी, दूर्वा, बेल, फुले, सानचाफ्याची फुले, आंब्याची पाने, विड्याची 25 पाने, चाैरंग, कोकीळेची मूर्ती किंवा फोटो (लॅमिनेशन केलेला), कलसात टाकण्यासाठी नाणे, विड्यावर ठेवण्यासाठी 10 रू ची नाणी, पुरोहितांसाठी दक्षिणा. वरील सर्व साहित्य पूजेच्या अगोदर ताटांमध्ये तयार ठेवावे, म्हणजे पूजेच्या वेळी उठावे लागणार नाही. पूजेची मांडणी: पूजा करायची जागा स्वच्छ करावी मोठा चौरंग भिंतीसमोर ठेवून त्याच्यासमोर पूजकासाठी पाट व उजवीकडे पुरोहितासाठी पाट. चौरंगावर गव्हाची रास करून तिच्यावर तांब्या पाण्याने पाऊण भरून ठेवावा. चौरंगावर विड्याची 2 उताणी पाने त्यावर 1 सुपारी व 1 नाणे असे 7 विडे तयार करावे. चौरंगावरील कलसावर तबक ठेवून त्यावर तांदुळ पसरून कोकीळेची मूर्ती किंवा फोटो ठेवावी व गणपतीपूजनासाठी सुपारी ठेवावी. पूजेला सुरवात करण्यापूर्वी समई व उदबत्ती पेटवून ठेवावी. सर्वप्रथम घरातील देवांना, पतीला, वडिल माणसांना व पुरोहितांना नमस्कार करावा. पूजेसाठी आसनावर बसल्यावर प्रथम स्वत:च्या हाताच्या मधल्या बोटाने कुंकुमतिलक लावावा. व हस्तप्रक्षालन करून पूजेला सुरूवात करावी. बाकी माहितीसाठी कोकीळाव्रताची पोथी घ्यावी व त्याप्रमाणे हे व्रत करावे.

कोकिळेचा स्वर कानावर पडल्याशिवाय व्रत सुटत नाही असे ऐकलय, हे खरे आहे का?

In reply to by ऋतुराज चित्रे

त्यासाठी पर्यायी व्यवस्था कोकीळेच्या आवाजाची audio clip ऐकली तरी चालते. नाही तर पोथी मधील एक मंत्र म्हणले तरी चालते.

In reply to by हेमंत लाटकर

audio clip ? आपल्याकडे असलेल्या प्राचीन तंत्रज्ञानाची झेप एवढी भारी असेल याची कल्पना नव्हती

हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते.
असं होय! मला वाटलं, या सगळ्या गोष्टी दुसरंच काहीतरी केल्यामुळे प्राप्त होतात. एक दुय्यम शंका. आषाढात आणि श्रावणात कोणते कोकिळ ओरडतात? @@
कॉल्लिंग अत्रुप्त बुवा! तुमचा बिजनेस वाढायची ऑपॉर्च्युनिटी दिसते आहे इथे!

In reply to by पैसा

असं होय! मला वाटलं, या सगळ्या गोष्टी दुसरंच काहीतरी केल्यामुळे प्राप्त होतात.
:O प्रतिसाद वाचुन हा प्रतिसाद नक्की पैतईं नी दिलाय की टवाळ कार्ट्याने असा प्रश्न पडला =))

In reply to by प्रसाद गोडबोले

व्रताचा धागा आहे. सभ्य व्हा. शंका घेऊ नका. देवळात पाया पडायला जातोस तेव्हा इकडे तिकडे पाहतोस का रे श्याम???? ;) - श्यामचा मामा

In reply to by प्रसाद गोडबोले

अगदी असेच! बाकी अनेक कथा उत्तम आहेत पण लै व्रतांच्या कथा मात्र तद्दन बिनडोक आहेत. ती श्यामबालावाली कथाही तसलीच. काय तर म्हणे "माझी पूजा का करत नाही" म्हणून लक्ष्मी रागावते. च्यायला, माझी पूजा करा म्हणून जर भक्तांना ओरडायला लागत असेल तर ती कसली देवी?

In reply to by बॅटमॅन

प्रसाद खाल्ला नाही म्हणून सत्यनारायण बोट बुडवतो म्हणे! मला लहान असताना सत्यनारायणाची भीतीच बसली होती!

In reply to by बॅटमॅन

या व्रतात जीवलग मिपामित्र बोलवून कट्टाजागर करावा. मिसळपावचा प्रसाद खाऊन व तक्रतीर्थ प्राशन करून उद्यापन करावे. नंतर कट्टावर्णन पोथी फोटोसह मिपावर प्रसिद्धा करून कट्ट्याला न येऊ शकणार्‍यांचा मनी जळजळ उत्पन्न करावी. :)

In reply to by बॅटमॅन

धर्माच्या नावाखाली असले बिनडोक बाळकडू पाजत असल्यानेच धर्म म्हणजे बकवास असे वाटू लागते.
म्हणुनच तर आम्ही आर्य सनातन वैदिक धर्मात धर्मांतर केले आहे . नो मुर्तीपुजा . नो भाकडकथा . ओन्ली यज्ञ . तोही नाही केला तरी चालेल फक्त "इदं न मम " म्हणायचे . तेन त्यक्तेन भुञ्जीथा: ! बस्स !! येणार का ? ;) त.टी. : धर्माचे सुधारित नियम (आणि इतिहासही) बनवण्याचा हक्क राखुन ठेवला आहे ह्याची कृप्या नोंद घ्यावी !

In reply to by प्रसाद गोडबोले

धर्माचे सुधारित नियम (आणि इतिहासही) बनवण्याचा हक्क राखुन ठेवला आहे ह्याची कृप्या नोंद घ्यावी !
हे अवडले ;)

In reply to by बॅटमॅन

जास्त भावली. आम्ही एक पोथी सोडून दुसरी पोथी कवटाळली नाही तर कवा (च) टाळली आहे !!! याचे साक्षी साक्षात प्रगो आहेत.

In reply to by बॅटमॅन

पाश्चामात्यांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्याकडील परंपरेने चालत आलेली व्रतवैकल्ये करणे चांगले आहे. पीके मध्ये हिन्दु घर्मियामध्येच जास्त अंधश्रंद्धा आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न झालेला आहे.

In reply to by हेमंत लाटकर

पाश्चामात्यांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्याकडील परंपरेने चालत आलेली व्रतवैकल्ये करणे चांगले आहे
उगाच? कैच्याकै... इथे लोकांनी विचारलेल्या चार प्रश्नांची योग्य उत्तरे आहेत का? उगाच कुणी पोटापाण्याच्या सोयीसाठी कुठल्यातरी कथेत पाणी घालून कसलीतरी व्रते तयार करायची आणि पुढच्या पिढ्यांनी "गप्प बसा" संस्कृती पाळत कसलेही प्रश्न न विचारता पुढे चालू ठेवायची? ती सती परंपरा पण असल्याच (की याच?) कसल्याशा कथेतून आलेली नै? मग परंपरेने चालत आलेली म्हणून ती पण सुरू करायची का परत?

In reply to by हेमंत लाटकर

असली बिनडोक व्रतवैकल्ये करून आपणच आपल्या धर्माला कमीपणा आणतो आहोत. जरा उपनिषदे वाचावीत, थोडेथोडके नामस्मरण करावे ते सोडून असल्या मूर्ख गोष्टींना भाव देण्यात कुणाचाच फायदा नाही. (पुरोहितवर्ग सोडला तर - तुम्ही पुरोहितांचे प्रतिनिधी म्हणून बोलत असाल तर तुमचे म्हणणे मान्य कारण इन दॅट केस तुमचा प्रामाणिक स्वार्थ असेल.)

In reply to by प्रचेतस

ही कथा ब्रिटिशकाळातली आहे? काही आहेत हे माहितीये, उदा. सत्यनारायण. (ब्रिटिश काळ म्ह. १८१८ नंतरच असे नेसेसरी नाय)

In reply to by बॅटमॅन

इणजण्न्रल अशा बहुतेक सर्वच व्रतांच्या कथा ब्रिटिशकाळात आलेल्या आहेत. साधारण १५० वर्षांच्या कार्यकाळात. अर्थात ह्या कथेबद्दल काळ नक्कीच सांगता येणार नाही पण अशा बहुतेक कथा ह्याच काळातील आहेत.

In reply to by बॅटमॅन

मला खरंच एक प्रांजळ मत हवे आहे ह्या विषयावर : आता आपल्याला हे लक्षात येते आहे की असल्या भाकडकथा अन व्रतवैकल्ये हे हिंदु धर्मातील वैगुण्य आहेत मग आपण हे मुळासकट उपटुन टाकले पाहिजेत की आंजारुन गोंजारुन त्यांना सुधारणावादी रुप देवुन चालु ठेवले पाहिजे ?

In reply to by प्रचेतस

यात सामाजिक भाग जास्त आहे का? पूजेचं मार्केटिंग करून पूजा केल्या नाहीत तर अमुक तमुक नुकसान होतं हे जाणीवपूर्वक पसरवलं जाण्याचा उद्देश पुरोहित वर्गाला वाली न उरल्यानं (पेशवाई संपली त्यामुळे) करावी लागणारी उदरनिर्वाहासाठीची धडपड असा काही भाग होता का??? प्रत्येक धर्मात धर्म मार्तण्डान्नी भीती, लालूच, स्तुति वगैरे मार्ग अवलंबून आपापाली पोटं भरण्याचं काम केलेलं आहे.

In reply to by प्यारे१

प्रत्येक धर्मात धर्म मार्तण्डान्नी भीती, लालूच, स्तुति वगैरे मार्ग अवलंबून आपापाली पोटं भरण्याचं काम केलेलं आहे.
हेच हेच आमचेही मत आहे , मात्र आम्ही ते मांडले की आम्हाला टनाटनि हिंदु औरंगजेब वगैरे वगैरे ऐकुन घ्यावे लागते :(((( अर्थात आम्हाला त्याने विशेष काही फरक पडत नाही हे ही तितकेच खरे ;) येथे खरे हे सत्य ह्या अर्थाने =))

In reply to by प्रसाद गोडबोले

पश्या माझं पण आधी तेच मत होतं. आता मी माझ्या जाएगी राहून विचार करतो. खरंच एवढ्या घरांची, फैक्ट्री ची, बांधकामांची गरज आहे का? माझ्या मते नाही. तरीही पैसा रोल होण्यासाठी हे आवश्यक आहे. ते होण्यासाठी (काही अंशी) प्रोजेक्ट सुरु होतात, कंपनीला पैसा मिळतो आमच्यासारखे हजार दोन हजार लोक पोट भरतात. मी दांभिक नाही? (काही जणांसाठी दांभिक च आहे तो मुद्दा सोडा) भारतात गाड्यांची एवढी गरज खरंच आहे? ऑटोमोबाइल इंडस्ट्री सुरु राहावी म्हणून सार्वजनिक वाहन व्यवस्था रस्ते नीट न असन्यामागे एखादी लॉबी असावी अशा पद्धतीनं कामं होत आहेत. किमान एखाद्याला माहिती तरी आहे नेमका गोंधळ काय आहे ते. त्या अनुषंगानं थोडं काम करतोय तो. आज समजलं की हे सगळां व्यर्थ आहे म्हणून मी उद्या नोकरी सोडून जाऊ शकत नाही तसंच एखादा गुरूजी सुद्धा नाही करु शकत ना???

In reply to by प्यारे१

आज समजलं की हे सगळां व्यर्थ आहे म्हणून मी उद्या नोकरी सोडून जाऊ शकत नाही तसंच एखादा गुरूजी सुद्धा नाही करु शकत ना???
मला आज समजले की मी जे काम करतो ते व्यर्थ आहे तर मी ताबडतोब प्रोफाईल बदलेन ! आणि तसेच पुरोहितांनी केले पाहिजे होते : सत्यनारायण हा भाबडे पणा आहे तर तो बदलुन त्याच्या जागी ईशावास्योपनिशदाचे पारायण घ्या , पुरुषसुक्त जातीयवादी वाटते तर त्या जागी नासदीय सुक्त घ्या , अंतिमसंस्कार फालतुपणा वाटतो तर त्याजागी अष्टावक्र गीतेचा पाठ घ्या , नारायण नागबळी अन इतर १७६० शांतींच्या जागी बादरायणाच्या ब्रह्मसुत्रांचा पाठ घ्या !! माझ्या मते प्रत्येक भाकडकथेला चांगला वैदिक तत्वज्ञानावर आधारित पर्याय नक्कीच सुचवता येईल :) - आर्य सनातन वैदिक प्रगो

In reply to by प्यारे१

पेशवाई संपली हा भाग असावाच. पण ह्या कथा जवळपास आख्ख्या भारतात कमी अधिक प्रमाणात पसरलेल्या दिसतात.

In reply to by प्यारे१

पेशवाई संपल्यामुळे पुरोहितांचे हाल चालू झाले असे वाटत नाही. त्यामुळे त्याच काळात अशा कथा का प्रचलित झाल्या त्यामागे कारण वेगळे असावे.

In reply to by बॅटमॅन

एक कारण असं वाटतं की गोव्यात बघते त्याप्रमाणे पोर्तुगीजांच्या अत्याचारांचा परिणाम म्हणून हिंदू लोक जास्तच conservative म्हणावे असे झालेत. इंग्रज अंमलात धर्मंतरासाठी तसा छळ वगैरे नसला तरी ख्रिश्चन धर्मापासून स्वतःचे संरक्षण करण्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून असे काही काही शोधले गेले असावे. न जाणो, व्रते वगैरे करून आपण "काहीतरी" धार्मिक करतो आहोत ही भावना लोकांत रुजत असेल.

In reply to by प्रचेतस

यात सामाजिक भाग जास्त आहे का? पूजेचं मार्केटिंग करून पूजा केल्या नाहीत तर अमुक तमुक नुकसान होतं हे जाणीवपूर्वक पसरवलं जाण्याचा उद्देश पुरोहित वर्गाला वाली न उरल्यानं (पेशवाई संपली त्यामुळे) करावी लागणारी उदरनिर्वाहासाठीची धडपड असा काही भाग होता का??? प्रत्येक धर्मात धर्म मार्तण्डान्नी भीती, लालूच, स्तुति वगैरे मार्ग अवलंबून आपापाली पोटं भरण्याचं काम केलेलं आहे.

In reply to by बॅटमॅन

यात माझा काय फायदा माहितीसाठी हा धागा टाकला. मी काही पुरोहित नाही देशपांडे आहे.

In reply to by हेमंत लाटकर

अर्रर्रर्रर्र आता 'गावगाड्यातला वतनदारांचा रोल" यावर टाका एखादा धागा. तिथे तरी माहीती द्याल.

In reply to by पैसा

प्रसाद खाल्ला नाही म्हणून सत्यनारायण बोट बुडवतो म्हणे!
बघा, देवासारखा देव प्रसादात बोट बुडवतो. लहानपणी कोणाला पाणी देताना चुकून त्यात बोट बुडालं; तर घरचे लोक मोठे डोळे करुन बघत असत!!

In reply to by पैसा

प्रसाद खाल्ला नाही म्हणून सत्यनारायण बोट बुडवतो म्हणे! मला लहान असताना सत्यनारायणाची भीतीच बसली होती! असे म्हणण्याचा उद्देश घरात काही पुजा केली तर प्रसाद न खाणे म्हणजे पुजेचा व श्रद्धेचा अपमान करणे.

In reply to by हेमंत लाटकर

तुम्हाला आवडते तर तुम्हीपूजा करा ना! आणि मला पण बोलवा प्रसादाला. मला प्रसादाचा शिरा खूऊऊऊप्प्प्प्प आवडतो. पण "तू शिरा खाल्ला नाहीस तर बुडशील" असे सांगितले तर लहान मुले घाबरणारच ना! आता काय मी तेवढी लहान नाय्ये. मला पूजा बघायला आणि अत्रुप्त बुवांच्या रांगोळ्यासुद्धा लै अवडतात. मात्र मी पूजा करतो तू २५ जणांचा स्वयंपाक कर म्हटलंत तर मात्र नै अवडणार.

In reply to by हेमंत लाटकर

अच्चा, मंजे प्रसाद म्हणून बेचव गोष्ट गळ्यात मारण्याची ट्याक्ट आहे तर! आवडले बरं का. (लहानपणी शिकरण खाऊन ओकायच्या घाईला आलेला) बॅटमॅन.

म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील
इथे जरा लॉजिक गंडलं असं वाटत नाही काय? च्यायला, हे बरंय... गायला तर ती कोकीळा आणि चावली तर तो डास? ह्यो अन्याव हाय म्हाराजा.

In reply to by थॉर माणूस

इथे जरा लॉजिक गंडलं असं वाटत नाही काय? सगळंच गंडलय. दाक्षायणिने शंकराच्या उ:शापाला फाट्यावर मारले, मस्तपैकी पक्षिणी होऊन चॉकलेटी व पांढर्‍या रंगाच्या ठिपक्यांची साडी नेसून नराला काळा कोट घालून गात बसायला लावले.पुरावा

दाक्षायणीला का शाप? तिने बिचारीने शंकराचा अपमान झाला म्हणून यज्ञकुंडात उडी घेतली आणि शंकराने तिलाच व्हिलन ठरवून दहा हजार वर्षांचा शाप दिला? शाप यज्ञ ज्यांनी केला आणि शंकराला बोलावले नाही त्यांना दिला असता तर एक वेळ शंकराचं फ़्रस्ट्रेशन म्हणून खपवून घेता आले असते. टिपीकल भारतीय नवर्यासारखाच वागला की शंकर...काहीही झाले की बायकोवर राग काढायचा...ये बात कुछ हजम नाही हुई. आणि जटा शिळेवर आपटल्या???? ही कोणती राग व्यक्त करण्याची पद्धत? आणि शंकराला राग नेमका कसला आला? बायको भस्म झाल्याचा? की ज्यांनी यज्ञ केला त्यांचा? कन्फ्युजन है भाई. या कथेत शंकर स्वत:चे डोके अजिबात चालवत नाही. याने-त्याने जे सांगितले त्यावर विश्वास ठेवून आकांड-तांडव करतो. तो नेमका कुणाच्या बाजूला आहे हेच कळत नाही. पुत्रकामेष्टी यज्ञ - हेच पुत्र होण्याचे खूळ अजून उतरत नाही. स्त्री जणू दुय्यम, दासी, नाईलाजाने वाढवलेला जीव ही रोगट विचारांची लागण असल्याच बिनबुडाच्या कथांमुळे जास्त रुजली. ज्या नारदमुनीमुळे हे सगळे घडले ते नामानिराळे! शंकराला हे समजले नाही? बिचारी दाक्षायणी हकनाक बळी गेली कारण ती एक अबला आहे, स्त्री आहे. "कोणतेही शीर आणा". शंकराला एखाद्या मृत माणसाला जिवंत करता येते, एक शीर नाही मिळवता येत? आणि तमाम दुनियेला जिवंत करता येते, दाक्षायणीला नाही जिवंत करता येत. थोडा विचार केला तर लक्षात येईल; या कथेला किती अर्थ आहे ते. एक मनोरंजन करणारी कथा म्हणून जरी बघायचे म्हटले तरी या कथेला काही आकार असल्याचे जाणवत नाही. नुसताच थयथयाट! एखाद्या बी ग्रेड सिनेमासारखा! आपण या असल्या कथांमधून लवकर बाहेर पडायला पाहिजे. बाकी व्रत-बीत किती महत्वाचे हे ज्याचे-त्याने ठरवायचे.

In reply to by समीरसूर

या कथा भगवान शंकरांनी तरी नाहीत ना लिहिल्या? ज्यांनी लिहिल्या त्यांना दोष देणे सोडून हिंदू धर्मात अत्यंत प्रमुख देवता असणार्या भ. शंकरांचा इतका अपमानकारक उल्लेख कशासाठी?

In reply to by मांत्रिक

तो कथालेखकाचाच दोष नाही का? त्यांनी हिंदू धर्मात अत्यंत प्रमुख देवता असणार्या भ. शंकरांचा इतका अपमानकारक उल्लेख कशासाठी केला? त्यांना शिव्या घालायलाच पाहिजेत. इतकेही साधे कळत नाही म्हणजे काय?

In reply to by मांत्रिक

अजिबात अपमानकारक उल्लेख नाहीये. कृपया याला देवतांचा अपमान, धार्मिक भावना दुखावणे वगैरे ठेवणीतला रंग देऊ नये. शंकराविषयी मी जे लिहिले आहे ते कथेतील पात्ररचनेच्या आणि त्या पात्राच्या वागणुकीच्या संदर्भात लिहिले आहे. देवाचा अपमान माझ्यासारखा टिनपाट माणूस करू शकत नाही. इन फ़ेक्ट कुणीच करू शकत नाही. आज-काल धार्मिक कट्टरता इतकी का फोफावतेय? परवा पाषाण रस्त्यावर कार बाजूला थांबवून खाली सतरंजी टाकून १५-२० मिनिटे नमाज पढणारा २०-२१ वर्षांचा मुलगा पाहिला. ही धार्मिकता नक्कीच नाही. हे काहीतरी वेगळंच आहे. पाच-पाच वर्षांच्या पोरांना कडक रोजे करतांना पाहून हसावे की रडावे कळत नाही. वीस वर्षांची तरुणी बुरखा घालू न देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमामुळे मेडिकलची प्रवेश परीक्षा बुडवते आणि एक वर्ष वाया घालवते???? हे काय आहे? उच्चशिक्षित डॉक्टर हॉटेलमध्ये हलाल मटण आहे की नाही याची चौकशी करूनच जेवण घेतो. देव ही आपण जे म्हणू ते ऐकणारी यंत्रणा नाहीये; देव ही सकारात्मक सामर्थ्य देणारी एक संकल्पना आहे हे कधी कळणार लोकांना? अमुक वेळेला नमाज नाही पढली तर देव शिक्षा करेल, अभिषेक नाही केला तर काहीतरी वाईट (किंवा केला तर चांगलं) घडेल, नवस केला तर मुलगा होईल...असं काहीही नसतं. असं कधीही होत नाही. श्रद्धा श्रद्धा म्हणून तरी असल्या गोष्टी किती काळ कवटाळून बसणार आहोत आपण? मूळ मुद्दा लक्षात घेणं महत्वाचं.

In reply to by समीरसूर

समीरसूर साहेब. तुमची बाजू समजली मला. पण माझं यावरचं म्हणणं नंतर मांडतो. आत्ता मोबाईलवर शक्य नाही.

In reply to by समीरसूर

आज-काल धार्मिक कट्टरता इतकी का फोफावतेय? परवा पाषाण रस्त्यावर कार बाजूला थांबवून खाली सतरंजी टाकून १५-२० मिनिटे नमाज पढणारा २०-२१ वर्षांचा मुलगा पाहिला. ही धार्मिकता नक्कीच नाही. हे काहीतरी वेगळंच आहे. पाच-पाच वर्षांच्या पोरांना कडक रोजे करतांना पाहून हसावे की रडावे कळत नाही. वीस वर्षांची तरुणी बुरखा घालू न देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमामुळे मेडिकलची प्रवेश परीक्षा बुडवते आणि एक वर्ष वाया घालवते???? हे काय आहे? उच्चशिक्षित डॉक्टर हॉटेलमध्ये हलाल मटण आहे की नाही याची चौकशी करूनच जेवण घेतो.
गल्ली चुकलासा जनू? ही कट्टरता पाळणारे समोर आले की आपण सर्वधर्मसमभावाचे गोडवे गातो हो!! कथेच्या बाबतीत मुद्दा पटला, पण कट्टरतेच्या बाबतीत नाही. आम्ही स्वमतांध दांभिक असल्याने देव मानतो, दिव्यांच्या अवसेला साग्रसंगीत पूजा करतो, अंबाबाईच्या देवळात धोतर नेसून जातो आणि जाताना कोणी शिवणार नाही याची काळजी घेतो आणि एवढं सगळं झालं की संकेतस्थळांवर कट्टरतेच्या नावाने गळे काढतो. :)

In reply to by सूड

मी वर्षा-दीड वर्षातून एखाद्या वेळेस देवळात जातो आणि ते देखील फिरायला जायचे म्हणून, तिथे जाउन मला हे दे, मला ते दे असे गळे काढायला मी जात नाही. मी ओक्टोबर २०१३ मध्ये मित्रासोबत देवळात गेलो होतो त्यानंतर थेट एप्रिल २०१५ मध्ये देवळात गेलो. ते देखील एक मित्र अमेरिकेतून आला होता आणि त्याला सारसबागेतील गणपतीचे दर्शन घ्यायचे होते म्हणून गेलो होतो. देवळात नेमाने जायचे आणि माणसांशी तुसडेपणाने वागायचे असला दुटप्पीपणा मला कधी झेपलाच नाही. सोवळे वगैरे प्रकार मी कधीच मानले नाहीत.